मंगळवार, २७ डिसेंबर, २०२२

संपत्ती संचय

उत्तर प्रदेशात एकाच व्यक्तीकडे अडीच शे कोटींपेक्षा जास्त रोख सापडली. महाराष्ट्रात पण वेगवेगळी सुमारे तेवढीच रक्कम सापडली. अशा बातम्यात नवीन काही राहिलेले नाही. शिवाय शेकडो वा हजारो कोटी रुपये संपत्तीचे मालक असल्याच्या बातम्या असतातच. ताज्या दोन बातम्या वाचताना मनात सहज दोन गोष्टी आल्या -

१) अतिशय बदनाम झालेल्या भारताच्या जुन्या आर्थिक व्यवस्थेत एक व्यक्ती अनेक व्यवसाय करू शकत नव्हती. त्यामुळे खरे खोटे व्यवसाय, उद्योग दाखवून संपत्तीचे असे केंद्रीकरण किंवा संचय यांची शक्यता नव्हती. आजच्या समस्यांच्या संदर्भात जुन्याचे विश्लेषण व्हायला नको का? (ज्यांना लगेच जातीयवाद वगैरे आणायचा असेल त्यांनी डॉ. आंबेडकर यांचे मुंबई विधिमंडळातील खोत कायद्यावरील भाषण वाचावे.)

२) शारीरिक श्रम करणाऱ्यांनाच मतदानाचा अधिकार राहावा अशी सूचना महात्मा गांधी यांनी केली होती. आजच्या crony capitalism च्या छायेत त्याचा साधकबाधक विचार व्हावा का?

- श्रीपाद कोठे

२८ डिसेंबर २०२२

मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०२२

श्रीलंका

भारताने श्रीलंकेला मदत केल्याची छोटीशी बातमी पेपरला आहे. चांगले आहे. मनाने सहजच आठवले; स्वामी विवेकानंद पहिला विदेश प्रवास आटोपून भारतात परतले तेव्हा त्यांचे पहिले स्वागत आणि मानपत्र अर्पण कोलंबोला झाले होते. त्यांचे भाषणही झाले होते. ते भारतातील पहिलं स्वागत होतं. मानपत्र आणि भाषण दोन्हीत तसा उल्लेख तर होताच पण त्याला सगळ्यांची स्वीकृती होती. गेल्या उण्यापुऱ्या सव्वाशे वर्षात असं काय आणि काय काय झालं की, श्रीलंका आणि भारत यांचं एकत्व मनातूनही पुसलं जावं? गडबड फार मोठी आहे. नीट समजून घेतली तर. हा हिंदू/ भारतीय समाज बाह्य आघातांचाच विचार करू लागला आहे. त्यावरच त्याचं लक्ष आहे. स्वतःची शक्ती, सत्व, जीवन यांच्याकडे लक्ष देण्याची त्याला गरज वाटेनाशी झाली. अन तो दुबळा होतो आहे. सबळ होण्याचा त्याचा अर्थदेखील बदलला आहे. त्यामुळेच अखंड भारत म्हटल्यावर सुद्धा आम्हाला फक्त पाकिस्तान आठवतो. वास्तविक भारत म्हणजे काय? हे समजून घ्यायला स्वामीजींचं कोलंबो भाषण पुरेसं आहे. त्याचं वारंवार वाचन सुद्धा आपली जाणीव, दृष्टी आणि चिंतन घडवू शकतं, व्यापक करू शकतं, त्याला दिशा देऊ शकतं. हां, आम्हाला ते आवडेल आणि पटेल का ही मात्र शंका मनात आहे.

- श्रीपाद कोठे

३० नोव्हेंबर २०१९

सोमवार, २८ नोव्हेंबर, २०२२

असमर्थनीय

समता परिषदेने अरुंधती रॉय ला पुरस्कार दिला. मानभावीपणे लाखात लाख घालून तिने तो अन्य कोणाला दिला. अन महानतेचा एक कडा सर केल्याचे दाखवत नक्षलवादाला समर्थन देऊन कौतुकही केले. नक्षलवादाची मानवीय चर्चाही भरपूर झालेली आहे. मात्र आपल्या खऱ्याखोट्या अधिकारांसाठी, न्यायासाठी वगैरे दुसऱ्या मानवाची हत्या करणे ही कोणत्याही रंगाची मानवता होऊच शकत नाही. म्हणूनच नक्षलवादाचे स्पष्ट वा प्रच्छन्न समर्थनही होऊ शकत नाही. शिवाय प्रस्थापित शासकीय भूमिकेला हे छेद देणारेही आहे. यासाठी सरकारने अरुंधती बाईंना `सरकारी पुरस्कार' द्यायला हवा, अन तिला पुरस्कार देऊन प्रतिष्ठित करणाऱ्या अन तिच्या नक्षलसंबंधित भूमिकेवर मूग गिळून अप्रत्यक्ष समर्थन देणाऱ्या समता परिषदेच्या भुजबळ महाशयांनाही `सरकारी पुरस्कार' द्यावा.

- श्रीपाद कोठे

२९ नोव्हेंबर २०१५

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०२२

स्वयंसेवक आणि राजकीय पक्ष

नागपूरचे भाजप नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. स्वाभाविकच अनेकांना वाईट वाटले, अनेक जण अस्वस्थ झाले. हिंदुत्व, संघ, भाजप अशीही चर्चा होणे स्वाभाविकच. त्यांना संघाचा कौटुंबिक वारसा होता हेही खरं. पण यात वाईट वाटण्यासारखे वा अस्वस्थ होण्यासारखे काय आहे? हां; भाजप या पक्षापुरते दु:ख, अस्वस्थता, धक्का असू शकतात. पक्षाचा फायदा वा नुकसानही असू शकते. त्याहून अधिक काही नाही. कारण कोणाच्या राजकीय महत्त्वाकांक्षा दडपून तर टाकता येऊ शकत नाहीत. त्या राहणारच. एकीकडे संघ वाढत जाणार, हिंदुत्वाची स्वीकार्यता वाढत जाणार, अन बहुपक्षीय लोकशाही असल्यामुळे राजकीय आकांक्षा आणि राजकीय गणिते हेही सुरूच राहणार. हिंदुत्वाचे पुरस्कर्ते, संघाचे स्वयंसेवक सगळ्या पक्षांमध्ये दिसू लागणार. त्यांचे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणेयेणेही राहणारच. आजवर संघ म्हणत असे की आम्हाला कोणताही राजकीय पक्ष वर्ज्य नाही. सगळे पक्ष आपलेच पक्ष आहेत. पण हे एकतर्फी होते. आता विविध पक्षांनाही संघाचे स्वयंसेवक चालू लागतील. विविध पक्षांची संघाबद्दलची एकतर्फी अस्पृश्यता हळूहळू संपू लागेल. हा सामाजिक, राजकीय बदल होणे अपरिहार्य आहे. सगळ्यांना त्याची सवय करून घ्यावी लागेल.

- श्रीपाद कोठे

सोमवार, २२ नोव्हेंबर २०२१

मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०२२

थोडेसे अप्रिय

आपली अर्थव्यवस्था १२ टक्के रोखीची आहे. जगाचा हा दर ४ टक्के आहे.

- अर्थमंत्री

अर्थमंत्री महोदय,

१) जेथे ४ टक्के दर आहे त्या अर्थव्यवस्था आपण आदर्श मानता का?

२) `international standard syndrome' चे आपण समर्थन करता का?

३) भारत `सोने की चिडिया' होता तेव्हाही भारताची अर्थव्यवस्था रोखीचीच होती. आजच्यापेक्षा त्याचे प्रमाण अधिकच होते.

४) आपले सरकार सत्तेवर आल्यापासूनच्या अडीच वर्षात foreign exchange reserve दुथडी भरून वाहत आहेत. या काळातही आपली अर्थव्यवस्था cash intense अशीच आहे.

५) IMF, WB यांच्यासाठी cashless चा खटाटोप सुरु आहे का?

६) आपल्यासारख्या तज्ञांनी स्वत:चे (स्वदेशी) paradigms निर्माण करून जगाला ते imitate करायला का लावू नयेत?

@@@@@@@@@@@@@@@@@

आज एका बँक प्रतिनिधीने त्यांचे payment app ऑफर केले. हे करताना ती म्हणाली, याचा उपयोग केल्यास सिनेमाच्या एका तिकिटावर एक फ्री मिळणार. तुम्ही आणि मादाम दोघांसाठी एकच तिकीट. मी एकटाच आहे मादाम नाहीत, हे त्या प्रतिनिधीला सांगण्यात अर्थ नव्हता. म्हणून एवढेच म्हणालो- गेल्या पुष्कळ वर्षात मी सिनेमाला गेलेलोच नाही अन पुढेही बहुतेक जाणार नाहीच. मग? माझ्या या बोलण्यावर ती बुचकळ्यात पडली. संवाद संपला.

cashless economy will push the society towards consumerism. does bjp is for that? भाजपने तसे असायला काहीच हरकत नाही. पण भाजपने हे स्पष्ट करायला हवे. अन तसे असेलच तर दीनदयाळजींचे नाव घेणे थांबवावे.

@@@@@@@@@@@@@@@@@@

जगज्जेता अलेक्झांडर याचा पराभव एका अकिंचन, अनिकेत, अवस्त्र ऋषीने केला होता. भारताची तीच पद्धती आणि परंपरा आहे आणि उपभोगवाद, सत्ताकांक्षा यांचा पराभव तसाच होऊ शकतो. सत्ताकांक्षेचा पराभव दुसरी सत्ता करू शकत नाही. भारतावर थोपवल्या जाणाऱ्या सत्ताकांक्षेचा पराभव सुद्धा याच पद्धतीने व्हावा लागेल. होईल.

@@@@@@@@@@@@@@@@@@

थोडेसे अप्रिय-

`बुडाला औरंग्या पापी, म्लेंच्छसंहार जाहला

अभक्तांचा क्षयो झाला, आनंदवनभुवनी'

असे धन्योद्गार समर्थांनी काढल्यानंतरही ते आनंदवनभुवन किती काळ टिकले?

महाप्रतापी आर्य चाणक्याने अपार पुरुषार्थ करून स्थापित केलेल्या विक्रमादित्याचे आणि साम्राज्याचे नंतर काय झाले?

सत्तेचे स्वरूपच तसे आहे. सत्ता क्षणस्थायी असते. राष्ट्र चिरस्थायी असतं.

समाज कोणत्या सत्तेचा किती पाठीराखा आहे यापेक्षा समाज किती राष्ट्रमय आहे हे महत्वाचे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, १६ नोव्हेंबर २०१६

शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०२२

भ्रष्टाचार प्रतिबंधक विधेयक

भ्रष्टाचार प्रतिबंधक विधेयक (सुधारित) संसदेच्या येत्या हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात येणार आहे. संसदेच्या संबंधित समितीने त्याला मंजुरी दिली आहे. या समितीत सगळ्याच राजकीय पक्षांचे सदस्य असतात. या प्रस्तावात एक तरतूद अशी आहे की- कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याच्या विरुद्ध भ्रष्टाचाराची तक्रार करावयाची असेल तर त्यासाठी आधी परवानगी घ्यावी लागेल. अशी तरतूद आहे हे निश्चित. कारण यावरील चर्चेत भाग घेणाऱ्या भारतीय जनता पार्टी आणि कॉंग्रेसच्या प्रतिनिधींनी ती नाकारली नाही. शिवाय भाजपाच्या प्रतिनिधीने त्याचे समर्थन केले. असे असेल तर हा भयानक प्रकार आहे. देशाचे माजी मुख्य सचिव राहिलेले टी.आर.एस. सुब्रमण्यम यांनी तर हे विधेयक केराच्या टोपलीत फेकून द्यावे या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रस्तावित विधेयकाचे कागद घेऊनच ते बसले होते. टी.आर.एस. सुब्रमण्यम यांच्या प्रामाणिकपणाबद्दल, सचोटी आणि अध्ययनाबद्दल तसेच अनुभवाबद्दल कोणालाच शंका नाही. ते भाजपाचे विरोधकसुद्धा नाहीत. आदल्याच दिवशी times now वर नोटा रद्द करण्याचे सशक्त आणि आक्रमक समर्थन करणारे टी.आर.एस. सुब्रमण्यम दुसऱ्या दिवशी सीएनबीसी आवाज वर प्रस्तावित विधेयकावर प्रखर प्रहार करीत होते.

प्रकरण गंभीर आहे एवढे खरे.

- श्रीपाद कोठे

१२ नोव्हेंबर २०१६

सोमवार, ७ नोव्हेंबर, २०२२

बिहारच्या निकालानंतर-

१) स्वत:च्या विजयाच्या आनंदापेक्षा भाजपच्या पराभवाचा आनंद अधिक.

२) हा पराभव हिंदुत्व विचारांचा म्हणायचा असेल, तर हा विजय हजारो कोटींचा घोटाळा करणाऱ्या भ्रष्ट वृत्तीचा म्हणायचा का? लोकांना भ्रष्टाचार हवा आहे का?

३) कथित लोकशाहीने समाज अनेक तुकड्यात विभाजित केला आहे, समाजाला विचारहीन, विवेकहीन बनवले आहे.

४) लोकशाही म्हणजे झुंडशाही.

५) ६५ वर्षात विविध जातीजमाती सशक्त का झाल्या नाहीत याचा विचार करण्यापेक्षा आरक्षणाचा झेंडा उंच धरून लाचार राहणे आणि लाचार ठेवणे हेच लोकांना आवडते.

६) मतभेद उमदेपणाने मान्य करून, मनोमालिन्य उरू न देणे; याऐवजी सगळ्या बऱ्यावाईट गोष्टींना गोंजारत खोटी दिखावटी सहिष्णुता जोपासणे (बोलीभाषेत- मुंह मे राम, बगल मे छुरी), लोकांना भावते.

७) लोकशाही ही खूप अपेक्षा करू नये अशी किंवा फारशा गांभीर्याने घेऊ नये अशी व्यवस्था आहे.

८) गांधीजी किंवा संविधान निर्मात्यांसारख्या आदर्शवाद्यांना लोकशाहीत स्थान नसते. उदा.- समाजाने गोवंशहत्याबंदी, समान नागरी कायदा यासारख्या आदर्श गोष्टींच्या दिशेने चालण्याऐवजी; शक्तीपरीक्षणात यश मिळवण्यासाठी आदर्शांना सामूहिक तिलांजली द्यावी लागते.

९) काही महिन्यांपूर्वी दिल्लीत याहून अधिक बहुमताने आम आदमी पार्टी निवडून आली. आता दिल्लीत फक्त अराजक आहे. बिहारच्या लोकांना कदाचित अराजक हवे आहे किंवा त्यांना फारसे काही कळत नाही.

- श्रीपाद कोठे

८ नोव्हेंबर २०१५

नोटबंदी

मी नोटबंदीचा समर्थक आहे की विरोधक? मला नाही ठाऊक. तुम्ही म्हणाल ते मला मान्य. पण मला वाटतं- स्व. चंद्रशेखर पंतप्रधान होईपर्यंत कधीही भाजपा वा जनसंघाची सत्ता नव्हती. होती फक्त कॉंग्रेसची सत्ता आणि विविध प्रकारे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कम्युनिस्ट, समाजवादी वगैरेंची. त्या ४५ वर्षांच्या आर्थिक धोरणांनी आणि निर्णयांनी चंद्रशेखर सरकारला रिझर्व्ह बँकेचे सोने जागतिक बँकेकडे गहाण ठेवावे लागले होते. देशाच्या दिवाळखोरीच्या एकच पाऊल अलीकडे. नोटबंदीने काय बरेवाईट केले असेल ते असो; पण सोने गहाण ठेवून देशाला दिवाळखोर करण्याकडे मात्र नाही नेले, हे नक्की.

- श्रीपाद कोठे

८ नोव्हेंबर २०१७

शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०२२

अल्पसंख्य हिंदू

काही राज्यात हिंदूंना अल्पसंख्यक दर्जा द्यावा असा एक विचार पुढे येतो आहे. केवळ `अरे'ला `कारे' करण्याची खुमखुमी किंवा चार सवलती पदरात पाडून घेण्यासाठी हे करू नये. याचे दूरगामी मानसिक व व्यावहारिक परिणाम चांगले होणार नाहीत. अगदी एक हिंदू असेल तरीही त्याला अल्पसंख्य म्हणू नये. हे प्रयत्न हिंदूंचेच असले तरीही ते हाणून पाडले पाहिजेत. त्याजागी अल्पसंख्य, बहुसंख्य हे शब्दच हद्दपार करण्याचे वातावरण आणि प्रयत्न व्हावे. आणि या देशातील सगळे रहिवासी `हिंदू' आहेत हे रुजवण्याचा प्रयत्न व्हावा. `सिंधूच्या पलीकडले हिंदू' हा सुरुवातीचा अर्थच प्रमाण ठेवून तो पक्का करावा. हिंदू धर्म याचा अर्थ हिंदू नावाचा धर्म असा न करता हिंदूंचे धर्म असा होईल याचा प्रयत्न व्हावा. म्हणजे त्यानुसार ख्रिश्चन आणि इस्लाम हे सुद्धा हिंदू धर्मच ठरतील. (उपासना पद्धती या अर्थाने धर्म. या पोस्टपुरता.) हिंदू मूळ समुदायवाचक शब्द होता. तो पुन्हा तसाच प्रतिष्ठीत व्हावा. किमान हिंदूंना अल्पसंख्य म्हटले जाऊ नये. कोणत्याही परिस्थितीत.

- श्रीपाद कोठे

५ नोव्हेंबर २०१७

सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०२२

कांद्याचे भाव

कांदा आयात करून कांद्याचे भाव खाली आणण्याची चर्चा आहे. चांगलाच निर्णय आहे पण त्यासाठी एवढा वेळ का लागावा?

दुसरे म्हणजे कांद्याचे (अन्यही पुष्कळ जिन्नस) भाव निश्चित का करू नयेत? एक भाव निश्चित करून जाहीर करावा. त्यापेक्षा अधिक भावाने विक्री करण्यास बंदी घालावी. याने साठेबाजी कमी होऊ शकेल. भाव जर जास्त मिळणारच नसेल तर कोणी साठवून का ठेवेल? कांदा कमीच असेल तर आहे तोवर ठरलेल्या भावात विकला जाईल. संपला तर मिळणार नाही. कांदा मिळाला नाही तर जीवन काही थांबत नाही. माल साठवून ठेवायचा, सोयीने टंचाई निर्माण करायची, सोयीने भाव वाढवायचे वा पाडायचे; हे बंद होणार की नाही? विक्रीत हस्तक्षेप, धाडी वगैरे घालणे, त्यातून निर्माण होणारी साटेलोटे साखळी, हे हवेच कशाला? Fixed rate ठरवून द्यायचा. त्याचा दरवर्षी आढावा घ्यायचा. जसे शेतमालाचे हमीभाव जाहीर करतात तसेच ग्राहकांसाठी विविध वस्तूंचे भाव ठरवून द्यायचे. व्यापारी, अडते, दलाल आदी मोडून काढण्याची हिंमत दाखवावी लागेल. सध्याच्या प्रयत्नांनी हे साध्य होणे कठीण. समाजाच्या organic checks and balances चा उपयोग करून घेणेही महत्वाचे.

- श्रीपाद कोठे

१ नोव्हेंबर २०२०

शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०२२

जेपींचा वारसा

नरेंद्र मोदी यांनी पाटण्याच्या सभेत `जे जेपींना सोडू शकतात ते बीजेपीही सोडू शकतात' अशी बोचरी टीका नितीश कुमार यांच्यावर केली. त्याला नितीश कुमारांनी आज उत्तर दिले. आणखीनही बरेच राजकारणी जेपींचे नाव जपत असतात. प्रश्न असा की जेपी म्हणून प्रसिद्ध असलेले जयप्रकाश नारायण यांचे खरे उत्तराधिकारी कोण? जेपी यांच्याबद्दल पूर्ण आदर बाळगूनही एक ऐतिहासिक सत्य दुर्लक्षित करता येत नाही की, जयप्रकाशजींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळेच यश लाभले. मुळात जयप्रकाशजींचे आंदोलन आकाराला आले ते गुजरातमधून आणि त्याचे शिल्पकार होते नानाजी देशमुख. बिहारमध्ये त्यांनी मोठी सभा वगैरे घेतली होती, पण ती तेवढ्यापुरतीच होती. नानाजींनी सूत्रे हाती घेतली आणि त्याचे विशाल आंदोलन झाले. आणिबाणीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरात जेपींनी जे उद्गार काढले ते पाहिले तर सगळ्या शंका दूर होतात.

जयप्रकाशजीचा, सरदार पटेलांचा, एवढेच नव्हे तर महात्मा गांधींचाही खरा वारसदार जर कोणी असेल तर तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघच आहे.

- श्रीपाद कोठे

२९ ऑक्टोबर ‌‌‌२०१३

कारण मुळात आणि प्रामाणिकपणे संघ त्याच्या जन्मापासूनच कोणालाही विरोधक वा शत्रू मानत नाही. `सर्वेषां अविरोधेन' हीच संघाची सततची भूमिका आहे. आणि हे केवळ बोलणे नाही व्यवहारही तसाच आहे. म्हणूनच पहिल्या बंदीनंतर गोळवलकर गुरुजींनी देशभर एकच भूमिका मांडली- `वयं पंचाधिकम शतम' आणि बाळासाहेब देवरसांनी दुसर्या बंदीनंतर देशभर भूमिका मांडली- `forget & forgive'. पंजाबमधील दहशतवादाच्या वेळी हिंदू-शीख असा भेद करून वातावरण तापत असताना, संघ शाखांवर हल्ले होत असताना बाळासाहेब देवरस यांनी स्पष्ट भूमिका घेतली `no retaliation'. सगळेच पक्ष आपलेच आहेत. कोणताही पक्ष शत्रू नाही वा परका नाही. संघाची ही भूमिका मोरोपंत पिंगळे यांनी जाहीरपणे नागपुरात विमानतळाजवळच्या डो. हेडगेवार चौकाच्या उदघाटनाच्या वेळी मांडली होती. १९६८ साली संविद सरकारे स्थापन करताना दीनदयाल उपाध्याय यांनीही हीच भूमिका घेतली होती. मुद्दा हा आहे की, अन्य पक्ष संघाला आपला शत्रू मानतात. तसेच वागतात. मग स्वाभाविकच स्वयंसेवकांना त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटत नाही. आणि संघासोबत राहणे त्या पक्षांना अनेक कारणांनी परवडत नाही. समस्या ते पक्ष आणि संघाचा विरोध करणार्यांची आहे. संघाची नाही.


मी नरहर कुरुंदकर वाचेन, पण त्यांचे मत काय आहे त्यावरून मी मत बनवणार नाही. दुसरे असे की, जयप्रकाशजींचे स्वत:चे मतच महत्वाचे. आणि जेपींचे मत किती प्रखर होते? जेली म्हणाले होते- `संघ जर facist असेल तर मीही facist आहे.' अन्य मतांची काय गरज?


देशातलं प्रत्येक सरकार हे देशाचं सरकार असतं, मग त्यांना फक्त ४०-४५ टक्के लोकांचाच पाठींबा का असतो? किंवा ४०-४५ टक्के पाठींबा असणार्या सरकारला देशाचं सरकार म्हणायचं का? मुद्दा सत्तेचा- संघावर आक्षेप घेणारेच ठरवतात की संघाला सत्ता प्राप्त करायची आहे वगैरे किंवा संघाला या राष्ट्रासाठी काही करायचं असेल तर त्याने सत्ता मिळवली पाहिजे वगैरे. आणि प्रश्न विचारतात. संघाने सत्ता का मिळवायची? टीकाकारांना वाटते म्हणून? संघाचा विचारच वेगळा आहे. त्या विचारात सत्तेला स्थान नाही असे नाही, पण तो विचार सत्तासापेक्ष नाही. संघाने जे स्वप्न पाहिले आहे, त्यात सत्ता ही खूप छोटी गोष्ट आहे. बाकीच्यांना वाटते तेवढे महत्व संघाला सत्तेचे वाटत नाही. सत्ता हे संघाचे उद्दीष्टच नाही. कोणाला त्यावर विश्वास आहे की नाही हा ज्याचा त्याचा भाग आहे. संघाने नेहमीच `पथ का अंतिम लक्ष्य नही है, सिंहासन चढते जाना... सब समाज को लिये साथ मे आगे है बढते जाना...' असाच संस्कार दिला आहे. तसे नसते तर ईशान्य भारतात शेकडो कार्यकर्ते घरदार सोडून कशाला सेवाकार्यात लागले असते?


अन्य समाज लोकसंख्या हे हत्यार म्हणून वापरणार असतील वा तशी तयारी करीत असतील तर हिंदूंनाही त्याचा तसाच विचार करावा लागेल. आम्ही कोणावर आदळणार नाही, पण आमच्यावर कोणी आदळत असेल तर त्याची काळजीही आम्ही घेतली पाहिजे; हा तर सामान्य जीवशास्त्रीय नियम आहे ना?


पोपने तर संपूर्ण आशिया ख्रिश्चन करण्याचा संकल्प आपल्या नवी दिल्लीतील विज्ञान भवनात जाहीर केला होता.

बुधवार, २६ ऑक्टोबर, २०२२

विरोधी पक्ष की सहयोगी पक्ष

 - चुकीचा विचार चुकीच्या शब्दांना जन्म देतो, ते शब्द चुकीचे भाव आणि चुकीच्या धारणा घेऊन पुढे जातात, अन ही मालिका सुरूच राहते. 'विरोधी पक्ष' हे असेच चुकीचे शब्द. त्याऐवजी सत्ताधारी पक्ष आणि सहयोगी पक्ष अशी शब्दावली रूढ व्हायला हवी. देशातले सगळे पक्ष देशाचे पक्ष आहेत आणि सहयोगी पक्ष आहेत. कोणीही विरोधी नाही. हास्यास्पद वाटणारा हा प्रयोग नेटाने रेटला तर भविष्यात फरक दिसेल. सगळ्याच गोष्टींचं असंच असतं नं?

- श्रीपाद कोठे

२७ ऑक्टोबर २०१८

चलनी करण नको

सध्या दिवाळीची हवा आहे. दिवाळी हा लक्ष्मीचा सण. या सणाच्या शुभेच्छांमध्ये 'ज्ञानाची दिवाळी' वगैरे येत असले तरीही, कोणी ते फार गंभीरपणे घेत नाही. मात्र दिवाळीला अवकाश असल्यामुळे लक्ष्मी आणि ज्ञान यांना एकत्र करणारा एक विचार - 'सगळ्या गोष्टींचे चलनीकरण ही चुकीची गोष्ट आहे.' त्यामुळे जीवनाचं मूल्यवर्धन होत नाही. सगळ्या गोष्टींची किंमत पैशात करू नये हे आपल्याला बऱ्यापैकी कळतं. (वळतं का माहिती नाही.) पण सगळ्या गोष्टीचं चलनीकरण नको हेही तेवढंच महत्वाचं आहे. जसे अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थेचा विचार करताना ती किती बिलियन किंवा ट्रीलीयन डॉलर्सची आहे हे बोललं जातं. हे अयोग्य आहे. केंद्र सरकारनेही असं काही उद्दिष्ट ठेवलं आहे. हे बरोबर नाही. त्या ऐवजी अमुक काळानंतर देशात कोणीही उपाशी झोपणार नाही, कोणीही अशिक्षित राहणार नाही, कोणीही उपचारवंचित राहणार नाही; अशी उद्दिष्ट हवीत. अशीच भाषाही हवी. कारण डॉलर्समध्ये उद्दिष्ट ठरवलं की फोकस डॉलर्सवर होतो. भूक, आरोग्य, शिक्षण असं उद्दिष्ट ठेवलं की फोकस त्या गोष्टींवर होतो. अन फोकस कशावर आहे त्यानुसार गोष्टी आकार घेतात. केंद्रात भाजप सरकार असल्याने ही भाषा बदलण्याची थोडी अपेक्षा करता येते. पण जागतिक शक्ती, नाणेनिधी, जागतिक बँक, अर्थतज्ज्ञ; यासारखी कारणे देऊन जर तीच डॉलर्सवाली भाषा सुरू राहिली तर जीवनाचं चलनीकरण आणखीन वाढत जाईल. हा बदल करण्यासाठी हिंमत, धैर्य, बांधिलकी हवे आणि त्यासाठीची बौद्धिक, सैद्धांतिक तयारी भरपूर हवी. ती तयारी आहे का मला ठाऊक नाही, पण एवढं ठाऊक आहे की, भारताने जगाच्या पावलावर पाऊल न टाकता वेगळी वाट चोखाळली तरी भारताला काही म्हणण्याची वा खोडा घालण्याची शक्ती आज कोणाकडे नाही. प्रश्न फक्त आपल्या संकल्पाचा आहे.

- श्रीपाद कोठे

२७ ऑक्टोबर २०२१

सोमवार, २४ ऑक्टोबर, २०२२

बावळट भाटांचा विजय असो

माणूस किती निर्बुद्ध वा बावळट असू शकतो? आयबीएन-लोकमत पाहताना आज या प्रश्नाचं उत्तर मिळालं. ते उत्तर आहे, कुमार केतकर यांच्याएवढा. का? याला आधार त्यांचं एक विश्लेषण. भारतीय जनता पार्टीने `कॉंग्रेसमुक्त भारत' अशी घोषणा दिली आहे. त्यावरील त्यांचा अभिप्राय- `देशाला कॉंग्रेसमुक्त करायचे म्हणजे, हेडगेवारमुक्त आणि वल्लभभाईमुक्तही करावे लागेल. कारण हेडगेवार आणि वल्लभभाई पटेल हे पण कॉंग्रेसचेच होते.'

माझे आक्षेप-

संघ कॉंग्रेसविरोधी आहे म्हणताना हेडगेवार कॉंग्रेसचे होते हे का आठवत नाही?

यांच्याच तर्काने जायचे तर, हेडगेवार हिंदुत्वसमर्थक होते म्हणजे कॉंग्रेस पण हिंदुत्वाची समर्थक आहे का?

कॉंग्रेस विसर्जित करावी असे स्वत: महात्मा गांधी यांनी म्हटले होते. म्हणजे नेहरू, पटेल यांच्यासह सगळे नेते; एवढेच नव्हे तर कॉंग्रेसने दिलेला स्वातंत्र्याचा लढा आणि मिळवलेले स्वातंत्र्य यांचेही विसर्जन करायला हवे असेच गांधीजींना म्हणायचे होते का?

अनेक जागतिक संस्था अनेक अहवाल सादर करीत असतात. त्यांचे निष्कर्ष असतात- कधी भारत अप्रामाणिक आहे, कधी भारत मागासलेला आहे; वगैरे. म्हणजे केतकर अप्रामाणिक आहेत, मागासलेले आहेत असाच त्याचा अर्थ होईल का?

आपण सगळे म्हणतो, अमुक एकाचे ऑपरेशन झाले. म्हणजे त्या व्यक्तीचे डोळ्याचे, डोक्याचे, हाताचे, पायाचे, हृदयाचे, नाकाचे, कानाचे, पोटाचे, हाडाचे; असे सगळ्याच गोष्टींचे ऑपरेशन झाले असे म्हणायचे का?

तुम्ही-आम्ही असे म्हणत नाही, कारण आपण केतकर यांच्याएवढे निर्बुद्ध आणि बावळट नसतो. बावळट भाटांचा विजय असो.

- श्रीपाद कोठे

२५ ऑक्टोबर २०१३

गुरुवार, २० ऑक्टोबर, २०२२

हिंदुत्व

- हिंदुत्व हे राजकारण वा समूह अस्मिता एवढंच राहीलं तर काय होतं याचं, नेपाळ हे चांगलं उदाहरण आहे. हिंदुत्वाचं तत्व तिथे फार कधी नव्हतंच. किंवा असेल तर ते टिकवून ठेवता आलं नाही. त्याचाच हा परिणाम.

- मुस्लिम, ख्रिश्चन वा साम्यवाद यांना उर्वरित जगाच्या तुलनेत भारतात यश मिळालं नाही; हे आपण मान्य करतो पण; असं का झालं याची चिकित्सा करत नाही.

- ज्याला हिंदूंची दुर्बलता म्हटले जाते वा सांगितले जाते, ती खरंच दुर्बलता किती आणि शक्ती किती; याचाही विचार करायला हवा.

- श्रीपाद कोठे

२१ ऑक्टोबर २०२०

शनिवार, १५ ऑक्टोबर, २०२२

महत्त्वाचा मुद्दा कोणता?

सरसंघचालकांच्या कालच्या भाषणातील कोणता मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा वाटला? असा प्रश्न एकाने विचारला.

त्यावर माझं उत्तर होतं - 'आपण या जगाचे स्वामी नाही आहोत. ईशावास्यम इदं सर्वम.' हा मुद्दा.

त्यावर तो म्हणाला, पण हे फार तात्त्विक आहे.

मी म्हटलं 'हो.'

त्यावर तो पुन्हा म्हणाला - 'बाकीच्या व्यावहारिक गोष्टींचं काय?'

मी - 'बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आलेला आहे त्याच्या कारणांच्या मुळाशी आणि सोडवणुकीच्या प्रारंभाशी नेणारा हा विचार आहे. ज्याला तू तात्त्विक म्हणतो आहेस तो. तालिबान, लोकसंख्या, मंदिर व्यवस्थापन, कुटुंब प्रबोधन, राजकीय संस्कृती, फेडरल व्यवस्था; सगळ्या सगळ्या प्रश्नांचं मूळ आणि उत्तर त्यात आहे. त्याचा विचार फार कोणी करणार नाही. पण त्याकडे लक्ष दिल्याशिवाय समस्यांची उकल आणि सोडवणूक पण होणार नाही.'

- श्रीपाद कोठे

१६ ऑक्टोबर २०२१

शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०२२

नोबेल पुरस्कार विजेत्या कडून अपेक्षा

अभिजित भट्टाचार्य यांना मिळालेल्या अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्कारावर होणारी टीका मला मान्य नाही. मी त्यांचे अभिनंदन करतो. फक्त या अभिनंदनासोबत एक अपेक्षा व्यक्त करतो की, जगाची नीट न्यायपूर्ण आर्थिक घडी बसवण्यासाठी काही मार्ग आणि उपाय त्यांनी सांगावे. भारतात मोदी सरकार असल्याने आणि सध्या भारताला हिंदुत्वाचा विळखा असल्याने भारताचं भलं होणं अयोध्येतल्या प्रभू रामावर सोपवू. पण आज अमेरिका ते रशिया, व्हाया चीन आणि इक्वेडोरपासून श्रीलंकेपर्यंतची सगळी स्थानके; येथील आर्थिक स्थिती; संपत्तीचे असमान वाटप आणि आहे रे - नाही रे यांच्यातील जमीन आस्मानाचे अंतर; जागतिक मंदी; जागतिक कुपोषण; बँका आणि कंपन्या बुडणे; युनोची दिवाळखोरी; अशा अक्षरशः न संपणाऱ्या यादीची लांबी कशी कमी करता येईल याचा मार्ग दाखवला तर पुढेमागे बिचाऱ्या भारताला काही शिकता येईल. मागे आणखीन एक बंगाली बाबू आदरणीय अमर्त्य सेन यांनाही नोबेल मिळाले होते. त्यावेळीही आशा जागी झाली होती पण काही साधलं नाही. बांगला भाषिक आणि मुस्लिम अशाही एका मोठ्या अर्थतज्ञाला बांगलादेशातील प्रयोग वगैरे लक्षात घेऊन नोबेल मिळाले होते. पण अजून बांगला देशाचे आर्थिक चित्र चांगले झाल्याचे कोणी बोलताना दिसत नाही. तेव्हा अभिजित बाबू काही करतील अशी आशा अन अपेक्षा ठेवून त्यांचे अभिनंदन करतो.

- श्रीपाद कोठे

१५ ऑक्टोबर २०१९

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०२२

प्रगती म्हणजे... ... ...

२९ ऑक्टोबर १८९६ रोजी लंडन शहरात `आत्मसाक्षात्कार' या विषयावर दिलेल्या व्याख्यानात स्वामीजी म्हणाले- `विषयभोगवासना कधीकधी अत्यंत धोक्याच्या पण अतिशय भुरळ पाडणाऱ्या एका आगळ्याच कल्पनेचे रूप घेत असते. ही कल्पना तुम्हाला नेहमीच ऐकू येईल. अगदी जुन्या काळीही ती होतीच. ती तुम्हाला प्रत्येक धर्माच्या अनुयायात आढळून येईल. ती कल्पना अशी की, अशी एक वेळ येईल की ज्यावेळी जगातली सर्व दु:खे लयास जातील, केवळ सुखेच मागे उरतील आणि ही पृथ्वी स्वर्ग होऊन जाईल. यावर माझा विश्वास नाही. ही पृथ्वी जशी आहे तशीच सदा राहणार आहे. असे म्हणणे फार कठोर आहे खरे, पण तसे म्हटल्याखेरीज काही गत्यंतर दिसत नाही. या जगातील दु:ख माणसाच्या शरीरातील संधिवातासारखे आहे. संधिवाताला तुम्ही एका अवयवातून हुसकून लावा, तो दुसऱ्या एखाद्या अवयवात शिरतो. तिथून हाकला की तो तुम्हाला आणखीच कुठेतरी सतावू लागतो. तुम्ही काहीही करा, तो आपले ठाण सोडायचा नाही. फार जुन्या काळी लोक जंगलात राहत आणि एकमेकांना मारून खात. आजच्या काळात ते एकमेकांचे मांस खात नाहीत खरे, परंतु अगदी मन लावून एकमेकांना ठकवितात. या ठकवाठकविने देशचे देश, शहरेची शहरे पोखरून निघत आहेत. हे काही प्रगतीचे चिन्ह नव्हे. आणि जगात जिला तुम्ही प्रगती म्हणता ती म्हणजे वासनांनी वासनांना गुणायचे याखेरीज आणखी दुसरे काय आहे? वासनांच्या संतत वृद्धीखेरीज आणखी काय आहे हे मला तरी काही कळत नाही. मला जर काही अगदी स्पष्ट दिसत असेल तर ते म्हणजे हेच की, दु:खे सगळी वासनांमुळे ओढवत असतात. वासना म्हणजे एखाद्या भिकाऱ्यासारखी दशा. तो सदा कशाची तरी भिक मागत असतो. कोणत्याही गोष्टीकडे `ही मला मिळाली पाहिजे' या वासनेखेरीज तो बघूच शकत नाही. सदा लसलस, सदा पाहिजे, पाहिजे, आणखी पाहिजे हीच भगभग. वासना तृप्त करण्याची आपली शक्ती जर गणितश्रेढीने वाढली तर वासनेची शक्ती भूमितीश्रेढीने वाढत असते. या जगातल्या सुखांची आणि दु:खांची बेरीज सदैव सारखी असते. समुद्रात एका जागी लाट उंचावली की दुसरीकडे त्यामुळे खळगा पडत असतो. जर एखाद्या माणसाला सुख लाभले तर दुसऱ्या एखाद्या माणसाला किंवा पशुला त्यासाठी दु:ख भोगावे लागते. माणसांची संख्या वाढत आहे आणि पशूंची संख्या घटत आहे. आपण त्यांना मारून टाकून त्यांची जमीन हिसकून घेत आहोत. आपण त्यांचे सगळे खाद्य लुबाडून घेत आहोत. असे असता- सुख वाढत आहे असे आपण कोणत्या तोंडाने म्हणू शकू? प्रबळ देश दुबळ्यांचा फन्ना उडवीत आहेत. त्याने ते प्रबळ देश सुखी होतील असे का तुम्हास वाटते? मुळीच नाही. ते मग एकमेकांचा नि:पात करू लागतील. एक व्यवहारी माणूस या दृष्टीने मला हे मुळीच कळत नाही की या जगाचा स्वर्ग कसा काय बनणार आहे? वस्तुस्थिती याच्या अगदी विरुद्ध आहे. व्यवहारी दृष्टी सोडून तात्त्विक दृष्टीने विचार केला तरी मला हे शक्य दिसत नाही.'

- श्रीपाद कोठे

१३ ऑक्टोबर २०१४

सोमवार, १० ऑक्टोबर, २०२२

महिलांचे सर्वेक्षण

दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्राने केलेल्या भारतीय स्त्रियांच्या सद्यस्थितीच्या सर्वेक्षणाचे लोकार्पण काल नागपूरला झाले. त्या कार्यक्रमाचे वृत्त आजच्या वृत्तपत्रात आले आहे. राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी या प्रसंगी बोलताना एक विचार मांडला की - 'हे सर्वेक्षण उत्कृष्ट झाले आहे पण विदेशी मापदंडाने झाले आहे. सर्वेक्षणाचे मापदंड भारतीय दृष्टीने तयार व्हावयास हवे.' अतिशय महत्त्वाचा आणि मूलभूत असा हा विचार आहे. तसेच केवळ महिला या विषयापुरता मर्यादित नसून; सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, मनोरंजन, वैद्यक, कला, कामगार, विकास, उपासना आणि जीवनाच्या सगळ्याच अंगांना लागू होणारा आहे. अनेक गोष्टी चांगल्या आणि चांगल्या हेतूंनी केल्या जातात; पण तेवढे पुरेसे नसते. तात्कालिक, दीर्घकालीन आणि चिरंतन असा सगळा विचार आवश्यक असतो. त्या दृष्टीने शांताक्काजी यांनी मांडलेला मूलभूत विचार पाहिला पाहिजे.

- श्रीपाद कोठे

११ ऑक्टोबर २०१९

बाष्कळ राहुल

राहुल गांधीच्या कालच्या विधानावर संघ, समितीकडून काही प्रतिक्रिया येत आहेत. कशाला हवीत ही स्पष्टीकरणे? हो, संघ ही पुरुषांची संघटना आहे आणि समिती ही महिलांची संघटना आहे. प्रत्येक संघटना आपापली मर्यादा, कामाची पद्धती ठरवू शकते की नाही? फक्त महिलांसाठी वा फक्त पुरुषांसाठी असे काम असू शकते की नाही? एकत्रित काम करायचे की वेगवेगळे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य आहे की नाही? राहुलसारखे मूर्ख काहीही बरळणार, त्यावर त्यांच्याहून विद्वान संपादक, पत्रकार चर्चा करणार, संघात महिला नाहीत म्हणून संघ महिलाविरोधी आहे; असे गाढवाला शोभणारे तर्कट देणार. अन आम्ही त्याला उत्तरे देणार? कशाला? मुळात समता वगैरे म्हणजे काय हे समजण्याची कुवत किती जणांची आहे? खरं तर समता वगैरेच्या नावाने जो बाष्कळपणा सुरु आहे त्याचीच झाडाझडती घेण्याची गरज आहे. बावळटांच्या निर्बुद्ध तर्कटांना आम्ही बळी पडण्याची गरज नाही.

या निमित्ताने संघ, हिंदुत्व, धर्म, परंपरा, संस्कृती, भारतीयता इत्यादीवर उठताबसता तोंडसुख घेत राहणाऱ्या, तमाम स्त्रीवादी महिला आणि पुरुषांचाही तीव्र निषेध. अतिशय अप्रस्तुत आणि अशोभनीय अशा राहुलच्या बकवासनंतर त्यांना तोंडही उघडावेसे वाटले नाही. हाच त्यांच्या मनातील महिलांचा आदर म्हणायचा का?

- श्रीपाद कोठे

११ ऑक्टोबर २०१७

रविवार, ९ ऑक्टोबर, २०२२

हे-ते च्या पलीकडे

यशवंत सिन्हा यांनी सरकारच्या अर्थनीतीवर टीका केली. नंतर अरुण शौरी यांनीही तसे केले. काल republic च्या sunday debate मध्ये पाहिलं, तिस्ता सेटलवाडला कडवी झुंज देत मोदींना defend करणारे यतीन ओझा हे केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणाची कडाडून आलोचना करीत होते. या सगळ्यांच्या आधी, सिन्हा यांच्याही खूप आधी, गोविंदाचार्य यांनीही केंद्राच्या अर्थनीतीवर टीका केली होती. राजकीय गणिते किंवा त्यांचे व्यक्तिगत हानीलाभाचे हिशेब हे यामागील कारण असू शकते. तशी टीकाही होते.

परंतु भारतीय मजदूर संघाने नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत केंद्राच्या आर्थिक धोरणांवर कठोर टीका केली. एवढेच नाही तर येत्या १७ तारखेला दिल्लीत मोठ्या निदर्शनांची घोषणा केली. भारतीय किसान संघाच्या एका प्रतिनिधीने राज्यसभा टीव्हीवर बोलताना सांगितले की, सुरुवातीला आम्हाला बैठकीला वगैरे बोलावले तरी जात होते. आता तेही बंद झाले आहे. या ठिकाणी कोणती राजकीय लाभहानी म्हणावी?

खरं असं आहे की, आपण समाज म्हणून अजून परिपक्व झालेलो नाही. सगळ्या गोष्टींचा जसा समन्वित विचार करायचा असतो, तसेच त्या समजून घेण्यासाठी त्याचे स्वतंत्र विश्लेषणही करायचे असते. वर्गीकरण आणि वर्गांचे संश्लेषण दोन्ही हवे. आम्ही मात्र एकच गोष्ट धरून ठेवतो. अर्थकारणाच्या बाबतीतही तेच होते आहे. यावेळी मी मोदी/ भाजप/ संघ विरोधक यांच्याबद्दल बोलत नाहीय. ते विरोध करतच राहणार. पण जे असे विरोधक नाहीत त्यांनी स्वतंत्रपणे विचार न करता मोदी वा केंद्र सरकार यांचे डोळे मिटून समर्थन करण्याचे काय कारण? किंवा कोणी टीका केली तर त्याची हेटाळणी करण्याची काय गरज? मुळात असा स्वतंत्र नीट विचार केला पाहिजे हे मोदी/ भाजप/ संघ समर्थक समजू शकतील. कारण त्यांना तीच शिकवण आणि संस्कार मिळतात. बाकीच्यांना ती शिकवण आणि ते संस्कार मिळत नाहीत. (व्यक्तिगत शिकवण वा संस्कार म्हणत नाही. ते असू शकतात.) त्यामुळे सगळ्यांनी नीट विचार करून समर्थन वा टीका करावी.

माझे मत काय? भाजपने सत्ताप्राप्तीसाठी जेवढी मेहनत घेतली तेवढी मेहनत अर्थकारणासाठी घेतलेली नाही. सध्याच्या केंद्र सरकारची आर्थिक धोरणे योग्य नाहीत. मुळात अर्थकारणाबाबत भाजप फारसा गांभीर्याने विचारच करत नाही, असे माझे मत आहे. अन हे मत फार जुने आहे. आजचे नाही. व्यक्तिगत अनुभवांच्या आधारेही बरेच लिहिता येईल. ते योग्यही नाही अन हे ते स्थानही नाही.

खूप मोठा विषय आहे. एक दोन गोष्टींचा फक्त निर्देश करतो. १) मागणीनुसार पुरवठा आणि २) उपलब्धतेनुसार किमती; हे अर्थशास्त्राचे दोन मुलभूत सिद्धांत. आज जगभरात आणि भारतातही हे दोन्ही धाब्यावर बसवले आहेत. आजचे सगळे अर्थकारण या दोन्हीच्या विपरीत आहे. नुकतीच १९७१ ची किराणा यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्याच्याशी आजची तुलना करून पाहिल्यास माझा मुद्दा पटेल. किंवा काही वर्षांपूर्वी सोन्याचे भाव १८ हजारावरून एकदम ३२ हजारापर्यंत गेले होते. ते नीट समजून घेतल्यास मुद्दा पटेल. उदाहरण म्हणून घरांच्या किमतीही घेता येतील. आज जे भाव वाढतात ते मागणी वाढल्याने वाढत नाहीत. हे अर्थशास्त्राच्या विपरीत आहे. तसेच एकीकडे उत्पादन वाढते तर दुसरीकडे भावही वाढतात. वास्तविक उत्पादन वाढीने भाव खाली यायला हवेत. तसे न होणे अर्थशास्त्राच्या विपरीत आहे. ६०-७० वर्षांपूर्वीची जगाची लोकसंख्या आज जेवढी वाढली आहे, त्या प्रमाणात किमती अव्वाच्या सव्वा वाढल्या आहेत. आजचे अर्थकारण आणि अर्थतंत्र प्रचलित अर्थशास्त्राच्याही विपरीत आहे. गांधी, दीनदयाळ आदींनी मांडलेल्या अर्थशास्त्राचा तर प्रश्नच नाही. कालच पियुष गोयल यांनी एक मुद्दा मांडला की, सरकार नवीन नोकऱ्या निर्माण करत नाही याचा अर्थ बेरोजगारी वाढते असा होत नाही. तर स्वयंरोजगार वाढतो आहे. त्यांचे म्हणणे काही अंशी खरे आहे. सरकारने नोकऱ्या निर्माण करणे वा देणे हा एकच पर्याय नसतो. परंतु लोक स्वयंरोजगार करतील यासाठी तशी धोरणे हवीत. विकासाची ती दिशा असायला हवी. केवळ त्यांना कर्जे देणे म्हणजे स्वयंरोजगाराला चालना देणे नसते. अशा बऱ्याच गोष्टी आहेत.

हे बदलणे सोपे नक्कीच नाही. पण त्यासाठी प्रयत्न करणे, प्रयत्नांची ती दिशा असणे हे भाजपकडून अपेक्षित आहे. त्याऐवजी भाजप प्रवाहपतितासारखा वागतो, बोलतो आहे. हे बदलायला हवे एवढे खरे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

९ ऑक्टोबर २०१७

गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०२२

नवाब मलिक यांना प्रश्न

आज काही साखर कारखान्यांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना नबाब मलिक म्हणाले - 'वर्ण व्यवस्थेत ज्यांना व्यवसाय करण्याचा अधिकार आहे त्यांनाच व्यवसाय करता येईल. बाकीच्यांना करता येणार नाही. अशी भाजप सरकारची (कारण धाडी ed ने टाकल्या आहेत.) वृत्ती आहे.' अहो मलिक, बारा बलुतेदारी काय होती? अन वर्णव्यवस्था वगैरे बोलण्याआधी, तुम्ही ज्या महात्मा गांधींना मानता, त्यांनी वर्णव्यवस्थेवर काय म्हटलं आणि लिहिलं आहे ते तरी एकदा पहा नं. किती दिवस काहीही बोलत राहायचं अन समाजात गोंधळ निर्माण करायचा?

- श्रीपाद कोठे

७ ऑक्टोबर २०२१


बुधवार, ५ ऑक्टोबर, २०२२

सारखेच शिक्षण कशाला?

'समता' या विषयावर आतापर्यंत पुष्कळदा लिहिलं आहे. त्याबाबतीत माझी मते स्पष्ट आहेत. आज पुन्हा हा विषय डोक्यात येण्याचे कारण म्हणजे हाथरस. अर्थात सध्याच्या घटनेची चर्चा मला करावयाची नाही. ती पुष्कळ होते आहे. होत राहील. ही घटना हे फक्त माझा मुद्दा मांडण्याचे निमित्त. मुद्दा हा की, समता तत्त्वाने केलेले घोळ. आपण कितीही नाकारले तरीही भारतात किमान दोन प्रकारचं जीवन आहे. एक साधनसंपन्न, शिक्षणसंपन्न, शिष्टाचारसंपन्न; आणि दुसरं; त्याविरुद्ध. शहरी आणि ग्रामीण असंही म्हणता येईल. या दोन्ही प्रकारच्या समाजांना सारखेच नियम, सारखेच शिक्षण इत्यादी असू शकते का? याचं स्पष्ट उत्तर नाही असं असलं तरीही, आपली व्यवस्था त्याच मार्गाने जाते. ग्रामीण जीवनाला पोषक असं शिक्षण, तसे शिक्षणाचे विषय, त्यासाठीची कौशल्ये, तंत्र, वातावरण, साधने, कालावधी; अशा पुष्कळ गोष्टी भिन्नच असणे योग्य. शहरी विद्यार्थ्यांना जे आणि जसे शिकवले जाते, ते आणि तसेच ग्रामीण भागात का शिकवावे? ग्रामीण भागातून विलक्षण प्रतिभा असलेले विद्यार्थी पुढे येतात हे खरे आहे. पण किती प्रमाणात? अन तसे विद्यार्थी हे मुळातच विशेष क्षमता घेऊन जन्माला आलेले असतात. वेगळे शिक्षण असले तरीही ते पुढेच येतील आणि शहरी विद्यार्थ्यांना टक्कर देतील. परंतु उरलेल्या ९९ टक्के विद्यार्थ्यांचे काय? त्यावर केवळ चित्रपट काढणे पुरेसे ठरेल का? समता समता हा घोष करण्यापेक्षा, प्रामाणिक सदहेतूने वास्तवाला अनुसरून शिक्षण इत्यादींची रचना आपल्याला का करता येऊ नये?

- श्रीपाद कोठे

६ ऑक्टोबर २०२०

संघावरील तीन आक्षेपांचे तथ्य

येत्या विजयादशमीला रा. स्व. संघ ९६ वर्षे पूर्ण करेल. संघाबाबत तीन मुद्दे बरेचदा चर्चेत असतात.

१) संघाकडे स्वतःचा कोणी महापुरुष नाही.

२) संघ सगळ्याच महापुरुषांवर आपला दावा सांगतो.

३) विश्वगुरुच्या आकांक्षेत supremacy आहे. ती मान्य होऊ शकत नाही.

एक लक्षात घ्यायला हवं की, आजकाल आपणच terms ठरवायच्या अन त्यानुसार मूल्यमापन करायचं अशी पद्धत आहे. संघाच्या बाबतीत हा प्रकार अधिकच असतो. मुळातच आपणच terms ठरवून मूल्यांकन करणं चुकीचं. ते संघाबाबत असो वा अन्य संदर्भात. त्यामुळेच या आक्षेपांबाबत संघाला काय वाटतं हे लक्षात घेऊन चर्चा व्हायला हवी.

- पहिला आक्षेप हा की, संघाकडे स्वतःचा महापुरुष नाही. हा आक्षेप एका अर्थी खराच आहे. डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, नानाजी देशमुख, दत्तोपंत ठेंगडी, अटलबिहारी वाजपेयी, दीनदयाळ उपाध्याय, एकनाथजी रानडे, अशोक सिंघल; किंवा आपापल्या ठिकाणी मोठी कामं उभी करणारी, भरपूर योगदान देणारी मंडळी; ही एका अर्थी महापुरुषच आहेत. तरीही समाजाच्या ऐतिहासिक विकासक्रमाचा विचार केल्यास त्याला एक मर्यादा आहे. मोठी सामाजिक मान्यता हे महापुरुष समजण्याचं एक माप असतं. त्या अर्थाने संघाकडे स्वतःचा महापुरुष नाही हे खरं आहेच. पण संघाला मुळात काय वाटतं? आपल्याकडे स्वतःचा महापुरुष नाही याची खंत, याचं दु:ख संघाला वाटतं का? याचं उत्तर नकारार्थी आहे. कारण महापुरुष निर्माण करणे, त्याचा पंथ विकसित करणे आणि त्या आधारावर आपला दबदबा निर्माण करणे हे संघाला करायचेच नाही. एक जुने ज्येष्ठ पत्रकार दि. वि. गोखले म्हणत असत, 'संघाने खूप मोठी माणसे निर्माण केली. परंतु सगळी बिना चेहऱ्याची.' हे अगदी खरं आहे. मात्र अनेकांना वाटतं की, संघाकडे स्वतःचा महापुरुष असायला हवा अन तसा तो नाही. त्यामुळे हा संघाचा मोठा दोष आहे. अशा लोकांचं तसं वाटणं त्यांच्यापुरतं ठीक असू शकतं पण वास्तव नाही आणि संघाचं ठीक मूल्यमापन करणारंही नाही.

- दुसरा आक्षेप असतो की, सगळ्याच महापुरुषांवर संघ दावा सांगतो. हा तर हास्यास्पद प्रकार आहे. राष्ट्रजीवन ही कुणा एकाची जहागिरी नसते. परंतु ती आपली जहागिरी असावी असं वाटणारेच असा आक्षेप घेऊ शकतात. राष्ट्रजीवन ही जहागिरी नसल्यानेच अनेक जण आपापल्या पद्धतीने, जे जे योग्य वाटतं, त्या त्या वेळी जाणवतं; त्यानुसार योगदान देतात. प्रत्येकाचं योगदान राष्ट्रजीवन पुष्ट करणारं असतंच, पण राष्ट्रजीवनाला तेवढंच पुरेसं नसतं. असंख्य महापुरुषांचं हे योगदान आणि त्या योगदानाची मर्यादा दोन्ही लक्षात घ्यावे लागते. म्हणूनच संपूर्ण राष्ट्रजीवनाचा विचार करताना कोणालाही वगळून चालत नाही अन कोणालाही समग्रता देऊनही चालत नाही. प्रत्येकाचा योगदानासाठी गौरव करावा लागतो, त्याच्या विचाराची आणि कृतीची प्रासंगिकता विशद करावी लागते, त्याच्या जीवनकार्यातील गतार्थता ठरवावी लागते, अन पुढे चालावं लागतं. यालाच म्हणतात विभूतीपूजा न करणे. संघ विभूतीपूजा करत नाही आणि आक्षेप घेणारे विभूतीपूजेत अडकतात. एवढेच याबाबत म्हणता येऊ शकेल.

- तिसरा आक्षेप विश्वगुरु शब्दावर. कारण त्यात supremacy झळकते. इथे बराचसा वैचारिक गोंधळ आहे. कारण श्रेष्ठता आणि वर्चस्व यातील फरक बहुसंख्य लोकांना फारसा आकलन होत नाही. श्रेष्ठता ही योग्य गोष्ट आहे आणि ती मानवी जीवनाची अपरिहार्यता आहे. खरं तर वर्चस्व भावनेचा त्याग केल्याखेरीज श्रेष्ठ होताच येत नाही. अन असे श्रेष्ठत्वच मानवाला पुढे घेऊन जाते. माणसाला माणूस बनवते. पुढे जाऊन अतिमानव पदी बसवते. वर्चस्वभावना, supremacy मात्र मानवाचे अवमूल्यन करते. आज अगदी रोजच्या व्यक्तिगत संबंधांपासून सगळीकडे हा गोंधळ पाहायला मिळतो. त्यामुळेच विश्वगुरु शब्दाला आक्षेप घेण्यात येतो. श्रेष्ठत्व आणि वर्चस्व यातला फरक नीट समजून घेणे हाच यावरचा उपाय असू शकतो.

- श्रीपाद कोठे

मंगळवार, ५ ऑक्टोबर २०२१

सोमवार, ३ ऑक्टोबर, २०२२

दान आणि दबाव

अन्नदान, विद्यादान, ज्ञानदान, द्रव्यदान, न्यायदान या साखळीत काही दशकांपासून एका दानाची वाढ झाली आहे. मतदान. दान ही वास्तविक एक वृत्ती आहे. पण ती लोप पावत असून व्यापार अथवा करार असं स्वरूप घेते आहे. प्रेम, मैत्री, नाती, जीवन, भक्ती या गोष्टी देवाणघेवाण, हिशेब किंवा करार अशा नाहीत; हे तोंडाने म्हणण्यापुरते राहिले की काय अशी स्थिती येते आहे. हा बदल केवळ काळाचा बदल नाही तो आतल्या वृत्तीचा बदल आहे. म्हणूनच त्याची दखल घेऊन हा वृत्तीबदल थांबवण्याचा प्रयत्न करायला हवा. सध्या निवडणूक वारे आहेत. त्यामुळे मतदानाचा विचार. मत हे दान असेल (अन ते तसेच असावे) तर त्याकडे तसेच पाहायला हवे. मतदान करून जनतेने आपला प्रभाव आणि शक्ती वापरली पाहिजे, मतदान केलेच पाहिजे, मतदान अधिकाधिक व्हावे, मतच दिले नाही तर सत्तेकडून अपेक्षा करणे किंवा सत्तेविषयी तक्रार करणे किंवा सत्तेचे मूल्यांकन करणे योग्य नाही; ही सगळी मते म्हणजे सौदेबाजीच. देवाणघेवाण, हिशेब, करार. वास्तविक मतदान होवो वा न होवो, अगदी शून्य टक्के मतदान झाले तरीही निवडून येणाऱ्यांनी, सत्ताधाऱ्यांनी समाजपोषक, समाजाची धारणा करणारी, समाजाच्या कल्याणाचीच कामे करायला हवीत. तशाच प्रकारची भाषा हवी. कारण आपण जी भाषा उपयोगात आणतो त्यातूनच कालांतराने भावधारणा होते. मतदानाचा आग्रह करतानाच, त्याच श्वासात; निवडून येणाऱ्यांनी, सत्तेने मतांचा विचार करू नये; जनतेच्या दबावाचा विचार करू नये; आपले कर्तव्य करावे; हे बोललं, लिहिलं, सांगितलं गेलं पाहिजे. तरच ते योग्य वृत्तीचा, योग्य भावाचा, योग्य विचारांचा परिपोष करेल. सत्तेचं गमावलेलं character दबावातून परत येणार नाही, तर योग्य वृत्तीपोषणातून परत येईल. त्यासाठी दानाचा भाव जागा कसा होईल याचा विचार प्राधान्याने व्हायला हवा.

- श्रीपाद कोठे

४ ऑक्टोबर २०१९

शनिवार, १ ऑक्टोबर, २०२२

मूलभूत त्रुटी

- दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनावर पोलिसांचा अत्याचार.

- नंदुरबारमध्ये नदीपात्रातील विहिरी न बुजवण्यावरून गोळीबार.

- मुंबईत एक कोटी रुपयांचे स्वच्छतागृह.

- सुरतच्या हिरे कंपनीने कर्मचाऱ्यांना मर्सिडीज मोटारी भेट दिल्या. हे कर्मचारी स्वत: देखील मर्सिडीज घेऊ शकत होते. या कंपनीने याआधीही मोटारी, सदनिका भेट दिलेल्या आहेत.

या आणि यासारख्या बातम्यांची यादी रोज करता येऊ शकेल. यावर तावातावाने चर्चा होत असतात. खोलात जाणे तसेही माणसाच्या स्वभावात नसते. त्यामुळे उपाय वा मार्ग सापडत नाही. आजच्या अर्थ विचारात काही मूलभूत त्रुटी आहेत. त्यांचा विचार केल्याशिवाय पुढचा मार्ग सापडणे अशक्य. त्रुटी-

- आजची व्यवस्था भोगाची सक्ती करते,

- आजची व्यवस्था पैसा कमावण्याची सक्ती करते,

- आजची व्यवस्था पैशाशिवाय जगता येणार नाही अशी स्थिती निर्माण करते,

- आजची व्यवस्था धनाधारित मूल्यांचे पोषण करते, त्यांनाच आधार मानते,

- प्रत्येक व्यक्ती, संस्था, काम, उपक्रम; आर्थिकदृष्ट्या परिपूर्ण, स्वावलंबी, स्वयंपूर्ण असायला हवे असे मानते.

- प्रत्येक वस्तू किंवा सेवा पैसा उत्पन्न करू शकत नाही, सारखाच पैसा उत्पन्न करू शकत नाही; याचा विचार करीत नाही. टमाटे, हिरे, शिक्षण, पोळ्या करणे या सगळ्यांचे `पैसामूल्य' सारखे राहू शकत नाही हे आजची व्यवस्था लक्षात घेत नाही.

- आजची व्यवस्था व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच करते, जीवनाचा संकोच करते, जीवन एकसुरी रटाळ बनवते.

- पर्यावरण, निसर्ग, प्रकृती, मोकळा वेळ, कला साहित्य, मन बुद्धीचा विकास, अध्यात्माची उपेक्षा करते.

- आधी हे जगून घ्या मग अध्यात्म पाहू, असा चुकीचा विचार करते.

- अध्यात्मिक मूल्य आणि वृत्ती असेल तरच भौतिक व्यवहारांना दिशा, स्थैर्य, मर्यादा, समावेशकता देता येईल; याकडे दुर्लक्ष करते.

आजच्या अर्थविचारातल्या या मूलभूत त्रुटी आहेत. त्यांना address न करता काहीही केले अन कितीही केले तरीही समाधानकारक फळ मिळू शकणे अशक्य. सरकार कोणाचेही असो.

- श्रीपाद कोठे

२ ऑक्टोबर २०१८

सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२

बँक बुडणे

बँक बुडणे ही आता नवीन बाब राहिलेली नाही. ठेवीदारांचे पैसे बुडू नयेत यासाठी त्याला दिलेले संरक्षण म्हणजे DICGC (deposit insurance and credit guarantee corporation) याचे संरक्षण एक लाख रुपयांपर्यंतच असते हे खरे पण ठेवीदारांना एक लाख रुपयेही मिळत नाहीत. वरून हजार रुपये काढायलाही रांगा लावून ताटकळत बसावे लागते. कारण मुळात या बँका बुडतच नाहीत. ठेवीला असलेले विमा संरक्षण बँक बुडाल्यावर मिळते. मात्र रिझर्व्ह बँक निर्बंध घालते ते बँक वाचवण्यासाठी. म्हणजे बुडू नये म्हणून दिलेली ती संधी असते. त्यामुळे व्यवहारात बँक बुडाली म्हटले तरी बँक बुडालेली नसते. खरी समस्या इथे आहे. बँक पुन्हा पूर्व स्थितीत आणणे अथवा बुडाली हे ठरवणे; ही किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे. एखादी व्यक्ती वर्षानुवर्षे कोमात असण्याची स्थिती असते तसे हे. यात ठेवीदारांना हकनाक त्रास सोसावा लागतो. अनेकांची जीवनाची गाडी रुळावरून घसरते, तर अनेक आयुष्यातून उठतात. काहीही गुन्हा वा चूक नसताना सामान्य माणूस भरडला जातो. यातून मार्ग काढणे आवश्यक आहे. बँकेच्या सक्षमतेबद्दल शंका येऊन रिझर्व्ह बँक जेव्हा पाऊल उचलते तेव्हाच ग्राहकांना विम्याचे पूर्ण संरक्षण देऊन सामान्य माणसाला दिलासा देता येऊ शकेल. हा अनुभव घेतल्यावर साहजिकच ग्राहक आपला पैसा दुसरीकडे जमा करेल. त्यामुळे अर्थ व्यवस्थेतील पैसा कायम राहील आणि ग्राहकांचेही नुकसान होणार नाही. बँक पूर्व स्थितीला आणण्याचे प्रयत्न पुढेही सुरूच राहतील. बँकेवर निर्बंध आणल्यानंतर ग्राहकांना धीर धरायला सांगण्यात येते त्याऐवजी रिझर्व्ह बँकेने थोडा धीर धरून विशिष्ट मुदतीसाठी बँकांना आपल्या ठेवीचा जो अंश रिझर्व्ह बँकेकडे ठेवावा लागतो त्यात बँकांना सुट द्यावी. बँक बुडवण्यात भूमिका असणाऱ्या धेंडांना धडा शिकवणे ही महत्वाची बाब आहेच. ते करावेच पण ते सामान्य ग्राहकांच्या जीवावर करू नये. घोटाळे आणि शिक्षा हाताळताना सामान्य माणसाला वेठीस न धरता मोकळे करण्याचा विचार प्राधान्याने करणे गरजेचे आहे.

- श्रीपाद कोठे

२७ सप्टेंबर २०१९

रविवार, २५ सप्टेंबर, २०२२

प्रवाहपतीत होऊ नये

हिंदुत्व एका संस्कृतीचं नाव आहे. ती एक जीवनशैली आहे. भारतीयत्वाचा पर्यायी शब्द आहे. त्याची सांगड एखाद्या पक्षाशी घालणं अनुचित आहे. भारतीयत्व आणि हिंदुत्व एक आहे असं म्हटलं जातं, तेव्हा एक लक्षात घ्यायला हवं की- राजकीय व्यवस्था म्हणून अनेक पक्ष राहणारच. समाज आहे तोवर राजकीय आकांक्षा बाळगणारे अनेक जण राहणारच. हिंदुत्वात सगळ्याच विचारांचा समावेश होणार असेल तर, टोकाच्या डाव्यांपासून टोकाच्या उजव्यांपर्यंत सारे हिंदुत्वाच्या कक्षेत येतील, यायला हवेत. सगळा देश हिंदुत्वाने भारला जाईल तेव्हा काय एकच पक्ष राहील की काय? असे होणार नाही/ होऊ नये. राजकीय विचार, राजकीय भूमिका, राजकीय इच्छा/ आकांक्षा या राहणारच. तेव्हा पक्षही अनेक राहणारच. हिंदुत्व अतिप्रचंड आहे. त्याला पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न त्याचे विरोधक जाणीवपूर्वक करतात. मात्र हिंदुत्व समर्थकांनी तेच केल्यास त्याने हिंदुत्वाची शक्ती वाढण्यापेक्षा हिंदुत्वाचे खच्चीकरणच होईल. शिवसेनेकडे फक्त हिंदुत्वाचे स्टीकर होते बाकी काहीही नाही. त्यामुळे एवढ्या विचाराची, दूरवर पाहण्याची वगैरे तिच्याकडून अपेक्षाच करता येत नाही. परंतु हिंदुत्वाचा गांभीर्याने विचार करणाऱ्यांनी मात्र प्रवाहपतीत होऊ नये.

- श्रीपाद कोठे

२६ सप्टेंबर २०१४

शनिवार, २४ सप्टेंबर, २०२२

सामूहिक शहाणपण

लाखो वर्षांच्या वाटचालीत माणसाने अनेक गोष्टींचा विकास केला. बाह्य व आंतरिक प्रकृतीवर मात करीत करीत ही जी वाटचाल केली त्यालाच आपण सभ्यता म्हणतो. या सभ्यतेच्या विकासात एक सामूहिक शहाणपणही विकसित झाले. त्या सामूहिक शहाणपणाने आपल्याला काही मुलभूत, शाश्वत सत्ये शिकवली आहेत. त्यातली काही अशी-

१) एक आंबा पूर्ण गाडीभर आंबे नासवून टाकू शकतो.

२) अन्याय करणारा तर दोषी असतोच, पण अन्याय निमूटपणे पाहणारा देखील दोषीच असतो.

३) गुन्हे करणारा तर दोषी असतोच, पण गुन्हेगाराला आश्रय देणाराही दोषीच असतो.

४) संपूर्ण प्रजेबद्दल समान भावना, यासोबतच निर्विवाद चारित्र्य म्हणजेही राजधर्म.

५) charity must begin at home.

६) caesar's wife must be above suspision.

आपल्या सर्वशक्तिमान संसदेला व संसद सदस्यांना मात्र ही सत्ये मान्य नसावीत. नाही तर गुन्हेगारांना संरक्षण देणारा अध्यादेश केंद्र सरकारने काल का काढला असता? असो. सामूहिक शहाणपण भलेही काहीही सांगत असो. शहाणपणाने वागलेच पाहिजे असे तर काही सरकारवर बंधन नाही ना?

- श्रीपाद कोठे

२५ सप्टेंबर २०१३

सत्तेचं भूत

आज पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती आहे. दोन वर्षांनी त्यांची जन्मशताब्दी साजरी होईल. आज त्यांनी उभ्या केलेल्या पक्षाचे सरकार दिल्लीत सत्तेवर आहे. दीनदयाळजींनी सत्ता/ राजकारण हे समाजजीवनाचे एक अंग मानले. त्याला खूप जास्त महत्व देणे आणि समाजाचे अस्तित्व, समाजाचे सुखदु:ख, समाजाचे भलेबुरे यासाठी सत्तेला अमर्याद महत्व देणे त्यांच्या विचारांशी विसंगत आहे. या एका मुद्याचा सगळ्या व्यक्ती, संस्था, संघटना, सगळे पक्ष यांनी सखोल आणि गांभिर्याने विचार करायला हवा.

एक निरीक्षण फक्त या संदर्भात नोंदवावेसे वाटते- प्रभू रामचन्द्रांपासून तर छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत शेकडो, हजारो प्रजाहितरक्षक, विश्वकल्याणाची दृष्टी आणि प्रामाणिक तळमळ असणारे आणि अफाट कर्तृत्व असणारे राजे-महाराजे (शासक) भारतात आणि भारताबाहेर होऊन गेले. मात्र त्यातील कोणतीही राजवट वा व्यवस्था चिरकाल टिकली नाही. एवढेच नाही तर समाजाची सुखदु:ख वाढली किंवा कमी झाली नाहीत आणि समाजाची मानसिक, बौद्धिक, आत्मिक, सांस्कृतिक प्रगती वगैरे फारशी झाली नाही. आदिम समाज आजच्या सुस्थितीत आला याची कारणे सत्तेपेक्षा सत्तेच्या बाहेर अधिक आहेत. सत्तेचं/ राजकारणाचं भूत आपल्या मनातून आणि मानगुटीवरून उतरविण्याची नितांत गरज आहे.

- श्रीपाद कोठे

२५ सप्टेंबर २०१४

चर्चा हिंदुत्वाची

हिंदुत्व, गुरुजींचं हिंदुत्व, संघाचं वर्तमान हिंदुत्व, हिंदुत्व दुर्बल होऊ नये आदी आदी चर्चा तेजीत आहेत. श्री गुरुजी, विचारधन, (मास मिडिया वाचून चर्चा आणि विचार करणाऱ्यांना हे नाव माहिती नसेल... bunch of thought याचं मराठी नाव आहे `विचारधन'.) श्री गुरुजींची मुस्लिम विषयक भूमिका इत्यादी मोठे विषय आहेत. प्रसंगोपात्त त्यावर लिहीनच. पण श्री गुरुजींची भूमिका चूक होती येथपासून तर संघाने घेतलेली ताजी भूमिका बोटचेपी आणि लांगूलचालन करणारी आहे, निवडणूक समोर ठेवून घेण्यात आलेली आहे; येथवर मते मांडली जात आहेत. या मंथनाला दिशा म्हणून स्वा. सावरकर यांच्या `हिंदुत्व' ग्रंथातील अगदी शेवटला परिच्छेद वाचावा. या परिच्छेदात एका पुस्तकाची असेल नसेल पण एका प्रबंधाची शक्ती नक्कीच आहे. तो परिच्छेद असा-

`हेही तितकेच निश्चित आहे की जेव्हा केव्हाही अशी वेळ येईल तेव्हा हिंदुलोक सर्व जगाला दुसरे तिसरे काही सांगणार नाहीत तर तेच जगाला करावयास सांगतील की जे गीतेने सांगितले, जे बुद्धाने उपदेशिले. ज्यावेळी हिंदू मनुष्य हा हिंदुत्वातीत होतो त्यावेळेला तो शंकराचार्यांप्रमाणे ‘वाराणसी मेदिनी’ म्हणून गावयाला लागतो नि तुकाराम महाराजांप्रमाणे ‘आमुचा स्वदेश भुवनत्रयामध्ये वास’ असे गर्जून उठतो. काय म्हणता? माझा स्वदेश? ऐका तर, बंधूंनो! माझ्या देशाच्या मर्यादा म्हणजे, त्रैलोक्याच्या मर्यादा. तीच माझ्या देशाची सीमा!'

(स्वा. सावरकर, `हिंदुत्व' या पुस्तकाचा शेवटला परिच्छेद.)

विरोधक, समर्थक हे दोन्ही बाजूला ठेवून एक विनंती करावीशी वाटते; चर्चा आणि वादविवाद किंचित कमी करून वाचन, व्यासंग आणि चिंतन थोडे वाढवले तर समाजाच्या हिताचे होईल. फुकटच्या सल्ल्याबद्दल रागावू नये.

- श्रीपाद कोठे

२५ सप्टेंबर २०१८

गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२

हिंदुत्वाची चिंता

हिंदुत्व ज्यांचा प्राण आहे असे अनेक प्रामाणिक कार्यकर्ते, विचारवंत, पत्रकार, सामान्य लोक सध्या सुरु असलेल्या शिवसेना-भाजप संघर्षावरून खूप चिंतीत आहेत. त्यांच्या भावना ठीक आहेत, पण एका गोष्टीकडे लक्ष वेधावेसे वाटते की- हिंदुत्व अशा एखाद्या युतीवर किंवा ती तुटण्यावर वगैरे अवलंबून नव्हते, नाही आणि असणार नाही. आपलं आजचं जीवन, आजची राजकीय व्यवस्था, आजची पक्षपद्धती यांचा मागमूसही नव्हता तेव्हापासून हिंदुत्व आहे. खरं तर इतिहास डोळे उघडतो तेव्हापासून हिंदुत्व आहे. अन अंतापर्यंत ते राहणार आहे. अशी असंख्य स्थित्यंतरे त्याने पचवून टाकली आहेत.

- श्रीपाद कोठे

२३ सप्टेंबर २०१४

बदलाचे साधन व्हावे

सरसंघचालकांच्या आरक्षण विषयक विधानावरील खा. रामदास आठवले यांची प्रतिक्रिया आज वाचण्यात आली. मला मनापासून ती आवडली. आठवले म्हणतात, `जातीव्यवस्था पूर्ण समाप्त केल्यास आम्ही जातीवर आधारित आरक्षण सोडून देऊ.' यावर दुमत होण्यासारखे काहीच नाही. फक्त मुद्दा आहे की, हे साध्य कसे करायचे? अन हे साध्य झाले हे कसे समजायचे? खरे तर आज जातीव्यवस्था आहे असे म्हणणे हा एक विनोद होय. आज कोणी जातीनुसार व्यवसाय करीत नाही. अनेक विविध जातींचे लोक दुसऱ्या जातींचे समजले जाणारे व्यवसाय करीत आहेत. अगदी ब्राम्हण माणूस केशकर्तनालय चालवतो आहे. काही लोक आपापले व्यवसाय करतात पण त्याची कारणे जातीव्यवस्था नसून अन्य आहेत. जसे- आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सवय, सुलभता, आवड; इत्यादी. मग आज जात आहे कुठे? राजकारण, विविध सवलती, सुविधा, कुटुंबातील काही रीती- आचार- इत्यादी, अन भांडणांची खुमखुमी जिरवण्यासाठी. खाणेपिणे या विषयात जात आता जवळपास नसल्यासारखी आहे. काही अपवाद असतील. त्यात व्यक्तिगत संबंध किंवा धार्मिक व्रत आदी गोष्टी आहेत. पण व्यवस्था म्हणून तर तो विषय मोडीतच निघाला आहे. विवाह हा एक विषय आहे जेथे जात अजूनही महत्वाची ठरते. पण त्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तेथे जबरदस्ती उपयोगाची नाही. कारण सवयी, आवडीनिवडी, वातावरण असे अनेक मुद्दे असतात. जसजसे सामाजिक अभिसरण वाढते आहे विवाह या विषयातील जात हा मुद्दा निवळत आहे. तो अजून निवळेल. १०० वर्षांपूर्वीच्या मानाने समाजाने आज तो बदल समाधान वाटावे एवढा स्वीकारलेला आहे.

मग जात आहे कुठे तर राजकारण, सवलती, सोयीसुविधा आणि मनात. राजकारण, सवलती, सोयीसुविधा या गोष्टी अशा आहेत की त्या बाबतीत जात वा अन्य कोणताही आधार सोडायला कोणी कधी तयार होणार नाही. माणूस खूपच, म्हणजे कमालीचा आदर्शवादी झाला तरच ते शक्य होईल. नजीकच्या काही शे वर्षात तरी ते शक्य नाही. त्यामुळे या बाबतीत कधीतरी थोड्या कठोरपणे चिकित्सा व उपचार करावेच लागतील. दुसरी जागा आहे मन. ती बाब तर पूर्णत: वैयक्तिक आहे. खा. आठवले यांच्यासारख्यांनी स्वत:ला अमुक जातीचे वगैरे मानणे सोडून दिले, आपल्या मनातून ते काढून टाकले की, जातीव्यवस्था तेवढ्या प्रमाणात मोडून पडेल. असे मनातून जात काढून टाकणारे जितके असतील तितकी या प्रक्रियेला गती मिळेल. आज मराठा म्हणा, दलित म्हणा, की अन्य नेते स्वत:च्या मनातून ही भावना काढून टाकतात का? पवार किंवा आठवले किंवा मायावती किंवा लालू किंवा मुलायम किंवा नितीश किंवा जयललिता; आपापल्या मनातून स्वत:ची वा दुसऱ्या कुणाची जात पुसून टाकतात का? जगाला दाखवण्यासाठी नव्हे प्रामाणिकपणे. यासाठी व्यक्तिगत संकल्प हवा. फाटे न फोडता मी स्वत:पासून सुरुवात करेन तर होईल, या निश्चयाने चालावे लागेल. कोण काय करते याची फार चर्चा करण्यापेक्षा मी काय करायला हवे याचा विचार केला तर होईल. ते सगळ्यांनी करावे यासाठी ज्याला जसा प्रयत्न करणे शक्य आहे तसा प्रयत्न त्यांनी करावा. आठवलेंनीही करावा. मग त्यांना कोणाला आवाहन करावे लागणार नाही- आधी जातीव्यवस्था संपवा म्हणून. प्रत्येकाने हव्या असलेल्या बदलाचे स्वत: साधन होण्याचा प्रयत्न करायला हवा.

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, २३ सप्टेंबर २०१५

बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२

प्रश्न अनंतमूर्ती यांना...

मोदी पंतप्रधान झाल्यावर, अत्यंत व्यथित झाल्याने अनंतमूर्ती जर भारतात राहू शकत नसतील, तर ते कुठे राहू शकतील? जिहाद वा क्रुसेड यांना अधिकृत मान्यता देणाऱ्या समाजाचे मोठे वास्तव्य असणाऱ्या देशांमध्ये? हिरोशिमा, नागासाकीवर अणुबॉम्ब टाकणाऱ्या देशामध्ये? क्रांतीच्या नावाखाली लाखो लोक मारणाऱ्या स्टालिन, ख्रुश्चेव्ह्च्या देशात? तायनानमेन चौकाची युद्धभूमी करणाऱ्या देशात? अब्जावधी लोकांना ठार मारून टाकणे हाच पुरुषार्थ मानणाऱ्या समाजांसोबत? लोकशाहीचा हवाला देत तेलाचे राजकारण करणाऱ्या देशात? कुठे राहू शकतील ते? गोध्रा आणि गुजरात दंगली ही चांगली गोष्ट नाहीच. पण भारताच्या फाळणीचे काय? केवळ ६५ वर्षांपूर्वी आपलेच १० लाख बंधू भगिनी क्रूरपणे मारल्या गेले होते. ज्या नेहरूंचे गुणगान अनंतमूर्ती करतात त्या नेहरूंच्या नाकर्तेपणामुळे १९४७, १९६२, १९६५ मध्ये जे भारतीय सैनिक प्राणास मुकले, त्याचे काय? हे जग, त्यातील व्यवहार, त्याचे व्यामिश्र स्वरूप, हिंसा-अहिंसा, न्याय-अन्याय, स्वातंत्र्य-समानता, बंधुत्व वगैरे वगैरे बद्दल जे प्रचंड अपुरं, उथळ, पोरकट आकलन बुद्धिवंत म्हणवणार्यांमध्ये आहे ते याचं कारण आहे. युरोपीय विचारांचा पगडा याच्या मुळाशी आहे. क्रिया-प्रतिक्रिया याचा वैज्ञानिक सिद्धांत प्रतिपादन करताना व्यवहारातील त्याचे स्वरूप मात्र समजण्याची यांची तयारीही नसते आणि ताकदही. शांततापूर्ण सहअस्तित्वासाठी हा क्रिया-प्रतिक्रिया सिद्धांत खोटा ठरवून उभं राहावं लागतं. त्यासाठी बुद्धीपलीकडील बाबींचं आकलन आणि समज हवी, म्हणजेच आध्यात्म हवं. इहवादी, बुद्धिवादी यांना ते मान्य नाही. त्यामुळे त्यांचं विवेचनही अपुरं राहतं आणि व्यवहार भरकटलेला.

- श्रीपाद कोठे

२२ सप्टेंबर २०१३

रविवार, १८ सप्टेंबर, २०२२

डॉ. मनमोहन सिंग - स्वच्छ?

अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या फायद्यासाठी अणुऊर्जा आयोगाला बाजूस सारून पुढे जाण्याचा निर्णय पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीने यासंबंधीचे टिपण तयार केले आहे. मागील कार्यकाळात खासदार विकत घेऊन अणुकरार केला आणि सरकारही वाचवले. मग किरकोळ व्यापारात विदेशी (अमेरिकी) गुंतवणूकदारांना आमंत्रण. अन आता नियम आणि पद्धती बाजूस सारून व्यवहार. शिवाय कोळसा फाईल्स वगैरे आहेच. तरीही पंतप्रधान स्वच्छच ???

शोध पत्रकारिता कशी होते? प्रथम काहीतरी शंकास्पद वाटते. मग निरीक्षण केल्यावर पुन्हा शंका बळावते. त्यानंतर शोध घेऊन छडा लावला जातो. मागील दसऱ्याच्या वेळी गडकरींच्या कंपन्या शोधण्यासाठी कुत्र्यासारखे फिरणारे पत्रकार आता ते सारे विसरूनही गेले. कारण गडकरींना अध्यक्ष पदावरून दूर करण्याचे महत्कार्य आटोपले होते. मनमोहन सिंग यांच्याबद्दल मात्र प्रसार माध्यमांना शंकाही येत नाही. काय म्हणायचे? हिप्नोटीझम, विकाऊ वृत्ती, देशद्रोह, निर्लज्जता, कॉंग्रेसधार्जिणेपणा, भाजपाद्वेष... की आणखीन काही?

- श्रीपाद कोठे

१९ सप्टेंबर २०१३

जावेद अख्तर यांची धूर्तता

एक ज्येष्ठ कार्यकर्ते, संस्कार भारती विदर्भ प्रांताचे संघटन मंत्री आणि माझे मित्र अजयजी देशपांडे यांनी एक व्हिडीओ पाठवला. जावेद अख्तर यांचा. कोणत्या तरी वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमातील काही मिनिटांचे क्लिपिंग. राजदीप सरदेसाई नावाचे कथित पत्रकार तो कार्यक्रम संचालित करीत आहेत. गोड शब्द, तर्कपूर्ण पद्धती आणि आक्रमकपणे सत्य पण घातक गोष्टी कशा गळी उतरवायच्या याचा उत्तम नमूना. ही क्लिप कधीची माहीत नाही, पण विषय तोच सहिष्णुता. भारताची परंपरा फार महान आहे. आपण ती पुढे चालवणार की महानता सोडून लहान होणार, असा जावेद अख्तर यांचा सवाल. स्वाभाविकच पेचात टाकणारा. मात्र तेवढाच धूर्त. आजवर हीच धूर्तता चालत आली आहे. तुम्ही महान आहात, तुम्ही थोर आहात इत्यादी सांगून; स्वत: कसेही वागायला मोकळे. आम्ही कसेही वागलो तरी चालेल. तुमच्या देवदेवता, धर्म, परंपरा, आचारविचार, तुमची भावधारा, प्रतिके यावर आम्ही कशीही टीकाटिप्पणी करू, कशीही टिंगलटवाळी करू, त्यांना हास्यास्पद ठरवू, त्यांची निन्दानालस्ती करू, त्यांचा अपमान करू, तुम्हाला काय अभिप्रेत आहे त्याला अर्थ नाही आम्हाला काय अर्थ काढायचा आहे तोच आम्ही काढू... तरीही तुम्ही शांतच राहायचे कारण तुम्ही महान आहात. हे आणि असेच जावेद साहेब बोलले. शोले किंवा पिके चित्रपटाचे उदाहरण देऊन बोलले.

जावेद साहेब लाज वाटायला पाहिजे तुम्हाला खरे तर. आमच्या मराठीत एक म्हण आहे. मराठीत असल्याने तुम्ही ती ऐकली नसेल. म्हण आहे- मऊ लागले म्हणून कोपराने खणू नये. साधं शहाणपण शिकवणारी ही म्हण आहे. पण तुम्ही अन तुमच्यासारखे कोपराने खणत गेलात अन मग जे व्हायचे ते होतेच. आतून कोणी फणा काढला तर नंतर ओरडता कशाला? सहिष्णू सहिष्णू म्हणत जेव्हा तुम्ही अतिरेक केला, आतल्या नागाला डिवचलं तेव्हा त्याने फणा उगारला. आता त्याचा राग शांत होईपर्यंत वाट पाहावी लागेलच. पण तुम्हाला तो फणा पाहून कमरेचं सावरणं कठीण होतंय. तुमची पंचाईत ही आहे. अन हिंदूंना - तुम्ही महान आहात हे सांगताना; कोणी काही म्हणत नाही याचा अर्थ त्याला काहीही म्हणावे असा होत नाही; तसा अर्थ काढणे असभ्यपणा असतो, ते म्हणजे चांगुलपणाचा गैरफायदा घेणे असते; हे तुमच्यासारख्या संवेदनशील सृजनशील माणसाला कळत नाही? हे म्हणजे carrying coal to new castle असे आहे. मुख्य म्हणजे हिंदूंच्या सहिष्णूतेवर आपापल्या स्वार्थाची आणि विकृतींची पोळी भाजून घेण्याचा कावा ओळखू न शकल्यानेच आजची दुरवस्था आली आहे. अगदी काल जम्मू काश्मीरच्या उरी तळावर झालेला हल्ला सुद्धा या तुमच्या निर्लज्ज काव्याचाच परिणाम आहे. मात्र आता हा कावा ओळखून हिंदू वागू लागला तर तुम्हाला शहाणपण सुचायला लागले आहे.

एक पक्कं लक्षात ठेवा- आमच्या महानतेचं काय करायचं आम्ही पाहून घेऊ. आम्ही महान राहू किंवा लहान होऊन जाऊ. महान काय किंवा लहान काय; कोणत्याही लेबलांचं आम्हाला कौतुक नाही. ज्याला जे म्हणायचं असेल ते म्हणा. पण यापुढे कावेबाजपणा चालणार नाही एवढं नक्की. तेवढी खूणगाठ बांधून ठेवा.

- श्रीपाद कोठे

१९ सप्टेंबर २०१६

परराष्ट्र धोरण

युद्धात विजयी होण्याचा पहिला नियम हा की, युद्धाची वेळ, स्थळ आणि पद्धत आपण निश्चित करायची असते. शत्रूने नाही. शत्रूला हवं तेव्हा, तिथे आणि त्या पद्धतीने युद्ध केल्यास यशाची शक्यता फार कमी असते. शिवाजी महाराजांचा आपल्याला सार्थ अभिमान असतो. त्यांनी वापरलेल्या युद्द तंत्राचं भान आणि थोडा अभ्यासही करायला हवा. अफजलखानाने उभ्या महाराष्ट्रात थैमान घातले असताना, अगदी तुळजा भवानीच्या मूर्तीवर घण घातले असतानाही महाराजांनी आपले फासे हातून सुटू दिले नाहीत. कालपासून जो क्षोभ देशभर उसळलेला आहे तो अतिशय योग्य असला तरीही एक प्रश्न आपणच आपल्याला विचारला पाहिजे- आम्हाला प्रतिक्रिया हवी आहे की शत्रूचा चोख बंदोबस्त? दुसरी गोष्ट हीही ध्यानात घ्यायला हवी की, देशाची सुरक्षा आणि परराष्ट्र संबंध यांच्यात मोदी सरकार आल्यापासून आमुलाग्र बदल झाला आहे. १९६५ च्या चीन युद्धापर्यंत तर पंडित नेहरू आणि त्यांच्या पक्षाला सक्षम लष्कराची गरजच वाटत नव्हती आणि लालभाईंनी तर उघडपणे चीनला समर्थन दिले होते. अशा लोकांनी जी संरक्षण आणि परराष्ट्र नीती सहा दशके राबवली ती पूर्णत: बदलून भारताला अनुकूल असे निर्णय, त्यांची कार्यवाही, त्याचे परिणाम इत्यादी बाबी खूप गुंतागुंतीच्या आणि सगळ्या प्रकारची शक्ती, बुद्धी आणि युक्ती यांची मागणी करणाऱ्या आहेत. याचा अर्थ पाकिस्तानचा बंदोबस्त करण्यासाठी पुढील सहा दशके लागावीत अथवा लागतील असा मुळीच नाही. मात्र, पाकिस्तान जन्माला घालण्यासाठी जगभरातील कोणी कोणी काय काय केले, त्याला किती काळ आणि तयारी लागली हे विसरू नये. अन ते लक्षात ठेवून पाकिस्तानला संपवण्यासाठी काय काय अन कसे करावे लागेल याचा थोडा विचार करावा. बाकी, जनतेत अशा गोष्टींचा आक्रोश असलाच पाहिजे. जोश के साथ होश भी हो... इतनाही.

- श्रीपाद कोठे

१९ सप्टेंबर २०१६

हेल्मेट व सामान्य माणूस

आमच्याकडे दारावर इडली, सांबारवडा विकणारा एक जण येत असे. एवढ्यात दिसत नाही. एक भोपु वाजवत तो फिरायचा. एक जुनी लुना किंवा तसलीच गाडी. त्यावर तीन चार डबे लावून तो फिरायचा. ते ठेवण्याची व्यवस्थाही त्याने केली होती. एकदा तो सायकल घेऊन आला. त्याला विचारलं तर म्हणाला, वो हेल्मेट की झंझट है ना.

आज देशभर असे लाखो लोक आहेत, जे अशी कामे करून जगतात. गाडी outdated झाली वगैरे त्यांना कळत नाही. ते आहे त्या स्थितीतून पुढे जात असतात. बरं त्यांनी प्रत्येक ठिकाणी, चार चार पावलांवर हेल्मेट घाल काढ करावी का? विम्याच्या बाबतीतही तो टाळण्याचा विचार करतो. कारण कमाई तेवढी नसते. मग कपात कुठे कुठे करता येईल याचा तो विचार करतो. काय पुढे ढकलता येईल याचा तो विचार करतो. जुन्या गाड्यांना तर विमा काढणाऱ्यांनीच नकार दिल्याची उदाहरणे आहेत. अन हे सगळं चूक, अयोग्य, अनैतिक नाही.

भाजी वगैरे व्यवसाय करणारे सकाळी भाजी आणायला गाडी (दुचाकी) घेऊन जातात आणि मग ठेल्यावर भाजी विकतात. त्यांच्या गाड्या अशाच असतात. शिवाय हेल्मेटचा प्रॉब्लेम असतोच. घरोघरी दूध देणारे याच प्रकारात येतात.

बरे हेल्मेट नियमित घालणारा माणूसही एखादे वेळी अनवधानाने, घाईघाईत किंवा काही अडचणीमुळे त्याविना गाडीवर असू शकतो. त्यावेळी पोलिसांच्या तावडीत न सापडणे हा त्याच्या नशिबाचा भाग समजायचा का?

हे सगळे शहरी भागात. ग्रामीण भागाचे काय? त्याला विमा काढायला, परवाना नवीन करायला किंवा पियुसी करायलाही गाव सोडून जावं लागतं. घर, घरची कामं, वेळ, सवड, शेतीभाती, पाऊसपाणी, पेट्रोल खर्च असं सगळं पाहून तो निर्णय घेतो.

आपण या सगळ्यांना एका झटक्यात बेजबाबदार, गुन्हेगार वगैरे ठरवायचं का? अन तसं ठरवणं हे आपल्याला कोणत्या पातळीवर उभे करते?

बाकी, अपघात कशाने होतात, कसे होतात? त्याची कारणे? यांचा तर विचार करण्याची गरजच नाही. Soft target सामान्य माणूस बरा. त्याला उठसुठ बोल लावता येतो, अक्कल शिकवता येते, अन वेठीलाही धरता येतं. अन आम्ही सर्वज्ञ असल्याने, सगळ्या जगाच्या भल्याचा मक्ता परमेश्वराने आम्हालाच दिला असल्याने, आम्हाला जे वाटते तेच बाकीच्यांना वाटायला हवे. दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी बाजू असू शकते याचा विचार करणे म्हणजे ईश्वराने दिलेल्या मकत्याचा अनादरच नव्हे का?

तेव्हा असो.

- श्रीपाद कोठे

१९ सप्टेंबर २०१९

जाती व्यवस्था

आरक्षण मागणाऱ्या आणि आरक्षण देणाऱ्या सगळ्यांनी आधी आपण जाती मानतो, जाती व्यवस्था आपल्याला मान्य आहे; असे जाहीर करावे. तसे करायचे नसेल किंवा तसे करणे घटनाविरोधी होणार असेल; तर सामाजिक वा आर्थिक कमकुवत असणारी कोणतीही व्यक्ती भारतीय नागरिक म्हणूनच कमकुवत राहील. एकही व्यक्ती कमकुवत राहू नये अशी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व्यवस्था विकसित करणे ही शासनाची जबाबदारी आहे. जी जात व्यवस्थाच आम्ही संपवलेली आहे त्या जातींच्या आधारे नोकऱ्या, शिक्षण, व्यवसायात प्रमाण शोधणे आणि त्यावरून गोंधळ माजवणे निर्बुद्धता आहे. सगळ्यांना (१३०/ १४०/ १५० कोटी लोकांना) चांगले जीवन, चांगले शिक्षण मिळायला हवे; हाच discourse राहायला हवा, हीच भाषा राहायला हवी, हेच ध्येय राहायला हवे. बाकी सगळ्या विद्वतचर्चा निरर्थक आहेत.

- श्रीपाद कोठे

१९ सप्टेंबर २०२०

शेती कायदे आणि जीवनदृष्टी

चित्रपट असो, मनोरंजन क्षेत्र असो, अर्थकारण असो, राजकारण असो; चर्चेचे दोनच बिंदू असतात. प्रामाणिकता आणि कार्यक्षमता. या दोन गोष्टींवरूनच वाद, भांडणे अन आरोप प्रत्यारोप होतात. पण आपण ज्यासाठी या चर्चा करतो त्याचा एक महत्वाचा बिंदू मात्र बहुधा लक्षात घेतला जात नाही. तो म्हणजे जीवनदृष्टी. जोवर त्या बिंदूकडे लक्ष दिले जात नाही तोवर फार काही समाधानकारक होईल अशी आशा करण्यात अर्थ नाही.

दोन दिवसांपूर्वी संसदेत पारित झालेली तीन शेती विषयक विधेयके हे याचे उदाहरण म्हणता येईल. दलाल हा शब्द वाईट अन चुकीचा आहे की, दलालीची वृत्ती वाईट अन चुकीची आहे? सरकारी मंडी मोडीत काढून कॉर्पोरेटला त्यासाठी मुक्तद्वार देणे, याने दलाली संपेल का? उलट सरकार किमान मतांच्या भीतीने आणि लालचीने तरी समाजाला उत्तरदायी असतं. कॉर्पोरेट्ससाठी तर फक्त पैसा हाच देव असतो. कॉर्पोरेट्स समाजाचा विचार करतात वा करतील हे कोणीही छातीवर हात ठेवून सांगू शकत नाही. दलाली मोडून काढण्यासोबतच डाळी, धान्य, खाद्यतेल आदी वस्तू आता 'जीवनावश्यक वस्तू' राहणार नाहीत. हा तर विनोद म्हणावा लागेल. शेती व्यवसाय surplus production मुळे अडचणीत आला आहे आणि 'जीवनावश्यक वस्तू' कायद्यामुळे साठवण करण्यात अडथळा येतो असा एक तर्क करण्यात येतो. पण  'जीवनावश्यक वस्तू' हा दर्जा काढून घेण्याने साठेबाजी वाढणार नाही का?

ग्राहक हा घटक तर यात कुठेच नाही. कॉर्पोरेट्समुळे शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल हे क्षणभर गृहित धरले तरी ग्राहकांची लूट होणार नाही याची काय शाश्वती? तसेच ग्राहक म्हणजे फक्त नोकरदार वर्ग नसतो, तर कापूस पिकवणारा शेतकरी पण धान्य आणि अन्य वस्तूंचा ग्राहक असतोच. शेतकऱ्यांचा माल खरेदी करणारे कॉर्पोरेट्स तो माल देशांतर्गत ग्राहकांना प्राधान्याने विकतील याचाही काय भरवसा? दुष्काळी वा पूर परिस्थिती वा युद्धजन्य परिस्थितीत जनतेच्या अन्न सुरक्षेची जबाबदारी कॉर्पोरेट्स घेतील का?

याचा अर्थ आज असलेली व्यवस्था आदर्श आहे असा नक्कीच नाही. मग मार्ग कसा काढायचा? यासाठीच जीवनदृष्टीचे परिवर्तन हवे. पहिली आणि प्राथमिक बाब तर ही की, समाजाला आदर्शवादी बनवायला हवे. ही सतत चालणारी प्रक्रिया औपचारिक आणि अनौपचारिक रीतीने सतत सशक्तपणे चालत राहायला हवी. दुसरे म्हणजे; उत्पादन, वितरण, विक्री, व्यवस्थापन, मालाची ने आण या सगळ्याचे विकेंद्रीकरण हवे. कॉर्पोरेट्स म्हणजे विकेंद्रीकरण नाही. मागे शांताकुमार यांनी संसदेत बोलताना साठवणुकीच्या जुन्या, परंपरागत पद्धतींना प्रोत्साहन देण्याचा मुद्दा मांडला होता. शेतकऱ्यांच्या घरोघरी भरपूर साठवण करण्याची जी पद्धत होती (त्याला बहुतेक गव्हाणी/ कणगी हा शब्द आहे) तसे प्रत्येक जण आपापली साठवण करू शकेल असे काहीतरी असायला हवे. गावागावात यासाठी लॉकर व्यवस्था केली जाऊ शकते.

मुख्य म्हणजे, शेतमालासाठी जशी किमान आधारभूत किंमत असते तशी कमाल किंमत सुद्धा निश्चित केली जावी. यालाच price band म्हणतात. शेतकऱ्यांसाठी आणि ग्राहकांसाठीही असे price band ठरवायला हवे. देशांतर्गत गरज पूर्ण करणे; दुष्काळ, पूर अथवा युद्ध या काळात किंवा सामान्य काळातही टंचाई उत्पन्न होणार नाही; या गोष्टींना प्राथमिकता राहील. देशी गरजांकडे दुर्लक्ष करून निर्यात करणे किंवा टंचाई निर्माण करून साठे दडवून ठेवणे; दोन्ही दंडनीय गुन्हे असायला हवेत.

हे असेच व्हायला हवे असे नाही. पण समाज याचा अर्थ समाजातील प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक घटक असा अर्थ ध्यानात घेऊन; त्या प्रत्येक घटकाचा विचार प्रत्येक व्यवस्थेने, प्रत्येक कायद्याने, प्रत्येक तरतुदीने केला पाहिजे. व्यवसाय किंवा कोणतेही काम आपल्याच पोळीवर तूप ओढण्यासाठी करायचे नाही, हा विचार सतत जागवत राहायला हवे. कोणत्याही घटकाने कोणाशीही शत्रुत्वाची भावना, प्रतिस्पर्धेची भावना ठेवू नये. कोणी कोणाला लुबाडू नये. यासाठी जीवनदृष्टी बदलावी लागेल. केवळ तांत्रिक काथ्याकूट करून होणार नाही.

- श्रीपाद कोठे

शनिवार, १९ सप्टेंबर २०२०

शनिवार, १७ सप्टेंबर, २०२२

निष्पक्ष

कर्नाटकातल्या राज्य सरकारने नुकताच एक सभ्य निर्णय घेतला, सगळ्या कर्मचाऱ्यांनी अंगभर कपडे घालूनच आले पाहिजे. पुरुष तर साधारण अंगभरच कपडे घालतात. त्यामुळे हा निर्णय महिला कर्मचारी समोर ठेवून होता हे स्पष्ट आहे. यावर मते मतांतरे असतील, पण गमतीचा भाग म्हणजे प्रसार माध्यमांनी यावर काहीही कोल्हेकुई केली नाही. भारतीय जनता पार्टीने असा काही निर्णय घेतला असता तर केवढे वादळ उठले असते. शिवसेनेने मुंबईतील दुकानांमध्ये लागलेले स्त्रियांचे पुतळे हटवण्याचा प्रस्ताव दिला तेव्हा केवढा गहजब झाला होता. आता मात्र प्रसार माध्यमे आणि स्त्रीवादी देखील `अळीमिळी गुपचिळी'. कुठे गेले तत्व आणि कुठे गेले स्वातंत्र्य? कर्नाटकात कॉंग्रेसचे सरकार आहे हे तर कारण नसावे? इतर वेळी जो उपटसुंभपणा पाहायला मिळतो त्यामागील खरे सूत्रधार कोण म्हणायचे? आणि तरीही प्रसार माध्यमे निष्पक्ष? हाहाहा !!!

- श्रीपाद कोठे

१८ सप्टेंबर २०१३

सरसंघचालकांच्या वक्तव्याच्या निमित्ताने

'हिंदूंनी अशास्त्रीय प्रथांचा त्याग करावा,' या सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या वक्तव्याची सध्या बरीच चर्चा सुरु आहे. अशी चर्चा होण्यात गैर काहीही नाही. पण त्यावरून संघ, हिंदू, डॉ. भागवत यांच्यावर टीकाटिप्पणी व्हावी हे मात्र न समजण्यासारखे आहे. उलट संघ, हिंदू यांना प्रतिगामी, मागास म्हणून हिणवणाऱ्या लोकांनी याचे मनापासून स्वागत करायला हवे. पण त्यासाठी मनाची प्रामाणिकता अन उमदेपणा हवा. तसा तो किती आहे हे या निमित्ताने स्पष्ट होते आहे.

सरसंघचालकांच्या या खऱ्याखोट्या (कारण त्यांच्या ज्या भाषणातील हे वाक्यांश आहेत ते काही जाहीर भाषण नव्हते. अन कोणी पत्रकार प्रतिनिधीही त्याला उपस्थित नव्हते.) वक्तव्यानंतर कथित पुरोगामी अन सुधारणावाद्यांनी आपापल्या याद्या सादर केल्या आहेत. त्यांना जे विषय अशास्त्रीय वाटतात त्यावर संघाची काय भूमिका आहे, किंवा त्या मुद्यांवर संघ का बोलत नाही, संघ मोघम का बोलतो; असेही मुद्दे उपस्थित केले जात आहेत. एका कार्यकारी संपादकाने तर संघाने आधी गोळवलकर गुरुजींचे विचार जाहीरपणे नाकारावेत आणि मग बोलावे, असा अतिशय आचरट सल्लाही देऊन टाकला आहे. नेहमीप्रमाणेच, संघ यावर काही प्रतिक्रिया देण्याची शक्यता नाही.

वास्तविक बदल, परिवर्तन ही बाब हिंदू समाजासाठी मुळीच नवीन नाही. हजारो वर्षातील पाचपन्नास वर्षांचा कोणताही कालखंड असा नाही ज्यात हिंदू समाज, रूढी, प्रथा, परंपरा बदलल्या नाहीत. अन असाही कालखंड नाही जेव्हा समाज नेतृत्वाने या बदलांचे स्वागत केले नाही किंवा त्यांना उचलून धरले नाही. हां, एक गोष्ट मात्र निश्चित की, केवळ बदलासाठी बदल, कोणाला वाटतं म्हणून बदल, कोणाला संतुष्ट करण्यासाठी बदल, कायदे वा अन्य दबावाने बदल, बदलांचा गाजावाजा, बदल करताना आवेश अन आक्रस्ताळेपणा करणे, असा आक्रस्ताळेपणा करून बदलाची प्रक्रिया सुकर करण्याऐवजी संघर्ष निर्माण करणे अन कडव्या गटांना जन्म देणे; यासारख्या गोष्टी हिंदूंनी आणि संघानेही टाळल्या आहेत.

ज्ञान विज्ञानाचे वावडे ना संघाला आहे ना हिंदूंना. पण आपल्याला जे अन जसे वाटते, ते अन तसेच प्रत्येकाला वाटते किंवा वाटायला हवे, त्यानुसारच सगळ्यांनी वागायला हवे, तसे वागत नसतील तर ते कुचकामी, अशांचे जगणे अशक्य करून टाकावे; वगैरे परिवर्तनाच्या कल्पना ना संघाच्या आहेत ना हिंदूंच्या. मुळात अशा कल्पना अशास्त्रीय आहेत. अस्पृश्यता वा जातिभेदाच्या संदर्भात संघाने जेवढे काम केले आहे, तेवढे अन्य कोणीही केलेले नाही. पण संघाची स्वत:ची अशी एक शैली आहे अन ती काळाच्या कसोटीवर सिद्ध झाली आहे. बाकीच्यांनीही तिचे अनुकरण करावे अशी ती शैली आहे. पण रा.स्व. संघ हे आपल्या देशात `नावडतीचे मीठ' असल्याने ते अळणी ठरवले जाते. त्याला काही इलाज नाही.

सामाजिक प्रथा, परंपरा सतत बदलत असतातच. अगदी ज्या गोळवलकर गुरुजींचा कट्टर म्हणून उल्लेख केला जातो त्यांनीही हे स्पष्ट केले होते की, `हिंदू राष्ट्रवृक्षाची अनेक पाने जुनी झाली आहेत. जीर्णशीर्ण झालेली आहेत, पिकली आहेत. ती गळून जातील. ती गळून जाऊ द्यायला हवीत. त्यात वाईट वाटण्यासारखे, दु:ख करण्यासारखे, शोक करण्यासारखे काहीही नाही. या वृक्षाला नवीन पालवी फुटेल अन तो आपल्या अंगभूत जीवनरसाने पुन्हा बहरून येईल.' स्वामी विवेकानंद, स्वा. सावरकर, योगी अरविंद, महात्मा गांधी, डॉ. हेडगेवार अशी मालिकाच सांगता येईल ज्यांनी नेहमीच हिंदू समाज काळानुरूप राहावा यासाठी प्रयत्न केले. मुद्दा फक्त एवढाच उरतो की- शास्त्रीय काय अन अशास्त्रीय काय? जे जे जुने ते अशास्त्रीय अशी जर धारणा असेल तर कठीण होईल. किंवा प्रयोगशाळा ही एकच शास्त्रीयतेची कसोटी असेल तर कठीण होईल. किंवा उपयुक्तता हाच शास्त्रीयतेचा एकमेव निकष असेल तर कठीण होईल. सरसंघचालकांना आपापल्या याद्या सादर करणाऱ्यांनी याचाही विचार करायला हवा.

शास्त्रीय याचा अर्थ सगळ्या अंगांचा विचार करून, अभिनिवेशरहित राहून, स्थायी- संघर्षरहित वा कमीत कमी संघर्षाच्या मार्गाने- हारजीत याच्या पलीकडे जाऊन शुद्ध विश्व कल्याणाची दृष्टी ठेवून असा जर घेतला; जो सरसंघचालकांना अपेक्षित असावा; तर अनावश्यक आक्रस्ताळा वादविवाद टाळता येऊ शकेल.

- श्रीपाद कोठे

नागपूर

शुक्रवार, १८ सप्टेंबर २०१५

@ Charudatta Jichkar अहो जिचकार, हिंदू धर्म authority ने चालत नाही. अन तुम्हाला हवे म्हणून त्याने तसे चालावे हा दहशतवाद झाला. आधी जरा धर्म, हिंदू, समाज, सामाजिक परिवर्तन वगैरे गोष्टी समजून घ्या नीट. त्यासाठी लोक आपली आयुष्यची आयुष्य लावतात. तुम्ही काही वर्षे तरी लावा अन मग बोला. उगाच पानटपरीवरची शेरेबाजी नका करू.

सोमवार, १२ सप्टेंबर, २०२२

कावेरीचा विवाद

कावेरी प्रश्न पुन्हा पेटला. तो पहिल्यांदाच पेटलाय असं मात्र नाही. हे व्यवस्थांचं अपयश आहे. याचे दोन अर्थ होतात. १) विद्यमान व्यवस्था तोकडी आहे आणि ती बदलायला हवी. २) केवळ व्यवस्था करून प्रश्न सुटत नाहीत.

ज्यावेळी कावेरी पाणीवाटपाची व्यवस्था केली गेली तेव्हा ती पुरेशीच होती. म्हणूनच ती स्वीकारण्यात आली. मग व्यवस्था असूनही प्रश्न का निर्माण होतात? कारण कोणतीही व्यवस्था हा प्रश्न सोडवण्याचा एक भाग आहे. एकमेव भाग नव्हे, हे लक्षात घेतले जात नाही. व्यवस्था, परिस्थिती आणि माणूस हे तीन घटक मुख्यत: असतात. त्यातील व्यवस्था याच घटकाची खूप चर्चा होते. त्यावरच वेळ, पैसा, नियोजन सगळे खर्च होते. कारण ते सोयीचे असते. त्यामुळे खापर फोडण्यासाठी एक हक्काची जागा मिळते. सगळ्या सामाजिक वा अन्य प्रश्नांची हीच गत आहे. कारण परिस्थिती आपल्या हाती नसते आणि `माणूस' घडवणे किचकट, वेळखाऊ आणि काही प्रमाणात बेभरवशाचे व अगम्य काम आहे. ती धीराची व्यामिश्र प्रक्रिया आहे. त्यापेक्षा सोपेसोपे व्यवस्था तयार करणे किंवा तिच्या नावाने बोटे मोडणे, हेच आपण स्वीकारतो.

दीर्घकालीन भल्यासाठी मात्र `केवळ व्यवस्थेने प्रश्न सुटत नाहीत' हा मंत्र वारंवार जपण्याची गरज अशा वेळी जाणवते.

- श्रीपाद कोठे

१३ सप्टेंबर २०१६

शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०२२

सशस्त्र क्रांती

प्रा. सरोज गिरी नावाचे कोणी डावे विचारवंत (???) आहेत. त्यांनी republic tv वरच्या चर्चेत आज उघडपणे `होय, या देशात सशस्त्र क्रांती व्हावी असे मला वाटते.' असे विधान केले. त्यानंतर झालेल्या गोंधळानंतरही `मी आपल्या म्हणण्यावर ठाम आहे,' असे ते सातत्याने सांगत राहिले. डाव्यांचे वास्तव रूप अनेकदा उघड झालेले आहेच. आज ते परत एकदा उघडे पडले. हे महाशय प्राध्यापक आहेत. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ते कशा प्रकारे प्रबोधित करीत असतील? अन देशभरातील हजारो महाविद्यालयातील असे अनेक प्राध्यापक मिळून (याचा अर्थ एकत्र येऊन किंवा सगळ्यांचे स्वतंत्र योगदान एकत्रित करून) कोणती मानवता जन्माला घालत आहेत? आमच्या पद्धतीने चला, आमचे विचार मान्य करा अन्यथा सशस्त्र संघर्ष करू; ही भूमिका कोणता विचारी माणूस मान्य करू शकेल? तरीही त्यांची तळी उचलून धरणाऱ्यांना काय म्हणायचे आणि त्यांचे काय करायचे? मानवता, सहृदयता, सहिष्णूता यांची जपमाळ ओढणाऱ्या लोकांचा चेहरा आणि मन किती विकारी, विषारी अन विखारी आहे; हे अजूनही लक्षात येऊ नये? या महाशयांनी आज इतक्या जणांचे वस्त्रहरण केले की, कितीही श्रीकृष्ण आले तरीही यांची लाज झाकली जाणार नाही. खरे तर या वस्त्रहरणाचा पोत इतका विलक्षण आहे की, उघड्या पडलेल्या सगळ्यांची तर सोडाच कुणा एकाचीही लाज झाकेल एवढे वस्त्र आज अखिल जगात उपलब्ध नाही. मानवतेला लागलेल्या या कीड्यांनी शक्य झालेच तर किमान फाटक्या चिंध्यांमध्ये तोंड लपवता आले तर लपवावे.

- श्रीपाद कोठे

१० सप्टेंबर २०१७

अहो प्रसन्न जोशी

प्रसन्ना जोशी परवा जोरजोरात ओरडत होता- पितृत्वाचं काय? पितृत्वाचं काय? विषय होता- नथुराम गोडसे संघाचा होता वा नाही.

अहो प्रसन्ना जोशी (आणि कंपनी) काय सिद्ध करायचं आहे तुम्हाला? नथुराम गोडसे संघात येत असे म्हणून त्याच्या कृतीचं पितृत्व संघाकडे? अहो, महात्मा गांधी हे हरीलाल गांधी यांचे प्रत्यक्ष पिता होते? मग हरीलालच्या कृत्यांचे पितृत्व महात्मा गांधींना द्यायचे का? का नाही देत ते श्रेय? इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीचे श्रेय जवाहरलाल नेहरूंचे का? तायनानमेन चौकातील शेकडो विद्यार्थ्यांच्या हत्येचे श्रेय कार्ल मार्क्सच्या झोळीतच टाकायचे ना? स्टालिनने केलेला नरसंहार सुद्धा मार्क्सने तयार केलेल्या वातावरणामुळेच ना? जगभरात इस्लामच्या नावाने थैमान घालून अमाप जीवांची हत्या करणाऱ्या, अगदी कराचीतील १२५ बालकांना अल्लाघरी पाठवण्याची जबाबदारी मुहम्मद साहेबांचीच म्हणायची का?

बरे ते जाऊ द्या. संघाने तयार केलेल्या वातावरणावर तुमचा आक्षेप असतो. ठीक. संघाने तयार केलेल्या वातावरणाने गांधीजींची हत्या झाली. मग एकदोन किंवा दहा वीस नव्हे, तब्बल दहा लाख; पुन्हा सांगतो, तब्बल दहा लाख हिंदूंना यमसदनी पाठवण्यासाठी कोणी तयार केलेले वातावरण कारणीभूत होते? कधीतरी करा ना चर्चा? कराल का? तुम्ही नाही करणार याची खात्री आहे. दहा लाख हिंदूंच्या हत्येचं पितृत्व टाका ना कॉंग्रेसच्या पदरात. की ते १० लाख मृत्यू माणसांचे नव्हते? दखल घेण्यासारखे नव्हते?

इंदिरा गांधी, राजीव गांधी, दीनदयाळ उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी, लालबहादूर शास्त्री, बेनझीर भुट्टो, अब्राहम लिंकन, जॉन केनेडी अशा अनेक हत्यांसाठी कोणी तयार केलेले वातावरण जबाबदार होते? अन गांधीजींची हत्या झाली तेव्हा संघ २३ वर्षांचा होता. गोळवलकर गुरुजी सरसंघचालक होऊन फक्त आठ वर्षे झाली होती. त्यानंतर २५ वर्षे गुरुजी सरसंघचालक होते. अन संघ आता ९१ वर्षांचा आहे. या काळात तसे काही वातावरण का नाही तयार झाले?

अन वातावरणाची एवढी चिंता करता, मग आजकालच्या मुलींच्या परिधानामुळे मुलांमधील लैंगिक गुन्ह्यांचे वातावरण तयार होते असे म्हटल्यावर नाकाला मिरच्या का झोंबतात? की वातावरण निर्मिती फक्त हत्येच्या संदर्भातच होत असते? अन तीही फक्त संघाकडूनच?

जरा जनाची नाही पण मनाची तरी लाज बाळगत जा हो.

- श्रीपाद कोठे

१० सप्टेंबर २०१६

गुरुवार, ८ सप्टेंबर, २०२२

समाज म्हणजे काय?

आपण समाज, समाज म्हणतो तो काय असतो? कसा असतो? काळा की गोरा? लठ्ठ की रोडका? अन हे प्रश्न मी विचारतोय- तुमच्या माझ्यासाठी. आज सगळ्यात जास्त धोकादायक जर काही असेल, सगळ्यात जास्त त्रासदायक जर काही असेल, सगळ्यात जास्त चिंताजनक जर काही असेल; तर ते आहोत तुम्ही आम्ही. दोन वेळ भरपेट जेवण, दोन वेळ नाश्ता, अनेकदा चहा, जायला यायला गाड्या, राहायला घर, घरात पुस्तके, इंटरनेट, शिकले सवरलेले, ग्रंथालये कोळून पिणारे, रोज गळणाऱ्या टीव्हीतून ज्ञानामृत प्राशन करणारे तुम्ही आम्ही हा खरा धोका आहे. ज्यांना हे सारे उपलब्ध नाही ते ना त्रासदायक आहेत ना धोकादायक.

गुडगावच्या शाळेत एका विद्यार्थ्याचा जीव जातो. त्या प्रकरणाचे सत्य समाजापुढे आणण्यासाठी पत्रकार त्याच्या घरी पोहोचतो. डोळ्यात पाणी येणे स्वाभाविकच. त्याच्या आईशीही बोलतो. अन तिथेच उभे राहून, खोलीच्या बाहेरही न येता- सरकारला, मुख्यमंत्र्यांना, शाळा प्रशासनाला प्रश्नांवर प्रश्न विचारत सुटतो. या वा अशासारख्या घटना सरकार, मुख्यमंत्री, शाळा प्रशासन यांच्या भरवशावर सुटू शकतात का; हा प्रश्न तूर्त बाजूला ठेवू. पण त्यांना विचारावयाचे प्रश्न तरी किमान कुठे उभे राहून विचारायचे याचे भान न ठेवणारा पत्रकार म्हणजे समाज? तरुण तेजपाल विमानाने जातो आहे. त्याच्या मागे धावणारी पत्रकार; हवाई सुंदरीने बाजूला करूनही त्याचा पिच्छा सोडायला तयार होत नाही. हा समाज? परंपरानिष्ठ तरुणांनी valentine day ला भेटकार्डाच्या दुकानावर दगडफेक केली किंवा गौरक्षकांनी उत्पात केला तर; तुमचा कायद्यावर विश्वास नाही का? कायदा हातात का घेता? असा रोकडा सवाल करणाऱ्या प्रसार माध्यमांनी कायद्यावर विश्वास नसल्यासारखे वागणे आणि त्यावर काहीही न बोलणे म्हणजे समाज? जबाबदार फक्त शासन, प्रशासन? शालेय विद्यार्थ्यांमध्ये बेजबाबदारपणे वागण्याची इच्छा जागवणाऱ्या जाहिराती आणि त्या करवून घेणारे उत्पादक, तसेच दूरगामी परिणामांचा विचार न करता `गंमत हो' म्हणून त्याचे समर्थन करणारे पालक; या सगळ्यांना काहीच जबाबदारी नसणे म्हणजे समाज?

@@@@@@@

मेधा खोले नावाच्या एका महिलेने जी काही तक्रार केली; त्यासाठी हातची कामे सोडून गोंधळ माजवणारे तुम्ही आम्ही म्हणजे समाज? कायद्यावर विश्वास ठेवायचा म्हणजे काय करायचे असते हे न समजणारे तुम्ही आम्ही म्हणजे समाज? व्हायचे ते होईल ना त्याचे. त्यासाठी आपापसात लाथाळी करणारे, भूमिका घेणारे, कधी थेट शिवीगाळ करणारे किंवा ते फार वाईट दिसेल म्हणून विनोदाची शाल पांघरून कुचाळक्या करत, आपल्या मनातील न गेलेली जात दाखवून देणारे तुम्ही आम्ही म्हणजे समाज? प्रथा, परंपरा, रूढी, मान्यता, श्रद्धा, व्यवहार आणि कायदे, नियम आदींचा संबंध, अनुबंध इत्यादीवर पाच मिनिटेही गंभीर विचार करण्याची क्षमता आणि पात्रता नसलेले तुम्ही आम्ही म्हणजे समाज? आदर्श विचार, व्यवहार हा पांढऱ्यावर काळे करण्याचा विषय नाही आणि पांढऱ्यावर काळे करून तो साधताही येत नाही. तो जगण्याचा विषय आहे. मन मोठं, सखोल, व्यापक होणं म्हणजे आदर्श होत जाणं. एखाद्याला शिक्षा देऊन अथवा तो वाईट वागला म्हणून टीका वा टवाळी करून त्याचं मन मोठं आणि शुद्ध होईल का; हा प्रश्नही न पडणारे तुम्ही आम्ही म्हणजे समाज? अन अमुक कोणी असा वागला असं म्हणताना, मागच्या क्षणापेक्षा या क्षणी मी व्यापक, शुद्ध, समजदार झालो आहे हे स्वत:ला सांगणे ही देखील माझी जबाबदारी असते; याचे भानही नसणारे तुम्ही आम्ही म्हणजे समाज? षड्रिपूंमध्ये फक्त काम आणि क्रोध एवढेच नाहीत; लोभ, मोह, मद, मत्सर हेही आहेत. हे सारे कमी करत जाण्याऐवजी वाढवण्यातच आयुष्य घालवणारे आणि झुंडीलाही त्यात काहीही वावगे वाटत नसल्याने त्याचे समर्थन करीत राहणारे तुम्ही आम्ही म्हणजे समाज? मेधा खोले यांच्यापेक्षा आपणही फार वेगळे नाही आहोत हे समजण्याची लायकीही नसणारे तुम्ही आम्ही म्हणजे समाज?

@@@@@@@@@

गौरी लंकेश यांच्याविषयी हळूहळू जे बाहेर येत आहे त्यावरून त्या बाईंचा वकूब फारच सुमार होता आणि वृत्तीही चांगली नव्हती हे सिद्ध होते. जीएसटीच्या विषयावर चर्चा सुरु असताना वापरलेले sanitary napkins पंतप्रधानांना पाठवण्याची भाषा बोलणारी स्त्री सभ्य म्हणायची का? अशी भाषा उद्या मी वापरली तर?? की भाजप, संघ, हिंदुत्व यांना विरोध करणारे कोणीही फक्त योग्यच असतात? दुर्दैवी हत्याकांडाचे दु:ख मलाही आहे, तुम्हालाही आहे. दुर्दैवी हत्याकांडाची चिंता मलाही आहे, तुम्हालाही आहे. माझा सवाल एवढाच की, दुर्दैवी हत्याकांडामुळे हलकटपणाकडे दुर्लक्ष करायचे का? समाज काय असतो? कोणत्या तरी सोयीच्या घटनेचा आडोसा घेऊन हलकटपणाकडे दुर्लक्ष करणारे तुम्ही आम्ही म्हणजे समाज?

@@@@@@@@@@

या सगळ्याला थेट भिडल्याशिवाय आणि ते भिडताना स्वत:ला सुरक्षित ठेवण्याची खोड टाकून दिल्याशिवाय तुम्हाला मला हवे असलेले चित्र तयार होणार नाही एवढे मात्र निश्चित.

- श्रीपाद कोठे

नागपूर

९ सप्टेंबर २०१७

चामड्याच्या पट्टा

येताजाता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सहिष्णू होण्याचा उपदेश देणाऱ्यांसाठी-

जैन बांधवांच्या व्रतानिमित्त मांसविक्री बंद करण्याच्या विषयावरून दिसून येणाऱ्या असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर, संघाचा तीन वर्षांपूर्वीचा एक निर्णय केवढा लक्षणीय ठरतो. संघात गणवेषासाठी वापरला जाणारा पट्टा पूर्वी चामड्याचा राहत असे. एका उत्सवाला जैन मुनी पाहुणे म्हणून आले होते. त्यावेळी त्यांनी विचारले- या चामड्याच्या पट्ट्याला पर्याय देता येणार नाही का? अन संघाने प्रतिनिधी सभेत विचार करून निर्णय घेतला की, पट्टा चामड्याचा राहणार नाही. पुन्हा या गोष्टीचा गाजावाजा देखील नाही. दुसऱ्यांचा आदर, बदलाची मानसिकता अन स्वाभाविकता याचे हे मनोज्ञ उदाहरण आहे.

कोण काय आहे अन किती पाण्यात आहे हे समजण्यासाठी एवढे पुरे.

- श्रीपाद कोठे

९ सप्टेंबर २०१५

लंबक

१) सहिष्णुता,

२) सर्वधर्म समभाव,

३) सगळ्यांचा आदर,

४) अल्पसंख्यकांचे हक्क,

कुठे गेले हे सगळे? जैन बांधवांसाठी चार दिवस मांस-मच्छी नाही खाल्ले तर कोणते आभाळ कोसळणार आहे? चार दिवस मांस खायला नाही मिळाले तर काय मरण ओढवणार आहे? खरे तर तसे झाल्यास चांगलेच होईल. पृथ्वीचा भार कमी होईल. एका कबुतराला वाचवण्यासाठी स्वत:चे मांस काढून देणाऱ्या शिबी राजाच्या या देशात चार दिवस मांसाहार करता येणार नाही यासाठी एवढा आक्रोश? शेजारच्या घरी एखादा मृत्यू झाल्यास त्या घरी चूलही पेटू न देता, सगळ्यांची जेवणे करण्याची जबाबदारी घेणारा समाज एवढा `स्व' केंद्रित व्हावा? स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वार्थाने एवढा बरबटून जावा? बाकीच्यांचे काय व्हायचे ते होवो, आम्हाला हवे ते, हवे त्या वेळेला, हवे तसे झालेच पाहिजे !!! कोणते तत्वज्ञान आहे हे? अन यावर कोणीही काहीही बोलू नये? तथाकथित आधुनिक विचारांची अन तत्वांची वगैरे एवढी मानसिक गुलामी? निर्लज्जता या शब्दानेही मान टाकावी एवढी दयनीय अवस्था? या निर्लज्जांना हे ठासून सांगितलेच पाहिजे की, तुमचा बौद्धिक दहशतवाद चालणार नाही. कोणाला आम्ही हिटलर वाटलो तर वाटलो. तुम्ही जर अतिरेक करणार असाल तर लंबक जागेवर आणण्यासाठी आज ना उद्या दुसऱ्या टोकाला ताकद लावावी लागेलच.

बाय द वे- स्वत:च्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी जिवंत प्राण्यांच्या मानेवर सुरी फिरवणाऱ्यांना माणसांच्या मृत्यूवर येताजाता गळे काढण्याचा अधिकार राहावा का? ही सृष्टी तुमच्या बापाची नाही. यच्चयावत जीवजंतु, वनस्पती, माणसे सगळ्यांची आहे.

- श्रीपाद कोठे

९ सप्टेंबर २०१५

मंगळवार, ६ सप्टेंबर, २०२२

थट्टेखोरांसाठी

डॉ. मोहनजी भागवत यांच्या 'भारतातील सगळे हिंदूच' या वक्तव्यावरून आधीही चर्चा झाली होती आणि कालपासून पुन्हा सुरू झाली आहे. या वक्तव्यावर टीका करणारे किंवा त्याची थट्टा करणारे यांनी अनंत काणेकर या प्रसिद्ध मराठी साहित्यिकांचं 'धुक्यातून लाल ताऱ्याकडे' हे छोटंसं पुस्तक वाचावं. १९३६-३७ साली लिहिलेलं हे पुस्तक, रशियातील कम्युनिस्ट क्रांतीचा चमत्कार भाविकपणे पाहण्यासाठी केलेल्या प्रवास वर्णनाचं पुस्तक आहे. काणेकर अजिबात हिंदुत्ववादी नव्हते. डॉ. भागवत यांच्या वक्तव्याच्या अनुषंगाने त्यात काय लिहिलेले आहे ते टीकाकारांनी आणि थट्टेखोरांनी वाचावे. त्यावेळी डॉ. भागवत यांचा जन्मही झाला नव्हता. राजकीय आखाड्यात जे कानावर पडते तेवढेच म्हणजे जगाचे संपूर्ण ज्ञान असे समजणाऱ्या सगळ्यांना कोपरापासून नमस्कार.

(या पुस्तकावरील माझा जुना लेख सापडला तर नक्की शेअर करीन.)

संघाची सहिष्णुता

संघाची असहिष्णूता, विरोधी विचारांची गळचेपी यावर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. सहज काही गोष्टी मनात आल्या. नागपूर हे संघाचे मुख्यालय. काहीही झाले की, नागपुरातून आदेश आहे का? अशी विचारणा होते. याच नागपुरात `तरुण भारत' नावाचे एक दैनिक वृत्तपत्र आहे. ते संघाचे मुखपत्र आहे असे लोक समजतात. त्या दैनिकाने लेखक, विचारवंत म्हणून ज्यांना समाजात मान्यता मिळवून दिली; त्यातील तीन नावे- दिवंगत भा. ल. भोळे, श्री. सुरेश द्वादशीवार, डॉ. भाऊ लोखंडे. हे तिघेही ज्येष्ठ लेखक, विचारवंत पूर्वीही कधी आणि आताही संघाचे दुरान्वयेही समर्थक वा हितचिंतक नव्हते, नाहीत. संघाच्या मुखपत्राने मात्र त्यांचे स्तंभ अथवा अन्य लेखन आवर्जून आणि कधीकधी मागून घेऊन प्रसिद्ध केले. संघाचे तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस `तरुण भारत'चे अध्यक्ष असताना संघाशिवाय अन्य लोकांचे लेख, त्यांच्या बातम्या छापायला हव्यात यासाठी किती आग्रही होते हे सर्वपरिचित आहे. बरे, हा फक्त इतिहास आहे का? तर नाही. आजच्या घडीला संघाला पाण्यात पाहणारी आणि सोशल मीडियावर सतत संघाविरुद्ध आघाडीवर असणारी दोन नावे आहेत- अतुल अच्युतराव सोनक आणि अरुणाताई सबाने. तरुण भारतने यांचेही स्तंभ चालवले आहेत आणि आजही त्यांचे लेखन तरुण भारत प्रसिद्ध करीत असते. एवढेच कशाला, आज तरुण भारतचे संपादक असलेले (नेमके designation मला लक्षात नाही. पण पहिल्या तीनमध्ये असलेले) श्री. श्याम पेठकर हे तर तरुण भारतात कार्यरत आहेत आणि सतत लिहित असतात. ते दुरान्वयानेही संघाचे समर्थक वा हितचिंतक नाहीत. त्यांचे मित्रमंडळ, त्यांची उठबस असलेले लोक, त्यांचे विचार आणि त्यांचे लिखाण सगळ्यांना ठाऊक आहे. ही काही नावे फक्त उदाहरण म्हणून आहेत. या नावांशी माझे कोणतेही शत्रुत्व नाही. उलट, सगळ्यांशी माझे मैत्रीचे संबंध आहेत. याबाबतीत आणखीन एक मी नक्की सांगू शकतो की, संघाचे समर्थक वा हितचिंतक यांना `तरुण भारत'ची ही भूमिका अनेकदा पटत नाही. आवडत नाही. अनेकदा ते त्यामुळे नाराजही असतात. तरीही `तरुण भारत'च्या सुरुवातीपासून अगदी आजच्या क्षणापर्यंत ही भूमिका सतत राखण्यात आली आहे. कमीअधिक प्रमाणात देशभरातील संघप्रेरणेने चालणाऱ्या प्रसार माध्यमात हेच चित्र आहे. संघाच्या मुख्यालयातून काही संदेश जात असेल तर तो हा आहे.

याउलट- १९९७ साली देश स्वातंत्र्याची सुवर्णजयंती साजरी करीत असताना, मी लोकसत्ता दैनिकात वर्षभर लिहिलेल्या, विदर्भातील स्वातंत्र्य संग्रामावरील स्तंभाचा ३६ वा किंवा ३७ वा लेख थांबवण्यात आला होता. कारण काय? तर तो लेख होता, महात्मा गांधी यांनी वर्धेच्या संघ शिबिराला दिलेल्या भेटीवरील. संघाची गांधीविरोधी प्रतिमा रेटायची असेल तर हे करणे भागच ना? मीही भूमिका घेतली- माझा तो लेख छापाल तरच पुढील मालिका चालवायची. त्याला नकार मिळाल्याने ५२ भागांची मालिका मध्येच मी थांबवली. असे वेगवेगळे खूप अनुभव आहेत. खूप व्यक्तिगत होईल म्हणून ते टाळतो. फक्त एक उल्लेख मात्र करतो. दिवंगत नरेंद्र दाभोळकर या भल्या माणसानेही संघ वा हिंदुत्व यावरील माझा लेख प्रसिद्ध करायला मला व्यक्तिश: स्वच्छ आणि स्पष्ट नकार दिला होता.

यावर वेगळे काही म्हणणे आवश्यक आहे?

- श्रीपाद कोठे

नागपूर

७ सप्टेंबर २०१७

सोमवार, ५ सप्टेंबर, २०२२

रुदाली

गौरी लंकेश यांच्या हत्येचे मला दु:ख आहे. मी त्याचा निषेध करतो आणि हे कृत्य करणाऱ्याला लवकरात लवकर कठोर शासन व्हावे, अशीही माझी इच्छा आहे. कोणाला हे प्रामाणिक वाटो की न वाटो. माझी ती भावना आहे आणि विचारपूर्वक बनवलेले मतही. मात्र त्याचवेळी, एकाच श्वासात मला हेही सांगायचे आहे की, या निमित्ताने सार्वजनिक रुदाली करणाऱ्या बहुतांश लोकांवर माझा विश्वास नाही. कारण, याच दक्षिण भारतातल्या केरळ राज्यात संघ स्वयंसेवकांच्या ज्या हत्या झाल्या त्यासाठी तोंड उघडण्याचा प्रांजळपणा मला या रुदालींमध्ये दिसला नाही. `आम्हाला आमच्या प्रामाणिकपणासाठी कोणाच्या certificate ची गरज नाही' असा शहाजोगपणा त्यांनी जरूर करावा. परंतु आपला प्रामाणिकपणा पटवून देण्याची आणि सिद्ध करण्याची त्यांची धमक नाही हे साऱ्या जगाला ठाऊक आहे. कम्युनिस्टांनी केलेल्या राजकीय हत्यांची जाहीर कबुली देणारी अन त्याचे समर्थन करणारी व्यक्ती केरळ मंत्रिमंडळात आजही आहे. यावर शेपूट घालणाऱ्या या रुदालींचाही मी, गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांसोबतच निषेध करतो.

- श्रीपाद कोठे

६ सप्टेंबर २०१८

रविवार, ४ सप्टेंबर, २०२२

महागाई

दारावर नेहमी येणाऱ्या भाजी विक्रेत्याला आज विचारले, आपल्या वस्तीत भाजी व्यवसाय करणारे किती जण असतील? म्हणाला, पुष्कळ आहेत. पण सध्या दहा असतील. भाज्या महागल्याने कमी झाले. भाज्या उतरल्या की वाढतील पुन्हा. त्याच्या उत्तरावरून स्पष्ट आहे की, महागाईने केवळ ग्राहक कमी होत नाहीत तर व्यवसाय करणारे, म्हणजेच रोजगारही कमी होतात. महागाई वाढत जाणे हे अर्थशास्त्राच्या अंगानेही योग्य नसते. दुर्दैवाने महागाई न वाढवणारा अर्थविचार जग आणि तज्ञ म्हणवणारे करत नाहीत.

- वाढू द्या हो महागाई. गरीब बिचाऱ्या शेतकऱ्यालाच चार पैसे मिळतील ना. असा युक्तिवाद करणारे भाबडे असतात असेच म्हटले पाहिजे. भाज्या पाच रुपये, दहा रुपये किलो असण्याचे वास्तव अनेकांच्या गाठीशी असेल. आज भाज्या ८० रुपये किलोला पोहोचल्या आहेत. म्हणजे किमान आठ पट. शेतकऱ्यांचा पैसा आणि जीवनमान, भाजी विक्रेत्यांचा पैसा आणि जीवनमान तसे वाढले आहे का? किती जणांचे वाढले आहे? दलाल ही एकच समस्या आहे का? मुळात ही समस्या आहे की व्यवस्थेतील त्रुटी?

- शेतकऱ्याला पैसा मिळण्याचा विचार करतानाच; भाजी, धान्य, किराणा आदी गोष्टी; समाजातल्या 'आहे रे' आणि 'नाही रे' या दोन्ही वर्गांसाठी असतात; या वास्तवाचा विचारही हवा की नको?

- नीट, सखोल, साधकबाधक विचार न करता वरवर काहीतरी बोलणे, सुचवणे, करणे; असलेल्या नसलेल्या करुणेचे प्रदर्शन; या गोष्टी टाळणे आपल्याला कधी जमणार?

- श्रीपाद कोठे

५ सप्टेंबर २०२०

शनिवार, ३ सप्टेंबर, २०२२

गांधी हत्या, रा. स्व. संघ आणि देवदास गांधी

राहुल गांधी यांनी रा. स्व. संघावर गांधी हत्येचा आरोप केल्याचे प्रकरण सध्या गाजते आहे. ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधीजींची हत्या झाल्यानंतर १५ दिवसांच्या आतच, त्यांचे पुत्र देवदास गांधी यांनी त्या प्रकरणावर एक लेख लिहिला होता. ६ फेब्रुवारी १९४८ रोजी त्यांनी लिहिलेला हा लेख गांधीजींनी सुरु केलेल्या साप्ताहिक हरिजनमध्ये १५ फेब्रुवारी १९४८ च्या अंकात प्रकाशित झाला होता. लेखाचे शीर्षक होते- `i speak as an orphan'. देवदास गांधी हे महात्मा गांधींचे पुत्र तर होतेच, पण हिंदुस्थान टाईम्स या अग्रगण्य दैनिकाचे संपादक सुद्धा होते. त्यांच्या दीर्घ लेखात त्यांनी त्या घटनेचा पुष्कळ आढावा घेतला आहे. तो सगळा मुळातून वाचण्यासारखा आहे. रा. स्व. संघाच्या संदर्भात देवदास गांधी यांनी त्या लेखात काय म्हटले आहे? ते खालीलप्रमाणे-

`the rss was once a movement which evoked my admiration. physical culture, drill, early rising and a disciplined living was its basis when it commenced. but soon adventurers came into the picture. some saw in it personal salvation and political opportunity. deterioration set in. shocking things began to be said by some of the leaders. first in private, then even publicly. at last someone started harbouring the darkest thoughts. but let us not loose our perspective. there are people in the hindu mahasabha and in the rss who would have given their lives to save gandhiji had they known. and this obviously applies to the vast majority of them. there is no more than a handful of individuals who are guilty of this crime. nor should we confuse maharashtra with a few maharashtrians who have lurking accomplices elsewhere. it is said that some of them celebrated the events by eating sweets. that is too comic for words.'

या अतिशय स्पष्ट भूमिकेवर वेगळ्या भाष्याची गरज नाही. त्याच्या अन्वयांबद्दल पुन्हा केव्हा तरी.

- श्रीपाद कोठे

४ सप्टेंबर २०१७

आंधळेपणा

दिवसाची स्थिती वेगळी असते, रात्रीची वेगळी असते. बालकांची स्थिती वेगळी असते, वृद्धांची वेगळी असते. शाळा महाविद्यालयातील स्थिती वेगळी असते, चित्रपटगृहातील वेगळी असते. तशीच विकसित देशातील स्थिती वेगळी असते, अविकसित देशातील स्थिती वेगळी असते. भरपूर जमीन, कमी लोकसंख्या, भरपूर साधने, वेगळा विकासक्रम असलेले देश आणि कमी जमीन, मोठी लोकसंख्या, निराळा विकासक्रम असलेले देश यांची स्थिती वेगळी असते.

हे पुराण लावण्याचे कारण म्हणजे सध्या चर्चेत असलेला वाहन कायदा. मुळात पर्यावरण हा विषय गुंतागुंतीचा. त्यावर नीमहकीम तोडगे असू शकत नाहीत. एकीकडे उद्योगांपासून तर अनेक गोष्टींनी प्रदूषण वाढवायचे आणि पियुसी प्रमाणपत्र नसेल तर मोठा दंड करून प्रदूषण नियंत्रण करण्याचा देखावा करायचा हे योग्य नाही. आज सर्वत्र रस्ते, मेट्रो, रेल्वे, बांधकामे यासारखी कामे सुरू आहेत. त्यांनी प्रचंड प्रदूषण होते. त्याचा दंड कोण भरणार? त्याच्या परिणामांचे काय? दुसरीकडे चप्पल घेण्यासाठीही महिन्याच्या बजेटचा विचार करणाऱ्या सामान्य माणसाला वाहन कायद्याचा धाक दाखवायचा? कष्टाने आपला संसार उभा करणारी व्यक्ती कष्ट थोडे कमी व्हावे यासाठी गाडी घेते त्याला नियम आणि कायद्याच्या फेऱ्यात अडकवणार? बरं त्याच्या घरी दोन चार झाडे असली तर त्याला प्रदूषण कमी केल्याबद्दल काही पैसा देणार का? फटाके फोडून प्रदूषण करणारे आणि फटाके न फोडणारे यांना एकच न्याय लावायचा का? झाडांचा आणि मातीचा पत्ता नसणाऱ्या टोलेजंग सदनिकांमध्ये राहून, एसी आणि गाड्यांनी प्रदूषण वाढवणारे आणि बाकीचे यांना एकच न्याय का? हेल्मेट सारख्या बाबतीत व्यावहारिक विचार हवा की नको? इतके करून सगळे नियम पाळणाऱ्या कोणाला दुर्दैवाने जीव गमवावा लागला तर संबंधित अधिकारी, मंत्री राजीनामे देतील का?

या बाबतीत आणखीन एक कोन असू शकतो. आज भारताला जगाच्या बरोबरीत उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवाय आर्थिक विकासासाठी गुंतवणूक आकर्षित करणे इत्यादी आहेच. तेव्हा त्यांनी तयार केलेले मापदंड, त्यांच्या अपेक्षा, त्यांना हव्या असलेल्या गोष्टी; यानुसार चालणे, निर्णय घेणे, योजना, कायदे इत्यादी करण्याचा एक प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष दबाव असू शकतो का? नक्कीच असू शकतो. परंतु असा दबाव झुगारून देण्यासाठी; याच्यात्याच्याकडे न पाहता स्वतःच्या ताकदीवर, स्वतःच्या पद्धतीने चालण्यासाठी लागणारी शक्ती- युक्ती- बुद्धी- यांचाही लेखाजोखा घ्यायला हवा. ते कठीण आहे हे मात्र खरे.

- श्रीपाद कोठे

४ सप्टेंबर २०१९

शुक्रवार, २ सप्टेंबर, २०२२

माणूस असा असतो?

दिनूकाका गेले. दिनूकाका म्हणजे दिनकरराव जोशी. भारतीय मजदूर संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते. एकाच वेटाळात राहणारे, एकाच शाखेचे स्वयंसेवक, `national organisation of bank workers' (NOBW) या संघटनेत अन पर्यायाने भारतीय मजदूर संघात वडील अन ते दोघेही सक्रिय, दत्तोपंत ठेंगडी ही समान श्रद्धा; या कारणांमुळे दिनकरराव झालेत दिनुकाका. नागपूर शहर विस्तारू लागले आणि `महाल' या नागपुरच्या मूळ वस्तीतील लोक शहराच्या वेगवेगळ्या दिशांना नवीन वस्त्या वसवू लागले. दिनुकाका अन वडील दोघेही याच पद्धतीने `भगवाननगरात' आले. त्यावेळच्या भगवाननगराची आता फक्त कल्पनाच करायची. आजूबाजूला शेते पसरलेली, रस्ते नाहीत, वीज नाही, वाहने वगैरे तर कोणाकडेच नव्हती. वाहन म्हणजे सायकली. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच घरे. पलीकडच्या मानेवाडा गावाच्याही पलीकडे घोगली नदी, जंगल वगैरे. त्या जंगलातील कोल्हे वगैरे प्राणी वस्तीपर्यंत येत असत असे त्यावेळचे जाणकार सांगतात. अशा या वस्तीत स्वाभाविकच सगळ्यांचा सगळ्यांशी घरगुती परिचय. सणवार, हळदीकुंकू अशा निमित्तांनी घरोघरी प्रत्येकाचे जाणेयेणे. त्यातच काही संघाची मंडळी. त्यांनी स्वाभाविकच शाखा सुरु केली. परस्पर संपर्क, सहयोग, आधार आणि परिचय यांना त्याचाही हातभार लागला. गेल्या शतकातील ६० च्या दशकाच्या उत्तरार्धाचा हा काळ. दिनुकाकांना तेव्हापासून पाहिलेले.

सुरुवातीला संघाची भगवाननगर शाखा आजच्या भगवाननगर चौकाच्या शेजारी लागत असे. आजचे शाखेचे स्थान आणीबाणीनंतरचे. तेव्हाच्या शाखेचे मैदान दिनुकाकांच्या घराच्या जवळ. त्यामुळे शाखेसाठी रोज लागणारे ध्वज, ध्वजदंड इत्यादी सामान त्यांच्याच घरी ठेवत असत. त्यामुळे रोज सायंशाखा आटोपल्यावर सगळेजण ते सामान परत ठेवण्याच्या निमित्ताने त्यांच्या घरी जात. तिथे पाणी वगैरे पिऊन मग घरी परतायचे. तासभर खेळ वगैरे झाल्याने तहान लागत असेच. इकडे आम्ही बच्चे कंपनी पाणी पीत असताना तिकडे गोठ्यातल्या गायींना ठेवलेली पाण्याची बादली उचलून ठेवून दिनुकाका सायकलने बाहेर पडत असत, भगवाननगरातून सीताबर्डीवरील NOBW च्या कार्यालयात जायला. हा त्यांचा रोजचा शिरस्ताच होता. सकाळी उठल्यावर प्रभात शाखा, नंतर चार घरी संपर्क करून आंघोळ- पूजा- जेवण करून सायकलने रिझर्व्ह बँकेत नोकरीसाठी जाणे, बँक आटोपल्यावर घरी परतताना घरच्या गायींसाठी कॅरियरवर बांधून चारा घेऊन येणे. घरी आल्यावर हातपाय धुवून गायींना चारापाणी करणे, दूध काढणे, जेवणे, तयार होऊन NOBW च्या कार्यालयात जाणे. रात्री १०-११ वाजता घरी परतणे.

कित्येक वर्षे हा क्रम होता. हळूहळू यात काही बदल झाले. सायकलची प्रथम व्हिकी झाली, मग बजाजची स्कूटर झाली, मग स्कुटी, मग अॅक्तिव्हा; असे बदल झाले. घरच्या गायीही कमी झाल्या, मग संपल्या. दिनुकाका हे त्यांच्या काकांजवळ राहिले. त्यांना सगळे रामभाऊ काका म्हणत. ते नवयुग विद्यालयात शिक्षक होते. त्यांना मुलगा नसल्याने दिनुकाका त्यांच्याजवळ राहिले. दिनुकाका हे रामभाऊ काकांच्या भावाचा मुलगा. रामभाऊ काकांना सात मुली. अन दिनुकाका त्यांचा एकुलता एक भाऊ. मात्र या कौटुंबिक वास्तवाचा कोणाला थांगपत्ताही लागू नये, असा सगळ्यांचा व्यवहार. अकृत्रिम, सहज, आतून आलेला. सगळ्या बहिणींची शिक्षणं, लग्न, संसार, काका-काकूंचा सांभाळ, तब्येती, त्यांचे स्वर्गवास असे सगळे इतक्या सहज, निर्व्याज, हसतमुख पद्धतीने की विचारता सोय नाही.

आणीबाणीच्या काळात रामभाऊ काका नागपूर कारागृहात होते. त्यामुळे पोलिसांची वक्रदृष्टी घरावर होतीच. दिनुकाका संघाचे स्वयंसेवक असल्यामुळे त्यांच्यावर पण जबाबदारी होतीच. भूमिगत पत्रकांचे वितरण, कारागृहातील स्वयंसेवकांच्या कुटुंबांची जबाबदारी, त्या कुटुंबांची आर्थिक मदत- त्यांना धीर देणे- दुखणी- अडचणी- अशा अनेक गोष्टी; शिवाय बैठका वगैरे. हळूहळू दिनुकाकांचे घरचे व्याप आणि जबाबदाऱ्या कमी झाल्या, तशा बाहेरच्या जबाबदाऱ्या वाढत गेल्या. भारतीय मजदूर संघाच्या कामातील त्यांचा सहभाग आणि त्यांच्यावरील जबाबदाऱ्या वाढत गेल्या. प्रथम विविध कामगार संघटना, नंतर भारतीय मजदूर संघाच्या विदर्भ प्रांताची जबाबदारी, मग क्षेत्राची जबाबदारी, मग अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य अशी ती चढती भाजणी होती. संघ आणि संघ परिवाराच्या रचनेनुसार वरचे पद म्हणजे मोठी जबाबदारी, अन मोठी जबाबदारी म्हणजे अधिक काम, अधिक वेळ देणे अन अधिक परिश्रम. त्यामुळेच दिनुकाकांचे वय वाढत होते तसेच परिश्रमसुद्धा. प्रवास, दौरे सतत सुरु असत. पण न थकता, न कुरकुरता, न तक्रार करता हे सगळे सुरु होते. अन हे सगळे करतानाच प्रभात शाखेत जाणेही थांबले नाही. भारतीय मजदूर संघाचे काम करतानाच संघातील सक्रियता भंगली नाही. त्यामुळेच संघ शिक्षा वर्गातही वर्ग कार्यवाह म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. संघाच्या शाखेत जाणे किंवा संघाचा गणवेश घालून घराबाहेर पडणे अतिशय कठीण असल्याच्या काळात अन नवीन, पूर्णत: प्रतिकूल असलेल्या वस्तीत पाय रोवून उभे राहणे सोम्यागोम्याचे काम नाही. संघाच्या सुरुवातीच्या काळात हजारो स्वयंसेवकांनी ते केले आहे. दिनुकाका त्यातीलच.

दिनुकाकांना मुलबाळ नव्हते. पण त्यांच्या व्यवहारात, विचारात, मानसिकतेत त्याचा कुठेही परिणाम जाणवला नाही. कधीही अन कोणालाही. तोंडाने आपल्या अभावांचा, त्रासाचा उच्चार करणे तर त्यांच्या स्वभावातच नव्हते. हा विलोप किती असावा? तर कालच्या त्यांच्या अंत्ययात्रेत डॉ. रामभाऊ तुपकरींनी मला हळूच विचारले- श्रीपाद, दिनूभाऊंना मुलबाळ काय? डॉ. रामभाऊ तुपकरींनी हे विचारणे याला खूप महत्व आहे. ज्याला रामभाऊ तुपकरी माहीत आहेत त्यालाच हे कळेल. संघातील एक अतिशय ज्येष्ठ व्यक्तिमत्व, तरुण भारतचे प्रकाशन करणाऱ्या नरकेसरी प्रकाशनाचे व्यवस्थापकीय संचालक, श्रीराम अर्बन बँकेचे संस्थापक संचालक, विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रथम मेटॅलर्जी विभागाचे प्रमुख आणि नंतर अधिष्ठाता; असे रामभाऊ. संघ आणि परिवारातील अनेक वरिष्ठांशी त्यांचे व्यक्तिगत संबंध. त्यात दिनुकाकाही आलेत. पण दिनुकाकांना मुलबाळ नाही हे त्यांनाही माहीत नव्हते. इतकी विलोपी वृत्ती. हे त्यांच्या व्यवहारातही दिसून येत असे. वयाच्या ८० पर्यंत सुद्धा घरची बिले भरणे आदी कामे ते स्वत: करत. घरातील हवेनको, भाजी-किराणा, औषधपाणी, दुरुस्ती-डागडुजी वगैरे सगळे. घरी येणाऱ्यांचा राबता तर होताच. काकू नेहमीच हसून स्वागत करीत. चहापाणी, खाणेपिणे करीत. पण काकूंचा चहा झाला की, स्वयंपाकघरात जाऊन तो बैठकीच्या खोलीत घेऊन येणे अन आलेल्याला देणे हे दिनुकाका करीत.

वृत्तीची ही सात्विकता नेहमीच अनुभवायला मिळत असे. दोन वर्षांपूर्वी, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवतांचा एक कार्यक्रम भगवाननगरात झाला. कार्यक्रम अगदी घरगुती. नगराचे संघचालक डॉ. रमाकांत कापरे यांच्याकडे जेवण. त्यानिमित्ताने डॉ. कापरेंनी सगळ्या जुन्या, मोहनजींसोबत काम केलेल्या स्वयंसेवकांनाही भोजनाला बोलावले होते. सुरुवातीला एकत्र बसणे, गप्पा वगैरे अन मग भोजन असा कार्यक्रम. गप्पा वगैरे झाल्या. उपलब्ध जागेनुसार भोजनाची व्यवस्था दोन भागात झाली. सरसंघचालक, काही स्वयंसेवक, घरची मंडळी यांची पंगत डॉ. कापरेंकडे झाली, अन त्यांच्याच घरापुढील राचलवार यांच्या घरी बाकी लोकांची व्यवस्था. जेवणे वगैरे झाल्यावर सरसंघचालक थोडा वेळ डॉ. कापरे यांच्याकडे बसले. नंतर कार्यालयात परत गेले. दिनुकाका मात्र त्यावेळी समोरच्या घरी भोजन वगैरे आटोपल्यावर सरसंघचालकांना निरोप देण्यासाठी बाहेर उभे होते. आपण वयाने, अनुभवाने ज्येष्ठ आहोत, आत जाऊन बसलो तर कोण काय म्हणणार आहे? किंवा भोजन करून निघून गेलो तर काय होते? किंवा आपल्याला कोणी बसा वगैरेही म्हटले नाही; असे काहीही त्यांच्या मनाला शिवले सुद्धा नाही. लहान मोठ्या, मान अपमानाच्या कृतक कल्पना त्यांच्या जवळही फटकत नसत.

व्यक्तिगत अनुभवही असाच असायचा. वास्तविक मी म्हणजे त्यांच्यासमोर `पोर'. शेंबूड पुसता येत नव्हता तेव्हापासून त्यांनी मला पाहिलेले. पण मोठा झालो, पत्रकारितेत आलो, त्यामुळे थोडीबहुत ओळख निर्माण झाली, थोडे लिहू बोलू लागलो; त्यानंतर त्यांच्या वागण्यात बदल झाला. बोलताना एकेरी बोलत असले तरीही `पोर' म्हणून न वागता सन्मान राहत असे. आपल्यालाच ते बरं वाटत नसे. पण त्यांनी सहजपणे तो बदल केला. असा बदल करणे सोपे नसते. मनाचे उमदेपण आणि मोठेपण त्यासाठी हवे. एकदा स्व. दत्तोपंत ठेंगडी त्यांच्याकडे मुक्कामाला होते. त्यांनी मला भेटायला बोलावले. त्या भेटीच्या वेळीही त्यांचा हा विलोपीपणा पाहायला मिळाला. स्व. दत्तोपंत आणि मी जवळपास तीनेक तास बोलत होतो. काकूंच्या हातचा इडलीसांबार अन चहाचा आस्वाद घेत आमचे बोलणे सुरु होते. पण दिनुकाका तेथे येऊनही बसले नाहीत. ते माझ्यापेक्षा वयाने तर मोठे होतेच, भारतीय मजदूर संघात मोठे पदाधिकारी होते, त्यांचेच घर होते; ते आले असते, बसले असते, बोलले असते तर त्यात वावगे काहीच नव्हते. पण पंतांनी मला बोलावले होते अन आम्ही बोलत होतो, तेव्हा बाजूला राहण्यात त्यांना कसलाही अनमान वाटला नाही.

निरपेक्ष आत्मीयता हाही दिनुकाकांचा विशेष. त्यातून गोष्टीवेल्हाळ. जो दिसेल त्याच्याशी बोलणार, त्याची विचारपूस करणार, कोणी कधीही गेला तरी त्याला उपलब्ध असणार, त्याच्यासाठी वेळ देणार. म्हणूनच वस्तीत असो वा भारतीय मजदूर संघात त्यांचा लोकसंपर्क अन लोकसंग्रह अफाट होता. शाखेत येणारे स्वयंसेवक, त्यांचे घरचे लोक यांच्याशी तर त्यांचा संबंध होताच; पण शाखेत कधीही न येणाऱ्यांशीही त्यांचे जातायेता अनौपचारिक बोलणे, विचारपूस राहत असे. या लोकसंग्रहात उच्च जातींचे समजले जाणारे, खालच्या जातींचे समजले जाणारे, दलित, आदिवासी, मुसलमान, ख्रिश्चन, महिला असे सगळेच होते. अशा प्रकारच्या संबंधांचे अनेक हृद्य अनुभव त्यांच्या संग्रही होते. ते किस्से बरेचदा ऐकायलाही मिळत असत. गेली काही वर्षे त्यांच्या पायांनी त्यांच्याशी असहकार केला होता. दहापंधरा मिनिटे उभे राहणेही कठीण होत असे. पण फिरणे, गाडी चालवणे, प्रवास, संपर्क हे सारे सुरूच होते. कामाच्या निमित्ताने देशभर फिरून झाले होते. कामगार संघटनेचे काम केल्याने उद्योगपती, मालक, सरकार अशांशी देखील परिचय होता. विविध भाषा बोलत असत. सहज बोलताना मराठीवरून कधी हिंदीवर, तर कधी इंग्रजीवर जात असत. अन ते देखील धाराप्रवाही.

२३ ऑगस्टला त्यांनी घरी सत्यनारायण पूजा ठरवली होती. श्रावण मासानिमित्त. त्यासाठी सोवळे नेसून तयार असतानाच ते खाली पडले. लगेच दवाखान्यात भरती करण्यात आले. मेंदूतील रक्तस्रावाने ते कोसळले होते. त्याचेच रुपांतर अंग लुळे पडण्यात झाले. त्याउपरही उपचारांना प्रतिसाद देत होते. पण परवा, १ सप्टेंबरला संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आला अन त्यांची प्राणज्योत मालवली. १२ ऑगस्ट रोजी त्यांनी वयाची ८० वर्षे पूर्ण केली होती. एक कृतार्थ आणि सुदीर्घ आयुष्य जगून दिनुकाका गेले.

स्वत:साठी काही न मागता, कशासाठीही कुरकुर वा तक्रार न करता, अभावांचा वा कष्टाचा बाऊ न करता, आपला विचार कमी आणि बाकीच्यांचा विचार जास्त; असे जगता येते का? माणसे अशी जगतात का? असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याचे उत्तर `होय' असे आहे. दिनुकाका हे त्याचे उदाहरण आहे. त्यांच्यासारखी माणसे पाहायला, अनुभवायला मिळतात तेव्हा; साधेपणा, माणुसकी, आत्मविलोपी वृत्ती, कष्ट, निर्वैर या केवळ बोलण्याच्या गोष्टी नाहीत, जगण्याच्या गोष्टी आहेत यावर अविश्वास ठेवण्याचे कारण उरत नाही.

- श्रीपाद कोठे

नागपूर

गुरुवार, ३ सप्टेंबर २०१५

Secularism

secularism ही कल्पनाच मुळात भुक्कड आहे. सत्ताकांक्षा हे त्याचे मूळ आहे. राजा श्रेष्ठ की उपासना पंथ श्रेष्ठ? सत्ता कोणाची चालावी? या वादातून secularism चा जन्म झाला. त्यातून धर्म (वास्तविक उपासना पंथ) व राज्यव्यवस्था वेगळे असा प्रवाह निर्माण झाला. भारतेतर उपासना पंथ हे वास्तविक उपासना पंथ कमी आणि ईश्वराच्या नावाने राजकारण करणारे गट अधिक आहेत. त्यांची तुलना भारतीय उपासना पंथांशी होऊ शकत नाही. भारतातील ईश्वर मानणारे किंवा ईश्वर न मानणारे पंथ संप्रदाय सुद्धा या ऐहिक अस्तित्वाला शेवटचे टोक मानत नाहीत. शिवाय सत्ताकांक्षा हे त्यांच्या तत्वात कुठेही बसत नाही. त्याग, संयम, अपरिग्रह इत्यादी त्यांची वैशिष्ट्ये आणि शिकवण आहे. अन येथील समाजाच्या अंगोपांगात ती एवढी भिनली आहे की, येथील उत्तुंग कर्तृत्वाचे राजेदेखील सत्ता ही स्वत:ची खाजगी जहागीर तर मानत नाहीतच, उलट त्याचा त्याग करून तपश्चर्येला निघून जातात. राजा रन्तिदेव असो, राजा जनक असो, सम्राट चंद्रगुप्त वा अशोक असो, छत्रपती शिवाजी असोत, हरिहर बुक्कराय असोत, की आणखीन अनेक. त्याग आणि तपश्चर्येचा आदर्श त्यांनी जगून दाखवला आहे. त्यामुळेच `धर्म' या सर्वव्यापी कल्पनेचे तर सोडाच, उपासना पंथ या अर्थानेही राज्य व धर्म वेगळे करण्याची चर्चा भारतात अनाठायी आहे. विश्वनिर्मात्याने सगळी अक्कल भारताबाहेरच वाटली आहे या भ्रामक समजातून बाहेर येणे गरजेचे आहे. हे न समजल्यामुळेच, राजकारण आणि धर्म वेगळे करण्याची चर्चा केली जाते. त्याच्या परिणामी दिवा अथवा समई पेटवणे, कार्यालयात देवादिकांचे फोटो लावणे, सरस्वती वंदना आदी गोष्टींवर वाद होतो. त्या बंद केल्या जातात. सत्ताकांक्षेचा स्वाभाविक परिणाम असतो- हे की हे? this or this? जीवनाकांक्षेचा स्वाभाविक परिणाम असतो- हे आणि हे. this and this. or आणि and यातील फरक नीट समजून घेतला तर भुक्कडपणातून सुटका होऊ शकते. मानवी जीवनासाठी (व्यक्तिगत आणि सामाजिक) राजकारण आणि धर्म दोन्हीची गरज होती, आहे, राहील. त्यामुळे दोहोत कुरघोडीची स्पर्धा आणि संघर्ष असणे, निर्माण करणे, कल्पिणे, समजणे; हे सगळेच बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. दोन्हीपैकी एकही वरचढ नसून, परस्परपूरक आहेत. राजकारण आणि धर्म (उपासना पंथ या अर्थाने सुद्धा) दोन्हीने समन्वयाने, हातात हात घेऊन चालणे, हाच भारतीय आदर्श आणि सिद्धांत होऊ शकतो.

- श्रीपाद कोठे

नागपूर

रविवार, ३ सप्टेंबर २०१७

शनिवार, २७ ऑगस्ट, २०२२

भांडायला कारणे हवीत

बाबासाहेब पुरंदरे प्रकरणाचे वादळ आले अन गेले. विरोध करणाऱ्यांनाही समाधान वाटले, आपण सामाजिक- ऐतिहासिक विषय लावून धरले याचे. अन सरकारला समाधान वाटले ठरल्याप्रमाणे पुरस्कार देण्याचे. बाबासाहेबांना पाठींबा देणाऱ्यांना समाधान वाटले विजयाचे. त्यावेळी बोलायचा एक मुद्दा बोललो नव्हतो. मुद्दाम. कारण त्या गदारोळात कोणी त्याकडे शांतपणे अन गांभीर्याने पाहिले नसते. तो मुद्दा म्हणजे, प्रमाणीकरणाचा. इतिहास म्हटला म्हणजे पुरावे, प्रमाण आले. बरे दिलेले पुरावे सबळ आहेत की कच्चे वगैरे प्रश्न आहेतच. सहज एक वाटलं, आजचा एखादा संदर्भ घेऊन याचा विचार करून पाहावा.

संदर्भ म्हणून लोकसभा आठवली. नुकतेच संसदेचे पावसाळी अधिवेशन झाले. रोजच कामकाजात व्यत्यय येत होता. ललितगेट प्रकरण तापवले जात होते. अखेर एक दिवस चर्चा झाली. त्यात विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे बोलत असताना भाजपच्या एका सदस्याने सोनिया गांधींच्या बहिणीचे नाव घेतले. त्यावरून कॉंग्रेसचे सदस्य संतापले. खडगे तर `यू शट अप' म्हणाले. सोनिया संतापल्या. सभापतींसमोर येऊन घोषणा देऊ लागल्या. सगळ्या जगाने हे live पाहिले.

शे-दोनशे-पाचशे वर्षांनी जेव्हा भारतीय संसदेच्या इतिहासाची चर्चा होईल तेव्हा काय होऊ शकेल? पुरावे तपासले जातील. सगळ्यात सबळ पुरावा- सभागृहातील नोंदी. दुय्यम पुरावा- इलेक्ट्रोनिक वा मुद्रित प्रसार माध्यमे. कच्चा पुरावा- लोकांमधील चर्चा, किंवदंती, दंतकथा. सभागृहातील नोंदींमध्ये तर काहीच राहणार नाही. कारण तो भाग काढून टाकावा असेच अध्यक्षांचे आदेश होते. रोज सभागृह तहकूब होताना तर केवळ `सभागृह अमुक वेळेपर्यंत तहकूब करण्यात येत आहे,' एवढेच सांगितले आणि नोंदवले जाते. कारण नसतेच. मग पाचशे वर्षांनी चर्चा झडतील की, सभागृह तहकूब झाले कशावरून? सोनियांच्या बहिणीबद्दल टिप्पणी केली कशावरून? सोनियांनी घोषणा दिल्या कशावरून? यासाठी असलेले पुरावे दुय्यम, तिय्यम आहेत. त्यावर विश्वास ठेवता यात नाही. ते प्रमाण नाहीत. याचा अर्थ या गोष्टी झाल्याच नाहीत, असा होईल का? प्रमाणीकरण हे असे असते. खूप साऱ्या घटना आणि खूप सारे तपशील घेऊन चर्वितचर्वण करता येईल. मात्र त्याचा लघुत्तम साधारण विभाजक उर्फ लसावि उर्फ आशय उर्फ निष्कर्ष हाच काढावा लागेल की, प्रमाणीकरण असेच असते. प्रमाणीकरण आणि सत्यता या वेगवेगळ्या गोष्टी असतात.

प्रमाणीकरण ही मुळातच अपुरी, अयोग्य बाब आहे. ती ताणली जाते तेव्हा तर ती त्याज्यच ठरवायला हवी. सगळ्या प्रकारचे, पुन्हा म्हणतो- सगळ्या प्रकारचे प्रमाणीकरण; ही सामूहिक गुन्हेगारी आहे. विशिष्ट स्वार्थाच्या पूर्तीच्या प्रयत्नांचा तो भाग असतो. भेसळीचे वा शव विच्छेदनाचे अहवाल असोत की, गुणवत्तेसाठीची विविध प्रमाणपत्रे असोत. `नेसले'ला काय प्रमाणपत्र नव्हते का? किंवा सोन्याच्या शुद्धतेसाठी प्रमाणीकरण असूनही त्यात घोटाळे होत नाहीत का? उलट गावचा सोनार अधिक प्रामाणिक होता.

वर्तमान गोष्टींच्या प्रमाणीकरणाची ही तऱ्हा असते तर इतिहासाबद्दल तर बोलायलाच नको. तरीही आपल्याला प्रमाणे हवी असतात. कशासाठी? आम्हाला फक्त भांडायला कारणे हवी असतात बहुतेक.

- श्रीपाद कोठे

२८ ऑगस्ट २०१५

शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२

खूप जणांना न पटणारं :

- एखादा ब्राम्हण चुकीचं वागला तर सगळे ब्राम्हण वाईट.

- एखादा पुरुष चुकीचं वागला तर सगळे पुरुष वाईट,

- एखादी स्त्री चुकीचं वागली तर सगळ्या स्त्रिया वाईट,

- एखाद्या देशाच्या प्रमुखाने चुकीचं वक्तव्य केलं तर तो देशच वाईट,

- एखाद्या शीख व्यक्तीने इंदिराजींची हत्या केली तर सगळे शीख वाईट,

- एखाद्या मराठी माणसाने गांधीजींची हत्या केली तर सगळी मराठी माणसे वाईट,

- काही मुसलमान आतंकी असतात म्हणून सगळे मुसलमान अतिरेकी,

एखाद्या कृतीसाठी एखादी जात, एखादा पंथ, एखादा देश, एखादी भाषा, एखादी संघटना; यांना घाऊक दोषी ठरवणे... गुण किंवा अवगुण यांचं समूहिकरण हे मुळातच चुकीचं आणि अपक्व बुद्धीचं लक्षण. इंग्रजी आमदनी पासून आमची विचारपद्धती बिघडवण्यात आली अन आम्हीही त्याला प्रतिसाद दिला. अगदी मुस्लिम समस्येलाही हे लागू होते.

*********

सध्या अफगाणिस्थानच्या निमित्ताने बरीच चर्चा सुरू आहे. त्यातील discourse देखील मोठ्या प्रमाणात मुस्लिम असा आहे. हे चूक आहे. अफगाणिस्थानात आतंक निर्माण करणारे मुस्लिम आहेत आणि त्यात होरपळणारेही मुस्लिम आहेत. अनेक मुस्लिम देश तालिबानला साथ देण्याला तयार नाहीत. आपल्या देशातही हळूहळू तालिबान अमान्य करणारे मुस्लिम स्वर ऐकू येऊ लागले आहेत. मुस्लिमेतर लोकांसोबतच खुद्द मुसलमानांनाही विचार करायला लावणारी सध्याची परिस्थिती आहे. अशा वेळी चर्चा योग्य वळणावर जाईल याची दक्षता घ्यायला हवी.

कोणते असेल ते योग्य वळण? मुस्लिम समाजाचे परिवर्तन हे ते योग्य वळण असेल. तालिबान म्हणजे जागतिक मुस्लिम समुदाय असं समीकरण योग्य म्हणता येणार नाही. मुसलमान समाजाची कट्टरता, त्या कट्टरतेचा गैरफायदा घेणाऱ्या मुस्लिमांमधील आणि मुस्लिमांबाहेरील शक्ती; हे वास्तव नाकारण्यात अर्थ नाही. मात्र सोबतच मुस्लिम समाजातील कट्टर नसलेल्या शक्तीही आहेत हेही नाकारून चालणार नाही.

मुस्लिम राष्ट्रीय मंच असो, मुस्लिम सत्यशोधक समाज असो, बिराजदार यांच्यासारखे मुस्लिम संस्कृत पंडित असो, हिंदू ग्रंथांचे भाषांतर करणारे पारेख असोत, स्व. ए. पी.जे. अब्दुल कलाम, शिवभक्त डागर बंधू असोत, संगीत क्षेत्रातील राशीद खान किंवा झाकीर हुसेन असोत... अशी थोडीबहुत मंडळी तर आहेतच. शिवाय मुस्लिम देशात कट्टरता बाजूस सारणाऱ्या थोड्याबहुत शक्तीही आहेतच. अनेक मुस्लिम देशांच्या महिला खेळाडू जागतिक स्पर्धांमध्ये मोकळेपणाने खेळत असतात.  पाक कॉफी हाऊस नावाच्या वेबसाईटवर पाकिस्तानातीलच अनेक लोक कट्टरतेच्या विरुद्ध लिहीत असतात. अयोध्येतील राम मंदिराच्या वेळी किंवा तीन तलाक प्रकरणी समजूतदार भूमिका घेणारे मुस्लिम होतेच. हे सगळे मुस्लिमांचे प्रतिनिधी व्हायला हवेत. ते आपोआप होणार नाहीत. त्यासाठी मुस्लिम समुदायाने प्रयत्न करणे जसे आवश्यक आहे तसेच मुस्लिमेतर लोकांनीही या परिवर्तनशील मुस्लिम लोकांची चर्चा केली पाहिजे, दखल घेतली पाहिजे, त्यांच्या प्रतिमा निर्माण केल्या पाहिजेत. कोळसा उगाळून काय होणार? अन किती उगाळायचा? जे व्हायला हवे असे वाटते त्यालाही चालना द्यायला हवीच ना? मुस्लिमेतरांच्या बोलण्यातून मुस्लिमांनाही जाणीव व्हायला हवी की, कट्टर नसलेलेही मुसलमान आहेत/ असतात आणि त्यांना स्वीकार्यता असते. कट्टरतेला स्वीकार्यता नसते हे बहुसंख्य समाजाच्या लक्षात यायला हवे.

याचा अर्थ हिंदू, बौद्ध वा अन्य समुदायांनी भोळसट राहावे अस नाही. सावधगिरी, तत्परता, चुकीच्या गोष्टींचा प्रतिकार करण्याची सिद्धता; हे सगळे हवेच. परंतु एकमेकांचा गळा घोटण्याच्या वृत्तीने काहीही साध्य होत नाही, याचं realization होण्यासाठी आवश्यक असा अवकाश आणि असा discourse याही आवश्यक बाबी. अन ही मुस्लिम आणि मुस्लिमेतर दोघांचीही जबाबदारी ठरते. घाऊक विचार न करता 'माझी जबाबदारी' असा विचार करायला हवा. शेवटी 'तू असा, तू तसा' असं करून साध्य तर काही होणार नाहीच ना?

- श्रीपाद कोठे

२७ ऑगस्ट २०२१