शनिवार, १९ नोव्हेंबर, २०१६

सूर्यनारायण राव


जगरहाटीप्रमाणे सूर्यनारायण राव गेलेत. सुदीर्घ आणि कृतार्थ जीवन जगून गेलेत.
तीन-चार वर्षांपूर्वी विजयादशमीला जोडून रा. स्व. संघाच्या ज्येष्ठ प्रचारकांचे एक शिबिर नागपूरला झाले होते. जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात पोहोचलेले देशभरातील सुमारे शंभरेक प्रचारक त्याला आले होते. त्यातील सगळ्यांनीच पाच दशकांहून अधिक काळ संघाचे प्रचारक म्हणून कार्य केले होते. काहींनी तर सहा-सात दशके सुद्धा. त्यावेळी नागपूरच्या विश्व संवाद केंद्राने त्या सगळ्या प्रचारकांच्या मुलाखती घेण्याचा एक उपक्रम केला होता. या निमित्ताने या व्रतस्थ जीवनांना बोलके करणे, त्यांचं जीवन आणि रा. स्व. संघाची वाटचाल यांची प्रेरक माहिती गोळा करणे हा त्याचा हेतू. माझ्याकडे त्यातील तीन नावे आली होती. त्यातील एक होते- सूर्यनारायण राव. त्यापूर्वी त्यांना पाहिले होते. भेटणे, बोलणेही झाले होते. पण ते प्रतिनिधी सभेतील व्यवस्था म्हणून, कधी बौद्धिक वर्गाच्या वा अन्य कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा एखाद्या वेळी एखादा प्रश्न विचारण्यापुरते. मुलाखतीच्या निमित्ताने मात्र त्यांना जवळून पाहता आले, समजून, जाणून घेता आले.
रेशीमबागेतील यादव भवनाच्या तळमजल्यावरील त्यांच्या खोलीत मी पोहोचलो तेव्हा दुसरे एक ज्येष्ठ प्रचारक रंगा हरीजी तिथे बसले होते आणि त्यांची चर्चा सुरु होती. सूर्यनारायण राव संघाचे पहिले अखिल भारतीय सेवाप्रमुख राहिले होते, तर रंगा हरीजी संघाचे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख राहिलेले. दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समग्र साहित्याचे जे १२ खंड गुरुजी जन्मशताब्दी निमित्त प्रकाशित झाले त्याचे संपादन देखील रंगा हरीजी यांनीच केले होते. दोघेही अतिशय ज्येष्ठ, अत्यंत कर्तृत्वसंपन्न, प्रज्ञावान प्रचारक. तरीही मी तिथे पोहोचताच रंगा हरीजी लगेच उठून, नमस्कार करून तिथून गेलेत. मुलाखतीची वेळ ठरलेली होती, मुलाखत घेणारा आला होता; त्यामुळे चर्चा ताबडतोब बंद. अनुशासन आणि साधेपणा, सहजता यापेक्षा वेगळी आणि अधिक काय असू शकते? त्या दोघांपुढे मी कोणीच नव्हतो. थोडा वेळ थांबावे लागले असते तरीही काहीच हरकत नव्हती. पण मला थांबावे लागले असते तर त्याने संघ आणि त्या दोन ज्येष्ठ प्रचारकांच्या महानतेला किंचित धक्का लागला असता ना !!
माझे स्वागत करून मराठीत म्हणाले- बसा. अन मला प्रश्न केला - which language? मी हसत म्हणालो- as you wish. but of course not tamil. त्यावर तेही दिलखुलास हसले. अन म्हणाले- ok. we will start and will proceed naturally आणि इंग्रजी व हिंदीत ही मुलाखत पार पडली. अधून मधून एखादा शब्द वा छोटेसे वाक्य मराठीतही. बोलणे सुरु करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या सहायकाला आवाज दिला. मी म्हटले, काही हवे आहे का? मी देतो. सांगा. ते नाही म्हणाले. सहायक आल्यावर म्हणाले- दोन पेले पाणी भरून इथे ठेव. सहायकाने पाणी ठेवल्यावर गप्पा सुरु झाल्या आणि सुमारे नऊ दशकांचा जीवनपट आणि संघाचा इतिहास उलगडू लागला. धिप्पाड शरीरयष्टीचे सूर्यनारायण राव थोडे थकले होते, पाय कामातून गेल्याने उठबस नव्हती, वॉकरशिवाय पान हलत नव्हते; पण आवाज आणि स्मृती मात्र खणखणीत होती. बोलण्याच्या ओघात सव्वा तास कसा गेला कळलेच नाही. बोलणे मात्र पूर्ण झालेच नव्हते. कारण त्यांच्याकडे सांगायला खूप होते आणि मला ऐकण्यासारखे खूप होते. मग तेच म्हणाले- तुम्ही परवा या. उद्या तर विजयादशमी. उत्सव आणि सणाचा दिवस. परवा संध्याकाळी समारोप आहे. तुम्ही दुपारी या. मला मिळालेला हा आनंददायी बोनस होता.
ठरल्याप्रमाणे गेलो. सूर्यनारायण राव तयारच होते. मी विचारले- कालचा दसरा उत्सव कसा वाटला? प्रसन्न होऊन म्हणाले- खूप छान. उत्सव छान झाला. संख्याही भरपूर होती. मी पहिल्यांदाच नागपूरचा दसरा उत्सव पाहिला, त्यात सहभागी झालो. कधी योग आला नव्हता. पुन्हा तास- सव्वा तास बोलणे झाले. त्यांनी एक छान आठवण सांगितली. गोळवलकर गुरुजी तामिळनाडू प्रवासात होते. ते सुर्यनारायण राव यांच्या घरी गेले. त्यांच्या पद्धतीप्रमाणे गुरुजींनी सगळी चौकशी केली. तेव्हा लक्षात आले की, त्या कुटुंबात एक चिंता आहे. सूर्यनारायण राव यांची बहीण आणि नंतर राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय मंडळात राहिलेल्या रुक्मिणी अक्का यांना नागपूरला शिकायला जायचे होते आणि नागपूरला तर त्यांचे कोणीच नव्हते. गुरुजी लगेच म्हणाले- गोळवलकरांचे घर तुमचे नाही का? आणि रुक्मिणी अक्का पुढील व्यवस्था होईपर्यंत गुरुजींच्या घरी राहिल्या. बोलणे संपवून निरोप घेऊन मी उठलो. निघण्यापूर्वी त्यांना नमस्कार केला आणि दाराकडे वळलो त्यावेळी ते म्हणाले- माफ करा हं. तुम्हाला निरोप द्यायला मी दारापर्यंत येऊ शकत नाही. यावर मी काय बोलणार? एक आवंढा गिळला आणि बाहेर पडलो.
सूर्यनारायण राव १९४६ साली प्रचारक निघाले. महात्मा गांधीजींची हत्या झाली त्यावेळी गुरुजी मद्रासला प्रतिष्ठित नागरिकांच्या कार्यक्रमात होते. सूर्यनारायण राव त्यावेळी तिथे गुरुजींसोबत होते. नंतरच्या घटनाक्रमात त्यांना अटक झाली होती. कारागृहात असताना त्यांनी संपूर्ण विवेकानंद साहित्य अनेकदा वाचून काढले होते. ते त्यांना अक्षरशः पाठ होते. पृष्ठ क्रमांकासह. त्यानंतर अनेक वर्षांनी विवेकानंदांचे ते संपूर्ण साहित्य मद्रास कारागृहाच्या ग्रंथालयाला देण्याचा कार्यक्रम झाला. त्यावेळी सूर्यनारायण राव यांना खास आमंत्रित करण्यात आले होते. स्वामीजींच्या शिकागो भाषणाच्या शताब्दीनिमित्त नागपूरला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा एक कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमात त्यांनी दिलेले संदर्भ ऐकून सगळेच अवाक् झाले होते. प्राचार्य राम शेवाळकर त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. ते तर अक्षरशः भारावून गेले होते. तोवर शेवाळकर संघ वा संघ परिवाराचे विरोधक नसले तरीही फार जवळ सुद्धा नव्हते. परंतु त्या भाषणाने त्यांना अधिक जवळ आणले होते.
दक्षिण भारतात, विशेषत: तामिळनाडूत संघाचे काम रोवण्यात सूर्यनारायण राव यांचे फार मोठे योगदान आहे. तामिळनाडूत ४० च्या दशकातच काम सुरु झाले होते तरीही ते रुजले नव्हते. अन्य प्रांतांच्या तुलनेत तामिळनाडू प्रांत संघाच्या कामात एकदम पिछाडीवर होता. कुख्यात आणीबाणीनंतर तेथील कामाने वेग घेतला. त्यासाठी एक घटना सांगता येईल. संघाच्या इतिहासात प्रथमच आणीबाणीनंतर सरसंघचालकांचे विजयादशमीचे भाषण आधी तयार करून देशभर एकाच वेळी पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानुसार ते भाषण `तुघलक'चे संपादक चो रामस्वामी यांच्याकडेही पोहोचवण्यात आले. त्यावर चो रामस्वामी यांचे म्हणणे पडले की, भाषण ठीक आहे. मात्र संघावर अनेक आरोप होत असतात, आक्षेप घेतले जातात त्यांना कोणी अधिकाऱ्याने सविस्तर उत्तरे दिली पाहिजेत. त्यानुसार त्यांनी आपल्या संपादक विभागातील सहकाऱ्यांना अनेक वृत्तपत्रे, नियतकालिके यातील संघविषयक बातम्या व लेखांचे अध्ययन करून चार पानांची एक प्रश्नावली तयार केली आणि सहकाऱ्यांना त्या प्रश्नावलीसह मद्रासच्या संघ कार्यालयात पाठवले. तेथे सूर्यनारायण राव यांनी त्या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली. हा सगळा मजकूर सुमारे ५१ पानांचा झाला. चो रामस्वामी यांनी त्याचे संपादन करून ती उत्तरे विस्तारपूर्वक `तुघलक'मध्ये छापली. परिणामी संघाचे काम सुरु करा, अशी मागणी करणारी ६०० पत्रे २० दिवसात संघाच्या मद्रास कार्यालयात आलीत. येथून संघाच्या कामाने तामिळनाडूत उचल घेतली.
महाराष्ट्राचे एक माजी राज्यपाल सी. सुब्रमण्यम यांचे काका स्वामी चिद्भवानंद यांचे अनेक आश्रम आणि मठ तामिळनाडूत आहेत. ते संघाचे कट्टर विरोधक होते. मात्र सूर्यनारायण राव यांनी एका कार्यक्रमासाठी त्यांना बोलावले. त्यांनी स्पष्ट नकार दिला. सूर्यनारायण राव मात्र त्यांच्या मागेच लागले. स्वामी चिद्भवानंद त्यांना म्हणाले- मी एका अटीवर येईन. मी वेळेचा आणि शिस्तीचा अतिशय भोक्ता आहे. तुमचा कार्यक्रम शिस्तशीर आणि वक्तशीर होणार असेल तरच मी येतो. सूर्यनारायण राव हो म्हणाले. स्वामीजी कार्यक्रमाला आलेत आणि तेथील शिस्तशीरपणा आणि वक्तशीरपणा यांनी इतके प्रभावित झाले की, तेथेच त्यांनी जाहीर केले की, राज्यभरातील त्यांचे मठ आणि आश्रम संघासाठी सदैव खुले राहतील. सूर्यनारायण राव यांनी तामिळनाडूत संघकार्यासाठी एक भक्कम आधार त्यांच्या रूपाने उभा केला होता.
रेशीमबागेत माझ्याशी झालेल्या बोलण्यात त्यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली होती. ते म्हणाले- ९० च्या दशकात संघ म्हातारा झाला अशी एक चर्चा संघात आणि संघाबाहेरही सुरु झाली होती. आम्हा कार्यकर्ता मंडळींच्या मनातही पुढील वाटचालीचा गंभीर विचार सुरूच होता. अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते वृद्ध होत होते. तेव्हा सरसंघचालक रज्जुभैय्या यांच्याशी हा विषय बोलावा असे ठरले. त्यावेळच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी विचारविनिमय केला आणि रज्जुभैय्यांना याबद्दल पत्र लिहिण्याचे ठरले. ते काम सूर्यनारायण राव यांच्यावर सोपवण्यात आले. त्यानुसार त्यांनी सगळ्यांच्या वतीने सरसंघचालकांना एक पत्र लिहून ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी पदावरून दूर व्हावे आणि तरुण कार्यकर्त्यांकडे जबाबदारी सोपवावी असा विषय मांडला. स्व. रज्जुभैय्या यांनी याला संमती दिली आणि आपणही वृद्ध झालो असल्याने आपणही निवृत्त होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतरचा इतिहास सगळ्यांना परिचित आहे.
सूर्यनारायण राव यांच्या रूपाने संघाच्या महत्वाच्या सात दशकांच्या इतिहासाचा साक्षीदार आणि संघाचा इतिहास घडवणारा एक शिल्पकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली.
- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, १९ नोव्हेंबर २०१६

मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०१६

थोडे वेगळे


झोपेतून उठलो. किती वाजले म्हणून फोन पाहिला तर ३-४ मेसेजेस. आश्चर्य वाटलं. पाहिलं तर मेसेजेस india mart चे. मी काहीही न करताच माझा पासवर्ड इत्यादी आलेले. दिवसाची सुरुवात झाली तेवढ्यात एक फोन- `सर आपने फर्निचर का ऑर्डर दिया था.' त्याला तोडत म्हटले- `नाही, मी ऑर्डर दिली नाही.' फोन बंद केला. त्यानंतरही दोन फोन. अखेर खडसावलं. तेव्हा ब्याद गेली. ज्या कंपनीचे सीम आहे त्या कंपनीचे तीन चार मेसेजेस - why worry about cash. use this and that. pls download.
cashless economy चा विचार करताना याचाही विचार व्हायला हवा. प्रगती हवी तर हा त्रास सहन करायलाच हवा किंवा या त्रासावर हे १० उपाय आहेत, अशासारखे सल्ले `शहाणपण' या सदरात मोडणार नाहीत. हां ज्यांना त्यात आनंद वाटतो त्यांनी जरूर ते करावे, पण आमच्या कल्पनाचित्रातील जग साकारायचे असल्याने तुम्ही त्रास सहन करायलाच हवा हे म्हणणे योग्य नाही. पैसा, खरेदी-विक्री, वादावादी, भांडणे अन ती सोडवणे, कायदा अन त्याची कलमे तोंडी लावत जगणे, भौतिक आणि लौकिक गोष्टीतच ज्यांना जीवन घालवायचे त्यांनी घालवावे पण सगळ्यांनी तसेच जगावे हा दुराग्रह चुकीचा.
@@@@@@@@@@@@@@@
थोडे unaccounted money बद्दल...
कालच गुरु नानक जयंती झाली. त्यांच्याबद्दल असं सांगतात की, आपल्या उदासीन मुलाने व्यापार करावा म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना काही पैसे दिले आणि व्यापार करण्यास सांगितले. नानकदेवांनी ते पैसे गोरगरिबांना वाटून टाकले. एका अर्थी हा आर्थिक गुन्हाच म्हणायला हवा. मात्र त्याने नुकसान झाले नाही. उलट गरीबांचा तर फायदा झालाच पण जगाला नानक देव लाभले. गेल्या अनेक दशकात गोळा झालेल्या काळ्या पैशाने आतंक, दहशतवाद, अमली पदार्थांचा विळखा, नक्षलवाद इत्यादी समस्या अक्राळविक्राळ झाल्या यात वादच नाही. परंतु त्याच्या नावावर काही सकारात्मक गोष्टीही आहेत हे विसरायला नको. राजकारणात अमाप काळा पैसा आहे. त्याचे असंख्य दुष्परिणाम आहेतच. पण, त्या काळ्या पैशाने लाखो लोकांचे भरणपोषण केले आहे, लाखो लोकांना दहा-वीस रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत मदतही केली आहे. अनेकांची आजारपणे, अनेकांची महागडी ऑपरेशन्स या unaccounted money तून झाली आहेत. अनेक मुलींचे संसार सुरु झाले आहेत. अनेकांची शिक्षणे झाली आहेत. असंख्य सामाजिक, सांस्कृतिक संस्था उभ्या झाल्या आणि चालल्या आहेत. देवस्थानांजवळ असलेल्या unaccounted money तून लाखो लोकांची पोटे भरत असतात. त्यात अनेक गरजूही असतात. या गरजूंची पोटे भरायची म्हटल्यास सरकारला किती अन काय काय करावे लागेल? या अन्नछ्त्रांसाठी लागणारे सामान आणि माणसे यांचे केवढे अर्थकारण चालते. गृहिणींच्या हाती असलेल्या, डब्यात लपवलेल्या पैशातून घरात आलेली अडचण कळतही नाही आणि सुटून जाते. आपल्या समाजाच्या या सवयीमुळेच जागतिक मंदी आमच्यासाठी फार महत्वाची ठरली नाही. parallel economy मुळेच समाजाला फार प्रश्न पडलेही नाहीत. unaccounted money, parallel economy ही पूर्णत: वाईट, कुचकामाची आणि चिरडून टाकण्याच्या लायकीची हा विचार एका टोकाचा आहे.
मात्र, या unaccounted money चा अतिरेक झाला आणि अधूनमधून त्याच्या नाड्या आवळल्या नाहीत तर ते सगळ्याच दृष्टीने घातक ठरते. त्यासाठी cautious and prudent अप्रोच हवा. अर्थव्यवस्था cashless असो की रोखीची, मोठ्या नोटा असोत वा लहान, unaccounted money जनरेट होतच असतो. कारण ती समाजाची गरजही असते. अर्थव्यवस्थेचीही गरज असते. वेळोवेळी आढावा आणि छोटेमोठे उपाय करून त्याचे व्यवस्थापन करता येऊ शकते, करायला हवे. रिझर्व्ह बँक करीत असलेले cash reserve ratio सारखे उपाय याचाच भाग असतात. मोठ्या नोटा रद्द करण्याचा ताजा निर्णय असाच एक उपाय आहे. ती जादूची कांडी नाही. अर्थात हा उपाय वेगळ्या पद्धतीने करता आला असता. तो perception चा भाग आहे. मात्र हा उपाय वेगळ्या पद्धतीने करता आला असता असे कोणी म्हटले तर त्याकडे संशयाने पाहण्याचे कारण नाही. खुद्द स्टेट बँक ऑफ इंडिया या सगळ्यात मोठ्या बँकेने याच वर्षी एप्रिल महिन्यात सादर केलेल्या एका अहवालात याची चर्चा केली होती.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
आज एका अर्थवाहिनीचा एक कार्यक्रम झाला. `अर्थकारणात महिलांचे स्थान' हा त्याचा विषय. वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी या त्याला उपस्थित होत्या. आपल्या भाषणात बोलताना त्यांनी भारतीय कुटुंब व्यवस्थेचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या- आपल्या आजी पणजी कोणाला न कळता पैसा वाचवून ठेवत. कशासाठी? कोणाची तब्येत बिघडली, धान्य किराणा आणायला पैसा नसला इत्यादी कारणांसाठी. त्या स्वत:साठी पैसा जमवत नसत. येथपर्यंत सगळे ठीक होते पण नंतरचे वाक्य जे स्मृती इराणी बोलल्या ते योग्य म्हणता येणार नाही. त्या म्हणाल्या- आता महिलांनी आपल्यासाठी पैशाचा विचार केला पाहिजे. ज्या भारतीय कौटुंबिक मूल्यांचा आपण गौरवाने उल्लेख करतो आणि सगळे जग ज्या कौटुंबिक मूल्यांसाठी भारताचे उदाहरण देतात त्या कौटुंबिक मूल्यांनाच हे छेद देणे आहे. स्वत:चा विचार न केल्यामुळे आपल्या महिलावर्गाला त्रास सोसावा लागला यात वाद नाही. पण त्यावरचा उपाय त्यांनी स्वार्थाचा विचार करणे हा नसून बाकीच्यांनी त्यांचा विचार करणे हा आहे. प्रत्येकाला स्वत:चा विचार करायला शिकवून जगाचं सोडा स्वत:चं देखील भलं होणं कठीण. आज जबाबदार म्हणवणारे लोक आणि एकूणच विचारप्रवाह अधिकृतपणे स्वार्थी होण्याचा उपदेश देत असतील तर पुढील ५० वर्षात जगाचं वाटोळं झालेलं असेल.
कुटुंब कसं असतं? जिथे कायदे आणि नियम नाहीत, पण जबाबदारी आहे. जिथे शिक्षा वगैरे नाही स्नेहाचं बंधन आहे. जिथे वागणे, बोलणे, खाणे, पिणे, सवयी कशाचेही साचे नाहीत आणि तरीही कुटुंब एक युनिट आहे. तिथे किती जवळ यायचं यालाही बंधन नाही, किती दूर जायचं यालाही बंधन नाही. तरीही ते तुटत नाही. कुटुंब हे समाजाचं प्राथमिक स्वरूप आहे आणि `वसुधैव कुटुंबकम' ही आमची आकांक्षा आहे. आजच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी, किरकोळ गोष्टी, आधुनिक म्हणून स्वीकारल्या जाणाऱ्या गोष्टी यांचा विचार, यांची चिकित्सा, यांचे विश्लेषण या भूमिकेतून व्हायला हवं. तरंच काही आशा बाळगता येईल.
@@@@@@@@@@@@@
पुराणमित्येव् न साधु सर्वम्
नचापि काव्यम् नवमेतवद्यम
सन्त: परिक्षान्यतरद भजन्ति
मूढ: परप्रत्ययनेन बुद्धिः ......... (कालिदास)
जुनं ते सगळं योग्य असं नाही. नवीन ते सर्व कल्याणकारी असंही नाही. संत सारासार विचार करतात. मूर्ख लोक दुसऱ्याचे अनुकरण करतात.
सध्या इतकंच.
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, १५ नोव्हेंबर २०१६

शनिवार, १५ ऑक्टोबर, २०१६

नाण्याची दुसरी बाजू


नाण्याची एकच बाजू आपण पाहू शकतो. नाण्याच्या दोन्ही बाजू एकाच वेळी पाहणे कोणालाही शक्य नाही. कोणीही कितीही विद्वान, कर्तृत्ववान वगैरे असला तरीही नाण्याच्या दोन्ही बाजू एकाच वेळी पाहणे जमुच शकत नाही. ती आपली अंगभूत मर्यादा आहे. हां, पण एकदा एक बाजू; त्यानंतर दुसरी बाजू; असे पाहता येते. दोन्ही बाजू पाहिल्यानंतर त्या स्मृतीत साठवून, एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात हे समजून नाणे मात्र एकच आहे ही धारणा पक्की होते. त्यामुळे नाण्याची देवाणघेवाण करताना आपण नाण्याच्या दोन्ही बाजू पाहत नाही. ते नाणे आहे एवढेच पाहतो. हाच विवेक. दुर्दैवाने आज हा विवेक आपण गमावून बसतो आहोत. आपल्या अहंमन्य दांभिकतेपोटी अनेक चुकीच्या गोष्टी आपण करतो आहोत आणि त्यातून एक सार्वत्रिक निराशा, असंतोष, हतबलता आणि त्याच्या परिणामी उद्रेक घडवून आणतो आहोत. विचार करण्यासारखा आणखी एक पैलू म्हणजे, ही एकांगी अहंमन्य दांभिकता भलेपणातूनदेखील आलेली असू शकते. चांगले असण्याचा, भले करण्याचा देखील प्रचंड अहंकार असतो. तो वाईटाच्या अहंकारापेक्षा घातक असतो. कारण वाईट गोष्ट ही मुळातच वाईट असते, त्रासदायक असते. तिला सहानुभूती मिळत नाही आणि जो वाईट वर्तन करतो तोदेखील मनातून त्या कृतीला पाठींबा देत नाही. चांगल्या गोष्टीला मात्र सहानुभूती आणि समर्थन असते. त्यामुळे त्यातील दुसरी बाजू लक्षात घेतली जात नाही आणि प्रचंड एकांगीपणा जन्माला येतो. आजच्या तारखेतील दोन उदाहरणे यासाठी पुरेशी आहेत. त्यांच्यात तसे कोणतेही साम्य नाही. मात्र त्याच्या हाताळणीमागील मानसिकता सारखीच आहे. भलं करण्याच्या अहंमन्य एकांगीपणातून आलेली.
आजच एक बातमी वाचली. मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी हेल्मेटबाबत केलेल्या सर्वेक्षणाची. हेल्मेट कसे योग्य इत्यादी गोष्टी त्यात ओघानेच आल्या. आपल्याला जो निष्कर्ष काढायचा आहे त्यासाठी अशी सर्वेक्षणे बेमालूमपणे करवून घेणे, त्याचे निष्कर्ष ढोल बडवत प्रचारित करणे, त्यातून दडपण उभे करणे आणि आपले निष्कर्ष गळी उतरविणे ही आज नवीन बाब राहिलेली नाही. हे सर्वेक्षणदेखील त्यातीलच म्हणायला हवे. अन्यथा- हेल्मेटच्या फायद्यांचा अभ्यास करताना, ते अडचणीचे आणि uncomfortable असू शकते याचाही अभ्यास का होऊ नये. नाण्याची एकच बाजू पाहण्याचा एकांगी अहंमन्यपणा याशिवाय दुसरे कारण असू शकत नाही. एखाद्या गोष्टीचा प्रामाणिक, कळकळीने विचार करत असतानाही, त्याची दुसरी बाजू असू शकते आणि ती तेवढीच खरी असू शकते हे २१ व्या शतकातही समजू नये ही मानवी शोकांतिका आहे. पण भलेपणाची समज आणि ठेका आम्हालाच मिळालेला आहे हा समज जर सोडायचाच नसेल तर `गाढवापुढे वाचली गीता...' याशिवाय दुसरे काहीही प्रत्ययाला येऊ शकत नाही.
दुसरा विषय सध्या सुरु आहे तो- समान नागरी कायद्याचा. अनेकांना धक्का बसेल, अनेकांना पटणार नाही आणि हा किंवा तो गट असाच विचार करू शकणाऱ्यांना बंडखोरी वाटेल; पण समान नागरी कायदा करणे मला मान्य नाही. मुळात असे कायद्यावर कायदे करत जाणे निरर्थक आहे. प्रत्येक कायदा करताना आता सारे काही छान सुरळीत होईल अशी प्रचंड आशा बाळगली जाते. अन काहीच काळात तसे काहीही होत नसल्याचा प्रत्यय येतो. हा जगभरातील हजारो वर्षांचा अनुभव आहे. याचा अर्थ कायदे नकोत असाही नाही. परंतु कायदे म्हणजे काय? कायदे कशासाठी? कायद्याच्या मर्यादा आणि बलस्थाने कोणती? कायदा राबवणे आणि त्यामागील मानसिकता? समाजाची जडणघडण आणि वाटचाल, मानवी वर्तन यासारख्या अनेक गोष्टींची जी समज विकसित व्हायला हवी ती झालेलीच नाही. ही समज विकसित होण्याची प्रक्रिया कायम दुर्लक्षित राहते. त्याऐवजी कायदे करून टाका ही `टोळी मानसिकता' सोपी आणि सोयीची वाटते. मुळातच परिवर्तन म्हणजे काय? कशासाठी? कसे? परिवर्तन सत्तेद्वारे होते का? होऊ शकते का? तसे केल्यास होणारे परिणाम काय असतात? परिवर्तनाची एखाद्याची कल्पनाच योग्य, तीच सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे का? एखाद्याची परिवर्तनाची कल्पना राबवण्यासाठी सत्तेचा वापर हा राक्षसीपणा नाही का? नाण्याची एकच बाजू पाहून तेवढीच खरी मानण्याचा दुराग्रह एवढेच त्याचे स्वरूप म्हणावे लागेल.
समान नागरी कायद्याचे उदाहरण घेतल्याने त्याच्या थोड्या तपशीलाची चर्चा अप्रस्तुत ठरू नये. विवाहपद्धती आणि कुटुंब व्यवस्था हा यातील कळीचा मुद्दा आहे. या दोन्हीही गोष्टी मानवी गरज, सामाजिक व्यवस्था, आर्थिक बाजू, धार्मिकता या सगळ्यांचे संमिश्रण असते. विवाह केवळ मानवी गरजेसाठी आहे असे म्हणणे जसे चुकीचे, तसेच ती फक्त सामाजिक व्यवस्था आहे किंवा त्याला फक्त आर्थिक वा धार्मिक अर्थ आहे हे म्हणणेही चुकीचे. सगळ्याच गोष्टी त्यात अंतर्भूत आहेत. अन या सगळ्या बाबी प्रत्येक व्यक्तीसाठी आणि समाजासाठी वेगवेगळ्या असतात. मूलतः प्रत्येक व्यक्ती ज्या एका परिपूर्णतेकडे कळत वा नकळत चालतो, त्याला साहाय्य करेल अशाच पद्धतींचा अवलंब माणूस करीत असतो. ही अतिशय धीमी आणि गुंतागुंतीची प्रक्रिया असते. त्यात घिसाडघाई करणे, अन्य कोणी अवाजवी लुडबुड वा हस्तक्षेप करणे यामुळे खरे तर त्या त्या व्यक्तीच्या अथवा व्यक्तीसमूहाच्या वाटचालीचा बट्ट्याबोळ होतो. त्यासाठी अवाजवी दंडव्यवस्था सर्वनाशाला कारणीभूत ठरते. जात आणि जातीयता यांचे आजचे चित्र याची साक्ष ठरावे. एक पत्नी वा एक पती ही आदर्श व्यवस्था आपण म्हणू शकतो. परंतु तसेच असले पाहिजे ही एकांगी भूमिका होईल. काही लोक लग्न न करताही राहू शकतील, तर दोन बायका किंवा दोन पती ही काहींची आवश्यकता असू शकेल. प्रभू राम एकपत्नीव्रती होते, तर त्यांचे पिता दशरथ यांनी तीन विवाह केले होते. भगवान कृष्णांनी एक सहस्र विवाह केले, तर त्यांचे आईवडील तसे नव्हते. शिवाजी महाराजांनी एकाहून अधिक विवाह केले म्हणून ते वाईट ठरत नाहीत किंवा स्वामी विवेकानंदांनी विवाह केला नाही म्हणून तेही अयोग्य ठरत नाहीत. जास्त विवाह करणाऱ्या लोकांबद्दल जशा चर्चा होतात, तशाच विवाह न करणाऱ्या लोकांबद्दलही होतात. कमी किंवा जास्त विवाह याची अनेक कारणे असू शकतात. एकाच आयुष्यात पाच-सहा लग्न केले तर चालते, तेवढेच घटस्फोट घेतलेत तरीही चालते; पण घटस्फोटाशिवाय एकाच वेळी एकाहून अधिक लग्न चालत नाहीत. का? कोणी जर ते सांभाळू शकत असेल तर त्याचे स्वातंत्र्य का हिरावून घ्यावे? हां, त्याच्या कृत्याची जबाबदारी त्याची राहील एवढे पुरेसे. ती जशी पुरुषाची राहील तशीच स्त्रीचीही राहील. जबाबदारी घ्यावी आणि आपापला मार्ग निवडावा. विवाह कसा करायचा याचीही एकसमान तऱ्हा असण्याची गरज नाही.
बुरखा किंवा तलाक हेदेखील मुद्दे आहेत. मानवीयता आणि मुस्लिम महिलांचा विकास यासंदर्भात ते योग्य असले तरीही परिवर्तन हे आतून आणि त्याच्या अंगभूत गतीने व्हावे. बुरखा प्रथा असणाऱ्या मुस्लिम समाजात सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या महिला नाहीत का? राष्ट्राध्यक्ष होणाऱ्या महिला नाहीत का? अमेरिकेत अजून महिला राष्ट्राध्यक्ष झालेली नाही पण पाकिस्तान, बांगलादेशात झाल्या आहेत. तीन वेळा तलाक म्हणून तलाक देणाऱ्या मुस्लिम समाजात तसे न वागणारेही भरपूर आहेत. बहुविवाह न करणारेही आहेत. आजवर झालेले परिवर्तन कसे अन कशाच्या आधारे झाले? तोच प्रवाह पुढे कसा जाईल एवढेच पाहणे पुरेसे असते. उगाच आक्रस्ताळेपणा करणे, जिथेतिथे दंडशक्ती वापरणे; मुख्य म्हणजे मला वाटते ते, मला वाटते त्या गतीने व पद्धतीने व्हायला हवे हा दुराग्रह पथभ्रष्ट करतो. परिवर्तने हिंदूंची असोत की मुस्लिमांची; भले याचे असो वा त्याचे अंगभूत रीतीने व गतीने व्हावे. मुख्य म्हणजे चांगलेपणाचे साचे बनवणे आणि सगळ्या जगाला त्या साच्यात घालणे, त्यासाठी सत्ता राबवणे; कधीच इष्ट नाही. लाल, काळ्या, पिवळ्या, पांढऱ्या, निळ्या, भगव्या, बहुरंगी सगळ्याच रंगांना हे लागू होते. मानवाच्या आंतरिक वातावरणाचा, आंतरिक पर्यावरणाचा सत्तानिरपेक्ष विकास व्हायला हवा. त्यावर भर देणे मानवी इतिहासात अजून तरी सुरु झालेले नाही. ते व्हायला हवे एवढे मात्र खरे.
- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, १३ ऑक्टोबर २०१६

शनिवार, ८ ऑक्टोबर, २०१६

`प्रामाणिक पण अयोग्य' हिंदू वा भारतीय विचार विश्वापुढील आव्हान

पाकिस्तानी कलाकारांच्या संदर्भात सध्या बरीच चर्चा सुरु आहे. कलाकारांवर अशी बंधने असू नयेत, असाही त्यातील एक सूर आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, अनेकांना तसे प्रामाणिकपणे वाटते. कला, कलाकार, सादरीकरण यांचा आणि दहशतवाद, दोन देशातील संघर्ष- वाद यांचा काय संबंध असा त्यांचा प्रामाणिक प्रश्न असतो. याचा अर्थ त्यांचा युक्तिवाद बरोबर असतो असे नाही, पण त्यांचे वाटणे प्रामाणिक असते. या अयोग्य पण प्रामाणिक मताचा अधिक खोलवर विचार करण्याची गरज आहे. या विश्वातील प्रत्येक वस्तू, विचार, व्यक्ती, घटना वेगवेगळी आहे; हा सिद्धांत या विचारांच्या मुळाशी आहे. वर्तमानात ज्याला `वैज्ञानिक विचारपद्धती' म्हटले जाते ती हीच. या विश्वातील यच्चयावत प्रत्येक बाब सुटी सुटी आहे. हे सगळे सुटे भाग जोडून हे विश्व आकारास आलेलं आहे असा विचार हे लोक करतात. कधी काही समस्या आली तर संबंधित सुटा भाग काढून टाकायचा, त्याजागी दुसरा बसवायचा म्हणजे झाले. या विश्वातील प्रत्येक वस्तू, विचार, व्यक्ती, घटना परस्परांशी जैविक पद्धतीने जोडल्या असून त्यांचा एकमेकांवर परिणाम होत असतो. त्या विलग करता येत नाहीत. खाणेपिणे, कपडेलत्ते, वागणेबोलणे, चालणेफिरणे यासारख्या मोजमाप करता येईल अशा गोष्टी; मन आणि त्याच्या चलनवलनावर परिणाम करतात हे त्यांना मान्य नसते. शरीर वेगळं, मन वेगळं, बुद्धी वेगळी, भावना वेगळ्या, विचार वेगळे, बाह्य घडामोडी वेगळ्या असा त्यांचा समज असतो. यातील काहीही वेगळं नसून त्यातील प्रत्येक गोष्टीचा प्रत्येकीवर परिणाम होतो हे त्यांना मान्य नसते. परिणामांचा हा आंतरिक फापटपसारा शरीरातील सूक्ष्म रक्तवाहिन्यांसारखा म्हणता येईल. कुठून कुठे काय पोहोचवतं माहीत नाही. त्यासाठी बुद्धीची सूक्ष्मता हवी. अर्थात रक्तवाहिन्या हे फक्त उदाहरण आहे. त्या प्रत्यक्ष दिसू शकतात आणि भावभावना आणि बाह्य गोष्टी यांना जोडणाऱ्या वाहिन्या दिसत नाहीत हा त्यातील ठळक भेद होय. त्यामुळेच अनेकदा- `पुरावे काय?' या प्रश्नावर येऊन चक्रव्यूह सुरु होतो. परंतु पुरावे नसतानाही अनेक गोष्टी वास्तव असतात. एखाद्या गोष्टीचे पुरावे नाहीत म्हणजे ती गोष्टच नाही असे होत नाही आणि एखाद्या गोष्टीचे पुरावे आहेत म्हणजे ती आहेच असेही होत नाही. मन कोणीही दाखवू शकत नाही पण ते नाही असे नाही. अन पुरावे असून ती गोष्ट नसते याचे उदाहरण म्हणून मकरंद अनासपुरे यांचा `कायद्याचं बोला' चित्रपट पाहावा. `कळते पण वळत नाही' अशी माणसांची स्थिती का असते याला तुकड्यात विचार करणाऱ्यांकडे काहीही उत्तर नसते. अशा वेळी ते फक्त चिडचिड करतात. आधुनिक विज्ञान (relativity and quantum mechanics च्या आधीचे) आणि त्या आधारावर विकास पावलेली विचारपद्धती, त्यातून घडलेले प्रबोधनपर्व हे सगळे याच्या मुळाशी आहे.

relativity and quantum mechanics यांच्यानंतरचे विज्ञान मात्र वेगळे आहे. ते या विश्वाला सुटे भाग एकत्र करून assemble केलेले समजत नाही. हे संपूर्ण विश्व एक एकसंघ एकक आहे. आपण त्या विश्वाच्या अंतर्गत असल्याने त्याचे संपूर्ण आकलन करू शकत नाही असे त्याचे म्हणणे आहे. हा विचार वेदांताकडे घेऊन जाणारा आहे. मात्र या आधुनिकोत्तर विज्ञानाच्या आधारावरील विचारपद्धती अजून विकसित झालेली नाही. त्यानुसार प्रबोधन ही त्याही पुढील पायरी. दुर्दैवाने या विश्वाच्या चुकीच्या धारणांवर आधारित विचार, कल्पना, संकल्पना, पद्धती, रचना, मान्यता, शब्दावली घेऊन आम्ही समस्यांची उत्तरे शोधीत आहोत. हिंदू वा भारतीय विचारविश्व हेदेखील या जंजाळात अडकले आहे. गेली तीन-चारशे वर्षे ज्या चुकीच्या रस्त्यावरून चालतो आहोत त्याच चुकीच्या रस्त्यावर आम्ही हवा असलेला पत्ता शोधत भटकतो आहोत. त्यामुळे आम्हाला पत्ता सापडणारच नाही. आम्ही मुक्कामावर पोहोचूच शकणार नाही. हिंदू अथवा भारतीय विचारविश्वापुढे हे खरे आव्हान आहे. आम्ही चालतो आहोत तो रस्ता, त्यावरील ओळखीच्या खाणाखुणा, त्याची दिशा हे सगळेच चुकलेले आहे हे समजावून देणे आणि योग्य रस्ता, दिशा आणि खाणाखुणा सांगणे; ही हिंदू अथवा भारतीय विचारविश्वाची पुढील दिशा असायला हवी. प्रथम त्यांनाच हे समजावून घ्यावे लागेल. त्यासाठी प्रचंड मोठा सायास लागेल आणि धीट व्हावे लागेल. राजकारणापल्याड जाऊन `प्रामाणिक परंतु अयोग्य' असा हा विचारव्यूह भेदावा लागणार आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, ८ ऑक्टोबर २०१६

बुधवार, २१ सप्टेंबर, २०१६

एकात्म मानववाद काय आहे?


भारतीय जनता पार्टीने `एकात्म मानववाद' हा पक्षाचा वैचारिक आधार म्हणून स्वीकारला आहे. त्यामुळे अनेकांच्या कानावर `एकात्म मानववाद' हे शब्द पडले आहेत. परंतु `एकात्म मानववाद' म्हणजे नेमके काय? काय आहे हा `एकात्म मानववाद'? हे मात्र फारसे चर्चेचे विषय नसतात. एकूण `एकात्म मानववाद' याचं आकलन फारसं नाही हे वास्तव आहे. भारतीय जनता पार्टीने `एकात्म मानववाद' म्हणजे `अंत्योदय' असं सोपं, सुटसुटीत समीकरण केलं आहे. ते योग्य तर नाहीच, पण घातकही आहे. फारशी साधकबाधक चर्चा आजवर झाली नसल्याने स्वाभाविकच `एकात्म मानववाद' याबद्दल गैरसमज आहेत आणि आपापल्या पद्धतीने त्याचा अर्थ लावून त्यावर टीकाटिप्पणीही होत असते.
एक बाब अगदी स्पष्ट आहे की, `एकात्म मानववाद' हे एक वैचारिक दर्शन आहे. दर्शन ते असते जे दिशा देते. म्हणूनच `एकात्म मानववाद' सामाजिक, आर्थिक, राजकीय व्यवस्था आणि जीवन यांना दिशा देणारा विचार आहे. तो राजकीय किंवा आर्थिक कार्यक्रम नाही. तो राजकीय, आर्थिक नियोजनाचा आराखडा नाही. निवडणुका, राजकीय पक्ष, निरनिराळ्या नियुक्त्या, कार्यक्षेत्रे, कामाचे वाटप, निधीचे वाटप, आर्थिक रचना, उद्योगांचे स्वरूप इत्यादी गोष्टी त्यात नाहीत. तशी अपेक्षा ठेवून `एकात्म मानववाद' पाहिल्यास निराशाच पदरी पडेल. आपलं conditioning इतकं झालं आहे की, स्वयंपाक किंवा बालसंगोपन सुद्धा नेमक्या सूचनांशिवाय आपण करू शकत नाही. आपल्याला सगळे साचे तयार हवेत. त्यात कच्चा माल ओतून मूर्ती घडवणे एवढेच आपल्याला जमते. दृष्टी, कल्पना आणि हात वापरून मूर्ती तयार करणे आम्ही विसरलो आहोत. पण ही समस्या आपली आहे. त्यामुळे `एकात्म मानववाद' अपुरा वा चुकीचा वा निरर्थक ठरत नाही. आपल्या मर्यादांमुळे आम्हाला त्याचं आकलन होत नाही. `एकात्म मानववाद' सर्व प्रकारच्या आर्थिक, राजकीय, सामाजिक रचना, व्यवस्था, त्यातील परिवर्तने यांची दिशा काय असावी हे स्पष्ट करणारे एक विचारदर्शन आहे, एखादा नियोजन आराखडा नाही हे नीट समजून घेणे आवश्यक आहे.
१९६५ च्या एप्रिल महिन्यात २२, २३, २४ आणि २५ तारखांना पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची मुंबईत चार भाषणे झालीत. ती भाषणेच एकात्म मानववाद म्हणून ओळखली जातात. त्यातील पहिले भाषण होते- `राष्ट्रवाद की सही कल्पना', दुसरे भाषण होते- `एकात्म मानववाद', तिसरे भाषण होते- `व्यष्टी, समष्टी मे समरसता' आणि चौथे भाषण होते- `राष्ट्रीय जीवन के अनुकूल अर्थरचना'. या सगळ्या भाषणांमध्ये धोरण, नीती, आकडेवारी इत्यादी नाही. सरकारी वा गैरसरकारी धोरणांची चिरफाड नाही. वर्तमान वा भूतकालीन संदर्भ हे विषयाच्या स्पष्टीकरणासाठी अन विवेचनासाठी आहेत. मग या भाषणांमध्ये एवढे काय आहे? त्यात मानवी जगण्याच्या अन त्यासाठी उभ्या करण्यात येणाऱ्या व्यवस्थांच्या संदर्भात मुलभूत तात्विक चिंतन आहे. राष्ट्र म्हणजे काय? आधुनिक राष्ट्रकल्पना काय आहे अन ती कशी विकसित झाली? भारतीय राष्ट्रकल्पना काय आहे? दोन्हीतील मूलभूत फरक काय? सुख म्हणजे काय? जीवनाची दृष्टी कशी असावी? राज्य म्हणजे काय? समाज म्हणजे काय? पैशाकडे कसे पहावे? आदर्श काय असावेत? व्यक्ती आणि समाज कसा विचार करतात? अनेक राष्ट्रे संपून का गेलीत? धर्म म्हणजे काय? सत्ता आणि संपत्ती यांची बलस्थाने आणि दुर्बलस्थाने कोणती? त्यांच्या मर्यादा काय? चतुर्विध पुरुषार्थ, मानवाचे स्वरूप; इत्यादी गोष्टींची या भाषणांमध्ये चर्चा आहे.
अशा प्रकारे विचार करण्याची आणि तो देशासमोर ठेवण्याची गरज दीनदयाळजींना का वाटली? `एकात्म मानववाद' मांडण्यापूर्वीच्या एका लेखात त्यांनी हे स्पष्ट केले आहे. `समाजवाद, प्रजातंत्र आणि हिंदुत्ववाद' या शीर्षकाच्या लेखात लोकशाही, समाजवाद, सर्वोदय, यंत्रवाद, भांडवलशाही; या साऱ्याचा आणि त्यातील प्रत्येकाच्या मुळाशी असलेल्या तत्वज्ञानाचा परामर्श घेऊन, त्यांच्या यशापयशाची आणि संभाव्यतांची चर्चा करून शेवटी निष्कर्ष मांडताना दीनदयाळजी म्हणतात- `आपणास राजनैतिक, आर्थिक, सामाजिक आणि सैद्धांतिक अशा सर्वच आघाड्यांवर यंत्रवादाशी सामना करावा लागेल. धर्मराज्य, प्रजासत्ताक, सामाजिक समानता आणि आर्थिक विकेंद्रीकरण हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असले पाहिजे. या सर्वांचा संमिलीत निष्कर्षच आपणास एक असे जीवनदर्शन देईल की ज्यामुळे आपण आजच्या झंझावाती वादळामध्येही सुरक्षित राहू शकू. आपण त्याला कोणतेही नाव देऊ शकतो- हिंदुत्ववाद, मानवतावाद किंवा आणखी कोणताही नवा वाद. पण हाच एकमेव मार्ग भारतीय आत्म्याला अनुरूप असा होईल. तोच जनतेमध्ये नवीन उत्साह निर्माण करील आणि कदाचित संभ्रमाच्या चौरस्त्यावर उभ्या असलेल्या विश्वालाही तो मार्गदर्शन करू शकेल.' १९६५ साली एप्रिल महिन्यात सगळ्या देशापुढे `एकात्म मानववाद' ठेवून दीनदयाळजींनी त्यांना वाटणारी ही गरज पूर्ण केली.
आपण ज्या मार्गाने आजवर चालत आलो त्याने लोक, समाज, राज्य, यंत्र या सगळ्यात एक संघर्ष उत्पन्न केल्याचे रोज पाहायला मिळते. यातील प्रत्येक घटकाची ओढाताण, प्रत्येक घटकाला कमी वा अधिक महत्व- स्थान- प्राधान्य- प्रमाण- यामुळे जन्माला येणारे दु:ख, अस्वस्थता, उद्रेक, असमाधान, अशांती; आज नवीन राहिलेले नाही. या पार्श्वभूमीवर `एकात्म मानववाद' लक्षणीय ठरतो. हा सार्वत्रिक संघर्ष आणि असमाधान दूर करण्यासाठी; प्रत्येक घटकाचे महत्व, स्थान, प्राधान्य, प्रमाण कमी वा अधिक होऊ नये हे आवश्यक आहे. परंतु हे कमी आहे की अधिक आहे हे कसे ठरवायचे? त्याचा निर्णय कसा करायचा? त्यासाठी हवी दृष्टी. ही दृष्टी विकसित होण्यासाठी हवा ठोस विचार. असा विचार आकारास येण्यासाठी हवे तत्वज्ञान आणि असे तत्वज्ञान सिद्ध होण्यासाठी हवे जीवनाचे दर्शन. असे जीवनाचे दर्शनच या सगळ्या धावपळीला दिशा देऊ शकते. `एकात्म मानववाद' हे असे दिशा देणारे दर्शन आहे.
काय सांगते हे दर्शन?
१) आत्यंतिक व्यक्तिवाद नको.
२) आत्यंतिक समाजवाद नको.
३) पैशाचा अभाव नको तसेच पैशाचा प्रभावही नको.
४) संघर्षाऐवजी समन्वयाची कास धरावी.
५) राजकीय सत्ता सर्वोपरी आणि सर्वेसर्वा नाही.
६) माणूस हा आर्थिक, राजकीय वा सामाजिक प्राणी नाही.
७) माणूस हा शारीरिक गरजा, जाणीवा, प्रेरणा यासोबतच मानसिक, बौद्धिक व आत्मिक गरजा, जाणीवा, प्रेरणा यांनी संचालित होत असतो.
८) माणूस हा ठोकळा वा यंत्र नाही. (यंत्रवाद म्हणताना दीनदयाळजींना यंत्रांचा अतिरेक नसावा हे जसे अभिप्रेत होते तसेच माणूस हा यंत्र नाही; किंबहुना हे विश्व म्हणजे चार भाग जोडून बनवलेले यंत्र नाही हेही अभिप्रेत होते. विचार आणि दृष्टीतील यांत्रिकता हा यंत्रवाद याचा आशय.)
९) मानव हा या विश्वापासून वेगळा isolated नाही. माणूस, समाज, निसर्ग, ब्रम्हांड, अन या सगळ्याचे मूळ जे काही असेल ते; या सगळ्यांचा समन्वय सुखासाठी आवश्यक. सगळ्यापासून फटकून अथवा सगळ्यावर सत्ता गाजवण्याच्या वृत्तीतून सुखी होता येणार नाही.
१०) उच्च प्रेरणांच्या अभावी मानवी जाणिवांचा आणि प्रेरणांचा विकास अशक्य. अन या विकासाअभावी सुखशांतीपूर्ण सह अस्तित्वाकरीता माणूस सहकार्यही करणार नाही.
११) विचार आणि चेतनेचा विकास झालेला माणूस. नराचा नारायण होण्याचा ध्यास घेतलेला माणूस. त्याच्या आधारे मर्यादांची जाण असणाऱ्या व्यवस्था. सामूहिक पुरुषार्थाच्या आधारे या व्यवस्थांच्या द्वारे सगळ्यांचे संपूर्ण सुख.
१२) यासाठी अनुकूल जीवनशैली.
एकात्म मानववादाचे हे काही ठळक पैलू. यांच्यावर एक नजर टाकली तरीही एक गोष्ट लगेचच स्पष्ट होते की, राजकीय पक्ष, राजकीय सत्ता यांची यातील भूमिका मर्यादित आहे. ती मुलभूत आहे असेही नाही. हा समाजाने समाजासाठी करावयाचा विचार आहे. ही समाजाने स्वत:साठी स्वीकारावयाची दिशा आहे. राजकीय सत्तेला वेठीला धरून व्यक्ती वा समाजाच्या इच्छांची आवर्तने पूर्ण करण्याचा खटाटोप किंवा व्यक्ती व समाजाच्या इच्छांच्या आवर्तनांचा उपयोग करून घेत सत्ता बळकट करण्याचा उपद्व्याप; असे `एकात्म मानववादाचे' स्वरूप नाही. एकात्म मानववाद हजारो वर्षांच्या मानवी संचितातून निघालेले नवनीत काय आहे याचा मार्ग आणि दिशा स्पष्ट करतो. त्यासाठी सत्ता, पक्षोपपक्ष यांच्यासोबतच समाजाकडूनही विशिष्ट गुणांची, कर्तव्यांची, जबाबदाऱ्यांची, समजूतदारीची अपेक्षा करतो. readymade tailored सुखाचा दावा एकात्म मानववाद करीत नाही. खोट्या आणि फसव्या कल्पना आणि दावे तो मोडीत काढतो. तो ना आशावादी आहे ना निराशावादी. एकात्म मानववाद यथार्थवादी आहे. तो डावा किंवा उजवा नाही, तर सरळमार्गी आहे.
एकात्म मानववाद समजून घेण्यासाठी आणि त्यातील खाचखळगे, शंकाकुशंका यांच्या समाधानासाठी दीनदयाळजींचं अन्य साहित्य आणि विशेषत: त्यांची `चिती' कल्पना आणि `लोकमत परिष्काराचा' विचार समजून घेणे आवश्यक आहे. अन्य विचारधारांच्या तुलनेत हे एकात्म मानववादाचे वैशिष्ट्यही आहे.
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, २० सप्टेंबर २०१६

बुधवार, १७ ऑगस्ट, २०१६

जन्म नटसम्राटाचा


२१ ऑगस्टला दुपारी १२ अन संध्याकाळी ७ वाजता पुन्हा एकदा झी वर नटसम्राट लागणार असल्याची जाहिरात पाहिली. साधारण महिनाभरात तिसऱ्यांदा झी वाले हा चित्रपट दाखवतायत बहुधा. साधारण महिनाभरापूर्वी श्रीदेवीने विचारले होते- तुम्ही हा सिनेमा पाहिलाय का? मी आत्ता पाहतेय. लिहा यावर. गेल्या रविवारी संध्याकाळी मातोश्री पाहत होत्या. अन आज पुन्हा ही जाहिरात. दाखवोत बापडे. आपलं काय जातंय? पण श्रीदेवी लिहा म्हणाली तेव्हा, त्यापूर्वीही अन नंतरही त्याबद्दल जे वाटत होतं अन वाटतंय ते सांगण्याचा मोह आजच्या जाहिरातीमुळे झाला.
सूत्ररूपाने सांगायचं झालं तर `माणूस मोठा होण्यास नकार देतो' तेव्हा त्याचा नटसम्राट होतो. ग्रेस म्हणत असत- people refuse to grow. असंख्य वेळा हे प्रत्ययाला येतं. `नटसम्राट'मध्येच आप्पासाहेब बेलवलकर यांचं एक स्वगत आहे. `या वादळाला कुणी घर देता का घर?' असं काहीसं. त्यात ते म्हणतात- हे वादळ थकलंय आता. मला नेहमी प्रश्न पडतो- असंच होणार, वादळाला थकावंच लागणार, थकावंच लागतं हे कळायला आप्पासाहेबांना इतका वेळ का लागावा? इतके भोग का भोगावे लागावे? अन उत्तर एकच मिळतं- माणसाचा महाप्रचंड अहंकार. युधिष्ठिराचं प्रसिद्ध उत्तर आठवतं- `रोज मृत्यू समोर दिसत असूनही माणूस स्वत:ला अमर्त्य समजून चालत असतो; हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे.' या उत्तरातील तत्व सगळ्या गोष्टींना लागू पडतं. आप्पासाहेब आपल्या `वादळ' असण्यावर इतकं प्रेम करतात की, आपण त्रिकालाबाधितपणे `वादळ'च राहणार ही समजूत ते घट्ट धरून ठेवतात. ती समजूत सोडण्याचा विचारही ते करत नाहीत. तसे प्रसंग येत नाहीत असे नाही. पण ते आपलं `वादळ'पण प्रचंड जोपासत असतात. शेवटी व्हायचं ते होतं. भूमिका आणि आपण एकच आहोत हा भ्रम टाकल्याविना मोठं होता येत नाही.
ही भूमिका फक्त एकट्या आप्पा बेलवलकर यांची नसते; प्रत्येक जण अशा भूमिका पार पाडत असतो. प्रसिद्ध सनईवादक उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्यावर जेव्हा म्हातारपणी हलाखीत राहण्याची पाळी आली तेव्हा हे तत्व वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळाले. आपली लोकप्रियता, आपले वादन यात ते इतके गुंतले की, आपलं जीवन ही आपली नव्हे तर बाकीच्यांचीच जबाबदारी आहे आणि त्यांनी ती पार पाडली पाहिजे, ही अपेक्षा ते सोडू शकले नाहीत. आपल्या आवडीनिवडी, छंद, स्वभाव, लहरी, गरजा; एवढेच नव्हे तर नातीगोती, मैत्री, ईश्वर, देवधर्म, कुटुंब, समाज, कायदे; एकूण एक सगळ्या गोष्टींना काही मर्यादा असतात हेच आपल्याला मान्य होत नाही. त्यातील एक वा अनेक गोष्टी आपण इतक्या घट्ट धरून ठेवतो की, त्याबाहेर पडण्याचा विचारही करीत नाही. हे मर्यादांचा विचार न करणे म्हणजेच मोठं होण्याला, माणूस होण्याला नकार देणे. असा नकार देणे हे माणसाच्या रक्तात इतके भिनले असल्यानेच त्याला नटसम्राट आकर्षित करतात. त्यांचे भूमिकेतून बाहेर न पडणेही माणसाला आवडते अन त्यामुळे होणाऱ्या शोकांतिकेवर अश्रू ढाळणेही त्याला आवडते. भुमिकेबाहेर पडणे मात्र कष्टाचे वाटते.
या नटसम्राट नाटकातच एक आणखीन स्वगत आहे. आप्पासाहेब सरकारशी बोलताना म्हणतात- `आभाळ पाठीवर घेऊन जंगलातून फिरणाऱ्या हत्तींना विचारा, तेही सांगतील- कुणीही कुणाचं नसतं.' अतिशय हळवं होऊन आपण पाहतो, पण आपल्या मनात हा प्रश्न येत नाही की, असा सवाल करणारे आप्पासाहेब किती जणांचे झालेत? त्यांना आपलं `वादळ'पण टाकून देऊन किती जणांचं होता आलं? खरं तर हा अतिशय व्यवहाराचा, देवाणघेवाणीचा प्रश्न आहे. सर्वसाधारण माणूस या प्रश्नाच्या रोखाने बरेचदा वागत असतोही. मनाविरुद्ध दुसऱ्यांचा होण्याचा प्रयत्नही करतो. पण खरा प्रश्न आहे- असं कोणी कोणाचं असतं का? होऊ शकतं का? प्रतिभेचा, प्रज्ञेचा, अन प्रेरणेचा पैस जितका मोठा असेल तितकं हे कळतं की- असं कोणी कोणाचं होत वगैरे नाही, होऊ शकत नाही.
आप्पा बेलवलकर जेव्हा म्हणतात की, कोणीही कोणाचं नसतं, तेव्हा त्याचा अर्थ असतो- कोणी तरी कोणाचं तरी असायला हवं. मात्र, खलील जिब्रानचा Prophet जेव्हा गावकऱ्यांना सांगतो की- तुमची मुले तुमची नाहीत. ती तुमच्यातून आली आहेत; तेव्हा तो माणसाला मोठा करीत असतो. तरीही ती पूर्णता मात्र नसते. Prophet फक्त काय नाही ते सांगतो. आप्पा बेलवलकर फक्त अभावाबाबत बोलतात. Prophet त्या अभावाचं वास्तव रूप दाखवतो. अन आदि शंकराचार्य त्याला पूर्णता प्रदान करतात, जेव्हा ते निर्वाणषटक रचतात. मी म्हणजे शरीर, नातीगोती, कुटुंब, कुळकुळाचार, देवधर्म, माता पिता पुत्र बंधू सखा, गुरु शिष्य; काही म्हणजे काही म्हणजे काहीही नाही. मात्र त्याच वेळी ते सूत्र सोडून देत नाहीत. तर `मी'चं स्वरूप सांगतात- चिदानंदरूपः शिवोहम शिवोहम... मी चैतन्य आणि आनंदस्वरूप शिव आहे. ही आहे पूर्णता. हे आहे मोठं होणं.
हे काही एका दिवसाचं काम नाही. हे शिवत्व बाजारात मिळत नाही. वर्षानुवर्षांच्या, कदाचित अनेक जीवनांच्या वाटचालीनंतर ते शिवत्व गवसतं. मात्र या वाटचालीत असंख्य भूमिका सोडून द्याव्या लागतात. त्या भूमिका सोडण्याची वेळ आली की सोडून द्यायच्या, त्यांनी केलेल्या उपकारासाठी मनाच्या तळातून धन्यवाद देऊन. मोठं होण्याचा हाच मार्ग आहे. परंतु भूमिकेला घट्ट चिकटून राहण्याचा अट्टाहास केला की, घर मागत हिंडणारा नटसम्राट जन्माला येतो. या जगाच्या रंगभूमीवर अनेक भूमिका येतात वाट्याला- राजाची, रंकाची, नात्यागोत्याची, समाजसेवकाची, धर्माचार्याची, नटाची किंवा नटीची, रसिकाची किंवा प्रेक्षकाची, सज्जनाची किंवा दुर्जनाची, प्रेयसीची वा प्रियकराची, कलाकाराची, संशोधकाची... कोणाचीही अन कशाचीही. पण असतात मात्र साऱ्या भूमिकाच. वाट्याला आलेली भूमिका सोडून द्यायला खळखळ केली की जे भोगावं लागतं, त्यालाच म्हणतात शोकांतिका. जगाच्या फापटपसाऱ्यातील त्याचं चित्र फक्त वेगवेगळ दिसतं एवढंच. खरं तर फक्त आप्पासाहेब बेलवलकर नाही, तर तुम्ही आम्हीही नटसम्राटच असतो; मोठं व्हायला नकार देणारे. म्हणूनच आम्हाला हे नाटक अन हा सिनेमा आवडतो. नाही तर त्यात आवडण्यासारखं काही नाही.
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, १६ ऑगस्ट २०१६

बुधवार, १० ऑगस्ट, २०१६

देवाजीचे देणे

दहावी उत्तम प्रकारे उत्तीर्ण झालेल्या पुतण्याला भेटायला पुण्याला गेलो होतो. एवढ्या दूर आलोत तर चार दिवस भटकून येऊ असा विचार केला. नेहमीप्रमाणेच पर्यटन, सहल असे नसल्याने धोपटी उचलायची अन चालू लागायचे. सोबत, जाण्यायेण्याची व्यवस्था, राहण्याखाण्याच्या सोयी इत्यादी गोष्टी ध्यानात घ्यायच्या नसतातच भटकताना. भटकंती म्हणजे भटकंती. यावेळी होते शिवथरघळ आणि रायगड. त्यातील शिवथरघळ पहिल्यांदाच जाणार होतो. रायगड शाळेत असताना सुमारे ४० वर्षांपूर्वी चढलेला. राज्य परिवहनाच्या पुण्याच्या स्थानकावरून सुरुवात झाली. चौकशीच्या खिडकीवर विचारले तर तिथला माणूस म्हणाला- महडची बस हवी की महाडची. म्हटलं शिवथरघळला जायचं आहे. तो म्हणाला, त्यासाठी महाडची बस. देशाटनाने ज्ञानात भर पडते, असे एका संस्कृत सुभाषितात सांगितले आहे. यावेळी त्याची अशी सुरुवात झाली. महड म्हणजे अष्टविनायकातील एक स्थान. महाड म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांनी जिथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता ते. सुमारे पाच तासांचा प्रवास करून बस महाडला पोहोचली. दुपारचा एक वाजला होता. महाड स्थानकावर शिवथरघळच्या बसची चौकशी केली. तिथला माणूस म्हणाला- दीड वाजता बस आहे, पण ड्रायव्हर मिळाला तर जाईल. ज्ञानात भर पडणे सुरूच होते. वाट पाहण्याशिवाय दुसरा इलाज नव्हता. दुसरेही ८-१० लोक होते. त्यांना घळीच्या पायथ्याशी असलेल्या शिवथर गावी जायचे होते. या वाट पाहण्याच्या वेळात बरेच प्रबोधन झाले. या बसची समस्या काय, त्यातील खाजगी वाहनांच्या व्यवसायाचा भाग, कोणाकोणाचे काय काय हितसंबंध, गावातील गट इत्यादीची आपसूक माहिती झाली. अधुनमधून माझी साक्ष काढणेही सुरु होते. मी पहिल्यांदाच महाडला आलो आहे याच्याशी त्यांना सोयरसुतक नव्हते. अखेर बहुप्रतिक्षित बस आली. पण ती शिवथरला जाणार की नाही हे जाणून घेणे महत्वाचे होते. म्हणजे चालक-वाहक तयार असणे महत्वाचे होते. नुसती बस असून उपयोग नव्हता. त्यात पुन्हा पाचेक मिनिटे गेली अन बस जाणार हे निश्चित झाले.
महाडहून साधारण ३०-४० किमीचा प्रवास. हा प्रवास मात्र रमणीय. दुसरा शब्दच नाही. बस चांगली होती, चालवणारा चांगला होता, बसमध्ये गर्दी नव्हती, बाहेर ढग आणि भुरभूर पाऊस होता, आजूबाजूला सर्वत्र हिरवाई अन डोंगर होते. साधारण सव्वादोनला बस शिवथरघळला पोहोचली. २-४ वाहने उभी होती. दोन झोपडीवजा हॉटेल्स. अन पलीकडून प्रचंड आवाज येत होता न दिसणाऱ्या धबधब्याचा. पावले अर्थातच घळीकडे वळली. पन्नासेक मीटर चालून गेलो तर समोर १०० फूट उंच अन वीसेक फूट रुंद धबधबा शिवथर नदीत कोसळत होता. पाच मिनिटे होतो तिथेच उभा राहिलो. मग ही रौद्रसुंदरता जवळून अनुभवण्यासाठी घळीच्या पायऱ्या चढू लागलो. दोन पायऱ्या चढलो अन सर आली धावून. पुढच्या २०-२५ पायऱ्या चढून होईपर्यंत चिंब. मजाच मजा. घळीच्या अगदी समोर कोसळणाऱ्या त्या धबाबा धारांचे वर्णन काय करावे? `सावधान' हा शब्द कानी पडताच ज्यांची विरक्ती जागी झाली त्या विरक्त समर्थांनासुद्धा त्या धबाब्यावर लिहावेसे वाटले यातच सारे आले. नितांत रमणीय अशी ती रौद्रसुंदरता साठवत साठवत घळीत पोहोचलो. मनात आलं- आजही जगाच्या कोलाहलापासून दूर निबिड एकांतात असलेलं हे स्थान साडेतीनशे वर्षांपूर्वी समर्थांनी कसं शोधून काढलं असेल, इथे २२ वर्षं ते कसे राहिले असतील आणि जगापासून दूर अज्ञात अशा या ठिकाणी जगाच्या नेमक्या दुखण्यावर कालातीत असं औषध श्रीदासबोधाच्या रुपात कसं तयार केलं असेल...
समर्थ स्मरणात मन असतानाच घळीतील समर्थांच्या मूर्तीचे अन प्रभू रामाचे दर्शन घेतले. तिथेच टेकलो. समोर धबधबा कोसळत होता. त्याचा जादुई आवाज आसमंतात भरून राहिला होता. घळीत तुषार येत होते. मिणमिणत्या दिव्यांनी दूर न झालेला अंधार मनावर गारुड जमवीत होता. समर्थ आणि श्रीदासबोध मनात पिंगा घालीत होते. तासभर कसा गेला कळलेच नाही. शेजारी एक सज्जन येऊन बसले. ते धुळ्याचे. नोकरीनिमित्त महाडला. सुटी घालवण्यासाठी आले होते. त्यांच्याशी चार गोष्टी झाल्या. त्यांना म्हटले- तुमच्या धुळ्याचे स्व. शंकरराव देव यांनीच ही जागा १९३० साली शोधून काढली. त्यांना ते माहीत नव्हते. त्यांना माझ्याबद्दल उगाचच आदर निर्माण झाला. म्हणाले- तुमचा चांगला अभ्यास आहे दिसतो. मीच खुलासा केला- अहो, अभ्यास वगैरे काही नाही. तिथे पाटी आहे. त्यावर लिहिलेली माहिती आहे ही. आपण लोक कुठे जातो तेव्हा फारसं लक्ष देऊन (attentive राहून) पाहत नाही, फिरत नाही हे पुन्हा प्रत्ययाला आलं. ते सज्जन गेले, मीही बाहेर पडलो. तिथल्या व्यवस्थापनाचे एक दोघे जण समोर बसले होते. त्यांना विचारले- येथे निवासाची काही सोय? त्यांनी पुणेरी कोरडेपणाने अन तटस्थतेने उत्तर दिले- काहीही नाही. मी काही लगेच हार मानणारा नाही. रेटून धरले. नागपूरहून आलोय. चार वाजत आलेत. परतायला बस नाही. इत्यादी. पुणेरी असल्याने त्यांना याचे काहीही वाटायचे कारण नव्हते. दोन मिनिटे उभा राहिलो. मग म्हटले- त्या विकीपेडियावर तर माहिती दिली आहे की, इथल्या हॉलमध्ये राहता येते म्हणून. आता दोघांपैकी एकाला स्वर सापडला. त्यांनी विचारले- किती जण आहात? म्हटलं- एक. एकटा जीव सदाशिव. हे उत्तर ऐकताच लगेच उत्तर आले- नाही सोय राहण्याची. एकट्या माणसाला आम्ही नाही राहू देत. असा अनुभव यापूर्वीही गाठीशी असल्याने मी म्हणालो- मला तुमच्या अडचणी माहीत आहेत. अमुक अमुक ठिकाणीही असेच झाले होते. पण आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र (कार्ड) पाहून त्यांनी परवानगी दिली होती. ते निष्ठावंत मात्र माझा सहानुभूतीने विचार करायला तयार नव्हते. अखेर मी माघार घेतली आणि घळीच्या पायऱ्या उतरलो.
खालच्या हॉटेलात गेलो. मालकाला म्हटले- जेवायचे आहे. `उशीर झाला हो' अशी तक्रार त्याने केली. तरीही जेऊ मात्र घातले. मग त्यालाच विचारले मुक्कामाचे. म्हणाला- नाही. आता आली ना पंचाईत... चहू बाजूंनी उंच डोंगर, निवासाची व्यवस्था नाही, परतायला गाडी नाही, अन संध्याकाळचे पाच वाजलेले. शहरातले संध्याकाळचे पाच आणि डोंगरदऱ्यातले पाच यातील फरकाचे ज्ञान झाले. अर्थात घाबरून जाण्याचं, निराश होण्याचं वगैरे काही कारण नव्हतं. `समर्थाचिया सेवका' कोण वक्र पाहे? मनाशी ठरवलं, अंधार पडायच्या आत शिवथर गावात पोहोचायचं. कोणी घरात घेतलं तर ठीक, नाही तर घराबाहेर घराच्या आडोशाने ताणून द्यायची. सकाळी ताजेतवाने होण्यासाठी नदी आहेच अन मग महाडला पोहोचू. ठरवले अन डोंगर उतरू लागलो. पाच-दहा मिनिटे चाललो अन समोरच्या झाडाआडून एक माणूस सामोरा आला. हातात कोयता असलेला तो, बाजूच्या शेतातील शेतकरी होता. पण हे ध्यानी यायच्या आतच मारुततुल्य वेगाहून अधिक वेगाने मनात काय काय येऊन नाही गेले... गेले काही तास मनात समर्थ, श्रीराम, हनुमान आदींच्या सोबतीला श्रीदासबोध, श्रीरामायण अन त्यामुळेच वाल्मिकीही होते. म्हटले- हा वाल्या कोळी तर नाही. पण मी काही देवर्षी नारद नाही. हा आपल्याला लुटेल का? मारून टाकेल का? अन लगेच हेही आले- लुटले तर लुटले, मारले तर मारले. या शिवथर नदीतून वाहत वाहत अंती तर सागरालाच भेटायचे आहे. पण काहीही झाले नाही. आम्ही एकमेकांना ओलांडून पुढे गेलो.
थोडे आणखीन पुढे चाललो अन एक ऑटोरिक्षा येताना दिसली. म्हटले, याला चमत्कार, प्रभूची कृपा इत्यादी म्हणायला हरकत नाही. त्याला हात दाखवला. महाडला नेशील का विचारले. हो म्हणाला. तो कोणाला तरी शिवथरघळला घेऊन चालला होता. प्रवास पुन्हा घळीकडे सुरु झाला. घळीत भेटलेले धुळ्याचे सज्जन त्याच रिक्षात होते. त्यांनाही उशीर झाला होता अन इकडे येणारी ही रिक्षा त्यांनी पकडली. मला पाहून त्यांना आश्चर्य वाटले. म्हणाले- तुम्ही मुक्काम करणार होता नं. काय झाले? मी त्यांना सगळा प्रकार सांगितला. आमच्याशिवाय त्या रिक्षात एक महीला अन एक पुरुष, असे दोघे होते. त्या महीला माझे म्हणणे लक्ष देऊन ऐकत होत्या. माझे बोलणे झाले. दोन मिनिटांनी त्यांनी मला विचारले- तुम्ही संघाचे काम करता का? माझ्या आश्चर्याला सीमा नव्हती. मी म्हटले- हो. पण तुम्ही कसे काय विचारले? त्या म्हणाल्या- मला वाटले. तोपर्यंत घळ आलीच होती. त्या म्हणाल्या- चला वर. मी म्हटले- तुम्ही जाऊन या. आम्ही जाऊन आलो मघाशीच. तशा त्या म्हणाल्या- चला तर. आम्ही वर गेलो. त्यांच्यासोबत आलेल्या गृहस्थांना त्या म्हणाल्या- तुम्ही या दर्शन करून. अन त्या वळल्या व्यवस्थापक मंडळींकडे. अन सुरु झाला तोफखाना- यांना का राहू देत नाही? इतक्या दुरून लोक येतात. काय करायचे त्यांनी? सोय असून नकार का? कोणाशी बोलू सांगा? त्यांची सरबत्ती आणि व्यवस्थापकांचे ना, सुरूच होते. त्या परिसरातून फोन लागत नाही. पण त्या महीला त्यांना म्हणाल्या- मला माहीत आहे एक जागा. तिथून फोन लागतो. चला माझ्यासोबत आपण फोन करू. अखेरीस मी मध्ये पडलो. म्हटले- त्या एवढं म्हणतायत तर फोन लावून पहा ना... नाही तर मी जाईन परत. त्यावर व्यवस्थापक राजी झाले. ते इमारतीच्या आत गेले. आत बाकीही काही मंडळी होती. मी बाहेरच थांबलो. आत काय झाले कोणास ठाऊक. सगळे बाहेर आले. अन व्यवस्थापक मला म्हणाले- तुमचं एखादं ओळखपत्र दाखवा अन सामान आत घ्या. दर्शनाला आलेल्या गृहस्थांना रात्री मुंबईला परतायचे होते. त्यामुळे त्या महिलेने माझे नाव, फोन नंबर लिहून घेतले अन ती मंडळी परतली.
नागपूरहून पुण्याला जातानाच ठरवले होते- शिवथरघळला मुक्काम करायचा. ऐन वेळी नकार मिळाला होता अन तासा दीड तासातच नाट्यमय रीतीने माझा शिवथरघळ येथील मुक्काम सुरु झाला होता
एकदाचे मुक्कामाचे निश्चित झाल्यावर मात्र काही अडचण झाली नाही. व्यवस्थापक मंडळीही `नागपूरकर, नागपूरकर' म्हणून बोलू लागले. संध्याकाळी तेथील प्रार्थना झाली. त्यात सहभागी झालो. प्रार्थना आटोपून बाहेरच्या जागेत उभे होतो तेवढ्यात `हे लोक राजकारणी आहेत' हे सांगण्याची गरज पडू नये अशा पद्धतीने १५-२० लोक घळ चढून आले. त्यातील एक जण माझ्याचकडे आले. म्हणाले- रायगडचे उपजिल्हाधिकारी आहेत. मी त्यांना व्यवस्थापकांकडे पाठवले. थोडी धावपळ वाढली. सुमारे अर्धा तास तो गट होता. मला त्या साऱ्याशी काहीही करावयाचे नव्हते. मिट्ट काळोखात काही दिसतं का, जाणवतं का हे शोधण्याचा माझा खेळ सुरु होता. रात्री कळले, आलेले पाहुणे उपजिल्हाधिकारी नव्हते तर कोणत्या तरी राजकीय पुढाऱ्याचे पी.ए. होते. ज्यांना राजकारणाची थोडीफार ओळख आहे तेही जाणतातच की, तिथे पी.ए.चे सुद्धा पुष्कळ पी.ए. असतात. असो. थोड्या वेळाने व्यवस्थापकांनी आवाज दिला- `नागपूरकर चला जेवायला.' वरण, भात, भाजी, पोळी, कढी असे छान जेवण झाले. व्यवस्थापक मंडळींपैकीच एकाच्या कोणाचा तरी त्या दिवशी वाढदिवस होता. त्यामुळे जिलबी आली होती. तिचाही आस्वाद घेतला. जरा वेळ शतपावली, गप्पाटप्पा झाल्यावर झोपायच्या मार्गाला सगळे लागले. तिथे राहणाऱ्या लोकांची नियमित व्यवस्था आहे. ते तिकडे गेले. मुक्कामाला येणाऱ्या बसचे चालक वाहक रोज तिथेच मुक्कामाला असतात. त्यामुळे त्यांचीही व्यवस्था आहेच. माझी सोय मोठ्या हॉलमध्ये होती. थोड्या वेळाने चालक वाहक आले. त्यांची जेवणे झाली. थोड्या शिळोप्याच्या गप्पा. तेही झोपायला गेले. मी एकटाच होतो. मुख्य व्यवस्थापक जवळ आले. त्यांच्या मनात गेले काही तास असलेला प्रश्न त्यांनी केला- `त्या महिला कोण तुमच्या?' म्हटलं- `कोणीही नाहीत. त्या मला रिक्षात भेटल्या.' त्यांचं समाधान झालं नाही हे स्पष्ट दिसत होतं. पण बोलले काही नाहीत. मीच म्हणालो- `माझी तीव्र इच्छा होती. प्रभूने ती अशी पूर्ण केली असं मला वाटतं. यावर फार डोकं खर्च करावं हेही माझ्या स्वभावात नाही.' त्यांना काय वाटलं कोणास ठाऊक? किंचित हसले अन म्हणाले, `विश्रांती घेऊ या. शुभ रात्री.' ते झोपायला गेले. शे-दोनशे माणसे झोपू शकतील एवढ्या त्या दालनात आता मी अन बाहेरील धबधब्याच्या पार्श्वसंगीताच्या साथीने मूर्तीतून माझ्यावर कृपावर्षाव करणारे समर्थ एवढेच होतो. पांघरूण घेतले अन डोळे मिटले.
पहाटे ४ वाजता प्रसन्न जाग आली. आवरून बाहेर आलो तर काळोख रुपयात एक आणा कमी झाला होता. मंडळींची सकाळच्या प्रार्थनेची तयारी सुरु होती. बाहेर बसूनच मी त्या प्रार्थनेत सहभागी झालो. लगेच गरमागरम चहा झाला. आंघोळ उरकून निघण्याची तयारी करावी या विचारात होतो. थंड पाण्याची सवय असूनही गरम पाणी मिळाल्यास बरे असे वाटण्याएवढी थंडी होती. नजर टाकली तर आचाऱ्याने भला मोठा गंज पाणी तापायला ठेवला होताच. आंघोळ उरकून, तयारी करून अन घळीत जाऊन आलो. शिवथरघळच्या भेटीची अन निवासाची पुरचुंडी बांधून घेतली अन पायऱ्या उतरलो. सव्वासातला बस हलली. डोंगर पार करत फोनच्या रेंजमध्ये पोहोचलो तर फोन वाजला. नंबर ओळखीचा नव्हता. फोन घेतला अन खुलासा झाला. पलीकडून काल माझ्यासाठी व्यवस्थापनाशी भांडणाऱ्या ताई बोलत होत्या. काही अडचण आली का, निघालात का इत्यादी विचारपूस. अन शेवटी निमंत्रण- `तुम्ही महाडला येताहात. स्थानकाच्या मागेच चालत येण्याच्या अंतरावर माझे घर आहे. चहा नाश्त्याला या.' नाही म्हणणे असभ्य ठरले असते. एक तर त्यांनी माझी मदत केली होती अन अचानक आपल्याला मदत करणारी व्यक्ती कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकताही होतीच. त्यांच्या घरी पोहोचलो. छोटेसे नीटनेटके दोनच खोल्यांचे घर. म्हणजे मुळात तो मोठा वाडा. वाटण्या वगैरे झाल्या अन प्रत्येकाच्या वाट्याला जे आले त्यात प्रत्येकाने आपापले संसार थाटलेले. अर्थात ही सगळी माहिती नंतर झाली. गेल्यावर आगत स्वागत झाले. परिचयाची देवाणघेवाण झाली. तेव्हा कळले- त्या ताई विश्व हिंदू परिषदेच्या जिल्हा महिला प्रमुख आहेत. विश्व हिंदू परिषदेच्या कामाशिवायही पुष्कळ सामाजिक कामात त्या अग्रेसर असतात. कपाटात शोभणारी मेडल्स, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्रे त्याची साक्ष पटवतात. बोलण्याच्या ओघात त्यांनी सांगितले की, प्रशांतजी हरताळकर (आता दिल्लीत मुक्काम, विश्व हिंदू परिषदेचे विदेश विभागाचे काम पाहतात.) सुद्धा त्यांच्याकडे बरेचदा राहून गेले आहेत. त्यानंतर दुराव्याचे कारण उरले नाही. कारण प्रशांतजी ओळखीचेच. शिवाय विदर्भातले. मूळ अकोल्याचे पण अनेक वर्षे नागपुरात राहिलेले. त्यामुळे औपचारिकता गळून पडली. चहा नाश्ता झाला.
आता काय कार्यक्रम? त्यांचा प्रश्न. म्हटले- रायगडला जायचे आहे. आमचे खाणेपिणे सुरु असतानाच एक दोन काका लोक आले होते. एक त्यांच्या परिचयातील निवृत्त शिक्षक श्री. भुस्कुटे. स्वत: चांगले लेखक. त्यांचा मुलगा संजय भुस्कुटे मुंबईला प्रसार माध्यमात. अन दुसरे बँकेतून निवृत्त झालेले. ताई डबे देण्याचा व्यवसायही करतात. अन्य अनेक कमाईच्या अन बिन कमाईच्या कामांसह. ते काका डबा घ्यायलाच आले होते. त्यांना ताईंनी काही सूचना दिल्या आणि त्या काकांनी मला रायगडला जाणाऱ्या गाडीत बसवून दिले. निघताना मलाही सूचना दिल्या- पायऱ्यांनी जाऊ नका. पाऊस आहे, त्यामुळे निसरडे असेल. शिवाय धुकं आहे. काहीही दिसणार नाही. अन तुम्ही एकटे जाताहात. त्यामुळे रोप वे ने जा. रोप वे च्या मालकांनाही त्यांनी फोन केला, आपले पाहुणे येताहेत म्हणून. निघताना म्हणाल्या- संध्याकाळी आले की इकडेच यायचे. रात्रीचे जेवण इथेच. त्यानंतर मी काही बोलणार तर त्या म्हणाल्या- रात्रीच्या मुक्कामाचं मी पाहते. शेजारी काका आहेत. एकटेच असतात. त्यांच्याकडे होईल सोय. समजूतदारीचा विशिष्ट स्तर असला की अनेक गोष्टी सोप्या, सहज होतात त्या अशा.
रायगडावर पोहोचलो. रोप वे चे तिकीट काढले. नजर इकडे तिकडे फिरवली. तिथे संघाचे चौथे सरसंघचालक रज्जुभैयांचा एक फोटो लागलेला दिसला. कुठल्या तरी कार्यक्रमाला ते आले असतानाचा. रोप वे च्या माझ्या capsule मध्ये दोन तरुण पोरे अन कर्नाटकचा एक हौशी फिरस्ता होता. capsule वर सरकू लागली अन क्षणार्धात खालचे सगळे तर गायब झालेच पण समोरचा भलाथोरला रायगड सुद्धा दिसेनासा झाला. प्रचंड धुके दाटले होते. गडावर कसे होणार. फिरता येईल की नाही अशी चर्चा करीतच चढणे सुरु होते. दोघा तरुणांपैकी एक जण फारच बहाद्दर होता. एवढा की, पहिल्या मिनिटाला त्याने मिटलेले डोळे त्याला उतरायला सांगितले तेव्हाच उघडले. रायगडावर उतरलो तेव्हा धुके थोडे कमी झाले होते अन भुरभूर सुरु झाली होती. आमच्या चौघांचा एक गट तयार झाला होता. त्या गटासाठी एक वाटाड्या केला आणि भ्रमंती सुरु झाली. ४० वर्षांपूर्वी पाहिले होते त्यातील काही आठवते का हे पाहण्याचा निष्फळ प्रयत्न केला. राणीवसा, राजमहाल, टांकसाळ, राजदरबार, सिंहासन असे करत करत होळीच्या माळावर पोहोचलो. वाटाड्याने जाहीर केले. आम्ही इथवरच येत असतो. बाजारपेठ, केदारेश्वर मंदिर, महाराजांची समाधी तुमची तुम्ही पाहा. त्याचा निरोप घेऊन निघालो. होळीचा माळ पार केला. तिथेच स्थानिक बाया, मुली चहा, बिस्किटे विकत होत्या. चहा घेतला. त्याच पिठले भाकरी जेवणाची सोयही करतात. जेवण कराल का म्हणून त्यांनी विचारले. जेवायचे होतेच. मी आणि दोघे तरुण यांनी होकार दिला. बाजारपेठेतून मधल्या वाटेने शे-दोनशे फुटाची ढलान उतरते तिथे पाच-सहा झोपड्या आहेत. तिथेच आम्हाला जेऊ घालणाऱ्या लीलाबाईची झोपडी. आम्हाला तिने ती दाखवली. तिला झोपडी दिसत होती. त्यावरचा झेंडा दिसत होता. आम्हाला मात्र धुक्यामुळे काहीही दिसत नव्हते. अखेर तिच्यासोबत खाली उतरून मी प्रत्यक्ष पाहून आलो अन पावले केदारेश्वराकडे वळली.
मंदिरात पोहोचलो. गाभाऱ्यात गेलो. त्या ओल्या अंधारात गुडघे खाली टेकवले. केदारेश्वराच्या पिंडीला स्पर्श केला अन अंगांग शहारले. हीच ती ज्योतिर्मय पिंडी जिला; त्या मृत्युंजय महापुरुषाने अन त्याला जन्म देणाऱ्या पुण्यश्लोक माऊलीने अनेकवार स्पर्श केला असेल. हीच ती ज्योतिर्मय पिंडी; जिच्याजवळ त्यांच्या मनातील कैक आशा निराशेच्या ओंजळी रीत्या झाल्या असतील. अन हीच ती पिंडी जिच्या छायेत त्या मृत्युन्जयाने अनंताच्या प्रवासाला पाऊल उचलले होते. थोडा वेळ निरव शांततेत तिथेच घालवला. बाहेर आलो. समोरच्या प्रांगणातील महाराजांच्या समाधीपुढे नतमस्तक झालो. स्वराज्यासाठी बेलाग राजधानी वसवणाऱ्या हिरोजी इंदोलीकरच्या पायरीला भक्तिभावाने स्पर्श केला अन परतीची वाट धरली. पीठ मळून ठेवून अन पिठले तयार करून लीलाबाई आमची वाटच पाहत होती. हातपाय धुवून झोपडीत शिरलो. पाच मिनिटात पिठलं, भाकरी, कांदा, मिरची, चटणी अशा थाळ्या समोर आल्या. तुटून पडलो, पण मांडीला अंग घासत म्याऊ म्याऊ करणाऱ्या मनिला भाकरीचा तुकडा टाकल्यानंतरच. जेवताना चारदोन गोष्टी झाल्या. रोज गिऱ्हाईक मिळतात का? त्यावर उत्तर होते- हो, रोज मिळतात. कधी एक, कधी दोन, कधी चार-पाच. काही कार्यक्रम असला की मग मात्र गर्दी होते. पुढचा प्रश्न होता- तेवढं पुरतं का? त्यावर उत्तर होतं- हो पुरतं. मनोमन माहीत होतं की त्यांच्या झोळीत अजून पडायला हवं आहे. पण समाधान काय असतं हे अनुभवायला मिळालं अन त्याच वेळी बाहेर थैमान घालणारं असमाधान डोक्यात चमकून गेलं. पूर्ण उभं राहून बाहेर पडता येणं अशक्य असलेल्या त्या कुडातून बाहेर पडताना विचार करून पाहिला, कशी राहत असतील या पाच-सहा झोपड्यातील लोकं इथे. अंधार पडल्यावर काय करीत असतील. दिनचर्या कशी असेल, सण उत्सव कसे असतील, सुख दु:ख कशी असतील, भीती वाटत असेल का... इत्यादी. फारसा कल्पनाविलास नाही करता आला.
रायगड दर्शन करून महाडला परतलो. ताईंना फोन केला. म्हटले- रायगड दर्शन छान झाले. आता चवदार तळ्याला कसे जायचे सांगा. दलितोद्धाराच्या चळवळीचे ते ऐतिहासिक प्रतिक पाहून येतो. त्यांनी रस्ता सांगितला. त्यानुसार गेलो. ते ऐतिहासिक तळे पाहिले. आता तो परिसर राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यात आला आहे. मोठ्ठा तलाव, बगीचा, डॉ. आंबेडकरांचा पुतळा अन एक इमारत तेथे आहे. तिथे थोडावेळ घालवून परतलो. ताई वाटच पाहत होत्या. चहा झाला. सोबतच गप्पाही. ताईंना दोन मुली. दोघींचीही लग्न झालेली. यजमान एका मुलीकडेच गेलेले होते. त्या मूळ मराठा. ब्राम्हण तरुणाशी प्रेमविवाह केला. त्यामुळे गेली ३३ वर्षं माहेरच्यांनी त्यांचं नाव टाकलेलं. सासरी मात्र सगळ्यांनी स्वीकारलं. गणपतीला त्यांच्याच हातचे मोदक हवेत. लग्नाच्या वेळी शिक्षण फक्त दहावीपर्यंत. नंतर बारावी केलं. आता मुलीपासून प्रेरणा घेऊन एलएलबी करणार आहेत. पण शिक्षण नसूनही कामात, संघटनेत, कार्यक्रमांच्या, उपक्रमांच्या, मिरवणुकांच्या आयोजनात वाघ; पोलिसांशी भांडायलाही कमी नाही की, मुलींना लाठीकाठी शिकवण्यात कमी नाही; भाषणही देणार अन रायगडावर दोन हजार वृक्षही लावणार. चहासोबत हा सगळा इतिहास कळला. मग म्हणाल्या मी थोडी बाहेर जाऊन येते. तुम्हाला आंघोळ करायची असेल, कपडे धुवायचे असतील तर उरकून घ्या. त्या बाहेर गेल्या. मी आंघोळ, कपडे धुणे उरकले. तोवर त्या आल्याच. संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या. मी सह्याद्री पाहू लागलो. निग्रहाने अन्य वाहिन्या नाकारणारे लोक आहेत हे नक्की.
थोड्या वेळाने जेवणे झाली. मग त्या म्हणाल्या, मी जाऊन येते. माझी एक मुस्लिम मैत्रीण आहे. शाळेत असतानाची. तिला आज रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या तेव्हा तिने निमंत्रण दिले- कितीही वेळ झाला तरीही ये. अगदी मध्यरात्री सुद्धा चालेल. मी तिच्याकडे जाऊन येते. साधारण नऊ वाजले होते. तासाभरात त्या जाऊन आल्या. थोड्या वेळ बोलून शेजारच्या काकांकडे गेलो. ते सानिया मिर्झाचा खेळ पाहत होते. त्यांनी स्वागत केले. बिछाना तयारच होता. मला त्यांच्याकडे सोपवून ताई घरी गेल्या. आम्ही जरा वेळ गप्पा मारल्या. काका ६५ वर्षांचे. अविवाहित. एकटेच असतात. इलेक्ट्रिकची कामे करतात. दुकान होते. बंद केले आहे. अजून हिमालयात ट्रेकिंगला जातात. छान गट्टी जमली. रात्री झोप झाली. सकाळी उठलो. त्यांना उठवले. त्यांनी लगेच चहा केला. पाणी तापवले. आंघोळ वगैरे करून तयार झालो. नागपूरला येण्याचं निमंत्रण दिलं. निरोप घेण्यासाठी शेजारी ताईंकडे गेलो. पाच मिनिटे टेकलो. त्यांनी हातावर बर्फी ठेवली. पाणी दिले. त्यांनाही नागपूरचे निमंत्रण दिले. रस्त्यापर्यंत त्या सोडायला आल्या. त्यांचा निरोप घेतला अन पुढचा प्रवास सुरु झाला.
त्यांनी मला का विचारले असेल- तुम्ही संघाचे आहात का म्हणून? का माझ्यासाठी भांडल्या असतील? विश्वास का टाकला असेल? हे प्रश्न घेऊनच बसमध्ये चढलो. एक मात्र खरं की, सर्वत्र अविश्वासाचे वातावरण असतानाही लोक परस्परांवर विश्वास ठेवतात अन तो सार्थही ठरवतात. सगळ्यांनाच असा अनुभव येईल का? संघाचे सगळेच लोक असे वागतील का? संघाचे आहोत म्हणून कोणी त्यांच्याकडे गेलेत तर त्यांनाही अशीच वागणूक मिळेल का? या प्रश्नांची उत्तरे नकारार्थीच राहतील. कुठला तरी ऋणानुबंध तर नक्कीच असेल, पण त्यासोबतच या अनुभवातील दोन्ही घटकांचा - माझा व ताईंचाही - विश्वास की, हे संघाचे संस्कार आहेत आणि जे काही घडत असतं ते ती अज्ञात शक्तीच घडवीत असते हेही कमी महत्वाचे नक्कीच नाहीत.
- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, २७ जुलै २०१६

अखंड भारत म्हणजे...

ऑगस्ट महिना आला की, अखंड भारताचा विषय सहजच येतो. येत्या १५ ऑगस्टला ६९ वर्षे पूर्ण होतील. पण त्या जखमा अजून भरून आलेल्या नाहीत. खरे तर अखंड भारत हा विषय तेवढ्यापुरता नाहीच. तो फार मोठा आहे. या विषयाची चर्चाही भरपूर होते. अखंड भारताचे पक्षधर आणि त्यात अर्थ नाही अशा दोन्ही बाजू पुढे येत असतात. मात्र `अखंड भारत' म्हणजे नेमके काय याचा विचार दोन्ही बाजूंना फारसा केलेला दिसत नाही. अगदी शेषराव मोरे यांनी त्यांच्या पुस्तकात आणि त्यांच्या पुस्तकाचा प्रतिवाद या स्वरुपात प्रकाशित झालेल्या पुस्तकात सुद्धा अखंड भारताची चर्चा नाही. त्या कल्पनेची मांडणी देखील नाही. अखंड भारत म्हटल्यानंतर डोळ्यापुढे काय येते आणि अखंड भारत म्हणताना काय अभिप्रेत असते; या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ही तफावतच पुष्कळशा वादविवादांना जन्म देते.
अखंड भारत म्हटल्यानंतर डोळ्यापुढे काय येते? भारत, पाकिस्तान, बांगलादेश यांचे एक राज्य, एक पंतप्रधान, एक मंत्रिमंडळ, एक राज्यघटना इत्यादी. शिवाय १९४७ च्या फाळणीमुळे जी पार्श्वभूमी लाभली आहे त्यामुळे, हिंदू-मुस्लिम संख्या आणि त्यांचे संबंध. अखंड भारत म्हटल्यावर साधारण याच्यापलीकडे चर्चा वा कल्पना जात नाही. मात्र अखंड भारत म्हणजे एवढेच अभिप्रेत नाही हे लक्षात घेणे खूप महत्वाचे आहे. `अखंड भारत' आमच्या राष्ट्रीयत्वाचा हुंकार आहे. ती आमच्या राष्ट्रीयत्वाची आकांक्षाही आहे. त्यासाठी राष्ट्र म्हणजे काय हेदेखील नीट समजून घ्यायला हवे. भारतीय राष्ट्रकल्पना आणि nation कल्पना एकच नाहीत हेही समजून घ्यायला हवे.
राष्ट्र म्हणजे काय? `आम्ही एक आहोत' ही जनसमूहातील भावना म्हणजे राष्ट्र. राज्य ही राष्ट्राला मजबूत करणारी आणि त्याचे संरक्षण करणारी एक व्यवस्था आहे. राष्ट्र आपल्याला हवी ती राज्यव्यवस्था निर्माण करतं किंवा नको असणारी राज्यव्यवस्था बदलून टाकतं. राष्ट्र ही मूळ आणि सर्वोपरी बाब आहे. पण ज्याला राष्ट्र म्हणतात अशी ही ऐक्यभावना असते तरी कशी? ती कशी निर्माण होते? कशी वाढते? त्याचा नेमका उगम आणि स्वरूप काय? याबाबत भरपूर गोंधळ आहे. निवासाचा भौगोलिक प्रदेश, भाषा, चालीरीती, परंपरा, प्राचीनता, जाती, पंथ, संप्रदाय, पूजापद्धती, इतिहास, मालकी इत्यादी आधारावर जनसमूहात ऐक्य निर्माण करण्याचे, ऐक्य टिकवण्याचे, एकत्व साधण्याचे अनेक प्रयत्न झाले अन आजही होत आहेत. हे सगळेच प्रयत्न फसलेले आहेत. अन भविष्यात होणारे असे प्रयत्न फसतील यातही शंका नाही. जगाचा प्राचीन अन अर्वाचीन इतिहास अशा उदाहरणांनी भरलेला आहे. कोट्यवधी शवांचे उसासे, लाखो मैल लांबीच्या रक्ताच्या नद्यांचे नि:श्वास, मानवतेच्या अपार हानीचे हिशेब या इतिहासात दबलेले आहेत. मग याचा अर्थ हा आहे का की, राष्ट्र ही चुकीची बाब आहे? राष्ट्रकल्पना टाकून द्यायला हवी का? असा काही निष्कर्ष काढण्याआधी भारताची राष्ट्रकल्पना समजून घ्यायला हवी.
अथर्ववेद सांगतात- व्यक्तीच्या मनातील आत्मभावाच्या विकासातून राष्ट्र उदयाला येतं. व्यक्तीच्या मनातील आत्मभावाच्या विकासाची ही पहिली पायरी नाही अन शेवटचीही पायरी नाही. पहिली पायरी आहे कुटुंब. त्यानंतर क्रमाने भवताल, गाव, ग्रामसमूह, असे करत करत `आत्मवत सर्वभूतेषु' इथवर प्रवास चालतो. राष्ट्र ही त्या प्रवासातील वैश्विकतेच्या अलीकडची पायरी आहे. भाषा, परंपरा, इतिहास, रीतीभाती इत्यादी गोष्टी राष्ट्र जन्माला घालत नाहीत, तर आत्मभावाच्या विकासाच्या मार्गावर चालणाऱ्या स्वाभाविक क्रियाप्रतिक्रियेतून त्यांचा विकास होतो. या आत्मभावाच्या विकासाला जे जे साहाय्यक ते ते त्यामुळे स्वीकार्य ठरते, राष्ट्रीय ठरते. त्यातूनच राष्ट्रीय स्वभाव, राष्ट्रीय मूल्य आकाराला येतात. ही दृष्टी अन त्यासाठीचे प्रयत्न यातूनच भारतीय राष्ट्र विकास पावले. त्याचा स्वभाव आणि चारित्र्य घडले. म्हणूनच ख्रिश्चन, मुस्लीम, ज्यू, पारशी या सगळ्यांना भारताने उदार आश्रय दिला. भारतभरातील भाषाभूषा ऐक्यभावनेच्या आड आल्या नाहीत. भारतीय ऋषीमुनींच्या आध्यात्मिक दर्शनातून, सगळे विश्वब्रम्हांड एकाच स्पंदनाचे आविष्कार आहेत या साक्षात्कारातून ही भारतीय दृष्टी विकसित झाली. म्हणूनच योगी अरविंद तर पुढे जाऊन म्हणतात- indian nationalism is nothing but sanatan dharma. त्यामुळेच भारतात एक सर्वसमावेशक, नित्य विस्तारशील राष्ट्र आकारास आलं.
परंतु प्रश्न तेव्हा निर्माण झाले जेव्हा भारतात आलेल्या काही शक्तींनी सर्वसमावेशक दृष्टी नाकारली. भारताने विकसित केलेली ही जीवनदृष्टी आणि जीवनशैली नाकारून एकांगी भूमिका ज्यावेळी भारतात मूळ धरू लागली अन धुडगूस घालू लागली, त्यावेळी स्वत:च्या विश्वकल्याणी दृष्टीचे, विचारांचे, तत्वांचे अन जीवनाचे रक्षण करण्याचा प्रयत्न या राष्ट्राने केला. म्हणूनच संघर्ष आणि रणवीरांचा इतिहास तुलनेने अलीकडचा आहे. वेद, उपनिषदांमध्ये रणसंघर्ष नाही. मात्र अलीकडील काळात रचलेल्या पुराणांमध्ये हा संघर्ष आहे. त्याचे कारणच संघर्षाचा विचार, त्यासाठीची सिद्धता आणि प्रत्यक्ष पराक्रम यांचा इतिहास या मूळ राष्ट्रावरील आक्रमणानंतरचा आहे. या संघर्षाचा मोठा आणि अलीकडचा परिणाम म्हणजे १९४७ ची भारताची फाळणी होय. या हजारेक वर्षांच्या संघर्षाचा परिणाम हा झाला की, या राष्ट्राच्या स्वाभाविक विकासाला खीळ बसली. याचा अर्थ आत्मभावाच्या विकासाला, एकत्वभावनेची अनुभूती अधिकाधिक लोकांना व्हावी यासाठीच्या प्रयत्नांना खीळ बसली. त्यासाठी करावयाच्या उदात्त अन प्रचंड उद्यमाऐवजी सर्वसमावेशकता नाकारणाऱ्या शक्तींशी संघर्षातच काळ, शक्ती, बुद्धिमत्ता, धन सगळे खर्ची पडले.
या पार्श्वभूमीवर अखंड भारताचा विचार महत्वाचा ठरतो. सगळ्यांना सामावून घेत, शांततापूर्ण सहजीवन हा जर भारतीय राष्ट्रकल्पनेचा व्यावहारिक आशय घेतला तर; अस्मिता भडकावून छोटे मोठे गट तयार करणे, त्याआधारे सत्ता आणि संपत्तीसाठी सतत संघर्ष करणे ही भारतेतर राष्ट्रकल्पना त्याज्यच ठरते. पाकिस्तानची निर्मिती आणि पाकिस्तानची समस्या याच `आम्ही तुम्हाला मानत नाही' या उद्दंडतेचा परिणाम आहेत. नव्हे जगभरातील अशांतता, उद्रेक, स्थलांतराचे प्रश्न, देशांचे घडणे अथवा मोडणे, युरोपीय युनियनसारखे प्रयोग फसणे, अण्वस्त्राचा धोका हे सगळे exclusivist सत्ताकांक्षी अस्मितेचे अन त्यालाच राष्ट्र समजण्याचे परिणाम आहेत. याच्या मुळाशी भारतेतर जीवनदर्शनांची अपूर्णता आहे. शांततापूर्ण सहअस्तित्व जगात कोणीही नाकारीत नाही. मात्र ते प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न यशस्वीही होत नाहीत. हे प्रयत्न जिथे अडतात किंवा अपयशी ठरतात तेथे जीवनदृष्टीचा, विचारांचा अपुरेपणा हेच कारण असल्याचे दिसून येते. एखादी गोष्ट का स्वीकारायची अथवा का नाकारायची, एखाद्या गोष्टीचा आग्रह का धरायचा अन एखादी गोष्ट का सोडून द्यायची अशासारखे प्रश्न जीवनदृष्टीच्या अपुरेपणाने निर्माण होतात. भारताने या समस्येवर मात करीत प्रदीर्घ काळ एकरस समाज येथे घडवला. एक सत्य, व्यापक, व्यावहारिक, सर्वसमावेशक, सगळ्यांचा आदर करणारे, पण लघुता- क्षुद्रता- अभद्रता- यांचा त्याग करीत `आम्ही एक आहोत' हा राष्ट्रभाव विकसित करणारे उत्तुंग जीवनदर्शन सगळ्यांपुढे ठेवून, तशा आदर्श जीवनाची आकांक्षा जागवून भारताने ते केले. संपूर्ण जगालाही शांततापूर्ण सहअस्तित्वासाठी याशिवाय दुसरा मार्ग नाही. हा मार्ग कोण दाखवणार? जे त्या मार्गावरून चालले आहेत ते. भारत आणि या भारतातील हिंदू समाज यांच्यावरच ही नियतीदत्त जबाबदारी आहे. म्हणूनच ऋषींनी `वसुधैव कुटुंबकम' म्हटले, ज्ञानोबांनी `हे विश्वची माझे घर' म्हटले आणि आचार्य विनोबांनी `जय जगत' म्हटले. परंतु हे होईल कसे? हा जो प्रवास राहील त्याचा प्रारंभ म्हणजे `अखंड भारत'.
१९४७ साली भारत खंडित झाला. अपार जीवितहानी, वित्तहानी झाली. खूप कटुता निर्माण झाली. या साऱ्याची चर्चा होते त्यावेळी त्याची कारणे शोधून आरोप प्रत्यारोप होतात. रा. स्व. संघ, हिंदू महासभा यांनी भारत अखंड राहावा यासाठी काही केले नाही असा आक्षेप घेतला जातो. तर महात्मा गांधींनी आपल्या प्रेतावरून भारताचे विभाजन होईल असे म्हटल्याची अन त्यांनी काहीही केले नाही अशीही टीका होते. कॉंग्रेसने तर अधिकृतपणे विभाजनाला मान्यता दिलीच. कम्युनिस्टांना भारताचे अनेक तुकडे हवे होते त्यामुळे त्यांचा विचार करण्याची गरजच नाही. मात्र ही सगळी चर्चा विभाजन का स्वीकारले याची आहे. विभाजन का झाले याची नाही. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, रा. स्व. संघ, हिंदू महासभा, गांधीजी, कॉंग्रेस यापैकी कोणीही देश तोडण्याची मागणी वा भाषा केली नव्हती. देश अखंड राखण्यात कोणी अपयशी ठरले असेल, कोणी विभाजन मान्य केले असेल; मात्र तशी कोणाची मागणी नव्हती. दुसऱ्या शब्दात या सगळ्या संस्था, संघटना, पक्ष अन लोक हिंदू-मुस्लिम सहअस्तित्वाचे विरोधी नव्हते. हिंदू-मुस्लिमांनी एकत्र राहू नये असे यापैकी कोणाचेही म्हणणे नव्हते. याचे मुख्य कारण हिंदूंची बहुसंख्या हेच होते. हिंदू कुठेही असला तरीही स्वभावतः सहअस्तित्ववादीच असतो. मग विभाजन कशामुळे झाले? विभाजन सहअस्तित्वाला नकार देण्याच्या मुस्लिम मानसिकतेमुळे झाले. आम्ही बाकीच्यांपेक्षा श्रेष्ठ आहोत, आम्हाला विशेष लाभ, विशेष दर्जा असला पाहिजे, अन्य लोक दुय्यम आहेत या मुस्लिम प्रवृत्तीतून भारत विभाजित झाला. ही मानसिकता नाकारणारी मुस्लिम संख्या थोडी होती, प्रभावहीन होती हे विभाजनाचे एकमेव कारण आहे. विभाजन घडवून आणणाऱ्या पाश्चात्य शक्तींनीही याच मानसिकतेचा आधार घेऊन, तिला खतपाणी घालून विभाजन प्रत्यक्षात घडवले. द्विराष्ट्रवाद कोणाची देणगी आहे यावरही चर्चा होत असते. त्यात स्वा. सावरकर यांचेही नाव येते. चर्चेपुरता हा दावा स्वीकारला तरीही, सावरकरांना दोन देश हवे होते असा त्याचा अर्थ होत नाही. एकाच देशात दोन राष्ट्रसमूह राहू शकतात. त्यामुळे द्विराष्ट्रवाद कोणीही प्रतिपादन केलेला असला तरीही ते भारत विभाजनाचे कारण नाही. भारत विभाजनाचे एकमेव कारण सहअस्तित्वाला नकार देणारी मुस्लिम मनोवृत्ती आणि त्या मनोवृत्तीचे पोषण करणारे त्यांचे तत्वज्ञान हेच आहे.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत खंडित स्वरुपात स्वतंत्र झाल्यानंतर मात्र एक लक्षणीय बदल झाला. कॉंग्रेसने उराशी बाळगलेले अखंड भारताचे ध्येय सोडून दिले. गांधीजींनीही आपल्या अखंड भारताच्या स्वप्नाला तिलांजली दिली. परंतु रा. स्व. संघ, हिंदू महासभा, स्वा. सावरकर यांनी मात्र अखंड भारताच्या ध्येयाचा त्याग केला नाही. स्वातंत्र्यानंतर अस्तित्वात आलेला भारतीय जनसंघ या राजकीय पक्षानेही अखंड भारताचे ध्येय स्वीकारले होते. यातील हिंदू महासभा शक्तिहीन आणि निष्प्रभ झालेली आहे. सावरकरांचा वारसा सांगणारी कोणतीही संघटीत शक्ती अस्तित्वात नाही. अन भारतीय जनसंघाचा नवीन अवतार असलेल्या भारतीय जनता पक्षाने अखंड भारत हा विषय टाकून दिलेला आहे. रा. स्व. संघ मात्र अजूनही अखंड भारताचे स्वप्न बाळगून आहे. प्रसिद्ध समाजवादी डॉ. राममनोहर लोहिया यांनी जनसंघाचे नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्यासह अखंड भारताच्या दिशेने टाकलेले पाउल या स्वरुपात एका confederation ची कल्पना मांडली होती. रा. स्व. संघातर्फे अजूनही अखंड भारताचे स्मरण केले जाते आणि त्याची ती आकांक्षाही आहे.
अखंड भारत ही वास्तविकता होऊ शकेल का? कशी असेल ही वास्तविकता? याचाही विचार अस्थानी ठरू नये. एक राज्य, एक सरकार, एक पंतप्रधान, एक सैन्यदल, एक कायदा असे त्याचे स्वरूप राहणार नाही हे निश्चित. असे स्वरूप राहणारच नाही असे नाही. पण त्याला प्रदीर्घ काळ लागेल. सुरुवातीला तसे चित्र नसेलच. यासोबतच हेही लक्षात घ्यायला हवे की, अखंड भारत म्हणजे केवळ भारत- पाकिस्तान- बांगलादेश- एवढेच नाही. अखंड भारत या कल्पनेत श्रीलंकेपासून अफगाणिस्तानपर्यंत आणि पूर्वेला नेपाळ, ब्रम्हदेश, भूतान पर्यंत सगळ्या लहानमोठ्या देशांचा समावेश असेल. ढोबळ मानाने आज ज्याला `सार्क' म्हणून ओळखले जाते तो प्रदेश. या प्रदेशात भारताशिवाय जे देश आहेत त्यांच्यात मुस्लिमांशिवाय हिंदू, बौद्ध व अन्य लोकही राहतात. त्यांच्यात खूप वितुष्ट वा शत्रुत्व नाही. पूजापद्धती, आचारव्यवहार इत्यादी मिळतेजुळते आहे. श्रीलंकेचे प्रमुख भारतातील मंदिरात दर्शनासाठी येतात. श्रीलंकेतील महिला साडी परिधान करतात. खूपसे साम्य आणि सौहार्द्र या देशांमध्ये आहे. `सार्क'च्या माध्यमातून विविध प्रकारची देवाणघेवाण यांच्यात होत असते. एक आर्थिक गट म्हणून पुढे येण्याचीही या देशांची आकांक्षा आहे. परस्परांच्या देशात जाण्यासाठी व्हिसा आदी लागू नये असेही प्रयत्न सुरु आहेत. हीच देवाणघेवाण अधिक व्यापक आणि मूलगामी करीत वैचारिक आणि भावनिक स्तरापर्यंत वाढवली तर अखंड भारताचा एक महत्वाचा टप्पा साध्य होईल. असे झाल्यास निर्माण होणारी शक्ती आजच्या `भारतीय उपमहाद्विपाचे' `भारत' होण्यासाठी मोठा आधार ठरेल. अखंड भारत प्रत्यक्षात येण्याची सुरुवात पाकिस्तानपासूनच व्हायला हवी असे कुठे आहे?
मुख्य अडचण पाकिस्तान व बांगलादेश यांची आहे. परंतु आजची परिस्थिती तशीच राहील असे नाही. वास्तविक हे दोन्ही देश आर्थिक, सामाजिक, राजकीय दृष्टीने इतके खिळखिळे झाले आहेत की, त्यांचे अस्तित्व टिकेल का असा प्रश्न उघडपणे चर्चिला जातो. त्यांचे अस्तित्वच टिकणार नाही अशी साधार भीती अनेकांना वाटते. उद्या समजा हे देश विखुरले तर? जागतिक शक्ती त्यांचा अफगाणिस्तान करणार नाहीत याची शाश्वती देता येत नाही. आपल्या शेजारी दुसरा अफगाणिस्तान तयार होणे भारताला परवडणारे नाही. त्यामुळे हे देश विखुरलेच तर त्यावेळी निर्णायक चाल खेळणे भारताला आवश्यक ठरेल. तशी चाल भारत खेळू शकला तर तेही अखंड भारताच्या दिशेने टाकलेले पाउल ठरेल. अनेकांना हे पटणार नाही, पण सध्याच्या स्थितीत पाकिस्तान आणि बांगलादेश विखरु नयेत असाच भारताचा प्रयत्न असायला हवा. हे दोन्ही देश एकसंघ राहावेत यासाठी भारताने प्रयत्न करायलाही हरकत नाही.
अखंड भारताचा सकारात्मक विचार करण्यासारखे काही बदल १५ ऑगस्ट १९४७ नंतर झाले आहेत का, याचाही विचार क्रमप्राप्त ठरतो. असे बदल झाले आहेत असे ठामपणे म्हणता येईल. कोणते आहेत हे बदल?
१) हिंदूंची वाढलेली शक्ती. हिंदूंचे संघटन, हिंदूंची आर्थिक, सामाजिक, राजकीय शक्ती वाढलेली आहे.
२) भारतातील मुसलमानांची मानसिकता १०० टक्के पाकिस्तानी राहिलेली नाही.
३) पाकिस्तानपेक्षाही अधिक मुस्लिम भारतात राहतात अन तेही हिंदूंबरोबर. भारतातील, पाकिस्तानातील अन जगभरातील मुस्लिमांना आता याची जाणीव होऊ लागली आहे.
४) भारताची एक देश म्हणून वाढलेली शक्ती अन त्याने जगात प्राप्त केलेले स्थान.
५) पाकिस्तान निर्मितीबद्दल झालेला पाकिस्तानी नागरिकांचाच भ्रमनिरास.
६) भारताशी शत्रुत्व करू नये असा विचार करणारी सध्या लहान असणारी पण पुढे वाढण्याची शक्यता असलेली पाकिस्तानातील शक्ती.
७) इस्लामअंतर्गत सुरु झालेले परिवर्तनाचे प्रयत्न.
८) इस्लामच्या नावाने सुरु असलेल्या दहशतवादाचे इस्लामच्याच अनुयायांना बसणारे तडाखे.
ही सगळीच कारणे भारतापासून दूर झालेल्या देशांना भारताच्या जवळ येण्यासाठी बाध्य करू शकतात, बळ पुरवू शकतात. परंतु एकीकरणाची ही प्रक्रिया केवळ सत्ता आणि संपत्तीच्या लाभहानीपुरती किंवा व्यावहारिक देवाणघेवाणीपुरती राहून चालणार नाही. तसे झाले तर त्यातून हितसंबंधांची गटबाजी निर्माण होईल, अखंड भारत नाही. अशा प्रकारची देवाणघेवाण, कला साहित्य क्रीडा यातील सहकार्य आणि सहयोग इत्यादीसोबत; कोणत्याही काळात आणि कोणत्याही लोकांसाठी, कोणत्याही परिस्थितीत आधारभूत ठरू शकणारे भारतीय जीवनदर्शन रुजवण्याला प्राधान्य द्यावे लागेल. `एकं सत, विप्रा: बहुधा वदन्ति', `सर्वेपि सुखिनः सन्तु', `सर्वं खल्विदं ब्रम्ह', `ईशावास्यमिदं सर्वम' ही आणि यासारखी जीवनदृष्टी घडवणारी तत्वे जगण्याचा एक भाग होतील हे पाहिले पाहिजे. यासाठी प्रथम आजच्या भारतात मोठे वैचारिक अन भावनिक परिवर्तन हवे. त्यातून आजच्या भारताची क्षमता वाढेल. ती वाढल्याशिवाय पुढे पाउल टाकताच येणार नाही. भारताची ही क्षमता केवळ तंत्रज्ञान, उद्योग, शेती, सेवा, पैसा, साधने, सुखसोयी यांची क्षमता नसावी. या सगळ्यासह विचारांची क्षमता हवी. विचारांची व्यापकता, कणखरता, मुळापर्यंत जाण्याची तयारी, त्यातून विकसित होणारी जीवनदृष्टी, त्या दृष्टीला अनुकूल व्यवहार; ही सगळी त्या क्षमतेची अंगे होत. यातून अखंड भारत साकार होईल. अन अखंड भारत साकार होणे optional नाही. जमले तर करू बुवा, नाही तर नाही; असे चालूच शकत नाही. अखंड भारत व्हावाच लागेल, त्याला पर्याय नाही. कारण त्याशिवाय संपूर्ण पृथ्वीवरील मानवी सहअस्तित्व सार्थक, शांततापूर्ण अन आनंददायी होऊच शकत नाही. अखंड भारताचा अंतिम टप्पा गाठेपर्यंत भूमिका आणि रणनीती म्हणून अनेक बाबी कराव्या लागतील. वरवर पाहता त्या अखंड भारताच्या स्वप्नाशी विसंगत वाटू शकतील. उदाहरणार्थ- अण्वस्त्रसज्जता. अखंड भारताच्या अंतिम चित्रात त्याला काहीही स्थान नाही. पण त्याची तात्कालिक अपरिहार्यता देखील नाकारता येत नाही. सिद्धांत, भूमिका आणि धोरण यांचा संतुलित विचारव्यवहार अन अशा विचारव्यवहाराची सार्वत्रिक समज या गोष्टी आवश्यक आहेत.
थोर तत्वचिंतक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी अखंड भारत या संबंधाने व्यक्त केलेले विचार अखंड भारताच्या दिशेने करावयाची वाटचाल, त्याची तात्विक भूमिका आणि त्याचे व्यवहारिक मार्गदर्शन करणारे आहेत. आपल्या दीर्घ लेखात पंडितजी लिहितात- `अखंड भारत केवळ देशाच्या भौगोलिक एकतेचा परिचायक नाही, तर जीवनाच्या भारतीय दृष्टिकोनाचा द्योतक आहे. हा दृष्टीकोनच अनेकतेत एकतेचे दर्शन घडवीत आहे. म्हणूनच आमच्या बाबतीत अखंड भारत ही अशी एखादी राजकीय घोषणा नाही, की जी विशिष्ट परिस्थितीत लोकप्रिय होईल म्हणून आम्ही स्वीकारली आहे.अखंड भारताची धारणा हा आमच्या संपूर्ण जीवनदर्शनाचा मूलाधार आहे. जर आम्ही युगायुगातून वाहत आलेल्या आपल्या जीवनधारेच्या अंत:प्रवाहाचे दर्शन घेण्याचा प्रयत्न करू, तर आम्हाला असे आढळून येईल की, आमची राष्ट्रीय चेतना सदैव अखंडतेसाठी प्रयत्नशील राहिलेली आहे आणि त्या प्रयत्नात आम्ही पुष्कळ प्रमाणात सफलही झालो आहोत. १९४७ चा पराजय हा भारतीय एकत्वाच्या अनुभूतीचा पराजय नाही, तर राष्ट्रीय एकतेच्या नावावर केलेल्या भ्रांत प्रयत्नांचा पराजय आहे. जर भौगोलिक दृष्ट्या खंडित झालेल्या भारतात हिंदू मुस्लिमांमध्ये एकत्वाची अनुभूती शक्य असेल, तर शेष भूभाग आपल्याशी एकजीव व्हायला वेळ लागणार नाही. एकतेच्या अनुभूतीच्या अभावाने जर देश खंडित झाला आहे, तर त्या अनुभूतीच्या अस्तित्वाने तो अखंड होईल. आम्ही त्याचसाठी प्रयत्न करायला हवा.'
- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, १० ऑगस्ट २०१६

गुरुवार, २ जून, २०१६

पहा विचार करून...


१५ मे रोजी जागतिक कुटुंब दिवस साजरा करण्यात येतो असे वृत्तपत्रातून लक्षात आले. रोज असा कोणता ना कोणता दिवस साजरा करण्याची गरज संयुक्त राष्ट्रसंघाला जाणवते यातच वर्तमान जागतिक व्यवस्था व वातावरणाचे अपयश लपले आहे. नेमक्या याच दिवशी, वृत्तपत्रात महात्मा गांधींचे नातू कनू गांधी अन त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. शिवा लक्ष्मी दिल्लीतील एका वृद्धाश्रमात राहत असल्याचे प्रकाशित झाले आहे. महात्मा गांधी यांचे चिरंजीव रामदास गांधी यांचे कनू गांधी हे पुत्र. वय ८७ वर्षे. स्वाभाविकच ही बातमी वाचल्यावर मनात कणव निर्माण होते. याच बातमीत दुसरे एक प्रसिद्ध गांधी- तुषार गांधी यांची या बातमीवरील प्रतिक्रिया प्रसिद्ध झाली आहे. तुषार गांधी म्हणतात- `कनू गांधीच यासाठी दोषी आहेत. त्यांचे कधीच कुणाशी पटत नाही, पटू शकत नाही. आम्ही आणि गांधीजींशी संबंधित सगळ्या संस्था त्यांचा सांभाळ करायला तयार असतानाही त्यांच्या स्वभावामुळे, वागण्यामुळे ते टिकत नाहीत.' तुषार गांधी यांच्या या प्रतिक्रियेत काही अन्य रंगही असू शकतील. मात्र याच प्रतिक्रियेत त्यांनी मांडलेला एक मुद्दा मात्र अधोरेखित करून लक्षात घेण्यासारखा आहे. ते म्हणाले- गांधीजींच्या वारसांना सांभाळणे हे सरकारचे काम नाही. अन त्यांचे हे म्हणणे पूर्णपणे पटण्यासारखे आहे. मात्र तुषार गांधी यांची प्रतिक्रिया क्षणभर बाजूस ठेवून कनू गांधींचा विचार केला तर काय जाणवते? आजच्या त्यांच्या परिस्थितीसाठी तेच जबाबदार असू शकतात. कारण ते स्वत: उच्च विद्याविभूषित असून २५ वर्षे अमेरिकेत राहिले आहेत. त्यांनी नासा सारख्या संस्थेत काम केले आहे. ते आपल्या आयुष्याचे नीट नियोजन करू शकले नाहीत का? की आणखीन काही... अशा प्रकरणी सामान्य माणसापासून मोठ्या लोकांपर्यंत सगळ्यांच्याच प्रतिक्रिया गोंधळलेल्याच राहतात. याचे कारण आहे, आपण पुरेशा गांभीर्याने या गोष्टींचा विचारच करीत नाही.
कधी कधी वाटते की, आपण अति भावनावशतेच्या युगात वावरतो आहोत की काय. अन वृद्धांच्या संबंधातही याच भावनावशतेतून विचार करतो की काय? वृद्धांचा विचार करताना वृद्धांच्या समस्या, वृद्धांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या, अन मूळ वृद्धावस्था या तीन अंगांनी विचार करणे आवश्यक आहे. यातील एकाचाही धड विचार आज होताना दिसत नाही. `आम्हाला त्यांनी जन्म दिला आहे. आम्ही त्यांचे ऋणी आहोत. त्यांचे ऋण फेडणे आमचे कर्तव्य आहे,' एवढाच विचार होताना दिसतो. अन हा विचार टोकाला पोहोचला की, विवश कर्तव्यबोधात परिणत होऊन एक प्रकारचा inferiority complex निर्माण होतो. आज बहुश: हेच चित्र दिसते.
वृद्धांच्या वेगळ्या समस्या असतात. हातपायच नव्हे, तर कान, डोळे, मेंदू, मन, स्मृती सगळेच थकलेले असते. त्यामुळे परावलंबन येते. स्वत: जे काही करतात तेदेखील व्यवस्थित करू शकत नाहीत. हातून वस्तू पडून जाणे, चालताना अंग कापणे, अडखळणे, सामान्य व्यक्ती १० पावले चालून जाईल तेवढ्या वेळात दोन पावले चालणे, विजेची बटने बंद करायला विसरणे, नळाच्या तोट्या बंद करायचे राहून जाणे, दार बंद करता न येणे किंवा बंद दार उघडता न येणे, खायला-जेवायला वेळ लागणे, कधी कधी खाताना सांडणे, वाहनात बसताना- उतरताना वेळ लागणे, त्रास होणे, स्वत: मोठ्याने बोलणे आणि दुसऱ्यांनी मोठ्याने बोलावे ही अपेक्षा; अशा असंख्य गोष्टी असतात. यातून त्यांना स्वत:ला शारीरिक, आर्थिक, मानसिक, भावनिक त्रास होतोच, शिवाय त्यांच्या सोबत राहणाऱ्यांनाही त्रास होतो. आज लाखो घरे अशा गोष्टींनी त्रासलेली आहेत. अनेक घरे तर या त्रासांच्या जोडीला असलेल्या शारीरिक वा मानसिक आजारांनी रया घालवून बसली आहेत. रोजच्या व्यवहारातील एक त्रास अनेकदा पाहायला मिळतो. लघुशंका केल्यानंतर न्हाणीघरात पाणी व्यवस्थित न टाकणे. एक तर मुळात म्हातारपण म्हणा, त्यातच औषधे आदींची भर; त्यामुळे लघुशंकेला उग्र असा दर्प असतो. त्यात न्हाणीघराची निगा योग्य पद्धतीने राखली गेली नाही तर सगळ्या घराला त्रास होतो. भरीसभर घरी कोणी आले की आणखीन पंचाईत. अशा वेळी घरच्या अन्य सदस्यांची चिडचिड होणे, त्रागा होणे स्वाभाविक असते. एकूणच वागण्याबोलण्यात आलेली बेफिकिरी, अनावश्यक अघळपघळपणा, कुठे काय बोलायचे याचे भान नसणे, वस्तू घेतल्या तिथे टाकून देणे; अशाही गोष्टी आढळतात. आपण अर्थहीन होत असून संपत चाललो आहोत या जाणीवेतून मुद्दाम त्रास देण्याची वृत्तीही आढळून येते. या साऱ्याचा त्यांनाही त्रास होतो अन इतरांनाही. त्यांनी हा त्रास किती सहन करायचा आणि बाकीच्यांनी का, किती अन कुठवर सहन करायचा असे प्रश्न निर्माण होतात.
बदललेल्या परिस्थितीचाही विचार अपरिहार्य ठरतो. घरोघरी कमी झालेली माणसांची उपलब्धता, स्त्री व पुरुष दोघांचेही काम करणे, मुलांचे अभ्यास- करीयर इत्यादी वर्तमान समाजाचे वास्तव आहे. यातील कोणाला काय सोडायला वा थांबवायला सांगायचे? तसे सांगणे योग्य ठरेल का? वयाच्या साधारण ७० च्या पुढे हे प्रश्न वाढतात आणि गुंतागुंतीचे होत जातात. उपदेशात्मक आणि भावनात्मक आवाहने अन विश्लेषणे ऐकायला कितीही चांगली व उदात्त वगैरे वाटली तरीही त्याचा ना वृद्धांना उपयोग असतो, ना त्यांचे करावे लागणाऱ्या बाकीच्यांना. अनेकदा तर दोन्ही बाजूंना मोठी क्षुब्धता, अशांती, असमाधान निर्माण होते. त्यात अनेक गोष्टींचा बळी जातो.
सरकारे याबाबत काय करतात वा करू शकतात? एक तर पेन्शन वा अन्य मार्गांनी पैसा देणे; अन दुसरे म्हणजे त्यांच्या समस्या लक्षात घेऊन कायदे करणे. जसे - सगळीकडे लिफ्ट अथवा स्लोपिंग असावे, आधारासाठी कठडे असावे, वाहनांमध्ये आसने आरक्षित असावीत, आवाजावर मर्यादा... इत्यादी. पण या नियमांची अंमलबजावणी होते की नाही, करण्यात आलेल्या सोयी नीट चालतात की नाही आणि त्यांची निगा राखली जाते की नाही, या सोयी पुरवण्यातील अडचणी, सोयी निर्माण करून वृद्धांचे त्रास संपतात का याचा आढावा घेणे; अशा अनेक गोष्टी कामांचा अनावश्यक फापटपसारा वाढवून ठेवतात. पैसा देणे हा तर उपाय होऊच शकत नाही. आज विविध बँका अथवा डाक कार्यालये येथे जाऊन पाहिले तरी वृद्धांना पैसा प्राप्त करण्यासाठी होणारे त्रास लक्षात येतील. अर्थात ते करण्याची इच्छा अन फुरसत कोणाकडेही नाही. आपण जिवंत आहोत यासाठी द्यावयाच्या प्रमाणपत्रापासून, जाणेयेणे, तहान- लघुशंका- कान, डोळे, शरीर यांच्या कमी होणाऱ्या शक्तीचे परिणाम- त्यामुळे फॉर्म भरता न येणे, सही नीट न येणे इत्यादी अडचणी... अशा असंख्य गोष्टी. शिवाय पैसे मिळाले तरीही विविध बिले भरण्यासाठी जाणे, रांगेत उभे राहणे अशा गोष्टी असतातच.
सगळे बाजूला ठेवले तरीही बाहेर वा घरात सुरक्षा हा मुद्दा उरतोच. कॅमेरे बसवले तरीही त्याने घटना थांबवता येत नाहीत. शिवाय सुरक्षा म्हणजे केवळ गुंडांपासूनची सुरक्षा नव्हे. तोल जाऊन पडणे, चक्कर येणे, न्हाणीघराचे दार लागून जाणे, किंवा अनामिक भय यांचे काय? बरे सगळे घटक योग्य आहेत असे धरले; जसे पैसा आहे, घरदार आहे, मुले- सुना- नातवंडे आहेत- तरी समस्या वा त्रास नसतात का? एखाद्या वृद्धाला अचानक काही त्रास सुरु झाला तरीही त्याबाबत कळणे आणि मुलाने, सुनेने घरी येऊन त्यांना घेऊन जाणे यासाठी लागणारा वेळ कसा भरून काढायचा? आजकाल वाढत्या शहरांमुळे हा वेळ वाढतच जाणारा राहील. ही सगळी चर्चा मुख्यत: शहरी भागातील, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत नसलेल्या अन बऱ्यापैकी सुशिक्षित वर्गाच्या संदर्भातीलच आहे. पण ग्रामीण भाग, आर्थिक विपन्न समाजबांधव, अशिक्षित वर्ग यातील वृद्धांचे प्रश्न आणि समस्या तर आणखीनच भीषण आहेत. केवळ पैसा, सुविधा अन गोडबोलेपणा यांनी त्या दूर होऊ शकतील का?
याच्याही पलीकडचा एक प्रश्न म्हणजे मानसिकता अन रितेपणा. जगाच्या दृष्टीने निरर्थक होत जाणे, उपभोगाच्या दृष्टीने क्षीण होत जाणे, आयुष्यभराच्या अनुभवांती येणारा तोचतोचपणाचा कंटाळा, अन मृत्यूची चाहूल; या साऱ्याचे काय? त्या संदर्भात तर आज कुठेही चर्चा होताना दिसत नाही. केवळ पैसा, सुविधा, आरोग्य, नातीगोती यापलीकडचे हे विषय आहेत. आतापर्यंत चर्चा केलेल्या सगळ्या घटकांचा संकलित सखोल विचार करून याबाबत उपाययोजना करणे आवश्यक ठरते. केवळ शिळ्या कढीला उत आणल्यासारखे, वृद्धांमध्ये कृत्रिम उत्साह- कृत्रिम चैतन्य- कृत्रिम जीवेच्छा- निर्माण करणे हास्यास्पद ठरते. त्यापेक्षा व्यावहारिक आणि भावनिक वास्तवावर घट्ट पाय रोवून याकडे पाहिले पाहिजे.
प्राचीन भारतीय शास्त्रात उल्लेख असलेल्या आश्रम व्यवस्थेचा या अनुषंगाने विचार व्हायला हवा. प्राचीन भारतीय चिंतन म्हटले की नाके मुरडणे अन `वृद्धाश्रम म्हणजे समाजाला लागलेली कीड' या सुविचाराच्या माऱ्याने झालेले बधिरीकरण; याबाहेर पडून या विषयाकडे पाहायला हवे. आजचे वृद्धाश्रम ही निखालस उचलून धरावी अशी गोष्ट नाही. सेवाभाव म्हणून चालणारे वृद्धाश्रम मोठ्या प्रमाणात केविलवाणे असतात. अन केविलवाणे असले वा नसले तरीही तेथे ठेवण्यात येणारे वृद्ध अन अशी सेवाकार्ये यामागील भावना माणूस म्हणून अधोगतीला नेणारी आहे. समाजात व्यावसायिक वृद्धाश्रम देखील आहेत. मात्र त्यांचा उदेशच व्यावसायिक असल्याने त्याबाबत बोलण्यात अर्थ नाही. समाजाला लाचारी, दुरावा, नकोसेपण, व्यावसायिकता यापासून दूर; आणि वृद्धांचे जीवन सुकर व सार्थ करणारी, त्याचवेळी बाकीच्यांना गृहीत न धरणारी अशी व्यवस्था हवी आहे. अशी व्यवस्था तयार करून, नियोजन करून, लादून होणार नाही. ती विकसित व्हावी लागेल. या विषयाची व्यापक सार्वत्रिक चर्चा हे त्याचे पहिले पाऊल राहील. तरीही ही व्यवस्था कशी असू शकेल याचे एक कल्पनाचित्र-
१२ वर्षांचे एक तप असे म्हणतात. त्याला धरून, जीवनाची सहा तपे पूर्ण झाल्यानंतर म्हणजे वयाची ७२ वर्षे पूर्ण झाल्यानंतर वृद्धांसाठीच्या स्वतंत्र आश्रमात राहायला जाणे. ७२ व्या वर्षी कौटुंबिक जीवन संपुष्टात येईल अशी सामाजिक व्यवस्था असावी. यानंतर कुठलीही आर्थिक वा अन्य सुविधा देण्यात येऊ नये. वैयक्तिक संपत्ती व मालमत्तेची व्यवस्था त्यांनी त्यांच्या इच्छेने करावी आणि कफल्लक होऊन आश्रमवासी व्हावे. यानंतरची सगळी व्यवस्था सरकार आणि समाज यांनी करावी. तसे करणे त्यांना बंधनकारक असावे. या स्वतंत्र आश्रमांची व्यवस्था परिपूर्ण असावी. एकट्या वृद्धासाठी वा जोडप्यासाठी स्वतंत्र खोल्या असाव्यात. जेवणखाण, कपडेलत्ते, औषधपाणी, वैद्यकीय व्यवस्था, मंदिर, संगणक, ग्रंथालय, वृत्तपत्रे; अशा एक ना अनेक; सगळ्या प्रकारच्या व्यवस्था तेथे असाव्यात. त्यासाठीचा खर्च सरकार अन समाजाने करावा. सरकारचा पेन्शन, अन्य सुखसोयी अथवा सवलती यासाठी होणारा खर्च आणि प्रत्येक व्यक्ती वा कुटुंबाचा त्यासाठी होणारा खर्च या आश्रमांकडे वळवता येईल. अधिकच्या खर्चाची तरतूद करणेही कठीण नाही. कोणत्याही वृद्धाला कोणत्याही कारणासाठी कुठेही जाण्याची गरज पडणार नाही अशी या आश्रमांची व्यवस्था राहावी. ही व्यवस्था पाहणारे, राबवणारे, देखभाल करणारे व्यावसायिक लोक असावेत. २४ तास पाळीनुसार ते कामे करतील.
वयाचे ७२ वे वर्ष हे फार होत नाही हे खरे. या वयात माणूस नीट हालचाली वगैरे करू शकतो हेही खरे. पण एकदम गलितगात्र झाल्यावर टाकून दिल्यासारखे स्वतंत्र व्यवस्था करणे योग्य नाही. त्यापेक्षा परावलंबीत्व दृष्टीच्या टप्प्यात येऊ लागताच, पुढील दृष्टीने मनाची तयारी अन सवय म्हणून हे वय योग्य राहील. जे वृद्ध काही काम करू इच्छितात, ते आश्रमाच्या कामात अथवा सामाजिक वा सरकारी कामात सहभागी होऊ शकतील. अर्थात आश्रमात राहण्याच्या मर्यादेत अन त्यांच्या क्षमतेनुसार आणि बिना मोबदला. ५०- १००- २०० अशा संख्येने हे आश्रम असावेत. असे आश्रम तालुका स्थानीच असावेत. याचे दोन लाभ होतील- १) सर्व प्रकारच्या प्रदूषणापासून मुक्त आरोग्यदायी जीवन वृद्धांना मिळेल, २) लोकसंख्येचे विकेंद्रीकरण होईल. शहरांवरील भार आणि गावांचे बकालपण काही प्रमाणात नियंत्रित होईल. वृद्धांचा परस्परांना आधार राहील. सुखदुःखात साथ राहील. समान सुखदु:खे असल्याने, शरीराचे अन मनाचे वेग साधारण सारखे असल्याने फरपट होणार नाही. अधूनमधून त्यांच्या सहली वगैरे अर्थात राहाव्यातच. कुटुंबीयांनी भेटायला जाणे किंवा फार नाही (अगदी वाढदिवस, आठवण आली वगैरे) पण लग्नकार्य अथवा मरण अशा प्रसंगी वृद्धांनी घरी जाऊन येण्याची सोय असावी.
मात्र हे होईल का? अन कसे होईल? हे अगदी खरे आहे की, अनेक पातळ्यांवर अनेकांचा अनेक कारणांनी याला विरोध राहील. वृद्धांचाही विरोध राहू शकेल. आपणच आपल्याभोवती उभारलेल्या चौकटी, आपल्याच भावनांचे अन विचारांचे भोवरे यामुळेही विरोध राहील. पैसा, मालमत्ता, अधिकार हातून सोडण्याची तयारी राहणार नाही. माझे लोक वगैरे तर राहीलच. याची थट्टामस्करीही होईल. या साऱ्यासाठी भारतीय आध्यात्मिक विचार आवश्यक आहेत. त्यातही मृत्यूचा विचार आवश्यक. खरे तर मृत्यूचा विचार संपूर्ण जीवनासाठीच आवश्यक आहे. मृत्यूचा विचारच जीवनाचा अर्थ, आशय आणि अभिव्यक्ती घडवीत असतो. मृत्यूचा विचारच जीवनाकडे पाहण्याची दृष्टी विकसित अन प्रगल्भ करतो. एकूणच समाजाने आध्यात्माचा अन मृत्यूचा गांभीर्याने विचार करणे अन वृद्धांनी तर हा विचार अगत्याने अन अग्रक्रमाने करणे आवश्यक. यामुळे म्हातारपण तर सुखी होईलच, पण अपरिहार्यपणे निर्माण होणारी रिक्ततादेखील दूर होईल. जंजाळातून बाहेर पडणे हे अनेक प्रकारच्या गुंतागुंतीतून, त्रासातून बाहेर पडणे असते. जंजाळ न सोडण्यानेच रक्तदाब, मधुमेह अन निद्रानाश असे विकार सतावतात. असंख्य ताणतणाव `धरून ठेवण्यानेच' मागे लागतात. आजचे बहुतांश विकार अन व्याधी जीवनदृष्टीशीच संबंधित आहेत. ती दृष्टी विकसित केली की अनेक बाबी सुरळीत होतील. आज धर्म, देव, आध्यात्म या नावाने जे सुरु आहे ते दुर्दैवाने योग्य मार्गावर नाही. ते माणसाला आध्यात्मिक बनवून मुक्ततेच्या मार्गावर नेण्याऐवजी माणसाला अधिकाधिक ऐहिक अन दुबळे बनवण्यात गुंतले आहे. त्यांनी अधिक सघन आणि सार्थक पसायदान समाजाला देण्याची गरज आहे. सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक व्यवस्थेच्या अंगानेही याचा विचार व्हायला हवा.
पहा विचार करून...
- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, १ जून २०१६

शनिवार, २७ फेब्रुवारी, २०१६

राष्ट्रवाद - भारतीय अन अभारतीय


कालचा दिवस नि:संशय मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांचा होता. त्याचा प्रभाव बराच काळ राहणार आहे. ते स्वाभाविक तर आहेच, पण त्यात अयोग्य देखील काहीही नाही. त्यांनी आपल्या भाषणात, लोकसभेत त्याआधी झालेल्या एका भाषणाचाही उल्लेख केला होता. तो होता, पश्चिम बंगालमधील जादवपूरचे तृणमूल कॉंग्रेसचे खासदार सुगत बसू यांचा. खा. बसू यांचे भाषण खरंच अप्रतिम होते. पण अपूर्ण व अप्रामाणिक होते. अपूर्ण एवढ्यासाठी की, राष्ट्रवादाचे जे मूलगामी विवेचन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्याची सांगड ते वर्तमानाशी घालू शकले नाहीत. अन जी सांगड घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला ती तर्कदुष्ट आणि पूर्वग्रहदूषित होती. खा. बसू यांनी महर्षि अरविंद, रवींद्रनाथ टागोर, बंकिमचंद्र, नेताजी बोस आदींचा उल्लेख केला. रवींद्रनाथांच्या nationlasim या ग्रंथाचाही उल्लेख केला. अन त्यांची टिप्पणी होती की, आज रवींद्रनाथ असते तर त्यांनाही राष्ट्रद्रोही ठरवण्याचा प्रयत्न झाला असता. त्यांनी न उच्चारलेले पण अध्याहृत असलेले कारण हे की, रवींद्रनाथ आंतर्राष्ट्रवादी (वैश्विक) होते. खा. बसू यांचे वैश्विकता आणि राष्ट्रवाद याबद्दलचे आकलन तर तोकडे आहेच, पण राष्ट्रवादी विचारधारेवर त्यांनी केलेला आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहे.

वैश्विकता आणि राष्ट्रवाद या परस्परविरोधी बाबी आहेत, हा भारतेतर विचार आहे. भारतीय चिंतन परंपरा या दोन्हीत काहीही विरोध वा संघर्ष मान्य करीत नाही. राष्ट्रीयता आणि वैश्विकता या दोन वेगळ्या पायऱ्या आहेत एवढेच. राष्ट्रीयता हा अलीकडचा टप्पा आणि वैश्विकता हा पलीकडचा टप्पा. राष्ट्रवादी असल्याशिवाय कोणी विश्ववादी होऊ शकत नाही, अन राष्ट्रवादी होऊन कोणी तिथेच थांबू शकत नाही. मूलत: भारतीय चिंतन परंपरा पूर्णवादी आहे. ती या संपूर्ण अस्तित्वाकडे एक unit म्हणून पाहते. या अस्तित्वाकडे एक unit म्हणून पाहणारा सुद्धा त्याच्यापेक्षा वेगळा नाही. तोही त्या unit चाच भाग आहे. अन व्यक्ती ते विश्व या त्याच्या जाणिवांच्या पातळ्या आहेत. राष्ट्र ही त्यातील एक पातळी. जाणिवांची ही साखळी `व्यक्ती'पासून सुरु होते आणि कुटुंब, परिसर, समाज, निसर्ग, राष्ट्र असे करत `विश्व' जाणिवेपर्यंत पोहोचते. मात्र भारतीय चिंतन परंपरा केवळ वैश्विक नाही, ती त्याच्याही पलीकडील चेतन स्तरापर्यंत जाणीवेच्या विकासाची मांडणी करते. या जाणीवा एकाच ठायी एकाच वेळी अस्तित्वात असतात. फक्त त्यांची अभिव्यक्ती वेगवेगळ्या परिस्थितीत कमी अधिक होत असते इतकंच.

या देशातील सगळेच विचार, सगळेच महापुरुष, सगळेच चिंतन वैश्विकच आहे, पण त्याचा राष्ट्रीयतेशी संघर्ष नाही. रवींद्रनाथ टागोर हा काही अपवाद नाही. उपनिषदांपासून आजतागायत हाच प्रवाह चालत आला आहे. म्हणूनच संत ज्ञानेश्वरदेखील विश्वात्मक देवाला, विश्वासाठी पसायदान मागतात किंवा आचार्य विनोबा भावे `जय जगत'चा नारा देतात. एखादी व्यक्ती रोजच्या खाण्यापिण्याचा, कपड्यालत्त्याचा विचार `व्यक्ती' स्तरावरच करते. पण नेपाळला विनाशकारी भूकंप झाला की, लगेच मदतीचा हात पुढे करते. `मी' आणि `विश्व' या दोन्ही जाणीवा तिच्या ठायी आहेतच. त्या विशिष्ट वेळी अभिव्यक्त होतात. या दोनच्या मधील परिवार, परिसर, समाज, राष्ट्र इत्यादीच्या बाबतीतही असेच आहे. चांगले, सुखी, आनंदी, अर्थपूर्ण, सार्थक जीवन जगताना आणि जगण्यासाठी आवश्यक अशा या पायऱ्या आहेत. `मी'चा संपूर्ण विलय होऊन `चेतन' सत्तेत सदासर्वदा अवस्थित व्यक्ती हे व्यक्तित्वाच्या विकासाचे भारतीय मापदंड आहेत. परंतु किती जणांच्या बाबतीत हे वास्तव आहे वा असू शकते? फार थोड्यांच्या बाबतीत, हे त्याचे उत्तर आहे. `मी'च्या मर्यादा आणि `वैश्विक'तेची ओढ आणि आवश्यकता लक्षात घेऊन व्यक्तीच्या उत्तरोत्तर जाणीव विकासाचा विचार आवश्यक ठरतो. तसा तो केला नाही तर त्यातून भांबावलेपण अन सर्वनाश ओढवतो. ज्यांच्या जाणिवांचा स्तर अधिक आहे, त्यांना त्याहून लहान स्तर चुकीचा वाटत असेल तर त्याच्या जाणिवांचा विकास झालेला नसून, त्याच्या बुद्धीला फक्त त्याची माहिती आहे; असा अर्थ काढावा लागेल. ज्याच्या जाणिवांचा खरेच विकास अन विस्तार झालेला आहे, त्याला धाकट्या जाणीवा नाकारण्याची गरज पडणार नाही, कारण त्यातूनच पुढे जायचे असते हे त्याला अनुभवाने माहिती असते. हाच आहे सनातन धर्म. म्हणूनच महर्षी अरविंद म्हणतात भारतीय राष्ट्रवाद = सनातन धर्म.

परंतु हा सगळा विचार करणारा अन त्याचा अनुभव घेणारा व्यक्ती वेगळा आहे. कुटुंब, समाज, राष्ट्र, विश्व या सगळ्या बाबी त्या व्यक्तीच्या सुख व आनंदासाठी आहेत. व्यक्तीच्या सुख व आनंदाला सहाय्यक ठरतील तोवर त्या योग्य अशी दृष्टी व भावना असेल तर मात्र प्रत्येक स्तरावर संघर्ष अपरिहार्य ठरतो. आज व्यक्ती आणि कुटुंब यांच्यातील संघर्ष हे त्याचेच रूप आहे. किंवा एखादी व्यक्ती वैश्विकता, मानवता इत्यादींचा धोशा लावतानाच आपले व्यक्तिगत सुख- सुविधा- साधने- मानसन्मान- पदप्रतिष्ठा- याबद्दल आत्यंतिक संवेदनशील, प्रसंगी असहिष्णू असल्याचे पाहायला मिळते. माझी पदोन्नती न होता दुसऱ्याची झाली तर ते त्याच्यासाठी असह्य ठरते. त्यावेळी त्याची मानवता कुठेतरी गुडूप होऊन जाते. हाच न्याय समूहालाही लावता येईल अन तसे होते तेव्हा राष्ट्र हे विशिष्ट समुहाचे सुख वा प्रभाव यांचे एक उपकरण ठरते अन ते संघर्षाचे कारणसुद्धा. भारताबाहेर झालेला राष्ट्रांचा विकास हा अशा प्रकारे समूहाच्या सुख व वर्चस्वाच्या भावनेतून झालेला आहे. भारतीय राष्ट्रविचार हा व्यक्तीच्या जाणीव विकासाच्या मार्गातील एक टप्पा या अंगाने जाणारा आहे. म्हणूनच सर्वच प्राचीन, अर्वाचीन संत, महापुरुष, ऋषीमुनी, दार्शनिक, चिंतक, विचारवंत हे एकाच वेळी व्यक्तिवादी, समूहवादी, राष्ट्रवादी, मानवतावादी, विश्ववादी अन संपूर्णतावादी होते व आहेत. वेगवेगळ्या वेळेला परिस्थिती नुसार त्यांनी त्याचे प्रतिपादन केले आहे. म्हणूनच मानवतावादी असलेले रवींद्रनाथ टागोर स्वातंत्र्य आंदोलनातदेखील सहभागी होते. अन विश्वात्मक विचार करतानाच राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी लढा उभारणारे गांधीजी त्यांना चुकीचे वाटत नव्हते. उलट आपले आप्त वाटत होते.

एक व्यक्ती असो की संपूर्ण मानवजात; सगळ्यांचे कल्याण हेच उद्दिष्ट ठेवून; व्यवहार आणि विभिन्न मर्यादा लक्षात घेऊन, विकसित झालेल्या रचनेतील, विविध टप्प्यांपैकी एक टप्पा म्हणजे `राष्ट्र' ही दृष्टी असेल तर काहीही नाकारण्याचे कारण नाही, अन कुठला संघर्षही उरत नाही. याउलट आपल्या लहान वा मोठ्या `मी'चे स्वार्थसाधन म्हणून पाहिले तर प्रत्येकच गोष्ट नाकारावी लागते अन प्रत्येकच स्तरावर संघर्षाची पाळी येते. भारताचा अन रा.स्व. संघाचाही राष्ट्रवाद हा जाणीवविकासाच्या मार्गावरील राष्ट्रवाद आहे. अन अन्य लोकांचा राष्ट्रवाद स्वार्थसाधनेचा राष्ट्रवाद आहे. त्यामुळेच खा. सुगत बसू तोंडाने रवींद्रनाथ किंवा महर्षी अरविंद यांचा राष्ट्रवाद सांगत असले तरीही महिषासुरमर्दिनीचे भंजन करणे त्यांना नाकारावे वा दुर्लक्षित करावे लागते. कारण ते स्वार्थसाधनेत अडथळा आणते. याउलट रा.स्व. संघ `हिंदुराष्ट्र' म्हणत असताना सुद्धा राष्ट्रीय मुस्लिम मंच स्थापन करू शकतो. त्याला काहीही नाकारावे लागत नाही. संघाला आपला राष्ट्रवाद कोणावरही थोपवायचा नाही. कारण तो थोपवता येतच नाही. जाणीवेचा विकास ही थोपवण्याची बाबच नाही. म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारताबाहेर आपले काम `राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' या नावाने नव्हे, तर `हिंदू स्वयंसेवक संघ' या नावाने चालवले आहे. राष्ट्राचा परीघ कोणता याचे पूर्ण भान संघाला आहे. अन राष्ट्रच कशाला व्यक्ती ते ब्रम्हांड यांचे परीघ कोणते आणि का, याचे सखोल चिंतन ही भारतीय राष्ट्रवादाची विशेषता आहे. भारतेतर मापदंड लावून, अन सगळ्यात महत्वाचे म्हणजे `स्व'ला अवास्तव गोंजारुन भारतीय राष्ट्रवाद समजून घेण्याचा प्रयत्न केला तर हाती काही लागण्याची शक्यता नाही. `स्व' नाकारायचाही नाही अन त्याच्या परीघाकडे, सामर्थ्याकडे अन मर्यादेकडे दुर्लक्षही करायचे नाही, अशी भूमिका अन दृष्टी असेल तर भारतीय राष्ट्रवाद तर कळेलच, पण संघर्षही कमी करता येईल.

- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, २५ फेब्रुवारी २०१६