शनिवार, १९ मार्च, २०११

निमित्त मोनिका व राधिकाचे...

निमित्त मोनिका व राधिकाचे...
मोनिका किरणापुरे खून प्रकरण सध्या नागपुरात गाजते आहे. मोनिका मूळची नागपूर जिल्ह्यातील रामटेकची राहणारी. नागपूरला राहून एका अभियांत्रिकी महाविद्यालयात ती शिकत होती. त्याच्या दोनेक दिवस आधी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत राधिका तन्वर या महाविद्यालयीन युवतीचा भर रस्त्यात खून करण्यात आला होता. राधिकाचे प्रकरण दिल्लीचे असल्याने दूरचित्रवाणीवर त्याची खूप चर्चा झाली. त्यामानाने मोनिका प्रकरणाला प्रसिद्धी मिळाली नाही. कदाचित त्यामुळेच असावे की, राधिकाचा खुनी दोन दिवसांनी मुंबईत पकडला गेला. मोनिकाचा खुनी मात्र अजूनही सापडलेला नाही. राधिकाचा खुनी तिचा एक मित्रच होता. मोनिकाचा मारेकरीही कदाचित तिला ओळखणाराच असावा. दोन्ही प्रकरणात तरुण विद्यार्थ्यांनी पुढाकार घेउन वातावरण तापविले. विद्यार्थ्यांचा मोर्चा वगैरे प्रकार यशस्वी आणि प्रभावी पार पडले. राधिकाचा खुनी सापडल्यानंतर मात्र ते प्रकरण थंड झाले आहे. मोनिकाचा खुनी सापडल्यानंतर नागपुरातील प्रकरणही शांत होईल. यापूर्वीही पुष्कळदा असेच घडलेले आहे. संबंधित प्रकरणाचे आरोपी पकडले गेल्यावर चर्चा शांत व्हावी अशा या घटना आहेत का?
आरोपी पकडले गेल्यावर कायदा आपल्या पद्धतीने काम करील हे खरे आहे. चौकशी होईल, आरोप सिद्ध होतील, शिक्षा होईल. पण भविष्यात अशा घटना होणार नाहीत याची खात्री देता येईल का? युवा वर्गानेही याचा गंभीर विचार करायला हवा. राधिका आणि मोनिका या दोन्ही घटना काही निर्जन अरण्यात झालेल्या नाहीत. या दोघीही महाविद्यालयात जात असताना भर रस्त्यात या घटना घडल्या आहेत. शेकडो लोक त्यावेळी आजुबाजुला होते. त्यात महाविद्यालयीन युवकही होते. मात्र त्यांनी काहीही केले नाही. या मुलींच्या मदतीलाही कोणी धावून गेले नाही आणि आरोपीला पकडण्याचा प्रयत्नही कोणी केला नाही. सगळ्यात गंभीर हीच बाब आहे. का माणसे एकमेकांच्या मदतीला धावून जात नाहीत? या प्रश्नाचा विचार करण्यासाठी थोडा आजच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करायला हवा.
काय आहे आजचे वास्तव? विशेषत: विशितल्या तरुणाईचे? प्रचंड वेगाने गाड्या हाकणे, तासंतास मोबाईलवर बोलणे, मोठमोठ्याने आरडाओरड, कानठळ्या बसवणार्या आवाजात गाणी ऐकणे अन् त्यावर बेधुंद नाचणे, स्वत:बद्दलचे अवास्तव आणि अनावश्यक ग्रह आणि सगळ्यात मुख्य म्हणजे प्रचंड उर्मटपणा आणि उद्धटपणा. साधी दुचाकी वा चारचाकी सुद्धा व्यवस्थित पार्क करायला हवी याकडे आजचा तरुण लक्ष देतो का? बरे त्याला तसे सांगायचीही सोय नसते. असे कोणी सांगितलेच तर त्याकडे दुर्लक्ष केले जाते. काय कटकट म्हणून संभावना केली जाते. नाही तर सरल उर्मटपणे उत्तरे दिली जातात. सांगणार्याचा अपमान केला जातो, पाणउतारा केला जातो. बहुसंख्य तरुणांच्या वागण्याबोलण्याची, व्यवहाराची आज हीच स्थिती आहे. गल्लीबोळात तरुण-तरुणी प्रेमचाळे करीत हिंडत असतात. मर्यादा सोडून वागणार्या अशा तरुणांना कोणी हटकले तर त्याचे काय होते हे सार्याँना ठाऊक आहे. यात युवतीही मागे नाहीत. अधिकाधिक बेबंद वागणे म्हणजेच आजची तरुणाई झाली आहे. त्या विरुद्ध कोणी बोलले तर त्याला आपण का त्यांच्या फंदात पडलो असे वाटू लागते. बहुसंख्य तरुण वर्ग परस्परांशी तर फटकून वागतोच पण एकूण सगळ्यांनीच एकमेकांशी आणि आपल्याशी फटकून वागावे अशीच त्याची इच्छा आणि प्रयत्न असतो. यातूनच घरात, बाहेर, मित्रांमध्ये, महाविद्यालयात आणि एका अर्थाने समाजातच सर्व प्रकारच्या औपचारिक, अनौपचारिक संबंधात मोठी दरी तयार होऊ लागली आहे. त्यामुळे एकमेकांसाठी धावून जाणे, मदत करणे ही प्रवृत्ती लोप पावत आहे. एवढेच नव्हे तर कोणी मदतीचा हात पुढे केलाच तर त्याच्या वाट्याला जो त्रास आणि हेटाळणी येते त्यामुळे मदतीचे हातही आखडू लागले आहेत.
याचा परिणाम केवळ मदतीला धावून जाणे वा न जाणे एवढ्यापुरताच मर्यादित राहत नाही. एकमेकांच्या भानगडीत पडायचे नाही आणि `मला सारे समजते', `मी आता लहान नाही', `प्रत्येकाने आपापले पाहावे' या तरुणाईच्याच विचारशून्य वल्गनांमुळे विद्यार्थ्यांनाही कोणाचे काय चालले आहे, कोणाची भांडणे आहेत, स्वभाव कसे आहेत, बलस्थाने कोणती, दुर्बल स्थाने कोणती हे काही माहीत नसते. त्यामुळे एखादी घटना घडल्यानंतर ती का घडली असावी याचे केवळ तर्कच करावे लागतात. आज आपल्या सुरक्षेची मागणी करणारी मुले मुली काही ठोस माहिती देऊन आरोपीपर्यंत पोहोचायला आणि सत्य उघड करायला फारशी मदत करू शकत नाहीत हेही वास्तव आहे. सहज, स्वाभाविक व आस्थापूर्ण संबंध असेल तर विपरीत घटना रोखताही येऊ शकते. संबंधात निर्माण होणार्या ताणतणावांना वाट करून देता येऊ शकते. पण हे ताणतणाव वाढत गेले की त्याचा स्फोट होतो. आत्मीय संबंधांचे वंगण नसल्यामुळे असे अपघात होण्यापूर्वीच टाळले जाण्याचीही शक्यता कमी होते.
तरुणांमधे सतप्रवृत्त, विचारी, समजूतदार वर्ग नाहीच असे नाही पण हा समजूतदार वर्ग एकूण तरुण वर्गात किती प्रभावी आहे. किंवा हा समजूतदार वर्ग प्रभावी व्हावा म्हणुन सार्याच पातळ्यांवर किती प्रयत्न केले जातात? तरुण वर्गच इतिहास घडवत असतो, जग घडवत असतो हे शंभर टक्के खरे आहे. पण सगळेच तरुण फार चांगलं काही तरी घडवतात असे नाही. विवेकानंद हे विवेकानंद होते, भगतसिंह भगतसिंह होते, शिवाजी शिवाजी होते म्हणून त्यांनी इतिहास घडवला. ते तरुण होते म्हणून त्यांनी इतिहास घडवला नाही. तरुण काय घडवू शकतो याची ही उदाहरणे आहेत. तरुण वय हे काही घडवायला साहाय्य नक्कीच करतं, पण केवळ तरुण आहे म्हणून कोणी काही घडवू शकत नाही. माझ्या या विचारांमुळे तरुण वर्ग संतप्त होऊ शकेल, सगळ्याच गोष्टींचे कौतुक करणारा एक वर्ग समाजात असतो तोही नाराज होऊ शकेल. पण तो बदल घडवून आणू शकणार नाही. बदल घडवून आणायचा असेल तर त्याची सुरुवात स्वत:पासून करावी लागेल. तरुणाईला सुद्धा!!! नाही तर अशा घटना होतच राहतील.

गुरुवार, १० मार्च, २०११

मला काय त्याचे?

मला काय त्याचे?

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत सध्या हिंसक व सूड घेऊ घटनांनी थैमान घातले आहे. परीक्षेत नक्कल करू न दिल्याबद्दल आठव्या वर्गातल्या एका विद्यार्थ्याने आपल्या शिक्षिकेवर ब्लेडने वार केले. त्यात ती शिक्षिका चांगलीच जखमी झाली. गंमत म्हणजे त्यावेळी वर्गातील मुले, `ब्लेड मारो, कोंपी करो' असे ओरडत होती. अतिशय संतापजनक असा हा प्रकार म्हटला पाहिजे. केवळ आठव्या वर्गातील ही लहान लहान मुले घाबरली असती, भेदरली असती, तर समजण्यासारखे होते. पण त्यांचा attitude विचित्रच नव्हे तर घृणास्पद होता.
महाराष्ट्रात पेट्रोल भेसळीवरून झालेले यशवंत सोनवणे खून प्रकरण अजून विस्मरणात सुद्धा गेलेले नसतानाच अशा प्रकारच्या घटना घडतच आहेत. तेल, डिझेल, पेट्रोल एवढेच काय वाळू, जमीन, भूखंड, दूध असे सारे माफिया प्रकार सर्रास सुरू असून जीवघेणे हल्लेही सुरूच आहेत. महाराष्ट्र असो की दिल्ली अशा असभ्य, असंस्कृत, विधिनिषेधशून्य घटना रोज घडत आहेत आणि त्या सामान्य माणसाच्या सुरक्षेवर, शंतातामय सहजीवनावर प्रश्नचिन्हही लावीत आहेत. महाराष्ट्र व दिल्लीतच असे घडते आहे असे नाही, तर पूर्ण देशभरच हा तमाशा चालू आहे. तपशिलाचा फक्त फरक!! बाकी निर्ढावलेपणा, निर्लज्जपणा, अतिरेक आणि दहशतीची वृत्ती मात्र सारखीच.
आणखीनही एक सारखेपणा सगळीकडे पाहायला मिळतो. तो म्हणजे- माणसांचा, समाजाचा थंडपणा आणि असहायता. एक तर बहुसंख्य समाज अशा घटनांकडे पाहतच नाही. त्याची नजर शेअर बाजार, रिअलिटी शो, दूरचित्रवाणीवरील मालिका, क्रिकेटसारखा जगाच्या जीवनमरणाचा खेळ, मोबाईल; टीव्ही; वेगवेगळी इलेक्ट्रोनिक उपकरणे; गाड्या; यांची मोडेल्स वगैरे वगैरे अतिशय महत्वाच्या गोष्टींवर असते. त्यामुळे त्याला वेळच नसतो.
यानंतरही त्याच्यावर अशी एखादी घटना आदळलीच तर तो नजर फिरवून घेतो. त्याने साधले नाही तर `मला काय त्याचे? माझा त्याच्याशी काय संबंध? मला काय फरक पडतो?' अशी स्वत:ची अन् बाकीच्यांचीही समजूत घालतो. अशा घटना फार मनाला लावून घ्यायच्या नसतात. त्यांचा त्रास करून घेउन आपली मन:शांती बिघडवायची नसते. त्याने उगाचच मनावर ताण येतो आणि जीवनातलं स्वास्थ्य आपण हरवून बसतो असा यौगिक कम आध्यात्मिक सल्लाही आजकाल समाज देऊ लागला आहे. बाकीच्यांना आपण काय सांगू शकतो? काय समजावू शकतो? आपण चांगलं राहावं. असा उपदेशही ऐकायला मिळतो. अशा प्रकारचा विचार करताना, असे युक्तिवाद करताना आपण स्वत:लाच कसे फसवतो आहोत किंबहुना स्वत:च्या पायावरच कसा धोंडा पाडून घेतो आहोत याकडे मात्र समाज सपशेल दुर्लक्ष करू लागला आहे. अशा घटनांना बळी पडणारे अनेकदा दिल्लीतील त्या शिक्षिकेसारखे सज्जन लोकच असतात. कदाचित एखादे वेळी आपल्याही वाट्याला असे काही येऊ शकेल, एवढा साधा विचारही समाजाच्या मनाला स्पर्श करिनासा झाला आहे. आपणाला विचारांची एक देणगी मिळालेली आहे, त्याचा वापर आपण करायला हवा. आजूबाजुच्या बर्यावाईट घटना, शेजारीपाजारी, अन्य लोक यांच्या सुखाच्याच नव्हे तर दु:खाच्या घटना, समाजातल्या निरनिराळ्या व्यवस्था यांचा संवेदनशिलतेने, सह्रुदयतेने, आस्थेने विचार करायला हवा आणि त्यानुसार व्यवहार करायला हवा. चांगल्या घटनांचे कौतुक तर करायलाच हवे पण वाईट घटनांचा निषेधही करायला हवा, त्यावर साधकबाधक चर्चा करायला हवी, आवश्यक तेथे व आवश्यक प्रमाणात सक्रियता हवी... यामुळेच समाज `समाज' या रुपात उभा राहत असतो. समाजाची चांगल्या वाईटाची जाण जागी राहत असते. भल्या लोकांना त्याने बळ लाभते अन् वाईट वृत्तीवर अंकुश राहतो. आणि तेच व्यक्तिच्याही हिताचे असते. हे सारे समजून घेण्याची वृत्तीच जणू लोप पावते आहे की काय अशी भीती वाटावी असे आजचे चित्र आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर.