सोमवार, २३ जून, २०१४

बायकोशी बोलल्याचे पैसे

तपशील खुपसा लक्षात नाही. पण एक किस्सा पक्का लक्षात आहे. एका मराठी वाहिनीवरील हास्यसम्राट नावाच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमात एका वऱ्हाडी कवीने सांगितला होता. एक माणूस नवीन नवीन लग्न झालेला मधुचंद्राला जातो. चार दिवस हॉटेलमध्ये मुक्काम करून मौजमजा करतो. घरी परतण्याचा दिवस येतो. हॉटेल सोडण्याची तयारी सुरु असते. हॉटेलचा व्यवस्थापक बिल देतो. माणूस चक्रावून जातो. एवढे बिल? तो व्यवस्थापकाला म्हणतो, हा हिशेब समजावून सांगा. व्यवस्थापक समजावून सांगतो. अमक्याचे इतके, तमक्याचे इतके वगैरे. तो माणूस म्हणतो, अरे पण अमुक चार गोष्टी तर आम्ही घेतल्याच नाहीत. (उदा. सकाळचे जेवण) त्यावर व्यवस्थापक म्हणतो, तुम्ही या सोयी घेतल्या नाहीत, सकाळचे जेवण घेतले नाहीत, पण आम्ही तर ते देऊ केले होते ना !! माणूस काहीच बोलू शकत नाही. व्यवस्थापक खोलीतून निघून जातो. दोघे नवरा बायको सामान घेऊन काउंटरवर येतात. माणूस व्यवस्थापकाजवळ जातो आणि त्याला म्हणतो, द्या हजार रुपये. व्यवस्थापक गोंधळात पडतो. विचारतो, कसचे? माणूस त्याला म्हणतो, अहो चार दिवस रोज संध्याकाळी दोन तास तुम्ही माझ्या बायकोशी गप्पा मारत बसलात ना, त्याचे. तुमच्या बिलाचे पैसे त्यातून वजा करून एक हजार उरतात ते परत द्या. व्यवस्थापक उसळतो. म्हणतो, मी कधी बोललो तुझ्या बायकोशी? माणूस उत्तरतो- अहो साहेब, तुम्ही नसाल बोलला पण ती तर तयार होऊन बसली होती ना तुमच्याशी बोलायला.

असाच दुसरा एक किस्सा घर घेण्याच्या संदर्भात झी मराठीवर सध्या सुरु असलेल्या फू बाई फू मध्ये सादर करण्यात आला होता. हे किस्से आठवावेत असंच सध्या वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी नागपूर-पुणे बसच्या भाड्याचा विषय होता गप्पांचा. तेव्हा कळले की, तिकीट का वाढवले तर पिण्याच्या पाण्याचे वगैरे पैसे त्यातच लावलेले असतात आणि पाणी नको असेल तर? या माझ्या बावळट प्रश्नावर उत्तर होते, नाही ते द्यावेच लागतील. भ्रमणध्वनीचं उपकरण विकत घ्यायचं आहे, तर या १० सोयी असलेलंच घ्यावं लागेल. तुम्हाला त्या सोयी हव्या असोत की नसोत, तुम्हाला त्या घेण्याशिवाय पर्याय नाही.

सुधारणा, सोयीसुविधा, विकास वगैरेची आज ही अवस्था आहे. सध्या गाजत असलेल्या रेल्वे भाडेवाढीच्या संदर्भात हा विषय पुन्हा डोक्यात आला. चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी भाववाढ करण्यात आली, असा जोरकस युक्तिवाद करण्यात येत आहे. सगळ्यात पहिला प्रश्न हा की, म्हणजे नेमके काय? त्यासाठी एक शब्द वापरला जातो, जागतिक दर्जाची स्थानके. जागतिक दर्जाची स्थानके कोणाला हवी आहेत? अमेठीत स्मृती इराणी यांच्या प्रचार सभेत बोलताना मोदी त्यांच्या खास शैलीत लोकांना म्हणाले होते, `तुम्हाला काय मर्सिडीज मोटारी हव्यात? तुम्ही काय अमुक मागता/ तुम्ही काय तमुक मागता?' आणि त्यावर स्वत:च उत्तर देताना ते म्हणाले होते- `नाही. तुम्ही मागता फक्त पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता, आरोग्य.' रेल्वेच्या बाबतीतही तेच खरे आहे. कोट्यवधी लोकांची मागणी एवढीच आहे की- गाड्या वेळेवर धावाव्या, पाणी उपलब्ध असावे, स्वच्छता असावी, आरक्षण फार त्रासदायक नसावे, बसायला, थांबायला पुरेशी सोय असावी. उगाच सगळी स्थानके एसी वगैरे करायची, टाइल्स तोडून मार्बल बसवायचे याची गरज नाही. सगळ्या गाड्या एसी, प्रत्येक डब्यात टीव्ही, इंटरनेट, अमुक- ढमुक वगैरेची काहीही आवश्यकता नाही. मुळात सार्वजनिक ठिकाणे, सार्वजनिक सोयी सुविधा, सार्वजनिक व्यवस्था सामान्य परंतु दर्जेदार असाव्यात. अनेकांना त्या परवडू शकतील, पण अनेकांना त्या परवडणार नाहीत. अनेकांना त्या परवडत असूनही नको असतील. त्यामुळे सोयी सुविधांचे हे गाजर दाखवणे बंद झाले पाहिजे. जे लोक प्रवासभर टीव्ही पाहिल्याशिवाय वा इंटरनेटशिवाय जगू शकत नाहीत त्यांनी स्वत:ची सोय करून घ्यावी. जबरदस्तीने लादणे पूर्णत: अयोग्य आणि अन्याय्य आहे. ग्राहक संघटनांनीही याविषयी सक्रिय व्हायला हवे.

स्वच्छता वगैरे मुद्दे तर असे आहेत की अर्धेअधिक प्रश्न लोकांशी, त्यांच्या सवयींशी, जबाबदारीच्या भावनेशी संबंधित आहेत. सुरक्षेचा मुद्दाही असाच. आजच प्रवीण दीक्षित यांचे एक वक्तव्य वाचण्यात आले. सध्या ते महाराष्ट्राचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख आहेत. पूर्वी ते नागपूरचे पोलिस आयुक्त होते. त्यावेळी त्यांच्याशी चर्चेचा योग आला होता. आजचे त्यांचे वक्तव्य आणि त्यावेळी चर्चेत त्यांनी व्यक्त केलेले मत सारखे आहे. त्यांचे मत असे की, सुरक्षेसाठी लोकसहभाग आणि लोकभावना महत्वाची. ती नसेल तर बाकी कितीही उपाययोजना करा, सीसी टीव्ही, कमेरे लावा फारसे काहीही होणार नाही. लोक जर प्रवास करताना एकमेकांशी बोलायलाही महाग असतील, कोणाची बॅग चोरीला गेली तर मला काय त्याचे अशी वृत्ती असेल किंवा उघडपणे डब्यात बलात्कार होताना पाहूनही त्याकडे डोळेझाक करत असतील तर त्यांची सुरक्षा प्रत्यक्ष ब्रम्हदेव सुद्धा करू शकणार नाहीत. या सगळ्या गोष्टी खूप गुंतागुंतीच्या आणि वेगळ्या पद्धतीने हाताळण्याच्या आहेत. केवळ निधी हवा, निधी हवा असे म्हणून भागणार नाही.

रेल्वे स्थानके जागतिक दर्जाची करण्याचा प्रयत्न योग्य की अयोग्य हा मुद्दा क्षणभर बाजूला ठेवला तरीही प्रश्न उरतोच की, अशा तऱ्हेने तो दर्जा प्राप्त करता येईल का? ही गोष्ट निर्विवाद सत्य आहे की, ६० वर्षांच्या शासनकाळात या देशातील सरकारे अक्षम्य बेपर्वाईने वागली. पण म्हणून बिघडलेले सारे काही सहा महिन्यात सुरळीत होईल का? शिवाय असंख्य अशा गोष्टी आहेत ज्यासाठी पैशाची नव्हे तर मानसिकता, इच्छाशक्ती, विचारशीलता, सवयी, अभ्यास, निर्धार, मूल्यांशी बांधिलकी, आदर्श उदाहरणे यांची गरज आहे. रेल्वे स्थानके चांगली करण्यासाठी पैशाची गरज आहे हे नक्की. पण आजवर त्यासाठी जो पैसा देण्यात आला त्याचे काय झाले? तो कोणीतरी खाल्ला, उधळला, वाया घालवला म्हणून आज भुर्दंड भरा - हा तर्क होऊ शकत नाही. सामान्य लोकांनी जे प्रचंड बहुमताने भाजपला निवडून दिले, त्यातील एक महत्वाचे कारण आहे, या सरकारने आजवर झालेला अपहार वसूल करावा आणि ज्यांनी तो केला त्यांना अद्दल घडवावी. याऐवजी ज्याचा या अपहाराशी फारसा संबंध नाही त्यालाच वेठीस धरणे चुकीचे आहे. भारताबाहेरील काळा पैसा, वैधपणे परंतु अनैतिकपणे कमावलेली लाखो कोटींची संपत्ती या बाबी थोडावेळ दूर ठेवू. तरीही आज देशभरातील सगळ्या बँकांमधील सगळे लॉकर्स सील करून त्यातील अवैध संपत्ती सरकारजमा केली तरीही हजारो कोटी रुपये उभे राहतील. रेल्वे दरवाढ हा जर कटू निर्णय असेल तर हे अन्य पर्याय देखील कटूच आहेत. आज गरज आणि अपेक्षा अशा वेगळ्या कटू निर्णयांची आहे. भाकरीची चोरी हीदेखील चोरीच असते आणि सोन्याची चोरी हीदेखील चोरीच असते. परंतु भाकरीची चोरी माफच करायला हवी. कारण ती अस्तित्वाच्या अपरिहार्यतेतून करण्यात आलेली असते. सोन्याची चोरी ही चोरीच्या वृत्तीतून करण्यात आलेली असते. तसे जर नाही केले तर एका संस्कृत सुभाषितात म्हटल्याप्रमाणे, घोडा, वाघ, हत्ती यांना घाबरून शेळीचा बळी दिल्याप्रमाणे होईल. असा बळी देणे कदाचित नैसर्गिक असेल, पण सभ्यतेला धरून नक्कीच नाही.

लोक आज दारू, सिगारेट, चपला- जोडे, मोबाईल, सिनेमा यावर किती खर्च करतात; मग दरवाढीला विरोध का असाही युक्तिवाद केला जातो. त्यावर तर्क असा की, मग या गोष्टींचे दर आणि त्यावरील कर वाढवा ना. त्याला कोणाचा आक्षेप आहे? करा म्हणावे ज्यांना आणि जेवढा खर्च करायचा असेल तो. सरकारी तिजोरीत भर पडेल. केंद्र सरकारचे आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी तर तसा प्रस्तावही दिला आहे. दारूची किंमत दुपटीने वाढवा अशी त्यांची सूचना आहे. धान्य साठवण्याची गोदामे वगैरे बनवण्यासाठी भाजपचेच अश्विनीकुमार यांनी अनेक सूचना केल्या होत्या. मनमोहन सिंग सरकार असताना राज्यसभेत महागाईवर झालेल्या चर्चेत, काहीही अतिरिक्त पैसा खर्च न करता, लोकसहभागातून सध्या आहे त्याच स्थितीत धान्य साठवण्याची व्यवस्था कशी करता येईल याचे सुंदर विवेचन त्यांनी केले होते. अशा लोकांचे काँग्रेसने न ऐकणे समजता येईल, पण भाजपनेही आपल्या लोकांचे ऐकू नये, समजून घेऊ नये?

सरकार नवीन आहे, हेतू चांगले आणि स्वच्छ आहेत. वेळ दिला पाहिजे हेही खरे. मात्र देशाचे, समाजाचे भले करायचे आहे याच्या अति उत्साहात विवेक सुटू नये एवढेच.

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, २३ जून २०१४

शनिवार, २१ जून, २०१४

आत्मविलोपी

महापुरुषांची अखेरसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण असलेली अनेकदा पाहायला मिळते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार हेदेखील त्याला अपवाद नाहीत. २१ जून १९४० रोजी त्यांनी इहलोकीचा निरोप घेतला. त्या दिवशी तिथी होती, ज्येष्ठ कृष्ण द्वितीया. वय होते अवघे ५१ वर्षे. धिप्पाड आखाड्यात कसलेला देह त्यांनी अक्षरश: चंदनासारखा झिजवला.

त्यांच्या प्रकृतीची ओळख होण्यासाठी एक उदाहरण पुरेसे आहे. ते वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी कोलकाता येथे असतानाचा प्रसंग. सुरुवातीचे दिवस होते. खानावळवाला नियमितपणे डबे पाठवीत असे. काही दिवसांनी डॉक्टरांनी त्याला सांगितले की, तो पाठवतो तेवढा डबा त्यांना पुरत नाही. डबा जास्त पाठवावा. खानावळवाल्याला शंका आली की, अशी तक्रारवजा मागणी तर अन्य कुणाचीही नाही. न जाणो, दोघांचा डबा एकासाठी मागवून दोघे जेवतील. पैसे वाचवण्यासाठी विद्यार्थी असे करू शकतात. तेव्हा खानावळवाल्याने अट घातली की, तू येथे तेवढे जेवून दाखव तरच तुला जास्त डबा पाठवीत जाईन. डॉक्टरांनी अट मान्य केली व पूर्ण केली. तेव्हापासून त्यांना जास्त डबा मिळू लागला. असा हा देह अखेरच्या दिवसात जर्जर झाला होता. १९२५ च्या विजयादशमीला संघाची स्थापना केल्यानंतर त्या कार्यासाठी केलेली प्रचंड मेहनत, अखंड धावपळ, देहाचे संवर्धन- संरक्षण- पोषण- याविषयीची कमाल अनास्था; यामुळे त्यांचा वज्रासारखा देह आतून पोखरत गेला. शिवाय डोक्याला असलेल्या विवंचना वेगळ्याच.

त्यांच्या अगदी अखेरच्या दिवसात ते नागपूरचे तेव्हाचे संघचालक श्रीमंत बाबासाहेब घटाटे यांच्या सिव्हिल लाईन्सच्या बंगल्यातच वास्तव्याला होते. तेथेच त्यांच्यावर पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याला लंबर पंक्चर म्हणतात. या शस्त्रक्रियेत पाठीतून थेंब थेंब असे पाणी निघते. डॉ. हेडगेवार यांच्यावर ही शस्त्रक्रिया झाली तेव्हा मात्र पाठीतून पाण्याची धार निघाली होती. `रक्ताचे पाणी करणे' या वाक्प्रचाराचा जणू प्रत्ययच त्यावेळी आला होता. असे असतानाही मनात मात्र फक्त संघाचाच विचार होता. आपल्या स्वीकृत कार्याशी एवढी तद्रूपता क्वचितच पाहायला मिळते. या आजारातच नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांना भेटायला आले होते. पण त्यावेळी डॉक्टर झोपले असल्याने त्या दोघांची भेट होऊ शकली नाही. झोपेतही ते देशाचे स्वातंत्र्य आणि संघाचे काम याबद्दलच बोलत असत. दुसऱ्या कोणत्याही विषयाला त्यांच्या हृदयात स्थान नव्हते.

एवढे आजारी असूनही आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी हालचालीला बंदी केली असूनही, नागपूरला सुरु असलेल्या संघ शिक्षा वर्गात ते समारोपाला गेले होते. संघ शिक्षा वर्गाच्या समारोपाचे दोन भाग असतात, एक जाहीर समारोप आणि दुसरा फक्त सहभागी स्वयंसेवकांसाठी खाजगी समारोप. हट्ट केल्यामुळे डॉ. हेडगेवार यांना जाहीर समारोपाला नेण्यात आले होते. मात्र तेथे ते बसू शकले नाहीत आणि त्यांना परत नेण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी खाजगी समारोपाला मात्र ते गेलेत. तेथे त्यांनी आपले अखेरचे ऐतिहासिक भाषणही केले. त्यावर्षी प्रथमच देशाच्या सगळ्या प्रांतातून स्वयंसेवक त्या वर्गासाठी आले होते. संघाचे काम देशव्यापी झाल्याचे सुखद दृश्य त्यांना पाहता आले होते. त्याचा उल्लेख करून आपण आपल्यापुढे भारताचे लघु रूप पाहतो आहे, असे उद्गार त्यांनी काढले होते.

या जगाचा निरोप घेण्यापूर्वी काही दिवसांची गोष्ट. डॉक्टर बिछान्यावर पडून विश्रांती घेत होते. यादवराव जोशी त्यांच्याजवळ बसले होते. डॉक्टरांनी यादवराव जोशींना विचारले, `संघाचा कोणी अधिकारी मरण पावला तर त्याचा अंत्यसंस्कार कसा कराल?' यादवराव गडबडले. त्यांना प्रश्नाचा रोखही लक्षात आला. परंतु त्यांनी विषय टाळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा डॉ. हेडगेवार स्वत:च त्यांना म्हणाले, `अंत्यसंस्कार लष्करी इतमामात वगैरे करण्याची मुळीच आवश्यकता नाही. आपला संघ हा एक परिवार आहे. त्यामुळे परिवारातील एखादी व्यक्ती निधन पावल्यावर जसा साधेपणाने अंत्यसंस्कार केला जातो, तसाच संघाच्या सर्वोच्च अधिकाऱ्याचाही अंत्यसंस्कार करावा.' काय विलक्षण व्यक्तिमत्व असेल त्यांचे !! संघटनेचा अतिशय दूरचा विचार करून त्यासाठी मोलाचे मार्गदर्शन तर त्यात आहेच. शिवाय स्वत:बद्दलची विलक्षण आत्मविलोपी वृत्तीही त्यात आहे. मी स्थापन केलेली संघटना, माझी संघटना, मी सर्वोच्च प्रमुख, मी रक्ताचे पाणी करून ती नावारूपाला आणली, संपूर्ण भारतभर त्याचा विस्तार केला, माझे कर्तृत्व... कशाकशाचाही स्पर्शही मनाला नाही. शिवाय भाबडेपणाने, भक्तिभावाने कोणी तशा भावना बाळगू नये, तशा भावनांचे पोषण होऊ नये यासाठी स्वत:हून तो विषय मार्गी लावून देणे. एखाद्या योग्याला साजेशी अशीच मनाची ही अवस्था म्हणायला हवी. त्यांचा  अंत्यसंस्कार त्यांना अभिप्रेत अशाच साधेपणाने रेशीमबाग येथे पार पडला. आज त्याच ठिकाणी त्यांच्या समाधीवर स्मृती मंदिर उभे आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, २१ जून २०१४

गुरुवार, १९ जून, २०१४

पंचतारांकित शैली शक्य आहे का?

आज सगळीकडे विकास, सुख,समृद्धी, आधुनिकता, विज्ञान- तंत्रज्ञान, वेग, झगमगाट यांची चर्चा पाहायला मिळते. थोडक्यात म्हणजे पंचतारांकित जीवनपद्धतीची चर्चा. बाकी सगळ्या गोष्टी, सगळे विचार बाजूला ठेवले तरी एक प्रश्न उभा राहतो की, जगातील सगळ्या ७०० कोटी लोकांना असे पंचतारांकित जीवन उपलब्ध करून देणे शक्य आहे का? जगाचे सोडून देऊ. भारतातील १२५ कोटी लोकांना असे जीवन उपलब्ध करून देणे तरी शक्य आहे का? आज सुमारे ४० कोटी लोक दोन वेळच्या जेवणाच्या चिंतेतून बाहेर पडले आहेत. तेवढ्याच लोकांना पाणी, वीज, आरोग्य आदी सुविधा बऱ्यापैकी उपलब्ध आहेत. हा आजचा सर्वसामान्य स्तर १२५ कोटी लोकांना उपलब्ध करून द्यायचा म्हटले तरी जमीन, पाणी, धान्य, जंगल, शेती, खनिजे इत्यादीवर किमान तिपटीने ताण वाढेल. या साऱ्या गोष्टी किमान तिप्पट लागतील. हे योग्य आहे अथवा नाही हा मुद्दा सध्या बाजूलाच ठेवू. किमान हे शक्य आहे का याचा विचार तरी करायला हवा की नाही? आणि हा स्तर पंचतारांकित स्तरापर्यंत पोहोचवायचा म्हटले तर काय होईल? किती अनवस्था प्रसंग येईल? १२५ कोटी लोकांचे जाऊ देऊ. आज जी ४० कोटी जनता थोडीफार निर्धास्त आहे, तिच्या डोळ्यातील- मनातील पंचतारांकित जीवनाचे स्वप्न पूर्ण करायचे म्हटले तरीही नैसर्गिक साधने पुरी पडतील का? तथाकथित जागतिकीकरणाची सुरुवात झाल्यानंतर सगळ्या जगात मोठे परिवर्तन येऊ लागले. पण त्याचा परिणाम काय झाला? विकसनशील देशातील लोक जास्त जेवायला लागल्याने अन्नधान्याची कमतरता जाणवू लागली आणि महागाई वाढली, अशी विश्लेषणे मी-मी म्हणणारे अभ्यासक आणि विद्वान करू लागले. या विश्लेषणात काहीच तथ्य नाही असे नाही. मागणी आणि पुरवठ्याचा तो साधा सिद्धांत आहे. हा सिद्धांत मानवनिर्मित नसून निसर्गदत्त आहे. पण याचा अर्थ विकसनशील देशातील लोकांनी पोटभर जेवू नये असा नाही. किंबहुना जगातील प्रत्येक माणसाला, एवढेच नव्हे तर पशूंना आणि पक्ष्यांना आणि किटकांनाही पोटभर, पुरेसे, पौष्टिक अन्न मिळालेच पाहिजे.

प्रश्न आहे तो हा मेळ कसा घालायचा हा? सर्वप्रथम एक गोष्ट कितीही विसंगत, कर्कश वाटली तरीही कानीकपाळी ओरडून सांगायला हवी की पंचतारांकित जीवनपद्धती चुकीची आहे. त्या पद्धतीने जगणे चूक आहे आणि त्याची स्वप्ने पाहणेही चूक आहे. व्यवहार आणि नैतिकता या दोन्ही अंगांनी ते चूक आहे. साधे परंतु आरोग्यदायी (आरोग्य- शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक,सांस्कृतिक, आध्यात्मिक) जीवन हाच हेतू आणि आदर्श असायला हवा. असे झाले नाही आणि सध्या सुरु आहे तीच जीवनपद्धती सुरु राहिली तर जे त्यात यशस्वी होतील ते माणूस राहणार नाहीत आणि जे त्यात मागे पडतील त्यांना वरच्या स्तरातील लोकांवर संघर्ष लादण्यावाचून पर्याय राहणार नाही. असे होऊ नये अशी प्रामाणिक इच्छा असेल तर जीवनाचा प्राधान्यक्रम निश्चित करावा लागेल. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य या मुलभूत गरजा आहेत. त्यांना सर्वोच्च प्राथमिकता द्यावी लागेल आणि या मुलभूत गोष्टी सगळ्यांना पुरेशा उपलब्ध होतील हे पाहावे लागेल. बाकी गोष्टींपैकी आवश्यक आणि अनावश्यक गोष्टी निश्चित करून अनावश्यक गोष्टींना निकाली काढावे लागेल. (अनावश्यक- उदा. – मोटारी, चंद्रावर मानवी वसाहत उभारणे वगैरे.) आमच्या सवयी, इच्छा आकांक्षा, प्रतिष्ठा सन्मान, संकल्पना (आधुनिकता, प्रगती, विकास, पुढारलेपण, मागासलेपण); इत्यादी बाबींची फेरमांडणी आणि पुनर्व्याख्या करावी लागेल. जगण्याच्या असंख्य मितींचा विकास करावा लागेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार सांभाळला त्यावेळी प्रथम महात्मा गांधींच्या प्रतिमेला वंदन केले. संसदेतील आपल्या पहिल्या भाषणात आणि निवडून आल्यानंतरच्या गंगाआरतीच्या वेळी बोलतानाही त्यांनी गांधीजींचे संदर्भ दिले. एकूण जीवनाच्या, विशेषत: अर्थकारणाच्या संदर्भात गांधीजींनी सांगितलेल्या काही मुलभूत गोष्टी लक्षात घेणे, विचारात घेणे अत्यंत आवश्यक आहे. गांधीजींनी म्हटले होते-

साधे शेतकऱ्याचे जीवन हेच खरे जीवन.

प्रत्येकाला केवळ भाजीभाकरीच नव्हे तर त्यासोबत दुध तूपही मिळायला हवे.

या वसुंधरेकडे सगळ्यांच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता आहे, पण कुणा एकाचीही हाव मात्र ती पूर्ण करू शकत नाही.

माणसाने पोटासाठी (चरितार्थासाठी) दिवसाचे सहा तास काम करावे, बाकी वेळ त्याने स्वत:चे जीवन जगण्यासाठी आणि घडवण्यासाठी द्यावा.

यंत्राने माणसाची जागा घेऊ नये, माणसावर प्रभुत्व गाजवू नये. यंत्र माणसाला सहायक असले पाहिजे.

गांधीजींच्या विचारातील या काही ठळक बाबी. या व्यवहारात आणण्याचा प्रयत्न करण्यातूनच भावी पर्यायी जीवनरचना आकारास येईल. एका आणखीन महत्वाच्या गोष्टीची नोंद करणे आवश्यक आहे. आपल्या सगळ्या अर्थविचारांचा आधार ईशावास्योपनिषदाचा प्रथम मंत्र आहे हे गांधीजींनी ठासून सांगितले होते. त्यांचा विश्वस्त विचारसुद्धा त्या मंत्रातूनच विकसित झालेला आहे. `हिंदस्वराज’मध्ये तर त्यांनी स्पष्टच म्हटले आहे की, पाश्चात्य सभ्यता कुचकामी आहे. पाश्चात्य सभ्यता मानवाला सुखी करू शकत नाही. सभ्यता याचा अर्थ जगण्याच्या सवयी, जगण्याच्या पद्धती, जगण्यामागचा विचार, जगण्याच्या कल्पना संकल्पना, जगण्याचे संदर्भ, जगण्याचा आशय, जगण्याचे हेतू, जगण्याचे मापदंड, जगण्याचे सारभूत आणि आधारभूत तत्वज्ञान; या सगळ्या गोष्टी. या सगळ्या गोष्टी पाश्चात्य ठेवून गांधीजींचे नाव घ्यायचे आणि सगळ्यांना सुखी करण्याची धडपड करायची यातून फार काही साध्य होणार नाही. जगात उभे राहण्यासाठी एका मर्यादेपर्यंत जगाचा विचार करणे, जगाच्या स्पर्धेत उतरणे हे आवश्यक आणि योग्य आहे. मात्र त्याचवेळी जगापुढे पंचतारांकित जीवनाच्या जागी जीवनाचा नवीन, योग्य, संतुलित आदर्श ठेवण्याचे आणि त्याचे उदाहरण घालून देण्याचे काम हे भारताचे काम आहे. आजवरच्या सगळ्या महापुरुषांनी, चिंतकांनी हेच सांगितले आहे.

गांधीजींचे नाव घ्यायचे पण वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, हिंदू; हे शब्द आले की शेपूट घालायचे असे चित्र पुष्कळदा पाहायला मिळते. दुसरीकडे हिंदुत्वाची मशाल खांद्यावर घेतलेले अनेक जण गांधीजी हे नाव पाल अंगावर पडावी तसे झटकतात. आधुनिक आणि अत्याधुनिक जीवनशैलीचे पुरस्कर्ते तर गांधीजींना काही समजत होते यावरच विश्वास ठेवत नाहीत. आपल्याला यातून बाहेर पडावेच लागेल. एकात्म मानव दर्शनाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनीही विश्वकल्याणी अर्थकारणासाठी त्रिसूत्री सांगितली होती. १) अधिकाधिक उत्पादन, २) संयमित उपभोग आणि ३) न्याय्य वितरण; ही ती तीन सूत्रे होत. गांधीजी आणि दीनदयाळजी यांचा आशय एकच आहे आणि त्याचा आधारही एकच आहे. पर्यायी, संतुलित जीवनशैलीचा स्वीकार आणि आग्रह हा संपूर्ण समाजाचा विषय आहे. सरकारला आणि व्यवस्थांना त्यासाठी बाध्य करणे ही समाजाची जबाबदारी आहे. आजच्या बेजबाबदार वातावरणात समाजाला, समाजातील प्रत्येकाला ही जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, १६ जून २०१४