सोमवार, १४ ऑगस्ट, २०२३

प्रयत्न आणि उपाय

प्रयत्न आणि उपाय यांच्यात फरक आहे हे आपल्याला कळतं का? बहुतेक नाही कळत. रोज सतत पाहायला, ऐकायला मिळणारं अरण्यरुदन, आक्रोश, आकांडतांडव, अभिनिवेश पाहून तरी तसंच वाटतं. धार्मिक कर्मकांड, विज्ञान तंत्रज्ञान, राज्यघटना, योग, शिक्षण, वैद्यकशास्त्र, संस्कार, गुन्ह्याला सजा, चांगल्या कामाला पुरस्कार, कला, व्यायाम, आहार... कोणतीही गोष्ट घ्या. अन थोडा विचार करून पाहा. `अमुक गोष्टीने अमुक होईल' असे जे जे म्हणून दावे केले जातात ते ते खोटे ठरतात. एखादा उपचार हा उपाय असता तर त्याचे निकाल १०० टक्के लागायला हवेत. ते लागत नाहीत. या जगात आजवर जे जे म्हणून झालं आणि सध्या सुरु आहे, ते सारेच्या सारे प्रयत्न आहेत. ते कधी परिणाम देतात, कधी देत नाहीत. आम्हाला हवे ते, आम्हाला हवे तेवढे, आम्हाला हवे त्या पद्धतीने, आम्हाला हवे तेव्हा परिणाम आले की आम्ही खुश होतो. हा प्रयत्नाचा परिणाम आहे असा दावा करतो आणि एकांगीपणे, अट्टाहासाने त्याला घट्ट धरून ठेवतो. आम्हाला क्षणभर सुद्धा प्रश्न पडत नाही की, मिळालेला परिणाम हा प्रयत्नामुळे मिळाला असेल तर त्याचा अनुभव १०० टक्के का नसतो? असा प्रश्न पडत नाही, पण तो समोर आला की आम्ही कारणे शोधतो. त्यावरून वेगवेगळी मते मांडली जातात. एखादा प्रयत्न असफल का झाला याची कारणमीमांसा करताना एकवाक्यता कधीच राहत नाही. कारण प्रत्येकाला अपयशाची कारणे जरी वेगळी वाटली तरीही प्रत्येकाच्या मनात एक मात्र अगदी शिगोशिग भरलेलं असतं- प्रयत्न हाच उपाय आहे. दु:ख असो, दारिद्र्य असो, वेदना असो, वंचना असो, अभाव असो, आकांक्षा असो, आपल्या कल्पनेतील एखादे चांगले- सुंदर- सुखद- व्यक्तिगत वा सामुहिक चित्र असो; त्यासाठी जे जे करतो वा केलं जातं ते उपाय आहेत ही आमच्या मनातील भावना आम्हाला जाणवतच नाही. परंतु कोणताही विचार, कोणतीही कृती; हे प्रयत्न आहेत, प्रयत्न असतात. एखाद्या गोष्टीला उपाय समजणे याचा अर्थ, अपेक्षित परिणामांची शाश्वती वा खात्री वाटणे, शाश्वती वा खात्री गृहीत धरणे असते. मात्र प्रयत्न समजणे याचा अर्थ, परिणामांचा विचार सोडून देऊन प्रामाणिक प्रेरणेने कृती करणे असा होतो. उपाय समजले की, अपयशाचे दोषारोपण करण्याची चढाओढ सुरु होते. प्रयत्न समजले की, आत्मचिंतन येतं. उपाय समजले की, जबाबदारी ढकलण्याची अहमहमिका सुरु होते. प्रयत्न समजले की, जबाबदारी स्वीकारणे सुरु होते. उपाय समजले की, स्वत:ला excuse मागणे सुरु होते. प्रयत्न समजले की, स्वत: स्वत:ची चिरफाड करणे सुरु होते. उपाय समजणे दुबळे बनवते. प्रयत्न समजणे सशक्त बनवते. उपाय समजणे म्हणजे अहंकार गोंजारणे. प्रयत्न समजणे म्हणजे अहंकार तपासणे. उपाय समजणे म्हणजे स्वत:ला सर्वशक्तिमान समजणे. प्रयत्न समजणे म्हणजे अपूर्णतेचा बोध होणे. `कर्मण्येवाधिकारस्ते, मा फलेषु कदाचन' या कालातीत उपदेशाचे हे मर्म असावे. महाभारताचे युद्ध भगवद्गीतेच्या प्रस्थापनेसाठी होते. आम्हाला मात्र महाभारत युद्धातच रस आहे. अजूनही. कौरव किंवा पांडवांच्या बाजूला उभे राहण्यातच आम्हाला धन्यता वाटते. आम्हाला भगवद्गीता हवी आहे का?

आजच्या घटकेला सुरु असलेल्या एकूण एक चर्चा पाहून हा प्रश्न मनात उभा राहिला. स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देताना आपणापुढे ठेवतो.

- श्रीपाद कोठे

नागपूर

मंगळवार, १५ ऑगस्ट २०१७

अमृतयोग

पंतप्रधानांनी आजच्या भाषणात २०४७ पर्यंत विकसित देश होण्याचा संकल्प जाहीर केला. हे छान झालं. अमृत महोत्सवाच्या उत्सवातून आपल्याला बाहेर पडायचं आहे हे त्यातून स्पष्ट व्हावं. या संकल्पासाठी काय करावं लागेल यावरही ते बोलले. मला तीन गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या. १) आत्मनिर्भर भारत. २) घराणेशाहीतून मुक्ती. ३) भ्रष्टाचारातून मुक्ती. या संदर्भात काही सूचना, काही विचार.

घराणेशाहीतून मुक्ती म्हटल्याबरोबर गांधी परिवार हे सगळ्यांच्या मनात येतं. पण हे तेवढ्यापुरतं असू नये. शिक्षण, उद्योग इत्यादी क्षेत्रातही घराणेशाही खूप आहे. ही घराणेशाहीसुद्धा असू नये. 'औद्योगिक घराणी' यांची जागा 'प्रत्येक घराण्याचा (परिवाराचा) उद्योग' याने घ्यावी. याचाच विस्तार करायचा तर - देशाचे एक रिलायन्स, देशाचे एक अमूल, देशाचे एक पतंजली, देशाचे एक लिज्जत... ... ... असे न राहता; जिल्ह्याचे रिलायन्स, जिल्ह्याचे अमूल, जिल्ह्याचे पतंजली, जिल्ह्याचे लिज्जत... असे असावे. पाणी, दूध, धान्य, तेल, स्वच्छता, पापड, लोणची, शेवया, शिक्षण, आरोग्य, सुरक्षा, पोलीस, कपडे, पादत्राणे, खते, बांधकाम; अशा असंख्य गोष्टीत प्रत्येक जिल्हा स्वयंपूर्ण व्हावा. वास्तविक न्यायव्यवस्थेत देखील काही विषयांसाठी जिल्हा हीच अंतिम सीमा ठरवायला हवी. जिल्हा स्तरावर होऊ शकणारी उत्पादने, त्यांचे वितरण, सेवा यासाठी जिल्हा स्तरापेक्षा मोठ्या कंपन्या, प्रतिष्ठाने असू नयेत. यासाठी जसा समाजाने पुढाकार घेतला पाहिजे; तसेच नियम, कायदे इत्यादीसाठी शासनाने देखील आपला वाटा उचलायला हवा. 

समाजाने जसे सुरुवातीला काही अडचणी सोसण्याची तयारी ठेवावी, तसेच शासनाने देखील सुरुवातीला नाराजी सहन करण्याची तयारी ठेवावी. शेकडो गोष्टी अशा आहेत ज्यासाठी मोठ्या आस्थापनांची गरज नाही. त्यासाठी विद्यमान तंत्रज्ञान पुरेसे आहे. नवीनच तंत्रज्ञान असले पाहिजे हा स्वप्नाळूपणा सोडावा लागेल. तंत्रज्ञान ही सतत बदलणारी, विकसित होणारी गोष्ट आहे. त्यामुळे त्याच्यामागे धावण्यापेक्षा उपलब्ध तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून चांगले जीवन उभे करणे महत्त्वाचे. केवळ जगात याच्याकडे अमुक तंत्रज्ञान आहे, त्याच्याकडे तमुक तंत्रज्ञान आहे; असे करत धावाधाव करण्यात अर्थ नाही. मागासलेले अन पुढारलेले हे डोक्यातून काढून टाकले पाहिजे. जीवन महत्त्वाचे आहे तंत्रज्ञान नाही. पुढारलेले, मागासलेले, आधुनिक इत्यादी संदर्भात आपली मानसिकता सुदृढ असायला हवी विकृत नको.

खरं तर एकूणच मानसिकता योग्य वळणावर यायला हवी आहे. उदा. खाद्यतेल. खाद्यतेल काढणारे छोटे उद्योजक आजही आहेत. त्यांची संख्या वाढूही शकेल. पण तेल काढण्यासाठी तेलबिया उपलब्ध असायला हव्यात. त्यासाठी शेती नीट व्हायला हवी. आज त्याची मानसिकता नाही. ही मानसिकता नसण्याची पुष्कळ कारणे आहेत. त्यातील एक कारण आहे अवास्तव स्वप्ने. आपल्याला समाज म्हणून स्वप्नेही योग्य, व्यावहारिक व मानवीय पाहावी लागतील. अवास्तव स्वप्नांमुळे तरुण मोठ्या प्रमाणात निष्क्रिय राहतात हे वास्तव ध्यानात घ्यायला हवे. जसे राज्य वा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा. सरकारी नोकरी म्हणजे सुखाचे आणि निश्चिन्त आयुष्य असा समज. त्यामुळे त्यासाठी आटापिटा. प्रत्यक्षात परीक्षा देणाऱ्यांपैकी किती जणांना ती नोकरी मिळते. बाकी सगळे त्या प्रयत्नात जो वेळ वाया घालवतात त्याचे काय? मनोरंजन क्षेत्राचे उदाहरण देखील घेता येईल. जेवढे लोक यशस्वी होतात, नावलौकिक व पैसा कमावतात त्याच्या कितीतरी पटीने लोक सुमार जीवन ओढत राहतात. अशी अनेक उदाहरणे घेता येतील. अन दुसरीकडे अनेक कामांना माणसे नाहीत किंवा सुमार माणसे आहेत. स्वप्ने व्यावहारिक ठेवतानाच, सगळ्या कामांच्या मोबल्यातील तफावत सुद्धा व्यावहारिक पातळीवर आणावी लागेल. शेती आणि सरकारी नोकरी यातील मोबल्यातील तफावत खूप जास्त असेल तर ओढाताण होणारच. त्यासाठी काही ठिकाणी मोबदला कमी करण्याची गरज असेल तर तेही करायला हवे. मनोरंजन क्षेत्राची चमकधमक आणि अवाजवी पैसा कमी करण्याचीही गरज आहे.

देश स्वयंपूर्ण व्हायचा असेल, भ्रष्टाचारमुक्त, घराणेशाहीतून मुक्त व्हायचा असेल तर; आपल्याला खऱ्या अर्थाने आध्यात्मिक व्हावे लागेल. अध्यात्म याचा अर्थ ऐहिकतेसाठी वा पारलौकिकासाठी देव प्राप्त करणे नाही; तर स्वतः देवस्वरूप होणे. ही आत्मविकासाची प्रक्रिया आहे. याशिवाय आम्ही ना भ्रष्टाचारातून मुक्त होणार, ना घराणेशाहीतून मुक्त होणार, ना आपली स्वप्ने व्यावहारिक करू शकणार. सगळं जग मुठीत करणे, अमाप पैसा कमावणे, सगळ्यांवर सत्ता गाजवणे, मोठं... मोठं... मोठं... होत जाणे, आणखीन... आणखीन... आणखीन... मिळवत जाणे; याला नियंत्रित करायचं असेल तर आध्यात्मिक वृत्तीला पर्याय नाही. याशिवाय आमच्या सवयी इत्यादींसाठीही आध्यात्मिकता महत्त्वाची आहे. खाद्यान्न समस्या आहे. त्यासाठी फक्त उत्पादन वाढवून उपयोग नाही. वाया जाणारे अन्न वाया जाणार नाही हेही आवश्यक आहे. किती जण याची जाणीव रोजच्या जगण्यात ठेवतात. अन्न वाया जाणार नाही म्हणजे नाही. त्यासाठी आवडीनिवडी इत्यादी फार टोकदार न ठेवता flexible ठेवण्याची सवय करावी लागेल. न आवडणारी भाजी समोर आली तरी खाता यायला हवी. योग्य अंदाज घेऊन स्वयंपाक करण्याची सवय लावून घ्यावी लागेल. उरलेले अन्न टाकून न देता त्याला नवीन करून उपयोग करण्यात कमीपणा वाटू न देण्याची मानसिकता घडवावी लागेल. आम्हाला कसली कमी नसल्याने काहीही करू हा माज सोडावा लागेल. अशा असंख्य बाबी. त्यासाठी वृत्ती आध्यात्मिक हवी. योग हा योगदिवसापुरता किंवा शारीरिक सुदृढतेपुरता न ठेवता; योग म्हणजे कर्मकुशलता आणि चित्तवृत्तींचा निरोध (मनाला काबूत ठेवणे म्हणजेच मनाला वाटते त्यात वाहून न जाता, मनाला काय वाटायला हवे त्याकडे वळवणे) हे व्यवहारात उतरवावे लागेल.

हे सगळे उत्सव करण्याइतके सोपे नाही. त्यासाठी व्यक्ती म्हणून आणि समाज म्हणून स्वतःला बदलावे लागेल. अमृतयोगाने त्यासाठी शक्ती, बुद्धी द्यावी.

- श्रीपाद कोठे

सोमवार, १५ ऑगस्ट २०२२

बुधवार, २९ मार्च, २०२३

प्रतिनिधी सभेतील श्रद्धांजली प्रस्ताव

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागौर येथे नुकत्याच झालेल्या प्रतिनिधी सभेत पारित श्रद्धांजली ठराव खालीलप्रमाणे आहे. यातील नावांवर- विशेषत: क्रमांक १७ ते २७ वर नजर टाकावी. अन हेच चित्र यापूर्वीच्या ठरावांमध्येही दिसून येईल. अन्य संस्था, संघटनांच्या संबंधात असे म्हणता येईल का? सर्वसमावेशकता, सहिष्णुता, मतभेद असावेत- मनभेद नकोत, राष्ट्रीय एकात्मता; इत्यादी शब्द सहज आठवले.

अपनी प्रदीर्घ यात्रा में अपने साथ रहे ऐसे कई महानुभावों की अनुपस्थिति हम अनुभव कर रहे हैं। वैसे ही राष्ट्रजीवन में अपनी समर्पित प्रतिभा, ज्ञान तथा कर्तृत्व आदि से समाज में स्वनामधन्य हो गए ऐसे महानुभाव भी आज हमारे मध्य नहीं रहे।

1) श्री अशोक जी सिंघल - विश्व हिन्दू परिषद के मार्गदर्शक, 2) श्री मधुजी लिमए - पूर्व प्रान्त प्रचारक असम, 3) श्री मुकुंदराव पणशीकर - अ.भा. कार्यकारिणी सदस्य एवं धर्मजागरण विभाग प्रमुख, 4) श्री संजय कुलासपुरकर - वनवासी कल्याण आश्रम के क्षेत्र संगठन मंत्री, असम क्षेत्र, 5)मा. राजनारायण ठाकूर - अ.भा.प्रतिनिधि एवं महानगर संघचालक, मुजफ्फरपुर, 6) श्री कृष्णचंद्र सूर्यवंशी - वरिष्ठ प्रचारक एवं किसान संघ के अ.भा. पूर्व कोषाध्यक्ष, मध्यभारत, 7) श्री रामदौरसिंह - भारतीय मजदूर संघ के राजस्थान क्षेत्र संगठन मंत्री, 8) श्री नित्यानंद जी - पूर्व प्रांत कार्यवाह, उत्तरांचल, 9) श्री अरुणभाई यार्दी - अखिल भारतीय विद्यार्थी परिषद के पूर्व अ.भा.अध्यक्ष, गुजरात, 10) श्री नेकशाम समशेरी - पूर्व क्षेत्र संघचालक, पश्चिम उत्तरप्रदेश क्षेत्र, 11) श्री वीरेन्द्र प्रसाद अग्रवाल - पूर्व प्रांत संघचालक, जयपुर प्रांत, 12) श्री जगन्नाथ गुप्ता - पूर्व प्रदेशाध्यक्ष विहिप एवं कल्याण आश्रम, जयपुर प्रांत, 13) श्री सुजीत - कन्नूर जिले के स्वयंसेवक, 14) Dr. K. N. Sengottaiyan - अध्यक्ष, सेवाभारती तमिलनाडु, 15) श्री जे. दामोदर राव - पूर्व प्रांताध्यक्ष भारतीय किसान संघ एवं पूर्व विधायक, भा. ज. पा., तेलंगाणा, 16) श्री व्ही. रामा राव - पूर्व राज्यपाल, सिक्किम, 17) श्री शरद जोशी - किसान नेता, महाराष्ट्र, 18) श्री मुफ्ती मुहम्मद सईद – मुख्यमंत्री जम्मू कश्मीर 19) श्री ए. बी. बर्धन - मजदूर नेता, नागपुर 20) श्री बलराम जाखड़ - पूर्व लोकसभा अध्यक्ष, 21) श्री भंवरलाल जैन - प्रसिद्ध उद्योगपति, जळगांव 22) श्री मंगेश पाडगांवकर - ख्यातनाम कवि, महाराष्ट्र, 23) श्री सईद जाफरी - सिने अभिनेता, 24) श्रीमती साधना - सिने अभिनेत्री, 25) श्रीमती मृणालिनी साराभाई - प्रसिद्ध नृत्यांगना, 26) आचार्य बलदेव जी -गुरुकुल कालवा, 27) पी.ए.संगमा-पूर्व लोकसभा अध्यक्ष।

वैसे ही चेन्नई में आयी बाढ़ के कारण एवं समय-समय पर घटित प्राकृतिक आपदाओं में काल के ग्रास बने, आतंकवादी घटनाओं के शिकार बने, सियाचिन में बर्फ के तूफान में तथा सीमाओं की रक्षा करते हुए अपने प्राणों की बलि चढ़ाई ऐसे सुरक्षाबलों के जवान, ऐसे समस्त महानुभावों के समस्त परिवार-जनों के प्रति अखिल भारतीय प्रतिनिधि सभा अपनी गहरी शोक संवेदना प्रकट करती है। ईश्वर उन्हें सद्गति प्रदान करें। उन्हें हम हमारी श्रद्धांजलि अर्पित करते हैं।

- श्रीपाद कोठे

३० मार्च २०१६

गणेश चा लेख व माझी प्रतिक्रिया

माझे मित्र गणेश कनाटे यांची सद्यस्थितीत आवश्यक आणि महत्त्वाची अशी ही पोस्ट. (लिंक दिलेली आहे.) त्यावरील माझी प्रतिक्रिया. वादावादी न करता चर्चा सकारात्मक दिशेने जावी एवढीच अपेक्षा. माझी प्रतिक्रिया - 

गणेश, तू हा initiative घेतो आहे याचा समाधान आहे. तुझ्या या प्रामाणिक प्रयत्नांना supplement म्हणून फक्त काही गोष्टी. रोग दूर करायचा असेल तर फक्त लक्षणांचा विचार करून चालत नाही. कारणांचाही विचार करावा लागतो, हे मान्य व्हायला हरकत नसावी. अन तिथे नेमकी बरेचदा पंचाईत होते. गुण अवगुण, बुद्धिमत्ता, क्षमता इत्यादी गोष्टी समूहगत नसतात हे अगदी खरं आहे पण त्या तशा असतात या समजातून बाहेर यावे लागेल. अन ती जबाबदारी सगळ्या जाती, पंथ, पक्ष, संस्था, संघटना यांची आणि त्यात सहभागी प्रत्येकाची आहे. शिवाय हे फक्त लिहिणे वा बोलणे यातूनच नाही तर व्यवहारातून दिसावे, जाणवावे, व्यक्त व्हावे लागेल. आपल्या नागपुरातल्याच एक दोन गोष्टी उदाहरण म्हणून. स्व. सुदर्शनजी रा. स्व. संघाचे सरसंघचालक झाले तेव्हा त्यांनी दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले होते. नागपुरातल्या अनेक मोठमोठ्या लोकांनी डॉ. आंबेडकर यांचा पुतळा अपवित्र झाला म्हणून तो धुतला होता. अगदी स्व. भा. ल. भोळे यांच्यासारख्या माणूस त्यात होता. द्वेषपूर्ण आणि द्वेष निर्माण करणाऱ्या या कृत्यावर कोणी कोणी आणि काय प्रतिक्रिया दिल्या? अगदी याच धाग्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणारेही अनेक नागपूरकर आहेत. त्यावेळचे जाऊ द्या. आज 'ते कृत्य चूक होते' एवढे तरी ही मंडळी म्हणू शकते का? हे धैर्य आणि प्रामाणिकपणा नसेल तर इच्छाचिंतनाला किती अर्थ राहील?

दुसरे उदाहरण. मुस्लिम राष्ट्रीय मंच. आपल्या नागपूरचेच अन तूही ज्यांच्यासोबत काम केलं आहे ते विराग पाचपोर या मंचाचं काम करतात. हिंदू- मुस्लिम संवाद सौहार्द वाढावा याचा तो प्रयत्न. दोन दशके झाली त्याला. माहिती नाही असे नाही पण किती लेखक, किती पत्रकार, किती विद्वान, किती विचारवंत त्याचा उल्लेख तरी करतात किंवा त्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतात? मी तर म्हणेन मुद्दाम टाळतात. आजपासून सुमारे साठ वर्षांपूर्वी विश्व हिंदू परिषदेने अनेक संतांना एकत्र आणून अस्पृश्यता चुकीची असून त्याला धर्माचा आधार नाही अशी जाहीर भूमिका घेतली आणि यासाठी अनेक प्रयत्न केले. समाजातील किती विचारवंतांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला?

- व्यक्तिगत अनुभवांच्या आधारेही खूप बोलता येईल. त्या अनुभवांचेच काही लेख होतील. मात्र संबंधित लोक त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करतात, त्याची टवाळी करतात आणि शहाजोगपणे मोठमोठ्या गोष्टी करतात. अन मी चिल्लर लोकांबद्दल बोलतच नाही. अगदी मोठाली नावे आहेत. नाव मोठं लक्षण खोटं असे हे लोक किती ढोंगी असतात हे मला व्यक्तिगत अनुभव आहेत. मी ते गंगार्पण करतो. सगळ्यांनी करायला हवेत पण नाही करू शकत. अन मी म्हणतो तशी अपेक्षा तरी का करावी? उघड दिसणाऱ्या गोष्टींबाबत प्रामाणिक खंत तर व्यक्त करायला हवी. तरच पुढे जाता येईल.

- तू म्हणतो तसे हिंदूंना खोऱ्यातून पळून जावे लागले तसे आजही तिथे राहणारे हिंदू आहेतच. हाच न्याय अन्यत्रही लावायला हवा की नको. देश स्तरावर मुस्लिम समाज राहतो आहेच नं? मग हिंदू बिथरले या ओरड्याला काय अर्थ राहतो? किमान ते तसं नाही हे प्रकटपणे बोलणारे हवेत.

- योगायोगाने आजच्या फेसवुक मेमरीत या विषयाशी संबंधित एक पोस्ट आली. तिची लिंक पोस्ट करतो. पहावी. त्यावर प्रतिक्रिया वाचायलाही आवडेल.


गणेश कनाटे यांच्या पोस्टची लिंक -

https://www.facebook.com/633133472/posts/10158828263108473/


माणुसकी जिवंत असलेले लोक कमी प्रमाणात का होईना पण तेव्हाही होते आजही आहेत! 

१९८६ पासून १९९७ पर्यंत काश्मिरी पंडितांचे खोऱ्यातून मोठया प्रमाणात विस्थापन झाले. ते विस्थापन होण्यापूर्वी पंडितांची लोकसंख्या खोऱ्यातील एकूण लोकसंख्येच्या ४.५% इतकी होती. (काश्मीर फाईल्समध्ये अनुपम खेर ती २% होती, असं म्हणतो.) त्यापैकी बहुसंख्य पंडित खोरे सोडून प्रथम जम्मूला व नंतर देशात इतरत्र स्थलांतरित झाले. इतके मोठ्या प्रमाणात विस्थापन होऊनही जवळजवळ ८०० पंडितांचे परिवार खोऱ्यातून कधीच बाहेर पडले नाहीत. ते अजूनही तिथेच आहेत. विश्वास बसत नसेल तर श्रीनगरला एक वैष्णो भोजनालय आहे त्याच्या मालकाशी कधी गेलात तर भेटून या.

जर खोऱ्यातील ९५% मुसलमान ५% हिंदूंचे शिरकाणच करायला निघाले असते तर एकतरी पंडित कुटुंब सोडा व्यक्ती तरी खोऱ्याबाहेर जिवंत बाहेर पडू शकली असती काय?

मुसलमानांचा पराकोटीचा द्वेष करणाऱ्या आरती टिक्कु या पत्रकार मुलीच्या कुटुंबालाही एका मुस्लिम मुलानेच त्यांना जीवे मारण्याच्या कटाबद्दल माहिती दिली आणि एका मुस्लिम टांस्पोर्टरच्या ट्रकमधून आधी टिक्कु परिवाराच्या मुली व नंतर संपूर्ण परिवार जम्मूला पोहोचू शकला.

तसेच गांधींच्या हत्येनंतर सातारा-सांगली-कोल्हापूर भागातील ब्राह्मणांच्या घरांवर चालून गेलेल्या जमावासमोर अनेक बहुजन समाजातील नेते, गावागावांतील प्रतिष्ठित नागरिक/नेते उभे झाले नसते तर साडे तीन टक्के लोकसंख्या असलेले ब्राह्मण या राज्यात औषधालादेखील उरले नसते,असे आपल्याला वाटत नाही का?

आकड्यांचा खेळ सोडून देऊ. पण काश्मीरच्या प्रकरणात काही माणुसकी जपणारे मुसलमान निश्चितच होते तसेच गांधीहत्येनंतर असलेल्या प्रक्षोभात माणुसकी जपणारे ब्राह्मणेतर लोकही निश्चितच होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे उदाहरण आवर्जून द्यायचे का?

असे असेल तर आज जी मंडळी काश्मीर प्रश्नाचा आधार घेऊन मुसलमानांच्या विरोधात आणि गांधीहत्याप्रकरणी काँग्रेसविचारांच्या बहुजनांच्या विरोधात फेसबुक, व्हाट्सअप्प इत्यादी समाजमाध्यमांवर द्वेष पसरविणारी खोटी माहिती पेरताहेत, यांचा सद्सद्विवेक मेला असे म्हणायचे काय? यांना केवळ इतरांचे रक्त प्यायचे आहे काय? राजकारणात मते मिळविण्यासाठी, सत्ता मिळविण्यासाठी कुणाचेही रक्त सांडले तरी यांना चालतं काय?

माझे म्हणणे भाबडे आणि आजकाल ज्याला शहाणपणा म्हणतात तसे नसलेले वाटत असेल तर माझी काहीही हरकत नाही परंतु समाजात असा द्वेष पसरू नये, कुणी पसरवू नये, यासाठी जे काय करता येईल ते केले पाहिजे, असे मला मनापासून वाटते. अशा कोणत्याही प्रयत्नात मी यथाशक्ती सहभागी होईन.