गुरुवार, ६ डिसेंबर, २०१८

टीवटीवाटी आगाऊपणाची चिकित्सा – ३


ज्याला भारत विविधता म्हणतो त्याला त्यांनी विषमता असे नाव दिले. हे जग कुणीतरी त्याच्या लहरीने तयार केले आणि त्यातील discrepancy दूर करणे हे आपले काम आहे असे ते मानतात. तर या विश्वात मूलभूत विविधता आहेत. प्रत्येक गोष्टीचे अंगभूत गुणधर्म आहेत, त्याची बलस्थाने आणि मर्यादा आहेत, माणूस या सगळ्यावर अधिराज्य गाजवायला जन्माला आलेला नाही; ही भारताची धारणा आहे. त्यामुळेच इच्छा, आकांक्षा, गरजा, भुका, मन, बुद्धी; या साऱ्याचा आणि त्यांच्या अखंडपणे चालणाऱ्या विभ्रमांचा सतत आढावा आणि व्यवस्थापन करावे लागते; असे भारत म्हणतो. अन्य लोकांना मात्र हे मान्य नाही. त्यांच्या मते मानवी मनात आलेली, बुद्धीला सुचलेली प्रत्येक गोष्ट साकार करणे, प्राप्त करणे हा केवळ अधिकारच नव्हे, तर जीवनमरणाचा प्रश्न असतो. भलेही नंतर त्यातील फोलपणा लक्षात येईल आणि त्यामुळे वैफल्य वाट्याला येईल. भारत नेमका याच्या वेगळा विचार करतो. त्यामुळे व्यक्तिगत गोष्टींना आळा घालण्यात काही गैर नाही असे त्याला वाटते. जगालाही आज तसे वाटू लागले आहे. नीतीमत्ता खुंटीला टांगून ठेवणारा आणि उपभोगवादाशी सांगड घातलेला इहवाद आज जगालाही चटके देऊ लागला आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, सुख, शांति अशी जी स्वप्ने माणसाने बाळगली त्या साऱ्यांना या इहवादाने हरताळ फासला आहे. नुकतेच अमेरिकेतील black Friday sale चे काही व्हिडीओ पाहण्यात आले. त्यासाठी उडालेली झुंबड आणि तिथल्या अधिकाधिक वस्तू ताब्यात घेण्यासाठीचा हपापलेपणा आणि धावपळ तेथील एकूण आर्थिक आणि सामाजिक स्थितीची कल्पना देत होते. आर्थिक विषमता, शारीरिक-मानसिक रोग, जीवनाविषयीची निरर्थकता, हिंसा, भावनिक रिक्तता, भय, anxiety, तांत्रिकतेचा भस्मासूर अशा अनेक बाबींनी ग्रस्त होत जाणारी मानवजात आज भांबावल्यासारखी झाली आहे. तिचा जीवनप्रवाह कुंठीत झाल्यासारखा वाटतो आहे. विचार, प्रयत्न, धडपड यांचे डबके तयार झाले आहे. या डबक्यातून बाहेर पडण्यासाठी, जीवनाचा प्रवाह वाहता करण्यासाठी जी दृष्टी, बुद्धी, धाडस हवे त्याचा अभाव जाणवतो आहे. हा अभाव दूर करणे इहवादाला शक्य नाही हे कधीकधी, कुठेकुठे जाणवते पण ते मान्य करण्यात मानवी अहं आणि मानवी बुद्धीची दांभिकता आड येते. गेली पुष्कळ शतके जो विचार, जे तत्वज्ञान, ज्या धारणा, ज्या भावना उराशी बाळगले; ज्याचा उदोउदो केला; जे अभिनिवेशाने जगासमोर ठेवले; या साऱ्याचे मनबुद्धीवर जे संस्कार झाले; ते पुसून नवीन पर्व सुरु करणे तसेही कठीण असणारच.
भारताच्या संदर्भात मात्र स्थिती जरा वेगळी आहे. हजारो वर्षांच्या अनुभवाच्या, जीवनाच्या, विचारांच्या प्रभावाने भारताने या नीतीशून्य उपभोगवादी इहवादाला सहजासहजी स्वीकारलेले नाही. गेली अनेक दशके या दोहोत संघर्ष सुरु आहे. दुसरीकडे कालचक्राचा फेरा म्हणा किंवा या समाजाचे नाकर्तेपण म्हणा किंवा अन्य काहीही; पण या समाजाची ऐहिक वाताहत झाली होती. त्यामुळे एक संपन्न, सुखी, सर्वसमावेशी ऐहिक जीवन उभे करणे हेही भारताच्या प्राधान्यक्रमात आहे. चांगुलपणा आणि संपन्नता यांनी भारताबाहेरील विविध शक्तींनी भारताचे जे लचके तोडले, जी दुर्दशा केली; त्यातून उभे राहणे हेही आव्हान आहे. जुने तत्वज्ञान, जुने संस्कार, जुनी मूल्यव्यवस्था; ऐहिकतेची पूर्ती; अन जागतिक प्रवाहांचा मारा; या तीन अंगांनी भारतीय सामाजिक जीवन वर्तमानात आकार घेते आहे. या तिन्हींच्या समन्वयाचे, सामंजस्याचे अन संघर्षाचे स्वरही उमटत असतात. यातील इष्ट आणि अनिष्ट, सकस आणि हिणकस यांची निवड हे एक मोठे आव्हान आहे. `माझे – तुझे’ करून यातून मार्ग निघणार नाही. हेही ध्यानात घेतले पाहिजे की, आजच्यासारखेच जीवन कालचे वा परवाचे वा त्यापूर्वीचे नव्हते. अर्थ (पैसा), नाती, लैंगिकता, स्त्री, पुरुष, देश, विदेश, शिक्षण, आनंद, सुख, स्वास्थ्य; अशा असंख्य गोष्टींच्या कल्पना आज कल्पनातीत बदलल्या आहेत. त्या प्रत्येकाचे विश्लेषण करायचे तर एकेक जन्म लागेल, एवढा तो पसारा मोठा आहे. मात्र त्याच्या मुळाशी गेल्यास एक बाब स्फटिकाप्रमाणे स्पष्ट होते. ती म्हणजे – सत्ता आणि उपभोग ही वर्तमानाची मूल्ये आहेत आणि त्याग आणि समन्वय ही भारताची मूल्ये आहेत. सत्ता आणि उपभोग यांनीच इहवाद अतिशय आग्रही आणि असहिष्णू होतो; तर त्याग आणि समन्वय यामुळे भारतीय आध्यात्मिक विचार अनाग्रही आणि सहिष्णू ठरतो. अगदी छोट्या मोठ्या घटना, वाद, प्रसंग यातही हे दिसून येते. सत्ता आणि उपभोग यांच्या शीर्ष स्थानी असणाऱ्यांना ते स्थान टिकवून ठेवायचे आहे. त्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. त्यासाठी ज्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही अथवा ज्यांना ती मान्य नाहीत त्यांच्याही गळी ती उतरवण्याचे विविध प्रयत्न होत राहतात. मनोरंजन, विचार, साहित्य, जाहिराती अशा सगळ्या गोष्टींचा वापर करून सत्ता, संघर्ष, उपभोग, शोषण यांचे एक तत्वज्ञान तयार केले जाते. भारताचे तत्वज्ञान आणि समन्वयाच्या आधारे उभी असलेली कुटुंब व्यवस्था हे या शक्तींना अडथळे आहेत. त्यामुळे त्यावर आघात करणे, ते मोडीत काढणे, त्याबद्दल भ्रम उत्पन्न करणे, त्यासाठी खऱ्याखोट्याचा आधार घेणे; असे सगळे प्रकार होतात. ब्राम्हण या शब्दावर आघात हा वास्तविक भारतीय तत्वज्ञानावर आघात असतो. स्त्रियांना स्वतंत्र आणि सबल करणे याचा अर्थ, कुटुंब व्यवस्था मोडीत काढणे हा असतो. या दोन्हीवर आघात म्हणजे भारतीय मूल्यांवर आघात असतो. हे चक्र आता मागे फिरवणे शक्य नाही. यातूनच मार्ग काढणे आवश्यक आहे.
महिलांचा विचार करायला हवा, ही काही आता मोठी गोष्ट राहिलेली नाही. ते समाजाने मान्य केलेले आहे. तसा तो व्हायलाही लागला आहे. अगदी स्वामी विवेकानंद, भगिनी निवेदिता, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, मावशी केळकर आणि अशा अनेकांनी यावर स्पष्ट भूमिका घेतलेली आहे आणि प्रयत्नही केले आहेत. मात्र यांच्या भूमिका, त्यांची दृष्टी आणि आजचा यासंबंधातील विचारप्रवाह यातील फरक आणि अंतर समजून घेणे महत्वाचे ठरते. मानवी विकासाची भारतीय कल्पना आणि त्यासाठी आवश्यक अवकाश, बळ स्त्रियांना प्राप्त व्हावे हा त्यांचा आशय होता. आज मात्र सगळ्यांशी फटकून राहणारी, पुरुषनिरपेक्ष, भोगैक सर्वस्व मानणारी, अर्थप्रधान विचार करणारी, सत्तावादी स्त्री हाच आदर्श मांडला जातो आहे की काय अशी स्थिती आहे. दुर्दैव म्हणजे, वर ज्या महापुरुषांचा उल्लेख केलेला आहे त्यांच्याशी नाते सांगणारे स्त्री-पुरुषही यात जाणता अजाणता हातभार लावत असतात. एक अनुभव सांगितल्याशिवाय राहवत नाही. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नीचे अमिताभ बच्चन यांच्यासोबत नृत्यमुद्रेतील छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. मी ज्यावेळी त्यावर नाराजी व्यक्त केली त्यावेळी एक हिंदुत्वनिष्ठ कलाकार महिला मला म्हणाली – `त्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे? आपल्याला gorgeous महिला पाहण्याची सवय नाही.’ मी विषय थांबवला. परंतु विचारांचं, भावनांचं, दृष्टीचं penetration किती आहे यासाठी फक्त हे उदाहरण.
चारपाच दिवसांपूर्वी एकाने मला बीबीसी मराठीवरील एक ब्लॉग पाठवला. त्याचं शीर्षक वाचून तो मला का पाठवला असावा म्हणून मी बुचकळ्यात पडलो. ब्लॉग पाठवणाऱ्याला विचारलं. त्याने त्याचं कारणंही सांगितलं. काय होता ब्लॉगवरील लेख? ब्रेसियरचा इतिहास आणि ती वापरण्याचे फायदे तोटे. मात्र त्यात दोन उल्लेख होते – एक म्हणजे भारतात महिला आपली अंतर्वस्त्रे लपवून वाळवतात; अन दुसरा उल्लेख होता एक महिला सुद्धा दुसऱ्या महिलेला ब्रा दिसत असेल तर ते खुणेने सांगून लपवायला सांगते. प्रश्न असे आहेत की, हे दोन्ही उल्लेख लेखाच्या विषयाशी सुसंगत आहेत का आणि भारतीय महिलांच्या या सवयीत टीका करण्यासारखे वा आक्षेप घेण्यासारखे काय आहे? मर्यादा, लज्जा, शालीनता यात वाईट काय? आक्षेपार्ह काय? त्या कल्पना सतत बदलत असतात. बदलतील. पण याविषयीच्या fashion tv किंवा fox life यांच्याच कल्पना आणि मापदंड योग्य आणि भारतीय कल्पना आणि मापदंड अयोग्य, मागास, टाकाऊ हे कसे? एखादी महिला पोहण्याच्या पोशाखातच पोहणार. त्यात वावगे वाटण्याचे कारण नाही. कोणाला वाटत नाही. ज्यांना वाटत असेल त्यांनी स्वत:ला दुरुस्त केले पाहिजे. पण धाडसी खेळ, पर्यटन, मॉल, मंदिर, नृत्य किंवा अशाच अनेक ठिकाणी तोकडा, तंग, असभ्य पोशाख घालण्याचे समर्थन केले जाते तेव्हा; हा प्रवास दैहिकतेच्या दिशेने आहे असे म्हणण्याशिवाय पर्याय नसतो.
रामदेवबाबांच्या एका टीव्ही कार्यक्रमात भावना सेठ नावाची एक अभिनेत्री होती. त्यात हाच प्रश्न आला तेव्हा तिने उत्तर दिले होते – आम्हाला आवडते आम्ही घालतो. लोकांनी पाहावे, मिटक्या माराव्या, घरचा रस्ता धरावा. आज ही भावना सोशल मीडियातून देखील व्यक्त होताना दिसते. असा उत्तेजक वा अभद्र पोशाख करताना तुझ्या मनात नेमके काय असते? असा प्रश्न एकदा एका मुलीला विचारला तेव्हा तिने जो उथळ आक्रस्ताळेपणा केला तो मी अनुभवलेला आहे. जयपूरला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने इंडिया टुडेच्या एका संपादकांशी गप्पा मारण्याची संधी मिळाली होती. हाच विषय होता. ते म्हणाले – `दिल्लीत माझ्या apartment मध्ये शेजारी एक कुटुंब राहतं. तेथील सुनबाई सगळ्या प्रकारचे कपडे घालते. अगदी मिनी, मायक्रो वगैरे. पण पूर्ण धार्मिक, आध्यात्मिक आहे.’ मी त्यांना विचारले - `आध्यात्मिक म्हणजे काय?’ मग ते काहीही बोलले नाहीत. दैहिकता मर्यादित, नियंत्रित, नियमित करणे जर आवश्यक वाटत नसेल तर, त्याला धार्मिक, आध्यात्मिक म्हणता येईल का? आपण जरा साधासुधा पोशाख केला तर बावळट ठरू याची भीती आज भारतीय स्त्रीच्या मनात बसली आहे की नाही? एकीकडे भगवे झेंडे घेऊन, भारतीय पोशाख करून गाड्या चालवीत शक्तीप्रदर्शन करणारी स्त्रीसुद्धा, घरी आल्यावर टीव्हीवर नृत्याच्या नावाखाली तोकड्या कपड्यातील नृत्य करणाऱ्या मुलीच्या पायात हात घालून तिला दहा जण उचलून घेतात हे मेलेल्या नजरेने पाहते की नाही? कुठे राहिला मूल्यबोध? आपण अनैतिक नव्हे, ननैतिक होतो आहोत. टीव्हीवरील अनेक कार्यक्रम कोणत्या भावना, कोणती मूल्ये, कोणते मापदंड प्रक्षेपित करीत असतात. म्हाताऱ्या व्यक्तींच्या लैगिक भावनांचा विचार भारतात होत नाही. तो व्हायला हवा अशी विचारपेरणी सुरु झालेली आहे. त्या विचाराबाबत आक्षेप घेण्याचे कारण नाही. पण लैगिकता हेच जीवन किंवा त्यापासून बाजूला जाणे म्हणजे चूक, पाप, मागासपण असा जो सूर आणि मांडणी असते ती संपूर्ण समाज दैहिकतेच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न असतो. स्त्री ही भोगाची वस्तू नाही हे वाक्य पार घासून गुळगुळीत झालेले आहे. पुरुषांचे सोडूनच द्या, स्त्रियांना तरी हे मनातून किती मान्य आहे? उपभोग घेऊ न देणे आणि उपभोगाची वस्तू नाही हे मान्य असणे यात फरक नाही का? या अनिर्बंध मोकळेपणाला सत्ताकांक्षा येऊन मिळाली की आणखीनच उत येतो. आपला नवरा आपल्यासाठी sanitary napkins घेऊन आला ही सोशल मीडियावर सगळ्यांना सांगून आनंद साजरा करण्याची गोष्ट कशी काय असू शकते? असाच एक चित्रपट मध्यंतरी आला होता. त्याचे कोण कौतुक? कशासाठी? हे सगळे न करताही स्त्रीचे अस्तित्व, तिचे अवकाश, तिच्या गरजा सहअनुभूतीने समजून घेणे आणि हा चिल्लर, पोरकट बाजारूपणा यातला फरक आपण समजून घेणार की नाही? आपण कुठे जातो आहोत आपल्याला तरी कळते आहे का?
समस्या असंख्य आहेत. त्या पुरुषांच्या आहेत अन स्त्रियांच्याही आहेत. केवळ स्त्रियांच्या अशाही आहेत. आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, लैंगिक, मानसन्मानाच्या अशा अनेक आहेत. चौकट राजा नावाचा चित्रपट बहुतेक मराठी लोकांनी पाहिलेला असेल. त्या अपघात झालेल्या पुरुषाची समस्या आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, भावनिक जशी आहे तशीच लैंगिक पण आहे. वेडे लोक, अपघातग्रस्त लोक, शारीरिक- मानसिक- बौद्धिक- कमतरता असलेले लोक; अन अशा खूप वेगवेगळ्या लोकांच्या असंख्य समस्या आहेत. यात स्त्री आणि पुरुष असे करता येत नाही. एवढेच नाही तर काहीही कमतरता नसलेल्या लोकांच्या समस्या असतात त्यातही स्त्री वा पुरुष असा भेद करता येत नाही. एक लग्न की अधिक लग्न, समलैंगिकता योग्य की अयोग्य, ईश्वर आदी मानायचे की नाही; अशा अनेक गोष्टींकडे उपेक्षा अथवा मस्करीपेक्षा आस्थेने पाहायलाच हवे. परंतु याकडेही दुर्लक्ष नको की; पिंड, वृत्ती, गरज, इच्छा, आकांक्षा, शैक्षणिक आणि सांस्कृतिक स्तर आणि समज, कौशल्य, स्वभाव, परिस्थिती, योग्य-अयोग्यता, compatibility, परंपरा, कल्पना, जुन्यातून बाहेर पडण्याची वृत्ती, जुने टाकून देण्याच्या नावाने अयोग्य किंवा अनावश्यक गोष्टींना मिळणारे पोषण, संधी, आर्थिक- सामाजिक व्यवस्था, जीवनशैली, अपेक्षा, अवास्तव अपेक्षा, अपेक्षापूर्ती, अपेक्षाभंग, अनुभव, छुपे वा उघड हेतू, आग्रहीपणा; असे अक्षरशः असंख्य कंगोरे असतात. या सगळ्यांचा घाऊक विचार करणे, घाऊक सिद्धांत मांडणे, अमुक विरुद्ध अमुक असा रंग देणे, न्यायअन्यायाचे स्वरूप देणे; हे शहाणपणाचे नक्कीच म्हणता येणार नाही. आजच्या प्रचलित अर्थाचे स्वातंत्र्य आणि सुख मिळवणारे सुद्धा किती विविध प्रकारे जीवनाला कंटाळतात, जीवन संपवण्याचे पाऊल उचलतात हे आता नव्हाळीचे राहिलेले नाही. आर्थिक स्वावलंबनाच्या विचाराने आता लग्न जुळवतानाच `तुझे तू, माझे मी’ हे स्वरूप घेतलेले आहे; अन पुरुषी अत्याचाराच्या खऱ्याखोट्या मांडणीने पुरुषविहीन जीवनाचा पुरस्कार करण्यासाठी फेसबुकचे प्रोफाईल काळे ठेवण्यापर्यंत आपण पोहोचलो आहोत. आम्हाला हेच हवे आहे का यापेक्षाही, यातून सगळ्यांचे कल्याण किंवा आमचे व्यक्तिगत सुख, समाधान, शांति तरी प्राप्त होईल का; हा कळीचा प्रश्न आहे. मानवीय आणि दैवी म्हणून जे जे गुण, प्रतीके, पद्धती विकसित झाल्या वा करण्यात आल्या त्यांचा साधकबाधक विचार करण्याचे नाकारणे हा करंटेपणा म्हणावा लागेल.
भारताचे काय होईल? हिंदूंचे काय होईल? आध्यात्माचे काय होईल? हे प्रश्नच गैरलागू आहेत. त्यांचे काय होईल याची चिंता करण्याची गरज नाही. इहवादी भोगवादाने, सत्तावादाने या साऱ्याची राखरांगोळी केली आणि ते भस्म फासून विश्वविजयाचे कितीही तांडव केले तरीही त्या राखेतून पुन्हा भारत, हिंदू आणि आध्यात्माचा फिनिक्स भरारी घेईल. प्रश्न हा आहे की, आम्हाला मर्यादित का होईना जे समजते त्याकडे दुर्लक्ष करून आजवरचे सारे शुभ, मंगल, कल्याणकारी आम्हीच उधळून टाकण्याचा नतद्रष्टपणा करणार आहोत का? Geneticaly modified माणूस जन्माला घातल्याचा दावा आज शास्त्रज्ञ करीत आहेत. येणाऱ्या भस्मासुराला ओळखण्याची गरज आहे. स्त्रीत्वाच्या किंवा अन्य कोणत्याही भावुकतेच्या प्रवाहात वाहून जाणे योग्य ठरणार नाही.
- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, २९ नोव्हेंबर २०१८

टीवटीवाटी आगाऊपणाची चिकित्सा – २


ब्राम्हण ही जात वा व्यवस्था म्हणून अस्तित्वात नाही. खरे तर कोणतीच जात अस्तित्वात नाही. जे काही असेल तर ते त्याचे विखुरलेले निष्प्राण अवशेष. मात्र ब्राम्हणत्व कधीच संपले नव्हते, आजही संपलेले नाही. ऋषीमुनींच्या माध्यमातून, संतमहंतांच्या माध्यमातून, भिक्खुंच्या आणि श्रमणांच्या माध्यमातून; ब्राम्हणत्व सतत वाहते राहिले. संपूर्ण जगाला आर्य, ब्राम्हण, ऋषी स्तरावर पोहोचवणे हेच भारताने आपले ध्येय उराशी बाळगून ठेवले. विचार आणि व्यवहार अधिकाधिक निर्मळ होणे हा त्याच प्रयत्नांचा भाग. महात्मा गांधींनी स्वत:च्या आईला दिलेल्या वचनापोटी विलायतेत शाकाहारासाठी केलेली भटकंती किंवा अलीकडे जगाने `जागतिक शाकाहार दिवस’ साजरा करणे आणि जगभरात शाकाहार करणाऱ्या लोकांची संख्या वाढत जाणे हे ब्राम्हणत्व विस्तारत असल्याचेच लक्षण आहे. केवळ शाकाहार हा मुद्दा नाही. मानवाच्या जगण्याचा स्वरच बदलणे ही मुख्य बाब. कोणता स्वर आहे ब्राम्हणत्वाचा? या स्थूल जगण्यातील प्रत्येक शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्रिया अथवा संवेदन; विनाशी आणि तात्पुरते आहे. जीवनाचा एक याहून वरचा स्तर आहे. तो लौकिक नाही. त्या सर्वोच्च स्तरावर संपूर्ण स्वातंत्र्य, संपूर्ण आनंद, संपूर्ण समाधान, अमरता आहे. उलट या स्थूल जगण्यात प्रत्येक पावलावर मर्यादा, पारतंत्र्य, असमाधान, नश्वरता, ओढाताण आहे. हे जे जीवनाचं वास्तव स्वरूप आहे तो आहे ब्राम्हणत्वाचा स्वर. त्यामुळेच व्यवहारातील नाव, पैसा, प्रतिष्ठा, सन्मान, कौतुक; अशा सगळ्याच गोष्टींची मर्यादा मानवी मनावर बिंबवण्याचा प्रयत्न होत राहिला. मर्यादित जीवन आणि अमर्याद जीवनाची स्वयंभू ओढ यांचा मेळ, समन्वय घालत घालत जगणं बहरत राहिलं. यातूनच श्रेष्ठत्वाचा वेगळा दृष्टीकोन भारतात विकसित झाला.
एक गोष्ट वारंवार लक्षात घ्यायला हवी की, भारताच्या दृष्टीने श्रेष्ठत्व आणि सत्ता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अन्य जगाने या दोन्ही गोष्टी एक केल्या, एकत्रच पाहिल्या, त्यांचा एकत्रित बोध धरून ठेवला. भारताने मात्र श्रेष्ठत्व आणि सत्ता या दोन निराळ्या गोष्टी आहेत असे प्रतिपादन केले. किंबहुना सत्ता नाकारणे हे श्रेष्ठत्वाचे लक्षण ठरले. जोवर हा फरक नीट ध्यानात घेतला जात नाही तोवर अनेक गोष्टींचा उलगडा कठीणच. या चिंतनातूनच `उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा’ अशी नीतीतत्वे विकसित झाली. दुसऱ्याचा विचार, समन्वित विचार, साकल्याने विचार हेच भारताचे विशेष राहिले. व्यक्तिगत लाभहानी किंवा ऐहिकाचा ध्यास नव्हता असे नाही. त्याचे महत्व नव्हते असेही नाही. परंतु त्यासाठी किती आकांत वा उरस्फोड करायची याचा विचारही होत असे. आमच्या सामाजिक पद्धती, व्यवस्था, धारणा, कल्पना या अंगाने पहाव्या लागतात. उलट भारताबाहेरील विचारात या सगळ्याच्या विरोधी सूर दिसतात. भारताने खूप विचारपूर्वक या विश्वातील मर्यादांचा स्वीकार केला. त्याउलट अन्य जगाने या मर्यादा म्हणजे कटकारस्थान असल्याचा तर्क मांडला. अन त्याला अनुसरून संघर्ष हा स्थायीभाव विकसित केला. समन्वय फेटाळला. समन्वय म्हटले की तडजोड येते, कोणाला तरी पाऊल मागे घ्यावे लागते, मनाची, भावनांची, गरजांची ओढाताण होते. ते सारेच त्रासदायक असतेच. परंतु विचारपूर्वक भूमिका घेत राहिले, परिस्थिती- क्षमता- इत्यादी समजून घेत अशा तडजोडी केल्या तर त्रास कमी होतो. याचा अर्थ तडजोडच करायची असा नाही. लढायचे सुद्धा. पण लढण्यापूर्वी कृष्णशिष्टाई आणि गीतेचा आसरा घ्यायला विसरायचे नाही. हे समजून घेतल्याशिवाय भारतातील कोणतीही गोष्ट समजणे कठीण. ती जातीव्यवस्था असो की कुटुंबव्यवस्था. एक लक्षात घेतले पाहिजे की या दोन्ही आज वास्तवात अस्तित्वात नाहीत. परंतु पुढील व्यवस्थांचा विकास करताना कोणती तत्वे विचारात घ्यावी लागतील हे ध्यानात येण्यासाठी हा विचार आवश्यक ठरतो. या पार्श्वभूमीवर पुरुषसत्ताक आणि महिला यांचा विचार करावा लागतो.
श्रेष्ठत्व म्हणजे सत्ता आणि सत्ता म्हणजे श्रेष्ठत्व याच विचारातून भारताबाहेरील लोकांनी भारताकडे पाहिले. अन त्यानुसार विविध जातींचा संघर्ष, स्त्री-पुरुष संघर्ष, जुन्या-नव्याचा संघर्ष, परंपरा-आधुनिकता यांचा संघर्ष, विज्ञान-आध्यात्म यांचा संघर्ष, उत्तर-दक्षिणेचा संघर्ष; अशी मांडणी केली. पण तसे नव्हते. एक तर प्रत्येक व्यक्तीने, गटाने स्वतंत्रपणे फुलण्यातून विविध आचारविचार, भाषा-भूषा इत्यादी विकसित झाले होते. किंवा श्रमविभागणी हे तत्व होते. किंवा सुव्यवस्था हे तत्व होते. हे सगळे लादलेले होते असा निष्कर्ष कशाच्या आधारावर काढला जातो हे समजण्यापलीकडचे आहे.
मुळात व्यवसायांचे स्वरूप गृहउद्योग अशाच स्वरूपाचे होते. लोहार, सुतार, गवळी, तेली वा अन्य व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या घरील महिला घरातच व्यवसायात सहभागी होऊ शकत. काही व्यवसाय घरीच करण्याचे नव्हते पण ते महिलांनी करू नये असा कुठे आदेश नव्हता. शिक्षणाची आजची कल्पना मनात ठेवून जर आम्ही त्यावेळी शिक्षण नव्हते असे म्हणू लागलो तर ते हास्यास्पद म्हणावे लागेल. कष्ट, साधनांची उपलब्धता, सुख या गोष्टी फारशा नव्हत्याच. मी जिथे राहतो त्या ठिकाणी अगदी ५० वर्षे पूर्वी वीज नव्हती, रस्ते नव्हते. यावरून कल्पना करावी. खरं तर आपण कल्पनाही करू शकत नाही. कृष्णधवल चित्रपट पाहून सुद्धा त्या काळाची किती कल्पना आपण करू शकतो? अन तरीही आपण शेकडो, हजारो वर्षांच्या वाटचालीवर बेधडक टिप्पणी करीत राहतो. हे विचित्र आहे. अगदी १९७० च्या दशकात आलेल्या शोले चित्रपटात डाकूंच्या दहशतीचे चित्रण आहे. अगदी अलीकडेपर्यंत चंबळ वगैरे सारखे प्रदेश होतेच. रात्री लुटल्या जाऊ नये म्हणून रेल्वे गाड्या विशिष्ट भागातून रात्री न चालवण्याच्या घटना अगदी दशकभरातल्या आहेत. असे असताना समाजाने, स्त्रियांनी आणि पुरुषांनी मिळून; एकत्रित विचारविनिमय करून कामांचे विभाजन, वाटणी केली नसेल कशावरून? की आम्हीच फक्त विचार करणारे आणि संवेदनशील म्हणून जन्माला आलो आहोत?
सगळा साधकबाधक विचार न करता काहीतरी शब्द प्रचलित करायचे. त्यावर आपल्या मनातील अर्थ चिकटवायचे आणि गोंधळ अन संघर्ष निर्माण करायचा. परस्पर अविश्वास, तणाव, भय निर्माण करायचे; हे शहाणपणाचे नक्कीच नाही. घरची कामे म्हणजे दुय्यम, हिणकस, अन्याय, टाकावू; असं एकदा ठरवलं की मग वाद सुरु होतात. पण मुळात अशी भावना होती का? अशी भावना निर्माण होण्यासारखे जगणे होते का? जे काही जगण्याचे स्वरूप होते त्यातही महिला सण, खेळ, महिलांचे म्हणून काही प्रसंग असे सारे करीत होत्याच. त्यांचं दु:ख व्यक्त होत नव्हतं म्हणताना आपल्या डोक्यात त्यांची पुस्तके एवढाच विचार राहत असेल तर कठीण आहे. मुळात पुस्तके, छापखाने, मुद्रण हे सारे किती जुने आहे. आज सगळे काही बोटांच्या टोकावर येऊनही किती स्त्रिया वा पुरुष लिहितात, वाचतात. किती जणांना त्याची गरज वाटते? आज वेद, उपनिषदे, पुराणे सगळे उपलब्ध असताना किती ते वाचण्याचे, त्याचे अध्ययन करण्याचे कष्ट घेतात? वेद ऐकले की शिक्षा होत असे की नाही ठाऊक नाही, पण आज किती जण त्याचे अध्ययन करतात? मूळ मानवी वृत्ती आज अनेक गोष्टी सुकर झाल्या असताना जर अशी आहे, तर जेव्हा एखाद्या पुस्तकाची प्रत काढायची म्हणजे महिनोनमहिने मान खाली घालून लिहून काढावी लागत असेल; त्यावेळी मानवी वृत्ती कसा विचार करीत असेल? कसला म्हणजे कसला विचार करायचाच नाही असे जर ठरवले तर मात्र गोष्ट वेगळी. मूळ मुद्दा हा की जुन्याचा फार अधिक गूळ न पाडता, त्या समाजाची स्वीकार शीलता किती आहे; बदलांना सामोरे जाण्याची वृत्ती किती आहे; हे बदल स्वीकारताना जुन्याशी असलेला धागा जोडून ठेवून पुढे जाण्याची वृत्ती किती आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे नव्याचा स्वीकार करताना त्यातील पोषक आणि विनाशक यांचे तारतम्य करण्याची वृत्ती किती आहे; यावर समाजाची पत आणि प्रत ठरते. भारतीय समाजात महिलांना दुय्यम स्थान होते, त्यांना चरकात ढकलणे हेच भारतात केले जात होते; इत्यादी अवास्तव, अर्थहीन, अतिरंजित वादात न अडकता; किंबहुना असे वाद, अशी शब्दावली, अशी भावना प्रयत्नपूर्वक बाजूस सारून वर्तमानाला योग्य प्रतिसाद कसा देता येऊ शकतो याची चर्चा हवी.
या विषयाचा आणखीन एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. वर्तमानाचा स्वीकार करताना उभे राहणाऱ्या आव्हानांचा. तो पुढील भागात.
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, २७ नोव्हेंबर २०१८

टीवटीवाटी आगाऊपणाची चिकित्सा - १


jack dorsey या ट्विटर सीईओचा आगाऊपणा गाजतो आहे. काही दिवसांनी तो शांत होईल. पण त्या निमित्ताने जे मुद्दे, जे विषय चर्चेत आलेत आणि येताहेत ते समाजमंथनाचे विषय आणि मुद्दे आहेत. ब्राम्हण आणि पुरुषसत्ताक असे दोन विषय आणि हे दोन विषय ज्या तिसऱ्या विषयाशी जोडण्यात आले तो तिसरा विषय म्हणजे महिला. एक बाब सुरुवातीलाच नमूद करण्याची गरज आहे की, या तिन्ही विषयाबाबत शांतपणे, गांभीर्याने आणि साधकबाधक चर्चा आज केली जात नाही आणि कोणाची तसे करण्याची फारशी तयारी नाही. ऐतिहासिक कारणांमुळे या विषयांबाबत बोटचेपी, उथळ, भरकटलेली अशीच चर्चा अधिक होते. मुख्य म्हणजे मनात भय बाळगून भीतीयुक्त विचार होतो. बचावात्मक चर्चा होते. त्यामुळे गाभा सुटून जातो. ऐतिहासिक कारणे दोन प्रकारची आहेत. एक म्हणजे मूळ भारतीय समाजाचा विकासक्रम, त्याचा जीवनप्रवाह आणि दुसरे म्हणजे या समाजाचा बाहेरील जगाशी गेल्या दोन शतकात आलेला संबंध. कोणत्याही जीवनप्रवाहात स्वाभाविकपणे येणारे अडथळे, साचलेपण, त्यातील तात्कालिक आणि स्थायी तत्वे, त्यांचे स्थलकालत्व, उपयुक्तता, उपयुक्ततेच्या कक्षेत न येणाऱ्या गोष्टी; असे अनेक घटक असतात. भारतीय समाजातही हे सारे आहेच. भरीसभर हा जीवनप्रवाह सुदीर्घ असल्याने या सगळ्या घटकांची गुंतागुंत आणि त्याचे स्वरूप समजून घेणे, समजावून देणे अधिकच जिकीरीचे आणि कष्टाचे आहे. त्यामुळे वारंवार वाद आणि गोंधळ होतो अन पुन्हापुन्हा या विषयांची मांडणी करावी लागते.
पहिला मुद्दा ब्राम्हण, ब्राम्हणवाद, ब्राम्हणीपणा इत्यादी. सर्वप्रथम लक्षात घेण्याची गोष्ट ही की अन्य अनेक शब्दांप्रमाणे ब्राम्हण या शब्दाचे विविध अर्थ होतात. त्याच्या संदर्भानेही त्याचे अर्थ बदलतात. मुळात ब्रम्ह जाणतो तो ब्राम्हण येथपासून एक जातीविशेष असे त्याचे अर्थ होतात. पण या वेगवेगळ्या अर्थातून ब्राम्हणपणाची जी लक्षणे डोकावतात ती कोणती? एक म्हणजे नियमबद्ध असणे आणि दुसरे म्हणजे श्रेष्ठत्व भावना. या दोन गोष्टीत ब्राम्हण आणि त्यापासून निघणाऱ्या सगळ्या शब्दांच्या अर्थछटा येऊन जातात. प्रश्न असा की, नियमबद्धता आणि श्रेष्ठत्व भावना यात वावगे काय आहे? आणि हे दोन्ही निर्मूल करता येतात का? ज्या twitter सीईओ वरून हा वाद सुरु आहे त्याचेच उदाहरण घेता येईल. हा वाद सुरु झाल्यावर अशी एक माहिती आली की, तो विपश्यना करण्यासाठी गेलेला आहे. त्यामुळे त्याची प्रतिक्रिया मिळू शकत नाही. तो विपश्यनेला गेल्याने बाहेरील जगाशी संबंध नाही, फोन आदी नाही. हा ब्राम्हणीपणा नाही का? वेगळेपण, नियमबद्धता, व्रतस्थता, त्यातून येणारी मी श्रेष्ठ आहे ही भावना; हे सारे ब्राम्हणत्व नाही तर काय? पण आपल्याला तसे वाटत नाही कारण तो विपश्यना करून परत आल्यावर त्याची मानगूट धरता येईल. मात्र एक गोष्ट खरी की, ब्राम्हण ही वृत्ती आहे. ती मानवाची मूलभूत वृत्ती तर आहेच शिवाय काही प्रमाणात आवश्यक आणि मानवी विकासासाठी योग्य अशीही आहे. हीच वृत्ती संपत्ती संग्रहावर आधारित क्लब मेम्बरशीप इत्यादीत सुद्धा झळकते. शशी थरूर ज्यावेळी विमानातील सामान्य वर्गाला cattel class म्हणून हिणवतो त्यावेळी हीच वृत्ती असते. मग भारत आणि अन्य जग यात फरक काय आहे? भारताने या वृत्तीची सांगड ज्ञान, तपश्चर्या, आध्यात्म, स्वाध्याय, अध्ययन, अध्यापन यांच्याशी घातली आणि व्रतस्थ साधेपणाची बंधने घालून तिला प्रवाहित केले. अन्य जगाने तिचा शास्त्रशुद्ध विचार न करता मोकळे सोडून दिले. स्वाभाविकच मानवाच्या उतरणीला लागण्याच्या स्वभावाप्रमाणे ती वृत्ती आकार घेत गेली आणि सत्ता आणि संपत्तीची बटिक बनली. ब्राम्हण वृत्तीला विशेषाधिकार दोन्हीकडे मिळाले. पण भारतात विशेषाधिकार हे पैसा आणि सत्ताविहीन राहिले. भारताबाहेर ते पैसा आणि सत्ताश्रीत राहिले. म्हणूनच स्वामी विवेकानंद ठणकावून सांगत असत- `तुमच्या डॉलरवर आधारित जातिभेदापेक्षा भारतीय जातीव्यवस्था खूप सरस आहे.’ मात्र, कोणत्याही जीवमान घटकाप्रमाणे त्या व्यवस्थेत दोष आले, त्या व्यवस्थेची वाताहत झाली. परंतु त्या व्यवस्थेने जे काही पोषण केले होते त्याचे काही गुण कायमही राहिलेत. म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर किंवा गाडगे बाबा जेव्हा या साऱ्याबाबत बोलत तेव्हा त्यात जो विवेक राहत असे, त्यात आक्रस्ताळेपणाचा अभाव राहत असे आणि त्यात जी सुजाण समजूत राहत असे ती बाकीच्यांमध्ये राहत नाही. ब्राम्हण ही काही हलक्याने घेण्याची गोष्ट नाही, काहीतरी अंगात आल्यासारखे करून जाळून टाका, फोडून टाका, फेकून द्या; असे करण्याची गोष्ट नाही. त्यातील दुष्टपणा, स्वार्थीपणा काढून टाकायला हवा एवढेच. त्यामुळेच गाडगेबाबा आपल्या कीर्तनातून ब्राम्हणी आचारांचे, उच्चारांचे अनुकरण करायला सांगत. मिलिंद महाविद्यालयात शिक्षक नियुक्त करताना बाबासाहेब आंबेडकर यांनी आवर्जून ब्राम्हण शिक्षक नियुक्त केले. किंवा रोष व्यक्त करण्यासाठी आणि प्रतिकात्मक म्हणून मनुस्मृती जाळली तरीही तिच्यातील त्यांना योग्य वाटलेल्या गोष्टींचा आणि मनूचाही त्यांनी गौरव केला आहे. भारतीय समाज व्यवस्थेने सगळ्या समाज घटकांना काही ना काही आर्थिक संरक्षण दिलेले आहे, असे गौरवोद्गार देखील कोकणातील खोत कायद्याबाबत विधिमंडळात बोलताना त्यांनी काढले होते. समग्रतेने विचार करून विवेकाने वागणे, बोलणे हीच त्यांची महानता होती.
ज्यांना आपले अन्य हेतू साध्य करायचे होते आणि आहेत त्यांना मात्र हा विवेक आणि विचार करण्याची गरज नसते. त्यामुळेच ब्राम्हण या शब्दाबाबतही असाच भ्रम, अविचार, विवेकशून्यता सहेतूक पसरवली गेली. ब्राम्हण शब्दही काळाच्या ओघात लोप पावला असता तरीही हरकत नव्हती पण आपले दुष्ट हेतू साध्य करण्यासाठी तो जिवंत ठेवण्यात आला आणि त्याला सगळ्या वाईट गोष्टी, हिणकस गोष्टी जोडण्याची जणू स्पर्धा लागली. महात्मा गांधींच्या हत्येसारख्या घटनांनी त्या प्रयत्नांना बळही दिले. राजकीय सत्तालाभासाठी झालेले असे प्रयत्न तर अगदीच बटबटीत असतात. हे प्रयत्न देशातच होतात असे नाही तर विदेशातील सहेतूक प्रयत्नही असतात. माणसाची एक वृत्ती असते. गोष्टी एकमेकांना जोडण्याची. जसे अनेकांना सवय असते मोठ्या व्यक्तींबरोबर फोटो काढून घ्यायची. कुठेतरी, कोणत्या तरी निमित्ताने फोटो काढला जातो. मग तो फोटो दाखवून स्वत:ची पत वाढवून घ्यायची. किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या बातमीत आभार प्रदर्शनाच्या निमित्ताने का होईना आपले नाव येण्यासाठी खटपट करणारे असतातच. का? वलय प्राप्त होते. वास्तविक संबंध नसतो, पण तो असल्याचे भासवून काही साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो. ही जी गोष्टी जोडण्याची वृत्ती आहे त्याचा उपयोग अनेकदा अक्कलहुशारीने केला जातो. मग संस्कृत, शुद्ध बोलणे, जेवणापूर्वी श्लोक- मंत्र म्हणणे, वागण्या- बोलण्याच्या, खाण्यापिण्याच्या सवयी, अगदी पान वाढण्याची पद्धत, आवडीनिवडी, वेशभूषा, मर्यादा अशा छोट्या छोट्या गोष्टींना सुद्धा `ब्राम्हणी’ असा शब्द चिकटवायचा आणि या गोष्टींचे साहचर्य, ऐक्य लोकांच्या मनावर बिंबवायचे. हेटाळणीच्या अंगाने त्याची चर्चा करायची आणि त्याबाबत नकारात्मक मानस तयार करायचे. सगळ्यांना सुरक्षात्मक पवित्र घ्यायला लावायचा. अशी ही खेळी असते.
एक उदाहरण या निमित्ताने आठवतं. नागपूर श्रमिक पत्रकार संघाने ज्येष्ठ संपादक मामासाहेब घुमरे यांच्या मनोगताचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. तेव्हा बोलताना त्यांनी एक किस्सा सांगितला होता. नागपूरला बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर चंद्रपूरलाही असा एक कार्यक्रम झाला होता. पत्रकार म्हणून मामासाहेब घुमरे त्यासाठी गेले होते. त्यानंतर झालेल्या भोजनाच्या वेळी, बाबासाहेबांनी वाढणाऱ्या लोकांना आवाज देऊन सांगितले होते की- `तो घुमरे आहे ना तो बामन आहे. त्याला आपले हे (मांसाहारी) चालत नाही. त्याला वाढताना काळजी घ्या.’ बाबासाहेबांचा आक्षेप आणि अन्य लोकांचे विरोध यातील फरक समजून घ्यायला हा एक प्रसंग पुरेसा आहे.
ब्राम्हण वृत्ती ही मानवाची मूलभूत वृत्ती आहे. तिला वळण लावणे आणि योग्य पोषण देणे मानवी विकासासाठी आवश्यक आहे. कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर त्यासाठी मर्यादा आखून घ्याव्या लागतात, काही यम नियम निश्चित करून पाळावे लागतात, काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात, काही गोष्टी करता येणार नाहीत हे लक्षात घ्यावे लागते, नियमपालन करावे लागते. अमुक गोष्ट साध्य करून आपल्याला श्रेष्ठत्व प्राप्त करावयाचे आहे ही भावना एक प्रबळ प्रेरणा असते. श्रेष्ठत्वाची ही भावना नसेल तर माणूस हीनत्व भावनेने ग्रासतो, निराशेत जातो आणि हळूहळू संपत जातो. यासाठी साध्य विचारपूर्वक ठरवावे लागते. भारताने दीर्घ विचारांती हे साध्य भारतीय जनसमुहापुढे ठेवले. जीवनाचा आध्यात्मिक आशय हे ते साध्य होय. ऐहिकता ही साधनांपुरती आहे आणि आध्यात्मिकता हेच शाश्वत जीवन आहे, हा विचार भारतीय चिंतकांनी समाजापुढे ठेवला. याने अनेक गोष्टी साध्य झाल्या. जीवनातील विफलता निपटून काढण्यात आली. ऐहिकतेसंबंधीचे वखवखलेपण नियंत्रित केले गेले. एकाच वेळी आंतरिक समाधान आणि बाह्य व्यवस्था यासाठी आवश्यक मानस तयार केले. या पायावरच भारताच्या धार्मिक, सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक, सांस्कृतिक व्यवस्था; जाणीवा, कल्पना, संकल्पना, कला, क्रीडा या सगळ्यांनी आकार घेतला. हळूहळू नियमबद्धता, व्रतस्थता, श्रेष्ठत्व जाणीव ब्राम्हण जातीच्या (अध्ययन, अध्यापन, पौरोहित्य) बाहेर नेण्याचे प्रयत्नही झाले. वारकरी संप्रदाय हे असे उदाहरण म्हणता येईल. आजही लोक श्रावणात मांसाहार करत नाही, हेदेखील ब्राम्हणत्व संपूर्ण समाजात; जात निरपेक्षपणे रुजवण्याच्या प्रयत्नाचे उदाहरण म्हणता येईल. ऐहिक उपभोग मर्यादित प्रमाणात आणि मर्यादित रीतीने घ्यावेत हा विचार समाजभर रुजवण्याचे प्रयत्न होत राहिले. हे सगळे जबरीने नव्हते. सत्तेच्या आधारे तर नव्हतेच. म्हणूनच आचार विचारांचे असंख्य नमूने पाहायला मिळतात. याने ऐहिकतेला अडथळा केला होता असेही नाही. सोन्याचा धूर निघत असे किंवा भिकारी सापडत नव्हते किंवा घरांना कुलुपे लावत नसत अशा प्रकारची जी वर्णने ऐकायला, वाचायला मिळतात ती काय सांगतात? खाणेपिणे, वस्त्रप्रावरणे, इमारती, भाषा, गणित, आयुर्वेद, पारिभाषिक शब्द, कथाकहाण्या, नृत्य- नाट्य- साहित्य-, दर्शने, सिल्क रूट, विविध देशांचे लोक इथे येऊन जाणे, विविध देशांची आक्रमणे, विविध राजे, राजघराणी, व्यवसाय याबाबत उपलब्ध माहिती; हे सगळे ऐहिकतेला नाकारून कसे शक्य होईल. हां, दोनच गोष्टी होत्या एक म्हणजे सातत्याने विविध प्रकारे जीवनाच्या संपूर्णतेचा संस्कार आणि व्यावहारिक मर्यादा आणि विवेक. अर्थात ही मर्यादा आणि विवेक यामागेही संपूर्ण समाजाचा विचार हीच प्रेरणा होती. इसवी सनाच्या सातव्या शतकापासून झेललेल्या विविध आक्रमणांनी दोन गोष्टी झाल्या. एक म्हणजे विस्कळीतपणा आला आणि सुरक्षात्मक उपाय मोठ्या प्रमाणावर करावे लागले. चिंतन, सुधार, व्यवस्था थांबून गेले.
आक्रमकांनी हे सगळे समजून न घेणे स्वाभाविक होते. आकलन न झाल्याने आणि स्वत:चे वर्चस्व टिकवण्याच्या गरजेपोटी; अशा दोन्ही रीतीने त्यांनी भारतीय समाजाचे चित्रांकन आणि मूल्यांकन केले. शिवाय वीज, वाहने, उद्योग, दळणवळण, विज्ञान तंत्रज्ञान, इंटरनेट, संगणक; हे तर जगभरातच अगदी अलीकडचे. त्यांचा आर्थिक, सामाजिक परिणाम सगळ्या जगावर कसा झाला आणि होत आहे; हे नजरेआड करून जुन्याचे विश्लेषण, मूल्यांकन केले जाते. या सगळ्या आधुनिक गोष्टींच्या आधी, म्हणजे तीनचारशे वर्षे पूर्वी जगभरातील समाज कसे होते याचा विचार करण्याची फुरसत फारशी कोणाला नसते. त्यातच गेल्या शंभरेक वर्षात, विशेषतः गेल्या ६०-७० वर्षात जगभरात मानवी मूल्यांची जागा उपभोगवादी आणि उपयुक्ततावादी मूल्यांनी कशी घेतली हे न पाहता आणि त्याची अनुभवावर आधारित साधकबाधक चर्चा न करता; ती उपभोगवादी आणि उपयुक्ततावादी मूल्येच योग्य आणि आवश्यक आहेत असे गृहित धरून; मतप्रदर्शन आणि विचार केला जातो. jack dorsey ला देण्यात आलेले आणि त्याने प्रदर्शित केलेले पोस्टर आणि त्यात उल्लेखित ब्राम्हणी, पुरुषसत्ताक हे उल्लेख आणि महिला वर्गाशी ते जोडून देण्याची चलाखी; याचाच परिणाम आहे. पुरुषसत्ताक आणि महिला हे दोन मुद्दे पुढील भागात.
- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, २४ नोव्हेंबर २०१८