मंगळवार, १६ जून, २०१५

डाळींचा प्रश्न आणि विवेकानंद

सध्या डाळींचा विषय ऐरणीवर आला आहे. आपल्या राज्यकर्त्यांमधील दूरदृष्टीचा अभाव आणि कर्मदरिद्रीपणा यांचे हे उत्तम उदाहरण आहे. डाळींचा हा प्रश्न आजचा नाही, तर गेल्या चार-पाच दशकात तो विकसित झाला आहे. दुर्दैवाने आजही आमचे राज्यकर्ते त्याकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाहीत आणि त्यानुसार नियोजनाची योग्य ती दिशा स्वीकारताना दिसत नाहीत. डाळींच्या बाबतीत स्वयंपूर्ण असलेल्या आपल्या देशाला आज डाळींच्या आयातीवर अवलंबून करण्यात आले आहे. आणि डाळींची निर्यात करून रोखीच्या रूपानेही देशाला संपन्न करण्याऐवजी ऑस्ट्रेलिया, कॅनडा यासारख्या देशांची अर्थव्यवस्था उंचावण्याला मदत करीत आहोत.

या डाळींच्या संदर्भात शे-सव्वाशे वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंदांनी विचार केला होता आणि तो पाहिला की, आपले कर्मदरिद्रीपण अधिकच नजरेत भरते. आपल्या सगळ्या गुरुबंधूंना उद्देशून स्वामीजींनी स्वामी रामकृष्णानंद यांना १८९४ साली एक पत्र लिहिले होते. त्यात ते लिहितात- `उडीद किंवा इतर कोणत्याही डाळी इकडे नाहीतच. असल्या वस्तू असल्याचेही इकडच्या लोकांना माहीत नाही.' सुमारे वर्षभरानंतर स्वामी त्रिगुणातीतानंद यांना न्यूयॉर्क येथून १७ जानेवारी १८९५ रोजी लिहिलेल्या पत्रात पुन्हा याच विषयाची चर्चा करताना स्वामीजी लिहितात- `मुगाच्या, तुरीच्या डाळीचा व्यापार इंग्लंड व अमेरिकेत किफायतशीरपणे चालू शकेल, असे रामदयालबाबूंना कळवा. डाळींच्या वरणाचा जर योग्य रीतीने प्रचार झाला तर लोक त्या आवडीने वापरू लागतील. लहान लहान डब्यात घालून व त्यावर त्या कशा तयार करावयाच्या हे छापून जर डाळी घरोघर खपविल्या तर त्यांना खूप मागणी राहील. तसेच त्या येथे साठवून ठेवण्याचीही काही व्यवस्था करायला हवी. त्याचप्रमाणे मुगवड्या वगैरेसारख्या वस्तूदेखील येथे मोठ्या प्रमाणावर खपू शकतील. साहसयुक्त उद्योगाची आवश्यकता आहे.'

आज जगातील अनेक देश असे आहेत जे काहीही पिकवित नाहीत. आपल्या अन्नगरजांसाठी दुसऱ्यांवर अवलंबून असलेल्या या देशांना अन्न मिळणे बंद झाले तर काय होईल? माणूस, अन हो- केवळ भारतीयच नव्हे तर पृथ्वीच्या पाठीवरील कोणताही माणूस अन्नाशिवाय राहू शकणार नाही. अगदी शुद्ध मांसाहारी माणूससुद्धा भाजीपाला, धान्य, डाळी, तेल, मसाले इत्यादींशिवाय राहू शकणार नाही. एवढेच नाही तर मांसाहारासाठी लागणाऱ्या प्राण्यांचे पोटसुद्धा वनस्पतींवरच अवलंबून असते. अन्न आणि अन्य वनस्पती यांच्यासाठी जमीन हवी, माती हवी. स्वत:ला `कोणीतरी' आणि `काहीतरी' समजून माणूस या मुलभूत गोष्टीकडे जे दुर्लक्ष करीत आहे ते त्याच्याच मुळावर यायला फार वेळ लागणार नाही.

अवघ्या काही दशकात येऊ घातलेल्या या परिस्थितीचा- संगणक, भ्रमणध्वनी, गाड्या आणि विकासाच्या कल्पनांमध्ये रममाण झालेला आणि `युवा'पणाची टिमकी वाजवणारा आजचा युवा कसा सामना करेल? की आमची मानसिक, बौद्धिक दृष्टीच अधू झालेली आहे? `आपला देश शेतीप्रधान आहे. शेतीतून किती रोजगार मिळणार? त्यासाठी शेतीवरील भार कमी करण्याची गरज आहे,' अशी वाक्ये आमचे नेतेच नव्हे तर तुम्ही आम्हीही अशा थाटात उच्चारतो की, शेती म्हणजे खूप काहीतरी वाईट गोष्ट आहे. शेतीवरील भार कमी करायला हवा याचा आमचा व्यवहारातील अर्थ शेती कमी करायला हवी हाच आहे. शेतीचा विचार अर्थकारणाच्या संदर्भात व्हावा की समग्र जीवनाच्या संदर्भात? आम्हाला जगायचे आहे की पैसा साठवायचा आहे? आम्हाला जगायचे आहे की विकास (?????) साधायचा आहे? शेतीप्रधान अर्थव्यवस्था शेतीविहीन करणे शहाणपणाला धरून होईल का? तरीही जमिनी अकृषक करण्याचा सपाटा लावायचा, त्यावर टोलेजंग व्यावसायिक वा निवासी इमारती बांधायच्या, आम्ही त्यामागे धावायचे, असेच चालू द्यायचे का?

स्वातंत्र्य मिळाले त्यावेळच्या लोकसंख्येत केवळ तिप्पट वाढ झाली आहे. इमारती मात्र त्याहून कितीतरी पटीने वाढल्या; संख्या आणि मजले या दोन्ही अर्थाने. तरीही आम्हाला घरे पुरत नाहीत. याचे गौडबंगाल काय आहे हा प्रश्नही न पडण्याइतके आंधळे झालो आहोत आम्ही? एकीकडे बाईचे आरोग्य चांगले राहावे म्हणून तिची बाळंतपणे मर्यादित करण्याचा प्रयत्न करायचा आणि जमिनीतून वर्षाला तीन तीन पिके घेण्याचा खटाटोप करायचा? भूमाता म्हणून जाणीव वगैरे ठेवा बाजूला, पण जमिनीचाही कस वगैरे असतो हे तरी लक्षात घेणार की नाही? आपला स्वार्थ, हेकेखोरपणा, विक्षिप्तपणा, अफलातील कल्पना सोडण्यासाठी आम्हाला किती किंमत मोजायची आहे? किती किंमत मोजली म्हणजे आमचे समाधान होणार आहे तो निर्माताच जाणे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, १६ जून २०१५

शुक्रवार, १२ जून, २०१५

पुलंची भाषणे- भावानंदाचे सचैल स्नान

(पुलंच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त लिहिलेला लेख)

पुलंची भाषणे- भावानंदाचे सचैल स्नान

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असलेले पु. ल. देशपांडे स्वर्गवासी झाल्याला एक वर्षं झालं. विनोदी लेखक, संगीतज्ञ, नट, वक्ता, नाटककार, चित्रपट अभिनेता, सामाजिक जाणीवा सतेज असणारा कार्यकर्ता अशा विविध नात्यांनी साऱ्यांना त्यांचा परिचय होता. परंतु या साऱ्या भूमिकांमधील विनोदी लेखक हीच त्यांची भूमिका जनमानसात अधिक दृढमूल झाली होती. मात्र, दर्जेदार विनोदनिर्मितीसाठी जीवनाचं सर्वगामी दर्शन घेण्याची प्रज्ञा असावी लागते. स्वत: पु. ल. याविषयी एका ठिकाणी म्हणतात की, `विनोदी लेखकालाही नुसतेच विसंगतीवर बोट ठेवून भागत नाही. त्यामागच्या कारुण्याचे दर्शन घडावे लागते.' त्यांना स्वत:ला जीवनातलं कारुण्याचं हे दर्शन घडलं होतं. त्यांचा निर्भेळ विनोद चिंतनशील आत्ममग्नतेतून प्रसूत झालेला असतो. पुलंची भाषणे त्यांच्या व्यक्तिमत्वातील या चिंतनशीलतेचा, परिपक्व जाणिवांचा, नीरक्षीरविवेकाचा व प्रसंगी निर्भयतेचाही मनोज्ञ साक्षात्कार घडवतात.

पु. ल. देशपांडे यांच्या भाषणांचे तीन संग्रह मुंबईच्या परचुरे प्रकाशनाने प्रकाशित केलेले आहेत. `श्रोतेहो!', `मित्रहो!', `रसिकहो!' अशा शीर्षकांनी प्रसिद्ध झालेल्या या तीन खंडांमध्ये त्यांची ४३ भाषणे संकलित करण्यात आलेली आहेत. या भाषणांच्या अनुक्रमणिकेवरून साधी नजर फिरवली तरीही आपण स्तिमित होऊन जातो.

`मित्रहो!' या पुस्तकात त्यांची साहित्यविषयक १४ भाषणे संकलित करण्यात आली आहेत. त्यात इचलकरंजी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून केलेल्या भाषणापासून तो बडोद्याच्या मराठी वाड्ग्मय परिषदेतील अध्यक्षीय भाषणांपर्यंत व वाईच्या साहित्य संस्कृती मंडळापुढे केलेल्या भाषणापासून तर दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी केलेल्या भाषणांचा समावेश आहे. मॉरिशस व न्यू जर्सिच्या परदेशस्थ मराठी भाषिकांपुढील भाषणेही त्यात आहेत. या सर्वच साहित्य विषयक भाषणातून त्यांनी रसिक व समीक्षक या दोन्ही नात्यांनी मराठी साहित्य क्षेत्राचा विविधांगी आढावा घेतला आहे. साहित्यातील गहन प्रश्नांचा वेध घेण्यापासून त्यातल्या अनेक अंतर्विरोधांची चिकित्सा करण्यापर्यंतचा आवाका व पल्ला या भाषणांमधून दृग्गोचर होतो. साहित्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन आनंदवादी आहे. जुन्याचा अभिमान व नव्या जाणिवांचे मन:पूर्वक स्वागत यांचा नितांतसुंदर मिलाफ त्यांच्या साहित्यविषयक चिंतनातून जाणवतो. या ग्रंथाच्या प्रस्तावनेत शांताबाई शेळके म्हणतात त्याप्रमाणे, `पुलंच्या वाड्ग्मय अभिरुचीची पाळेमुळे भूतकालीन साहित्यात रुजली आहेत, पण स्वागतोत्सुक दृष्टी मात्र भविष्यकाळाचा वेध घेत आहे.' साहित्यातील नवता, अभिव्यक्ती, विविध प्रवाह, त्यांची ताकद व त्यांच्या कमतरता, भाषा; याविषयीचे सखोल चिंतन पुलंनी या भाषणांमधून मांडले आहे.

`साहित्यात जसे असामान्य लेखक असतात तसे असामान्य वाचक हवेत,' असे ज्यावेळी पुलं आपल्या भाषणात म्हणतात त्यावेळी त्यांना साहित्याच्या व्यवहाराचीही डोळस जाण असल्याचे दिसून येते. पुलं जुन्या जमान्यात वावरतात असा आरोप त्यांच्यावर अनेकदा होत असे. त्याबद्दल ते म्हणतात, `आयुष्यात जिथे जिथे काव्य आढळलं ती स्थानं आणि ते प्रसंग विसरता येत नाहीत. मी मूर्तीपूजा करीत नाही, पण लहानपणी देवळात पंचारतीने उजळलेल्या गाभाऱ्याची पाहिलेली शोभा मी विसरू शकत नाही. मला विजेचा दिवा आवश्यक वाटतो, उपयुक्त वाटतो, पण समईची ज्योत जिवंत वाटते.' साहित्यातील सुगमता व दुर्बोधता यावरील चिंतन श्रोत्यांपुढे मांडतानाही पुलं एक सुवर्णमध्य साधतात. `सर्वांनीच अगदी शालोपयोगी लिहिले पाहिजे, असा आग्रह का असावा?' असा सवाल करतानाच, `एखाद्याला प्रसादयुक्त लिहिता येते हा मात्र त्याचा अवगुण ठरू नये !' असा इशाराही ते देतात. मानवी जीवनातल्या सुख व दु:ख या दोन्हींचे साहित्यात काय स्थान असते हा मुद्दा स्पष्ट करताना ते म्हणतात, `ज्येष्ठ साहित्यिकांनी सुखाची व दु:खाची भव्य चित्रे काढली आहेत. डोतोव्हस्की सारख्यांनी अत्यंत दु:खमय जीवनातून ललितकृतींच्या सुवर्णमूर्ती निर्माण केल्या ! दु:खाचे चित्र रडके असते म्हणून कुणी सांगितले?'

साहित्याचा कस व साहित्याची प्रत यांचीही चर्चा पुलंनी आपल्या भाषणातून केली आहे. साहित्यातील अनेक निकृष्ट बाबींचेही विश्लेषण त्यांनी केले असून जागतिक रंगमंचावरील दोन महाभयंकर युद्धांचे परिणाम साहित्यावर कसे झाले आहेत याची त्यांनी फोड करून दाखवली आहे. साहित्य व साहित्य निर्मितीला अत्यंत उदात्त पातळीवर नेउन ठेवताना पुलं म्हणतात, `आजच्या भयग्रस्त जगाला, सामाजिक आणि राजकीय आपत्तींनी त्रस्त झालेल्या समाजाला धीर देण्याचे कामही द्रष्ट्या साहित्यिकाचेच आहे.'

नाट्य व संगीत विषयक चिंतन

`रसिकहो' या संकलनात पुलंची नाट्य व संगीत विषयक नऊ भाषणे संग्रहित केलेली आहेत. विषयांची विविधता हे याही भाषणांचे वैशिष्ट्य आहे. नागर रंगभूमी, तमाशाचा फड, अभिनयसाधना, नाट्य सादरीकरण प्रक्रिया, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिक्षणाचे तंत्रमंत्र आदी मार्गांनी त्यांचा चिंतनप्रवास उलगडत जातो. ही भाषणे निव्वळ तात्विक नाहीत व ती आपल्याला नाटकाकडे पाहण्याचा एक निकोप दृष्टीकोन देतात. नांदेडच्या अ.भा. नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना पुलंनी आपली नाट्यविषयक भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणतात, `माझी भूमिका ज्ञात्याची नसून भक्ताची आहे. साहित्य, संगीत, नाट्य हे माझ्या भक्तीचे विषय आहेत. कलेची गुढे चिकित्सक बुद्धीने उलगडण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही. नाटके लिहिणे, नाटके करणे, नाटके पाहणे यात मी रमतो !' परंतु यात त्यांच्या विनयशीलतेचा भाग मोठा आहे. नाट्यकृतींचे वाड्ग्मयीन सौंदर्य, सादरीकरणाची प्रक्रिया, तसेच जातिवंत रसिकाची मनोभूमिका यांचे समरस होऊन विश्लेषण करतानाच, रंगभूमीवरील उणीवा व रसास्वादनातील विघ्ने यांचेही चित्र ते परिणामकारकपणे उभे करतात. नाट्यकला, नाट्यव्यवसाय, त्याची सांस्कृतिक व आर्थिक बाजू इत्यादी अनेक बारीकसारीक बाबींचाही उहापोह ते आपल्या भाषणांमधून करतात.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या शिक्षणावरील त्यांची दोन भाषणे या संग्रहात आहेत. शास्त्रीय संगीताचं त्यांचं ज्ञान वादातीत आहे. या क्षेत्रातील आव्हानांचीही त्यांना जाण आहे. पण शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाबद्दल त्यांनी व्यक्त केलेले विचार शिक्षण तज्ञान्नाही अंतर्मुख करणारे आहेत. नाट्याचार्य खाडिलकरांच्या नाट्यलेखनाचा परामर्श घेणारी तीन विस्तृत भाषणे `नाट्यतीर्थावरचा तपस्वी सेनापती' या शीर्षकाखाली समाविष्ट करण्यात आली आहेत. हा केवळ खाडिलकरांचा गुणगौरव नसून त्यांच्या लेखनातील सलग सूत्र शोधण्याचा प्रयत्न आहे. `लोकमान्य टिळक हे त्यांचे दैवत असून देशभक्ती हीच त्यांच्या नाट्यलेखनामागील प्रेरणा होती,' असा निष्कर्ष पुलं काढतात. मात्र, गद्य नाटकांमधून प्रखर व आवेशपूर्ण देशभक्तीचे धडे देणारे खाडिलकर संगीत नाटकांकडे वळल्यावर त्यांच्या नाटकातले ओज, तेज व आवेश हळूहळू मावळत गेल्याचेही ते तटस्थपणे मांडतात.

`रसिकहो' या संग्रहातील `स्निग्धच्छाया - रवींद्रनाथांची' हे अंतिम भाषण एकदम वेगळ्या धाटणीचे आहे. रवींद्रनाथ, शांतीनिकेतन, विश्वभारती याबाबत अत्यंत मृदू, तरल व काव्यमय शब्दात ते आप्तभाव व्यक्त करतात. शांताबाई शेळके म्हणतात त्याप्रमाणे, `साऱ्या निर्मितीकडेच एक अविभाज्य संपूर्णता म्हणून बघणाऱ्या आणि कवीच्या रसलीन वृत्तीतही एक सुंदर अलिप्तता सतत राखणाऱ्या टागोरांचे एक अगदी वेगळे आणि मनाला भारावून टाकणारे दर्शन पुलंच्या या भाषणातून होते.'

कोणत्याही कलेला ओंगळपणाचं वावडं असतं असं नमूद करतानाच `नाटकसुद्धा नाटकी वाटता कामा नये. ही तर या कलेची खरी गंमत आहे' याचं भान ते आणून देतात. नाजूक, सूक्ष्म, तरल संवेदना समजायला समाजाची संवेदनशीलता वाढावी लागते ही जाणीव ते साऱ्यांना करून देतात. `एखाद्या व्यक्तीच्या वागण्यातील विसंगती दाखवून तात्पुरता हशा पिकवता येईल; पण प्रवृत्तीतली विसंगती दाखवून हशा निर्माण करणारं नाटक प्रेक्षकांना हसवतं आणि अंतर्मुख होऊन विचार करायलाही लावतं' असं पुलं म्हणतात, त्यावेळी या विनोदी लेखकाची उंची आपल्याला नतमस्तक करते.

विविधरंगी `श्रोतेहो'

`श्रोतेहो' हे पुलंच्या भाषणाचे तिसरे संकलन. यात विविध क्षेत्रातील मान्यवर, संस्था, उपक्रम, समारंभ या निमित्तांनी केलेली २० भाषणे संकलित करण्यात आली आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर, बॅ. नाथ पै, न. चिं. केळकर, कुसुमाग्रज, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, गजाननराव वाटवे आदी महनीयांवरील पुलंची भाषणे या संग्रहात वाचायला मिळतात. नाट्य, साहित्य, संगीत, चित्रपट क्षेत्रातील हा बहुरूपी `खेळीया' ग्राहकपेठ पुणेने आयोजित केलेल्या समारंभात `सहकारी चळवळ' या विषयावर भाषण करतो हेदेखील या संग्रहातून वाचकांच्या लक्षात येते व आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. साने गुरुजींच्या `स्वप्न आणि सत्य' या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगीचे पुलंचे भाषणही असेच हृद्य आहे. साने गुरुजी `मातृधर्मी' होते असे सुंदर विशेषण पुलं त्यांना लावतात. नरहर कुरुंदकरांच्या `गोदातटीचे कैलासलेणे' या पुस्तकाचे प्रकाशन करताना केलेल्या भाषणात आजच्या वास्तवाचे परखड विश्लेषण करताना पुलं म्हणतात, `या जगात कोट्यधीशांचे ध्येय माणसांचे गिऱ्हाईक तरी बनवा किंवा मतदार तरी बनवा हेच असते.' याच उथळ प्रवृत्तीचा समाचार घेताना लोकमान्य सेवा संघाच्या षष्ट्यब्दीपूर्ती निमित्त केलेल्या भाषणात ते म्हणतात, `काळाबरोबर चालायचं म्हणजे काळातल्या कोठल्या प्रवृत्तीबरोबर चालायचं याचा विचार क्षणोक्षणी करण्याची पाळी आली आहे.'

वक्ता व श्रोता यांच्यातील अंतर कमी करून जणू काही श्रोत्यांशी साधलेला संवादच आहे असे पुलंची ही भाषणे वाचताना वाटत राहते. ते श्रोत्यांना सहजपणे आपलेसे करून घेतात. अत्यंत रसाळपणे, गोष्टीवेल्हाळपणे ते श्रोत्यांशी बोलतात. विविध वाड्ग्मयीन संदर्भ, अवतरणे, प्रसंग पेरत पेरत पुलं भाषणाची रंगत वाढवतात. चिंतनशीलता, बहुश्रुतता, गाढ व्यासंग यामुळे त्यांची भाषणे श्रवणीय व वाचनीय ठरतात. `विनोदी वक्ता' अशी त्यांची रूढ प्रतिमा असली तरीही विनोदाचा अंशही नसलेले त्यांचे भाषण श्रोत्यांना बसल्या जागी खिळवून ठेवते. गंभीर, भावनोत्कट, विचारांना प्रवृत्त करणारे भाषणही पुलं सारख्याच ताकदीने करू शकतात. विनोद हे श्रोत्यांना आपल्या काबूत आणण्याचे वक्त्याचे प्रभावी अस्त्र असते; परंतु वर्ण्य विषयाच्या गांभिर्यात किंवा उत्कटतेत ते विक्षेप आणून श्रोत्यांना विचलित करू लागले तर त्या अस्त्राचा अवलंब करू नये याची त्यांना सुयोग्य जाण आहे व विनोदाच्या अस्त्राचा त्यांनी याच पद्धतीने संयमित उपयोग केलेला आहे. त्यांच्या प्रत्येक भाषणातून त्यांची चिंतनशीलता, बहुश्रुतता व गाढ व्यासंग डोकावतो. विविध विषयांवरील भरपूर ज्ञानभांडार ते श्रोत्यांपुढे खुले करतात. पण त्यात ज्ञातेपणाची आढ्यता नसते. प्रत्येक विषयाचा भरगच्च तपशील ते श्रोत्यांना पुरवतात.

संदर्भसंपन्नता हे पुलंच्या भाषणाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. कोणत्या काव्यपंक्ती, वचने, सुभाषिते, कथा, म्हणी, अनुभव श्रोत्यांच्या कानी केव्हा पडतील सांगता येत नाही. उपनिषदे, कालिदास, भवभूती, पतंजली, भरत मुनींपासून केशवसुत, कवी अनिल, कुसुमाग्रज यांच्यापर्यंत; स्टालिनवस्की, ओस्बोर्न, बेकेट, सार्त्र, कर्केगार्द, टॉलस्टॉय, चार्ली चॅप्लिन पर्यंत; तुकाराम, रामदास वा तुलसीदासांपर्यंत; भातखंडे, पलुस्करांपासून नत्थनखां पर्यंत; रागरागीण्यांपासून भजने, ठुमरी, कजरी, होली, कव्वालीपर्यंत अगणित प्रकारची संदर्भसंपृक्तता श्रोत्याला, वाचकाला प्रमुदित करते. कोट्या, विनोद, सुंदर काव्यपंक्ती यांची सतत उधळण सुरु असते. उपरोध, उपहास, अत्युक्ती, उनोक्ती, हजरजबाबीपणा, चतुरालाप यांचा सतत मारा सुरु असतो. देव, धर्म, भक्ती, आध्यात्म यापासून चार हात दूरच राहणाऱ्या पुलंना त्याचे सोवळे मात्र नव्हते. एवढेच नव्हे तर त्यापासूनचे दूरत्व जाणीवपूर्वक जोपासण्याचा बेगडीपणाही नव्हता. त्यातील सौंदर्याची आणि भावसंपन्नतेची तर त्यांना ओढ असावी असे म्हणता येईल. समाजवादी असूनही हिंदुत्वनिष्ठ सावरकरांचे गुणगान करण्यात त्यांना कमीपणा वाटला नाही. मुळातच वृत्तीतील कद्रूपणा सोडून देऊन मध गोळा करणाऱ्या मधमाशीप्रमाणे गुणग्राहकता, जीवनातलं सत्य- शिव- सुंदर टिपणारी विचक्षणता हाच पुलंचा स्थायी भाव, त्यांच्या सर्व भाषणांमधून डोकावतो. तीन संग्रहातील ही भाषणे हे माहितीचे जसे अफाट भांडार आहे, तसाच तो चिंतनशीलतेचा सुंदर प्रत्यय आहे. ही भाषणे श्रोत्याला, वाचकाला भावश्रीमंत करतात. पुलंच्या या भाषणांमध्ये टाळ्या घेणारी अनेक वाक्ये तर आहेतच, सुभाषिते वाटावीत अशीही वाक्ये जागोजागी आढळतात. एके ठिकाणी पुलं म्हणतात, `ज्यामुळे आपल्या मनाला स्नान घडतं ते तीर्थ असं मी मानतो.' पुलंची ही भाषणं आपल्या मनाला सचैल स्नान घालतात व म्हणूनच त्यांना तीर्थाचं पावित्र्य आलेलं आहे.

१२ जून २००१ रोजी पुलंच्या स्वर्गवासाला एक वर्षं झालं. आपल्या रावसाहेब या व्यक्तिचित्राचा समारोप करताना, रावसाहेबांच्या मृत्यूवर भाष्य करताना पुलं म्हणतात- `आमची लहानशी जीवनं समृद्ध करण्यासाठी परमेश्वरानं दिलेल्या या देणग्या; न मागताच दिल्या होत्या, न सांगताच परत नेल्या.' खुद्द पुलंबद्दल यापेक्षा वेगळं काय म्हणता येईल?

- श्रीपाद कोठे
नागपूर
(शुक्रवार, १५ जून २००१ रोजी लोकसत्तेत प्रकाशित)

शुक्रवार, ५ जून, २०१५

शेवटची विनवणी...

दि. ४ जून १९७३. रात्रीचे सुमारे ९.३० वाजले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील महाल मुख्यालयात- डॉ. हेडगेवार भवनात- दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या डोक्याला तेल लावण्यासाठी नागपुरातील ज्येष्ठ स्वयंसेवक बाबुराव चौथाईवाले यांनी बाटली हातावर आडवी केली. त्याच वेळी बाटलीतील तेल संपले. बाबुराव चौथाईवाले तेलाची दुसरी बाटली आणण्यासाठी वळले. त्यावर गुरुजी त्यांना लगेच म्हणाले- `तेल संपले? ठीक. आता उद्या कोण तेल लावतंय?' कालपुरुषच जणू त्यांच्या मुखाने बोलत होता.

त्यावेळी श्री गुरुजी साधारण तीन वर्षांपासून कर्करोगाने आजारी होते. तरीही अगदी तीन महिने आधीपर्यंत म्हणजे १९७३ च्या मार्च महिन्यापर्यंत त्यांचे देशभर प्रवास, भाषणे, बैठकी, पत्रलेखन, कार्यक्रम सुरूच होते. त्यानंतर मात्र त्यांना चालणे फिरणे अवघड होऊन बसले होते. त्यामुळे महालच्या डॉ. हेडगेवार भवनातील मागच्या बाजूची वरच्या मजल्यावरील खोली हेच त्यांचे विश्व झाले होते. त्याच ठिकाणी शेकडो लोक त्यांना भेटून जात होते. त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यापासून जनसंघाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्यापर्यंत; तसेच राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका आणि प्रमुख संचालिका मावशी केळकर यांच्यापासून कामगार नेते जॉर्ज फर्नांडीस यांच्यापर्यंत विविध क्षेत्रातील असंख्य लोक होते. संघ स्वयंसेवकांची तर मोजदादच नाही.

दि. ४ जून १९७३ ला डोक्याला तेल लावून झाल्यावर गुरुजी अंथरुणावर झोपले नाहीत. रात्रभर खुर्चीतच बसून होते. पहिल्यांदाच असे झाले होते. त्रास खूप वाढला होता. श्वास घेणे खूपच जड जात होते. त्यामुळे प्राणवायूचे सिलेंडर आणण्याचा निर्णय घेण्यात आला. दुसरे दिवशी दि. ५ जून १९७३ रोजी सकाळी लवकरच त्यांचे स्नान उरकण्यात आले. स्नानानंतर नित्याप्रमाणे संध्या केली. गुरुजींचे स्वीय सचिव डॉ. आबाजी थत्ते त्यांना प्राणवायू देत होते, तेव्हा गुरुजी त्यांना म्हणाले- `अरे आबा, आज घंटी वाजणार असे दिसते. त्याची काळजी नाही. परंतु संघ शिक्षा वर्ग चालले आहेत. सर्व प्रवासात आहेत. त्यात व्यत्यय येऊ नये अशी इच्छा आहे.' जीवनाच्या शेवटच्या घटिकांमध्येही चिंता एकच होती, संघाच्या कामात व्यत्यय येऊ नये. त्याच दिवशी सकाळी ८.१५ वाजता अटलबिहारी वाजपेयी भेटायला आले. सकाळी स्नानापूर्वी गुरुजींनी हातापायाची नखे काढली. स्नानसंध्या झाल्यावर खुर्चीवर बसले अन कमंडलू उजवीकडे ठेवला. नेहमी कमंडलू डावीकडे ठेवीत असत. पण त्यावेळी उजवीकडे ठेवला. जणू प्रवासाला निघताना सोयीचे व्हावे म्हणून. दुपारी अगदी घोटभर चहा घेतला. उपस्थित डॉक्टरांनी नर्सिंग होममध्ये चलण्याचा आग्रह केला. त्यावर, `उद्या बघू' असे म्हणाले.

दुपार नंतर प्रकृती झपाट्याने घसरू लागली. त्यावेळी सरकार्यवाह बाळासाहेब देवरस यांना नागपूरला बोलावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी त्यांना फोन लावण्यात आला. त्यावेळी मोबाईल तर दूरच, साधे दूरध्वनीही सर्वत्र नव्हते. शिवाय, कोड नंबर फिरवून परगावी फोन लावता येत नसे. ट्रंक कॉल बुक करावा लागे. संघ कार्यालयात असलेल्या एकमेव दूरध्वनीवरून निरोपांची सगळी धावपळ कृष्णराव मोहरील करीत होते. संध्याकाळी डॉक्टरांनी इंजेक्शन दिले. दम लागण्याचे प्रमाण वाढले होते. संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटे झाली. तेव्हा संघाच्या नित्य प्रार्थनेसाठी जाण्याची तयारी त्यांनी सुरु केली. तेव्हा, `आज इथूनच प्रार्थना करायची आहे' असे डॉ. आबाजी थत्ते म्हणाले. त्यानुसार तिथे उपस्थित सगळ्यांनी तिथेच ध्वज लावून प्रार्थना केली. नेहमीप्रमाणे उभे राहणे शक्यच नव्हते त्यामुळे बसूनच पण स्पष्ट स्वरात गुरुजींनी प्रार्थना म्हटली.

रोजच्याप्रमाणे संध्याकाळी ७.३० वाजता चहा आला. गुरुजींनी चहा घेतला नाही. डॉ. आबाजी थत्ते, बाबुराव चौथाईवाले, विष्णुपंत मुठाळ खोलीतच रेंगाळत होते. त्यांना गुरुजी थोडे रागावले. म्हणाले, चहा घेऊन या. एकेक करून तिघेही चहा घेऊन आले. आठच्या सुमारास दूरध्वनी आला म्हणून डॉ. थत्ते खाली गेले. गुरुजींना लघुशंका लागली. ते उठू लागले. बाबुराव म्हणाले, भांडे आणतो. उठू नका. पण गुरुजी म्हणाले, स्नानगृहातच घेऊन चल. लघुशंका झाल्यावर हातपाय धुतले. ११ चुळा भरल्या. जणू काही महाप्रवासासाठी संपूर्ण शुद्धता. स्नानगृहातून बाहेर पडण्यासाठी वळले आणि बाबुरावांच्या कमरेला धरून त्यांनी त्यांच्या खांद्यावर मान टाकली. विष्णुपंत मुठाळ स्नानगृहाच्या दाराजवळच उभे होते. दोघांनी मिळून त्यांना खोलीत आणून खुर्चीवर बसवले. डोळे बंद, चलनवलन बंद. श्वास मात्र संथ लयीत सुरु होता. बाबुराव पाय चोळू लागले. आबाजी धावत वर आले. त्यांनी प्राणवायू दिला. डॉक्टरांना दूरध्वनी केले. प्रथम डॉ. परांजपे पोहोचले. त्यांनी तपासले आणि म्हणाले, `सर्व संपत आले आहे. let him die peacefully.' पाठोपाठ डॉ. पेंडसे, डॉ. वेचलेकर, डॉ. शास्त्री, डॉ. पांडे, डॉ. इंदापवार आले. संघाचे अधिकारी बाबासाहेब घटाटे, बापूराव वऱ्हाडपांडे, विनायकराव फाटक हेदेखील पोहोचले. सगळे भोवती उभे होते. श्वास हळूहळू कमी कमी होत होता. रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी एक जोरदार श्वास बाहेर पडला आणि गुरुजींची कुडी निष्प्राण झाली.

श्री गुरुजींचे पार्थिव संघ कार्यालयाच्या खालील मोठ्या दालनात आणले गेले. गुरुजी गेल्याची वार्ता नागपुरात आणि देशभर वाऱ्यासारखी पसरली. काही मिनिटातच लोकांचे लोंढे महालच्या डॉ. हेडगेवार भवनाकडे लोटले. त्याचवेळी रेशीमबागेत सुरु असलेल्या संघ शिक्षा वर्गात हे वृत्त कळताच स्वयंसेवकांनी महाल कार्यालयाकडे धाव घेतली. आकाशवाणीने गुरुजींच्या महायात्रेचा कार्यक्रम जाहीर केला. दुसऱ्या दिवशी म्हणजे ६ जून १९७३ ला सकाळपासून देशभरातील लोक येउन पोहोचू लागले. श्री. एकनाथजी रानडे, श्री. बाळासाहेब देवरस, श्री. लालकृष्ण अडवाणी, श्री. अटलबिहारी वाजपेयी, आचार्य दादा धर्माधिकारी, श्री. चंद्रशेखर धर्माधिकारी, न्या. पाध्ये, न्या. चांदुरकर, राजे फत्तेसिंगराव भोसले, श्री. राजाराम महाराज भोसले, वसंतराव साठे, जांबुवंतराव धोटे, त्र्यं. गो. देशमुख, लोकमतचे संपादक पां. वा. गाडगीळ अशी अनेक मंडळी येउन गेली. गुरुजींच्या पार्थिवाजवळ अखंड गीतापाठ सुरु होता.

दुपारी चारच्या सुमारास ध्वनिवर्धकावरून शांततेचे आवाहन करण्यात आले. सगळीकडे शांतता पसरली. महाराष्ट्र प्रांताचे प्रांत संघचालक बाबाराव भिडे यांच्या आवाजाने शांततेचा भंग केला. गुरुजींनी २ एप्रिल १९७३ रोजी लिहिलेल्या तीन ऐतिहासिक पत्रांपैकी पहिले पत्र ते वाचू लागले. संघकार्याची धुरा आपल्यानंतर सरसंघचालक म्हणून श्री. बाळासाहेब देवरस सांभाळतील असे त्यांनी पहिल्या पत्रात नमूद केले होते. त्यानंतरची दोन पत्रे नूतन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी रुद्ध कंठाने वाचली. तिसऱ्या पत्राचा समारोप करताना गुरुजींनी लिहिलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग तर बाळासाहेब वाचूच शकले नाहीत. त्यानंतर नूतन सरसंघचालकांनी महायात्रेला निघालेल्या द्वितीय सरसंघचालकांना पुष्पहार अर्पण केला. भगव्या वस्त्राने झाकलेला या अद्भुत संन्याशाचा पार्थिव देह फुलांनी सजवलेल्या ट्रकवर ठेवण्यात आला आणि गुरुजींची अंत्ययात्रा सुरु झाली.

महालच्या डॉ. हेडगेवार भवनातून सुरु झालेली अंत्ययात्रा पाहण्यासाठी, गुरुजींचे अंतिम दर्शन व्हावे यासाठी अफाट जनसंमर्द मार्गावर सगळीकडे जमला होता. संध्याकाळी पावणेसहाला सुरु झालेली ही अंत्ययात्रा दोन तासांनी पावणेआठ वाजता रेशीमबाग मैदानावर पोहोचली. जवळ जवळ तीन लाख लोक या महायात्रेत सहभागी झाले होते. गुरुजींचे पार्थिव रेशीमबाग मैदानात पोहोचल्यावर गीतेच्या पंधराव्या अध्यायाचे पठण झाले. त्याचवेळी श्री. माधवराव मुळे, राजमाता विजयाराजे शिंदे, नानाजी देशमुख आदी मंडळी पोहोचली. त्यांनी अंत्यदर्शन घेतल्यावर गुरुजींचे पार्थिव चंदनाच्या चितेवर ठेवण्यात आले. १९४० साली ज्या ठिकाणी संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांना अग्नी देण्यात आला होता, त्याच स्थानाच्या बरोब्बर समोर पूर्वेला गुरुजींच्या चितेला अग्नी देण्यात आला. सरसंघचालकांना प्रणाम देण्यात आला. प्रार्थना झाली. आदल्या दिवशी, ५ जून १९७३ रोजी प्रार्थना म्हणून आणि शेवटी `भारत माता की जय' म्हणून गुरुजींनी पार्थिव देहाची शीव ओलांडली होती. ६ जून १९७३ रोजी तशीच प्रार्थना म्हणून आणि `भारत माता की जय' म्हणून त्यांच्या आत्म्याने पार्थिव विश्वाची सीमा ओलांडली.

स्वत:चे श्राद्धही स्वत:च्या हातांनी उरकून घेतलेल्या या वीतरागी संन्याशाने जाताना हात जोडून सगळ्यांची क्षमा मागितली होती. आपला स्वभाव, आपल्या त्रुटी, आपले दोष यामुळे कोणी दुखावला असेल तर क्षमा करावी अशी विनंती करून अखेरीस संत तुकाराम महाराजांचा अभंग उद्धृत केला होता-

शेवटची विनवणी, संतजनी परिसावी
विसर तो न पडावा, माझा देवा तुम्हासी
आता फार बोलो कायी, अवघे पायी विदित
तुका म्हणे पडतो पाया, करा छाया कृपेची

त्यांची स्मृती म्हणून ज्या ठिकाणी त्यांना अग्नी देण्यात आला त्याच ठिकाणी यज्ञकुंडाची एक प्रतिकृती उभारण्यात आली आहे. राष्ट्रयज्ञात समिधेप्रमाणे आपले जीवन समर्पित करणाऱ्या गुरुजींच्या या समाधीवर तुकाराम महाराजांचा हाच अभंग गुरुजींच्या अक्षरातच लिहिण्यात आलेला आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, ५ जून २०१५

शनिवार, १६ मे, २०१५

भाषणानंतर जबाबदारी कोणाची?

चीनमधील भारतीयांपुढे पंतप्रधान मोदी यांचे अप्रतिम भाषण झाले. मोदी ज्या देशात जातात तेथे त्यांचे भारतीय नागरिकांसमोर भाषण होते. आता ती एक परिपाठी झाली आहे. मोदींचे आणि भाजपचे समर्थक, हितचिंतक त्याचे गुणगान करतात, टाळ्या वाजवतात, कौतुक करतात आणि त्यांचे विरोधक टीका करतात, नावे ठेवतात, बोटे मोडतात. प्रसार माध्यमांना काही भूमिकाच नसते. ते काहीही करतात. पंतप्रधानांच्या भाषणात साधारण मुद्दे तेच असतात. पण भारतातील नवीन सरकार, त्याची वैशिष्ट्ये, विकास, विकासासाठीचे प्रयत्न अशा मुद्यांचाच उहापोह होतो. काही सूक्ष्म परंतु खऱ्या महत्वाच्या मुद्यांकडे मात्र कोणीही लक्ष देत नाही. त्यावर चर्चाही होत नाही. प्रत्यक्ष भाषण ऐकणारे लोकही त्या मुद्यांवर फारसा प्रतिसाद देत नाहीत, विचार करतात की नाही कोणास ठाऊक. आजच्याही भाषणात असे मुद्दे होते.

पहिला मुद्दा होता, `वसुधैव कुटुंबकम'. जगात पसरलेल्या दहशतवादाचा मुकाबला करून त्याला पराभूत करायचे असेल तर त्यासाठी भारताने जगाला दिलेला `वसुधैव कुटुंबकम'चा संदेश व्यवहारात आणण्याला पर्याय नाही, असा पंतप्रधानांचा मुद्दा होता. हा मुद्दा नवीन नाही आणि त्यातील शब्द तर चोथा वाटावेत इतके गुळगुळीत झाले आहेत. पण त्यातील भाव किती जणांच्या मन बुद्धीपर्यंत पोहोचतो? `वसुधैव कुटुंबकम' हे केवळ शब्द नाहीत. त्याच्याप्रती बांधिलकी व्यक्त करून काहीही होणार नाही. खरे तर भारतातील कोणत्याही विचाराचे, संदेशाचे, तत्वज्ञानाचे हे वैशिष्ट्य आहे की, ते आचरणात आणण्यासाठी असते. त्याची बौद्धिक चर्चा करून किंवा विश्लेषणे करून उपयोग नसतो. त्या अंगाने विचार केला तर कुटुंबापासून तर जागतिक सत्ताकारणापर्यंत सहअस्तित्वासाठी भरपूर तयारी हवी. त्यासाठी माणसांच्या मनाला, विचाराला वळण लावण्याची गरज आहे. अन हे काम दीर्घ काळ चालणारे आहे. अर्थात मोदींनी आपल्या भाषणात त्याचा सूत्रपात करणे ही सुरुवात आहे आणि ती स्वागतयोग्य अशीच आहे. परंतु, तो विचार आणि त्यातील भाव, त्यातील आशय जगभर पसरावा, जगण्यात उतरावा यासाठी opinian makers ने आणि मोदींच्या पाठीशी उभे असलेल्या पक्षाने आणि कार्यकर्त्यांनी जे आणि जेवढ्या प्रमाणात करणे अपेक्षित आहे ते केले जाते का? या मुद्याचाही सखोल परामर्श घ्यायला हवा.

दुसरा मुद्दा होता, `निसर्गाचे दोहन व्हावे, शोषण नव्हे.' जगभरात उभे राहिलेले प्रदुषणाचे संकट लक्षात घेता, ही संकटे निर्माण होण्यापूर्वीच हजारो वर्षे आधी भारताने दिलेली, जगाकडे- निसर्गाकडे- पाहण्याची दृष्टी किती महत्वाची आहे याचे पंतप्रधानांनी विश्लेषण केले. अगदी सकाळी उठल्यावर भूमीला पाय लावण्यापूर्वी क्षमायाचना करण्याच्या संस्काराचाही त्यांनी उल्लेख केला. खरी सुरुवात तिथून व्हायला हवी. पण त्या मुद्यांचा आणि संस्कारांचा भाषणानंतर कुठे उल्लेखही होत नाही. आजच्या विकासाच्या व्याख्येत आणि आशा आकांक्षांच्या झंझावातात `निसर्गाचे दोहन व्हावे, शोषण नव्हे,' हा विचार पालापाचोळ्यासारखा उडून जातो. यासाठी मोदींना दोष नाही देता येणार. उलट, भारतासारख्या विशाल आणि महत्वाच्या देशाचे शक्तिशाली पंतप्रधान म्हणून बोलतानाही ते समस्यांच्या इतक्या मुळाशी जातात, याबद्दल आनंदच व्हायला हवा. खरा प्रश्न - या जगाचे भले व्हावे असे वाटणारे आणि मोदी व भाजप यांचे चाहते व हितचिंतक काय करणार हा आहे. आज मोदींसमोर बसून त्यांच्या भाषणाला जोरदार टाळ्या वाजवणारे लोक त्यांच्या या विचाराचे मर्म किती समजू शकतात आणि त्यानुसार वागू शकतात हा महत्वाचा प्रश्न आहे. एका भ्रमणध्वनीने काम होत असतानाही आपले स्टेटस वाढवण्यासाठी जेव्हा दुसरा भ्रमणध्वनी घेतला जातो, तेव्हा निसर्गाचे दोहन संपून शोषण सुरु होते, हे कोण आणि केव्हा सांगणार आणि समजून घेणार. दर दोन चार वर्षांनी नवीन गाडी घेण्याची इच्छा निसर्गाच्या शोषणाला जन्म देते, weekend home ची कल्पनाच निसर्गाच्या शोषणाला हातभार लावते हे कधीतरी समजून घेण्याची गरज आहे.

मुळात तारांकित आणि स्पर्धेवर आधारित जीवनशैली आणि जीवनदृष्टी ही निसर्गाचे शोषण करणारी आहे. सगळ्यांना माणूस म्हणून जगता येण्यासाठी आवश्यक अशा गरजांची पूर्तता व्हायलाच हवी. पण जगण्याच्या गरजांची पूर्तता आणि हव्यास, वखवख यांच्यातील फरक समजून घ्यावा लागेल. आज अगदी दरीद्रातील दरीद्रापासून जगातील पहिल्या क्रमांकाच्या श्रीमंतांपर्यंत सगळ्यांची धाव हव्यासात मोडेल अशीच आहे. जगातील चार पाच टक्के लोक सोडले तर आज कोणाला साधेपणा, सात्विकता वगैरे हवी आहे? प्रत्यक्षात शक्य होत असेल किंवा नसेल, धाव मात्र हव्यास याच गोष्टीकडे आहे. अगदी साध्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा `माझ्याकडे अमुक ब्रांडची अमुक वस्तू आहे' किंवा `मी विदेशात इतके वेळा गेलो आहे' किंवा `मी अमुक गोष्टींवर अमुक इतका इतके वेळा खर्च करतो' अशासारख्या फुशारकीतून व्यक्त होणारा पुरुषार्थ निसर्गाच्या शोषणालाच हातभार लावतो. एवढेच काय, प्रवासात घरून पाण्याची बाटली भरून न घेता पाणी विकत घेण्याची सवय ही सुद्धा, मोदींनी भूमीची क्षमायाचना करण्याच्या ज्या संस्काराचा उल्लेख केला त्या संस्काराशी विसंगत अशी गोष्ट आहे. आपण सगळेच निसर्गाच्या या शोषणाला कळत वा नकळत किती हातभार लावत असतो, याचा विचार जगातील ७०० कोटी लोक करतील तेव्हा अनुकूल बदल होईल. जगातील ७०० कोटींचा विचार नंतर करता येईल. आज मोदींच्या आपल्यांनी, हा विचार करायला नको का?

- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, १६ मे २०१५

बुधवार, २९ एप्रिल, २०१५

समतेच्या नावानं चांगभलं

`समतेला माझा विरोध का?' या २२ एप्रिलच्या माझ्या लेखावर पुष्कळ वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. या प्रतिक्रियांमुळे माझी भूमिका स्पष्ट करण्याची पुन्हा संधी मिळाली. त्यासाठी प्रतिक्रिया देणाऱ्यांचे आभार. जी टीका करण्यात आली वा आक्षेप नोंदवण्यात आले त्यातील तीन प्रमुख आहेत. १) समता व समानता या दोन भिन्न बाबी आहेत. २) विकासासाठी संधींची समानता आवश्यक. ३) निसर्गदत्त विषमता आणि मानवनिर्मित विषमता यांची तुलना अयोग्य आहे.

या तिन्हीतील कुठलाच मुद्दा नवीन नाही. वरवर पाहता बिनतोडही आहे. मात्र थोडा खोलवर विचार केला तर त्यातील फोलपणा लक्षात येईल. समता आणि समानता या दोन भिन्न बाबी आहेत हे म्हणणे ठीक, पण त्यातील नेमका फरक सांगणे अवघड आहे. समता ही मनातील एक उच्च भावना आहे, पण त्याचे व्यवहारातील रूप कसे असेल? प्रेम ही जशी लक्षणांवरून जाणावयाची गोष्ट आहे, तशीच समता ही लक्षणांवरून जाणावयाची बाब आहे. अन ही लक्षणे समानतेच्या अधिकाधिक जवळ जाणारीच असावी लागतील. समुद्र आणि त्याच्या लाटा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत पण स्वतंत्र नाहीत. त्या अन्योन्याश्रयी आहेत. समुद्राशिवाय लाटा नाहीत आणि लाटांशिवाय समुद्र नाही. त्या केवळ भिन्न अवस्था आहेत. तसेच समता आणि समानता यांचे आहे. मनातील समता व्यवहारात येताना समानतेच्या रूपानेच येऊ शकते.

याच्याशीच संबंधित मुद्दा म्हणजे, निसर्गदत्त विषमता आणि मानवनिर्मित विषमता. निसर्गदत्त विषमता कोणीही नाकारत नाही. नाकारू शकत नाही. पण मानवनिर्मित विषमता मोडून काढण्याची चर्चा होते. प्रश्न असा आहे की, ही मानवनिर्मित विषमता येते कोठून? तिचे मूळ कोठे आहे? तिचे मूळ निसर्गदत्त विषमतेतच आहे याचा विसर पडतो. एखादी व्यक्ती स्वार्थी वा दुष्ट असते आणि ती शोषण, हिंसा वा अन्य तशा प्रकारच्या गोष्टी करते. पण स्वार्थी अथवा नि:स्वार्थी, दुष्ट अथवा सुष्ट हे भेद, ही विषमता निसर्गदत्त नाही का? निसर्गदत्त विषमता ही रूप, गुण, बुद्धी, परिस्थिती, वृत्ती, स्वभाव; अशा सगळ्याच प्रकारची असते. मानवी विषमता त्यातूनच जन्मास येते. अन ही निसर्गदत्त विषमता मिटवण्याचा रामबाण उपाय आज तरी माणसाकडे नाही. दुष्टाला सुष्ट करण्याची काय प्रक्रिया आहे? शिक्षण, संस्कार, विपश्यना वगैरे सारख्या पद्धती खरेच या जगातील सगळी कटुता, कृपणता, क्रूरता वगैरे घालवू शकतात? बरे आज एक कोटी दुष्टांना सुष्ट केले तरी उद्या तसेच तयार होतीलच ना? रोज लाखो बालके स्वत:चा पिंड घेऊन जन्माला येत असतात. शिवाय जगात घडणाऱ्या घटनांच्या क्रियाप्रतिक्रियातून माणसांचे वर्तन, विचार घडत, बिघडत असतात. पैसा, साधने, तंत्रज्ञान, माणसे यांचे कमीअधिक प्रवाह गरजेनुसार वाहत असतात. तेव्हा निसर्गदत्त विषमता आणि मानवनिर्मित विषमता या दोन गोष्टी नसून, एकीतूनच दुसरी जन्म घेते, हे समजून घेणे गरजेचे आहे.

तिसरा मुद्दा आहे- विकासासाठी संधींची समानता. हा तर फारच तकलादू आहे. यातून जंगलचा न्यायच उत्पन्न होण्याची शक्यता आहे आणि आज तेच पाहायला मिळत आहे. गॅट किंवा डंकेल प्रस्ताव आणि संपूर्ण जागतिकीकरणाची प्रक्रिया याच युक्तिवादावर आधारित होती. आज मात्र विपरीत चित्रच पाहायला मिळते. अगदी साधी गोष्ट आहे- रिलायन्स आणि खेडेगावातील एखादा दरिद्री शेतकरी यांना समान संधी आहे. पण रिलायन्स भाजी विकण्याचा दरिद्री शेतकऱ्याचा व्यवसाय करू शकते, पण दरिद्री शेतकरी रिलायन्स उभे नाही करू शकत. उलट यातून विनाश होतो तो दरिद्री शेतकऱ्याचाच. कायदे वगैरेची चर्चा न केलेलीच बरी. न्याय मागण्याची समान संधी असतानाही आज त्या संदर्भात काय स्थिती आहे? खरे तर सत्ता गाजवणे, कोणापेक्षा तरी वरचढ होणे, जग मुठीत बाळगणे, सर्वशक्तिमान होणे, वगैरे वगैरे असंख्य नावांनी मानवाच्या मनात अंगभूत असलेल्या काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षडरीपुंचा पुरता बंदोबस्त होईपर्यंत संधींच्या समानतेतून चांगलेच उत्पन्न होईल ही आशा करणे भाबडेपणाचे आहे. देण्यात आलेली संधी प्रत्येक जण उदार, विशाल मनाने आणि सद्वृत्तीने वापरेल याचा काय भरवसा? उलट तसे न होण्याचीच शक्यता अधिक. संधी मिळायचा अवकाश की मनातील स्वार्थ, सत्तालालसा उफाळून आल्याच म्हणून समजा. मुख्य म्हणजे स्वत: पुढे जाण्यासाठी दुसऱ्याला मागे ढकलणे, दुसऱ्याचे पाय खेचणे किंवा दुसऱ्याचे अहित करणे यात काय वावगे आहे, या प्रश्नाला समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत संधींची समानता काय आणि किती साध्य करू शकेल?

मग उपाय काय? उपाय आहे- माणसापुढे जगण्याचे व्यापक प्रयोजन ठेवणे. जगणे म्हणजे पैसा, वस्तू, साधने यांचा संग्रह वाढवीत जाणे नाही आणि जगणे म्हणजे जगवणे, ही व्यापक दृष्टी रुजवीत जाण्याची नितांत गरज आहे. मला पुढे जायचे आहे, मला अमुक मिळवायचे आहे, याच्यावर मात करायची आहे, त्याच्यावर मात करायची आहे (याच्यावर, त्याच्यावरमध्ये निसर्गही आला), याच्यापेक्षा श्रेष्ठ व्हायचे आहे वगैरे चुकीची प्रयोजने काढून टाकण्याची गरज आहे. संपूर्ण जीवनदृष्टीच बदलावी लागेल. ही जीवनदृष्टी बदलली की समता वगैरे आपोआपच साध्य होईल आणि मानव त्याहूनही खूप पुढे निघून जाईल. समतेसाठी आटापिटा करून ती साध्य होणार नाही आणि विपरीत परिणाम करेल. कारण माणसाच्या मनात आमुलाग्र बदल करण्याची, त्याच्या मनात उच्चतर भावांची प्रेरणा देण्याची शक्ती त्यात नाही. उच्चतर आदर्शांच्या साधनेने, रुजवणुकीनेच काही तरी मार्ग निघू शकेल. अर्थात- संपूर्ण गीता सांगितल्यावरही तुझा निर्णय तू घे असे सांगणाऱ्या पार्थसारथ्याची परंपरा मी सांगतो. त्यामुळे माझे म्हणणे पटलेच पाहिजे हा आग्रह नाही. प्रत्येकाचा आपापला विचार असावा.

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, २९ एप्रिल २०१५

मंगळवार, २८ एप्रिल, २०१५

भवभयातील रतीरंग

आज रात्री बरोब्बर ७० वर्षे होतील. २८ आणि २९ एप्रिल १९४५ च्या मधली रात्र...!!!

जवळपास साडेचार महिन्यांपासून, तारीखच सांगायची तर १६ जानेवारी १९४५ पासून अडॉल्फ हिटलर बर्लिन शहरात एका भुयारात राहत होता. सहा वर्षांपूर्वी सुरु झालेल्या दुसऱ्या जागतिक महायुद्धाचा शेवट नजरेच्या टप्प्यात आला होता. आपल्या क्रौर्यगाथांनी दहशत निर्माण करणारा, वंशश्रेष्ठतेचा दुराग्रही योद्धा चारही दिशांनी घेरला गेला होता. अमेरिका, सोव्हिएत युनियन यांच्या मित्र देशांच्या फौजा जर्मनीत घुसून बर्लिनच्या दिशेने पुढे सरकत होत्या. लाखो माणसांना मुंगीसारखे चिरडून टाकणारा हिटलर एका भुयारात लपून बसला होता. उंदरासारखा असे मात्र म्हणता येणार नाही. कारण तिथूनही आपली सत्ता चालवण्याचा त्याचा आटापिटा सुरूच होता. जर्मनीची हार होणार हे निश्चित झाल्यावर त्याने जर्मनीतील सगळी औद्योगिक प्रतिष्ठाने जमीनदोस्त करण्याचा हुकुम त्या भुयारातून दिला. ही औद्योगिक प्रतिष्ठाने शत्रूच्या हाती पडू नयेत हा उद्देश. शस्त्रास्त्र मंत्री अल्बर्ट स्पिअर याला या कामाची जबाबदारी त्याने सोपवली. स्पिअरने काहीही प्रतिसाद न देता त्याच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले. २० एप्रिल १९४५ ला त्याचा ५६ वा वाढदिवस होता. त्याच दिवशी सोव्हिएत फौजांनी जर्मनीची राजधानी बर्लिनवर तुफान बॉम्बहल्ला केला. पूर्ण जर्मनी भाजून काढली. बर्लिनच्या संरक्षणासाठी जर्मन फौजांनी यावे ही त्याची आज्ञा पाळण्यास लष्कराने नकार दिल्याची बातमी त्याला २२ एप्रिल रोजी देण्यात आली तेव्हा तो पूर्ण निराशेत बुडाला आणि त्या क्षणी त्याने सर्वप्रथम आपला पराभव अटळ असल्याचे मान्य केले. त्याच दिवशी त्याने हेही जाहीर केले की, शेवटपर्यंत आपण बर्लिनमध्येच राहू आणि अखेरीस स्वत:वर गोळी झाडून घेऊ. डॉ. वेर्नर हेस यांना त्याने आत्महत्येची खात्रीची पद्धत कोणती याची माहितीही विचारली. डॉ. हेस यांनी बंदूक व विष यांचा एकत्र उपयोग करण्याचा सल्ला दिला. ज्यावेळी फिल्ड मार्शल हर्मन गोरिंग याला याविषयी कळले तेव्हा त्याने हिटलरला एक तार पाठवली. १९४१ च्या निर्णयाप्रमाणे आपण तुमचे उत्तराधिकारी असल्याने आता तसे जाहीर करावे, असे त्याने त्या तारेत म्हटले होते. यावर हिटलर संतापला आणि त्याने गोरिंगला काढून टाकण्याचे आदेश दिले. २७ एप्रिल १९४५ रोजी बर्लिनचा उर्वरित जगाशी असलेला संपर्क तुटला. हिटलरचे अधिकारी तहाच्या व शरणागतीच्या हालचाली करीत असल्याचे त्याला कळले. त्याचा नुसता संताप संताप होत होता. सगळीकडून घेरला गेलेला, अधिकारी, सैन्य सगळे सोडून जात असलेले, पराभव समोर दिसतोय आणि स्वत: एकाकी असहाय्य अशी त्याची अवस्था झाली होती.

दरम्यानच्या काळात त्याने आपली प्रेयसी ईव्हा ब्राऊन हिला बर्लिनला बोलावून घेतले होते. त्याच्यापेक्षा २३ वर्षांनी लहान असलेली ईव्हा ब्राऊन १९२९ पासून म्हणजे १६ वर्षांपासून त्याची प्रेयसी होती. ती छायाचित्रकार होती. हिटलरची उपलब्ध असलेली अनेक छायाचित्रे तिनेच काढली आहेत. पूर्ण घायाळ झालेल्या प्रियकराच्या हाकेला ओ देऊन तीही त्याच्याकडे भुयारात आली. २८ आणि २९ एप्रिलच्या मधल्या रात्री त्या दोघांनी विवाह केला. भुयारात सोबत असलेल्या हाताच्या बोटावर मोजण्याइतपत लोकांच्या उपस्थितीत, जगाला हालवणाऱ्या हिटलरचा विवाह झाला. विवाहाच्या प्रमाणपत्रावर ईव्हा ब्राऊनने आपले नाव बदलून ईव्हा हिटलर असे केले. नवविवाहित जोडप्याने उपस्थितांना अल्पाहार दिला आणि ते आपल्या शयनकक्षात गेले. तेथे रात्री हिटलरने आपले मृत्युपत्र लिहिले. २९ एप्रिलच्या पहाटे चार वाजता त्याने मृत्युपत्रावर सही केली. २९ एप्रिल रोजीच त्याला त्याचा सहकारी, इटलीचा बेनिटो मुसोलिनी आणि त्याची पत्नी क्लारा यांना मारून व उलटे करून लटकावल्याची बातमी कळली. त्या क्षणी त्याने आधीच घेतलेल्या आत्महत्येच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. त्याला देण्यात आलेल्या सायनाइड विषाबद्दल त्याला संशय निर्माण झाला तेव्हा त्याने ते आपली लाडकी कुत्री ब्लोंडी हिला खाऊ घातले. ब्लोंडी तत्काळ मरण पावली. हिटलरच्या मनाची खात्री पटली. ३० एप्रिल रोजी सोव्हिएत फौजा भुयारापासून १६०० फुटांवर येउन पोहोचल्या होत्या. हिटलरने भुयारातील सहकाऱ्यांची एक बैठक घेतली. त्यांना सूचना दिल्या. दुपारी एक वाजता जोडप्याने दोन सहकारी आणि खानसामा याच्यासोबत जेवण घेतले. नंतर त्यांनी सगळ्यांचा निरोप घेतला. दुपारी अडीच वाजता ते आपल्या खाजगी कक्षात गेले. तासाभराने म्हणजे ३० एप्रिल १९४५ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास हिटलरच्या शयनकक्षातून बंदुकीची गोळी झाडल्याचा आवाज आला. काही मिनिटे वाट पाहून सहकारी आत गेले तेव्हा एका सोफ्यावर अडोल्फ व ईव्हा निष्प्राण पडलेले होते. अडोल्फच्या डाव्या बाहुपाशात असलेली ईव्हा शांत होती. तिच्या शरीरावर कोणतीही जखम नव्हती. अडोल्फच्या कपाळातून उजव्या बाजूने रक्त येत होते. ठरल्याप्रमाणे आधी ईव्हाने सायनाइडचे चोकलेट खाल्ले आणि ती मेल्याची खात्री झाल्यावर अडोल्फने स्वत:वर गोळी झाडून घेतली. सहकाऱ्यांनी लगेच त्यांचे मृतदेह बाहेर आणले. शत्रू तोंडावर उभाच होता. त्याच्या हाती ते लागायला नको होते. त्यामुळे दोन्ही निष्प्राण देहांवर पेट्रोल टाकण्यात आले आणि ते पेटवून देण्यात आले. त्यावर आतील कागदांच्या चळती आणून टाकल्या गेल्या. काहीही मागे राहू नये याची काळजी घेतली गेली. तरीही सोव्हिएत फौजांनी काही अवशेष नंतर हस्तगत केलेच आणि अनेक वर्षेपर्यंत, अनेकदा त्याची छाननी, तपासणी, खात्री करून घेण्याचे त्यांचे प्रयत्न सुरूच होते. न जाणो, हातावर तुरी देऊन हिटलर निघून तर गेला नसेल आणि हे अवशेष अन्य कोणाचे तरी असतील. अचानक हिटलर कुठून तरी टपकेल तर !! भवभयाचे किती रंग !!!

भयापोटीची आक्रमकता, आक्रमणातून उत्पन्न झालेले भय, अस्तित्वाचे भय, अस्तित्व संपल्यानंतरही उरलेले कल्पनेतील भय... भवभयाचे कितीतरी रंग... अन त्यात मिसळलेला ईव्हा आणि अडोल्फचा रतीरंग...!! सगळे राख होणार हे दिसत असूनही, असे काय होते की तिने त्याच्याकडे यावे? पुढचा दिवसही आपला नाही हे ठाऊक असतानाही लग्न करण्याची काय गरज होती? कोणते समाधान मिळाले दोघांनाही? कोणता आनंद मिळाला? चाळीस तासांपेक्षाही कमी अवधीच्या या संसाराने कोणते पूर्णत्व बहाल केले असेल त्यांना? जगाला नाचवणाऱ्या योद्ध्याला कोणती कमतरता होती? आणि कोणतेही भविष्य नाही, नावही बदनामच होणार हे माहित असतानाही कोणती प्रीती होती? भयाने अंतर्बाह्य वेढले असतानाही, कोणता आधार पुरवला असेल या रतीरंगाने? या पृथ्वीच्या रंगमंचावरील नाटकांना अंत नाही हेच खरे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
२८ एप्रिल २०१५

बुधवार, २२ एप्रिल, २०१५

समतेला माझा विरोध का?

१९ एप्रिल २०१५ रोजी मी फेसबुकवर एक पोस्ट टाकली. ती अशी-
समता दोन प्रकारांनी येऊ शकते-
१) सगळ्यांनी शहाणं होऊन.
२) सगळ्यांनी गाढव होऊन.
यावर एका मित्राने प्रतिक्रिया व्यक्त केली की, `हे कोणाच्याच हातात नाही, त्यामुळे ती (समता) कधीच येणे शक्य नाही.'

माझ्या पोस्टवरच्या सहज प्रतिक्रियेतून त्याने या विश्वातलं एक प्रखर सत्य अधोरेखित केलं. काळाचा महिमा म्हणा वा अन्य काहीही विश्लेषण करा. पण आज आपल्या मनावर, बुद्धीवर काही गोष्टींचा, काही घोषणांचा, शब्दांचा, काही कल्पनांचा एवढा पगडा आहे की, आपण त्याबाबत विचार करण्याची शक्तीच गमावून बसलो की काय असे वाटावे. समता किंवा समानता या अशाच कल्पना आहेत.

आज आपण स्वीकारलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्वत्रयी फ्रेंच राज्यक्रांतीतून आलेली आहे. ही तत्वं आपण फ्रेंच राज्यक्रांतीतून नव्हे तर भगवान बुद्धाच्या विचारातून घेतली आहेत, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. त्यावर वाद करण्याचे कारण नाही. पण सगळ्यांची भूमिका हीच असेल असे म्हणणे धाडसाचेच नव्हे तर चुकीचे ठरेल. दुसरी गोष्ट म्हणजे, या तीन तत्वांचा आग्रह धरताना वा त्यानुसार वागताना कुठेही बौद्ध विचारांचा मागमूस दिसत नाही. उलट पाश्चात्य जीवन मूल्यांचीच त्याला जोड असते. त्यामुळे समाजात व्याप्त अशा अर्थानेच मी चर्चा करणार आहे. त्यामुळे मी राज्यघटनेच्या विरोधी आहे किंवा डॉ. आंबेडकर मला मान्य नाहीत वगैरे किंकाळ्या मारण्यात अर्थ नाही. याचवेळी हेही विनम्रतेने नमूद करणे आवश्यक आहे की, समजा माझा राज्यघटनेशी किंवा डॉ. आंबेडकर यांच्याशी मतभेद असला तरीही त्यात काही गैर असण्याचे किंवा वाटण्याचे कारण नाही.

समतेवर माझा पहिला आक्षेप हा की, समता असूच शकत नाही. विषमता हाच या विश्वाचा पाया आणि आधार आहे. कोणाला पटून किंवा न पटून त्यात काहीही बदल होणार नाही. जी गोष्ट अस्तित्वातच नाही किंवा अस्तित्वात येउच शकत नाही, त्यासाठी रक्त, वेळ, पैसा, ऊर्जा, बुद्धिमत्ता, भावना; वाया घालवणे व्यर्थ आहे. या एका मुद्यावरून जे वाद, भांडणे, संघर्ष चहूकडे होताना दिसतात ते उबग आणणारे तर आहेच, पण दु:ख दायकही आहे. त्यातून काही चांगले, अर्थपूर्ण हाती लागण्याऐवजी त्रागा, संताप, मनस्ताप आणि कटुता एवढेच हाती लागते. हे सगळे होणे अपरिहार्य आहे. एखादी मौल्यवान गोष्ट समाजाच्या गळी उतरवायची असेल, प्रस्थापित करायची असेल तर हे होणारच; असा युक्तिवाद केला जाऊ शकतो. हा युक्तिवाद सशक्त आहे यात वादच नाही. पण आमच्या अनुभवावरून काहीच शिकायचे नाही का, हा मूळ प्रश्न आहे. रस्ता चुकला असला तरीही पुढेच चालत राहायचे का? कधी कधी प्रवासात रस्ता चुकतो. ओळखीच्या खुणा दिसत नाहीत किंवा वेळ लागूनही नेमक्या ठिकाणी पोहोचत नाही, तेव्हा शंका येतेच की रस्ता तर नाही ना चुकला. मग त्याची खात्री करून घ्यावी लागते आणि प्रसंगी ज्या रस्त्याने जात असतो तो टाकून देऊन माघारी फिरावे लागते. तेच योग्य, उचित आणि शहाणपणाचे असते. समतेच्या बाबतीतही हे करण्याची गरज आहे.

प्रत्येक व्यक्तीला त्याच्या त्याच्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे. काही जणांना जीवनात खूप काही मिळवायचे असते, तर काही जण संतुष्टीचे जीवन जगत असतात. काही अधिकार गाजवण्याच्या वृत्तीचे असतात, तर काही तसे नसतात. काही कठोर व्यवहारी असतात तर काही भावनांना अधिक महत्व देणारे असतात. काही पैशाच्या मागे धावणारे असतात तर काही कला साहित्य निसर्ग वगैरेत रमणारे असतात. काही संथ असतात तर काही वेगवान असतात. प्रत्येकाच्या आवडी वेगळ्या, गरजा वेगळ्या, परिस्थिती वेगळी. या सगळ्यासह जेव्हा माणसे जगतात तेव्हा विषमता राहणे, निर्माण होणे अपरिहार्य ठरते. अगदी छोटेसे उदाहरण. कोणत्याही कुटुंबात पाहायला मिळू शकते. पत्नीला चित्रपट पाहायला जायचे आहे आणि पतीला मात्र छानसे पुस्तक वाचायचे आहे; किंवा त्या दोघांची अदलाबदल करून; अशा वेळी कोणाला तरी आपले म्हणणे बाजूस ठेवावे लागते आणि समतेचे तत्व बाधित होते. दिसायला खूप छोटी गोष्ट आहे. कदाचित टिंगलटवाळी करावी अशी. पण थोडे गांभीर्याने आजूबाजूला पाहिले तर अशासारख्याच गोष्टींवरून घराघरात अशांतता आणि चौकाचौकात चर्चा झडताना दिसत नाहीत का?

चर्चा काय होतच राहतात. त्याचे काय एवढे? हे म्हणणे ठीक आहे, पण अशा चर्चातूनच अपेक्षा निर्माण होतात. मग अपेक्षा आणि अपेक्षाभंग यांचे चक्र सुरु होते. त्यातून मानसिक, सामाजिक, आर्थिक ताण सुरु होतात. एक सामाजिक वातावरण, शब्दावली, आनुषंगिक अर्थ अशी साखळी तयार होते. मग आपण शेतकरी आणि उद्योगपती यांना समान मानू लागतो. त्या दोघात असलेला जमीन अस्मानाचा फरक नजरेआड होऊ लागतो. लहान मुले आणि मोठी माणसे यांना समान समजू लागतो. अन लहान मुलांच्या समस्यांचे एक वेगळे जग आकाराला येते. एवढेच नाही तर त्या हाताळण्याची एक वेगळी समस्या पालकांसाठी तयार होते. रागावणं, बोलणं, टोमणे मारणं, एखादी कृती करणं,  एखादी गोष्ट करणं किंवा न करणं यांचे आग्रह, लकबी; अशा एक ना अनेक असंख्य गोष्टी समतेच्या चष्म्यातून पाहिल्या की नवीन समस्यांना जन्म देतात. सामान्य माणूस आणि राजकीय नेते समान आहेत ही धारणा मान्य केल्याने केवढा घोळ झाला आहे याचा विचार तरी आमच्या मनाला शिवतो का? या दोघांमध्ये प्रचंड फरक आहे. म्हणूनच नेत्यांनी जाणूनबुजून व्रतस्थतेने खडतर आयुष्य जगले पाहिजे. तो जेव्हा पैसा आणि अन्य सर्व प्रकारच्या धनसंपत्तीचा लोभ धरतो आणि आपणही माणूस आहोत असा युक्तिवाद करतो; तेव्हा सगळी सामाजिक, राजकीय, आर्थिक व्यवस्था भ्रष्ट व्हायला सुरुवात होते. त्यामुळेच दोघांमध्ये समानता राहायला नको. भूमिकेनुसार अनेक गोष्टी बदलत असतात, बदलायला हव्यात.

तरुण पिढीत वाढत असलेली उच्छ्रुंखलता, उर्मटपणा, बेपर्वा वृत्ती, या समानतेचीच देण आहेत. एवढेच नाही तर आपल्या वयाला न साजेसे असे वर्तन जेव्हा ज्येष्ठ पिढी करते तेव्हा ती समतेच्या या मूल्याने पोसलेल्या अहंगंड वा न्यूनगंडाने पछाडलेली असते असेच म्हणावे लागेल. स्त्री पुरुष समानतेचा घोळ तर सगळ्यांच्या परिचयाचा आहेच. वानगीदाखल दोनच गोष्टींचा उल्लेख पुरेसा ठरावा. एक म्हणजे- महिलाविषयक कायदेशीर तरतुदी आता प्रश्नांकित होऊ लागल्या असून त्या पातळ होऊ लागल्या आहेत. दुसरा उल्लेख एका व्यंगचित्राचा - या व्यंगचित्रात काही मुली दारू पिताना दाखवल्या होत्या आणि त्यावर लिहिले होते- `पोरगी शिकली, प्रगती झाली.' या गोष्टींचे समर्थन करणारे लोकही आहेत. म्हणजे केवळ पुरुषांची बरोबरी करायची या एकाच वेडाने झपाटलेल्या स्त्रिया दारू पिणे, जुगार खेळणे, शिव्यागाळी, सिगारेट पिणे, अन्य अमली पदार्थांचे सेवन, बेफाम गाड्या हाकणे; या आणि यासारख्या गोष्टींचे सर्रास समर्थन करतात. का? समानता. दुसरीकडे, हे करीत असताना त्या नकळत ही कबुली देतात की, एखादी गोष्ट चांगली का तर ती पुरुष करतात म्हणून. म्हणजे पुरुष करतात ते सगळे चांगले अशी कबुली देऊन, चांगले वाईट याचा विचार न करता ते करत सुटायचे. ही समता म्हणायची? जगात चांगल्या आणि वाईट, सभ्य आणि असभ्य, स्वार्थी आणि सर्वसमावेशक, एकांगी आणि एकात्म; अशा सगळ्याच वृत्ती असतात. त्यांच्यातील संघर्षात काय उचलून धरायचे आणि काय टाकून द्यायचे, हे कसे ठरवणार? कोण ठरवणार? समतेचे तत्व स्वीकारले तर यातून मार्ग कसा काढायचा? आज संपूर्ण मानवता या संभ्रमात सापडली आहे.

याशिवायही एक मोठे कारण आहे, ज्यामुळे माझा समतेला विरोध आहे. ते कारण आहे दांभिकता. अन ही दांभिकता आपल्या प्रगतीला, आपल्या विकासाला, आपल्या समजूतदारीला, आपल्या परिपक्वतेला अडसर उत्पन्न करते. प्रत्येक जण स्वत:ला सर्वोत्तम, सर्वोच्च, सर्वशक्तीसंपन्न, परिपूर्ण समजू लागला आहे. मला असे वाटते की मीच बरोबर, माझ्याहून मोठा कोण आहे? मग प्रत्येकच लेखक स्वत:ला कुसुमाग्रज समजू लागतो. चळवळीतला प्रत्येक व्यक्ती स्वत:ला डॉ. आंबेडकर समजू लागतो. प्रत्येक हिंदुत्ववादी स्वत:ला सावरकर समजू लागतो. प्रत्येक विचारवंत स्वत:ला विवेकानंद, अरविंद समजू लागतो. आपल्यापेक्षा सकस, अर्थपूर्ण, आशयसंपन्न काही असू शकते आणि मी स्वत:ला अधिक पूर्ण, अधिक सक्षम करायला हवे ही भावना हळूहळू लोप पावत आहे. दुसऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या अपेक्षा स्वत:च्या क्षमता, योग्यता आणि रुची या आधारे केल्या जातात; तर स्वत:च्या अपूर्णता, त्रुटी लक्षातही घेण्याची गरज वाटत नाही. अशा दोन्ही अंगाने समतेचे तत्व आपली मानसिकता बिघडवून टाकते. या जगात लोखंड, सोने, तांबे, पितळ, माती, पाणी असे सगळेच असते. प्रत्येकाचे महत्व आहे, स्थान आहे, वैशिष्ट्य आहे. पण ते समान नाही. माणसांचेही तसेच आहे. असंख्य आकार प्रकारची माणसे आहेत. त्यांनी परस्पर सौहार्द, सहकार्य करीत; सुखपूर्ण, आनंददायी जीवन जगावे. त्यांना तसे जगता यायला हवे. पण त्याचा मार्ग समतेतून जात नाही. समता हे तत्व वा आदर्श होऊच शकत नाही. प्रत्येकाच्या मनातील भावनांचे उन्नयन आणि संवेदनशीलता या आधारावर तो मार्ग प्रशस्त होतो. आमचा रस्ता चुकलेला आहे. कारण जेथे जावयाचे त्याची काहीही खुण मार्गावर दिसत नाही. वेळही खूप झालेला आहे. दुराग्रह सोडून आमच्या ध्येयाच्या दिशेने जाणारा योग्य मार्ग पकडणे आवश्यक आहे. त्याला पर्याय नाही.

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, २२ एप्रिल २०१५