मंगळवार, ४ जुलै, २०१७

अन्नदाता सुखी भव - ३


`अन्नदाता सुखी भव'चा तिसरा भाग लिहिणं काही ना काही कारणाने पुढे जात राहिलं. आज सकाळी एक बातमी वाचण्यात आली आणि वाटलं- कदाचित या बातमीसाठीच लिखाण पुढे ढकलत जावं लागलं असेल. नियती खेळवते म्हणतात ते हेच. काय होती बातमी? अमेझॉन या ऑनलाईन विक्री कंपनीच्या प्रमुखाला आपली पाच लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकची संपत्ती दान करावयाची आहे. बातमीच्या शेवटी एक उल्लेख असाही आहे की, जगातल्या १६० हून अधिक लोकांना आपली अवाढव्य संपत्ती दान करायची आहे. ही संपत्ती कुठे आणि कशी दान करायची या चिंतेत हे लोक आहेत. आजच्या अर्थकारणाचा फार महत्वाचा भाग या ठिकाणी विचारात घ्यावा लागतो. आजचे अर्थकारण पैसानिर्मिती करणारे अर्थकारण आहे. त्या ऐवजी अर्थकारण हे पुरेसा पैसा खेळवणारे अर्थकारण हवे. पैशाची (विनिमयाचे साधन) निर्मिती हा अर्थकारणाचा महत्वाचा पैलू आहेच, पण अर्थकारण त्याच ठिकाणी थांबता कामा नये. आज तसे ते थांबते.
वास्तविक निसर्गचक्र, जीवनचक्र, विचारचक्र, स्वरचक्र यासारखेच अर्थचक्र असायला हवे. ही चक्र कल्पना फार महत्वाची आहे. या संपूर्ण अस्तित्वाचाच तो आधार आहे. हे अस्तित्व चक्रीय आहे. निसर्ग हे त्याचे फार सुंदर आणि लक्षणीय उदाहरण आहे. नेमके आजच्या विचारपद्धतीत ही चक्रकल्पना missing आहे. तेच अर्थकारणालाही लागू आहे. अर्थाचे एक चक्र हवे. त्या चक्रात आवश्यक आणि पुरेसा पैसा हवा. पण चक्र नसेल तर पैसा कितीही असला, आवश्यकतेपेक्षा कितीही अधिक असला तरीही तो फक्त एकाच, म्हणजे वरच्या दिशेने जाईल आणि खालच्या दिशेला त्याचा अभाव अधिकाधिक जाणवेल आणि त्याचा त्रास होईल. शरीरातील रक्त फक्त हृदयाकडेच जात राहिले किंवा फक्त हृदयाकडून जात राहिले तरी अनर्थ होईल. रक्त डोक्यापासून पायाकडे, पायापासून डोक्याकडे आणि हृदयापासून हृदयाकडे जात राहायला हवे. ते खेळते राहायला हवे. आणि गरजेपेक्षा अधिक सुद्धा असायला नको. त्याचे शरीरातील प्रमाण निश्चित असते.
आज याचा विचार अर्थकारणाच्या संदर्भात होत नाही. समाजशरीरात आज गरजेपेक्षा किती तरी जास्त पैसा आहे. तोही claim असलेला. unclaimed वेगळाच. मग एवढा पैसा असूनही दारिद्र्य का? शेतकरी आत्महत्या का? शेतकरी कर्जबाजारी का? कारण पैसा फिरत नाही. पैशाची निर्मिती होऊन उपयोग नाही तो फिरायलाही हवा. पुन्हा एकदा हेही लक्षात घ्यायला हवे की तो गरजेहून अधिक सुद्धा नको. हे कसे साधता येईल? पुन्हा एकदा शरीराचे उदाहरण घ्यावे लागेल. हात, पाय, धड, डोळे, कान, नाक, मेंदू हे सारे आपापले काम करतात. हे कामच त्यांच्याकडे रक्त खेचून आणते, त्यांच्यापासून रक्त परत पाठवते आणि हे चक्र सतत सुरु राहते. आणखीन एक- प्रत्येक अवयव, प्रत्येक पेशी आपापले काम करते, मात्र ते काम म्हणजे रक्त तयार करणे नव्हे. रक्तपुरवठ्याशिवाय अवयव काम करू शकणार नाहीत, अवयवांनी काम केले नाही तर शरीर राहू शकणार नाही. पण रक्त तयार करण्याचे आणि पुरवण्याचे काम फक्त हृद्य करीत असते. आजच्या यंत्र-तंत्र युगाने जी यांत्रिक विचारपद्धती उत्पन्न केली त्यात हा विचार होत नाही. संपूर्ण शरीर एक संपूर्णता आहे. त्यामुळे हृदय जे रक्त तयार करतं ते केवळ हृदयाचे नसून संपूर्ण शरीराचे असते. त्यामुळे ते देताना ते संकोच करीत नाही. हृदयाने तयार केलेले रक्त स्वीकारताना अन्य अवयव त्यात कमीपणा वा अपमान मानत नाहीत. आणि ही देवाणघेवाण गरजेनुसार असल्याने अधिक ओरबाडणे, साठवून ठेवणे, संग्रह करणे इत्यादी गोष्टींना वाव नाही. हे अर्थकारणाला लावून पाहिले की अनेक गोष्टींचा उलगडा होतो.
आज आमच्या विचारशून्यतेने आम्ही अनर्थ ओढवून घेतला आहे. हे संपूर्ण अस्तित्व, ही प्रकृती एक संपूर्णता आहे हे लक्षात न घेऊन, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक अस्तित्व वेगळे आहे असे आम्ही मानतो. त्यानुसार प्रत्येक अस्तित्वाने आपापले रक्त तयार करावे आणि त्या भरवशावर जगावे असे मानतो. नेमकी चूक इथे होते. प्रत्येक अवयव आपापले रक्त तयार करू लागला तर रक्ताचे फिरणे थांबेल आणि शरीर संपून जाईल. अर्थकारणाच्या संदर्भात हा विचार कसा करता येईल. जगण्यासाठी पैसा हवा हे निर्विवाद. हा येणार कुठून? त्यासाठी प्रत्येकाने काम करायला हवे. निर्विवाद. पण हे काम म्हणजे पैसा निर्माण करणे नव्हे हे लक्षात घ्यायला हवे. शरीराची प्रत्येक पेशी काम करते. पण ते काम म्हणजे रक्त तयार करणे नव्हे, तसेच प्रत्येकाने काम करायलाच हवे. ती जगण्याची मुलभूत गरज आहे. मात्र काम करणे म्हणजे पैसा तयार करणे नव्हे. आपल्या conditioning मुळे हे समजायला थोडे किचकट आहे, पण ते समजून घेण्याशिवाय पर्याय नाही. प्रत्येकाने काम करायला हवे, प्रत्येकाला काम करता यायला हवे. पण काम करणे आणि पैसा यांचा जो संबंध आज आपण जोडलेला आहे तो तोडायला हवा. काम म्हणजे रोजगार म्हणजे पैसा हे समीकरण बदलायला हवे.
प्रत्येक गोष्ट ज्यावेळी पैशात मोजली जाते त्यावेळी त्याला किंमत प्राप्त होते. सगळ्या गोष्टींची किंमत सारखी नसते. मागणी पुरवठ्या नुसार किमती ठरतात. त्याला परिस्थितीची जोड असते. त्यामुळे किंमत या स्वरुपात सगळ्यांना सारखा न्याय देताच येत नाही. म्हणूनच सोने, मोबाईल, शिकवणे, साहित्यनिर्मिती, कलासाधना, घर सांभाळणे, शेतीमाल यांच्या किमती सारख्या राहू शकत नाहीत. त्यांचे मूल्य आणि त्या मूल्याचे महत्व कमी होत नाही, संपत नाही. शेतीमालाचे जगण्याच्या संदर्भातले मूल्य आणि महत्व अजिबात कमी होऊ शकत नाही. तसेच घर सांभाळण्याचे किंवा शिकवण्याचे किंवा कलासाधनेचे किंवा साहित्य निर्मितीचेही. पण या सगळ्या गोष्टींची किंमत सारखी राहू शकत नाही. तसेच यातील सगळ्या गोष्टी पैसा निर्माण करू शकत नाहीत. आज मात्र आम्ही या प्रत्येक कामाला पैसा निर्माण करण्यात लावतो. यामुळे पैसा तर निर्माण होत नाहीच उलट त्याचा दर्जा आणि मूल्य कमी होते आहे. त्याचा फटका एकूण जगण्याला बसतो आहे. (क्रमशः)
- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, १८ जून २०१७

अन्नदाता सुखी भव- २


पैसा हा शेतकरी समस्येचा दुसरा महत्वाचा पैलू आहे. कधीकाळी शेतकऱ्याकडे असलेला पैसा आता त्याच्याकडे नाही. `उत्तम शेती'ची आता अधम शेती झाली आहे. याची अनेक कारणे आहेत. लोकसंख्येतील वाढ, शेतीचे हिस्सेवाटे, शेतजमिनी धनदांडग्या लोकांच्या घशात घालण्याचे उद्योग, गावांबद्दल जाणता अजाणता निर्माण झालेली अनास्था, विकास- प्रगती- जगणे- यांचा केंद्रबिंदू शहरांकडे सरकणे, परीटघडीचे आयुष्य आणि लिहिता वाचता येणे म्हणजेच चांगले जीवन हा रुजवलेला व जोपासलेला समज, व्यसने, गतानुगतिकता, राजकारण, आधुनिकतेच्या नावाखालील शेतीचे अनावश्यक रासायनिकरण व यांत्रिकीकरण, परंपरा आणि पारंपरिकतेच्या डोळस स्वीकार-नकाराचा अभाव; अशी ही विविध कारणे आहेत. गेली अनेक वर्षे हे सुरु आहे. तरीही त्याचे आजचे भयावह स्वरूप आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे post globalisation चे चित्र आहे. आजची विदारक स्थिती हा जागतिकीकरणाचा परिणाम आहे. १९९० पूर्वी शेतकरी आत्महत्या हा विषय नव्हता.
जागतिकीकरणसुद्धा आता २५ वर्षे जुने झाले आहे. एवढेच नाही तर ज्यांनी जागतिकीकरणात आघाडीवर राहून नेतृत्व केले होते ते त्यातून माघार घेऊ लागले आहेत. काही दिवाळखोर झाले आहेत. काही मुठभर लोकांच्या हाती जगातील ८० टक्के संपत्ती साठल्याची जी चर्चा अधूनमधून होते, त्या संपूर्ण phenomenon चा तडाखा संपूर्ण जगाला बसला आहे. भारतातील शेतकरी समस्या हा त्याचाच एक भाग आहे. ही समस्या इतकी किचकट आणि गुंतागुंतीची आहे की, त्यावर `झट मंगनी पट ब्याह' असा उपाय शक्य नाही. ज्यांना अशी अपेक्षा आहे ते अडाणी आणि अशी अपेक्षा जनमानसात निर्माण करून त्याचे राजकारण करू पाहणारे बदमाश आहेत असेच म्हटले पाहिजे. पक्षोपपक्षांचे झेंडे घेऊन नाचणारे बावळट म्हटले पाहिजेत. आज सत्तेवर असणारे, काल सत्तेवर असलेले किंवा उद्या सत्तेवर येणारे यांची यातील भूमिका मर्यादित होती, आहे वा असेल हे समजून घेणे गरजेचे आहे.
एक उदाहरण घेता येईल. शेतीसाठी पैसा पाहिजे. परंतु त्यासाठी पैसा मिळत नाही. का? कारण शेती बेभरवशाची आहे. अगदी कालचे उदाहरण- काल झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने विदर्भाच्या पातुर भागात इतकी जोरदार हजेरी लावली की शेतात काढून ठेवलेला कोट्यवधींचा शेतमाल मातीमोल झाला. कधी अतिवृष्टी तर कधी अनावृष्टी; कधी कीडीचा हल्ला तर कधी प्राण्यांची समस्या; पाऊसपाणी व्यवस्थित झाल्यावरसुद्धा कधी भरघोस पिके तर कधी पिके कमी येणे. दोन शेजारच्या शेतात सारखे पिक पेरले, एकाच वेळी पेरले तरीही त्याचे उत्पादन चार-आठ दिवस मागेपुढे येते. त्यात शेतकऱ्याच्या व्यक्तिगत किंवा कौटुंबिक कामांमुळे किंवा मजूर इत्यादी सोय न झाल्याने वगैरे माल मागेपुढे निघतो. एकाचा माल घरात येतो, तर दुसऱ्याचा दोन दिवसांनी पाऊस वा वादळ आले की मातीमोल होतो. उद्योग आणि शेती यात असे कमालीचे अंतर आहे. उद्योगात माणसे, उत्पादन, साठवणूक, वातावरण, परिस्थिती नियंत्रणात असतात. शिवाय उद्योग बुडाला तरी त्याची जमीन, कच्चा वा पक्का माल ताब्यात घेता येतो. काही ना काही वसुली करता येऊ शकते. तरीही बँकांची थकीत कर्जे लाखो कोटी रुपयांवर पोहोचली आहेत. अशा स्थितीत शेतीला पैसा कोण देणार? एखाद्या theme park साठी बँक अथवा जागतिक एखादी संस्था सहज पैसा देते पण शेतीसाठी देत नाही. मग स्वाभाविक हे काम सरकारकडे येते. पण सरकार किती अन काय काय करणार?
सरकारला शेतीलाही पैसा द्यावा लागतो, शाळांनाही पैसा द्यावा लागतो, इस्पितळेही उभारावी लागतात, कला साहित्याची जोपासना करायला पण पैसा पुरवावा लागतो. अशा असंख्य बाबी. पैशाचे सोंग आणता येत नाही पण आणावे लागते. मग कर्जाचे डोंगर उभारावे लागतात, त्यातून पत घसरते, कर्जफेडीची चिंता सतावते, त्यासाठी जनतेच्या खिशाला हात घालावा लागतो. मागणाऱ्यांची संख्या जेवढी अधिक तेवढी जनतेच्या खिशाला कात्री अधिक. ही कात्री सरसकट सगळ्या जनतेच्या खिशाला लागते. ज्या शेतकऱ्याला एका हाताने मदत दिली जाते त्याच शेतकऱ्याच्या अन्य गरजातून थोडे थोडे का होईना काढून घेतले जाते. कर्जाचा पर्याय थोडा बाजूला ठेवला तर धनदांडग्या लोकांच्या दाढ्या कुरवाळाव्या लागतात. त्यांच्याकडून परस्पर काही गोष्टी करून घ्याव्या लागतात. त्यासाठी त्यांच्या अटी शर्ती स्वीकाराव्या लागतात. बरे, आपण स्वीकारलेल्या महान लोकशाहीमुळे निवडणुकांना पैसा लागतो. शेतकरी तो पैसा देऊ शकत नाहीत. पैसा देतात ते उद्योजक आणि व्यापारी हेच. त्यांना हात लावता येत नाही. सरकार कोणाचेही असो. घडते ते हेच. प्रत्येक पक्षाचे आपापले उद्योजक, व्यापारी असतात. त्या त्या उद्योजकांना किंवा व्यापाऱ्यांना त्यांचे त्यांचे सरकार हवे असते. दुसरे सरकार आले की त्यांचे नाककान दाबले जातात. जगणे थोडेबहुत तरी मुश्कील होते. आज सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनांमागे हादेखील एक पैलू आहे.
अशा स्थितीत कर्जमाफी किंवा हमीभाव नेहमीच कात्रीत सापडतात. शिवाय कृषीमालाचे भाव वाढवणे याच्या अन्य परिणामांचा विचार होतच नाही. कृषीमालाचे भाव वाढवा म्हणणे ठीक आहे. कदाचित ते वाढवले जातीलही. पण त्याचे परिणाम काय? अन त्याने साध्य काय होणार? सगळ्यात पहिला मुद्दा लक्षात घ्यायला हवा की, शेतकरी हा एकाच वेळी शेती कसणारा उद्योजक आहे, कृषिमाल विकणारा व्यापारी आहे, अन ग्राहकही आहे. एखादा शेतकरी गहू विकेल त्यावेळी डाळ, दूध इत्यादी विकतही घेईल. एखादा शेतकरी भुईमुग विकेल त्याच वेळी गहू, तांदूळ इत्यादी विकत घेईल. भाव वाढतील तेव्हा सगळेच भाव वाढतील. मग गहू विकून अधिक पैसा मिळेल अन त्याच वेळी अन्य गरजा महाग झाल्याने त्यात खर्चही होईल. खाद्यान्नाचे भाव वाढल्याने महागाई वाढेल, नोकरदारांचे महागाई भत्ते वाढतील, माणसांच्या हाती अधिक पैसा आल्याने कारखान्यात उत्पन्न होणाऱ्या उत्पादनांचे भाव वाढतील, वरच्या लोकांकडे पुन्हा अधिकचा पैसा साठेल, शेतकरी आजच्यापेक्षा अधिक पैसा असूनही सगळ्यात शेवटल्या पायरीवरचा शेवटल्या पायरीवरच राहील. त्याचे जगणे आता जसे कठीण आहे तसेच जास्तीचा पैसा मिळाल्यावर सुद्धा कठीणच राहील. आज कृषीमालाचे भाव वाढवण्याचा घाऊक उपाय सांगणारे हे धरून चालतात की बाकी सगळ्या बाबी आज आहेत तशाच राहतील. त्यांचे हे वाटणे दिवास्वप्न किंवा मूर्खांचे नंदनवन याहून अधिक काहीही नाही.
जगभरात, अगदी विकसित देशातसुद्धा हीच स्थिती आहे. त्यामुळेच त्यांनाही शेतीला मोठाली अनुदाने द्यावी लागतात, पैसेवाल्यांच्या दाढ्या कुरवाळाव्या लागतात, अन या प्रयत्नात ते अभूतपूर्व कर्जबाजारी होतात किंवा दिवाळखोर होतात. शिवाय ज्याच्याकडे ना शेती आहे, ना उद्योग असा जो कोट्यवधीच्या संख्येतील मजूरवर्ग, कष्टकरी वर्ग आहे त्याचे काय? खायला, प्यायला त्यालाही हवे. त्याला ना हमी भाव, ना महागाई भत्ता, ना वेतन आयोग. जाडीभरडी का होईना भात रोटी खाऊन जगणाऱ्या या वर्गाने गहू, तांदूळ, डाळी, दूध यांचे भाव वाढले तर काय करायचे? पुन्हा सरकारने त्यांना फुकटात धान्य, दूध वगैरे द्यायचे? पुन्हा त्याचा बोजा अर्थयंत्रावर? बरे, हा जो मोठा कष्टकरी वर्ग आहे त्याच्यावरच बाकी संपूर्ण समाजाचा डोलारा उभा असतो. नेहमीच. त्या वर्गाने त्याचे पाहून घ्यावे अशाच राक्षसी मानसिकतेत आज आपण आहोत. माणूस म्हणून तर आपले हे अध:पतन आहेच, पण हा काच वाढला तर; the worm also turns या उक्तीप्रमाणे; संपूर्ण समाजव्यवस्था अस्ताव्यस्त होण्याची शक्यता नजरेआड करून चालणार नाही.
मग काय? पुढील भागात विचार करू.
- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, ११ जून २०१७

`वामांगी'च्या निमित्ताने


दर आषाढी कार्तिकीला येते तशीच आजही अरुण कोलटकर यांची `वामांगी' ही कविता वाचायला मिळाली. नेहमीच मनोरंजन आणि उथळपणा म्हणून त्याकडे पाहतो. आजही तसेच पाहिले. पण त्यासोबतच त्यावर मत मांडावे असेही वाटले.
कोलटकर यांची ही कविता आता भरपूर परिचित झालेली आहे. त्यामुळे कविता येथे देत नाही. ज्यांना ठाऊक नसेल त्यांना ती सहज उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे मूळ मुद्यावर येतो. पंढरपुरात विठ्ठलाच्या शेजारी रखुमाई नाही. त्यावर ही कविता. कोलटकर यांनी त्यांना वाटला तो अर्थ लावून स्त्रीवादाच्या अंगाने ही कविता लिहिली. पण म्हणून ते सत्य ठरते का? अशीच पुरुषवादी भूमिका घेऊन कविता लिहिता येईलच. ती विठ्ठलाची भूमिका म्हणून मांडता येऊ शकेल. हा सगळाच त्यामुळे पोरखेळ ठरतो. साहित्यिकाने स्वातंत्र्य किती आणि कशाचे घ्यायचे हा महत्वाचा मुद्दा आहे. आपले प्रश्न, आपली मते मांडताना शतकानुशतके ज्या गोष्टी घडत-बिघडत आल्या आहेत, त्यांचा आधार किती घ्यावा हा मूळ प्रश्न आहे. त्यातल्या त्यात देव, धर्म, रूढी, परंपरा, भावना यांना हात घालताना किमान तर्कबुद्धी तरी वापरायलाच हवी. या कवितेच्या संदर्भात ती किमान तर्कबुद्धी वापरायची म्हटले तर प्रश्न निर्माण होतो विठ्ठल-रुक्मिणी यांना खरेच अस्तित्व आहे का? असे कोणी आज वा कधीकाळी होते का? उत्तर स्पष्ट आहे- त्याबद्दल काहीही सांगता येत नाही. मग सांगता येत नाही तर त्यावर समग्र जीवनाच्या संदर्भात भाष्य का करायचे? तो प्रश्न भावनांचा, श्रद्धांचा म्हणून दूर ठेवायचा. आपली मते, आपले विचार, आपल्या समस्या मांडण्यासाठी त्यांना वेठीला धरण्याचे कारण नाही. ते काम अन्य प्रकारे होते आणि होऊ शकते. त्यामुळे अशा बाबतीत आक्रस्ताळेपणा करत विनाकारण श्रद्धाभंजन करत सुटणे चुकीचे ठरते. त्यामुळे ही कविता अयोग्य आणि चुकीची म्हणावी लागते.
दुसरा मुद्दा येतो, कवितेच्या आशयाचा. याबाबतीत असे म्हणता येईल की, देव, ईश्वर, धर्म इत्यादींची समज नसलेली ही कविता आहे. मुळात देव, धर्म, ईश्वर, आध्यात्म यांची बांधिलकी आणि श्रद्धा जपणारे सुद्धा याबाबत फारसा विचार करीत नाहीत. मग ज्यांना ते मान्य नाही किंवा त्याला विरोध करायचा आहे त्यांची गोष्टच वेगळी. अरुण कोलटकर असो किंवा `पिके' तयार करणारा अमीर खान असो; एकाच माळेचे मणी. ही दोन नावे फक्त उदाहरण म्हणून घेतली. परंतु असे अक्षरशः असंख्य आहेत. साहित्यिक, विचारवंत, लेखक, कलाकार, पत्रकार आणि प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे समाजमानस घडवणारे बहुतांश लोक या गोष्टींचा मुळातून, सखोल अभ्यास वगैरे करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. किमान असा अभ्यास करणाऱ्यांकडून थोडा सल्ला वगैरे घेण्याच्या भानगडीत पडत नाहीत. उलट आपले मत लादण्याचा प्रयत्न करतात. शेकडो वर्षे वारकरी, भागवत संप्रदाय, संत काय म्हणत आहेत याच्याशी आम्हाला काहीही देणेघेणे नाही. आम्ही म्हणतो तोच अर्थ खरा आहे असा दावा करणे हास्यास्पद ठरते. भारतीय तत्वज्ञान, देवदेवता कल्पना, प्रतिकांचे अर्थ, प्रतिकांचा विकास, या साऱ्याचा मानवी जगण्याशी संबंध यांचा सखोल विचार न करता अनेकदा लिहिले जाते. आजचे बहुसंख्य साहित्य हे impulsive साहित्य आहे. कोलटकर यांची ही कविताही तशीच आहे. अतिशय धाडसाने मी हेही म्हणेन की, पुराणे, कथाकहाण्या हे साहित्य देखील impulsive साहित्य आहे. मूळ भारतीय तत्वज्ञान, आध्यात्म, जीवनदृष्टी समजण्यासाठी उपनिषदे हाच संदर्भबिंदू आहे. लोकश्रुती किंवा अन्य साहित्य नाही. अलीकडच्या काळात यावर भाष्य करणारे विवेकानंद, योगी अरविंद असोत किंवा डॉ. राधाकृष्णन यांच्यासारखे विद्वान यांचे अध्ययन न करता, जीवन, जगणे इत्यादींचा गांभीर्याने विचार न करता लिहिले जाते. असे लिहावे की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न. त्यांनी असे लिहू नये म्हणून काही ते थांबणार नाहीत. मात्र एका गोष्टीवर आक्षेप घ्यावाच लागेल आणि आग्रहाने ती गोष्ट मांडावी लागेल की, impulsive लिहून ते सिद्धांत म्हणून प्रचारित करू नका.
कोलटकर किंवा त्यांच्या पद्धतीने लिहिणारे लोक ज्या विचारांना प्रमाण मानून लेखन करतात ते विचार आज केवळ भारतात नव्हे संपूर्ण जगात प्रश्नांकित झालेले आहेत. गेली काही शतके हे विचार आपल्या कानीकपाळी इतके ठसवले गेले आहेत की, आम्ही त्यांचा नीट विचार करूच शकत नाही. व्यक्तिवाद, इहवाद, विकास, स्वातंत्र्य, जीवन, जगणं, माणूस इत्यादींच्या संकल्पना, त्यामागील भावना, जगण्याच्या संदर्भातील या सगळ्याचे अनुभव हे सगळेच आज कोलमडून पडले आहेत. सगळ्या गोष्टींचा विचार तुकडे तुकडे करून, पृथकपणे करणे आणि सगळ्या गोष्टींचा विचार जोडत जोडत सलगपणे करणे असा मूळ विचारांचा फरक आहे. जोडत जाणे हा भारतीय विचार आणि भाव आहे. तो समजत नाही तोवर अनेक गोष्टी उलगडणे कठीणच. देव ईश्वर असा विषय असल्याने फक्त एक सिद्धांत म्हणून मांडतो. त्याचा विस्तार वाचकांवर सोपवतो. सिद्धांत- भारतीय आध्यात्मदृष्टी सुद्धा अखेरीस ईश्वर सोडून देते. भारतेतर इहवादी, लौकीकवादी दृष्टी तर ईश्वर टाकूनच देते. दोन्हीत ईश्वर संपून जातो. मात्र भारतीय दृष्टी सगळ्या लौकिक, अलौकिक, आध्यात्मिक बाबी सामावून घेत घेत जगण्याचं संपूर्णत्व प्रकट करते. त्यात ईश्वर संपणे याचा अर्थ ईश्वराचा विलय आहे. मात्र भारतेतर दृष्टी ईश्वराची तोडफोड करत, जगण्याची चिरफाड करत, तुकडे तुकडे करत, अखेरीस फक्त चिंध्या हाती ठेवते आणि जगणे हा वैफल्याचा उत्सव म्हणून साजरा करते. रखुमाईच्या प्रतिकातून कोलटकर यांनी मांडलेला विचार याला अपवाद नाही.
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, ४ जुलै २०१७

शुक्रवार, ९ जून, २०१७

अन्नदाता सुखी भव- १


देशभर सध्या शेतकरी गाजतो आहे. तूतू मीमी ला अंत नाही. समाज, त्याचे सारे व्यवहार, त्याचे विचार आणि विचारशक्ती सारेच राजकारणाच्या दावणीला बांधले गेल्याने सगळंच कठीण झालं आहे. त्यामुळे त्या संदर्भात काहीही न बोललेलेच बरे. मात्र हा विषय त्यापलीकडे जाणारा आहे, अन त्या पल्याडच्या गोष्टी बोलणे, लिहिणे आवश्यक आहे.
शेती अन शेतकरी यांची मूळ समस्या काय आहे? पैसा आणि प्रतिष्ठा या दोन मूळ समस्या आहेत. शेतकऱ्याजवळ पैसा नसणे, शेतीसाठी पैसा नसणे, सरकार वा अन्य यंत्रणा यांनी शेतीसाठी पुरेसा पैसा न देणे किंवा खर्च न करणे, उपलब्ध पैशाचा अयोग्य वापर; हे पैशाच्या समस्येचे रूप आहे. शेतकरी, शेती, शेतकरी कुटुंब, जमीन, माती, ग्रामीण जीवन, कष्ट याकडे अप्रतिष्ठा दृष्टीने, हिणकस दृष्टीने पाहणे; त्याची मस्करी करणे; त्याविषयी तुच्छता; हे प्रतिष्ठेच्या समस्येचे रूप आहे. शिवाय या दोन्ही समस्या परस्परात गुंतल्या आहेत आणि परस्परांशी निगडीत आहेत. या दोन्हीचा सखोल विचार आवश्यक आहे.
आज किती जण चार-आठ दिवस खेड्यात जाऊन राहतात? किती खासदार, आमदार गावातल्या घरी राहतात? मदत करणारे किती celebrity आठ दिवस गावात जाऊन राहतात? शेती वा शेतकऱ्यांवर बेंबीच्या देठापासून चर्चा करणारे मुद्रित वा दृकश्राव्य माध्यमातील किती लोक खेड्यात जाऊन राहू शकतील? पर्यटन म्हणून का होईना गावात मुक्कामाला जाणारे किती आहेत? गाव सोडून शहरात आलेले किती गावी जाण्यास इच्छुक आणि उत्सुक असतात? का ही अनास्था? खराब रस्ते, वीज, पाणी, स्वच्छतागृहे यांची समस्या, मोबाईल रेंज न मिळणे, शहराचा आकार- स्वरूप- सोयी- खाणेपिणे- सिनेमे- भाषा- बोलणेचालणे- यापासून थोडा वेळ सुद्धा दूर राहण्याची तयारी नसणे; ही काही कारणे. यातून मार्ग काय? गावी जाऊन राहायला सुरुवात करणे. सुरुवातीला त्रास होईलच. दहा, शंभर, हजार, काही हजार अशी संख्या वाढत गेली तर त्यातूनच आज गावखेड्यात असलेला सुविधांचा अभाव दूर होईल. फक्त अभाव दूर करा म्हणून किंवा ते दूर करण्यासाठीच्या इमारती, रचना, व्यवस्था उभ्या करून अभाव दूर होणार नाही. आधी लोकांनी गावाकडे जावे लागेल, तिथे राहावे लागेल. त्रास सोसावा लागेल. पायवाट कशी तयार होते? सुरुवातीला चालणाऱ्यांना त्रास सोसावाच लागतो. जेवढे अधिक लोक ही तयारी करतील तेवढा समस्या सुटण्याला हातभार लागेल. आजही पुष्कळ जण जातात, पण नव्हाळीचे भाकरी-भरीत, हुरडा आदी खाण्यासाठी; तिथून येताना पिशव्या भरून आणून; `त्यांनी येताना आग्रहाने हे दिले' म्हणून फुशारकी मारता यावी यासाठी जातात. मात्र गावात गेल्यानंतर जसा त्रास सहन करू तसेच आपल्या पदरात काही पाडून घेण्यापेक्षा त्यांच्या पदरात काही टाकण्यासाठी जाऊ, ही भावना घेऊन जायला हवे. तिथे जे काही मिळेल ते धान्य फळे, घरगुती तयार केले जाणारे पदार्थ, वस्तू इत्यादी; तिथे जाऊन, पुरेसे पैसे देऊन घेऊ हा विचार व्हावा लागेल. केवळ गावातून आणलेल्या मालाची शहरात फुशारकी मारणे किंवा गावातल्या लोकांवर आपल्या चकाचक गाडीची, भारी मोबाईल, कपडेलत्ते, पादत्राणे, बोलणेचालणे आदींची मोहिनी घालणे याहून वेगळा विचार करावा लागेल. गावी जाऊन राहण्यातून त्यांच्यापर्यंत स्नेह आणि पैसा पोहोचावा याची काळजी घ्यावी लागेल. आहे तयारी?
प्रतिष्ठेच्या प्रश्नाचा आणखीन एक महत्वाचा पैलू म्हणजे- शेती करण्याची, असलेली शेती सोडून न देण्याची मानसिकता तयार होणे. त्यासाठी पैसा आणि नियोजनबद्ध प्रयत्न हवेत. शहरांमध्ये मेट्रो, सिमेंट रस्ते, पाण्यावरील विमाने, बुलेट ट्रेन, मॉल्स इत्यादी उभारण्यापेक्षा त्या पैशातून तालुका स्थानी शीतगृहांची साखळी उभारणे, साठवणुकीची व्यवस्था उभारणे, शेतमालाच्या बाजारपेठा शहरात उभारण्यापेक्षा तालुक्याला उभारणे, तालुका केंद्र करून शाळा, महाविद्यालये, दवाखाने, इस्पितळे उभारणे ही दिशा धरावी लागेल. ग्राहकांच्या फुकट्या मानसिकतेला आवाहन करून ग्रामीण मालाला उठाव देण्याचे प्रयत्न करण्यापेक्षा, ग्राहकाच्या सदसद्विवेकाला आवाहन करून तालुक्याच्या बाजारपेठेला जाण्याची त्याची मानसिकता तयार करावी लागेल. जाहिराती, प्रसार माध्यमे, मनोरंजन, प्रबोधनाचे अन्यान्य मार्ग यांचा वापर त्यासाठी आग्रहाने करावा लागेल. आहे तयारी?
याशिवाय पैशाचा प्रश्न महत्वाचा आहे. तो पुढील भागात.
- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, ९ जून २०१७

सोमवार, १५ मे, २०१७

पाहा विचार करून...

आफ्रिका सोडून संपूर्ण जगावर मोठा सायबर हल्ला झाला. आपल्या येथे सुद्धा रिझर्व्ह बँकेने काही सूचना जारी केल्या. जगभरातच याची चर्चा सुरु आहे. हा हल्ला आटोक्यात आला असून सुरक्षेची चर्चा सुरु झाली आहे. परंतु जी माहिती नको त्याच्या हाती लागून गेली त्याचे काय? त्याचा वापर तर तो करणारच. त्या माहितीच्या आधारे जगभरात उत्पात करून होईपर्यंत नव्याने करण्यात आलेल्या सुरक्षा उपायांचा भेद करण्याची क्षमता व कौशल्य हे लोक विकसित करणार आणि पुन्हा हल्ला करणार. डिजिटल व्यवहारांचे आक्रमकपणे व अभिनिवेशाने समर्थन करणारेही आता बिचकू लागले आहेत. तुमचे-आमचे, तूतू-मीमी हे होईलच. संपूर्ण जगाची कबर खोदल्या गेली तरीही तूतू-मीमी सोडायचं नाही, सुटणार नाही असा शाप देऊनच माणसाला जन्माला घातलं असणार. मात्र या माणसांमधीलच काही हाताच्या बोटावर मोजावेत असे अपवाद असलेल्यांनी याचा अधिक खोलात जाऊन विचार करायला हवा.

एक गोष्ट निर्विवाद आहे की, सत्ताकांक्षा आणि सुखलोलुपता अन सुखसाधनांची अखंड वाढ; या दोन तत्वांवर वर्तमान सभ्यता- संस्कृती- जीवन- उभे आहे. यावर या जीवन पद्धतीचे समर्थक आणि टीकाकार दोघेही एकमत होतील. पण गमतीची गोष्ट म्हणजे- या जीवनपद्धतीने ज्या समस्यांच्या गर्तेत माणसाला लोटले आहे, त्या समस्यांची सोडवणूक करण्याचे, त्या समस्यांवर केले जाणारे उपाय सुद्धा; सत्ताकांक्षा आणि सुखलोलुपता अन सुखसाधनांची अखंड वाढ; या दोन गोष्टींवरच आधारित असतात. नव्हे- सत्ताकांक्षा आणि सुखलोलुपता अन सुखसाधनांची अखंड वाढ; याच दोन संदर्भात विचार करण्याचं आमच्या बुद्धीचं प्रचंड conditioning झालेलं आहे. अगदी प्रामाणिकातल्या प्रामाणिक व्यक्ती अन प्रयत्नसुद्धा याला अपवाद नाहीत. जे ही बाब समजू शकतात त्यातील ९० टक्केहून अधिक तूतू-मीमी मध्ये अडकलेले असतात. काही चांगला बदल खरंच घडून यायचा असेल तर या जगातील ७०० कोटी लोकांपैकी बहुसंख्य लोक विचारी अन सुजाण झाले पाहिजेत; हे लक्षात घेऊन त्यासाठी प्रयत्न करण्याची त्यांची तयारी नाही.

वर्तमान जगण्याच्या मूळ तत्वांना खूप आदर्श, आध्यात्मिक तत्वांचा मुलामा देण्याचे सुद्धा प्रयत्न होतात. हे अगदी सहज शक्य आहे. पण आध्यात्मिकता अथवा आदर्श ही आंतरिक प्रकृती आहे. चराचराला कवेत घेणे, चराचराशी एकरूप होणे, चराचराशी समत्वाचा व्यवहार, चराचराचं एकत्व; इत्यादी गोष्टी आंतरिक प्रकृतीशी संबंधित आहेत. बाह्य व्यवहारात विषमता, विविधता, अल्पता, वेगवेगळेपणा, आटोपशीरपणा; याच गोष्टी असू शकतात. आंतरिक प्रकृतीचा अखंड विस्तार आणि बाह्य व्यवहार छोट्या छोट्या मर्यादांमध्ये; हेच जीवनाचे सूत्र असू शकते.

शांतपणे विचार करणाऱ्यांसाठी फक्त एक संकेत- भारताच्या आर्थिक इतिहासाचे नवनवे अध्ययन आणि त्याचे निष्कर्ष आता समोर येत आहेत. त्यावर वेगळ्या भाष्याची गरज नाही. परंतु भारताच्या त्या वैभवकाळात - भारत राजकीय दृष्टीने अशांत होता, आजच्यासारखे केंद्रीभूत शिक्षण- संशोधन नव्हते, जातीव्यवस्था अतिशय भक्कम होती, संपन्नता असूनही सुरक्षेचे उपाय वाढवण्याची गरज तर पडत नव्हतीच उलट घरांना कुलूपे न घालण्याचे प्रयोग यशस्वी होत असत, सारे काही कोणाच्या तरी हातात घट्ट धरून ठेवण्याची पद्धती नव्हती, एकच एक सत्ताकेंद्र नसल्याने नियमांची विस्कळीतता होती. या सगळ्या गोष्टींचा विचारही व्हायला नको?

गुरुवार, १३ एप्रिल, २०१७

महायुद्धांचे आकडे

गेले दोन दिवस सिरीया आणि अफगाणिस्थानातील अमेरिकेच्या हल्ल्यांची चर्चा आहे. काल तर अण्वस्त्र वगळून आज जगात असलेल्या बॉम्बपैकी सगळ्यात मोठा बॉम्ब अमेरिकेने वापरला. जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे का अशी सार्थ शंका व्यक्त होऊ लागली आहे. विविध लहानमोठी युद्धे आणि दोन जागतिक महायुद्धे यांच्या माध्यमातून जगावर सत्ता स्थापन करणे किंवा अवांच्छित शक्तींना नियंत्रित करणे यांचे प्रयत्न जगभरात होत आलेले आहेत. अगदी भारतात देखील. रावण वा कंस यांना नियंत्रित करण्यासाठी श्रीराम व श्रीकृष्ण यांनी युद्ध केले. तर राजसूय इत्यादी यज्ञाच्या वेळी होणाऱ्या लढायातून वर्चस्व स्थापित करण्याचे प्रयत्न झाले. सिकंदराने विश्ववर्चस्वासाठी लढाया केल्या. शिवाजी महाराजांनी तत्कालीन आतंकवाद निपटून काढण्यासाठी लढाया केल्या. गेल्या दोनशे वर्षांचा इतिहास तर ताजा आहेच. वर्चस्व अथवा त्रासदायक शक्तींचे नियंत्रण या दोनच गोष्टी लढाया अथवा युद्ध यांच्या मुळाशी पाहायला मिळतात. यातील त्रासदायक गोष्टींचे नियंत्रण ही अपरिहार्य आणि आवश्यक बाब आहे. वर्चस्व ही ना अपरिहार्य बाब आहे ना आवश्यक. पण त्रासदायक गोष्टींच्या नियंत्रणासाठी वर्चस्व आवश्यक होऊन बसते. कालांतराने या वर्चस्वातूनच त्रासदायक गोष्टी जन्माला येतात. मानवजातीपुढील हा एक dilemma किंवा paradox आहे.

भारताने यावर उत्तर शोधले आहे. अस्वस्थता आणि संघर्ष या परिस्थितीत करावयाचा व्यवहार आणि शांततेच्या परिस्थितीत करावयाचा व्यवहार यांची फोड करून. जगाला या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत हे पूर्ण लक्षात घेऊनच वाटचाल करावी लागते हे भारताचे म्हणणे आहे. याला अनुसरूनच त्याने कामे इत्यादीची वाटणी केली होती. समाजाला, माणसाला अधिकाधिक `मन-बुद्धी'श्रीमंत करण्याचा प्रयत्न सतत व्हावयास हवा ही त्याची एक बाजू आणि त्याला emergency अन contingency यांच्यासाठी सिद्ध ठेवायला हवे ही दुसरी बाजू. `मन-बुद्धी'श्रीमंत करण्याची बाजू अधिक मजबूत करत दुसऱ्या बाजूची गरज कमी करत जाणे हे भारताचे प्राचीन सूत्र. यालाच म्हणायचे सभ्यता आणि संस्कृती. जगाने तर याचा काही विचारच केला नाही. परंतु भारतही मार्गच्युत झाला. त्यामुळे आज स्थिती अशी आहे की गांधी आणि सावरकर यांच्यावरून आपण भांडत बसतो. गांधी आणि सावरकर दोघेही आवश्यक असतात हे आम्हाला उमगतच नाही. emergency अन contingency च्या वेळी गांधी उपयोगाचा नाही म्हणून आम्ही त्याला शिव्या घालतो आणि `मन-बुद्धी'च्या श्रीमंतीच्या मार्गात सावरकर अडथळा ठरतात म्हणून त्यांना शिव्या घालतो. शिव्या घातल्या की प्रतिक्रिया होऊन त्यांचे समर्थक गटतट निर्माण होतात. माणूस आणि समाज जिथल्या तिथेच राहतो. आपले कर्मदरिद्रीपण महापुरुष आणि परिस्थिती यांच्यावर ढकलून आम्ही मूर्खता कुरवाळत बसतो. दोघेही आवश्यक आहेत. दोघांची वेगवेगळी स्थाने आहेत. दोघांची बलस्थाने आहेत अन दोघांच्या मर्यादा आहेत. त्यांचा योग्य उपयोग करून आम्हास पुढे जायचे आहे हे भान आम्ही गमावून बसलो आहोत. जगाला ही दृष्टी देणे हेच भारताचे प्रयोजन आहे. आम्हालाच त्याचे आकलन होत नसेल तर आम्ही जगासंबंधीचे कर्तव्य काय पार पाडणार? अन भारत जगाला ही दृष्टी देणार नाही, जगाच्या जीवनात ती पूर्ण मिसळून टाकणार नाही तोवर; महायुद्धांचे आकडे मोजणे संपणार नाही.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, १४ एप्रिल २०१७

शनिवार, १९ नोव्हेंबर, २०१६

सूर्यनारायण राव


जगरहाटीप्रमाणे सूर्यनारायण राव गेलेत. सुदीर्घ आणि कृतार्थ जीवन जगून गेलेत.
तीन-चार वर्षांपूर्वी विजयादशमीला जोडून रा. स्व. संघाच्या ज्येष्ठ प्रचारकांचे एक शिबिर नागपूरला झाले होते. जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात पोहोचलेले देशभरातील सुमारे शंभरेक प्रचारक त्याला आले होते. त्यातील सगळ्यांनीच पाच दशकांहून अधिक काळ संघाचे प्रचारक म्हणून कार्य केले होते. काहींनी तर सहा-सात दशके सुद्धा. त्यावेळी नागपूरच्या विश्व संवाद केंद्राने त्या सगळ्या प्रचारकांच्या मुलाखती घेण्याचा एक उपक्रम केला होता. या निमित्ताने या व्रतस्थ जीवनांना बोलके करणे, त्यांचं जीवन आणि रा. स्व. संघाची वाटचाल यांची प्रेरक माहिती गोळा करणे हा त्याचा हेतू. माझ्याकडे त्यातील तीन नावे आली होती. त्यातील एक होते- सूर्यनारायण राव. त्यापूर्वी त्यांना पाहिले होते. भेटणे, बोलणेही झाले होते. पण ते प्रतिनिधी सभेतील व्यवस्था म्हणून, कधी बौद्धिक वर्गाच्या वा अन्य कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा एखाद्या वेळी एखादा प्रश्न विचारण्यापुरते. मुलाखतीच्या निमित्ताने मात्र त्यांना जवळून पाहता आले, समजून, जाणून घेता आले.
रेशीमबागेतील यादव भवनाच्या तळमजल्यावरील त्यांच्या खोलीत मी पोहोचलो तेव्हा दुसरे एक ज्येष्ठ प्रचारक रंगा हरीजी तिथे बसले होते आणि त्यांची चर्चा सुरु होती. सूर्यनारायण राव संघाचे पहिले अखिल भारतीय सेवाप्रमुख राहिले होते, तर रंगा हरीजी संघाचे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख राहिलेले. दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समग्र साहित्याचे जे १२ खंड गुरुजी जन्मशताब्दी निमित्त प्रकाशित झाले त्याचे संपादन देखील रंगा हरीजी यांनीच केले होते. दोघेही अतिशय ज्येष्ठ, अत्यंत कर्तृत्वसंपन्न, प्रज्ञावान प्रचारक. तरीही मी तिथे पोहोचताच रंगा हरीजी लगेच उठून, नमस्कार करून तिथून गेलेत. मुलाखतीची वेळ ठरलेली होती, मुलाखत घेणारा आला होता; त्यामुळे चर्चा ताबडतोब बंद. अनुशासन आणि साधेपणा, सहजता यापेक्षा वेगळी आणि अधिक काय असू शकते? त्या दोघांपुढे मी कोणीच नव्हतो. थोडा वेळ थांबावे लागले असते तरीही काहीच हरकत नव्हती. पण मला थांबावे लागले असते तर त्याने संघ आणि त्या दोन ज्येष्ठ प्रचारकांच्या महानतेला किंचित धक्का लागला असता ना !!
माझे स्वागत करून मराठीत म्हणाले- बसा. अन मला प्रश्न केला - which language? मी हसत म्हणालो- as you wish. but of course not tamil. त्यावर तेही दिलखुलास हसले. अन म्हणाले- ok. we will start and will proceed naturally आणि इंग्रजी व हिंदीत ही मुलाखत पार पडली. अधून मधून एखादा शब्द वा छोटेसे वाक्य मराठीतही. बोलणे सुरु करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या सहायकाला आवाज दिला. मी म्हटले, काही हवे आहे का? मी देतो. सांगा. ते नाही म्हणाले. सहायक आल्यावर म्हणाले- दोन पेले पाणी भरून इथे ठेव. सहायकाने पाणी ठेवल्यावर गप्पा सुरु झाल्या आणि सुमारे नऊ दशकांचा जीवनपट आणि संघाचा इतिहास उलगडू लागला. धिप्पाड शरीरयष्टीचे सूर्यनारायण राव थोडे थकले होते, पाय कामातून गेल्याने उठबस नव्हती, वॉकरशिवाय पान हलत नव्हते; पण आवाज आणि स्मृती मात्र खणखणीत होती. बोलण्याच्या ओघात सव्वा तास कसा गेला कळलेच नाही. बोलणे मात्र पूर्ण झालेच नव्हते. कारण त्यांच्याकडे सांगायला खूप होते आणि मला ऐकण्यासारखे खूप होते. मग तेच म्हणाले- तुम्ही परवा या. उद्या तर विजयादशमी. उत्सव आणि सणाचा दिवस. परवा संध्याकाळी समारोप आहे. तुम्ही दुपारी या. मला मिळालेला हा आनंददायी बोनस होता.
ठरल्याप्रमाणे गेलो. सूर्यनारायण राव तयारच होते. मी विचारले- कालचा दसरा उत्सव कसा वाटला? प्रसन्न होऊन म्हणाले- खूप छान. उत्सव छान झाला. संख्याही भरपूर होती. मी पहिल्यांदाच नागपूरचा दसरा उत्सव पाहिला, त्यात सहभागी झालो. कधी योग आला नव्हता. पुन्हा तास- सव्वा तास बोलणे झाले. त्यांनी एक छान आठवण सांगितली. गोळवलकर गुरुजी तामिळनाडू प्रवासात होते. ते सुर्यनारायण राव यांच्या घरी गेले. त्यांच्या पद्धतीप्रमाणे गुरुजींनी सगळी चौकशी केली. तेव्हा लक्षात आले की, त्या कुटुंबात एक चिंता आहे. सूर्यनारायण राव यांची बहीण आणि नंतर राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय मंडळात राहिलेल्या रुक्मिणी अक्का यांना नागपूरला शिकायला जायचे होते आणि नागपूरला तर त्यांचे कोणीच नव्हते. गुरुजी लगेच म्हणाले- गोळवलकरांचे घर तुमचे नाही का? आणि रुक्मिणी अक्का पुढील व्यवस्था होईपर्यंत गुरुजींच्या घरी राहिल्या. बोलणे संपवून निरोप घेऊन मी उठलो. निघण्यापूर्वी त्यांना नमस्कार केला आणि दाराकडे वळलो त्यावेळी ते म्हणाले- माफ करा हं. तुम्हाला निरोप द्यायला मी दारापर्यंत येऊ शकत नाही. यावर मी काय बोलणार? एक आवंढा गिळला आणि बाहेर पडलो.
सूर्यनारायण राव १९४६ साली प्रचारक निघाले. महात्मा गांधीजींची हत्या झाली त्यावेळी गुरुजी मद्रासला प्रतिष्ठित नागरिकांच्या कार्यक्रमात होते. सूर्यनारायण राव त्यावेळी तिथे गुरुजींसोबत होते. नंतरच्या घटनाक्रमात त्यांना अटक झाली होती. कारागृहात असताना त्यांनी संपूर्ण विवेकानंद साहित्य अनेकदा वाचून काढले होते. ते त्यांना अक्षरशः पाठ होते. पृष्ठ क्रमांकासह. त्यानंतर अनेक वर्षांनी विवेकानंदांचे ते संपूर्ण साहित्य मद्रास कारागृहाच्या ग्रंथालयाला देण्याचा कार्यक्रम झाला. त्यावेळी सूर्यनारायण राव यांना खास आमंत्रित करण्यात आले होते. स्वामीजींच्या शिकागो भाषणाच्या शताब्दीनिमित्त नागपूरला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा एक कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमात त्यांनी दिलेले संदर्भ ऐकून सगळेच अवाक् झाले होते. प्राचार्य राम शेवाळकर त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. ते तर अक्षरशः भारावून गेले होते. तोवर शेवाळकर संघ वा संघ परिवाराचे विरोधक नसले तरीही फार जवळ सुद्धा नव्हते. परंतु त्या भाषणाने त्यांना अधिक जवळ आणले होते.
दक्षिण भारतात, विशेषत: तामिळनाडूत संघाचे काम रोवण्यात सूर्यनारायण राव यांचे फार मोठे योगदान आहे. तामिळनाडूत ४० च्या दशकातच काम सुरु झाले होते तरीही ते रुजले नव्हते. अन्य प्रांतांच्या तुलनेत तामिळनाडू प्रांत संघाच्या कामात एकदम पिछाडीवर होता. कुख्यात आणीबाणीनंतर तेथील कामाने वेग घेतला. त्यासाठी एक घटना सांगता येईल. संघाच्या इतिहासात प्रथमच आणीबाणीनंतर सरसंघचालकांचे विजयादशमीचे भाषण आधी तयार करून देशभर एकाच वेळी पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानुसार ते भाषण `तुघलक'चे संपादक चो रामस्वामी यांच्याकडेही पोहोचवण्यात आले. त्यावर चो रामस्वामी यांचे म्हणणे पडले की, भाषण ठीक आहे. मात्र संघावर अनेक आरोप होत असतात, आक्षेप घेतले जातात त्यांना कोणी अधिकाऱ्याने सविस्तर उत्तरे दिली पाहिजेत. त्यानुसार त्यांनी आपल्या संपादक विभागातील सहकाऱ्यांना अनेक वृत्तपत्रे, नियतकालिके यातील संघविषयक बातम्या व लेखांचे अध्ययन करून चार पानांची एक प्रश्नावली तयार केली आणि सहकाऱ्यांना त्या प्रश्नावलीसह मद्रासच्या संघ कार्यालयात पाठवले. तेथे सूर्यनारायण राव यांनी त्या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली. हा सगळा मजकूर सुमारे ५१ पानांचा झाला. चो रामस्वामी यांनी त्याचे संपादन करून ती उत्तरे विस्तारपूर्वक `तुघलक'मध्ये छापली. परिणामी संघाचे काम सुरु करा, अशी मागणी करणारी ६०० पत्रे २० दिवसात संघाच्या मद्रास कार्यालयात आलीत. येथून संघाच्या कामाने तामिळनाडूत उचल घेतली.
महाराष्ट्राचे एक माजी राज्यपाल सी. सुब्रमण्यम यांचे काका स्वामी चिद्भवानंद यांचे अनेक आश्रम आणि मठ तामिळनाडूत आहेत. ते संघाचे कट्टर विरोधक होते. मात्र सूर्यनारायण राव यांनी एका कार्यक्रमासाठी त्यांना बोलावले. त्यांनी स्पष्ट नकार दिला. सूर्यनारायण राव मात्र त्यांच्या मागेच लागले. स्वामी चिद्भवानंद त्यांना म्हणाले- मी एका अटीवर येईन. मी वेळेचा आणि शिस्तीचा अतिशय भोक्ता आहे. तुमचा कार्यक्रम शिस्तशीर आणि वक्तशीर होणार असेल तरच मी येतो. सूर्यनारायण राव हो म्हणाले. स्वामीजी कार्यक्रमाला आलेत आणि तेथील शिस्तशीरपणा आणि वक्तशीरपणा यांनी इतके प्रभावित झाले की, तेथेच त्यांनी जाहीर केले की, राज्यभरातील त्यांचे मठ आणि आश्रम संघासाठी सदैव खुले राहतील. सूर्यनारायण राव यांनी तामिळनाडूत संघकार्यासाठी एक भक्कम आधार त्यांच्या रूपाने उभा केला होता.
रेशीमबागेत माझ्याशी झालेल्या बोलण्यात त्यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली होती. ते म्हणाले- ९० च्या दशकात संघ म्हातारा झाला अशी एक चर्चा संघात आणि संघाबाहेरही सुरु झाली होती. आम्हा कार्यकर्ता मंडळींच्या मनातही पुढील वाटचालीचा गंभीर विचार सुरूच होता. अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते वृद्ध होत होते. तेव्हा सरसंघचालक रज्जुभैय्या यांच्याशी हा विषय बोलावा असे ठरले. त्यावेळच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी विचारविनिमय केला आणि रज्जुभैय्यांना याबद्दल पत्र लिहिण्याचे ठरले. ते काम सूर्यनारायण राव यांच्यावर सोपवण्यात आले. त्यानुसार त्यांनी सगळ्यांच्या वतीने सरसंघचालकांना एक पत्र लिहून ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी पदावरून दूर व्हावे आणि तरुण कार्यकर्त्यांकडे जबाबदारी सोपवावी असा विषय मांडला. स्व. रज्जुभैय्या यांनी याला संमती दिली आणि आपणही वृद्ध झालो असल्याने आपणही निवृत्त होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतरचा इतिहास सगळ्यांना परिचित आहे.
सूर्यनारायण राव यांच्या रूपाने संघाच्या महत्वाच्या सात दशकांच्या इतिहासाचा साक्षीदार आणि संघाचा इतिहास घडवणारा एक शिल्पकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली.
- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, १९ नोव्हेंबर २०१६