शनिवार, २२ नोव्हेंबर, २०१४

पूर्णतेच्या दिशेने

(`भारतीय शिक्षण' मासिकाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला लेख. `व्यक्तिमत्व विकास' असा या अंकाचा विषय आहे.)

`व्यक्तिमत्व विकास' हा २१ व्या शतकाचा परवलीचा शब्द बनला आहे. लहान लहान बालकांसाठी उन्हाळ्याच्या सुटीत आयोजित करण्यात येणाऱ्या `व्यक्तिमत्व विकास शिबिरां'पासून अगदी पंतप्रधान म्हणून व्यक्तिमत्वाच्या grooming पर्यंत याची अनेक रूपे पाहायला मिळू शकतात. `व्यक्तिमत्व विकास' या संकल्पनेत दोन गोष्टी अंतर्भूत आहेत- एक म्हणजे व्यक्तिमत्व आणि दुसरे म्हणजे त्याचा विकास. थोडक्यात म्हणजे प्रत्येकाला स्वत:चे असे एक व्यक्तिमत्व आहे अन त्याचा विकास घडवायचा आहे. याचे व्यवहारातील स्वरूप मात्र अनेक प्रश्न निर्माण करते. मुळात आज लावण्यात येणारा व्यक्तिमत्व विकासाचा अर्थ, एका साच्यातून काढावयाची माणसे असा होत असून; प्रत्येकाचे म्हणून काही स्वतंत्र व्यक्तिमत्व असते याचा जणू विसरच पडून गेलेला दिसतो. समाजात चांगल्या किंवा आदर्श व्यक्तिमत्वाचे एक कल्पनाचित्र तयार करण्यात आले आहे. वेशभूषा, भाषा, शरीराचे सुशोभन, वागण्या-बोलण्याच्या, खाण्या-पिण्याच्या लकबी, क्रिया-प्रतिक्रियांचे संकेत, वापरावयाच्या किंवा बाळगावयाच्या वस्तूंचे ब्रांड, पैशाची मालकी, अशा काही गोष्टींचे मापदंड विविध माध्यमातून प्रतिष्ठित करण्यात आले असून, त्याला अनुरूप असे शिक्षण-वळण देणे आणि घेणे म्हणजे व्यक्तिमत्व विकास असा अर्थ आज सर्वत्र प्रचलित आहे.

मुळात व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून ज्या व्यक्तीचा विकास करायचा, ज्या व्यक्तीला समजून घ्यायचे, ज्या व्यक्तीला फुलवायचे; त्या व्यक्तीबद्दलच तोकडी समज ही फार मोठी अडचण आहे. आपण समजून चालतो की, सगळी माणसे सारखीच आहेत. खरे तर `सगळी माणसे सारखी आहेत' हे एक भाववाक्य आहे. भाव या अर्थाने, आध्यात्मिक अर्थाने ते खरे आहे. परंतु व्यावहारिक अर्थाने ते अतिशय असत्य कथन आहे. व्यवहारात आपण पाहतो की माणसांमध्ये असंख्य विविधता आहे, विषमता आहे. जिकडे पाहावे तिकडे विविधता किंवा विषमताच नजरेस पडते. रंग, रूप, स्वभाव, आवडी-निवडी, गरजा, इच्छा-आकांक्षा, वृत्ती, कल, बुद्धिमत्ता, कौशल्य; सगळ्यातच वेगळेपणा. समानता कुठेच नाही. एकाच आई-वडिलांच्या पोटी जन्म घेणारी मुलेही सारखी नसतात. पुराणांपासून तर इतिहासातही अशी अनेक उदाहरणे आहेत. हिरण्यकश्यपु आणि प्रल्हाद असो की, महात्मा गांधी आणि हरीलाल; प्रत्यक्ष पिता आणि मुलगा यात केवढा तरी भेद. भारतीय उपखंडातील सगळ्यांचा डीएनए सारखा असल्याचे म्हणतात, तरीही एवढा भेद आहे. म्हणजेच प्रत्येकाचे व्यक्तिमत्व सारखे नाही. तरीही व्यक्तिमत्व विकास करताना विशिष्ट साच्याचा विचार करूनच घडण करण्याचा प्रयत्न होतो. ही ओढाताण कितपत योग्य म्हणता येईल?

व्यक्तिमत्व विकासाच्या आजच्या प्रयत्नातील दुसरी मोठी गफलत म्हणजे- स्पर्धेची प्रेरणा. व्यक्तिमत्व चांगले व विकसित आहे, म्हणजे काय तर, ती व्यक्ती अन्य कोणापेक्षा तरी पुढे आहे, आघाडीवर आहे. हे पुढे असणे वा आघाडीवर असणे देखील भोंगळ पद्धतीच्या मापदंडांनीच निश्चित होणार. क्षणभर तो मुद्दा बाजूस ठेवला तरीही, एक बाब नक्की की- कोणाला तरी वाईट/ अपूर्ण/ चुकीचे/ कमअस्सल दाखवणे म्हणजे स्वत: विकसित होणे. अन्य साऱ्यांबद्दल असा दूषित भाव ठेवून होणारा व्यक्तिमत्वाचा विकास खरा विकास म्हणावा का? फुलाचे फुलणे हे जसे स्वयंभू असते तसे स्वयंभूपणाने फुलणे म्हणजे विकास होय. एक फुल दुसऱ्याशी आकार, रंग, रूप, गंध, याची तुलना करत नाही किंवा त्यासाठी दुसऱ्या फुलाचा दुस्वास करीत नाही. निसर्गात सगळीकडे हे पाहायला मिळते. झाडे एका जागी उभे राहायला नकार देत नाहीत आणि नदी सतत वाहत राहण्याचा कंटाळा करीत नाही. त्यातच त्यांचे सौंदर्य, सफलता आणि इतिकर्तव्यता. माणूस मात्र एकाला दुसऱ्याच्या तुलनेत आणि स्पर्धेत उभे करण्यातच धन्यता मानतो. प्रत्येकाचे स्वतंत्र वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व असून ते फुलवणे, विकसित करणे आवश्यक असते. अन्यथा ते व्यक्तिमत्व खुरटून जाते. कोणी खेळ खेळेल, कोणी वाद्य वाजवील, कोणी गाणे म्हणील, कोणी लिखाण करेल, कोणी प्रयोग करेल, कोणी वस्तू तयार करेल, कोणी स्वयंपाक करेल, कोणी सजावट करेल, कोणी चिंतन करेल, कोणी ध्यान करेल, कोणी जपजाप्य करेल. ती व्यक्ती जे काही करते ते चांगले, सकस, परिपूर्ण, आनंददायी होते आहे की नाही एवढेच पाहायला हवे. अन त्याची मुक्त हस्ते अन्य साऱ्यांसाठी, हातचे काहीही राखून न ठेवता, उधळण करण्याची मानसिकता हवी. नदी पाणी देऊन टाकते, स्वत: पीत नाही. झाडे आपली फळे-फुले सगळी देऊन टाकतात; स्वत:चा शृंगार करीत नाहीत किंवा स्वत: खात नाहीत. व्यक्तिमत्व विकासाची ही दिशा असायला हवी.

तिसरी भ्रामक समजूत अशी की, प्रत्येक जण प्रत्येक गोष्ट करू शकतो. एखाद्या चांगल्या तत्वाचे किती विडंबन होऊ शकते याचा हा उत्तम नमुना आहे. निराश, हताश, अकर्मण्य मनुष्याला उभे करण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी, विश्वास देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या या तत्वाचा अर्थ मर्यादित असून, आपल्या त्या-त्या वेळच्या स्थितीत आपल्या आवाक्यात असणाऱ्या गोष्टी प्रयत्नसाध्य असतात हा त्याचा आशय आहे. हा नीट लक्षात न घेता नुसती धावपळ सुरू असते. त्यामुळे अखेर हाती काहीच लागत नाही.

या सगळ्याचा परिणाम एक तर शून्य असतो आणि दुसरे म्हणजे हास्यास्पद असतो. शिवाय त्याने त्या-त्या व्यक्तीला समाधान, शांती लाभत नाही ते वेगळेच. व्यक्तिमत्व विकासाच्या या कृत्रिम, चुकीच्या खटपटीचाच परिणाम म्हणून आज आपल्याला ६०-६०, ७०-७० वर्षांचे वयोवृद्ध स्त्री-पुरुष फॅशनेबल कपडे घालून रॅम्पवर चालताना पाहायला मिळतात आणि आई-वडील मुलांना एका वर्गातून दुसऱ्या वर्गात ने-आण करण्याची अखंड धावपळ करताना दिसतात. तबला-तबला करत एखाद्या मुलाची काही वर्षे वाया घालवली जातात आणि मग तो आयुष्यात कधीही तबल्याला हात लावत नाही. आपल्या मुलाला सगळं आलं पाहिजे- तो अभ्यासात/ खेळात/ सगळ्या कलांमध्ये/ पोहण्यात/ अन्य उपक्रमात पुढे असलाच पाहिजे असा ध्यास घेतलेले पालक आणि शेजारणीकडे अमुक वस्तू आहे त्यामुळे तिचं स्टेटस वाढतं आणि म्हणूनच ती वस्तू आपल्याकडेही असलीच पाहिजे; शिवाय तिच्यापेक्षा महाग असली पाहिजे; असा विचार करणाऱ्या महिला अन याला माना डोलावणारे पुरुष; व्यक्तिमत्व विकासाच्या कोणत्या इयत्तेतले म्हणावेत? पडद्यावर आदर्श व्यक्तित्व साकारणारे नट वा नट्या, प्रत्यक्ष आयुष्यात ते आदर्श उतरविण्याचा आग्रह दूरच प्रयत्नही करताना दिसत नाहीत. किंवा संपूर्णतेचा आग्रह असा विकृत झालेला दिसतो की, भूमिका म्हणून कोणती भूमिका स्वीकारावी याचेही तारतम्य ठेवले जात नाही. आपण सगळ्याच भूमिका करू शकतो हे दाखवणे एवढेच ध्येय उरते, त्याचा स्वत:च्या व्यक्तिमत्वावर किंवा समाजावर काय परिणाम होईल वगैरे विचार करण्याची गरज वाटेनाशी होते. चित्रपट वा नाटक लिहिणे किंवा करणे काय किंवा एखाद्या विषयावर लिहिणे काय; परिणामांचा विचार करण्याची गरज वाटत नाही. अगदी खेड्यापाड्यात सुद्धा तरुण मुली वर्तमानपत्र किंवा पुस्तके वाचणार नाहीत पण ब्युटी पार्लरमध्ये जायला चुकणार नाहीत. असंख्य लोक अतिशय चुकीचे बोलतील पण इंग्रजीतच बोलतील. व्यक्तिमत्व विकासाच्या एकांगीपणाचेच हे परिणाम म्हणायला हवेत.

छोट्या पडद्यावर या विकृतीचे अनेक नमुने पाहायला मिळतात. लहान मुलांचे रिअॅलिटी शो हे एक उत्तम उदाहरण ठरावे. जसे परीक्षा उत्तीर्ण होण्यापुरती तयारी विद्यार्थी करतात तशी तयारी या मुलांकडून करून घेतली जाते. त्यात काही यशस्वी ठरतात तर काही अपयशी. अहंकार मात्र दोघांचेही अतोनात वाढतात. यशस्वी होणारे तर हरभऱ्याच्या झाडावर चढतातच, पण अयशस्वी होणारेही आम्ही तिथपर्यंत पोहोचलो या गुर्मीत असतात. अशी मुले अनेकदा कौतुक म्हणून घरगुती कार्यक्रमात काही करायला किंवा म्हणायला सांगितले तरीही त्याला नकार देतात. यश, स्वार्थ, स्पर्धा याखाली या मुलांमधील निरागसता ठेचली जाते. महिलांच्या कार्यक्रमातही हेच दिसते. अनेकदा महिला प्रश्नांची चुकीची उत्तरे देतात अन तरीही त्यांना काही ना काही मिळतेच. म्हणजे माहिती असो की नसो, वेळ मारून नेली की काम संपले. ज्ञानसाधनेचा एवढा उथळ अधिक्षेप याआधी क्वचितच झाला असेल. एखाद्या कलेसाठी, कौशल्यासाठी झोकून देण्याची, गाडून घेण्याची, परिश्रम करण्याची ऊर्मी आणि प्रेरणाच खुडून टाकली जाते. दुसरा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे कोणतीही गोष्ट आनंदासाठी करण्याऐवजी पैसा वा अन्य काहीतरी मिळवण्यासाठी करण्याची वृत्ती वाढीस लागली आहे.

मनुष्याचं बाह्य व्यक्तिमत्व महत्वाचं असतं. प्राथमिक परिणाम त्याचाच होतो. ते चांगलं, नीटनेटकं असलं पाहिजे, त्याचा समतोल विकास झाला पाहिजे. व्यावहारिक जीवन जगताना त्याचा उपयोग असतो. परंतु हे बाह्य व्यक्तिमत्व हाच व्यक्तिमत्वाचा एकमेव निकष मानल्याने संपत्ती, सौंदर्य, सत्ता, स्पर्धा, यशस्वीता, सारखेपणा, पोशाखीपणा, कृत्रिमता यांना अवास्तव महत्व प्राप्त झाले. त्याने व्यक्तिमत्वाचा विकास तर झाला नाहीच, उलट व्यक्तीजीवनात आणि सामाजिक जीवनात देखील अशांती, उद्वेग, अस्वस्थता, बकालपणा, दु:ख, वेदना निर्माण केले. व्यक्तिमत्वाला एक आंतरिक बाजूही असते याचा विसर पडल्याने किंवा जाणूनबुजून त्याकडे दुर्लक्ष केल्याने अनवस्था स्थिती उत्पन्न झाली.

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील एक प्रसिद्ध प्रसंग आहे. अमेरिकेत असताना त्यांना एकाने विचारले- `तुम्ही असा विचित्र पोशाख का करता? सभ्य पोशाख का करीत नाही?' स्वामीजींनी क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिले- `तुमच्या देशात पोशाखावरून माणसाची सभ्यता ठरते आणि आमच्या देशात त्याच्या चारित्र्यावरून.' व्यक्तिमत्वाकडे पाहण्याचा हा मुलभूत फरक आहे. स्वामीजींनी ज्या चारित्र्याचा उल्लेख केला तोच आंतरिक व्यक्तिमत्वाचा विकास. मनुष्याला बाह्य जीवन असते तसेच आंतरिक जीवनही असते. माणसाला वित्तेषणा आणि पुत्रेषणा यासोबतच लोकेषणाही असते. म्हणूनच पैसा मिळाला पाहिजे, सगळे उपभोग मिळाले पाहिजेत, सुंदर दिसले पाहिजे, लोकांनी सुंदर म्हटले पाहिजे; या गोष्टींसोबतच लोकांनी आपल्याला चांगले म्हटले पाहिजे, आपल्यावर प्रेम केले पाहिजे, आपले ऐकले पाहिजे, आपला आदर केला पाहिजे, असेही त्याला वाटते. लोकांचे हे प्रेम आणि आदर मिळवायचे असेल तर व्यक्तिमत्वाच्या आंतरिक गुणांचा विकास करावा लागतो. दुसऱ्यांना घेऊन चालणे, दुसऱ्यांच्या गुणांचा गौरव करणे, दुसऱ्यांच्या चुकांना माफ करणे, स्वत:ची टिमकी न वाजवणे; अशा अनेक गोष्टींची गरज असते. या साऱ्या गोष्टी नीतीच्या कक्षेत येतात. आणि नीती म्हणजेच आपला क्षुद्र- देहबोधात्मक- इंद्रियबद्ध- `मी' दूर सारणे. या लहान `मी'पासून जेवढे दूर तेवढे नीतीच्या दृष्टीने उच्च स्थानी. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर; या सहा विकारांपासून दूर जाणे; अहंकार आणि स्वार्थापासून दूर जाणे म्हणजे, लहान `मी'पासून दूर जाणे. लहान `मी'पासून दूर होऊन विश्वव्यापी व्यापक `मी'कडे जाण्यासाठी अभ्यासाची, प्रयत्नांची, साधनेची गरज असते. व्यक्तिमत्वाच्या या आंतरिक विकासाची ही प्रक्रिया जीवनभर चालणारी अखंड प्रक्रिया असते. आंतरिक व्यक्तिमत्वाचा हा विकास एका अर्थाने बाह्य व्यक्तिमत्वाचा विनाश असतो.

ज्ञानयोगाच्या आपल्या विवेचनात स्वामी विवेकानंद स्पष्टपणे म्हणतात- `नीतिशास्त्र नेहमी सांगत असते- मी नव्हे तू. त्याचे ब्रीद असते- मी नव्हे तर माझ्याखेरीज इतर. म्हणजेच स्वार्थीपणा नाही तर नि:स्वार्थता. याचेच नाव नीती. ती अनंत शक्ती किंवा तो अनंत आनंद इंद्रियांद्वारा मिळविण्याच्या प्रयत्नात माणूस व्यक्तित्वाच्या ज्या साऱ्या फोल कल्पनांना बिलगत असतो त्या टाकून दिल्या पाहिजेत, असे नीतिशास्त्राचे सांगणे आहे. आधी इतरांचे आणि नंतर मागाहून माझे अशी तुमची वृत्ती असावयास हवी. इंद्रिये म्हणत असतात- आधी मी. नीतिशास्त्र म्हणत असते- मी सगळ्यात शेवटी. याप्रमाणे नीतीचे सर्व नियम त्यागावर आधारलेले आहेत. भौतिक पातळीवर व्यक्तित्वाचा विनाश करणे, परिपोष करणे नव्हे. ते अनंत कधीच भौतिक पातळीवर व्यक्त व्हावयाचे नाही. ते शक्य नाही. तशी कल्पनाही करता यावयाची नाही. म्हणून त्या अनंताच्या अधिकाधिक सूक्ष्म अभिव्यक्तीसाठी माणसाने भौतिक पातळी सोडून वर उच्च उच्च स्तरांवर जावयास हवे. नीतीचे निरनिराळे नीतीनियम अशा रीतीने घडविले जात असतात. परंतु त्या सर्वात एकच एक मध्यवर्ती भावना असते आणि ती म्हणजे आत्मत्यागाची. संपूर्ण आत्मविलय हेच नीतिशास्त्राचे ध्येय आहे. स्वत:च्या व्यक्तित्वाचा विचार करू नका असे म्हटल्यास लोकांना धक्का बसतो. ज्याला ते स्वत:चे व्यक्तित्व म्हणतात ते हरविण्याची त्यांना भयंकर भीती वाटत असते. परंतु त्याचबरोबर हीच माणसे नीतीचे सर्वोच्च आदर्श अगदी बरोबर असल्याचे मान्य करतील. त्यांच्या हे मुळीच लक्षात येत नाही की, समस्त नीतीनियमांचे एकमेव कार्य, एकमेव लक्ष्य, एकमेव ध्येय आहे- व्यक्तित्वाचा विनाश, त्याची उभारणी नव्हे.'

स्वामीजींनी केलेले हे विवेचन मानवी जीवनाच्या अंतिम थांब्याचे विशाल चित्र रेखाटणारे आहे. पूर्णता हा मानवी जीवनाचा, मानवी व्यक्तित्वाचा सर्वोच्च बिंदू आहे. मात्र प्रत्येक व्यक्तीची अवस्था निराळी असते. त्या अवस्थेला अनुसरून त्याचा विकास व्हावा. त्याची वाटचाल मात्र पूर्णतेच्या दिशेने व्हायला हवी. कोणी या पूर्णतेच्या प्रवासाची नुकतीच सुरुवात केली असेल, तर कोणी अखेरच्या टप्प्यावर पोहोचला असेल. सहज जाता जाता सांगण्यासारख्या, समजण्यासारख्या या गोष्टीही नसतात. सतत निरीक्षण, आढावा घेणे, परीक्षण करणे व्हायला हवे. कोणाची बाह्य जीवनाची गरज अधिक असेल. त्याला हरकत असण्याची गरज नाही. मात्र सोबतच आंतरिक गुणांचे संगोपन, संवर्धन होईल याकडे लक्ष दिले जायला हवे. जसजसा हा आतला विकास अधिक होत जाईल तसतसे बाह्य आवरण गळत जाईल. ही चारआठ दिवसांची किंवा चारआठ महिन्यांची नव्हे तर आयुष्यभराची प्रक्रिया आहे. त्यासाठी विवेकाची गरज असते. केवळ बाह्य गोष्टी म्हणजेच व्यक्तिमत्व विकास नव्हे तर त्याला आंतरिक बाजूही आहे याचे भान सतत जागृत हवे. बाह्य व्यक्तिमत्वाचा सुयोग्य, सार्थक उपयोग हेही त्याचे महत्वाचे अंग आहे याचीही जाणीव असायला हवी. आजकाल अब्जावधींची धनसंपदा बाळगणाऱ्या धनकुबेरांच्या याद्या प्रसिद्ध होत असतात. तरीही जगातील अर्धी लोकसंख्या विपन्नावस्थेत आहे. व्यक्तिमत्वाच्या विवेकहीन, एकांगी बाह्य बाजूच्या विकासाचे हे एक उदाहरण म्हणता येईल. अनेक क्षेत्रात, अनेक ठिकाणी त्याचा प्रत्यय घेता येईल. हे एकांगीपण समाजात खोलवर झिरपले आहे. ते दूर करून व्यक्तिमत्व विकासाचे संतुलन निर्माण करण्याचे आज जगापुढे आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यात भारताची विशेष जबाबदारी आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, २० सप्टेंबर २०१४

गुलजार, गुड्डीचे गीत आणि धर्म

हृषीकेश मुखर्जी आणि गुलजार यांच्या `गुड्डी' या चित्रपटाची सुरुवातच एका गोड प्रार्थनागीताने होते. त्याचे शब्द आहेत- `हमको मन कि शक्ती देना'. अतिशय गोड असे हे प्रार्थनागीत सुप्रसिद्ध आहे. त्याचं दुसरं कडवं आहे- `मुश्किले पडे तो हम पे, इतना कर्म कर... साथ दे तो धर्म का, चले तो धर्म पर...' पुढे आणखीन दोन ओळीही आहेत, पण या दोन महत्वाच्या. आमच्यावर संकटे आली तर आम्ही धर्माचा साथ द्यावा आणि धर्ममार्गावर चालावे, अशी शक्ती आम्हाला दे; अशी ही प्रार्थना आहे. गुलजार सारख्या सिद्धहस्त प्रतिभावंताने हे गीत लिहिलं आहे हे प्रथम लक्षात घ्यायला हवे. दुसरे म्हणजे- धर्म या शब्दाने घडवून आणलेले या जगातील आजवरचे सगळ्यात मोठे लोकवस्तीचे स्थलांतर गुलजारजींनी स्वत: अनुभवलेले आहे. त्याचे चटके सोसत ते स्वत: स्थलांतरित झालेले आहेत. धर्म या शब्दाने घडवलेला भीषण नरसंहार, धर्म या शब्दाने घेतलेला लाखो लोकांचा बळी, धर्म या शब्दाने घडवलेले हजारो बलात्कार, धर्म या शब्दाने केलेली संपत्ती- कलावैभव- नातीगोती- प्रेम- विश्वास- यांची अमाप राखरांगोळी; हे सारे गुलजार नावाच्या संपूर्णसिंह कालरा यांनी प्रथमपुरुषी अनुभवलेले आहे. तरीही त्यांनी गुड्डीच्या प्रार्थनागीतात धर्म हाच शब्द वापरला आहे. धर्म शब्दाचा हा भीषण अनुभव घेतल्यानंतर २४ वर्षांनी आणि आजपासून फक्त ४१ वर्षांपूर्वी त्यांनी धर्म शब्द वापरला. एक गोष्ट आणखीनही आवर्जून लक्षात ठेवायला हवी की, गुलजार रूढ अर्थाने धार्मिक- देवभोळे- भक्त वगैरे नाहीत. रा.स्व. संघ, विहिंप यांच्याशी सुद्धा त्यांचा दुरूनही संबंध नाही. उलट तथाकथित धर्मनिरपेक्ष समजल्या जाणाऱ्या वर्गातच त्यांची उठबस आणि वावर आहे. तरीही गुड्डीच्या प्रसिद्ध प्रार्थनागीतात त्यांनी धर्मावर चालण्याची मनीषा व्यक्त केली आहे. कोणताही शब्द उगीचच, विचार न करता वापरणाऱ्यातील ते नाहीत.

एवढ्या विवेचनाचे कारण एकच आहे. आज धर्म या शब्दाला प्राप्त झालेला आणि चिकटविण्यात आलेला चुकीचा अर्थ आणि त्या आधारे समाजात माजलेला आणि माजवण्यात येणारा गोंधळ याकडे लक्ष वेधणे. रा. स्व. संघ, त्याचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी, पंडित दीनदयाळ उपाध्याय, स्व. दत्तोपंत ठेंगडी गेली अनेक दशके सातत्याने अन आग्रहाने हा विचार मांडत होते की, `धर्म' म्हणजे religion नव्हे. ते चुकीचे भाषांतर आहे. त्यामुळे खूप घोळ, गोंधळ आणि गडबड होत आहे आणि पुढेही होईल. `धर्म' म्हणजे मत/ पंथ/ संप्रदाय/ उपासना पद्धती/ पूजा पद्धती/ देव- पूजा- कर्मकांड- नाही. या सगळ्याचा धर्मात समावेश होऊ शकतो आणि याशिवायही धर्म असू शकतो. धर्म आणि या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. अगदी निरीश्वरवादी, जडवादी हे सुद्धा धर्माशिवाय राहू शकत नाहीत. धर्म काढून टाकला तर कुठल्याच गोष्टीला काहीही अर्थ राहणार नाही. एका संस्कृत सुभाषितात सुद्धा हा विचार मांडण्यात आला आहे. आहार, निद्रा, भय, मैथुन हे पशु आणि माणूस यांच्यात समान आहे आणि केवळ धर्म हीच अशी गोष्ट आहे की ज्यामुळे माणूस आणि पशु यांच्यात फरक करता येईल. श्रीकृष्णाने जेव्हा `यतो धर्मस्ततो जय:' अशी घोषणा केली तेव्हा त्याला हाच धर्म अधोरेखित करावयाचा होता. महर्षी वेद व्यास ज्यावेळी म्हणाले- `ऊर्ध्वबाहू विरौम्येष, नच कश्चित शृणोति माम, धर्माद अर्थश्चकामश्च, स धर्म: किं न सेव्यते' त्यावेळी त्यांनाही हाच धर्म अभिप्रेत होता.

इंग्रज येथे आले त्यावेळी अनेक संकल्पना आणि शब्द त्यांच्यासाठी नवीन होते. त्यामुळे त्यांचे त्यांनी चुकीचे भाषांतर करून ठेवले. धर्म या शब्दाचेही तसेच झाले. परंतु हजारो वर्षांपासून विकसित झालेल्या आपल्या समाजात अनेक संकल्पना देखील समाजासोबतच विकसित झालेल्या आहेत. त्या संकल्पनांचे शब्द आणि अर्थ समाजाच्या रक्तातून वाहत आहेत. धर्म संकल्पनेचेही तसेच आहे. अन तेच गुलजारजींच्या गुड्डीमधील प्रार्थनागीतातून सहज श्वासासारखे अभिव्यक्त झाले आहे. धर्माचा चुकीचा अर्थ लावल्याने काय काय झाले व होत आहे आणि धर्म म्हणजे नेमके काय; हे वेगळे विषय आहेत. मात्र, धर्म म्हणजे आम्ही आज समजतो ते नाही हे समजून घेणे आणि चुकीचे समज आपल्या मनातून, डोक्यातून काढून टाकणे प्रथम गरजेचे आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, २२ नोव्हेंबर २०१४

शनिवार, १५ नोव्हेंबर, २०१४

पं. नेहरूंचे गांधीजी- २

अलीपूर कारागृहात असतानाच्या आपल्या मनस्थितीचे वर्णन पं. नेहरूंनी आत्मकथेच्या अखेरी अखेरी केले आहे. ते लिहितात- `एप्रिल महिना उजाडला अलीपूर जेलमध्ये माझ्या कानावर आलेल्या अप्रिय बातम्यांमुळे माझे मनस्वास्थ्य बिघडून गेले होते. एके दिवशी तुरुंगाच्या सुपरींटेंडन्टनी सहजगत्या मला सांगितले की, गांधीजींनी कायदेभंग परत घेतला. इतकी वर्षे महत्वाची मानलेली चळवळ संपुष्टात आली हे ऐकून मनाला दु:ख झाले. तथापि, असा शेवट व्हावयाचा हे ठरलेलेच होते, अशी माझी मी समजूत काढली. त्यानंतर माझ्या हाती `स्टेट्समन' पडला व कायदेभंग थांबवताना गांधीजींनी केलेला खुलासा पाहिल्यावर माझे अंत:करण अंधारात खचत चालले आहे असे मला वाटले. कायदेभंग करण्यात गांधीजींनी यथोचित वर्तन केले असेच मला वाटले. पण त्यांनी जी कारणमीमांसा मांडली होती ती मात्र बुद्धीची अवहेलना करणारी होती. राष्ट्रीय चळवळीच्या पुढाऱ्यांनी असल्या तर्कशास्त्राचा अवलंब करावा ही विलक्षण गोष्ट होय.'

पुढे ते लिहितात- `गांधीजींच्या व माझ्यामध्ये अफाट दर्या पसरला आहे, असे मला वाटते. गेली कित्येक वर्षे ज्या स्नेहबंधनांनी मी त्यांच्याशी निगडीत होऊन गेलो होतो, ती तुटून जात आहेत असे वाटून अंत:करणात सुरी खुपसल्याप्रमाणे मला वेदना झाल्या. कित्येक वेळपर्यंत माझ्या मनात तुफान माजून राहिले होते. गेल्या एक-दोन वर्षात गांधीजींनी केलेल्या गोष्टी मला फारशा पसंत नव्हत्या. कायदेभंगाच्या चळवळीत आपले सहकारी गुंतले असता त्यांनी चालू केलेले उपवास व उत्पन्न केलेले नवे नवे प्रश्न, त्यांनी स्वत:च उपस्थित केलेल्या अनेक भानगडी व त्यामुळे त्यांच्यापुढे पडलेले विलक्षण पेच या सर्व गोष्टींच्या मी विरुद्ध होतो. मी थोडावेळ तुरुंगाबाहेर होतो. तेवढ्या वेळात हे सर्व भेद माझ्या पूर्णपणे लक्षात आले होते.'

`एकदम मनात विचार आला की, अलीपूरच्या तुरुंगात आपण एकाकी कोंडलेलो आहोत. मला सर्व जीवन असार व अरण्यवत भासू लागले. आतापर्यंत अनेक बिकट धडे मी गिरवले असतील; परंतु सर्वात बिकट व दु:खदायक असा धडा मला आता गिरवावयाचा होता. तो असा की, आपण दुसऱ्या कोणावरही विसंबून राहता कामा नये. आयुष्याच्या मार्गावर सोबतीची पर्वा न करता चालत राहिले पाहिजे. दुसऱ्यावर विसंबून राहिले म्हणजे निराशा व्हावयाचीच.'

`माझ्या अंत:करणातील हे वादळ ज्यांनी माजविले त्या गांधींची मला पुन्हा आठवण आली. गांधीजी म्हणजे किती असामान्य माणूस ! त्यांच्या स्वभावातील गोडी किती अनुपम, किती अनिवार्य, आणि जनमनावरील त्यांचे प्रभुत्व तरी किती सूक्ष्म पण गाढ ! त्यांच्या केवळ लेखांवरून आणि उक्तींवरून गांधीजींची खरी कल्पना येणार नाही. त्यापेक्षा कितीतरी पटींनी त्यांचे व्यक्तित्व मोठे आहे. त्यांनी केलेली हिंदुस्थानची सेवा तरी किती विशाल आहे बरे ! हिंदी जनतेत त्यांनी मनुष्यपणा निर्माण केला. धैर्याचा स्फुल्लिंग चेतवला. शिस्त व सहनशक्ती यांचे बीजारोपण केले आणि ध्येयासाठी हसतमुखाने त्याग करावयास आणि त्या त्यागाला अनुरूप असा विनय अंगी धारण करण्यासही त्यांनीच ना शिकविले? धैर्याच्या खंबीर पायावरच शीलसंवर्धन करता येईल असे ते म्हणत असत. ज्याच्यापाशी धैर्य नाही; त्याच्यापाशी नीती, धर्म, प्रेम- काहीही असणे शक्य नाही. मनावर भीतीचे दडपण असेल तर सत्य अथवा प्रेम यांची साथ फार काळपर्यंत करता येणार नाही. हिंसेबद्दल मनात आत्यंतिक तिटकारा असूनही `भ्याडपणा हा हिंसेपेक्षा देखील तिरस्करणीय आहे' असे ते म्हणत असत.'

`गांधीजी हिंदुस्थानचे अनन्यसाधारण असे प्रतिनिधी बनले. या पुरातन आणि हतदैवी देशाचे अंत:करणच त्यांच्या शब्दांवाटे प्रकट होत होते. गांधीजी म्हणजेच जणू काही हिंदुस्थान असे वाटावे. त्यांच्यातील उणीवादेखील हिंदुस्थानच्या राष्ट्रदेहातील उणीवा होत्या. त्यांचा अपमान झाला तर तो, गांधीजी या व्यक्तीचा नसून सर्व राष्ट्राचा झाला असे वाटत असे. व्हाईसरॉय वगैरेसारखे जे सद्गृहस्थ गांधीजींची नालस्ती करीत, त्यांना आपण सर्व राष्ट्राच्या हृदयाला सुया बोचीत आहोत याची जाणीव नसावी. परंतु आज गांधीजींचे धोरण, त्यांची देशसेवा, त्यांचे माझ्यावर झालेले अनंत उपकार याविषयी प्रश्नच नव्हता. या सर्व गोष्टी मान्य असल्या, तरीही इतर बाबतीत माणूस घोडचुका करणार नाही असे थोडेच आहे? त्यांचे ध्येय तरी कोणते? इतक्या वर्षांचा सहवास घडूनसुद्धा मला त्यांचे ध्येय स्पष्टपणे कळलेले नव्हते. त्यांना तरी स्वत:च्या ध्येयाची स्पष्ट कल्पना आलेली आहे की नाही, याची मला शंकाच वाटत होती.'

गांधीजी म्हणजे एक कोडे आहे, विसंगतीचे एक उदाहरण आहे. सर्वच असामान्य माणसे, मला वाटते अशी असतात. कित्येक वर्षे मला एक गूढ पडले आहे की, पददलित माणसांविषयी ज्याला इतके गाढ प्रेम व आस्था वाटते, त्याने पददलित वर्ग हमखास उत्पन्न करणाऱ्या व त्याला पिसून काढणाऱ्या समाजरचनेला पाठिंबा द्यावा हे कसे? अहिंसेचा जो एवढा मोठा कैवारी, त्यानेच निर्भेळ हिंसा व दडपशाही यावर आधारलेल्या सामाजिक व राजकीय संस्थांना मान्यता द्यावी, हा काय न्याय? स्वत:ला ते कधीकधी समाजवादी म्हणवतात. पण त्या शब्दाला त्यांच्या कोशात विशिष्ट अर्थ आहे. व्यवहारात समाजवाद या शब्दामुळे ज्या आर्थिक घटनेचा बोध होतो, तो त्यांच्या व्याख्येत बसत नाही. त्याच्या मागोमाग बऱ्याच प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांनीही त्या शब्दाचा वापर करण्यास प्रारंभ केला आहे. त्यांच्या तोंडी असणाऱ्या समाजवादाचा `भूतदयावादाचे कडबोळे' एवढाच अर्थ करता येईल.'

`दक्षिण आफ्रिकेत असताना गांधींच्या मनात कल्पनातीत स्थित्यंतरे घडून आली व त्या योगाने प्रचंड विचारमंथन होऊन त्यांचा जीवनविषयक दृष्टीकोन पार पालटून गेला. तेव्हापासून एका ठाम विचारसरणीच्या स्थिर पायावर त्यांच्या कल्पनांना अधिष्ठान सापडले असून गांधीजींच्या विचारात आता स्थित्यंतराला वाव उरलेला नाही. हिंसाकर्माशी निगडीत झालेल्या समाजवादाविषयी व विशेषत: मार्क्सवादाविषयी त्यांचे मन साफ नाही. कलह व हिंसा यांचा भपकारा वर्गकलह या शब्दातून येत असल्याने त्यांना तो शब्ददेखील त्याज्य वाटतो. जनतेच्या राहणीचे मान काही एका किमान दर्जापलीकडे जावे अशी त्यांची मुळीच इच्छा नाही. काही मूठभर सुखासीन लोक विषयकर्दमात लोळत आहेत तेवढे पुरे; त्यांची संख्या वाढवून परिस्थिती अधिकच बिघडविण्यात काय हशील? विशिष्ट मर्यादेपलीकडे सुखसाधनांची वाढ व्हावी याविषयी ते उत्सुक नसल्याने समाजवाद जे चित्र रेखाटतो, ते त्यांना यत्किंचितही विलोभनीय वाटत नाही. मग भांडवलशाही अंशत: तरी का मान्य करावयाची? वास्तविक त्यांना दोन्ही पद्धतींबद्दल तिटकाराच आहे. परंतु भांडवलशाही सध्या प्रत्यक्ष विद्यमान आहे म्हणून, तिच्याकडे दुर्लक्ष करणे शक्य नाही म्हणून व सपशेल उपासमारीपेक्षा ती जरा बरी म्हणून, ते भांडवलशाहीला मान्यता देतात इतकेच.'

`आत्यंतिक सुख व स्वास्थ्य मिळविणे हे ध्येय न मानता, लोकांनी जीवन अधिक नीतीमय करावे, दुराचरणाचा त्याग करावा, चैन सोडावी आणि अशा रीतीने स्वत:ची आत्मोन्नती साधित जावे, अशी त्यांची इच्छा आहे. ज्या कोणाला जनतेची सेवा करावी असे वाटत असेल त्याने जनतेची आर्थिक उन्नती साधणे हेच आपले मुख्य काम आहे असे न समजता स्वत:च्या राहणीचे मान कमी करून सामान्य जनांच्या पायरीवर यावे व त्यांच्याशी मिसळावे. खरी लोकशाही ती हीच, असे त्यांचे मत असल्याचे १७ सप्टेंबर १९३४ रोजी गांधीजींनी काढलेल्या जाहीर पत्रकावरून दिसून येईल.'

`ही दृष्टी बहुधा पुरातन काळाशी संलग्न झालेली आढळते. त्या काळाची परिस्थिती बदलून स्वप्नातही कधी कल्पना आली नसेल इतकी साधनसंपत्ती मानवजातीच्या हाती आता जमा झाली असली, तरी आमच्या मनाभोवती पडलेले भूतकाळाचे पाश अद्यापि ढिले झालेले नाहीत. दुसरे ज्याला `तमोयुग' म्हणतात तेच आपले `कृतयुग' अशी समजूत करून घेऊन कॅथॉलिक लोक मध्ययुगीन काळाकडे माना मुरडून पाहत आहेत. `इस्लामी लोकशाही'चे युग पहिल्या खलिफाच्या सदा विजयी राजवटीत होऊन गेले म्हणून मुसलमानांची दृष्टी त्या जमान्यावर खिळून राहिली आहे व वैदिक काळ आणि रामराज्य यांची स्वप्ने हिंदू लोक या घडीला पाहत आहेत. इतिहास मात्र कानाशी ओरडून सांगतो आहे की, त्या सुवर्णयुगात अन्नवस्त्रादी अत्यावश्यक गोष्टीदेखील जनतेला मिळत नसत. लोकांना फाके मारावे लागत. शिखरावरच्या मूठभर लोकांनी अत्यानंद चाखला असेल; कारण आत्मिक विलास उपभोगण्यासाठी आवश्यक ती साधने व स्वास्थ्य त्यांना लाभत होते. पण इतरांची दशा पुसाल तर उदरभरणासाठी घाम शिंपित राहण्यापलीकडे त्यांनी काही केले असेल अशी कल्पनासुद्धा करवत नाही. उपाशी पोटाला संस्कृती कसली आणि वेदांत कसला? पोटाला गोळाभर अन्न कसे मिळवायचे या विवंचनेतच ते निमग्न असणार.'

व्यक्तीची मानसिक, नैतिक व आध्यात्मिक उन्नती करून त्याद्वारे परिस्थितीत बदल करावा, असे गांधीजींना वाटते. दुराचरणाचा व भोगलोलुपतेचा मार्ग वर्जून लोकांनी शुद्ध व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे. मद्यपान, धुम्रपान इत्यादी व्यसने सोडा, कामवासनेचे दमन करा, असा त्यांचा आग्रहाचा उपदेश आहे. पण माणसाची लुटारू वृत्ती उतावी, मातावी आणि ती स्वैर सुटावी अशीच सध्याची समाजव्यवस्था आहे. त्यात मनुष्याच्या अधम वृत्ती `गवता ऐशा उदंड' पोसतात हेही तितकेच खरे आहे. दुसऱ्याला जमिनीवर लोळवून जो त्या मुडद्यांच्या उंच राशीवर उभा राहील तो यशवंत ठरतो. असल्या आकांक्षा व असल्या भावना समाजात जोपासल्या जात असता व शिखरावरची माणसे त्यांच्या संमोहनाला बळी पडत असता, नीतिमान मानव निर्माण करण्याचे आपले ध्येय जयास जाईल असे गांधीजींना वाटते तरी कसे?'

अलीपूर कारागृहातील मनस्थितीचे हे लांबलचक विवरण खूप गोष्टी स्पष्ट करणारे आहे. गांधीजींच्या संबंधात नेहरूंचे मत जसे यातून स्पष्ट होते; त्याप्रमाणेच- भारतीय संस्कृती, समाजव्यवस्था, चिंतन याबद्दलची त्यांची प्रतिकूल मते; पाश्चात्य धार्जीणेपणा; मार्क्सवादी हिंसेला नसलेला विरोध; मात्र भारतीय आत्मरक्षेसाठी बळाच्या वापरला असलेला विरोध; गांधीजींना वर्गसंघर्ष शब्द चालत नाही यावर तक्रार पण आपल्याला रामराज्य शब्द चालत नाही यातील विसंगती; या साऱ्याचेही दर्शन होते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे समाजात वाईट गोष्टींची चलती आहे म्हणूनच माणूस घडवण्याची गरज आहे, समाजात वाईट गोष्टींची चलती नसती तर माणूस घडवण्याची गरजच पडली नसती; या अतिशय साध्या आणि मुलभूत मुद्याविषयीची नेहरूंची भोंगळ संभ्रमावस्था; या साऱ्यावर पं. नेहरूंचे हे गांधीजी विषयक कथन प्रखर प्रकाश टाकते.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, १५ नोव्हेंबर २०१४

शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०१४

पं. नेहरूंचे गांधीजी- १

भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी अल्मोड्याच्या जिल्हा कारागृहात आपली आत्मकथा १४ फेब्रुवारी १९३५ रोजी लिहून पूर्ण केली. त्यावेळी ते ४५ वर्षांचे होते. त्यांच्या या आत्मकथेत महात्मा गांधी यांच्याबद्दल देखील त्यांनी स्वाभाविकपणेच लिहिले आहे. १९१९ साली काँग्रेसचे अधिवेशन अमृतसर शहरात भरले होते. त्याचे अध्यक्ष मोतीलाल नेहरू होते. १९१९ काँग्रेस ही पहिली गांधी-काँग्रेस होती, असे मत नेहरूंनी आत्मकथेत मांडले आहे. त्या अधिवेशनाला लोकमान्य उपस्थित होते तरीही लोकांचा ओढा आणि कल गांधीजींकडे होता. त्यानंतर १९२० च्या १ ऑगस्टला लोकमान्यांचे निधन झाल्यावर गांधीजींसोबत आपणही मुंबईला गेलो होतो असे नेहरूंनी लिहिले आहे.

आपले वडील मोतीलाल नेहरू आणि गांधीजी यांच्या संबंधांबद्दल नेहरूंनी लिहिले आहे- `गांधीजींबद्दल त्यांना (वडिलांना) वैयक्तिक आकर्षणही वाटत होते. परंतु ही जोडी पाहून नवल वाटण्यासारखे होते. एक संत, विलास परान्मुख, धर्मनिष्ठ, आयुष्यातील शारीरिक व इंद्रीयजन्य सुखांचा त्याग करणारा; तर दुसरा विलासी, जीवनातील अनेकविध सुखांचा आस्वाद घेण्यात तत्पर व इहलोकीच्या अस्तित्वानंतरच्या गोष्टींबद्दल बेफिकीर ! मानस पृथक्करणाच्या भाषेत सांगायचे तर अंतर्मुख व बहिर्मुख व्यक्तींची ही युती झालेली होती. भेद असूनही सामान्य आशाबंधांनी दोघेही निगडीत झाले होते. दोघांचे राजकीय पंथ भिन्न झाल्यावरदेखील त्यांच्यातील स्नेहबंध दृढ राहिला.' गांधीजी व मोतीलाल नेहरू यांचे राजकीय पंथ भिन्न झाल्याचे जवाहरलाल यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.

काँग्रेसमध्ये गांधीयुग सुरु झाल्याने काय फरक पडला याचे सुंदर वर्णनही या आत्मकथेत करण्यात आले आहे. जवाहरलालजी म्हणतात- `कोलकाताच्या अधिवेशनापासून काँग्रेसच्या राजकारणात गांधीयुगाला प्रारंभ झाला व ते युग अद्यापि चालू आहे. गांधीयुगापासून काँग्रेसचे स्वरूप अजिबात पालटले. युरोपियन पोशाख गेला व त्याच्या जागी खादीची वस्त्रे आली. काँग्रेसमध्ये कनिष्ठ, मध्यमवर्गीय प्रतिनिधींचा भरणा झाला. अधिवेशनात हिंदुस्थानी भाषा अधिकाधिक प्रचारात येउन काँग्रेस अधिवेशनात नवे चैतन्य, नवा उत्साह व नवी कळकळ दृष्टीस पडू लागली.'

काल काँग्रेस पक्षातर्फे घेण्यात आलेल्या नेहरू जयंती कार्यक्रमात पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी इंग्रजीला दुय्यम स्थान देत असल्याची तक्रार केली. त्या संदर्भात पं. नेहरू यांच्या वरील लिखाणाचा संदर्भ महत्वाचा ठरावा. पूर्वी गांधीजी व नेहरू असा संघर्ष होता आणि आता मोदी व राहुल असा संघर्ष आहे. महात्मा गांधीजींच्या बाजूने कोण आणि विरोधात कोण हे सहज लक्षात येणारे आहे. तरीही `गांधी-नेहरू विचारधारा' असाच शब्दप्रयोग होत राहणार असेल तर कठीण आहे.

गांधीजींनी सुरु केलेल्या खिलाफत चळवळीच्या संदर्भात आपल्या आत्मकथेत लिहिताना पं. नेहरू म्हणतात- `खिलाफतीच्या चळवळीला प्रामुख्य देण्यात आल्यामुळे पुष्कळ मौलवींनी व मुसलमानांच्या धार्मिक पुढाऱ्यांनी चळवळीत भाग घेतला होता. त्यामुळे चळवळीला थोडेसे धार्मिक वळण लागले. चळवळीच्या धार्मिक व आध्यात्मिक बाजूवर गांधीजी नेहमीच भर देत असत. त्यांच्या धर्मात कडवेपणा अथवा असहिष्णुता नव्हती, परंतु जीवनाकडे धार्मिक दृष्टीने पाहण्याची शिकवणूक त्यापासून मिळत असे. त्याचा परिणाम चळवळीवर फार झाला. जनसमुदायात तरी निदान, चळवळीला धार्मिक पुनरुज्जीवनाच्या चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. बहुतेक काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्या नेतृत्वाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करीत व ते गांधीजी बोलतील तसे बोलत असत.'

यासंबंधात आपल्याला काय वाटत होते हेदेखील पं. नेहरूंनी अतिशय स्पष्ट शब्दात नमूद केले आहे. ते लिहितात- `हिंदू व मुसलमान समाजात वाढीस लागलेल्या या भावनांकडे पाहून मला थोडीशी काळजीच वाटत असे. मला ही गोष्ट बिलकुल पसंत नव्हती. जाहीर सभातून हे मौलवी, मौलाना आणि स्वामी जे विचार प्रदर्शित करीत ते फार प्रतिगामी स्वरूपाचे असत. समाजशास्त्र, अर्थशास्त्र व इतिहास याबद्दलच त्यांचे ज्ञान इथून तिथून चुकीचे वाटत होते. प्रत्येक गोष्टीला धर्माची फोडणी दिल्यामुळे स्पष्टपणे विचार करणे अशक्य होऊन बसे. गांधीजींचे काही काही शब्दही कर्णकटू वाटत. उदा.- `रामराज्य' हा त्यांचा नेहमी येणारा शब्द घ्या. पण त्यांना थोपवण्याची शक्ती माझ्यात नव्हती. शब्द रूढ आणि जनतेला ज्ञात आहेत म्हणून गांधीजी ते वापरीत असतील, असे स्वत:चे समाधान मी करून घेत होतो. कारण लोकांची अंत:करणे काबीज करण्याची कला त्यांना पूर्णपणे अवगत होती. त्यांची भाषा उलगडणे मुष्किलीचे होई. पण ते थोर असामान्य पुरुष आहेत, विजयी सेनानी आहेत, एवढी गोष्ट आम्हाला समजण्याइतके त्यांच्याविषयीचे ज्ञान आम्हाला होऊन चुकले होते. त्या काळापुरता तरी आम्ही त्यांच्या हाती कोरा चेक दिला होता. त्यांच्या लहरी व त्यांचे छंद याबद्दल आपसात चर्चा सुरु झाली की आम्ही अर्धवट थट्टेने म्हणत असू की, स्वराज्य मिळाल्यावर मात्र या प्रकारांना पायबंद घातलाच पाहिजे !' स्वत: पं. नेहरूंच्या या लिखाणावर वेगळी टिप्पणी करण्याची गरज नाही. `रामराज्य' हा शब्दही कर्णकटू वाटणारे पं. नेहरू सगळ्यांबद्दल सहानुभूती ठेवणारे कसे काय असू शकतील?

गांधीजींनी कायदेभंगाची चळवळ मागे घेतली. त्याबद्दल पं. नेहरू लिहितात- `१९२२ च्या सुरुवातीला यक्षिणीची कांडी फिरावी त्याप्रमाणे सर्वच देखावा पालटला. तुरुंगात आम्हाला कळले की, गांधीजींनी चळवळीचे सर्व चढाऊ कार्यक्रम बंद केले असून कायदेभंगाची चळवळ थांबविली आहे. ती बातमी ऐकून आम्ही थक्क झालो, गोंधळून गेलो. वृत्तपत्रात बातमी वाचली की, चौरीचौरा नावाच्या गावी खेडुतांच्या जमावाने पोलिसांचा प्रतिकार करण्याच्या उदेशाने पोलिसांसकट चौकीला आग लावून दिली आणि त्यामुळे सहासात पोलिस जळून मेले. काही आठवडे गेल्यावर सरकारने गांधीजींना पकडून त्यांना जबरदस्त शिक्षा ठोठावली. १९२२ मध्ये कायदेभंग बंद केला ही गोष्ट योग्य झाली असली, तरी फार मोठ्या चळवळीचा कासरा ताणून ती एकाएकी थांबविल्यामुळे देशात घातुक मनोवृत्तींची वाढ झाली असण्याचा संभव आहे. राजकीय क्षेत्रात व्यक्त होणारी निष्फळ व पांगलेली हिंसावृत्ती मावळली, पण व्यक्त होण्यासाठी कोठे तरी ती अवकाश शोधीत होतीच. त्यामुळे नंतरच्या काळात जातीय तंटे विकोपास गेले असावेत.'

आपल्या आत्मकथेत एका ठिकाणी गांधीजींबद्दल ते लिहितात- `मनुष्यनिर्मित वस्तूंमधील सौंदर्य अथवा कला पारखण्याची शक्ती गांधीजींच्या अंगी फारच थोडी होती. नैसर्गिक सौंदर्याचे मात्र ते कौतुक करीत. ताजमहाल म्हणजे जबरदस्तीने राबविण्यात आलेल्या मजुरांच्या घामाचे घनीभूत स्वरूप. याहून त्याची मातब्बरी नाही, असे त्यांना वाटे. त्यांची सुवासाबद्दलची अभिरुचीही माफक असे. तथापि जीवनकलेचे तंत्र त्यांनी आपल्या परीने हुडकून काढले होते व आपल्या जीवनाला एखाद्या कलाकृतीची प्रमाणबद्धताही प्राप्त करून दिली होती. त्यांची प्रत्येक हालचाल अर्थपूर्ण व निर्दोष अशी असे. त्यात एक विशिष्ट चारुता प्रत्ययास येई. खडबडीतपणाचा, तीक्ष्णपणाचा, लवलेशही त्यांच्यापाशी नव्हता. मध्यमवर्गात भरपेट सापडणाऱ्या हीन व सवंग अभिरुचीचा मागमूसही त्यांच्या अंगी दिसत नसे. मन:शांतीचा जो दिवा त्यांना गवसला, त्याच्या दिव्य तेजाची पखरण त्यांनी इतरांवर केली व त्याच्या उजेडाने उजळलेल्या आयुष्याच्या नागमोडी मार्गावर मोठ्या निश्चयाने व निर्भयतेने ते आपली पावले टाकीत राहिले.'

१९२४ साली गांधीजी बेळगाव काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्याबद्दल नेहरू लिहितात- `१९२४ च्या डिसेंबरात बेळगाव येथे जे काँग्रेस अधिवेशन भरले त्याचे गांधीजी अध्यक्ष होते. गेली कित्येक वर्षे काँग्रेसचे महाध्यक्ष बनून राहिलेल्या गांधीजींना काँग्रेसचे अध्यक्ष करणे म्हणजे थोडा विडंबनाचाच प्रकार होता ! त्यांचे अध्यक्षीय भाषण मला आवडले नाही. मला ते मुळीच स्फूर्तीदायक वाटले नाही. गांधीजींनी सांगितल्यावरून नव्या वर्षासाठी काँग्रेस कमिटीच्या चिटणीसाच्या जागी माझी निवड झाली. मी म्हणजे काँग्रेसचा मिराशी चिटणीस बनत चाललो होतो ! माझ्या इच्छेची कोणी पर्वाच करीत नसे !'

१९३३ च्या राजकारणाबद्दल लिहिताना पं. नेहरू लिहितात- `मुंबईमध्ये तुरुंगातून नुकतेच सुटून आलेले काही मित्र व सहकारी मला भेटले. समाजवादी तत्वांचा प्रभाव येथे बऱ्याच प्रमाणात दिसून आला. काँग्रेसमधील पुढाऱ्यांच्या काही कृत्यांबद्दल त्यांच्यामध्ये बराचसा असंतोषही पसरलेला दिसत होता. राजकारणाकडे पाहण्याच्या गांधीजींच्या आध्यात्मिक दृष्टीकोनावरही त्यांनी सडेतोड टीका केली. टिकेपैकी बराचसा भाग मलासुद्धा मान्य होता.'

आपल्या बहिणीच्या लग्नाच्या पत्रिका गांधीजींना आवडल्या नव्हत्या हे सांगताना पं. नेहरू आत्मकथेत लिहितात- `विवाहाच्या छोट्या निमंत्रण पत्रिका हिंदुस्थानी भाषेत छापून घेतल्या होत्या. पण लिपी मात्र रोमन होती. ही एक नवलपरीचीच गोष्ट झाली. हिंदी भाषा रोमन लिपीत लिहिण्याची पद्धत सैन्यात व मिशनच्या संस्थांमधून तेवढी प्रचलित आहे. मी हा प्रयोग म्हणून करून पाहिला. अनुकूल- प्रतिकूल दोन्ही प्रकारची मते मला ऐकावयाला मिळाली. पण बहुसंख्य लोक प्रतिकूलच दिसले. माझी कल्पना गांधीजींना पसंत पडली नाही. संपन्न परंपरेच्या कोणत्याही भाषेची लिपी बदलणे म्हणजे मर्मस्थानाची शस्त्रक्रिया करण्यासारखे आहे. साहित्यात लिपीला अत्यंत जिव्हाळ्याचे स्थान प्राप्त झालेले असते. लिपी बदलली की शब्दांचे निराळेच स्वरूप आपल्यापुढे उभे राहून त्यातून निराळ्याच ध्वनींची व कल्पनांची निर्मिती होऊ लागते. अशा परिस्थितीत जुनी लिपी काढून टाकणे हे अंगावरील कातडी सोलून काढण्यासारखे मोठे क्रूर कर्म होईल. नव्या लिपीमुळे देशातील शैक्षणिक प्रगतीलासुद्धा पायबंद बसण्याचा संभव आहे.' नेहरूंच्या या कथनाला अनुसरून असे म्हणण्यास वाव आहे की, श्रीमती सोनिया गांधी यांची रोमन लिपीत लिहिली जाणारी हिंदी भाषणे गांधीजींना खचितच आवडली नसती.

१९३० च्या दशकाच्या सुरुवातीला आपण समाजवादाकडे वळू लागलो होतो आणि काँग्रेसमधील पुष्कळ सहकाऱ्यांना समाजवाद मान्य नव्हता, असे सांगून नेहरू लिहितात- `डिसेंबरअखेर गांधीजींनी मद्रासहून मला पत्र पाठवले. तेव्हादेखील हीच अडचण पुन्हा उपस्थित झाली. `मद्रास मेल'मध्ये प्रसिद्ध झालेल्या आपल्या मुलाखतीचे कात्रण त्यांनी मजकडे पाठविले होते. बातमीदाराने मजविषयी प्रश्न टाकला असता त्यांनी माझ्या कार्याबद्दल जवळजवळ दिलगिरी व्यक्त करणारे उद्गार काढले होते व काँग्रेसच्या नावाने मी या नव्या विचारसरणीचा प्रचार करणार नाही, असा माझ्या प्रामाणिकपणाबद्दल विश्वासही प्रकट केला होता. माझ्याबद्दलचा हा उल्लेख तर मला पसंत पडला नाहीच पण जमीनदारी पद्धतीचे त्यांनी जे समर्थन पुढे मांडले होते, ते वाचून माझे डोके बरेच गरम झाले. ती पद्धती म्हणजे राष्ट्राच्या व शेतकऱ्यांच्या आर्थिक जीवनाचे एक इष्ट अंग आहे, असे त्यांना वाटत असल्याचे पाहून मी थक्कच झालो. कारण पुरेसा मोबदला मिळून या पद्धतीची इतिश्री झाली तर ती खुद्द जमीनदार- तालुकदारांनाही हवी आहे. तथापि गांधीजींना मात्र ती पद्धती इष्टच वाटत होती आणि निधीधारकत्व वगैरेसंबंधी आपले विचार ते अद्यापि बोलून दाखवीतच होते. माझ्या-त्यांच्या दृष्टीकोनात केवढा हा मतभेद? भविष्यकाळी त्यांच्याबरोबर आपण कसे सहकार्य करणार, असे विचार माझ्या मनात आले.' श्रीमती इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात राज्यघटनेत समाविष्ट केलेला समाजवाद नेहरूंच्या विचारांशी जुळणारा नक्कीच आहे, पण मग गांधीजींचे काय? या प्रश्नाचे उत्तर काँग्रेसने देणे आवश्यक आहे.

बिहारमध्ये झालेला मोठा भूकंप म्हणजे अस्पृश्यतेच्या पापाबद्दल ईश्वराने दिलेली शिक्षा आहे, असे उद्गार गांधीजींनी काढले होते. त्यांचे हे विधान आपल्याला मुळीच पटले नव्हते व ते वाचून आपली मती गुंग होऊन गेली होती, असेही नेहरूंनी आत्मकथेत नमूद केले आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, १४ नोव्हेंबर २०१४

रविवार, ९ नोव्हेंबर, २०१४

संघ परिचय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता अपरिचित राहिलेला नाही. केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सगळ्यात मोठी स्वयंसेवी संघटना म्हणून संघ ओळखला जातो. तरीही संघाची ओळख पटलेली आहे का, असा प्रश्न विचारला तर तो वावगा ठरणार नाही. संघाचे समर्थक, संघाचे विरोधक, संघाबद्दल आस्था बाळगणारे, संघाला पाण्यात पाहणारे, एवढेच नव्हे तर संघाचे स्वयंसेवकही आपापल्या पद्धतीने संघाची ओळख पटवून देतात, संघाचे मूल्यमापन करतात किंवा संघाबद्दलचे आपले मत तयार करतात. त्यात काहीही तथ्य नसते असे नाही. परंतु ते परिपूर्ण असते असेही नाही. संघ स्वत:देखील स्वत:ची ओळख कधी कधी देतो. मात्र तीही पूर्ण ओळख असतेच असे नाही. विशिष्ट संदर्भ घेउन आलेले ते एक दर्शन असते. परिपूर्ण दर्शन मात्र नसते.

संघाचे भाष्यकार आणि थोर विचारवंत स्व. दत्तोपंत ठेंगडी संघाचे स्वरुप समजावून देताना भाषाशास्त्रातील अनन्वय अलंकाराचे उदहारण देत असत. अनन्वय अलंकार कसा असतो हे सांगण्यासाठी संस्कृत भाषेत एक श्लोक आहे.
`गगनं गगनाकारं, सागर: सागरोपमा:
रामरावणयोर्युद्धम, रामरावणयोरिव'
म्हणजे आकाश आकाशासारखंच आहे, सागर सागरासारखाच आहे आणि राम-रावण युद्ध हे राम- रावण युद्धासारखेच आहे. त्याप्रमाणेच संघही संघासारखाच आहे. तो नीट समजून घेण्यासाठी त्याचे विविधांगी, गुंतागुंतीचे स्वरुप समजून घेणे आवश्यक आहे. अर्थात संघाला अशा विश्लेषणाची गरज नाही. इ.स. १९२५ पासून आजतागायत संघ त्याच्या पद्धतीने चालत राहिला आहे आणि वाढत राहिला आहे. मात्र संघाला याची गरज नसली तरीही संघाला जे साध्य करायचे आहे त्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून अशा विश्लेषणाची गरज आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हटले की सर्वप्रथम डोळ्यापुढे येते ती संघाची शाखा. एका मैदानावर भगवा ध्वज रोवलेला. त्यासमोर काही लोक एकत्र झालेले आणि त्यांचे काही कार्यक्रम. हे कार्यक्रम खेळ, नियुद्ध, संचलन, दंड, लेझीम, सूर्यनमस्कार, योगासने, व्यायामयोग, घोष, गीतगायन, कथाकथन, चर्चा, भाषण, प्रार्थना असे अनेक प्रकारचे असू शकतात. हीच सामान्यपणे समाजाला असलेली संघाची ओळख आहे. संघ काय करतो तर शाखा चालवतो. या शाखांमध्ये येणाऱ्या लहानमोठ्या साऱ्यांना स्वयंसेवक म्हणतात. या स्वयंसेवकांचे वर्षभरात काही कार्यक्रम होतात. त्यावेळी ते विशिष्ट गणवेश घालतात. या कार्यक्रमांमध्ये भाषणे होतात आणि त्यातून संघाचा विचार सांगितला जातो. याहून अधिक फारसे कोणाला ठाऊक नसते. अगदी संघाच्या स्वयंसेवकाला किंवा कार्यकर्त्यालाही! संघाचे काम करायला त्याची फारशी गरजही नसते.

संघाची कार्यपद्धती, त्याची संघटनात्मक रचना, कार्यपद्धती व रचना यांचा विकास, संघाचा इतिहास याविषयी अत्यल्प माहिती असते. संघाचे म्हणून काही साहित्य आहे, पुस्तके आहेत याची अनेकांना कल्पनाही नसते आणि तरीही एखादी व्यक्ती संघाचा कार्यकर्ता असते. एखादा महाविद्यालयीन विद्यार्थी, क्वचित शालेय विद्यार्थी सायं शाखेचा मुख्य शिक्षक वा कार्यवाह असतो. प्रभात शाखेचा एखादा स्वयंसेवक वा कार्यकर्ता निवृत्तीनंतरच संघाच्या शाखेत आलेला असतो. वयाच्या साठीत त्याने पहिल्यांदा संघाचा गणवेश घातलेला असतो. संघ शिक्षा वर्गाचे प्रशिक्षण कार्यकर्त्याने घेतलेलेच असते असे नाही. एक दिवस कधी तरी संघाच्या शाखेत आलेली व्यक्तीही आयुष्यभर संघाचा स्वयंसेवक असते. काही स्वयंसेवक काही दिवस, महिने वा वर्ष संघाचे काम करत असतात. तर काही आयुष्यभर संघाचे काम करतात. नवनवीन शाखा सुरू होत असतात. सुरू असलेल्या काही शाखा बंदही पडतात आणि पुन्हा सुरुही होतात. शाखा सुरू वा बंद करण्याचे आदेश निघत नाहीत. माणसांची उपलब्धता हाच एकमेव मुद्दा. माणूस उपलब्ध असेल तर शाखा चालते नाही तर बंद.

शाखा चालवणाऱ्या  या कार्यकर्त्यांना काहीही मिळत नाही. पैसा, प्रतिष्ठा, मानसन्मान एवढेच काय एखादे प्रमाणपत्रही नाही. प्रमाणपत्र मिळाले तरी त्याचा उपयोग तरी काय होणार हा एक वेगळाच प्रश्न आहे. असे प्रश्न ज्याच्या मनात येतात तो आपोआपच कामापासून दूर होतो. कारण काही देण्याचा प्रश्नच उत्पन्न होत नाही ही संघाची स्पष्ट भूमिका आहे. असे दूर झालेले लोकही संघाचे स्वयंसेवक मात्र राहतातच. त्यांच्या स्वयंसेवकत्वाला काहीही बाधा येत नाही. जसे काम करण्याच्या मोबदल्यात काहीही मिळत नाही. तसेच काम करण्यासाठी वा स्वयंसेवक होण्यासाठीही काहीही द्यावे लागत नाही. त्यासाठी नोंदणी, नोंदणी शुल्क वगैरे नसते. गणवेश, शिबिर, वर्ग, सहल यासाठीचा खर्च मात्र स्वत:च करावा लागतो. संघाचे काम चालवण्यासाठी स्वयंसेवक स्वत:च पैसा गोळा करतात. वर्षातून एकदा त्यासाठी गुरुदक्षिणेचा कार्यक्रम होतो. ज्याला जितके पैसे द्यायचे असतील तितके तो भगव्या ध्वजापुढे समर्पण करतो. कोण किती देतो याची ना चर्चा होत ना त्यासाठी काही बंधन आहे. गुरुदक्षिणा दिलीच पाहिजे हेदेखील बंधन नाही. गुरुदक्षिणा न देता वा त्या कार्यक्रमाला उपस्थित न राहता सुद्धा एखादी व्यक्ती स्वयंसेवक राहू शकते.

गेली ८९ वर्षे हा क्रम सुरू आहे. खरे तर आपण सारे हा एक चमत्कार घडताना पाहतो आहोत. काहीही आकर्षकपणा नाही, काहीही फायदा नाही, उलट तोटाच! आणि तरीही एखादे कार्य सतत चालूच राहते. विस्तारत राहते. समाजाला प्रभावित करीत राहते. याला आश्चर्य नाही तर काय म्हणणार? लोक संघाचे काम का करतात? संघ म्हणतो शाखा चालवा आणि लोक त्या चालवतात. हे कसे काय घडून येते. खरं तर यावर विश्वास बसणेही कठीण. पण जे प्रत्यक्ष दिसते ते नाकारणार तरी कसे? माणसे येतात- जातात, पिढ्या बदलतात, संकटे येतात, संघर्ष होतात, मतभेद होतात, तरीही सातत्य कायम राहते, ऊर्जा कायम राहते, प्रभाव कायम राहतो. हे कसे आणि का होते हा एक गूढ प्रश्नच आहे. याचे नेमके उत्तर कोणाकडेही नाही. अगदी संघाकडेही नाही. खरे तर संघ याचा विचारही करीत नाही. सतत फक्त काम करीत राहायचे एवढेच संघाला माहीत आहे. असा सगळा `जर-तर'चा मामला असूनही, trial and error चे गणित असूनही, देशस्थ विस्कळीतपणाचा खाक्या असूनही संघ चालतो आणि वाढतो आहे. वयाची ८९ वर्षे पूर्ण केल्यावरही गतार्थ न होता सार्थ ठरतो आहे. संदर्भहीन न होता सयुक्तिक ठरतो आहे. या पृथ्वीवर एक आश्चर्य घडताना आपण पाहतो आहोत.

समाजाला हलवून टाकणाऱ्या अनेक व्यक्ती, चळवळी, उपक्रम, विचार या जगाने पाहिले आहेत. सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक अशा विविध क्षेत्रात त्यांनी प्रभाव निर्माण करीत खळबळ उडवून दिली आहे. मात्र थोड्याच अवधीत त्या इतिहास झाल्या आहेत. खळबळ निर्माण करणारी व्यक्ती, कार्यक्रम वा विचार संघाजवळ कधीच नव्हते. तरीही समाजाला हलवून टाकणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना, विचार यांच्यापेक्षा संघ उजवा ठरतो. ८९ वर्षे हा कालावधी खूप मोठा नाही, पण तो खूप लहानही खचितच नाही. सातत्य, विचारांची आणि कार्यपद्धतीची अखंडता, काळाबरोबर पावले टाकण्याची वृत्ती आणि क्षमता या साऱ्याच बाबतीत संघाचे आगळेपण ठळकपणे नजरेत भरल्याशिवाय राहत नाही. मुख्य म्हणजे हे सारे एवढ्या शांतपणे की काही घडते आहे हे कुणाला जाणवू सुद्धा नये. ढोल पिटणे, जाहिरातबाजी, आक्रस्ताळेपणा यापैकी काहीही नाही. बरे संत प्रवृत्तीच्या एखाद्या व्यक्तीने हे केले तर समजून घेता येईल. परंतु संघाने मात्र सर्व प्रकारच्या गुणदोषांनी युक्त अशा लाखो सामान्य माणसांकडून ही मौन साधना करवून घेतली आहे. पिढी दर पिढी हजारो लोकांना टोकाच्या निरपेक्षपणे कार्याला प्रवृत्त करून कार्यरत ठेवण्याचे हे जगातील एकमेव उदाहरण असावे. पद, प्रतिष्ठा, पैसा, मानसन्मान तर नाहीच पण ईश्वरप्राप्ती, आध्यात्मिक उन्नती वगैरे अभौतिक किंवा मानसिक समाधान, आत्मिक समाधान वगैरे भावनिक बाबीही नाहीत. आणि तरीही संघाची यशस्वी वाटचाल यथार्थपणे सुरूच आहे.

संघाचा हा प्रवास शून्यातून विश्वनिर्मितीचा प्रवास आहे. संघ स्थापनेच्या वेळी संघाचे नावही ठरलेले नव्हते. समाजाला अपरिचित अशी ८-१० माणसे केवळ एकत्र झाली होती आणि डॉ. केशव बळीराम हेडगेवार नावाच्या एका राजकीय- सामाजिक कार्यकर्त्यावर असलेल्या प्रेमाखातर ती एकत्र झाली होती. त्यात विचार, ध्येयनिष्ठा वगैरे फारसे नव्हते आणि ८९ वर्षांच्या वाटचालीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असे नाव धारण करणारे काम दररोज देशभरात ५० हजार स्थानी चालते. यात ५० लाख स्वयंसेवक रोज एकत्र येतात आणि या मातृभूमीविषयीच्या आपल्या कर्तव्याचे स्मरण करून तिच्या उज्वल जीवनाविषयी प्रार्थना करतात. या व्यतिरिक्त हजारो स्थानांवर आठवड्यातून एकदा वा महिन्यातून एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणून लाखो लोक एकत्र येउन या समाजाचा, देशाचा विचार करतात. त्यातील अनेक जण प्रत्यक्ष काही ना काही कामही करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असे बिरुद न लावणाऱ्या परंतु संघ हीच प्रेरणा असलेल्या, तसेच वैचारिक आणि भावात्मक दृष्टीने संघाशी जोडल्या गेलेल्या आणि व्यवहारात संघाशी समन्वय राखून काम करणाऱ्या ३६ अखिल भारतीय संस्था आहेत.

या संस्था समाजाच्या विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. संघाप्रमाणेच त्यांचेही स्वरुप अखिल भारतीय असेच आहे. राष्ट्रीय, अखिल भारतीय, आदी विशेषणे लावणाऱ्या अन् एखाद्या वस्ती वा गावापुरत्या मर्यादित असणाऱ्या संस्थांसारखे हे स्वरुप नाही. तर या साऱ्या संस्था खऱ्या अर्थाने अखिल भारतीय आहेत. संघाचे काम तर तालुका स्तरापर्यंत पोहोचले आहेच, पण अन्य ३६ संस्थांपैकी अनेक संस्थांचा पसाराही तालुका स्तरापर्यंत पसरला आहे, तर अन्य संस्थांचे काम जिल्हा स्तरापर्यंत तरी पोहोचलेले आहेच. भौगोलिक दृष्टीने विचार केला तर संपूर्ण देश संघाच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कामाने व्यापला आहे. समाज जीवनाच्या विविध क्षेत्रांचा विचार केला तर बहुतेक साऱ्या क्षेत्रात संघाचे काम पोहोचले आहे. सर्व प्रकारच्या आर्थिक स्थितीतील लोक या कामाशी जोडले गेले आहेत. सर्व प्रकारच्या जाती धर्माचे लोक संघाशी संलग्नित आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये केवळ पुरुष येत असले तरीही राष्ट्र सेविका समितीच्या माध्यमातून महिलाही या कामात सक्रिय आहेत. अन्य संस्थांच्या कामातही महिलांचा सहभाग लक्षणीय असाच आहे. समाजाच्या प्रत्यक्ष सेवेची कामे दीड लाखाहून अधिक आहेत. लाखो स्त्री-पुरुष स्वत:साठी काहीही न मिळवता या सेवाकार्यांच्या माध्यमातून समाज सुशिक्षित, सुदृढ, सुसंस्कृत, आरोग्यसंपन्न व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहेत.

नित्य आणि नैमित्तिक असे प्रत्यक्ष संघाचे काम, अन्य संस्था संघटनांचे काम, सेवाकार्य यासाठी माणसे लागतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात लाखो स्त्री-पुरुष हुडकून काढणे हेच खरे तर एक अशक्य कोटीतील काम आहे. परंतु संघाने अशी माणसे नुसती हुडकून काढली नाहीत तर त्यांना कामाला लावले. कामांचे आणि माणसांचे नियोजन केले. व्यवस्था निर्माण केल्या आणि त्या सातत्याने पुढे सुरू ठेवल्या. लोक जुने होत असतात, निवृत्त होत असतात. हे अतिशय नैसर्गिक आहे. अशा लोकांच्या जागी नवीन माणसांना क्रियाशील करावे लागते. संघाने तेही यशस्वीपणे केले आहे. ही कामे करणारी माणसे शिकली सवरलेली आहेत. उच्चविद्या विभूषित आहेत. स्वत: कर्तृत्ववान आहेत. विचारी आहेत. अशा माणसांना थातुरमातुर वैचारिक वा भावनिक आवाहन बांधून ठेवू शकत नाही, सक्रिय ठेवू शकत नाही. एखादे साधे गणेशोत्सव मंडळ चालवणे आणि टिकवणे किती कठीण असते याचा अनुभव आपण सतत घेत असतो.

संघाने मात्र हे असाध्य, साध्य करून दाखविले आहे. इ. स. २००६ साली संघाचे दुसरे सरसंघचालक श्री. गुरूजी यांची जन्मशताब्दी होती. त्यासाठी देशभरात जे कार्यक्रम झाले त्यात ५ लाख गावातील लोक सहभागी झाले होते. देशात सुमारे ७ लाख गावे आहेत. म्हणजे ७० टक्केहून अधिक गावातील लोक यात सहभागी झाले होते. संघकार्याचा हा विस्तार केवळ देशातच झालेला आहे असे नाही, तर जगातील सुमारे ४० देशांमध्ये संघाचे काम चालते आणि सगळ्यांनी त्याची दखल घ्यावी असे स्वरुप आता त्यास प्राप्त झाले आहे. ८९ वर्षांचा हा प्रवास सरळ होता असेही नाही. खूप वेगवेगळ्या प्रकारचा संघर्ष करीत हा प्रवास झालेला आहे. हा संघर्ष बाह्य होता, आंतरिक होता, परक्यांशी होता, स्वकीयांशी होता, राजकीय होता, सामाजिक होता, आर्थिक होता, भावनिक होता, शारीरिक होता, बौद्धिक होता. अनेकदा तर संघाचे अस्तित्व संपवून टाकण्याचा प्रयत्न झालेला जगाने पाहिला आहे. ज्या समाजासाठी संघ अव्याहत काम करतो आहे त्या समाजाने प्रदीर्घ काळ त्याला मनापासून स्वीकारलेही नव्हते. संपूर्ण विपरीत परिस्थितीचा सतत सामना करीत संघ इथवर पोहोचला आहे.

हे करताना त्यातील अखंडत्वही कायम आहे. एकच संघधारा वाहते आहे. त्याच्या शतधारा झाल्या नाहीत हीदेखील एक लक्षणीय बाब आहे. छोटी मोठी कामेदेखील एकसंध फार कमी काळ टिकतात. कधी नेतृत्वावरून वाद तर कधी तात्विक वाद!! कधी कार्यपद्धतीवरून मतभेद. परिणाम मात्र एकच. संघटनेत फाटाफूट. संघकार्याचे वैशिष्ट्य हे की संघावर नाराज होउन बाहेर पडलेल्यांनी आपली वेगळी कामे सुरू केली पण पर्यायी वा समांतर संघ काढला नाही. ते शक्य झाले असते वा नाही हा मुद्दा वेगळा, पण कोणी पर्याय निर्माण करण्याचा गांभीर्याने विचारही केला नाही. याशिवाय जी कामे मूळ स्वरूपात टिकतात ती एका विशिष्ट मर्यादेतच काम करीत राहतात. सतत वर्धिष्णु राहूनही अखंडत्व कायम राखणे हेही एक वैशिष्ट्यच म्हटले पाहिजे. संघाची स्थापना १९२५ सालाची. महात्मा गांधींचा भारताच्या राजकीय, सामाजिक क्षितिजावर उदय झाला १९२० साली. कम्युनिस्ट पार्टीची स्थापनाही १९२० सालाचीच. म्हणजे सर्वोदय आणि कम्युनिझम यांच्यापेक्षा संघ ५ वर्षांनी लहान. कम्युनिस्ट पार्टीने सर्व प्रकारचे मार्ग आपल्या कार्यवाढीसाठी अवलंबिले. हिंसाचारही नाकारला नाही. अनेक वर्षे सत्ता उपभोगली. मोठा काळ सत्तेची सहानुभूती कम्युनिझमला मिळाली. गांधींच्या कार्याला तर देशात आणि जगातही अतिशय अनुकूलता होती व आहे. त्या पार्श्वभूमीवर या तिन्ही कामांची तुलना आज केली तर संघाचे यश आणखीनच ठळकपणे जाणवते.

केवळ विचार केला तरीही अंगावर शहारा यावा असा हा प्रवास आहे. जगाच्या इतिहासात क्वचितच एखाद्या संघटनेचा प्रवास एवढा रोमांचक आणि अद्भुत राहिला असावा. समुद्रमंथनातून निघालेले हलाहल प्राशन करून भगवान शंकरांनी तांडव केले होते. संघाने मात्र शांतपणे हलाहल पचवून टाकले आहे आणि समाजावर मात्र शांती आणि सौहार्दाचा अमृतवर्षावच केलेला आहे. असे सारे असतानाही सर्वाधिक गैरसमज असणारी संघटनाही संघच आहे. मोठ्या प्रमाणावर हेटाळणी सहन करणारी संघटनाही संघच आहे. आपल्याच कार्यकर्त्यांची नाराजी झेलणारीही संघटना संघच आहे. संघाच्या वाट्याला एवढे शिव्याशाप, एवढे तर्ककुतर्क का आले वा येतात. संघाबद्दल एवढा गोंधळ का आहे? तरीही संघ का वाढला? तरीही संघ का काम करतो आहे? संघाला नेमके करायचे तरी काय आहे? कशासाठी एवढा सारा खटाटोप सुरू आहे? काय साध्य करायचे आहे? काय मिळवायचे आहे? संघाला स्वत:ची प्रतिमा आणि वास्तव याविषयी काय वाटते? आजवरचा प्रवास आणि विस्तार याविषयी संघाला काय वाटते?

या व अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी, संघाबद्दलचा गोंधळ दूर करण्यासाठी आणि संघाविषयी सम्यक आकलन करून सारासार मत बनवण्यासाठी संघाची नीट ओळख करून घेणे गरजेचे आहे. साधारणपणे ६ वेगवेगळ्या दृष्टींनी संघ समजून घ्यावा लागेल.
१) संघाचे संघटनात्मक स्वरुप
२) संघ विचारधारा
३) संघ भावधारा
४) संघ- समाज परिवर्तनाचे माध्यम
५) संघाची ऐतिहासिक भूमिका
६) वैश्विक सभ्यतेच्या प्रवासातील संघाचे योगदान

संघाने अशी मांडणी आजवर केलेली नाही. हे हिन्दू राष्ट्र आहे, त्याची सर्वांगीण उन्नती व्हावी आणि या राष्ट्राने या जगातील आपला भार समर्थपणे वहन करावा एवढेच संघाने म्हटले आहे. या सहा कोनातून केलेले विश्लेषण परिपूर्ण असेल असेही नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शंभरीकडे वाटचाल करीत असताना त्याचा असा आढावा घेणे आवश्यक मात्र आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, ९ नोव्हेंबर २०१४

शनिवार, १ नोव्हेंबर, २०१४

उफराटा गाढवपणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी समारंभाला संतमहंत उपस्थित होते त्यावर आता टीकाटिप्पणी सुरु झाली आहे. अकलेचे तारे तोडले जात आहेत. का? संतमहंत समाजाचे अंग नाहीत का? हजारो वर्ष झालीत देव धर्म (याचा अर्थ आपल्या प्रत्ययाला येणारे विश्वच फक्त वास्तव नसून, आपल्या प्रत्ययाला न येणारे विश्वही आहे असा विश्वास असणारे.) मानणारे आणि न मानणारे असा झगडा सुरु आहे. तरीही आजदेखील देव धर्म मानणारे लोकच जगात (फक्त भारतात नव्हे) बहुसंख्य आहेत. भारताचा आणि महाराष्ट्राचाही तोच मुख्य प्रवाह आहे. तो नाकारण्याचे कारण काय? शासनाने खेळाडू, उद्योजक, व्यावसायिक, शिक्षक, सैनिक, पोलिस, वैज्ञानिक, महिला, बालके, साहित्यिक, कलाकार अन अन्य अशाच सगळ्यांचा गौरव- सन्मान करावा; पण संतमहंतांचा नको. का? या तर्काला मूर्खपणा याशिवाय काय म्हणायचे? वास्तविक समाजाचे सगळे घटक जर कुठे एक होत असतील तर ते देवाच्या दारीच. कोणाला पटो किंवा न पटो. सचिन तेंडुलकरला भारतरत्न दिलेले चालते, पण तो ज्या देवधर्माला मानतो त्याचा सन्मान चालत नाही. संतमहंतांची माणसाच्या/ समाजाच्या जडणघडणीत एक महत्वाची भूमिका असते. केवळ भारतात नव्हे, संपूर्ण जगभर. संत भोंदू नसतात का? ढोंगी नसतात का? म्हणून आमचा त्यांना विरोध आहे वगैरे तर्क बालिश बडबड यापेक्षा अधिक काही नाही. भोंदू आणि ढोंगी कोण नसतात? विज्ञानापासून सत्तेपर्यंत आणि शिक्षणापासून उद्योगापर्यंत सर्वत्र भोंदू आणि ढोंगी असतात. याचा अर्थ भोंदुगिरी आणि ढोंग याचे समर्थन करणे नाही. पण ते ओळखणे, उघड करणे, त्यापासून समाजाला/ व्यक्तीला परावृत्त करणे यासाठी वेगळे उपाय, पद्धती वगैरे आहेत. त्याला कोणाची नादेखील नाही. पण काहीतरी कारणे पुढे करायची आणि संतमहंत यांच्यावर आगपाखड करायची हे योग्य नाही. कोणी देवधर्म मानायचा वा नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण देव नाही असे नि:संदिग्धपणे जोवर सिद्ध होत नाही, तोवर समाजाचा एक महत्वाचा घटक म्हणून तो विषय आणि वर्ग राहणारच. आणि म्हणूनच शासनानेही त्यांचा आदर-सन्मान करायलाच हवा. राज्यघटना वगैरेचा हवाला देऊन विरोध करणाऱ्यांना कशाचेही काहीही कळत नाही असे म्हणण्याशिवाय पर्याय नाही. डॉ. आंबेडकरांनी १९५० साली घटना सादर केली आणि त्यानंतर तब्बल सहा वर्षांनी १९५६ साली बौद्ध धर्म स्वीकारला, हे विसरता कामा नये. मार्ग कोणता हा भाग ज्याच्या त्याच्या रुची प्रकृतीचा आहे. परंतु डॉ. आंबेडकर यांच्यासारख्या प्रकांड बुद्धिवादी पंडितालाही धर्म अतिशय महत्वाचा आणि मोलाचा वाटत होता. पण तो व्यक्तिगत ठेवावा वगैरे फालतूपणाला अर्थ नाही. व्यक्तीसाठी जर तो अतिशय महत्वपूर्ण असेल तर शासन दरबारी त्याचा सन्मान करणे चुकीचे हा उफराटा गाढवपणा फक्त तथाकथित बुद्धीवादीच करू जाणोत.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, १ नोव्हेंबर २०१४

बुधवार, २९ ऑक्टोबर, २०१४

स्वच्छता, फटाके, प्रदूषण वगैरे


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडून आल्यापासूनच स्वच्छता हा विषय लावून धरला आहे. २ ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी स्वत: रस्त्यावर उतरून आणि त्यांच्या कार्यशैलीप्रमाणे आणखी नऊ जणांना त्यासाठी आमंत्रित करून त्यांनी स्वच्छता या विषयाचे एक वातावरण तयार केले आहे. योगायोगाने पाठोपाठच दिवाळी आली. त्यामुळे फटाक्यांचा कचरा हा विषय पुढे आला. अनेक ठिकाणी हा कचरा तसाच असल्याचे पाहायला मिळाले तर अनेक ठिकाणी तो साफ करण्याची दृश्येही पाहायला मिळाली. सोबतच प्रदूषण हा विषयही जोडला गेला. पंतप्रधान मोदी हिंदुत्वाचे पाठीराखे. दिवाळी हा हिंदूंचा सण. या सगळ्या गोष्टी एकत्र करून काही निष्कर्ष काढले गेले. हिंदुत्वाचे पाठीराखे असलेले मोदी स्वच्छता अभियान राबवितात आणि हिंदू लोक आपल्या दिवाळी सणात फटाक्यांचा कचरा करतात, अशी विसंगतीही दाखवली गेली. या सगळ्या गोंधळात दोन्ही विषयांच्या मुळाशी जाताना मात्र फार कुणी दिसले नाही.

राजकारण बाजूला ठेवून पंतप्रधान मोदी यांच्या भाषणांकडे बारकाईने पाहिले तर एक महत्वाची गोष्ट ते सतत मांडत असल्याचे दिसून येते. अगदी त्यांच्या प्रचारसभातही त्यांनी हा मुद्दा मांडला होता. तो मुद्दा म्हणजे- एकटे मोदी वा एकटे सरकार काही करू शकत नाही. हा मुद्दा किती जण ऐकतात, किती जण लक्षात ठेवतात, किती लोकांना त्याचे आकलन होते आणि किती लोक व्यवहारातील त्याचे स्वरूप समजू शकतात हा गहन प्रश्न आहे. आजही आजूबाजूला लोक चर्चा करताना दिसतात की, `मोदी काही करून दाखवतील. मोदी आहेत तोवर सगळे ठीक चालेल. सगळे सुधरून जाईल.' देशाची राज्यव्यवस्था असो की घरची कुटुंबव्यवस्था नेत्याची एक विशिष्ट भूमिका असते हे निर्विवाद सत्य आहे. परंतु कुटुंबापासून देशापर्यंत एकटा नेता काहीही करीत नसतो. युद्ध जिंकल्यावर सेनापतीला पदक मिळते, पण ती कामगिरी काही त्याची एकट्याची नसते. सैन्यातील प्रत्येक सैनिकाचे श्रेय सारखे असते. प्रत्येक जण पूर्ण जबाबदारीने आणि समर्पण भावनेने आपले काम करतो तेव्हा विजय मिळतो. शिवाय नेत्यावर विसंबून राहिले तर नेता बदलला की पुन्हा घडी विस्कटायला वेळ लागत नाही. ही संपूर्ण प्रक्रिया आणि त्यातील भाव नीट समजून घेतला नाही तर हाती फार काही लागणार नाही आणि पंतप्रधान मोदी काय म्हणतात तेही समजून घेता येणार नाही.

इंग्रजांच्या काळापासून आपल्याला सवय लावण्यात आली की, तुम्ही तुमचे प्रतिनिधी निवडून द्या आणि पुढच्या निवडणुकीपर्यंत आराम करा. तुमचे कर्तव्य म्हणजे फक्त प्रतिनिधी निवडून देणे. तुम्हाला बाकी काहीही कर्तव्य नाही. तुम्हाला फक्त अधिकार. त्यामुळे आपल्या सवयी, आपले विचार करणे सगळेच बदलून गेले. म्हणजे आम्ही कसाही, कुठेही आणि कितीही कचरा करू, पण आम्हाला स्वच्छ परिसर मिळाला पाहिजे. तो आमचा हक्क आहे आणि सरकारचे कर्तव्य. कर्तव्य आणि हक्कांची ही विभागणी चुकीची असूनही चर्चेपुरती मान्य केली तरीही, एक मुद्दा शिल्लक राहतोच. तो असा की, स्वच्छतेसाठी केलेली व्यवस्था पाळण्याची जबाबदारी कोणाची? ती जबाबदारी तर दुसऱ्या कोणालाही देताच येणार नाही ना? कचरा योग्य जागी, योग्य रीतीने टाकणे हे काम कोणाचे? आपण तेवढे केले तरी खूप काम होण्यासारखे आहे. अगदी सुशिक्षित, साधनसंपन्न लोकांच्या लग्नातही जेवणाची ताटे वा अन्य कचरा कसाही, कुठेही पडलेला पाहायला मिळतो. शिवाय यात स्त्री आणि पुरुष असाही भेद नसतो. मुळात कमी कचरा करणे, स्वाभाविकपणे होणारा कचरा योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी टाकणे, आम्ही जेवढ्या आणि ज्या कचऱ्याची विल्हेवाट लावू शकतो ती स्वत: लावणे; यात आपल्याला कमीपणा का वाटतो? सार्वजनिक तर जाऊच द्या, घरगुती स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवण्याची काळजीही आपण घेत नाही. आपल्याला त्याची गरजही वाटत नाही. पान, तंबाखू, खर्रा खाऊन थुंकण्याची आपल्याला लाज वाटत नाही अन `सगळ्यांना समजून घ्यावे' या आपल्या आध्यात्मिक वृत्तीने अशा लोकांबद्दलचा सार्वजनिक तिरस्कारसुद्धा उत्पन्न होऊ शकत नाही. तिरस्काराचं सुद्धा मानवी सभ्यता आणि विकासात महत्व आहे हे समजून घेण्याची गरज आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहे मोठ्या प्रमाणात उभारण्याची गरज असून ती सरकारची जबाबदारी आहे हे खरे असले तरी, असलेल्या सुविधा आम्ही कशा वापरतो हेही तपासायला हवे. कोणत्याही गोष्टीला एकच बाजू नसते. आमची तशी कितीही इच्छा असली तरी !! परंतु आम्ही स्वत:ला इतके डोक्यावर चढवून ठेवतो की सर्वंकष विचार आम्ही करूच शकत नाही. मोदी आणि मोदींचे सरकार काय करेल याचे चर्वितचर्वण करतानाच आम्ही काय केले पाहिजे, मी काय केले पाहिजे, मी काय करू शकतो; याच्या चिंतनालाही वेळ दिला पाहिजे.

फटाक्यांची चर्चा गेल्या काही वर्षांपासून पर्यावरण, प्रदूषण या संदर्भात होते. यावर्षी त्या चर्चेला स्वच्छतेचाही एक पैलू जोडला गेला. एका झटक्यात सांगून टाकायचे तर फटाक्यांवर पूर्णपणे बंदी यायला हवी. दिवाळी साजरी करणारे किंवा न करणारेही अनेक जण याच्याशी मुळीच सहमत होणार नाहीत. आनंद, धार्मिक स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, रोजगार अशी बरीच कारणे पुढे केली जातील. ही सगळीच कारणे बहाणेबाजी या एका सदरात मोडणारी आहेत. व्यापारी आणि व्यावसायिक लोक असोत किंवा घरगुती लोक, फटाके उडवताना कुरघोडी हा एक मोठा घटक असतो. आपण अधिक किमतीचे, अधिक मोठे, अधिक आवाजाचे, अधिक प्रकाशाचे फटाके अधिक प्रमाणात अन अधिक वेळ फोडले हे दाखवण्याचा इरादा नसतो का हे त्या लक्ष्मीमातेची शपथ घेऊन सांगावे. फटाके उडवण्यातील आनंद हा आसुरी आनंदच असतो. त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे, स्वत:ला आणि इतरांना मोद देण्याऐवजी त्रास देणारी गोष्ट आनंद साजरा करणारी असूच शकत नाही.

फटाक्यांचं समर्थन करताना धर्माचा आधारही घेतला जातो. एक तर हिंदूंच्या सणाच्या वेळीच पर्यावरण वगैरे आठवते का, असा एक आक्षेप असतो. हा युक्तिवाद मुळातच तकलादू आहे. हिंदू समाजाला एकजूट होण्यासाठी आणि सशक्त होण्यासाठी इतक्या सैल मुद्याची गरज नाही. हिंदू समाज शक्तिमान करण्यासाठी त्याच्या शक्तीस्थानांवर जोर द्यायला हवा. देशकाल परिस्थितीनुसार तर्कपूर्ण अशा गोष्टींना हिंदू धर्माचा विरोध असूच शकत नाही. दुसरा युक्तिवाद असतो- फटाके फोडणे ही धार्मिक प्रथा आहे. या युक्तिवादात तथ्य नाही. अगदी प्रभू रामचंद्राच्या काळात सुद्धा अयोध्येत फटाके फोडले होते, असे सांगणारेही आहेत. भारतात असंख्य सणउत्सव सतत साजरे होत असतात. त्यांना शेकडो-हजारो वर्षांची परंपरा आहे. फटाके फोडणे हा जर धर्माचा भाग असेल तर अन्य कोणत्याही सणउत्सवाशी फटाके का जोडलेले नाहीत? अन्य अनेक उद्योग व्यवसायांचा भारताचा इतिहास शेकडो वर्षे मागे नेता येत असताना फटाका व्यवसायात आघाडीवर असलेल्या शिवकाशीचा इतिहास मात्र फक्त शे-सव्वाशे वर्षांचाच का असावा? मुळातच फटाक्यांचा जागतिक इतिहास हा दोन-अडीचशे वर्षांचा आहे. भारतात याची सुरुवात ब्रिटीश काळात झाली आणि तेव्हापासून आजतागायत फटाके हा निव्वळ व्यावसायिक प्रकार आहे. त्यात धार्मिकता काहीही नाही. धर्माचा त्याचा संबंध नाही. याउपरही समजा फटाके आणि धर्माचा संबंध असेल तरीही, हिंदू समाजाने योग्य-अयोग्य विवेक करून अनेक गोष्टीत बदल केलेले आहेत. तीच हिंदू धर्माची शिकवण आहे, त्याचे वैशिष्ट्य आहे आणि त्याचे शक्तीस्थानही.

फटाक्यांना विरोध का? त्याने रोजगाराची हानी होणार नाही का? दुसरा प्रश्न बालीश बुद्धीचा आहे. एक म्हणजे, फटाक्याने होणारे नुकसान आणि फटाके व्यवसाय बुडाल्याने होणारे नुकसान यातील, फटाक्यांनी होणारे नुकसान अधिक आहे. दुसरे म्हणजे, अशा गोष्टी अपरिहार्य असतात आणि त्यांनी खूप फरक पडत नाही. मोबाईलमुळे हजारो पिसिओधारक बेरोजगार झालेतच ना? स्वयंचलित दुचाकी वाहने वाढल्याने सायकलनिर्मिती आणि दुरुस्ती यातील रोजगार घटलाच ना? संगणक वापरणे सुरु झाल्यावर अनेक लोक बेरोजगार झाले ना? त्यामुळे हा मुद्दा गैरलागू आहे.

फटाक्यांना विरोध असण्याचे कारण आहे- त्यामुळे आरोग्य आणि पर्यावरणाची होणारी हानी. आवाज आणि वायू प्रदूषण किती होते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आपण सारे प्रत्यक्ष ते अनुभवतो. डोळे खराब होण्यापासून, डोके बधीर होईपर्यंत आणि चिडचिडेपण वाढण्यापासून जखमा होईपर्यंत, शिवाय हृदयविकार- श्वसन विकार वगैरे माहिती सगळ्यांना आहे. एक गोष्ट आवर्जून सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की फटाक्यांचे हे प्रदूषण झाडे लावून कमी होऊ शकत नाही. कारण फटाके फोडण्यातून निर्माण होणारा धूर कागद, लाकडे वा काडीकचरा यांच्या धुरासारखा साधा नसतो. कागद, लाकडे, काडीकचरा जाळला तर त्यातून फक्त कार्बन डायऑक्साइड निर्माण होईल आणि हा वायू झाडांचे अन्न आहे. त्यामुळे थोडी झाडे लावली की त्याचे प्रदूषण कमी होईल. तसेही प्रत्येक माणूस रोज चोवीस तास, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कार्बन डायऑक्साइडचे प्रदूषण श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेदरम्यान करीतच असतो. ते प्रदूषण झाडे लावून पळवता येते. मात्र फटाक्यांच्या ज्वलनात (फटाके आवाजाचे असोत की प्रकाशाचे) अनेक रसायने आणि धातू असतात. वेगवेगळ्या रंगांच्या निर्मितीसाठी अनेक विषारी धातू वापरले जातात. झाडे ही रसायने आणि धातू शोषून घेऊ शकत नाहीत.

लाल रंगासाठी स्त्रॉशियम आणि लिथियम, नारिंगी रंगासाठी कॅल्शियम, पिवळ्या रंगासाठी सोडियम, हिरव्या रंगासाठी बेरियम, निळ्या रंगासाठी कॉपर, जांभळ्या रंगासाठी पोटॅशियम आणि रुबिडीयम, सोनेरी रंगासाठी कोळसा आणि लोखंड, पांढऱ्या रंगासाठी टिटॅनियम, अॅल्युमिनियम, बेरिलियम, मॅग्नेशियम आदी धातू वापरले जातात. याशिवाय झिंक, सल्फर, फॉस्फरस यांचाही वापर केला जातो. झाडांच्या प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत कार्बन डायऑक्साइड ग्रहण करून ऑक्सिजन बाहेर सोडला जातो. अन्य धातू वा रसायने हवेत तशीच राहतात. हवेत मिसळलेले हे धातू आणि रसायने हवा, पाणी इत्यादी कायमस्वरूपी प्रदूषित करतात.

या ठिकाणी एक नोंद घेणे आवश्यक आहे. फटाक्यांप्रमाणेच सर्व प्रकारच्या स्वयं वातानुकूलन यंत्रणा (एसी), डिओडरंट्स, स्वयंचलित वाहनांचा धूर अशा काही गोष्टींनी होणारे प्रदूषण केवळ झाडे लावून दूर होणारे नाही. या ज्वलनातून उत्सर्जित होणारे क्लोरो-फ्लुरो कंपाउंडस व अन्य घटक पर्यावरण आणि आरोग्य यांना मोठी हानी पोहोचवतात. शिवाय सगळ्या गोष्टी पोटात घेऊन त्यांचे उपयुक्त अन्य गोष्टीत परिवर्तन करण्याची स्वयंसिद्ध क्षमता असलेल्या मातीशी आम्ही वैर धरलेलं आहे. त्यामुळे पर्यावरणाचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. फटाक्यांना पूर्ण फाटा देण्याची म्हणूनच आवश्यकता आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, २९ ऑक्टोबर २०१४