शनिवार, ११ ऑक्टोबर, २०१४

नेता ऐसा मिळे अम्हाला...

केंद्र सरकारच्या एका ग्रामविकास योजनेचं उद्घाटन आज नवी दिल्लीतील विज्ञान भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. राजकारण, राजकीय नेते, सत्ताकारण यावर मतप्रदर्शन करण्याचं मी नेहमीच टाळतो. पण आजचा कार्यक्रम, त्यातील पंतप्रधानांचे भाषण, त्यातून पुढे आलेली योजना आणि त्यामागची दृष्टी याचं अभिनंदन केल्याशिवाय राहवत नाही. सध्या महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे आणि त्या निमित्ताने खूप बरीवाईट चर्चा सुरु आहे. ती चर्चा करणाऱ्यांनी आणि ज्यांना स्वत:चं, समाजाचं, देशाचं भलं व्हावं असं वाटतं त्या सगळ्यांनी तो कार्यक्रम, त्यातील भाषण जरूर ऐकावं. एकीकडे बारामतीची कुस्ती खेळतानाच दुसरीकडे देशाची, त्यातील ग्रामीण भागांची, समस्यांची, त्यावरील उपायांची, त्यातील खाचखळग्यांची अचूक जाण; प्रत्यक्ष कृतीसाठी दिशादर्शक कल्पना; प्रेरक भाषा; सर्वसमावेशकता; स्वत:चा वाटा उचलण्याचा संकल्प; अशा अनेक गोष्टी केवळ अर्धा तासात, समोर कागदाचा चिटोराही न ठेवता करणारे पंतप्रधान या देशाने पहिल्यांदाच पाहिले आहेत. एकीकडे प्रचाराचे दौरे आणि भाषणांची रणधुमाळी सुरु असतानाच, संपूर्ण देशाच्या ग्रामविकासाच्या संदर्भात मन-बुद्धीची एवढी तयारी आणि टीकेचा वर्षाव सुरु असतानाही मन-बुद्धीचा एवढा समतोल; या काही खायच्या गोष्टी नाहीत. एका संघगीताच्या काही ओळी सहजच ओठावर येतात-
धीरवृत्तीचा उंच हिमालय,
भीषणतेतही निर्भय निश्चल,
नेता ऐसा मिळे आम्हाला,
काय असे मग उणे,
यशाने दुमदुमवू त्रिभुवने...
आणि हे करण्यासाठी मुहूर्त लोकनायक जयप्रकाश नारायण आणि श्रद्धेय नानाजी देशमुख यांच्या जयंतीचा. स्वत:ला जयप्रकाशजींचे वारसदार म्हणवून घेणारे फक्त आणि फक्त मोदीविरोधात बुडून गेले असताना हा नेता त्यांना आदरांजली वाहण्यासाठी संपूर्ण देशापुढे, खासदारांपुढे देशाला पुढे नेण्याचा कृती कार्यक्रम ठेवतो- तोही `अरे हे तर सहज शक्य आहे' असं कोणाच्याही तोंडून निघावं अशा स्वरूपाचा. केवळ मोदी पंतप्रधान आहेत म्हणून केंद्र सरकारने देऊ केलेली मदत नाकारण्यात धन्यता मानणारे जेपीभक्त कुठे आणि अशी मदत नाकारणाऱ्यांनाही आपल्या योजनेत समाविष्ट करून घेण्याची मानसिकता कुठे?

देशाच्या ४०० जिल्ह्यात रात्रीचा मुक्काम करणारे मोदी कदाचित पहिलेच पंतप्रधान असतील. कुठे पाण्याची टाकी असते तर पाण्याचे नळ नसतात; तर कुठे नळ असतात तर पाण्याची टाकी नसते; ही आपल्या ग्रामविकासाची अवस्था माहीत असणारा आणि आपल्या भाषणात त्याचा उल्लेख करणारा हा नेता, स्वत:चे सोडून दुसरे गाव दत्तक घ्या- ही व्यावहारिक सूचना करायलाही विसरला नाही. आपण काही नवीन करीत आहोत असा आव न आणता अन्य लोक अशा प्रकारच्या ग्रामविकासासाठी जे प्रयत्न करीत आहेत त्याचाही उल्लेख करायला ते विसरले नाहीत. एवढेच नाही तर त्या प्रयत्नांची दृकश्राव्य ओळखही करून देण्यात आली. ही निधी देणारी योजना नसून, विकासाची नवीन दृष्टी विकसित करणारी योजना असल्याचे सांगतानाच- supply driven development ऐवजी demand driven development ची कल्पना अभ्यासक, कार्यकर्ते आणि विचारक यांच्यापुढे त्यांनी ठेवली.

आजच्या योजनेचे प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे सांगता येतील-
१) खासदाराने ग्रामीण भागात जावे.
२) ग्रामस्थांशी आपुलकीचे नाते जोडावे.
३) आपण काय सांगतो, त्याऐवजी लोक काय सांगतात ते ऐकावे.
४) आज्ञा देऊन कामे करण्यापेक्षा प्रेरणा देऊन कामे करण्याची पद्धत अवलंबावी.
५) छोट्याशा कामाला मोठ्ठा वळसा घालावा लागणारी पद्धत बदलून तिथल्या तिथे अनेक गोष्टी मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा.
६) आपणही एक गाव दत्तक घेणार असल्याची स्वत: पंतप्रधानांची भूमिका. (ही आजवर ऐकू न आलेली भाषा आहे.)
७) योजनेच्या यशासाठी प्रामाणिकता, कळकळ आणि भावना महत्वाची आहे यावर भर.

यादी आणखीनही करता येईल. मुख्य मुद्दा आहे- या जबाबदारीच्या, पुढाकार घेण्याच्या, झूल उतरवून काम करण्याच्या, कामाच्या बदल्यात कशाचीही अपेक्षा ठेवू नये हे स्पष्टपणे सांगण्याच्या, स्वत:चा वाटा उचलण्याच्या गोष्टी बोलणेही बंद झाले होते. जमिनीवरील पाय उचलले गेले होते. पंतप्रधान ज्या पद्धतीने काम करीत आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा जमिनीवर ठाम पाय रोवण्याची चर्चा सुरु झाली आहे. खरे तर या जगातील सगळ्याच गोष्टींच्या मुळाशी माणसाच्या (समाजाच्या) मनातील भावना आणि डोक्यातील विचार हेच असतात. प्रत्यक्ष कृती आणि त्याचा परिणाम या नंतरच्या गोष्टी आहेत. परंतु आजवर आपण भावना आणि विचार अडगळीत ढकलून सारे काही केवळ वरवर करीत राहिलो. भावना आणि विचारांना हात घालून आणि प्रवाहित करून कृतीला चालना द्यावी लागेल. पंतप्रधान तेच करीत आहेत. नेत्याने दुसरे करायचे तरी काय असते?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक राहिलेल्या भारतीय जनता पार्टीच्या पंतप्रधानांच्या आजच्या आवाहनाला सोनिया गांधी, राहुल गांधी, काँग्रेसचे अन्य खासदार, कम्युनिस्ट खासदार, अन्य समर्थक व विरोधक प्रतिसाद देतील? प्रत्यक्ष काही करून दाखवण्याची, प्रत्यक्ष समाजाचे भले करण्याची ही संधी खासदार उपयोगात आणतील? समाज पाहणार आहे, लोक पाहणार आहेत, जग पाहणार आहे. १०० खासदारांनी जरी हे करून दाखवले तरी पुरे. अन्य ७०० खासदारांच्या पाठीशी लागून जनताच त्यांना हे करायला भाग पाडेल. एकदा ही साखळी प्रक्रिया सुरु झाली की, राजकारणात तग धरण्यासाठी जमिनीवर राहून काम करण्याला पर्याय राहणार नाही.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, ११ ऑक्टोबर २०१४

मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०१४

स्वाभिमान आणि दृष्टीकोन

भारताच्या यशस्वी मंगळ मोहिमेची खिल्ली उडवणारे एक व्यंगचित्र न्यूयॉर्क टाईम्सने प्रसिद्ध केले. जगभरातील भारतीय समुदायाने त्यावर आक्षेप घेतल्यावर त्या वृत्तपत्राने माफीही मागितली. मात्र माफी मागितली म्हणजे वृत्ती आणि दृष्टी बदलते असे नाही. हे व्यंगचित्र काढणारी व्यक्ती सिंगापूरची आहे. काय होते त्या व्यंगचित्रात? कशावर भाष्य होते? भाष्य होते मंगळ मोहिमेला आलेल्या खर्चावर. पंतप्रधानांनी ज्या गोष्टीचा गौरवपूर्ण उल्लेख केला होता आणि समस्त भारतीयांना ज्याचा अभिमान वाटतो अशी ही बाब. हॉलीवूड चित्रपटापेक्षा कमी खर्चात पार पाडलेल्या या मोहिमेच्या खर्चाचा अर्थ, व्यंगचित्र काढणाऱ्या दीड शहाण्याने आणि ते प्रसिद्ध करणाऱ्या अति शहाण्यांनी, भारत दरिद्री आहे असा लावला. एक शेतकरी आपली गाय घेऊन दारावर उभा आहे आणि उच्चभू लोकांच्या क्लबमध्ये आत घेण्याची विनंती करतो आहे, असे त्यात दाखवले आहे. न्यूयॉर्क टाईम्सच्या या आचरटपणातून निर्माण झालेल्या मान-अपमानाच्या प्रश्नाचा योग्य निकाल त्यांच्या माफीने लागलेला आहे. परंतु या व्यंगचित्राने पुढे आणलेल्या इतर प्रश्नांचे काय? वास्तविक तेच या प्रकरणातील खरे प्रश्न असून आज जगाला भेडसावत आहेत. काय आहेत हे प्रश्न?

हे प्रश्न आहेत, जगण्यातील पैशाच्या भूमिकेचे. पैसा म्हणजेच जगणे की पैसा हे जगण्याचे साधन आहे? जी गोष्ट कमी खर्चात होते त्यासाठी अधिक पैसा खर्च करणे शहाणपणाचे की मूर्खपणाचे? कोणाजवळ किती पैसा आहे यावरून व्यक्तीचा, समाजाचा, देशाचा, संस्थेचा दर्जा उच्च किंवा नीच ठरवणे याला सभ्यपणा म्हणावे का? बुद्धिमत्ता, गुणसंपदा यांना काही अर्थ आहे की नाही? अमाप पैसा आहे एवढ्यासाठी निर्बुद्धतेचा गौरव करण्याची वृत्ती माणसाला भूषणावह समजायची का? ज्या मानवेतर सृष्टीवर माणसाचे जीवन अवलंबून आहे त्याबद्दल तिरस्कार, घृणा आणि कमीपणाची भावना मानवाला कमीपणा आणणारी नाही का?

संपूर्ण जगात या प्रश्नांची जी उत्तरे दिली जातील त्याच्या नेमके विरुद्ध भारताचे उत्तर असेल. उत्तरातील हा विरोध वृत्ती आणि विचारांचा परिणाम आहे. वृत्ती आणि विचारांचा हा विरोध आजचाच आहे असेही नाही. हा खूप जुना आहे. अमेरिका आज भारतेतर जगाच्या या दृष्टीची सगळ्यात सशक्त प्रतिनिधी आहे. सुमारे १२५ वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंद यांनी प्रत्यक्ष अमेरिकेतच या वृत्तीचे वाभाडे काढले होते. `डॉलरवर आधारित जीवनमूल्य, डॉलरवर आधारित समाजव्यवस्था, डॉलरवर आधारित विचारपद्धती' यावर प्रचंड कोरडे ओढून त्यांनी त्यातील त्रुटी आणि धोके दाखवून दिले होते. एवढेच नव्हे तर संपूर्ण जगासाठी यासंबंधातील भारतीय दृष्टीकोन कसा योग्य आहे याचेही विवेचन केले होते. आज त्यांनी दाखवलेल्या त्रुटी आणि धोके जगापुढे आ वासून उभे आहेत. जगातील बहुतेक सारेच संघर्ष आणि अशांती भारतेतर दृष्टीच्या स्वीकारामुळेच निर्माण झाले आहेत.

स्वामीजींनी भारताचा स्वाभिमान आणि दृष्टीकोन या दोहोंच्या प्रस्थापनेसाठी काम केले. आज स्वाभिमानाची प्रस्थापना झालेली आहे असा अनुभव येतो. न्यूयॉर्क टाईम्सच्या व्यंगचित्र प्रकरणाने हा अनुभव पुन्हा दिला आहे. दृष्टीकोनाची प्रस्थापना मात्र अजून बाकी आहे. खुद्द आम्ही भारतीय लोकही स्वभिमानापुरता विचार करीत असून, दृष्टीकोनाकडे दुर्लक्ष करीत आहोत अशी स्थिती आहे. `अर्थ' विषयातील भारतीय दृष्टीकोनाची प्रस्थापना हे आगामी काळातील आव्हान आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, ७ ऑक्टोबर २०१४

बुधवार, २४ सप्टेंबर, २०१४

एकात्म मानववादाचे प्रणेते दीनदयाळ उपाध्याय

२६ मे २०१४ रोजी या देशात खऱ्या अर्थाने काँग्रेसेतर पक्षाचे सरकार निर्भेळ बहुमताने केंद्रात सत्तेवर आले. याविषयी आपल्या भावना व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, `हा अनेक पिढ्यांच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे.' स्वाभाविकच त्यांच्या डोळ्यापुढे केवळ भारतीय जनता पार्टीच नव्हे तर त्याचा पूर्वावतार असलेला जनसंघही होता. अनेक पिढ्यांच्या या कार्यकर्त्यांचे मेरुमणी आणि जनसंघाचे संस्थापक महामंत्री पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा २५ सप्टेंबर हा जन्मदिन. उत्तर प्रदेशच्या मथुरा जिल्ह्यातील नागला चंद्रभान या गावी त्यांचा जन्म झाला. वयाची तीन वर्षे पूर्ण करण्याच्या आधीच त्यांचे वडील आणि वयाची आठ वर्षे पूर्ण करण्याच्या आधीच त्यांची आई हे जग सोडून गेले. त्यानंतर त्यांचे संगोपन सिकर येथे त्यांच्या मामांनी केले. सिकर येथूनच त्यांनी दहावीची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली. या यशानंतर सिकरच्या महाराजांनी त्यांना दरमहा १० रुपये शिष्यवृत्ती आणि अन्य खर्चासाठी २५० रुपये दिले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पिलानी, कानपूर आणि आग्रा येथे झाले.

कानपूर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्याशी भेट झाली. त्यानंतर संघाचे ज्येष्ठ प्रचारक बाबासाहेब आपटे, दादाराव परमार्थ, बापू महाशब्दे यांच्याशीही त्यांचा संबंध आला. नंतरच्या काळात राजकीय क्षेत्रात त्यांचे सहकारी राहिलेले सुंदरसिंग भंडारी कानपूर येथे त्यांचे सहाध्यायी होते. १९४२ साली ते रा. स्व. संघाचे प्रचारक म्हणून काम करू लागले. उत्तर प्रदेशचे सह प्रांतप्रचारक म्हणून जबाबदारी सांभाळत असतानाच जनसंघाच्या स्थापनेचा निर्णय झाला आणि त्यांना जनसंघाचे काम करण्यासाठी सांगण्यात आले. जनसंघाची स्थापना प्रथम उत्तर प्रदेशात झाली. त्यावेळी त्याचे प्रथम महामंत्री म्हणून त्यांना जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर काहीच महिन्यात पक्षाला अखिल भारतीय रूप देण्यात आले तेव्हा जनसंघाचे अखिल भारतीय महामंत्री म्हणून त्यांच्याकडे काम सोपवण्यात आले. जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा उजवा हात होऊन ते काम करू लागले. त्यावेळी त्यांचे वय अवघे ३५ वर्षे होते. मात्र त्यांचा कामाचा झपाटा आणि समज पाहून डॉ. मुखर्जी उद्गारले होते- `मला दोन दीनदयाळ द्या, मी देशाचा राजकीय चेहरा बदलून टाकीन.'

जनसंघ बाल्यावस्थेत असतानाच १९५३ साली डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे काश्मिरात कारागृहात संशयास्पद अवस्थेत अकाली निधन झाले. त्यानंतर पक्षाचा सगळा भार दीनदयाळजींच्या खांद्यावर आला. ११ फेब्रुवारी १९६८ रोजी रेल्वे प्रवासात गाडीतच त्यांची रहस्यमय हत्या झाली. त्यांचे वय त्यावेळी फक्त ५१ वर्षे होते. मात्र त्यांना मिळालेल्या उण्यापुऱ्या १५ वर्षांच्या काळात त्यांनी जनसंघाची अतिशय मजबूत पायाभरणी केली. पक्षाला अखिल भारतीय रूप देणे, पक्षाचे संघटन मजबूत करणे, हजारो ध्येयसमर्पित कार्यकर्ते उभे करणे, निवडणुकीच्या राजकारणात पक्षाचे प्रतिनिधी निवडून आणणे आणि या साऱ्याहून महत्वाचे म्हणजे पक्षाला सुदृढ वैचारिक अधिष्ठान मिळवून देणे ही सारी कामे त्यांनी त्या १५ वर्षात केली. त्यांनी पक्षासमोर आणि समाजासमोर मांडलेला `एकात्म मानववाद' कालातीत असून लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, भांडवलशाही, मार्क्सवाद, व्यक्तिवाद, विज्ञानवाद अशा सगळ्या विचारांच्या उलटसुलट खंडनमंडनाच्या वावटळीत भारतीय विचार परंपरेवर आधारित निश्चित दर्शन समोर ठेवणारा आहे.

जनसंघाचे महामंत्री म्हणून काम करत असतानाच दीनदयाळजींना देशातील, समाजातील, राजकारणातील, पक्षातील, प्रशासनातील विचारांच्या अभावाची, अपुरेपणाची अन भरकटलेपणाची जाणीव होऊ लागली. त्याच्याच परिणामी त्यांनी अतिशय सखोल आणि मुलभूत चिंतन केले आणि १९६५ साली एप्रिल महिन्यात २२, २३, २४, २५ असे सलग चार दिवस मुंबईत एका भाषणमालेच्या रुपात ते प्रकट केले. २२ एप्रिल रोजी `राष्ट्रवादाची योग्य कल्पना', २३ एप्रिल रोजी `एकात्म मानववाद', २४ एप्रिल रोजी `व्यष्टी-समष्टीतील समरसता' आणि २५ एप्रिल रोजी `राष्ट्रजीवनाला अनुकूल अर्थरचना' या विषयांवर भाषणे दिली. यातील एकाच भाषणाचे शीर्षक `एकात्म मानववाद' असे असले तरीही त्या चार भाषणांना संकलितपणे दीनदयाळजींनी मांडलेला `एकात्म मानववादाचा' सिद्धांत म्हणून ओळखले जाते. दुर्दैवाने त्यानंतर केवळ तीन वर्षेच ते या जगात राहिलेत, त्यामुळे या अतिशय सखोल अशा विचारदर्शनावर भाष्य करणे अथवा त्याचा विस्तार करणे; तसेच त्याचे व्यावहारिक स्वरूप समाजापुढे मांडणे त्यांना शक्य झाले नाही. म्हणूनच `एकात्म मानववाद' समजून घेताना त्यांचे अन्य लिखाण लक्षात घ्यावे लागते. त्याशिवाय `एकात्म मानववाद' नीट समजून घेता येऊ शकत नाही. त्यांनी लिहिलेले आद्य शंकराचार्यांचे चरित्र, त्यांच्या स्तंभलेखनाचे संकलन असलेली `पोलिटिकल डायरी', त्यांच्या लेखांचे `राष्ट्रजीवन की दिशा' आणि `राष्ट्रचिंतन' या सगळ्यातून त्यांचे सिद्धांत उलगडतात.

दीनदयाळजी जनसंघाचे महामंत्री होते तरीही `एकात्म मानववादाची' वैचारिक किंवा व्यावहारिक मांडणी जनसंघ किंवा भारतीय जनता पक्षाकडून झाली नाही. प्रथम जनसंघाने आणि नंतर भारतीय जनता पक्षाने पक्षाची विचारधारा म्हणून त्याचा स्वीकार केला असला तरीही त्याची चर्चा, विवेचन, मांडणी कधीच केली नाही. उलट मुख्य प्रवाहातील पक्ष होताना कुठेतरी `एकात्म मानववाद' बाजूस सारला गेला का, अशी शंका यावी अशीच स्थिती आहे.

१९७० च्या फेब्रुवारी महिन्यात कानपूरच्या दीनदयाळ उपाध्याय स्मारक शिक्षा समितीच्या वतीने प्रसिद्ध चिंतक दत्तोपंत ठेंगडी यांचे `एकात्म मानववादा'वर एक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. `एकात्म मानववाद- एक अध्ययन' या शीर्षकानेच ते प्रसिद्ध आहे. १९७२ साली कानपूरच्याच दीनदयाळ उपाध्याय सनातन धर्म विद्यालयात रा. स्व. संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचे एक भाषण आयोजित करण्यात आले होते. ते `परिपूर्ण मानव' या शीर्षकाने प्रसिद्ध आहे. एकात्म मानववाद समजून घेण्यासाठी ही दोन्ही भाषणेही उपयुक्त आहेत. त्यानंतर बऱ्याच काळाने, ८० च्या दशकात; म्हणजे दीनदयाळजींनी एकात्म मानववाद मांडल्यानंतर सुमारे वीस वर्षांनी पुण्याच्या `भारतीय विचार साधना' प्रकाशनाने `पंडित दीनदयाळ उपाध्याय विचार दर्शन' नावाचा द्विखंडात्मक ग्रंथ प्रकाशित केला. त्यात एकात्म मानववादाचा विस्तारपूर्वक आढावा आणि परामर्श घेण्यात आला आहे.

या द्विखंडात्मक ग्रंथात प्रसिद्ध पत्रकार आणि विचारवंत वि. वा. नेने यांनी `एकात्म दर्शन'चा आढावा घेतला आहे. दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्राचे संस्थापक आणि प्रसिद्ध पत्रकार भा. कृ. केळकर यांनी दीनदयाळजींच्या राजकीय वारशाची चर्चा केली आहे. जळगावचे व्यावसायिक आणि अर्थशास्त्राचे अभ्यासक श. अ. कुलकर्णी यांनी एकात्म अर्थनीतीचे विवेचन केले आहे. सुप्रसिद्ध संपादक, विचारवंत, लेखक चं. प. भिशीकर यांनी दीनदयाळजींच्या मूलगामी राष्ट्रचिंतनाची चिकित्सा केली आहे. प्रसिद्ध विचारवंत ब. ना. जोग यांनी दीनदयाळजींनी राष्ट्रकारणासाठी केलेल्या राजकारणावर प्रकाश टाकला आहे. `दै. भारत', `केसरी', `महाराष्ट्र टाईम्स', `तरुण भारत', `लोकसत्ता' या विविध वृत्तपत्रातून वाचकांना परिचित असलेले वि. ना. देवधर यांनी अनेक लोकांच्या आठवणीतून दीनदयाळजींचे व्यक्तिदर्शन घडवले आहे. एकात्म मानववादाचा भाव समजण्यासाठी हे व्यक्तीदर्शन लक्षात घेणे अतिशय आवश्यक. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या द्विखंडात्मक ग्रंथाला दत्तोपंत ठेंगडी यांनी लिहिलेली आणि पहिल्या खंडाच्या सुरुवातीला असलेली दीडशेहून अधिक पृष्ठांची विवेचक प्रस्तावना. एक प्रकारे दीनदयाळजींच्या एकात्म मानववादावरील भाष्य म्हणून या ग्रंथाचा उल्लेख करावा लागेल.

काय आहे `एकात्म मानववाद'? एकात्म मानववाद काय आहे याचा विचार करण्यापूर्वी, ते जनसंघ वा भाजपचे आर्थिक, राजकीय, सामाजिक धोरण नाही; हे स्पष्ट व्हायला हवे. दीनदयाळजी एका पक्षाचे अध्वर्यू होते. त्यामुळे त्यांनी मांडलेला विचार हा त्या पक्षाचा धोरणात्मक दस्तावेज असावा अशी कल्पना सहजपणे करण्यात येते. परंतु ती वास्तवाला धरून नाही. दीनदयाळजी जनसंघाचे महामंत्री होते, त्याचवेळी ते विशुद्ध तत्वचिंतकही होते. प्रचलित विचारधारा, वाद, भारताचा आणि जगाचा इतिहास, सद्यस्थिती, मानवी सौख्याची आणि प्रगतीची कल्पना, अशा नाना गोष्टींच्या एकात्म चिंतनातून त्यांना प्रतित झालेले एक संकल्पचित्र त्यांनी `एकात्म मानववाद' या रुपात सादर केले. यात आर्थिक, राजकीय कार्यक्रम नाही. अर्थकारण, राजकारण याची चर्चा निश्चित आहे, परंतु ती ध्येयधोरण आणि दिशादर्शन या स्वरुपाची आहे; आराखडा वा कृती कार्यक्रम या प्रकारची नाही. अर्थकारण वा राजकारणाच्या पायाभूत सिद्धांतांची ही चर्चा आहे. हे विश्व तसेच त्यातील मानव आणि त्याचे जगणे याकडे पाहण्याच्या प्रचलित पाश्चात्य पद्धतीपेक्षा वेगळी दृष्टी दीनदयाळजींनी `एकात्म मानववादात' प्रतिपादित केली आहे. राष्ट्र म्हणजे काय? समाज म्हणजे काय? आंतर्राष्ट्रीयता म्हणजे काय? राजकारणाचं स्थान काय? अर्थकारणाचं स्थान काय? सुखाची कल्पना काय असावी? व्यक्ती, परिवार, समाज, राज्य यांच्यातील सर्वोच्च कोण? अशा अनेक मुलभूत गोष्टींची चर्चा आणि चिकित्सा त्यांनी केलेली आहे. व्यक्ती आणि समाजाचा एकांगी विचार न करता त्यांचे बहुरंगी स्वरूप समजावून घेऊन त्याआधारे मानवी जीवनाची घडी बसवायला हवी, असा त्यांचा निष्कर्ष आहे. माणूस हा आर्थिक प्राणी नाही, राजकीय प्राणी नाही किंवा सामाजिक प्राणीही नाही. हे सगळे त्याच्या व्यापक जगण्याचे अविच्छिन्न भाग आहेत, पण एक भाग म्हणजे पूर्णता; असे मानण्याची चूक आपण करतो आहोत आणि ती दुरुस्त करायला हवी हा त्यांच्या विचारांचा आशय आहे. शिवाय ही सारी अंगे एकाच वेळी विचारात घेणे आवश्यक. एकाचा विचार आता, एकाचा नंतर असे करून उपयोग नाही, असेही त्यांचे प्रतिपादन आहे. हा सगळ्या अंगांचा आणि त्यासोबतच माणसाला कुठे जायचे आहे त्या ध्येयाचा, एकत्रित विचार म्हणजे `एकात्म मानववाद'. या एकात्म, समग्र चिंतनाच्या आधारे त्यांनी कल्पना केलेल्या व्यवस्थेत `धर्म' हा सगळ्या गोष्टींचा मार्गदर्शक आणि नियंत्रक असेल. मात्र त्याच वेळी `धर्म' म्हणजे `रिलिजन/ पंथ/ संप्रदाय/ पूजापद्धती' नाही आणि `धर्मराज्य' म्हणजे `theocratic' राज्य नाही, हे दीनदयाळजी आग्रहाने मांडतात. `धर्मराज्य' म्हणजे पुन्हा हजारो वर्षे मागे जाणे नाही आणि ऐहिक जीवन नाकारणेही नाही, हेदेखील ते प्रखरतेने सांगतात.

येत्या एप्रिल महिन्यात दीनदयाळजींनी मांडलेल्या `एकात्म मानववादाला' ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने त्याची विस्तृत, तपशीलवार चर्चा होईलच. योगायोगाने त्यांनीच स्थापन केलेल्या पक्षाशी नाळ जुळलेला आणि त्यांच्या `एकात्म मानववादा'शी बांधिलकी सांगणारा भाजपा केंद्रात सत्तेवर आहे. त्यामुळे त्याची ध्येयधोरणे, त्याचे कार्यक्रम एकात्म मानववादाशी किती सुसंगत वा असंगत आहेत यांचीही चर्चा होईल. परंतु ते फारसे महत्वाचे नाही. कारण एकात्म मानववाद हा एखादा कार्यक्रम नसून, समाजाचे- मानवाचे- मूल्यभान जागवणारा एक विचार आहे. त्यामुळे तो विचार संपूर्ण समाजापर्यंत पोहोचणे, रुजणे आणि समाजाने त्या दिशेने पुढे जाणे आवश्यक आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, २५ सप्टेंबर २०१४

सोमवार, १५ सप्टेंबर, २०१४

आदर- अनादर

एकेरी बोलणं हा पुष्कळांचा स्वभावच असतो. कोणत्याही व्यक्तीबद्दल असे लोक एकेरीतच बोलणार. ती व्यक्ती मोठ्या पदावर असो, वयाने- ज्ञानाने- मानाने- दानाने- कर्तृत्वाने- कितीही मोठी व्यक्ती असू द्या; हे लोक त्यांचा उल्लेख एकेरीतच करणार. पूर्वी नवरा बायको सुद्धा परस्परांशी बोलताना देखील आदरार्थी बहुवचन वापरीत असत. बहुतेक सगळ्या बायका आणि सगळे नसले तरी बरेच पुरुष सुद्धा आदरार्थी बहुवचनाचाच वापर करीत. अगदी वडील सुद्धा मुलाचे लग्न वगैरे झाले की, त्याला अहो-जाहो करीत. नात्यांमध्ये तर बहुधा आदरार्थी बहुवचनच ऐकायला मिळत असे. स्वामी विवेकानंद यांचे गुरु श्री रामकृष्ण परमहंस यांच्या धर्मपत्नी सारदा मा त्यांच्या परस्पर संबंधांविषयी म्हणत असत- `त्यांनी (म्हणजे श्री रामकृष्णांनी) मला कधीही तू म्हटले नाही.' भारतीय मजदूर संघाचे संस्थापक, एकात्म मानव दर्शनाचे आणि संघाचे थोर भाष्यकार, महान कामगार नेते आणि विचारवंत स्व. दत्तोपंत ठेंगडी यांच्याबाबत मला स्वत:ला असाच अनुभव आहे. सुदैवाने माझा त्यांच्याशी पुष्कळ आणि चांगला संबंध आला. ते नेहमीच अहो म्हणूनच बोलत असत. मी त्यांना पुष्कळदा म्हटले की मी सगळ्याच अर्थाने खूप लहान आहे. वयातही खूपच अंतर आहे, तुम्ही मला अहो नका म्हणू. पण त्यांनी शेवटपर्यंत अहो म्हणणे सोडले नाही.

आज काळ बदलला आहे आणि बहुतेक सगळ्या नात्यांमध्ये एकवचन ऐकायला मिळते. वडिलांचासुद्धा `ए बाबा' झाला आणि नवरा-बायको अरे-अगं वर आले. नव्हे एकेरीतच बोलावे हा आग्रह देखील असतो. बहुवचनी अनेकदा कृत्रिमही वाटते. पण एकेरी संबोधनाची ही पद्धत आता विकृतीकडे झुकते आहे की काय असे वाटू लागले आहे. समवयस्क, वर्ग मित्रमैत्रिणी, कुटुंब, नाती, समाजात वावरताना निर्माण झालेले मैत्र अथवा नाती यात सहजपणे निर्माण झालेल्या आपुलकीतून- स्नेहातून- विकसित झालेले एकेरी संबोधन आणि सगळ्या जगाच्या घुगऱ्या आपण खाल्ल्या आहेत अशा थाटात मान- अपमान- सभ्यता- चांगुलपणा- मनाचा/ वृत्तीचा मोठेपणा हे सगळे गुंडाळून ठेवून वेळ- प्रसंग- वातावरण- कसलाही विचार न करता एकेरी बोलणे; या दोन गोष्टीत महदंतर असते. हे लक्षात घ्यायला हवे. राष्ट्रपती, पंतप्रधान, न्यायाधीश, शास्त्रज्ञ, साहित्यिक, विचारवंत, उद्योगपती, कलाकार असे देशाच्या, समाजाच्या जडणघडणीत, भावविश्वात विशिष्ट स्थान असणाऱ्या लोकांबद्दल; किंवा शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य, कार्यालयीन वरिष्ठ, शेजारपाजारचे ज्येष्ठ, वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, प्रतिभावंत अशा अनेकांबद्दल आदरार्थी बोलताना आपली जीभ का अडखळावी?

एकेरी बोलण्याचा आणखीनही एक गमतीशीर पण अयोग्य पैलू आहे. पुष्कळदा आपल्या सोबतचे, बरोबरीचे लोक पुढे निघून जातात. हुद्दा, सामाजिक स्थान, कर्तृत्व, ज्ञान, साधना, व्यासंग यात ते खूप आघाडी घेतात. अशी आघाडी ठरवून घेतली जाते वा तो एक स्वाभाविक प्रवासही असू शकतो. मागे राहिलेली व्यक्ती डावी वा कमअस्सल असेलच असेही नाही. सारखी क्षमता, योग्यता असूनही दोन व्यक्ती मागेपुढे होतात. यात योगायोगाचा भागही असतो. पण मागे राहणारा पुढे गेलेल्याबद्दल सवयीने वा ठरवून एकेरी बोलतो. कुठेतरी मनातील मागे पडल्याच्या दु:खाला तो अशी वाट करून देतो. मग चार लोकांपुढे किंवा त्याच्या हाताखालील लोकांपुढे सुद्धा त्याच्या मानपानाचा विचार न करता मुद्दाम त्याच्याशी एकेरीत बोलतो. हे योग्य नाही हे कळून सुद्धा. आपण एखाद्याच्या खूप जवळचे आहोत हे दाखवण्यासाठीसुद्धा अनेक जण अनेकदा एकेरीत बोलतात. अनेकदा कशाचा मान आणि कशाचा अपमान असा युक्तिवाद करून सन्मानाने बोलणे टाळले जाते. आपल्या हाताखालचे लोक, आपल्या घरी काम करणारी बायामाणसे, यांचा तर मान ठेवला पाहिजे असे क्वचितच वाटते.

सन्मानाने आणि आदराने बोलल्याने आपण लहान होतो का? आपला अपमान होतो का? आपल्याला कमीपणा येतो का? असे काहीच नाही. उलट, योग्य आदराने, सन्मानाने, बहुवचनी बोलल्याने आपण मोठेच ठरतो. परंतु मोठे आणि चांगले होण्यापेक्षा आपला अहंकार सुखावणे आपल्याला अधिक मोलाचे आणि महत्वाचे वाटते. इंग्रजी भाषेत आदरार्थी एकवचन नाहीच. नसेल. पण इंग्रजीत नाही म्हणून आम्ही ते सोडून द्यावे असे तर नाही ना? आज जग एकत्र येत आहे. भाषांची सरमिसळ होते आहे. भावना, संकल्पना नव्याने आकारास येत आहेत. त्यात काही गोष्टी बदलणार, काही गोष्टी सुटून जाणार. पण हा बदल केवळ एकाच बाजूने होईल वा व्हावा असे तर नाही ना? केवळ मराठीने किंवा हिंदीने बदलावे असे नाही. इंग्रजीही बदलू शकते. आदरार्थी एकवचन आपण सोडून देण्यापेक्षा ५० वर्षांनंतर इंग्रजीने आदरार्थी एकवचन स्वीकारलेले पाहण्यात समाधान आणि सार्थकता नाही का? एकीकरणाच्या या प्रवाहात योग्य-अयोग्य, चांगले-वाईट यांचा विवेक करून त्यापाठी उभे राहणे आणि ठाम राहणे आवश्यक. मनात आदरभावना जपणे आणि आपल्या वागण्याबोलण्यात त्याचं प्रतिबिंब अनुभवायला मिळणे हे योग्य आणि चांगले नाही असे कोण म्हणेल?

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, १५ सप्टेंबर २०१४

गुरुवार, १४ ऑगस्ट, २०१४

अखंड भारत- २

भारताच्या भूभागावरील अन्य देशांचा जन्म साम्राज्यवादी कुटीलतेचा आणि ब्रिटीशांच्या प्रशासनिक चतुराईचा परिणाम होता. पाकिस्तानच्या निर्मितीत या दोन कारणांसोबत सांप्रदायिक उन्मादाचे तिसरे कारण महत्वाचे आणि निर्णायक ठरले होते. नव्हे तेच एकमेव कारण वाटावे इतका त्याचा प्रभाव आणि आवाका मोठा होता. म्हणूनच आजही अखंड भारत म्हटले वा भारताची फाळणी म्हटले की, पाकिस्तानची निर्मिती एवढेच प्रामुख्याने डोळ्यासमोर येते. अखंड भारताची चर्चाही त्याभोवतीच फिरत असते. हे अतिशय स्वाभाविक असेच आहे. याची काही करणे अशी-

१) अपरिमित मनुष्यहानी. किमान १० लाख हिंदूंचे शिरकाण भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी झाले.
२) जगातील आजवरचे सगळ्यात मोठे मानवी स्थलांतर त्यावेळी झाले. हे स्थलांतरदेखील रोजगार वा युद्ध वा तत्सम कारणांनी नव्हते, तर धार्मिक आधारावर लोकांना विस्थापित करण्यात आले होते- तेही दोन भागांपैकी फक्त एका भागातून, पाकिस्तानातून.
३) मानवी अन्याय, अत्याचार, दुराचार, लुटालूट याला तर सीमाच नव्हती.
४) परस्परांशी संलग्न नसलेल्या हजारो मैल दूर असलेल्या दोन स्वतंत्र भूभागांचा एक देश कृत्रिमरीत्या, शासकीय व प्रशासकीय आदेशाने जन्माला घालण्यात आला.
५) हे विभाजन होऊ नये यासाठी, अन्य कुठल्याही विभाजनापेक्षा कितीतरी अधिक नेत्यांनी प्रयत्न आणि प्रतिष्ठा पणाला लावले होते अन ते सारे पराभूत झाले होते.
६) अन्य देश वेगळे झाले तरीही त्यावेळी भारताचे शत्रू जन्माला आले नव्हते. मात्र पाकिस्तान निर्मितीच्या वेळी एक शत्रू देश जन्माला आला. मुळात पाकिस्तानची निर्मिती प्रशासकीय, राजकीय, आर्थिक, सामाजिक कारणांनी झाली नाही तर मुस्लिमांच्या हिंदू द्वेषातून आणि भारत द्वेषातून झाली.

मुळातच `एकं सत विप्रा: बहुधा वदन्ति' हे तत्व हजारो वर्षे रक्तात भिनल्यामुळे सांप्रदायिक आधारावर नवीन देशाची निर्मिती या देशाच्या स्वप्नातही आली नव्हती. सांप्रदायिक कलह हेच मुळात मोगलांच्या आक्रमणापासून या देशात आले. इस्लामच्या कट्टरवादी विचारधारेने येथील बहुलतावादी, उदार विचारांना आणि आचारांना पहिला धक्का दिला. त्यानंतर आत्मसुरक्षा आणि क्रियाप्रतिक्रिया न्यायाने या देशाची घडी विस्कटत गेली.

दुसरीकडे या आक्रमणाने हतबुद्ध होऊनही या देशाची विश्वकल्याणी चिंतनधारा आटली नाही. अनेकानेक संत, संप्रदाय, चिंतक, आंदोलने यांनी बाहेरून आलेल्या या लाटेला आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यशदेखील आले. मूळ संघर्षाची प्रवृत्ती, स्वामित्वाची लालसा आणि त्याला अधिकृत पांथिक पाठींबा असतानाही इस्लामचे भारतीय रूप आकार घेत होते. मूळ भारतीय मानस या दोन भिन्न प्रवाहांच्या एकीकरणासाठी तयार होत होते. अगदी १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात देखील याची झलक पाहायला मिळाली होती. धूर्त इंग्रजांना ते लक्षात आले आणि त्यांनी योजनापूर्वक हिंदू आणि मुस्लिम यांना वेगळे करण्यास सुरुवात केली. आत्मसातिकरणाच्या प्रक्रियेत पहिली पाचर मारली गेली अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या स्थापनेने. या विद्यापीठाच्या रूपाने दोन वेगळ्या अस्मिता पोसण्याचे आणि त्यासाठी इस्लामिक कट्टरता जोपासण्याचे, वाढवण्याचे, त्याला खतपाणी घालण्याचे आणि त्याचे तत्वज्ञान तयार करण्याचे एक सशक्त केंद्र १८७५ साली अस्तित्वात आले. देशाच्या स्वातंत्र्याचा लढा लढण्यासाठी स्थापना झाल्याचा दावा करणाऱ्या (वास्तविक भारतीय जनतेच्या असंतोषाला निरर्थक करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या) काँग्रेस पक्षाच्याही अगोदर मुस्लिम विद्यापीठाची स्थापना घडवून आणण्यात काय हेतू असू शकतो?

अलिगढ विद्यापीठाच्या स्थापनेपासून सुरु झालेला हा प्रवास १९०५ च्या वंगभंग आंदोलनानंतर १९०६ साली मुस्लिम लीगच्या स्थापनेपर्यंत पोहोचला. इंग्रजांनी पसरलेल्या या जाळ्यात काँग्रेसदेखील फसली. खिलाफत चळवळीने त्याला बळच दिले. पाश्चात्य विचार आणि रीतीरिवाज मानणारे आणि पाळणारे, पारंपारिक अर्थाने मुस्लिम म्हणता येणार नाहीत असे मोहंमद अली जिना हे वेगळ्या पाकिस्तानचे प्रतिक बनले. जिना हे पाकिस्तानचे जनक मानले जातात. परंतु वेगळ्या मुस्लिम राष्ट्राची मूळ कल्पना अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे संस्थापक सर सय्यद अहमद खान यांची आहे. १८६७ साली प्रथम त्यांनी ही कल्पना प्रचारित केली. त्यानंतर १८७५ साली त्यांनी मदरसातुल उलुम मुसलमान-ए-हिंद स्थापन केले, त्याचे पुढे मोहम्मेदन अँग्लो ओरिएन्टल कॉलेज झाले आणि नंतर त्याचेच अलिगढ मुस्लिम विद्यापीठ झाले.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना १८८५ साली सर ए.ओ. ह्यूम या ब्रिटीश माणसाच्या पुढाकाराने झाली. सर सय्यद अहमद खान यांना त्यात रुची नव्हती आणि त्यांना त्यात सामील करून घेण्याचा प्रयत्नही काँग्रेसने केला नाही. उलट दोघातील फुट कशी वाढेल याचेच प्रयत्न करण्यात आले. १८८७ साली काँग्रेसचे तिसरे अधिवेशन झाले. बद्रुद्दिन तय्यबजी काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यावेळी सर सय्यद अहमद खान यांनी त्यांना मुस्लिम हितासाठी काँग्रेसच्या बाहेर पडण्याचे आवाहन केले होते. काँग्रेस हिंदूंची प्रतिनिधी आहे, असा त्यांचा तर्क होता. त्याला बद्रुद्दीन तय्यबजी यांनी उत्तर दिले की, मुस्लिमांच्या हितासाठी बाहेर पडण्यापेक्षा काँग्रेसमध्ये राहूनच आपण प्रयत्न करू. परंतु दुसरीकडे काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या याच बद्रुद्दीन तय्यबजी यांनी काँग्रेस नेतृत्वाला एक लिखित विनंती केली की, काँग्रेसमध्ये मुस्लिमांना न्याय मिळत नाही. मुस्लिमांना न्याय मिळावा आणि त्यांच्यात विश्वास वाढावा यासाठी पाच वर्षे काँग्रेस विसर्जित करावी वा स्थगित ठेवावी. थोडक्यात म्हणजे या ना त्या प्रकारे सतत मुस्लिमांचे तुणतुणे वाजवत ठेवायचे. याच भावनेतून १९०६ साली मुस्लिम लीगची स्थापना झाली.

यामुळे त्यांचे वेगळेपण अधिकच उठावदार झाले. त्यांच्या मागण्यांना जोरही आला. वास्तविक यामागे फूस इंग्रजांचीच होती. मुस्लिम लीगच्या स्थापनेनंतर हिंदूंची काँग्रेस आणि मुस्लिमांची मुस्लिम लीग असे दोन पक्ष तयार झाले. कोणत्याही विषयावर चर्चा करताना प्रथम तुमच्या दोघांचेही एकमत होऊ द्या, अशी भूमिका ब्रिटीशांकडून सातत्याने घेण्यात आली. प्रथम दोन समुदायांमध्ये परस्पर अविश्वास निर्माण करून त्यांना एकमेकांच्या विरोधात उभे करण्यात आले आणि नंतर तुम्ही एकत्र आल्याविना काहीही करता येणार नाही अशी आडमुठी भूमिका घ्यायची अशी ब्रिटीशांची खेळी होती. काँग्रेसही त्यांच्या या जाळ्यात अडकत गेली. १९१८ चा लखनौ करार याचे उदाहरण म्हणता येईल. लोकमान्य टिळकांनी अतिशय चांगल्या भावनेने या कराराला मान्यता दिली, पण त्यामुळे मुस्लिम लीगला स्वतंत्र गटाची मान्यता आणि शक्ती प्राप्त झाली. स्वाभाविकच त्यापुढील प्रत्येक गोष्टीत मुस्लिम लीगची भूमिका महत्वाची ठरू लागली. दोनच वर्षात टिळकांचे देहावसान झाले. महात्मा गांधी राजकीय पटलावर आले. त्यांना परिस्थितीची कल्पना नव्हती असे नाही. उलट परिस्थितीची कल्पना असल्यामुळेच आणि मुस्लिम लीग प्रत्येक वेळी आडमुठेपणा करील या शंकेनेच त्यांना खुश करण्याचा विचार ते करू लागले. मुस्लिमांना जवळ आणण्याचा प्रयत्न करावा म्हणजे स्वातंत्र्याच्या लढ्यात काँग्रेसला त्यांची साथ लाभेल असा त्यांचा होरा होता. परंतु मुस्लिम मानस समजून घेण्यात गांधीजी कमी पडले. मुस्लिमांचा विश्वास प्राप्त करून घेऊन त्यांना अधिकाधिक जवळ आणण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून त्यांनी तुर्कस्तानातल्या खिलाफत चळवळीला पाठींबा दिला. याचा अर्थ काँग्रेस आपली मित्र आहे असा काढण्याऐवजी खिलाफतची मागणी बरोबर आहे असा काढण्यात आला. त्यानंतर अशा मागण्या वाढतच गेल्या आणि प्रत्येक वेळी त्यापुढे वाकणे सुरु झाले. काय योग्य काय अयोग्य याचा विवेक सुटला. एवढेच नव्हे तर मुस्लिमांना जवळ आणण्याच्या या भावनेचा पगडा एवढा होता की मग हिंदूंचा विचार करण्याचीही गरज उरली नाही. मुसलमान म्हणतील ते योग्य आणि ते म्हणतील ते अयोग्य अशी अत्यंत घातक मुलभूत चूक काँग्रेसच्या या धोरणाने झाली. परिणामी अखेर २३ मार्च १९४० रोजी मुस्लिम लीगच्या लाहोर अधिवेशनात स्वतंत्र पाकिस्तानची मागणी करण्यात आली.

मुसलमानांचे लांगुलचालन काँग्रेस करते, ब्रिटीश सरकार त्यांचे लाड करते आणि ब्रिटीश सरकार व मुस्लिम नेते यांच्यापुढे काँग्रेस लाचार होते; अशी भूमिका आणि टीका केवळ हिंदू महासभा किंवा रा. स्व. संघ किंवा काँग्रेस विरोधकच करीत असत असे नाही. प्रत्यक्ष काँग्रेसचे नेते डॉ. पट्टाभिसीतारामय्या यांनी १९४६ साली एक पुस्तक लिहून १९०६ ते १९४६ या काळात मुस्लिम लीगला देण्यात आलेल्या सवलतींची यादीच प्रसिद्ध केली होती. मुस्लिम लीग, काँग्रेसची दिशाहीन स्थिती, इंग्रजांची फोडा झोडा नीती या तीन बाबीच भारत-पाकिस्तान विभाजनासाठी जबाबदार ठरल्या.

भारत व पाकिस्तान हे दोन वेगळे देश होणार, फाळणी होणार हे जेव्हा स्पष्ट झाले तेव्हा मोहम्मद आली जिन्ना यांनी जोरकसपणे लोकसंख्येच्या अदलाबदलीची, म्हणजे प्रस्तावित भारतातील सगळ्या मुस्लिमांनी पाकिस्तानात यावे आणि प्रस्तावित पाकिस्तानातील सगळ्या हिंदूंनी भारतात जावे अशी मागणी केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही अशीच सूचना केली होती. हिंदू व मुसलमान एकत्रितपणे शांततेने आणि सौहार्दाने राहू शकणार नाहीत असे मत त्यांनी `thoughts on pakistan' मध्ये व्यक्त केले होते. काँग्रेसने मात्र ही फाळणी प्रादेशिक आहे, सांप्रदायिक नाही अशी भूमिका घेत लोकसंख्येच्या अदलाबदलीचा प्रस्ताव फेटाळून लावला आणि कुठे राहायचे याबाबत लोकांना स्वयंनिर्णयाचा अधिकार राहावा अशी भूमिका घेतली. लोकसंख्येची अदलाबदल होणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर शेवटच्या औपचारिकता पूर्ण करताना १९४६ साली कॅबिनेट मिशनसमोर प्रश्न आला की, पाकिस्तानात उरलेल्या हिंदूंचे काय? आणि भारतात उरलेल्या मुसलमानांचे काय? त्यावर बॅरि. जिन्नांचे उत्तर होते- `they will be treated as reciprocal hostages. this will prevent mistreating of minorities in both the countries.'

भविष्यकाळात भारताने कधीही यानुसार कृती केली नाही. केवळ राजकीय धोरणाचा भाग एवढेच कारण त्यामागे नव्हते तर भारताचा तो हजारो वर्षांचा स्वभाव आहे. कोणाचाही द्वेष वा सूडभावना हिंदूंच्या/ भारताच्या रक्तातच नाही. त्यामुळे पाकिस्तानातील हिंदूंचा अनन्वित छळ झाला, त्यांना परागंदा व्हावे लागले, त्यांची लोकसंख्या सतत घटत गेली तरीही भारताने मुस्लिमांकडे reciprocal hostages म्हणून कधीही पाहिले नाही. वास्तविक १५ ऑगस्ट १९४७ पूर्वी भारतातील ९० टक्केहून अधिक मुसलमानांनी वेगळ्या पाकिस्तानच्या बाजूने मतदान केले होते. प्रत्यक्षात पाकिस्तानात गेलेत मात्र सुमारे ५० टक्के. म्हणजे भारतातील बहुसंख्य मुस्लिमांचा त्यावेळी पाकिस्तानला पाठिंबा होता. तरीही भारताने त्यांना reciprocal hostages म्हणून वापरले नाही. अगदी बांगलादेश निर्मितीच्या वेळीही भारत आपल्या स्वभावानुसारच वागला. आपल्या हाती पडलेल्या हजारो सैनिकांना त्याने सन्मानाने परत केले. बांगलादेश आणि पाकिस्तानात मात्र काहीही कारण नसताना हिंदूंना योजनापूर्वक संपविण्यात आले. भारत भारताच्या स्वभावानुसार वागला आणि ते दोन देश त्यांच्या स्वभावानुसार. मात्र भारताच्या स्वभावाविरुद्ध तक्रार असता कामा नये, त्या दोन देशांच्या स्वभावाविरुद्ध मात्र दाद आणि न्याय मागायलाच हवे. कारण भारताच्या स्वभावाने कोणाचे अहित होत नाही, त्यांच्या स्वभावाने मात्र सगळ्यांचे अहित होते.

भारताच्या पूर्व भागातही मुस्लिम उपद्रव वाढला होता. मुस्लिम लीगने १५ ऑगस्ट १९४६ रोजी `डायरेक्ट अॅक्शन'ची घोषणा केली होती. त्यानंतर कोलकाता आणि बंगालमध्ये जे अभूतपूर्व दंगे उसळले त्याने हिंदूंची ससेहोलपट केली. हजारो हिंदूंना ठार करण्यात आले. मृत्यूचे ते तांडव पाहून गांधीजी अस्वस्थ झाले. ती आग विझवण्यासाठी गांधीजी बंगालमध्ये गेले. एक दिवस संध्याकाळी प्रार्थना सभा सुरु असताना जमावाने प्रार्थना स्थळाला घेरून घेतले. लोक मुस्लिम लीगचा नेता सुहरावर्दी याची मागणी करू लागले. गांधीजींनी सभेत उपस्थित सुहरावर्दीलाच उत्तर द्यायला सांगितले. नाईलाज झालेल्या सुहरावर्दीने `डायरेक्ट अॅक्शन'साठी आपणच जबाबदार असल्याचे मान्य केले आणि गांधीजींच्या उपस्थितीचा फायदा घेत पळ काढला. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी महात्मा गांधी रात्री ११ वाजताच झोपी गेले होते. रात्री १२ वाजता दिल्लीत स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा होत असताना गांधी शांत झोपून होते.

इंग्लंडचे पंतप्रधान क्लीमेंट अॅटलि यांनी २० फेब्रुवारी १९४७ रोजी ब्रिटीश पार्लमेंटमध्ये जाहीर केले की, जून १९४८ अखेर हिंदुस्थानी जनतेकडे सत्ता सुपूर्द करण्यात येईल. १९४७ च्या मार्च महिन्यात लॉर्ड माउंटबॅटन भारतात आले. त्यांनी घाईने फाळणी उरकली. सत्तांतराची घोषणा करण्याची पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी तारीख निश्चित झालेली नव्हती. परंतु फाळणीची अधिकृत घोषणा करण्यात आल्याने स्वाभाविकच जगभरातील पत्रकार उपस्थित असलेल्या त्या महत्वाच्या पत्रपरिषदेत त्यांना `कधी?' असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर लॉर्ड माउंटबॅटन गडबडले. त्यांनी मनाशी काय हिशेब केला देव जाणे, अन अचानक जून १९४८ ऐवजी १५ ऑगस्ट १९४७ ही तारीख जाहीर केली. दोन देश वेगळे झाले तो क्षण एकच होता आणि असू शकतो. तरीही पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन १४ ऑगस्ट आणि भारताचा स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट असे का? तर लॉर्ड माउंटबॅटन यांना दोन्हीकडे उपस्थित राहता यावे यासाठी, असे त्याचे उत्तर आहे. हे महाशय नसते उपस्थित राहिले समारंभाला तर काय झाले असते?

- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, १४ ऑगस्ट २०१४

मंगळवार, १२ ऑगस्ट, २०१४

अखंड भारत - १

खूपदा चर्चिला जाणारा, चर्चेहून अधिक महत्वाचा असणारा आणि त्याहूनही अधिक गैरसमजांचा एक विषय आहे अखंड भारत. इतिहासातील सत्य आणि भविष्यातील आव्हान आहे अखंड भारत. काय होता अखंड भारत? काय आहे अखंड भारत? काय राहील अखंड भारत?

भारताच्या इतिहासावर नजर टाकली तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते ती म्हणजे भारतावरील आक्रमणे. गेल्या हजारो वर्षात भारतावर शेकडो आक्रमणे झाली. इतिहासाच्या शेकडो पुस्तकांमध्ये भारतावर झालेल्या आक्रमणांचा उल्लेख आहे, त्याची चर्चा आहे. अफगाणिस्तान, नेपाळ, श्रीलंका, भूतान, तिबेट, पाकिस्तान, मालदीव, बांगलादेश यांच्यावरील आक्रमणांचा मात्र इतिहास नाही. कारण मुळात हे देश भारताचाच भाग होते. जी काही आक्रमणे झाली ती भारतावरच झाली. येथील भूभाग, येथील अमाप संपत्ती, येथील धनधान्य, येथील ज्ञानविज्ञान लुटण्यासाठी आणि हडपण्यासाठी भारतावर आक्रमणे केली जात आणि या आक्रमणकर्त्यांनी केलेल्या राजकारणातून गेल्या अडीच हजार वर्षात भारताचे २४ तुकडे झाले.

पुराणांमध्ये आणि धर्मशास्त्रांमध्ये भारताचे अतिशय सुस्पष्ट वर्णन असून हिमालयाच्या दक्षिणेला आणि हिंदी महासागराच्या उत्तरेला असलेल्या भूभागाला भारत म्हणतात आणि तेथील लोकांना भारती म्हणतात असे त्यात म्हटले आहे. भारताचे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी १९६५ साली दिलेल्या गणराज्य दिन संदेशात विष्णूपुराणातील यासंबंधीचा श्लोकच उद्धृत केला होता. तो श्लोक होता- `हिमालयं समारभ्य यावदेन्दु सरोवरम, तं देवनिर्मितम देश:, हिंदुस्थानं प्रचक्षते'. अशाच आशयाचा दुसराही एक श्लोक आहे- `उत्तरं यत समुद्रस्य, हिमाद्रेश्चैव दक्षिणम, वर्षं तद भारतम नाम, भारती तत्र संतती:' उत्तर आणि दक्षिणेच्या या सीमा नमूद केलेल्या असल्या तरीही भारताच्या पूर्व आणि पश्चिम सीमांचा उल्लेख मात्र नाही. परंतु थोडा नीट विचार केला तर लक्षात येईल की, हिमालयाचा पूर्व-पश्चिम विस्तार आणि हिंदी महासागराचा पूर्व-पश्चिम विस्तार याच भारताच्या नैसर्गिक सीमा होत्या. हिमालय आणि हिंदी महासागर यांचा पूर्व-पश्चिम विस्तार जवळपास सारखाच आहे. पूर्वेला इंडोनेशिया ते पश्चिमेला इराणपर्यंत हिमालय व हिंदी महासागराचा विस्तार आहे आणि या दोघांच्या मधील भूभाग म्हणजेच आजच्या इंडोनेशियापासून तर इराणपर्यंतचा संपूर्ण भूभाग म्हणजे प्राचीन भारत होय. तोच अखंड भारत.

या अखंड भारताचे सिकंदराच्या आक्रमणापासूनच्या अडीच हजार वर्षात २४ तुकडे पाडण्यात आले. या काळात रोमन, ग्रीक, हूण, शक, कुषाण, सिरीयन, पोर्तुगीज, फेंच, डच, अरब, तुर्क, तार्तार, मोगल व इंग्रज यांनी अनेकवार आक्रमणे केली. त्यांचा संघर्ष जसा येथील स्थानिक जनतेशी झाला तसाच त्यांचे आपापसातही संघर्ष झाले. आपापसात करारमदारही झाले. भारताचे काही तुकडे या त्यांच्या करारमदारांचाही परिणाम आहेत. यातील केवळ इंग्रजांनी १८५७ ते १९४७ या ९० वर्षांच्या काळात भारताचे सात तुकडे केले. १८५७ मध्ये भारताचे क्षेत्रफळ ८३ लाख चौरस किलोमीटर होते. आज भारताचे क्षेत्रफळ ३३ लाख चौरस किलोमीटर आणि शेजारील देशांचे क्षेत्रफळ ५० लाख चौरस किलोमीटर आहे.

त्यावेळच्या भारतात एकछत्री राज्यसत्ता नव्हती. वेगवेगळी राज्ये होती. मात्र व्यापार, तीर्थयात्रा, पर्यटन, रोटी-बेटी व्यवहार, नातेसंबंध, वेशभूषा, संगीत, नृत्य, साहित्य, भाषा-बोली, खाद्य परंपरा, ज्ञान-विज्ञान, पूजापाठ, पंथ-संप्रदाय हे सारे मुक्त होते. त्यावर कुठेही बंधने नव्हती. लोक कुठेही जाऊ-येऊ शकत होते. खरे तर एका प्रबळ राज्यसत्तेशिवाय एवढा मोठा देश आणि विशाल समाज एकत्र, सुखशांतीपूर्ण रीतीने कसा राहिला हा सगळ्या जगाच्या चिंतनाचा विषय आहे. भारतात येणारे ह्यू एन त्संग किंवा रिचर्ड बर्टन किंवा त्यांच्यासारखे अनेक पर्यटक वा संशोधक ज्यावेळी येत तेव्हा या संपूर्ण अतिविशाल भूप्रदेशात कुठेही गेले तरीही त्याचा उल्लेख भारत असाच करीत. या देशाच्या कोणत्याही भूभागात पाहिलेली, अनुभवलेली गोष्ट भारतात पाहिलेली वा अनुभवलेली, अशीच नोंद त्यांनी आपापल्या लेखनात केली आहे.

इंग्रजांनी या देशाचा पहिला लचका तोडला त्याचं नाव अफगाणिस्थान. इ.स. १८७६ मध्ये रशिया व ब्रिटीश यांच्यात एक करार झाला त्यानुसार रशिया आणि भारत (इंग्रजांच्या अंमलाखालील) यांच्या सीमेवर एक बफर राज्य निर्माण करण्याचा निर्णय झाला. ते राज्य म्हणजेच आजचा अफगाणिस्थान. शैव संप्रदायी, प्रकृती पूजक, बौद्ध मतावलंबी असलेल्या तेथील जनतेच्या इस्लामिकरणाची प्रक्रिया आधीच सुरु झाली होती. त्या प्रक्रियेला नंतर पूर्णत्व आले. महाराजा रणजीत सिंग यांनी कंधारवर राज्य केल्याचे स्पष्ट उल्लेख आहेत. धृतराष्ट्राची पत्नी आणि कौरवांची माता गांधारी याच गांधार (कंधार) देशाची राजकन्या होती. १८७६ साली ब्रिटिशांनी हा भूभाग भारतापासून वेगळा केला.

हिमालयातील ४६ लहान मोठ्या सरदारांना एकत्र आणून पृथ्वी नारायण शाह यांनी नेपाळ राज्याची स्थापना पूर्वीच केली होती. भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या अनेकांनी नेपाळमध्ये आश्रयही घेतला होता. ब्रिटिशांनी आपली ताकद वापरून या पहाडी प्रदेशातील छोट्या छोट्या राजांना सरदारांना एकत्र करून त्यांच्याशी एक करार केला आणि १९०४ साली नेपाळला स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता देत असल्याचे जाहीर केले. इंग्रजांच्या डाकुगिरीचे हे मासलेवाईक उदाहरण आहे. कोणीही मागणी वगैरे केली नसताना, आपला काहीही संबंध नसताना विश्वसम्राटाच्या स्वत:च स्वत:ला बहाल केलेल्या थाटात केलेल्या त्यांच्या या कृतीने नेपाळ जन्माला आले. तेथे इंग्रजांनी आपले प्रशासन लागू केले. १९४७ सालीच नेपाळलाही ब्रिटनने आपल्या कब्ज्यातून मुक्त केले. १९५३ साली महाराजा त्रिभुवन सिंह यांनी भारत सरकारला एक निवेदन देऊन नेपाळ भारतात सामील करून घ्यावे आणि नेपाळला भारताचे एक राज्य म्हणून दर्जा द्यावा अशी विनंती केली होती. १९५५ साली रशियाने संयुक्त राष्ट्रसंघात यासाठी दोनदा विशेषाधिकार वापरला होता. परंतु पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या भूमिकेने नेपाळ भारतात समाविष्ट होऊ शकला नाही. आजही भारत आणि नेपाळ मधील नागरिकांना परस्परांच्या देशात जाण्यायेण्यासाठी पासपोर्ट व्हिसाची गरज नाही. मात्र भारताच्या चुकीच्या आणि विचित्र धोरणांमुळे नेपाळ हा भारत विरोधासाठी चीनचा अड्डा बनला आहे.

भूतानला १९०६ साली वेगळा देश जाहीर करण्यात आले. १९१४ साली चीन सरकार व ब्रिटीश सरकार यांच्यात एक करार झाला आणि भारत व चीन यांच्यातील एक बफर राज्य म्हणून तिबेटला वेगळा स्वतंत्र देश जाहीर करण्यात आले. हिमालयाचे विभाजन करून मॅकमोहन रेषा तयार करण्यात आली. दोन विस्तारवादी, साम्राज्यवादी शक्तींचे हे जागतिक षड्यंत्र होते. स्वातंत्र्यानंतर १९४९ ते १९५९ या काळात तिबेटकडे पूर्ण दुर्लक्ष करून भारताने तिबेट चीनच्या घशात घातला. एकीकडे तिबेटला चीनचा प्रदेश म्हणून मान्यता देणे आणि दुसरीकडे तिबेटच्या दलाई लामांना आसरा देऊन निर्वासित तिबेटी सरकार स्थापन करण्यास मान्यता देणे, अशा अतिशय भोंगळ धोरणाने आपण एक मोठी डोकेदुखी मागे लावून घेतली. शिवाय १९६२ च्या युद्धात चीनने हडपलेला अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेशचा प्रचंड भूभाग तर आपण विसरून गेल्यासारखाच आहे.

याशिवाय थायलंड, कंबोडिया, जावा, सुमात्रा, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, फिलीपिन्स, सिंगापूर, व्हिएत्नाम येथेही भारतीय राजघराण्यांनी प्रदीर्घ काळ राज्य केले. त्या काळात तेथे हिंदू संस्कृती (धर्म, सभ्यता, रीतीरिवाज, कलाकौशल्य, साहित्य, मंदिरे, स्थापत्य, व्यापारउदीम वगैरे) दिमाखाने नांदत होती. ते देशही अलगथलग पडत गेले. श्रीलंका व म्यानमार यांना १९४८ साली ब्रिटीश सत्तेतून मुक्त करण्यात आले. श्रीलंकेत १९७८ साली तर म्यानमारमध्ये २०११ साली नवीन राज्यघटना अस्तित्वात आली. म्यानमार म्हणजे खरे तर पूर्वीचा ब्रम्हदेश. त्याच्या नावातच ब्रम्ह होते. लोकमान्य टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली याच देशातील मंडालेच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्यावेळी हा देश भारताचाच भाग होता. आपले साम्राज्य या ना त्या प्रकारे कायम राहावे किंवा भारतीय उपखंडात ढवळाढवळ करण्यासाठी आपल्याजवळ कायम स्थान राहावे या दूरदर्शी परंतु कुटील हेतूने ब्रिटिशांनी हे तुकडे करून ठेवले होते. यातील सगळ्यात महत्वाचा, मूलगामी आणि सखोल परिणाम करणारी कृती होती पाकिस्तानची निर्मिती. भारताच्या या विभाजनाची कहाणी हा एक स्वतंत्र शोकात्म महाअध्याय आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, १३ ऑगस्ट २०१४

रविवार, २७ जुलै, २०१४

अर्थ प्रभावाची गुन्हेगारी

पैशाच्या अभावातून गुन्हेगारी जन्माला येते तशीच पैशाच्या प्रभावातून देखील गुन्हेगारी जन्माला येते. अशी अर्थ प्रभावाची गुन्हेगारी बहुतेक दुर्लक्षित राहते. किंबहुना अशी गुन्हेगारी असू शकते किंवा गुन्हेगारीच्या मुळाशी अर्थाचा प्रभावसुद्धा राहू शकतो हेच मुळात लक्षात घेणे व मान्य करणे कठीण जाते. परंतु त्यामुळे वास्तविकता बदलत नाही हेही खरे. अर्थप्रभावातून निर्माण होणाऱ्या गुन्हेगारीचे स्वरूप बहुआयामी आहे. अर्थ अभावाच्या गुन्हेगारीला मानवीय दृष्टीकोनातून समजून घेता येऊ शकते आणि अर्थाचा अभाव दूर करून ती गुन्हेगारी दूरही करता येऊ शकते. अर्थ प्रभावाची गुन्हेगारी मात्र अशी समजूनही घेता येत नाही आणि दूर करणेही अवघड आहे. अर्थ प्रभावाची ही गुन्हेगारी आपल्या आजूबाजूला सहज आणि विपुल प्रमाणात पाहायला मिळू शकते. ही वृत्ती, अशा घटना, असे विचार हे अनेकदा गुन्हेगारी म्हणून पाहिलेही जात नाहीत. कधी कधी मात्र त्याला स्पष्टपणे गुन्हा संबोधले जाते.

आज समाजात कर्करोगासारखा पसरलेला भ्रष्टाचार हे अर्थ प्रभावाच्या गुन्हेगारीचे वृत्ती व कृती या दोन्ही प्रकारचे उत्तम उदाहरण आहे. मोठमोठे अधिकारी, व्यावसायिक, उद्योगपती, राजकारणी यांच्यावर अनेकदा धाडी पडतात आणि अनेक दिवस संपत्तीची मोजदाद सुरु असते. ही गुन्हेगारी नव्हे तर काय? अशा तऱ्हेने गैरमार्गाने पैसा मिळवणे, तो बेकायदेशीरपणे दडवून किंवा लपवून ठेवणे दोन्ही गुन्हेच. पुष्कळदा हे सारे दडपण्याचा जो प्रयत्न होतो तीही गुन्हेगारीच. वृत्ती म्हणूनही हा प्रकार गुन्हेगारी म्हणूनच गणला जायला हवा. या लोकांना जगण्याचे प्रश्न असतात किंवा असा गैरमार्गाने पैसा जमवण्याशिवाय त्यांना पर्याय नसतो असे नाही. तरीही अशी कृती केली जाते आणि नंतर तर तिला काहीच मर्यादा राहत नाही.

जगभर नजर फिरवली तरी हे लक्षात येईल. आज महासत्ता समजली जाणारी अमेरिका जगातील ४२ टक्के शस्त्रे पुरवते. त्यातून अफाट पैसा कमावते. वेगवेगळ्या पद्धतीने शस्त्रे विकली जावीत याचा प्रयत्न होतो, लॉबिंग होते, प्रश्न सोडवले जातात किंवा निर्माण केले जातात. ही सारी अर्थ प्रभावाखालील गुन्हेगारी म्हटली पाहिजे. विविध प्रकारचे मानकीकरण, कायदे- नियम अर्थ प्रभावाची गुन्हेगारी याच सदरात येतात. स्वत:ला दिवाळखोर म्हणून जाहीर करू शकलात की तुम्ही बँकाच्या बँका बुडवू शकता. किंवा व्यवसाय आणि व्यक्तिगत आयुष्य चलाखपणाने वेगळं करू शकलात की विजय मल्यासारखं छान आयुष्य जगू शकता. ही गुन्हेगारी आहे.

कालचीच एक बातमी आहे- ज्यात एका साठी ओलांडलेल्या महिलेवरील आपबिती दाखवण्यात आली. घटना मुंबईतील आहे. साठी ओलांडलेली एक महिला लोकलचे दुसऱ्या वर्गाचे तिकीट काढून चुकून पहिल्या वर्गात बसली. एका महिला तिकीट तपासनीसानेच तिची दोन वेळा अंगझडती घेतली, तासभर तिला कोंडून ठेवले. समोरची महिला पैसेवाली असती आणि तिने त्या तिकीट तपासनिसाचे हात ओले केले असते तर पुढील प्रकार घडला नसता. एक तर पैसे खाणे हा तिचा उद्देश असेल किंवा नियमानुसार वागण्याचा तिचा प्रयत्न असेल. खरेच नियमानुसार वागण्याचा प्रयत्न असेल तरीही साठी उलटलेल्या त्या महिलेला दुसऱ्या डब्यात जायला सांगून प्रश्न सुटला असता. परंतु प्रथम वर्ग म्हणजे फार मोठे, श्रेष्ठ, विशेष असे काहीतरी आणि ही विशेषता जपणे हे सगळ्यात महत्वाचे हा जो श्रेष्ठत्वगंड असतो त्यातून अशी अमानवीय घटना घडते.

या घटनेच्या एक दिवस आधीचीच दिल्लीतील घटना- एका मुलीने तक्रार केली की काही लोकांनी तिला रात्री त्रास दिला आणि तिचे कपडे फाडले. स्वाभाविक ती खळबळजनक बातमी झाली. परंतु २४ तास व्हायच्या आतच ती मुलगी बदलली. तिने तक्रार करण्यास नकार दिला. तपासात लक्षात आले की, ती मुलगी १८ वर्षांपेक्षा कमी वयाची होती, मध्यरात्री दारू पिउन तर्र होती आणि गाडी चालवीत होती. या सगळ्या प्रकारामुळे आपणच फसू शकतो हे लक्षात आले तेव्हा तिने तक्रार करण्यास नकार दिला आणि तिचा कांगावा उघड झाला. हा सगळा प्रकार `पैशाचा माज' या सदरात मोडणारा आणि गुन्हेगारी स्वरूपाचा आहे. वेगवेगळ्या शहरात चालणारे दुचाकी स्टंट, रेव्ह पार्ट्या आणि हुक्का पार्लरचे वाढते प्रस्थ, मादक पदार्थांचा चिंताजनक विळखा, या साऱ्याशी संबंधित निरनिराळ्या स्तरावरील लोक, त्यांचे लागेबांधे, टोळ्या हे सगळे प्रकार अर्थ प्रभावाची गुन्हेगारी नाहीत तर काय?

अगदी आपल्या आजूबाजूला सुद्धा आपण हा माज पाहू शकतो. साधं गाड्या नीट पार्क करण्याचं उदाहरण घेऊ या. कुठेही कशीही गाडी उभी करणं हा जणू काही आपला जन्मसिद्ध अधिकार असल्याच्या थाटात लोक वागत असतात. शिवाय कोणी काही बोलायचं वा हटकायचं नाही. तसं केलं तर शिवीगाळ, मारहाण, कुजकट बोलणे वगैरे अंगावर घेण्याची तयारी ठेवावी लागते. बरे वरून पोलिस बिलिस आमचं काही वाकडं करू शकत नाहीत, ते आमच्या खिशात आहेत हा आव. हा आवही खरा असतो कारण पोलिसांचे हात ओले होतच असतात. नागपुरातील एका सदनिकेतील रहिवासी अनेक वर्ष एका राजकीय नेत्याच्या गाडी पार्किंगमुळे बेजार होते. हा नेता रात्री केव्हातरी येणार, त्यावेळी लोक झोपले असतात वगैरेकडे दुर्लक्ष करून हॉर्न वाजवणे, गाडीचा आवाज, त्याच्या बोलण्याचा आवाज, शिवाय सकाळी बाकीच्यांना आपापल्या गाड्या काढताना अडचण होईल याचा विचार न करता अस्ताव्यस्त पद्धतीने गाडी लावणे; हे सगळे डोक्यावर चढून बसलेल्या पैशाचे प्रताप नव्हे तर काय? बरे हा नेता होता. पण सामान्य महाविद्यालयीन तरुणी अशा पद्धतीने वागतात तेव्हा काय म्हणायचे? नागपुरातीलच एका मोठ्या लेखिकेला हा अनुभव घ्यावा लागला आहे. त्या लेखिका तब्येत दाखवण्यासाठी म्हणून डॉक्टरांकडे जायला निघाल्या तेव्हा त्यांच्या फाटकासमोर तरुण मुलींचे एक टोळके आपल्या दुचाकींवर बसले होते. त्यांना बाजूला व्हायला म्हटले त्यावेळी प्रथम तर त्यांनी लक्षच दिले नाही. मग शिवीगाळ करत, बोटे मोडत, अद्वातद्वा बोलत कसे तरी ते टोळके बाजूला झाले. आई-बापांची कमाई अंगात आलेल्या या तरुणी गुन्हेगार नाहीत काय?

अशा या ढोबळ गोष्टींशिवाय अशा असंख्य सूक्ष्म गोष्टी आहेत ज्या लक्षात येत नाहीत, पण सखोल विचार केला तर त्यातील अर्थ प्रभावाचे गुन्हे ध्यानात येतील. आपण आपल्या जीवनशैलीने प्रदूषण किती वाढवत आहोत हे ध्यानात घ्यावे. प्रदूषण केल्याशिवाय आपण जगूच शकत नाही हे खरे आहे. अगदी काहीही केले नाही तरीही दिवसाचे बारा तास आपण श्वासोश्वासाच्या माध्यमातून प्रदूषण करत असतो. मात्र आपल्या जगण्यातून प्रदूषण कमी कसे होईल, त्याची भरपाई कशी होईल याची काळजी न करता बेमुर्वतपणे ते वाढवीत राहणे याला गुन्हेगारीशिवाय दुसरे काहीही म्हणता येणार नाही. अनावश्यक खरेदी हादेखील गुन्हाच म्हणावा लागेल. अनेकदा अशा अनावश्यक गोष्टी कचऱ्यात टाकल्या जातात किंवा अनावश्यक खाणे केवळ चामडीच्या रुपात वाढत जाते. दोन्हीचा उपयोग नसतो. पण त्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या उर्जा, वेळ आणि कच्चा माल यांचे काय? तेही वाया जाणार. अनावश्यक खरेदी वा अनावश्यक उपभोग नियंत्रित केला तर त्यातून अन्य अनेकांच्या गरजा पूर्ण होऊ शकतील किंवा तेवढ्या गोष्टींची बचत होईल आणि पर्यायाने प्रदूषण टाळले जाईल.

वागताना, जगताना मात्र आपण एवढा आणि असा विचार करत नाही. एकूणच पैसा आला की आपण विचार न करता, सैलपणाने वागू लागतो. हा प्रकार देखील अर्थ प्रभावाच्या गुन्हेगारीतच मोडावा लागेल. हा मुख्यत: वृत्तीचा गुन्हा म्हणावा लागेल. बरे चारचौघात जमले की असे विषय काढायचे नसतात, बोलायचे नसतात. आपण सगळे हा अनुभव घेत असतो. मनातल्या मनात आपल्याला अनेक गोष्टी जाणवतात, पण शिष्टाचाराच्या नावाखाली त्या चटईखाली ढकलून द्यायच्या असतात. आपल्या उक्ती-कृतीचं विश्लेषण, सामाजिक जबाबदारी, गरिबी, जाणीवा, योग्य-अयोग्य वगैरे गोष्टी अर्थ प्रभावासोबत कालबाह्य आणि टाकावू होतात. मग त्यांचा विचारही करायचा नसतो. ही वृत्ती आणि त्याला अनुसरून होणारी कृती हे कायदेशीर आणि सामाजिक दृष्टीने तर गुन्हे आहेतच; पण नैतिक आणि आध्यात्मिक अंगानेही ते गुन्हे आहेत. सत्य बोलणे, सत्य आचरण करणे, सत्याच्या बाजूने उभे राहणे, स्वत:ला अंतर्बाह्य शुद्ध करणे यासारख्या गोष्टींना पारखे करणारा हा अर्थ प्रभाव आहे.

अर्थाच्या अभावी चांगले जीवन जगता येत नाही. एवढेच नव्हे तर त्यातूनही गुन्हेगारी जन्माला येते. मात्र अर्थाच्या प्रभावानेही गुन्हेगारी जन्माला येत असेल तर काय करायचे? येथे एक गोष्ट नीट लक्षात घ्यायला हवी की, अर्थाचा प्रभाव आणि अर्थाची मुबलकता या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. अर्थाचा प्रभाव हा मन-बुद्धीवरचा परिणाम आहे. जीवन जगण्यासाठी पुरेसा पैसा असणे आवश्यकच आहे. मात्र त्याची हाव सुटणे, मन-बुद्धी त्याच्या अंमलाखाली चालणे हे अयोग्य आहे. अर्थाचा हा प्रभाव रोखणे यासाठी सुद्धा मन-बुद्धीचाच उपयोग करून घ्यावा लागतो. ते संस्कारित असले की त्यावर अर्थाचा अनर्थकारी प्रभाव होत नाही. त्यासाठी त्याला समजवावे लागते की आनंद, सुख आणि पैसा हे पर्यायवाची शब्द नाहीत. पैसा पैशाच्या जागी आहे. आनंद आणि सुखाच्या परी निराळ्या असतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची एक कविता आहे `या झोपडीत माझ्या'. त्यातील काही ओळी अशा आहेत-

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या... ...
भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या... ...

ताऱ्यांकडे पाहून, प्रभुनाम गाऊन जे सुख आणि आनंद प्राप्त होतो त्याची मन-बुद्धीला जाणीव असेल तर अर्थाचा प्रभाव उत्पन्न होऊ शकत नाही. आनंदाच्या अशा अनेक परी असतात. चित्र काढण्यातला आणि चित्र पाहण्यातला आनंद, गाणी ऐकण्यातला आणि गाणी म्हणण्यातला आनंद, निसर्गात रमण्याचा आणि निसर्ग जतन करण्यातला आनंद, लेखनातला आणि वाचनातला आनंद, विनोदातला आणि गांभीर्याचा आनंद, चारचौघातला आणि एकांताचा आनंद, भजनाचा आणि ध्यानाचा आनंद; अशा आनंदाच्या असंख्य परी. त्यांचा मन-बुद्धीला परिचय झाला, त्यात रमणे सुरु झाले, त्याच्या परिणामी आतील व्यक्तित्व समृद्ध होऊ लागले की मग मन-बुद्धीवरचा अर्थाचा अनर्थकारी प्रभाव नष्ट होतो. सारे काही पैसा, पैसा आणि पैसाच असे जोवर राहील तोवर अर्थाचा प्रभाव आणि त्यातून जन्म घेणारी गुन्हेगारी राहील. ती कमी केल्यास सुख-शांती, न केल्यास दु:ख-अशांती. तुमची आमची इच्छा असो की नसो.

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, २७ जुलै २०१४