मंगळवार, १७ मे, २०२२

अस्मिता

गावोगावी परतणाऱ्या मजुरांचा विषय सध्या सगळीकडे सुरू आहे. हा विषय ज्या प्रकारे समोर आला आहे त्यातले काही घटक असे...

- राजकारण करणे,

- मजुरांना चुकीची माहिती देणे,

- मजुरांना भडकवणे,

- व्यक्ती आणि समाजाचा मनोबौद्धिक स्तर फारच कमी असणे,

- धैर्य, शांतता, संयम, धीर; यासारख्या गुणांचा अभाव,

- फेडरल व्यवस्था,

- जबाबदारी, कर्तव्य, कोणी करायचं याचे वाद आणि अस्पष्टता,

- पुढचा अंदाज घेऊन निर्णय व कृती न करणे,

- मानवीयतेचा अभाव,

- अनैसर्गिक परिस्थितीत भोंगळ आदर्शवादीतेचा विक्षिप्तपणा,

- आपण पूर्ण आहोत हा प्रत्येकाचा आग्रह,

या सगळ्याच गोष्टी समाज म्हणून आपला पराभव अधोरेखित करणाऱ्या आहेत. पण आपल्याला तसे वाटते का?

जबाबदारी निश्चित करणे, शिक्षा करणे, न्याय मिळवणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, अन्यायाविरुद्ध दाद मागणे; अशा गोष्टींना इतकं अवास्तव महत्व आम्ही देऊ लागलो की; परस्पर विश्वास निर्माण करणे, आत्मियता जोपासणे, त्या आधारे समस्या सोडवणे, अडचणीतून मार्ग काढणे; या गोष्टी आम्ही विसरूनच गेलो आहोत. आमच्या विचार आणि व्यवहारातील जिवंतपणा नष्ट होऊन आम्ही passive जीवन जगतो आहोत. मुख्य म्हणजे याचं आग्रहाने आणि अभिनिवेशाने समर्थन करतो आहोत. तुमच्या माझ्या साध्या साध्या प्रतिक्रिया सुद्धा यात contribute करीत असतात. पण आम्हाला त्याची जाणीव असते का? Why we can't hold ourselves back?

आम्हाला आमच्या गट अस्मिता मोठ्या का वाटू लागल्या? त्या कमी कशा करता येतील? प्रश्न याची किंवा त्याची नाही. सगळ्यांच्याच अस्मिता कमी करण्याची गरज आहे. व्यक्तींच्या, गटांच्या, व्यवस्थांच्या, सरकारांच्या, व्यवसायांच्या; अगदी सगळ्यांच्या अस्मिता जीवनानुगामी करणे गरजेचे आहे. आपण समाज म्हणून, देश म्हणून, माणूस म्हणून एक आहोत; हे आपण उत्पन्न करू शकलो नाही. हे आपले सामूहिक अपयश आहे. हे कसे बदलेल?

- श्रीपाद कोठे

१८ मे २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा