बुधवार, २३ नोव्हेंबर, २०११

ब्रेक, वेग आणि नियंत्रण

लहानपणी सायकल शिकताना `ब्रेक हातात ठेवावा' हे वाक्य आपण किती तरी वेळा ऐकलेलं असतं. तसा तो ब्रेक हातात ठेवून सायकल शिकलेलीही असते. कालौघात ते सारे आपण विसरूनही जातो. `ब्रेक हातात ठेवावा' हे तत्व सत्य आहे आणि जीवनव्यापी आहे हे मात्र लक्षात येत नाही. आज सर्वत्र जे काही सुरू आहे, ऐकायला येते आहे, पाहायला मिळते आहे ते पाहिले की `ब्रेक हातात ठेवावा' हे तत्व वारंवार आठवते. विशेषत: अर्थकारणावरून आज जगभर जो हैदोस सुरू आहे तो पाहिला की, हे तत्व जीवनव्यापी सूत्र म्हणून पटू लागते.

१९१७ साली रशियात सुरू झालेला कम्युनिझमचा प्रवास ग्लासनोस्त, पेरेस्रोइकाच्या खडकावर आपटून फुटला आणि अमेरिकेत व्याप्त अर्थप्रधान, व्यक्तिवादी कल्पना जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण यांच्या माध्यमातून जगभर पसरल्या. त्यांचा जोर आणि प्रभाव एवढा होता की, कम्युनिझमचा आणखीन एक गढ असलेला चीनदेखील जुनी खोळ टाकून नव्याने वाटचाल करू लागला. चीनमध्येही कम्युनिझमचे थडगे बांधले गेले. तेव्हापासून अमेरिकन भांडवलशाहीचा रथ चौखूर उधळला. भांडवलशाहीच्या या tytanic ला २००८ साली मोट्ठे छिद्र पडले आणि त्यात पाणी घुसायला लागले. हे अवाढव्य tytanic आता कधी बुडेल याचा काहीही भरवसा राहिलेला नाही.

बुडणार्या जहाजाच्या बावरलेल्या कप्तानासारखे सारे तज्ञ, धोरणकर्ते बावरुन इकडे तिकडे धावाधाव करत आहेत. हाती काहीही लागत नाही, मार्ग सापडत नाही, जहाजातील पाणी कितीही काढले तरीही काही उपयोग होत नाही. देशचे देश बुडू लागले आहेत. package देण्यासाठी अवास्तव नोटा छापल्याने मुद्रास्फीति आणि महागाई वाढली. देशोदेशीच्या केंद्रीय बैंक्सनी योजलेले उपाय पालापाचोळ्यासारखे उडून गेले. गमतीचा भाग म्हणजे अजूनही तथाकथित अर्थतज्ञ आर्थिक सुधारणा वगैरे वेडपट गोष्टीच करीत आहेत. ज्या विकसित वगैरे देशांनी कथित आर्थिक सुधारणा वगैरे केल्या ते देश दिवाळखोरीत निघत आहेत हे सुद्धा कोणी लक्षात घेत नाही. आजुबाजूला घडणार्या गोष्टी मनापर्यंत, बुद्धीपर्यंत पोहोचत सुद्धा नाहीत एवढी हतबुद्धता, भाम्बावलेपण सारीकडे पसरले आहे.
कम्युनिझमने गाडीचे ब्रेक एवढे दाबून ठेवले होते की, गाडी पुढेच सरकत नव्हती आणि भांडवलशाहीच्या गाडीला तर ब्रेकच नाहीत. तिचा वेगही सुसाट आहे. आता या गाडीचे भवितव्य काय हे सांगायला कोणा ज्योतिष्याची गरज नाही. क़पाळमोक्ष ठरलेलाच आहे. पाहायचे फक्त एवढेच आहे की, या भीषण अपघातातून कोण वाचते आणि कोणाकोणाची आहुती पडते. जखमी तर बहुतेक सार्यांनाच व्हावे लागेल. गाडीला ब्रेक अत्यावश्यक असतो आणि योग्य वेळी तो वापरायचाही असतो; हा सुवर्णमध्य, हा व्यवहार, हे त्रिकालाबाधित सत्य कम्युनिझम आणि भांडवलशाही या दोन्हीने नजरेआड केले.

परंतु ब्रेक आणि त्याचा योग्य वापर हे सत्य प्रत्यक्षात येण्यासाठी एक आणखीन गोष्ट अत्यावश्यक असते आणि ती म्हणजे, `नियंत्रण'. हे नियंत्रण असते मनाचे, विचारांचे. नियंत्रण कधीही बाह्य असू शकत नाही. गाडीचा वेग वाढू लागला की, मन सांगते वेग कमी कर आणि आपण ब्रेक लावतो. वळण आले की मन सांगते, वेग कमी कर, अमुक दिशेला गाडी वळव आणि मग तशी कृती केली जाते. मानवी सभ्यतेने आज हे नियंत्रणच गमावले आहे. अर्थकारणापुरते बोलायचे तर, हे संपूर्ण अर्थकारण पैसा मिळवण्याचे अर्थकारण आहे. ही दिशाच चुकीची आहे. ही दिशा वळवून अर्थकारणाचे तोंड माणसाचे सुख, समाधान, शांती, सुरक्षा, सुव्यवस्था, सहजीवन याकडे वळवले जात नाही तोवर आपल्या नशिबी केवळ जंगलात भटकणेच राहील.

-श्रीपाद कोठे, नागपूर
मंगळवार, २२ नोव्हेंबर २०११

बुधवार, २ नोव्हेंबर, २०११

गरज आणि अपव्यय

१ नोव्हेंबरपासून महाराष्ट्र शासनाने विजेची भरघोस दरवाढ केली आहे. दिल्लीतील केंद्र सरकारही पेट्रोलची पुन्हा भाववाढ करणार असे संकेत आहेत. या दोन्हीचा थोडाफार विरोध होईल आणि पुन्हा सारे काही शांत होऊन जाईल. गेल्या दोन वर्षात महागाई आ वासून उभी आहे. सामान्य दैनंदिन जीवन जगणार्या सामान्य माणसांनाच ही चिंता भेडसावते आहे असे नाही तर सरकार, पंतप्रधान, रिझर्व बँकेचे गव्हर्नर, जागतिक नेते, जागतिक अर्थसंस्था या सार्यांना महागाईने घोर लावला आहे. जगणे कठीण झालेल्यांना तर ही चिंता सतावते आहेच पण धोरण आणि नियोजन करणार्यांनाही हीच चिंता सतावते आहे. आता तर विकासाची गती थांबली तरी चालेल पण महागाई काबूत यायला हवी, अशा टोकाच्या वाटणार्या भूमिकेपर्यंत रिझर्व बँकेचे गव्हर्नरदेखील बोलू लागले आहेत. यातून मार्ग काढण्याचे प्रयत्नही सुरू आहेत पण हाती काही लागत नाही. अर्थतज्ञ त्याचे विविध प्रकारे विश्लेषण करतात. ते सारे सामान्य माणसाच्या डोक्यावरून जाते. आपला कोलमडणारा जमाखर्च सावरला जात नाही, एवढेच त्याला कळते. परंतु महागाईचा हा प्रश्न केवळ अर्थशास्त्राचा विचार करून सुटणार नाही हे अर्थतज्ञान्ना कळत नाही आणि एकूण अर्थव्यवहारात आपलीही काही जबाबदारी आहे हे सामान्य माणूस समजून घेत नाही. अर्थतज्ञ स्वत:च्या विश्वात मश्गुल असतात आणि सामान्य माणूस सारे काही अर्थव्यवस्था, अर्थधोरणे आणि ही धोरणे निश्चित करणारे यांच्यावर ढकलून मोकळा होतो.
विजेचे उदाहरण घेऊ. वीज ही आजची जीवनावश्यक बाब झाली आहे. विकासाच्या आणि आधुनिकीकरणाच्या संकल्पनेचे जे काही मापदंड आहेत त्यात ऊर्जेचा अधिकाधिक वापर हा एक मापदंड आहे. वीज हा आज जगभर वापरल्या जाणार्या ऊर्जेचा महत्वाचा घटक आहे. या विजेचा किती प्रचंड गैरवापर होत असतो याचा विचार आपण करतो का? नुकतीच दिवाळी झाली. या काळात विजेचा किती गैरवापर झाला? दिवाळीसारखे सण आवश्यक असतातच. ते नवजीवन देतात, ऊर्जा देतात, अर्थकारणाला चालना देतात. त्यामुळे ते आनंदाने साजरे करायलाच हवेत. पण आनंद साजरा करण्यासाठी घरावर विजेच्या १-२ माळा लावणे ठीक आहे. मात्र जिकडे तिकडे जो प्रचंड झगमगाट दिसतो त्याचे समर्थन करता येईल? नवदांपत्याचा पहिला दिवाळसण, नवीन घरातील पहिली दिवाळी, घरातील नवजात बालकाची पहिली दिवाळी अशा प्रसंगी अधिक रोषणाई समजूनही घेता येईल, पण नियमितपणे साजर्या होणार्या सणालाही ही उबग आणणारी रोषणाई विजेचा अपव्यय नाही तर काय? मोठमोठे मोल्स, दुकाने, अन्यत्र लावण्यात येणारे फलक यात विजेचा किती अपव्यय होतो? शासकीय कार्यालय, अन्य सार्वजनिक संस्था, सार्वजनिक स्थाने येथील वीज वापराकडे कोणाचे लक्ष असते? मंत्री, आमदार, खासदार यांच्या निवासात आवश्यकतेपेक्षा कितीतरी जास्त वीज वापरली जातेच ना! झोपडपट्टी असो वा एका बेडरूमचा ब्लोक वा बंगला; विजेचा वापर योग्य पद्धतीने व गरजेनुसारच केला पाहिजे याचा आग्रह असतो का? शाळा, महाविद्यालये, कारखाने, बैंक्स, विमानतळे... जिकडे नजर टाकावी तिकडे विजेचा अपव्यय सहज पाहायला मिळतो.
या अपव्ययाकडे लक्ष न देण्याची दोन कारणे आहेत. एक तर उपभोगाची मानसिकता. खूप उपभोग म्हणजे खूप सुख, खूप उपभोग म्हणजे खूप आनंद, खूप उपभोग म्हणजे खूप आधुनिकता, खूप उपभोग म्हणजे खूप पुरोगामित्व, खूप उपभोग म्हणजे खूप विकास अशी आज मानसिकता झाली आहे. दुसरा युक्तिवाद म्हणजे आम्ही जी वीज वापरतो त्याचे पैसे भरतो. मग ती अधिक वापरली तर तक्रार का? हा युक्तिवाद बिनतोड वाटत असला तरीही विचारपूर्वक करण्यात येणारा नाही हे सहज ध्यानात येईल. कारण असे की, आपण पैसे देऊन वीज विकत घेऊ शकत असलो तरीही पैशाने वीज उत्पन्न करता येत नाही. दिवाळीपूर्वी कोळशाचा प्रश्न उत्पन्न झाला तेव्हा आपण हा अनुभव घेतला आहे. हा अनुभव आपण कुठेही घेऊ शकतो. अगदी नंदनवन समजल्या जाणार्या अमेरिकेतही. सध्या तेथे बर्फाचे प्रचंड वादळ सुरू आहे आणि त्यामुळे वीज पुरवठ्यावर परिणाम झाला अशा बातम्या आहेत. त्यामुळे पैसा असूनही वीज मात्र नाही. कारण अगदी स्पष्ट आहे, पैसा एखादी गोष्ट विकत घेऊन देऊ शकतो, ती उत्पन्न करू शकत नाही. पैसा हे केवळ विनिमयाचे साधन आहे. पण आज आपण त्यालाच मूल्य देऊन बसलो आहोत त्यामुळे अनेक समस्यांच्या विळख्यात आपण सापडलो आहोत.
विजेचं मूल्य वीज आहे, पाण्याचं मूल्य पाणी आहे, खाद्यपदार्थांचं मूल्य खाद्यपदार्थ आहे, जमिनीचं मूल्य जमीन आहे, मातीचं मूल्य माती आहे, तेलाचं मूल्य तेल आहे, शुद्ध हवेचं मूल्य शुद्ध हवा आहे, भावनांचं मूल्य भावना आहेत, नात्यांचं मूल्य नाती आहेत. अशा अनेक गोष्टी. त्या मुळात असतील तर त्यांचा विनिमय होऊ शकेल. पण त्या नसतीलच तर पैसा कितीही असला तरीही त्याचा उपयोग नाही. पण आज पैसा हेच मूल्य झाल्यामुळे `मी पैसा देतो. त्यामुळे वाट्टेल तेवढा वापर करण्याचा मला अधिकार आहे' ही भावना आणि हा विचार बळावला आहे. एक लक्षात घेतले जात नाही की, एखाद्याने एखाद्या गोष्टीचा अपव्यय केला तर अन्यत्र त्याची कमतरता जाणवणारच. उत्पादन कितीही वाढवले तरीही हे चक्र बदलू शकत नाही. यासाठी भरपूर उत्पादन यासोबतच, आवश्यक आणि गरजेनुसार उपभोग हे सूत्र आवश्यक आहे. या सूत्राच्या अभावी कितीही अधिक उत्पादन केले तरीही तूट जाणवणारच आणि महागाई वाढणारच. अन्नधान्य, पेट्रोलियम पदार्थ, पाणी, जमीन या सार्याच बाबतीत हा अपव्यय आज सुरू आहे.
सामूहिक आणि संघटित स्वरुपातही हा अपव्यय सुरू आहे. त्याला विकासाचा मुलामा देऊन एक तत्त्वज्ञानही निर्माण केले जात आहे.
# पुण्याजवळील लवासा सिटी प्रकल्प अपव्यय नाही तर दुसरे काय आहे? तिथे घर घेण्याची सामान्य माणसाची प्राज्ञा नाही. तिथे ज्या कुणी घर घेतले असेल त्याचे पंचतारांकित आयुष्य व्यवस्थित सुरू आहे. त्यांना घराची गरज मुळीच नाही. त्या लवासा सिटीची कल्पना ज्यांची आहे त्यांनीच, विदेशातून कुठून तरी ती कल्पना सुचल्याचे म्हटले आहे. काहीही कारण नसताना, गरज नसताना हा केवढा अपव्यय. `आमच्याकडे पैसा नावाची निर्जीव वस्तू खूप जास्त आहे' या एकाच कारणासाठी!
# राजधानी दिल्लीजवळील नॉएडा येथे नुकतीच झालेली F -1 ग्रां-प्री स्पर्धा अपव्ययाशिवाय दुसरे काय आहे? पैसा, वेळ, पेट्रोल, वीज या सार्याचा अपव्यय. बोटावर मोजता येतील एवढ्या लोकांची वेगाची रग जिरावी यासाठी केलेला सामूहिक तमाशा. अन् पैशाची नशा चढलेल्या लोकांनी त्याचे कौतुक करायचे. दुसरे काय?
# मुकेश अंबानींची गगनचुंबी ईमारत वा सचिनचे नवीन आलिशान घर यांना तरी काय म्हणता येईल?
# किमान अधिवेशनाच्या काळात आमदार, खासदार, मंत्री सामूहिक वाहनांचा उपयोग का करीत नाहीत?
# जगाच्या लोकसंख्येतील फक्त ५ टक्के लोकसंख्या असलेली अमेरिका जगातील २५-३० टक्के निसर्गसाधनांचा वापर करते आणि सर्वाधिक प्रदूषणही निर्माण करते हा अपव्यय नव्हे तर दुसरे काय?
# आमची अनावश्यक खरेदी, `आम्हीही काही कमी नाही' हे दाखवण्यासाठी करण्यात येणारी खरेदी ही पैशाचीच नव्हे तर संसाधने, ऊर्जा, वेळ या सार्याचा अपव्यय नव्हे का?
# पूर्ण वापर न करता वस्तू टाकून देणे, खाण्याच्या पदार्थांची नासाडी हाही अपव्ययच.
हे सारे काही हवेतून निर्माण होत नाही वा पैशाने उत्पन्न करता येत नाही. अनेक प्रकारचा अपव्यय हा तर गुन्हेगारी स्वरूपाचा आहे असेच म्हटले पाहिजे. प्रेमाने वा दटावून, लोभ कायम ठेवून वा नाराजी ओढवून घेऊन, शांतपणे वा आवाज चढवून; पण आज हे सांगण्याची वेळ आली आहे की, अपव्यय थांबवा. व्यक्तिगत अपव्यय थांबवा आणि सामूहिक अपव्ययही थांबवा.
एक प्रश्न मात्र उरतो. गरज आणि अपव्यय ठरवायचे कसे? एक साधे सूत्र मांडता येईल. एखादी कृती वा एखादी खरेदी न केल्यास आयुष्य अडखळत असेल, त्यात अडथळा निर्माण होत असेल, आयुष्य थांबून जात असेल, पुढे जात नसेल, कुंठित होत असेल तर ती गरज. पण आयुष्यात काहीही कमी राहत नसेल, आयुष्य सुरळीत सुरू राहत असेल आणि तरीही एखादी कृती वा खरेदी करत असू तर तो अपव्यय. परंतु असे मोजून मापून निरस वा निर्जीव, आनंदहीन आयुष्य जगता येत नाही. आयुष्यात आनंद, रस असायलाच हवा. मग काय करायचे? गरजेपेक्षा २० टक्के अधिक खर्च वा कृती ही त्यासाठी ग्राह्य धरायला हरकत नाही. २० टक्केपेक्षा अधिक जे काही असेल ते मात्र अपव्ययच मानायला हवा.
आजच्या जीवनशैलीत अपव्ययाचा हा विचार हास्यास्पद वाटू शकेल. परंतु नीट, सर्वंकष आणि भविष्याचा विचार केला तर त्याला पर्याय नाही हे सहज ध्यानात येण्यासारखे आहे.

-श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, २ नोव्हेंबर २०११