रविवार, ६ जुलै, २०१४

चांगले, वाईट आणि मनाची शुद्धता

एक फार जुनी आणि प्रचलित गोष्ट आहे. श्रीकृष्ण एकदा युधिष्ठीर आणि दुर्योधन यांना एक काम सांगतात. युधिष्ठिराला सांगतात की, दिवसभर फिरून गावात किती दुर्जन लोक आहेत ते पाहा आणि मला सांगा. दुर्योधनाला सांगतात की, गावात दिवसभर फिरून किती सज्जन लोक आहेत ते पाहा आणि मला सांगा. दोघेही आपापल्या कामाला लागतात. संध्याकाळी परत येतात. श्रीकृष्ण विचारतात, सांगा तुम्हाला काय आढळले? युधिष्ठीर म्हणतात- गावात एकही दुर्जन व्यक्ती आढळली नाही. दुर्योधन म्हणतात- गावात एकही सज्जन व्यक्ती आढळली नाही.

एक बोधकथा म्हणून ही कथा सांगितली जाते आणि `दृष्टी तशी सृष्टी’ हा त्याचा बोध सांगितला जातो. आपली दृष्टी स्वच्छ, निर्मळ राहावी असा त्याचा निष्कर्ष. ही कथा वा त्याचा निष्कर्ष चूक आहे असे नाही. परंतु तो अपुरा आहे एवढे निश्चित. कारण आमची दृष्टी स्वच्छ व निर्मळ राहावी हे जेवढे खरे तेवढेच हेही खरे की, हे जग चांगल्या व वाईटाचे, सज्जनता व दुर्जनतेचे मिश्रण आहे. प्रत्येकाचा अनुभव हेच सांगतो. आम्हाला मात्र अनुभवाच्या त्या त्या क्षणी जग पूर्ण सज्जन वा पूर्ण दुर्जन वाटत असते. ही सज्जनता वा दुर्जनता अनुभव आल्यानंतर ठरवावयाची बाब आहे. त्याआधी काही निष्कर्ष काढता येत नाही. काही व्यक्ती वा घटना वारंवार घडतात, संपर्कात येतात, प्रत्ययाला येतात; तेव्हा पूर्वानुभवावरून काही ठोकताळे करता येतात. ते ठोकताळे करणे आणि त्यानुसार वागणे, काळजी घेणे आवश्यक असते.

कुठली तरी एकच बाजू घेणे चुकीचे असते. जगात फक्त दुर्जनच आहेत असे समजून सतत काळजी करत राहणे, शंकेखोरपणे वागणे, संशय घेत राहणे, अति सावधानता, त्यामुळे वृत्तीत- वागण्यात कटुता- रुक्षता- कडवटपणा- फटकळपणा- अंती आपलेच नुकसान करतात. दुसरीकडे जगात फक्त सज्जनच आहेत असे समजून वागल्यास त्याची मोठी किंमत पदोपदी मोजावी लागते. लुबाडणूक, फसवेगिरी, गृहीत धरले जाणे, डावलले जाणे, अपमान हे सारे वाट्याला येते. शिवाय आपल्याला कोणीही ठकवतात याचे जे दु:ख होते ते वेगळेच. म्हणूनच सज्जनता आणि दुर्जनता दोन्ही कळले पाहिजे, दोन्हीची जाण असली पाहिजे आणि त्या-त्या पद्धतीने वागता आले पाहिजे. सदा शंकेखोर किंवा सदा बिनधास्त दोन्ही चुकीचे. यालाच म्हणतात- चित्तशुद्धी.

अनेकदा चित्तशुद्धीचा अर्थ सज्जनता असा घेतला जातो. तो योग्य नाही. शुद्ध पाणी याचा अर्थ जे पाणी गढूळ नाही हा जसा आहे तसाच सरबत हे सुद्धा शुद्ध पाणी नाही. शुद्ध पाणी ते जे गढूळ करता येते किंवा ज्याचे सरबत बनवता येते. `पानी तेरा रंग कैसा, जिसमे मिलाया वैसा’ हे शुद्ध पाण्याचे लक्षण आहे. सज्जनता आणि दुर्जनता समजणारं आणि त्याच्याशी त्या-त्या पद्धतीने वागू शकणारं मन म्हणजे शुद्ध मन. मनाची ही शुद्धता प्राप्त करणं म्हणजे माणूस होणं. हात, पाय, कान, नाक, डोळे आहेत; भाषा बोलू शकतो; म्हणजे माणूस नाही. केवळ दुर्जनतेनी मन भरून टाकणं किंवा केवळ सज्जनतेनी मन भरून टाकणं; या दोन्ही विकृती. मनाच्या शुद्धतेनी साम्यावस्था प्राप्त करणे म्हणजे प्रकृती.

परंतु मनाची ही शुद्धता मिळवायची कशी? काही मने असतात जी म्हणतात- मला काहीही कळत नाही बुवा. काही मने म्हणतात- मला सारे काही कळते. काही लोकांना वाटते आपण फारच निरर्थक, दुबळे आणि अपूर्ण आहोत. काही लोकांना वाटते आपण सार्थक, सबळ आणि परिपूर्ण आहोत. आपल्याला कोणापासून काही शिकण्याची, समजून घेण्याची गरज नाही असे त्यांना वाटते. आपल्याला कोणी काही म्हणतो वा सांगतो याचाही त्यांना राग येतो, त्रास होतो. याउलट काही लोक सतत पडती भूमिका घेऊन वागतात. असे लोक जबाबदाऱ्या टाळतात, चालढकल करतात, सांगकामेपणा करतात. अशा लोकांचा कोणाला काही आधारही नसतो, उलट अनेकदा त्यांचा बोजाच होतो. फाजील आत्मविश्वास असणारे, अति अहंकारी; तसेच आत्मविश्वासहीन, व्यक्तित्वहीन असे बहुतांश पाहायला मिळतात. या दोघांचेही मन शुद्ध नसते.

मी स्वयमेव संपूर्ण नाही पण मी निरर्थक शून्यही नाही. मी अनेकांपेक्षा कमी आहे पण अनेकांपेक्षा अधिकही आहे. सगळ्याच गोष्टी मला कळत नाहीत पण अनेक गोष्टी मला कळतात. मला पुष्कळापासून पुष्कळ शिकण्यासारखे आहे आणि पुष्कळांना पुष्कळ शिकवण्यासारखेही माझ्याकडे आहे. आपल्या बलस्थानांची आणि आपल्या दुर्बलस्थानांची नीट, नेमकी जाण ही खरी गरज असते. ही जाण उत्पन्न होणे सततच्या प्रयत्नांनी शक्य होते. हे प्रयत्न स्वत:चे स्वत:च करायचे असतात. हा मानसिक, बौद्धिक व्यायाम आहे. अति आणि फाजील चर्चा, प्रश्नोत्तरे वगैरेपेक्षा आत्मपरीक्षण, आत्मविश्लेषण आणि प्रामाणिक प्रयत्न यासाठी आवश्यक. एखादी व्यक्ती असा मानसिक, बौद्धिक व्यायाम करते की नाही हे सांगावे लागत नाही. ते आपोआप कळते.

आपल्याला कोणापासून शिकण्यासारखे, ग्रहण करण्यासारखे आहे; त्यांच्यापासून शिकणे, ग्रहण करणे; कोणाचे बोलणे ऐकले पाहिजे ते ऐकणे, समजून घेणे; कोणाकडे दुर्लक्ष करायचे, कोणाचे बोलणे कानाआड करायचे, कोणाला टाळायचे वगैरे गोष्टी या मानसिक, बौद्धिक व्यायामाचा भाग होत. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. ही आहे प्रकृती. ही प्रकृती अशी का? चांगले आणि वाईट म्हणजे काय? हे दोन्ही कुठून येते? त्यांचे अंतिम गंतव्य कोणते? माझा त्यांचा संबंध काय? या आणि अशा प्रश्नांची सुरुवात म्हणजे संस्कृतीची सुरुवात. या प्रश्नांचा मागोवा घेतघेत अंतिम टोक गाठणे म्हणजे संस्कृतीची चरमसीमा. म्हणजेच सुसंस्कृततेचा आदर्श. युधिष्ठीर आणि दुर्योधन दोघेही निरनिराळ्या अंगाने विकृतीची उदाहरणे आहेत, तर श्रीकृष्ण हा सुसंस्कृततेचा सर्वोच्च आदर्श.

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, ६ जुलै २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा