मंगळवार, २६ जून, २०१८

बंगदेशी ५


उत्तर कोलकात्याच्या जोडासांको भागातील ठाकूरबारी हे एक बंगाली तीर्थस्थान आहे. `कविगुरू’ म्हणून ख्यात असलेल्या रवींद्रनाथ टागोर यांचे हे घर. घर कसले खूप मोठ्ठी हवेलीच. किती मोठी? फक्त ३५ हजार वर्ग मीटर एवढ्या आवारात !! आज तेथे `रवींद्र भारती विद्यापीठ’ आहे. १९६२ साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या विद्यापीठाचे उद्घाटन केले होते. रवींद्रनाथांचे आजोबा द्वारकानाथ ठाकूर यांनी १७८५ साली ही हवेली बांधली. रवींद्रनाथांनी पहिला आणि शेवटचा श्वास घेतला तो याच हवेलीत. त्यांचा विवाह देखील येथेच झाला. पण ८०-८१ वर्षांच्या आयुष्यातील सुरुवातीची १७ वर्षे आणि अखेरची नऊ वर्षे, अशी २६ वर्षेच ते या हवेलीत राहिले. त्यांच्या काव्यलेखनाची सुरुवात याच ठिकाणी झाली. साहित्य, संगीत, चित्रकला, नाटक अशा विविध कला प्रकारांवर आपला ठसा उमटवणारे आणि त्यात मोठे योगदान देणारे रवींद्रनाथ टागोर यांनीच नोबेल पुरस्कारांच्या नामावळीत भारताचे नाव प्रथम नोंदवले. टागोरांनी कला साहित्यात फक्त योगदान दिले असे नाही तर बंगाली मानसाला वळण देण्याचा मोठा प्रयत्न केला. मुख्य म्हणजे युगांतराच्या काळातील त्यांच्या साहित्याने आणि कलेने मूळ भारतीयत्वाचा धागा टाकून दिला नाही, सुटू दिला नाही. भारतीयत्वाचा प्रवाहच नवीन रुपडे घेऊन त्यांच्या साहित्यातून, कलेतून वाहत राहिला. रवींद्रनाथांच्या वयाच्या ४० व्या वळणावर पत्नी मृणालिनी देवी यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यानंतरची ४० वर्षे ते `एकला चालो’ असेच जगले. त्याशिवाय प्रचंड प्रतिभावान, प्रज्ञावान लोकांना जे वेगळ्या प्रकारचे एकाकीपण जाणवते, त्यांच्या विचार आणि भावनांना सशक्त प्रतिसाद न मिळण्याची जी कमतरता त्यांना आयुष्यभर त्रास देते; ते एकाकीपण तर होतेच. त्यानेही त्यांची आध्यात्मिक वृत्ती आणखीन पुष्ट केली. वाडवडिलांकडून त्यांना सांपत्तिक वारसा लाभला पण त्यात ते बुडाले नाहीत. संपत्ती त्यांची होती पण ते संपत्तीचे झाले नाहीत. ती आणखीन वाढवण्याच्या फंदात ते पडले नाहीत. त्याऐवजी जीवनातल्या सत्य-शिव-सुंदराची आराधना करण्यात ते रत राहिलेत. असे रवींद्रनाथ जन्मले, राहिले आणि परत गेलेत ती ही ठाकूरबारी.
गिरीश पार्क मेट्रो स्थानकावर उतरून थोडा वेळ चालत गेलो की आपण या हवेलीत पोहोचतो. दोन मार्गांनी येथे पोहोचता येते. एक रवींद्र भारती विद्यापीठाच्या बाजूने आणि दुसरे पैतृक घराच्या बाजूने रवींद्र सारिणीवरून. कोणत्याही प्रवेशद्वाराने गेलो तरीही दारातला चाफा आपले हसून सुगंधी स्वागत करतो. ठाकूरबारीचे दोन स्पष्ट भाग आहेत. एक `रवींद्र भारती विद्यापीठ’ आणि दुसरे टागोरांचे पैतृक घर. हवेलीसमोरील मोठ्ठ्या मैदानातील बाग पार करून घरात प्रवेश करताना उजव्या हाताला रवींद्रनाथांचा सुरेख अर्धपुतळा आहे. हवेलीतील संग्रहालयात तीन दालने आहेत. त्यात रवींद्रनाथ, कुटुंबीय आणि बंगाली नवोत्थान प्रयत्नांचे चित्रमय दर्शन होते. वेगवेगळी लहानमोठी चित्रे, काही वस्तू पाहणाऱ्याला जुन्या काळात घेऊन जातात. गाण्यांच्या जुन्या तबकड्या, त्यांना विविध ठिकाणी मिळालेल्या भेटवस्तू, त्यांच्या मोजक्या चित्रफिती, त्यांनी काढलेली चित्रे; हेही या दालनांमधून पाहायला मिळते. रवीन्द्रनाथांनी अखेरचा श्वास ज्या खोलीत घेतला ती खोलीही जतन केली आहे. त्यांनी विश्वात्मकाला गीतांची अंजुली `गीतांजली’ वाहिली होती. मी त्यांना काय वाहणार? मी त्यांना मौन भावांजली वाहून तेथून बाहेर पडलो.
बंगाली मनाला वेड लावणाऱ्या आणि जगालाही भुरळ घालणाऱ्या या तत्वज्ञ कवीच्या या निवासाला भेट देणे हा एक आनंदाचा आणि समाधानाचा विषय. परंतु तिथे होणाऱ्या उत्सवांच्या वेळी तिथे जाऊ नये असे माझे व्यक्तिगत मत. हां, उत्सवांचा अनुभव हा स्वतंत्र विषय, पण कवीगुरूंशी, त्यांच्या व्यक्तित्वाशी, त्यांच्या भावविश्वाशी, त्यांच्या चिंतनाशी, त्यांच्या अनुभवांशी एकरूप व्हायचे असेल, ते सारे feel करायचे असेल तर जो निवांतपणा हवा तो उत्सवांच्या वेळी मिळत नाही. मी गेलो तो रवींद्रनाथांचा जन्मोत्सव होता. खरं तर त्या दिवशी जाऊन त्या विश्वात रमावे हाच हेतू. पण त्या दिवशी ठाकूरबारीत अक्षरश: जत्रा असते. एरवी सकाळी १० ते दुपारी साडेचार उघडे असणारे हे घर त्या दिवशी सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत उघडे असते. अन रवींद्रनाथांवर अपार माया करणारे सर्व वयोगटातील, सर्व आर्थिक- सामाजिक स्तरातील लाखो बंगाली स्त्री-पुरुष यांची तिथे रीघ लागलेली असते. अंगणात टाकलेल्या भव्य मंडपात सतत कविता, नृत्य, नाट्य असे काही ना काही सुरूच असते. प्रत्येक कलाकार आपापल्या कलेद्वारे आपल्या ;लाडक्या `रोबी’ला भावांजली वाहत असतो. बंगाली माणसाचे हे रवींद्रप्रेम अनुभवल्याविना कळणे नाही. ते मी अनुभवले पण `रोबी’शी जे तदाकार व्हायचे होते ते मात्र होता आले नाही.
तिथे घालवलेल्या काही तासात; रवींद्रनाथांची आजी दिगंबरी देवी, काकू जोगमाया देवी, मोठी वहिनी ज्ञाननंदिनी, दुसरी वहिनी कादंबरी देवी आणि पत्नी मृणालिनी देवी; या स्त्रियाही मनात पिंगा घालत होत्या. रवींद्रनाथांच्या जडणघडणीत या महिलांचाही मोठा वाटा होता. किंबहुना अन्य कोणापेक्षा अधिक वाटा होता. रवींद्रनाथांना अचानक आणि ध्यानीमनी नसताना लग्न करावे लागले होते, पत्नी अवघ्या १४ व्या वर्षी आई झाली होती, वहिनी कादंबरी देवी यांनी वयाच्या ऐन विशीत आत्महत्या केली होती, अन वहिनी ज्ञाननंदिनी एकटीने इंग्लंड वगैरे फिरणारी. अशा या विविध छटांच्या, वृत्तींच्या स्त्रियांनी त्यांच्या भावभावनांना आकार दिला होता. कादंबरी देवी या तर त्यांच्या कवितेच्या प्रथम वाचक आणि समीक्षक होत्या. त्यांच्या कथा कादंबरीतून भेटणारी स्त्री पात्रे याच महिलांनी प्रभावित केलेली असावीत असाही एक विचार मनात येऊन गेला. शब्दसुरांचा, रंगरेखांचा, निराकार ब्रम्हाचा हा उपासक; बंगभूमीचा अन भरतभूमीचा पुत्र, समाजोत्थानाचा ध्यास घेतलेला कर्मवीर; अशा विविध रूपातील रवींद्रनाथांचा पिंड जेथे आकारला त्या ठाकूरबारीचा अनुभव भावश्रीमंत करणारा होता. अर्थात तदाकार होण्यासाठी पुन्हा भेट द्यावी लागणार हे नक्की. हवेलीच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडताना थोडी चाफ्याची फुले आणि चिमूटभर माती बांधून घेतली आणि निघालो.
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार २६ जून २०१८

शुक्रवार, २२ जून, २०१८

बंगदेशी – १


बंगदेशी खुणावणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. काही दिवसांपूर्वी अशीच साद आली बंगदेशाची अन जाऊन आलो गळाभेट घेण्यासाठी. हावडा स्थानकावर उतरलो आणि prepaid taxi ने मुक्कामी पोहोचलो ते मनात थोडे आश्चर्य घेऊनच. आश्चर्य याचे की, रस्ते इतके मोकळे का? कोलकात्याला काही मी पहिल्यांदाच गेलो नव्हतो. परंतु रस्त्यांवर इतका शुकशुकाट प्रथमच जाणवला. याच कोलकाता नगरात, एकाच जागी तासभर अडकून पडण्याचा अनुभवही घेतला होता. मग लक्षात आले, अरे आज तर रविवार. म्हणूनच taxi १५-२० मिनिटात मुक्कामी पोहोचली. मुक्कामाजवळ पोहोचलो तर खरं, पण वळणावर गाडी थांबवून चालक म्हणाला- गाडी आत जाणार नाही. माझ्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहून म्हणाला- no right turn. आता आली पंचाईत. मग विश्वास देत म्हणाला- थोडंच चालत जावं लागेल. म्हटलं- ते ठीकाय बाबा. पण तू नेमकं पोहोचवलं आहेस की नाही खात्री तर करून घेऊ दे. आता आणखीन पंचाईत. सामान घेऊन पत्ता शोधणे त्रासाचे. अन सामान गाडीत ठेवून जायचे तर मनाची चलबिचल. बरे गाडीचे पैसे द्यायचे आहेत असेही नव्हते. ते आधीच देऊन झाले होते. शेवटी त्याला म्हटले- सामान राहू दे गाडीतच. मी आत पाहून येतो. तो हो म्हणाला. आतल्या रस्त्याला (मोठा दुपदरी रस्ता असूनही आलो त्या बाजूने right turn नव्हता.) थोडं चालत जाऊन मुक्कामाची खात्री करून आलो. गाडी दृष्टीआड होईल एवढे आत जावे लागले होते. परतलो तेव्हा गाडीत बसून चालक गाणी ऐकत होता. त्याला धन्यवाद देऊन सामान घेऊन मुक्कामी आलो. अशा रीतीने बंगदेशीच्या प्रवासाची सुरुवात तर छान झाली. मोकळे रस्ते आणि प्रामाणिक वाहनचालकाने कोलकात्यात स्वागत केले.
आंघोळ वगैरे उरकून बाहेर पडलो. पहिली भेट कुणाची घ्यावी? स्वाभाविक उत्तर आले- चलो दक्षिणेश्वर. मां भगवतीच्या भेटीला. पहिल्यांदा कुणाला भेटणार आईशिवाय? कोलकात्याच्या भुयारी मेट्रोने जाऊ म्हटले. कोलकात्याच्या भुयारी मेट्रोचा माझा हा पहिलाच अनुभव. नंतरच्या मुक्कामात मेट्रोलाच प्राधान्य दिले एवढा हा अनुभव छान होता. `श्याम बझार’ स्थानकाचे टोकन घेतले. टोकन देणारा स्वाभाविक बंगालीत बोलला. मला काहीही कळले नाही. पण मागेच असलेल्या एका तरुणीने माझी अडचण लक्षात घेऊन स्वत:हून दुभाष्याचे काम केले अन प्रश्न सुटला. त्याच वेळी कुठून ट्यूबलाईट पेटला कुणास ठाऊक. मनात म्हटले- परत येताना इथेच यायचे आहे. पण इथे म्हणजे कुठे? या स्थानकाचे नाव काय? अन्य कष्ट घेण्याऐवजी त्या तरुणीलाच विचारले. तिनेही सहज सांगितले. `कोण हा बावळट, कुठून आला’ असे कोणतेही भाव चेहऱ्यावर न दाखवता म्हणाली- `जतीन पार्क.’ मनाला बजावले- पुढील काही दिवस `जतीन पार्क’ हे शब्द मुळीच विसरायचे नाहीत. कोलकाता मेट्रो खरंच व्यवस्थित आहे. फलाटावर उतरले की, डावीकडे आणि उजवीकडे लहान पाट्या लटकलेल्या दिसतात. फलाटावर येणारी गाडी कोणत्या स्थानकांवर पुढे जाणार हे त्यावर लिहिले असते. ते वाचून आपला फलाट निवडता येतो. वेगाने येणारी गाडी पूर्ण थांबल्याशिवाय स्वयंचलित दरवाजे उघडत नाहीत. त्यामुळे धावत धावत चढणे-उतरणे याचा प्रश्नच नाही. शिवाय फलाटावरून डब्यात शिरणे म्हणजे एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाण्यासारखे अन दारे तर मोठी असतातच. गाडीने स्थानक सोडले की पुढील स्थानक कोणते आणि त्याचा फलाट कोणत्या दिशेला येणार याची उद्घोषणा होते. हीच उद्घोषणा स्थानक येण्याच्या काही क्षण अगोदर होते. तुम्ही नवीन असलात तरीही त्यामुळे कोणाला विचारण्याची गरज पडत नाही. शिवाय उद्घोषणा अतिशय स्पष्ट आणि बंगाली, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषेत होतात. त्यामुळे अडचण येण्याचा संभव कमीच. मुंबईच्या लोकलपेक्षा मेट्रो केव्हाही उजवी. अपघातांचे प्रमाणही कमी, सुख आणि सुरक्षा दोन्हीची हमी.
दक्षिणेश्वरी पोहोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. विश्वातील सगळ्याच कातर, हळव्या, रम्य, दु:खार्त आनंदाच्या क्षणांचं दान नियतीनेच जिच्या पदरी टाकलं आहे अशी संध्याकाळ. सारं काही स्वीकारण्यासाठी सतत पुढे असलेली कालपुरुषाची ओंजळ म्हणजे संध्याकाळ. अशा संध्याकाळी पुण्यसलीला भागीरथीच्या तीरी भगवतीच्या, आईच्या दारी पोहोचलो होतो. याआधीच्या खेपेस मंदिराबाहेरचा परिसर साधा होता. आता खूप बदलला आहे. मंदिराच्या महाद्वारातून आत प्रवेश करताच लक्षात आलं, इथे मात्र काहीही बदललेलं नाही. चहूभोवताल त्याच सुमारे दीडशे वर्षांपूर्वीच्या मोठाल्या पडव्या. त्यात निवांत बसलेली माणसे. विविध दालनात संस्थांची कार्यालये आदी. राणी रासमणी या कोळी जातीच्या राणीने, स्वप्नातील दृष्टांतानुसार बांधलेल्या या भव्य मंदिराचा इतिहास सांगणारी चित्रे लावलेली, पावनी गंगेच्या वेगवान प्रबल प्रवाहाला समांतर १२ ज्योतिर्लीन्गांची १२ स्वतंत्र पण सारखी मंदिरे. अन विस्तीर्ण प्रांगणाच्या मध्यभागी भगवती मां कालीचं उंच मंदिर. मंदिराच्या डाव्या, उजव्या अन पुढील बाजूने वर जाणाऱ्या पायऱ्यांवर लागलेल्या मोठ्या रांगा. कुठेही गडबड गोंधळ नाही. मंदिरातील शांततेत उलुध्वनी भरून राहिला होता. शांतपणे एका रांगेत जाऊन उभा राहिलो. पाचेक मिनिटात पायऱ्या चढून भगवतीपुढे पोहोचलो. शांत आणि पवित्र तामसिक अशी ही कालिका. कालीरूप असूनही उग्र नसलेली अशी ही दक्षिणेश्वरची मूर्ती आहे. कालीरुपाला इष्ट मानून पाच मकारांची जी तंत्रसाधना करतात ती येथे नाही. `कलकत्ते का काला जादू’ इथे नाही. बळी वगैरे प्रकार नाहीत. काली उपासना असूनही सात्विक जगदंब भाव. मनात असंख्य तरंग उठले. पण क्षणभरच. लगेच मन न-मन झालं. मनोभावे प्रणाम करून बाहेर आलो. मंदिरासमोरच्या एका कट्ट्यावर बसलो. भगवतीसमोर न-मन झालेलं मन आता उन्मन होऊ लागलं. भागीरथीच्या नादमधुर तालात मन कुठे निघून गेलं कळलंच नाही. थोडा वेळ असाच आनंदमय अवस्थेत गेला.
मग आवारात एक चक्कर टाकली. संस्थानने लावलेल्या नळाचे थंडगार पाणी पोट भरून प्यायलो आणि पावले विलक्षण आवेगाने, विलक्षण धुंदीत आणि अपार नम्रतेने ठाकुरांच्या- श्रीरामकृष्ण परमहंस यांच्या खोलीकडे वळली. एक अद्भुत शांती, अद्भुत धुंदी, गंभीर आनंद, अलौकिक पूर्णता या खोलीत सदैव असते. मुख्य म्हणजे यातील काहीही कोणावरही सत्ता गाजवीत नाही. हे सारे फक्त असते... तुम्हाला सोबत करत... हळूहळू तुमचा तू काढून घेत तुम्हाला आपल्यात सामावून घेत. समग्र विश्वाच्या आध्यात्मिकतेला एक दिशा आणि वेग देणाऱ्या ठाकुरांची ही खोली. इथेच त्यांची अद्भुत लीला आकारास आली. इथेच त्यांची लोकविलक्षण साधना मूर्त झाली. इथेच या अस्तित्वाच्या गाभ्याला हात घालणारी, कोटी कोटी मानवांना आधार आणि आनंद देणारी संभाषणे झाली, इथेच स्वामी विवेकानंदांना त्यांनी निर्विकल्प समाधी केवळ स्पर्शाने मिळवून दिली, जात-पात-धर्म-भाषा-लिंग-देश-वेश-वंश- हे सारे भेद कोणताही उच्चार न करता एकाच मूळ आत्मरसात विरवून टाकले. आनंदाचे सप्तसमुद्र याच १० बाय १५ फुटांच्या खोलीत उसळले. पलंगडीवर ठेवलेल्या ठाकूर प्रतिमेला प्रणाम करून खोलीच्या खिडकीजवळ जाऊन बसलो. गंगेच्या विशाल प्रवाहावरून येणारा पश्चिमेचा शीतल वारा जीवाला सुख चारत होता. मन तर निसटून कुठे कुठे भटकत आणि भरकटत होतं. बसल्या बसल्याच तास दीड तास या जगाच्या बाहेर फिरून आलो. ठाकुरांच्या पाठुंगळी बसून.
बाहेर आलो. पुन्हा एकदा पडवीत टेकलो. मग मंदिराच्या आवाराबाहेर पडलो. श्री रामकृष्णांच्या लीलासहधर्मिणी, मां सारदा ज्या नगारखान्यात राहत असत तिथे गेलो. तिथे आता त्यांची बंगाली लाल काठाची साडी परिधान केलेली प्रतिमा आहे. काही बंगाली मंडळी तिथे भजन करीत होती. थोडा वेळ त्यात सामील झालो. इकडे तिकडे भटकलो आणि `श्यामबाजार’ मेट्रो स्थानकावर परतण्यासाठी पाय वळवले. मंदिरात जाण्यापूर्वी बाहेर काढून ठेवलेली पादत्राणे आणि भ्रमणध्वनी परत घेतले आणि निघालो. तेव्हा जाणीव झाली- अरे, गेले तीनेक तास भ्रमणध्वनी आपल्याजवळ नव्हता !! म्हणजे तो कधीच नसला तरी चालू शकेल का? मनात उगाच चुकार प्रश्न येऊन गेला. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांजवळ जाऊन वाटेची खात्री करून घेतली आणि पावले चालू लागली. मनात भगवती, श्रीरामकृष्ण आणि मां सारदा भरून घेऊन. पुण्यदायीनी भागीरथीचा निरोप घेऊन.
- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, १ जून २०१८

बंगदेशी ४


लाला लजपतराय सारिणी असं अधिकृत नाव असलेल्या, पण एल्गिन रोड याच नावाने प्रसिद्ध असलेल्या रस्त्यावरील `नेताजी भवन’ला भेट देणे हा एक अनुभव आहे. अर्थात असा अनुभव घेण्याची गरज वाटणारे थोडे आहेत हे दिलेल्या भेटीच्या वेळी अनुभवास आले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या या पैतृक घरी जाण्यासाठी नजीकचे मेट्रो स्थानक आहे त्याचे नावही `नेताजी भवन’ असेच. नव्हे नेताजींच्या घरामुळेच ते नाव मिळाले. अर्थात मेट्रो स्थानकावर उतरल्यावर १०-१२ मिनिटे चालावं लागतं. अतिशय गजबजलेल्या एल्गिन रस्त्यावर `नेताजी भवन’ मात्र शांतपणे अविचल उभे आहे. लाल हिरव्या रंगातील या तीन मजली इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ पदपथावर नेताजींचा अर्धपुतळा बसवण्यात आला आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजव्या हाताला एका खोलीत साहित्य विक्री आणि त्यासोबतच घर पाहण्यासाठीच्या तिकीट विक्रीची व्यवस्था आहे. तिकीट घेऊन पुढे जाताच नजरेस पडते ती नेताजींची ऐतिहासिक मोटार. जर्मन बनावटीच्या Wanderer W24 या BLA 7169 क्रमांकाच्या मोटारने नेताजींनी आपल्या निवासाचा अखेरचा निरोप घेतला होता. १९३७ पासून ही मोटार त्यांच्याजवळ होती आणि १९४१ साली भारतातून बाहेर पडण्यासाठी जेव्हा सुभाषबाबू निघाले तेव्हा त्यांचा पुतण्या शिशिर बोस याने याच मोटारीतून त्यांना कोलकात्यावरून तेव्हाच्या बिहारमधल्या आणि आताच्या झारखंडमधल्या गोमोह पर्यंत पोहोचवले होते. तेथून रेल्वेगाडीने सुभाषबाबू पुढे गेले होते. ही गाडी आता आहे तेथे पूर्वी नव्हती. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ती येथे समारंभपूर्वक एका काचेच्या घरात ठेवण्यात आली आहे.
मोटार पाहून चार पावले पुढे गेल्यावर उजव्या हाताला वर जाण्यासाठी जिना आहे. पूर्वीच्या घरांचे छप्पर उंच राहत असे. त्यामुळेच जिने पण उंच राहत असत. नेताजी भवनातील जिनेही असेच उंच. साधारण २०-२२ पायऱ्यांचे. जिना चढून वर गेल्यावर प्रथम आपण पोहोचतो नेताजींच्या शयन कक्षात. १९४६ साली गांधीजींनी या घराला भेट दिली तेव्हा ते या शयनकक्षात आले होते. त्याचे छायाचित्र येथे आहे. या दालनात दारातून आत पाऊल टाकताच डाव्या हाताला मां कालीची तसबीर असून त्याखाली तंत्रोक्त कालिका श्लोक लिहिलेला आहे. नेताजींचे मूळ कुठे होते ते येथे स्पष्ट होते. या साधारण १५ बाय १५ फुटाच्या खोलीत त्यांचे वडील जानकीनाथ यांचा मोठा पलंग, नेताजींचा लहान पलंग, धोतर, छत्री, खडावा, घड्याळ, आरसा, खुर्ची, बूट असे सगळे सामान आहे. १६-१७ जानेवारी १९४१ च्या रात्री याच खोलीतून ते बाहेर पडले होते. ते ज्या मार्गाने गेले तो मार्ग पावलांनी दाखवला आहे. शेजारीच त्यांचे भाऊ सरत बोस यांची खोली आहे. या खोलीत त्यांची आई प्रभावती यांचे छायाचित्र पाहायला मिळते. या खोलीत एक महत्वाची तसबीर पाहायला मिळते. सरत बोस हे THE NATION या वृत्तपत्राचे संपादक होते. २० फेब्रुवारी १९५० रोजी त्यांचे निधन झाले. मृत्यूपूर्वी तासभर आधी म्हणजे रात्री ११ वाजून १० मिनिटांनी त्यांनी आपल्या वृत्तपत्रासाठी अग्रलेख लिहिला होता. त्यात त्यांनी पूर्व पाकिस्तान म्हणजे आजच्या बांगला देशातील स्थितीचा आढावा घेऊन सूचना केली होती की, पूर्व बंगालचे वेगळे राज्य करण्यात यावे. त्यावेळची पूर्व बंगालची एकूण स्थिती आणि भारताचा भाग असलेल्या पश्चिम बंगालमधील विचारप्रवाह, दोन्हीमधील भावनिक बंध हे त्या अग्रलेखातून स्पष्ट होतात. त्यांची सूचना नंतर २१ वर्षांनी, १९७१ साली प्रत्यक्षात आली.
ही दालने पाहून जिन्याने वरच्या मजल्यावर जाताना जिन्याच्या बाजूला एक दालन आहे. ते आहे सुभाषबाबूंचे कार्यालय. याच दालनातून त्यांनी कॉंग्रेसचे अखिल भारतीय अध्यक्ष म्हणून काम केले. आजच्या एखाद्या आमदाराचे कार्यालय सुद्धा त्यांच्या कार्यालयापेक्षा मोठे आणि भपकेदार ठरेल. तो काळ आणि आताचा काळ यातील अंतर हे दालन पाहताना ठळकपणे मनात आल्याशिवाय राहत नाही. त्यावेळी दालन लहान व साधे, पण कर्तृत्व अफाट. अन आज दालने मोठी, भपकेबाज; अन कर्तृत्व खुरटे, खुजे. एक टेबल, चार खुर्च्या, एक सोफासेट, टेबलवर तिरंगा झेंडा, कपाटे... संपले.
जिन्याने वर आल्यावर डाव्या हाताच्या मोठ्या आणि उजव्या हाताच्या लहान दालनात संग्रहालय आहे. डाव्या हाताच्या मोठ्या दालनात प्रवेश केल्यावर पहिलीच तसबीर आहे स्वामी विवेकानंद यांची. त्याखाली लिहिले आहे- AN INSPIRATION. या दालनात अनेक गोष्टी पाहायला मिळतात. नेताजींच्या वस्तू, त्यांनी परिधान केलेला आझाद हिंद सेनेचा गणवेश, त्यांचे हस्ताक्षर, त्यांची कौटुंबिक छायाचित्रे, त्यांची देश विदेशातील छायाचित्रे, कोलकाता महापालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कोलकाता महापालिकेचे महापौर, कॉंग्रेसचे नेते, कॉंग्रेसचे अध्यक्ष, विविध देशी विदेशी असामींसह छायाचित्रे इथे पाहायला मिळतात. सतत त्यांच्या भाषणाची ध्वनीचित्रफित सुरु राहते. हिटलर सोबतचे त्यांचे छायाचित्र लक्ष वेधून घेते. क्रूरकर्मा हिटलरला भगवान बुद्धाची मूर्ती भेट देणारे नेताजी आगळेवेगळे ठरतात. शांतिनिकेतनात आंब्याच्या झाडाखाली रवींद्रनाथांसह झोपाळ्यावर बसलेले नेताजी एक वेगळे दर्शन देतात, तर कोलकात्यातील महाजाती सदनाच्या उद्घाटन कार्यक्रमात त्यांच्यासह बसलेले रवींद्रनाथ टोपी घातलेले पाहायला मिळतात. कोलकाता काँग्रेसच्या वेळी घोड्यावर बसलेले आणि एमिलीसोबतचे नेताजीही इथे आहेत. १६ जानेवारी १९४१ रोजी रात्री त्यांनी या घरात अखेरचे जेवण घेतले. ते ज्या मार्बलच्या ताटवाटीत जेवले ती ताटवाटी आणि त्यावेळी त्यांनी परिधान केलेले रेशमी धोतर इथे पाहायला मिळते. नेताजींचे रसिकत्वही या दालनात अनुभवता येते. त्यांचे notebook of favourite songs 1924-1927 या दालनात फिरताना लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहात नाही. या संग्रहात त्यांनी स्वहस्ताक्षरात रवींद्रनाथांची `आमार शोनार बांगला’ ही कविता लिहिलेली आहे. जपानमधील NIPPON TIMES चे अंक, त्यांनी विदेशी रेडीओवरून केलेली संबोधने इत्यादीही पाहायला मिळते. या दालनातील एक तसबीर मात्र सुभाषबाबूंच्या ज्ञात प्रतिमेपेक्षा एकदम वेगळी आहे. ती आहे, सुभाषबाबू आपल्या वडिलांचे श्राद्ध करतानाची. १९३७ सालच्या या छायाचित्रात कौटुंबिक आणि धार्मिक, पारंपरिक सुभाषचंद्रांचे हृद्य दर्शन होते.
सुभाषबाबूंचे घर पाहून, अनुभवून खाली उतरलो. पुस्तकविक्रीच्या दालनात गेलो. आल्यासारखी दोन पुस्तके घेतली. एक, सुगत बोस यांचं – the nation as mother and other visions of nationhood आणि दुसरं, कृष्णा बोसचं – a true love story : emilie and subhash. विक्रेता बोलका होता. त्याला म्हटलं- पुस्तके महाग वाटतात. तो म्हणाला- हो. महाग आहेत. पण आम्हाला कोणतीही सरकारी मदत नाही. शिवाय समाजाचे हवे तसे आर्थिक पाठबळ नाही. त्यामुळे नाईलाज आहे. त्याने थंड पाणी पाजले. तिथून जायचे होते, `अरविंद भवन’ला. तेथून ते जवळ आहे. त्याला सहज विचारले `अरविंद भवन’ला कसे जाता येईल? त्याने प्रतिप्रश्न केला- ऋषी अरविंद? त्याच्या त्या प्रश्नाने सामान्य बंगाली माणसाच्या मनातही श्री अरविंद यांच्याबद्दल काय भावना आहेत ते स्पष्ट झाले. तेही सुभाषबाबूंच्या संस्थेत काम करणाऱ्या व्यक्तीच्या मनात. सर्वसाधारण समाजात असणारे समज अशा छोट्या छोट्या, क्षुल्लक वाटणाऱ्या घटनातून निर्मूल होतात. मी म्हटले- हो, ऋषी अरविंद. त्याने पत्ता अन रस्ता सांगितला अन म्हणाला- पण तुम्ही ओला किंवा उबेर करूनच जा. ते सोयीचे. १० मिनिटे प्रयत्न केला पण दोन्ही कंपन्यांना भर वाहत्या लाला लजपतराय सारिणीवर उभ्या असलेल्या माझे लोकेशन काही सापडले नाही.
असो म्हणत रस्त्यावरील taxi ला विचारले. तो तयार झाला. आमची स्वारी शेक्सपिअर सारिणीवरील `श्री अरविंद भवन’कडे निघाली. शेक्सपिअर सारिणीला पोहोचल्यावर चालकाने विचारले कुठे थांबायचे? म्हटले- बाबा रे, तुझ्यापेक्षा मी नवखा. इथे विचारावे लागेल. आम्ही विचारत विचारत पुढे जात होतो. शेक्सपिअर सारिणी हा एक लांबलचक रस्ता. खूप पुढे गेल्यावर एकदाचे `श्री अरविंद भवन’ला पोहोचलो. चालक म्हणाला- `आपण फेरा घेऊन आलो. जवळच्या मार्गाने येता आले असते. वेळ आणि पैसे वाचले असते.’ मी म्हणालो- `अरे पण या मार्गावर एकेरी वाहतूक असल्याने त्या पोलीसने हा रस्ता सांगितला ना?’ त्यावर चालक म्हणाला- `ते ठीक आहे. पण पोलिसांना आतील रस्ते कुठे माहीत असतात? तुम्ही पुन्हा याल तेव्हा nightingale hospital जवळ असा पत्ता सांगा. म्हणजे taxi वाला तुम्हाला बरोबर घेऊन येईल.’ अतिशय मैत्रीपूर्ण असा संवाद सुरु असतानाच मी त्याच्या हाती पैसे ठेवले. त्यावर तो म्हणाला- `दहा रुपये कमी परत केले तर चालतील का?’ ठरले होते ८० रुपये, मी दिले होते शंभर रुपये, अन तो मला विचारत होता – दहा रुपये कमी दिले तर चालतील का? पैसे देत असताना माझ्या तर मनात होते, हा कुरकुर करणार. फेरा घेऊन यावं लागलं, चार ठिकाणी विचारावं लागलं याचं भांडवल करणार अन पूर्ण शंभर रुपये खिशात टाकणार. उलट तोच मला विचारत होता, दहा रुपये कमी दिले तर चालेल का? तुम्ही म्हणाल तसं. अशा सौजन्यापुढे कोणीही साहजिकच नांगी टाकेलच ना? म्हटले- ठीकाय बाबा.
श्री अरविंद यांच्या घराचे आवर मोठ्ठे आहे. सगळीकडे झाडे, फुले यांची रेलचेल आहे. मोकळी जागा अधिक आणि बांधकाम कमी आहे. डाव्या, उजव्या बाजूच्या छोट्या इमारती नंतर बांधलेल्या आहेत. साहित्य विक्री, कार्यालय इत्यादीसाठी. आपण मूळ घरात प्रवेश करतो तिथे प्रवेशद्वारावर, देशबंधू चित्तरंजन दास यांनी अरविंद यांच्यावरील अलीपूर बॉम्ब खटल्याच्या वेळी न्यायालयात त्यांच्याविषयी जे उद्गार काढले होते ते लावले आहेत. श्री. चित्तरंजन दास यांनी म्हटले होते –
My appeal to you therefore is that a man like this who is being charged with the offences imputed to him stands not only before the bar in this Court but stands before the bar of the High Court of History and my appeal to you is this: That long after this controversy is hushed in silence, long after this turmoil, this agitation ceases, long after he is dead and gone, he will be looked upon as the poet of patriotism, as the prophet of nationalism and the lover of humanity. Long after he is dead and gone his words will be echoed and re¬-echoed not only in India, but across distant seas and lands. Therefore I say that the man in his position is not only standing before the bar of this Court but before the bar of the High Court of History.
या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर एक मोठे दालन आणि त्याच्या दोन्ही बाजूंना काही खोल्या आहेत. तेथे आता वाचनालय, पुस्तकालय चालते. मोठ्या दालनातून सरळ चालत गेल्यावर आपण घराच्या मागील भागात पोहोचतो. तेथे आता श्री अरविंद यांच्या समाधीचा एक चौथरा उभारण्यात आला आहे. त्यामागे आणि बाजूला एक लांबलचक पडवी तयार करण्यात आली आहे. पडवीत अरविंदांचा अर्धपुतळा आहे. समाधीवर फुलांची सुरेख आरास असते. दर्शनाला येणारे लोक सुगंधित उदबत्त्या पेटवून बाजूच्या नियोजित जागी ठेवतात. त्यामुळे वातावरण कायम सुगंधित असते. तसे येणारे कमीच असतात. मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या हाताने वर जाण्यासाठी मोठा जुन्या काळचा लाकडी गोलाकार जिना आहे. पहिल्याच पायरीजवळ अरविंदांचे अनुयायित्व स्वीकारून भारतात आलेल्या आणि पांडीचेरीला त्यांच्या कार्यात साथ देणाऱ्या मूळ फ्रेंच श्री मां यांचे जिन्याचे तात्विक वर्णन करणारे उद्धरण वाचायला मिळते. वर जुन्या पद्धतीची दोन मोठी दालने आहेत. काय असेल ते, पण एकूण श्री अरविंद यांचे हे निवासस्थान फारसा ठसा उमटवू शकले नाही. त्यांच्या जीवनात बडोदा आणि पांडिचेरी यांना जे स्थान आहे ते कोलकात्याला नाही हे खरेच आहे. माणसाला न समजणाऱ्याही खूप गोष्टी आहेत असे म्हणत ऋषी अरविंद जेथे जन्मले, बागडले, राहिले, जेथून त्यांनी क्रांतीकार्य केले त्या निवासस्थानाचा निरोप घेतला.
- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, १६ जून २०१८

बंगदेशी ३


कोलकाता म्हटले की, अनेक नावांची यादी क्षणार्धात नजरेपुढे तरळून जाते. रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर, सुभाषचंद्र बोस, योगी अरविंद, डॉ. जगदीशचंद्र बोस, बंकिमचंद्र चटर्जी, बिपिनचंद्र पाल; अशी एक जगाला ललामभूत ठरलेली मांदियाळी. भागिरथीच्या तीरावर बेलूर येथील रामकृष्ण आश्रम, माणिकतला भागातील स्वामी विवेकानंद यांचे जन्मस्थान, एल्गिन रस्त्यावरील सुभाषचंद्र बोस यांचे निवासस्थान, जोडासांकोची ठाकूरबारी, शेक्सपिअर सारिणीवरील श्री अरविंद भवन; हे सगळेच `ये रे’ म्हणून बोलावणारे. अन बोलावू धाडले नाही तरीही हक्काने जावे असे. वाटले तर गुज करावे, न वाटले तर राहिले. नुसतेच जाऊन, डोळाभर पाहून यावे. अनुभवून यावे. साऱ्यांनाच भेटून आलो. माझ्याकडे सांगण्यासारखे काय होते त्यांना? त्यांनी आपल्याला पाहावे यापरता दुजा हेतू नव्हताच. बेलूर तर ३६५ दिवस मनात उगवलेले असतेच. कधीतरी केलेला आठ दिवसांचा मुक्काम जन्मभर पुरेल असाच. जणू त्यासाठीच जन्म. ती भेट पुरणारी असली तरीही, ओढही सरणारी नाही. यावेळी मात्र थोडक्यावर समाधान मानावे लागले. कोलकाता `वाढता वाढता वाढे’ असे असल्याने कधी तरी जाणाऱ्याची अंतर, वेळ चुकणार म्हणजे चुकणार. त्यामुळे पोहोचलो उशिरा. उशिरा म्हणजे सांजारती सुरु होता होता. भास्कर अस्ताचलास टेकण्याच्या वेळी यमनाचे सूर उमटतात- `खंडन भवबंधन जगवंदन वंदी तोमाय... निरंजन नररूपधर निर्गुण गुणमय...’ बेलूर रस्त्यावरील प्रवेशद्वारातच दुरून येणारे स्वर कानी पडतात. झपझप पावले उचलत ठाकूर मंदिरात पोहोचतो. एक एक पायरी चढताना निरंजन यमन कवेत घेतो सारं काही. हे खेव देणंही असं, की सारं काही आहे जिथल्या तिथेच. काहीही लोपत नाही. फक्त जे सारं काही आहे ते निरालंब आहे. कोणत्याही आलंबनाशिवाय. निरालंब सुख, निरालंब दु:ख, निरालंब आनंद, निरालंब वेदना, निरालंब प्रेम, निरालंब संयोग, निरालंब वियोग, निरालंब विश्व, निरालंब ईश, निरालंब शून्यत्व, निरालंब अस्तित्व, निरालंब आसू, निरालंब हसू... जे काही आहे ते शुद्ध आहे, पूर्ण आहे... पूर्णात् पूर्णमिदम... आरती आटोपली. त्या विशाल सभामंडपातील लोक हळूहळू पांगले. सागरात लय पावून उन्मुक्त होण्यासाठी वेगाने निघालेल्या भागिरथीच्या विशाल प्रवाहावरून उजव्या बाजूने आलेली वाऱ्याची झुळूक हळूच कानाशी आली अन म्हणाली- `उठ आता.’ उठलो. पुढे जाऊन त्या निरंजनाच्या अगदी पुढ्यात उभा राहिलो. बोलणे, सांगणे काही नव्हतेच. दोघांनीही एकमेकांना पाहिले. डोळा भरून. माथा टेकवला अन उजवीकडील पायऱ्या उतरलो. मन एकदम भूतकाळात गेले. एकदा कधीतरी सहज उत्सुकता म्हणून येथे आलो होतो. याच पायऱ्यांजवळ उभा होतो. अचानक एक जण जवळ आला. मला न येणाऱ्या बंगालीत काही तरी बोलला. मी फक्त त्याच्या तोंडाकडे पाहिले. मग त्यानेच विचारले होते- `कहां से आए हो?’ तेव्हा उत्तर दिले होते- `नागपूर से.’ त्यावर काहीही न बोलता त्याने आत जाण्यास सांगितले होते. काय होते आत? दुपारच्या भोजनप्रसादाची पंगत. या पलीकडे दिसणाऱ्या भागिरथीच्या प्रवाहात पाय सोडून बसलेली आईच तिथे वाढत होती. तिनेच बोलावून घेतले होते, त्या भर दुपारच्या भुकेल्या वेळी. उत्सुकता म्हणून आलो होतो, तिने काहीही न विचारता पोटाशी धरून प्रेमाने जेऊ घातले होते. अन मग तिचाच होऊन गेलो. नंतरच्या खेपेस, त्या पलीकडच्या आंब्याखाली उभा असताना तिनेच हाती मधुर आंबा घातला होता. असंच काहीबाही घोळवत आवारात फिरू लागलो. अलीकडे सूर्यास्तानंतर नदीकाठावर जाण्यास बंदी केलेली आहे. काही अनुचित घटना घडल्या होत्या त्यामुळे. त्यामुळे नदी काठावरील स्वामी विवेकानंद यांचे समाधी मंदिर, सारदा मांचे मंदिर, अन मिशनचे पहिले अध्यक्ष स्वामी ब्रम्हानंद यांचे मंदिर बंद होते. तेथील गार्ड हे सांगत होता तेवढ्यात एक संन्यासी कोणाशी तरी मराठीत बोलताना कानी पडले. म्हणून त्यांच्याजवळ गेलो. ओळख दिली. थोडावेळ बोललो. मग त्यांना विचारले- मराठी बोलताय तेव्हा कोण कुठले? पण त्यांनी सांगितले नाही. म्हणाले- ते खूप मागे पडलेय. आता आठवतही नाही. पुन्हा ठाकूर मंदिरात आलो. थोडा वेळ निवांत बसलो. परतण्यासाठी पायऱ्या उतरू लागलो. चार पायऱ्या उतरलो असेन आणि आठवलं- आपल्या थंगड्याने ठाकुरांना नमस्कार सांगितला आहे. उतरलेल्या पायऱ्या पुन्हा चढलो. माथा टेकवला. म्हटलं- हा प्रणाम थंगड्याचा. अन बेलूरचा निरोप घेतला.
कोलकाताच्या माणिकतला भागातील स्वामी विवेकानंद यांचे जन्मस्थान, निवासस्थान आता उत्तम रीतीने बांधले आहे. जसे त्यावेळी होते तसेच. सोबतच शेजारची घरे विकत घेऊन थोडा व्याप वाढवला आहे. शिवाय तिथे संग्रहालय आणि विवेकानंद कल्चरल सेंटर सुरु करण्यात आले आहे. बेलूरला उशिरा पोहोचलो होतो. येथे लवकर पोहोचलो. भेट देणाऱ्यांसाठी दुपारी १२ वाजता स्वामीजींचे घर बंद होते. दुपारी दोन वाजता पुन्हा उघडते. पोहोचलो तेव्हा नेमके सव्वाबारा झालेले. आता काय करायचे? तेथील विवेकानंद कल्चरल सेंटरमध्ये गेलो. तिथे भाषा, कला व अन्य काही वर्ग; संशोधन इत्यादी चालते. मी गेलो तेव्हा स्वागत कक्षात एक दोघे बसलेले होते. मीच जाऊन औपचारिक चौकशी केली. शेजारी एका कक्षात रामकृष्ण मिशनचे एक संन्यासी काही काम करत बसले होते. तिथे गेलो. त्यांना म्हटले- नागपूरहून आलो आहे. मी आलो तर स्वामीजींचे घर, संग्रहालय बंद झाले आहे. आपल्या या स्वागत कक्षात बसू का घर उघडेपर्यंत? इथलेच एखादे पुस्तक वाचत बसेन. त्यांनी काहीही आढेवेढे न घेता अनुमती दिली. तिथे ठेवलेल्या पुस्तकातील एक पुस्तक घेतले. स्वामीजींची मातृभक्ती या विषयावरील एका भाषणाची ती पुस्तिका होती. तिथल्या सोफ्यावर मी वाचत बसलो. १०-१५ मिनिटांनी ते संन्यासी भोजनावकाशासाठी बाहेर पडले. त्यांनी पाहिले मी पंखा न लावताच बसलो आहे. त्यांनी स्वागतिकेतील एका व्यक्तीला बोलावले. त्याला सांगितले त्यांना पंखा लावून दे, पाणी दे आणि घर उघडले की सांग. त्याने पंखा लावून दिला. पाणी दिले. अन दोन वाजता सूचनाही दिली. उरलेली दोन पाने संपवून मी घर आणि संग्रहालय पाहायला गेलो. अगदी पहिल्यांदा आलो तेव्हा हे घर एक पडके घर होते. कोणी राहत नव्हते. मेंटेनन्स नव्हता. होता फक्त एक रखवालदार. त्यानेच कुलूप उघडून घर फिरवून आणले होते. त्यानंतर आलो होतो तेव्हा मिशनने नुकताच ताबा घेऊन कामाला अगदी सुरुवात केली होती. याखेपेस घर पूर्ण झालेले होते. एकएक दालन पाहत होतो. तिथे ठेवलेले सामान पाहात होतो. स्वामीजींची चरित्रकथा डोळ्यांपुढून सरकत होती. एकएक प्रसंग आठवत होता. मनात उजळणी होत होती. हां इथून स्वामीजींनी भिकाऱ्याला आपले सगळे कपडे देऊन टाकले होते, या दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतून उडी मारून खालच्या रस्त्यावर घोडागाडीखाली येणाऱ्या एका बालकाचा जीव त्यांनी वाचवला होता, इथेच त्यांच्या डोक्यावर नाग पाहून त्यांच्या मित्रांनी पळ काढला होता, हेच स्वामीजी फिरवीत ते मुद्गल, याच अशिलांच्या खोलीत त्यांनी वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळे हुक्के ओढून पाहिले होते काय फरक असतो म्हणून, हा स्वामीजींचा तंबोरा... असे करत करत जीवाचा आनंद सुरु होता. ज्या वीरेश्वर महादेवाच्या भक्तीने नरेंद्र जन्माला आला अशी त्याच्या जन्मदात्रीची श्रद्धा होती, त्या वीरेश्वर महादेवाची पिंड एका दालनात प्रतिष्ठापित करण्यात आली आहे. वीरेश्वराच्या त्या मंदिरात तास दीड तास बसलो. मनात विचार आला- या वीरेश्वराच्या कृपेनेच नरेंद्र खऱ्या अर्थाने वीर झाला होता. सगळ्यांवर अशीच कृपा होवो आणि समस्त मानवप्राणी वीर होवो. या ठिकाणी एक छोटासा प्रार्थना हॉल आहे. आजूबाजूला स्वामीजींचे कुटुंबीय, काका, भाऊ यांच्या खोल्या आहेत. स्वामीजींचे एक भाऊ भूपेंद्रनाथ दत्त हे क्रांतिकारक होते. एवढेच नव्हे तर कम्युनिस्ट विचारधारेचेही त्यांना आकर्षण होते. त्यांनी कम्युनिस्ट कार्यकर्ता म्हणून कामही केले होते. अन रशियाला जाऊन ते लेनिनला भेटूनही आले होते. शेतकरी, शेतमजुरांसाठी तुम्ही काम करा असे लेनिनने त्यांना सांगितले होते. त्यांच्या कक्षात त्यांच्या तसबिरीसह ही माहिती तर आहेच, पण लेनिनचा फोटोदेखील आहे. मला हे लक्षणीय आणि महत्वाचे वाटते. हाच भारताचा भाव आणि स्वभाव आहे.
- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, ११ जून २०१८

बंगदेशी २


कोलकात्याच्या मेट्रो प्रवासाचा एक धडा `जतीन पार्क’ स्थानकावर परतल्यावर मिळाला. आपण मेट्रो प्रवासाचे टोकन घेतो आणि फलाटावर जातो त्यावेळी ते टोकन आत जाण्याच्या मार्गावर असलेल्या खोक्यावर टेकवावे लागते. त्याशिवाय त्या स्वयंचलित व्यवस्थेतून आत जाताच येत नाही. तुम्ही टोकन खोक्यावर टेकवले की मधला अडथळा दूर होतो आणि आत जाण्याचा मार्ग मोकळा होतो. प्रवास संपवून स्थानकाच्या बाहेर पडताना त्या प्रवासाचे टोकन बाहेर पडण्याच्या मार्गावरील खोक्यात टाकायचे म्हणजे अडथळा दूर होतो आणि मार्ग मोकळा होऊन बाहेर येता येते. जाताना तर व्यवस्थित गेलो, पण जतीन पार्कला परतल्यावर मी टोकन खोक्यात टाकले तरीही मार्ग काही खुला होत नव्हता. तीन चारदा असे झाल्यावर एक माणूस लगेच जवळ आला. त्याचा पहिलाच प्रश्न होता - `कहां घूम रहे थे इतनी देर?’ गडबड अशी झाली होती की, जाताना घेतलेले टोकन श्यामबाजार स्थानकावर मी खोक्यात टाकलेच नाही. कारण ती पद्धतच परिचयाची नव्हती. तरीही बाहेर कसा पडलो कोणास ठाऊक. कदाचित गर्दीत समोरच्या व्यक्तीच्या पाठोपाठ बाहेर निघून गेलो असेन किंवा काही तांत्रिक कारण किंवा आणखीन काही. नेमके नाही सांगता येणार. मात्र बाहेर पडलो एवढे खरे. त्यामुळेच परत येताना जवळ दोन टोकन होते. एक जातानाच्या प्रवासाचे अन एक येतानाच्या प्रवासाचे. मी जे टोकन खोक्यात टाकत होतो ते जातानाच्या प्रवासाचे होते त्यामुळे स्वयंचलित यंत्रणा ते स्वीकारित नव्हती, फेटाळून लावत होती. तो माणूस जवळ येऊन जेव्हा विचारू लागला - `आतापर्यंत कुठे फिरत होता?’ तेव्हा त्याचे लक्ष माझ्या हातातील दुसऱ्या टोकनकडे गेले. मला नाही पण त्याला गडबड लक्षात आली. तो म्हणाला - `ते टोकन टाका.’ मी दुसरे टोकन टाकले आणि मार्ग खुला झाला. तेव्हा कुठे सगळी रचना स्पष्ट झाली. मी फुकट प्रवास केलेला नाही याची त्या माणसाला खात्री झाली आणि मला समाधान !! मग दोन मिनिटे त्या व्यक्तीशीही बोललो. लोकांनी मेट्रोचा गैरवापर करू नये, छान वातानुकुलीत वातावरणात फिरून येणे, टाईमपास करणे वा अन्य गैरप्रकार टाळण्यासाठी ही व्यवस्था. विशिष्ट वेळेपर्यंतच ते परत स्वीकारले जाते. अन्यथा ती स्वयंचलित व्यवस्था ते नाकारते आणि तुम्ही पकडले जाता. त्यामुळे कोणीही अवैधपणे प्रवास करू शकत नाही.
कोलकाता ज्या देवीसाठी प्रसिद्ध आहे किंवा ज्या देवीमुळे कोलकाता ओळखले जाते, ती काली कलकत्तेवाली म्हणजे कालीघाटावरील मां काली. येथे मात्र दक्षिणेश्वरच्या एकदम विरुद्ध. देवाचा बाजार, भक्तीचा बाजार, पंडे आणि पंच मकराची तंत्रसाधना. अर्थात हे तांत्रिक प्रकार मंगळवार, शनिवार, अमावास्या या दिवशीच. परंतु पंडे वगैरे दररोज. मी देवळानजीक गेलो तर एक खेटलाच. तो खेटला तर मीही खेकसलो. तो कालीचा पंडा असेल तर मीही कालीचा भक्त होतोच ना? त्याला कशाची भीती आणि क्षिती नव्हती तर मला तर कशाचीच भीती अन क्षिती नव्हती. त्याला टिपेच्या स्वरातच सांगितले- मला कोणतीही पूजाबिजा करायची नाही. फक्त दर्शन करायचे. हात जोडायचे अन निघायचे आहे. मग तो बाजूला झाला अन अजीजीने म्हणाला- `फुल तो लीजिये चढाने के लिए.’ त्याला हरकत असण्याचे कारण नव्हतेच. कोणत्या तरी फुलवाल्याकडून टोपली घ्यायची तर त्याचे कमिशन असलेल्या फुलवाल्याकडून घेऊ. त्याने काही बिघडत नाही. टोपली घेतली. त्यानेच ती धरली. आवारात गेलो. त्याच्याकडे टोपली मागितली तेव्हा म्हणाला- `बहुत देर लगेगी. लाईन देख रहे है ना? दो घंटे तो लगना ही है.’ मनातल्या मनात हसलो. म्हटले - `माई, मीही थोडंबहुत जग पाहिलं आहे हे तुझ्या या पंड्याला सांगितलं नाहीस का?’ अन प्रकटपणे त्याला सांगितलं- `मुझे पैसे देकर कोई भी स्पेशल दर्शन वगैरे नही करना. जितना समय लगेगा लगने दो. बहुत ही ज्यादा देर होगी तो बाहर से ही प्रणाम करके निकल जाउंगा. मां मेरे मन मे बसती है.’ पण तो सामान्य माणूस नव्हता, पंडा होता. आपल्याला पटो न पटो, आवडो न आवडो; त्याच्या बिचाऱ्याचा पोटाचा प्रश्न होता. माझ्या उत्तरावर तो घोटाळला पण दोन पावले चालल्यावर पुन्हा तेच - `समय बहुत लगेगा. देर होगी.’ ४-५ वेळा असा दोन दोन पावलांचा प्रवास झाला. अखेर त्याला म्हटले - `आप ही चढा देना फुल. मै चला. हो गया मेरा दर्शन.’ अखेरीस त्याने टोपली माझ्या हाती दिली आणि माघार घेऊन परतला. रांगेत लागलो. त्याने म्हटल्याप्रमाणे दोन तास लागले नाहीत. पंधरा मिनिटात दर्शन, प्रणाम करून बाहेर. सारदा मां भक्तांना नेहमी सांगत असत- `ती जगन्माता सत आणि असत, विद्या आणि अविद्या, चांगले आणि वाईट; अशा साऱ्याचीच आई आहे.’ प्रणाम करताना हेच मनात घोळत होते.
कोलकाता... अवाढव्य पसरलेले महानगर. कधीकाळी भारताची राजधानी असलेले. साधारण दोन कोटीपर्यंत लोकसंख्या पोहोचलेली. कसे आहे हे ऐतिहासिक शहर? बंगाली लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या `मुडी’सारखे. मुडी म्हणजे मुरमुरे. बंगाली माणसाने दिवसातून एकदातरी मुडी खाल्लीच पाहिजे. अन मुरमुरे कशासोबत खायचे? कशाहीसोबत. मिठाईपासून पाण्यापर्यंत काहीही चालतं मुडीसोबत. अन त्याचा `कच्चा चिवडा’ केला की ती होते `झालमुडी.’ कोलकाता या झालमुडीसारखं आहे. खूप साऱ्या गोष्टी मिसळलेलं. या शहरातले रस्ते मोठे आहेत. बहुतेक सगळीकडे पदपथ आहेत. अन क्वचित अपवाद वगळले तर कोलकात्याचा माणूस पदपथाचाच वापर करतो. याचा अर्थ पदपथ खूप छान, देखणे, स्वच्छ, नीटनेटके असतातच असे नाही. एखादं तरी बिऱ्हाड थाटलेलं नाही किंवा एखादं तरी दुकान नाही असा पदपथ सापडणे कठीण. परंतु कोलकात्याचा माणूस या दुकानातून किंवा बिऱ्हाडातून मार्ग काढतो पण वापरतो पदपथच. एखादी खानावळ आहे. लोक जेवत आहेत आणि जाणारे त्यांच्या मधून जात आहेत हे सहज पाहायला मिळेल. आपल्याला कचऱ्यातूनच चालावे लागेल असे नाही, पण मधेमधे त्यातूनही मार्ग काढावा लागेलच. पदपथावर पाण्याचा नळ धोधो वाहतो आहे, त्यात कोणी गाडी धुतो आहे, कोणी आंघोळ करतो आहे, कोणी कपडे धुतो आहे; यात कोणीही आश्चर्य वाटून घेत नाहीत. अन नळाची धार आपल्या घरच्या नळाच्या धारेपेक्षा दहापट तरी मोठी. अगदी मॉड मुलीदेखील नाकातोंडाला रुमाल वगैरे न लावता सहजपणे या पदपथांवरून जात असतात.
नवीन नवीन भागांमध्ये मात्र हे चित्र बदलते आहे. परंतु कोलकाता अजूनही जुन्या काळातच असल्यासारखे आहे. मुंबईसारखे राजकीय, आर्थिक, विदेश व्यवहार, मनोरंजन, उद्योग, गुन्हेगारी असे बहुविध पैलू कोलकात्याला नाहीत. हे फक्त वाढते आहे पण त्यामुळे त्याला फार बदलावे लागते असे नाही. दोन कोटीपर्यंत लोकसंख्या पोहोचली तरी हजार- पाच हजार लोकसंख्येच्या गावातल्यासारखी दुकाने तेथे पाहायला मिळतील. अन लोक अशा दुकानातून खरेदीही करीत असतात. अंतरामुळे जाण्यायेण्याला वेळ लागतो हे खरे असले तरी, येथील माणूस घाईत नसतो. माणसे उगाच धावताहेत असे दिसत नाही. एवढी लोकसंख्या असूनही गर्दी अशी नसते. धक्काबुक्की नसते. तुम्ही गर्दीने लोटले जात नाही. चालणे किंवा उभे राहणे तुम्ही तुमच्या मर्जीने करू शकता. शेअरिंग ऑटोरिक्षा, चार-पाच बससेवा, taxis, मेट्रो, स्वत:चे वाहन असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मेट्रो विशिष्ट मार्गावरच उपयोगाची. शेअरिंग ऑटोरिक्षा ठराविक मार्गांवर, विशिष्ट भागापुरतेच चालतात. बस आणि taxi मात्र सहज आणि कुठूनही कुठेही जातात. अजूनही ९० टक्के taxis काळ्यापिवळ्या ambassador गाड्याच. आता आता पांढऱ्या-निळ्या वेगळ्या मॉडेलच्या गाड्या आल्या आहेत. पण त्या फार थोड्या. संख्येने थोड्या असल्या तरीही नवीनपणामुळे आपला दर्जा वरचा आहे असा गंड त्यांच्यात आहे. वागणे, पैसे, लुटारूवृत्ती यातून हा गंड अनुभवास येतो. ट्रामचे रूळ अजूनही बघायला मिळतात. ट्राम मात्र बहुतेक बंद झाल्या आहेत. यापूर्वी ट्राम प्रवासाचा अनुभव घेतल्याने त्याची रुखरुख वाटली नाही.
अन्य महानगरांप्रमाणे दमट हवामान आणि त्यामुळे भरपूर घाम हे कोलकात्याचेही वैशिष्ट्य. फरक हा की कितीही वेळा आंघोळ करण्यासाठी पाणी मात्र उपलब्ध. पाण्याची कमतरता नाही. बंगाल सुजलाम आहेच. अन सुफलाम सुद्धा. फळे आणि फुले भरपूर. शिवाय विविध प्रकारची. ताजी अन रसरशीत. झाडे वगैरे बऱ्यापैकी. अगदीच रखरखीत नाही. जा-ये करणे अन्य महानगरांच्या तुलनेत स्वस्त आहे तसेच खाणेही अन्यत्रच्या तुलनेत स्वस्त. गोड तर बंगाल्यांच्या आवडीचे. अगदी पाच-दहा रुपयाची मिठाई घेऊन, खाऊन पुन्हा कामाला लागणे हे सहज पाहायला मिळणारे. छोटी वा मोठी दुकाने. अन मारुती van वा तत्सम छोट्या गाड्या मिठाई विकताना पाहायला मिळतात. तिथेच खाण्यासाठी स्थानिक माणसाने मिठाई घेतली तर त्याला पारंपरिक पानाच्या द्रोणात मिठाई मिळणार अन गिऱ्हाईक स्थानिक नसेल तर थर्माकोल अथवा अन्य पदार्थाच्या आधुनिक द्रोणात मिठाई मिळेल. पोहे वगैरे नाही मिळणार. दक्षिणी पदार्थही कमीच. समोसे मात्र भरपूर खातात. त्यांना समोसे मात्र म्हणायचे नाही. त्यांना म्हणायचे शिंगाडे. पुरीभाजी म्हणजे लुची. पत्ता, रस्ता वगैरे सांगायला सगळे बहुतेक तयारच असतात. कोणी कुरकुर करत नाहीत. जागोजागी पोलीस भरपूर असतात. तेही मदत करतात. अन फसवणूक हा माणसाचा गुण असला तरीही त्याचे प्रमाण कमी. रात्री बेरात्री भीती फारशी नाही. हां राजकीय गुन्हेगारी हा मात्र स्वतंत्र विषय.
मोठाल्या हवेल्या अजूनही सगळीकडे पाहायला मिळतात. सदनिका आहेतच पण महानगराच्या मानाने कमी. कोलकाता अजूनही मोठ्या प्रमाणात स्वतंत्र घरांमध्ये राहते. पारंपरिक बंगाली पेहेरावातील स्त्री पुरुष मात्र आता शोधावेच लागतात. पूजा वगैरेच्या निमित्तानेच ते पाहायला मिळतात. छोट्या मोठ्या कामांच्या आणि व्यवसायाच्या निमित्ताने बिहारी लोक कोलकात्यात आलेले मोठ्या प्रमाणात सापडतात. बंगाली हीच मूळ आणि प्रधान भाषा. परंतु हिंदीला विरोध वा आकस नाही. समजलीही मोठ्या प्रमाणावर जाते.
- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, ४ जून २०१८

शब्दांच्या पलीकडले


७ जून २०१८. देशाच्या इतिहासातील एक नोंद घेण्यासारखा दिवस. भविष्यावर लांब सावली पडेल असा दिवस. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे नेते, माजी राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ शिक्षा वर्गाच्या तृतीय वर्षाच्या समारोप समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वास्तविक सरदार वल्लभभाई पटेल यांचे बंधू व कॉंग्रेसचे तत्कालीन नेते विठ्ठलभाई पटेल यांच्यासह गांधीजी, नेताजी यांच्यापासून अनेक लहानमोठे काँग्रेस नेते संघाच्या कार्यक्रमात येऊन गेलेले. पण १९४७ साली देशाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून संघ आणि काँग्रेस यांच्यात कॉंग्रेसनेच जो दुरावा निर्माण केला होता त्या पार्श्वभूमीवर हा बदल लक्षणीय ठरतो. दुसरे म्हणजे, कॉंग्रेसने निर्माण केलेल्या दुराव्याचा उपयोग करून घेत; हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदुत्वविरोधी असे जे समाजाचे वैचारिक विभाजन आणि ध्रुवीकरण कम्युनिस्ट लोकांनी प्रयत्नपूर्वक घडवले; त्यालाही मिळालेली ही चपराक होती.
डॉ. प्रणव मुखर्जी तीन दिवस नागपुरात होते. त्यांचे कार्यक्रम, त्यांच्या भेटीगाठी, त्यांची देहबोली, त्यांचे खाणेपिणे, त्यांची वेशभूषा; इत्यादी गोष्टी हा त्यांच्या व्यवहाराचा शब्द होत्या. या व्यवहाराच्या शब्दांचा वाच्यार्थ, लक्षणार्थ आणि भावार्थ यांची चर्चाही यानिमित्ताने भरपूर झाली. प्रत्येकाने आपापल्या परीने त्यात भाग घेतला वा त्यातून काही तरी ग्रहण केले. त्यांच्या या व्यावहारिक शब्दांबरोबरच समारोप समारंभात प्रत्यक्षपणे त्यांनी स्वत:च्या विचारांनाही शब्दरूप दिले. त्यांच्या व्यावहारिक शब्दांची जेवढी चर्चा झाली तेवढी त्यांच्या विचारशब्दांची मात्र झाली नाही. त्यांच्या भाषणात संघाबद्दल एकही शब्द नव्हता. अन विषयाच्या दृष्टीने सरसंघचालक आणि डॉ. मुखर्जी यांच्या भाषणात फारसा भेद नव्हता. मुळीच नव्हता म्हटले तरीही चालेल. पण खरेच त्याचा एवढाच अर्थ आहे का?
भाषेच्या संदर्भात letter and spirit असा शब्दप्रयोग केला जातो. शब्द आणि त्याचा भावार्थ. त्यालाच reading between the lines असेही म्हटले जाते. डॉ. मुखर्जी यांच्या प्रकट भाषणाचा हा भावार्थ आणि लक्षणार्थ फार मोठा आहे. विरोधी विचाराच्या लोकांनी एकत्र येणे, विचारांची देवाणघेवाण करणे, सद्भावांचा सेतू बांधणे याच्या पलीकडेही ते भाषण काही सांगून जाते. मुळात त्यांचे भाषण पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत हा शब्दांपलीकडील आशय सांगणारेच होते. १) भारत हे एक राष्ट्र नाहीच, २) भारतीय राष्ट्र १९४७ रोजी जन्माला आले, ३) भारतीय समाज हा सुव्यवस्थित समाज नव्हताच, ४) भारतीय समाजाचे या जगात काही योगदान नाही, ५) माणसाचा, समाजाचा, जीवनाचा विचार हा भारताबाहेरील जगाचीच मक्तेदारी आहे, ६) भारताला इतिहास, संस्कृती आदी काही नाही, ७) भारताने संस्कृतीचा जुना धागा तोडून टाकला आहे किंवा तोडून टाकायला हवा, ८) राष्ट्रवाद ही संकुचित आणि भयानक गोष्ट आहे, ९) राष्ट्र म्हणजे राज्य, १०) सगळ्यांच्या कल्याणासाठी विविधता संपुष्टात आणायला हवी; अशा ज्या बाबी आपल्या आणि जगाच्या मनीमानसी गेल्या सुमारे २०० वर्षात रुजवण्यात आल्या आहेत; त्या सगळ्यांना डॉ. मुखर्जी यांनी आपल्या छोट्याशा भाषणाने वाऱ्यावर उधळून लावले आहे. कम्युनिस्ट, समाजवादी, साम्राज्यवादी ब्रिटीश, स्वार्थांध विश्व आणि भाजपेतर सत्तांध भारतीय राजनीती, तसेच या सगळ्यांनी पोसलेले देशी वा विदेशी विचारविश्व; या सगळ्यांना दिलेले हे एक सणसणीत उत्तर होते. डॉ. मुखर्जी जे बोलले हे सारेच संघ, संघप्रणीत संस्था; एवढेच नव्हे तर महर्षी दयानंद, स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. राधाकृष्णन असे अनेकानेक लोक गेली अनेक दशके बोलत आहेत. काँग्रेसमध्येही अशा लोकांचा एक प्रवाह होताच. परंतु या सगळ्यांना सुव्यवस्थित रीतीने, नियोजित पद्धतीने बाजूला करून; शिक्षण, प्रसार माध्यमे, सामाजिक चर्चा, साहित्य, चित्रपट, नाटके या साऱ्यातून अधिकृत वा अनौपचारिक रीतीने अभारतीय विचार आणि भारताविषयी चुकीच्या आणि नकारात्मक, अभावात्मक गोष्टी मुख्य प्रवाहाच्या रुपात प्रवाहित आणि प्रचारित करण्यात आल्या. रा. स्व. संघ आपल्या शक्तीने आणि पद्धतीने त्याचा मुकाबला करीत होता. परंतु संघाचा विरोध करणारे, देशाचे सर्वोच्च पद भूषविणारे डॉ. मुखर्जी जेव्हा, हेतूपुरस्सर डावलले जाणारे सत्य उचलून धरतात, ठामपणे त्याचे प्रतिपादन करतात तेव्हा तो विचार, ते सत्य मुख्य प्रवाह होण्याची वाट चालू लागते. डॉ. मुखर्जी सत्य बोलले, संघ जे बोलत होता तेच बोलले हे महत्वाचे नाही; ते सत्य डॉ. मुखर्जी बोलले हे महत्वाचे आहे. म्हणून त्याला ऐतिहासिक महत्व आहे.
आमची लोकशाही परंपरा `लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य’ येथून सुरु झालेली नसून हजारो वर्षांची प्राचीन परंपरा आहे, असे डॉ. मुखर्जी म्हणतात तेव्हा ते लोकशाहीचा स्वभाव आणि संसदीय लोकशाहीपेक्षाही अधिक व्यापक असा आशय आपल्यासमोर ठेवतात. आज लोकशाही म्हटल्याबरोबर संसद, विधिमंडळ, निवडणुका, पक्षोपपक्ष, संघर्ष हेच चित्र बहुसंख्य जनता पाहू शकते. हे बाजूला सारून लोकशाही समजून घेणे, सहमती वा सर्वसहमती ही सुद्धा लोकशाही असू शकते या भावनेचा अभाव, लोकशाहीसाठी गटतट असलेच पाहिजेत असे नाही, गटतट असेल तरच ती लोकशाही असे नसते; या साऱ्याचा विचार आज कोणी करीत नाही अन कोणी केला तर त्याला लोकशाहीविरोधी ठरवायलाही आम्ही कमी करत नाही. रा. स्व. संघात लोकशाही नाही हा आरोप आपल्या या संकुचित दृष्टीमुळेच होत असतो. मात्र डॉ. मुखर्जी यांनी ज्या प्राचीन भारतीय लोकशाहीचा उल्लेख केला त्याचा आशय नीट समजून घेतला तर, आज लोकशाहीच्या नावावर जो बुजबुजाट आणि संघर्ष पाहायला मिळतात ते कमी होऊ शकतील.
आत्मनिषेधाच्या समाजव्यापी भावनेलाही त्यांनी आपल्या भाषणातून खडसावले. नालंदा, तक्षशीला विद्यापीठांनी तत्कालीन जगाचे पोषण केले किंवा आधुनिक शासन-प्रशासन विचारांचा पाया घातला जाण्याच्या हजारो वर्षे पूर्वीच भारतात सुविकसित शासन-प्रशासन पद्धती प्रचलित होती; याकडे डॉ. मुखर्जी यांनी आपल्या भाषणात लक्ष वेधले तेव्हा; भारत वा भारतीय समाज याविषयी विलक्षण न्यूनगंड आणि आत्मनकाराची भावना त्यांनी खोडून काढली. नालंदा तक्षशीला यासारखी विद्यापीठे गंमत गंमत म्हणून उभी होत नाहीत. त्यामागे परिश्रम आणि साधना असते. ज्ञानाची, कौशल्याची उपासना असते. अन हे सारे रिकाम्या पोटी होऊ शकत नाही. पोट रिकामे राहू नये यासाठी उद्योग, व्यापार, शेती हे लागते. उद्योग, व्यापार, शेती, नगरांची उभारणी आणि व्यवस्था, इमारती आणि जीवनाच्या असंख्य गोष्टी चालण्यासाठी कौशल्य, तंत्रज्ञान, विज्ञान, संशोधन हेही लागते. आम्ही जगाचे पोषण करत होतो याचा अर्थ हे सारे आमच्याकडे होते अन ते जगाच्या कल्याणार्थ वापरण्याची दृष्टी आणि दानतही होती. आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञान, समाजविज्ञान, राज्यशास्त्र, राज्यतंत्र, तत्वज्ञान यांची भाषा आणि अवकाश वेगळा असेल; पण याचा अर्थ आम्ही काही विचारच केला नव्हता वा आमचे काही चांगले जीवनच नव्हते, असा होत नाही. समाजात व्याप्त असलेल्या या भावनेचा राजकारणाशी फारसा संबंध नाही. ती घातक मात्र आहे. ही आत्मनकाराची भावना चुकीची आहे, म्हणून ती टाकून द्यायला हवी हा त्यांचा मथितार्थ आहे. संसदेच्या सहाव्या क्रमांकाच्या प्रवेशद्वारावरील चाणक्याच्या श्लोकाचा उल्लेख करून त्यांनी सांगितले की, आम्ही आजही जुन्या भारताशी नाळ जोडून ठेवलेली आहे. भगिनी निवेदितांनी सांगितलेल्या from the past, by the present, for the future या सुत्रालाच मुखर्जींनी अधोरेखित केले. राज्यघटनेतील चित्रे लपवणे किंवा त्यांना हेतूपुरस्सर विरोध करणे अयोग्य असल्याचा संदेशच जणू त्यांनी दिला.
या सगळ्यापेक्षाही अधिक मूलभूत होते त्यांनी केलेले राष्ट्र आणि राष्ट्रीयतेचे विवेचन. `विविधतेत एकता’ या सर्वपरिचित सूत्राचा उल्लेख त्यांनी केला. सगळेच जण सर्वदा `विविधतेत एकता’ हे बोलत असतात. अन दुसऱ्याच क्षणी म्हणतात- कोणी हिंदू नाही, कोणी मुस्लिम नाही, कोणी ख्रिश्चन नाही, काही जातीपाती नाहीत, कोणी मराठी नाही, कोणी मद्रासी नाही, कोणी बंगाली नाही, कोणी हिंदी नाही; इत्यादी. आपण ज्या तत्वाचा उच्चार करतो, त्याला किती हास्यास्पद ठरवतो आहोत हेही आपल्याला लक्षात येत नाही. आपण म्हणतो `विविधतेत एकता’ अन अर्थ करतो- विविधताशून्य एकता. एकतेच्या प्रयत्नांना यश का येत नाही, एकतेची भावना बळ का घेत नाही याचे हे कारण आहे. स्वामी विवेकानंद यांना एकदा अमेरिकेत असे विचारण्यात आले की, हिंदू धर्माची एवढी महती आपण सांगता मग आम्ही हिंदू व्हावे असे आपण सांगाल काय? त्यावर स्वामीजी म्हणाले- `नाही. मी म्हणेन, तुम्ही अधिक चांगले ख्रिश्चन व्हा, अधिक चांगले मुस्लिम व्हा, तुम्ही जे काही आहात ते अधिक चांगले व्हा.’ एकता ही एक आंतरिक गोष्ट आहे. बाह्य एकता शक्यही नाही, आवश्यकही नाही आणि ती निर्माण केलीच तर ती आंतरिक विभेद निर्माण करून मूळ हेतूलाच तडा देते. `विविधतेत एकता’ म्हणताना, विविधता राहणारच आहे हे आम्ही विसरून जातो. याचा अर्थ लगेच चातुर्वर्ण्य, जातीव्यवस्था वगैरे वगैरे करण्याची गरज नाही. समाजव्यवस्था काय, भाषा काय, अन्य सामाजिक आर्थिक राजकीय रचना काय; भेद, वेगळेपण, विविधता, विभिन्नता राहणारच आहे. जातीव्यवस्थेत शोषण होते आणि संसदीय व्यवस्थेत ते नाही असे तर नाही. मानवी जीवनाचे स्वरूपच असे आहे. या विश्वाचे स्वरूपच असे आहे. त्याचे योग्य व्यवस्थापन करून सगळ्यांना कमीत कमी त्रास आणि अधिकाधिक सुख कसे मिळेल हा विचार महत्वाचा. त्यासाठी आंतरिक एकतेचा वेध घ्यावा लागतो. ही आंतरिक एकता आंतरिक जाणीवा, समजूतदारपणा यांचा स्तर वाढला की उत्पन्न होते. हे आंतरिक उन्नयन म्हणजेच आध्यात्म. मानवाची आंतरिक उन्नती हा आमच्या राष्ट्रभावनेचा पाया आहे. या आधारावरच आम्ही भाषा, प्रांत, जाती, पद्धती, परंपरा, उपासना, राज्ये, सत्ता यांची विपुलता असूनही एक भारत, एक समाज, एक राष्ट्र म्हणून उभे राहू शकलो, हजारो वर्षे जीवित राहू शकलो. माझिनीचा मानवतावादी राष्ट्रवाद, हिटलरचा एकाधिकारवादी राष्ट्रवाद, किपलिंगचा साम्राज्यवादी राष्ट्रवाद, रुझवेल्टचा यथार्थवादी राष्ट्रवाद, आर्थिकतावादी राष्ट्रवाद, प्रादेशिक राष्ट्रवाद, भाषिक राष्ट्रवाद, पांथिक राष्ट्रवाद, सत्तासापेक्ष राष्ट्रवाद; या साऱ्यापेक्षा भारतीय राष्ट्रविचार भिन्न आहे. जीवनप्रवाहातील आवश्यक अशी स्वाभाविक विविधता जपून आंतरिक एकत्वाचा, आंतरिक उन्नतीच्या आधारे शोध आणि बोध घेत भारतीय राष्ट्र विकसित होते.
मानवी सौख्यासाठी हक्क, अधिकार, संघर्ष, कर्तव्ये यापेक्षाही प्रत्येकाचा आंतरिक विकास यावर त्याचा भर आहे. कोणत्याही लहान वा मोठ्या अस्मितेचा बळी देऊन नव्हे तर त्यांना सामावून घेत वाटचाल करणारा हा विचार असल्याने; तो वैश्विकतेच्या विरोधातही नाही. राष्ट्रीय एकतेसाठी मुस्लिमांनी गणपतीपूजन केले किंवा न केले; किंवा हिंदूंनी ईद साजरी केली किंवा न केली; किंवा अमुक समाजाने तमुक समाजाच्या महापुरुषाची जयंती साजरी केली वा नाही हे महत्वाचे नाही. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने चालावे. परंतु दुसरा आपला शत्रू नाही हे लक्षात घ्यावे. दुसऱ्यावर स्वामित्व गाजवण्याची भावना योग्य नाही हे समजून घ्यावे. अन त्यानुसार व्यवहार असावा. याच व्यापक भावनेतून भूतकाळातील घटनांवर भूमिका घ्याव्या. याच व्यापक भावनेतून भविष्याची वाटचाल करावी. याच व्यापक भावनेतून स्वत:तील त्रुटी, कमतरता, लघुता यांना चिकटून न बसता त्या काढून टाकण्याचा प्रयत्न करावा. ही आहे भारतीय राष्ट्रकल्पना. `वसुधैव कुटुंबकम’ हे त्याचे लक्ष आहे. डॉ. प्रणव मुखर्जी यांनी आपल्या भाषणातून हेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्यांनी एकत्र यायला हवे, विचारांचे आदानप्रदान करायला हवे, हे तर खरेच. पण हे तरी कशासाठी? केवळ बौद्धिक विरंगुळा म्हणून का? याचे उत्तर - बौद्धिक विरंगुळा म्हणून नव्हे तर मानवाच्या सुखी, समाधानी जगण्यासाठी हे आहे. त्यासाठी केवळ एकत्र येणे आणि आदानप्रदान पुरेसे नाही. त्यापुढील एकत्र वाटचाल महत्वाची असते. ही एकत्र वाट चालायची असेल तर त्याला दिशा हवी, अन योग्य दिशेसाठी ठोस वैचारिक आधार हवा. ठोस वैचारिक आधार नसेल तर काही साध्य होऊ शकत नाही. १९६८ पासून आजतागायत किमान समान कार्यक्रमाची कितीतरी आवर्तने आपण अनुभवली आहेत. शिवाय विचारांच्या विविधतेचा आदर ही फक्त पहिली पायरी असते. आपापल्या विचारांना घट्ट चिकटून बसणे हा अट्टाहास असू शकतो, शहाणीव नाही. विचारांवर विचार म्हणून माया करणे हास्यास्पद असते. सत्यान्वेषण आणि विश्वकल्याण ही विचारांची दिशा हवी. म्हणूनच 'तुमच्या विचारांसाठी मी उभा राहीन' असे म्हणणारा Voltaire आदर्श होऊ शकत नाही, तर 'साऱ्या विश्वातून उच्च विचार आमच्याकडे येवोत' अशी कामना करणारे वेद हाच आदर्श होऊ शकतो. महात्मा गांधी याच वेदोक्त विचारांचे पाईक असल्याने स्वतःच्या विचारांचा फेरविचार करीत आणि आपले नंतरचे म्हणणे मान्य करावे असे म्हणत. मानवी वाटचालीत विविध विचारांनी एकत्र येऊन पुढील वाटचाल देखील करायला हवी. डॉ. मुखर्जी यांनी एकत्र येणे आणि पुढील वाटचालीचा वैचारिक आधार, या दोन्ही गोष्टींची पूर्ती केली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आजवर हेच विचार मांडत आला आहे. आपण याच विचारांचे वाहक आहोत हेच संघ सांगत आला आहे आणि परिस्थिती आणि शक्तीनुसार तसा व्यवहार करीत आलेला आहे. विविध समाजगटांमध्ये संवाद वा संघटनांचे काम असो, देशव्यापी सेवाकार्ये असोत किंवा डॉ. मुखर्जी यांना समारोप कार्यक्रमाला आमंत्रित करणे असो; संघाने आपला विचार आणि व्यवहार जगासमोर मांडला आहे. प्रश्न त्यांचा आहे ज्यांना डॉ. मुखर्जी यांचे म्हणणे तत्वत:सुद्धा मान्य नाही. तेच लोक संघ सोडून बाकी सगळ्यांच्या एकतेचा विचार करतात, तेच लोक अन्य उपासना पंथांच्या संदर्भात अनुदार असतात. आता पाळी त्यांची आहे. भारतीय राष्ट्राच्या व्यापक प्रकृतीचा वारसदार कोण हे येणारा काळच सांगेल.
- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, १७ जून २०१८