रविवार, १ एप्रिल, २०१८

केरळची एक बातमी

केरळची एक बातमी वाचण्यात आली-
`एक लाख शालेय विद्यार्थ्यांनी जात आणि धर्म यांचे रकाने कोरे सोडले.'
यातून ध्वनित अर्थ- या एक लाख विद्यार्थ्यांनी जाती धर्माचा त्याग केला. आता ते माणूस झालेत, केवळ माणूस.
यात भंपकपणा आहे आणि धोकाही. ऐकायला, बोलायला खूप्पच छान वगैरे वाटत असलं तरीही हे निरर्थक आहे.
१) मुळातच आपल्या सगळ्या दुहीचं, भांडणाचं, त्रासाचं मूळ जाती आणि धर्मात आहे हे तद्दन खोटं आहे.
२) स्वामी विवेकानंद, नारायण गुरु, असंख्य संत महंत यांनी याबाबत केलेलं विवेचन आणि त्यांचं नाव घेऊन करण्यात येणारं विवेचन यात कुठेच ताळमेळ नसतो. या साऱ्या महापुरुषांनी जाती वा धर्माच्या लहान units ची अपरिहार्यता मान्य केली, त्यांची गरज मान्य केली; पण बौद्धिक आणि भावनात्मक दृष्टीने त्यांच्या वर उठल्याविना पर्याय नाही हे सांगितलं.
३) आजचं या संदर्भातील सगळं विवेचन अभावात्मक आणि नकारात्मक, अन म्हणूनच परिणामशून्य आहे.
४) जाती आणि धर्माचा त्याग करणारी व्यक्ती अहंकार- दांभिकता- स्वार्थ- सगळ्या प्रकारच्या हिणकस भावना आणि व्यवहार यांचा त्याग करून माणूस होते का? उलट आम्ही फार महान कार्य केल्याच्या आविर्भावात अधिकच लहान होते.
५) बाबा रामरहीमच्या कथित आश्रमात सगळ्यांना `मानव' हीच संज्ञा होती. ती खरेच माणसे होती का?
६) जाती धर्माचा असा त्याग करून माणूस `माणूस' होतो का?
७) केवळ जाती वा धर्माचाच त्याग का? माणूस कोण मोठा लागून गेला? `माणूस' या गोष्टीचाही त्याग का नको? समग्र अस्तित्वाचा एक कण एवढीच ओळख का नको? किंबहुना तीही कशासाठी?
८) माणूस झालो म्हणून फुशारकी मारायची अन बकरे-कोंबड्या-मासे यांचा जीव घ्यायचा; माणसांचेच शोषण करायचे, माणसांचाच द्वेष करायचा, माणसांनाच वजा करत जायचे; ही कोणती नीती? की अनीती?
९) यातील `आधुनिकतेचा' कावेबाजपणा हा की, काहीच वर्षात `देश' हा रकाना पण कोरा ठेवण्याची टूम पुढे येईल.
१०) `संन्यास' यातही सर्व प्रकारच्या व्यवस्था आणि बंधनांचा त्याग अभिप्रेत आहे. परंतु त्यागाची ती कल्पना, पद्धती, तो भाव सकारात्मक, पूर्णतेकडे नेणारा आहे; तर या विद्यार्थ्यांनी केलेला जाती धर्माचा कथित त्याग नकारात्मक, शून्यतेकडे नेणारा, अभावात्मक असा आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, १ एप्रिल २०१८