गुरुवार, ११ ऑक्टोबर, २०१८

स्वयंसेवक

(विजयादशमी... रा. स्व. संघाचा स्थापना दिवस... त्यानिमित्त...)
स्वयंसेवक
स्वयंसेवक !! मराठीतला एक साधा शब्द. पण आज त्या शब्दाला एक वेगळा अर्थ आणि वलय प्राप्त झालं आहे. स्वयंसेवक म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाच, असं एक समीकरण ठरून गेलं आहे. वास्तविक हा शब्द काही संघाने coin केलेला नाही. तयारही केलेला नाही किंवा त्यावर त्याचा स्वामित्व हक्कही नाही. तरीही संघ आणि स्वयंसेवक यांचे एक साहचर्य निर्माण झाले आहे. समाजात अशी उदाहरणे विरळाच असतात. डॉ. हेडगेवार यांनी रा. स्व. संघाची स्थापना केली तेव्हा एक वचन वऱ्हाड, विदर्भात प्रचलित होते. `ना बाप का डर, ना मां का डर; बेटा बन गया व्होलन्तिअर’. या वचनाचा उल्लेख करून डॉ. हेडगेवार सांगत की, संघात आपण केवळ volunteer चं भाषांतर करून स्वयंसेवक शब्द योजलेला नाही. राजकीय पक्ष ज्या अर्थाने छोटीमोठी पडेल ती कामे करणाऱ्या तरुणांसाठी स्वयंसेवक शब्द वापरतात तसा आपण वापरत नाही. स्वयंप्रेरणेने राष्ट्राची सेवा करणारे ते स्वयंसेवक हा अर्थ संघाला अभिप्रेत आहे, ही त्यांची स्पष्ट धारणा होती. कालौघात त्यांची धारणा आणि त्यांनी योजलेला शब्द समानार्थी होऊन समाजात प्रतिष्ठीत आणि स्थिर झाले आहेत.
कोण असतो हा स्वयंसेवक? कसा असतो? काय करतो? स्वयंसेवक होणे म्हणजे काय? काय असते त्याची पद्धत? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे खूप सोपी आहेत किंवा कठीणही. ज्याच्या त्याच्या मनोभावानुसार. रा. स्व. संघाच्या शाखेत एकदा एखादी पुरुष व्यक्ती आली की ती व्यक्ती संघाचा स्वयंसेवक होऊन जाते. शाखेत येऊन तुम्ही ध्वजाला प्रणाम केला की तुम्ही झाले स्वयंसेवक. त्यासाठी दुसरे काहीही करावे लागत नाही. हां, संघाच्या अगदी सुरुवातीच्या काळात, म्हणजे संघ स्थापनेनंतर ४-५ वर्षे थोडी वेगळी पद्धत होती. ज्याला स्वयंसेवक करून घ्यायचे त्याला डॉ. हेडगेवार यांना भेटावे लागत असे. डॉक्टर त्याच्याशी वैयक्तिक माहिती, सामाजिक स्थिती वगैरेबाबत बोलत आणि मग ती व्यक्ती स्वयंसेवक होत असे. अर्थात त्याही वेळी स्वयंसेवक होणे म्हणजे शाखेत येणे, अशीच पद्धत आणि असाच अर्थ होता. स्वयंसेवक याचा अर्थ संघाचा सदस्य. परंतु या सदस्याची नोंदणी, प्रवेश शुल्क, वार्षिक वा आजीवन शुल्क, हजेरीपट वगैरे काहीही नसते. वेगवेगळ्या कार्यक्रमांचे निरोप देणे, शिबीर आदींची माहिती देणे यासाठी शाखेचे मुख्य शिक्षक, कार्यवाह, गणशिक्षक, गटनायक यांच्याकडे स्वयंसेवकांची म्हणजे शाखेत आलेल्यांची एखादी यादी असते. पण ती कुठे सादर वगैरे करावी लागत नाही. त्याचे रजिस्टर नसते. कार्यकर्ता बदलला की तो जुनी यादी मागून घेतो किंवा स्वत:ची नवीन यादी तयार करतो. ज्याला जशी नावे आठवतील तशी यादी तयार होते. ही यादी कमी जास्त होत असते. कधी कोणी सुटून जातात, तर कधी अमुक स्वयंसेवक असावा असं वाटून नाव जोडलं जातं. निरोप देणे, माहिती देणे, संपर्क याहून अधिक या यादीचा उपयोग नसतो. काही विशिष्ट अशा स्वयंसेवक याद्याही असतात. जसे संघ शिक्षा वर्गाचे तृतीय वर्षाचे शिक्षण पूर्ण केलेल्या स्वयंसेवकांची यादी किंवा शारीरिक विभागाची, बौद्धिक विभागाची, विविध व्यावसायिक गटांची अशाही याद्या असतात. या विभागांच्या विशेष कार्यक्रमांची, अभ्यासवर्गांची माहिती देणे, निरोप देणे यासाठी. ही झाली स्वयंसेवकांची नोंद.
स्वयंसेवक होण्यासाठी जशी कोणती विशेष पद्धत नाही, तशीच किमान गुणवत्ताही नाही. यच्चयावत कोणतीही पुरुष व्यक्ती संघाची स्वयंसेवक होऊ शकते. वय, जात, प्रांत, भाषा, व्यवसाय, शिक्षण काहीही असो वा नसो. ओळखीने, बोलावण्याने किंवा उत्सुकतेने तुम्ही शाखेत आलात; उत्सवाला आलात; भगव्या ध्वजाला प्रणाम केलात की तुम्ही स्वयंसेवक झालात. या स्वयंसेवकांवर कोणते बंधनही नसते. रोज शाखेत आलेच पाहिजे ही अपेक्षा असली तरीही त्यासाठी जबरदस्ती नसते वा ते बंधनकारक नसते. तुम्ही एकदा आलेत म्हणजे तुम्ही जन्मभराचे स्वयंसेवक. पुन्हा कधी शाखेत आले नाहीत तरीही. एखाद्याने स्वत:ला स्वयंसेवक म्हणवून घेणे थांबवले तरीही संघाच्या दृष्टीने तो स्वयंसेवक राहतो. शाखेत असताना किंवा उत्सवात असताना तेथील अनुशासन पाळावे ही स्वाभाविक अपेक्षा असते. अन अनुशासन मोडण्यासारखे काही कारण राहत नसल्याने, तसेच वरिष्ठ अधिकारीही अनुशासन पाळत असल्याने नवीन वा जुना स्वयंसेवक स्वाभाविक, सहजपणे अनुशासन पाळतो. कधी एखादा अप्रिय प्रसंग घडला आणि अनुशासन नाही पाळले वा अनुशासन मोडून, रागावून कोणी निघून गेला तरीही; त्याच्या स्वयंसेवक असण्यात काहीही बाधा येत नाही. तो स्वयंसेवक राहतोच. प्रत्येक स्वयंसेवक रोज शाखेत येतोच असे नाही आणि तो प्रत्येक उत्सवाला किंवा कार्यक्रमाला येतोच असेही नाही. शाखा चालत राहते, उत्सव वा अन्य कार्यक्रम होत राहतात; निरोप कमीअधिक दिले जातात; स्वयंसेवक कधी उपस्थित राहतात, कधी राहत नाहीत. सगळा राजीखुशीचा मामला. स्वयंसेवकत्व मात्र अढळ राहते.
एखादी व्यक्ती स्वयंसेवक झाली की त्याचा काय फायदा? त्याला काय मिळतं? स्वयंसेवकाला काहीही मिळत नाही, त्याचा काहीही फायदा नाही. काहीही म्हणजे अक्षरशः काहीही मिळत नाही. यावर विश्वास ठेवणे सामान्यपणे जड जाते. पण जे जे शाखेत गेले आहेत त्यांना हे माहिती आहे. अन हे माहिती असणे अनुभूत असल्याने जगातील कोणीही काही सांगितले तरीही त्यावर कोणाचा विश्वास बसत नाही. जे अनेक स्वयंसेवक नाराज होऊन संघात जाणे बंद करतात, संघाशी संबंध ठेवत नाहीत तेदेखील या मुद्यावर सहमत असतात. जसे स्वयंसेवक झाल्यावर मिळत काहीच नाही तसाच त्याचा फायदाही काही नसतो. हां, अनेक माणसांशी संपर्क येतो त्यामुळे कुठे एखादी नोकरी, कुठे शाळा महाविद्यालयात प्रवेश होऊन जाते, सुकर होते. पण स्वयंसेवक असल्यामुळे नोकरी मिळते, प्रवेश मिळतो; असे नसते. पुष्कळदा अशी अपेक्षा ठेवून येणाऱ्या लोकांची निराशाही होते. परंतु संघ अशी अपेक्षा निर्माण करत नाही, होऊ देत नाही आणि पूर्णही करत नाही. हां, व्यक्तिगत संपर्कातून, संबंधातून जे काही फायदे (??) होत असतील, तो भाग वेगळा. याउलट तोटा मानले तर, स्वयंसेवक होण्याचे तोटेच असतात. शाखेत वा कार्यक्रमात जायचे म्हणजे वेळ द्यावा लागतो. लहान वा मोठी जबाबदारी घेणाऱ्या स्वयंसेवकाला तर जास्तच वेळ द्यावा लागतो. जबाबदारी मोठी म्हणजे वेळही जास्त देणे. आपण संघासाठी, संघकार्यासाठी अधिक वेळ दिला पाहिजे; हा एक आग्रहाचा, चिंतनाचा, बौद्धिक वर्गाचा, सततच्या पाठपुराव्याचा विषय असतो; इतके वेळ देणे महत्वाचे असते.
ज्याप्रमाणे वेळ खर्च करावा लागतो त्याचप्रमाणे पैसाही पदरचा खर्च करावा लागतो. संघाचा खर्च चालवण्यासाठी संघाने गुरुदक्षिणा नावाची जी पद्धत रूढ केली आहे त्यात दक्षिणा समर्पण हा तर भाग असतोच, पण गणवेशात कार्यक्रम असेल तर स्वत:चा गणवेश स्वत:च खर्च करून तयार करावा लागतो. एनसीसी, पोलीस किंवा लष्कराप्रमाणे स्वयंसेवकांना गणवेश मिळत नाही. शिबीर, निवासी वर्ग, संघ शिक्षा वर्ग यांचाही खर्च शुल्क रुपात करावा लागतो. जाणेयेणे तर स्वत:च्या पैशाने करावेच लागते. नैमित्तिक अशा स्वरुपाची मदत गोळा केली जाते तेव्हा त्यातही धन रूपाने योगदान देणे स्वयंसेवकाकडून अपेक्षित असते. जसे नैसर्गिक आपत्ती, वनवासी कल्याण आश्रमासाठी निधी संकलन, ज्या ठिकाणी इमारत बांधकाम आदी असेल तेथे त्यासाठी निधी देणे; हे सुरूच असते. अर्थात सगळेच स्वयंसेवक नेहमीच असा खर्च करतात, योगदान देत असतात असेही नाही. जशी वेळ असेल, जशी परिस्थिती असेल, जशी गरज असेल त्याप्रमाणे.
सुरुवातीच्या काळात तर कार्यक्रमांची आणि शिबिरे आदींची सगळी व्यवस्था स्वयंसेवक स्वत:च करीत असत. राहुट्या उभारणे किंवा मंडप उभारणे यासारखी कामेही करत. मैदानाचे रेखांकन सुद्धा स्वयंसेवक करतात. प्रांत वा अखिल भारतीय बैठकी, प्रतिनिधी सभा यासाठीच्या व्यवस्था स्वयंसेवक उभारतात. हे सगळे विनामोबदला. सुट्या घ्याव्या लागल्या तर सुट्या घेऊन. व्यवसाय बाजूस ठेवावा लागला तर बाजूस ठेवून. डॉक्टर हेडगेवार तर शाखेच्या मैदानाची झाडझूड, मैदानावर पाणी टाकणे ही कामेही स्वयंसेवकांना सोबत घेऊन करीत असत. जेथे शाखेच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली नसेल, त्यासाठी कोणी उपलब्ध नसेल तर सामान्य स्वयंसेवकच शाखा लावत असतो. प्रचारक वा प्रणामाचा अधिकार नसलेले अधिकारी शाखेत आले तर तो सामान्य स्वयंसेवकच प्रणाम घेतो. त्याला वेगळे काही करावे लागत नाही. कारण रचना हा गौण भाग असून कार्य महत्वाचे. स्वयंसेवक हाच संघवाहक असतो.
स्वयंसेवक म्हणून काही फायदा नसला तरीही व्यक्तीला काहीच मिळत नाही असे नाही. सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्याला एक ओळख मिळते. ज्या ठिकाणी शाखा असेल आणि सगळ्या प्रकारचे स्वयंसेवक येतात त्या ठिकाणी एखादा सामान्य व्यवसाय करणारा, निम्न प्रकारची नोकरी करणारा स्वयंसेवक डॉक्टर, वकील, प्राध्यापक अशा प्रतिष्ठीत व्यक्तींशी सहज बोलू शकतो. त्यांच्या घरी जाऊ शकतो. आपण शाखा या विशेष गटाचे एक सदस्य आहोत ही ओळख त्याला मिळते. सूर्यनमस्कार, आसने, योगचाप, छोटेछोटे खेळ शिकायला मिळतात. शारीरिक स्वास्थ्य बिनापैसा प्राप्त होते. कथा, परंपरा- संस्कृती यांची माहिती; समाज, देश, परिस्थिती यांची माहिती मिळते, विचार ऐकण्याची, विचार करण्याची सवय लागते, ठरवून काम करण्याची सवय लागते. असे काही लाभ होत असले तरीही गवगवा होत नाही. तुम्ही एखादा कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित केला, पार पाडला तरीही कौतुक होत नाही. टाळ्या मिळत नाहीत. छान गीत म्हटलं, चांगली कथा सांगितली किंवा उत्तम भाषण दिलं तरीही पुरस्कार मिळत नाही. ज्यांना तशी अपेक्षा असते ते स्वाभाविकच निराश वा नाराज होतात, पण खूप चांगली व दर्जेदार गुणसंपदा असलेले लोकही स्वयंसेवक म्हणून कसलीही अपेक्षा न ठेवता, लक्षातही येणार नाही अशा पद्धतीने वावरत असतात.
जे स्वयंसेवक शाखेत रमतात, ज्यांना गोडी लागते, स्वआग्रहाने नियमित येतात, सहभागी होतात, लहानमोठी कामे मनापासून करतात त्यांच्यावर गणशिक्षक, मुख्यशिक्षक, कार्यवाह अशा जबाबदाऱ्या सोपवल्या जातात. याच पद्धतीने अखिल भारतीय स्तरापर्यंत पदाधिकारी निवडले जातात. व्यक्तीची संघकार्यातील सक्रियता पाहून त्याला प्रतिज्ञा दिली जाते. प्रतिज्ञा घेतलेल्या स्वयंसेवकाची सक्रियता पाहून त्याला संघ शिक्षा वर्गाच्या प्रशिक्षणाला जाण्याची अनुमती मिळते. एकूण स्वयंसेवकांच्या तुलनेत प्रतिज्ञा घेतलेल्या स्वयंसेवकांची संख्या कमी असते, तर संघ शिक्षा वर्गाचे प्रशिक्षण घेणाऱ्या स्वयंसेवकांची संख्या त्याहूनही कमी असते. संघाचे काम करण्यासाठी किंवा जबाबदारी देण्यासाठी प्रतिज्ञा किंवा प्रशिक्षण आवश्यक भाग नसतो. अगदी संघचालक पदावरील व्यक्तीचेही संघ शिक्षा वर्गाचे प्रशिक्षण झालेले असेलच असे नसते. या सगळ्याचे set rules नाहीत. अन म्हणूनच कदाचित गेली ९३ वर्षे संघाचं काम सुखेनैव सुरु आहे. नियमांचे जंजाळ कार्यात अडथळेच अधिक आणत असते. संघाने हे जंजाळ टाळले आहे. रचना उभी करण्यासाठी काही नियम, काही पद्धत आवश्यक असते. त्याला तेवढेच महत्व देऊन, अधिक महत्व न देता, काम करणे ही संघाची पद्धत आहे. त्यामुळेच एखादा स्वयंसेवक प्रतिज्ञा न घेतलेला, प्रशिक्षण न घेतलेला असेल तरीही त्याने दक्ष अशी आज्ञा दिली की सगळे दक्ष होतात.
स्वयंसेवक झाल्याने किंवा स्वयंसेवक म्हणून सक्रीय झाल्याने जशी शाबासकी मिळत नाही, तसेच स्वयंसेवकाने संघाशी संबंध ठेवले नाहीत म्हणून किंवा संघाला प्रतिकूल कृती केली म्हणून शिक्षाही मिळत नाही. येण्यासाठी पायघड्या नाहीत आणि निघून गेले तर लाखोळी नाही. नागपूरच्या एका विजयादशमी उत्सवाला तर कुठल्याशा एका मुद्यावरून साधारण डझनभर स्वयंसेवक पूर्ण गणवेशात दंडाला काळ्या फिती बांधून निषेध म्हणून, मुख्य कार्यक्रम मैदानाच्या बाजूला पूर्ण वेळ बसले होते. त्यावेळी स्व. रज्जुभैय्या सरसंघचालक होते. पण त्यांच्यावर कुठली कारवाई वगैरे झाली नाही. व्यक्तिगत रीतीनेही स्वयंसेवक नाराज वगैरे होतात. काही काळ बाहेर जातात. बाहेर गेलेले पुन्हा सक्रीय सुद्धा होतात. तिसरे सरसंघचालक स्व. बाळासाहेब देवरस हे याचे मोठे उदाहरण आहे. काही स्वयंसेवक काही काळ सक्रीय असतात मग कंटाळा येऊन, कौटुंबिक अडचणींमुळे, व्यावसायिक अडचणींमुळे, प्रकृती अस्वास्थ्यामुळे निष्क्रियही होतात. काही कोणतेही कारण नसतानाही निष्क्रिय होतात. एखादे काम सातत्याने करण्याचीही प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असते. कोणी कोणी एकदा संघात आला की अगदी अखेरच्या श्वासापर्यंत निष्ठाही बाळगतो, सक्रियही असतो. असे अखेरच्या श्वासापर्यंत सक्रीय राहणारे केवळ प्रचारक असतात असे नाही तर अनेक गृहस्थ स्वयंसेवक देखील असतात. सगळेच असे राहू शकतील असे संघालाही वाटत नाही. संघ हे माणसांचे काम आहे. अनाग्रहाचे काम आहे. यामुळेच स्वयंसेवक होण्यापासून तर त्याने आयुष्यभर आपले स्वयंसेवकत्व सांभाळण्यापर्यंत सगळ्या गोष्टींकडे संघ पुरेशा स्वाभाविकपणे पाहतो. काही अपवाद असतात. ते सगळीकडे, सगळ्याच बाबतीत असतात.
स्वयंसेवकाने समाजाविषयी, देशाविषयी, मूल्यांविषयी कृतज्ञतेची आणि बांधिलकीची भावना ठेवावी; त्यानुसार जीवन जगावे; अन प्रत्यक्ष संघाच्या कामातून, संघप्रेरणेने चालणाऱ्या कामातून किंवा संघाशी संबंध नसलेल्या कामातून किंवा व्यक्तिगत रीतीने हा समाज चांगला, सुव्यवस्थित राहावा यासाठी योगदान देत राहावे; एवढी संघाची अपेक्षा असते. तसे सांगणे अन शिकवणेही असते. संघाची ही अपेक्षा पूर्ण करणारे स्वयंसेवक असतात तसेच ही अपेक्षा पूर्ण न करणारे किंवा विपरीत वागणारे स्वयंसेवकही असतात. चांगल्या स्वयंसेवकांमुळे संघाला प्रतिष्ठा मिळते, समाजाचा फायदा होतो; विपरीत वागणाऱ्या स्वयंसेवकांमुळे संघाला दोष लागतो, समाजाचा तोटा होतो. संघ या गोष्टीकडेही सहज प्रक्रिया म्हणून पाहतो. संघाचे आग्रह कायम राहतात. पद्धत कायम राहते. प्रत्येक जण स्वयंसेवक आहे ही भावना कायम राहते. संघाने स्वयंसेवकाच्या जीवनाचे नियंत्रण करावे. त्याला चांगले वागायला भाग पाडावे. त्याच्या बऱ्यावाईट कृत्यांची जबाबदारी घ्यावी; अशी समाजाची अपेक्षा असते. संघ मात्र सुरुवातीपासूनच अशा नियंत्रणाचा विचार बाजूस सारत आला आहे. व्यक्तीचे किंवा समाजाचे असे नियंत्रण करणे शक्यही नसते आणि योग्यही नसते. परंतु चांगल्या प्रेरणा जागवणे, भाव रुजवणे, प्रबोधन करणे हे संघटनेचे काम. त्यातून आपापल्या मगदुराप्रमाणे ग्रहण करून स्वयंसेवक जगतात, वागतात. त्यांच्या क्षमतेप्रमाणे हा प्रवाह वाहत राहतो. वाढत राहतो. काही भोवरेही तयार होतात. तेही स्वयंसेवकांमुळेच. स्वयंसेवकत्वाचे आदर्शही समाजाने पाहिले, अनुभवले आहेत; अन स्वयंसेवकत्वाला काळिमा फासणारी उदाहरणेही समाजाने पाहिली, अनुभवली आहेत. संघ मात्र सगळ्यांना स्वयंसेवक मानून प्रेरणा जागवण्याचे काम करत राहतो. संघासाठी जे भगव्या ध्वजाला प्रणाम करून गेले आहेत ते तर स्वयंसेवक असतातच, पण जे अजून आलेले नाहीत तेही भावी स्वयंसेवक असतात. संपूर्ण समाज स्वयंसेवक - स्वयंप्रेरणेने राष्ट्राची सेवा करणारी व्यक्ती – व्हावा ही संघाची मनीषा आहे.
- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, ११ ऑक्टोबर २०१८