सोमवार, २६ मे, २०१४

`वाटा' संस्कृती थांबायला हवी

अतिशय साध्या गोष्टी खूप गुंतागुंतीच्या करणे हे माणसाचे वैशिष्ट्य म्हटले पाहिजे. त्यात धूर्त कोल्हयांनी काही खेळी खेळली तर विचारायलाच नको. आमच्या देशात इंग्रज नावाचा एक धूर्त कोल्हा सुमारे १५० वर्षे राहिला आणि त्याने अशाच अनेक गोष्टी विनाकारण आमच्या मागे लावून दिल्या. सध्याच्या वातावरणाच्या आणि चर्चांच्या पार्श्वभूमीवर हे ठळकपणे जाणवते. `वाटा' संस्कृती ही त्याचाच भाग म्हणायला हवी.

भारतीय जनता पक्षाने फक्त ७ मुसलमानांना तिकीट दिल्या आणि त्यातील एकही व्यक्ती निवडून आली नाही; या विषयावर सध्या `विद्वान'(!!!) मंडळींची चर्चा सुरु आहे. त्यावर बराच उहापोह सुद्धा सुरु आहे. अगदी मुस्लिम लोकच त्याला उत्तरे देत आहेत. यानिमित्ताने एक मुलभूत गोष्ट समजून घ्यायला हवी ती म्हणजे, सत्तेतील वाटा हा चांगल्या जगण्याची हमी नसतो. तसेच भले होण्यासाठी, समस्या सोडविण्यासाठी त्यात सहभाग असलाच पाहिजे हा सिद्धांतच चुकीचा आहे. एखाद्या गर्भवतीची सुटका करण्यासाठी दुसरी साधी बाईच लागते. एक गर्भवती दुसऱ्या गर्भवतीची सुटका नाही करू शकत. सुटका करणाऱ्या बाईला कळा येण्याची गरज नसते, तिला कळा येउन उपयोग नसतो. तिच्याकडे कौशल्य, आस्था आणि तळमळ असले म्हणजे झाले. ते नसेल तर काहीही उपयोग नाही. अन्य सगळ्या रोगांचेही असेच. कर्करोगावर उपचार करायला डॉक्टरला कर्करोग होण्याची गरज नाही. किंबहुना कर्करोगापासून मुक्त डॉक्टरच योग्य उपचार करू शकेल. इंग्रज नावाच्या धूर्त कोल्ह्याने मात्र आमच्या मनावर बिंबविले की, तुमचे भले व्हायचे असेल तर तुमचे प्रतिनिधी आवश्यक आहेत.

बरे या धोरणानुसार जे निर्णय झाले त्याचा अनुभव काय दाखवतो? पाकिस्तान निर्माण करून एक प्रकारे १०० टक्के सत्ता मुसलमानांच्या हाती देण्यात आली. झाले का मुसलमानांचे भले? दलितांच्या नावाने अनेक दलित मंत्री, मुख्यमंत्री, राष्ट्रपती वगैरे झालेत. झाले का दलितांचे भले? आता या चर्चेत महिलांचीही भर पडली आहे. इंदिरा गांधी महिला पंतप्रधान होत्या, मायावती, जयललिता, ममता मुख्यमंत्री आहेत. झाले का महिलांचे भले? सुटले का त्यांचे प्रश्न? प्रश्न आणि समस्या सुटायला प्रतिनिधित्व हा पर्याय नाही. त्यासाठी कौशल्य, सहृदयता आणि तळमळ आवश्यक आहे. त्यातही प्रतिनिधित्वाचा अर्थ ज्यावेळी वाटेकरी असा होतो त्यावेळी तर गुंतागुंत अधिकच वाढते.

आज ही वाट्याची चर्चा बटबटीतपणे ऐकायला, पाहायला मिळते. अगदी पंतप्रधान स्तरापर्यंत हे पाहायला मिळते. म्हणूनच डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांनी जाहीर विधान केले होते की, या देशातील संसाधनांवर पहिला अधिकार अल्पसंख्यकांचा आहे. हा देश, इथली संसाधने, इथल्या नोकऱ्या वगैरे म्हणजे काय लोण्याचा गोळा आहे? कोणी अधिक बळकवायचा याची चढाओढ लावायला? यातूनच मग वेडपटासारखी विचारणा सरकार करते की, सैन्यात मुसलमान किती आहेत? सुदैवाने सैन्याधिकाऱ्यांचे तारतम्य जाग्यावर असल्याने त्यांनी कळवले की, सैन्यात सगळे फक्त सैनिक आहेत. जे आपल्या या मातृभूमीसाठी तळहातावर शीर घेऊन सज्ज असतात.

जाती जमातींच्या बाबतीतही असेच असते. गेली शे-दीडशे वर्षे आपल्या जातीव्यवस्था आणि एकूणच समाजव्यवस्था याबद्दल खूप बोलले गेले. त्यातील तथ्यांश फार थोडा आहे. मुळात अस्पृश्यतेसारखी अयोग्य आणि अन्याय्य प्रथा ही मोठी आणि खरी समस्या होती. त्याची जातीव्यवस्थेशी सरमिसळ करून गोंधळ माजवण्यात आला. अमक्याने तमक्यावर अन्याय केला किंवा चांगली वागणूक दिली नाही वगैरेचा जातीच काय अन्य कोणत्याही व्यवस्थेशी काहीही संबंध नाही. ती समस्या मानवी गुणावगुणांशी संबंधित आहे. अमुक व्यवसायात अमुक जातीचा सहभाग किती आहे, सरकारी नोकरीत कोण किती आहेत, राजकारणात किती आहेत वगैरे वेडपटपणा करण्याला काही सीमाच नाही.

ही सगळी चर्चा करताना एका गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाते की आज जी काही सामाजिक, आर्थिक, राजकीय व्यवस्था आहे; उत्पादन- वितरण- उपभोगाची साधने आणि पद्धती आहेत; ते अगदी अलीकडील आहे आणि त्यात थोड्या थोड्या काळाने फरक पडतो आहे. त्याचे संदर्भ बदलत आहेत. इंग्रज येथे आले, त्यांनी त्यांची शिक्षण पद्धती आणि अन्य गोष्टी इथे आणल्या; त्यानंतर पहिला बळी गेला तो ब्राम्हणांचा. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिला. त्यामुळे स्वाभाविकच ते प्रथम आणि जोरकसपणे इंग्रजी शिक्षण आणि नवीन नोकऱ्या व व्यवसायांकडे वळले. कारण प्रश्न पोटापाण्याचा होता. कोणावर अन्याय करणे, बळकावणे वगैरे भाग त्यात नव्हते. लोहार, कुंभार, चांभार, न्हावी, सुतार, अशा अनेक अन्य लोकांना इंग्रज आले म्हणून काही फरक पडला नाही. शेती असलेल्यांना एकदम पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला नाही. त्यामुळे स्वाभाविकच ते नवीन शिक्षणवळण यापासून काहीसे दूर राहिले. अर्थात नव्या काळाची चाहूल घेणाऱ्या त्या त्या समाजातील नेत्यांनी नवीन वाटचाल सुरु केली होती. नवीन व्यवसायात, शिक्षण पद्धतीत जसजसा विकास होत गेला तसतशी गुंतागुंत वाढली.

भरीसभर जगाचा वेग इतका वाढला की, जुन्या व्यवस्थेतून नवीन व्यवस्थेत संक्रमण नीट, पुरेसे झाले नाही आणि स्थिरपद झाले नाही. स्थैर्य ही गोष्ट तर मानव समाज विसरूनच जाईल की काय अशी स्थिती आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर विचार करायला हवा. अमक्या नोकरीत कोण किती आहेत आणि तमक्या नोकरीत कोण किती आहेत याने काय फरक पडतो. दुधाच्या व्यवसायात कोण किती संख्येने आहेत यापेक्षा दुधाचे अधिक आणि भेसळमुक्त उत्पादन करून सगळ्यांना ते मिळेल अशी व्यवस्था करणे, त्यासाठी आवश्यक असे मनुष्यबळ उभे करणे हाच मार्ग असायला हवा. ज्यावेळी जाती व्यवस्था होती ते एक प्रकारचे आरक्षणच तर होते. अमुक एखाद्या व्यवसायात दुसऱ्या जातीचे किती लोक आहेत असा प्रश्न तेथे उपस्थित होऊच शकत नव्हता कारण व्यवसाय म्हणजेच जाती होत्या. कुंभाराच्या व्यवसायात फक्त कुंभारच होते पण तेच संपूर्ण समाजाची गरज पूर्ण करीत असत. कुंभार व्यवसायात सुतारांचा प्रतिनिधी नाही म्हणून त्यांना गाडगी मडकी नाहीत, असा प्रकार नव्हता.

आणखीन एका गोष्टीचा गांभीर्याने विचार करायला हवा. आमचे सरकार, आमची राज्यघटना जर जातीधर्माच्या आधारावर भेदभाव करीत नाही तर हा तमाशा कशाला? जातीधर्माच्या आधारावर एखादी गोष्ट नाकारली जाणे हे जर घटनाबाह्य असेल तर, त्या आधारावर एखादी गोष्ट देणे हाही घटनाद्रोह नव्हे का? अन जी गोष्ट मुळात नाहीच, ज्याचे अस्तित्वच आपण अधिकृतपणे संपवले आहे तिलाच आधार बनवून संघर्ष करणे कोणत्या तर्काला धरून होईल? जातींच्या संदर्भात एकच बाब आज खरी आहे, ती ही की- आपण जात सोडायला तयार नाही. त्यातही गंमत अशी की, `दुसरा सोडायला तयार नाही म्हणून मी सोडणार नाही' असा उफराटा युक्तिवाद आपण करतो. वाटा मागायला मिळावा, तू-तू, मी-मी करायला मिळावं, याहून अधिक त्यात काहीही असत नाही. आज जातीचं अस्तित्व फक्त मनात आहे. धर्माचं स्वतंत्र अस्तित्व आहे, पण त्याचं कार्यक्षेत्र वेगळं आहे.

वर्गीय समस्या म्हणून जर काही होत्या आणि आजही आहेत तर त्या आहेत, स्थिर जीवन नसलेल्या भटक्या वर्गांच्या आणि जंगलात राहणाऱ्यांच्या. बाकी ज्या वर्गीय समस्या म्हणून गणल्या जातात त्या तशा नाहीत. शिक्षण, आरोग्य, रोजगार, निवारा, पाणी, कुपोषण, भूक; या आणि यासारख्या समस्या वर्गीय, जातीय, धार्मिक चष्म्यातून पाहिल्या जातात आणि त्यासाठी प्रतिनिधित्वाची छाननी होते तेव्हा गोंधळ आणि गुंता निर्माण होतो. त्यातून काहीही साध्यही होत नाही आणि साध्य होणारही नाही. शाळा, महाविद्यालये, नोकऱ्या, उद्योग, रुग्णालये, रस्ते, पाणी, मुलभूत रचना मोठ्या प्रमाणावर उभारणे हाच त्यावरील उपाय आहे. हे सगळे गरजेपेक्षा थोड्या अधिक प्रमाणात उपलब्ध असणे आवश्यक आहे. तेव्हा मग ज्याला ज्या गोष्टीत रुची असेल आणि जशी परिस्थिती असेल त्यानुसार ते ते शिक्षण आणि रोजगार- व्यवसाय ती व्यक्ती निवडेल. या मूळ गोष्टीवर भर न देता, नको ती विश्लेषणे करीत बसायचे आणि फाटे फोडत जायचे उद्योग आता थांबायला हवेत. सगळे देशवासी एक आहेत असे जर आम्ही म्हणतो तर हे विभेदकारी उपद्व्याप थांबायलाच हवेत. सगळ्यांच्या मुलभूत गरजा निरपवादपणे पूर्ण व्हायलाच हव्यात. त्यात वर्गीकरण नको. बाकीच्या गोष्टींसाठी माणसाच्या मनाची मशागत सतत होत राहावी. त्याला काही पर्याय नाही.

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, २६ मे २०१४

गुरुवार, २२ मे, २०१४

अवास्तव किमतींचे वास्तव

आजच्या वर्तमानपत्रात सॅमसंग कंपनीने आपल्या स्मार्टफोनच्या किमती २०-२५ टक्के कमी केल्याची बातमी आहे. ही रक्कम आठ हजारापेक्षा अधिक आहे. किमती एवढ्या कमी केल्या म्हणून अनेकांनी आनंद आणि समाधान व्यक्त केले असेल. आता आपण हा फोन घ्यायला काही हरकत नाही असा विचार काहींनी केला असेल. मनात विचार आला, आता ही कंपनी तोटा सहन करून हे स्मार्टफोन विकणार की काय? तसे तर शक्य नाही. कोणताही व्यापारी तोटा सहन करून माल विकत नाही. तो माल खराब होणारा असला, सडणारा असला, बाजारात अतिप्रचंड प्रमाणात असला तरच एखादे वेळी असे होईल. परंतु टिकणारा, कारखान्यात तयार झालेला, मागणी असलेला माल असा तोटा स्वीकारून कोणी विकणार नाही. यासाठी काहीतरी कारण खासच असले पाहिजे. ते कारण जे काही असेल ते असो. एक खरे की आता त्या फोनवर कंपनीने नफा थोडा कमी केला. याचा अर्थ कंपनीने आतापर्यंत भरपूर नफेखोरी केली.

जगात आठ हजार रुपयात महिन्याचा संसार करणारी कुटुंब आहेत आणि एका फोनवर आठ हजार रुपये अतिरिक्त आकारणारी कंपनी आणि एका फोनवर आठ हजार रुपये अतिरिक्त देणारे लोक आहेत. कशाचा कशाला मेळ नाही. ही नफेखोर वृत्ती अनेक ठिकाणी आढळते. कधी कधी मोटारींच्या किमती काही हजाराने कमी केल्याच्या अशाच बातम्या वाचायला मिळतात. बरे, काही धोरणात्मक बदल झाले, सरकारचे कर कमी झाले वगैरे प्रकार असेल तर गोष्ट वेगळी. तसे नसताना ग्राहकी आकर्षित करण्यासाठी किंवा माल खपवण्यासाठी असे भाव कमी केले जातात तेव्हा आश्चर्याऐवजी चीड येते.

माणसाच्या नफेखोरीला काही सीमा नसेल आणि कदाचित इलाजही नसेल. पण मग सरकार नावाच्या यंत्रणेचे काय? जेव्हा अशा वृत्ती वेगवेगळ्या प्रकारे गैर मार्गाने समाजाला त्रास देतात, लुटतात, शोषण करतात, गैरफायदा घेतात तेव्हा त्यावर लक्ष ठेवून नियंत्रण आणायला हवे की नाही? वस्तूंच्या वा सेवांच्या किमती ठरवण्याची काही नीती आहे की नाही? नसेल तर का नाही आणि असेल तर ती कोणत्या बासनात गुंडाळून ठेवली आहे? की ज्याला जसे वाटेल तसे भाव त्याने ठरवायचे? गेली अनेक वर्षे ग्राहक पंचायत मागणी करते आहे की, वस्तूंचे भाव निर्मितीमूल्यावर (उत्पादन मूल्यावर) आधारित असावेत. तसे होताना मात्र दिसत नाही. आपण वापरीत असलेल्या शर्ट, चपलांपासून, संगणक, गाड्या येथपर्यंत अनेक गोष्टींचे भाव अनेकदा अवास्तव असल्याचे आढळून येते.

सामान्यपणे त्याबद्दल लोकांची तक्रारही नसते. कधी कधी तर एखाद्या गोष्टीसाठी जास्त पैसे मोजणे यातच प्रतिष्ठा आणि समाधान मानले जाते. वास्तविक भाव कमी असेल आणि त्या वास्तविक भावात खरेदी केली असेल किंवा एखाद्या गोष्टीसाठी वाजवी किंमत मोजली असेल तर तो तुच्छतेचा विषय होतो. म्हणूनच एखाद्या बड्या पंचतारांकित वगैरे हॉटेलात चहा पिऊन आलो तरी आपली कॉलर ताठ होते. कारण आम्ही अवास्तव पैसे मोजलेले असतात. टपरीवरचा चहा आणि पंचतारांकित चहा यांच्या किमतीत एवढा फरक का असतो तर प्रतिष्ठेसाठी. आज अगदी कोटी कोटी रुपयांच्या गाड्या आहेत. टाटांनी गरिबांसाठी आणलेली नॅनो आणि ऑडी यात लागणारे सामान, त्यांची जोडणी, जुळणी, रंग, मजुरी वगैरेत इतका फरक का?

तुमच्या-माझ्या मनातील पैशाशी जोडलेला उच्चनीच भाव याच्या मुळाशी आहे. निर्मितीमूल्याशी संबंध नसलेल्या किमती आपल्या प्रतिष्ठेचा गंड जोपासतात. त्यामुळे त्या आपल्यालाही हव्या असतात. आपण एक प्रकारे फसवले गेलो, ठकवले गेलो, लुबाडले गेलो याची खंत वा दु:ख आम्हाला नसते. तर आपण अधिक पैसा खर्च केला आणि कोणापेक्षा तरी अधिक पैसा खर्च केला, अवास्तव पैसा खर्च केला याचे समाधान आमच्यासाठी महत्वाचे असते. याचाच फायदा उचलून नफेखोरी केली जाते.

एक माहितीतला किस्सा वानगीदाखल सांगायला हरकत नाही. दोन कुटुंब सुटीच्या दिवशी दिवसभराच्या सहलीसाठी गेली होती. येताना गावातील एका ओळखीच्यांच्या शेतात गेली. शेतकऱ्याने स्वाभाविकच शेतातील झाडाला लागलेली संत्री, पालक ताजा ताजा तोडून पाहुण्यांना दिले. `अतिथी देवो भव' हा त्याच्यावरचा संस्कार. दोन्ही कुटुंब घरी परतली. दोन दिवसांनी त्या कुटुंबातील गृहिणीमध्ये बोलणे झाले तेव्हा एकीने संत्री, पालक यांचे कौतुक केले तर दुसरीने तिला सांगितले, `मी तर ते आमच्या कामवाल्या बाईला देऊन टाकले. नाही तरी ते काही चांगले नव्हते. त्यापेक्षा reliance fresh मध्ये चांगले आणि ताजे मिळते. मी काल तिथूनच आणली संत्री.' असे म्हणून तिने reliance fresh मधील संत्री दुसरीपुढे ठेवली. झाडावरच्या संत्र्यांपेक्षा दुकानातील संत्री तिला ताजी वाटली याचे कारण चकचकाट आणि त्यासाठी मोजलेले पैसे. तिच्यासाठी शेतकऱ्याचा स्नेह, संत्र्यांचे ताजेपण, मैत्रिणीला संत्री खाऊ घालणे; यापेक्षाही मोजलेले पैसे मोलाचे आणि महत्वाचे होते. वेगवेगळ्या संदर्भात असे अनुभव आपण कुठेही घेऊ शकतो.

मात्र ही वृत्ती अनिष्ट, अनैतिक आणि असमतोल निर्माण करणारी आहे. माणसातील प्रामाणिकता, समबुद्धीने विचार व्यवहार करण्याची उर्मी आदि गुणांचा ऱ्हास यामुळे होतो. शिवाय यातून कृत्रिम असमतोल निर्माण होतो. कच्चा माल, खनिजे, उर्जा ताब्यात घेण्याची प्रवृत्ती वाढते. साठेबाजी वाढते. उधळपट्टी वाढते. भाववाढ होते, चलनवाढ होते. परिणामी सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय असमतोल वाढतो. ज्याच्याकडे पैसा आहे तो खर्च करतो, तुम्हाला काय हरकत आहे; असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण तो गैरलागू आणि अयोग्य आहे. मुळात पैसा आहे म्हणून खर्च करतो अशी स्थिती नसून, खर्च करण्यासाठी पैसा दिला जातो आणि मिळवला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे, काही माणसांच्या प्रतिष्ठांसाठी मानवी प्रतिष्ठेचा बळी दिला जातो.

पाणी हे याचे उत्तम उदाहरण आहे. वास्तविक पाण्यावर प्रत्येकाचा समान अधिकार असायला हवा. पण आज तुमच्या खिशात पैसे असतील तर तुम्हाला चांगले पाणी मिळणार आणि खिशात पैसे नसतील तर पिऊ नये असे पाणी मिळणार किंवा मग पाणीच मिळणार नाही अशी स्थिती आहे. याच्या पलीकडची स्थितीही एखाद्या वेळी पाहायला मिळते. उद्या ती सार्वत्रिक होऊ शकते. ती म्हणजे- पैसे असूनही पाणी मिळणार नाही. कारण एक तर पाणीच उपलब्ध असणार नाही किंवा नफेखोरी वाढल्याने तुमच्याकडील पैसे त्यासाठी पुरणार नाहीत. जगभरातील पाण्याच्या समस्येवर नजर टाकल्यास हे वास्तव स्पष्ट होते. कारण मुळात पाण्याचं मूल्य पाणी हेच आहे. लोखंडाचं मूल्य लोखंड हेच आहे. कापसाचं मूल्य कापूस हेच आहे. झोपेचं मूल्य झोप हेच आहे. प्रेमाचं मूल्य प्रेम हेच आहे. आज करोडो रुपये, सर्व सुखसुविधा, औषधे असूनही झोप गायब झाली आहे याचे कारण आपण झोपेचं मूल्य ओळखूच शकलो नाही. प्राणवायूचे मास्क लावून लोकांना फिरावं लागतं याचंही कारण हेच आहे की, आपण प्राणवायूचं मूल्य ओळखलं नाही. तसं नसतं तर प्राणवायूचा गळा घोटणाऱ्या गाड्यांना आम्ही आमच्या जगण्यात अवास्तव महत्व दिलंच नसतं.

ही सगळी एक साखळी आहे. मुळात पैसा, वस्तू, सुख वगैरे गोष्टींकडे पाहण्याची आपली दृष्टी या सगळ्याच्या मुळाशी आहे. सॅमसंग कंपनीने आपल्या स्मार्टफोनच्या किमती २५ टक्के कमी करणे, नफेखोरी, त्यात गुंतलेली प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी आपल्या या दृष्टीशी संबंधित आहेत. सगळं जग आज या दुष्टचक्रात सापडलं आहे. हे दुष्टचक्र भेदणे आवश्यक आहे, हे मात्र खरे.

श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, २२ मे २०१४

रविवार, १८ मे, २०१४

रिझर्व्ह बँकेचा अनैतिक निर्णय

भारतीय रिझर्व्ह बँकेने अलीकडेच एक निर्णय घेतला आहे. बँक खाते उघडण्याची व स्वतंत्रपणे वापरण्याची वयोमर्यादा १० वर्षेपर्यंत खाली आणली आहे. हा निर्णय का घेण्यात आला हे विस्ताराने वाचायला, ऐकायला मिळाले नाही. परंतु यावर व्यापक सामाजिक मंथन होणे आवश्यक आहे. नीती या शब्दाचे इंग्रजीत दोन अर्थ होतात- policy आणि morality. policy नेहमीच moral वा ethical राहीलच असे नाही. रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय सुद्धा तशाच प्रकारचा म्हटला पाहिजे.

या विषयाला अनेक बाजू आहेत. एक तर या वयात मुलांकडे बँक खाते काढण्यासाठी पैसा असतो का? बालकांना काम करण्यास कायद्याने बंदी असल्याने त्यांच्याजवळ कमाईचे पैसे असणार नाहीत. जे काही पैसे असतील ते आई-वडिलांनी दिलेले खाऊचे, खेळण्याचे, वाढदिवस वा तत्सम प्रसंगाचे पैसे असतील. घरच्या घरी ते साठवणे आणि मोठी रक्कम जमा झाली की त्याचा विनियोग करणे हे रूढ आहे. मुलांना पैशाचे महत्व पटवून देणे, बचतीची सवय लावणे यासाठी ते योग्य आहे आणि पुरेसेही. त्याहून अधिकची गरज आहे का?

रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला असल्याने बँका मुलांची खाती उघडण्याचा प्रयत्न करतील. जाहिराती होतील, कदाचित शाळातून प्रयत्न होतील, अन्यही मार्ग उपयोगात आणले जाऊ शकतात. त्यामुळे मुलांमध्ये खाती उघडण्याची चढाओढ लागेल. त्यातून अनिष्ट स्पर्धा सुरु होईल. नको असलेलं श्रेष्ठ कनिष्ठत्व सुरु होईल. ते वय लक्षात घेता हे प्रकार किती विविध पद्धतींनी परिणाम करतील याचा विचार रिझर्व्ह बँकेने केला असेल असे वाटत नाही. यामुळे घरोघरी अशांतता निर्माण होईल. अभ्यासाची मानसिकता बिघडेल. जी मुले खाती उघडू शकणार नाहीत त्यांच्या मनात न्यूनगंड वा हिनगंड किंवा खातेधारक मुलांचा दुस्वास निर्माण होईल. बालवयातील मुलांची वर्तणूक, त्यांची विचार करण्याची क्षमता यावर या गोष्टींचा परिणाम होईल. काही पालक सधन असतात आणि आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन, चर्चा त्यांना आवडत असते, हवीही असते. असे पालक मुलांच्या खात्यांचा त्यासाठी उपयोग करून घेतील. महिलांच्या कंपूत आपापल्या मुलांच्या खात्यांवरून चर्चा आणि हेवेदावे होतील.

दुसरे म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाने मुलांना पैसा त्यांच्या मताने खर्च करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. म्हणजे मुलांना आई-वडिलांकडे हट्ट करण्याची गरज नाही. एकीकडे मुलांना नाही म्हणा, त्यांना नकार ऐकण्याची आणि पचवण्याची सवय लावा असे मानसशास्त्रज्ञ सांगत आहेत आणि दुसरीकडे नकाराची, त्यातून विकसित होणाऱ्या चांगल्या-वाईट तारतम्याची व्यवस्थाच नष्ट करणारे हे पाऊल आहे. भरीसभर आज चहुभोवताल असलेली आकर्षणे. असे तर नाही की, याच कारणाने रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला की, मुलांच्या हातात पैसा आला म्हणजे ते या आकर्षणांना बळी पडून अधिकाधिक खर्च करतील. एकूणच केवळ तंत्राचा विचार करण्याच्या आजच्या काळात, अर्थतंत्राचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असावा. बाजाराला उठाव देण्याचा एक खात्रीशीर मार्ग म्हणून. अर्थतंत्राचा विचार करताना अर्थनीतीला तिलांजली देण्यात तसेही काय मोठेसे? अर्थकारण महत्वाचे समाज गेला खड्ड्यात.

असंख्य अर्थहीन गोष्टींनाच आधुनिकता आणि सभ्यता समजत जो गोंधळ सध्या जगभर सुरु आहे, त्याचा हा परिणाम आहे. या साऱ्या भोंगळ गोष्टी दूर सारून मुळातून विचार करण्याची, समजून घेण्याची कोणाची तयारी नाही. आर्थिक स्वतंत्रता ही अशीच एक भोंगळ बाब. आर्थिक स्वतंत्रता हा या लेखाचा विषय नाही, पण विषयाच्या अनुषंगाने त्याचा विचार आवश्यक आहे. आज आपल्याकडे एक कुटुंब व्यवस्था आहे. जिथे ती नाही तिथे ती उभी करण्याचे प्रयत्न होतात. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कुटुंब व्यवस्था बळकट करण्याचे आश्वासन देण्यात येते. आपल्या या कुटुंब व्यवस्थेत परस्पर अवलंबित्व महत्वाचं आहे. या अवलंबित्वाचा अतिरेक आणि गैरवापर या समस्या आहेत. त्यांची चिंता करण्याची गरज आहे. पण म्हणून `आम्हाला कोणाची गरज नाही' हा उद्धट भाव योग्य तर नाहीच उलट कुटुंब व्यवस्थेला छेद देणारा आहे. it's like throwing a baby with a bathwater. पैसा, त्याचा विनियोग, त्याची उपलब्धता, निर्णय; या सगळ्यासाठी मुले-मुली आपल्या पालकांवर अवलंबून असतात. या बाबतीत हळूहळू ती स्वतंत्र होतात. यातून योग्य-अयोग्यता, तारतम्य, पैशाकडे पाहण्याची दृष्टी विकसित होते. हे असेच व्हायलाही हवे. आयुष्य ही एका दिवसात जगून घ्यायची गोष्ट नाही, एका दिवसात समजण्याची गोष्ट नाही, एका दिवसात करून टाकण्याची गोष्ट नाही. तसेच जन्माला येतानाच सगळं ज्ञान, समज वगैरे घेऊन कोणीही येत नाही. एकूणच आयुष्य ही एक विकासाची प्रक्रिया आहे. सगळ्याच अंगांना हे लागू आहे. पैसा, त्याचा विनियोग यालाही ते लागू आहे. ही प्रक्रिया मुद्दाम मोडीत काढणे वा बदलणे हे morality या अर्थाने अनैतिक आहे.

ही समज आणि दृष्टी विकसित होणे याशिवायही अवलंबित्वाचे उपयोग आहेत. त्यातील एक म्हणजे त्यातून निर्माण होणारा भावबंध. कोणासाठी काही करणं यातून होणारं मनाचं उन्नयन, त्यातून मिळणारा आनंद, वात्सल्याची भूक या साऱ्याची पूर्ती पालकांच्या दृष्टीने; तसेच कृतज्ञतेची भावना, प्रेम, आदर, अशा पद्धतीने वागायचं असतं हा संस्कार बालकांच्या दृष्टीने; या  जीवन समृद्ध करणाऱ्या बाबी आहेत. संपन्न करण्याच्या नादात समृद्धीकडे दुर्लक्ष का व्हावे? आज सगळ्या वेडपट गोष्टींकडे ओढा दिसून येतो. अमेरिकेत मुले खूप लहान वयात आई-वडिलांपासून दूर होऊन कमवायला लागतात म्हणून आम्हालाही त्याचीच ओढ लागते. माणसाचा माणूस म्हणून विचार न करता एक आर्थिक प्राणी, एक सामाजिक प्राणी, एक राजकीय प्राणी असाच विचार करणाऱ्या या आधुनिकतेच्या अशा अनेक गोष्टींचा खरे तर मुळातून विचार आवश्यक आहे.

महाकवी कालिदासाने एका ठिकाणी म्हटले आहे-
पुराणमित्येव् न साधु सर्वम्
नचापि काव्यम् नवमेत् वद्यम्
संत: परिक्षान्यतरद भजन्ते
मूढ: परप्रत्ययनेन बुद्धि:
(जुनं सारं सोनं नाही, नवीन सारं काव्य -सुंदर मधुर या अर्थाने- नाही; संत- समतोल व्यक्ती या अर्थाने- सारासार विचार करतात आणि मूर्ख लोक दुसऱ्याच्या बुद्धीने चालतात.)

काही वर्षांपूर्वी लोकसत्तात वैद्यकीय व्यवसायाच्या सद्यस्थितीबाबत लिहिले होते. त्यावेळी प्रख्यात अस्थीतज्ञ पद्मश्री डॉ. विक्रम मारवा यांच्याशी चर्चा करण्याचा योग आला होता. तेव्हाचे त्यांचे एक वाक्य आजही कानात आहे. ते म्हणाले होते, `वैद्यकीय व्यवसायाला वैद्यकीय तंत्रज्ञासोबतच वैद्यकीय तत्वज्ञाची गरज आहे.' आज सगळ्याच क्षेत्रांबाबत हे म्हणण्याची पाळी आली आहे. तंत्रशरण समाजाला तत्वज्ञानाची फार मोठी गरज आहे. प्रसिद्ध शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांनी आपल्या `स्वरमयी' या पुस्तकात याच आशयाचं एक वाक्य नमूद केलं आहे. ते वाक्य आहे - `जो समाज तत्वज्ञानाकडे दुर्लक्ष करून तंत्रज्ञानावर अधिक भर देतो, त्या समाजाला काही काळानंतर त्यापैकी एकाचीही गरज उरत नाही.' आशय हा की, त्याचं समाज म्हणून अस्तित्वच नष्ट होतं. या साऱ्याचा गांभीर्याने आणि मुळातून विचार केल्याशिवाय policy आणि morality यातील भेद समजणे अवघड आहे. अन हा भेद समजून घेत नाही तोवर रिझर्व्ह बँकेच्या निर्णयासारखे समाजाच्या अस्तित्वाच्या मुळावर येणारे अनैतिक निर्णय येतच राहणार आहेत.

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, १८ मे २०१४

बुधवार, ७ मे, २०१४

प्रश्नांकित मातृत्व

पुत्र हा कुपुत्र असू शकतो, पण माता ही कुमाता असणे शक्यच नाही; हे आदि शंकराचार्यांचं वचन खोटंच ठरवण्याची जणू चढाओढ लागली आहे की काय अशी शंका घ्यावी, अशा घटना एकापाठोपाठ एक घडत आहेत. शंकराचार्यांचं वचन हे भक्तीभावनेपोटी थोडं अतिशयोक्त स्वरूपाचं आहे हे आपल्याला मान्य असलं तरीही त्यातील आशयाशी आपण सहमत असतोच. नव्हे प्रत्येकाने असायलाच हवे. जगभरचाच हा अनुभव आहे. माता या गोष्टीबाबत जगभरातच एक आदराची, श्रद्धेची भावना दिसते. तरीही कैकेयीला `माता न तू वैरिणी' असं म्हणणारा भरतसुद्धा आपल्या परिचयाचा असतो. तरीही `आई' याविषयी मन कलुषित वा संभ्रमित करेल एवढी शक्ती त्यात नसते. गेल्या दोन दिवसातील दोन घटनांनी मात्र `मातृत्व' प्रश्नांकित केलेलं आहे. एक घटना आहे जर्मनीतील आणि एक आपल्याच देशातील.

जर्मनीत एका २० वर्षीय तरुणीने जन्म दिलेल्या आपल्याच बाळाला; त्याच्या जन्मानंतर काही तासातच चाकूने कापून यमसदनी धाडले. कारण काय तर आता त्या बाळातच गुंतून पडावे लागेल आणि आपल्याला मित्र मैत्रिणींसमवेत क्लब, पब आणि पार्ट्यांना जाता येणार नाही ही तिची भावना. ही घटना केवळ आपल्यासारख्या बुरसटलेल्या भारतीय लोकांनाच धक्का देणारी म्हणावी का? तर तसे नसून ही घटना इतकी धक्कादायक आहे की प्रत्यक्ष जन्मदात्या मुलीच्या आईने या प्रकारामुळे सैरभैर होऊन आत्महत्या केली. प्रगत जर्मनीतील २० वर्षांच्या, स्वतंत्र जीवन जगणाऱ्या मुलीला स्वत:च्या प्रत्येक कृतीचा अर्थ आणि परिणाम समजत नसेल? परंतु तरीही त्या कृती नियंत्रित करता न येणे हा महत्वाचा प्रश्न आहे.

`कळते पण वळत नाही' अशी आज जगाची गत आहे. `सिगारेट पिणे आरोग्यास हानिकारक आहे' असा इशारा नजरेआड करून सिगरेटचा मनसोक्त आस्वाद घेणे आणि जर्मनीतील ताजी घटना एकाच स्वरूपाच्या आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. एकूणच जीवनाच्या तळाशी न जाता तुटक तुटक विचार करणाऱ्या तथाकथित आधुनिक विचारकांना हे पटणार नाही. एकूणच माणूस काय किंवा अन्य काहीही काय (वस्तू, व्यक्ती, घटना, विचार, भावना वगैरे काहीही) हे एखाद्या कारखान्यात विशिष्ट साचातून तयार केलेले ठोकळे आहेत असेच त्यांना वाटते. त्यामुळे त्यांचा विचार न करता पाहिले तर, सिगारेट पिणे आणि नवजात अर्भकाचा खून करणारी माता या दोन्ही घटनांच्या मुळाशी एकच तत्व सापडते; ते म्हणजे मनावर नियंत्रण नसणे. जगातील आजच्या असंख्य समस्यांचा ल.सा.वि. काढला तर तो एकच असेल, मनावर नियंत्रण नसणे. `मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक' वगैरे हमरस्त्यावरील पाट्यांचेही दिवस आता सरले आहेत. अनिर्बंधता हाच `आज'चा मूलमंत्र झाला आहे. तुम्ही अनिर्बंध नसाल तर तुम्ही कालचे. ही अनिर्बंधता सारं काही गिळंकृत करीत निघाली आहे. तिची मजल आता कुठवर पोहोचली आहे हे दर्शवणारी जर्मनीतील ही घटना आहे.

आम्हाला स्वातंत्र्य अनिर्बंध हवं, (अर्थात स्वत:च, दुसऱ्यांच्या स्वातंत्र्याशी घेणेदेणे नाही.) आम्हाला सुख अनिर्बंध हवं. सुख म्हणजे- पैसा, वस्तू, सत्ता, लैंगिकता, नावीन्य, शरीराला धक्काही न लागणे, जमीनजुमला वगैरे वगैरे वगैरे... सुख अनिर्बंध म्हणजे हे सगळंही अनिर्बंध हवं. मनोभावांची पूर्तता अनिर्बंध हवी. समाजासाठी वगैरे काही करण्याची इच्छा असणारे आणि प्रयत्न करणारे यांनाही हेच सारे अशाच अनिर्बंध पद्धतीने हवे, फक्त ते आपल्यासोबत सगळ्यांसाठी हवे एवढेच. हेच जगण्याचे प्रयोजन. त्यामुळे त्यासाठी काहीही करायला तयार असलेच पाहिजे. आणि काहीही करायला तयार हवे तर मग मनावर नियंत्रण कसे ठेवायचे? आणि मुख्य म्हणजे का ठेवायचे? अन मातृत्व तर मनावरील नियंत्रणाची प्रचंड मागणी करतं. हे नियंत्रण फक्त `मादित्वा'वरील नसतं तर असंख्य प्रकारचं असतं. मुलाला मोठा अपघात झाल्यावरही डोळ्यातलं पाणी मागे फिरवून त्याला हिम्मत देण्यातही मनावरील नियंत्रण आवश्यक ठरतं. मातृत्व ही खरे तर वस्तू नाही, तो भाव आहे. त्यात गोड बोलणे आहे आणि कठोर बोलणेही आहे. त्यात धीर आहे, धैर्य आहे; माघार घेणे आहे, आक्रमक होणे आहे; थोपटणे आहे अन ताडन करणेही आहे; काळजी घेणे आहे आणि स्वावलंबी बनवणेही आहे; अन याशिवायही पुष्कळ काही आहे. या अनेक परस्परविरोधी  गोष्टी कधी, कुठे, कशा व किती प्रमाणात उपयोगात आणायच्या हे आपोआप उमजवून देणारं रसायन आहे मातृत्व. म्हणूनच ते स्त्री मध्ये असू शकतं तसंच पुरुषातही असू शकतं. मातृत्व ही एक साधना आहे. तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम आहात की ख्रिश्चन आहात; तुम्ही जडवादी आहात की आध्यात्मिक आहात; तुम्ही महानगरात राहता की खेड्यात राहता; याला काहीही अर्थ नाही. मातृत्वासाठी साधना आवश्यक आहे. अन साधना म्हणजेच मनावर नियंत्रण.

आज मात्र मातृत्वाला एक वस्तू बनवून टाकले आहे. एकीकडे तर त्याला स्पष्ट वा प्रच्छन नकार आणि दुसरीकडे त्याचे वस्तुकरण. पश्चिम बंगालच्या मालदा भागातील घटना मातृत्वाचे वस्तूकरण दाखवणारी आहे. एका महिलेने आपल्या पोटातील बाळाचा जन्माला येण्यापूर्वीच ३० हजार रुपयात सौदा करून टाकला होता. मूल न होणारी अनेक जोडपी असतात. त्यातून मार्ग काढण्यासाठी प्राचीन काळापासून दत्तक प्रथा आहे. परस्पर संबंधातही एखादी स्त्री मूल जन्मालाच एवढ्यासाठी घालते की, तिच्या जवळच्या एखाद्या स्त्रीच्या ओटीत ते घालावे. अनाथालयातून जी मुले दिली जातात ती सुद्धा विकली जात नाहीत. पण या महिलेने चक्क जन्माला येण्यापूर्वीच ३० हजार रुपयात बाळ विकून टाकले. मातृत्व भावाचे याहून आणखीन कोणते अवमूल्यन असू शकते?

आणखीन एक मुद्दा विचारात घ्यायला हवा. मूल होणे, त्याचे लालनपालन करणे, संगोपन करणे; हे मातृत्वाचे अंग आहेच. त्याचे महत्व, एखाद्या स्त्रीच्या जीवनातील त्याची गरज हेही अत्यंत महत्वाचे आहे. परंतु तेवढे म्हणजेच मातृत्व असे जे चित्र सर्वत्र पाहायला मिळते ते योग्य आहे का याचाही विचार व्हायला हवा. मी पुरुष असल्याने यावर बोलण्याचा मला अधिकार नाही आणि ती सारी गुंतागुंत मी कधीच समजून घेऊ शकत नाही; असे आक्षेप यावर घेतले जाऊ शकतील. ते आक्षेप अनाठायी आहेत असेही समजण्याचे कारण नाही. तरीही माझा मुद्दा अनाठायी आहे असा त्याचा अर्थ होत नाही. दुसरे असे की, एक तटस्थ व्यक्ती म्हणून मला असेही दिसते की निसर्गदत्त मातृत्व नाकारलेल्या काही माता आपल्या मातृत्वाचा परीघ एवढा विस्तारतात की त्यात सगळे जग सामावून जावे. उषाताई चाटी यांचा एक उदाहरण म्हणून उल्लेख करायला हरकत नाही. त्यांना मुलबाळ नाही तरीही राष्ट्र सेविका समिती या महिलांच्या अखिल भारतीय संघटनेचं सर्वोच्च नेतृत्व अनेक वर्षे त्यांनी यशस्वीपणे केलं. लाखो सेविकांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या त्या आई झाल्या. एखादी गोष्ट मिळणे न मिळणे यापलीकडे जाण्याची आणि मनाला उंच उचलून घेण्याची सवय लावणे म्हणजेच तर साधना. ही साधना आध्यात्माची असो की मातृत्वाची. परंतु अशा प्रकारे विचार करण्याऐवजी मनाला अधिकाधिक दुबळे बनवणाऱ्या पद्धतीनेच विचार करणे सयुक्तिक म्हणता येईल का?

आज सगळं जग एका विचित्र कोंडीत सापडलं आहे. स्वार्थ, चोरी, लबाडी यांना आम्ही चांगलं म्हणू शकत नाही आणि त्यातून सुटूही शकत नाही. जीवनाचं प्रयोजन, सर्व प्रकारच्या आर्थिक- सामाजिक- राजकीय- सांस्कृतिक व्यवस्था, वातावरण, कल्पना, संकल्पना, आदर्श; या साऱ्यातून स्वार्थ, संपत्ती, सत्ता, संघर्ष, स्पर्धा याचीच साधना आम्ही करत आहोत. वास्तवतेच्या नावाखाली त्याचं समर्थन करत आहोत आणि अपेक्षा मात्र नि:स्वार्थी, सज्जन, परहिताचा विचार करणाऱ्या समाजाची करीत आहोत. हा आमच्या विचार-व्यवहाराचा paradox आहे. हा paradox दूर करण्याचे प्रयत्न आधीही झालेत आणि आताही सुरु आहेत. परंतु मातृत्व भावाच्या अभावी त्यांना यश मिळालेले दिसत नाही. मातृत्व भावाची साधना आणि विकास हाच इष्ट बदलाचा प्रारंभबिंदूही आहे आणि त्याचे शिखरही. म्हणूनच मातृत्वाचे आज सुरु असलेले विडंबन आणि स्खलन रोखणे या जगाच्या सार्थक अस्तित्वासाठी आवश्यक आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, ७ मे २०१४