बुधवार, १७ ऑगस्ट, २०१६

जन्म नटसम्राटाचा


२१ ऑगस्टला दुपारी १२ अन संध्याकाळी ७ वाजता पुन्हा एकदा झी वर नटसम्राट लागणार असल्याची जाहिरात पाहिली. साधारण महिनाभरात तिसऱ्यांदा झी वाले हा चित्रपट दाखवतायत बहुधा. साधारण महिनाभरापूर्वी श्रीदेवीने विचारले होते- तुम्ही हा सिनेमा पाहिलाय का? मी आत्ता पाहतेय. लिहा यावर. गेल्या रविवारी संध्याकाळी मातोश्री पाहत होत्या. अन आज पुन्हा ही जाहिरात. दाखवोत बापडे. आपलं काय जातंय? पण श्रीदेवी लिहा म्हणाली तेव्हा, त्यापूर्वीही अन नंतरही त्याबद्दल जे वाटत होतं अन वाटतंय ते सांगण्याचा मोह आजच्या जाहिरातीमुळे झाला.
सूत्ररूपाने सांगायचं झालं तर `माणूस मोठा होण्यास नकार देतो' तेव्हा त्याचा नटसम्राट होतो. ग्रेस म्हणत असत- people refuse to grow. असंख्य वेळा हे प्रत्ययाला येतं. `नटसम्राट'मध्येच आप्पासाहेब बेलवलकर यांचं एक स्वगत आहे. `या वादळाला कुणी घर देता का घर?' असं काहीसं. त्यात ते म्हणतात- हे वादळ थकलंय आता. मला नेहमी प्रश्न पडतो- असंच होणार, वादळाला थकावंच लागणार, थकावंच लागतं हे कळायला आप्पासाहेबांना इतका वेळ का लागावा? इतके भोग का भोगावे लागावे? अन उत्तर एकच मिळतं- माणसाचा महाप्रचंड अहंकार. युधिष्ठिराचं प्रसिद्ध उत्तर आठवतं- `रोज मृत्यू समोर दिसत असूनही माणूस स्वत:ला अमर्त्य समजून चालत असतो; हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे.' या उत्तरातील तत्व सगळ्या गोष्टींना लागू पडतं. आप्पासाहेब आपल्या `वादळ' असण्यावर इतकं प्रेम करतात की, आपण त्रिकालाबाधितपणे `वादळ'च राहणार ही समजूत ते घट्ट धरून ठेवतात. ती समजूत सोडण्याचा विचारही ते करत नाहीत. तसे प्रसंग येत नाहीत असे नाही. पण ते आपलं `वादळ'पण प्रचंड जोपासत असतात. शेवटी व्हायचं ते होतं. भूमिका आणि आपण एकच आहोत हा भ्रम टाकल्याविना मोठं होता येत नाही.
ही भूमिका फक्त एकट्या आप्पा बेलवलकर यांची नसते; प्रत्येक जण अशा भूमिका पार पाडत असतो. प्रसिद्ध सनईवादक उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्यावर जेव्हा म्हातारपणी हलाखीत राहण्याची पाळी आली तेव्हा हे तत्व वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळाले. आपली लोकप्रियता, आपले वादन यात ते इतके गुंतले की, आपलं जीवन ही आपली नव्हे तर बाकीच्यांचीच जबाबदारी आहे आणि त्यांनी ती पार पाडली पाहिजे, ही अपेक्षा ते सोडू शकले नाहीत. आपल्या आवडीनिवडी, छंद, स्वभाव, लहरी, गरजा; एवढेच नव्हे तर नातीगोती, मैत्री, ईश्वर, देवधर्म, कुटुंब, समाज, कायदे; एकूण एक सगळ्या गोष्टींना काही मर्यादा असतात हेच आपल्याला मान्य होत नाही. त्यातील एक वा अनेक गोष्टी आपण इतक्या घट्ट धरून ठेवतो की, त्याबाहेर पडण्याचा विचारही करीत नाही. हे मर्यादांचा विचार न करणे म्हणजेच मोठं होण्याला, माणूस होण्याला नकार देणे. असा नकार देणे हे माणसाच्या रक्तात इतके भिनले असल्यानेच त्याला नटसम्राट आकर्षित करतात. त्यांचे भूमिकेतून बाहेर न पडणेही माणसाला आवडते अन त्यामुळे होणाऱ्या शोकांतिकेवर अश्रू ढाळणेही त्याला आवडते. भुमिकेबाहेर पडणे मात्र कष्टाचे वाटते.
या नटसम्राट नाटकातच एक आणखीन स्वगत आहे. आप्पासाहेब सरकारशी बोलताना म्हणतात- `आभाळ पाठीवर घेऊन जंगलातून फिरणाऱ्या हत्तींना विचारा, तेही सांगतील- कुणीही कुणाचं नसतं.' अतिशय हळवं होऊन आपण पाहतो, पण आपल्या मनात हा प्रश्न येत नाही की, असा सवाल करणारे आप्पासाहेब किती जणांचे झालेत? त्यांना आपलं `वादळ'पण टाकून देऊन किती जणांचं होता आलं? खरं तर हा अतिशय व्यवहाराचा, देवाणघेवाणीचा प्रश्न आहे. सर्वसाधारण माणूस या प्रश्नाच्या रोखाने बरेचदा वागत असतोही. मनाविरुद्ध दुसऱ्यांचा होण्याचा प्रयत्नही करतो. पण खरा प्रश्न आहे- असं कोणी कोणाचं असतं का? होऊ शकतं का? प्रतिभेचा, प्रज्ञेचा, अन प्रेरणेचा पैस जितका मोठा असेल तितकं हे कळतं की- असं कोणी कोणाचं होत वगैरे नाही, होऊ शकत नाही.
आप्पा बेलवलकर जेव्हा म्हणतात की, कोणीही कोणाचं नसतं, तेव्हा त्याचा अर्थ असतो- कोणी तरी कोणाचं तरी असायला हवं. मात्र, खलील जिब्रानचा Prophet जेव्हा गावकऱ्यांना सांगतो की- तुमची मुले तुमची नाहीत. ती तुमच्यातून आली आहेत; तेव्हा तो माणसाला मोठा करीत असतो. तरीही ती पूर्णता मात्र नसते. Prophet फक्त काय नाही ते सांगतो. आप्पा बेलवलकर फक्त अभावाबाबत बोलतात. Prophet त्या अभावाचं वास्तव रूप दाखवतो. अन आदि शंकराचार्य त्याला पूर्णता प्रदान करतात, जेव्हा ते निर्वाणषटक रचतात. मी म्हणजे शरीर, नातीगोती, कुटुंब, कुळकुळाचार, देवधर्म, माता पिता पुत्र बंधू सखा, गुरु शिष्य; काही म्हणजे काही म्हणजे काहीही नाही. मात्र त्याच वेळी ते सूत्र सोडून देत नाहीत. तर `मी'चं स्वरूप सांगतात- चिदानंदरूपः शिवोहम शिवोहम... मी चैतन्य आणि आनंदस्वरूप शिव आहे. ही आहे पूर्णता. हे आहे मोठं होणं.
हे काही एका दिवसाचं काम नाही. हे शिवत्व बाजारात मिळत नाही. वर्षानुवर्षांच्या, कदाचित अनेक जीवनांच्या वाटचालीनंतर ते शिवत्व गवसतं. मात्र या वाटचालीत असंख्य भूमिका सोडून द्याव्या लागतात. त्या भूमिका सोडण्याची वेळ आली की सोडून द्यायच्या, त्यांनी केलेल्या उपकारासाठी मनाच्या तळातून धन्यवाद देऊन. मोठं होण्याचा हाच मार्ग आहे. परंतु भूमिकेला घट्ट चिकटून राहण्याचा अट्टाहास केला की, घर मागत हिंडणारा नटसम्राट जन्माला येतो. या जगाच्या रंगभूमीवर अनेक भूमिका येतात वाट्याला- राजाची, रंकाची, नात्यागोत्याची, समाजसेवकाची, धर्माचार्याची, नटाची किंवा नटीची, रसिकाची किंवा प्रेक्षकाची, सज्जनाची किंवा दुर्जनाची, प्रेयसीची वा प्रियकराची, कलाकाराची, संशोधकाची... कोणाचीही अन कशाचीही. पण असतात मात्र साऱ्या भूमिकाच. वाट्याला आलेली भूमिका सोडून द्यायला खळखळ केली की जे भोगावं लागतं, त्यालाच म्हणतात शोकांतिका. जगाच्या फापटपसाऱ्यातील त्याचं चित्र फक्त वेगवेगळ दिसतं एवढंच. खरं तर फक्त आप्पासाहेब बेलवलकर नाही, तर तुम्ही आम्हीही नटसम्राटच असतो; मोठं व्हायला नकार देणारे. म्हणूनच आम्हाला हे नाटक अन हा सिनेमा आवडतो. नाही तर त्यात आवडण्यासारखं काही नाही.
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, १६ ऑगस्ट २०१६

बुधवार, १० ऑगस्ट, २०१६

देवाजीचे देणे

दहावी उत्तम प्रकारे उत्तीर्ण झालेल्या पुतण्याला भेटायला पुण्याला गेलो होतो. एवढ्या दूर आलोत तर चार दिवस भटकून येऊ असा विचार केला. नेहमीप्रमाणेच पर्यटन, सहल असे नसल्याने धोपटी उचलायची अन चालू लागायचे. सोबत, जाण्यायेण्याची व्यवस्था, राहण्याखाण्याच्या सोयी इत्यादी गोष्टी ध्यानात घ्यायच्या नसतातच भटकताना. भटकंती म्हणजे भटकंती. यावेळी होते शिवथरघळ आणि रायगड. त्यातील शिवथरघळ पहिल्यांदाच जाणार होतो. रायगड शाळेत असताना सुमारे ४० वर्षांपूर्वी चढलेला. राज्य परिवहनाच्या पुण्याच्या स्थानकावरून सुरुवात झाली. चौकशीच्या खिडकीवर विचारले तर तिथला माणूस म्हणाला- महडची बस हवी की महाडची. म्हटलं शिवथरघळला जायचं आहे. तो म्हणाला, त्यासाठी महाडची बस. देशाटनाने ज्ञानात भर पडते, असे एका संस्कृत सुभाषितात सांगितले आहे. यावेळी त्याची अशी सुरुवात झाली. महड म्हणजे अष्टविनायकातील एक स्थान. महाड म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांनी जिथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता ते. सुमारे पाच तासांचा प्रवास करून बस महाडला पोहोचली. दुपारचा एक वाजला होता. महाड स्थानकावर शिवथरघळच्या बसची चौकशी केली. तिथला माणूस म्हणाला- दीड वाजता बस आहे, पण ड्रायव्हर मिळाला तर जाईल. ज्ञानात भर पडणे सुरूच होते. वाट पाहण्याशिवाय दुसरा इलाज नव्हता. दुसरेही ८-१० लोक होते. त्यांना घळीच्या पायथ्याशी असलेल्या शिवथर गावी जायचे होते. या वाट पाहण्याच्या वेळात बरेच प्रबोधन झाले. या बसची समस्या काय, त्यातील खाजगी वाहनांच्या व्यवसायाचा भाग, कोणाकोणाचे काय काय हितसंबंध, गावातील गट इत्यादीची आपसूक माहिती झाली. अधुनमधून माझी साक्ष काढणेही सुरु होते. मी पहिल्यांदाच महाडला आलो आहे याच्याशी त्यांना सोयरसुतक नव्हते. अखेर बहुप्रतिक्षित बस आली. पण ती शिवथरला जाणार की नाही हे जाणून घेणे महत्वाचे होते. म्हणजे चालक-वाहक तयार असणे महत्वाचे होते. नुसती बस असून उपयोग नव्हता. त्यात पुन्हा पाचेक मिनिटे गेली अन बस जाणार हे निश्चित झाले.
महाडहून साधारण ३०-४० किमीचा प्रवास. हा प्रवास मात्र रमणीय. दुसरा शब्दच नाही. बस चांगली होती, चालवणारा चांगला होता, बसमध्ये गर्दी नव्हती, बाहेर ढग आणि भुरभूर पाऊस होता, आजूबाजूला सर्वत्र हिरवाई अन डोंगर होते. साधारण सव्वादोनला बस शिवथरघळला पोहोचली. २-४ वाहने उभी होती. दोन झोपडीवजा हॉटेल्स. अन पलीकडून प्रचंड आवाज येत होता न दिसणाऱ्या धबधब्याचा. पावले अर्थातच घळीकडे वळली. पन्नासेक मीटर चालून गेलो तर समोर १०० फूट उंच अन वीसेक फूट रुंद धबधबा शिवथर नदीत कोसळत होता. पाच मिनिटे होतो तिथेच उभा राहिलो. मग ही रौद्रसुंदरता जवळून अनुभवण्यासाठी घळीच्या पायऱ्या चढू लागलो. दोन पायऱ्या चढलो अन सर आली धावून. पुढच्या २०-२५ पायऱ्या चढून होईपर्यंत चिंब. मजाच मजा. घळीच्या अगदी समोर कोसळणाऱ्या त्या धबाबा धारांचे वर्णन काय करावे? `सावधान' हा शब्द कानी पडताच ज्यांची विरक्ती जागी झाली त्या विरक्त समर्थांनासुद्धा त्या धबाब्यावर लिहावेसे वाटले यातच सारे आले. नितांत रमणीय अशी ती रौद्रसुंदरता साठवत साठवत घळीत पोहोचलो. मनात आलं- आजही जगाच्या कोलाहलापासून दूर निबिड एकांतात असलेलं हे स्थान साडेतीनशे वर्षांपूर्वी समर्थांनी कसं शोधून काढलं असेल, इथे २२ वर्षं ते कसे राहिले असतील आणि जगापासून दूर अज्ञात अशा या ठिकाणी जगाच्या नेमक्या दुखण्यावर कालातीत असं औषध श्रीदासबोधाच्या रुपात कसं तयार केलं असेल...
समर्थ स्मरणात मन असतानाच घळीतील समर्थांच्या मूर्तीचे अन प्रभू रामाचे दर्शन घेतले. तिथेच टेकलो. समोर धबधबा कोसळत होता. त्याचा जादुई आवाज आसमंतात भरून राहिला होता. घळीत तुषार येत होते. मिणमिणत्या दिव्यांनी दूर न झालेला अंधार मनावर गारुड जमवीत होता. समर्थ आणि श्रीदासबोध मनात पिंगा घालीत होते. तासभर कसा गेला कळलेच नाही. शेजारी एक सज्जन येऊन बसले. ते धुळ्याचे. नोकरीनिमित्त महाडला. सुटी घालवण्यासाठी आले होते. त्यांच्याशी चार गोष्टी झाल्या. त्यांना म्हटले- तुमच्या धुळ्याचे स्व. शंकरराव देव यांनीच ही जागा १९३० साली शोधून काढली. त्यांना ते माहीत नव्हते. त्यांना माझ्याबद्दल उगाचच आदर निर्माण झाला. म्हणाले- तुमचा चांगला अभ्यास आहे दिसतो. मीच खुलासा केला- अहो, अभ्यास वगैरे काही नाही. तिथे पाटी आहे. त्यावर लिहिलेली माहिती आहे ही. आपण लोक कुठे जातो तेव्हा फारसं लक्ष देऊन (attentive राहून) पाहत नाही, फिरत नाही हे पुन्हा प्रत्ययाला आलं. ते सज्जन गेले, मीही बाहेर पडलो. तिथल्या व्यवस्थापनाचे एक दोघे जण समोर बसले होते. त्यांना विचारले- येथे निवासाची काही सोय? त्यांनी पुणेरी कोरडेपणाने अन तटस्थतेने उत्तर दिले- काहीही नाही. मी काही लगेच हार मानणारा नाही. रेटून धरले. नागपूरहून आलोय. चार वाजत आलेत. परतायला बस नाही. इत्यादी. पुणेरी असल्याने त्यांना याचे काहीही वाटायचे कारण नव्हते. दोन मिनिटे उभा राहिलो. मग म्हटले- त्या विकीपेडियावर तर माहिती दिली आहे की, इथल्या हॉलमध्ये राहता येते म्हणून. आता दोघांपैकी एकाला स्वर सापडला. त्यांनी विचारले- किती जण आहात? म्हटलं- एक. एकटा जीव सदाशिव. हे उत्तर ऐकताच लगेच उत्तर आले- नाही सोय राहण्याची. एकट्या माणसाला आम्ही नाही राहू देत. असा अनुभव यापूर्वीही गाठीशी असल्याने मी म्हणालो- मला तुमच्या अडचणी माहीत आहेत. अमुक अमुक ठिकाणीही असेच झाले होते. पण आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र (कार्ड) पाहून त्यांनी परवानगी दिली होती. ते निष्ठावंत मात्र माझा सहानुभूतीने विचार करायला तयार नव्हते. अखेर मी माघार घेतली आणि घळीच्या पायऱ्या उतरलो.
खालच्या हॉटेलात गेलो. मालकाला म्हटले- जेवायचे आहे. `उशीर झाला हो' अशी तक्रार त्याने केली. तरीही जेऊ मात्र घातले. मग त्यालाच विचारले मुक्कामाचे. म्हणाला- नाही. आता आली ना पंचाईत... चहू बाजूंनी उंच डोंगर, निवासाची व्यवस्था नाही, परतायला गाडी नाही, अन संध्याकाळचे पाच वाजलेले. शहरातले संध्याकाळचे पाच आणि डोंगरदऱ्यातले पाच यातील फरकाचे ज्ञान झाले. अर्थात घाबरून जाण्याचं, निराश होण्याचं वगैरे काही कारण नव्हतं. `समर्थाचिया सेवका' कोण वक्र पाहे? मनाशी ठरवलं, अंधार पडायच्या आत शिवथर गावात पोहोचायचं. कोणी घरात घेतलं तर ठीक, नाही तर घराबाहेर घराच्या आडोशाने ताणून द्यायची. सकाळी ताजेतवाने होण्यासाठी नदी आहेच अन मग महाडला पोहोचू. ठरवले अन डोंगर उतरू लागलो. पाच-दहा मिनिटे चाललो अन समोरच्या झाडाआडून एक माणूस सामोरा आला. हातात कोयता असलेला तो, बाजूच्या शेतातील शेतकरी होता. पण हे ध्यानी यायच्या आतच मारुततुल्य वेगाहून अधिक वेगाने मनात काय काय येऊन नाही गेले... गेले काही तास मनात समर्थ, श्रीराम, हनुमान आदींच्या सोबतीला श्रीदासबोध, श्रीरामायण अन त्यामुळेच वाल्मिकीही होते. म्हटले- हा वाल्या कोळी तर नाही. पण मी काही देवर्षी नारद नाही. हा आपल्याला लुटेल का? मारून टाकेल का? अन लगेच हेही आले- लुटले तर लुटले, मारले तर मारले. या शिवथर नदीतून वाहत वाहत अंती तर सागरालाच भेटायचे आहे. पण काहीही झाले नाही. आम्ही एकमेकांना ओलांडून पुढे गेलो.
थोडे आणखीन पुढे चाललो अन एक ऑटोरिक्षा येताना दिसली. म्हटले, याला चमत्कार, प्रभूची कृपा इत्यादी म्हणायला हरकत नाही. त्याला हात दाखवला. महाडला नेशील का विचारले. हो म्हणाला. तो कोणाला तरी शिवथरघळला घेऊन चालला होता. प्रवास पुन्हा घळीकडे सुरु झाला. घळीत भेटलेले धुळ्याचे सज्जन त्याच रिक्षात होते. त्यांनाही उशीर झाला होता अन इकडे येणारी ही रिक्षा त्यांनी पकडली. मला पाहून त्यांना आश्चर्य वाटले. म्हणाले- तुम्ही मुक्काम करणार होता नं. काय झाले? मी त्यांना सगळा प्रकार सांगितला. आमच्याशिवाय त्या रिक्षात एक महीला अन एक पुरुष, असे दोघे होते. त्या महीला माझे म्हणणे लक्ष देऊन ऐकत होत्या. माझे बोलणे झाले. दोन मिनिटांनी त्यांनी मला विचारले- तुम्ही संघाचे काम करता का? माझ्या आश्चर्याला सीमा नव्हती. मी म्हटले- हो. पण तुम्ही कसे काय विचारले? त्या म्हणाल्या- मला वाटले. तोपर्यंत घळ आलीच होती. त्या म्हणाल्या- चला वर. मी म्हटले- तुम्ही जाऊन या. आम्ही जाऊन आलो मघाशीच. तशा त्या म्हणाल्या- चला तर. आम्ही वर गेलो. त्यांच्यासोबत आलेल्या गृहस्थांना त्या म्हणाल्या- तुम्ही या दर्शन करून. अन त्या वळल्या व्यवस्थापक मंडळींकडे. अन सुरु झाला तोफखाना- यांना का राहू देत नाही? इतक्या दुरून लोक येतात. काय करायचे त्यांनी? सोय असून नकार का? कोणाशी बोलू सांगा? त्यांची सरबत्ती आणि व्यवस्थापकांचे ना, सुरूच होते. त्या परिसरातून फोन लागत नाही. पण त्या महीला त्यांना म्हणाल्या- मला माहीत आहे एक जागा. तिथून फोन लागतो. चला माझ्यासोबत आपण फोन करू. अखेरीस मी मध्ये पडलो. म्हटले- त्या एवढं म्हणतायत तर फोन लावून पहा ना... नाही तर मी जाईन परत. त्यावर व्यवस्थापक राजी झाले. ते इमारतीच्या आत गेले. आत बाकीही काही मंडळी होती. मी बाहेरच थांबलो. आत काय झाले कोणास ठाऊक. सगळे बाहेर आले. अन व्यवस्थापक मला म्हणाले- तुमचं एखादं ओळखपत्र दाखवा अन सामान आत घ्या. दर्शनाला आलेल्या गृहस्थांना रात्री मुंबईला परतायचे होते. त्यामुळे त्या महिलेने माझे नाव, फोन नंबर लिहून घेतले अन ती मंडळी परतली.
नागपूरहून पुण्याला जातानाच ठरवले होते- शिवथरघळला मुक्काम करायचा. ऐन वेळी नकार मिळाला होता अन तासा दीड तासातच नाट्यमय रीतीने माझा शिवथरघळ येथील मुक्काम सुरु झाला होता
एकदाचे मुक्कामाचे निश्चित झाल्यावर मात्र काही अडचण झाली नाही. व्यवस्थापक मंडळीही `नागपूरकर, नागपूरकर' म्हणून बोलू लागले. संध्याकाळी तेथील प्रार्थना झाली. त्यात सहभागी झालो. प्रार्थना आटोपून बाहेरच्या जागेत उभे होतो तेवढ्यात `हे लोक राजकारणी आहेत' हे सांगण्याची गरज पडू नये अशा पद्धतीने १५-२० लोक घळ चढून आले. त्यातील एक जण माझ्याचकडे आले. म्हणाले- रायगडचे उपजिल्हाधिकारी आहेत. मी त्यांना व्यवस्थापकांकडे पाठवले. थोडी धावपळ वाढली. सुमारे अर्धा तास तो गट होता. मला त्या साऱ्याशी काहीही करावयाचे नव्हते. मिट्ट काळोखात काही दिसतं का, जाणवतं का हे शोधण्याचा माझा खेळ सुरु होता. रात्री कळले, आलेले पाहुणे उपजिल्हाधिकारी नव्हते तर कोणत्या तरी राजकीय पुढाऱ्याचे पी.ए. होते. ज्यांना राजकारणाची थोडीफार ओळख आहे तेही जाणतातच की, तिथे पी.ए.चे सुद्धा पुष्कळ पी.ए. असतात. असो. थोड्या वेळाने व्यवस्थापकांनी आवाज दिला- `नागपूरकर चला जेवायला.' वरण, भात, भाजी, पोळी, कढी असे छान जेवण झाले. व्यवस्थापक मंडळींपैकीच एकाच्या कोणाचा तरी त्या दिवशी वाढदिवस होता. त्यामुळे जिलबी आली होती. तिचाही आस्वाद घेतला. जरा वेळ शतपावली, गप्पाटप्पा झाल्यावर झोपायच्या मार्गाला सगळे लागले. तिथे राहणाऱ्या लोकांची नियमित व्यवस्था आहे. ते तिकडे गेले. मुक्कामाला येणाऱ्या बसचे चालक वाहक रोज तिथेच मुक्कामाला असतात. त्यामुळे त्यांचीही व्यवस्था आहेच. माझी सोय मोठ्या हॉलमध्ये होती. थोड्या वेळाने चालक वाहक आले. त्यांची जेवणे झाली. थोड्या शिळोप्याच्या गप्पा. तेही झोपायला गेले. मी एकटाच होतो. मुख्य व्यवस्थापक जवळ आले. त्यांच्या मनात गेले काही तास असलेला प्रश्न त्यांनी केला- `त्या महिला कोण तुमच्या?' म्हटलं- `कोणीही नाहीत. त्या मला रिक्षात भेटल्या.' त्यांचं समाधान झालं नाही हे स्पष्ट दिसत होतं. पण बोलले काही नाहीत. मीच म्हणालो- `माझी तीव्र इच्छा होती. प्रभूने ती अशी पूर्ण केली असं मला वाटतं. यावर फार डोकं खर्च करावं हेही माझ्या स्वभावात नाही.' त्यांना काय वाटलं कोणास ठाऊक? किंचित हसले अन म्हणाले, `विश्रांती घेऊ या. शुभ रात्री.' ते झोपायला गेले. शे-दोनशे माणसे झोपू शकतील एवढ्या त्या दालनात आता मी अन बाहेरील धबधब्याच्या पार्श्वसंगीताच्या साथीने मूर्तीतून माझ्यावर कृपावर्षाव करणारे समर्थ एवढेच होतो. पांघरूण घेतले अन डोळे मिटले.
पहाटे ४ वाजता प्रसन्न जाग आली. आवरून बाहेर आलो तर काळोख रुपयात एक आणा कमी झाला होता. मंडळींची सकाळच्या प्रार्थनेची तयारी सुरु होती. बाहेर बसूनच मी त्या प्रार्थनेत सहभागी झालो. लगेच गरमागरम चहा झाला. आंघोळ उरकून निघण्याची तयारी करावी या विचारात होतो. थंड पाण्याची सवय असूनही गरम पाणी मिळाल्यास बरे असे वाटण्याएवढी थंडी होती. नजर टाकली तर आचाऱ्याने भला मोठा गंज पाणी तापायला ठेवला होताच. आंघोळ उरकून, तयारी करून अन घळीत जाऊन आलो. शिवथरघळच्या भेटीची अन निवासाची पुरचुंडी बांधून घेतली अन पायऱ्या उतरलो. सव्वासातला बस हलली. डोंगर पार करत फोनच्या रेंजमध्ये पोहोचलो तर फोन वाजला. नंबर ओळखीचा नव्हता. फोन घेतला अन खुलासा झाला. पलीकडून काल माझ्यासाठी व्यवस्थापनाशी भांडणाऱ्या ताई बोलत होत्या. काही अडचण आली का, निघालात का इत्यादी विचारपूस. अन शेवटी निमंत्रण- `तुम्ही महाडला येताहात. स्थानकाच्या मागेच चालत येण्याच्या अंतरावर माझे घर आहे. चहा नाश्त्याला या.' नाही म्हणणे असभ्य ठरले असते. एक तर त्यांनी माझी मदत केली होती अन अचानक आपल्याला मदत करणारी व्यक्ती कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकताही होतीच. त्यांच्या घरी पोहोचलो. छोटेसे नीटनेटके दोनच खोल्यांचे घर. म्हणजे मुळात तो मोठा वाडा. वाटण्या वगैरे झाल्या अन प्रत्येकाच्या वाट्याला जे आले त्यात प्रत्येकाने आपापले संसार थाटलेले. अर्थात ही सगळी माहिती नंतर झाली. गेल्यावर आगत स्वागत झाले. परिचयाची देवाणघेवाण झाली. तेव्हा कळले- त्या ताई विश्व हिंदू परिषदेच्या जिल्हा महिला प्रमुख आहेत. विश्व हिंदू परिषदेच्या कामाशिवायही पुष्कळ सामाजिक कामात त्या अग्रेसर असतात. कपाटात शोभणारी मेडल्स, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्रे त्याची साक्ष पटवतात. बोलण्याच्या ओघात त्यांनी सांगितले की, प्रशांतजी हरताळकर (आता दिल्लीत मुक्काम, विश्व हिंदू परिषदेचे विदेश विभागाचे काम पाहतात.) सुद्धा त्यांच्याकडे बरेचदा राहून गेले आहेत. त्यानंतर दुराव्याचे कारण उरले नाही. कारण प्रशांतजी ओळखीचेच. शिवाय विदर्भातले. मूळ अकोल्याचे पण अनेक वर्षे नागपुरात राहिलेले. त्यामुळे औपचारिकता गळून पडली. चहा नाश्ता झाला.
आता काय कार्यक्रम? त्यांचा प्रश्न. म्हटले- रायगडला जायचे आहे. आमचे खाणेपिणे सुरु असतानाच एक दोन काका लोक आले होते. एक त्यांच्या परिचयातील निवृत्त शिक्षक श्री. भुस्कुटे. स्वत: चांगले लेखक. त्यांचा मुलगा संजय भुस्कुटे मुंबईला प्रसार माध्यमात. अन दुसरे बँकेतून निवृत्त झालेले. ताई डबे देण्याचा व्यवसायही करतात. अन्य अनेक कमाईच्या अन बिन कमाईच्या कामांसह. ते काका डबा घ्यायलाच आले होते. त्यांना ताईंनी काही सूचना दिल्या आणि त्या काकांनी मला रायगडला जाणाऱ्या गाडीत बसवून दिले. निघताना मलाही सूचना दिल्या- पायऱ्यांनी जाऊ नका. पाऊस आहे, त्यामुळे निसरडे असेल. शिवाय धुकं आहे. काहीही दिसणार नाही. अन तुम्ही एकटे जाताहात. त्यामुळे रोप वे ने जा. रोप वे च्या मालकांनाही त्यांनी फोन केला, आपले पाहुणे येताहेत म्हणून. निघताना म्हणाल्या- संध्याकाळी आले की इकडेच यायचे. रात्रीचे जेवण इथेच. त्यानंतर मी काही बोलणार तर त्या म्हणाल्या- रात्रीच्या मुक्कामाचं मी पाहते. शेजारी काका आहेत. एकटेच असतात. त्यांच्याकडे होईल सोय. समजूतदारीचा विशिष्ट स्तर असला की अनेक गोष्टी सोप्या, सहज होतात त्या अशा.
रायगडावर पोहोचलो. रोप वे चे तिकीट काढले. नजर इकडे तिकडे फिरवली. तिथे संघाचे चौथे सरसंघचालक रज्जुभैयांचा एक फोटो लागलेला दिसला. कुठल्या तरी कार्यक्रमाला ते आले असतानाचा. रोप वे च्या माझ्या capsule मध्ये दोन तरुण पोरे अन कर्नाटकचा एक हौशी फिरस्ता होता. capsule वर सरकू लागली अन क्षणार्धात खालचे सगळे तर गायब झालेच पण समोरचा भलाथोरला रायगड सुद्धा दिसेनासा झाला. प्रचंड धुके दाटले होते. गडावर कसे होणार. फिरता येईल की नाही अशी चर्चा करीतच चढणे सुरु होते. दोघा तरुणांपैकी एक जण फारच बहाद्दर होता. एवढा की, पहिल्या मिनिटाला त्याने मिटलेले डोळे त्याला उतरायला सांगितले तेव्हाच उघडले. रायगडावर उतरलो तेव्हा धुके थोडे कमी झाले होते अन भुरभूर सुरु झाली होती. आमच्या चौघांचा एक गट तयार झाला होता. त्या गटासाठी एक वाटाड्या केला आणि भ्रमंती सुरु झाली. ४० वर्षांपूर्वी पाहिले होते त्यातील काही आठवते का हे पाहण्याचा निष्फळ प्रयत्न केला. राणीवसा, राजमहाल, टांकसाळ, राजदरबार, सिंहासन असे करत करत होळीच्या माळावर पोहोचलो. वाटाड्याने जाहीर केले. आम्ही इथवरच येत असतो. बाजारपेठ, केदारेश्वर मंदिर, महाराजांची समाधी तुमची तुम्ही पाहा. त्याचा निरोप घेऊन निघालो. होळीचा माळ पार केला. तिथेच स्थानिक बाया, मुली चहा, बिस्किटे विकत होत्या. चहा घेतला. त्याच पिठले भाकरी जेवणाची सोयही करतात. जेवण कराल का म्हणून त्यांनी विचारले. जेवायचे होतेच. मी आणि दोघे तरुण यांनी होकार दिला. बाजारपेठेतून मधल्या वाटेने शे-दोनशे फुटाची ढलान उतरते तिथे पाच-सहा झोपड्या आहेत. तिथेच आम्हाला जेऊ घालणाऱ्या लीलाबाईची झोपडी. आम्हाला तिने ती दाखवली. तिला झोपडी दिसत होती. त्यावरचा झेंडा दिसत होता. आम्हाला मात्र धुक्यामुळे काहीही दिसत नव्हते. अखेर तिच्यासोबत खाली उतरून मी प्रत्यक्ष पाहून आलो अन पावले केदारेश्वराकडे वळली.
मंदिरात पोहोचलो. गाभाऱ्यात गेलो. त्या ओल्या अंधारात गुडघे खाली टेकवले. केदारेश्वराच्या पिंडीला स्पर्श केला अन अंगांग शहारले. हीच ती ज्योतिर्मय पिंडी जिला; त्या मृत्युंजय महापुरुषाने अन त्याला जन्म देणाऱ्या पुण्यश्लोक माऊलीने अनेकवार स्पर्श केला असेल. हीच ती ज्योतिर्मय पिंडी; जिच्याजवळ त्यांच्या मनातील कैक आशा निराशेच्या ओंजळी रीत्या झाल्या असतील. अन हीच ती पिंडी जिच्या छायेत त्या मृत्युन्जयाने अनंताच्या प्रवासाला पाऊल उचलले होते. थोडा वेळ निरव शांततेत तिथेच घालवला. बाहेर आलो. समोरच्या प्रांगणातील महाराजांच्या समाधीपुढे नतमस्तक झालो. स्वराज्यासाठी बेलाग राजधानी वसवणाऱ्या हिरोजी इंदोलीकरच्या पायरीला भक्तिभावाने स्पर्श केला अन परतीची वाट धरली. पीठ मळून ठेवून अन पिठले तयार करून लीलाबाई आमची वाटच पाहत होती. हातपाय धुवून झोपडीत शिरलो. पाच मिनिटात पिठलं, भाकरी, कांदा, मिरची, चटणी अशा थाळ्या समोर आल्या. तुटून पडलो, पण मांडीला अंग घासत म्याऊ म्याऊ करणाऱ्या मनिला भाकरीचा तुकडा टाकल्यानंतरच. जेवताना चारदोन गोष्टी झाल्या. रोज गिऱ्हाईक मिळतात का? त्यावर उत्तर होते- हो, रोज मिळतात. कधी एक, कधी दोन, कधी चार-पाच. काही कार्यक्रम असला की मग मात्र गर्दी होते. पुढचा प्रश्न होता- तेवढं पुरतं का? त्यावर उत्तर होतं- हो पुरतं. मनोमन माहीत होतं की त्यांच्या झोळीत अजून पडायला हवं आहे. पण समाधान काय असतं हे अनुभवायला मिळालं अन त्याच वेळी बाहेर थैमान घालणारं असमाधान डोक्यात चमकून गेलं. पूर्ण उभं राहून बाहेर पडता येणं अशक्य असलेल्या त्या कुडातून बाहेर पडताना विचार करून पाहिला, कशी राहत असतील या पाच-सहा झोपड्यातील लोकं इथे. अंधार पडल्यावर काय करीत असतील. दिनचर्या कशी असेल, सण उत्सव कसे असतील, सुख दु:ख कशी असतील, भीती वाटत असेल का... इत्यादी. फारसा कल्पनाविलास नाही करता आला.
रायगड दर्शन करून महाडला परतलो. ताईंना फोन केला. म्हटले- रायगड दर्शन छान झाले. आता चवदार तळ्याला कसे जायचे सांगा. दलितोद्धाराच्या चळवळीचे ते ऐतिहासिक प्रतिक पाहून येतो. त्यांनी रस्ता सांगितला. त्यानुसार गेलो. ते ऐतिहासिक तळे पाहिले. आता तो परिसर राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यात आला आहे. मोठ्ठा तलाव, बगीचा, डॉ. आंबेडकरांचा पुतळा अन एक इमारत तेथे आहे. तिथे थोडावेळ घालवून परतलो. ताई वाटच पाहत होत्या. चहा झाला. सोबतच गप्पाही. ताईंना दोन मुली. दोघींचीही लग्न झालेली. यजमान एका मुलीकडेच गेलेले होते. त्या मूळ मराठा. ब्राम्हण तरुणाशी प्रेमविवाह केला. त्यामुळे गेली ३३ वर्षं माहेरच्यांनी त्यांचं नाव टाकलेलं. सासरी मात्र सगळ्यांनी स्वीकारलं. गणपतीला त्यांच्याच हातचे मोदक हवेत. लग्नाच्या वेळी शिक्षण फक्त दहावीपर्यंत. नंतर बारावी केलं. आता मुलीपासून प्रेरणा घेऊन एलएलबी करणार आहेत. पण शिक्षण नसूनही कामात, संघटनेत, कार्यक्रमांच्या, उपक्रमांच्या, मिरवणुकांच्या आयोजनात वाघ; पोलिसांशी भांडायलाही कमी नाही की, मुलींना लाठीकाठी शिकवण्यात कमी नाही; भाषणही देणार अन रायगडावर दोन हजार वृक्षही लावणार. चहासोबत हा सगळा इतिहास कळला. मग म्हणाल्या मी थोडी बाहेर जाऊन येते. तुम्हाला आंघोळ करायची असेल, कपडे धुवायचे असतील तर उरकून घ्या. त्या बाहेर गेल्या. मी आंघोळ, कपडे धुणे उरकले. तोवर त्या आल्याच. संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या. मी सह्याद्री पाहू लागलो. निग्रहाने अन्य वाहिन्या नाकारणारे लोक आहेत हे नक्की.
थोड्या वेळाने जेवणे झाली. मग त्या म्हणाल्या, मी जाऊन येते. माझी एक मुस्लिम मैत्रीण आहे. शाळेत असतानाची. तिला आज रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या तेव्हा तिने निमंत्रण दिले- कितीही वेळ झाला तरीही ये. अगदी मध्यरात्री सुद्धा चालेल. मी तिच्याकडे जाऊन येते. साधारण नऊ वाजले होते. तासाभरात त्या जाऊन आल्या. थोड्या वेळ बोलून शेजारच्या काकांकडे गेलो. ते सानिया मिर्झाचा खेळ पाहत होते. त्यांनी स्वागत केले. बिछाना तयारच होता. मला त्यांच्याकडे सोपवून ताई घरी गेल्या. आम्ही जरा वेळ गप्पा मारल्या. काका ६५ वर्षांचे. अविवाहित. एकटेच असतात. इलेक्ट्रिकची कामे करतात. दुकान होते. बंद केले आहे. अजून हिमालयात ट्रेकिंगला जातात. छान गट्टी जमली. रात्री झोप झाली. सकाळी उठलो. त्यांना उठवले. त्यांनी लगेच चहा केला. पाणी तापवले. आंघोळ वगैरे करून तयार झालो. नागपूरला येण्याचं निमंत्रण दिलं. निरोप घेण्यासाठी शेजारी ताईंकडे गेलो. पाच मिनिटे टेकलो. त्यांनी हातावर बर्फी ठेवली. पाणी दिले. त्यांनाही नागपूरचे निमंत्रण दिले. रस्त्यापर्यंत त्या सोडायला आल्या. त्यांचा निरोप घेतला अन पुढचा प्रवास सुरु झाला.
त्यांनी मला का विचारले असेल- तुम्ही संघाचे आहात का म्हणून? का माझ्यासाठी भांडल्या असतील? विश्वास का टाकला असेल? हे प्रश्न घेऊनच बसमध्ये चढलो. एक मात्र खरं की, सर्वत्र अविश्वासाचे वातावरण असतानाही लोक परस्परांवर विश्वास ठेवतात अन तो सार्थही ठरवतात. सगळ्यांनाच असा अनुभव येईल का? संघाचे सगळेच लोक असे वागतील का? संघाचे आहोत म्हणून कोणी त्यांच्याकडे गेलेत तर त्यांनाही अशीच वागणूक मिळेल का? या प्रश्नांची उत्तरे नकारार्थीच राहतील. कुठला तरी ऋणानुबंध तर नक्कीच असेल, पण त्यासोबतच या अनुभवातील दोन्ही घटकांचा - माझा व ताईंचाही - विश्वास की, हे संघाचे संस्कार आहेत आणि जे काही घडत असतं ते ती अज्ञात शक्तीच घडवीत असते हेही कमी महत्वाचे नक्कीच नाहीत.
- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, २७ जुलै २०१६

अखंड भारत म्हणजे...

ऑगस्ट महिना आला की, अखंड भारताचा विषय सहजच येतो. येत्या १५ ऑगस्टला ६९ वर्षे पूर्ण होतील. पण त्या जखमा अजून भरून आलेल्या नाहीत. खरे तर अखंड भारत हा विषय तेवढ्यापुरता नाहीच. तो फार मोठा आहे. या विषयाची चर्चाही भरपूर होते. अखंड भारताचे पक्षधर आणि त्यात अर्थ नाही अशा दोन्ही बाजू पुढे येत असतात. मात्र `अखंड भारत' म्हणजे नेमके काय याचा विचार दोन्ही बाजूंना फारसा केलेला दिसत नाही. अगदी शेषराव मोरे यांनी त्यांच्या पुस्तकात आणि त्यांच्या पुस्तकाचा प्रतिवाद या स्वरुपात प्रकाशित झालेल्या पुस्तकात सुद्धा अखंड भारताची चर्चा नाही. त्या कल्पनेची मांडणी देखील नाही. अखंड भारत म्हटल्यानंतर डोळ्यापुढे काय येते आणि अखंड भारत म्हणताना काय अभिप्रेत असते; या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ही तफावतच पुष्कळशा वादविवादांना जन्म देते.
अखंड भारत म्हटल्यानंतर डोळ्यापुढे काय येते? भारत, पाकिस्तान, बांगलादेश यांचे एक राज्य, एक पंतप्रधान, एक मंत्रिमंडळ, एक राज्यघटना इत्यादी. शिवाय १९४७ च्या फाळणीमुळे जी पार्श्वभूमी लाभली आहे त्यामुळे, हिंदू-मुस्लिम संख्या आणि त्यांचे संबंध. अखंड भारत म्हटल्यावर साधारण याच्यापलीकडे चर्चा वा कल्पना जात नाही. मात्र अखंड भारत म्हणजे एवढेच अभिप्रेत नाही हे लक्षात घेणे खूप महत्वाचे आहे. `अखंड भारत' आमच्या राष्ट्रीयत्वाचा हुंकार आहे. ती आमच्या राष्ट्रीयत्वाची आकांक्षाही आहे. त्यासाठी राष्ट्र म्हणजे काय हेदेखील नीट समजून घ्यायला हवे. भारतीय राष्ट्रकल्पना आणि nation कल्पना एकच नाहीत हेही समजून घ्यायला हवे.
राष्ट्र म्हणजे काय? `आम्ही एक आहोत' ही जनसमूहातील भावना म्हणजे राष्ट्र. राज्य ही राष्ट्राला मजबूत करणारी आणि त्याचे संरक्षण करणारी एक व्यवस्था आहे. राष्ट्र आपल्याला हवी ती राज्यव्यवस्था निर्माण करतं किंवा नको असणारी राज्यव्यवस्था बदलून टाकतं. राष्ट्र ही मूळ आणि सर्वोपरी बाब आहे. पण ज्याला राष्ट्र म्हणतात अशी ही ऐक्यभावना असते तरी कशी? ती कशी निर्माण होते? कशी वाढते? त्याचा नेमका उगम आणि स्वरूप काय? याबाबत भरपूर गोंधळ आहे. निवासाचा भौगोलिक प्रदेश, भाषा, चालीरीती, परंपरा, प्राचीनता, जाती, पंथ, संप्रदाय, पूजापद्धती, इतिहास, मालकी इत्यादी आधारावर जनसमूहात ऐक्य निर्माण करण्याचे, ऐक्य टिकवण्याचे, एकत्व साधण्याचे अनेक प्रयत्न झाले अन आजही होत आहेत. हे सगळेच प्रयत्न फसलेले आहेत. अन भविष्यात होणारे असे प्रयत्न फसतील यातही शंका नाही. जगाचा प्राचीन अन अर्वाचीन इतिहास अशा उदाहरणांनी भरलेला आहे. कोट्यवधी शवांचे उसासे, लाखो मैल लांबीच्या रक्ताच्या नद्यांचे नि:श्वास, मानवतेच्या अपार हानीचे हिशेब या इतिहासात दबलेले आहेत. मग याचा अर्थ हा आहे का की, राष्ट्र ही चुकीची बाब आहे? राष्ट्रकल्पना टाकून द्यायला हवी का? असा काही निष्कर्ष काढण्याआधी भारताची राष्ट्रकल्पना समजून घ्यायला हवी.
अथर्ववेद सांगतात- व्यक्तीच्या मनातील आत्मभावाच्या विकासातून राष्ट्र उदयाला येतं. व्यक्तीच्या मनातील आत्मभावाच्या विकासाची ही पहिली पायरी नाही अन शेवटचीही पायरी नाही. पहिली पायरी आहे कुटुंब. त्यानंतर क्रमाने भवताल, गाव, ग्रामसमूह, असे करत करत `आत्मवत सर्वभूतेषु' इथवर प्रवास चालतो. राष्ट्र ही त्या प्रवासातील वैश्विकतेच्या अलीकडची पायरी आहे. भाषा, परंपरा, इतिहास, रीतीभाती इत्यादी गोष्टी राष्ट्र जन्माला घालत नाहीत, तर आत्मभावाच्या विकासाच्या मार्गावर चालणाऱ्या स्वाभाविक क्रियाप्रतिक्रियेतून त्यांचा विकास होतो. या आत्मभावाच्या विकासाला जे जे साहाय्यक ते ते त्यामुळे स्वीकार्य ठरते, राष्ट्रीय ठरते. त्यातूनच राष्ट्रीय स्वभाव, राष्ट्रीय मूल्य आकाराला येतात. ही दृष्टी अन त्यासाठीचे प्रयत्न यातूनच भारतीय राष्ट्र विकास पावले. त्याचा स्वभाव आणि चारित्र्य घडले. म्हणूनच ख्रिश्चन, मुस्लीम, ज्यू, पारशी या सगळ्यांना भारताने उदार आश्रय दिला. भारतभरातील भाषाभूषा ऐक्यभावनेच्या आड आल्या नाहीत. भारतीय ऋषीमुनींच्या आध्यात्मिक दर्शनातून, सगळे विश्वब्रम्हांड एकाच स्पंदनाचे आविष्कार आहेत या साक्षात्कारातून ही भारतीय दृष्टी विकसित झाली. म्हणूनच योगी अरविंद तर पुढे जाऊन म्हणतात- indian nationalism is nothing but sanatan dharma. त्यामुळेच भारतात एक सर्वसमावेशक, नित्य विस्तारशील राष्ट्र आकारास आलं.
परंतु प्रश्न तेव्हा निर्माण झाले जेव्हा भारतात आलेल्या काही शक्तींनी सर्वसमावेशक दृष्टी नाकारली. भारताने विकसित केलेली ही जीवनदृष्टी आणि जीवनशैली नाकारून एकांगी भूमिका ज्यावेळी भारतात मूळ धरू लागली अन धुडगूस घालू लागली, त्यावेळी स्वत:च्या विश्वकल्याणी दृष्टीचे, विचारांचे, तत्वांचे अन जीवनाचे रक्षण करण्याचा प्रयत्न या राष्ट्राने केला. म्हणूनच संघर्ष आणि रणवीरांचा इतिहास तुलनेने अलीकडचा आहे. वेद, उपनिषदांमध्ये रणसंघर्ष नाही. मात्र अलीकडील काळात रचलेल्या पुराणांमध्ये हा संघर्ष आहे. त्याचे कारणच संघर्षाचा विचार, त्यासाठीची सिद्धता आणि प्रत्यक्ष पराक्रम यांचा इतिहास या मूळ राष्ट्रावरील आक्रमणानंतरचा आहे. या संघर्षाचा मोठा आणि अलीकडचा परिणाम म्हणजे १९४७ ची भारताची फाळणी होय. या हजारेक वर्षांच्या संघर्षाचा परिणाम हा झाला की, या राष्ट्राच्या स्वाभाविक विकासाला खीळ बसली. याचा अर्थ आत्मभावाच्या विकासाला, एकत्वभावनेची अनुभूती अधिकाधिक लोकांना व्हावी यासाठीच्या प्रयत्नांना खीळ बसली. त्यासाठी करावयाच्या उदात्त अन प्रचंड उद्यमाऐवजी सर्वसमावेशकता नाकारणाऱ्या शक्तींशी संघर्षातच काळ, शक्ती, बुद्धिमत्ता, धन सगळे खर्ची पडले.
या पार्श्वभूमीवर अखंड भारताचा विचार महत्वाचा ठरतो. सगळ्यांना सामावून घेत, शांततापूर्ण सहजीवन हा जर भारतीय राष्ट्रकल्पनेचा व्यावहारिक आशय घेतला तर; अस्मिता भडकावून छोटे मोठे गट तयार करणे, त्याआधारे सत्ता आणि संपत्तीसाठी सतत संघर्ष करणे ही भारतेतर राष्ट्रकल्पना त्याज्यच ठरते. पाकिस्तानची निर्मिती आणि पाकिस्तानची समस्या याच `आम्ही तुम्हाला मानत नाही' या उद्दंडतेचा परिणाम आहेत. नव्हे जगभरातील अशांतता, उद्रेक, स्थलांतराचे प्रश्न, देशांचे घडणे अथवा मोडणे, युरोपीय युनियनसारखे प्रयोग फसणे, अण्वस्त्राचा धोका हे सगळे exclusivist सत्ताकांक्षी अस्मितेचे अन त्यालाच राष्ट्र समजण्याचे परिणाम आहेत. याच्या मुळाशी भारतेतर जीवनदर्शनांची अपूर्णता आहे. शांततापूर्ण सहअस्तित्व जगात कोणीही नाकारीत नाही. मात्र ते प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न यशस्वीही होत नाहीत. हे प्रयत्न जिथे अडतात किंवा अपयशी ठरतात तेथे जीवनदृष्टीचा, विचारांचा अपुरेपणा हेच कारण असल्याचे दिसून येते. एखादी गोष्ट का स्वीकारायची अथवा का नाकारायची, एखाद्या गोष्टीचा आग्रह का धरायचा अन एखादी गोष्ट का सोडून द्यायची अशासारखे प्रश्न जीवनदृष्टीच्या अपुरेपणाने निर्माण होतात. भारताने या समस्येवर मात करीत प्रदीर्घ काळ एकरस समाज येथे घडवला. एक सत्य, व्यापक, व्यावहारिक, सर्वसमावेशक, सगळ्यांचा आदर करणारे, पण लघुता- क्षुद्रता- अभद्रता- यांचा त्याग करीत `आम्ही एक आहोत' हा राष्ट्रभाव विकसित करणारे उत्तुंग जीवनदर्शन सगळ्यांपुढे ठेवून, तशा आदर्श जीवनाची आकांक्षा जागवून भारताने ते केले. संपूर्ण जगालाही शांततापूर्ण सहअस्तित्वासाठी याशिवाय दुसरा मार्ग नाही. हा मार्ग कोण दाखवणार? जे त्या मार्गावरून चालले आहेत ते. भारत आणि या भारतातील हिंदू समाज यांच्यावरच ही नियतीदत्त जबाबदारी आहे. म्हणूनच ऋषींनी `वसुधैव कुटुंबकम' म्हटले, ज्ञानोबांनी `हे विश्वची माझे घर' म्हटले आणि आचार्य विनोबांनी `जय जगत' म्हटले. परंतु हे होईल कसे? हा जो प्रवास राहील त्याचा प्रारंभ म्हणजे `अखंड भारत'.
१९४७ साली भारत खंडित झाला. अपार जीवितहानी, वित्तहानी झाली. खूप कटुता निर्माण झाली. या साऱ्याची चर्चा होते त्यावेळी त्याची कारणे शोधून आरोप प्रत्यारोप होतात. रा. स्व. संघ, हिंदू महासभा यांनी भारत अखंड राहावा यासाठी काही केले नाही असा आक्षेप घेतला जातो. तर महात्मा गांधींनी आपल्या प्रेतावरून भारताचे विभाजन होईल असे म्हटल्याची अन त्यांनी काहीही केले नाही अशीही टीका होते. कॉंग्रेसने तर अधिकृतपणे विभाजनाला मान्यता दिलीच. कम्युनिस्टांना भारताचे अनेक तुकडे हवे होते त्यामुळे त्यांचा विचार करण्याची गरजच नाही. मात्र ही सगळी चर्चा विभाजन का स्वीकारले याची आहे. विभाजन का झाले याची नाही. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, रा. स्व. संघ, हिंदू महासभा, गांधीजी, कॉंग्रेस यापैकी कोणीही देश तोडण्याची मागणी वा भाषा केली नव्हती. देश अखंड राखण्यात कोणी अपयशी ठरले असेल, कोणी विभाजन मान्य केले असेल; मात्र तशी कोणाची मागणी नव्हती. दुसऱ्या शब्दात या सगळ्या संस्था, संघटना, पक्ष अन लोक हिंदू-मुस्लिम सहअस्तित्वाचे विरोधी नव्हते. हिंदू-मुस्लिमांनी एकत्र राहू नये असे यापैकी कोणाचेही म्हणणे नव्हते. याचे मुख्य कारण हिंदूंची बहुसंख्या हेच होते. हिंदू कुठेही असला तरीही स्वभावतः सहअस्तित्ववादीच असतो. मग विभाजन कशामुळे झाले? विभाजन सहअस्तित्वाला नकार देण्याच्या मुस्लिम मानसिकतेमुळे झाले. आम्ही बाकीच्यांपेक्षा श्रेष्ठ आहोत, आम्हाला विशेष लाभ, विशेष दर्जा असला पाहिजे, अन्य लोक दुय्यम आहेत या मुस्लिम प्रवृत्तीतून भारत विभाजित झाला. ही मानसिकता नाकारणारी मुस्लिम संख्या थोडी होती, प्रभावहीन होती हे विभाजनाचे एकमेव कारण आहे. विभाजन घडवून आणणाऱ्या पाश्चात्य शक्तींनीही याच मानसिकतेचा आधार घेऊन, तिला खतपाणी घालून विभाजन प्रत्यक्षात घडवले. द्विराष्ट्रवाद कोणाची देणगी आहे यावरही चर्चा होत असते. त्यात स्वा. सावरकर यांचेही नाव येते. चर्चेपुरता हा दावा स्वीकारला तरीही, सावरकरांना दोन देश हवे होते असा त्याचा अर्थ होत नाही. एकाच देशात दोन राष्ट्रसमूह राहू शकतात. त्यामुळे द्विराष्ट्रवाद कोणीही प्रतिपादन केलेला असला तरीही ते भारत विभाजनाचे कारण नाही. भारत विभाजनाचे एकमेव कारण सहअस्तित्वाला नकार देणारी मुस्लिम मनोवृत्ती आणि त्या मनोवृत्तीचे पोषण करणारे त्यांचे तत्वज्ञान हेच आहे.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत खंडित स्वरुपात स्वतंत्र झाल्यानंतर मात्र एक लक्षणीय बदल झाला. कॉंग्रेसने उराशी बाळगलेले अखंड भारताचे ध्येय सोडून दिले. गांधीजींनीही आपल्या अखंड भारताच्या स्वप्नाला तिलांजली दिली. परंतु रा. स्व. संघ, हिंदू महासभा, स्वा. सावरकर यांनी मात्र अखंड भारताच्या ध्येयाचा त्याग केला नाही. स्वातंत्र्यानंतर अस्तित्वात आलेला भारतीय जनसंघ या राजकीय पक्षानेही अखंड भारताचे ध्येय स्वीकारले होते. यातील हिंदू महासभा शक्तिहीन आणि निष्प्रभ झालेली आहे. सावरकरांचा वारसा सांगणारी कोणतीही संघटीत शक्ती अस्तित्वात नाही. अन भारतीय जनसंघाचा नवीन अवतार असलेल्या भारतीय जनता पक्षाने अखंड भारत हा विषय टाकून दिलेला आहे. रा. स्व. संघ मात्र अजूनही अखंड भारताचे स्वप्न बाळगून आहे. प्रसिद्ध समाजवादी डॉ. राममनोहर लोहिया यांनी जनसंघाचे नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्यासह अखंड भारताच्या दिशेने टाकलेले पाउल या स्वरुपात एका confederation ची कल्पना मांडली होती. रा. स्व. संघातर्फे अजूनही अखंड भारताचे स्मरण केले जाते आणि त्याची ती आकांक्षाही आहे.
अखंड भारत ही वास्तविकता होऊ शकेल का? कशी असेल ही वास्तविकता? याचाही विचार अस्थानी ठरू नये. एक राज्य, एक सरकार, एक पंतप्रधान, एक सैन्यदल, एक कायदा असे त्याचे स्वरूप राहणार नाही हे निश्चित. असे स्वरूप राहणारच नाही असे नाही. पण त्याला प्रदीर्घ काळ लागेल. सुरुवातीला तसे चित्र नसेलच. यासोबतच हेही लक्षात घ्यायला हवे की, अखंड भारत म्हणजे केवळ भारत- पाकिस्तान- बांगलादेश- एवढेच नाही. अखंड भारत या कल्पनेत श्रीलंकेपासून अफगाणिस्तानपर्यंत आणि पूर्वेला नेपाळ, ब्रम्हदेश, भूतान पर्यंत सगळ्या लहानमोठ्या देशांचा समावेश असेल. ढोबळ मानाने आज ज्याला `सार्क' म्हणून ओळखले जाते तो प्रदेश. या प्रदेशात भारताशिवाय जे देश आहेत त्यांच्यात मुस्लिमांशिवाय हिंदू, बौद्ध व अन्य लोकही राहतात. त्यांच्यात खूप वितुष्ट वा शत्रुत्व नाही. पूजापद्धती, आचारव्यवहार इत्यादी मिळतेजुळते आहे. श्रीलंकेचे प्रमुख भारतातील मंदिरात दर्शनासाठी येतात. श्रीलंकेतील महिला साडी परिधान करतात. खूपसे साम्य आणि सौहार्द्र या देशांमध्ये आहे. `सार्क'च्या माध्यमातून विविध प्रकारची देवाणघेवाण यांच्यात होत असते. एक आर्थिक गट म्हणून पुढे येण्याचीही या देशांची आकांक्षा आहे. परस्परांच्या देशात जाण्यासाठी व्हिसा आदी लागू नये असेही प्रयत्न सुरु आहेत. हीच देवाणघेवाण अधिक व्यापक आणि मूलगामी करीत वैचारिक आणि भावनिक स्तरापर्यंत वाढवली तर अखंड भारताचा एक महत्वाचा टप्पा साध्य होईल. असे झाल्यास निर्माण होणारी शक्ती आजच्या `भारतीय उपमहाद्विपाचे' `भारत' होण्यासाठी मोठा आधार ठरेल. अखंड भारत प्रत्यक्षात येण्याची सुरुवात पाकिस्तानपासूनच व्हायला हवी असे कुठे आहे?
मुख्य अडचण पाकिस्तान व बांगलादेश यांची आहे. परंतु आजची परिस्थिती तशीच राहील असे नाही. वास्तविक हे दोन्ही देश आर्थिक, सामाजिक, राजकीय दृष्टीने इतके खिळखिळे झाले आहेत की, त्यांचे अस्तित्व टिकेल का असा प्रश्न उघडपणे चर्चिला जातो. त्यांचे अस्तित्वच टिकणार नाही अशी साधार भीती अनेकांना वाटते. उद्या समजा हे देश विखुरले तर? जागतिक शक्ती त्यांचा अफगाणिस्तान करणार नाहीत याची शाश्वती देता येत नाही. आपल्या शेजारी दुसरा अफगाणिस्तान तयार होणे भारताला परवडणारे नाही. त्यामुळे हे देश विखुरलेच तर त्यावेळी निर्णायक चाल खेळणे भारताला आवश्यक ठरेल. तशी चाल भारत खेळू शकला तर तेही अखंड भारताच्या दिशेने टाकलेले पाउल ठरेल. अनेकांना हे पटणार नाही, पण सध्याच्या स्थितीत पाकिस्तान आणि बांगलादेश विखरु नयेत असाच भारताचा प्रयत्न असायला हवा. हे दोन्ही देश एकसंघ राहावेत यासाठी भारताने प्रयत्न करायलाही हरकत नाही.
अखंड भारताचा सकारात्मक विचार करण्यासारखे काही बदल १५ ऑगस्ट १९४७ नंतर झाले आहेत का, याचाही विचार क्रमप्राप्त ठरतो. असे बदल झाले आहेत असे ठामपणे म्हणता येईल. कोणते आहेत हे बदल?
१) हिंदूंची वाढलेली शक्ती. हिंदूंचे संघटन, हिंदूंची आर्थिक, सामाजिक, राजकीय शक्ती वाढलेली आहे.
२) भारतातील मुसलमानांची मानसिकता १०० टक्के पाकिस्तानी राहिलेली नाही.
३) पाकिस्तानपेक्षाही अधिक मुस्लिम भारतात राहतात अन तेही हिंदूंबरोबर. भारतातील, पाकिस्तानातील अन जगभरातील मुस्लिमांना आता याची जाणीव होऊ लागली आहे.
४) भारताची एक देश म्हणून वाढलेली शक्ती अन त्याने जगात प्राप्त केलेले स्थान.
५) पाकिस्तान निर्मितीबद्दल झालेला पाकिस्तानी नागरिकांचाच भ्रमनिरास.
६) भारताशी शत्रुत्व करू नये असा विचार करणारी सध्या लहान असणारी पण पुढे वाढण्याची शक्यता असलेली पाकिस्तानातील शक्ती.
७) इस्लामअंतर्गत सुरु झालेले परिवर्तनाचे प्रयत्न.
८) इस्लामच्या नावाने सुरु असलेल्या दहशतवादाचे इस्लामच्याच अनुयायांना बसणारे तडाखे.
ही सगळीच कारणे भारतापासून दूर झालेल्या देशांना भारताच्या जवळ येण्यासाठी बाध्य करू शकतात, बळ पुरवू शकतात. परंतु एकीकरणाची ही प्रक्रिया केवळ सत्ता आणि संपत्तीच्या लाभहानीपुरती किंवा व्यावहारिक देवाणघेवाणीपुरती राहून चालणार नाही. तसे झाले तर त्यातून हितसंबंधांची गटबाजी निर्माण होईल, अखंड भारत नाही. अशा प्रकारची देवाणघेवाण, कला साहित्य क्रीडा यातील सहकार्य आणि सहयोग इत्यादीसोबत; कोणत्याही काळात आणि कोणत्याही लोकांसाठी, कोणत्याही परिस्थितीत आधारभूत ठरू शकणारे भारतीय जीवनदर्शन रुजवण्याला प्राधान्य द्यावे लागेल. `एकं सत, विप्रा: बहुधा वदन्ति', `सर्वेपि सुखिनः सन्तु', `सर्वं खल्विदं ब्रम्ह', `ईशावास्यमिदं सर्वम' ही आणि यासारखी जीवनदृष्टी घडवणारी तत्वे जगण्याचा एक भाग होतील हे पाहिले पाहिजे. यासाठी प्रथम आजच्या भारतात मोठे वैचारिक अन भावनिक परिवर्तन हवे. त्यातून आजच्या भारताची क्षमता वाढेल. ती वाढल्याशिवाय पुढे पाउल टाकताच येणार नाही. भारताची ही क्षमता केवळ तंत्रज्ञान, उद्योग, शेती, सेवा, पैसा, साधने, सुखसोयी यांची क्षमता नसावी. या सगळ्यासह विचारांची क्षमता हवी. विचारांची व्यापकता, कणखरता, मुळापर्यंत जाण्याची तयारी, त्यातून विकसित होणारी जीवनदृष्टी, त्या दृष्टीला अनुकूल व्यवहार; ही सगळी त्या क्षमतेची अंगे होत. यातून अखंड भारत साकार होईल. अन अखंड भारत साकार होणे optional नाही. जमले तर करू बुवा, नाही तर नाही; असे चालूच शकत नाही. अखंड भारत व्हावाच लागेल, त्याला पर्याय नाही. कारण त्याशिवाय संपूर्ण पृथ्वीवरील मानवी सहअस्तित्व सार्थक, शांततापूर्ण अन आनंददायी होऊच शकत नाही. अखंड भारताचा अंतिम टप्पा गाठेपर्यंत भूमिका आणि रणनीती म्हणून अनेक बाबी कराव्या लागतील. वरवर पाहता त्या अखंड भारताच्या स्वप्नाशी विसंगत वाटू शकतील. उदाहरणार्थ- अण्वस्त्रसज्जता. अखंड भारताच्या अंतिम चित्रात त्याला काहीही स्थान नाही. पण त्याची तात्कालिक अपरिहार्यता देखील नाकारता येत नाही. सिद्धांत, भूमिका आणि धोरण यांचा संतुलित विचारव्यवहार अन अशा विचारव्यवहाराची सार्वत्रिक समज या गोष्टी आवश्यक आहेत.
थोर तत्वचिंतक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी अखंड भारत या संबंधाने व्यक्त केलेले विचार अखंड भारताच्या दिशेने करावयाची वाटचाल, त्याची तात्विक भूमिका आणि त्याचे व्यवहारिक मार्गदर्शन करणारे आहेत. आपल्या दीर्घ लेखात पंडितजी लिहितात- `अखंड भारत केवळ देशाच्या भौगोलिक एकतेचा परिचायक नाही, तर जीवनाच्या भारतीय दृष्टिकोनाचा द्योतक आहे. हा दृष्टीकोनच अनेकतेत एकतेचे दर्शन घडवीत आहे. म्हणूनच आमच्या बाबतीत अखंड भारत ही अशी एखादी राजकीय घोषणा नाही, की जी विशिष्ट परिस्थितीत लोकप्रिय होईल म्हणून आम्ही स्वीकारली आहे.अखंड भारताची धारणा हा आमच्या संपूर्ण जीवनदर्शनाचा मूलाधार आहे. जर आम्ही युगायुगातून वाहत आलेल्या आपल्या जीवनधारेच्या अंत:प्रवाहाचे दर्शन घेण्याचा प्रयत्न करू, तर आम्हाला असे आढळून येईल की, आमची राष्ट्रीय चेतना सदैव अखंडतेसाठी प्रयत्नशील राहिलेली आहे आणि त्या प्रयत्नात आम्ही पुष्कळ प्रमाणात सफलही झालो आहोत. १९४७ चा पराजय हा भारतीय एकत्वाच्या अनुभूतीचा पराजय नाही, तर राष्ट्रीय एकतेच्या नावावर केलेल्या भ्रांत प्रयत्नांचा पराजय आहे. जर भौगोलिक दृष्ट्या खंडित झालेल्या भारतात हिंदू मुस्लिमांमध्ये एकत्वाची अनुभूती शक्य असेल, तर शेष भूभाग आपल्याशी एकजीव व्हायला वेळ लागणार नाही. एकतेच्या अनुभूतीच्या अभावाने जर देश खंडित झाला आहे, तर त्या अनुभूतीच्या अस्तित्वाने तो अखंड होईल. आम्ही त्याचसाठी प्रयत्न करायला हवा.'
- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, १० ऑगस्ट २०१६