रविवार, २९ जुलै, २०१८

बंगदेशी ८


ती संध्याकाळ दार्जिलिंगच्या मॉल रोडवर घालवली. माझा मुक्काम होता मुख्य रस्त्याच्या खालच्या दिशेला. चांदमारी नावाच्या भागातील botanical garden च्या जवळ. एका स्थानिक घरी. अन मॉल रस्ता म्हणजे दार्जिलिंग शहराच्या सगळ्यात वरच्या पठारावर घेऊन जाणारा मार्ग. मुख्य रस्ता, तेथून मॉल रस्त्याला घेऊन जाणारे वेगवेगळे रस्ते, अन मॉल रस्ता म्हणजे दुकानांची दाटीवाटी. बाजारच बाजार. सतत फुललेला. दार्जिलिंग हा पश्चिम बंगाल राज्याचा भाग असला तरीही जवळपास पूर्ण नेपाळी प्रभावात. भाषा, खाणेपिणे, कपडे, जगणे, वृत्तपत्रे; सगळे नेपाळी. दोन बंगाली व्यक्ती सुद्धा आपसात सहजच नेपाळीत बोलतात. नेपाळी भाषा न बोलणारी स्थानिक व्यक्ती सापडणे कठीण. मुख्य रस्त्यावरील एकमेव पुस्तकांच्या दुकानात डोकावलो. दोन-चार बंगाली पुस्तिका अन एक-दोन इंग्रजी वर्तमानपत्रे सोडली, तर सगळी पुस्तके आणि वर्तमानपत्रे नेपाळी. मोमोशिवाय खाण्यासाठी काही मिळेल का हे शोधणे म्हणजे एक मोठे कामच. अर्थात फरसाण, फळे, बिस्किटे, ब्रेड हे असतंच. परंतु उभ्या आडव्या भारतात मिळणाऱ्या असंख्य पदार्थांपैकी एखादा सुद्धा मिळणे कठीण. हॉटेल्समध्ये तर मोमो असतातच, पण रस्त्याने पाणीपुरीच्या दुकानांसारखी मोमोची दुकाने. अन कोणत्याही शहरातील एका रांगेतल्या पाणीपुरीच्या दुकानांपेक्षा जास्त संख्येने. अन मोमोचा हा व्यवसाय सांभाळणाऱ्या बहुतेक नेपाळी महिला. आपल्याला फक्त उनी कपड्यांच्या व्यवसायात दिसणाऱ्या या महिला सगळ्या व्यवसायात दिसतात. शाकाहार मिळेल का अशी घनदाट शंका यावी इतकी मांसाची दुकाने. भर रस्त्यावर टांगलेले प्राण्यांचे देह. काही ठिकाणी नियमानुसार दुकानासमोर आडोशाची भिंत आहे पण नियमांची पर्वा फारशी नाहीच. मुख्य रस्त्याच्या थोड्या आतल्या अंगाला शनि मंदिराजवळ एक मारवाडी खानावळ आहे तिथे फक्त शाकाहारी जेवण मिळते.
बाजारात मुख्य व्यवसाय उनी कपड्यांचा. लोकर, शाली, स्वेटर्स, विंड चिटर्स, रजया असे सगळे. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुकानात भाव होणार, पक्क्या दुकानात नाही. सगळे सारखेच. उन्हाळाच आहे. राहून राहून किती थंडी राहणार असा विचार करून गेलेल्या अस्मादिकांना विंड चिटर खरेदी करणे भाग पडले. दार्जिलिंगच्या जगप्रसिद्ध चहाची दुकाने मात्र नाहीतच जमा. चहापत्ती घरी घेऊन जावी किंवा कोणाला भेट घेऊन जावी असा विचार केला तर ते शक्य होणे नाही. चहा प्यायचा असेल तरीही तुरळक दुकान सापडेल. असे सगळे पाहत, नोंदी घेत; मॉल रस्त्याचा चढ आणि मग मॉल रस्ता चढून दार्जिलिंगच्या सर्वोच्च स्थानी पोहोचलो. हे मोठे मैदान खास फिरणाऱ्या लोकांसाठी. तेथे पाहण्याच्या दोनच गोष्टी- एक शिवमंदिर आणि एक स्तंभ. या स्तंभावर एका नेपाळी कवीची माहिती आणि त्याच्या कवितेतील रामायणावर लिहिलेल्या काही ओळी आहेत. त्या कवीच्या स्मृतीतच तो स्तंभ उभारला गेला आहे.
दार्जिलिंगचे नेपाळीपण मोठे आहे. सिलीगुडीला पोहोचतो त्याहून कमी वेळात आपण नेपाळला पोहोचू शकतो. लोकांची ये-जा सुरूच असते. मला निवासाजवळ भेटलेला एक मुलगा भारतातल्यापेक्षा नेपाळच्या अधिक गावांना जाऊन आलेला होता. या मैदानावर लोक फिरत होते, खेळत होते, मुले बागडत होती आणि सगळे चारही बाजूंनी दिसणारे हिमालयाचे प्राकृतिक सौंदर्य साठवून घेत होते. गर्दी होतीच पण सगळा कारभार निवांत. या निवांतपणाला गंमत आणण्यासाठी गरमागरम भुट्टा मदतीला आला. गर्दी नसलेल्या एका ठिकाणी गेलो. एक नेपाळी महिला कणसं भाजत होती. तिथेच एका दगडावर टेकलो. खरपूस भाजलेला भुट्टा तिने हाती दिला. तिच्याशी चारदोन शिळोप्याच्या गप्पा केल्या. ती मुंबईला येऊन गेलेली. अर्थात उनी कपडे विकायला. काही महिने होती. पुन्हा परत गावी. भुट्टा खाणे सुरु असतानाच गिऱ्हाईक देखील येत जात होते. एक साहेब आले. त्यांनी तीन कणसं घेतली. भाव होता प्रत्येकी वीस रुपये. त्यांनी मात्र महाग देते म्हणत, साठऐवजी पन्नास रुपयेच दिले. माझ्याकडे वळून ती म्हणाली- `पहा, तीन कणसं विकली तर आठ रुपये मिळतात. अन यांनी दहा रुपये कमी दिले.’ असा छोटा व्यवसाय करणाऱ्या लोकांशी भाव करू नये हे पुन्हा प्रकर्षाने जाणवले. हां, शालीचे हजार रुपये सांगणाऱ्या अशाच नेपाळी महिलांशी भाव जरूर करावा, पण कणीस घेताना नको. भाव कुठे करायचा अन कुठे नाही याचेही तारतम्य हवेच ना? निवासाजवळ असलेल्या हिंदी भाषी लोकांच्या `बडा ठाकूर मंदिरात’ रात्री सुंदरकांडाचा आनंदही घेतला. दोन दिवस दार्जिलिंगचा आनंद घेऊन, यजमानांनी बनवलेला खास दार्जिलिंग चहा घेऊन दार्जिलिंग सोडले. हां- एक आवर्जून सांगायचे म्हणजे, दार्जिलिंगला पाण्याची खूप मारामार आहे. पावसाचे पाणी साठवून साठवून लोक जगतात. पडणारा पाऊस सगळा खाली वाहून जातो. त्यातल्या त्यात एक बरे की, येथील लोकांना आंघोळीची गरज नसते. आणि सरासरी आठवड्यातून एकदाच आंघोळ करणारेच बहुसंख्य आहेत. तपशिलात गेलो तर महिन्यातून एकदा आंघोळ करणारेही सापडतात !!
दार्जिलिंगहून सिलीगुडी, तिथून जलपाइगुडी, तिथून सुमारे दोन तास विलंबाने आलेल्या `हिमकन्या एक्स्प्रेस’ने कोलकात्याला परत. कोलकात्याला सकाळी पोहोचलो. गाडी दोन तास विलंबाने आली पण पोहोचवले एक तास विलंबाने. दुपारी नागपूरची परतीची गाडी होती. बोसपुकूरला राहणाऱ्या भाचीचा आग्रह होता – आल्याशिवाय जायचे नाही. गाडीतून उतरताच बोसपुकूरची taxi केली. खाणाखुणा लक्षात होत्या पण ज्या चौकातून आत वळायचे त्या चौकातला हिरवा दिवा सुरु होता आणि चालकाला थांब सांगेपर्यंत स्वाभाविकच त्याने गाडी पुढे काढली होती. त्याचेही बरोबरच होते. पुन्हा हिरव्या दिव्याची वाट कोण पाहणार? पण त्यामुळे पंचाईत ही झाली की, गाडी आत नेणार कशी? वळवून यायचे म्हणजे दोनेक किमी पुढे जाऊन वळसा घेऊन या. ते अशक्य. मग, मुख्य रस्त्यावर उतरून तंगडेतोड करत भाचीच्या घरी जावे लागले. हाताशी वेळ फारसा नव्हता. चहा, आंघोळ, १५-२० मिनिटांची झपकी, भाचीच्या बेटीशी थोड्याशा गप्पा, जेवण, bags आवरणे; असे सगळे आटोपले. थोड्याशा वेळाच्या त्या धावपळीतही भाचीने बाजारात जाऊन खास `हिमगिरी आंबे’ आणलेत. त्या हिमगिरी आंब्याचा रस तृप्त करून गेला. त्याच दिवशी मुलीचा दहावीचा निकाल होता दुपारी. तिला काय द्यावे? बोलताबोलता लक्षात आले तिला वाचनाची आवड आहे. मग जवळचे भगिनी निवेदितांचे चरित्र तिला दिले आणि त्यांचा निरोप घेतला. मुख्य रस्त्यापर्यंत ती निरोप द्यायला आली. Taxi साठी थांबलो असतानाच एसी बस आली. तिने विचारले- चालेल का? हरकत असण्याचे काहीच कारण नव्हते. बसने स्थानकाच्या बाहेर सोडले. बसने आल्याने एक निरीक्षण खाती आणखीन जमा झाले. कोलकात्यात बस आणि taxi यांच्या भाड्यात फारसा फरक नाही. जवळपास सारखेच. एवढेच की, taxi त तुम्ही एकटे असलात तरीही चार जणांचे भाडे द्यावे लागते. बसमध्ये एकाचेच. नागपुरात मात्र रिक्षा आणि बस यांच्या भाड्यात कुठेही ताळमेळ नाही.
कोलकाता स्थानकावर पोहोचलो. अन एक लक्षात आले, स्थानकाच्या अवाढव्यतेच्या मानाने सोयी वा मदतकेंद्रे, मदतनीस, चौकशीच्या सोयी, पोलीस फार तोकडे आहेत. गर्दी आणि विस्तार लक्षात घेता वास्तविक जागोजागी सोय हवी. तर गाडी कुठल्या फलाटाला हे शोधण्यातच वेळ खूप गेला. त्यात गंमत म्हणजे- चौकशीच्या खिडकीवर मी विचारलेल्या प्रश्नाला खिडकीच्या आतील माणसाने आधीच्या पृच्छ्काचे उत्तर दिले. ते होते फलाट क्रमांक ८. त्यानुसार गेलो तर तिथे भलतीच गाडी. आता आली का पंचाईत. पुन्हा चौकशी खिडकीवर जाणे, रांगेत लागणे, विचारणे... गाडीची वेळ जवळ येत होती. इकडेतिकडे नजर टाकली कुणी कुली दिसतो का? मिनिटभर नाही दिसला. अस्वस्थता वाढली अन योगायोगाने कुली दिसला. मुख्य म्हणजे सामान न घेतलेला. त्याला विचारले तर म्हणाला- फलाट क्रमांक २१. अरे देवा !! ८ वरून २१ वर जाणे. मुख्य म्हणजे २१ आहे कुठे? त्याला विचारले- कुठे आहे? त्याला लक्षात आले. तो खुणेनेच म्हणाला, सामान गाडीवर ठेवा. मला पर्याय नव्हता. पैसे वगैरे न बोलता सामान गाडीवर ठेवले. अन दोघेही फलाट २१ कडे सुटलो. वेळेत पोहोचलो. त्याने सामान आत नेऊन ठेवले. मी आसन क्रमांक कन्फर्म केला अन वळून पाहिले. त्या क्षणभरात तो देवासारखा धावून आलेला कुली खाली उतरला होता. मी त्याच्या मागे खाली धावलो. डब्यातून उतरलो तेव्हा तो त्याची ढकलगाडी वळवून चालू लागला होता. जाऊन त्याला पकडले. म्हटले- बाबा रे पैसे तर घेऊन जा. किती देऊ? तो फक्त हसला. पुन्हा विचारले, तर म्हणाला- तुमची मर्जी. त्यावेळी मनात अन हातात आले तेवढे पैसे काढले. त्याला दिले अन जागेवर परतलो. लगेच दोन मिनिटात गाडी सुटली. कोण होता तो? बंगदेशीचा स्मृतिगंध मनाच्या कुपीत भरत भरत परतीचा प्रवास सुरु झाला.
- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, १४ जुलै २०१८

बंगदेशी ७


दार्जिलिंग तर लक्षात राहणारे आहेच, पण कोलकाता दार्जिलिंग प्रवास कायमचा, आयुष्यभर लक्षात राहणारा झाला. रात्री आठची गाडी होती. स्थानकावर पोहोचलो आणि कुठे लागते गाडी पाहिले तर ती लागली होती `७-ब’ फलाटावर. माझ्या ज्ञानात ही भर होती. फलाट क्रमांक ठीक आहे, पण त्या क्रमांकाला अ, ब, क अशी उपपदे ही माझं ज्ञान upto date करणारी होती. गाडीत बसलो. गाडी धावू लागली. शेजारी चांगले होते. दोघी बहिणी, त्यांचे नवरे, प्रत्येकीची एकएक लग्नाळू मुलगी. कुटुंबवत्सल. त्यांनी डबे उघडले. मलाही निमंत्रण दिले. पण माझे जेवण झाले होते. त्यामुळे निमंत्रण स्वीकारण्याचा प्रश्नच नव्हता. सगळे झोपी गेले.
सकाळी जेथे उतरायचे ते जलपाइगुडी स्थानक यायला एखादा तास असावा. छान ढगाळ वातावरण होते. पाऊस भुरभुरत होता. गाणं गुणगुणावं किंवा कविता फुलावी असा निसर्ग आणि वातावरण खिडकीबाहेर होतं. तेवढ्यात वाफाळता चहा आला. स्वाभाविकच सगळ्यांनी घेतला. चहापान झाल्यावर दोन बहिणींपैकी मोठीने एक छान मोठ्ठा डब्बा काढला. तो होता विड्याच्या पानांचा. त्यात विड्याची बांगला पाने, विड्याचे बाकी सगळे साहित्य नीट ठेवले होते. तिने विचारले- पान खाणार का? नेकी और पूछ पूछ. म्हटले- बिलकुल खाणार. फक्कड चहावर मस्त बांगला पान. ती पान लावत होती. अगदी छान शिरा काढून वगैरे. अधूनमधून विचारत होती, हे टाकू का, ते टाकू का? मीही हो-नाही सांगत होतो. लक्ष मात्र बाहेर होते. तिने असंच काहीतरी विचारलं. मला कळलं नाही. म्हणून मी काय असं विचारलं. त्यावर तिचा नवरा म्हणाला- काथ चालेल का? मी अर्थात हो म्हणालो. ती तीन पानं लावत होती. मी विचारलं- कोण खाणार नाही? नवरोबा म्हणाला- आम्ही दोघे नाही खाणार. म्हणजे दोन पुरुष नाही खाणार. त्यावर विडा लावणारी त्यांना चिडवत म्हणाली- ते गरीब आहेत. त्यामुळे त्यांना शौक परवडत नाहीत. आम्ही श्रीमंत आहोत त्यामुळे आम्ही सगळे शौक करतो. बंगाली कुटुंबाचंही असं छान लोभस चित्र पाहायला मिळालं.
बोलता बोलता तिने तयार झालेला विडा हाती दिला. विडा तोंडात टाकला. चघळायला सुरुवात केली. नजर खिडकीबाहेरच. विड्याची थोडीशी पिंक पोटात गेली.... आणि सगळं शरीर झिणझिणलं. बाहेरचं सगळं सौदर्य वगैरे क्षणार्धात लोप पावलं. पोट ढवळून निघालं, डोकं बधीर झालं. स्वत:ला सावरणं कठीणच्या पलीकडे गेलं. कसा तरी बेसिनजवळ गेलो. सगळं पान थुंकलं. पण तेवढ्या वेळात पोटात जो रस गेला त्याचा प्रताप मात्र सुरूच होता. त्या शौकवालीने पानात मस्त तेज तंबाखू टाकला होता. मी कामातून गेलो होतो आणि त्या दोघी मात्र तंबाखूच्या छान बंगाली पानाचा तब्येतीने आनंद घेत होत्या. थोड्याच वेळात गाडी जलपाइगुडीला टेकली. चक्कर येत होतीच. पोट ढवळत होतंच. काय अन कसं होईल या विचारातच उतरलो. इनमिन दोनच bags पण त्याही उचलवत नव्हत्या. तसाच रिक्षा केला. कारण जलपाइगुडीहून जायचे होते सिलीगुडीला. तेथून दार्जिलिंग.
रिक्षातून जाताना जवळचा बिस्कीटचा पुडा काढला. कारण पाणी पिणे शक्य नव्हते. ते उलटून पडले असते. मात्र आत जे acid secretion सुरु होते ते थांबायलाही हवे होते. म्हटलं, बिस्कीट खाऊन पाहू. चिमणीच्या दाताने कोरत कोरत दोन बिस्किटे कशीबशी खाल्ली. सोपेची डब्बी काढली. हा अनुभव नसल्याने प्रयोग करण्याला पर्याय नव्हता. सोप खात राहिलो चिमुट चिमुट. सिलीगुडी बस स्थानकावर पोहोचलो. उतरण्यापूर्वी पैसे दिले. उतरताना त्याला म्हटलं- या दोन bags तेवढ्या रस्त्याच्या पार करून देतो का? तोवर अगदी गोड बोलणाऱ्या रिक्षावाल्याने पैसे हाती पडले असल्याने थातूरमातुर कारण सांगून नकार दिला. कसेतरी करीत बाकड्यावर जाऊन बसलो. बसला अर्धा तास होता. तंबाखू किती तेज होता कोणास ठाऊक ताळ्यावर येण्याचं काही चिन्ह नव्हतं. किती वेळ आता हे चालणार कळत नव्हतं. बरं एक वेळ चक्कर ठीक आहे, पण उलटी हा त्रासदायक भाग. स्थानकावर सुद्धा दोनदा उलटी करून आलो. सोप खाणे, सोबत खडीसाखर सुरूच होते. तेवढ्यात बस आली. मार्गाला लागली. अन १५-२० मिनिटांनी थोडं शांत वाटायला लागलं. परिणाम सोपेचा होता की हिमालयाच्या नितांतसुंदर हवेचा अन वातावरणाचा माहित नाही. मात्र नंतरचा दोन तासाचा प्रवास अपार रमणीय झाला.
दार्जिलिंग. हिमालयाच्या कुशीत वसलेलं एक छोटं शहर. बाहेरगावाहून शहरात येणारा एक रस्ता. तोच पुढे शहराच्या बाहेर काढून देतो. या रस्त्याचा साधारण ८-१० किमीचा पट्टा आणि त्या रस्त्याच्या खाली दोनेक किमी आणि वर दोनेक किमी एवढं हे दार्जिलिंग. साधारण दोन लाख वस्तीचं. तसं हे इंग्रजांनी वसवलं. इथे वस्ती करू लागल्यावर त्यांनी पहाडाच्या उतारावर चहाचे मळे लावले. त्यात काही संशोधने केली. अन येथील चहा जगात सर्वतोमुखी झाला. नंतर हळूहळू पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला आले. वर्षाचे ३६५ दिवस लोक सतत येत जात असतात. परंतु गेल्या वर्षी स्वतंत्र `गोरखास्थान’साठी सात-आठ महिने बंद होता तेव्हा मात्र औषधालाही कोणी आले नाही. कारण मुळात येथील नागरिकच बंदमध्ये १०० टक्के सहभागी होते. जीवनावश्यक सेवा सुद्धा कठीण झाल्या होत्या. एकही दुकान उघडत नव्हते. एकही वाहन चालत नव्हते. आता पुन्हा सगळे सुरळीत सुरु झाले आहे.
शहराचा मुख्य रस्ता पहाटेपासूनच म्हणजे सूर्योदयापूर्वीच फुलू लागतो. कारण सगळ्यांना tiger hill ला जायचे असते. सूर्योदय आणि मुख्य म्हणजे उगवत्या सूर्याची किरणे पडून सोन्यासारखी चमचमणारी कांचनजंगा शिखरे पाहण्यासाठी. जगातील तिसऱ्या क्रमांकाचे हे सगळ्यात उंच शिखर. इ.स. १८५२ पर्यंत हे जगातील सर्वोच्च शिखर समजले जात होते. परंतु १८४९ पासून इंग्रजांनी केलेल्या मोजमाप व अभ्यासानुसार १८५६ मध्ये हे जगातले तिसरे शिखर म्हणून घोषित केले गेले. भारत सरकारने पुन्हा एकदा मोजमाप व अध्ययन करायला काय हरकत आहे? ते असो. अशाच पहाटवारीने अस्मादिक देखील tiger hill ला पोहोचले. पण समुद्र आणि डोंगर किंवा पहाड येथे हवामान कधी साथ देईल आणि कधी दगा देईल सांगता येत नाही. येथेही तसेच झाले. त्या दिवशी सूर्य उगवलाच नाही. त्यामुळे `ही समोर दिसतात ती कांचनजंगा शिखरे’ असे म्हणत परतावे लागले. चहाचे मळे तर रस्ताभर भेटतातच. काही वाटाडे विशिष्ट चहा मळ्यात नेऊन आणतात. त्यात फारसा अर्थ नसतो. सिलीगुडीहून दार्जिलिंगमध्ये प्रवेश करतानाच दार्जिलिंग हिमालयन रेल्वेचे चिमुकले स्थानक लागते. तेथून दार्जिलिंग-जलपाइगुडी अशी चिमुकली गाडी चालते. ती गाडी पाहणे आणि त्या इवल्याशा स्थानकावर टाईमपास करणे हा आनंद आहे. त्या गाडीसाठी आधीच आरक्षण करावे लागते. शिवाय वेळ खूप लागतो. त्यामुळे तो प्रवास केला नाही. पण त्या छोट्याशा गाडीने हिमालयाच्या डोंगररांगा पाहत प्रवास करण्यासाठी पुन्हा दार्जिलिंगला जायचे आहे.
कांचनजंगा, मिनी ट्रेन, चहामळे आणि डोळे निवविणारे मुबलक निसर्गसौंदर्य; यासोबत येथे असलेली महत्वाची गोष्ट म्हणजे भगिनी निवेदिता यांची समाधी. अर्थात तिचे महत्व अगदी बोटांवर मोजता येणाऱ्या लोकांसाठी. बाकी कोणाला ते नावही माहिती नसते. मी मात्र आवर्जून गेलो. नव्हे दार्जिलिंगला जाण्याचे ते प्रमुख कारण देखील होतेच. स्वत:चा देश, माणसे, नाती, भाव सगळे सगळे सोडून पूर्ण अंतर्बाह्य भारतमय होऊन, भारतमातेच्याच चरणी देह समर्पित करणाऱ्या भगिनी निवेदितांना वंदन करणे क्रमप्राप्तच होते. शहराच्या मुख्य रस्त्याच्या खूप खाली उतरत उतरत आपण दार्जिलिंगच्या स्मशान भूमीत पोहोचतो. येथेच निवेदितांची समाधी आहे. आताआतापर्यंत ती पडून होती. अलीकडील १०-२० वर्षात तिची देखभाल होऊ लागली आहे. रामकृष्ण मिशनने ती जबाबदारी घेतलेली आहे. तिथे गेलो तेव्हा स्थानिक वाहिनीचे काही लोक तिथे आले होते. त्यांचे चित्रांकन सुरु होते. मी नागपूरहून आलो म्हटल्यावर कौतुक स्वाभाविक होते. बाहेर पडल्यावर कशाचेही कौतुक होऊ शकते अन कशाचेही .......... असो. तर त्या निमित्ताने तिथल्या टीव्हीवर दिसलो असेन. दिसलो की नाही कोणास ठाऊक. की एडिटिंगमध्ये कट झालो. पण स्मशानभूमीत, तेही एवढ्या दूर हिमालयातल्या एक कोपऱ्यातील स्मशानभूमीत टीव्हीसाठी शूट होऊ असं स्वप्नातही कधी कोणाला वाटू शकेल का? हेच जीवन. साधारण अर्धा तास त्यात गेला. त्यानंतर निवेदितांना निवांत भेटलो. त्यांची छोटीशी मूर्ती आणि त्यावर एक छत्री त्याठिकाणी आहे. चारही बाजूंनी कुंपण घातले आहे. आजूबाजूला झाडी अन अंत्यसंस्कारासाठी काही चौथरे. शिवाय एक शिवमंदिर. निवेदितांच्या मूर्तीपुढे जरा वेळ बसलो. एका अनिर्वचनीय भावाने मन भरून गेले. याच ठिकाणी निवेदिता नावाचा तो देह होत्याचा नव्हता झाला होता. हिमालयाचा शीतल वारा त्यांच्याशी त्या क्षणी काय बोलला असेल? काय हितगुज झाले असेल त्या दोघात? कैलासराणाच्या या घरी तो कैलासपती आपल्या या लाडक्या लेकीशी काय बोलला असेल? ज्या कार्यासाठी देह धारण केला होता ते कार्य आटोपून घरी परतलेल्या आपल्या लेकीला त्या चंद्रमौळीने कसे जवळ घेतले असेल? त्या अलौकिक लेकीलाही काय काय वाटले असेल? तिच्याही भावनांची आंदोलने याच हिमसमीराने कान देऊन ऐकली असतील !! असेच काहीबाही. थोडा वेळ त्या भावात घालवून परत माघारी वळलो. उतरताना काही वाटत नाही, पण तेथून पुन्हा वर येताना मात्र चांगलाच दम निघतो. दोन ठिकाणी टेकावे लागले होते.
दुपारी रामकृष्ण मिशनच्या आश्रमात गेलो. तिथे निवेदिता राहत होत्या. वास्तविक ते डॉ. जगदीशचंद्र बोस यांच्या नातेवाईकांचे निवासस्थान. निवेदिता डॉ. बोस यांच्या पाहुण्या म्हणूनच तेथे मुक्कामाला होत्या. बोस पतीपत्नीही त्यांच्यासोबत होते. तेथेच त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला. बोस दांपत्य त्यांच्या अखेरच्या क्षणी त्यांच्याजवळ होते. ते पडीक घर आता मिशनने घेतले असून ते जसे होते तसे ठेवण्याचे आणि त्यात नवीन भर घालण्याचे काम सुरु आहे. निवेदिता राहत असत ती खोली नीट करण्यात आली आहे. तेथे निवेदितांची तैलचित्रातील मोठी तसबीर आहे. शिवाय मां सारदादेवी आणि निवेदिता यांच्या भेटीचे छायाचित्र फ्रेम करून भिंतीवर लावले आहे. निवेदितांच्या वापरातील वस्तू आहेत. तेथे बसता येते. खालील मजल्यावर श्रीरामकृष्ण प्रार्थना कक्ष आहे. कोणीही नसल्याने आणि कसलाही अडथळा वा गतिरोध नसल्याने दोन्ही ठिकाणी निवांत बसता आले. या महान आत्म्यांसोबत मौन सुखसंवाद करता आला. खिडकीतून होणारे हिमालयाचे दर्शन, हिरव्यागार दाट वनराईचे दर्शन, क्षणात सूर्यप्रकाश तर क्षणात अंधारगुडूप अशा विलक्षण खेळाची साथ आणि सोबतीला हिमशिखरांवरून येणारा शीतल वारा... वेळ कसा गेला कळलेच नाही. पलीकडच्या कक्षात तरुण विद्यार्थ्यांसाठी काही वर्ग चालतात. त्यासाठी काही विद्यार्थी आले तेव्हा गडबड झाली आणि भानावर आलो. येथील आवारातूनही कांचनजंगा पर्वतराजी दिसते. पण निसर्गराजा फार काही दाखवण्याच्या मनस्थितीत नव्हता त्या दिवशी. रामकृष्ण मिशनचा हा प्रकल्प गावाच्या थोडा बाहेर आहे. तिथून रमतगमत पुन्हा शहरात आलो.
- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, १३ जुलै २०१८

मंगळवार, १७ जुलै, २०१८

निरंतर चलनेवाली जीवमान प्रक्रिया है `धर्म'

हम सब मनुष्य है. सुख-दुख, आनंद और अवसाद, आशा और हताशा ऐसी अनेकानेक भावनाओं का अनुभव करते है. उनको व्यक्त भी करते है. इन भावनाओं को अनुकूल बनाने का प्रयास भी करते है. हमारी कई जरूरते होती है. हम उन्हें पुरा करने की कोशीश करते है. वह पुरी होती है तब समाधान होता है और नहीं होती तब कुंठा का अनुभव करते है. भावनाओं और जरूरतों की इस आबाधाबी में हमें स्वयं की और औरो की आवश्यकता होती है. हम स्वयं को स्वयं के साथ और स्वयं को औरो के साथ जुड़ा हुआ और पूरक देखना चाहते है. हम अगर स्वयं के साथ अथवा औरो के साथ बिखराव का अनुभव करते है तो कुछ भी करने में असमर्थ हो जाते है. यह असमर्थता केवल शारीरिक कृति के संबंध मे ही नहीं, अपितु मानसिक, बौद्धिक, आर्थिक, पारिवारिक, सामाजिक कृति के संबंध में भी दिखाई देने लगती है. इस प्रकार का बिखराव ना हो और कर्मों में असमर्थता ना उत्पन्न हो इस दृष्टी से `समाज’ नामक व्यवस्था का विकास हुआ. यह व्यवस्था सुचारू रूप से चलनी चाहिए. यह अनिवार्य है. घोर व्यक्तिवादी मनुष्य भी समाज और उसका सुचारू रूप से चलना आवश्यक मानता है. आज हम ऐसे घोर व्यक्तिवादी बहुत बड़ी मात्रा में देखते है. व्यक्तिवाद, व्यक्तिस्वतंत्रता, मै यही उनका विचार होता है. लेकिन उन्हें भी अपेक्षा होती ही है की- दूरभाष ठीक चले, रेलगाड़ियाँ अच्छी हो और समय पर चलें, कचरे के ढेर साफ होते रहे, बाजारों में सबकुछ उपलब्ध हो और दाम भी योग्य रहें, चैन से सो सके, अपने घर में चोरी न हो, हमारा जीवन सुरक्षित रहे, हम चाहे जितना शोर मचाये लेकिन हम चाहे तब शांति रहे. ऐसी कई बातें गिनाई जा सकती है. इसमें जिन बातो की अपेक्षा करते है उसे ये लोग अपना अधिकार मानते है. और जिनके सहारे ये अपेक्षाएं पूर्ण हो सकती है उनका इन अपेक्षाओं को पूर्ण करना यह उनका कर्तव्य मानते है. जिनसे अपेक्षा की जाती है वह अगर कहें की, आपकी अपेक्षाओं को पूर्ण करना मेरा कर्तव्य नहीं है; या यूँ कहें की- मेरे कर्तव्य का निर्धारण करनेवाले आप कौन हो, मै खुद तय करूँगा मेरा कर्तव्य क्या है, या फिर यूँ की- मेरे भी कुछ अधिकार है और उसे मै प्राथमिकता और प्रधानता दूंगा. इस स्थिति का समाधान क्या होगा और समाधान कौन निकालेगा? यह तो अजीबोगरीब परिस्थिति उत्पन्न होगी. इस स्थिति में काम नहीं चलेगा. आज हम कभी कभी इस स्थिति का अनुभव व्यक्तिगत और सामाजिक दोनों स्तरों पर करते है.

कानून और नियम बनाकर इस स्थिति का समाधान खोजने की कोशीश अक्सर की जाती है. यह कानून और नियम भंग करके अव्यवस्था उत्पन्न ना हो इसलिए न्यायव्यवस्था और दंडविधान का प्रावधान होता है. किन्तु यह कानून और नियम भी औरों का विचार किये बगैर तथा औरों के प्रति सहानुभूति के बगैर ना तो बनाएँ जा सकते है ना उनका पालन और क्रियान्वयन हो सकता है. दो वर्ष पूर्व भ्रष्टाचार के खिलाफ जो महाआंदोलन हुआ वह इस बात का जीताजागता उदहारण है. कितना बड़ा आंदोलन हुआ, बड़ी मात्रा में जागृति भी हुई, सारी संसद ने विशेष अधिवेशन बुलाकर एक आवाज में भ्रष्टाचार के खिलाफ अपनी प्रतिबद्धता जताई और कानून बनाने का संकल्प भी किया. लेकिन अभी तक कानून नहीं बन पाया. अन्यही ऐसे कई उदहारण देखने को मिलते है. दागी जनप्रतिनिधियों के संबंध में या राजनीतिक पार्टियों को सूचना कानून के अंतर्गत लाने के संबंध में तो कानून तैयार करनेवाली व्यवस्था और उसके सुयोग्य क्रियान्वयन की देखरेख करनेवाली व्यवस्था आमनेसामने खडी हो गयी है. दो संरचनाओं ने मिलकर समाज को एकसाथ रखने की और चलाने की जिनकी जिम्मेवारी है उनमे ही जुड़ाव और पूरकता की जगह अगर टकराव और बिखराव रहता है तो समाज का क्या होगा?

मानवी जीवन के कई पहलुओं में इस प्रकार की स्थिति देखने को मिलती है. चिकित्सक और रोगी में टकराव, महिला और पुरुष में टकराव, अमिर और गरीब में टकराव, शिक्षार्थी और अध्यापकों में टकराव, शासन और प्रशासन में टकराव, गावों और शहरों में टकराव, कृषि और उद्योगों में टकराव, विज्ञानं और अध्यात्म में टकराव. ऐसा क्यूँ होता है? एक तो आपसी विश्वास का अभाव और दुसरा अपने अधिकारों का आग्रह. विश्वास यह एक वस्तु नहीं, एक प्रक्रिया है. उसके भी आगे वह chain reaction है. प्रारंभ में विश्वास रखना पड़ता है. उसके लिए आत्मविश्वास और धैर्य की जरुरत होती है. उसके बाद जिस पर विश्वास रखा गया उसकी ये जिम्मेवारी होती है की वह विश्वास तोड़ने के बजाय उसे सार्थ बनाएँ. फिर विश्वास बढ़ता है. दुसरी बार थोड़ी सहजता से विश्वास रख सकते है. इसी प्रक्रिया से विश्वास बढ़ता और सशक्त होता जाता है. यह प्रक्रिया रूकती नहीं है, वह आखिर तक चलती रहनी चाहियें; यह उस प्रक्रिया की विशेषता है. इसके विपरीत अगर होता है तो विश्वास ख़त्म हो जाता है. उसे फिर उत्पन्न करने की भी यही प्रक्रिया है. उसे फिर से प्रारंभ करना पड़ता है. इस प्रक्रिया में दोनों पक्षों की सहभागिता अनिवार्य है. लेकिन फिर प्रश्न उत्पन्न होता है की, विश्वास क्यूँ रखा जाएँ और उस विश्वास को क्यूँ निभाया जाएँ? जब तक दोनों पक्षों को एक दुसरे के प्रति स्नेह और लगाव नहीं लगता, विश्वास की यह प्रक्रिया प्रारंभ ही नहीं होती. अधिकारों के आग्रह के संबंध में भी यही निष्कर्ष निकालना पड़ता है की, जब तक `मै’ की बजाय `हम’ का अनुभव नहीं होता तब तक अधिकारों की ही बात चलती है. बाकि तो छोड़ दीजियें, मातापिता या परिवार का कोई सदस्य अगर अधिकारों की बात करते है तो परिवार में अशांति उत्पन्न होना अवश्य है. अधिकार और कर्तव्य की यह प्रक्रिया भी दोनों पक्षों की सहभागिता चाहती है. हर किसी को इस बात का ध्यान रखना चाहिए की दुसरे के अधिकार की रक्षा हो रही है या नहीं. अधिकार नाम की बात गलत नहीं है. लेकिन उसका ख्याल रखने की जिम्मेवारी स्वयं की नहीं दूसरों की है. जब वह जिम्मेवारी नहीं निभाई जाती तब टकराव उत्पन्न होता है. प्रश्न फिर वही उत्पन्न होता है की, दूसरों के अधिकार की रक्षा का ध्यान मै क्यूँ रखू? यह प्रक्रिया भी अंत तक चलनी चाहिए लेकिन, आपसी एकत्व की अनुभूति के अभाव में वह नहीं हो पाता.

विश्वास और अधिकार रक्षा के लिए जो एकत्व की अनुभूति चाहिए, वह कैसे हो यह मूल प्रश्न है. दैनंदिन जीवन मे, रोज के कामो मे तो एकत्व की जगह विभिन्नताही दिखाई पडती है. हरेक का रुपरंग तो अलग है ही, साथ साथ जरुरते- आदते- विचार- bhavanayeभावनाएं- अपेक्षाएं- रुचियाँ- खामियाँ- कौशल- सब कुछ अलग अलग है. अगर कहीं कुछ मेल खा जाता है तो उस बातों में स्तर विभिन्न है. लेकिन यह विभिन्नताएं बाह्य प्रकृति का लक्षण है. सब प्रकार की विविधताओं के बिच भी आंतर प्रकृति में एकताही अनुभूत होती है. उसमे भी एक अजीब बात है. आंतर प्रकृति की दुख, वेदना, अभाव, त्रासदी अन्याय यह बातें एकत्व का अहसास कराती है. लेकिन सुख, आनंद, उल्लास आदि बातें एकत्व के स्थान पर ईर्ष्या, द्वेष, ऊँचनिचता ऐसे भाव पैदा करती है. एकत्व उत्पन्न करने के लिए भी प्रयास किये जाते है. उसका थोडाबहुत परिणाम तो होता है. किन्तु स्थायी और आश्वस्त करनेवाला परिणाम कम होता है. इसीलिए हम देखते है की, त्यौहारों में लोग एकत्र आते है, घुमने फिरने जाते है, खातेपिते है, एकदूसरे की कुछ मदद भी कर लेते है. लेकिन इतना सब होने के बाद भी आपस में झगड़े, टकराव, मनमुटाव, पीठ पीछे बातें करना, एक दुसरे की टांग खींचना, आपस में टांग अडाना यह भी होता है. कई बार बहुत घुलेमिले लोग भी बिखर जाते है. रिश्तेनाते, दोस्ती टूट जाती है. इतनाही नहीं इसमें से बड़ी मात्रा में कटुता भी उत्पन्न होती है.

इस पुरे विश्लेषण को हम संक्षेप में यूँ रख सकते है- आपसी एकत्व की अनुभूति के अभाव में संसार में सब कुछ या तो रुक जाएगा, या फिर अव्यवस्था की स्थिति होगी. एकत्व की अनुभूति जितनी मात्रा में हो उतनी मात्रा में मनुष्य जीवन सुचारू रूप से चलेगा. उतनी मात्रा में सुख-शांति का अनुभव होगा. लेकिन सहजता से होनेवाला अनुभव तो भेदों का ही है. एकत्व उत्पन्न करनेवाले प्रयासों का परिणाम भी अपेक्षाकृत नहीं है. तो फिर प्रश्न उत्पन्न होता है की, सुख-शांतिपूर्ण मनुष्य जीवन के लिए अपरिहार्य इस प्रकार की इस एकता का अहसास कैसे होगा? हिन्दू चिंतन यह कहता है की, यह एकता उत्पन्न करने की आवश्यकता ही नहीं है. यह एकताही विद्यमान है. विभिन्न चीजों को एक करने के प्रयास विफल होंगे ही. अगर चीजे अलग अलग है तो उसमे एकत्व नहीं हो सकता. हमें एकत्व की चाह है, उसकी धुंदली ही क्यों न हो, लेकिन अनुभूति के बगैर हम जी ही नहीं सकते. बस बात तो केवल इतनी है की किसी अनजाने कारण से हम इस एकत्व को भूल गए है. हमें उसे फिर से केवल मन में जगाना है.

एकत्व कहते ही हमारे मन में कुछ विशिष्ट चित्र उत्पन्न होता है. सब लोग एक जैसा पहनावा करें, सब लोग एक साथ खाएं, सब लोग एक साथ रहें, सब लोग एकही बोली बोलेन, सब लोग समान रूप से सोचें, सब लोग समान रूप से उपासना करें, स्वयं की रूचि- अरुचि- जरूरतें- इनका बलिदान करें. इसमें होता यह है की, जो लोग प्रभावशाली है, ताकतवर है उनकी ही बात सब पर लागु होती है और वह बात सब के मन की भावना के रूप में प्रस्तुत की जाती है. हर कोई स्वयं में उसके अनुसार परिवर्तन करें ऐसी अपेक्षा की जाती है. एकत्व की जो भी प्रमाणिक बात होती है या एकत्व के जो भी प्रामाणिक प्रयास होते है उनमे अधिकतर इसी बात को देखा जा सकता है. हमारी लोकतांत्रिक व्यवस्था इसका एक उदहारण है. हमारी कुटुंब व्यवस्था में भी यही देखने को मिलता है. उदाहरण के तौर पर सब लोगों के साथ अधिक से अधिक समय बिताने की बात को लें. जो प्रतिभावान लोग होते है, साहित्यिक या कलाकार होते है, लेखक होते है, वैज्ञानिक होते है, साधक होते है; उनकी अपनी अलग जरूरतें होती है. सब के साथ जादा समय बिताने के बजाय एकांत में समय बिताना उनकी जरुरत होती है. या फिर पत्नी को इच्छा हो सकती है की पति अधिक समय अपने साथ बिताएं, रोज घुमाने ले जाएँ या साथ घुमने चलें आदि. लेकिन व्यक्ति के संपूर्ण विकास के लिए क्या यह पूरक हो सकता है? किसी कला या साहित्य से खुद को जोडना, बगीचे में या खेती में काम करना, साधना करना, सामाजिक कामों में भाग लेना ऐसी चीजों के लिए समय व्यतीत करना क्या गलत है? लेकिन ऐसी बातों पर झगडे होते है. तो, कभी कभी व्यक्तिवाद के अतिरेक के कारण मेल बिठाना मुश्किल होता है और कभी कभी व्यक्ति के न्यायपूर्ण जरूरतों को दबाने की स्थिति उत्पन्न होती है.

इस दुविधा से निपटने के लिए हमें एकत्व के सही अर्थ को समझना पडेगा. एकत्व का सही आशय है आंतरिक  एकत्व. एकत्व यह मनुष्य के अंतर का भाव है. उसे बाहरी रूपों या गुणों पर थोपना गलत होगा. जब तक हम बाहर की बातें ही देखते और सोचते रहेंगे तब तक आंतरिक एकता की अनुभूति हम से दूर भागेगी. इसके दो अर्थ है- स्वयं के बारें में स्वयं की दृष्टी से सोचना और दूसरों के बारें में उन्ही की दृष्टी से सोचना. अर्थात- मुझे अगर पुस्तक पढने में रूचि है, या उस में मै रमता हूँ, वह मेरी जरुरत है तो मुझे उसी तरह से सोचना और व्यवहार करना चाहिए. और लोग पुस्तक पढने के विषय में या मेरे पुस्तक पढने के विषय में क्या सोचते है इसका विचार करने की आवश्यकता नहीं. लेकिन साथ ही कोई और अगर खानेपीने में आनंद का अनुभव करता है तो, मुझे उसका आदर करना चाहिए. मै अपना पुस्तक बाजु में रख दूँ यह दुसरे का आग्रह, या दूसरा अपना खानापीना दूर रखे यह मेरा आग्रह; यह दोनों बातें गलत कहनी पडेगी. स्वयं के और दूसरों के अंतर के बारें में सोचना इसके लिए आवश्यक है. यही है आध्यात्मिकता. भगवान के बारे में सोचना यह आध्यात्मिकता नहीं है. स्वयं के और दूसरों के अंतर के बारे में सोचने में, समझने में जहाँ तक भगवान की सहायता होती है, स्वागतयोग्य है. अन्यथा वह मात्र एक आदत बनकर रह जाएगी. इस आध्यात्मिकता का प्रमाण जितना अधिक होगा उतना ही व्यक्तिजीवन, समाजजीवन, राष्ट्रजीवन और विश्वजीवन शांति से और सुचारू रूप से चलेगा. इसका अभाव कुंठा और अशांति को जन्म देगा.

लेकिन एक प्रश्न फिर भी सामने खडा होता है. वह है- स्वयं की आध्यात्मिकता और लौकिक आवश्यकताएं इनका मेल किस प्रकार बिठाना? स्वयं की आध्यात्मिकता और दूसरों की आध्यात्मिकता इनका मेल कैसे बिठाना? स्वयं की आध्यात्मिकता और दूसरों की लौकिक आवश्यकताएं इनका मेल किस प्रकार बिठाना? स्वयं की लौकिक आवश्यकताएं और दूसरों की आध्यात्मिकता इनका मेल किस प्रकार बिठाना? इसके लियें कोई सार्थक उत्तर हो नहीं सकता. उसके लिए केवल एक मार्गदर्शक सूत्र हो सकता है. वह सूत्र है- क्या हम व्यापकता की ऑर बढ रहे है? हमें व्यक्तिगत रूप से, सामूहिक रूप से, राष्ट्रीय रूप से, वैश्विक रूप से व्यापकता की ऑर ले जाने वाली बातें, कृतियाँ योग्य है ऐसा समझना चाहिए. हमारे कर्मों से औरों को कोई नुकसान ना हो या तकलीफ ना हो यह सतत देखने की बात है. हर किसी को इसके लिए चौकन्ना रहना चाहिए. किन्तु संपूर्ण विश्व इस प्रकार सोचेगा या इस दिशा में प्रयास करेगा यह तो संभव नहीं है. इसीलिए कई व्यवस्थाओं का निर्माण होता है. लेकिन यह व्यवस्थाएं व्यापकता की ऑर बढने में सहायता करनेवाली होनी चाहिए. इसीलिए लचिली भी होनी चाहिए. यही धर्म है.

धर्म किसी व्यवस्था का नाम नहीं है. न ही वह कोई निश्चित नियम और रचना है. धर्म तो एक जीवमान प्रक्रिया का नाम है. स्वयं के और औरों के अंतर को सोचते सोचते और समझते समझते इस संपूर्ण अस्तित्व के अंतर को सोचने और समझने की प्रक्रिया का नाम है धर्म. इस संपूर्ण अस्तित्व के साथ एक हो जाना यह उस प्रक्रिया का चरम बिंदु है. तब तक यह प्रक्रिया चलती रहती है, रहनी चाहिए. स्वयं की और दूसरों की आध्यात्मिकता और लौकिकता इनका मेल बिठाते बिठाते व्यापकता की ऑर बढने की जो निरंतर चलनेवाली प्रक्रिया है उसीका नाम है धर्म. यह धर्म व्यक्तिजीवन, समाजजीवन, राष्ट्रजीवन, विश्वजीवन का आधार है. उसे ठीक से समझकर चरितार्थ करना यही विश्वशांति की और सहअस्तित्व की अनिवार्य आवश्यकता है.

- श्रीपाद कोठे
- ५६ बैंक कॉलोनी
- भगवाननगर, नागपुर- २७.

शनिवार, ७ जुलै, २०१८

बंगदेशी ६


तो दिवस शांतीनिकेतनचा होता. त्या दिवसाची सुरुवात आदल्या रात्रीच झाली होती. शांतीनिकेतनसाठी बोलपुरला जावे लागते. रेल्वे स्थानक बोलपूरचे. तेथून २-३ किमीवर शांतीनिकेतन. बोलपूरसाठी गाडी सकाळी सहा वाजता सियालदावरून. सकाळची वेळ असल्याने वेळ कमी लागणार तरीही बेफिकीर राहून चालणार नाही. त्यामुळे जाण्याचा अर्धा तास. Taxi वेळेवर मिळते न मिळते त्यासाठी अर्धा तास. म्हणजे पाच वाजता तरी निवास सोडावा लागणार. त्याआधी तासभर आवरायला, तयारीला. म्हणजे चार वाजता उठणे भाग. सकाळी उठण्यासाठी स्वत:वर अमाप विश्वास असल्याने अर्धा तास आधी म्हणजे साडेतीन वाजताचा गजर लावला. शिवाय चौकीदाराला आवाज द्यायला सांगून ठेवले. त्याआधी निवासापुढे taxi नाही मिळाली तर कुठे मिळेल त्याची विचारणा करून तेथवर पायी जाऊन आलो. किती वेळ लागेल इत्यादी गणिते मनाशी करून ठेवली. स्वत:ला स्वत:ची साथ चांगली मिळाली. साडेतीनला गजर वाजल्यावर पावणेचारला उठलो. तयारी करून रस्त्यावर आलो. हमखास taxi मिळेल या आश्वासनाचा काहीही उपयोग नाही हे लक्षात यायला फार वेळ लागला नाही. मग आदल्या रात्री पाहून आलेल्या सार्वजनिक इस्पितळाच्या दिशेने पावले उचलली. तिथे पोहोचण्यापूर्वीच एक गडी आपल्या गाडीला अभ्यंगस्नान घालीत असलेला दिसला. त्याला भीतभीतच विचारले. हो, आंघोळीला किती वेळ लागतो अन किती नाही. पण तो तयार झाला. म्हणाला घड्याळ लावा- दहा मिनिटात निघू. गड्याने शब्द पाळला. सियालदाला वेळेत पोहोचून बोलपूरचा प्रवास सुरु झाला. झुंजूमुंजू होण्याच्या वेळेचा सियालदा-बोलपूर प्रवास... बस, एकदा करावा... एवढेच. दोन तासाच्या प्रवासात अखंड सोबत असते कमलपुकुरांची. खिडकीबाहेरची नजर आत वळवण्याची इच्छाही होत नाही अन आठवणही. छोटेमोठे तलाव. त्यात फुललेली वा फुलणारी कमलपुष्पे. त्यांचे फुलणे उत्सुकतेने पाहणाऱ्या कमलकलिका. त्यांच्यावर मायापाखर करणाऱ्या कोवळ्या सुवर्णरश्मी. चुकार पाखरे, त्यांचे बागडणे, त्यांचे गाणे, बोलणे; सगळे आपल्याला सोबत घेऊन जाणारे.
बोलपूर छोटेसे स्थानक. रवींद्रनाथांच्या विश्वभारतीमुळे लोकांची येजा असते त्यामुळे दखलपात्र. अन्यथा कोणत्याही मुक्या स्थानकात गणना व्हावी असे. स्थानकाबाहेर आले की, सरळ `टोटो’त बसायचे. टोटो म्हणजे ई-रिक्षा. हे रिक्षा तुम्हाला सरळ विश्वभारतीला घेऊन जातात. हवं असेल तर संपूर्ण विश्वभारती फिरवून आणतात आणि परत बोलपूरला सोडूनही देतात. तुमचा कार्यक्रम असेल तसे. अशाच एका टोटोने शांतीनिकेतनात दाखल झालो. इ.स. १८६१ मध्ये देवेंद्रनाथ ठाकूर यांनी ही जागा घेतली. त्यावेळी तेथे असलेल्या एकमेव इमारतीत निरीश्वर ब्रम्हाची उपासना सुरु केली. त्यासाठी लोकांना हाकारले. लोकही आलेत. आश्रम सुरु झाला. आज त्या इमारतीला काचेचे असल्याने काच मंदिर, उपासना मंदिर, ब्रम्हमंदिर म्हटले जाते. या ठिकाणी देवेन्द्रनाथांना शांती लाभल्याने त्यांनी नामकरण केले शांतीनिकेतन. हळूहळू लोक येऊ लागले. भोवती गाव वसले. त्या गावाचे नाव पडले शांतीनिकेतन. त्या दिवशी विश्वभारतीत विशेष कार्यक्रम होता. काच मंदिरातील प्रार्थना आटोपली होती आणि आम्रकुंजात `माधोबी वितान’च्या पार्श्वभूमीवर रवींद्र संगीताचा कार्यक्रम सुरु होत होता. टोटोतून उतरून कार्यक्रमात जाऊन बसलो. ब्रम्ह कसं आहे यावर उपनिषदे म्हणतात- आनंदम ब्रम्हेती. त्यामुळे ब्रम्होपासक ठाकूरांच्या या विश्वभारतीत सगळा आनंदाचा बाजार. कोण, कुठला, कुठे चालला काही नाही. संगीताचं नवीन दालन विकसित करून समृद्ध करणाऱ्या रवींद्रनाथांच्या नावानेच पुढे ओळखल्या जाऊ लागलेल्या रवींद्र संगीताचा श्रुतीमधुर कार्यक्रम दोनेक तास चालला. आजी माजी विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक, पाहुणे, आगंतुक असे सारे मिळेल तेथे बसून संगीतात रमले होते. विश्वभारतीच्या वैशिष्ट्याप्रमाणे झाडांच्या सावलीतच कार्यक्रम सुरु होता. कार्यक्रम आटोपला. परिसर न्याहाळत थोडा वेळ घालवला. सगळे हळूहळू आपापल्या मार्गाने जात होते. मैदानात पलीकडे संध्याकाळच्या नाटकासाठी मंच उभारणे सुरु होते. एका झाडाखाली चार-पाच जण बोलत उभे होते. त्यांच्याजवळ गेलो. परिचय दिला आणि विश्वभारती पाहायला आल्याचे सांगितले. त्यातील एक होते सलील सरकार. विश्वभारती हेच ज्यांचे विश्व आहे असे एक शिक्षक. अन त्यांच्याशी बोलत होता केरळचा अरिजित राय. अरिजितने येथील institute of rural reconstruction मध्ये शिक्षण घेतले आहे. मी विश्वभारती पाहायला आलो याचा त्यालाच माझ्याहून जास्त आनंद झाला. तो स्वत:च म्हणाला- चला, मी दाखवतो. सलील सरकार यांचा निरोप घेऊन निघालो. अरिजित समरसून दाखवत होता, सांगत होता. हे ब्रम्ह मंदिर, हा आम्रकुंज, ही माधवीलता, हे पाठभवन, हे संगीत भवन, हे कला भवन, हे घंटाघर, हे छातीमताला, या मुलींच्या वसतिगृहात इंदिरा गांधी राहत असत... दमट हवामानामुळे येणारा घाम पुसत अरिजित सांगत होता. जाताजाता वाटेत बकुळ लागली. एकीकडे त्याचे बोलणे ऐकत बकुळीची ओंजळभर फुले वेचून घेतली. तेवढ्यात तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीकडे बोट दाखवून अरिजित सांगू लागला- `हा माणूस रोज इथे येतो. ३६५ दिवस. काहीही काम नसतं. फक्त येतो. बसतो मनास येईल तेवढा वेळ अन निघून जातो. तो इथे वर्तमानपत्र टाकत असे. वेडा झाला. पण विश्वभारती मनात तसंच राहिलं.’ हे ऐकताना मानवी वेडेपण डोक्यात नाचू लागलं. अरिजितला म्हटलं- `रवींद्रनाथ नावाच्या वेड्याला भेटायला हा दुसरा वेडा येतो.’ तोही हसला.
अरिजितसोबत कलाभवनला पोहोचलो. तिथे त्याने एका मराठी मुलाची ओळख करून दिली. पण त्यांची परीक्षा सुरु असल्याने त्याच्याशी बोलताबसता आले नाही. अरिजितलाही काम होते. मी काही त्याची वेळ घेऊन गेलो नव्हतो. तो निरोप घेऊन गेला. सूचना देऊन गेला. समजावून गेला. तो गेल्यावर कलाभवनच्या परिसरात एका झाडाखाली बसलो. शेजारीच रामकिंकर दा या प्रसिद्ध शिल्पकाराने घडवलेला गांधीजींचा पुतळा आहे. प्रतिकात्मक अशा पद्धतीने गांधीजींच्या पायाखाली एक मानवी सांगाडा शिल्पित केला आहे. त्या पुतळ्यावरून बराच वाद झाला होता अन त्यावर बंदीही घालण्यात आली होती. पण तो सारा इतिहास आहे. परिसरात विद्यार्थी येत जात होते. थोडा वेळ परिसराचा आस्वाद घेऊन शेजारच्या खानपानगृहात गेलो. तिथे चविष्ट पुरीभाजीचा आणि फक्कड चहाचा आनंद घेऊन बाहेर पडलो. आवाराबाहेर येऊन रस्त्याने जाणारी टोटो पकडली. त्याने विश्व भारतीचा सगळा परिसर दाखवला. सोबत त्याची running commentary पण होतीच. अर्थात त्याशिवाय फिरण्याला अर्थही राहिला नसता. रवींद्रनाथांचे घर, संग्रहालय, विद्यापीठाच्या विविध वास्तू, जुनी झाडे, इमारती तो दाखवत आणि सांगत होता. अमर्त्य सेन जिथे राहत त्या बंगल्यासमोर अनेक मे-फ्लॉवर दाटीवाटीने फुलले होते. बंगाली संस्कृतीची ओळख करून देणारे एक शिल्पग्राम देखील विद्यापीठ परिसरात आहे. तिथे राणी मां गैदिन्ल्यू, बिरसा मुंडा, तिलक मांझी यांच्यासह अन्य काही वनवासी योद्ध्यांचे पूर्णाकृती पुतळे आहेत. तसेही विश्वभारतीच्या मूळ प्रकृतीशी हे साजेसेच आहे. विश्वभारतीला सुरुवात झाली तेव्हा तेथे वार्षिक हिंदू मेळा आयोजित करण्यात येत असे. त्याद्वारे देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करण्याचा प्रयत्न होत असे. पुढे ते मागे पडले. त्याच्या स्मृतीही मागे पडल्या. परंतु हे पुतळे मात्र त्या भावनेशी सुसंगतच ठरतात. या शिल्पग्रामात ओरिसातील ग्रामीण घर, मंदिर यांचीही रचना पाहायला मिळते. ओरिसा आणि बंगाल तसे एकमेकांशी पुष्कळ जोडलेले आहेतच. हस्तकलेचा एक इवलासा हाटही तिथे भरला होता. बाऊलसाठी वापरले जाणारे एकतारी वाद्य हे एक आकर्षण अन लोभ होता, पण प्रवासात ते आणणे शक्य नसल्याने मनाला आवरले. त्या वाद्यालाच बाऊल म्हणतात अशी माहिती एकाने दिली. अर्थात माझ्या माहितीप्रमाणे बाऊल हा एक भक्तीपंथ आहे. अर्थात तो विषय विद्वानांचा अन अभ्यासकांचा आहे. आपण आपले ऐकून हो म्हणावे. कसे? हाटाशेजारच्या मैदानावर एका कार्यक्रमाची तयारी सुरु होती. अन तेथे लडिवाळ असे `आमी चीनी गो चीनी’ वाजत होते.
टोटोने विश्व भारतीजवळील हरिणांसाठी राखीव असलेले जंगल, चामडी वस्तू तयार करणारा, ग्रामीण महिला पुरुषांना रोजगार मिळवून देणारा कारखाना, चामडी वस्तू, बटिक प्रिंटचे कापड विक्रीचे दुकान असे सगळे दाखवले. या दुकानाच्या शेजारीही एका झाडाखाली एक कलाकार बाऊल गीते गात बसला होता. त्याच्या गाण्याच्या तालावर सात बदकांची एक रांग त्याच्या डावीकडून आली आणि डौलात चालत चालत, परिसरातील सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आणि पाहणाऱ्या साऱ्यांकडे दुर्लक्ष करत; उजव्या बाजूच्या अमलताश, चाफा, बकुळ, जास्वंद यांच्या बनात निघून गेली. तेथे थोडा वेळ घालवल्यावर परतताना टोटोने विश्वभारतीला जोडून उभारण्यात आलेले श्री निकेतन दाखवले. ग्रामीण पुनरुत्थान आणि महिला सबलीकरण ही श्री निकेतनची उद्दिष्टे. उन उतरणीला लागलं होतं. विश्वभारती पाहून झालं होतं. रवीन्द्रनाथ आठवून, साठवणं सुरु होतं. रवींद्रस्मृतींचा, श्यामोलीचा, आम्रकुंजाचा, अन तेथील लाल मातीचा गंध भरून घेत निरोप घेतला. अरिजितला फोन करून बोलावून घेतले. त्याचे हात हाती घेऊन त्याचाही निरोप घेतला. त्याच टोटोने बोलपूर स्थानकावर परतलो. गाडीला अवकाश होता आणि त्यातच भर म्हणजे एक तास विलंबाने येणार होती. करायला काहीच नव्हते. पण करायला काहीच नसणे ही समस्या नसलेल्या लोकांपैकी मी असल्याने, चहाचा पेला घेतला आणि एका सिमेंटच्या बाकड्यावर जाऊन बसलो निवांत. अशा वेळी जे जे आपल्या वाट्याला येतं, तो बोनस असतो. माणसांचा, अनुभवांचा, निसर्गाचा, आनंदाचा, दु:खाचा; कशाचाही. दोन घोट घेतले आणि पायाशी एक कुत्रा येऊन बसला. पुढला तासभर तो तसाच पायाशी बसला होता. त्याचा उद्योग एकच- बाकड्याच्या पाच फूट अंतरावरून जाणाऱ्या लोकांवर ओरडणे. बाकी काहीच नाही. कोणी जवळ आलं की ओरडायचं, पुन्हा गुपचूप बसून राहायचं. कधी कधी झोपल्याचं सोंग घेऊन. कारण झोपून असला तरीही माणूस जवळ आलं की हा पठ्ठा ताडकन उठणार. तासभर हा प्रकार सुरु होता. मी तिथून गाडीसाठी जाईपर्यंत. जणू माझा राखणदार म्हणूनच त्याची नियुक्ती होती. काहीच नसताना अशा गोष्टीही मौज वाटतात. परंतु आणखीन एक छान बोनस माझ्या पदरी पडणार होता, ज्याची मला कल्पना नव्हती.
चहा पिऊन झाला. पैसे देऊन झाले. इकडे तिकडे पाहत असतानाच पल्याडच्या फलाटाला लागून असलेल्या भल्या मोठ्या चिंचेच्या झाडाने लक्ष वेधून घेतले. शेकडो कावळ्यांचे त्या झाडावर संमेलनच भरले होते जणू. सगळे एका सुरात कावकाव करत. थोडा वेळ कावकाव झाली की सगळे एकसाथ आकाशात भरारी घेत. थोड्या घिरट्या घालत. मग इकडे तिकडे; कुणी फलाटावर, कुणी बाकड्यांवर, कुणी गाड्यांवर, कुणी जिन्यावर, कुणी कुठे, कुठे; जाऊन बसत. हळूहळू पुन्हा चिंचेच्या झाडाकडे परतत. सगळे गोळा झाल्याचे कसे कळत असेल ठाऊक नाही. पण सगळे जमले की पुन्हा एकाच सुरात कावकाव. ही कावकाव सुरु होई त्यावेळी एकही कावळा अन्यत्र दिसत नसे. कावकाव संपली की उड्डाण. पुन्हा सगळे चक्र. अगदी तल्लीन होऊन त्यांचा हा संध्याखेळ सुरु होता. मीही तल्लीन होऊन निसर्गाचा तो सुंदर विभ्रम पाहत होतो. मनात आले- रवींद्रनाथांनी असे कावळे पाहिले असतील का? त्यांनी कावळ्यांवर लिहिले आहे का मला ठाऊक नाही. पण लिहिण्याचा मुद्दा आला तेव्हा सहजच माउली आठवून गेलीच. अर्थात माउलीचा कावळा एकच होता. इथे अनेक कावळे कोकत होते. अन मीही त्यातील प्रत्येक काऊ कोणता शकून सांगतोय हे शोधत होतो. बोलपूर स्थानक मनात घट्ट बसलं आणि परतीच्या गाडीत बसलो.
कोलकात्याला पोहोचलो. प्रीपेड taxi केली. गाडीत जाऊन बसलो. गाडी बाहेर काढता काढता चालक म्हणाला- अमुक रस्त्याने वाहतूक खोळंबली आहे, आपण अमुक रस्त्याने जाऊ. अमुक एवढ्यासाठी की मी कोलकतेकर नसल्याने रस्ते लक्षात नाहीत. म्हटले- बरे. तर म्हणाला- तीस रुपये जास्त द्याल. मध्ये टोल पण आहे. मी काही बोललो नाही. गाडी चालू लागली. मधे टोल नाका आला. त्याने हात मागे केला. म्हणाला- १० रुपये. मी २० ची नोट दिली. त्याने पैसे दिले. पावती अन दहा रुपये परत घेतले अन समोर ठेवले. मुक्कामी पोहोचलो. त्याने हात पुढे केला. तो तीस रुपये म्हणाला होता. २० मी दिले होते. म्हणून १० ची नोट पाहिली. ती नव्हतीच. गाडी चालकच बोलला- जाऊ द्या २० देऊन टाका. म्हणजे वाहतूक खोळंबा हे कारण यासाठी होते. माझ्या स्वभावाप्रमाणे एखादा शब्द तरी बोलायला हवा होता पण विश्वभारतीच्या तंद्रीतून बाहेर पडायला मन तयार नव्हतं. त्यामुळे सोडून दिलं. उतरताना मनाने एक नोंद मात्र केली. ही taxi नवीन आलेल्या पांढऱ्या निळ्या taxi पैकी होती. काळ्यापिवळ्या जुन्या taxi पैकी नव्हती. आधीचे जुन्या गाडीवाल्यांचे दोन अनुभव आणि हा नवीन गाडीवाल्याचा अनुभव; मानसिकतेचा बदल सांगून गेले.
विश्वभारतीचा दिवस संपला होता. आज अशी विद्यापीठे, त्यांचे परिसर, निसर्गाच्या साथीने शिक्षणाचे प्रयोग, गुरुकुल पद्धतीचे प्रयोग अन्यत्रही सुरु झाले आहेत. त्यामुळे त्या अर्थाने कदाचित तिथे खूप काही मिळेल असे नाही. पण आजपासून शंभर वर्षांच्या आधी असा प्रयोग करण्याचे ऐतिहासिक महत्व, धाडस, जमीनदार असून शिक्षण- कला- साहित्य- देशभक्ती- यांचा घेतलेला ध्यास; अन हा ध्यास घेणारे मोठ्या उंचीची प्रतिभा लाभलेले रवींद्रनाथ तेथे ३०-३२ वर्षे वावरलेत, तिथल्या मातीशी- निसर्गाशी एकरूप झालेत; त्या निसर्गात त्यांचे श्वास मिसळून गेलेत, अन तेथील लाल मातीत त्यांची पदचिन्हे रुतली- रुजली हा भाव; हे मात्र फक्त शांतीनिकेतनातील विश्वभारतीतच लाभू शकते. सकाळी वेचलेली बकुळफुले खिशातून काढून टेबलवर ठेवली. त्यांचा सुगंध पसरला आणि दिवा मालवून निद्रेला पालवू लागलो.
- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, ७ जुलै २०१८