बुधवार, २९ ऑक्टोबर, २०१४

स्वच्छता, फटाके, प्रदूषण वगैरे


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडून आल्यापासूनच स्वच्छता हा विषय लावून धरला आहे. २ ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी स्वत: रस्त्यावर उतरून आणि त्यांच्या कार्यशैलीप्रमाणे आणखी नऊ जणांना त्यासाठी आमंत्रित करून त्यांनी स्वच्छता या विषयाचे एक वातावरण तयार केले आहे. योगायोगाने पाठोपाठच दिवाळी आली. त्यामुळे फटाक्यांचा कचरा हा विषय पुढे आला. अनेक ठिकाणी हा कचरा तसाच असल्याचे पाहायला मिळाले तर अनेक ठिकाणी तो साफ करण्याची दृश्येही पाहायला मिळाली. सोबतच प्रदूषण हा विषयही जोडला गेला. पंतप्रधान मोदी हिंदुत्वाचे पाठीराखे. दिवाळी हा हिंदूंचा सण. या सगळ्या गोष्टी एकत्र करून काही निष्कर्ष काढले गेले. हिंदुत्वाचे पाठीराखे असलेले मोदी स्वच्छता अभियान राबवितात आणि हिंदू लोक आपल्या दिवाळी सणात फटाक्यांचा कचरा करतात, अशी विसंगतीही दाखवली गेली. या सगळ्या गोंधळात दोन्ही विषयांच्या मुळाशी जाताना मात्र फार कुणी दिसले नाही.

राजकारण बाजूला ठेवून पंतप्रधान मोदी यांच्या भाषणांकडे बारकाईने पाहिले तर एक महत्वाची गोष्ट ते सतत मांडत असल्याचे दिसून येते. अगदी त्यांच्या प्रचारसभातही त्यांनी हा मुद्दा मांडला होता. तो मुद्दा म्हणजे- एकटे मोदी वा एकटे सरकार काही करू शकत नाही. हा मुद्दा किती जण ऐकतात, किती जण लक्षात ठेवतात, किती लोकांना त्याचे आकलन होते आणि किती लोक व्यवहारातील त्याचे स्वरूप समजू शकतात हा गहन प्रश्न आहे. आजही आजूबाजूला लोक चर्चा करताना दिसतात की, `मोदी काही करून दाखवतील. मोदी आहेत तोवर सगळे ठीक चालेल. सगळे सुधरून जाईल.' देशाची राज्यव्यवस्था असो की घरची कुटुंबव्यवस्था नेत्याची एक विशिष्ट भूमिका असते हे निर्विवाद सत्य आहे. परंतु कुटुंबापासून देशापर्यंत एकटा नेता काहीही करीत नसतो. युद्ध जिंकल्यावर सेनापतीला पदक मिळते, पण ती कामगिरी काही त्याची एकट्याची नसते. सैन्यातील प्रत्येक सैनिकाचे श्रेय सारखे असते. प्रत्येक जण पूर्ण जबाबदारीने आणि समर्पण भावनेने आपले काम करतो तेव्हा विजय मिळतो. शिवाय नेत्यावर विसंबून राहिले तर नेता बदलला की पुन्हा घडी विस्कटायला वेळ लागत नाही. ही संपूर्ण प्रक्रिया आणि त्यातील भाव नीट समजून घेतला नाही तर हाती फार काही लागणार नाही आणि पंतप्रधान मोदी काय म्हणतात तेही समजून घेता येणार नाही.

इंग्रजांच्या काळापासून आपल्याला सवय लावण्यात आली की, तुम्ही तुमचे प्रतिनिधी निवडून द्या आणि पुढच्या निवडणुकीपर्यंत आराम करा. तुमचे कर्तव्य म्हणजे फक्त प्रतिनिधी निवडून देणे. तुम्हाला बाकी काहीही कर्तव्य नाही. तुम्हाला फक्त अधिकार. त्यामुळे आपल्या सवयी, आपले विचार करणे सगळेच बदलून गेले. म्हणजे आम्ही कसाही, कुठेही आणि कितीही कचरा करू, पण आम्हाला स्वच्छ परिसर मिळाला पाहिजे. तो आमचा हक्क आहे आणि सरकारचे कर्तव्य. कर्तव्य आणि हक्कांची ही विभागणी चुकीची असूनही चर्चेपुरती मान्य केली तरीही, एक मुद्दा शिल्लक राहतोच. तो असा की, स्वच्छतेसाठी केलेली व्यवस्था पाळण्याची जबाबदारी कोणाची? ती जबाबदारी तर दुसऱ्या कोणालाही देताच येणार नाही ना? कचरा योग्य जागी, योग्य रीतीने टाकणे हे काम कोणाचे? आपण तेवढे केले तरी खूप काम होण्यासारखे आहे. अगदी सुशिक्षित, साधनसंपन्न लोकांच्या लग्नातही जेवणाची ताटे वा अन्य कचरा कसाही, कुठेही पडलेला पाहायला मिळतो. शिवाय यात स्त्री आणि पुरुष असाही भेद नसतो. मुळात कमी कचरा करणे, स्वाभाविकपणे होणारा कचरा योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी टाकणे, आम्ही जेवढ्या आणि ज्या कचऱ्याची विल्हेवाट लावू शकतो ती स्वत: लावणे; यात आपल्याला कमीपणा का वाटतो? सार्वजनिक तर जाऊच द्या, घरगुती स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवण्याची काळजीही आपण घेत नाही. आपल्याला त्याची गरजही वाटत नाही. पान, तंबाखू, खर्रा खाऊन थुंकण्याची आपल्याला लाज वाटत नाही अन `सगळ्यांना समजून घ्यावे' या आपल्या आध्यात्मिक वृत्तीने अशा लोकांबद्दलचा सार्वजनिक तिरस्कारसुद्धा उत्पन्न होऊ शकत नाही. तिरस्काराचं सुद्धा मानवी सभ्यता आणि विकासात महत्व आहे हे समजून घेण्याची गरज आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहे मोठ्या प्रमाणात उभारण्याची गरज असून ती सरकारची जबाबदारी आहे हे खरे असले तरी, असलेल्या सुविधा आम्ही कशा वापरतो हेही तपासायला हवे. कोणत्याही गोष्टीला एकच बाजू नसते. आमची तशी कितीही इच्छा असली तरी !! परंतु आम्ही स्वत:ला इतके डोक्यावर चढवून ठेवतो की सर्वंकष विचार आम्ही करूच शकत नाही. मोदी आणि मोदींचे सरकार काय करेल याचे चर्वितचर्वण करतानाच आम्ही काय केले पाहिजे, मी काय केले पाहिजे, मी काय करू शकतो; याच्या चिंतनालाही वेळ दिला पाहिजे.

फटाक्यांची चर्चा गेल्या काही वर्षांपासून पर्यावरण, प्रदूषण या संदर्भात होते. यावर्षी त्या चर्चेला स्वच्छतेचाही एक पैलू जोडला गेला. एका झटक्यात सांगून टाकायचे तर फटाक्यांवर पूर्णपणे बंदी यायला हवी. दिवाळी साजरी करणारे किंवा न करणारेही अनेक जण याच्याशी मुळीच सहमत होणार नाहीत. आनंद, धार्मिक स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, रोजगार अशी बरीच कारणे पुढे केली जातील. ही सगळीच कारणे बहाणेबाजी या एका सदरात मोडणारी आहेत. व्यापारी आणि व्यावसायिक लोक असोत किंवा घरगुती लोक, फटाके उडवताना कुरघोडी हा एक मोठा घटक असतो. आपण अधिक किमतीचे, अधिक मोठे, अधिक आवाजाचे, अधिक प्रकाशाचे फटाके अधिक प्रमाणात अन अधिक वेळ फोडले हे दाखवण्याचा इरादा नसतो का हे त्या लक्ष्मीमातेची शपथ घेऊन सांगावे. फटाके उडवण्यातील आनंद हा आसुरी आनंदच असतो. त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे, स्वत:ला आणि इतरांना मोद देण्याऐवजी त्रास देणारी गोष्ट आनंद साजरा करणारी असूच शकत नाही.

फटाक्यांचं समर्थन करताना धर्माचा आधारही घेतला जातो. एक तर हिंदूंच्या सणाच्या वेळीच पर्यावरण वगैरे आठवते का, असा एक आक्षेप असतो. हा युक्तिवाद मुळातच तकलादू आहे. हिंदू समाजाला एकजूट होण्यासाठी आणि सशक्त होण्यासाठी इतक्या सैल मुद्याची गरज नाही. हिंदू समाज शक्तिमान करण्यासाठी त्याच्या शक्तीस्थानांवर जोर द्यायला हवा. देशकाल परिस्थितीनुसार तर्कपूर्ण अशा गोष्टींना हिंदू धर्माचा विरोध असूच शकत नाही. दुसरा युक्तिवाद असतो- फटाके फोडणे ही धार्मिक प्रथा आहे. या युक्तिवादात तथ्य नाही. अगदी प्रभू रामचंद्राच्या काळात सुद्धा अयोध्येत फटाके फोडले होते, असे सांगणारेही आहेत. भारतात असंख्य सणउत्सव सतत साजरे होत असतात. त्यांना शेकडो-हजारो वर्षांची परंपरा आहे. फटाके फोडणे हा जर धर्माचा भाग असेल तर अन्य कोणत्याही सणउत्सवाशी फटाके का जोडलेले नाहीत? अन्य अनेक उद्योग व्यवसायांचा भारताचा इतिहास शेकडो वर्षे मागे नेता येत असताना फटाका व्यवसायात आघाडीवर असलेल्या शिवकाशीचा इतिहास मात्र फक्त शे-सव्वाशे वर्षांचाच का असावा? मुळातच फटाक्यांचा जागतिक इतिहास हा दोन-अडीचशे वर्षांचा आहे. भारतात याची सुरुवात ब्रिटीश काळात झाली आणि तेव्हापासून आजतागायत फटाके हा निव्वळ व्यावसायिक प्रकार आहे. त्यात धार्मिकता काहीही नाही. धर्माचा त्याचा संबंध नाही. याउपरही समजा फटाके आणि धर्माचा संबंध असेल तरीही, हिंदू समाजाने योग्य-अयोग्य विवेक करून अनेक गोष्टीत बदल केलेले आहेत. तीच हिंदू धर्माची शिकवण आहे, त्याचे वैशिष्ट्य आहे आणि त्याचे शक्तीस्थानही.

फटाक्यांना विरोध का? त्याने रोजगाराची हानी होणार नाही का? दुसरा प्रश्न बालीश बुद्धीचा आहे. एक म्हणजे, फटाक्याने होणारे नुकसान आणि फटाके व्यवसाय बुडाल्याने होणारे नुकसान यातील, फटाक्यांनी होणारे नुकसान अधिक आहे. दुसरे म्हणजे, अशा गोष्टी अपरिहार्य असतात आणि त्यांनी खूप फरक पडत नाही. मोबाईलमुळे हजारो पिसिओधारक बेरोजगार झालेतच ना? स्वयंचलित दुचाकी वाहने वाढल्याने सायकलनिर्मिती आणि दुरुस्ती यातील रोजगार घटलाच ना? संगणक वापरणे सुरु झाल्यावर अनेक लोक बेरोजगार झाले ना? त्यामुळे हा मुद्दा गैरलागू आहे.

फटाक्यांना विरोध असण्याचे कारण आहे- त्यामुळे आरोग्य आणि पर्यावरणाची होणारी हानी. आवाज आणि वायू प्रदूषण किती होते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आपण सारे प्रत्यक्ष ते अनुभवतो. डोळे खराब होण्यापासून, डोके बधीर होईपर्यंत आणि चिडचिडेपण वाढण्यापासून जखमा होईपर्यंत, शिवाय हृदयविकार- श्वसन विकार वगैरे माहिती सगळ्यांना आहे. एक गोष्ट आवर्जून सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की फटाक्यांचे हे प्रदूषण झाडे लावून कमी होऊ शकत नाही. कारण फटाके फोडण्यातून निर्माण होणारा धूर कागद, लाकडे वा काडीकचरा यांच्या धुरासारखा साधा नसतो. कागद, लाकडे, काडीकचरा जाळला तर त्यातून फक्त कार्बन डायऑक्साइड निर्माण होईल आणि हा वायू झाडांचे अन्न आहे. त्यामुळे थोडी झाडे लावली की त्याचे प्रदूषण कमी होईल. तसेही प्रत्येक माणूस रोज चोवीस तास, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कार्बन डायऑक्साइडचे प्रदूषण श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेदरम्यान करीतच असतो. ते प्रदूषण झाडे लावून पळवता येते. मात्र फटाक्यांच्या ज्वलनात (फटाके आवाजाचे असोत की प्रकाशाचे) अनेक रसायने आणि धातू असतात. वेगवेगळ्या रंगांच्या निर्मितीसाठी अनेक विषारी धातू वापरले जातात. झाडे ही रसायने आणि धातू शोषून घेऊ शकत नाहीत.

लाल रंगासाठी स्त्रॉशियम आणि लिथियम, नारिंगी रंगासाठी कॅल्शियम, पिवळ्या रंगासाठी सोडियम, हिरव्या रंगासाठी बेरियम, निळ्या रंगासाठी कॉपर, जांभळ्या रंगासाठी पोटॅशियम आणि रुबिडीयम, सोनेरी रंगासाठी कोळसा आणि लोखंड, पांढऱ्या रंगासाठी टिटॅनियम, अॅल्युमिनियम, बेरिलियम, मॅग्नेशियम आदी धातू वापरले जातात. याशिवाय झिंक, सल्फर, फॉस्फरस यांचाही वापर केला जातो. झाडांच्या प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत कार्बन डायऑक्साइड ग्रहण करून ऑक्सिजन बाहेर सोडला जातो. अन्य धातू वा रसायने हवेत तशीच राहतात. हवेत मिसळलेले हे धातू आणि रसायने हवा, पाणी इत्यादी कायमस्वरूपी प्रदूषित करतात.

या ठिकाणी एक नोंद घेणे आवश्यक आहे. फटाक्यांप्रमाणेच सर्व प्रकारच्या स्वयं वातानुकूलन यंत्रणा (एसी), डिओडरंट्स, स्वयंचलित वाहनांचा धूर अशा काही गोष्टींनी होणारे प्रदूषण केवळ झाडे लावून दूर होणारे नाही. या ज्वलनातून उत्सर्जित होणारे क्लोरो-फ्लुरो कंपाउंडस व अन्य घटक पर्यावरण आणि आरोग्य यांना मोठी हानी पोहोचवतात. शिवाय सगळ्या गोष्टी पोटात घेऊन त्यांचे उपयुक्त अन्य गोष्टीत परिवर्तन करण्याची स्वयंसिद्ध क्षमता असलेल्या मातीशी आम्ही वैर धरलेलं आहे. त्यामुळे पर्यावरणाचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. फटाक्यांना पूर्ण फाटा देण्याची म्हणूनच आवश्यकता आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, २९ ऑक्टोबर २०१४

शुक्रवार, १७ ऑक्टोबर, २०१४

आचरटांचे विलाप

कार्यकर्ता हा विचारवंत, द्रष्टा असायलाच हवा असा काही नियम विधात्याने केलेला नाही. पण आपण कोणाचा हात, तोंड वा मेंदू धरुही शकत नाही आणि नियंत्रितही करू शकत नाही. मात्र त्यामुळे होणारे परिणाम थांबत नाहीत. असेच हौशी विचारक फारसा मागचापुढचा विचार न करता लिहित किंवा बोलत सुटतात आणि गोंधळ माजवत राहतात.

कुठल्याशा उपनिषदात एक कथा आहे की, एक शिष्य आपल्या गुरूकडे जातो आणि एक प्रश्न विचारण्याची अनुज्ञा मागतो. गुरु त्याला १०० दिवस थांबण्याची आज्ञा करतो. १०० दिवसांनी शिष्य गुरूकडे जातो तेव्हा विचारतो, `मला १०० दिवस थांबायला का सांगितले? आता माझा जुना प्रश्न राहिला नसून नवीन प्रश्न विचारायचा आहे.' गुरु त्याला म्हणतो- नवीन प्रश्न असेल तर पुन्हा १०० दिवस थांब. असे दोन-तीनदा होते. अखेर शिष्य नाराजीनेच गुरूला याचे कारण विचारतो. गुरु त्याला सांगतो की, एखादा प्रश्न तुझ्या मनात आल्याबरोबर तू ज्यावेळी विचारतो त्यावेळी तू त्यावर काहीही विचार केलेला नसतो. तो तुझ्या मनातील केवळ एक तरंग असतो. १०० दिवस थांबल्यावर तुझ्या मनात, बुद्धीत तो घोळत राहतो. त्याला अनुसरून तू निरीक्षण करतो, तर्क करतो, अनुमान करतो, माहिती गोळा करतो, त्याचे विश्लेषण करतो; अशी सगळी प्रक्रिया घडते. त्यातूनच तुला उत्तर मिळते. किंवा समजा उत्तर नाही मिळाले तरी त्याबद्दल तू साधकबाधक विचार केलेला असतो आणि त्यामुळे मी जे उत्तर देईन ते समजून घेण्याची तुझी योग्यता तयार होईल. मग माझे उत्तर तुला पटेल किंवा पटणार नाही पण ते तुला योग्य अन निर्णायक उत्तराकडे घेऊन जाईल.

विचार, चिंतन, सिद्धांत, मते वगैरे संबंधात आज हे पदोपदी जाणवते. एकूणच विचार या गोष्टीसाठी आवश्यक असा वेळ देणे आणि सायास करणे बंद झाले असल्याने गोंधळ आणि बजबजपुरी पाहायला मिळते. त्यातून हाती मात्र काहीही लागत नाही. प्रसार माध्यमांनी हा गोंधळ वरच्या पायरीवर नेउन ठेवला आहे. एवढे सगळे विवेचन आज करण्याचे कारण म्हणजे विवेक कोरडे या मुंबईच्या सर्वोदयी कार्यकर्त्याचे आजच्या लोकसत्तेत प्रसिद्ध झालेले पत्र. या पत्रातून त्या सर्वोदयी कार्यकर्त्याचा वकूब जेवढा स्पष्ट होतो, तेवढीच लोकसत्ताच्या संपादकांची वृत्तीही. तसे नसते तर एक साधे पत्र, `लोकमानस' म्हणून न छापता `विशेष' म्हणून छापले नसते; तेही सरसंघचालकांचे छायाचित्र वगैरे छापून त्याला इतके उठावदार करून मोठ्या वैचारिक प्रबोधनाच्या स्वरुपात तर नक्कीच नसते छापले. याउलट, मी जर त्यावर प्रतिवाद पाठवला तर तो न वाचता केराच्या टोपलीत टाकला जाईल याबद्दल माझ्या मनात कणमात्र शंका नाही. बुद्धिमत्ता, चांगुलपणा, प्रामाणिकपणा, जगाच्या कल्याणाची कळकळ आणि प्रयत्नांची पराकाष्ठा यांचा मक्ता स्वत:लाच स्वत:च्याच हाताने देऊन टाकल्यानंतर यापेक्षा वेगळे काहीच घडू शकत नाही.

त्या पत्राचे शीर्षक आहे- `सारेच संघाचे !' अन संपूर्ण पत्रात त्यावर भरपूर टीका आहे. खरे तर यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे? एकीकडे बरळत सुटायचे- विचारभिन्नता/ मतभिन्नता असायला हरकत नाही पण मनभिन्नता नको आणि संघ जर सगळ्यांनाच आपले म्हणत असेल तर त्यावर आक्षेप घ्यायचा याला `गाढवपणा' याशिवाय दुसरे काय म्हणायचे. `आधीच मर्कट, त्यातही मद्य प्याला' अशीच ही स्थिती. आपण काय लिहितो/ बोलतो आहोत हे लिहिणाऱ्याला/ बोलणाऱ्याला न समजणारी स्थिती. संघात रोज म्हटल्या जाणाऱ्या एकात्मता स्तोत्राचा संदर्भ घेऊन त्यातील विसंगती दाखवण्याचा खटाटोप या स्वनामधन्य विद्वानाने केला आहे. काय आहे ही विसंगती? गांधीजींच्या अहिंसेला न मानणाऱ्यांनी गांधीजींना प्रात:स्मरणीय मानणे ही ती विसंगती. विचार तर दूर राहो, पण सामान्य समज इतक्या हास्यास्पद थराला आणल्यावर काय बोलावे? संघाने कधीही लपवून ठेवले नाही की, गांधीजींचा अहिंसा विचार आणि त्यांची मुसलमानांबद्दलची भूमिका यांच्याशी संघाचे मतभेद आहेत. प्रत्यक्ष गांधीजींशी झालेल्या चर्चेतही संघसंस्थापक डॉ. हेडगेवार आणि दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी त्यांना हे स्पष्ट केले होते. गेल्या ८९ वर्षात संघाने ती भूमिका बदललेली आहे असेही नाही. दुसरीकडे राजकारण, समाजकारण, अर्थकारण, ग्रामविकास, गोरक्षा, साधेपणा, आध्यात्मिक अधिष्ठान अशा अनेक गोष्टी आहेत ज्याबद्दल संघाचे मतभेद नाहीत, उलट संघाला ते सारे विषय आपलेच वाटतात आणि संघाने सातत्याने त्यासाठी भरीव कार्य केले आहे.

एखाद्याचे मोठेपण मान्य करणे किंवा त्याला सन्मान देणे, आदर देणे याचा अर्थ त्याचा प्रत्येक शब्द प्रमाण मानणे असा असतो का? आपल्या परंपरेत तर गुरूलाही तपासून घेण्यास सांगितले आहे. गांधीजी ज्या भगवदगीतेचे भक्त होते, ती गीता सांगणारा श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनाला स्पष्ट सांगतो- मी म्हणतो म्हणून तू युद्ध करू नकोस. तू विचार कर, योग्य-अयोग्य तू ठरव आणि निर्णय घे. स्वत: गांधीजींनी कधीही हा आग्रह धरला नाही की, आपण म्हणतो तेच प्रमाण. मग त्यांच्याशी प्रामाणिक मतभेद व्यक्त करूनही त्यांच्याबद्दल आदर बाळगणे, एवढेच नव्हे तर त्यांच्या लोकोत्तर व्यक्तित्वाचे रोज स्मरण करणे, त्यांच्यापासून प्रेरणा घेणे यात गैर काय आहे? खरे तर गांधीजींचे नाव प्रात:स्मरणात आणि नंतर एकात्मता स्तोत्रात समाविष्ट करणे आणि कायम ठेवणे हे संघाला सहज शक्य झालेले नाही. गांधीजींच्या भूमिका आणि त्यांच्या हत्येनंतरचा इतिहास या पार्श्वभूमीवर संघाच्या स्वयंसेवकांच्या मनात त्यांच्याविषयी रागही होता. तरीही एक समतोल भूमिका घेत संघाने स्वयंसेवकांच्या मानसिकतेत परिवर्तन घडवून आणले. हे काय लहानसहान काम आहे का? समाजाच्या मोठ्या वर्गाच्या मनातील राग, गैरसमज, कटुता प्रयत्नपूर्वक निपटून काढीत योग्य समतोल विचार आणि आचार रुजवत जाणे हे वाईट वा चुकीचे आहे का? ते वाईट वा चुकीचे असेल तर संघाने ही चूक केली आहे आणि पुढेही करीत राहील.

दुसरीकडे- गांधीजींची मुसलमानविषयक भूमिका आणि त्यांचा अहिंसाविचार यांची काय स्थिती आहे? सर्वोदय चळवळीची आज काय स्थिती आहे? सर्वोदय मृत्यूपंथाला का लागला? सर्वोदयी संस्था गतार्थ का झाल्या? त्यातील जोम, जोश, उत्साह, प्रेरणा लयास का गेल्या? संघ उन्मादी आहे त्यामुळे तो वाढला किंवा टिकला असे म्हणणे तर्कदुष्ट तर आहेच, पण माणूस, समाज याबद्दलची समज नसल्याचे ते लक्षण असून तो सामान्य माणसाचा अपमानही आहे. लोक मूर्ख आहेत असे म्हणायचे का? संघ वर्षानुवर्षे उन्माद निर्माण करीत असेल तर समाजाच्या सगळ्या थरातील कोट्यवधी स्त्री-पुरुष त्यात सहभागी का होतात? तेही स्वत:चे कुटुंब, कामधंदा वगैरे सांभाळून !! बरे हिंदू-मुस्लिम ऐक्य व्हावे अशी जर सर्वोदयवाद्यांची इच्छा होती तर त्यांनी केले काय? संघाला शिव्या देऊन ते ऐक्य होणार होते काय? याउलट हिंदू समाज आणि मुस्लिम समाज यांच्यात सार्थक चर्चा व्हावी आणि ऐक्य निर्माण व्हावे हा प्रयत्न संघानेच केला. दहा वर्षांपूर्वी तर चक्क एक अखिल भारतीय संस्था त्यासाठी स्थापन केली. संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे एक सदस्य पूर्णवेळ त्याच संघटनेचे काम करतात. अन हा नुसताच प्रयत्न नाही तर गोरक्षणासाठी लाखो मुस्लिमांना सहभागी करून घेण्याचे काम संघानेच केलेले आहे. त्यासाठी देशभर काढलेल्या विश्वमंगल गो-ग्राम यात्रेच्या समारोपाला संघाच्या रेशीमबागेतील मैदानावर सरसंघचालकांच्या शेजारी तीन-तीन मुस्लिम विद्वान धर्मगुरू बसले होते आणि त्यांनी गोरक्षेला पाठींबा दिला. संघाला लाखोली वाहणाऱ्यांनी काय केले? आजच्याच वृत्तपत्रात बातमी आहे की, संघाशी संबंधित जनता सहकारी बँकेने स्व. मोरोपंत पिंगळे पुरस्कार `मुस्लिम सत्यशोधक चळवळी'च्या कार्यकर्त्याला दिला आहे. स्व. मोरोपंत पिंगळे हे संघाचे फार मोठे अधिकारी होते. संघाने यावर आक्षेप वगैरे घेतलेला नाही. पण हे तथाकथित सर्वोदयी कार्यकर्ता किंवा लोकसत्ताच्या संपादकांना दिसणार आहे का? उलट संघाच्या बातम्या, संघाची माहिती, संघविषयक लेख कसे दाबून टाकायचे, दडवून ठेवायचे, समाजापर्यंत ते सारे पोहोचू द्यायचे नाही; असाच प्रयत्न होत असतो. यासंदर्भात माझे स्वत:चे अनुभव लिहायचे म्हटले तरी एक ग्रंथ होईल. वैचारिक प्रामाणिकपणा जोपासणे नाकाने कांदे सोलण्याइतके सोपे नाही.

गांधीजींच्या अहिंसा विचारांची आज काय स्थिती आहे हे सगळे जग पाहत आहे. जगभर सुरु असलेल्या हिंसाचाराला आळा घालण्यासाठी तथाकथित अहिंसेचे पुजारी काय करीत आहेत किंवा त्यांच्याकडे त्यासाठी काय कार्यक्रम आहे? की फक्त अहिंसा, अहिंसा अशी जपमाळ ओढत बसायचे. हिंसा थांबणे महत्वाचे की अहिंसेची जपमाळ ओढणे? हीच अहिंसेची जपमाळ ओढत बसल्याने १९६२ च्या चीन युद्धात काय झाले? अखेर देशाला आपली भूमिका बदलावी लागली. लालबहादूर शास्त्रींना `जय जवान, जय किसान' ही घोषणा द्यावी लागली. देशाला शक्तीची उपासना करावी लागली. परंतु शक्तीची उपासना म्हणजे हिंसेची आराधना नाही अन एखाद्या समाजाशी मैत्री आणि बंधुत्व म्हणजे त्या घटकांच्या सामाजिक विश्लेषणावर बंदी नाही; हे कळायला बुद्धी लागते, केवळ बुद्धिवादी असणे पुरेसे नसते. गांधीजींचे हे दोन्ही विचार पराभूत झाले असून याबाबत संघाची भूमिकाच योग्य आणि वास्तव असल्याचे काळाने दाखवून दिले आहे.

संघ सोयीस्कर भूमिका घेतो असे धादांत खोटे विधान करतानाच सर्वोदयवाद्यांनी गांधीजींचे धर्मप्रेम, त्यांच्या धर्मप्रेरणा, त्यांची रामभक्ती, त्यांचा काँग्रेसविरोध, त्यांचे व नेहरूंचे टोकाचे मतभेद हे सारे का दडवून ठेवले? सर्वोदयवाद्यांएवढा ढोंगीपणा तर क्वचितच कोणी केला असेल. याच पत्रात विवेक कोरडे यांनी स्वामी विवेकानंद आणि बंकिमचंद्र यांच्यासंदर्भातही लिहिले असून संघाचा दुटप्पीपणा उघड केल्याचा आव आणला आहे. फार खोलात न जाता एवढेच म्हणणे पुरेसे आहे की, त्यांनी स्वामी विवेकानंद आणि बंकिमचंद्र समजून घेणे तर दूरच वाचलेलेही नाहीत हे छातीठोकपणे सांगता येईल.

लोक आता `दूध का दूध और पानी का पानी' करू लागले आहेत हे दिसत असूनही या मर्कटलीला थांबत नाहीत याला काय म्हणावे? खरे तर म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावायला नको म्हणून आचरटांच्या या विलापावर वारंवार लिहावे लागते.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, १७ ऑक्टोबर २०१४

शनिवार, ११ ऑक्टोबर, २०१४

नेता ऐसा मिळे अम्हाला...

केंद्र सरकारच्या एका ग्रामविकास योजनेचं उद्घाटन आज नवी दिल्लीतील विज्ञान भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. राजकारण, राजकीय नेते, सत्ताकारण यावर मतप्रदर्शन करण्याचं मी नेहमीच टाळतो. पण आजचा कार्यक्रम, त्यातील पंतप्रधानांचे भाषण, त्यातून पुढे आलेली योजना आणि त्यामागची दृष्टी याचं अभिनंदन केल्याशिवाय राहवत नाही. सध्या महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे आणि त्या निमित्ताने खूप बरीवाईट चर्चा सुरु आहे. ती चर्चा करणाऱ्यांनी आणि ज्यांना स्वत:चं, समाजाचं, देशाचं भलं व्हावं असं वाटतं त्या सगळ्यांनी तो कार्यक्रम, त्यातील भाषण जरूर ऐकावं. एकीकडे बारामतीची कुस्ती खेळतानाच दुसरीकडे देशाची, त्यातील ग्रामीण भागांची, समस्यांची, त्यावरील उपायांची, त्यातील खाचखळग्यांची अचूक जाण; प्रत्यक्ष कृतीसाठी दिशादर्शक कल्पना; प्रेरक भाषा; सर्वसमावेशकता; स्वत:चा वाटा उचलण्याचा संकल्प; अशा अनेक गोष्टी केवळ अर्धा तासात, समोर कागदाचा चिटोराही न ठेवता करणारे पंतप्रधान या देशाने पहिल्यांदाच पाहिले आहेत. एकीकडे प्रचाराचे दौरे आणि भाषणांची रणधुमाळी सुरु असतानाच, संपूर्ण देशाच्या ग्रामविकासाच्या संदर्भात मन-बुद्धीची एवढी तयारी आणि टीकेचा वर्षाव सुरु असतानाही मन-बुद्धीचा एवढा समतोल; या काही खायच्या गोष्टी नाहीत. एका संघगीताच्या काही ओळी सहजच ओठावर येतात-
धीरवृत्तीचा उंच हिमालय,
भीषणतेतही निर्भय निश्चल,
नेता ऐसा मिळे आम्हाला,
काय असे मग उणे,
यशाने दुमदुमवू त्रिभुवने...
आणि हे करण्यासाठी मुहूर्त लोकनायक जयप्रकाश नारायण आणि श्रद्धेय नानाजी देशमुख यांच्या जयंतीचा. स्वत:ला जयप्रकाशजींचे वारसदार म्हणवून घेणारे फक्त आणि फक्त मोदीविरोधात बुडून गेले असताना हा नेता त्यांना आदरांजली वाहण्यासाठी संपूर्ण देशापुढे, खासदारांपुढे देशाला पुढे नेण्याचा कृती कार्यक्रम ठेवतो- तोही `अरे हे तर सहज शक्य आहे' असं कोणाच्याही तोंडून निघावं अशा स्वरूपाचा. केवळ मोदी पंतप्रधान आहेत म्हणून केंद्र सरकारने देऊ केलेली मदत नाकारण्यात धन्यता मानणारे जेपीभक्त कुठे आणि अशी मदत नाकारणाऱ्यांनाही आपल्या योजनेत समाविष्ट करून घेण्याची मानसिकता कुठे?

देशाच्या ४०० जिल्ह्यात रात्रीचा मुक्काम करणारे मोदी कदाचित पहिलेच पंतप्रधान असतील. कुठे पाण्याची टाकी असते तर पाण्याचे नळ नसतात; तर कुठे नळ असतात तर पाण्याची टाकी नसते; ही आपल्या ग्रामविकासाची अवस्था माहीत असणारा आणि आपल्या भाषणात त्याचा उल्लेख करणारा हा नेता, स्वत:चे सोडून दुसरे गाव दत्तक घ्या- ही व्यावहारिक सूचना करायलाही विसरला नाही. आपण काही नवीन करीत आहोत असा आव न आणता अन्य लोक अशा प्रकारच्या ग्रामविकासासाठी जे प्रयत्न करीत आहेत त्याचाही उल्लेख करायला ते विसरले नाहीत. एवढेच नाही तर त्या प्रयत्नांची दृकश्राव्य ओळखही करून देण्यात आली. ही निधी देणारी योजना नसून, विकासाची नवीन दृष्टी विकसित करणारी योजना असल्याचे सांगतानाच- supply driven development ऐवजी demand driven development ची कल्पना अभ्यासक, कार्यकर्ते आणि विचारक यांच्यापुढे त्यांनी ठेवली.

आजच्या योजनेचे प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे सांगता येतील-
१) खासदाराने ग्रामीण भागात जावे.
२) ग्रामस्थांशी आपुलकीचे नाते जोडावे.
३) आपण काय सांगतो, त्याऐवजी लोक काय सांगतात ते ऐकावे.
४) आज्ञा देऊन कामे करण्यापेक्षा प्रेरणा देऊन कामे करण्याची पद्धत अवलंबावी.
५) छोट्याशा कामाला मोठ्ठा वळसा घालावा लागणारी पद्धत बदलून तिथल्या तिथे अनेक गोष्टी मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा.
६) आपणही एक गाव दत्तक घेणार असल्याची स्वत: पंतप्रधानांची भूमिका. (ही आजवर ऐकू न आलेली भाषा आहे.)
७) योजनेच्या यशासाठी प्रामाणिकता, कळकळ आणि भावना महत्वाची आहे यावर भर.

यादी आणखीनही करता येईल. मुख्य मुद्दा आहे- या जबाबदारीच्या, पुढाकार घेण्याच्या, झूल उतरवून काम करण्याच्या, कामाच्या बदल्यात कशाचीही अपेक्षा ठेवू नये हे स्पष्टपणे सांगण्याच्या, स्वत:चा वाटा उचलण्याच्या गोष्टी बोलणेही बंद झाले होते. जमिनीवरील पाय उचलले गेले होते. पंतप्रधान ज्या पद्धतीने काम करीत आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा जमिनीवर ठाम पाय रोवण्याची चर्चा सुरु झाली आहे. खरे तर या जगातील सगळ्याच गोष्टींच्या मुळाशी माणसाच्या (समाजाच्या) मनातील भावना आणि डोक्यातील विचार हेच असतात. प्रत्यक्ष कृती आणि त्याचा परिणाम या नंतरच्या गोष्टी आहेत. परंतु आजवर आपण भावना आणि विचार अडगळीत ढकलून सारे काही केवळ वरवर करीत राहिलो. भावना आणि विचारांना हात घालून आणि प्रवाहित करून कृतीला चालना द्यावी लागेल. पंतप्रधान तेच करीत आहेत. नेत्याने दुसरे करायचे तरी काय असते?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक राहिलेल्या भारतीय जनता पार्टीच्या पंतप्रधानांच्या आजच्या आवाहनाला सोनिया गांधी, राहुल गांधी, काँग्रेसचे अन्य खासदार, कम्युनिस्ट खासदार, अन्य समर्थक व विरोधक प्रतिसाद देतील? प्रत्यक्ष काही करून दाखवण्याची, प्रत्यक्ष समाजाचे भले करण्याची ही संधी खासदार उपयोगात आणतील? समाज पाहणार आहे, लोक पाहणार आहेत, जग पाहणार आहे. १०० खासदारांनी जरी हे करून दाखवले तरी पुरे. अन्य ७०० खासदारांच्या पाठीशी लागून जनताच त्यांना हे करायला भाग पाडेल. एकदा ही साखळी प्रक्रिया सुरु झाली की, राजकारणात तग धरण्यासाठी जमिनीवर राहून काम करण्याला पर्याय राहणार नाही.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, ११ ऑक्टोबर २०१४

मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०१४

स्वाभिमान आणि दृष्टीकोन

भारताच्या यशस्वी मंगळ मोहिमेची खिल्ली उडवणारे एक व्यंगचित्र न्यूयॉर्क टाईम्सने प्रसिद्ध केले. जगभरातील भारतीय समुदायाने त्यावर आक्षेप घेतल्यावर त्या वृत्तपत्राने माफीही मागितली. मात्र माफी मागितली म्हणजे वृत्ती आणि दृष्टी बदलते असे नाही. हे व्यंगचित्र काढणारी व्यक्ती सिंगापूरची आहे. काय होते त्या व्यंगचित्रात? कशावर भाष्य होते? भाष्य होते मंगळ मोहिमेला आलेल्या खर्चावर. पंतप्रधानांनी ज्या गोष्टीचा गौरवपूर्ण उल्लेख केला होता आणि समस्त भारतीयांना ज्याचा अभिमान वाटतो अशी ही बाब. हॉलीवूड चित्रपटापेक्षा कमी खर्चात पार पाडलेल्या या मोहिमेच्या खर्चाचा अर्थ, व्यंगचित्र काढणाऱ्या दीड शहाण्याने आणि ते प्रसिद्ध करणाऱ्या अति शहाण्यांनी, भारत दरिद्री आहे असा लावला. एक शेतकरी आपली गाय घेऊन दारावर उभा आहे आणि उच्चभू लोकांच्या क्लबमध्ये आत घेण्याची विनंती करतो आहे, असे त्यात दाखवले आहे. न्यूयॉर्क टाईम्सच्या या आचरटपणातून निर्माण झालेल्या मान-अपमानाच्या प्रश्नाचा योग्य निकाल त्यांच्या माफीने लागलेला आहे. परंतु या व्यंगचित्राने पुढे आणलेल्या इतर प्रश्नांचे काय? वास्तविक तेच या प्रकरणातील खरे प्रश्न असून आज जगाला भेडसावत आहेत. काय आहेत हे प्रश्न?

हे प्रश्न आहेत, जगण्यातील पैशाच्या भूमिकेचे. पैसा म्हणजेच जगणे की पैसा हे जगण्याचे साधन आहे? जी गोष्ट कमी खर्चात होते त्यासाठी अधिक पैसा खर्च करणे शहाणपणाचे की मूर्खपणाचे? कोणाजवळ किती पैसा आहे यावरून व्यक्तीचा, समाजाचा, देशाचा, संस्थेचा दर्जा उच्च किंवा नीच ठरवणे याला सभ्यपणा म्हणावे का? बुद्धिमत्ता, गुणसंपदा यांना काही अर्थ आहे की नाही? अमाप पैसा आहे एवढ्यासाठी निर्बुद्धतेचा गौरव करण्याची वृत्ती माणसाला भूषणावह समजायची का? ज्या मानवेतर सृष्टीवर माणसाचे जीवन अवलंबून आहे त्याबद्दल तिरस्कार, घृणा आणि कमीपणाची भावना मानवाला कमीपणा आणणारी नाही का?

संपूर्ण जगात या प्रश्नांची जी उत्तरे दिली जातील त्याच्या नेमके विरुद्ध भारताचे उत्तर असेल. उत्तरातील हा विरोध वृत्ती आणि विचारांचा परिणाम आहे. वृत्ती आणि विचारांचा हा विरोध आजचाच आहे असेही नाही. हा खूप जुना आहे. अमेरिका आज भारतेतर जगाच्या या दृष्टीची सगळ्यात सशक्त प्रतिनिधी आहे. सुमारे १२५ वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंद यांनी प्रत्यक्ष अमेरिकेतच या वृत्तीचे वाभाडे काढले होते. `डॉलरवर आधारित जीवनमूल्य, डॉलरवर आधारित समाजव्यवस्था, डॉलरवर आधारित विचारपद्धती' यावर प्रचंड कोरडे ओढून त्यांनी त्यातील त्रुटी आणि धोके दाखवून दिले होते. एवढेच नव्हे तर संपूर्ण जगासाठी यासंबंधातील भारतीय दृष्टीकोन कसा योग्य आहे याचेही विवेचन केले होते. आज त्यांनी दाखवलेल्या त्रुटी आणि धोके जगापुढे आ वासून उभे आहेत. जगातील बहुतेक सारेच संघर्ष आणि अशांती भारतेतर दृष्टीच्या स्वीकारामुळेच निर्माण झाले आहेत.

स्वामीजींनी भारताचा स्वाभिमान आणि दृष्टीकोन या दोहोंच्या प्रस्थापनेसाठी काम केले. आज स्वाभिमानाची प्रस्थापना झालेली आहे असा अनुभव येतो. न्यूयॉर्क टाईम्सच्या व्यंगचित्र प्रकरणाने हा अनुभव पुन्हा दिला आहे. दृष्टीकोनाची प्रस्थापना मात्र अजून बाकी आहे. खुद्द आम्ही भारतीय लोकही स्वभिमानापुरता विचार करीत असून, दृष्टीकोनाकडे दुर्लक्ष करीत आहोत अशी स्थिती आहे. `अर्थ' विषयातील भारतीय दृष्टीकोनाची प्रस्थापना हे आगामी काळातील आव्हान आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, ७ ऑक्टोबर २०१४