बुधवार, २३ नोव्हेंबर, २०११

ब्रेक, वेग आणि नियंत्रण

लहानपणी सायकल शिकताना `ब्रेक हातात ठेवावा' हे वाक्य आपण किती तरी वेळा ऐकलेलं असतं. तसा तो ब्रेक हातात ठेवून सायकल शिकलेलीही असते. कालौघात ते सारे आपण विसरूनही जातो. `ब्रेक हातात ठेवावा' हे तत्व सत्य आहे आणि जीवनव्यापी आहे हे मात्र लक्षात येत नाही. आज सर्वत्र जे काही सुरू आहे, ऐकायला येते आहे, पाहायला मिळते आहे ते पाहिले की `ब्रेक हातात ठेवावा' हे तत्व वारंवार आठवते. विशेषत: अर्थकारणावरून आज जगभर जो हैदोस सुरू आहे तो पाहिला की, हे तत्व जीवनव्यापी सूत्र म्हणून पटू लागते.

१९१७ साली रशियात सुरू झालेला कम्युनिझमचा प्रवास ग्लासनोस्त, पेरेस्रोइकाच्या खडकावर आपटून फुटला आणि अमेरिकेत व्याप्त अर्थप्रधान, व्यक्तिवादी कल्पना जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण यांच्या माध्यमातून जगभर पसरल्या. त्यांचा जोर आणि प्रभाव एवढा होता की, कम्युनिझमचा आणखीन एक गढ असलेला चीनदेखील जुनी खोळ टाकून नव्याने वाटचाल करू लागला. चीनमध्येही कम्युनिझमचे थडगे बांधले गेले. तेव्हापासून अमेरिकन भांडवलशाहीचा रथ चौखूर उधळला. भांडवलशाहीच्या या tytanic ला २००८ साली मोट्ठे छिद्र पडले आणि त्यात पाणी घुसायला लागले. हे अवाढव्य tytanic आता कधी बुडेल याचा काहीही भरवसा राहिलेला नाही.

बुडणार्या जहाजाच्या बावरलेल्या कप्तानासारखे सारे तज्ञ, धोरणकर्ते बावरुन इकडे तिकडे धावाधाव करत आहेत. हाती काहीही लागत नाही, मार्ग सापडत नाही, जहाजातील पाणी कितीही काढले तरीही काही उपयोग होत नाही. देशचे देश बुडू लागले आहेत. package देण्यासाठी अवास्तव नोटा छापल्याने मुद्रास्फीति आणि महागाई वाढली. देशोदेशीच्या केंद्रीय बैंक्सनी योजलेले उपाय पालापाचोळ्यासारखे उडून गेले. गमतीचा भाग म्हणजे अजूनही तथाकथित अर्थतज्ञ आर्थिक सुधारणा वगैरे वेडपट गोष्टीच करीत आहेत. ज्या विकसित वगैरे देशांनी कथित आर्थिक सुधारणा वगैरे केल्या ते देश दिवाळखोरीत निघत आहेत हे सुद्धा कोणी लक्षात घेत नाही. आजुबाजूला घडणार्या गोष्टी मनापर्यंत, बुद्धीपर्यंत पोहोचत सुद्धा नाहीत एवढी हतबुद्धता, भाम्बावलेपण सारीकडे पसरले आहे.
कम्युनिझमने गाडीचे ब्रेक एवढे दाबून ठेवले होते की, गाडी पुढेच सरकत नव्हती आणि भांडवलशाहीच्या गाडीला तर ब्रेकच नाहीत. तिचा वेगही सुसाट आहे. आता या गाडीचे भवितव्य काय हे सांगायला कोणा ज्योतिष्याची गरज नाही. क़पाळमोक्ष ठरलेलाच आहे. पाहायचे फक्त एवढेच आहे की, या भीषण अपघातातून कोण वाचते आणि कोणाकोणाची आहुती पडते. जखमी तर बहुतेक सार्यांनाच व्हावे लागेल. गाडीला ब्रेक अत्यावश्यक असतो आणि योग्य वेळी तो वापरायचाही असतो; हा सुवर्णमध्य, हा व्यवहार, हे त्रिकालाबाधित सत्य कम्युनिझम आणि भांडवलशाही या दोन्हीने नजरेआड केले.

परंतु ब्रेक आणि त्याचा योग्य वापर हे सत्य प्रत्यक्षात येण्यासाठी एक आणखीन गोष्ट अत्यावश्यक असते आणि ती म्हणजे, `नियंत्रण'. हे नियंत्रण असते मनाचे, विचारांचे. नियंत्रण कधीही बाह्य असू शकत नाही. गाडीचा वेग वाढू लागला की, मन सांगते वेग कमी कर आणि आपण ब्रेक लावतो. वळण आले की मन सांगते, वेग कमी कर, अमुक दिशेला गाडी वळव आणि मग तशी कृती केली जाते. मानवी सभ्यतेने आज हे नियंत्रणच गमावले आहे. अर्थकारणापुरते बोलायचे तर, हे संपूर्ण अर्थकारण पैसा मिळवण्याचे अर्थकारण आहे. ही दिशाच चुकीची आहे. ही दिशा वळवून अर्थकारणाचे तोंड माणसाचे सुख, समाधान, शांती, सुरक्षा, सुव्यवस्था, सहजीवन याकडे वळवले जात नाही तोवर आपल्या नशिबी केवळ जंगलात भटकणेच राहील.

-श्रीपाद कोठे, नागपूर
मंगळवार, २२ नोव्हेंबर २०११

1 टिप्पणी:

  1. हीच तर गंमत आहे ना श्रीपाद... इतकं सुस्साट सूटायचं की रस्तेही संपतील... आणि मग जेव्हा रस्ते संपतील तेव्हा सारं ठप्प.. आणि तेव्हा अर्थमंत्री अकरा-बारा-तेरा अशी काय ती सांख्यिक कारणं देतील .. माझ्या मतानूसार एकच उपाय आहे ह्या साऱ्याला आणि तो म्हणजे..
    "Back to Basics"...!!

    उत्तर द्याहटवा