रविवार, २५ ऑक्टोबर, २०१५

वर्तमान, अपुऱ्या मानवतावादाचे परिणाम

`साहित्यिकांची नाराजी' प्रकरण अजून सुरूच आहे. त्यातील राजकारण, पुरस्कार वगैरे परत करणाऱ्या साहित्यिकांचे हेतू, त्यांच्या मनातील आपपरभाव इत्यादी बाबी थोडा वेळ बाजूला ठेवून विचार केला तरीही एक गोष्ट जाणवते की, त्यांच्या भूमिकेचा पूर्ण प्रामाणिकपणा मान्य करूनही त्यांची भूमिका चुकीची आहे. कारण आपल्या कृतीसाठी त्यांच्याकडून जी कारणे दिली जात आहेत, त्याची जी विश्लेषणे व स्पष्टीकरणे दिली जात आहेत त्यांच्यावरच प्रश्नचिन्ह लावले जाऊ शकेल. नव्हे ते तसे लावले जायला हवे. नाराज, निराश, राजीनामे देणारे साहित्यिक मानवतावादी आहेत. अन त्यांचं वैचारिक, भावनिक पोषण करणारा हा वर्तमान मानवतावाद मुळातच अपुरा, अर्धवट, चुकीचा आहे. त्याचा आधार, त्याची गृहितकं, त्याने जन्माला घातलेल्या कल्पना- संकल्पना, त्याने तयार केलेल्या मान्यता, त्याने रेखलेले चित्र; हे सारेच अपुरे व चुकीचे आहे.

सिग्मंड फ्रॉईडचे मानसशास्त्र हा त्याचा फार मोठा आधार आहे. एक तर मुळातच फ्रॉईडने त्याचे सगळे विचार, तर्क, सिद्धांत विकृत व्यक्तींच्या निरीक्षण, परीक्षणावरून काढलेले आहेत. त्यामुळेच ते एकांगी आहेत. त्याने केवळ जाणीवयुक्त बाह्य मन मान्य केले. नेणिवेतील अबोध मन फ्रॉईडला मान्यच नाही. त्यामुळेच तो माणसाची बहिर्मुखता फक्त मान्य करतो. केवळ बहिर्मुखता सत्य आहे अंतर्मुखता असत्य म्हणूनच त्याज्य आहे असे तो म्हणतो. शिवाय कामभावना या विश्वातील सगळ्या गोष्टींच्या मुळाशी असल्याचा त्याचा सिद्धांत किती तकलादू आहे हे वरवर विचार केला तरीही लक्षात येते. गेल्या वर्षी नेपाळमध्ये महाविनाशकारी भूकंप झाला. तेव्हा सगळ्या जगाने त्याला जो प्रतिसाद दिला त्याच्या मुळाशी कुठे कामभावना होती? अन अशा व्यक्तिगत अन सामूहिक घटना अपवादात्मक नसून नियमित घडत असतात. शिवाय कामभावना ही मूळ बाब मानली तरीही केवळ दोन शरीरांचे मिलन यापलीकडे फ्रॉईड जाऊ शकलेला नाही. अस्तित्वाच्या सूक्ष्म स्तरांवरील कामभावनेचा विकास त्याच्या आवाक्यात येऊ शकलेला नाही. भारतीय तंत्रविचारात सुद्धा या विश्वाच्या मुळाशी कामभावना मान्य केली आहे. त्यातूनच शिव-शक्ती वा पुरुष-प्रकृती कल्पना आल्या. पण या कल्पना म्हणजे दोन शरीरांचे स्थूल मिलन नाही. मन, बुद्धी आणि चेतन पातळीवरील कामभावनेचे संवेदन आणि प्रकटीकरण स्थूल शारीर जाणीवांपेक्षा निश्चितच निराळे राहील. पण बहिर्मुखी जाणीवाच अंतिम सत्य मानल्याने फ्रॉईड त्या भावनांचा विकास करूच शकला नाही.

फ्रॉईडला त्याचाच सहकारी असलेल्या कार्ल जंगने आव्हान दिले होते. खरे तर दोघेही मित्र. दोघांनी मिळून १९११ साली आंतरराष्ट्रीय मनोविश्लेषण समिती स्थापन केली होती. पण अबोधात्मक मन हाच दोघांच्या मतभेदांचा मुद्दा झाला. वर्षभरातच फ्रॉईडने स्वत: त्यास वेगळे होण्याची विनंती केली आणि जंगने वेगळे होऊन आपले काम सुरु ठेवले. नंतर त्याने आपले `विश्लेषणात्मक मानसशास्त्र' मांडले. जाणीवेपलीकडील जीवनशक्तीचा सिद्धांत त्याने मांडला. जीवनातील द्वंद्व आणि संघर्ष त्या जीवनशक्तीतून उत्पन्न होतात, असे त्याचे मत होते. एवढेच नव्हे तर उपनिषदातील या विश्वाची मूळ शक्ती आणि आपण प्रतिपादन करीत असलेली जीवनशक्ती यातील साम्यही जंगने दाखवले आहे. त्याविषयी मतांतरे आहेत. एवढेच नव्हे तर भारतीय चिंतनाने मनापलीकडील अस्तित्वाचे अनेक स्तरही सांगितले आहेत. हे स्तर अनुभवगम्य नसून अनुभूतीगम्य आहेत असे भारतीय चिंतन सांगते. मात्र, स्थूल इंद्रियगम्य बाह्य विश्व हेच एकमेव आणि अंतिम सत्य होय. तेच मानवाचे खरे रूप होय हा फ्रॉईडचा सिद्धांत मात्र भारतीय चिंतनाला आणि त्याचा सहकारी राहिलेल्या जंगलाही मान्य नाही.

दैनंदिन जीवनात सुद्धा फ्रॉईडच्या मान्यता अपुऱ्या असल्याचे प्रत्ययास येते. तरीही जगभर त्याच मान्यता उचलून धरण्यात आल्या. याची तीन कारणे असू शकतात- १) काळाचा महिमा, २) व्यापारी संस्कृतीचे/ जीवनपद्धतीचे हितसंबंध, ३) इंद्रियगम्य सुखाची मानवाची लालसा. परंतु कारण कोणतेही असले तरीही, केवळ बाह्य जगाच्या प्रेरणा माणसाचे व्यक्तिगत आणि सामूहिक जीवन सुखी, शांत, समाधानी बनवू शकत नाहीत. त्यातून केवळ तात्विक, वैचारिक, सैद्धांतिक, व्यावहारिक संघर्षच जन्माला येऊ शकतात. अन्यथा संभ्रम निर्माण होऊ शकतो. निराशा वाढू शकते. दुसरे काहीही नाही. आज जगभरात याचा प्रत्यय येऊ लागलेला आहे.

बहिर्मुखी इंद्रियगम्य विश्वच सत्य मानल्याने व्यक्ती वा समूहाच्या क्रिया अथवा विचार अथवा भावना यांचं मूल्यांकन दृश्य बाबींवरून केले जाते. तसेच त्यांच्या उगमाची, निर्मितीची चर्चा वगैरे करण्याची गरज उरत नाही. जसे प्रेम ही भावना समजून घ्यायची तर गोड आणि नाजूक वागणे-बोलणे हे त्याचे मापदंड. प्रेम हे एक जीवनमूल्य. त्यामुळे गोड-नाजूक वागणे-बोलणे आवश्यक. मग लहान मुलांना रागावणे किंवा शिस्त लावणे वगैरे मानवतावादात बसत नाही. त्यातून `दाग अच्छे है' ही भावना आकारास येते. अशा प्रकारच्या अयोग्य प्रतिमांचा मारा सुरु होतो. तो व्यावसायिक लाभ मिळवून देतो. त्यामुळे अशा प्रतिमा उचलून धरल्या जातात. दिसायलाही छान वाटतं. केवढं मानवतेचं दर्शन आहे, असं वाटतं. पण डाग पाडणे चुकीचे आहे, योग्य नाही; असे वळण लावायचे असेल तर थोडी कठोरता दाखवावी लागते. पण कठोरता म्हणजे प्रेमाचा अभाव, म्हणजे मानवतेच्या विरोधी. अशी ही शृंखला तयार होत जाते. मग बाह्य कठोरतेची उपयोगिता, आवश्यकता, अन त्यातील प्रेम आकलन करण्याची क्षमताच संपून जाते.

समस्यांच्या संदर्भातही हेच दिसते. हिंदू-मुस्लिम संबंधांचा विचार करायचा असेल तर गेल्या अनेक शतकांचा विचार आवश्यक ठरतो. पण तो करायचा म्हणजे काही कठोर गोष्टी बोलाव्या लागतील. कठोर विश्लेषण करावे लागेल. पण बाहेर दिसणाऱ्या कठोरतेचा अर्थ विरोध, दुष्टता, शत्रुता असा लावला गेल्याने; कठोर विश्लेषण होऊ शकत नाही. गोड गोड बोलणे हाच चांगुलपणाचा अन भलेपणाचा निकष ठरू लागल्याने समस्या जटील होत गेल्या. अगदी संयुक्त राष्ट्रसंघ देखील ठराव आणि निषेध यापलीकडे जगातील संघर्ष अन समस्या सोडवू शकलेले नाही. प्रसिद्ध गीतकार गुलजार यांचे उदाहरण घेता येईल. मानवी संवेदना हा त्यांचा प्रांत. त्याचं चित्रण, वर्णन त्यांनी ताकदीने केलं. पण फाळणीच्या वेदना स्वत: भोगल्या असूनही फाळणीमुळे निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी वा कमी करण्यासाठी ते काहीही करू शकले नाहीत. त्यासाठी काही कठोर गोष्टी कराव्या लागतील. पण कठोरता म्हणजे मानवतेला काळीमा अशी काहीशी धारणा झाल्याने त्यांचा नाईलाज असावा.

बाह्य गोष्टी प्रमाण मानल्याने, आत पाहण्याची, खोलात जाण्याची, कारणमीमांसा करण्याची गरज उरत नाही. अमुक घटना का घडली किंवा अमुक गोष्ट का करायची वा करायची नाही इत्यादीचा विचार अनावश्यक ठरतो. फक्त आपल्या कल्पनाचित्रानुसार गोष्टी घडाव्यात एवढे इच्छाचिंतन उरते. ते नियमित सुरुच राहते आणि समस्याही तशाच कायम राहतात. अमूर्त भावना आणि जाणिवांना दृश्य प्रतिकात बांधण्याचा प्रयत्न साहित्यिक अन कलाकार करतात. आपल्याला जाणवणाऱ्या जाणीवांचं नेमकं स्वरूप, तसेच त्या येतात कुठून याचा संभ्रम कायम राहतो आणि त्या संभ्रमित अवस्थेतच त्या त्या जाणीवांना एखाद्या आकारात, चौकटीत, प्रतिकात कोंबण्याचा प्रयत्न सुरु राहतो. त्या चौकटीत न बसणारी गोष्ट चुकीची ठरू लागते. सूत्ररुपात सांगायचे तर- बाह्य गोष्टी प्रमाण मानायच्या, त्याच्या व्यक्तीसापेक्ष चौकटी तयार करायच्या, सगळ्या घटना- विचार त्यात कोंबायचे, जे कोंबले जाऊ शकणार नाहीत ते चुकीचे अन त्याज्य ठरवायचे. हिंसा-अहिंसा, सुख-दु:ख, न्याय-अन्याय, खरे-खोटे, ज्ञान-अज्ञान, योग्य-अयोग्य, इष्ट-अनिष्ट, चांगले-वाईट, श्रेष्ठ-कनिष्ठ; या व अशा सगळ्या गोष्टींचे निकष म्हणजे चौकटी.

या जगातून दु:ख संपूर्ण नाहीसे होणे शक्य आहे का? या जगातून संघर्ष पूर्ण नाहीसा होणे शक्य आहे का? या जगातून विविधता नाहीशी होणे शक्य आहे का? मी आणि समूह यातील एकच या जगात राहील अशी स्थिती येऊ शकते का? स्वप्न आणि वास्तवाचा संबंध काय? सगळे गोडगोड, छानछान होऊ शकत नसेल तर कशासाठी धडपड करायची? अशा असंख्य प्रश्नांची मालिका उभी राहते, जिची उत्तरे बाह्य इंद्रिय अनुभवांनी मिळू शकत नाहीत. ती तशी मिळवण्याची साहित्यिकांची, कलाकारांची धडपड निष्फळ ठरते ती तेवढ्यासाठीच. केवळ बाह्य विश्वाच्या कसोट्या लावणे एकांगीच ठरणार. त्यातूनच चिंतनशीलतेचा अभाव निर्माण होतो आणि स्वप्नाळूपणाचा बुजबुजाट. साहित्यिकांचे राजीनामे आणि अन्य अशाच बाबी याच एकांगीपणाचा परिणाम आहेत. खरी समस्या हे राजीनामे वगैरे नसून, बाह्य आणि आंतरिक विश्वाचे संतुलन साधून या विश्व व्यापाराकडे पाहण्याची निकोप, सार्थ दृष्टी कशी विकसित करता येईल हा आहे. राजीनामे वगैरेसारख्या उठवळ समस्या त्याने आपोआपच नियंत्रित होतील. एकांगी असण्यापेक्षा एकात्म असणे, संतुलित असणे नेहमीच चांगले असते.

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, २५ ऑक्टोबर २०१५

बुधवार, २१ ऑक्टोबर, २०१५

नऊ दशकांची अमृतवर्षा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता अपरिचित राहिलेला नाही. केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सगळ्यात मोठी स्वयंसेवी संघटना म्हणून संघ ओळखला जातो. तरीही संघाची ओळख पटलेली आहे का, असा प्रश्न विचारला तर तो वावगा ठरणार नाही. संघाचे समर्थक, संघाचे विरोधक, संघाबद्दल आस्था बाळगणारे, संघाला पाण्यात पाहणारे, एवढेच नव्हे तर संघाचे स्वयंसेवकही आपापल्या पद्धतीने संघाची ओळख पटवून देतात, संघाचे मूल्यमापन करतात किंवा संघाबद्दलचे आपले मत तयार करतात. त्यात काहीही तथ्य नसते असे नाही. परंतु ते परिपूर्ण असते असेही नाही. संघ स्वत:देखील स्वत:ची ओळख कधी कधी देतो. मात्र तीही पूर्ण ओळख असतेच असे नाही. विशिष्ट संदर्भ घेउन आलेले ते एक दर्शन असते. परिपूर्ण दर्शन मात्र नसते.

संघाचे भाष्यकार आणि थोर विचारवंत स्व. दत्तोपंत ठेंगडी संघाचे स्वरुप समजावून देताना भाषाशास्त्रातील अनन्वय अलंकाराचे उदहारण देत असत. अनन्वय अलंकार कसा असतो हे सांगण्यासाठी संस्कृत भाषेत एक श्लोक आहे.

`गगनं गगनाकारं, सागर: सागरोपमा:
रामरावणयोर्युद्धम, रामरावणयोरिव'
म्हणजे आकाश आकाशासारखंच आहे, सागर सागरासारखाच आहे आणि राम-रावण युद्ध हे राम- रावण युद्धासारखेच आहे. त्याप्रमाणेच संघही संघासारखाच आहे. तो नीट समजून घेण्यासाठी त्याचे विविधांगी, गुंतागुंतीचे स्वरुप समजून घेणे आवश्यक आहे. अर्थात संघाला अशा विश्लेषणाची गरज नाही. इ.स. १९२५ पासून आजतागायत संघ त्याच्या पद्धतीने चालत राहिला आहे आणि वाढत राहिला आहे. मात्र संघाला याची गरज नसली तरीही संघाला जे साध्य करायचे आहे त्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून अशा विश्लेषणाची गरज आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हटले की सर्वप्रथम डोळ्यापुढे येते ती संघाची शाखा. एका मैदानावर भगवा ध्वज रोवलेला. त्यासमोर काही लोक एकत्र झालेले आणि त्यांचे काही कार्यक्रम. हे कार्यक्रम खेळ, नियुद्ध, संचलन, दंड, लेझीम, सूर्यनमस्कार, योगासने, व्यायामयोग, घोष, गीतगायन, कथाकथन, चर्चा, भाषण, प्रार्थना असे अनेक प्रकारचे असू शकतात. हीच सामान्यपणे समाजाला असलेली संघाची ओळख आहे. संघ काय करतो. तर शाखा चालवतो. या शाखांमध्ये येणाऱ्या लहानमोठ्या साऱ्यांना स्वयंसेवक म्हणतात. या स्वयंसेवकांचे वर्षभरात काही कार्यक्रम होतात. त्यावेळी ते विशिष्ट गणवेश घालतात. या कार्यक्रमांमध्ये भाषणे होतात आणि त्यातून संघाचा विचार सांगितला जातो. याहून अधिक फारसे कोणाला ठाऊक नसते. अगदी संघाच्या स्वयंसेवकाला किंवा कार्यकर्त्यालाही! संघाचे काम करायला त्याची फारशी गरजही नसते.

संघाची कार्यपद्धती, त्याची संघटनात्मक रचना, कार्यपद्धती व रचना यांचा विकास, संघाचा इतिहास याविषयी अत्यल्प माहिती असते. संघाचे म्हणून काही साहित्य आहे, पुस्तके आहेत याची अनेकांना कल्पनाही नसते आणि तरीही एखादी व्यक्ती संघाचा कार्यकर्ता असते. एखादा महाविद्यालयीन विद्यार्थी, क्वचित शालेय विद्यार्थी सायं शाखेचा मुख्य शिक्षक वा कार्यवाह असतो. प्रभात शाखेचा एखादा स्वयंसेवक वा कार्यकर्ता निवृत्तीनंतरच संघाच्या शाखेत आलेला असतो. वयाच्या साठीत त्याने पहिल्यांदा संघाचा गणवेश घातलेला असतो. संघ शिक्षा वर्गाचे प्रशिक्षण कार्यकर्त्याने घेतलेलेच असते असे नाही. एक दिवस कधी तरी संघाच्या शाखेत आलेली व्यक्तीही आयुष्यभर संघाचा स्वयंसेवक असते. काही स्वयंसेवक काही दिवस, महिने वा वर्ष संघाचे काम करत असतात. तर काही आयुष्यभर संघाचे काम करतात. नवनवीन शाखा सुरू होत असतात. सुरू असलेल्या काही शाखा बंदही पडतात आणि पुन्हा सुरुही होतात. शाखा सुरू वा बंद करण्याचे आदेश निघत नाहीत. माणसांची उपलब्धता हाच एकमेव मुद्दा. माणूस उपलब्ध असेल तर शाखा चालते नाही तर बंद. शाखा चालवणाऱ्या या कार्यकर्त्यांना काहीही मिळत नाही. पैसा, प्रतिष्ठा, मानसन्मान एवढेच काय एखादे प्रमाणपत्रही नाही. प्रमाणपत्र मिळाले तरी त्याचा उपयोग तरी काय होणार, हा एक वेगळाच प्रश्न आहे. असे प्रश्न ज्याच्या मनात येतात तो आपोआपच कामापासून दूर होतो. कारण काही देण्याचा प्रश्नच उत्पन्न होत नाही ही संघाची स्पष्ट भूमिका आहे. असे दूर झालेले लोकही संघाचे स्वयंसेवक मात्र राहतातच. त्यांच्या स्वयंसेवकत्वाला काहीही बाधा येत नाही. जसे काम करण्याच्या मोबदल्यात काहीही मिळत नाही. तसेच काम करण्यासाठी वा स्वयंसेवक होण्यासाठीही काहीही द्यावे लागत नाही. त्यासाठी नोंदणी, नोंदणी शुल्क वगैरे नसते. गणवेश, शिबिर, वर्ग, सहल यासाठीचा खर्च मात्र स्वत:च करावा लागतो. संघाचे काम चालवण्यासाठी स्वयंसेवक स्वत:च पैसा गोळा करतात. वर्षातून एकदा त्यासाठी गुरुदक्षिणेचा कार्यक्रम होतो. ज्याला जितके पैसे द्यायचे असतील तितके तो भगव्या ध्वजापुढे समर्पण करतो. कोण किती देतो याची ना चर्चा होत ना त्यासाठी काही बंधन आहे. गुरुदक्षिणा दिलीच पाहिजे हेदेखील बंधन नाही. गुरुदक्षिणा न देता वा त्या कार्यक्रमाला उपस्थित न राहता सुद्धा एखादी व्यक्ती स्वयंसेवक राहू शकते.

गेली ९० वर्षे हा क्रम सुरू आहे. खरे तर आपण सारे हा एक चमत्कार घडताना पाहतो आहोत. काहीही आकर्षकपणा नाही, काहीही फायदा नाही, उलट तोटाच! आणि तरीही एखादे कार्य सतत चालूच राहते. विस्तारत राहते. समाजाला प्रभावित करीत राहते. याला आश्चर्य नाही तर काय म्हणणार? लोक संघाचे काम का करतात? संघ म्हणतो शाखा चालवा आणि लोक त्या चालवतात. हे कसे काय घडून येते? खरं तर यावर विश्वास बसणेही कठीण. पण जे प्रत्यक्ष दिसते ते नाकारणार तरी कसे? माणसे येतात- जातात, पिढ्या बदलतात, संकटे येतात, संघर्ष होतात, मतभेद होतात, तरीही सातत्य कायम राहते, ऊर्जा कायम राहते, प्रभाव कायम राहतो. हे कसे आणि का होते हा एक गूढ प्रश्नच आहे. याचे नेमके उत्तर कोणाकडेही नाही. अगदी संघाकडेही नाही. खरे तर संघ याचा विचारही करीत नाही. सतत फक्त काम करीत राहायचे एवढेच संघाला माहीत आहे. असा सगळा `जर-तर'चा मामला असूनही, trial and error चे गणित असूनही, देशस्थ विस्कळीतपणाचा खाक्या असूनही संघ चालतो आणि वाढतो आहे. वयाची ९० वर्षे पूर्ण केल्यावरही गतार्थ न होता सार्थ ठरतो आहे. संदर्भहीन न होता सयुक्तिक ठरतो आहे. या पृथ्वीवर एक आश्चर्य घडताना आपण पाहतो आहोत.

समाजाला हलवून टाकणाऱ्या अनेक व्यक्ती, चळवळी, उपक्रम, विचार या जगाने पाहिले आहेत. सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक अशा विविध क्षेत्रात त्यांनी प्रभाव निर्माण करीत खळबळ उडवून दिली आहे. मात्र थोड्याच अवधीत त्या इतिहास झाल्या आहेत. खळबळ निर्माण करणारी व्यक्ती, कार्यक्रम वा विचार संघाजवळ कधीच नव्हते. तरीही समाजाला हलवून टाकणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना, विचार यांच्यापेक्षा संघ उजवा ठरतो. ९० वर्षे हा कालावधी खूप मोठा नाही, पण तो खूप लहानही खचितच नाही. सातत्य, विचारांची आणि कार्यपद्धतीची अखंडता, काळाबरोबर पावले टाकण्याची वृत्ती आणि क्षमता या साऱ्याच बाबतीत संघाचे आगळेपण ठळकपणे नजरेत भरल्याशिवाय राहत नाही. मुख्य म्हणजे हे सारे एवढ्या शांतपणे की काही घडते आहे हे कुणाला जाणवू सुद्धा नये. ढोल पिटणे, जाहिरातबाजी, आक्रस्ताळेपणा यापैकी काहीही नाही. बरे संत प्रवृत्तीच्या एखाद्या व्यक्तीने हे केले तर समजून घेता येईल. परंतु संघाने मात्र सर्व प्रकारच्या गुणदोषांनी युक्त अशा लाखो सामान्य माणसांकडून ही मौन साधना करवून घेतली आहे. पिढी दर पिढी हजारो लोकांना टोकाच्या निरपेक्षपणे कार्याला प्रवृत्त करून कार्यरत ठेवण्याचे हे जगातील एकमेव उदाहरण असावे. पद, प्रतिष्ठा, पैसा, मानसन्मान तर नाहीच पण ईश्वरप्राप्ती, आध्यात्मिक उन्नती वगैरे अभौतिक किंवा मानसिक समाधान, आत्मिक समाधान वगैरे भावनिक बाबीही नाहीत. आणि तरीही संघाची यशस्वी वाटचाल यथार्थपणे सुरूच आहे.

संघाचा हा प्रवास शून्यातून विश्वनिर्मितीचा प्रवास आहे. संघ स्थापनेच्या वेळी संघाचे नावही ठरलेले नव्हते. समाजाला अपरिचित अशी ८-१० माणसे केवळ एकत्र झाली होती आणि डॉ. केशव बळीराम हेडगेवार नावाच्या एका राजकीय- सामाजिक कार्यकर्त्यावर असलेल्या प्रेमाखातर ती एकत्र झाली होती. त्यात विचार, ध्येयनिष्ठा वगैरे फारसे नव्हते आणि ९० वर्षांच्या वाटचालीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असे नाव धारण करणारे काम दररोज देशभरात ५० हजार स्थानी चालते. यात ५० लाख स्वयंसेवक रोज एकत्र येतात आणि या मातृभूमीविषयीच्या आपल्या कर्तव्याचे स्मरण करून तिच्या उज्वल जीवनाविषयी प्रार्थना करतात. या व्यतिरिक्त हजारो स्थानांवर आठवड्यातून एकदा वा महिन्यातून एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणून लाखो लोक एकत्र येउन या समाजाचा, देशाचा विचार करतात. त्यातील अनेक जण प्रत्यक्ष काही ना काही कामही करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असे बिरुद न लावणाऱ्या परंतु संघ हीच प्रेरणा असलेल्या, तसेच वैचारिक आणि भावात्मक दृष्टीने संघाशी जोडल्या गेलेल्या आणि व्यवहारात संघाशी समन्वय राखून काम करणाऱ्या तीन-चार डझन अखिल भारतीय संस्था आहेत.

या संस्था समाजाच्या विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. संघाप्रमाणेच त्यांचेही स्वरुप अखिल भारतीय असेच आहे. राष्ट्रीय, अखिल भारतीय, आदी विशेषणे लावणाऱ्या अन् एखाद्या वस्ती वा गावापुरत्या मर्यादित असणाऱ्या संस्थांसारखे हे स्वरुप नाही. तर या साऱ्या संस्था खऱ्या अर्थाने अखिल भारतीय आहेत. संघाचे काम तर तालुका स्तरापर्यंत पोहोचले आहेच, पण अन्य संस्थांपैकी अनेक संस्थांचा पसाराही तालुका स्तरापर्यंत पसरला आहे, तर बाकीच्या संस्थांचे काम जिल्हा स्तरापर्यंत तरी पोहोचलेले आहेच. भौगोलिक दृष्टीने विचार केला तर संपूर्ण देश संघाच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कामाने व्यापला आहे. समाज जीवनाच्या विविध क्षेत्रांचा विचार केला तर बहुतेक साऱ्या क्षेत्रात संघाचे काम पोहोचले आहे. सर्व प्रकारच्या आर्थिक स्थितीतील लोक या कामाशी जोडले गेले आहेत. सर्व प्रकारच्या जाती धर्माचे लोक संघाशी संलग्नित आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये केवळ पुरुष येत असले तरीही राष्ट्र सेविका समितीच्या माध्यमातून महिलाही या कामात सक्रिय आहेत. अन्य संस्थांच्या कामातही महिलांचा सहभाग लक्षणीय असाच आहे. समाजाच्या प्रत्यक्ष सेवेची कामे दीड लाखाहून अधिक आहेत. लाखो स्त्री-पुरुष स्वत:साठी काहीही न मिळवता या सेवाकार्यांच्या माध्यमातून समाज सुशिक्षित, सुदृढ, सुसंस्कृत, आरोग्यसंपन्न व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहेत.

नित्य आणि नैमित्तिक असे प्रत्यक्ष संघाचे काम, अन्य संस्था संघटनांचे काम, सेवाकार्य यासाठी माणसे लागतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात लाखो स्त्री-पुरुष हुडकून काढणे हेच खरे तर एक अशक्य कोटीतील काम आहे. परंतु संघाने अशी माणसे नुसती हुडकून काढली नाहीत तर त्यांना कामाला लावले. कामांचे आणि माणसांचे नियोजन केले. व्यवस्था निर्माण केल्या आणि त्या सातत्याने पुढे सुरू ठेवल्या. लोक जुने होत असतात, निवृत्त होत असतात. हे अतिशय नैसर्गिक आहे. अशा लोकांच्या जागी नवीन माणसांना क्रियाशील करावे लागते. संघाने तेही यशस्वीपणे केले आहे. ही कामे करणारी माणसे शिकली सवरलेली आहेत. उच्चविद्या विभूषित आहेत. स्वत: कर्तृत्ववान आहेत. विचारी आहेत. अशा माणसांना थातुरमातुर वैचारिक वा भावनिक आवाहन बांधून ठेवू शकत नाही, सक्रिय ठेवू शकत नाही. एखादे साधे गणेशोत्सव मंडळ चालवणे आणि टिकवणे किती कठीण असते याचा अनुभव आपण सतत घेत असतो.

संघाने मात्र हे असाध्य, साध्य करून दाखविले आहे. इ. स. २००६ साली संघाचे दुसरे सरसंघचालक श्री. गुरूजी यांची जन्मशताब्दी होती. त्यासाठी देशभरात जे कार्यक्रम झाले त्यात ५ लाख गावातील लोक सहभागी झाले होते. देशात सुमारे ७ लाख गावे आहेत. म्हणजे ७० टक्केहून अधिक गावातील लोक यात सहभागी झाले होते. संघकार्याचा हा विस्तार केवळ देशातच झालेला आहे असे नाही, तर जगातील सुमारे ४० देशांमध्ये संघाचे काम चालते आणि सगळ्यांनी त्याची दखल घ्यावी असे स्वरुप आता त्यास प्राप्त झाले आहे. ९० वर्षांचा हा प्रवास सरळ होता असेही नाही. खूप वेगवेगळ्या प्रकारचा संघर्ष करीत हा प्रवास झालेला आहे. हा संघर्ष बाह्य होता, आंतरिक होता, परक्यांशी होता, स्वकीयांशी होता, राजकीय होता, सामाजिक होता, आर्थिक होता, भावनिक होता, शारीरिक होता, बौद्धिक होता. अनेकदा तर संघाचे अस्तित्व संपवून टाकण्याचा प्रयत्न झालेला जगाने पाहिला आहे. ज्या समाजासाठी संघ अव्याहत काम करतो आहे त्या समाजाने प्रदीर्घ काळ त्याला मनापासून स्वीकारलेही नव्हते. संपूर्ण विपरीत परिस्थितीचा सतत सामना करीत संघ इथवर पोहोचला आहे.

हे करताना त्यातील अखंडत्वही कायम आहे. एकच संघधारा वाहते आहे. त्याच्या शतधारा झाल्या नाहीत हीदेखील एक लक्षणीय बाब आहे. छोटी मोठी कामेदेखील एकसंध फार कमी काळ टिकतात. कधी नेतृत्वावरून वाद तर कधी तात्विक वाद!! कधी कार्यपद्धतीवरून मतभेद. परिणाम मात्र एकच. संघटनेत फाटाफूट. संघकार्याचे वैशिष्ट्य हे की, संघावर नाराज होउन बाहेर पडलेल्यांनी आपली वेगळी कामे सुरू केली पण पर्यायी वा समांतर संघ काढला नाही. ते शक्य झाले असते वा नाही हा मुद्दा वेगळा, पण कोणी पर्याय निर्माण करण्याचा गांभीर्याने विचारही केला नाही. याशिवाय जी कामे मूळ स्वरूपात टिकतात ती एका विशिष्ट मर्यादेतच काम करीत राहतात. सतत वर्धिष्णु राहूनही अखंडत्व कायम राखणे हेही एक वैशिष्ट्यच म्हटले पाहिजे. संघाची स्थापना १९२५ सालाची. महात्मा गांधींचा भारताच्या राजकीय, सामाजिक क्षितिजावर उदय झाला १९२० साली. कम्युनिस्ट पार्टीची स्थापनाही १९२० सालाचीच. म्हणजे सर्वोदय आणि कम्युनिझम यांच्यापेक्षा संघ ५ वर्षांनी लहान. कम्युनिस्ट पार्टीने सर्व प्रकारचे मार्ग आपल्या कार्यवाढीसाठी अवलंबिले. हिंसाचारही नाकारला नाही. अनेक वर्षे सत्ता उपभोगली. मोठा काळ सत्तेची सहानुभूती कम्युनिझमला मिळाली. गांधींच्या कार्याला तर देशात आणि जगातही अतिशय अनुकूलता होती व आहे. त्या पार्श्वभूमीवर या तिन्ही कामांची तुलना आज केली तर संघाचे यश आणखीनच ठळकपणे जाणवते.

केवळ विचार केला तरीही अंगावर शहारा यावा असा हा प्रवास आहे. जगाच्या इतिहासात क्वचितच एखाद्या संघटनेचा प्रवास एवढा रोमांचक आणि अद्भुत राहिला असावा. समुद्रमंथनातून निघालेले हलाहल प्राशन करून भगवान शंकरांनी तांडव केले होते. संघाने मात्र शांतपणे हलाहल पचवून टाकले आहे आणि समाजावर मात्र शांती आणि सौहार्दाचा अमृतवर्षावच केलेला आहे. असे सारे असतानाही सर्वाधिक गैरसमज असणारी संघटनाही संघच आहे. मोठ्या प्रमाणावर हेटाळणी सहन करणारी संघटनाही संघच आहे. आपल्याच कार्यकर्त्यांची नाराजी झेलणारीही संघटना संघच आहे. संघाच्या वाट्याला एवढे शिव्याशाप, एवढे तर्ककुतर्क का आले वा येतात. संघाबद्दल एवढा गोंधळ का आहे? तरीही संघ का वाढला? तरीही संघ का काम करतो आहे? संघाला नेमके करायचे तरी काय आहे? कशासाठी एवढा सारा खटाटोप सुरू आहे? काय साध्य करायचे आहे? काय मिळवायचे आहे? संघाला स्वत:ची प्रतिमा आणि वास्तव याविषयी काय वाटते? आजवरचा प्रवास आणि विस्तार याविषयी संघाला काय वाटते?

या व अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी, संघाबद्दलचा गोंधळ दूर करण्यासाठी आणि संघाविषयी सम्यक आकलन करून सारासार मत बनवण्यासाठी संघाची नीट ओळख करून घेणे गरजेचे आहे. साधारणपणे ६ वेगवेगळ्या दृष्टींनी संघ समजून घ्यावा लागेल.
१) संघाचे संघटनात्मक स्वरुप
२) संघ विचारधारा
३) संघ भावधारा
४) संघ- समाज परिवर्तनाचे माध्यम
५) संघाची ऐतिहासिक भूमिका
६) वैश्विक सभ्यतेच्या प्रवासातील संघाचे योगदान

संघाने अशी मांडणी आजवर केलेली नाही. हे हिन्दू राष्ट्र आहे, त्याची सर्वांगीण उन्नती व्हावी आणि या राष्ट्राने या जगातील आपला भार समर्थपणे वहन करावा एवढेच संघाने म्हटले आहे. या सहा कोनातून केलेले विश्लेषण परिपूर्ण असेल असेही नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शंभरीकडे वाटचाल करीत असताना त्याचा असा आढावा घेणे आवश्यक मात्र आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, २१ ऑक्टोबर २०१५

शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०१५

महाकवीच्या गावाची सफर

प्रसिद्ध हिंदी छायावादी कवी सूर्यकांत त्रिपाठी `निराला' यांच्या पुण्यतिथीनिमित्त दीप्तीने काल त्यांची एक कविता टाकली आणि १०-१२ वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या. संस्कार भारतीच्या साहित्य विधेची एक अखिल भारतीय बैठक उत्तर प्रदेशातल्या उन्नाव येथे होती. तीन दिवसांची बैठक आटोपल्यावर परतीच्या आरक्षणाप्रमाणे लोक परतत होते. एक पूर्ण दिवस माझ्याकडे रिकामा होता. बाकीही काही मंडळी होती. दिवस कसा घालवायचा यावर चर्चा सुरु झाली. संस्कार भारतीचे तेव्हाचे अ.भा. अध्यक्ष पाटण्याचे डॉ. शैलेन्द्रनाथ श्रीवास्तव यांनी सुचवले- कवी `निराला' यांचे गाव इथून जवळ आहे. तिथे जाऊन येता येईल का पाहा. कार्यकर्त्यांनी विचारपूस केली तर ते शक्य होईल असे वाटले. मग काय? लगबग सुरु झाली. हिंदी साहित्य विश्वात ख्यातीप्राप्त डॉ. श्रीवास्तव यांच्यासह दुसऱ्या श्रेष्ठ साहित्यिकाच्या गावाची सफर म्हणजे आनंदच. डॉ. श्रीवास्तव, संस्कार भारतीचे तेव्हाचे अ.भा. संघटन मंत्री योगेन्द्रजी, अस्मादिक, अन्य दोन-तीन लोक असे `निराला' यांच्या `बैसवाडा' गावी निघालो. दीप्तीही होती सोबत.

दोनेक तासात उन्नाव वरून `बैसवाडा'ला पोहोचलो. प्रथम तेथील शाळेत गेलो. त्या शाळेला `निराला' यांचेच नाव आहे. शाळेचे मुख्याध्यापक, अन्य शिक्षक, कर्मचारी सगळेच आनंदून गेले होते. कवीचे गाव पाहायला आजकाल कोण जातात? पण ही देशभर फिरणारी बडी मंडळी (म्हणजे डॉ. श्रीवास्तव, योगेन्द्रजी) आपल्या छोट्याशा गावात आली याचं विलक्षण कौतुक त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. शिक्षक मंडळी आम्हाला शाळेच्या गच्चीवर घेऊन गेली. तिथे `निराला' यांची एक कविता कोरलेली होती. हे कवीवर आणि कवितेवर प्रेम करणारे लोक आहेत हे वेगळे सांगण्याची गरज उरली नव्हती. डॉ. श्रीवास्तव प्रत्येक गोष्ट टिपून घेत होते. शांतपणे ऐकत होते. पाहत होते.

शाळेतून आमची गाडी गावातल्या `निराला' यांच्या घराकडे निघाली. अन्य साधारण खेड्यांप्रमाणेच बैसवाडाही होते. छोट्या बोळात गाडी अडली. ना मागे, ना पुढे. डॉ. श्रीवास्तव अन योगेन्द्रजी उतरले अन चालू लागले. आम्हाला त्यांचे अनुकरण करणे भागच होते. पाचेक मिनिटात आमचा ताफा विश्वप्रसिद्ध हिंदी कवी `निराला' यांच्या झोपडीत पोहोचला. तेथे कोणीही राहत नव्हते. ओसाड. आजूबाजूचे लोक जमले. कोणी काही, कोणी काही सांगू लागले. कोणी सुसंगत, कोणी असंगत. त्यात एक विचित्र वाटावा असा माणूस होता. गावात बहुतेक अशी माणसे असतातच. पूर्ण खेडवळ, जरा स्क्रू ढिला आहे की काय असे वाटावे असा, गबाळ्या. जे बोलेल ते समजून घेण्यासाठी ऐकणाऱ्याने श्रम करायला हवेत अशी अपेक्षा करणारा. १०-१५ मिनिटे आम्ही तिथे घालवली. डॉ. श्रीवास्तव खाली वाकले त्यांनी त्या ओसाड झोपडीला नमस्कार केला. तिथली चिमूटभर माती कपाळाला लावली. अन आम्ही परत निघालो. दाराबाहेर पाऊल टाकले तर तो विचित्र माणूस डॉ. श्रीवास्तव यांच्याजवळ आला अन काही सांगू लागला. एका कार्यकर्त्याने त्याला हाडहुड करून बाजूला केले.

आम्ही परत शाळेत आलो. तिथे गाडी उभी होती. गाडीत बसून उन्नावचा रस्ता धरला. जसे आम्ही गाव सोडले, तसे तोवर शांत असलेले डॉ. श्रीवास्तव हाडहुड करणाऱ्या त्या कार्यकर्त्याकडे वळले. त्यांनी त्याला चांगलेच धारेवर धरले. ते म्हणाले- `त्या माणसाला तू असे का घालवून दिले. अशाच माणसांकडे अनेकदा पुष्कळ काही असते. अशी माणसे विचित्र असंबद्ध बोलत असतील. कंटाळवाणे वाटेल आपल्याला पण ते नीट शांतपणे ऐकले, संगती लावण्याचा प्रयत्न केला तर खूप काही पदरात पडते. अन आपल्या हाती काही लागले नाही, तरीही काय होते? त्या माणसाने `निराला' यांच्यासोबत काळ घालवला असेल. त्यांना कधी काही हवे नको पाहिले असेल. त्यांच्यासोबत रागाचे, हास्यविनोदाचे क्षण घालवले असतील. ते सांगण्याची त्याला जी ऊर्मी असते तिचेही महत्व आहेच ना? अन काहीच नसेल तरीही आपल्याला ज्या महाकवीबद्दल विलक्षण आदर आहे, त्याच्यासह राहिलेला एक माणूस म्हणून तरी त्याच्याशी नीट वागायला हवे की नको?' तो कार्यकर्ता खजील होऊन बसला होता. पण गाडीतील बाकीच्यांनाही, म्हणूनच मलाही- जीवनाची किती विलक्षण जाण प्राप्त झाली होती.

रस्त्यात एक छोटे गाव लागले. तेथील टपरीवर चहाचा आस्वाद घेऊन उन्नावचा प्रवास सुरु झाला. पुढच्या तासभर डॉ. श्रीवास्तव महाकवी `निराला' आणि त्यांचे `राम कि शक्तीपूजा' यावर बोलत होते. ज्यांना डॉ. श्रीवास्तव माहिती आहेत, त्यांना ज्यांनी ऐकले आहे असे समजू शकतील, आम्हाला त्यावेळी मिळालेली मेजवानी. स्वत: उत्कृष्ट ख्यातीप्राप्त साहित्यिक, हिंदीचे प्राध्यापक, भाषेवर प्रभुत्व, भाषेचा गोडवा, विद्वत्ता, वक्तृत्व अन काय नव्हते त्यांच्याकडे. व्यक्तित्वही प्रभावी. व्यक्तित्व अन वक्तृत्व असे की, अगदी अटलजी मंचावर असतानाही श्रोत्यांच्या मनात रेंगाळणार ते डॉ. श्रीवास्तवच. उन्नाव कधी आले ते कळलेच नाही.

काही योग नियतीने लिहून ठेवलेलेच असतात. असाच त्या दिवशीचा योग होता. `निराला' यांच्या गावची निराळीच सफर कायमचे आनंदनिधान झाली आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, १६ ऑक्टोबर २०१५

बुधवार, १४ ऑक्टोबर, २०१५

वैचारिक ओकाऱ्या

एका मित्राशी जरा वादावादी झाली. मग त्याने एका महान संपादकाने लिहिलेल्या लेखाची लिंक पाठवली. मी असल्या लिंक वगैरे वाचत नाही असा त्याला परतीचा संदेश दिला. तो लेख मी आधीच वाचलेला होता. त्यात त्या संपादकाने मांडणी केली आहे की, देशभरात सगळीकडे भाजपला सत्ता मिळवून देण्याचे रा.स्व. संघाने ठरवले आहे. त्यानंतर त्यांचा पूर्ण अजेंडा राबवला जाईल. मी लिंक वाचत नाही असे म्हटल्याने मित्राची पंचाईत झाली. पण त्याला अपेक्षित हेच होते की- बोला यावर. संघ अन तुम्हीही म्हणता की, संघाला राजकारण करायचे नाही. आता बोला. आहे ना गंमत? आमच्या भागात एक म्हण आहे- `बाजारात तुरी, अन भट भटणीला मारी.' म्हणजे संघाची किंवा माझी भूमिका काय आहे हे गेलं उडत. त्याबद्दल कोणी विद्वान काही म्हणतात त्यावर बोला...!! यालाच म्हणतात- जाणूनबुजून असेल तर तमाशा, अजाणता असेल तर बावळटपणा.

तथाकथित स्वातंत्र्य, समता, लोकशाही, जागतिकीकरण, ज्ञानयुग, तंत्रज्ञान युग वगैरेंनी बाकी काय चांगलं- वाईट  केलं ते थोडं बाजूला ठेवू, पण या गोष्टींनी सगळ्याच गोष्टींचं बेसुमार सुमारीकरण केलं हे मात्र निर्विवाद. कोणीही उठावे अन काहीही करावे, कोणीही उठावे अन काहीही लिहावे, कोणीही उठावे अन काहीही बोलावे; कशाला काही धरबंद नाही. बरं जे करायचं, लिहायचं, बोलायचं ते तरी सुसंगत, विचारपूर्वक, `अभ्यासोनि प्रकटावे' असे असते का? नाव नको. आधी जसं संघाबद्दल उदाहरण दिलं तशी उदाहरणं कुठेही पाहायला मिळतात. धर्म, देव, धार्मिकता, शास्त्र, रूढी, लोकाचार, समजुती, परंपरा, तत्वज्ञान यांच्याही बाबतीत. म्हणजे मोठ्याने कर्णकर्कश्श भोंगे कोणी वाजवतात म्हणून देव धर्म वाईट. का बुवा? ते नाही विचारायचं. एखाद्या कुठल्या देवदेवतेच्या आख्यायिका वगैरे थेट उपनिषदांच्या एखाद्या सिद्धांताशी झुंजवायच्या. का? आम्हाला वाटते म्हणून.

राजकारण, समाजकारण, चळवळी यातही तेच. आज हिंदुत्वाची शक्ती वाढली आहे. त्यामुळे अनेक हौशे, नवशे, गवशे स्वत:ला हिंदुत्वाचे खंदे पुरस्कर्ते म्हणवून घेतात. आपापल्या ठिकाणी ते त्यांना वाटेल ते करतात. अन सगळे तोंडसुख येते हिंदुत्वाच्या वाट्याला. यात केवळ समाजोपयोगी वा समाजविघातक एवढाच भेद असतो असे नाही. काही प्रामाणिक मतभेद सुद्धा असू शकतात. पण लगेच कावकाव सुरु होते- ते असे म्हणतात, ते तसे म्हणतात. अगदी स्वातंत्र्य चळवळीत किंवा ज्यांना आपण आदर्श म्हणतो अशा नेत्यांमध्येही मतभेद राहत होतेच ना? कॉंग्रेसमध्येही हिंदुत्ववादी होतेच. महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्यातच नव्हे तर गांधीजी व रवींद्रनाथ टागोर यांच्यातही मोठे मतभेद होते. डॉ. आंबेडकरांना मानणाऱ्या रिपब्लिकन विचारांचे किती गट आहेत? किंवा कम्युनिस्ट विचारधारा किती धारांनी वाहते? पण त्यावर प्रश्न उपस्थित होत नाहीत. त्या चळवळी वा विचारधारा मानणाऱ्या व्यक्तींची कृत्ये त्यांच्या तत्वज्ञानाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यासाठी वापरली जात नाहीत. हिंदुत्व मात्र या साऱ्याला अपवाद.

सध्या साहित्यिक राजीनामे प्रकरण सुरु आहे. साहित्य आणि समाज यांचा खरंच कसा आणि किती संबंध असतो, यावर किती जण सखोल विचार करतात. साहित्याने जग बदलता आलं असतं तर आजवर काय कमी साहित्य निर्माण झालं आहे? असा प्रश्न समोर आला की दुसरे कुणी उठतात, अन साहित्य वगैरे झूठ आहे असा सूर आळवतात. साहित्याची अतिरेकी भलावण आणि साहित्य झूठ अशा भूमिका घेणारे दोघेही सारखेच उथळ आणि पोकळ. तेच सरकार आणि समाज यांच्या बाबतीत. एक तर सरकार सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार किंवा सरकार ही निरर्थक गोष्ट आहे. बस, दोनच भूमिका अन त्यांचे अभिनिवेश. घरात तरी आई वडिलांचे मुलांवर पूर्ण नियंत्रण असते का? म्हणजे काय त्यांचे काहीच नियंत्रण नसते?

मुळातच या जगातील बहुतेक सगळ्या गोष्टी multifaceted, multidimensional असतात. त्यातील जेवढे आपल्या शरीर-मन-बुद्धीच्या आवाक्यात आले ते लगेच त्रिकालाबाधित सिद्धांताच्या रुपात बाहेर टाकण्याची सवड आणि सोय सध्याच्या जीवन रचनेने आणि तंत्रज्ञानाने करून दिलेली आहेच. वरून या multifaceted, multidimensional जगातील असंख्य गोष्टी प्रत्येकाच्या मन-बुद्धीत इच्छेने वा अनिच्छेने कोंबत राहणारी प्रक्रिया आणि व्यवस्थाही आहेच. मग रोज अजीर्ण होईपर्यंत, प्रकृतीला झेपेल न झेपेल याकडे लक्ष न देता वेगवेगळी माहिती, मते इत्यादी कोंबत राहायचे. ते पचणे शक्यच नसते. कारण त्यासाठी मूळ पचनशक्ती आणि अवकाश लागतो. त्या दोन्हीचा अभाव. त्यामुळे जिकडे तिकडे बेसुमार वैचारिक, बौद्धिक, मानसिक, संकल्पनात्मक ओकाऱ्या. याच ओकाऱ्या कधी फेसबुकवरील चर्चा, कधी व्होट्स अॅपवरील पोस्ट, दूरचित्रवाणीवरील बडबडी, चित्रपट, कथा, कादंबऱ्या, घराघरातील चर्चा-वादविवाद, चहाटपरी वा पानठेल्यावरील गप्पा यातून सांडत राहतात. याची कारणे काय वगैरे चर्चा करता येतील. पण बेसुमार सुमारीकरण याच्या मुळाशी आहे हे खरे.

पुढील काळ कसा राहील? कुणास ठाऊक?

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, १४ ऑक्टोबर २०१५

सोमवार, १२ ऑक्टोबर, २०१५

कांगावखोर बौद्धिक दहशतवादाची नवीन खेळी

साहित्य अकादमीचे पुरस्कार परत करणाऱ्यांची संख्या डझनाचा आकडा ओलांडून पुढे गेली. तिघांनी साहित्य अकादमीचे राजीनामेही दिले. स्वाभाविकच चर्चाही सुरु झाल्या. या चर्चांमध्ये दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांची नावे स्वाभाविकच आलीत. अन्य दंगलींचाही उल्लेख झाला. एका मराठी वाहिनीवर संचालन करणाऱ्यांच्या उल्लेखातून २००२ च्या गुजरात दंगलींचा उल्लेख सुटला. तेव्हा अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेल्या एका व्यक्तीने ते लक्षात आणून दिले, एवढेच नव्हे तर आपण घाबरला आहात का? असा खोचक प्रश्नही केला. यातील हेतू कोणाच्याही सहज लक्षात येऊ शकतो. त्यावर संचालन करणाऱ्या व्यक्तीने आपण घाबरत नसल्याचे सांगून, २००२ चा उल्लेख आवर्जून अन जोरकसपणे केला. मला असल्या शहाण्यांची लाज वाटली अन मी टीव्ही बंद केला. आजवर या देशातील स्वनामधन्य विद्वान जे करत आले आहेत तेच अजूनही सुरु आहे. या देशात काय फक्त दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांचीच हत्या झाली? पंडित दीनदयाळ उपाध्याय अन डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी काय या देशातील नव्हते? नक्षलवादी नाव धारण करून डाव्या विचारसरणीचे गुंड या देशात रोज निष्पाप लोकांच्या हत्या करत नाहीत? पंजाबच्या मोगा शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर हल्ला करून दोन डझन स्वयंसेवकांना मारून टाकण्यात आले नव्हते? ईशान्य भारतात रा. स्व. संघ आणि अन्य समविचारी संघटनांच्या किती कार्यकर्त्यांच्या निर्मम हत्या झाल्या आहेत? त्या काय देशाबाहेरच्या आहेत? केरळमध्ये कम्युनिस्टांनी किती हत्या केल्या यावर तर खुद्द त्यांचेच नेते आता बोलायला लागले आहेत? अरे कांगावखोरांनो अन त्यांच्या समर्थकांनो, द्या- हवे तेवढे राजीनामे द्या; पण मी उल्लेख केलेल्या बाबींचा किमान उल्लेख तरी करा. तुम्ही तर गेली कित्येक दशके या लोकांना अन विचारांना पाल झटकावी तसे झटकत आला आहात. त्यांना अस्पृश्यांसारखी वागणूक देत आला आहात. त्यांचे उल्लेखही टाळत आला आहात. अन तरीही स्वत:च्या सहिष्णुतेची टिमकी वाजवताना लाज वाटत नाही?

अन कोणत्या तोंडाने करता आहात सहिष्णुतेच्या गप्पा? तो अधिकार तरी आहे का तुम्हाला? रा. स्व. संघाचे पाचवे सरसंघचालक स्व. सुदर्शनजी यांनी सरसंघचालक झाल्यावर पहिले काम केले होते, नागपूरच्या दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्याचे. त्यावेळी तुमच्याच पंथातल्या एका महान विचारवंताने अन त्याच्या साथीदारांनी जाऊन चक्क डॉ. आंबेडकरांचा तो पुतळा धुतला होता. तेव्हा कुठे गेली होती तुमची सहिष्णुतेची बांधिलकी? या देशातील सर्वोच्च न्यायालयाने रा. स्व. संघाला गांधी हत्येतून पूर्णत: मुक्त केले तरीही तुम्ही उठता बसता त्याला दूषणे देता, तेव्हा तुम्ही फारच सहिष्णू असता नाही का? शंकराचार्यांना ऐन दिवाळीच्या दिवशी बेड्या घातल्या होत्या तेव्हा तुमची सहिष्णुता झोपली होती का? अन ज्या नरेंद्र मोदींच्या नावापुढे पंतप्रधान हे विशेषण रोजच्या तुमच्या पोटदुखीसाठी कारणीभूत आहे, त्या मोदींना सतत एक तप तुम्ही ज्या पद्धतीने वागवले तेव्हा तुमची सहिष्णुता कुठे दडून बसली होती?

सहिष्णुतेच्या गप्पा कोणी कराव्यात? ज्यांच्या रक्तातून असहिष्णुता वाहते आहे त्या कम्युनिस्ट अन काँग्रेसवाल्यांनी? आणीबाणीनंतर शाह आयोगाने जेव्हा स्व. इंदिरा गांधींना दोषी ठरवले होते अन त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती, तेव्हा काहीच मिनिटात संघाच्या लोकांच्या घरांवर झालेले हल्ले तुम्हाला आठवतात तरी का? काँग्रेसी गुंडांनी केलेल्या दगडफेकीत फुटलेली माझ्या घराची काच अजूनही त्याची साक्ष देईल. याच हल्ल्यात हात तुटल्यामुळे वडिलांना चार महिने काय सोसावे लागले होते याची तुम्हाला कल्पना असण्याची शक्यताच नाही. कारण तुमची सहिष्णुता कायम सत्तेचे तळवे चाटण्यात व्यस्त राहत आलेली आहे. गांधी हत्येनंतर महाराष्ट्रात करण्यात आलेली ब्राम्हणांची कत्तल तुम्हाला माहितच नाही. कारण तुमच्या मते त्यावेळी महाराष्ट्र भारतात नसावाच.

भारतासहित जगभरातील पत्रकारांच्या हत्या, आयएसआयएसच्या कारवाया, पाकच्या कारवाया, कोरिया असो की सिरीया, अमेरिका असो की इराण... एकूणच मानवी जीवनातील हिंसा, त्याची कारणे, त्याचे परिणाम, त्यावरचे उपाय वगैरेंची चर्चा करण्याची तुमची क्षमता तरी आहे का? गोडगोड बोलणे वा इच्छाचिंतन यांच्या मर्यादांची चर्चा करण्याची तयारी आहे का तुमची? प्रत्येक घटना सरकारच्या इशाऱ्यानेच होते असे जे तुम्हाला तुमच्या राजीनामे देण्यातून सुचवायचे आहे त्याला तरी काय आधार? अशी बालिश कृती करून केवळ गोंधळ, अविश्वास माजवण्याचा तुम्हाला काय अधिकार? तुमची ही कृती बालिश तर आहेच, सोबतच बेजबाबदारदेखील आहे. तुमच्या बौद्धिक दिवाळखोरी शिवाय दुसरे काहीही यातून पुढे येत नाही.

नागपूरच्याच एका प्राध्यापक मित्राने, याच राजीनामा यादीत असलेल्या गणेश देवी यांना त्याने पाठवलेला मेसेज, सकाळी मला पाठवला. त्यात त्याने २००६ च्या मुंबई बॉम्बस्फोटात आपला भाऊ मरण पावल्याचा उल्लेख करून; गणेश देवींना प्रश्न केला आहे- त्याबद्दल साहित्यिकांनी काय केले होते? देवींची त्यावर काहीही प्रतिक्रिया नाही. आता सामूहिक बंडखोरी करणाऱ्या या साहित्यिकांनी समाजाच्या असंख्य गटांमध्ये ऐक्य, सहिष्णुता निर्माण करण्यासाठी काय केले आहे, या प्रश्नाचे उत्तर आधी द्यावे. मग सहिष्णुतेच्या वगैरे गप्पा माराव्यात. साहित्य अकादमीनेही दबावात येऊ नये. १०-१५ च नव्हे, आजवरच्या ११०० साहित्यिकांनी पुरस्कार परत केले तरीही घाबरू नये, दबावात येऊ नये. समाजात रुजलेल्या बौद्धिक दहशतवादाची ही नवीन खेळी सरकार, साहित्य अकादमी अन सामान्य माणसांनी ओळखण्याची गरज आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, १२ ऑक्टोबर २०१५

बुधवार, ७ ऑक्टोबर, २०१५

बेजबाबदार

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत प्रदूषण इतकं वाढलं आहे की, येत्या २२ तारखेला `no car day' पाळण्याची तयारी सरकारने चालवली आहे. त्याला नायब राज्यपालांची परवानगीही मिळाली आहे. त्यावर एका बिझिनेस वाहिनीवर चर्चा झाली. बिझिनेस वाहिनी हे आवर्जून सांगण्याचे कारण म्हणजे, या विषयाचा थेट व्यवसायांशी असलेला संबंध. एक प्रकारे conflict of interest. असे असूनही हे विषय आता इतके महत्वाचे अन संवेदनशील होऊ लागले आहेत की त्याकडे दुर्लक्ष करणे कोणालाच शक्य नाही. तर या चर्चेत, नेहमीप्रमाणेच राजकीय नेतेही सहभागी झाले होते. कॉंग्रेसच्या रागिणी नायक या चर्चेत होत्या. त्यांनी सुरुवातीलाच एक भूमिका मांडली की, प्रदूषण दूर करण्याची जबाबदारी सरकारची आहे त्याची जबाबदारी लोकांवर टाकू नका. त्यांचे शब्द होते- dont shift the onus to peoples shoulder.

जी एक भयंकर मोठी चूक वर्षानुवर्षे चालत आलेली आहे, ती काल त्यांच्या मुखातून बाहेर पडली. आमचे एकूणच जगणे, त्यातील सुखदु:ख, त्रास अथवा सोयीसुविधा, समस्या वा त्या सोडवणे; या बाबी कोणत्याही एका घटकावर अवलंबून नसतात. त्याला अनेक पदर आणि अनेक कोन असतात. अनेकांची आपापली जबाबदारी असते. मात्र काहीही झाले की, सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याची अतिशय घातक सवय आपल्याला लागलेली आहे. `चाहे जो मजबुरी हो, हमारी मांगे पुरी करो' हाच आपला जीवनमंत्र झाला आहे. कोणत्याही गोष्टीची जबाबदारी स्वीकारायला आम्ही तयार नसतो. जबाबदारीविहीन जीवन आम्हाला हवे आहे. पण असे शक्य नसल्याने जबाबदारी ढकलायला सरकार ही एक चांगली गोष्ट आहे. काहीही झाले की सरकार काय करते? सरकार झोपले आहे का? असे प्रश्न विचारले की आमचे काम संपले.

पाश्चात्य सामाजिक विचारातील ही प्रचंड मोठी चूक आणि त्रुटी आहे. पण या पद्धतीने कोणतीही समस्या सुटणे हे मुळातच अशक्य असल्याने वाद, भांडणे आणि संघर्ष सुरु राहतात पण समस्या सुटत नाहीत. उलट समस्येच्या सोडवणुकीतून नवीन समस्या जन्माला येतात. सीसी कॅमेरे याचे उत्तम उदाहरण. चोऱ्या, दरोडे वगैरे होऊ नयेत यासाठी गेल्या काही वर्षात सीसी कॅमेरे आले. पण एकही दिवस असा जात नाही की, त्या कॅमेऱ्यात टिपलेला गुन्हा बातम्यात पाहायला मिळत नाही. समाजाने सुरक्षेसाठी पोलीस दल उभारले, पण पोलिसांवरील अत्याचार वा पोलिसांकडून होणारे अत्याचार; या रोजच्या बातम्या आहेत. सरकार ही गोष्ट सुद्धा चांगल्या सामाजिक व व्यक्तिगत जीवनासाठी निर्माण झाली. पण आज जी स्थिती त्या संबंधाने आहे त्याचे वेगळे वर्णन करण्याची गरज नाही. विद्यार्थांना शिक्षणासाठी पैसा मिळावा म्हणून बँकांनी कर्ज देणे सुरु केले. आज त्या कर्जातील पाच हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम बुडीत खाती आहे.

अक्षरश: असंख्य उदाहरणे देता येतील. एकांगी, बेजबाबदार विचारपद्धती, त्याला अनुसरून योजना, व्यवस्था अन विश्लेषणे; यांनी समस्या सुटत नाहीत. उलट त्यामुळे समस्यांचे डोंगर उभे होत राहतात. व्यक्तिगत जीवनातील एखाद्या क्षुल्लक घटनेपासून तर प्रदूषण वगैरेंसारख्या जगड्व्याळ समस्यांना अनेक पदर अन कोन असतात, अनेकांच्या अनेक जबाबदाऱ्या असतात. त्यातील प्रत्येकाने जबाबदारीने, विचारपूर्वक वागणे, विचार करणे आवश्यक असते. आम्हाला हे किमान मान्य तरी आहे का?

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, ७ ऑक्टोबर २०१५

रविवार, ४ ऑक्टोबर, २०१५

गांधी जयंतीचे अरण्यरुदन

२ ऑक्टोबरला गांधी जयंती साजरी झाली. देशात अन जगभरातही. गेल्यावर्षीपासून देशात या दिवसाला वेगळा रंग चढलेला आहे. तो आहे स्वच्छतेचा. ही चांगलीच बाब आहे. संयुक्त राष्ट्रसंघ हा दिवस अहिंसा दिन म्हणून साजरा करतं. जगातील हिंसाचार मात्र वाढतोच आहे. अगदी या अहिंसा दिनाच्या दिवशीच अमेरिकेतील एका महाविद्यालयात एका माथेफिरूने वर्गात घुसून, विद्यार्थ्यांचा धर्म विचारून त्यांना गोळ्या घातल्या आणि त्यात तब्बल १० विद्यार्थी जागीच मरण पावले. यानंतर पुन्हा एकदा अमेरिकेतील शस्त्र परवाना कायद्यावर चर्चा सुरु झाली आहे.

दहशतवाद आणि हिंसा यांचा अतूट संबंध आहे. नुकतेच पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेत असताना खुद्द संयुक्त राष्ट्रसंघालाच प्रश्न केला की, दहशतवादाची व्याख्या काय? म्हणजे ज्या गोष्टीचा मुकाबला करायचा आहे, त्यावर जो साधकबाधक विचार व्हायला हवा, तोही जगाने अद्याप केलेला नाही असेच म्हणावे लागेल. दहशतवाद म्हणा वा हिंसाचार म्हणा; जगाची चर्चा अजूनही कायदे, नियम, शस्त्रे, परवाने, शिक्षा, व्यवस्था, साधने याच वरवरच्या उथळ बाबींवर चालते. एखाद्याच्या हाती शस्त्र नसतानाही हिंसा होत नाही का? किंवा बॉम्बस्फोट वा सामुहिक हत्याकांड यापेक्षा वेगळा असा दहशतवाद नसतो का? कौटुंबिक हिंसा किंवा आर्थिक दहशतवाद यासारख्या बाबींचा विचार हिंसा आणि दहशतवादाच्या संदर्भात किती होतो?

मुळात हिंसेचे मूळ कुठे आहे? या जगातील बहुतेक सगळ्या कृतींमागे सत्ताकांक्षा ही प्रेरणा असते. कोणाला राजकीय मार्गाने, कोणाला आर्थिक मार्गाने, कोणाला ज्ञानमार्गाने, कोणाला माहितीच्या मार्गाने, कोणाला सौंदर्याच्या मार्गाने, कोणाला पद-प्रतिष्ठेच्या मार्गाने, कोणाला शस्त्राच्या मार्गाने, कोणाला संख्येच्या मार्गाने, कोणाला नीतीच्या मार्गाने, कोणाला अन्य विविध मार्गांनी सत्ता गाजवायची असते. अगदी व्यक्तिगत जीवनापासून जागतिक पातळीपर्यंत ही सत्ताकांक्षा दिसते. आपलं ऐकलं पाहिजे, आपल्या म्हणण्याप्रमाणे झालं पाहिजे, आपल्या मार्गाने चाललं पाहिजे, आपली भाषा- आपली शब्दावली- वापरली पाहिजे; अशी त्याची खूप रूपं पाहायला मिळतात. आपल्याजवळ जे आहे त्याचा उपयोग करून सत्ता राबवणे किंवा नसलेल्या गोष्टींवर ताबा मिळवून सत्ता गाजवणे हे दोन्ही प्रकार पाहायला मिळतात.

अनेकदा सत्ता गाजवण्यासाठी अतिरेकी आग्रह केला जातो. गंमत म्हणजे कधीकधी यात प्रामाणिक कळकळ देखील असते. पण म्हणून व्हायचे परिणाम टाळता येत नाहीत. ही सत्ताकांक्षा जशी स्वार्थाने बरबटलेली असते तशीच जगाच्या कल्याणाच्या करुणेतून सुद्धा आलेली असते. १- मी म्हणजे जग, २- मला जे आणि जसं समजतं ते आणि तेवढंच जग आहे, ३- जगाचं भलं करण्याची जबाबदारी माझीच आहे, ४- माझ्यासमोर जग म्हणजे `किस झाड कि पत्ती', ५- हे जग, येथील माणसे, येथील निसर्ग, येथील सारे काही माझ्यासाठी आहेत, ६- येथील जेवढ्या गोष्टी (पैसा, माणसे, जमीन, साधने, शस्त्रे, यंत्रे, ज्ञान) माझ्या ताब्यात तेवढा मी श्रेष्ठ, ७- अधिकाधिक ताबा म्हणजे अधिक सुख अन अधिक शक्ती; अशा अनेक प्रकारांनी ही सत्ताकांक्षा अभिव्यक्त होते. एकाने सांगितले की हिंसेचे ८१ प्रकार आहेत. या हिंसेलाच संघटीत शक्तीचे बळ लाभते तेव्हा त्यातून दहशतवाद जन्माला येतो. आयएसआयएसचा दहशतवाद तर आम्हाला समजतो, पण जगाच्या ७०० कोटी लोकसंख्येपैकी १२५ कोटी लोकसंख्या असणाऱ्या भारताला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व न देण्याला आम्ही दहशतवाद म्हणत नाही.

पैशाचा लोभ, तो वाढवणाऱ्या बाबी (उदा. फोर्ब्सतर्फे प्रसिद्ध होणारी जगातील श्रीमंतांची यादी), श्रेष्ठत्वाची लालसा इत्यादी गोष्टी हिंसेचे मूळ आहेत. खुद्द गांधीजी म्हणत असत- poverty is the greatest violence. या दारिद्र्याची चिंता आज कोणाला आहे? गरिबी दूर करायला हवी, असे म्हणून गरिबी दूर होत नाही. नव्हे त्यासाठी जगभरात जे उपाय अवलंबिले जातात त्यानेही गरिबी दूर होत नाही. गेल्या कित्येक दशकांचा (शतकांचाही म्हणता येईल) हा अनुभव आहे. कारण गरिबी दूर करा म्हणताना, ती मुळात निर्माण का व कशी होते यावर विचार करायला कोणीही तयार नाही. उद्योग वाढवा, शेती वाढवा, रोजगार वाढवा, कौशल्य वाढवा, तंत्रज्ञान विकसित करा; अशी धावपळ कितीही केली तरीही गरिबी दूर होत नाही, होऊ शकत नाही. कारण गरिबी निर्माण होण्याचा संबंध मानसिकतेशी आहे. जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टीशी आहे. बाकी साऱ्या बाबी पूरक आहेत. मानसिकता व जीवनदृष्टी योग्य असेल तरच त्यांचा उपयोग होईल, त्याचे अपेक्षित परिणाम मिळतील. आजचा खरा प्रश्न हा आहे. माणसाच्या मनातील ही सत्ताकांक्षा कशी कमी करता येईल? योग्य जीवनदृष्टी काय आहे अन ती कशी रुजवता येईल? हे मूळ प्रश्न आहेत. या प्रश्नांना भिडल्याशिवाय हिंसाचार काय वा अन्याय काय संपुष्टात येणे अशक्य आहे. कोणी अमुक म्हणाले, अमक्याने अमुक उपदेश केला आहे, अमक्याने अमुक विश्लेषण केले आहे, अमुक पुस्तकात अमुक सांगितले आहे, अमक्या संस्थेचा अमुक अहवाल आहे, अमक्या सर्वेक्षणात अमुक आढळले... यातील काहीही माणसाला त्याच्या व्यवहाराला प्रवृत्त करीत नाही. कोणीही काहीही सांगो, काहीही म्हणो; त्याने फरक पडत नाही. म्हणूनच दरवर्षी गांधी जयंती साजरी होते अन अरण्यरुदन करण्याशिवाय दुसरे काहीही माणूस करू शकत नाही.

काही गोष्टी अत्यंत स्पष्टपणे बोलण्याचीही गरज आहे. मुळातच सत्ताकांक्षा माणसाच्या मनात असली तरीही सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीच्या अलेक्झांडरच्या विश्वविजयाच्या प्रयत्नातून राजकीय सत्ताकांक्षा जगभरात पोसली गेली. क्रियाप्रतिक्रियातून त्याचे आजचे बीभत्स रूप आकारास आले. सुमारे दीड हजार वर्षांपूर्वीच्या इस्लामच्या उदयाने धार्मिक सत्ताकांक्षा फोफावली. तिच्या क्रियाप्रतिक्रियातून आजची परिस्थिती उद्भवली. अन १६ व्या- १७ व्या शतकातील औद्योगिक क्रांतीने आर्थिक सत्ताकांक्षा जन्माला घातली. त्यापाठोपाठच्या क्रियाप्रतिक्रियातून व तिच्या पोषणासाठी राबवण्यात आलेल्या युरोपीय प्रबोधनपर्वातून आजचे ताणतणाव जन्माला घातले आहेत. आजच्या स्थितीचे तात्विक, वैचारिक, व्यावहारिक संपूर्ण श्रेय पश्चिमेला आहे.

भारतीय औपनिषदिक चिंतन पूर्णत: वेगळी जीवनदृष्टी देते. गांधीजींनी देखील हेच म्हटले होते. ईशावास्योपनिषदाचा प्रथम मंत्र या जगात असेपर्यंत जगाला आशा आहे असे ते म्हणाले होते, तेव्हा त्यांना हेच अभिप्रेत होते. आजची सभ्यता, आजची जीवनशैली, आजची शब्दावली, आजची जीवनदृष्टी, आजची विचारपद्धती यात आमूलाग्र परिवर्तन होणे त्यासाठी गरजेचे आहे. त्यासाठी प्रथम विश्वव्यापी अन समाजव्यापी वैचारिक मंथन सुरु व्हायला हवे. नियोजन, रचना, व्यवस्था, आकडेवारी वगैरे जंजाळ पूर्णत: बाजूला सारून मुळाशी भिडणारी, व्यवहाराला जोडून असणारी तत्त्वचर्चा ही प्राथमिक आवश्यकता आहे. हे झाले तर पुढील पाच-पन्नास वर्षात त्याचे चांगले परिणाम दिसतील. अन्यथा, `बापू असे म्हणाले होते अन आम्ही त्याला हरताळ फासला' असे अरण्यरुदन करत बसण्याला पर्याय नाही.

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, ४ ऑक्टोबर २०१५