सोमवार, ९ डिसेंबर, २०१३

दिल्लीतील जनमताचा अर्थ काय?

अखेर पाच राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्या. चार राज्यात कोणतीही अडचण न येता सरकार स्थापन होईल. दिल्लीत मात्र जनादेश स्पष्ट नाही. गंमत म्हणजे संख्याबळ असो नसो, सरकार स्थापनेसाठी नेहमी असणारी अहमहमिका यावेळी दिसत नाही. उलट पहिल्या दोन क्रमांकाचे पक्ष, अनुक्रमे भाजप (७० पैकी ३२ जागा) आणि आम आदमी पार्टी (७० पैकी २८ जागा), विरोधी बाकांवर बसायला तयार आहेत. स्वतंत्र भारतातील आजची ही स्थिती अभूतपूर्व आहे. सरकार स्थापनेऐवजी विरोधी बाकांवर बसण्याची चढाओढ !!

भाजप आणि एएपी हे दोन्ही पक्ष तत्वनिष्ठ आहेत अशी अजून तरी मोठ्या प्रमाणात समजूत आहे. त्याला धक्का लागू नये याची दोन्ही पक्ष काळजी घेत आहेत. हे योग्य आणि स्वाभाविकही आहे. पण याचा अर्थ यामागे राजकारण नाही असा नक्कीच नाही. एएपीच्या दृष्टीने मतदारांनी असा कौल दिला हे बरेच झाले. एएपीला स्पष्ट बहुमत मिळाले असते आणि त्याने दिल्लीत सरकार स्थापन केले असते, तर अरविंद केजरीवाल यांच्यासह सगळा पक्ष दिल्लीत अडकून पडला असता. लवकरच होणार्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हे त्यांच्या सोयीचे झाले नसते. नवा पक्ष, नवे नेतृत्व, नवे सरकार आणि नव्याने जागृत झालेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा दबाव यामुळे एएपी दिल्लीत अडकून पडला असता. त्यामुळे सध्याची स्थिती एएपीसाठी फायदेशीर आहे. आता पुन्हा सहा महिन्यांनी दिल्लीत निवडणुका झाल्या तर त्या लोकसभा निवडणुकीसोबत होतील. दिल्लीसह देशभरात हवा तयार करणे आणि यावेळी मिळालेल्या यशाचा जेवढा लाभ पदरात पाडून घेता येईल तेवढा पदरात पाडून घेणे हा एएपीचा होरा असावा. सोबतच आपण एएपीला ८ जागा कमी दिल्या याचा पश्चात्ताप होऊन पुढील वेळी दिल्लीकर कोटा पूर्ण करून देतील असा विश्वास पक्षाला आता वाटत आहे.

भाजपच्या दृष्टीनेही ही स्थिती फारशी वाईट नाही. एक तर काँग्रेसचा सफाया झाला आहे. त्याचा सर्वदूर जो संदेश जायचा तो गेलेला आहे. तो संदेश भाजपच्या फायद्याचाच आहे. दिल्लीत एएपी सत्तेत आली तर ते भाजपसाठी सोयीचे ठरणार आहे. एक तर पक्ष अडकून पडेल. दुसरे, राज्य चालवताना पक्षाच्या तत्वनिष्ठ प्रतिमेवर जी जळमटं जमतात तीही भाजपला फायद्याची ठरतील. शिवाय आज कोणाचा पाठींबा घेऊन किंवा काही आमदार वळवून आपल्या प्रतिमेवर काजळी जमू देणे भाजपला परवडणारे नाही. त्याऐवजी जनतेचा कौल शिरोधार्य मानून पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणे केव्हाही चांगले, असा विचार पक्ष नक्कीच करीत असेल.

या स्थितीकडे आणखी एका दृष्टीने पाहिले जाऊ शकते. विस्कळीत जनादेश ही काही आता आपल्याला नवीन गोष्ट राहिलेली नाही. आणि भविष्यात ती स्थिती कायम राहणार नाही असेही नाही. दोन डझन राज्यांच्या, सव्वाशे कोटींच्या विशाल देशात वेगवेगळे लोक, त्यांचे वेगवेगळे विचार, वेगवेगळे पक्ष राहणारच. त्यामुळे अशी संभ्रमित अवस्था कधीही निर्माण होऊ शकते. राजकीय आकांक्षा जसजशा वाढत जातील तशी ही स्थिती आणखी जटील होऊ शकते. त्यामुळे मुळातून विचार करायला हवा. दोन अंगांनी तो विचार व्हायला हवा.

एक म्हणजे, एकाच प्रतिनिधीगृहासाठी दोनदा निवडणुका घेणे योग्य आहे का? पैसा, वेळ, मनुष्यबळ, ऊर्जा, साधने, कामातील अडथळे अशा अनेक बाबी त्यात अंतर्भूत आहेत. देश गरीब असो की श्रीमंत, हा सगळा अपव्यय करणे योग्य नाही. लोकशाहीसाठी होणारा हा व्यय हा अपव्यय नाही असाही तर्क करता येऊ शकेल. पण त्यात फारसा अर्थ नाही. येथेच दुसरा मुद्दा उपस्थित होतो- लोकशाही म्हणजे काय?

लोकशाही म्हणजे जर लोकांचे राज्य असेल तर ते फक्त बहुमताचे राज्य कसे असेल? दिल्लीची स्थिती विचारात घेऊन बोलायचे तर, दिल्ली फक्त भाजपची, एएपीची किंवा काँग्रेसची कशी होऊ शकेल? दिल्ली ही सगळ्या दिल्लीवासीयांची आहे. अगदी मत न देणार्या दिल्लीकराचीदेखील आहे. दिल्ली ही भाजपला मत दिलेल्यांची, एएपीला मत दिलेल्यांची आणि काँग्रेसला मत दिलेल्यांचीही आहे. मग सरकार सगळ्यांचे का असू नये? देशाच्या पातळीवर सुद्धा असाच विचार का करू नये? सगळाच्या सगळा देश वा राज्य एका पक्षाच्या वा एका नेत्याच्या वा एका विचारधारेच्या मागे जाईल हे कधीच शक्य नाही. त्यामुळे बहुमत- अल्पमत पद्धतीची ही व्यवस्थाच का बदलू नये? सत्तेचा कारभार सगळ्यांनी मिळून चालवावा. जनतेचं भलं करणं, देशाचं संरक्षण करणं हेच जर सगळ्या पक्षांचं उद्दिष्ट असेल तर सगळ्यांनी मिळून सत्ता सांभाळायला हवी. हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या पद्धतींबद्दल वेगवेगळे विचार असू शकतील. तोच अडचणीचाही भाग आहे. पण वेगवेगळ्या मतांमधून व्यवहार्य तोडगा काढणे हाच तर जीवनाचा नियम आहे ना? तो नियम सत्तेला लागू नाही असे नाही. पण त्यासाठी विश्वास, प्रामाणिकपणा, सहमती, पद व सत्ता लालसेचा अभाव या गोष्टींची गरज आहे. म्हणजेच एका नवीन राजकीय संस्कृतीची गरज आहे. त्यासाठी निवडणूक पद्धती, राजकीय व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था या सार्याचाच मुळातून विचार व्हायला हवा. `त्या दृष्टीने मंथन करा. काम करा. तोच भविष्याचा मार्ग आहे', हाच लोकांनी लोकांना दिलेला लोकांचा संदेश आहे. दिल्लीच्या संमिश्र जनमताचा हाच अर्थ आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, ९ डिसेंबर २०१३

रविवार, १७ नोव्हेंबर, २०१३

माफ करा, तुम्हाला राग येईल... पण,

माणसाला ब्रान्डची खूप ओढ असते. दारू, सिगारेटपासून शर्ट-प्यांट आणि मसाल्यांपर्यंतही. औषधे सुद्धा अमुक एका कंपनीची, त्याच नावाची वगैरे हवी असतात. जीवनाच्या सगळ्याच क्षेत्रात आणि समाजाच्या सगळ्याच अंगांना हे कमी अधिक लागू होते. अगदी आध्यात्माचेही ब्रान्ड असतात. मनोरंजन, क्रीडा हेदेखील त्याला अपवाद नाहीत. असे ब्रान्ड ही वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळ्या कारणांनी गरज असते. राजकीय नेत्यांना तर असे ब्रान्डस हवेच असतात. सचिन तेंडूलकर हा असाच एक ब्रान्ड आहे. याचा अर्थ तो चांगला क्रिकेटपटू नाही असा नाही. निर्विवादपणे तो चांगला आणि श्रेष्ठ क्रिकेटपटू आहे. देवदत्त प्रतिभा, अथक परिश्रम आणि देवदत्तच साधेपणा ही त्याची जमेची बाजू आहेच. त्याला नशिबानेही साथ दिली आणि तो एक जीवंत दंतकथा होऊन बसला.

परंतु यात काय मोठेसे? प्रतिभा, परिश्रम आणि साधेपणा या काही दुर्मिळ गोष्टी नाहीत. केवळ तेवढ्यावरून त्याला जेवढे उचलून घेण्यात आले ते न पटण्यासारखे आहे. तो देशासाठी खेळला, त्याने खूप त्याग केला वगैरे तर पोरकट युक्तिवाद आहेत. सचिन देशासाठी खेळला नाही. तो स्वत:साठी खेळला. क्रिकेट हे त्याने स्वत:च्या करिअरसाठी निवडले आणि त्याने त्यात स्वत:ला सिद्ध केले. तो पैसे वगैरे न घेता खेळला नाही. एवढेच नाही तर स्वत:ची महागडी गाडी देशात आणताना त्यावरील कर माफ करण्याची विनंतीही त्याने केली होती. त्याने जी काही कीर्ती, मान्यता, स्नेह मिळवला त्याचा उपयोग देशासाठी केला असेही नाही. सचिन आज एक ब्रान्ड झाला आहे. पण देशापुढील एखादा प्रश्न सोडवण्यासाठी त्याचा कितपत उपयोग आहे? एखाद्या समस्येच्या संदर्भात जनतेला एखादे आवाहन करण्याची वेळ आली तर सचिन करेल का आणि त्याने तसे आवाहन केले तरी लोक त्याला प्रतिसाद देतील का?

त्याने खूप त्याग केला वगैरे युक्तिवादही केला जात आहे. विशेषत: शनिवारी त्याचा अखेरचा सामना आटोपल्यावर तो स्वत: ज्या पद्धतीने भावूक झाला आणि त्याची पत्नी अंजली देखील ज्या पद्धतीने भावूक झाली ते पाहून सगळ्यांनाच उमाळे आले. प्रश्न त्याच्या वा अंजलीच्या भावूक होण्याचा नाही. जगातील अनेक पती-पत्नी अनेक प्रसंगी असे भावूक होतात. ते सारे खूप खरेही असते. त्यांच्यावर प्रेम करणारे जे असतात त्यांनाही त्यावेळी भरून येते. पण याचा अर्थ त्याने खूप सोसले, त्याग केला वगैरे होत नाही. ज्या गोष्टीवर प्रेम केलं, करिअर केलं ते सोडताना वाईट वाटतंच असतं. खरं तर त्याच्यापेक्षा हजारो पटीने अधिक त्याग लोक करत असतात. अगदी विवेकानंद, गांधीजी, भगतसिंग वगैरे बाजूला ठेवू; पण पोटाची खळगी भरण्यासाठी घरापासून दूर राहावे लागणारे लोक जेव्हा दिवाळी, दसर्याला घरी बायको-पोरांजवळ येऊ शकत नाहीत तेव्हा तो त्याग असतो. तुम्ही-आम्ही सहज आणि सुखाचे आयुष्य जगताना सीमेवर अतिशय कष्टमय जगणारा सैनिक त्याग करीत असतो. स्वत:चं करिअर वगैरे मनातही न आणता दूर कुठेतरी ईशान्य भारतात जाऊन तेथील लोकांसाठी आयुष्य वेचणारा मुलगा-मुलगी त्याग करत असतात. `मी'ला बाजूला ठेवून कुष्ठरोग्यांच्या जखम धुणारे बाबा आमटे त्याग करीत असतात. स्वत:ची डॉक्टरी बंगला, गाडी, बँकजमा यासाठी न वापरता जंगलात जाऊन राहणारे कोल्हे दांपत्य वा बंग दांपत्य हे त्याग करीत असतात. `मी क्रिकेट खेळत होतो. त्यामुळे कुटुंबाला वेळ देऊ शकलो नाही' ही सचिनची कुटुंबियांप्रती भावना असू शकते, पण तो त्याग नाही.

सचिनने लोकांना चार घटका आनंद दिला, थोडा वेळ स्वत:च्या जीवनाचा विसर पाडला. हा विसर केवळ दु:खांचा विसर नव्हता, कर्तव्यांचाही विसर होता. लोक कामधाम सोडून त्याचा खेळ पाहात. तो एक प्रकारचा कैफ होता. सचिनने लोकांना दिलेला आनंद ही केवळ एक झिंग होती. त्याने जे काही दिलं त्याचं आयुष्य किती? २४ तासातच तो छोट्या पडद्यावरून बाजूला झाला आहे. लता-आशाच्या गाण्यांनी जो आनंद दिला आणि पिढ्यानुपिढ्या जन्मापासून मरणापर्यंत करोडो लोकांना जो आधार दिला आणि देताहेत; त्या तुलनेत सचिनने जे दिले त्याची खरंच काही किंमत आहे का? स्वत: अनाम राहून समाजासाठी आणि पुढील पिढ्यांसाठीही भरीव काम करून ठेवणारे अनेक लोक आहेत. ते सचिनपेक्षा निर्विवादपणे श्रेष्ठ होत. कन्याकुमारीला असलेले विवेकानंद शिलास्मारक आणि त्याचे कर्ते एकनाथजी रानडे हे वानगीदाखल एक उदाहरण.

गेल्या काही वर्षात क्रिकेट हा खेळ एक ब्रान्ड म्हणून जाणीवपूर्वक, हेतुपूर्वक विकसित करण्यात आला आहे. त्यातील पैसा, लागेबांधे, सट्टेबाजी, राजकारण हे सारे लपून राहिलेले नाही. याच्याच परिणामी मुळात लोकप्रिय असलेला हा खेळ अवास्तव डोक्यावर उचलण्यात आला. योगायोग असा की सचिनने तो स्वत:चं करिअर म्हणून निवडला होता. म्हणूनच सचिनची लोकप्रियता हा तीन घटकांचा एकत्रित परिणाम आहे. क्रिकेट, चांगला खेळाडू आणि ब्रान्ड; हे ते तीन घटक. सचिन दुसर्या खेळात असता तरीही तो चांगलाच खेळाडू राहिला असता. लता मंगेशकर यांनी तर, त्याने आता गोल्फ खेळावे आणि नाव मिळवावे असे म्हटलेच आहे. पण तो अन्य खेळात असता तर एवढी लोकप्रियता त्याला मुळीच मिळाली नसती. अन भारतरत्नही मिळाले नसते. काँग्रेसने प्रचारासाठी केलेली विनंती नाकारणे, लता मंगेशकर यांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे अशी व्यक्त केलेली इच्छा, लता मंगेशकर यांचे सचिनप्रेम, राहुल गांधी मैदानात येणे आणि सचिन बाद होणे याचा योगायोग, सचिन ब्रान्डवर स्वार झालेली जनता; अशा विविध कारणांचा संमिश्र परिणाम होऊन सचिनला २०० वा सामना संपताच भारतरत्न जाहीर झाले.

पुढचा ब्रान्ड कोणता राहील कोणास ठाऊक?

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, १७ नोव्हेंबर २०१३

मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०१३

जयप्रकाशजीचा वारसदार संघच

नरेंद्र मोदी यांनी पाटण्याच्या सभेत `जे जेपींना सोडू शकतात ते बीजेपीही सोडू शकतात' अशी बोचरी टीका नितीश कुमार यांच्यावर केली. त्याला नितीश कुमारांनी आज उत्तर दिले. आणखीनही बरेच राजकारणी जेपींचे नाव जपत असतात. प्रश्न असा की जेपी म्हणून प्रसिद्ध असलेले जयप्रकाश नारायण यांचे खरे उत्तराधिकारी कोण? जेपी यांच्याबद्दल पूर्ण आदर बाळगूनही एक ऐतिहासिक सत्य दुर्लक्षित करता येत नाही की, जयप्रकाशजींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळेच यश लाभले. मुळात जयप्रकाशजींचे आंदोलन आकाराला आले ते गुजरातमधून आणि त्याचे शिल्पकार होते नानाजी देशमुख. बिहारमध्ये त्यांनी मोठी सभा वगैरे घेतली होती, पण ती तेवढ्यापुरतीच होती. नानाजींनी सूत्रे हाती घेतली आणि त्याचे विशाल आंदोलन झाले. आणिबाणीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरात जेपींनी जे उद्गार काढले ते पाहिले तर सगळ्या शंका दूर होतात.

जयप्रकाशजीचा, सरदार पटेलांचा, एवढेच नव्हे तर महात्मा गांधींचाही खरा वारसदार जर कोणी असेल तर तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघच आहे.

सोमवार, २८ ऑक्टोबर, २०१३

लोकशाहीची हुकूमशाही नको

सध्या वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या संदर्भात आपल्या राजकीय व्यवस्थेची चर्चा सुरु आहे. अनेक प्रकारच्या सूचना, त्यांचे खंडन-मंडन सुरु आहे. निकोप समाजाचेच हे लक्षण म्हटले पाहिजे. यातील ताजी सूचना आहे मतदान सक्तीचे करण्याची. लोकांचा राजकीय सहभाग वाढावा, त्यामुळे राजकारणात शिरलेल्या अनिष्ट प्रवृत्ती दूर करता येतील; असा त्यामागे तर्क आहे. ही सूचना भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, तसेच भाजपचेच ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केलेली असल्याने त्या सूचनेचे महत्व वाढले आहे. अशी सूचना करण्यामागील भावना चांगली असली तरीही तिच्याशी सहमत होता येत नाही.

मुळात ही सूचना व्यवहार्य नाही. `आधार कार्ड’ या विषयावरून जो गोंधळ सध्या सुरु आहे तो पाहता, सक्तीच्या मतदानाची सूचना देशातील गोंधळात भर घालण्यापलीकडे काही करू शकेल असे म्हणता येणार नाही. शिवाय मतदार याद्यांमधील घोळ, नोकरशाहीतील बजबजपुरी, घर ते मतदान केंद्र यातील अंतरे (आपली micro villages लक्षात घ्यायला हवीत), मतदारांची वाहतूक राजकीय पक्षांनी करू नये असे नियम, आजारपणे, बाळंतपणे, म्हातारपणे, व्याधीग्रस्तता, इत्यादी अडचणी, विद्यमान परिस्थितीत असलेल्या डाक मतदानाचा अनुत्साही अनुभव, या व अशा अनेक कारणांनी ती सूचना प्रत्यक्षात येणे कठीण आहे. शिवाय ती प्रत्यक्षात आणायची म्हटली तर, मतदान न करणार्यांना शिक्षेची तरतूद करावी लागेल. त्याचा जो काही बोजा आणि घोळ वाढेल तो वेगळाच. शिवाय चिरीमिरी घेऊन सर्रास नियम व कायदे मोडण्यातच धन्यता मानणार्या आपल्या समाजात केवढे तरी घोळ होऊ शकतात. २००-२०० रुपये घेऊन पोलिसांनी पुलावरून गाड्या जाऊ दिल्या आणि ऐन दसर्याच्या दिवशी मध्यप्रदेशात शंभराहून अधिक लोकांना हकनाक प्राणाला मुकावे लागले. अशाच प्रकारे हजारो मतांची हेराफेरी करण्याची संधी मतदान सक्तीचे करून आपण उपलब्ध करून द्यायची का? या सूचनेचा व्यवहार्य विचार आवश्यक आहे.

सक्तीच्या मतदानाच्या संदर्भात आज जगात काय स्थिती आहे? जगातल्या फक्त २२ देशात मतदान सक्तीचे आहे. त्यातीलही फक्त १० देशात त्यावर अंमल केला जातो. १२ देशात तसा कायदा असला तरीही त्याची अंमलबजावणी होत नाही. ज्या १० देशात सक्तीच्या मतदानाच्या कायद्याची अंमलबजावणी होते ते देश आहेत- १) आर्जेन्टिना, २) ऑस्ट्रेलिया, ३) ब्राझील, ४) कोंगो, ५) इक्वेडोर, ६) लक्झेम्बर्ग, ७) नौरू, ८) पेरू, ९) सिंगापूर आणि १०) उरुग्वे. ज्या १२ देशात सक्तीच्या मतदानाचा कायदा असून त्याची अंमलबजावणी होत नाही असे देश आहेत- १) बेल्जियम, २) बोलिव्हिया, ३) कोस्टारिका, ४) डॉमिनिकन रिपब्लिक, ५) इजिप्त, ६) ग्रीस, ७) होन्डुरास, ८) लेबनोन, ९) लिबिया, १०) पनामा, ११) पराग्वे, १२) थायलंड. यातील अनेक देश अदखलपात्र आहेत हे यादीवर नजर टाकली तर स्पष्ट होईल. एकूणच सक्तीच्या मतदानाच्या संदर्भात असलेली जागतिक अनास्था त्यातून स्पष्ट होते.

अमेरिकेत विद्यमान राज्यघटना लागू होण्याच्या १० वर्षे आधी, म्हणजे १७७७ साली जॉर्जिया राज्यात मतदान सक्तीचे करण्यात आले होते. नवीन राज्यघटना आल्यापासून ते रद्द करण्यात आले. ऑस्ट्रियामध्ये १९२४ साली सक्तीच्या मतदानाचा कायदा करण्यात आला आणि १९२५ साली त्याची अंमलबजावणी करण्यात आली. नेदरलैंड येथे १९१७ साली असा कायदा करण्यात आला आणि १९७० साली तो रद्द करण्यात आला. स्पेनमध्ये १९०७ ते १९२३ या कालावधीत असा कायदा होता पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. व्हेनेझुएला देशात १९९३ साली सक्तीच्या मतदानाचा कायदा रद्द करण्यात आला. चिलीच्या राज्यघटनेत २००९ साली सक्तीच्या मतदानाच्या कायद्याच्या जागी स्वैच्छिक मतदानाचा कायदा अंतर्भूत करण्यात आला. स्वित्झर्लंडमध्ये १९४७ ते १९७१ या काळात मतदान सक्तीचे होते, पण १९७५ पासून ते स्वैच्छिक करण्यात आले. ज्यावेळी तेथे मतदान सक्तीचे होते त्यावेळीही तेथे ७१ टक्केहून जास्त मतदान कधीच झाले नाही.

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत १९६४ साली सुमारे ८६ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर हा आलेख खालीच येत असून २००८ मध्ये हे प्रमाण ७० टक्क्यावर आले होते. अमेरिकेत लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी झालेल्या गेल्या २० निवडणुकांचाही हाच अनुभव आहे. २०१० मध्ये तर केवळ ४१.५० टक्केच मतदान झाले होते. संसदीय व्यवस्थेचे माहेर समजल्या जाणार्या ब्रिटनमध्येही हेच चित्र पाहायला मिळते. तेथे कधीही मतदान सक्तीचे नव्हते आणि इ.स. २००० नंतरच्या निवडणुकांमध्ये तर मतदान सातत्याने ६० टक्क्याच्या आसपासच राहते. युरोपीय युनियनचा जो प्रयोग सध्या सुरु आहे तेथे १९७९ पासून आजवर कधीही मतदानाने ४० टक्केलाही स्पर्श केलेला नाही. लोकप्रतिनिधींसाठी फ्रान्समध्ये एकेकाळी ८० टक्केच्या वर होणारे मतदान आता ५५ टक्क्यावर आले आहे. फ्रान्समध्ये गेल्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ८० टक्के मतदान झाले होते, प्रतिनिधीगृहासाठी मात्र फक्त ५५ टक्के मतदान झाले. जर्मनीतही मतदानाची टक्केवारी ९० वरून ७० वर घसरली आहे. मतदान घसरण्याची ही बाब जपानमध्येही पाहायला मिळते.

राजकीय व्यवस्थेसाठी मतदान करण्याची सामान्य माणसाची इच्छा का कमी होत आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे. लोकांना या व्यवस्थेची गरज वाटत नाही, गरज उरलेली नाही, सहभागाची गरज वाटत नाही, मतदान म्हणजेच सहभाग हे समीकरण मान्य नाही, लोकसहभागाच्या या राजकीय व्यवस्थेत काही त्रुटी आहेत, की आणखीन काही याचाही विचार अभ्यासकांनी, चिंतकांनी करायला हवा.

या सगळ्या मुद्यांवर साधक बाधक विचार करून त्यावर तोडगा काढून, त्यातून मार्ग काढून अखेरीस मतदान सक्तीचे करण्याचा निर्णय घेण्यात आला तरीही तो तत्वत: चुकीचाच ठरेल. कारण मूळ मुद्दा अधिक सखोल आहे. तो मुलभूत मुद्दा हा की, माणूस हा राजकीय प्राणी आहे का? व्यक्ती, समाज, राजकीय व्यवस्था यांचा परस्पर संबंध, त्यांचे सापेक्ष स्थान यावर मूलभूत विचार व्हायला हवा. महंमद इक्बालने लिहिलेल्या `सारे जहां से अच्छा’ या गीतात एक ओळ आहे, `युनान, मिस्र, रोमा... सब मिट गये जहां से... कुछ बात है कि हस्ती... मिटती नहीं हमारी’. अर्थ स्पष्ट आहे. त्याची जी काही कारणे आहेत त्यातील एक कारण हेही आहे की आमचा समाज राजकारणाच्या दावणीला बांधला गेला नव्हता. त्यामुळेच राज्यकर्ते, राजकारण आणि राजकीय व्यवस्था कितीही बदलत राहिली तरीही हा समाज अखंडपणे चालत राहिला. कुठलीच व्यवस्था नसतानाही, अराजकसदृश स्थिती असतानाही समाजाचे व्यवहार, व्यवसाय, शेतीवाडी, व्यापारउदीम, खेळ, कलासाधना, सणवार, उत्सव, यात्राजत्रा, धर्मकर्म हे सारे सुरूच होते.

आज आपण सुमारे दोन डझन राजे (मुख्यमंत्री) पाहतो. स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी ५६५ राजे होते. त्यांचे सरदार, दरकदार, कारभारी, दरबारी असा सगळा लवाजमा लक्षात घेतला तर सत्तेचे, संपत्तीचे किती मोठे विकेंद्रीकरण झाले होते लक्षात येईल. म्हणूनच १८३५ मध्ये इंग्लंडच्या संसदेत त्यांच्या लोक प्रतिनिधीकडून हे सांगण्यात आले की, भारतात आपल्याला एकही भिकारी आढळला नाही. अन्नछत्र किंवा लंगर हे समाजाने निर्माण केलेले अन्नसुरक्षा विधेयकाचेच रूप होते. समाज स्वत:हून, राजकीय सहभागीतेविना समाजातील अभावांची काळजी कशी घेतो याची उदाहरणे आजही पाहायला मिळतात. त्यामुळेच सगळे निर्णय सत्तेनेच घ्यायला हवेत, सगळे अधिकार सत्तेच्याच हातात एकवटलेले असावेत आणि हे अधिकार योग्य पद्धतीने वापरले जावेत यासाठी त्यावर अंकुश ठेवण्यासाठी सत्तेत सहभाग असायला हवा; हा मूळ सिद्धांतच तपासून पाहण्याची गरज आहे. शिवाय सत्तेत सहभाग मिळाल्याने अथवा मिळवल्याने सारे काही आलबेल होते हा समज किती तकलादू आहे, हे आजवर स्पष्ट झाले आहे. म्हणूनच सत्तेचे लोण्याच्या गोळ्याप्रमाणे वाटप आणि योग्य दिशा व मार्ग राखण्यासाठी दबावगटांचे नियंत्रण; हे राजकीय व्यवस्थेचे आजचे स्वरूप तपासून पाहायला हवे.

जोवर माणूस आहे तोवर समाज राहणारच. अन जोवर समाज आहे तोवर राजकीय व्यवस्था राहणारच. परंतु माणूस, समाज आणि राजकीय व्यवस्था यांचा आधार आणि त्यांच्या विचारांची आणि कृतीची प्रेरणा सकस, व्यापकतेची आणि सर्वसमावेशक वैश्विक कल्याणाची असायला हवी. सक्तीच्या मतदानाच्या संदर्भात या तत्वाचा विचार करायचा तर असे म्हणता येईल की, मतदान कितीही कमी झाले (अगदी १०-२० टक्के झाले) तरीही राज्यकर्त्यांनी त्यांच्याकडून अपेक्षित असेच वागले पाहिजे. मतदान कमी झाले म्हणून किंवा कमी होते म्हणून वाईट प्रवृत्ती शिरतात आणि नीट काम करता येत नाही, हा युक्तिवाद पूर्णपणे बाजूस सारला पाहिजे. कितीही कमी मतदान झाले तरीही जनहिताची कामे करणे, जनहिताचे निर्णय घेणे आणि त्या कामांचा आणि निर्णयांचा अपेक्षित परिणाम होतो आहे वा नाही याची खातरजमा करून त्यावर निगराणी ठेवणे आम्ही करूच, हा राजकीय निर्धार असायला हवा. अयोग्य व्यक्तींना तिकिटे न देण्याचा निर्णय राजकीय पक्ष का घेत नाहीत? अयोग्य व्यक्ती व्यवस्थेत शिरलीच तर तिला बाजूस करण्याची हिम्मत का दाखवत नाहीत? सत्कृतीच्या आपल्या संकल्पशक्तीचे दर्शन घडवण्याऐवजी सारी जबाबदारी लोकांवर का ढकलायची?

समाज ही खूप व्यापक गोष्ट आहे. राजकीय व्यवस्था ही त्याने निर्माण केलेली एक व्यवस्था आहे. त्यात सहभाग घ्यावा की नाही हा ज्याच्या त्याच्या इच्छेचा, स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. पण तुम्ही राजकीय व्यवस्थेत सहभागी होत नाही म्हणून आम्ही अपेक्षित व्यवहार करणार नाही, हा राजकीय व्यवस्थेतील सहभागीतांचा गर्भित भाव पूर्णत: चुकीचा आहे. मतदान किती होते, मतदान कोण करते याचा विचार न करता सत्तेने करावयाची कामे प्रामाणिकपणे करणे हे सत्तेचे, राजकीय नेतृत्वाचे कर्तव्य ठरते. तसेच राष्ट्रहीतासाठी जे कायदे-नियम सत्तेद्वारे केले जातील त्यांचे पालन करणे सामान्य जनतेचे कर्तव्य ठरते. कर वेळेवर आणि प्रामाणिकपणे भरणे, वाहतुकीचे नियम पाळणे, शासनाला सहकार्य करणे हे जनतेचे कर्तव्य आहे. पण मतदान करणे हे जनतेचे कर्तव्य नाही ठरू शकत. दुसरे म्हणजे `आम्ही चांगले आणि योग्य काम करावे असे वाटत असेल तर आमच्यावर नियंत्रण ठेवणे तुमचे कर्तव्य आहे. त्यामुळे तुम्ही मतदान करायलाच हवे' हा तर्क तर फक्त विचित्र म्हणावा लागेल. आज समाजही असा अंकुश असल्याविना आपले कर्तव्य पार पाडीत नाही आणि सरकारही अंकुश असल्याविना आपले काम चोखपणे करीत नाही. हे माणसाचे नव्हे पशूचे लक्षण आहे. मतदान कितीही कमी होवो, अगदी पूर्ण संख्येने खासदार, आमदार निवडून न येवो तरीही समाजाच्या, राष्ट्राच्या भल्याचेच काम आम्ही करू. ५४५ ऐवजी ३०० खासदार निवडून आले तर ते ३०० खासदारच संपूर्ण देशाचा कारभार न्यायपूर्ण आणि पारदर्शी पद्धतीने चालवतील अशा प्रकारची भावना आणि तयारी हवी. मनातील प्रेरणा आणि संकल्पशक्ती किती बळकट आहे त्यावर ही भावना अवलंबून आहे.

आपल्या राज्यात कोणी उपाशी आहे का हे पाहिल्याशिवाय राजा जेवत नसे, कोणीही व्यक्ती कधीही जाऊन राजवाड्याची घंटा वाजवून आपली समस्या सांगू शकत असे, राजा वेषांतर करून राज्याची- प्रजेची पाहणी करून योजना वगैरे तयार करीत असे; अशी वर्णने कथा कहाण्यात आपण वाचतो. त्यातील खराखोटा भाग असेल तो असो. पण राजाने तसे वागायला हवे ही अपेक्षा आणि मान्यता होती. तो आदर्श होता. समोर काही न काही आदर्श असला की, त्यासाठी काही न काही प्रयत्न केला जातो. परंतु आदर्शच न ठेवणे, उलट एकमेकांवर कुरघोडी हाच आदर्श ठेवणे, अंति खड्ड्यातच घेऊन जाते. आज सत्तेचे स्वरूप बदलले असले, राजा जाऊन सामान्य माणूस त्यात सहभागी होत असला तरीही त्याचे मूळ स्वरूप आणि राज्यव्यवस्थेच्या निर्मितीची भावना बदलण्याची वा मोडीत काढण्याची गरज नाही.  

आजही सत्तेपासून दूर राहून या समाजासाठी संपूर्ण जीवन झोकून देणार्यांची वानवा नाही. मग राजकारणात हे का होऊ नये? राजकारणाचा हा पोत बदलण्यासाठी प्रत्येक संबंधिताने प्रयत्न करायला हवेत. वरवरचे प्रयत्न आणि चर्चा कामाच्या नाहीत. राजकारणाचा पोत जर बदलला तर आजचे सगळे राजकारणी कदाचित घरी जातील. त्याने काहीही बिघडणारही नाही. पोकळी फार काळ टिकत नाही, हा निसर्गाचा नियम आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर

बुधवार, २५ सप्टेंबर, २०१३

सामूहिक शहाणपण

लाखो वर्षांच्या वाटचालीत माणसाने अनेक गोष्टींचा विकास केला. बाह्य व आंतरिक प्रकृतीवर मात करीत करीत ही जी वाटचाल केली त्यालाच आपण सभ्यता म्हणतो. या सभ्यतेच्या विकासात एक सामूहिक शहाणपणही विकसित झाले. त्या सामूहिक शहाणपणाने आपल्याला काही मुलभूत, शाश्वत सत्ये शिकवली आहेत. त्यातली काही अशी-

१) एक आंबा पूर्ण गाडीभर आंबे नासवून टाकू शकतो.
२) अन्याय करणारा तर दोषी असतोच, पण अन्याय निमूटपणे पाहणारा देखील दोषीच असतो.
३) गुन्हे करणारा तर दोषी असतोच, पण गुन्हेगाराला आश्रय देणाराही दोषीच असतो.
४) संपूर्ण प्रजेबद्दल समान भावना, यासोबतच निर्विवाद चारित्र्य म्हणजेही राजधर्म.
५) charity must begin at home.
६) caesar's wife must be above suspision.

आपल्या सर्वशक्तिमान संसदेला व संसद सदस्यांना मात्र ही सत्ये मान्य नसावीत. नाही तर गुन्हेगारांना संरक्षण देणारा अध्यादेश केंद्र सरकारने काल का काढला असता? असो. सामूहिक शहाणपण भलेही काहीही सांगत असो. शहाणपणाने वागलेच पाहिजे असे तर काही सरकारवर बंधन नाही ना?

गुरुवार, ४ जुलै, २०१३

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे नाव अनेक गोष्टींचा पर्याय झालेलं आहे. राष्ट्रीय एकता, काश्मीर, हिंदूंचा बुलंद आवाज, भारतीय जनसंघ, भारतीय उद्योग नीती; अशा अनेक गोष्टी या नावाशी अतूटपणे जोडल्या गेल्या आहेत. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्म ६ जुलै १९०१ रोजी बंगालची राजधानी कोलकाता या शहरी एका सुविद्य परिवारात झाला. त्यांचे आजोबा गंगाप्रसाद मुखर्जी विख्यात डॉक्टर होते. त्यांचे वडील सर आशुतोष मुखर्जी हे अत्यंत मेधावी विद्यार्थी, प्रसिद्ध वकील, कोलकाता विद्यापीठाचे कुलगुरू, अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांचे संस्थापक, प्रसिद्ध प्रशासक म्हणून नावाजले होते. गणित व पदार्थविज्ञान शास्त्र अशा दोन विषयात एम.ए. पदवी मिळवणारे ते पहिले भारतीय होते. १९०६ ते १९१४ आणि १९२१ ते १९२३ या काळात ते कोलकाता विद्यापीठाचे कुलगुरू होते. इंडियन सायन्स कॉंग्रेसचे ते संस्थापक अध्यक्ष होते. त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांना `बंगालचा वाघ' म्हणून ओळखले जात होते. प्रख्यात शास्त्रज्ञ प्रफुल्लचंद्र रॉय व स्वामी विवेकानंद त्यांचे सहपाठी होते. तसेच गणितातील चमत्कार समजले जाणारे श्रीनिवास रामानुजम आणि प्रसिद्ध तत्वज्ञ, थोर शिक्षण तज्ञ अन भारताचे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन त्यांनीच दिलेली देणगी होय असे म्हणावे लागेल. अशा अत्यंत कर्तृत्ववान, संपन्न आणि विद्याव्यासंगी परिवारात जन्म झालेल्या श्यामाप्रसादांनी तोच वारसा पुढे चालवला.

इ.स. १९२१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी इंग्रजी विषय घेऊन पहिल्या क्रमांकाने पदवी प्राप्त केली. १९२२ साली त्यांचा विवाह झाला. १९२३ साली त्यांनी बंगाली भाषा व साहित्य या विषयात एम.ए. पदवी मिळवली. इंग्रजी भाषेत अव्वल असूनही त्यांनी बंगालीत एम.ए. करण्यामागे त्यांच्या वडिलांचा आग्रह होता. त्यावेळी इंग्रजी धोरणामुळे भारतीय भाषांना उतरती कळा लागली होती. परंतु प्रखर स्वाभिमानी आणि स्वदेशाभिमानी सर आशुतोष मुखर्जी यांचा कुलगुरू या नात्याने भारतीय भाषांना सन्मानाचा दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न होता. त्यापोटी त्यांनी आपल्या मुलाला म्हणजे डॉ. श्यामाप्रसादांना बंगालीत एम.ए. करायला लावले. १९२३ साली त्यांची विद्यापीठाचे फेलो म्हणून निवड झाली. १९२४ साली त्यांच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर रिक्त झालेल्या कोलकाता विद्यापीठ सिंडीकेटच्या जागेवरही त्यांची निवड करण्यात आली. अशा प्रकारे वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी त्यांच्यावर शैक्षणिक कार्याची मोठी जबाबदारी येउन पडली. १९२६ साली ते इंग्लंडला गेले. त्यांनी बॅरीस्टरची पदवी प्राप्त केली. त्यानंतर कोलकाता उच्च न्यायालयात वकील म्हणून कामही सुरु केले. पण त्यात ते फार रमले नाहीत.

१९२९ साली त्यांनी राजकीय जीवनात प्रवेश केला. कोलकाता विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून आणि कॉंग्रेसचे सदस्य या नात्याने त्यांनी बंगाल विधानसभेत प्रवेश केला. हा त्यांच्या राजकीय जीवनाचा श्रीगणेशा. लगेच १९३० साली कॉंग्रेसने विधानसभेचा बहिष्कार करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर अपक्ष सदस्य म्हणून त्यांनी विधानसभेत प्रवेश केला. १९३३ साली त्यांची पत्नी सुधादेवी यांचे निधन झाले. १९३४ साली त्यांची कोलकाता विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली. १९३४ ते १९३८ एवढा काळ ते कुलगुरू होते. त्याशिवायही अनेक विद्यापीठ समित्यांवर त्यांनी भरीव काम केले.

कोलकाता विद्यापीठाचे कुलगुरू या नात्याने त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात बहुमोल भर घातली. शेती, भारतीय भाषा, शिक्षण, कला, विज्ञान अशा अनेक अंगांनी त्यांनी विद्यापीठ फुलवले. शेतीचा पदविका अभ्यासक्रम प्रथम त्यांनी सुरु केला. महिला आणि गरिबांना शिक्षण मिळावे यासाठी अनेक सवलती, छोटे छोटे अभ्यासक्रम, सोयीच्या वेळांचे नियोजन; अशा गोष्टी त्यांनी घडवून आणल्या. बी.ए. अभ्यासक्रमात हिंदी भाषेचा समावेश आणि बंगाली, हिंदी व उर्दू भाषांचे ऑनर्सचे शिक्षण त्यांनीच सुरु केले. विज्ञानातील पारिभाषिक शब्दांना बंगाली प्रतिशब्द देण्याचे कामही त्यांनी सुरु केले. लष्करी शिक्षणाचा अंतर्भाव केला. शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरु केले. उपायोजित रसायनशास्त्र विभागात; अधिक औद्योगिक उत्पादन कसे घेता येईल याबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण सुरु केले. कलादालन सुरु केले. अशा असंख्य प्रकारे त्यांनी कोलकाता विद्यापीठाच्या माध्यमातून समाजासाठी भरीव कार्य केले. अशा प्रकारच्या कामांना इंग्रजी सत्तेचा होता होईतो विरोधच राहत असे हे एक; आणि त्या काळात कोलकाता हेच संपूर्ण देशाच्या राजकीय आणि शैक्षणिक घडामोडींचे केंद्र होते हे दुसरे; अशा दोन गोष्टी लक्षात घेतल्या तर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केलेल्या या कामाची महत्ता लक्षात येईल. भारताच्या सगळ्या भागातील विद्यार्थी कोलकाता विद्यापीठात शिकायला जात असत हेही लक्षात घेतले पाहिजे.

१९३८ साली कोलकाता विद्यापीठाने त्यांना मानद डी.लिट.; तर बनारस हिंदू विद्यापीठाने त्यांना मानद एल.एल.डी. पदवी प्रदान केली. त्याच वर्षी `लीग ऑफ नेशन्स'च्या बौद्धिक सहकार्य समितीवर भारताचे प्रतिनिधी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. याच काळात ते हिंदू महासभेकडे आकर्षित झाले होते. १९३९ साली कोलकाता येथे हिंदू महासभेचे २१ वे अखिल भारतीय अधिवेशन भरले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. श्यामाप्रसादांनी त्यात सक्रिय भाग घेतला. १९४० साली ते हिंदू महासभेचे कार्यकारी अध्यक्ष निवडले गेले. १९४० ते १९४४ या काळात ते हिंदू महासभा बंगालचे अध्यक्ष होते. मुस्लिम लीगच्या वाढत्या सांप्रदायिक आणि हिंसक राजकारणाचा परिणाम म्हणूनच ते हिंदू महासभेकडे वळले होते. हिंदू-मुस्लिम शांततेचा एक प्रयत्न म्हणून त्यांनी मुस्लिम लीगसोबत संयुक्त मंत्रिमंडळ देखील बंगालमध्ये स्थापन केले. त्या मंत्रिमंडळात ते स्वत: अर्थमंत्री होते.

त्यावेळच्या बिहार सरकारने हिंदू महासभेच्या भागलपूर अधिवेशनावर बंदी घातली. ती मोडण्यासाठी श्यामाप्रसाद भागलपूरला गेले. तेथे त्यांना अटक करून नंतर त्यांना सोडून देण्यात आले. क्रिप्स कमिशनने वेगळ्या पाकिस्तानची मागणी उचलून धरली होती. त्यामुळे कमिशनच्या शिफारसी श्यामाप्रसादांनी पूर्णपणे फेटाळून लावल्या. १९४२ च्या `चले जाव' आंदोलनाची सरकारने जी दडपशाही केली त्याच्या निषेधार्थ त्यांनी बंगाल मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. १९४३ साली ५० लाख लोकांचा बळी घेणारा जो महाभयंकर दुष्काळ पडला होता, त्या दुष्काळात त्यांनी प्रचंड मदतकार्य केले. १९४४ साली Nationalist नावाचे एक दैनिकही त्यांनी सुरु केले होते. अमृतसर व बिलासपूर येथील हिंदू महासभेच्या अधिवेशनांचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. बॅ. जिन्ना यांच्याशी फाळणी टाळण्याबाबत त्यांनी चर्चाही केली होती. दरम्यान, भारतीय स्वातंत्र्याची चर्चा सुरु झाली होती आणि घटना समिती तयार करण्यात येत होती. त्यावेळी घटना समितीवर बंगालचे सदस्य म्हणून त्यांची निवड करण्यात आली.

सत्ता हस्तांतरणाची क्रिप्स योजना विफल झाल्यानंतर जिन्ना व सुहरावर्दी यांनी १६ ऑगस्ट १९४६ रोजी हिंदूंविरुद्ध direct action ची घोषणा केली. कोलकाता शहरात चार दिवस हिंदूंची सरसहा कत्तल सुरु होती. The great calcutta killings म्हणूनच ही घटना इतिहासात नोंदली गेली आहे. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यात बंगालमध्ये मानवतेची मान खाली गेली. १० ऑक्टोबर १९४६ रोजी ऐन कोजागिरीच्या दिवशी हिंदू लक्ष्मीपूजनाच्या उत्साहात असताना बंगालच्या नोआखली येथे मुसलमानांनी हिंदूंची सरेआम कत्तल सुरु केली. हत्या, लुटपाट, बलात्कार, धर्मांतर असे सारे काही सुरु झाले. लोकांचे घरातून बाहेर पडणे दुष्कर झाले. स्वत: महात्मा गांधी चार महिने नोआखलित तळ ठोकून होते. त्यांच्या प्रयत्नांना काहीही यश आले नाही. एकदा तर उद्वेगाने ते म्हणालेही की, आवश्यक असेल तर हिंदू महिलांनी शस्त्रेही बाळगावी. नोआखलिची परिस्थिती किती भीषण असेल हे यावरून ध्यानात यावे. हजारो हिंदू मारले गेले. उरलेल्यांना पश्चिम बंगाल, आसाम, त्रिपुरा येथे आसरा घ्यावा लागला. या सर्व काळात हिंदूंच्या पाठीशी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी ठामपणे उभे होते.

स्वत: अखंड भारतावर अभंग श्रद्धा असतानाही, देशाचे विभाजन अटळ आहे हे लक्षात येताच त्यांनी बंगालच्या विभाजनाची मागणी केली. त्यासाठी चळवळ केली आणि ज्या आधारावर देशाची फाळणी होत होती; त्याच आधारावर बंगालची फाळणी घडवून आणली. त्यांच्या या दूरदर्शित्वामुळे आणि समयसूचकतेमुळे पूर्ण बंगाल पाकिस्तानात न जाता पश्चिम बंगालचा भाग भारतात कायम राहिला.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित नेहरूंच्या नेतृत्वातील पहिल्या राष्ट्रीय मंत्रिमंडळात त्यांचा उद्योग व पुरवठा मंत्री म्हणून समावेश करण्यात आला. स्वतंत्र भारताची पहिली उद्योग नीती बनवण्याचा मानही त्यांच्याकडेच जातो. हेच उद्योग धोरण पुढे बराच काळ सुरु होते. १९४९ साली भारतीय महाबोधी सोसायटीच्या अध्यक्षपदीही त्यांची निवड करण्यात आली. १९५० साली पूर्व पाकिस्तानात (आजचा बांगलादेश) हिंदूंवर ठरवून हल्ले होऊ लागले. हिंदूंची कत्लेआम सुरु झाली. सुमारे ५० लाख हिंदू भारतात आश्रयाला आले. श्यामाप्रसादांनी पाकविरुद्ध कठोर कृतीची मागणी केली. परंतु पंडित नेहरूंनी त्यांच्या मागणीकडे पूर्ण दुर्लक्ष करीत उलट पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली यांच्याशी करार केला. याचा निषेध म्हणून श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला.

त्यावेळच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एका राष्ट्रवादी पक्षाची गरज त्यांना जाणवू लागली. पण असा अखिल भारतीय पक्ष स्थापन करणे सोपे नव्हते. त्यातही हिंदूंचा द्वेष न करणारा पक्ष काढणे जिकिरीचेच होते. त्यासाठी तशी कणखर माणसे हवी होती. त्यावेळी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना भेटले. दोघांची विस्तृत चर्चा झाली. त्यातूनच १९५१ च्या ऑक्टोबर महिन्यात `भारतीय जनसंघा'ची स्थापना झाली. १९५२ साली पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यात जनसंघाचे तीन खासदार निवडून आले. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी त्यातील एक होते.

एकीकडे देशाची घडी स्थिरस्थावर होत असतानाच, जम्मू-कश्मीरचा प्रश्न मात्र नेहरूंच्या धोरणाने तसाच पडून होता. स्वातंत्र्याला सहा वर्षे झाली तरीही जम्मू-काश्मीरचे भारतात पूर्ण विलीनीकरण झाले नव्हते. जम्मू-काश्मीर हा भारताचा भाग असूनही तेथे वेगळ्या राज्यघटनेने कारभार चालत असे. भारतीय घटना तेथे लागू नव्हती. जम्मू-काश्मीरचा स्वतंत्र ध्वज होता. तसेच त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला `पंतप्रधान' म्हटले जात असे. हे सारे समजण्याच्या पलीकडचे होते. देशाच्या एकता व अखंडतेबद्दल आस्था व बांधिलकी असणाऱ्या कोणालाही हे न पटणारेच होते. जम्मू-काश्मिरातील प्रजा परिषद पक्षाने याविरुद्ध आंदोलन छेडले. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी या आंदोलनाला पूर्ण पाठींबा दिला. ५ मे १९५३ रोजी या आंदोलनाला पाठींबा म्हणून `काश्मीर दिवस' पाळण्याचे आवाहन त्यांनी देशाला केले. ८ मे १९५३ रोजी ते काश्मीरला रवाना झाले. भारतीय नागरिक असूनही काश्मीर हद्दीत प्रवेश करण्यासाठी परवाना लागत असे. हा निर्बंध मोडून श्यामाप्रसाद ११ मे १९५३ रोजी काश्मिरात धडकले. त्यांना लगेच अटक करण्यात आली.

श्रीनगरच्या निशातबाग येथे त्यांना एका घरात कच्च्या कैदेत ठेवण्यात आले. ११ मे ते २३ जून या काळात ते कैदेत होते. त्यांच्या प्रकृतीची आबाळ होत असताना जाणूनबुजून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आलेले पंडित नेहरू आणि मौलाना आझाद यांनी त्यांची भेट घेण्याचे सौजन्यही दाखवले नाही. १९ जून रोजी त्यांना `dry pleurisy and coronary troubles' झाल्याचे निदान करण्यात आले. २२ जून रोजी त्यांची प्रकृती अधिकच ढासळली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथेच २३ जून रोजी पहाटे २.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या रोगाचे निदान, त्यांना मिळालेले उपचार, याविषयी अनेकांनी संशय व्यक्त केला होता. आजपर्यंत त्यावरील पडदा उठलेला नाही.

सरकारचे वर्तनही हा संशय बळकट करणारेच होते. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे देहावसान झाले तेव्हा पंडित नेहरू देशाबाहेर होते. मौलाना आझाद कार्यवाहक पंतप्रधान होते. त्यांनी श्यामाप्रसादांचे शव दिल्लीत आणण्यासही परवानगी दिली नाही. श्यामाप्रसाद एका अखिल भारतीय पक्षाचे अध्यक्ष होते, लोकसभेचे निवडून आलेले खासदार होते, देशाचे पहिले उद्योग मंत्री होते; असे असूनही त्यांचे शव दिल्लीत आणायला परवानगी देण्यात आली नाही. शव थेट कोलकात्याला पाठवण्यात आले. भरीस भर म्हणजे, शवाचे शवविच्छेदनही करण्यात आले नाही. अगदी प्राथमिक अशा स्वरुपाची ही बाब, पण त्याचीही पूर्तता करण्यात आली नाही. जम्मू-काश्मीरच्या शेख अब्दुल्ला सरकारने तर शवविच्छेदन जाणूनबुजून टाळलेच, पण पश्चिम बंगाल सरकारनेही त्याकडे डोळेझाक केली. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी देशाच्या एकतेसाठी शहीद झाले.

पंडित नेहरू भारतात परतल्यानंतर श्यामाप्रसादांची आई जोगमाया देवी यांनी श्यामाप्रसादांच्या मृत्यूची चौकशी करावी अशी मागणी त्यांच्याकडे केली. त्यावर, आपण त्यांच्याजवळ अखेरच्या क्षणी असणाऱ्यांशी चर्चा केली आहे आणि त्यात काही काळेबेरे असेल असे आपणास वाटत नाही, असे उत्तर जोगमाया देवी यांना दिले होते. एक मात्र झाले की, त्यानंतर तयार झालेल्या वातावरणाने जम्मू- काश्मीरसाठी वेगळा ध्वज, वेगळी घटना आणि वेगळा पंतप्रधान ठेवणे अशक्य झाले आणि ते सारे रद्द करण्यात आले. तेथे प्रवेश करण्यासाठी लागणारी परवाना पद्धतही रद्द करण्यात आली. आजही काश्मीरचे अन्य राज्यांच्या तुलनेने वेगळेपण आहेच. आजही कोणीही भारतीय नागरिक जम्मू-काश्मिरात जमीन खरेदी करू शकत नाही. जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे हे प्रतिपादन, अशा प्रकारे बाधित होतच आहे. भारतीय जनतेच्याच पैशावर सारे ऐषोआराम भोगणारे अब्दुल्ला घराणेच आजही तेथे सत्तेवर आहे. परंतु जम्मू-काश्मीरचे पूर्ण विलीनीकरण व्हावे अशी इच्छाही त्यांना होत नाही. तरीही आज कोणालाही जम्मू-काश्मीर भारतापासून दूर करणे शक्य नाही. आज जम्मू-काश्मीर आणि पश्चिम बंगाल आमच्या देशाची ढाल बनून उभे आहेत आणि त्याचे फार मोठे श्रेय शहीद डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनाच आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, ५ जुलै २०१३

शनिवार, २९ जून, २०१३

केदारनाथचा धडा

उत्तराखंडातील ढगफुटीने केदारनाथ परिसरात हाहा:कार उडाला आहे. १०-२० करता करता मृतांचा अधिकृत आकडा हजारावर पोहोचला आहे. अनधिकृतपणे हजारो लोक मरण पावले असावेत, असे म्हटले जात आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनीही हजारो लोक मरण पावले असावेत, अशी भीती व्यक्त केली आहे. हजारो यात्रेकरू अडकून पडले आहेत. गावेच्या गावे जमीनदोस्त झाली आहेत. ८-१० फूट चिखल, रेती सर्वत्र साचली आहे. सामान्य पावसापेक्षा ४०० टक्के अधिक पाऊस, तोही अगदी थोड्या वेळात आणि अचानक कोसळला. शब्दापलीकडील असे हे निसर्गाचे तांडव आहे. अशा स्थितीत लष्कराचे जवान सरसावले आहेत. प्राणांची बाजी लावून ते मदत आणि बचाव कार्य करीत आहेत. त्यांना सलाम करणे आपले कर्तव्य आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक देखील त्यांच्या स्वभावाला, वृत्तीला, संस्कारांना आणि परंपरेला धरून मदतकार्यात पुढे आले आहेत. अन्यही लोक आपापला वाटा उचलीत आहेत. प्रसार माध्यमेही माहितीच्या देवाणघेवाणीचे काम अथकपणे करीत आहेत. सध्या तरी याच गोष्टींवर लक्ष देणे आणि भर देणे आवश्यक आहे.

यासोबतच या `हिमालयन सुनामी'चे विश्लेषण पण सुरु झाले आहे. पर्यावरण, राजकारण, नोकरशाही, भ्रष्टाचार, अंदाधुंद विकास, उपभोगवाद, समाजाची जबाबदारी अशा अनेक मुद्यांचा उहापोह होत आहे. तसा तो व्हायलाही हवा. अगदी कर्कशपणे ही चर्चा व्हायलाही हरकत नाही. फक्त ती प्रामाणिक आणि जबाबदार असावी हे मात्र पाहायला हवे. अशीच एक चर्चा `times now' वाहिनीवर झाली. अर्णव गोस्वामीने राजकीय नेत्यांना अगदी फाडून खाल्ले. त्यानंतर चर्चा संपता संपता एका राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीने मत व्यक्त केले की, `तुमचे विश्लेषण बरोबर आहे. अशा दुर्दैवी घटना होऊ नयेत ही साऱ्यांचीच जबाबदारी आहे. राजकीय नेत्यांपासून याची सुरुवात व्हायला हवी हेही योग्य. पण बाकीच्यांचीही ही जबाबदारी आहे. आज पर्यावरण विरुद्ध विकास असा प्रश्न निर्माण झाला आहे. यातून मार्ग कसा काढायचा यासाठी आपणही काही ठोस उपाय सुचवावे.' यावर मात्र चर्चा घेणाऱ्या अर्णव गोस्वामीने ते मत अमान्य केले आणि आम्ही फक्त प्रश्न विचारू आणि प्रश्न विचारणे सोडणार नाही, असा समारोप केला. या चर्चेचे स्वागत करतानाच वृत्तीचा मात्र निषेध करायला हवा. राजकारण, राजकीय नेते याबद्दल आज फार काही बोलण्यासारखे नसले तरीही; सारे खापर त्यांच्यावर फोडले की आपले काम संपले, अशी ही वृत्ती नक्कीच समर्थनीय नाही.

पर्यावरण रक्षणाकडे अक्षम्य दुर्लक्ष हे केदारनाथ दुर्घटनेचे एक प्रमुख कारण आहे. गंगोत्रीपासून १६० किमीचा परिसर ecologically sensitive zone असल्याचे सरकारी अहवालच आहेत. त्यामुळे तिथे होणारी कामे अनेक प्रकारची काटेकोर काळजी घेऊन करायला हवीत. अशा प्रकारची काळजी घेतली जात नाही, असा अहवाल कॅगने २००९ सालीच दिलेला आहे. म्हणजे चार वर्षांपूर्वी. पण त्यावर अंमल मात्र झाला नाही. ताज्या ढगफुटीत वाहून गेलेल्या अनेक इमारती बेकायदेशीर असण्याची शक्यता आहे. जे झाले ते वाईट हे मान्य करतानाही राजकीय नेते आणि प्रशासन यांच्या चुकीकडे दुर्लक्ष कसे करता येईल? वाळू माफिया, लाकूड माफिया, जंगल माफिया, जमीन माफिया, जल माफिया हे सारे सगळीकडे आहेत तसेच उत्तराखंडातही आहेत. महाराष्ट्रातही आपल्याला हे नवीन नाही. या साऱ्या माफियांनी समाजाला सर्वत्र वेठीस धरले आहे. त्याचा भीषण परिणाम आज केदारनाथ दुर्घटनेच्या रुपात पाहायला मिळत आहे. भागीरथीचे अमाप पाणी आहे म्हणून अनावश्यक रीतीने अंदाधुंद हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट्सची उभारणी हेही महत्वाचे कारण आहे. अगदी विश्व हिंदू परिषदेने काही वर्षांपूर्वी गंगा वाचविण्यासाठी टिहरी धरणाला विरोध केला होता. भारतीय जनता पार्टीने मात्र पर्यावरणाच्या प्रश्नांकडे दुर्लक्षच केले.

परंतु प्रश्न इथेच संपत नाही. खरा प्रश्न हा आहे की, असे माफिया तयारच का आणि कसे होतात? जगातील सारी सत्ता आणि संपत्ती आपल्या हाती असली पाहिजे अशी वखवख, लालसा, हपापलेपण याच्या मुळाशी आहे. हे तर शक्य नाही. मग जास्तीत जास्त सत्ता आणि संपत्ती मिळवण्याचा आणि बाळगण्याचा प्रयत्न करायचा. संपत्तीसाठी सत्तेचे तळवे चाटायचे आणि सत्तेसाठी संपत्तीचे दासत्व स्वीकारायचे. या दोन्हीसाठी मग वाट्टेल ते करण्याची तयारी ठेवायची. पण एवढ्यानेही भागत नाही. सत्ता आणि संपत्ती याचा प्रमुख आधार सामान्य माणूस आहे. सामान्य माणसाशिवाय सत्ता मिळू शकत नाही आणि टिकूही शकत नाही. तेच संपत्तीच्या बाबतीत. सामान्य माणसाची मेहनत, कौशल्य आणि बुद्धिमत्ता यातूनच संपत्ती निर्माण होते. त्यामुळेच अनिच्छेने का होईना या सामान्य माणसाला, सत्ता व संपत्तीच्या या खेळात सहभागी करून घ्यावेच लागते. यातील गंमत अशी की, सत्ता व संपत्ती (विशेषत: संपत्ती) माणसाच्या जीवन व्यवहारालाही आवश्यक आहे. म्हणजेच ती त्याची गरजही  आहे. हा प्रश्न किती गुंतागुंतीचा आहे हे यातून स्पष्ट व्हावे. तीन मुद्दे याबाबत सांगता येतील-
१) संपत्ती ही माणसाची गरज आहे.
२) सुप्त रुपात त्याच्या मनात संपत्तीची लालसा आहे.
३) संपत्तीची लालसा तृप्त करण्याच्या प्रयत्नात जे वर पोहोचले आहेत ते सामान्य माणसाचा वापर करून घेत आहेत.
यातूनच अनेक समस्या आणि गुंतागुंती निर्माण होतात. अशांती निर्माण होते. अस्वस्थता निर्माण होते. लागेबांधे निर्माण होतात, गट निर्माण होतात.

सारी सत्ता आणि संपत्ती आपल्या हाती असावी अशी इच्छा असली तरीही तसे शक्य नसल्याने एकमेकांचे साहाय्य घेत अधिकाधिक लाभ पदरात पाडून घ्यायचा. कधी आवळून घ्यायचे, कधी मोकळे सोडायचे. सतत हिशेब मांडायचे. कधी एक जण बाजी मारेल तर कधी दुसरा. या साऱ्यात कोणाला तरी बळ मिळते आणि कोणी तरी बळी ठरतो. त्यातून वेगवेगळी तत्वज्ञाने निर्माण होतात. विविध पद्धती विकसित होतात. संकल्पना विकसित केल्या जातात. चांगल्या- वाईटाच्या, योग्य- अयोग्याच्या, जीवनस्तराच्या, प्रतिष्ठेच्या संकल्पना विकसित केल्या जातात. त्यांचा पद्धतशीर प्रचार- प्रसार केला जातो. आज आपण जाहिरातींचा जो पसारा पाहतो तो असाच आहे. त्याला वेष्टन चढवले जाते. असे वेष्टन चढवले की, आर. के. लक्ष्मणचा सामान्य माणूस त्या साऱ्या जाळ्यात छान अडकतो. या जाळ्यात अडकलेल्या माणसापुढे मग स्वप्ने सजवायची आणि सामुहिक लुटालूट करायची. सारं आयुष्य अशाच प्रकारे संपून जातं. कोणी यशस्वी म्हणून तिरडीवर चढतो, तर कुणी अयशस्वी म्हणून तिरडीवर चढतो. जग असंच सुरु राहतं.

या पार्श्वभूमीवर एक छोटीशी घटना सहज आठवते. काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र सरकारने आपले औद्योगिक धोरण जाहीर केले होते. त्यावर चर्चा सुरु होती. त्यात डी.एस.के. डेव्हलपर्सचे कुलकर्णी सहभागी झाले होते. त्यांनी मुद्दा मांडला की, `लहान गावात सोयी नसतात; त्यामुळे उद्योग तेथे जात नाहीत. विमानतळ नसतात. जी विमानतळे आहेत ती लहान आहेत. अधिक विमाने तिथे ठेवता येत नाहीत.' वगैरे. त्यावर एकाने म्हटले की, तुम्ही तुमच्या पंचतारांकित जीवनशैलीला थोडी मुरड घातली पाहिजे. त्यावर कुलकर्णी म्हणाले, `हो. आम्ही मुरड घालू. विमानाऐवजी मोटारीने जाऊ. पण रस्ते तरी कुठे आहेत. सहा पदरी रस्ते हवेत.' या क्षणी अचानक त्यांना लक्षात आले असावे की, अरे आपण तर पुन्हा पंचतारांकित शैलीचीच चर्चा करीत आहोत. त्यामुळे सावरून घेत ते लगेच म्हणाले, `असे सहा पदरी रस्ते नसतील तर निर्यात कशी शक्य होईल? द्राक्षे ट्रकमध्ये भरली आणि ट्रक अडकला तर ती खराब होऊन जातील ना?' यावर अन्य कोणी काही बोलले नाही. हे विस्ताराने सांगण्याचे कारण हे की, कुलकर्णीसारखा माणूस असे फसवे युक्तिवाद करून सामान्य माणसाचा बुद्धिभेद कसा करीत असतो हे लक्षात यावे. यातील फसवेपण असे की, द्राक्षे खराब होतील हे खरे असले तरीही; इन्फोसिस वा विप्रो जे काही निर्यात करतात त्यासाठी सहा पदरी रस्त्यांची काहीही गरज नाही. किंवा, तिखट, हळद, मसाले, शर्ट, मेणबत्त्या, sanitary napkins, खडू, टाचण्या, डब्बे अशा असंख्य गोष्टी किंचित वेळ लागला तरी खराब होत नाहीत. सामान्य माणसाचे विचारीपण कसे वेठीस धरले जाते हे असंख्य उदाहरणांवरून सांगता येईल.

जग हे असे आहे. त्यामुळेच या जगाचा समतोल राहावा, या जगात शांतता, स्थैर्य, सलोखा राहावा यासाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न जगभरच्या प्रतिभावंतांनी, विचारवंतांनी, साधू संतांनी, धर्मांनी, समाज व्यवस्थांनी केला. या सगळ्या प्रयत्नांचे एक समान सूत्र म्हणजे, प्रत्येकाने अंतर्मुख झाले पाहिजे. अन्यांचा विचार केला पाहिजे. आपले वाटणे, आपल्या इच्छा, आकांक्षा वेळोवेळी तपासून पाहायला हव्यात. त्यातील अनावश्यक आणि अयोग्य इच्छा आकांक्षा टाकून द्याव्या. जीवनाचा सर्वांगानी विचार करावा. त्यातूनच अनेक प्रकारचे नीती-नियम, विधी-निषेध, कायदे-कानून, प्रथा-परंपरा वगैरे विकसित झाले.

आज मात्र विकास, विज्ञान, व्यक्तीस्वातंत्र्य, आधुनिकता आदी बाबींचा असा काही एकत्रित विस्फोट झाला आहे की, माणसाला कोणतेही बंधन नको. विचारीपण नको. हवे आहे केवळ सुख, सुख आणि सुख. या सुखाला अंत नाही. जो माणूस या सुखाच्या मागे धावतो आहे त्यालाही हे ठाऊक नाही की आपल्याला नक्की जायचे कुठे आहे? म्हणूनच आज तो ज्या सुखासाठी धडपडतो तेच उद्या त्याच्या दु:खाचे कारण ठरते. आज साधी सायकल असेल तर त्याला स्वयंचलित दुचाकी हवी. २-४ वर्षातच ती दुचाकी त्याला डोळ्यासमोर नकोशी होते, कारण त्याला मारुती-८०० भुरळ घालत असते. ती आली की, काही वर्षातच त्याला स्वप्न पडते होंडा सिटीचे आणि मारुती-८०० खुपू लागते. याला कुठेही अंत नाही. बरे ज्याला हा खेळ खेळायचा त्याने तो खेळायला कोणी हरकत घेण्याचे कारण नाही. पण दुर्दैव असे की, हा खेळ सगळ्यांना (म्हणजे केवळ व्यक्तींनाच नव्हे, तर निसर्गाला, भावभावनांना, चांगुलपणाला, मानवतेला) वेठीस धरतो. त्यामुळेच त्यावर प्रतिक्रिया उमटू लागतात. या प्रतिक्रिया जशा विचारवंतांच्या असतात तशाच निसर्गाच्याही असतात. अशीच एक प्रतिक्रिया निसर्गाने केदारनाथ येथे दिली.

आम्हाला एक घर पुरत नाही. पदपथसुद्धा मातीचे नकोत. त्याला वाळू लागते. आमची मागणी बेसुमार वाढत जाईल तेव्हा ती पूर्ण करण्यासाठी वाळूचा उपसा होईलच ना? हा उपसा मग नियमांच्या बाहेर जातो. पण कोणामुळे? आमच्या अनिर्बंध `हवे'पणानेच ना? आज गायी म्हशींची संख्या कमी होत आहे, पण दुध-दही, तूप, पनीर, खवा यांची मागणी वाढतेच आहे. कशी पूर्ण होणार ती? तेच पाण्याचे, तेच जमिनीचे, तेच लाकडाचे... सगळ्यांची रडकथा तीच. आज पृथ्वीचे तापमान सतत वाढत आहे. कदाचित अणुबॉम्बपेक्षाही मोठा असा हा धोका राहील, असे तज्ञ म्हणतात. या तापमान वाढीत सगळ्यात मोठा वाटा आहे ऑटो कुलिंगचा. पण आम्ही ए.सी. बंद करायला तयार आहोत का? गाड्यांचा वापर कमी करायला तयार आहोत का? आज राजकारणी, उद्योगपती, बिल्डर्स, माफिया यांच्या हातमिळवणीच्या चर्चा होतात. पण या बिल्डर्सच्या जाहिराती नाकारण्याची प्रसार माध्यमांची हिम्मत आहे का? एखादे माध्यम हे म्हणेल की, आम्ही बिल्डरची जाहिरात घेत नाही. पण त्याच वेळी ते माध्यम अल्युमिनियम कंपनीची जाहिरात घेते. कोण वापरते हे अल्युमिनियम? बिल्डरच ना? हे एक विषाक्त वर्तुळ आहे.

हे वर्तुळ भेदण्याचा प्रयत्न म्हणजेच धर्म, म्हणजेच आध्यात्म, म्हणजेच तत्वज्ञान, म्हणजेच संतांची शिकवण, म्हणजेच नीती, म्हणजेच कलाकाराची अस्वस्थता, म्हणजेच प्रतिभावंताची प्रज्ञा. आज आम्ही या साऱ्याला अडगळीत टाकले आहे. तसे नसते तर आज केदारनाथच्या यात्रेचे आम्ही पर्यटन केले नसते. अन या पर्यटनाला प्रोत्साहन दिले नसते. आदी शंकराचार्यांनी कशासाठी सांगितली ही चार धाम यात्रा? किंवा अन्य कोणतीही यात्रा? ती अवघड होती म्हणूनच. ज्यात अवघडपण नाही ती अन्य काहीही असू शकते, पण यात्रा नाही. अवघडपण नाही तर ती साधना नाही. यात्रा किंवा साधना यांना वेळ द्यावा लागतो. चांगले-वाईट, सुखाचे- दु:खाचे अनुभव, जीवन- मरणाच्या कळा, मान- अपमान अनुभवावे लागतात, पचवावे लागतात. यातूनच अनुभूती (realisation) होते. मी स्वत:. माझ्या भोवतीचं हे जग, आमचा संबंध आणि संघर्ष, त्यातील क्षणत्व आणि चिरकालीत्व, या साऱ्या मनोव्यापारातून होणारा ईशत्वाचा स्पर्श, त्यानंतर त्याची धारणा आणि नंतर जे होतं ते दर्शन. दर्शन होण्याची ही एक प्रदीर्घ प्रक्रिया आहे. ती तुमच्याकडून अनेक गोष्टींची मागणी करते. ती किंमत न चुकवता आम्ही जे करतो ते फक्त पाहणे असते, दर्शन नाही. यात्रा दर्शनासाठी असतात, पाहण्यासाठी नाही. आम्ही त्या पाहण्यासाठी केल्या. मग पाहण्याची प्रक्रिया सुरु झाली आणि गाड्या, हॉटेल्स, गजबज, प्रदूषण, अविचार सुरु झाला. आज त्याचंच फळ आम्ही प्रत्यही भोगत असतो. केदारनाथचा अनुभव रोजचा नसल्याने त्याची चर्चा झाली. पण दरवर्षी सव्वा लाख लोक निव्वळ रस्ता अपघातात मरण पावतात, ते सवयीचे झाल्याने आम्ही विसरून जातो.

मग काय सगळे काही सोडून झाडांखाली भजन करत बसायचे फक्त? मुळीच नाही. ज्यांनी आध्यात्माचा, धर्माचा, संतसाहित्याचा प्रामाणिक धांडोळा घेतला ते सांगतील की, असे मुळीच नाही. सगळे करायचे. पैसा कमवायचा, सुख भोगायचे, पर्यटनाला जायचे, यात्राही करायच्या. परंतु यातील काहीही जीवनाचे ध्येय नाही हे लक्षात ठेवायचे. जीवनाचे ध्येय नावाची काही गोष्ट आहे. ती फार उंच आणि व्यापक आहे. तिच्यावरचे लक्ष ढळू द्यायचे नाही. त्या ध्येयाकडे जाण्यासाठी आवश्यक ते सारे काही करायचे. त्या ध्येयाकडे जाताना मार्गावरून बाजूला सारणार नाही असे सारे करायचे. पैसा कमावलाच पाहिजे पण अंबानी वा बिल गेट्स हे जीवनाचे ध्येय नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. सुख भोगलेच पाहिजे पण केदारनाथची यात्रा पायी आणि साधेपणानेच केली पाहिजे अन मृत्यूला सामोरे जाण्याच्या तयारीनेही. केदारनाथच्या गिरीकंदरात राहणाऱ्या आपल्याच रक्तमांसाच्या भावाबहिणींना चांगले जीवन जगायला मिळालेच पाहिजे, पण तेथील साधनसंपत्ती आमच्यासाठी ओरबाडून नाही; तर आमच्या घासातला घास देऊन. हा विवेक, विचार, समंजसपणा, संतुलन म्हणजेच आध्यात्मिकता, धर्म. केदारनाथाने शिकवलेला हा धडा आहे. शिकायचा की नाही हे आपल्यावरच अवलंबून आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, २९ जून २०१३

रविवार, २३ जून, २०१३

पैसा प्या पैसा

केदारनाथ दुर्घटनेची भीषणता छोट्या पडद्यावरून सगळे जग पाहत आहे. यातील एका व्यक्तीची आपबिती फार विदारक होती. त्या माणसाचा मुलगा पाणी पाणी करत होता. पण पाणी मिळत नव्हते. जिथून जसे शक्य होईल तसे पाण्याचे थेंब तो मुलाच्या तोंडात टाकत होता. त्याने सांगितले की, मरून पडलेल्या व्यक्तीची बनियन काढून ती मुलाच्या तोंडात पिळली. पण काही साध्य झाले नाही. अखेर पाणी पाणी करत त्याच्या मुलाने प्राण सोडला. त्याचं दु:ख आपण समजून घेऊच शकत नाही. आयुष्यभर आता ही घटना त्याचा पिच्छा पुरवणार आहे. पण आमच्यासाठी या घटनेचा काही बोध आहे की नाही? खरे तर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील दु:खाचे, अपघाताचे, दुर्दैवाचे प्रसंग बाकीच्यांसाठी काही शिकवण, काही बोध देऊन जातात. दुर्दैवाने आम्हाला अशा प्रकारे शिकण्याची सवय लागलेली नाही.

वरील प्रसंगातून पाण्याकडे पाहण्याची आमची दृष्टी, पाण्याविषयी आमची भावना, पाणीविषयक आमचे वर्तन हे आम्ही ठीकठाक करून घ्यायला हवे. हा विषय नवीन आहे असे नाही. पुष्कळदा त्याची चर्चा होते, अन वारंवार ती व्हायलाही हवी. पुढील महायुद्ध झाले तर ते पाण्यावरुनच होईल हेही सांगून झाले आहे. पण आम्ही पाण्याचा विचार करायला तयार नाही. आम्ही पैसा मोजतो, म्हणून वाटेल तेवढे आणि वाटेल तसे पाणी वापरण्याची आपल्याला मुभा आहे, ही वृत्ती टाकून देण्याची मात्र आमची तयारी नसते. वरील घटनेतील व्यक्तीच्या खिशातील पैशाचा, त्याला काहीही उपयोग झाला नाही. पैसा हे विनिमयाचे साधन आहे. पैसा काहीही तयार करू शकत नाही आणि पैसा कोणत्याही गोष्टीचा, गरजेचा पर्याय होऊ शकत नाही. या सगळ्याची जाणीव करून देणाऱ्या घटना आमच्या आजूबाजूला घडत नाहीतच असे नाही, पण आमची गुर्मी मात्र उतरायला तयार नाही. मोठमोठी शहरे, उद्योग पाण्याचा जो वापर करतात तो तर गुन्हेगारी स्वरूपाचा म्हणावा असा आहे. आम्ही जमिनीत पाणी मुरवत नाही. उपसा मात्र सतत सुरूच. सहज पाणी मुरावे यासाठी जमीन मोकळी ठेवायला आमची तयारी नाही. सिमेंट कोन्क्रीटचा एक भयानक भस्म्या रोग आम्हाला झाला आहे. ज्या मातीवर आम्ही आणि आमचा सारा सरंजाम उभा आहे त्या मातीविषयी अपार घृणा आम्ही बाळगतो.

पाण्याचा जपून आणि आवश्यक अन योग्य वापर तर सोडाच; पण रोज गाड्या धुणे, फरश्या धुणे, आजचे पाणी उद्या ओतून देणे; असे एक ना अनेक प्रकार. अतिशय थोडा पाऊस पडणाऱ्या राजस्थानच्या वाळवंटात पाण्याचे नियोजन आणि पाण्याचा वापर कसा होत असे, याचा इतिहास समजून घेण्यासारखा आहे. `राजस्थान की रजत बुन्दे' हे अनुपम मिश्रा यांचं पुस्तक सगळ्यांनी वाचावं असं आहे. त्यातून पाण्याची एक दृष्टी नक्कीच तयार होईल. पण अशा साऱ्या `निरर्थक' गोष्टींसाठी आमच्याकडे वेळ कुठे आहे?

केदारनाथाने एक जबर तडाखा लावून अनेक गोष्टी शिकण्याची, समजून घेण्याची संधी आम्हाला दिली आहे. वांड मुलाला पालक वा गुरुजन जसे कधीकधी जोरदार फटका देऊन वठणीवर आणण्याचा प्रयत्न करतात, तसेच या जगतपालकाने केले असावे. आम्ही आमचा वांडपणा टाकून देणार का, हा प्रश्न आहे. नाही तर उद्या, पाण्याऐवजी `पैसा प्या पैसा' असे म्हणण्याची पाळी येईल.

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, २४ जून २०१३

गुरुवार, १३ जून, २०१३

अडवाणी वाईट आहेत का?

अडवाणींनी राजीनामा दिला आणि अनेक चर्चा सुरु झाल्या. अनेकांना तर धरबंदच राहिला नाही. मनात प्रश्न आला, अडवाणी खरंच वाईट आहेत का? समाजाचीही गंमत असते. एखाद्याला डोक्यावर घेईल तर इतके की विचारू नका. आणि एखाद्याला डोक्यावरून खाली आपटेल तेही तसेच अतिरेकी. अडवाणींचे कर्तृत्व, त्यांनी खाल्लेल्या खस्ता वगैरे मग समाजाला आठवत नाहीत. त्याच्याशी त्याला फारसे देणेघेणे नसते. आज तो नरेंद्र मोदींवर स्वार झालेला असतो. कोणे एके काळी समाज अडवाणींवर असाच स्वार झाला होता याचा त्याला सहज विसर पडतो. अजून १५-२० वर्षांनी मोदी अडवाणींच्या मार्गाने तर जाणार नाहीत ना, ही शंकाही त्याला स्पर्श करत नाही. भस्मासुराची पुराणकथा; नीतिकथा वा बोधकथा म्हणून न पाहता `पुराणातली वांगी' म्हणून सोडून देतो. आणि तेच ते पुन्हा पुन्हा घडूनही समाज मात्र जिथल्या तिथेच राहतो.

याचा अर्थ अडवाणींचे सारे काही बरोबर आहे असा नक्कीच नाही. त्यांनी आता निवृत्त होऊन `तुका म्हणे आता, उरलो उपकारापुरता' असेच वागायला हवे. अजूनही सत्तेला चिकटून राहणे, उच्च पदाची आकांक्षा बाळगणे अन त्यासाठी बटबटीत राजकारण करणे नक्कीच अयोग्य आहे. पण ही भूमिका घेताना त्यामागील भाव, त्याचा आशय आणि अभिव्यक्ती कशी होते हे महत्वाचे आहे. त्यांच्याबद्दलचा उपेक्षेचा, उपहासाचा, तिरस्काराचा भाव नक्कीच योग्य म्हणता येणार नाही. तसेच मोदींसाठी त्यांनी दूर व्हावे हे देखील बरोबर नाही. पक्षासाठी, देशासाठी मोदींनी नेतृत्व करावे हा एक वेगळा मुद्दा आहे. आणि अडवाणींची वर्तमान भूमिका काय असावी हा वेगळा मुद्दा आहे.

खरं तर अशी संघर्षाची स्थिती का निर्माण होते? घरात सासूची सत्ता चालावी की सुनेची असा हा मुद्दा आहे. वर्चस्व गाजवण्याची लालसा, निर्णयाचे अधिकार माझ्या हाती असावेत ही भूमिका, लाभ-हानीची गणिते, यातून संघर्ष उत्पन्न होतात. पण निर्णय तर घ्यावे लागतात, कृती तर करावी लागते; प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी असते; मग अशा वेळी काय करायचे? ऐकायचे कोणाचे, माझे की तुझे? याचे की त्याचे? मोठ्यांचे की लहानांचे? तरुणांचे की म्हातार्यांचे? पुरुषांचे की बायकांचे? पैसेवाल्यांचे की गरिबांचे? आपण मत आणि निर्णय यांची गल्लत करतो. मत प्रत्येकाला असू शकते. आसवेही. पण निर्णय ही वेगळी आणि गुंतागुंतीची प्रक्रिया असते. निरीक्षण, विश्लेषण, परिणाम, व्यवहार, भावना, लाभ आणि हानीची तुलना; या आणि अशा अनेक गोष्टी त्यात असतात. पण आपल्याकडे यासाठी फुरसद व इच्छा दोन्हीही नसते. आम्हाला २+२= ४ असे सोप्पे उत्तर हवे असते. जीवन व्यवहार असा नसतो, हे आपण लक्षात घेत नाही. एखादा निर्णय वा एखादी कृती करायची वा नाही हे; मत वा वाटणे यावर न बेतता; त्याचे गुंतागुंतीचे निकष समजून घ्यायला हवेत. हे शाळा, महाविद्यालयात शिकवता येत नाहीत. ते जीवन व्यवहारातूनच शिकावे लागतात. बहुतेक वेळा स्वत:चे स्वत:च. यालाच समजूतदारी आणि परिपक्वता म्हणतात. ती असली की मग अनेक गोष्टी सुरळीत होतात. राजकारणात, समाजकारणात, अर्थकारणात आणि कुटुंबातही. नि:स्वार्थता, दुसऱ्याच्या भूमिकेत शिरून विचार करण्याची वृत्ती, `मी' बाजूला काढून ठेवण्याची तयारी, या त्यासाठी आवश्यक गोष्टी आहेत. हे जसे समाजाला लागू होते तसेच व्यक्तीलाही.

- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, १३ जून २०१३

गाढव तज्ञ

अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी आज जनतेला आवाहन केले की, कृपया सोने खरेदी करू नका. आपण किती गाढव आहोत, हे दाखवण्याची या तज्ञ लोकांना वारंवार इतकी उबळ का येते कळत नाही. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरते आहे. सोने आयात करण्यासाठी आपल्याला डॉलर द्यावे लागतात. त्यामुळे डॉलरची गंगाजळी आटते आणि foreign exchange reserve घटते. त्याने असंतुलन निर्माण होते, म्हणून सोने खरेदी करू नका, असा यांचा तर्क!! खरे तर `दुखणे पायाला आणि पट्टी डोक्याला' असा हा प्रकार आहे.

मुळात हे सगळे प्रश्न निर्माण झाले आहेत, कच्च्या तेलामुळे. यावर उपाय करायचे सोडून तज्ञांचे मात्र उफराटे उपदेश देणे सुरु आहे. कच्च्या तेलासाठी आपल्याला दुसऱ्यांवर अवलंबून राहण्यावाचून गत्यंतर नाही. त्यामुळे त्यातून मार्ग काढायचा याचा अर्थ, त्याचा वापर कमी करायचा आणि त्याला पर्याय शोधायचे. वापर कमी करायचा तर पर्यायी जीवनशैली विकसित करावी लागेल. शहर नियोजनापासून अनेक गोष्टी करता येतील. पण त्या करायच्या नाहीत आणि चुकीचे उपदेश द्यायचे. याला काय म्हणायचे? खरे तर आजची अर्थव्यवस्था कोणतेही प्रश्न सोडवू शकत नाही. अन या अर्थव्यवस्थेचा आधार असलेले अर्थशास्त्र दिशाहीन आहे. मुळात अर्थशास्त्र, अर्थव्यवस्था, अर्थचक्र कशासाठी? या प्रश्नापासून सुरुवात करायला हवी. तो एक स्वतंत्र विषय आहे.

परंतु मर्यादित विचार केला तरीही, सोने खरेदी न करण्याचा उपदेश किती मूर्खपणाचा आहे हे लक्षात येईल. आपल्या देशात सोने खरेदीची जी एक परंपरा आहे त्यामुळे लोकांच्या जगण्याला आणि अर्थव्यवस्थेला एक मजबूत आधार आहे. अडीअडचणीला लोकांना त्याचा आधार असतो. एक अतिशय सकारात्मक असा आपल्या जीवनव्यवहारांचा तो पैलू आहे. सरकारच्या नाकर्तेपणात स्वत:ला वाचवण्याचा तो एक चांगला उपाय आहे. दुसरे असे की, कच्चे तेल वा अन्य काहीही वापरून संपून जाणारे आहे. त्यात खर्च होणारे डॉलर म्हणजे घाट्यातला सौदा आहे. म्हणजे डॉलर तर खर्च होणारच. पण त्यानंतर आपल्या हातीही काही राहणार नाही. सोने खरेदी केल्यास, उद्या तिजोरीत खडखडाट झाला तरीही, आपण कफल्लक मात्र नक्कीच होणार नाही. सोने ही नेहमीच खात्रीची गुंतवणूक आहे. कदाचित त्याची विनिमय दराने किंमत थोडी कमीजास्त होईल, पण त्याचे मूल्य मात्र कायम राहील आणि म्हणूनच ते कधीही शून्यावर येणार नाही.

पण काय करणार? आज परिस्थिती अशी आहे की, `गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता.'

-श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, १३ जून २०१३

बुधवार, २९ मे, २०१३

संघ शिक्षा वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दरवर्षी उन्हाळ्यात होणाऱ्या संघ शिक्षा वर्गांचे महत्व अनन्यसाधारण असे आहे. संघाचे काम करण्यासाठी कुशल कार्यकर्ते तयार करण्यासोबतच, संघाची कार्यपद्धती, तंत्र आणि भाव जागृती या अंगाने या संघ शिक्षा वर्गांकडे पाहता येते. या संघ शिक्षा वर्गांची सुरुवात १९२७ च्या उन्हाळ्यात झाली. कार्यकर्ता कोठेही जाऊन काम करू शकला पाहिजे, हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून हा उपक्रम सुरु झाला. संघात त्यावेळी मुख्यत: तरुण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाच भरणा होता. त्यांना उन्हाळ्यात सुटी राहत असे. त्यामुळे उन्हाळा सोयीचा होता. पहिल्या संघ शिक्षा वर्गात १७ तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यावेळचे स्वरूपही वेगळे होते. त्यात सकाळ, संध्याकाळ शारीरिक कार्यक्रम, खेळ, कवायत यासोबतच दुपारी ४-४.३० तास चर्चा, गप्पागोष्टी, टिपणे असे चालत असे. आठवड्यातून तीनदा बौद्धिक वर्ग होत असे. डॉक्टर हेडगेवार कधी कधी स्वयंसेवकांना पोहायलाही घेऊन जात. जेवण व निवास मात्र प्रत्येकाचा आपापल्या घरीच राहत असे. सारेच स्वयंसेवक नागपूरचेच असल्याने वेगळी व्यवस्था करण्याची गरजच पडली नाही. तशी व्यवस्था करण्याची त्यावेळी कल्पनाही नव्हती आणि शक्तीही नव्हती. त्यावेळी चालणाऱ्या university officers training camp च्या धर्तीवर या वर्गाचे नामकरणही  officers training camp असेच झाले. त्याचे लघुरूप OTC  हेच त्यानंतर बरीच वर्षे रूढ होते. अजूनही अनेकांच्या ओठी OTC  रुळलेले आहे. आता मात्र सर्वत्र देशभरात संघ शिक्षा वर्ग असेच रूढ झाले आहे.

त्यानंतर हळूहळू या उन्हाळी संघ शिक्षा वर्गांना आकार प्राप्त होत गेला. नागपूरबाहेर पुण्याला संघ शिक्षा वर्ग सुरु झाला. कार्यकर्त्यांच्या उपलब्धतेनुसार नंतर हळूहळू देशभरात संघ शिक्षा वर्ग सुरु झाले. शारीरिक व बौद्धिक अभ्यासक्रमाची रचनाही हळूहळू झाली. त्यानंतर त्याचे प्रथम, द्वितीय, तृतिय वर्ष असे विभाजन करण्यात आले. तृतिय वर्षाचा वर्ग फक्त नागपुरात होतो. स्वयंसेवकांना संघाच्या या स्थापना भूमीतून आणि संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या कर्मभूमीतून प्रेरणा मिळावी, हा यामागील हेतू. नागपूरच्या शुक्रवारी भागातील डॉ. हेडगेवार यांचे घर, तसेच संघाचे मुख्यालय असलेले आणि दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्यापासून पुढील सर्व सरसंघचालकांचे निवासस्थान असलेले; डॉ. हेडगेवार भवन म्हणून ओळखले जाणारे; नागपूरच्या महाल भागातील संघाचे कार्यालय पाहण्याचाही एक कार्यक्रम तृतिय वर्षाच्या वर्गात असतो. शिवाय ज्या ठिकाणी हा वर्ग होतो तेथे  डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाध्याही आहेत. या साऱ्याशी असलेले स्वयंसेवकांचे भावनिक नाते लक्षात घेऊनच तृतिय वर्षाची योजना नागपुरात करण्यात आली आहे.

संघ शिक्षा वर्गाचे आयोजन जसजसे नागपूर बाहेर होऊ लागले, तसतसे प्रथम व द्वितीय वर्षाचे वर्ग प्रत्येक प्रांताचे स्वतंत्रपणे होऊ लागले. अर्थात हे टप्प्याटप्प्याने होत गेले. सगळ्या प्रांतात एकदम उन्हाळी वर्गांची सुरुवात झाली नाही. सुरुवातीला जे स्थान जवळ असेल तेथे स्वयंसेवकांनी जावे, अशी योजना होत असे. आता मात्र सगळ्या प्रांतात वर्ग होऊ लागले आहेत. साधारण २५ वर्षांपूर्वी या आयोजनात थोडा बदल करण्यात आला आणि प्रथम वर्षांच्या वर्गाचे आयोजन प्रांत स्तरावर, द्वितीय वर्षाच्या वर्गांची योजना क्षेत्रीय स्तरावर आणि तृतिय वर्षाची योजना अखिल भारतीय स्तरावर नागपूर येथे होऊ लागली. प्रथम व द्वितीय वर्षाच्या वर्गांची स्थाने दरवर्षी वेगवेगळी असतात. तृतिय वर्षाचे स्थान मात्र ठरलेले आहे. त्यात बदल होत नाही. या वर्गांच्या कालावधीतही वेळोवेळी बदल होत आले आहेत. सुरुवातीला संघ शिक्षा वर्ग ४० दिवसांचा राहत असे. मग हा कालावधी एक महिन्याचा करण्यात आला. त्यानंतर प्रथम व द्वितीय वर्षांचा कालावधी बदलून १५ दिवस व २१ दिवस करण्यात आला. याच वर्षीपासून (इ.स. २०१३) तृतिय वर्षाचा कालावधीही २५ दिवस करण्यात आला आहे.

नागपूरचा विचार करायचा तर १९८१ पर्यंत नागपूरचा प्रथम, द्वितीय व अखिल भारतीय असलेला तृतिय वर्षाचा वर्ग एकत्रच होत असत. सगळ्यांची भोजनाची व्यवस्था एकत्रच राहत असे आणि संघस्थानही एकत्रच राहत असे. निवास आणि बौद्धिक वर्ग मात्र वेगवेगळे राहत असत. १९८२ पासून मात्र तृतिय वर्षाचा वर्ग पूर्णपणे स्वतंत्र रुपात होऊ लागला. निवासासाठी इमारती नसल्याने परिसरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये निवासाची सोय राहत असे. त्या निवासस्थानाहून संघस्थानासाठी आणि भोजनासाठी येणेजाणे करावे लागत असे. अगदी प्रारंभीच्या काळात तर सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचीही निवास व्यवस्था मोहता विज्ञान महाविद्यालयातच राहत असे. बौद्धिक वर्ग आणि भोजनासाठी तट्ट्याचे मांडव असत. पंखे वगैरे नसत. मोहता विज्ञान महाविद्यालयात काही खोल्यात असलेले पंखे तेव्हाचे नागपूरचे अधिकारी स्व. विनायकराव फाटक यांनी वर्ग काळासाठी काढायला लावले होते, अशीही आठवण सांगितली जाते. नंतर हळूहळू रेशीमबागेत सुसज्ज निवासव्यवस्था उभी राहिली.

सुरुवातीला नागपूरच्या स्वयंसेवकांना शुल्क कमी भरून, घरून जेवणाचा डबा मागवण्याची सोय होती. संबंधित शाखांचे स्वयंसेवक रोज डबे पोहोचवून देत असत. आर्थिक दृष्ट्या दुर्बल स्वयंसेवकांनाही वर्गापासून वंचित राहावे लागू नये म्हणून ही सोय होती. काही कारणांनी नंतर ही सवलत बंद करण्यात आली. एखादा कार्यकर्ता चांगला असेल आणि त्याची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसेल तर त्याचे शुल्क गोळा करून त्याला वर्गाला पाठवण्याचे प्रसंगही नागपुरात आणि देशभरातही घडले आहेत. एक स्वयंसेवक अतिशय गरीब होता, पण त्याची इच्छा होती वर्गाला येण्याची. त्यावेळी डॉ. हेडगेवार यांनी त्याला वर्गातील मोकळ्या वेळात शिक्षार्थ्यांच्या गणवेशाच्या इस्त्रीचे काम करण्यास परवानगी दिली. त्या स्वयंसेवकाने आनंदाने ते काम केले आणि त्यातून जमा झालेल्या पैशातून वर्गाचे शुल्क भरले, अशीही एक आठवण जुने लोक सांगतात.

संघ शिक्षा वर्गाच्या स्वरुपासोबतच त्यातील शारीरिक व बौद्धिक कार्यक्रमातही वेळोवेळी बदल होत आले आहेत. पूर्वी सर्वत्र आखाड्यांमध्ये प्रचलित असलेले खड्ग, छुरिका आदी प्रकार होते. वेत्रचर्म होते. आता ते प्रकार नाहीत. योगासन, योगचाप, नियुद्ध हे प्रकार बरेच उशिरा शारीरिक अभ्यासक्रमात समाविष्ट झाले. बौद्धिक वर्गांचे विषय काळानुरूप बदलले आहेत. पूर्वी प्रवचन हा भाग राहत नसे. आता त्याचा समावेश करण्यात आला आहे. सुरुवातीला संघाबाहेरील मान्यवरांनाही बौद्धिक वर्गासाठी बोलावले जात असे. हळूहळू अभ्यासू कार्यकर्ते तयार होऊ लागले, संघाचा व्याप वाढला, अनुभव वाढू लागला; तसे हा प्रकार बंद झाला. आता प्रवचनांसाठी मात्र बाहेरील मान्यवरांनाही बोलावले जाते.

विविध प्रयोगही वर्गात केले जातात. एखादा दिवस मौन पाळले जाते. म्हणजे, सारी कामे न बोलता करायची. अशा वेळी, सुमारे हजारेक स्वयंसेवक त्या परिसरात असूनही एकदम शांतता असते. वस्तू भांडारातून आपल्याला हवी ती वस्तू घ्यायची. त्याचे पैसे तेथील पेटीत आपणच ठेवायचे. जो काही हिशेब असेल तो आपणच नीट पार पाडायचा. कोणी `दुकानदार’ न राहता व्यवहार करायचे. असे प्रयोग केले जातात. सेवा हा विषयही त्या मानाने नवीन असून, त्याची तात्त्विक बैठक आणि प्रत्यक्ष कार्यानुभव या दोन्हीचा समावेशही वर्गात असतो.

अनेक वर्षे रेशिमबागचा वर्ग पार पाडण्याची जबाबदारी नागपूरच्या स्वयंसेवकांवरच राहत असे. शारीरिक शिक्षक, चर्चा प्रवर्तक, व्यवस्था सांभाळणारे स्वयंसेवक सारे नागपूरचे. नागपूरबाहेरील वर्गातही आवश्यकतेनुसार नागपूरहून स्वयंसेवक पाठवले जात. बाहेरील प्रांतात शिक्षक, मुख्य शिक्षक म्हणून अनेक वर्षे गेलेले स्वयंसेवक आजही नागपुरात आहेत. आता मात्र सर्वत्र स्वयंसेवक उपलब्ध आहेत. एवढेच नव्हे तर नागपूरच्या वर्गातही मुख्य शिक्षक, शिक्षक वेगवेगळ्या ठिकाणांहून येत असतात. एका अर्थाने नागपूरचा भार किंचित हलका झाला आहे. अगदी अलीकडेपर्यंत सर्व वयोगटातले स्वयंसेवक या वर्गात राहत असत. आता मात्र ४० वर्षावरील ज्या स्वयंसेवकांनी संघ शिक्षा वर्गाचे शिक्षण पूर्ण केलेले नाही, त्यांच्यासाठी स्वतंत्र वर्गांची योजना करण्यात आली आहे.

तृतिय वर्षाचा वर्ग हा अखिल भारतीय स्वरूपाचा असल्याने सगळ्या प्रांतांचे, विविध भाषा बोलणारे स्वयंसेवक त्यात असतात. गणांची रचना करताना, प्रत्येक गणात जास्तीत जास्त विविधता आणण्याचा प्रयत्न करण्यात येतो. विविध भाषांचे स्वयंसेवक एकत्र राहतात. भाषा कळत नसली तरीही त्यांच्यात व्यवहार तर होतातच, पण स्नेह आणि सौहार्दही निर्माण होते. अनेक जण दुसऱ्या भाषा शिकण्याचा प्रयत्नही करतात. वेगवेगळ्या भाषांची गीते गायली जातात. एखादी भाषा येत नसतानाही त्या भाषेचे गीत मात्र पाठ झालेले असते. भाषांबद्दलचा टोकदारपणा गळून पडणे आणि आपुलकी वाढीस लागणे हे या वर्गात गेली अनेक दशके सहजपणे होत आले आहे. ज्या प्रांतात हिंदी प्रचलित नाही, त्या प्रांतातील स्वयंसेवकांसाठी बौद्धिक वर्गाचा अनुवाद सांगितला जातो. हाच भाव भोजनाच्या बाबतीतही पाहायला मिळतो. प्रत्येक प्रांतातील आहार अन त्याच्या सवयी वेगळ्या असतात. पण सगळे स्वयंसेवक वर्गात जी व्यवस्था असेल त्यानुसार सहज व्यवहार करतात. नागपूरचा उन्हाळा हा तर सगळ्या देशातच प्रसिद्ध आहे. पण भर मे महिन्यात सूर्य आग ओकत असताना स्वयंसेवक धुंदीत राहत असतात. अर्थात वैद्यकीय सेवा उपलब्ध असतेच. महिनाभराचा हा वर्ग ही एक प्रकारची तपश्चर्याच असते. अर्थात नुसते काही गोष्टींचे शिक्षण देणे हा केवळ या वर्गाचा हेतू नसून संघाच्या कामासाठी आवश्यक असा कार्यकर्ता निर्माण करणे हा उद्देश असल्याने, हे तप स्वाभाविकच ठरते.

संघ शिक्षा वर्गांचा विचार करताना तीन-चार वर्गांचा विशेष उल्लेख आवश्यक ठरतो. एक म्हणजे, १९४० चा पुण्याचा संघ शिक्षा वर्ग. या वर्गातच सर्वप्रथम आज प्रचलित असलेली संघाची संस्कृत प्रार्थना म्हणण्यात आली. तोवर एक हिंदी श्लोक व एक मराठी श्लोक असलेली प्रार्थनाच शाखा, शिबिरे, संघ शिक्षा वर्ग सर्वत्र म्हटली जात असे. दुसरा उल्लेख त्याच वर्षीच्या नागपूरच्या वर्गाचा करावा लागेल. कारण त्याच वर्गात प्रथम देशाच्या सगळ्या प्रांतातून स्वयंसेवक सहभागी झाले होते. अन डॉ. हेडगेवार यांनी त्यांचे ऐतिहासिक आणि अखेरचे भाषणही याच वर्गात केले होते. त्यात `मी आज संपूर्ण भारताचे लघुरूप माझ्यापुढे पाहत आहे,’ असे उद्गार त्यांनी काढले होते. त्यानंतर १९७३ च्या वर्गाचा उल्लेख करावा लागेल. हा वर्ग सुरु असतानाच, दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचे देहावसान झाले होते. उल्लेखनीय हे की, उरलेला साधारण एक आठवड्याचा वर्ग त्यानंतरही पूर्ण करण्यात आला होता. फक्त अंत्यसंस्काराचा एक दिवस वर्गाचे दैनंदिन कार्यक्रम स्थगित होते.

संघावरील पहिल्या दोन्ही बंदी नंतरच्या वर्षी संघ शिक्षा वर्ग झाले नव्हते. बंदीची वर्षे अन त्यानंतरचे वर्ष एवढा अपवाद वगळला तर १९२७ पासून सुरु झालेले हे वर्ग अखंडपणे सुरु आहेत. गांधीजींच्या हत्येनंतर जी बंदी आली होती, त्याने संघाचे कार्य खूपच विस्कळीत झाले होते. खूप पडझड झाली होती. मानसिकताही खचली होती. पुन्हा सारे सावरून धरण्यासाठी खंबीर कार्यकर्त्यांची गरज होती. त्यामुळे १९५१ साली वर्षभर नागपुरात संघ शिक्षा वर्ग झाले होते. एक वर्ग संपला की दुसरा, अशी आठवण सांगितली जाते. त्याचा नेमका तपशील मात्र उपलब्ध नाही.

१९४०    च्या नागपूरच्या वर्गात देशभरातील १४०० स्वयंसेवक सहभागी झाले होते. देश विभाजनाच्या वेळी १९४७ साली पंजाबच्या संगरुर व भोगपूर या दोन ठिकाणी वर्ग झाले होते. यात २५८६ स्वयंसेवक सहभागी झाले होते. यात आज पाकिस्तानात असलेल्या लाहोर शहरातील अनेक स्वयंसेवकही होते. १९४७ च्या उन्हाळ्यात त्या भागात जी परिस्थिती उत्पन्न झाली होती त्यामुळे हे वर्ग १० दिवस आधीच संपवण्यात आले होते. प्रत्यक्ष लाहोर शहरात १९३८ व १९३९ साली संघ शिक्षा वर्ग आयोजित करण्यात आले होते. १९३८ साली डॉ. हेडगेवार व गोळवलकर गुरुजी त्या वर्गाला गेले होते. १९३९ साली मात्र डॉ. हेडगेवार प्रकृती बरी नसल्याने लाहोरला गेले नव्हते, पण गुरुजी गेले होते. १९७१ साली १८ स्थानी वर्ग होते. गेल्या वर्षी ५२ स्थानी वर्ग झाले होते आणि त्यात साडेसोळा हजार स्वयंसेवक सहभागी झाले होते. वर्गांचा व्याप खूप वाढला, कालावधी मात्र तेवढाच (एप्रिल, मे, जून) आहे, प्रत्येक ठिकाणी पुरेसा वेळही दिला गेला पाहिजे; यामुळे सरसंघचालक आणि सरकार्यवाह सगळ्या वर्गांना भेटी देऊ शकत नाहीत. अर्ध्या वर्गांना सरकार्यवाह भेट देतात तर, अर्ध्या वर्गांना सरसंघचालक भेट देतात. नागपूरच्या तृतिय वर्षाच्या वर्गात मात्र दोन्ही सर्वोच्च अधिकारी आणि सगळे अखिल भारतीय अधिकारी भेट देतात. एक अखिल भारतीय अधिकारी पूर्ण दिवस वर्गात उपस्थित असतात. सगळ्या स्वयंसेवकांशी संपर्क, संवाद व्हावा यासाठी ही योजना करण्यात आली आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर

बुधवार, ८ मे, २०१३

बोलाचीच कढी, बोलाचाच भात

पुन्हा एकदा जुनाच खेळ सुरु झाला आहे. भारतीय जनता पार्टी संसद बंद पाडते आहे आणि सत्तारूढ कॉंग्रेस पक्ष चर्चा करण्याचे आवाहन करीत आहे. कोण योग्य, कोण अयोग्य याच्याही चर्चा झडत आहेत. त्याच्या पलीकडे पाहण्याची मात्र आमची तयारी नाही. `त्यांची तयारी' असे न म्हणता, `आमची तयारी' म्हटले याला कारण आहे. कारण हे की, राजकीय पक्ष व त्यांचे आखाडे सोडून बाकी जो समाज आहे त्याचीही मुळात जाऊन विचार करण्याची तयारी नाही. नोकरी, व्यवसाय, बँक  बॅलन्स, निरनिराळे ब्रान्डस, हॉटेल्स, फॉरिन ट्रिप्स यात गुंतलेला मोठा समाज; उन्हातान्हात चार बादल्या पाणी कसं मिळवायचं यात गुंतलेला समाज; विविध पक्षांचे झेंडे खांद्यावर घेऊन उभा असलेला समाज; यांना या साऱ्याशी देणेघेणे नाही. जे यावर चर्चा वगैरे करतात त्यातील बहुसंख्य लोकांचे या ना त्या प्रकारे हितसंबंध गुंतलेले. त्यामुळे त्यांच्या चर्चेतून काही निष्पन्न होत नाही. पण या सगळ्या परिस्थितीत एका गोष्टीकडे आमचे दुर्लक्ष होते. ते म्हणजे, आपली इच्छा असो वा नसो; आपल्याला आवडो वा नावडो राजकारण आणि राजकीय व्यवस्था आपल्या जगण्यावर परिणाम करीत असतात. म्हणूनच त्याबद्दल सजग, संवेदनशील, विचारी असणे आवश्यक आहे. पण हे विचारी असणे म्हणजे कोणत्या तरी पक्षाचा झेंडा खांद्यावर घेणे नव्हे.

आज आम्ही स्वीकारलेल्या व्यवस्थेत संसद सर्वोच्च आहे. लोकशाहीचे मंदिर वगैरे प्रकारे त्याचे वर्णन केले जाते. पण त्या मंदिरातील देव कोण? पंतप्रधान, मंत्री, खासदार, की सभागृहाचे अध्यक्ष? संसदेला दिलेली ही उपमा थोडी अधिकच ताणली जाते असे म्हटले आणि एका मर्यादेत त्याचा विचार करायचे म्हटले तरी काय दिसते. संसदेत जाणारे सगळे लोकशाहीचे पुजारी आहेत असे समजले वा भक्त आहेत असे समजले तर, हे पुजारी वा भक्त मंदिरात कसे वागतात? मंदिराचं पावित्र्य टिकवतात का? बरे येथे चालणारे कामकाज म्हणजे तरी काय? एका शब्दात उत्तर द्यायचे तर, `चर्चा' असे उत्तर द्यावे लागेल. कोणी यावर विचारेल की, मग आणखीन काय करणे अपेक्षित आहे वा काय करता येऊ शकते? हा प्रश्न अगदी सोळा आणे खरा आहे. चर्चेशिवाय काहीच करता येणे शक्य नाही. पण आम्ही तेथेच थांबून जातो.

संसदेत केवळ चर्चाच करता येण्यासारखी आहे या निष्कर्षाचा दुसरा अर्थ हाच काढता येऊ शकतो की, हीच संसदेची मर्यादा आहे. अनेक शतकांपूर्वी संत तुकाराम महाराज सांगून गेले, `बोलाचीच कढी, बोलाचाच भात; खाऊनिया तृप्त कोण झाला?' आम्ही मात्र ते समजून घ्यायला तयार नाही. आजवर किती चर्चा संसदेत झाली आणि त्यातून साध्य काय झाले. चर्चा केल्या आणि ठराव केले की सारे काम संपले का? चर्चा आणि ठराव म्हणजेच समस्यांचे समाधान मानायचे का?

काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे, असा ठराव संसदेने एकमुखाने केला आहे. समस्या संपली का? पाकिस्तानबाबत अनेक चर्चा झाल्या, पण त्या आघाडीवर सारे आलबेल झाले का? चीनबाबत दुसरे काय पाहायला मिळते? भ्रष्टाचार असो वा महागाई, कायदा सुव्यवस्था असो वा नद्यांची दुरवस्था; किती चर्चा आणि किती ठराव; हाती मात्र काहीच लागत नाही. असे का होते हे आम्ही कधीतरी समजून घेणार आहोत का?

याचा अर्थ चर्चा, विचारविनिमय आवश्यक नाही असा नाही. पण ती फक्त सुरुवात आहे. साधकबाधक चर्चेनंतर कामाला खरी सुरुवात होते. प्रत्यक्ष काम करणारे आणि चर्चा करणारे यांच्यात सगळ्याच अर्थाने खूप मोठे अंतर आहे. शिवाय प्रामाणिकता आणि सत्ता गाजवण्याची वृत्ती हे अडथळे आहेतच. सगळे सारखे असतात, सगळे प्रामाणिक असतात, सगळे सर्वगुणसंपन्न असतात, अन हे सगळे अगदी जन्मजात असते; असे आम्ही गृहीतच धरून चालतो. अन याच ठिकाणी फसगत होते. वास्तव हे आमच्या गृहितकापेक्षा विपरीत आहे. हे वास्तव लक्षात घेऊन व्यवस्था निर्माण करणे किंवा उपाययोजना करणे व्हायला हवे. तसे न होता, कोणी तरी एका वा अनेकांनी एकत्र येउन उपाय वा व्यवस्था अन्यांवर लादायच्या असा प्रकार सुरु आहे.

दुसरी अतिशय महत्वाची बाब म्हणजे आम्ही स्वतंत्रपणे विचार करायलाच तयार नाही. मानवी विचार, मानवी प्रतिभा वा मानवी प्रज्ञा आटली आहे का? संपुष्टात आली आहे का? की त्या विश्वनिर्मात्याने सांगितले आहे की, यानंतर तुम्ही विचार वगैरे करायचा नाही. संसद, न्यायपालिका, कार्यपालिका आणि प्रसार माध्यमे हे चार लोकशाहीचे आधारस्तंभ मानले जातात. हे सगळेच खांब आज; प्रश्नांकित झालेले आहेत आणि प्रभावहीन झालेले आहेत. या साऱ्याचाच मुळातून फेरविचार करण्याची गरज आहे. पण फेरविचार करण्याची गरज आहे असे म्हटले की, लगेच कावकाव सुरु होते. जणू काही मानवी सभ्यतेचा हा अंतिम बिंदूच आहे की काय? यापेक्षा वेगळी व्यवस्था नसू शकते का? किती हा कर्मदरिद्रीपणा? किती हे बुद्धीदारिद्र्य?

असा काही वेगळा विचार मांडला तर लगेच दोन आक्षेप तयार असतात. एक म्हणजे ही बंडखोरी आहे किंवा हा राजद्रोह आहे. वास्तविक राजद्रोह आणि पर्यायी व्यवस्थेचे चिंतन या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. सगळे कायदे- नियम पायदळी तुडवावेत, राज्यव्यवस्थेशी सहकार्य करू नये, अराजक माजवावे वगैरे कोणी म्हणत असेल तर ती बंडखोरी वा राजद्रोह म्हणता येईल. पण आजची व्यवस्था कुचकामी झाली आहे आणि त्याचे विश्लेषण करून त्याला पर्याय सुचवणे; अन त्याबाबत लोकात जागृती करणे किंवा लोकांना ते पटवून देणे यात वावगे काय?

दुसरा आक्षेप भावनिक स्वरूपाचा असतो. तो म्हणजे, वेगळ्या व्यवस्थेचा विचार हा राज्यघटनेच्या विरुद्ध आहे. घटनाभंग आहे. पर्यायाने ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी प्रतारणा आहे, म्हणजेच महिलांसहित सर्व दलित, पिडीत, शोषित यांच्या विरोधातील हा विचार आहे. हा अतिशय उथळ आणि अपरिपक्व असा आक्षेप आहे. परंतु त्यातील भावनिकता आणि संवेदनशीलता यामुळे कोणी या विषयावर बोलत नाहीत. खरे म्हणजे एक मुलभूत प्रश्नही या निमित्ताने विचारात घ्यायला हवा; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी मतभेद असणे हा गुन्हा किंवा पाप ठरावे का? किंवा त्यांच्यापेक्षा वेगळा विचार मांडणे म्हणजे दलित शोषितांचा विरोध ठरतो काय?

आपल्या आधीचे विचारक वा व्यवस्थाकार यांना बाजूला करीतच मानवसमाज पुढे पुढे चालत आला आहे. हाच जगाचा इतिहास आहे. आपल्या आजूबाजूची परिस्थिती, समस्या, गरजा, व्यवस्था यांचा समग्र विचार स्वतंत्रपणे करणे आवश्यकच असते. काळ जसजसा पुढे जातो तसतसा हा फेरविचार अधिकच आवश्यक ठरतो. खरे तर ठरवून एका विशिष्ट काळानंतर सगळा आढावा (गरज असो वा नसो) घेणे अनिवार्य असायला हवे. हे म्हणजे आपल्या पूर्वसुरींबद्दल अनादर नव्हे, तसेच स्वत:विषयी दुरभिमान नव्हे. हा साधा मानवी जीवनप्रक्रियेचा एक भाग आहे. आम्ही मनाने आणि बुद्धीने किती परिपक्व आहोत याचे ते निदर्शक आहे.

एक व्यवस्था राबवीत असतानाच त्याबाबत साधकबाधक विचार करणे, तो सगळ्यांसमोर मांडणे हेही व्हायला हवे. एक व्यवस्था स्वीकारली की ती अपरिवर्तनीय आहे असे समजण्याचे कारण नाही. अहंगंड आणि न्यूनगंड यापासून दूर राहून वास्तवाच्या आधारे विचार करण्याची सवय लावून घेण्याची गरज आहे. आज अशा प्रकारच्या विचारांची, चिंतनाची वानवा जाणवते. असे चिंतक आणि द्रष्टे ही आजची गरज आहे. त्यांच्या अभावी विचारवंत म्हणवून घेणारे भाट वटवट करीत राहतील. संसद नावाचा बडबडखाना असाच आरडाओरडा करीत राहील आणि तुम्ही आम्ही हतबुद्धपणे पाहत राहू.

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, ८ मे २०१३

शुक्रवार, ३ मे, २०१३

व्यवस्थापक स्वामी विवेकानंद- ३


रामकृष्ण मठ व रामकृष्ण मिशन यांच्या कल्पनेपासून तर स्थापना व नंतर ते काम पुढेही अव्याहत सुरु राहावे, यासाठी स्वामीजींनी कसे व्यवस्थापन केले हे पाहण्यासारखे आहे. रीतसर रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना व्हावयाची होती. तशी काही चर्चाही फारशी नव्हती. परंतु रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य व त्यांचे भक्त एकत्रित राहत असत आणि भजन-पूजन, शास्त्राध्ययन, शास्त्रचर्चा वगैरे करीत असत. हे लोक राहत असत त्याला आलमबाजार मठ म्हणत असत. स्वामी विवेकानंद त्यावेळी अमेरिकेत होते. पण त्यांच्या गुरुदेवांनी त्यांना जी जबाबदारी सोपविली होती आणि त्यांच्या जन्माचे जे प्रयोजन त्यांना सांगितले होते त्याची जाण आणि त्याचे भान त्यांना पूर्ण होते. २७ एप्रिल १८९६ रोजी अमेरिकेतूनच आलमबाजार मठातील गुरुबंधूंना लिहिलेले प्रदीर्घ पत्र मुळातून वाचण्यासारखे आणि समजून घेण्यासारखे आहे. स्वामीजींच्या अद्भुत व्यवस्थापन कौशल्याचे ते प्रत्यक्ष प्रमाण आहे.

अगदी सुरुवातीलाच तुम्हाला (म्हणजे गुरुबंधूंना) या जगात फार मोठे काम करावयाचे आहे हे त्यांनी सांगितले आहे. त्यासाठी व्यक्तिश: काय काळजी घ्यायला हवी हे लिहिताना त्यांनी, मत्सर आणि अहंकार यापासून कटाक्षाने दूर राहण्यास सांगितले आहे. नियमाची अपरिहार्यता आणि गरज पटवून दिली आहे. त्यानंतर मठाच्या व्यवस्थेविषयी बारीकसारीक सूचना दिल्या आहेत. त्यात जागा, जागेची विभागणी, जागेचे व्यवस्थापन, भेटायला येणारे लोक, त्यांच्या भेटण्याच्या वेळा, त्यांना अटेंड करणे, परस्पर संबंध, दिनचर्या, मठाचे कार्यालय, कार्यवाह, मठातील सामानसुमान; अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यानंतर मठाच्या संचालक मंडळाची चर्चा केली आहे. अध्यक्षाची निवड, कार्यवाहाची निवड, कामाची विभागणी, मठात नवीन व्यक्तीला दाखल करून घेण्याविषयी; आदी गोष्टींची चर्चा आहे. त्यानंतर कार्यविभाग या मथळ्याखाली १) अध्ययन विभाग, २) प्रचार विभाग, ३) साधना विभाग; या तीन विभागांची चर्चा आहे. त्यानंतर काही सामान्य सूचना आहेत. जेवणाच्या वेळा निश्चित असाव्यात, जेवणाची व्यवस्था कशी असावी, स्वच्छता असलीच पाहिजे, महिलांचे मठात येणेजाणे, पदाधिकारी वगैरे अनेक गोष्टी नमूद केल्या आहेत.

२० मे १८९७ रोजी अल्मोडा येथून स्वामी ब्रम्हानंद यांना लिहिलेले पत्रही उल्लेखनीय आहे. कोलकाताच्या मठासाठी जागा पाहण्याचे वगैरे काम तेव्हा सुरु होते. पैसा गोळा करण्याचे कामही सुरु होते. या विषयावर स्वामीजी म्हणतात, पैसा अजून हातात आलेला नाही. त्यासाठी थोडा वेळ लागेल. पण तोवर स्वस्थ बसून चालणार नाही. स्वामी ब्रम्हानंद यांना पसंत असलेली जागा दलालाला बयाणा रक्कम देऊन पाहून घ्यावी. ती जागा मिळाली नाही तर तेवढी रक्कम वाया जाईल, याच भावनेने ती जमीन पहावी, असा सल्ला विवेकानंदांनी दिला आहे व्यवहारावर त्यांची इतकी जोरदार पकड होती. यासोबतच आपला गुरुबंधू गंगाधर याने उपाशी राहू नये. भिक्षा मिळाली नाही तर पैसे खर्च करून पोट भरावे हेही त्यांनी कटाक्षाने लिहिले आहे. कामासाठी माणसे जमवण्याची चर्चा करताना ते म्हणतात, `गोड शब्द फार दूरवर ऐकू जातात हे लक्षात ठेवा.'

यानंतर बरोब्बर एका महिन्याने २० जून १८९७ रोजी भगिनी निवेदिता यांना लिहिलेल्या पत्रात त्यावेळची परिस्थिती स्पष्ट होते आणि किती वज्रसमान हृदयाने स्वामीजींनी कार्य केले हे दिसून येते. ते म्हणतात, `एव्हाना पुष्कळसे तरुण शिक्षण घेऊ लागले आहेत. परंतु नुकताच जो भूकंपाचा धक्का बसला त्याने आमच्या एकुलत्या एक, दरिद्री आश्रयस्थानाचा विध्वंस करून टाकला. बाकी ते भाड्यानेच घेतले होते म्हणा. काही हरकत नाही. याची तमा बाळगण्याचे कारण नाही. आश्रयस्थान असो वा नसो, आपत्ती कितीही येवोत, काम हे केलेच पाहिजे. अर्थात काही थोडे संन्यासी, काही फाटलेले कपडे व कधी कधी मिळणारे जेवण यावरच अद्यापि भागवावे लागत आहे. यात बदल झालाच पाहिजे आणि तो निश्चित होणार, कारण आम्ही मन-प्राण अर्पण करून कार्य करीत आहोत. नाही का?'

स्वामी ब्रम्हानंद यांना लिहिलेल्या अन्य एका पत्रात मठासाठी काशीपुर येथील कृष्णगोपाल यांची बाग मिळवण्याबद्दल त्यांनी लिहिले आहे. याच बागेत त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांनी देह ठेवला होता. त्यामुळे १५-१६ हजार रुपयात ही बाग मिळाली तर चांगले, असे लिहितानाच, तुम्हाला हे योग्य वाटले तरच हा व्यवहार करा असेही नमूद करून, स्वामी ब्रम्हानंद यांच्या अध्यक्षपदाचा मान राखायचे सौजन्यही त्यांनी दाखवले आहे. अर्थात या कामाचा बोभाटा होऊ नये, असा इशारा देताना ते म्हणतात, `योजना गुप्त ठेवल्या नाहीत तर कार्य बिघडते.' आपण ही जमीन घेणार असे कळले तर मालक भाव वाढवतील, याकडे लक्ष वेधून त्यासाठी गुप्तता आवश्यक असल्याचे स्वामीजींनी म्हटले आहे. अर्थात जे काही करायचे ते लवकर करावे. `दीर्घसूत्रीपणाने कार्याचा नाश होतो', असा इशाराही त्यांनी दिला आहे. स्वामीजींची अशी सुविचारवजा वाक्ये गोळा केलीत तरीही त्यातून व्यवस्थापन या विषयाची सांगोपांग मांडणी होऊ शकेल. याच पत्रात त्या वेळच्या दुष्काळाची चर्चा करून उपयुक्त सूचनाही त्यांनी दिलेल्या आहेत.

वेगवेगळ्या ठिकाणी रामकृष्ण संघाची केंद्रे स्थापन करणे, गुरुबंधू- शिष्य यांच्या गरजा पूर्ण होणे, पुस्तके लिहिणे, त्या पुस्तकांचे भाषांतर, पुस्तकाची भाषा सुबोध करणे, भाषांतर करू शकणाऱ्या व्यक्तींची माहिती अशा कित्येक गोष्टींकडे त्यांचे सतत व बारीक लक्ष असे. त्याविषयी ते सतत लिहित, बोलत असत.

१८९७ पासून त्यांच्या पत्रव्यवहारात एक प्रकारची निवृत्तीपरता दिसून येते. सगळ्या व्यापातून बाहेर पडण्याची धडपडही पाहायला मिळते. परंतु त्या मानसिकतेतही व्यवहाराकडे दुर्लक्ष वा ढिसाळपणा झालेला दिसत नाही. उलट आपल्यानंतरच्या व्यवस्थेची त्यांनी काळजी घेतलेलीही दिसते. आपल्या मनातील विरक्ती स्पष्टपणे मांडणारे एक पत्र त्यांनी स्वामी ब्रम्हानंद यांना मरी येथून ११ ऑक्टोबर १८९७ रोजी लिहिले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी १२ ऑक्टोबर १८९७ ला त्यांनी पुन्हा एक पत्र स्वामी ब्रम्हानंद यांना लिहिले. त्यात त्यांनी ५ अत्यंत महत्वाच्या सूचना केल्या आहेत. त्या अशा-
१) जे लोक पैसे गोळा करून मठाकडे पाठवतील त्यांना मठाकडून पावती दिली जाईल.
२) या पावतीच्या दोन प्रती असणे आवश्यक आहे. एक पैसे पाठविणाऱ्याकडे धाडली जाईल व दुसरी मठाच्या फाइलमध्ये राहील.
३) मठाजवळ सर्व दात्यांची नावे व पत्ते यांची नोंद असलेले एक मोठे रजिस्टर असले पाहिजे.
४) मठाच्या निधीसाठी दान म्हणून दिलेल्या रकमांचा अगदी पै-पै पर्यंतचा बिनचूक हिशेब ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. सारदाला किंवा इतर कुणाला पैसे दिल्यास त्याचा बिनचूक हिशेब त्यांच्याकडून घेतला पाहिजे. पैशांचा हिशेब बरोबर न ठेवल्यामुळे मला कोणीही फसवा किंवा पैसेखाऊ म्हणणार नाही याची काळजी घ्या. हे सर्व हिशेब पुढे छापून प्रसिद्ध करावे.
५) ताबडतोब एका वकिलाकडे जाऊन त्याच्या सल्ल्याने आपल्या दोघांच्या मृत्युनंतर आपल्या मठामध्ये जे काही असेल ते सर्व हरी व शरद यांना मिळावे असे मृत्युपत्र दाखल करा.
आश्रमातील आपल्या गुरुबंधूकडूनही चोख हिशेब घेण्याची सूचना आणि वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी मृत्युपत्राची केलेली तरतूद या लक्षणीय बाबीच म्हटल्या पाहिजेत.

ज्या उद्देशासाठी देणग्या गोळा केल्या जातात त्या उद्देशापासून थोडेदेखील ढळण्याचा आपल्याला अधिकार नाही, असेही स्वामीजी बजावत असत. अनेकदा विशिष्ट कामासाठी गोळा केलेला पैसा दुसऱ्या एखाद्या कामासाठी वापरायला त्यांनी मना केले आहे. काम चालवताना प्रत्येक माणसाला त्याच्या आवडीचे काम देता यायला हवे याकडेही ते लक्ष वेधत असत.

आपल्या कामाच्या संबंधात एक व्यवस्थापक म्हणून ते कसा विचार करीत असत, हे स्वामी ब्रम्हानंद यांना श्रीनगर येथून  लिहिलेल्या १ ऑगस्ट १८९८ च्या पत्रावरून दिसून येते. ते लिहितात, `तुम्ही नेहमी एक चुकीची समजूत करून घेता. मी ज्या ज्या वेळी हिशेबासंबंधाने तुम्हाला काही लिहितो त्या त्या वेळी माझा तुमच्यावर विश्वास नाही असे तुम्हाला वाटते. मला नेहमी जी काळजी वाटते ती सांगतो. कसे का होईना आपल्या कार्याला आता सुरुवात झालेली आहे. हे कार्य सतत सुरु राहावे आणि आपण निघून गेल्यानंतरही त्याची प्रगती होत राहावी याबद्दलचे विचार मला अहोरात्र भंडावून सोडत असतात. एखाद्या माणसाजवळ तात्त्विक ज्ञान जरी भरपूर असले तरी एखादे कार्य प्रत्यक्ष केल्याशिवाय त्याला खऱ्या अर्थाने शिकण्याची संधी मिळत नाही. आपल्यापैकी प्रत्येक माणसाने कार्याची जबाबदारी स्वीकारावयास तयार राहिले पाहिजे, असे मला वाटते. म्हणून मी निवडणूक, हिशेब, चर्चा यांचा पुन्हा पुन्हा उल्लेख करीत असतो. कार्यकर्त्यांपैकी एक माणूस जरी दगावला तरी दुसरा, किंबहुना जरूर पडली तर त्याच्यासारखे इतर दहा लोक ते कार्य अंगावर घेण्यास तयार असले पाहिजेत. दुसरे म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी माणसाच्या ठायी आवड निर्माण केली नाही तर तो जिवाभावाने काम करणार नाही. म्हणून प्रत्येकाला असे वाटले पाहिजे की- या कार्यात, या संस्थेच्या मालमत्तेत आपला वाटा आहे. हे कार्य चालविण्यात मत प्रकट करण्याचा आपल्याला अधिकार आहे. ही गोष्ट आपण आताच सुरु केली पाहिजे. आळीपाळीने प्रत्येकाला जबाबदारीची जागा द्या. प्रत्येकावर लक्ष ठेवा. जरूर पडल्यास तुम्हाला सर्व गोष्टींचे नियंत्रण करता आले पाहिजे. असे यंत्र उभे करा की, कोणीही मरो, कोणीही उरो ते यंत्र आपोआप चालू राहिले पाहिजे. आपण भारतीय लोक एखादी कायमच्या स्वरुपाची संस्था उभी करू शकत नाही हा आपला फार मोठा दोष आहे. याला कारण एकच आणि ते म्हणजे आपण सत्ता विभागून घ्यावयास तयार नसतो. आपल्या पश्चात कार्याचे काय होईल याचा विचारच करीत नसतो.' किती दूरगामी आणि मुलभूत विचार स्वामीजी करीत होते आणि कार्याला घाट देत होते, हे दाखवणारे हे पत्र आहे.

कामाच्या बाबतीत स्वामीजी अतिशय खमके होते आणि वेळप्रसंगी कडक कानउघाडणी करण्यासही ते कमी करीत नसत. नियतकालिकाच्या संबंधाने स्वामी ब्रम्हानंदांना एका पत्रात ते म्हणतात, `नियतकालीकाकडे विशेष लक्ष द्या. मी तुमच्यात नाही असेच गृहीत धरून चला. स्वतंत्रपणे कार्य करा. धन, विद्वत्ता आणि सगळ्याच बाबतीत आम्ही आमच्या वडील भावावर अवलंबून आहोत, अशी भावना असणे म्हणजे विनाशाचा मार्ग होय. नियतकालिकासाठी लागणारा सगळा पैसा मीच गोळा करायचा आणि त्यातले सगळे लेखही मीच लिहायचे, तर मग तुम्ही सगळे लोक काय करणार? आपले सर्व साहेब काय करीत आहेत? माझ्या वाट्याचे काम मी केले आहे. आता राहिलेले तुम्ही करा. कुणाला पैसा गोळा करता येत नाही., प्रचार करण्याचे कुणालाही जमत नाही, स्वत:ची कामे करणेही कुणाला जमत नाही, एक ओळ लिहिण्याचीही कुणाची कुवत नाही; आणि सगळे म्हणे संत आहेत !!' अशी कडक कानउघाडणी केल्यानंतर पुन्हा पैशाबाबत सूचना देताना ते म्हणतात, पैशाच्या बाबतीत प्रत्येक तपशीलासाठी कमिटीचा सल्ला घ्या. खर्चाच्या प्रत्येक मुद्यावर कमिटीच्या सर्व सदस्यांच्या सह्या घ्या.

आपण अतिशय कठोर भाषा वापरतो याची त्यांना जाण होती. त्याबाबत जोसेफाईनला इ.स. १९०० च्या एप्रिल महिन्यात लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, `आम्ही भारतीय लोक बराच कालपर्यंत अगदी पराधीन होतो. त्यामुळे आम्हाला कोणत्याही कार्याला प्रवृत्त करण्यासाठी कठोर भाषेचा उपयोग बराच करावा लागतो. हे सांगताना मला वाईटच वाटते. या खेपेस आमच्या वार्षिक उत्सवाची जबाबदारी आमच्यातील एका सर्वात आळशी असलेल्या माणसाने अंगावर घेऊन ती पार पाडली. हेच लोक सध्या दुष्काळग्रस्तांच्या सेवेची कामे माझी मदत न घेता अगदी योजनाबद्ध आणि यशस्वी पद्धतीने स्वत:च पार पाडीत आहेत. हा सगळा माझ्या अत्यंत कठोर कानउघाडणीचाच परिणाम आहे यात शंका नाही.'

काही काळानंतर स्वामीजी आणि त्यांचे अन्य गुरुबंधू यांचेही शिष्य होऊ लागले होते. त्यापैकी एक स्वामी शुद्धानंद यांना अल्मोडा येथून ११ जुलै १८९७ रोजी लिहिलेल्या पत्रात कार्यकर्त्यांचे मनोबल स्वामीजी कसे वाढवीत असत हे पाहायला मिळते. ते लिहितात, `माझ्या बंधुंपेक्षा मी माझ्या संतानांकडून अधिक अपेक्षा करतो हे तुम्ही नीट लक्षात ठेवा. मी जितका मोठा होऊ शकलो असतो त्याच्या शंभर पट मोठे माझ्या सर्व मुलांनी व्हावे अशी माझी इच्छा आहे. तुमच्यापैकी प्रत्येक जण अचाट कर्मे करणारा झाला पाहिजे - झालाच पाहिजे असे मी म्हणतो. आज्ञाधारकपणा, तत्परता आणि प्रेम या तीन गोष्टी जर तुमच्याजवळ असतील तर मग कोणताही अडथळा तुम्हाला रोखू शकणार नाही.'

व्यवस्थापन या बाबीचा विचार करताना साधारणपणे १) नियोजन, २) संघटन, ३) कार्यकर्ते/ कर्मचारी, ४) निर्देशन, ५) नेतृत्व, ६) संवाद, ७) प्रेरणा, ८) समन्वय, ९) नियंत्रण या गोष्टींचा विचार केला जातो. स्वामीजींनी त्यांच्या सर्व प्रकारच्या कामाचे जे काही व्यवस्थापन केले ते अभ्यासले, तर या सगळ्या गोष्टी त्यांनी किती उत्तम प्रकारे केल्या हे पाहायला मिळते. यातील आणखीन वैशिष्ट्य हे की, या साऱ्याचे कुठले शिक्षण वगैरे त्यांनी घेतले नव्हते. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे असा कुठला अनुभवही त्यांच्या गाठीशी नव्हता. तिसरे वैशिष्ट्य म्हणजे केवळ हे एकच काम त्यांनी केले नाही, तर अन्य अनेक कामे करीत असताना हे काम केले आहे. चौथे वैशिष्ट्य म्हणजे, कुठे एका जागी बसून त्यांनी हे केलेले नसून सतत फिरत फिरत हे काम त्यांनी केले आहे. पाचवे वैशिष्ट्य म्हणजे व्यवस्थापनाचे फक्त मार्गदर्शन तेवढे त्यांनी केले असे नसून, पैसा जमवणे; माणसे जमवणे वगैरे कामेही प्रत्यक्षपणे केली आहेत.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, ३ मे २०१३

व्यवस्थापक स्वामी विवेकानंद – २

`प्रबुद्ध भारत' आणि `ब्रम्ह्वादिन' या दोन नियतकालिकांचे व्यवस्थापन विवेकानंदांनी कसे केले हे पाहण्यासारखे आहे. व्यवस्थापक म्हणून किती आणि कशी अवधानं स्वामीजींनी ठेवली आहेत हे ११ जुलै १८९४ च्या त्यांच्या पत्रावरून पाहायला मिळते. पेरूमल यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, `नियतकालिक चालू करा. मी वेळोवेळी तुम्हाला लेख पाठवीत जाईन. नियतकालिकाचा एक अंक, त्यासोबत एक आभारदर्शक पत्र बोस्टन येथील हार्वर्ड विश्वविद्यालयातील प्रा. जे.एच. राईट यांना पाठवून द्या. कारण असे की, त्यांनीच मला प्रथम मदत केली. ते पत्र वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्यास त्यांना विनंती करा. तसे केल्याने मिशनऱ्यांचे म्हणणे खोटे आहे असे आपोआपच सिद्ध होईल.' पुढे ते म्हणतात, `डेट्रोइट येथील व्याख्यानात मला ९०० डॉलर्स म्हणजे २७०० रुपये मिळाले. दुसऱ्या एका व्याख्यानात एका तासात मला २५०० डॉलर्सची म्हणजे ७५०० रुपयांची प्राप्ती झाली. परंतु प्रत्यक्षात माझ्या हातात २०० डॉलर्सच पडले. एका भामट्या व्याख्यान मंडळाने मला ठकविले. मी त्या मंडळाशी असलेला माझा संबंध तोडून टाकला आहे.'

अनुभवांची देवाणघेवाण, त्यातून सावधतेचा इशारा, वास्तवाची जाण, वेगवेगळ्या लोकांमध्ये मेळ घालण्याचा प्रयत्न, काम करण्याचे शिक्षण, कामातील आपला सहभाग कोणता राहील याचे स्पष्ट निर्देश; अशा असंख्य गोष्टींचे व्यवधान स्वामीजी ठेवीत असत. स्वामीजी सतत प्रवासात राहत असत. त्यामुळे त्यांचा पत्ता सतत बदलत असे. त्याविषयीच्या सूचनाही स्वामीजींनी वारंवार केल्या आहेत.

मद्रासचेच त्यांचे अन्य एक शिष्य डॉ. नांजुंदा राव यांनाही त्यांनी व्यवस्थापकीय मार्गदर्शन केले आहे. `ब्रम्ह्वादिन' मासिक सुरु झाल्यावर मुलांसाठी एक मासिक सुरु करावे असा विचार डॉ. राव यांच्या मनात आला. त्याविषयी समाधान व्यक्त करून स्वामीजींनी त्यांना अनेक उपयुक्त सूचनाही केल्या. संस्कृत साहित्यातील अनेक कथा लिहवून घेऊन त्या लोकप्रिय करण्याची ही सुसंधी आहे असे नमूद करून ते म्हणतात, कथांच्या द्वारे तत्वांची शिकवण देणे हे या नियतकालिकाचे उद्दिष्ट असायला हवे. पण त्यात तात्त्विक चर्चा मात्र नको. प्रस्तावित मासिक मुलांसाठी असल्याने ते विद्वत्तापूर्ण नसावे असेही त्यांनी आवर्जून सांगितले होते. आपण त्यासाठी कथा लिहू असे सांगून स्वामीजी डॉ. राव यांना सांगतात, मुखपृष्ठाचे चित्र विचारपूर्वक ठरवा. ते साधे आणि आकर्षक असले पाहिजे. संघटनेसाठी आज्ञापालन ही अतिशय महत्वाची गोष्ट असल्याचेही स्वामीजींनी डॉ. राव यांना लिहिले होते.

अळसिंगा पेरूमल यांना ८ ऑगस्ट १८९६ रोजी स्वामीजींनी स्वित्झर्लंड येथून एक पत्र लिहिले आहे. त्या पत्राचा पहिलाच परिच्छेद वाचताना असे वाटते की, एखाद्या नियतकालिकाच्या व्यवस्थापकाने आपल्या संपादकालाच व्यावसायिक पत्र लिहिले आहे की काय. या पत्रात ते म्हणतात, `काही दिवसांपूर्वी तुम्हाला पत्र लिहिल्यानंतर `ब्रम्हवादिन'ला हातभार लावण्याचा मार्ग मी शोधून काढला आहे. त्याविषयीच मी आज तुम्हाला लिहिणार आहे. मी तुम्हाला एक-दोन वर्षांपर्यंत दरमहा १०० रुपये म्हणजेच वर्षाला ६० ते ७० पौंड पाठवीत जाईन. त्यामुळे `ब्रम्हवादिन'साठी पूर्ण वेळ काम करण्यास तुम्ही मोकळे व्हाल आणि परिणामी `ब्रम्हवादिन' अधिक यशस्वी होईल. छपाई वगैरेसाठी होणारा खर्च भागविण्यासाठी निधी उभारण्याच्या कामात श्री. मणी अय्यर व इतर मित्र साहाय्य करू शकतील. वर्गणीचे उत्पन्न किती येते? लेखकांना मानधन देऊन त्यांच्याकडून उत्कृष्ट लेखमाला लिहवून घेणे हे या रकमेत शक्य होईल काय? `ब्रम्हवादिन'मध्ये जे काही छापलेले असेल ते प्रत्येकाला अगदी समजलेच पाहिजे असे मुळीच नाही. माझे म्हणणे असे की, हिंदूंनी देशभक्तीने प्रेरित होऊन आणि सत्कर्म म्हणून वर्गणीदार व्हावे.'

पैशाच्या व्यवहाराबाबत सूचना करताना पुढे ते म्हणतात, `अनेक गोष्टी आवश्यक आहेत. प्रथमत: पूर्ण सचोटी हवी. तुमच्यापैकी कुणी सचोटीच्या मार्गापासून ढळेल असे मला मुळीच म्हणावयाचे नाही. परंतु पैशाच्या व्यवहाराच्या बाबतीत हिंदूंच्या ठिकाणी एक विशिष्ट गबाळेपणा आढळून येतो. ते आवश्यक तेवढे पद्धतशीर नसतात. जमाखर्च वगैरे ठेवण्याच्या बाबतीत ते काटेकोर नसतात.'

हाच विषय अधिक स्पष्ट करताना २६ ऑगस्ट १८९६ रोजीच्या पत्रात स्वामीजी डॉ. राव यांना लिहितात, `भारतात सर्व संघटित प्रयत्न एका दोषामुळे असफल होतात. तो दोष हा की काम करण्याची काटेकोर व कडक पद्धती अजून आपण शिकलो नाही. काम म्हणजे काम, मग तेथे मैत्री किंवा भीड उपयोगाची नाही. आपल्या ताब्यातील सर्व रकमेचा प्रत्येकाने चोख हिशेब ठेवला पाहिजे आणि एका विशिष्ट कार्यासाठी आपल्या स्वाधीन करण्यात आलेल्या रकमेचा विनियोग दुसऱ्या कोठल्याही कार्यार्थ होता कामा नये. मग आपल्यावर पुढच्या क्षणी भुकेने मरण्याची का पाळी येईना! याला म्हणतात व्यवहारातील सचोटी. दुसरी आवश्यक गोष्ट म्हणजे अदम्य उत्साह. कोणतेही काम केले तरी त्या वेळेपुरते ते काम तुम्ही उपासना म्हणून करा. सध्या या नियतकालीकालाच तुम्ही आपला देव समजा. म्हणजे मग तुम्ही यशस्वी व्हाल.' स्वामीजी किती कडक प्रशासक होते हे दाखवणारे हे पत्र आहे. एकदा आपल्याला यश मिळाले की विविध भाषांमधूनही आपण आपल्या नियतकालिकाचा विस्तार करू अशी भविष्यातील विस्ताराची दृष्टीही त्यांनी डॉ. राव यांच्यापुढे मांडली आहे.

आपल्या कामाला पोषक अशा विविध गोष्टींकडेही व्यवस्थापकाचे लक्ष असावे लागते आणि त्याचे नीट समायोजन त्याला करावे लागते. स्वामीजींनी हे कार्य केलेले देखील पाहायला मिळते. रशियाच्या झारने एक प्रवास वर्णनात्मक लेख लिहिला होता. त्यात भारताचे वर्णन `आध्यात्मिकतेची व ज्ञानाची भूमी' असे केले होते. तो लेख स्वामीजींनी अळसिंगा पेरूमल यांना पाठवला आणि तो `ब्रम्हवादिन'मध्ये छापण्याची सूचना केली.

अमेरिका व इंग्लंड येथे `प्रबुद्ध भारत' आणि `ब्रम्हवादिन' यांचे वितरक मिळावेत म्हणून देखील स्वामीजींनी खटपट केली होती. या मासिकांसाठी वर्गणीदार मिळवण्याचे कामही त्यांनी केले होते. `कर्मयोग', `भक्तियोग', `राजयोग' ही पुस्तके छापून त्यातून निधी उभा करण्याचा मोठा व्यापही त्यांनी केला होता. यासाठी होणाऱ्या विलंबासाठी त्यांनी कडक शब्दात पेरूमल यांची कानउघाडणीही केली होती. विलंबामुळे आपण संधी गमावून बसतो, विक्री कमी होते याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते. स्वामीजी पहिला विदेश प्रवास आटोपून भारतात परतले तेव्हा आपल्यासोबत येणाऱ्या लोकांची माहिती देण्याची आणि त्यांच्या व्यवस्थेच्या सूचना देण्याची काळजीही त्यांनी घेतली होती. कोणाची गैरसोय होऊ नये ही व्यवस्थापकाची दृष्टीच त्यामागे होती.

स्वामीजींनी कशाकशाची व्यवस्था केली हे पाहण्यासारखे आहे. भारतात परतल्यावर मरी येथून जगमोहनलाल यांना लिहिलेल्या पत्रात विवेकानंद म्हणतात, `मी तिघा संन्याशांना जयपूरला पाठवीत आहे. तरी मुंबईला जाण्यापूर्वी त्या तिघांची काळजी घेण्यास कुणाला तरी सांगून ठेवा. त्यांच्या जेवणाखाण्याची आणि राहण्याची चांगली व्यवस्था करावयास सांगा. मी येईपर्यंत ते तिघे तेथेच राहतील. ते तिघेही सरळ स्वभावाचे असून फारसे शिकलेले नाहीत. ती माझीच माणसे असून त्यांच्यापैकी एक माझा गुरुबंधू आहे. त्यांची इच्छा असल्यास त्यांना खेत्रीला न्यावे.'

खेत्रीच्या राजेसाहेबांना १६ ऑक्टोबर १८९८ रोजी लिहिलेल्या पत्रात त्यांनी पाश्चात्य स्नेह्यांबाबत लिहिले आहे. ते म्हणतात, `माझे पाश्चिमात्य स्नेही जयपूर पाहण्यासाठी एखाद-दोन आठवड्यात येतील. जगनमोहन तेथे असल्यास त्यांना पाहुण्यांकडे लक्ष देण्यास, त्यांना शहर दाखविण्यास, तसेच जुन्या कलाकृती दाखविण्यास सांगावे. पाहुणे मंडळी जयपूरला जाण्यासाठी निघण्यापूर्वी मुन्शीजींना पत्र पाठवा, अशी सूचना मी माझे गुरुबंधू सारदानंद यांना देऊन ठेवली आहे.'

स्वामीजींनी विदेशात हिंदू तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार केला, आश्रमांच्या रूपाने त्यासाठी काही स्थायी कार्यही उभे केले अन त्यासाठी अनेक विदेशी स्त्री-पुरुषांना सोबत उभे करून सहकार्य मिळविले. यामुळे प्रभावित होऊन अनेक जण भारत पाहण्यासाठी आले. काही त्यांच्यासोबत आले. काही स्वतंत्रपणे आलेत. अनेक जण भारतात राहिलेही. भारतातील कामासाठीही अनेकांचे अनेक प्रकारे सहकार्य स्वामीजींनी मिळविले. पण हे सारे वाटते तितके सोपे नक्कीच नव्हते. याचे एक मासलेवाईक उदाहरण त्यांनी १० जुलै १८९७ रोजी कु. जोसेफाईन मॅक्लिऑड यांना लिहिलेल्या पत्रात पाहायला मिळते.

या पत्रात ते म्हणतात, `तुम्ही इकडे जरूर या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, युरोपीय आणि भारतीय लोक (युरोपीय त्यांना नेटिव्ह म्हणतात) एकत्र राहतात, पण तेल व पाणी याप्रमाणे. नेटीव्हांशी मिसळणे म्हणजे युरोपियांना आपला दर्जा कमी करून घेण्यासारखे वाटते. अगदी राजधानीच्या शहरात सुद्धा चांगली हॉटेले नाहीत. अनेक नोकर बरोबर घेऊन तुम्हाला प्रवास करावा लागेल. (नोकर ठेवणे हे हॉटेलात राहण्यापेक्षा स्वस्त आहे.) फक्त कमरेवरच वस्त्र असलेल्या लोकांची संगत तुम्हाला सहन करावी लागेल. मी सुद्धा असेच वस्त्र नेसलेला तुम्हाला आढळेन. घाण व कचरा सगळीकडे भरपूर; माणसे सावळ्या रंगाची. परंतु तत्वज्ञानाबद्दल तुमच्याशी चर्चा करणारी माणसे मात्र पुष्कळच आढळतील. येथील इंग्रज रहिवाशांशी जास्त संबंध जोडलात तर तुम्हाला जास्त सुखसोयी मिळतील.. परंतु येथील हिंदू कसे आहेत याची काहीच कल्पना येणार नाही. बहुधा मी तुमच्याबरोबर भोजन घेऊ शकणार नाही. परंतु तुमच्याबरोबर पुष्कळ प्रवास करण्याचे, पुष्कळ ठिकाणांना भेट देण्याचे आणि माझ्या शक्तीनुसार तुमचा प्रवास शक्य तितका सुखकर करण्याचे मात्र मी अभिवचन देतो. या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागणार या अपेक्षेने तुम्ही यावे हे चांगले. अर्थात प्रत्यक्षात यापेक्षा अधिक काही चांगले झाले तर उत्तमच.' किती प्रकारचे व्यवस्थापन स्वामीजींनी केले असेल?

भगिनी निवेदिता यांना २९ जुलै १८९७ रोजी अल्मोडा येथून लिहिलेल्या पत्रातही त्यांनी अशाच प्रकारे भारतातील परिस्थितीची स्पष्ट कल्पना देणारे, परंतु हिरमोड न करणारे; धाडस कमी न करणारे; उत्साह देणारे पण वास्तवाची जाण निर्माण करणारे पत्र लिहिले आहे.

कोलकाताहून संत्री घेऊन मद्रासला पाठवावी. तेथे ती आपल्याला मिळतील, असे स्वामी ब्रम्हानंद यांना एका पत्रात लिहिलेले वाचायला मिळते. स्वामी रामकृष्णानंद यांना लिहिलेल्या २० एप्रिल १८९७ च्या पत्रातही अशाच अनेक छोट्या छोट्या गोष्टींचे मार्गदर्शन दिसून येते. मद्रास येथील आश्रम तेथील एक गृहस्थ श्री. बिलिगिरी यांच्या घरी सुरु झाला. तेथील पूजाअर्चा, अन्य कामे यासोबतच बिलिगिरी यांच्या दोन विधवा मुली आहेत याची आठवण ठेवून, त्यांच्याशी योग्य व्यवहार असावा याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. या मुलींना धर्म, तसेच संस्कृत व इंग्रजीचे शिक्षण द्यावे यावरही स्वामीजींनी भर दिला आहे. कुणी श्री. गुप्ता यांना कुत्रा चावला होता, त्यांनी नीट औषध घ्यावे हे सांगायलाही स्वामीजी विसरले नाहीत.

व्यवस्थापकाचा अभिन्न गुण असलेल्या नेतृत्वाविषयीही स्वामीजींनी फार मोलाचे मार्गदर्शन केले आहे. भगिनी निवेदिता यांना श्रीनगर येथून १ ऑक्टोबर १८९७ रोजी लिहिलेल्या पत्रात स्वामीजींनी नेतृत्व या विषयाची चर्चा केली आहे. नेतृत्वाबाबतचा मुलभूत विचार तर त्यात पाहायला मिळतोच, पण आजच्या विविध क्षेत्रातील नेतृत्वाच्या पार्श्वभूमीवर त्याचे आगळेपण ठळकपणे नजरेत भरते.

स्वामीजी म्हणतात, `काही लोक दुसऱ्याच्या नेतृत्वाखाली उत्तम काम करतात. प्रत्येक जण नेतृत्व करण्यासाठी जन्मलेला नसतो. जो एखाद्या लहान मुलाप्रमाणे सत्ता गाजवतो तोच सर्वात उत्तम नेता होय. लहान मूल हे जरी सर्वांवर अवलंबून असलेले दिसले तरी त्याची सर्व कुटुंबावर निरंकुश सत्ता असते. कमीत कमी मला तरी नेतृत्वाचे रहस्य हेच आहे असे वाटते. पुष्कळांना इतरांबद्दल प्रेम, सहानुभूती इत्यादी वाटत असेल, परंतु फारच थोड्यांना या भावना व्यक्त करता येतात. दुसऱ्यांबद्दलची सहानुभूती, त्यांच्याबद्दल वाटणारे कौतुक आणि प्रेम ही व्यक्त करण्याची शक्ती ज्या व्यक्तीच्या ठायी असते ती त्या शक्तीच्या जोरावर इतरांच्या मानाने आपल्या विचारांचा व कल्पनांचा अधिक प्रभावीपणे प्रचार करू शकते.'

याच पत्रात याच विषयावर स्वामीजी पुढे म्हणतात, `सगळ्यात मोठी अडचण आहे ती अशी- लोक मला प्राय: त्यांचे सर्व प्रेम देऊन टाकताना दिसतात, परंतु मोबदल्यात मी मात्र त्यांना माझे संपूर्ण प्रेम देता कामा नये. कारण ज्या दिवशी मी तसे करीन त्या दिवशी कार्य नष्ट होईल. पण व्यक्तीला विसरून व्यक्तीनिरपेक्ष विचार करण्याची विशाल दृष्टी ज्यांना लाभलेली नाही अशा काही लोकांना मात्र अशा मोबदल्याची अपेक्षा असते. मी शक्य तितक्या लोकांचे अनिर्बंध प्रेम संपादन करावे, परंतु स्वत: मात्र व्यक्तीनिरपेक्ष दृष्टी ठेवून पूर्णपणे अलिप्त राहावे, हे कार्याच्या साफल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण मी जर तसा अलिप्त राहिलो नाही तर, मत्सर व कलह ही कार्याचा विध्वंस करून टाकतील. नेत्याने नेहमी व्यक्तीनिरपेक्ष दृष्टी बाळगणे आवश्यक आहे. तुम्हाला हे पटेल अशी मला खात्री आहे. अर्थात नेत्याने निर्दय बनावे, लोकांच्या श्रद्धेचा स्वत:चे हेतू साध्य करण्यासाठी उपयोग करून घ्यावा आणि मनातल्या मनात त्यांना हसत राहावे, असा माझ्या म्हणण्याचा आशय नाही. माझ्या म्हणण्याचा जो अर्थ आहे, तो माझ्या जीवनात तुम्हाला दिसेलच. तो अर्थ हा की, माझे प्रेम कितीही व्यक्तिगत असले तरी वेळ आली किंवा तसेच आवश्यक भासले तर बुद्धांच्या कथनाप्रमाणे `बहुजनहिताय बहुजनसुखाय' माझ्या हाताने आपले हृदय उपटून काढण्याची शक्ती माझ्या ठायी असली पाहिजे. प्रेमाचा वेडेपणा तर पाहिजे, परंतु त्याने निर्माण होणारे बंधन मात्र नको.' आज आपल्यापुढे ज्या प्रकारचे नेतृत्व विविध क्षेत्रात वावरताना दिसते, त्यातून निर्माण होणाऱ्या ज्या अनेक विकृती दिसतात; त्या संदर्भात विचार केला तर स्वामीजींचे हे विवेचन आणि मार्गदर्शन किती महत्वाचे आणि अनोखे आहे हे सहज जाणवावे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, ३ मे २०१३

शुक्रवार, २६ एप्रिल, २०१३

संघ, संघटना, संघटीत समाज

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे वर्ष प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडवा, हा हिंदू नववर्षाचा प्रारंभदिन. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचा हा जन्मदिन. संघात हा दिवस नववर्षाचा पहिला दिवस म्हणूनच साजरा केला जातो, डॉ. हेडगेवार यांचा जन्मदिवस म्हणून नव्हे. अर्थात डॉ. हेडगेवार यांचे जीवन, कार्य आणि विचार यांचे संघात सतत स्मरण, चिंतन होत असते. त्यामुळे या प्रसंगी ते प्रमुखतेने होणे स्वाभाविकच ठरते. डॉ. हेडगेवार यांनी आपल्या १५ वर्षांच्या संघकामात अनेक मुलभूत गोष्टींची पायाभरणी केली होती. त्यावरच मग संघाचे विशाल कार्य उभे झाले. त्यातीलच एका मुलभूत विचाराचे या वर्ष प्रतिपदेनिमित्त प्रकट चिंतन.

डॉ. हेडगेवार नेहमी म्हणत असत, की आपल्याला संघाची ज्युबिली साजरी करायची नाही. अर्थ सरळ आणि स्पष्ट आहे. ५० वर्षे, ६० वर्षे, ७५ वर्षे, ८० वर्षे, १०० वर्षे... अशी वर्षांची उतरंड वाढवीत जायचे आणि आपली संस्था इतकी जुनी आहे वगैरेचे गोडवे गात, किती वर्षे संस्था चालली त्यावरून तिची थोरवी ठरवावी; हे संघाच्या संदर्भात त्यांना अभिप्रेत नव्हते. संघ खूप काळ चालत राहावा वगैरे त्यांची कल्पना नव्हती, हे स्पष्टच आहे. परंतु मग प्रश्न निर्माण होतो की, मग संघ काढला कशाला? आणि तो चालवायचा तरी कुठवर? या प्रश्नांच्या उत्तरासाठी काही गोष्टी थोड्या नीट समजून घेण्याची गरज आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो? या प्रश्नाचं उत्तर आहे, संघ हिंदूंचे संघटन करतो. कशासाठी हे संघटन करतो? हिंदू समाज सुसंघटीत करण्यासाठी. सारख्या भासणाऱ्या पण अतिशय वेगळ्या असणाऱ्या या दोन गोष्टी आहेत. इंग्रजीतील शब्दाचा उपयोग करून ही फोड करता येईल. संघ काय करतो, hindu organisation करतो. कशासाठी करतो? organised hindu society साठी करतो. organisation आणि state of being organised या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. संघाला हिंदू समाजाअंतर्गत एखादे संघटन उभे करायचे नाही, असे म्हटले जाते त्याचाही हाच अर्थ आहे. संघाला हिंदूंचे एखादे संघटन तर उभे करायचे नाहीच, पण संपूर्ण समाजाचेही संघटन करायचे नाही. संघाला संघटीत हिंदू समाज उभा करायचा आहे.

एखादी व्यक्ती खूप organised आहे असे जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी त्याचा अर्थ काय होतो? त्याचा अर्थ हा होतो की, ती व्यक्ती गडबड गोंधळ करीत नाही. साऱ्या गोष्टी वेळच्या वेळी करते. रुमाल राहिला, पाकीट विसरलो, बिल भरायचं राहिलं अशा गोष्टी त्या व्यक्तीच्या बाबतीत संभवत नाहीत. एखादी अडचण उभी राहिली तर ती व्यक्ती हातपाय गाळत नाही. त्या व्यक्तीचे वेळेचे, पैशाचे नियोजन पक्के असते. ती आपत्तींना घाबरत नाही, केव्हा काय करायला हवे हे त्या व्यक्तीला नेमके कळते. कोण आपला, कोण परका हे त्याचे आडाखे योग्य असतात. आपण बनवले जात नाही याची ती व्यक्ती पूर्ण काळजी घेते. ही व्यक्ती विचारी, समजूतदार, विवेकी, निर्णयक्षम, समन्वय आणि संघर्ष दोन्हीची क्षमता असणारी अशी असते. थोडक्यात म्हणजे जीवन जगताना सुखी, सुरक्षित आणि सहज जीवन जगणारी व्यक्ती organised आहे असे आपण म्हणतो. हे सारे त्या व्यक्तीला कोणी सांगावे लागत नाही. प्रत्येक वेळी त्यासाठी त्याला प्रशिक्षण घ्यावे लागत नाही. तो त्याचा पिंड असतो, स्वभाव असतो. त्याचं अस्तित्वच त्या सगळ्या गुणांचा समुच्चय असतं.

समाजाच्याही बाबतीत असंच आहे. कोणतेही अभाव नसणारा, अभाव उत्पन्न झाले तर ते सहज दूर करणारा, भौतिक सुखसोयींनी समृद्ध, संपूर्ण समाज एक आहे या भावनेने ओतप्रोत, स्वत:सोबतच समाजाचा- सृष्टीचा- अन्य समाजाचा विचार करणारा, शत्रू आणि मित्र यांची पारख असलेला, कोणत्याही आपत्तीला समर्थपणे तोंड देऊ शकणारा; अशा समाजाला organised society म्हणता येईल. याच्या अभावी तो समाज विस्कळीत समाज आहे, असेच म्हटले जाईल. आपला समाज, म्हणजेच येथील राष्ट्रीय समाज असलेला हिंदू समाज, असाच विस्कळीत समाज आहे. तो सुव्यवस्थित झाल्याविना हा देश, हे राष्ट्र पुन्हा ताठ मानेने उभे राहू शकणार नाही, असे डॉ. हेडगेवार यांचे विश्लेषण होते. त्या दृष्टीने संघटीत समाज उभा करण्याचा संकल्प त्यांनी केला.

परंतु असा समाज उभा होण्यासाठी आणि हे सारे सहज, स्वाभाविक, उत्स्फूर्तपणे होण्यासाठी समाजाच्या प्रत्येक घटकाचा विशिष्ट स्तर आवश्यक आहे. या समाजाच्या विचारांना, विचार करण्याच्या पद्धतीला तसा घाट द्यावा लागेल, त्याच्या सवयी बदलाव्या लागतील, स्वभाव बदलावा लागेल. प्रदीर्घ काळ यासाठी प्रयत्न केल्यानंतर समाजाचा विशिष्ट पिंड तयार होईल, समाजाची वृत्ती तयार होईल. हे घडवून आणण्यासाठी एखादी यंत्रणा हवी. ही यंत्रणा म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. डॉ. हेडगेवार यांची ही दृष्टी नीट समजून घ्यायला हवी.

एखादी संघटना उभारायची आणि त्या संघटनेच्या भरवशावर समाजासाठी काम करीत राहायचे, अशी त्यांची दृष्टी नव्हती. समाजाला अशा बाह्य आधाराची गरज लागू नये, प्रत्येक गोष्टीला योग्य-अयोग्य असा प्रतिसाद देण्यासाठी समाज सक्षम असावा; अशी त्यांची स्पष्ट धारणा होती. संघ संघटना म्हणून सगळ्या समाजाचे नियमन आणि नियंत्रण करील, अशी त्यांची कल्पना नव्हती. म्हणूनच ज्यावेळी डॉक्टरांना कोणी विचारले की, आमच्या वस्तीत काही गडबड झाली तर तुम्ही संघाचे स्वयंसेवक पाठवाल का? त्यावर ते गमतीने म्हणालेही, `मी माझ्या स्वयंसेवकांना पांघरूण घेऊन झोपायला सांगेन. तुम्ही जर वस्तीसाठी सज्ज होऊन उभे राहणार असाल तर तुमच्या मदतीसाठी मी त्यांना पाठवीन.' संघ काहीही करणार नाही; स्वयंसेवक सारे काही करतील, असेही ते म्हणत त्याचाही तोच अर्थ आहे.

अर्थात अशा आदर्श समाजाची उभारणी होईपर्यंत त्याला नीट सवयी लावण्यासाठी संघालाही, संघ म्हणून पुढे होऊन अनेकदा कामे करावी लागतील. त्यातूनच दिशादर्शन होईल, संस्कार होतील आणि सवयीही लागतील याकडे त्यांनी दुर्लक्ष केले नव्हते. त्यामुळेच, रामटेकची यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी व्यवस्था करण्यासाठी स्वयंसेवकांचे दल पाठवणे असो किंवा नागपुरातील महालक्ष्मी दंग्याच्या वेळी मुकाबला करण्यासाठी स्वयंसेवकांचा उपयोग करून घेणे असो; या गोष्टीही त्यांनी केल्या आहेत. अर्थात `तात्कालिक' आणि `अंतिम' या दोन्ही गोष्टींचे अवधान डॉक्टरांनी नेहमीच राखले होते.

संघ हा सामाजिक काम करणारे संघटन, हे जसे त्यांना अपेक्षित नव्हते; तसेच संघ ही राजकीय संघटना हे देखील अपेक्षित नव्हते. राजकारणात पक्ष संघटन आणि सत्ता असे दोन भाग असतात. त्यात कोण वरचढ यासाठी चढाओढही असते. कम्युनिस्ट पद्धतीत संघटना श्रेष्ठ हे तत्वच आहे. काँग्रेसमध्ये यात परिस्थितीनुरूप बदल पाहायला मिळतो. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी पंतप्रधान असताना सत्ता संघटनेपेक्षा श्रेष्ठ होती. काही वेळेला संघटना श्रेष्ठ असते. जसे सध्या आहे. संघाची आणि संघ संस्थापकांची ही कल्पना नव्हती. संघटना बांधून सत्ता हाती घेऊन समाजाचे भले होईल, या विचारावर मुळातच विश्वास नसल्याने तसा प्रश्नच उत्पन्न होत नाही. (संघ आणि राजकारण, तसेच जनसंघ- भाजपची उभारणी, आजची भूमिका वगैरे स्वतंत्र विषय आहे.)

डॉ. हेडगेवार यांची ही भूमिका पुढेही कायमच होती. डॉ. हेडगेवार यांच्यानंतर सरसंघचालक पदी आलेले गोळवलकर गुरुजी यांनी इंदूर चिंतन बैठकीत ७ मार्च १९६० रोजी दिलेल्या बौद्धिकात या विषयाची सखोल चर्चा केली आहे. रा. स्व. संघाचे संघाचे संघटन कसे आहे, त्याची वैशिष्ट्ये कोणती याची चर्चा करताना `अनुशासन' या शब्दाची चर्चाही त्यांनी केली आहे. उपनिषदातील `अनुशासन' शब्दाचा अर्थ स्पष्ट करून तोच संघाला अभिप्रेत असल्याचेही ते म्हणाले. याविषयी ते म्हणाले, `विशिष्ट पद्धतीनेच वागले पाहिजे असा आदेश उपनिषदात नाही. विशिष्ट अशी नियमावली सांगितली नाही. बुद्धीचे स्वातंत्र्य दिले आहे. आणि या स्वातंत्र्याचा मौलिक अशा सिद्धान्तांशी समन्वय जोडून त्यालाच अनुशासन म्हटले आहे. आपल्याकडे अनुशासन या शब्दात व्यक्तीचे स्वातंत्र्य, व्यक्तीचे सूत्रबद्ध जीवन आणि समष्टीत तिचे विलीनीकरण या दोहोंचा अंतर्भाव आहे. या दोहोत जो सामंजस्य निर्माण करू शकतो तोच यथार्थतेने हिंदू संघटन करू शकतो. अन्यथा जगात ज्या प्रकारे निरनिराळ्या लोकांनी काही संघटीत स्वरूप उभे केले आणि त्या आधारावर त्यांनी काही काळ शक्तीचा अनुभवही घेतला होता त्याच प्रकारे आपल्याकडेही होऊ शकेल. त्यातून एक हिंदू शक्ती उत्पन्न होईल आणि ती काही काळानंतर नष्ट होईल. अशी शक्ती अल्पजीवी राहील आणि काही काळ सफलता हाती आली तरीही ती शक्ती संपल्यावर शेकडो पटींनी अधिक हानी पोहोचेल. हे मी अत्यंत स्पष्टपणे तुमच्यासमोर सांगतो आहे.'

याचेच विवरण करताना ते पुढे म्हणतात, `आपले कार्य हिंदू समाज संघटीत करण्याचे आहे. हिंदू समाजात वेगवेगळ्या संघटीत शक्ती निर्माण करण्याचे नाही. समाजात वेगवेगळे पक्ष निर्माण करण्याचे नाही. समाज संघटीत जीवनाच्या विचारांनी ओतप्रोत असावा आणि समाजातील सर्व व्यक्ती नि:शेषपणे त्या विचारांनी परिपूर्ण असाव्यात हे आपले लक्ष्य आहे. समष्टीमध्ये आपले जीवन विलीन करून स्वत:सिद्ध अनुशासनाच्या भावनेत स्वत:ला गुंफून घेण्याचा निश्चय करून लोकांनी येथे यावे. या प्रकारच्या समाज संघटनेचा आमचा विचार आहे आणि संकल्प आहे- एक संघटीत पक्ष निर्माण करण्याचा नाही, हा विवेक करणे उचित ठरेल. यावर कोणी विचारेल की, संघ एका पक्षाप्रमाणे नाही तर मग कसा चालतो? आपण पूर्ण विचार केला तर आपल्याला हे मान्य करावे लागेल की, व्यक्ती व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी; संपूर्ण समाजाचे संघटीत जीवन निर्माण करण्यासाठी एक मोठे देशव्यापी, निरलस, नि:स्वार्थ कार्यकर्त्यांनी मिळून बनलेले संघटनयंत्र आपल्याला उभे करावे लागेल. पण ते आपले लक्ष्य नव्हे, ते केवळ साधन आहे. समाज सुसंघटीत व्हावा यासाठी कार्यकर्ते निर्माण करणे ही केवळ पहिली पायरी आहे.'

शेक्सपिअरच्या `ज्युलियस सीझर' नाटकाचा संदर्भ देत `मास मुव्हमेंट', `क्लास मुव्हमेंट' याची चर्चाही त्यांनी केली. पुढे अतिशय नि:संदिग्ध शब्दात त्यांनी हा विचार मांडला. ते म्हणतात, `आर्य लोकात कधी दासभाव राहू शकत नाही. दासपण त्याला कधीच चांगले वाटू शकत नाही. मग ते स्वकीयांचे असो वा परकीयांचे असो. आर्यांच्या प्रतिभेचा आणि चैतन्याचा हा असामान्य गुण आहे. आपण आपल्या जीवनात मुक्ती हेच जर सर्वश्रेष्ठ लक्ष्य मानलेले आहे, सर्वतंत्र स्वतंत्र आणि कुठलीही बंधने नाहीत अशी अवस्था जर श्रेष्ठ मानली आहे तर मग ऐहिक जीवनातही दासतेचा विचार मान्य होऊच शकत नाही. जर कुणाला तो मान्य होत असेल तर आर्यत्वापासून तो ढळला. हा आपला स्वाभाविक गुण आहे आणि त्याचे पोषण करून आपल्याला तो परिपुष्ट बनवायचा आहे. कुणी जबरदस्तीने कुणाचा गुलाम बनत असेल आणि आपली प्रतिभा विकत असेल तर कोणत्याही व्यक्तीचे असे हे पतन आपल्याला सहन होण्यासारखे नाही. आपण हे मान्य करू शकत नाही.'

या बौद्धिकाच्या अखेरीस इशारा देताना गुरुजी म्हणतात, `संघटना करताना, अहिंदू आणि अनार्य संघटना विचारांचा प्रभाव आपल्यावर पडण्याचे भय राहू शकते. परिणामी आपणही एक रिजिड- नॉन इलॅस्टिक; समाजाला गुलाम बनविणारे यंत्र निर्माण करून राष्ट्राचे भोळसटपणामुळे अहित तर करून बसणार नाही, ही खबरदारी घेण्यासाठीच हे मी सांगितले. यावर विचार करणे हे आता आपले काम आहे.'

याचा अर्थ राष्ट्रजीवनात संस्था, संघटना राहणार नाहीत अथवा राहू नयेत असा नाही. याचा अर्थ फक्त एवढाच की, कोणतीही एखादी संघटना राष्ट्रजीवनाचे निर्धारण करू शकत नाही. उलट गरजेनुसार आवश्यक त्या संघटना, संस्था उभ्या करण्याची, त्यात कालानुरूप परिवर्तन करण्याची आणि गतार्थ संस्था विलीन करण्याची शक्ती आणि विवेक राष्ट्रात सतत जागृत असायला हवा. त्यासाठी चार गोष्टींचा विचार आधारभूत मानायला हवा.
१) राष्ट्राविषयी सुयोग्य धारणा.
२) त्याच्या दृश्य स्वरूपाचे संरक्षण.
३) राष्ट्राच्या मूल्यव्यवस्थेबद्दल आस्था.
४) याविषयी बांधिलकीची भावना.

संघाचे तिसरे सरसंघचालक आणि संघात ज्यांची ओळख प्रति डॉक्टर हेडगेवार अशी आहे, त्या बाळासाहेब देवरस यांनीही यासंबंधात स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. सरसंघचालक होण्याच्या पूर्वी १९६५ साली त्यांचे सहा अतिशय महत्वपूर्ण बौद्धिक वर्ग झाले. `राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- लक्ष्य व कार्य' या शीर्षकाने त्याचे संकलन प्रकाशितही झाले आहे. संघाच्या कामाविषयी अनेक मूलभुत बाबींची त्यात चर्चा आहे. बाळासाहेब देवरस यांनी व्यक्त केलेल्या विचारांचा सारांश असा-

`ज्या समाजातील व्यक्ती स्वार्थरहित होते, त्या समाजात सहज आणि स्वाभाविक सामर्थ्य निर्माण होते. आपल्या समाजात शक्तीचा जो वास्तविक स्रोत आहे, त्या स्वाभाविक सामर्थ्यास जागृत करण्यासाठी संघाचे कार्य चालले आहे. यावच्चंद्र दिवाकरौ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अस्तित्वात ठेवण्याची आपली कल्पना नाही. राष्ट्र पुनरुत्थानाच्या ठिणग्यांचे चिरस्थायी वन्हीमध्ये रुपांतर करण्याची आवश्यकता आहे. समाज आणि राष्ट्राचा विचार व त्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी हाही चारित्र्याचा महत्वाचा भाग आहे. शक्ती निर्माण करणे हीच आमची, जे अंतिम लक्ष्य आहे त्यासंदर्भातील भूमिका आहे. ते नीट न समजून घेतल्यास अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. जर संघ नसता तर आज जेवढ्या तात्कालिक समस्या आहेत त्यापेक्षा कितीतरी अधिक गंभीर झाल्या असत्या. संघ प्रश्नांचा सम्यक विचार करतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या द्वारेच सदैव समाज शक्तिशाली राहील, असा संघाचा विचार नाही. समाजात परिवर्तन घडवू इच्छिणारा संघ हा एक प्रयत्न आहे.'

अर्थात याचा अर्थ संघ लगेच विसर्जित करण्याची वेळ आली आहे असा नाही. उलट आजची परिस्थिती पाहता आणखी शे-दोनशे वर्षे संघाची गरज राहू शकते. आपल्या राष्ट्राविषयी आस्था व बांधिलकी असणारे परंपरेने चालत आलेले घटक संघाबाहेरही विद्यमान होते. आज त्यांचेही क्षरण झाले आहे. त्यामुळे संघकार्याची गरज निर्विवादपणे आहे. मात्र त्याचवेळी संघाच्या कार्याबद्दल योग्य व स्पष्ट धारणा जेवढ्या अधिक प्रमाणात निर्माण होईल, तेवढेच अंतर्गत व बाह्य- समज, गैरसमज, व्यवहारातील अडथळे, अडचणी कमी होण्यास मदत होईल आणि संघटीत हिंदू समाज उभा करण्याच्या प्रयत्नांना बळकटी येईल.

- श्रीपाद कोठे
गुरुवार, ११ एप्रिल २०१३
नागपूर