शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१

स्वच्छता, फटाके, प्रदूषण वगैरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडून आल्यापासूनच स्वच्छता हा विषय लावून धरला आहे. २ ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी स्वत: रस्त्यावर उतरून आणि त्यांच्या कार्यशैलीप्रमाणे आणखी नऊ जणांना त्यासाठी आमंत्रित करून त्यांनी स्वच्छता या विषयाचे एक वातावरण तयार केले आहे. योगायोगाने पाठोपाठच दिवाळी आली. त्यामुळे फटाक्यांचा कचरा हा विषय पुढे आला. अनेक ठिकाणी हा कचरा तसाच असल्याचे पाहायला मिळाले तर अनेक ठिकाणी तो साफ करण्याची दृश्येही पाहायला मिळाली. सोबतच प्रदूषण हा विषयही जोडला गेला. पंतप्रधान मोदी हिंदुत्वाचे पाठीराखे. दिवाळी हा हिंदूंचा सण. या सगळ्या गोष्टी एकत्र करून काही निष्कर्ष काढले गेले. हिंदुत्वाचे पाठीराखे असलेले मोदी स्वच्छता अभियान राबवितात आणि हिंदू लोक आपल्या दिवाळी सणात फटाक्यांचा कचरा करतात, अशी विसंगतीही दाखवली गेली. या सगळ्या गोंधळात दोन्ही विषयांच्या मुळाशी जाताना मात्र फार कुणी दिसले नाही.

राजकारण बाजूला ठेवून पंतप्रधान मोदी यांच्या भाषणांकडे बारकाईने पाहिले तर एक महत्वाची गोष्ट ते सतत मांडत असल्याचे दिसून येते. अगदी त्यांच्या प्रचारसभातही त्यांनी हा मुद्दा मांडला होता. तो मुद्दा म्हणजे- एकटे मोदी वा एकटे सरकार काही करू शकत नाही. हा मुद्दा किती जण ऐकतात, किती जण लक्षात ठेवतात, किती लोकांना त्याचे आकलन होते आणि किती लोक व्यवहारातील त्याचे स्वरूप समजू शकतात हा गहन प्रश्न आहे. आजही आजूबाजूला लोक चर्चा करताना दिसतात की, `मोदी काही करून दाखवतील. मोदी आहेत तोवर सगळे ठीक चालेल. सगळे सुधरून जाईल.' देशाची राज्यव्यवस्था असो की घरची कुटुंबव्यवस्था नेत्याची एक विशिष्ट भूमिका असते हे निर्विवाद सत्य आहे. परंतु कुटुंबापासून देशापर्यंत एकटा नेता काहीही करीत नसतो. युद्ध जिंकल्यावर सेनापतीला पदक मिळते, पण ती कामगिरी काही त्याची एकट्याची नसते. सैन्यातील प्रत्येक सैनिकाचे श्रेय सारखे असते. प्रत्येक जण पूर्ण जबाबदारीने आणि समर्पण भावनेने आपले काम करतो तेव्हा विजय मिळतो. शिवाय नेत्यावर विसंबून राहिले तर नेता बदलला की पुन्हा घडी विस्कटायला वेळ लागत नाही. ही संपूर्ण प्रक्रिया आणि त्यातील भाव नीट समजून घेतला नाही तर हाती फार काही लागणार नाही आणि पंतप्रधान मोदी काय म्हणतात तेही समजून घेता येणार नाही.

इंग्रजांच्या काळापासून आपल्याला सवय लावण्यात आली की, तुम्ही तुमचे प्रतिनिधी निवडून द्या आणि पुढच्या निवडणुकीपर्यंत आराम करा. तुमचे कर्तव्य म्हणजे फक्त प्रतिनिधी निवडून देणे. तुम्हाला बाकी काहीही कर्तव्य नाही. तुम्हाला फक्त अधिकार. त्यामुळे आपल्या सवयी, आपले विचार करणे सगळेच बदलून गेले. म्हणजे आम्ही कसाही, कुठेही आणि कितीही कचरा करू, पण आम्हाला स्वच्छ परिसर मिळाला पाहिजे. तो आमचा हक्क आहे आणि सरकारचे कर्तव्य. कर्तव्य आणि हक्कांची ही विभागणी चुकीची असूनही चर्चेपुरती मान्य केली तरीही, एक मुद्दा शिल्लक राहतोच. तो असा की, स्वच्छतेसाठी केलेली व्यवस्था पाळण्याची जबाबदारी कोणाची? ती जबाबदारी तर दुसऱ्या कोणालाही देताच येणार नाही ना? कचरा योग्य जागी, योग्य रीतीने टाकणे हे काम कोणाचे? आपण तेवढे केले तरी खूप काम होण्यासारखे आहे. अगदी सुशिक्षित, साधनसंपन्न लोकांच्या लग्नातही जेवणाची ताटे वा अन्य कचरा कसाही, कुठेही पडलेला पाहायला मिळतो. शिवाय यात स्त्री आणि पुरुष असाही भेद नसतो. मुळात कमी कचरा करणे, स्वाभाविकपणे होणारा कचरा योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी टाकणे, आम्ही जेवढ्या आणि ज्या कचऱ्याची विल्हेवाट लावू शकतो ती स्वत: लावणे; यात आपल्याला कमीपणा का वाटतो? सार्वजनिक तर जाऊच द्या, घरगुती स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवण्याची काळजीही आपण घेत नाही. आपल्याला त्याची गरजही वाटत नाही. पान, तंबाखू, खर्रा खाऊन थुंकण्याची आपल्याला लाज वाटत नाही अन `सगळ्यांना समजून घ्यावे' या आपल्या आध्यात्मिक वृत्तीने अशा लोकांबद्दलचा सार्वजनिक तिरस्कारसुद्धा उत्पन्न होऊ शकत नाही. तिरस्काराचं सुद्धा मानवी सभ्यता आणि विकासात महत्व आहे हे समजून घेण्याची गरज आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहे मोठ्या प्रमाणात उभारण्याची गरज असून ती सरकारची जबाबदारी आहे हे खरे असले तरी, असलेल्या सुविधा आम्ही कशा वापरतो हेही तपासायला हवे. कोणत्याही गोष्टीला एकच बाजू नसते. आमची तशी कितीही इच्छा असली तरी !! परंतु आम्ही स्वत:ला इतके डोक्यावर चढवून ठेवतो की सर्वंकष विचार आम्ही करूच शकत नाही. मोदी आणि मोदींचे सरकार काय करेल याचे चर्वितचर्वण करतानाच आम्ही काय केले पाहिजे, मी काय केले पाहिजे, मी काय करू शकतो; याच्या चिंतनालाही वेळ दिला पाहिजे.

फटाक्यांची चर्चा गेल्या काही वर्षांपासून पर्यावरण, प्रदूषण या संदर्भात होते. यावर्षी त्या चर्चेला स्वच्छतेचाही एक पैलू जोडला गेला. एका झटक्यात सांगून टाकायचे तर फटाक्यांवर पूर्णपणे बंदी यायला हवी. दिवाळी साजरी करणारे किंवा न करणारेही अनेक जण याच्याशी मुळीच सहमत होणार नाहीत. आनंद, धार्मिक स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, रोजगार अशी बरीच कारणे पुढे केली जातील. ही सगळीच कारणे बहाणेबाजी या एका सदरात मोडणारी आहेत. व्यापारी आणि व्यावसायिक लोक असोत किंवा घरगुती लोक, फटाके उडवताना कुरघोडी हा एक मोठा घटक असतो. आपण अधिक किमतीचे, अधिक मोठे, अधिक आवाजाचे, अधिक प्रकाशाचे फटाके अधिक प्रमाणात अन अधिक वेळ फोडले हे दाखवण्याचा इरादा नसतो का हे त्या लक्ष्मीमातेची शपथ घेऊन सांगावे. फटाके उडवण्यातील आनंद हा आसुरी आनंदच असतो. त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे, स्वत:ला आणि इतरांना मोद देण्याऐवजी त्रास देणारी गोष्ट आनंद साजरा करणारी असूच शकत नाही.

फटाक्यांचं समर्थन करताना धर्माचा आधारही घेतला जातो. एक तर हिंदूंच्या सणाच्या वेळीच पर्यावरण वगैरे आठवते का, असा एक आक्षेप असतो. हा युक्तिवाद मुळातच तकलादू आहे. हिंदू समाजाला एकजूट होण्यासाठी आणि सशक्त होण्यासाठी इतक्या सैल मुद्याची गरज नाही. हिंदू समाज शक्तिमान करण्यासाठी त्याच्या शक्तीस्थानांवर जोर द्यायला हवा. देशकाल परिस्थितीनुसार तर्कपूर्ण अशा गोष्टींना हिंदू धर्माचा विरोध असूच शकत नाही. दुसरा युक्तिवाद असतो- फटाके फोडणे ही धार्मिक प्रथा आहे. या युक्तिवादात तथ्य नाही. अगदी प्रभू रामचंद्राच्या काळात सुद्धा अयोध्येत फटाके फोडले होते, असे सांगणारेही आहेत. भारतात असंख्य सणउत्सव सतत साजरे होत असतात. त्यांना शेकडो-हजारो वर्षांची परंपरा आहे. फटाके फोडणे हा जर धर्माचा भाग असेल तर अन्य कोणत्याही सणउत्सवाशी फटाके का जोडलेले नाहीत? अन्य अनेक उद्योग व्यवसायांचा भारताचा इतिहास शेकडो वर्षे मागे नेता येत असताना फटाका व्यवसायात आघाडीवर असलेल्या शिवकाशीचा इतिहास मात्र फक्त शे-सव्वाशे वर्षांचाच का असावा? मुळातच फटाक्यांचा जागतिक इतिहास हा दोन-अडीचशे वर्षांचा आहे. भारतात याची सुरुवात ब्रिटीश काळात झाली आणि तेव्हापासून आजतागायत फटाके हा निव्वळ व्यावसायिक प्रकार आहे. त्यात धार्मिकता काहीही नाही. धर्माचा त्याचा संबंध नाही. याउपरही समजा फटाके आणि धर्माचा संबंध असेल तरीही, हिंदू समाजाने योग्य-अयोग्य विवेक करून अनेक गोष्टीत बदल केलेले आहेत. तीच हिंदू धर्माची शिकवण आहे, त्याचे वैशिष्ट्य आहे आणि त्याचे शक्तीस्थानही.

फटाक्यांना विरोध का? त्याने रोजगाराची हानी होणार नाही का? दुसरा प्रश्न बालीश बुद्धीचा आहे. एक म्हणजे, फटाक्याने होणारे नुकसान आणि फटाके व्यवसाय बुडाल्याने होणारे नुकसान यातील, फटाक्यांनी होणारे नुकसान अधिक आहे. दुसरे म्हणजे, अशा गोष्टी अपरिहार्य असतात आणि त्यांनी खूप फरक पडत नाही. मोबाईलमुळे हजारो पिसिओधारक बेरोजगार झालेतच ना? स्वयंचलित दुचाकी वाहने वाढल्याने सायकलनिर्मिती आणि दुरुस्ती यातील रोजगार घटलाच ना? संगणक वापरणे सुरु झाल्यावर अनेक लोक बेरोजगार झाले ना? त्यामुळे हा मुद्दा गैरलागू आहे.

फटाक्यांना विरोध असण्याचे कारण आहे- त्यामुळे आरोग्य आणि पर्यावरणाची होणारी हानी. आवाज आणि वायू प्रदूषण किती होते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आपण सारे प्रत्यक्ष ते अनुभवतो. डोळे खराब होण्यापासून, डोके बधीर होईपर्यंत आणि चिडचिडेपण वाढण्यापासून जखमा होईपर्यंत, शिवाय हृदयविकार- श्वसन विकार वगैरे माहिती सगळ्यांना आहे. एक गोष्ट आवर्जून सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की फटाक्यांचे हे प्रदूषण झाडे लावून कमी होऊ शकत नाही. कारण फटाके फोडण्यातून निर्माण होणारा धूर कागद, लाकडे वा काडीकचरा यांच्या धुरासारखा साधा नसतो. कागद, लाकडे, काडीकचरा जाळला तर त्यातून फक्त कार्बन डायऑक्साइड निर्माण होईल आणि हा वायू झाडांचे अन्न आहे. त्यामुळे थोडी झाडे लावली की त्याचे प्रदूषण कमी होईल. तसेही प्रत्येक माणूस रोज चोवीस तास, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कार्बन डायऑक्साइडचे प्रदूषण श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेदरम्यान करीतच असतो. ते प्रदूषण झाडे लावून पळवता येते. मात्र फटाक्यांच्या ज्वलनात (फटाके आवाजाचे असोत की प्रकाशाचे) अनेक रसायने आणि धातू असतात. वेगवेगळ्या रंगांच्या निर्मितीसाठी अनेक विषारी धातू वापरले जातात. झाडे ही रसायने आणि धातू शोषून घेऊ शकत नाहीत.

लाल रंगासाठी स्त्रॉशियम आणि लिथियम, नारिंगी रंगासाठी कॅल्शियम, पिवळ्या रंगासाठी सोडियम, हिरव्या रंगासाठी बेरियम, निळ्या रंगासाठी कॉपर, जांभळ्या रंगासाठी पोटॅशियम आणि रुबिडीयम, सोनेरी रंगासाठी कोळसा आणि लोखंड, पांढऱ्या रंगासाठी टिटॅनियम, अॅल्युमिनियम, बेरिलियम, मॅग्नेशियम आदी धातू वापरले जातात. याशिवाय झिंक, सल्फर, फॉस्फरस यांचाही वापर केला जातो. झाडांच्या प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत कार्बन डायऑक्साइड ग्रहण करून ऑक्सिजन बाहेर सोडला जातो. अन्य धातू वा रसायने हवेत तशीच राहतात. हवेत मिसळलेले हे धातू आणि रसायने हवा, पाणी इत्यादी कायमस्वरूपी प्रदूषित करतात.

या ठिकाणी एक नोंद घेणे आवश्यक आहे. फटाक्यांप्रमाणेच सर्व प्रकारच्या स्वयं वातानुकूलन यंत्रणा (एसी), डिओडरंट्स, स्वयंचलित वाहनांचा धूर अशा काही गोष्टींनी होणारे प्रदूषण केवळ झाडे लावून दूर होणारे नाही. या ज्वलनातून उत्सर्जित होणारे क्लोरो-फ्लुरो कंपाउंडस व अन्य घटक पर्यावरण आणि आरोग्य यांना मोठी हानी पोहोचवतात. शिवाय सगळ्या गोष्टी पोटात घेऊन त्यांचे उपयुक्त अन्य गोष्टीत परिवर्तन करण्याची स्वयंसिद्ध क्षमता असलेल्या मातीशी आम्ही वैर धरलेलं आहे. त्यामुळे पर्यावरणाचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. फटाक्यांना पूर्ण फाटा देण्याची म्हणूनच आवश्यकता आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, २९ ऑक्टोबर २०१४

bifocal approach

अमेरिकेत जन्मलेल्या बालकांना (बाहेरून आलेल्या जोडप्यांच्या) आपोआप अमेरिकन नागरिकत्व मिळणार नाही अशा अध्यादेशासाठी डोनाल्ड ट्रंप कामाला लागले आहेत. एक डझन लोकांचे जीव घेणाऱ्या पेनसिल्व्हेनिया गोळीबाराची घटना ताजी आहे. या दोन्ही घटनांना जोडून विदेशी लोकांबद्दल अमेरिका अधिक कठोर होऊ शकते. आपल्या येथेही असा विचार करणारे बरेच लोक आहेत. जगातही आहेत. किंबहुना तोच जगाचा प्रवाह आहे. पण हा प्रवाह योग्य आहे का? या प्रश्नाचे उत्तर, हो आणि नाही; असे दोन्ही असायला हवे. हो यासाठी की प्राप्त परिस्थितीत तेच व्यवहार्य आहे. अन नाही यासाठी की, ते मानवी सभ्यतेच्या विकासाला बाधक आणि छेद देणारे आहे. कठोरता तर जाऊच द्या, पण शस्त्र वगैरेही असू नये; असा विचार करणारेही बरेच आहेत. वेडपटपणा याहून वेगळा शब्द त्यांच्यासाठी वापरता येणार नाही. त्यांचा उद्देश आणि भाव योग्य असला तरीही; वास्तवाचे आकलन, व्यावहारिकतेची समज आणि आपली कल्पना कशी साकारू शकेल याविषयीचा घोर स्वप्नाळूपणा; यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणेच श्रेयस्कर. पण हेही लक्षात घ्यायला हवे की, कठोर भाषा- धोरणे- अंमलबजावणी- यांच्या परिणामाची व्याप्ती मर्यादित असते. मुस्लिम समस्या दूर ठेवण्यासाठी आपण पाकिस्तान तोडून दिला किंवा प्रत्यक्ष छत्रपतींनी शत्रूचा जो काही बंदोबस्त केला; त्याने समस्या संपली का? जगभरात अशा प्रकारे राक्षसी वृत्ती डोके वर काढीत असतातच. त्यांचा केवळ बंदोबस्त करणे पुरेसे नसते. एका बाजूला दुष्ट शक्तींचा बंदोबस्त आणि दुसऱ्या बाजूला माणसाचा चांगुलपणा, त्याच्यातील देवत्व जागवण्याचे प्रयत्न; त्यासाठीचे वातावरण, तशी शब्दावली, तशी जीवनरचना; हे दोन्ही एकाच वेळी सुरु राहायला हवे. भारतच नव्हे जगभरातच मानवी सभ्यतेचा प्रवास याच रीतीने झाला आहे. आदिमानवापेक्षा आजचा मानव जर काही वेगळा असेल तर तो यामुळेच. दुर्दैवाने आज मानवी चांगुलपणा, त्याचे देवत्व जागवण्याची प्रक्रिया अतिशय क्षीण झाली आहे. जगभरात तर ती औषधालाच सापडेल, पण भारतातही ती प्रक्रिया दुबळी होते आहे. मानवी जीवनाचा हा bifocal approach हेच भारताचे वैशिष्ट्यही आहे. कठोर वास्तवातही हे भान ठेवणे आणि ही प्रक्रिया सशक्त करणे आवश्यक आहे. `वसुधैव कुटुंबकम'साठी त्याला पर्याय नाही.

गुरुवार, २८ ऑक्टोबर, २०२१

लक्ष्मीपूजन

श्रीसूक्त. देवी लक्ष्मीच्या आराधनेचे प्राचीन सुक्त. ऋग्वेदाच्या दुसऱ्या अध्यायातील सहावे सुक्त. अनुष्टुभ छंदातील हे सुक्त आनंदकर्दम ऋषींनी रचलेले. १५ श्लोकांच्या या सुक्तात श्रीलक्ष्मीचं वर्णन आणि आवाहन आहे. लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नाही हे या सुक्तातून स्पष्ट होते. धन, धान्य, पशु, गायी, फळफळावळ, दुधदुभते, पुत्रपौत्र, जमीनजुमला, वनेउपवने अशा सगळ्या गोष्टींचा `लक्ष्मी'मध्ये अंतर्भाव आहे. विनिमयाचे साधन म्हणून उपयोगात येणारा पैसा हा लक्ष्मीचा लहानसा आणि म्हटलं तर दुय्यम असा भाग. जीवनासाठी आवश्यक अशा साऱ्या गोष्टी म्हणजे लक्ष्मी. पैसा हे देवाणघेवाणीच्या व्यवहाराचं फक्त एक साधन आहे. आजच्या संदर्भात या वैशिष्ट्याचा आवर्जून विचार करायला हवा. आज आपण दुर्दैवाने पैसा म्हणजेच लक्ष्मी समजू लागलो आहोत. त्यामुळे पैसा कसा निर्माण होईल हाच एक ध्यास माणसाने घेतला आहे. त्यामुळे कृषी जर पैसा उत्पन्न करू शकत नसेल तर त्याऐवजी व्यवसाय उभे करा किंवा सेवाक्षेत्राचा आधार घ्या, असाच प्रवाह आहे. मुळात जीवनासाठी शेती, जंगले, जमीन, पाणी, उद्योग, सेवा, वस्तू, ज्ञान, कलाकौशल्य या सगळ्याच गोष्टी हव्यात. मात्र आज एखादी गोष्ट करायची वा नाही किंवा उचलून धरायची वा नाही याचा निकष `त्यातून पैसा निर्माण होतो का?' एवढाच राहीला आहे. अगदी शिक्षण क्षेत्रही याला अपवाद नाही. यातून एक अंतर्विरोध निर्माण होतो. जसे जगण्याला दुधदुभते लागते. आनंद साजरा करायला दुग्धजन्य पदार्थ लागतात. पण पशू मात्र दुर्लक्षित. त्यांची संख्या कमी होते याचा विचारच नाही. दुधदुभते आणि दुग्धजन्य पदार्थ वाढत्या लोकसंख्येसाठी हवेत तर पशूंची संख्याही वाढायला हवी. त्यांच्या चारापाण्याची व्यवस्था हवी. त्यांना चरण्यासाठी आणि राहण्यासाठी जागा हवी. त्यांची देखभाल करायला आणि अन्य कामांसाठी कुशल माणसे हवीत. यासाठी वातावरण हवे. आज तर शहरांची अंदाधुंद वाढ करून माणसे, सिमेंटकॉंक्रीट, गाड्या यांनी जमिनी व्यापून आणि आच्छादित करून टाकण्याची चढाओढ सुरु आहे. वातावरण, जगण्याचे मापदंड, पद्धती, संस्कार असे आहेत जे जमिनीपासून आणि पशुंपासून दूर घेऊन जातात. पशुंचे प्रेमसुद्धा त्यांच्यातील एक होऊन जगावे असे नाही; तर त्यांचे फोटो काढावे, त्यांच्या कारुण्यपूर्ण बातम्या दाखवाव्या किंवा एखाद्या निमित्ताने त्यांच्या चाऱ्यासाठी चार पैसे द्यावे इत्यादी प्रकारचे दिखावटी. मग भेसळयुक्त किंवा सकस नसलेले दूध आणि दुग्धजन्य पदार्थ वाट्यास येतात. भारतीय लक्ष्मीकल्पनेत हे बसणारे नाही. लक्ष्मीचा संबंध चांगल्या जगण्याशी आहे. पैसा माणसाला जगवत नाही. तहान लागल्यावर पैसा पिता येत नाही. भूक लागल्यावर पैसा खाता येत नाही. लज्जारक्षण वा थंडी, वारा, उन, पाउस यापासून शरीराचं रक्षण पैसा करू शकत नाही. कलाकौशल्याचा आनंद पैसा देऊ शकत नाही. ज्ञानार्जित सन्मान, प्रतिष्ठा पैसा देऊ शकत नाही. नाती वा मैत्र यातील गोडवा पैसा देऊ शकत नाही. उत्तम आरोग्य पैसा देऊ शकत नाही. निरामय मन-बुद्धी पैसा देऊ शकत नाही. आध्यात्मिक आनंद पैसा देऊ शकत नाही. पैसा केवळ साधनांच्या देवाणघेवाणीच्या उपयोगात येतो. त्याचे ते आणि तेवढेच महत्व आहे. परंतु `लक्ष्मी' ही त्याहून अतिशय विशाल आणि जीवनव्यापी संकल्पना आहे. `लक्ष्मी'चं हे रूप नीट समजून घेणं म्हणजे लक्ष्मीपूजन. आजच्या संदर्भात तर ते अधिकच आवश्यक आहे.

या श्रीसुक्ताच्या आठव्या श्लोकात एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण कामना व्यक्त करण्यात आली आहे. `अलक्ष्मी'चा नाश होवो. संपूर्ण जगात हिंदू जीवनदर्शन सोडून हा विचार कोणी केलेला नसेल. लक्ष्मी हवी पण अलक्ष्मी नको. ही कामना ठीक आहे, पण त्यासाठी `अलक्ष्मी म्हणजे काय?' याचा विचार क्रमप्राप्त ठरतो. सूक्ताच्या पाचव्या आणि सहाव्या श्लोकातही `अलक्ष्मी' शब्द आला आहे आणि तिचा नाश होवो असे म्हटले आहे. पाचव्या श्लोकात तो दु:ख, दारिद्र्य या अर्थाने आला आहे, तर सहाव्या श्लोकात अधिक व्यापक अर्थाने हा शब्द आला आहे. तिथे म्हटले आहे- हे माते, आमचे आंतरिक आणि बाह्य दारिद्र्य दूर कर. या साऱ्याचा एकत्रित विचार केला तर `अलक्ष्मी' म्हणजे काय हे स्पष्ट होते. श्रीलक्ष्मीच्या समोर घोडे आणि मागे रथ असून मोठ्या डौलात हत्तीवर बसून येणाऱ्या कमलासनी लक्ष्मीचे स्वागत सूक्ताच्या तिसऱ्या श्लोकात आहे. हे वर्णन सुद्धा महत्वाचे आहे. जी वाजतगाजत, डौलात येते ती श्रीलक्ष्मी आणि जी लपूनछपून, न दिसता चोर दरवाजाने येते ती अलक्ष्मी. भ्रष्ट मार्गाने येणारी, चोरी- डाकेगिरी अशा पद्धतीने येणारी, अन्याय करून मिळवलेली, हपापलेपणा करून मिळवलेली, समाधान शांती गमावून मिळवलेली, खोटेपणा फसवेगिरी करून मिळवलेली, जीवनाचे पोषण न करणारी, जीवनाकडे पाठ फिरवणारी (जीवन याचा अर्थ व्यक्तिगत जीवन, कौटुंबिक जीवन, सामाजिक जीवन, पर्यावरणीय जीवन, ऐहिक आणि पारलौकिक जीवन) ही सगळी `अलक्ष्मी'. या अलक्ष्मीचा नाश होऊन लक्ष्मी प्रसन्न होवो ही श्रीसुक्ताची कामना आहे.

श्रीलक्ष्मीची ज्येष्ठ भगिनी समजल्या गेलेल्या या अलक्ष्मीचा सूक्ष्म, व्यापक आणि सखोल विचार आवश्यक आहे. त्याशिवाय श्रीलक्ष्मीची खरी, पुरुषार्थी आणि पवित्र आराधना करता येणार नाही. वर्तमान संदर्भात हा विचार करायला हवा. `पैसे खाणे' हा सगळ्यांना माहिती असलेला एक अलक्ष्मीचा प्रकार. याचेही अनेक पदर, प्रकार, उपप्रकार आहेत. `दैनिक लोकसत्ता'ने तर काही वर्षांपूर्वी `भ्रष्टाचाराचे भेद अनेक' अशी एक मालिकाच काही महिने चालवली होती. ज्यात भ्रष्टाचाराची काही प्रकरणे, त्याच्या अनेक पद्धती, त्याची मीमांसा केली होती. याच विषयावरून केंद्रातील याआधीचे सरकार लोकांनी मोडीत काढले. आजही अशा बातम्या यत्रतत्र पाहायला, ऐकायला मिळत असतात. परंतु अलक्ष्मी केवळ या भ्रष्ट किंवा अवैध मार्गाने मिळवलेल्या पैशांपुरती मर्यादित केली जाऊ शकत नाही. रा. स्व. संघाचे चवथे सरसंघचालक स्व. रज्जुभैय्या यांचे एका विजयादशमी उत्सवातील भाषण मला आठवते. प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांनी `एबिसिएल' नावाची एक कंपनी काढली होती. त्यावेळी ते आर्थिक दृष्ट्या कंगाल झाले होते. त्यांनी स्वत:ची दिवाळखोरी जाहीर केली होती. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी `एबिसिएल'तर्फे जागतिक सौंदर्य स्पर्धा आयोजित केली होती. स्व. रज्जुभैय्या त्या भाषणात याचा उल्लेख करून म्हणाले- अशा प्रकारातून निर्माण होणारा पैसा आम्हाला नको. महिलांच्या देहाचे प्रदर्शन मांडून त्याचा बाजार करून निर्माण केला जाणारा पैसा लक्ष्मी नसून अलक्ष्मी आहे. महाराष्ट्रात डान्स बार प्रकरण हे असेच एक उदाहरण आहे. त्यातून पैसा निर्माण होत असेल लक्ष्मी नाही. एकीकडे शिक्षण, लष्कर, हवामान या आणि अशा अन्य अनेक क्षेत्रात माणसे मिळत नाहीत आणि पोटाच्या नावाने दारूचा पूर, शरीराचा बाजार मांडला जातो. हा बाजार केवळ डान्स बारमध्येच नाही तर जाहिरातीतही मांडला जातो. जाहिरातीतील दिशाभूल आणि स्त्री वा पुरुष देहाचा बाजार पैशाची निर्मिती करतात लक्ष्मीची नाही. `बिग बॉस'सारखे कार्यक्रम किंवा रियालिटी शो इत्यादी अलक्ष्मी जन्माला घालतात.

भ्रष्टाचाराची चर्चा होते तेव्हा गरिबी किंवा पुरेसा पैसा न मिळणे ही कारणे सांगून कधीकधी समर्थनाचा सूर लावला जातो. जसे पोलीस खाते. पोलिसांना पुरेसा पैसा मिळत नाही म्हणून पैसा खाण्याकडे त्यांची वृत्ती असते असे बोलले जाते किंवा रोजगार नसणे किंवा असलेल्या रोजगारातून पैसा न मिळणे हे कारणही पुढे केले जाते. मात्र ही कारणे बरोबर असली तरीही समर्थनीय नाहीत. पैसा कमी असेल तर आहे तेवढ्या पैशात जगले पाहिजे. अगदी टोकाचा विचार करायचा तर मरणाला सामोरे जाण्याची तयारीही हवी. पण भ्रष्ट व्यवहार, चोरी, लबाडी, लुबाडणूक करायची नाही असाच बाणा हवा. गरीब श्रीमंत असा भेद करून अयोग्य व्यवहाराचे समर्थन होऊ नये. अयोग्य व्यवहार गरीब माणसाचा असला तरीही त्यातून अलक्ष्मीच निर्माण होते. उलट अयोग्य व्यवहार न करता संघर्षपूर्ण जीवन जगल्यास, मनात येणाऱ्या चार गोष्टी बाजूला ठेवाव्या लागल्या तरीही चालेल पण सचोटी सोडणार नाही, अशा पद्धतीने वागल्यास बाहेरील लक्ष्मी मर्यादित राहिली तरीही आंतरिक लक्ष्मी कितीतरी मोठ्या प्रमाणात प्राप्त होते. यालाच सत्व म्हणतात. हजारो वर्षे भारताने हीच शिकवण दिली आणि ती जगूनही दाखवली. इतिहासात किंवा वर्तमानातही याचे दाखले मिळतात. या देशात घरांना कुलुपे लावली जात नसत किंवा भिकारी सापडत नसत, चोर नव्हते; अशी जी वर्णने विदेशी प्रवाशांनी लिहून ठेवली ती या सचोटीचे द्योतक आहेत. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या शेतकरी आत्महत्या अतिशय दुर्दैवी असल्या तरीही, वावगे न वागण्याचा जो पिंड या मातीने घडवला आहे त्याचे ढळढळीत उदाहरण आहेत. सगळ्यांना जगण्याची साधने, जगण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध झालाच पाहीजे. त्यावर वाद वा मतभेद होण्याचे कारण नाहीच. मात्र गरिबी वा अपुरा पैसा हे, भ्रष्ट वा अयोग्य आर्थिक व्यवहारांचे अथवा गुन्ह्यांचे समर्थन ठरू शकत नाही. अशा प्रकारे मिळणारा पैसा ही अलक्ष्मीच होय.

पैशाच्या मागे धावणे, प्रकृती- कुटुंब- संबंध- छंद- पर्यटन- साधना- अशा अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करून पैसा कमावण्याच्या मागे लागण्यातून अलक्ष्मी जन्म घेते. अनेकदा असे पैशाच्या मागे लागणे नसते, पण खूप कष्ट करून अधिकाधिक पैसा मिळवणे हा भाग असतो. त्यामुळे खूप कामे करणे, हाती आलेले काम कोणाला मिळू नये अथवा सुटून जाऊ नये असा प्रयत्न करून क्षमतेपेक्षा अधिक स्वत:ला राबवणे यातूनही अलक्ष्मी जन्म घेते. वैद्यकीय व्यवसाय, बांधकाम व्यवसाय, कला क्षेत्र यात हे प्रकार होतात. त्यातून शरीर आणि मन दोन्हीवर ताण येतो. कधीकधी केवळ हा ताणदेखील जीवघेणा ठरतो. अशी अनेक उदाहरणे आहेत. यात कष्ट, कौशल्य, वैधता सारे असले तरीही त्यातून निर्माण होणाऱ्या पैशाला लक्ष्मी म्हणता येणार नाही. लक्ष्मी ही जीवनाभिमुख असली पाहिजे. तिने समाधान जन्माला घालायला हवे. असमाधान असेल तिथे अलक्ष्मीच राहील. हे असमाधान पैशाचे असेल किंवा अन्य कशाचेही. ते योग्य नाही. पैशासाठी डॉक्टरांकडून होणारी अडवणूक, शिकवणी वर्ग, दिवाळीसारख्या प्रसंगी गाड्यांचे भाडे वाढवणे यासारखे सगळे प्रकार अलक्ष्मी जन्माला घालतात. अनावश्यक अथवा कमी आवश्यक वस्तूंचे अमाप उत्पादन, खरेदी-विक्री, उपभोग हेदेखील अलक्ष्मीचे पोषण करतात. सौदर्य प्रसाधने किंवा शीतपेये ही याची ठळक उदाहरणे आहेत. यात जीवनावश्यक गोष्टी दुर्लक्षित होण्यासोबतच, नैसर्गिक साधनसंपत्तीची उधळपट्टी आणि माणसाच्या आंतरिक आणि बाह्य पोषणाची हेळसांड या बाबीही आहेत. सणवार, लग्न वा अन्य समारंभ, उत्सव, महोत्सव यावेळी होणारे पैशाचे प्रदर्शन, अनेक गोष्टींची उधळपट्टी, प्रतिष्ठा वा दिमाख यावरील खर्च, प्रत्यक्ष पैशांची उधळण हे सगळेच अलक्ष्मी या सदरात मोडणारे.

अलक्ष्मीची जशी एक व्यावहारिक बाजू आहे तशीच एक व्यवस्थात्मक बाजूही आहे. व्यावहारिक बाबतीत व्यक्ती स्वप्रयत्नाने काही प्रमाणात अलक्ष्मी दूर ठेवू शकतो, तिची निर्मिती थांबवू शकतो किंवा तिचा नाश करू शकतो. व्यवस्थात्मक बाबतीत मात्र व्यक्ती ही व्यक्ती म्हणून खूप काही करू शकत नाही. उदाहरणार्थ- आजच्या उद्योगांची व्यवस्था. त्यालाही खूप कोन आहेत. त्यातील एक आहे वेळेचा. आज मुंबई, दिल्लीसारख्या महानगरांमध्ये ४-४, ५-५ तास नोकरीवर जाण्यायेण्यात खर्च होतात. हे केवळ महानगरांमध्ये आहे असे नाही, तर वर्धा-नागपूर, कामठी-नागपूर, नागपूर-काटोल अशी up-down करणारी मंडळीही खूप आहेत. जाणेयेणे, वाहतुकीची कोंडी, स्वत: वाहन चालवीत असल्यास त्याचा ताण, सार्वजनिक वाहनाने प्रवास करीत असल्यास मनस्ताप अशा अनेक गोष्टी माणसाला वेगवेगळ्या अर्थांनी खाऊन टाकतात. त्याच्या मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक विकासाची; कौटुंबिक आणि व्यक्तिगत आनंदाची ही हानी आहे. यातून लक्ष्मी कशी साकार होणार? गंमत म्हणजे याचा आता आपल्याला सराव होऊ लागला असून यालाच आपण `जीवनसंघर्ष' म्हणून गौरवू लागलो आहोत. target हाही एक महत्वाचा पैलू. महिन्याला इतकी औषधे विकली जायलाच हवीत, महिन्याला इतकी यंत्र विकली जायलाच हवीत, रोज अमुक एवढं उत्पादन झालंच पाहिजे, इतक्या केसेस पूर्ण व्हायलाच हव्या, अमुक target तमुक target, कामाशी बांधिलकी, commitment अशा अनेक प्रकारांनी चक्क वेठबिगारी चालते. अपघात किंवा आईवडिलांना, मुलाबाळांना दवाखान्यात घेऊन जाणेही मुश्कील व्हावे अशा स्तरालाही हे प्रकार कधी कधी पोहोचतात. नोकरी जाण्याच्या भीतीची तलवार तर सतत टांगलेली असते. जीवन आणि प्रपंच तर चालवायचा असतो. अशा स्थितीत माणूस मन मारून, त्रास सहन करून, मनाविरुद्ध काम करीत असतो.

उद्योग, व्यवसाय किंवा एकूणच अर्थकारणाच्या धोरणात्मक आणि सैद्धांतिक अशाही बाजू असतात. उदाहरणार्थ- उद्योग अथवा व्यवसाय राखीव असावेत की नाही, हा धोरणात्मक त्याच वेळी सैद्धांतिक प्रश्न आहे. काही दिवसांपूर्वी राज्यसभा टीव्हीवर चर्चा सुरु होती. त्यातून माहिती पुढे आली की, सुरुवातीला काही हजार उद्योग राखीव स्वरूपाचे होते. आता ती संख्या डझनात आहे. जसे भाजी विक्रीचा व्यवसाय. रिलायन्ससारख्या कंपनीला भाजी विक्रीसाठी परवानगी का देण्यात यावी? ज्या उद्योगांना कमी भांडवल लागते, कमी कौशल्य लागते, ज्यांचा व्याप आणि संबंध स्थानिक पातळीशी असतो, त्या उद्योगात मोठ्या महाकाय उद्योगांना परवानगी द्यायला नको. पण ती दिली जाते. ही धोरणात्मक बाब आहे. याची सैद्धांतिक बाजूही आहे. सगळ्यांना समान संधी, समान न्याय हा सिद्धांत असेल तर महाकाय उद्योगांना भाजी वा किराणा विक्रीची परवानगी का नको? ही धोरणे आणि त्याच्या मुळाशी असलेले सिद्धांत यांचा फेरविचार, त्यांची फेरमांडणी व्हायलाच हवी. होत असते आणि होईलही. परंतु सामान्य माणूस त्या संदर्भात फार काही करू शकत नाही. त्यातून जन्माला येणारी अलक्ष्मी थांबत नाही. नाही म्हणायला, बहिष्कार आणि लहान व्यापारी वा उद्योग यांच्याकडूनच खरेदी करण्याचा निश्चय सामान्य माणूस करू शकतो. सध्या तसे प्रयत्न सुरूही आहेत. मात्र त्यांना मर्यादा असते. मोठा उद्योग आपला व्यवसाय सुरु करताना लहान व्यापारी व उद्योग मारून टाकण्याचे काम प्राधान्याने करतात. शिवाय दिमाख आणि प्रतिष्ठा या दोन बाबीही असतात. दिमाख आणि प्रतिष्ठा या दोन गोष्टींवर नियंत्रण ठेवून सामान्य माणूस अलक्ष्मीची निर्मिती काही प्रमाणात कमी करू शकतो.

- श्रीपाद कोठे

गुरुवार, २८ ऑक्टोबर २०२१

गुरुवार, २१ ऑक्टोबर, २०२१

व्यवस्थेला व्यवस्थाच राहू द्या

निवडणूक आटोपली. परवा निकाल येतील. सध्या मतदानाच्या टक्केवारीची चर्चा सुरू आहे. ही चर्चा नवीन आहे असे नाही. फक्त ती नव्याने सुरू आहे एवढेच.

आपल्याला आवडले नाही, अपमानास्पद वाटले तरीही; एक गोष्ट नक्की की, कोणत्याही चर्चेचेदेखील स्तर असतात. मतदानाच्या टक्केवारीची जी चर्चा सुरू आहे त्यात, सर्व स्तरांचा सूर मात्र सारखा आहे. टक्केवारी वाढावी या सामान्य पट्टीपासून तर; मतदान न करणारे देशभक्त नाहीत, बेजबाबदार आहेत इथपर्यंत या सुरांची range आहे. एकच सूर खर्जापासून तार सप्तकापर्यंत ऐकू येतो आहे. एक प्रकारची hypnotized अवस्था पाहायला मिळते आहे. यातील गृहितक काय आहे? आपला say राजकारण, प्रशासन, निर्णय, धोरणे यात राहावा. दुसरे गृहितक आहे - आपल्याला सुख मिळावं अशी व्यवस्था तयार करावी. तिसरे गृहितक आहे - व्यवस्थेत गडबड होईल तेव्हा त्यावर अंकुश ठेवता यावा. चौथे गृहितक आहे - आपण या समाजाचा भाग असल्याने त्याच्या प्रत्येक गोष्टीत सहभागी होणं हे आपलं कर्तव्य आहे.

ही चारही गृहीतके योग्य म्हणता येतील? अनुभव लक्षात घेतला किंवा सहज आजूबाजूला नजर टाकली तरीही ही सगळीच गृहीतके योग्य नसल्याचा निष्कर्ष काढावा लागतो. व्यवस्थेत खरंच मतदाराचा say असतो? असू शकतो? मतदार जाऊ द्या, निवडून दिलेल्या प्रतिनिधींचा तरी say असतो? किती असतो? असू शकतो? या गृहितकाची व्यवहार्यता किती आहे? एक passive समाधान यापलीकडे काहीही नाही.

आपल्याला सुख मिळावं किंवा गडबड झाल्यावर अंकुश ठेवता यावा हे तरी मतदान करून साध्य होतं का? साधे भटक्या कुत्र्यांचे किंवा रस्त्यावरील खड्ड्यांचे प्रश्न सुद्धा मतदार काय किंवा मतदारांच्या संघटना काय (वास्तविक मत दिल्यावर व्यवस्था सुरळीत चालावी, वेगळ्या दबाव गटांची गरज काय?) सोडवू शकल्या आहेत का? सोडवू शकतात का?

बरे, सगळे प्रतिनिधी आदर्श आहेत, सक्रिय आहेत, समस्या सुटतात वगैरे प्रत्यक्षात आले तरीही; सत्तासीन होऊ न शकलेल्या लोकांना मत देणाऱ्या मतदारांच्या इच्छा, आकांक्षा, मागण्या, अपेक्षा, अडचणी यांचे काय? लगेच उत्तर येईल की, त्यासाठीच तर आपली शक्ती वाढवून सत्तेपर्यंत पोहोचायला हवं. पण त्याही स्थितीत कोणी ना कोणी तर सत्तेपासून दूर राहणारच. दुसरे म्हणजे असा विचार करणे हीच एक विकृती आहे. खेळाडूंचे संघ निवडणुकीचा खेळ खेळतात आणि तुम्ही कोणत्या तरी संघाच्या बाजूने झालेच पाहिजे; अथवा; अमुक घोडा आपल्याला लाभ मिळवून देईल असं मानून तुम्ही त्याच्यावर बेट लावायलाच हवी, तुम्ही रेस खेळलीच पाहिजे; हा कोणता अट्टाहास?

सगळ्यात महत्वाचे गृहितक म्हणजे - आपण समाजाचा घटक असल्याने प्रत्येक गोष्टीत सहभागी व्हायलाच हवे. अगदी कुटुंबात तरी आपण ही अपेक्षा ठेवतो का? ठेवावी का? निष्पक्षपाती होऊन हा मुद्दा स्वतःला लावून पाहावा. एक साधा प्रश्न आहे - समाज म्हणा, देश म्हणा यासाठी contribute करण्याची मतदान ही एकच पद्धत आहे का? दैनंदिन जीवनात सुद्धा इतक्या असंख्य गोष्टी असतात, असू शकतात ज्या समाजाची सुयोग्य धारणा, सुव्यवस्था, पोषण करतात/ करू शकतात. मतदान न करणारे सुद्धा यात मोठा सहभाग देत असतात. मग केवळ ते मतदान करत नाहीत म्हणून ते वाईट? म्हणून ते बेजबाबदार? आज एक सूचना वाचली - जे मतदान करणार नाहीत त्यांच्याकडून दुप्पट कर वसूल करावा. का? त्याने काही गुन्हा केला आहे? त्याने काही समाजविघातक कृत्य केलं आहे? तो काही अवास्तव किंवा अधिक काही मागणी करतो आहे? मग केवळ त्याने कोणत्या तरी घोड्यावर बोली लावायला, सट्टा खेळायला नकार दिला म्हणून तो गुन्हेगार? ही कोणती विचारपद्धती आहे? ही निव्वळ लोकशाहीची हुकूमशाही ठरेल.

मतदान केलं नाही तर व्यवस्थेवर बोलण्याचा अधिकार नाही ही कुठली भाषा? मनातल्या सद्भावापोटी कोणी बोलू शकत नाही का? माणसाच्या वंशात जन्म घेऊनही गाढवाला पाणी पाजणारे एकनाथ महाराज हा या समाजाचा आदर्श आहे. कोणासाठी काही करणे किंवा योग्य अयोग्य गोष्टींवर व्यक्त होण्यासाठी काही qualification असण्याची किंवा कोणत्या अटी असण्याची गरज नाही. तसा विचार हा मानवतेचा अपमान आहे.

लोकशाही ही एक व्यवस्था आहे. ती केवळ मतदान एवढ्यापुरती सीमित नाही. पण क्षणभर चर्चेसाठी ती तशी सीमित समजली तरीही, ती व्यवस्था आहे एवढेच. त्याला अवाजवी पावित्र्य, महत्व वगैरे चिकटवून लोकशाहीचा देव करू नये आणि त्या देवाभोवती पंथ, संप्रदाय, मठ आणि मठाधिपती उभे करू नयेत. व्यवस्थेला व्यवस्था राहू द्यावे. एखादी व्यवस्था नीट चालणे किंवा माणसाचं व्यक्तिगत आणि सामूहिक कल्याण; हे अन्य अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. त्यावर आपण किती चर्चा करतो, भर देतो, त्याचा किती ध्यास घेतो, हे अंतर्मुख होऊन पाहावे. मतदान मतदान करत बुभुक्षितांचा कलकलाट वाढवण्यापेक्षा ते अधिक चांगले ठरेल.

- श्रीपाद कोठे

नागपूर

मंगळवार, २२ ऑक्टोबर २०१९

(ज्यांना इच्छा असेल त्यांनी या विषयाशी संबंधित माझा जुना लेख माझ्या ब्लॉगवर पाहावा. जागतिक स्थितीचा आढावा त्यात आहे. त्यावेळी महाराष्ट्रातल्या पन्नासेक वृत्तपत्रांना तो पाठवला होता. एकानेही छापायची हिंमत दाखवली नव्हती.)

शनिवार, १६ ऑक्टोबर, २०२१

भाज्यांची गोष्ट

एका घरी एकदा सगळ्या भाज्या एकत्र आल्या. त्यांची एक सभाच भरली म्हणा ना. त्या घरचा मालक एक नावाजलेला सामाजिक कार्यकर्ता होता. त्याचं बोलणं, वागणं, चर्चा, त्याच्याकडे येणारे-जाणारे, त्यांची आपसात होणारी बोलणी; यामुळे त्या भाज्यांच्याही मनात विचार आला होता की, आपलाही एक समाज असावा आणि आपल्या सगळ्यांमध्ये सामाजिक भावना, सामाजिक जबाबदारी असावी. त्यासाठी सभा भरली होती. बटाट्याने प्रास्ताविक भाषण करून भूमिका मांडली. सगळ्यांच्या मनातीलच तो बोलल्याने सगळ्यांनी त्याला अनुमोदन दिले. समता आणि आदर या दोन गोष्टी आचरणात आणायच्या असा ठराव सगळ्यांनी मिळून केला. विदेशी तत्वांशीही या दोन मूल्यांना धरूनच व्यवहार करायचा असेही सर्वानुमते ठरले. सभा आटोपल्यावर त्यांचे प्रतिनिधी मंडळ मालकाकडे गेले. त्यांनी आपला विचार, नुकतीच पार पडलेली सभा आणि त्यातील निर्णय यांची त्याला माहिती दिली. त्यालाही फार छान वाटलं. मुळात त्याचा पिंड सामाजिकतेचा असल्याने त्याने भाज्यांना प्रोत्साहनच दिले. दुसऱ्या दिवशीपासून कार्यवाही सुरु झाली. त्या दिवशी वांग्याची भाजी होती. समतेचे तत्व आचरणात आणावयाचे असल्याने स्वयंपाक करणाऱ्या आचाऱ्याने, त्याला मिळालेल्या सूचनेप्रमाणे एक किलो वांग्याच्या भाजीत एक किलो तेल, एक किलो मीठ, एक किलो तिखट, एक किलो हळद, एक किलो मसाला, एक किलो बटाटे, एक किलो टमाटे, एक किलो गुळ, एक लिटर पाणी टाकले. भाजी तयार झाली. मालक जेवायला बसले. भाजीचा पहिला घास त्यांनी तोंडात टाकला आणि थु थु करत पानावरून उठले. त्यांना भाजी काही आवडली नव्हती. दुपारी भाज्यांची पुन्हा सभा भरली. पहिल्या दिवशीच्या अनुभवावर त्यात चर्चा झाली. मिरचीने मुद्दा मांडला- आपण आज फक्त एकच मूल्य आचरणात आणलं. ते म्हणजे समता. पण सगळ्यांना समान आदर द्यावा हे आपण विसरलो. त्यावर सभा आटोपली. पुन्हा भाज्या मालकाकडे गेल्या. सभेची माहिती दिली. मालक `बरं' म्हणाले. नंतरच्या दिवशी पुन्हा भाजीची वेळ झाली. तेव्हा आचाऱ्याने त्याला मिळालेल्या सूचनेप्रमाणे केले. सगळ्या गोष्टी सारख्या प्रमाणात तर टाकल्याच, पण समान आदराचे मूल्य जोपासायला म्हणून मागेपुढे न करता सगळ्या गोष्टी एकाच वेळी कढईत टाकल्या. दुपारी मालक जेवायला बसले. आदल्या दिवसाप्रमाणेच पुन्हा थु थु करत उठले. भाज्यांना अतिशय वाईट वाटले. पुन्हा सभा भरली. उभ्या राहिलेल्या पेचप्रसंगावर सगळ्यांनी खूप विचार केला. काहीच मार्ग निघत नाही हे पाहून सगळ्या भाज्या मालकाकडे गेल्या. सामाजिकता, समता आणि आदर ही मूल्ये; इत्यादी बाबी न सोडता विद्यमान पेचप्रसंगातून काय मार्ग काढता येईल यावर मार्गदर्शन करावे अशी विनंती त्यांनी मालकाला केली. मालक डोके धरून विचार करू लागला. काही दिवस झाले. मालकाने अजूनही डोके सोडले नाही म्हणतात.

- श्रीपाद कोठे

नागपूर

१७ ऑक्टोबर २०१५

प्रत्येकाचा देव वेगळा

शबरीमलाचे अय्यप्पा वेगळे आणि अन्यत्रचे अय्यप्पा वेगळे आहेत का? या प्रश्नाचे नि:संदिग्ध उत्तर आहे – हो. हे वेगवेगळे अय्यप्पा आहेत. अन या होकारार्थी उत्तरातच अनेक रहस्ये आहेत. या होकारार्थी उत्तराचे विश्लेषणच भारतीयता आणि हिंदुत्व यांचे वेगळेपण समजावून देऊ शकते. सगळ्या जगाचा एक देव. अन हे जग म्हणजे त्याचीच लहर, येथील कृत्याचे चांगले वा वाईट फळ त्याच्याच हाती, तो कसा हे ठरवणारे एखादे पीठ, त्या पीठानुसार सगळे निर्णय; हे सारेच भारतीय, हिंदू धर्मविचाराला छेद देणारे. भारतीय, हिंदू धर्मविचारानुसार प्रत्येकाचा ईश्वर निराळा. कोणाचा आपसात जुळला तर जुळला, नाही जुळला तर नाही जुळला. जुळलाच पाहिजे हे आवश्यक नाही. मुळातच तुमचा ईश्वर हा तुमचा आदिबिंदू आणि तुमचा अंतिम बिंदू. ईश्वराला तुमच्या पद्धतीने आकार, रूप, रंग, गुण बहाल करा. ईश्वर हा काही एक निश्चित गुणांचा (भौतिक, रासायनिक, मानसिक, आध्यत्मिक) पुतळा नाही. प्रत्येकाचा ईश्वर त्याच्या त्याच्या भावानुसार, आध्यात्मिक विकासानुसार वेगवेगळा. व्यक्तीच्या विकासाप्रमाणेच तोही विकसित होतो. कोणी एकाने (एकाने याचा अर्थ, व्यक्तीने किंवा शास्त्रानेही) ठरवायचे आणि बाकीच्यांनी मानायचे हे मुळातच अमान्य. ईश्वर, धर्म हे मानण्याचे विषय नाहीत. हे अनुभूतीचे, विकसनशील विषय आहेत. `सर्वं खल्विदं ब्रम्ह’ किंवा `सर्वं विष्णुमयं जगत’ किंवा `चराचरात ईश्वर आहे’ इत्यादी सिद्धांत नाहीत. तो त्या त्या व्यक्तींचा अनुभव आहे. ज्याला घ्यायचा त्याने घ्यावा. कोणाला केव्हा लाभेल तेही सांगता येत नाही. परंतु तो सगळ्यांना लागू करावयाचा सिद्धांत नाही. ज्याला ३३ कोटी देव मानायचे आहेत त्याने ते मानावेत. ती त्याच्या विकासावस्थेची गरज आहे. प्रत्येकाने ३३ कोटी देव मानावेत असे नाही. ज्याला ईशत्व हवे त्याने त्यासाठी प्रयत्न करावे, ज्याला इहत्वासाठी ईशत्व हवे, त्याने त्यासाठी प्रयत्न करावे. प्रत्येक व्यक्तीला यासाठी पूर्ण स्वातंत्र्य. कारण प्रत्येक जण जीव म्हणून वेगळा आहे. मूळ तत्व म्हणून एक असला तरीही. जीवाला जीवाचे गुणधर्म, जीवाच्या मर्यादा राहणारच. त्यामुळे त्याने आपापल्या पद्धतीने चालावे. अगदी जेवढे जीव तेवढे देव, तेवढ्या उपासना, तेवढे पंथ, तेवढ्या पद्धती राहू शकतील. त्यात चित्रविचित्रता राहील. जोवर कोणाच्या जीवित, वित्ताची sizable हानी होत नाही तोवर त्यात ढवळाढवळ अयोग्य.

या अनुषंगाने भगवान अय्यप्पाचा विचार कसा होऊ शकेल. ज्यांना सध्याच्या पद्धतीला आक्षेप आहे त्यांनी त्यांच्या पद्धतीने दुसऱ्या अय्यप्पा स्वामींची निर्मिती करावी. अगदी `केवळ मासिक पाळी सुरु असणाऱ्या महिलांसाठीच’ असेही मंदिर उभे करता येईल. पण जबरीने कोणाला आपल्या पद्धतीने वागायला लावणे पूर्णत: चुकीचे, अधार्मिक, आध्यात्मविरोधी. आध्यात्मिक अनुभूतींना सिद्धांत ठरवून व्यवहाराची जी मोडतोड करण्याची आज जी धडपड दिसते ती धर्म, ईश्वर, आध्यात्म यांचा भारतीय आशय समजून न घेतल्यामुळे.

स्वाभाविक प्रश्न येतो की, ज्या हिंदू समाज सुधारकांनी मंदिर प्रवेशाचे प्रयत्न गेल्या शतकात केले त्याबद्दल काय? एक गोष्ट स्पष्ट असायला हवी की, ते सारेच प्रयत्न सामाजिक होते. जड समाजाला जागे करण्याचे, त्या समाजातील तमोगुण घालवण्याचे ते प्रयत्न होते, त्या समाजातील दुष्टता घालवण्याचे ते प्रयत्न होते. यासाठी समाजाला जवळच्या असणाऱ्या धर्म या विषयाची मदत घेण्याचा, त्यावर आघात करून ती जडता, ती तमोमयता घालवण्याचा तो प्रयत्न होता. तेच त्याचे प्रयोजन होते. ते प्रयोजन आता संपले आहे. अस्पृश्यता, महिला, जगासोबत चालण्याची तयारी, विज्ञान इत्यादी ज्या गोष्टींसाठी त्या समाज सुधारकांनी प्रयत्न केले ते पुरेसे फलद्रूप झाले आहेत. त्यासाठी आता धर्माचा, धार्मिकतेचा आधार घेण्याची गरज नाही. समाजाने ते विषय स्वीकारले आहेत. आता धर्माला धर्माचे काम करू द्यायला हवे. बदललेल्या परिस्थितीचा सांगोपांग विचार करायलाच हवा. गेल्या शतकातील तर्क आणि युक्तिवाद आता निरर्थक झाले आहेत. उदाहरण म्हणून आरक्षणाचे घेता येईल. आरक्षण ही सामाजिक, आर्थिक उन्नती आणि सन्मान यासाठी आवश्यक असलेली गोष्ट आता कोणकोणत्या हेतूंनी वापरली जाते हे आपण अनुभवतो आहोत. धर्म, मंदिर प्रवेश, परंपरा, रूढी इत्यादी सुद्धा आपापल्या इच्छा वा आपले विचार लादण्यासाठी वापरले जाऊ नयेत.

राज्यघटना की आस्था असाही प्रश्न उभा राहतो. एक मूलभूत गोष्ट इथे लक्षात घ्यायला हवी की, आपण ज्याबद्दल बोलतो ती राज्यघटना आहे/ असते. राष्ट्रघटना अशी काही बाब अस्तित्वातच नाही/ असू शकत नाही. राज्य, राष्ट्र, देश या सगळ्या वेगवेगळ्या बाबी आहेत. त्यांची सरमिसळ करून गोंधळ निर्माण करण्यात हशील नाही. लोकांनी एकमेकांची डोकी फोडली तर राज्याने दोषींवर कारवाई करावी. ते नक्कीच राज्याचे काम आहे. त्यासाठी राज्यघटनेचा हवाला द्यावा. पण तेच तत्व, कोणी जबरदस्तीने मंदिरात घुसण्याचा प्रयत्न करील तर त्यांनाही लागू व्हायला हवे. कारण डोकी फोडणे किंवा जबरदस्तीने मंदिरात घुसणे किंवा हट्टीपणाने बातम्या देण्याचा प्रयत्न करणे; या सगळ्याच बाबी सारख्याच आततायीपणाच्या समजल्या पाहिजेत. अन आततायीपणा नियंत्रित करणे हे राज्याचे काम आहे. राज्यघटनेने त्याबद्दल बोलावे. मात्र कोणी कशी उपासना करावी, कोणी आपल्या उपासनेत कोणाला येऊ द्यावे किंवा येऊ देऊ नये; हे राज्य, राज्यघटना किंवा न्यायालये यांनी ठरवू नये.

भावजीवनाच्या विषयांनी भौतिक जीवनाचे अति नियंत्रण करण्याचा किंवा भौतिक जीवनाने भावजीवनाचे अति नियंत्रण करण्याचा प्रयत्न करू नये. भौतिक जीवन आणि भावजीवन हे दोन्ही राज्याने, राज्यघटनेने, न्यायालयाने, समाजाने, माणसांनी समजून घेतले पाहिजे. त्यासाठी प्रथम आपल्या डोक्यात पोसून ठेवलेले साचे फोडून फेकून द्यायला हवेत. व्यक्तीने समाजावर आणि समाजाने व्यक्तीवर स्वार होणे दोन्ही चूक. यांचा समतोल साधण्यासाठी `धर्म’जाणीव निर्माण होणे, व्यापक होणे, त्याची समज वाढणे खूप गरजेचे आहे. आज धर्माचा धोषा लावणाऱ्यांची धर्मसमज नीट आहेच असेही नाही. व्यक्ती आणि समाज, भावजीवन आणि भौतिक जीवन यांचा मिलनबिंदू राज्यघटना होऊ शकत नाही. धर्म हाच परस्परविरोधी भासणाऱ्या, भिन्न प्रवृत्तीच्या घटकांचा मिलनबिंदू असतो. सगळ्यांनी धर्म समजून घ्यायला हवा.

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, १७ ऑक्टोबर २०१८

शुक्रवार, १५ ऑक्टोबर, २०२१

महाकवीच्या गावाची सफर

प्रसिद्ध हिंदी छायावादी कवी सूर्यकांत त्रिपाठी `निराला' यांच्या पुण्यतिथीनिमित्त दीप्तीने काल त्यांची एक कविता टाकली आणि १०-१२ वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या. संस्कार भारतीच्या साहित्य विधेची एक अखिल भारतीय बैठक उत्तर प्रदेशातल्या उन्नाव येथे होती. तीन दिवसांची बैठक आटोपल्यावर परतीच्या आरक्षणाप्रमाणे लोक परतत होते. एक पूर्ण दिवस माझ्याकडे रिकामा होता. बाकीही काही मंडळी होती. दिवस कसा घालवायचा यावर चर्चा सुरु झाली. संस्कार भारतीचे तेव्हाचे अ.भा. अध्यक्ष पाटण्याचे डॉ. शैलेन्द्रनाथ श्रीवास्तव यांनी सुचवले- कवी `निराला' यांचे गाव इथून जवळ आहे. तिथे जाऊन येता येईल का पाहा. कार्यकर्त्यांनी विचारपूस केली तर ते शक्य होईल असे वाटले. मग काय? लगबग सुरु झाली. हिंदी साहित्य विश्वात ख्यातीप्राप्त डॉ. श्रीवास्तव यांच्यासह दुसऱ्या श्रेष्ठ साहित्यिकाच्या गावाची सफर म्हणजे आनंदच. डॉ. श्रीवास्तव, संस्कार भारतीचे तेव्हाचे अ.भा. संघटन मंत्री योगेन्द्रजी, अस्मादिक, अन्य दोन-तीन लोक असे `निराला' यांच्या `बैसवाडा' गावी निघालो. दीप्तीही होती सोबत.

दोनेक तासात उन्नाव वरून `बैसवाडा'ला पोहोचलो. प्रथम तेथील शाळेत गेलो. त्या शाळेला `निराला' यांचेच नाव आहे. शाळेचे मुख्याध्यापक, अन्य शिक्षक, कर्मचारी सगळेच आनंदून गेले होते. कवीचे गाव पाहायला आजकाल कोण जातात? पण ही देशभर फिरणारी बडी मंडळी (म्हणजे डॉ. श्रीवास्तव, योगेन्द्रजी) आपल्या छोट्याशा गावात आली याचं विलक्षण कौतुक त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. शिक्षक मंडळी आम्हाला शाळेच्या गच्चीवर घेऊन गेली. तिथे `निराला' यांची एक कविता कोरलेली होती. हे कवीवर आणि कवितेवर प्रेम करणारे लोक आहेत हे वेगळे सांगण्याची गरज उरली नव्हती. डॉ. श्रीवास्तव प्रत्येक गोष्ट टिपून घेत होते. शांतपणे ऐकत होते. पाहत होते.

शाळेतून आमची गाडी गावातल्या `निराला' यांच्या घराकडे निघाली. अन्य साधारण खेड्यांप्रमाणेच बैसवाडाही होते. छोट्या बोळात गाडी अडली. ना मागे, ना पुढे. डॉ. श्रीवास्तव अन योगेन्द्रजी उतरले अन चालू लागले. आम्हाला त्यांचे अनुकरण करणे भागच होते. पाचेक मिनिटात आमचा ताफा विश्वप्रसिद्ध हिंदी कवी `निराला' यांच्या झोपडीत पोहोचला. तेथे कोणीही राहत नव्हते. ओसाड. आजूबाजूचे लोक जमले. कोणी काही, कोणी काही सांगू लागले. कोणी सुसंगत, कोणी असंगत. त्यात एक विचित्र वाटावा असा माणूस होता. गावात बहुतेक अशी माणसे असतातच. पूर्ण खेडवळ, जरा स्क्रू ढिला आहे की काय असे वाटावे असा, गबाळ्या. जे बोलेल ते समजून घेण्यासाठी ऐकणाऱ्याने श्रम करायला हवेत अशी अपेक्षा करणारा. १०-१५ मिनिटे आम्ही तिथे घालवली. डॉ. श्रीवास्तव खाली वाकले त्यांनी त्या ओसाड झोपडीला नमस्कार केला. तिथली चिमूटभर माती कपाळाला लावली. अन आम्ही परत निघालो. दाराबाहेर पाऊल टाकले तर तो विचित्र माणूस डॉ. श्रीवास्तव यांच्याजवळ आला अन काही सांगू लागला. एका कार्यकर्त्याने त्याला हाडहुड करून बाजूला केले.

आम्ही परत शाळेत आलो. तिथे गाडी उभी होती. गाडीत बसून उन्नावचा रस्ता धरला. जसे आम्ही गाव सोडले, तसे तोवर शांत असलेले डॉ. श्रीवास्तव हाडहुड करणाऱ्या त्या कार्यकर्त्याकडे वळले. त्यांनी त्याला चांगलेच धारेवर धरले. ते म्हणाले- `त्या माणसाला तू असे का घालवून दिले. अशाच माणसांकडे अनेकदा पुष्कळ काही असते. अशी माणसे विचित्र असंबद्ध बोलत असतील. कंटाळवाणे वाटेल आपल्याला पण ते नीट शांतपणे ऐकले, संगती लावण्याचा प्रयत्न केला तर खूप काही पदरात पडते. अन आपल्या हाती काही लागले नाही, तरीही काय होते? त्या माणसाने `निराला' यांच्यासोबत काळ घालवला असेल. त्यांना कधी काही हवे नको पाहिले असेल. त्यांच्यासोबत रागाचे, हास्यविनोदाचे क्षण घालवले असतील. ते सांगण्याची त्याला जी ऊर्मी असते तिचेही महत्व आहेच ना? अन काहीच नसेल तरीही आपल्याला ज्या महाकवीबद्दल विलक्षण आदर आहे, त्याच्यासह राहिलेला एक माणूस म्हणून तरी त्याच्याशी नीट वागायला हवे की नको?' तो कार्यकर्ता खजील होऊन बसला होता. पण गाडीतील बाकीच्यांनाही, म्हणूनच मलाही- जीवनाची किती विलक्षण जाण प्राप्त झाली होती.

रस्त्यात एक छोटे गाव लागले. तेथील टपरीवर चहाचा आस्वाद घेऊन उन्नावचा प्रवास सुरु झाला. पुढच्या तासभर डॉ. श्रीवास्तव महाकवी `निराला' आणि त्यांचे `राम कि शक्तीपूजा' यावर बोलत होते. ज्यांना डॉ. श्रीवास्तव माहिती आहेत, त्यांना ज्यांनी ऐकले आहे असे समजू शकतील, आम्हाला त्यावेळी मिळालेली मेजवानी. स्वत: उत्कृष्ट ख्यातीप्राप्त साहित्यिक, हिंदीचे प्राध्यापक, भाषेवर प्रभुत्व, भाषेचा गोडवा, विद्वत्ता, वक्तृत्व अन काय नव्हते त्यांच्याकडे. व्यक्तित्वही प्रभावी. व्यक्तित्व अन वक्तृत्व असे की, अगदी अटलजी मंचावर असतानाही श्रोत्यांच्या मनात रेंगाळणार ते डॉ. श्रीवास्तवच. उन्नाव कधी आले ते कळलेच नाही.

काही योग नियतीने लिहून ठेवलेलेच असतात. असाच त्या दिवशीचा योग होता. `निराला' यांच्या गावची निराळीच सफर कायमचे आनंदनिधान झाली आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

शुक्रवार, १६ ऑक्टोबर २०१५

बुधवार, १३ ऑक्टोबर, २०२१

वैचारिक ओकाऱ्या

एका मित्राशी जरा वादावादी झाली. मग त्याने एका महान संपादकाने लिहिलेल्या लेखाची लिंक पाठवली. मी असल्या लिंक वगैरे वाचत नाही असा त्याला परतीचा संदेश दिला. तो लेख मी आधीच वाचलेला होता. त्यात त्या संपादकाने मांडणी केली आहे की, देशभरात सगळीकडे भाजपला सत्ता मिळवून देण्याचे रा.स्व. संघाने ठरवले आहे. त्यानंतर त्यांचा पूर्ण अजेंडा राबवला जाईल. मी लिंक वाचत नाही असे म्हटल्याने मित्राची पंचाईत झाली. पण त्याला अपेक्षित हेच होते की- बोला यावर. संघ अन तुम्हीही म्हणता की, संघाला राजकारण करायचे नाही. आता बोला. आहे ना गंमत? आमच्या भागात एक म्हण आहे- `बाजारात तुरी, अन भट भटणीला मारी.' म्हणजे संघाची किंवा माझी भूमिका काय आहे हे गेलं उडत. त्याबद्दल कोणी विद्वान काही म्हणतात त्यावर बोला...!! यालाच म्हणतात- जाणूनबुजून असेल तर तमाशा, अजाणता असेल तर बावळटपणा.

तथाकथित स्वातंत्र्य, समता, लोकशाही, जागतिकीकरण, ज्ञानयुग, तंत्रज्ञान युग वगैरेंनी बाकी काय चांगलं- वाईट  केलं ते थोडं बाजूला ठेवू, पण या गोष्टींनी सगळ्याच गोष्टींचं बेसुमार सुमारीकरण केलं हे मात्र निर्विवाद. कोणीही उठावे अन काहीही करावे, कोणीही उठावे अन काहीही लिहावे, कोणीही उठावे अन काहीही बोलावे; कशाला काही धरबंद नाही. बरं जे करायचं, लिहायचं, बोलायचं ते तरी सुसंगत, विचारपूर्वक, `अभ्यासोनि प्रकटावे' असे असते का? नाव नको. आधी जसं संघाबद्दल उदाहरण दिलं तशी उदाहरणं कुठेही पाहायला मिळतात. धर्म, देव, धार्मिकता, शास्त्र, रूढी, लोकाचार, समजुती, परंपरा, तत्वज्ञान यांच्याही बाबतीत. म्हणजे मोठ्याने कर्णकर्कश्श भोंगे कोणी वाजवतात म्हणून देव धर्म वाईट. का बुवा? ते नाही विचारायचं. एखाद्या कुठल्या देवदेवतेच्या आख्यायिका वगैरे थेट उपनिषदांच्या एखाद्या सिद्धांताशी झुंजवायच्या. का? आम्हाला वाटते म्हणून.

राजकारण, समाजकारण, चळवळी यातही तेच. आज हिंदुत्वाची शक्ती वाढली आहे. त्यामुळे अनेक हौशे, नवशे, गवशे स्वत:ला हिंदुत्वाचे खंदे पुरस्कर्ते म्हणवून घेतात. आपापल्या ठिकाणी ते त्यांना वाटेल ते करतात. अन सगळे तोंडसुख येते हिंदुत्वाच्या वाट्याला. यात केवळ समाजोपयोगी वा समाजविघातक एवढाच भेद असतो असे नाही. काही प्रामाणिक मतभेद सुद्धा असू शकतात. पण लगेच कावकाव सुरु होते- ते असे म्हणतात, ते तसे म्हणतात. अगदी स्वातंत्र्य चळवळीत किंवा ज्यांना आपण आदर्श म्हणतो अशा नेत्यांमध्येही मतभेद राहत होतेच ना? कॉंग्रेसमध्येही हिंदुत्ववादी होतेच. महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्यातच नव्हे तर गांधीजी व रवींद्रनाथ टागोर यांच्यातही मोठे मतभेद होते. डॉ. आंबेडकरांना मानणाऱ्या रिपब्लिकन विचारांचे किती गट आहेत? किंवा कम्युनिस्ट विचारधारा किती धारांनी वाहते? पण त्यावर प्रश्न उपस्थित होत नाहीत. त्या चळवळी वा विचारधारा मानणाऱ्या व्यक्तींची कृत्ये त्यांच्या तत्वज्ञानाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यासाठी वापरली जात नाहीत. हिंदुत्व मात्र या साऱ्याला अपवाद.

सध्या साहित्यिक राजीनामे प्रकरण सुरु आहे. साहित्य आणि समाज यांचा खरंच कसा आणि किती संबंध असतो, यावर किती जण सखोल विचार करतात. साहित्याने जग बदलता आलं असतं तर आजवर काय कमी साहित्य निर्माण झालं आहे? असा प्रश्न समोर आला की दुसरे कुणी उठतात, अन साहित्य वगैरे झूठ आहे असा सूर आळवतात. साहित्याची अतिरेकी भलावण आणि साहित्य झूठ अशा भूमिका घेणारे दोघेही सारखेच उथळ आणि पोकळ. तेच सरकार आणि समाज यांच्या बाबतीत. एक तर सरकार सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार किंवा सरकार ही निरर्थक गोष्ट आहे. बस, दोनच भूमिका अन त्यांचे अभिनिवेश. घरात तरी आई वडिलांचे मुलांवर पूर्ण नियंत्रण असते का? म्हणजे काय त्यांचे काहीच नियंत्रण नसते?

मुळातच या जगातील बहुतेक सगळ्या गोष्टी multifaceted, multidimensional असतात. त्यातील जेवढे आपल्या शरीर-मन-बुद्धीच्या आवाक्यात आले ते लगेच त्रिकालाबाधित सिद्धांताच्या रुपात बाहेर टाकण्याची सवड आणि सोय सध्याच्या जीवन रचनेने आणि तंत्रज्ञानाने करून दिलेली आहेच. वरून या multifaceted, multidimensional जगातील असंख्य गोष्टी प्रत्येकाच्या मन-बुद्धीत इच्छेने वा अनिच्छेने कोंबत राहणारी प्रक्रिया आणि व्यवस्थाही आहेच. मग रोज अजीर्ण होईपर्यंत, प्रकृतीला झेपेल न झेपेल याकडे लक्ष न देता वेगवेगळी माहिती, मते इत्यादी कोंबत राहायचे. ते पचणे शक्यच नसते. कारण त्यासाठी मूळ पचनशक्ती आणि अवकाश लागतो. त्या दोन्हीचा अभाव. त्यामुळे जिकडे तिकडे बेसुमार वैचारिक, बौद्धिक, मानसिक, संकल्पनात्मक ओकाऱ्या. याच ओकाऱ्या कधी फेसबुकवरील चर्चा, कधी व्होट्स अॅपवरील पोस्ट, दूरचित्रवाणीवरील बडबडी, चित्रपट, कथा, कादंबऱ्या, घराघरातील चर्चा-वादविवाद, चहाटपरी वा पानठेल्यावरील गप्पा यातून सांडत राहतात. याची कारणे काय वगैरे चर्चा करता येतील. पण बेसुमार सुमारीकरण याच्या मुळाशी आहे हे खरे.

पुढील काळ कसा राहील? कुणास ठाऊक?

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, १४ ऑक्टोबर २०१५

रविवार, १० ऑक्टोबर, २०२१

नेता ऐसा मिळे अम्हाला...

केंद्र सरकारच्या एका ग्रामविकास योजनेचं उद्घाटन आज नवी दिल्लीतील विज्ञान भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. राजकारण, राजकीय नेते, सत्ताकारण यावर मतप्रदर्शन करण्याचं मी नेहमीच टाळतो. पण आजचा कार्यक्रम, त्यातील पंतप्रधानांचे भाषण, त्यातून पुढे आलेली योजना आणि त्यामागची दृष्टी याचं अभिनंदन केल्याशिवाय राहवत नाही. सध्या महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे आणि त्या निमित्ताने खूप बरीवाईट चर्चा सुरु आहे. ती चर्चा करणाऱ्यांनी आणि ज्यांना स्वत:चं, समाजाचं, देशाचं भलं व्हावं असं वाटतं त्या सगळ्यांनी तो कार्यक्रम, त्यातील भाषण जरूर ऐकावं. एकीकडे बारामतीची कुस्ती खेळतानाच दुसरीकडे देशाची, त्यातील ग्रामीण भागांची, समस्यांची, त्यावरील उपायांची, त्यातील खाचखळग्यांची अचूक जाण; प्रत्यक्ष कृतीसाठी दिशादर्शक कल्पना; प्रेरक भाषा; सर्वसमावेशकता; स्वत:चा वाटा उचलण्याचा संकल्प; अशा अनेक गोष्टी केवळ अर्धा तासात, समोर कागदाचा चिटोराही न ठेवता करणारे पंतप्रधान या देशाने पहिल्यांदाच पाहिले आहेत. एकीकडे प्रचाराचे दौरे आणि भाषणांची रणधुमाळी सुरु असतानाच, संपूर्ण देशाच्या ग्रामविकासाच्या संदर्भात मन-बुद्धीची एवढी तयारी आणि टीकेचा वर्षाव सुरु असतानाही मन-बुद्धीचा एवढा समतोल; या काही खायच्या गोष्टी नाहीत. एका संघगीताच्या काही ओळी सहजच ओठावर येतात-

धीरवृत्तीचा उंच हिमालय,

भीषणतेतही निर्भय निश्चल,

नेता ऐसा मिळे आम्हाला,

काय असे मग उणे,

यशाने दुमदुमवू त्रिभुवने...

आणि हे करण्यासाठी मुहूर्त लोकनायक जयप्रकाश नारायण आणि श्रद्धेय नानाजी देशमुख यांच्या जयंतीचा. स्वत:ला जयप्रकाशजींचे वारसदार म्हणवून घेणारे फक्त आणि फक्त मोदीविरोधात बुडून गेले असताना हा नेता त्यांना आदरांजली वाहण्यासाठी संपूर्ण देशापुढे, खासदारांपुढे देशाला पुढे नेण्याचा कृती कार्यक्रम ठेवतो- तोही `अरे हे तर सहज शक्य आहे' असं कोणाच्याही तोंडून निघावं अशा स्वरूपाचा. केवळ मोदी पंतप्रधान आहेत म्हणून केंद्र सरकारने देऊ केलेली मदत नाकारण्यात धन्यता मानणारे जेपीभक्त कुठे आणि अशी मदत नाकारणाऱ्यांनाही आपल्या योजनेत समाविष्ट करून घेण्याची मानसिकता कुठे?

देशाच्या ४०० जिल्ह्यात रात्रीचा मुक्काम करणारे मोदी कदाचित पहिलेच पंतप्रधान असतील. कुठे पाण्याची टाकी असते तर पाण्याचे नळ नसतात; तर कुठे नळ असतात तर पाण्याची टाकी नसते; ही आपल्या ग्रामविकासाची अवस्था माहीत असणारा आणि आपल्या भाषणात त्याचा उल्लेख करणारा हा नेता, स्वत:चे सोडून दुसरे गाव दत्तक घ्या- ही व्यावहारिक सूचना करायलाही विसरला नाही. आपण काही नवीन करीत आहोत असा आव न आणता अन्य लोक अशा प्रकारच्या ग्रामविकासासाठी जे प्रयत्न करीत आहेत त्याचाही उल्लेख करायला ते विसरले नाहीत. एवढेच नाही तर त्या प्रयत्नांची दृकश्राव्य ओळखही करून देण्यात आली. ही निधी देणारी योजना नसून, विकासाची नवीन दृष्टी विकसित करणारी योजना असल्याचे सांगतानाच- supply driven development ऐवजी demand driven development ची कल्पना अभ्यासक, कार्यकर्ते आणि विचारक यांच्यापुढे त्यांनी ठेवली.

आजच्या योजनेचे प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे सांगता येतील-

१) खासदाराने ग्रामीण भागात जावे.

२) ग्रामस्थांशी आपुलकीचे नाते जोडावे.

३) आपण काय सांगतो, त्याऐवजी लोक काय सांगतात ते ऐकावे.

४) आज्ञा देऊन कामे करण्यापेक्षा प्रेरणा देऊन कामे करण्याची पद्धत अवलंबावी.

५) छोट्याशा कामाला मोठ्ठा वळसा घालावा लागणारी पद्धत बदलून तिथल्या तिथे अनेक गोष्टी मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा.

६) आपणही एक गाव दत्तक घेणार असल्याची स्वत: पंतप्रधानांची भूमिका. (ही आजवर ऐकू न आलेली भाषा आहे.)

७) योजनेच्या यशासाठी प्रामाणिकता, कळकळ आणि भावना महत्वाची आहे यावर भर.

यादी आणखीनही करता येईल. मुख्य मुद्दा आहे- या जबाबदारीच्या, पुढाकार घेण्याच्या, झूल उतरवून काम करण्याच्या, कामाच्या बदल्यात कशाचीही अपेक्षा ठेवू नये हे स्पष्टपणे सांगण्याच्या, स्वत:चा वाटा उचलण्याच्या गोष्टी बोलणेही बंद झाले होते. जमिनीवरील पाय उचलले गेले होते. पंतप्रधान ज्या पद्धतीने काम करीत आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा जमिनीवर ठाम पाय रोवण्याची चर्चा सुरु झाली आहे. खरे तर या जगातील सगळ्याच गोष्टींच्या मुळाशी माणसाच्या (समाजाच्या) मनातील भावना आणि डोक्यातील विचार हेच असतात. प्रत्यक्ष कृती आणि त्याचा परिणाम या नंतरच्या गोष्टी आहेत. परंतु आजवर आपण भावना आणि विचार अडगळीत ढकलून सारे काही केवळ वरवर करीत राहिलो. भावना आणि विचारांना हात घालून आणि प्रवाहित करून कृतीला चालना द्यावी लागेल. पंतप्रधान तेच करीत आहेत. नेत्याने दुसरे करायचे तरी काय असते?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक राहिलेल्या भारतीय जनता पार्टीच्या पंतप्रधानांच्या आजच्या आवाहनाला सोनिया गांधी, राहुल गांधी, काँग्रेसचे अन्य खासदार, कम्युनिस्ट खासदार, अन्य समर्थक व विरोधक प्रतिसाद देतील? प्रत्यक्ष काही करून दाखवण्याची, प्रत्यक्ष समाजाचे भले करण्याची ही संधी खासदार उपयोगात आणतील? समाज पाहणार आहे, लोक पाहणार आहेत, जग पाहणार आहे. १०० खासदारांनी जरी हे करून दाखवले तरी पुरे. अन्य ७०० खासदारांच्या पाठीशी लागून जनताच त्यांना हे करायला भाग पाडेल. एकदा ही साखळी प्रक्रिया सुरु झाली की, राजकारणात तग धरण्यासाठी जमिनीवर राहून काम करण्याला पर्याय राहणार नाही.

- श्रीपाद कोठे

नागपूर

शनिवार, ११ ऑक्टोबर २०१४

गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०२१

Approach

approach

सध्या कुस्तीस्पर्धांची एक जाहिरात सुरु आहे. एक तरुण मांडीवर थाप मारून एका तरुणीला आव्हान देतो आणि ती तरुणी न घाबरता तशीच मांडीवर थाप देते आणि न बोलता पुढे जाते. तरुण खजील होऊन खाली मान घालतो. जाहिरातीतून जो संदेश दिला तो स्पृहणीय आहेच.

कालच राष्ट्र सेविका समितीच्या संस्थापिका मावशी केळकर यांच्या जीवनावर एक बोलपट लोकसभा टीव्हीवर पाहिला. काही गोष्टींची उजळणी झाली. सध्या सुरु असणाऱ्या कुस्ती स्पर्धांच्या जाहिरातीतून जो संदेश देण्यात येत आहे तोच संदेश घेऊन मावशी १९३६ साली उभ्या राहिल्या. पतीच्या निधनानंतर आणि नऊवारी पातळ नेसून. सगळ्या भारतभर तो संदेश पोहोचवला आणि त्यानुसार वागणाऱ्या, दंड खांद्यावर घेऊन थाटात संचलन करणाऱ्या हजारो सेविका देशाच्या कानाकोपऱ्यात उभ्या केल्या.

आमच्या घरासमोरच काही मोकळे प्लॉट होते. त्या मैदानावर समितीची शाखा लागत असे. माझ्या बहिणी इतर सेविकांसह ती शाखा सांभाळत. त्यावेळच्या नागपूरच्या काँग्रेस खासदाराच्या ताफ्यातील एक `दादा' आमच्या पलीकडील वस्तीत राहत असे. तो अनेकदा रस्त्याच्या कोपऱ्यावर येऊन उभा राहत असे. सुमारे चाळीसेक वर्षांपूर्वीची ही कहाणी. त्यावेळी नागपूर सुद्धा आजच्या सारखे नव्हते. आमची वस्ती नवीनच होती. रिक्षावाले अंधार पडला की यायला घाबरत. वस्तीच्या मुख्य चौकात रात्री एकटेदुकटे जाणे कठीण होते. तलवारी वगैरे केव्हा निघतील नेम नसे. रस्त्याच्या कोपऱ्यावर उभा राहणारा `दादा' तर मोठंच प्रस्थ होतं. पण समितीची शाखा. त्या सगळ्या मुलींची हिंमत, संघाची तगडी शाखा (आमची शाखा शंभरी शाखा होती), संघाची म्हणून जी खास कुटुंब होती त्यांचे परस्पर संबंध, या सगळ्यामुळे निर्माण झालेले वस्तीतील वातावरण यामुळे, कोपऱ्यावर उभे राहण्यापलीकडे त्या `दादाने'` काहीही केले नाही. तो करू शकला नाही. हे सांगण्याचे कारण म्हणजे मावशी केळकर यांनी सांगितलेला approach.

जाहिरातीतील संदेश आणि मावशी केळकर यांनी दिलेला संदेश एकच आहे. पण दोन्हीचा approach मात्र फार वेगळा आहे. तो फार समजावून सांगण्याची गरज नाही. दोन्ही approach चे परिणाम गुणवत्ता म्हणूनही खूप वेगळे. दोन्हीची उदाहरणे आज मोठ्या प्रमाणात आजूबाजूला सहज दिसणारी. शेवटी कोणाचाही कोणताही approach हा प्रेरणा आणि प्रयोजन यांनी आकार घेतो. मावशी केळकर यांचा approach आणि जाहिरातीचा approach यात हा फरक आहे. संदेश एक असला तरीही. समाजासमोर दोन्ही आहे. काय स्वीकारायचं हा समाजाचा प्रश्न आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

सोमवार, ८ ऑक्टोबर २०१८

बुधवार, ६ ऑक्टोबर, २०२१

निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने आज सार्वजनिक जागी आंदोलन करण्याविरुद्ध मत दिले. तो मोठा विषय होता त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात तो जाणे ठीक होते. पण आपण समाज म्हणून, व्यक्ती म्हणून सार्वजनिक वस्तू, वास्तू, वाहने कशी वापरतो? अगदी सार्वजनिक संडास सुद्धा लोक व्यवस्थित वापरत नाहीत. दार लावून धर्म उरकले पाहिजेत, स्वच्छता ठेवावी, पाण्याचा वापर नीट करावा; हेदेखील लोकांना कठीण वाटते. फेसबुकसारखी सार्वजनिक माध्यमे सुद्धा आपल्या बेजबाबदारपणाला अपवाद नाहीत. फेसबुक यादीतील मैत्री ही प्रत्यक्षातील मैत्रिपेक्षा निराळी असते. येथील ओळख निराळी असते. वय, अनुभव, ज्ञान, क्षमता, परिस्थिती, वृत्ती, विचार वेगळे असतात. त्यामुळे लिहिताना, व्यक्त होताना, प्रतिक्रिया देताना मर्यादा पाळाव्या, सभ्यता आणि संकेत पाळावे, भाषा नीट असावी; या कशाचेही भान ठेवण्याची गरज आम्हाला वाटत नाही. सुमार, उथळ, अविचारी, दांभिक, उच्छृंखल असंच पुष्कळ पाहायला, अनुभवायला मिळतं. आपण विश्वगुरु वगैरे होऊ तेव्हा होऊ, पण सध्यातरी आपण निर्लज्ज आणि निरर्थक समाजाकडे चाललो आहोत. ज्यांना याची खंत वाटते ते स्पष्ट आणि परखड बोलणे टाळतात हेही दुर्दैवाचे आहे.

- ७ ऑक्टोबर २०२०

बेजबाबदार

 बेजबाबदार

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत प्रदूषण इतकं वाढलं आहे की, येत्या २२ तारखेला `no car day' पाळण्याची तयारी सरकारने चालवली आहे. त्याला नायब राज्यपालांची परवानगीही मिळाली आहे. त्यावर एका बिझिनेस वाहिनीवर चर्चा झाली. बिझिनेस वाहिनी हे आवर्जून सांगण्याचे कारण म्हणजे, या विषयाचा थेट व्यवसायांशी असलेला संबंध. एक प्रकारे conflict of interest. असे असूनही हे विषय आता इतके महत्वाचे अन संवेदनशील होऊ लागले आहेत की त्याकडे दुर्लक्ष करणे कोणालाच शक्य नाही. तर या चर्चेत, नेहमीप्रमाणेच राजकीय नेतेही सहभागी झाले होते. कॉंग्रेसच्या रागिणी नायक या चर्चेत होत्या. त्यांनी सुरुवातीलाच एक भूमिका मांडली की, प्रदूषण दूर करण्याची जबाबदारी सरकारची आहे त्याची जबाबदारी लोकांवर टाकू नका. त्यांचे शब्द होते- dont shift the onus to peoples shoulder.

जी एक भयंकर मोठी चूक वर्षानुवर्षे चालत आलेली आहे, ती काल त्यांच्या मुखातून बाहेर पडली. आमचे एकूणच जगणे, त्यातील सुखदु:ख, त्रास अथवा सोयीसुविधा, समस्या वा त्या सोडवणे; या बाबी कोणत्याही एका घटकावर अवलंबून नसतात. त्याला अनेक पदर आणि अनेक कोन असतात. अनेकांची आपापली जबाबदारी असते. मात्र काहीही झाले की, सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याची अतिशय घातक सवय आपल्याला लागलेली आहे. `चाहे जो मजबुरी हो, हमारी मांगे पुरी करो' हाच आपला जीवनमंत्र झाला आहे. कोणत्याही गोष्टीची जबाबदारी स्वीकारायला आम्ही तयार नसतो. जबाबदारीविहीन जीवन आम्हाला हवे आहे. पण असे शक्य नसल्याने जबाबदारी ढकलायला सरकार ही एक चांगली गोष्ट आहे. काहीही झाले की सरकार काय करते? सरकार झोपले आहे का? असे प्रश्न विचारले की आमचे काम संपले.

पाश्चात्य सामाजिक विचारातील ही प्रचंड मोठी चूक आणि त्रुटी आहे. पण या पद्धतीने कोणतीही समस्या सुटणे हे मुळातच अशक्य असल्याने वाद, भांडणे आणि संघर्ष सुरु राहतात पण समस्या सुटत नाहीत. उलट समस्येच्या सोडवणुकीतून नवीन समस्या जन्माला येतात. सीसी कॅमेरे याचे उत्तम उदाहरण. चोऱ्या, दरोडे वगैरे होऊ नयेत यासाठी गेल्या काही वर्षात सीसी कॅमेरे आले. पण एकही दिवस असा जात नाही की, त्या कॅमेऱ्यात टिपलेला गुन्हा बातम्यात पाहायला मिळत नाही. समाजाने सुरक्षेसाठी पोलीस दल उभारले, पण पोलिसांवरील अत्याचार वा पोलिसांकडून होणारे अत्याचार; या रोजच्या बातम्या आहेत. सरकार ही गोष्ट सुद्धा चांगल्या सामाजिक व व्यक्तिगत जीवनासाठी निर्माण झाली. पण आज जी स्थिती त्या संबंधाने आहे त्याचे वेगळे वर्णन करण्याची गरज नाही. विद्यार्थांना शिक्षणासाठी पैसा मिळावा म्हणून बँकांनी कर्ज देणे सुरु केले. आज त्या कर्जातील पाच हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम बुडीत खाती आहे.

अक्षरश: असंख्य उदाहरणे देता येतील. एकांगी, बेजबाबदार विचारपद्धती, त्याला अनुसरून योजना, व्यवस्था अन विश्लेषणे; यांनी समस्या सुटत नाहीत. उलट त्यामुळे समस्यांचे डोंगर उभे होत राहतात. व्यक्तिगत जीवनातील एखाद्या क्षुल्लक घटनेपासून तर प्रदूषण वगैरेंसारख्या जगड्व्याळ समस्यांना अनेक पदर अन कोन असतात, अनेकांच्या अनेक जबाबदाऱ्या असतात. त्यातील प्रत्येकाने जबाबदारीने, विचारपूर्वक वागणे, विचार करणे आवश्यक असते. आम्हाला हे किमान मान्य तरी आहे का?

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, ७ ऑक्टोबर २०१५

स्वाभिमान आणि दृष्टिकोन

 स्वाभिमान आणि दृष्टीकोन

भारताच्या यशस्वी मंगळ मोहिमेची खिल्ली उडवणारे एक व्यंगचित्र न्यूयॉर्क टाईम्सने प्रसिद्ध केले. जगभरातील भारतीय समुदायाने त्यावर आक्षेप घेतल्यावर त्या वृत्तपत्राने माफीही मागितली. मात्र माफी मागितली म्हणजे वृत्ती आणि दृष्टी बदलते असे नाही. हे व्यंगचित्र काढणारी व्यक्ती सिंगापूरची आहे. काय होते त्या व्यंगचित्रात? कशावर भाष्य होते? भाष्य होते मंगळ मोहिमेला आलेल्या खर्चावर. पंतप्रधानांनी ज्या गोष्टीचा गौरवपूर्ण उल्लेख केला होता आणि समस्त भारतीयांना ज्याचा अभिमान वाटतो अशी ही बाब. हॉलीवूड चित्रपटापेक्षा कमी खर्चात पार पाडलेल्या या मोहिमेच्या खर्चाचा अर्थ, व्यंगचित्र काढणाऱ्या दीड शहाण्याने आणि ते प्रसिद्ध करणाऱ्या अति शहाण्यांनी, भारत दरिद्री आहे असा लावला. एक शेतकरी आपली गाय घेऊन दारावर उभा आहे आणि उच्चभू लोकांच्या क्लबमध्ये आत घेण्याची विनंती करतो आहे, असे त्यात दाखवले आहे. न्यूयॉर्क टाईम्सच्या या आचरटपणातून निर्माण झालेल्या मान-अपमानाच्या प्रश्नाचा योग्य निकाल त्यांच्या माफीने लागलेला आहे. परंतु या व्यंगचित्राने पुढे आणलेल्या इतर प्रश्नांचे काय? वास्तविक तेच या प्रकरणातील खरे प्रश्न असून आज जगाला भेडसावत आहेत. काय आहेत हे प्रश्न?

हे प्रश्न आहेत, जगण्यातील पैशाच्या भूमिकेचे. पैसा म्हणजेच जगणे की पैसा हे जगण्याचे साधन आहे? जी गोष्ट कमी खर्चात होते त्यासाठी अधिक पैसा खर्च करणे शहाणपणाचे की मूर्खपणाचे? कोणाजवळ किती पैसा आहे यावरून व्यक्तीचा, समाजाचा, देशाचा, संस्थेचा दर्जा उच्च किंवा नीच ठरवणे याला सभ्यपणा म्हणावे का? बुद्धिमत्ता, गुणसंपदा यांना काही अर्थ आहे की नाही? अमाप पैसा आहे एवढ्यासाठी निर्बुद्धतेचा गौरव करण्याची वृत्ती माणसाला भूषणावह समजायची का? ज्या मानवेतर सृष्टीवर माणसाचे जीवन अवलंबून आहे त्याबद्दल तिरस्कार, घृणा आणि कमीपणाची भावना मानवाला कमीपणा आणणारी नाही का?

संपूर्ण जगात या प्रश्नांची जी उत्तरे दिली जातील त्याच्या नेमके विरुद्ध भारताचे उत्तर असेल. उत्तरातील हा विरोध वृत्ती आणि विचारांचा परिणाम आहे. वृत्ती आणि विचारांचा हा विरोध आजचाच आहे असेही नाही. हा खूप जुना आहे. अमेरिका आज भारतेतर जगाच्या या दृष्टीची सगळ्यात सशक्त प्रतिनिधी आहे. सुमारे १२५ वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंद यांनी प्रत्यक्ष अमेरिकेतच या वृत्तीचे वाभाडे काढले होते. `डॉलरवर आधारित जीवनमूल्य, डॉलरवर आधारित समाजव्यवस्था, डॉलरवर आधारित विचारपद्धती' यावर प्रचंड कोरडे ओढून त्यांनी त्यातील त्रुटी आणि धोके दाखवून दिले होते. एवढेच नव्हे तर संपूर्ण जगासाठी यासंबंधातील भारतीय दृष्टीकोन कसा योग्य आहे याचेही विवेचन केले होते. आज त्यांनी दाखवलेल्या त्रुटी आणि धोके जगापुढे आ वासून उभे आहेत. जगातील बहुतेक सारेच संघर्ष आणि अशांती भारतेतर दृष्टीच्या स्वीकारामुळेच निर्माण झाले आहेत.

स्वामीजींनी भारताचा स्वाभिमान आणि दृष्टीकोन या दोहोंच्या प्रस्थापनेसाठी काम केले. आज स्वाभिमानाची प्रस्थापना झालेली आहे असा अनुभव येतो. न्यूयॉर्क टाईम्सच्या व्यंगचित्र प्रकरणाने हा अनुभव पुन्हा दिला आहे. दृष्टीकोनाची प्रस्थापना मात्र अजून बाकी आहे. खुद्द आम्ही भारतीय लोकही स्वभिमानापुरता विचार करीत असून, दृष्टीकोनाकडे दुर्लक्ष करीत आहोत अशी स्थिती आहे. `अर्थ' विषयातील भारतीय दृष्टीकोनाची प्रस्थापना हे आगामी काळातील आव्हान आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

मंगळवार, ७ ऑक्टोबर २०१४

पत्रकार कोण असतो?

 पत्रकार कोण असतो?

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना `देहाती औरत' म्हटल्याचा आणि त्यावेळी तेथे उपस्थित असलेली एन.डी.टीव्हीची पत्रकार बरखा दत्त चुपचाप मिठाई खात राहिली, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केला आणि त्यानंतर पुन्हा एकदा एका जुन्या प्रश्नावर नव्याने मंथन सुरु झाले आहे. तो प्रश्न आहे, `पत्रकाराची भूमिका काय असावी?'

`पत्रकाराची भूमिका काय असावी?' या प्रश्नावर `पत्रकार हा प्रथम पत्रकार असतो' असा एक जोरदार आणि जोमदार दावा केला जातो. तो पत्रकार असतो न्यायाधीश नसतो, त्यामुळे त्याने कोणता निवाडा करू नये. किंवा सगळ्या बाजू स्वच्छपणे समाजासमोर याव्यात म्हणून त्याने कोणतीही एक बाजू घेऊ नये, असे म्हटले जाते. पत्रकाराची निष्पक्षता हा त्याचा पहिला गुण समजला जातो. ते योग्यही आहे. ते त्याचे कर्तव्य आहे आणि तो त्याचा धर्मही आहे. असे असताना त्यावर चर्चा का होते?

मागे कारगिल युद्धाच्या वेळीही बरखा दत्त हिच्याच `ground report' वरून याच प्रश्नाची चर्चा झाली होती. मुंबई शहरावरील दहशतवादी हल्ल्यानंतरही अशीच चर्चा झाली होती. आपली इलेक्ट्रोनिक प्रसार माध्यमे जे अति उत्साही वार्तांकन दाखवित होती ते पाहून; पाकिस्तानातील अतिरेकी मुंबईतील आपल्या लोकांशी संवाद साधत होते. त्यावेळीही `देशभक्ती' की `व्यवसायधर्म' अशी चर्चा झडली होती.

या चर्चेत पत्रकाराची निष्पक्षता हा एक मुद्दा पुढे करून अनेक बाबींकडे डोळेझाक केली जाते. पहिला मुद्दा हा की, पत्रकारिता हा एक व्यवसाय आहे. त्यालाही अन्य व्यवसायांप्रमाणे काही मर्यादा आहेत आणि त्या तशा असायलाच हव्यात. व्यवसाय कोणताही असो- वैद्यकीय, अभियांत्रिकी, खानावळ, शिक्षण, धान्य, कपडे, सौंदर्यवृद्धी- त्याच्या परिणामांची जबाबदारी तो व्यवसाय करणाऱ्यांचीच असते. शिवाय या परिणामांचा विचार, ते परिणाम होण्याआधीच संबंधित व्यावसायिकाने करायला हवा. ज्या देशात तो व्यवसाय करतो त्या देशातील कायदे, नीतीनियम, सामाजिक मान्यता आणि सुरक्षा यांच्या मर्यादेतच त्याने व्यवसाय करायला हवा. तसे तो करत नसेल तर ते नियमबाह्य, घटनाबाह्य आणि अनैतिक असेच म्हणायला हवे. हाच नियम पत्रकारितेलाही लागू व्हायला हवा.

ही काही नवीन अपेक्षा आहे असेही नाही. सामाजिक उपद्रव होतो तेव्हा संबंधित समुदायांची नावे सांगू नयेत, लिहू नयेत किंवा त्यांचा नामोल्लेख करून चर्चा करू नये असे संकेत आहेत आणि ते बऱ्याच प्रमाणात पाळलेही जातात. बलात्कारित वा पिडीत मुलीची वा महिलेची ओळख जाहीर करू नये अशीही पद्धत पत्रकारितेत आहे. त्यामागे हीच जबाबदारीची भावना असते. मग जे सामाजिक बाबतीत केले जाते वा त्याबाबत जी विशिष्ट व्यवहाराची अपेक्षा केली जाते ती राष्ट्रीय सुरक्षेच्या व स्वाभिमानाच्या बाबतीत गैर का ठरावी? अगदी आजही हेच सुरु आहे. सध्या जम्मू-काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये पाक अतिरेक्यांनी घुसखोरी केलेली आहे. सुमारे दोन आठवड्यांपासून आपले बहाद्दर जवान त्यांचा बंदोबस्त करीत आहेत. आमचे दूरचित्रवाणीचे पत्रकार त्यांच्या मागेमागे कॅमेरा घेऊन धावत आहेत. कशासाठी हा तमाशा?

पत्रकारिता कशासाठी? `to entertain, educate and enlighten' हे पत्रकारितेचे ध्येय असल्याचे पत्रकारिता अभ्यासक्रमात शिकवले जाते. ते अतिशय योग्य आहे, पण म्हणून केव्हा, कोठे, किती आणि कशाचे याचे तारतम्य सोडून द्यायचे की काय? देशाच्या सीमांचे, देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचे, संरक्षण योजनांचे, लढाईचे वगैरे शिक्षण आणि माहिती द्यायची आहे तर द्या ना. कोण अडवतो? पण त्याची वेळ कोणती? युद्ध सुरु असताना? संघर्ष सुरु असताना? महत्वाच्या राजकीय वार्ता सुरु असताना? का? कोणत्या वेळेला कोणती माहिती दिली, कशा पद्धतीने दिली तर त्याचे काय आणि कसे परिणाम होतील? अमुक वेळेला अमुक गोष्टीची गरज आहे का? किती गरज आहे? कशाचाही विवेक, तारतम्य ठेवायला हवे की नाही? माहिती देणे, शिक्षण देणे, मनोरंजन करणे हे आमचे काम आहे म्हणून उद्या सेलीब्रिटीच्या अंतर्वस्त्रांचे ब्रांडस सांगाल. कशासाठी? ते नाही पोहोचले लोकांपर्यंत तर काही अडते का? माहिती वा बातमी पोहोचवताना त्याची गरज किती? त्याचे परिणाम काय? त्याची योग्य- अयोग्य वेळ यांचे भान सोडून देण्याचे काय कारण?

एखादी व्यक्ती पत्रकार असते, याचा अर्थ ती व्यक्ती पत्रकार म्हणूनच जन्माला येते वा मरतानाही पत्रकारच असते असे नाही. अगदी पत्रकार म्हणून काम करतानाही ती नेहमीच पत्रकार नसते. घरी, कुटुंबात, नोकरीत, खाजगी आयुष्यात ती पत्रकारितेचा मुखवटा काढूनही अनेकदा वावरत असते नव्हे ते आवश्यक असते. बातमीशी, घडामोडींशी त्या व्यक्तीची बांधिलकी असली पाहिजे, त्यासाठी कामाच्या वेळा वगैरे सबबी त्याने सांगायला नको. येथवर ठीक आहे. पण एखाद्या पत्रकाराच्या मुलाने काही चूक केली तर त्याचे प्राधान्य आपल्या मुलाच्या त्या चुकीची बातमी देण्याला राहील की त्याची चूक दुरुस्त करायला?

तपशिलाची ही चर्चा बरीच वाढवता येईल. मूळ मुद्दा हा आहे की, पत्रकारिता ही एखाद्याची भूमिका असते. ही भूमिका पार पाडताना त्याच्या बाकीच्या भूमिका अस्तंगत होऊ शकत नाहीत. इतरांप्रमाणेच पत्रकारही एकाच वेळी अनेक भूमिका निभावत असतो, नव्हे त्याने त्या निभावायला हव्यात. एखादा नट रंगमंचावर एखादी भूमिका समरस होऊन पार पाडीत असेल आणि त्याच वेळी समजा रंगमंचावर आग लागली तर त्याने काय भूमिकेतच वावरायचे की, कोणताही विचार न करता आग विझवायची? खलनायकाची भूमिका करणाऱ्यालाही घरी आल्यावर लक्षात ठेवावेच लागते की आपण पती आहोत, पिता आहोत, पुत्र आहोत वा मित्र आहोत. मग पत्रकारांनीच तेवढे आम्ही पत्रकार आहोतचा धोशा लावत राहण्यात काय अर्थ. तुम्ही पत्रकार आहात त्याच वेळी तुम्ही जबाबदार नागरिक आहात, देशभक्त आहात, समाजाचे एक घटक आहात, संवेदनशील माणूस आहात. एक भूमिका पार पाडताना अन्य भूमिका विसर्जित होत नसतात.

विशिष्ट संदर्भामुळे `राजधर्म' या शब्दाची खूप चर्चा होते. पण प्रत्येकच गोष्टीचा एक धर्म असतो हे ध्यानात ठेवले पाहिजे. पत्रकारितेचाही `पत्रकार धर्म' असतो. आणि या अर्थाने जेव्हा `धर्म' शब्द वापरला जातो त्याचा अर्थ कर्तव्य, जबाबदारी आणि हेतू (लक्ष्य) या तिन्हींच्या संमिश्रणातून होणारा विचारबोध आणि व्यवहारबोध असा होतो. पत्रकारांनी आणि पत्रकारितेनेही `पत्रकार धर्माचे' भान सतत ठेवले पाहिजे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

सोमवार, ७ ऑक्टोबर २०११