रविवार, २७ जुलै, २०१४

अर्थ प्रभावाची गुन्हेगारी

पैशाच्या अभावातून गुन्हेगारी जन्माला येते तशीच पैशाच्या प्रभावातून देखील गुन्हेगारी जन्माला येते. अशी अर्थ प्रभावाची गुन्हेगारी बहुतेक दुर्लक्षित राहते. किंबहुना अशी गुन्हेगारी असू शकते किंवा गुन्हेगारीच्या मुळाशी अर्थाचा प्रभावसुद्धा राहू शकतो हेच मुळात लक्षात घेणे व मान्य करणे कठीण जाते. परंतु त्यामुळे वास्तविकता बदलत नाही हेही खरे. अर्थप्रभावातून निर्माण होणाऱ्या गुन्हेगारीचे स्वरूप बहुआयामी आहे. अर्थ अभावाच्या गुन्हेगारीला मानवीय दृष्टीकोनातून समजून घेता येऊ शकते आणि अर्थाचा अभाव दूर करून ती गुन्हेगारी दूरही करता येऊ शकते. अर्थ प्रभावाची गुन्हेगारी मात्र अशी समजूनही घेता येत नाही आणि दूर करणेही अवघड आहे. अर्थ प्रभावाची ही गुन्हेगारी आपल्या आजूबाजूला सहज आणि विपुल प्रमाणात पाहायला मिळू शकते. ही वृत्ती, अशा घटना, असे विचार हे अनेकदा गुन्हेगारी म्हणून पाहिलेही जात नाहीत. कधी कधी मात्र त्याला स्पष्टपणे गुन्हा संबोधले जाते.

आज समाजात कर्करोगासारखा पसरलेला भ्रष्टाचार हे अर्थ प्रभावाच्या गुन्हेगारीचे वृत्ती व कृती या दोन्ही प्रकारचे उत्तम उदाहरण आहे. मोठमोठे अधिकारी, व्यावसायिक, उद्योगपती, राजकारणी यांच्यावर अनेकदा धाडी पडतात आणि अनेक दिवस संपत्तीची मोजदाद सुरु असते. ही गुन्हेगारी नव्हे तर काय? अशा तऱ्हेने गैरमार्गाने पैसा मिळवणे, तो बेकायदेशीरपणे दडवून किंवा लपवून ठेवणे दोन्ही गुन्हेच. पुष्कळदा हे सारे दडपण्याचा जो प्रयत्न होतो तीही गुन्हेगारीच. वृत्ती म्हणूनही हा प्रकार गुन्हेगारी म्हणूनच गणला जायला हवा. या लोकांना जगण्याचे प्रश्न असतात किंवा असा गैरमार्गाने पैसा जमवण्याशिवाय त्यांना पर्याय नसतो असे नाही. तरीही अशी कृती केली जाते आणि नंतर तर तिला काहीच मर्यादा राहत नाही.

जगभर नजर फिरवली तरी हे लक्षात येईल. आज महासत्ता समजली जाणारी अमेरिका जगातील ४२ टक्के शस्त्रे पुरवते. त्यातून अफाट पैसा कमावते. वेगवेगळ्या पद्धतीने शस्त्रे विकली जावीत याचा प्रयत्न होतो, लॉबिंग होते, प्रश्न सोडवले जातात किंवा निर्माण केले जातात. ही सारी अर्थ प्रभावाखालील गुन्हेगारी म्हटली पाहिजे. विविध प्रकारचे मानकीकरण, कायदे- नियम अर्थ प्रभावाची गुन्हेगारी याच सदरात येतात. स्वत:ला दिवाळखोर म्हणून जाहीर करू शकलात की तुम्ही बँकाच्या बँका बुडवू शकता. किंवा व्यवसाय आणि व्यक्तिगत आयुष्य चलाखपणाने वेगळं करू शकलात की विजय मल्यासारखं छान आयुष्य जगू शकता. ही गुन्हेगारी आहे.

कालचीच एक बातमी आहे- ज्यात एका साठी ओलांडलेल्या महिलेवरील आपबिती दाखवण्यात आली. घटना मुंबईतील आहे. साठी ओलांडलेली एक महिला लोकलचे दुसऱ्या वर्गाचे तिकीट काढून चुकून पहिल्या वर्गात बसली. एका महिला तिकीट तपासनीसानेच तिची दोन वेळा अंगझडती घेतली, तासभर तिला कोंडून ठेवले. समोरची महिला पैसेवाली असती आणि तिने त्या तिकीट तपासनिसाचे हात ओले केले असते तर पुढील प्रकार घडला नसता. एक तर पैसे खाणे हा तिचा उद्देश असेल किंवा नियमानुसार वागण्याचा तिचा प्रयत्न असेल. खरेच नियमानुसार वागण्याचा प्रयत्न असेल तरीही साठी उलटलेल्या त्या महिलेला दुसऱ्या डब्यात जायला सांगून प्रश्न सुटला असता. परंतु प्रथम वर्ग म्हणजे फार मोठे, श्रेष्ठ, विशेष असे काहीतरी आणि ही विशेषता जपणे हे सगळ्यात महत्वाचे हा जो श्रेष्ठत्वगंड असतो त्यातून अशी अमानवीय घटना घडते.

या घटनेच्या एक दिवस आधीचीच दिल्लीतील घटना- एका मुलीने तक्रार केली की काही लोकांनी तिला रात्री त्रास दिला आणि तिचे कपडे फाडले. स्वाभाविक ती खळबळजनक बातमी झाली. परंतु २४ तास व्हायच्या आतच ती मुलगी बदलली. तिने तक्रार करण्यास नकार दिला. तपासात लक्षात आले की, ती मुलगी १८ वर्षांपेक्षा कमी वयाची होती, मध्यरात्री दारू पिउन तर्र होती आणि गाडी चालवीत होती. या सगळ्या प्रकारामुळे आपणच फसू शकतो हे लक्षात आले तेव्हा तिने तक्रार करण्यास नकार दिला आणि तिचा कांगावा उघड झाला. हा सगळा प्रकार `पैशाचा माज' या सदरात मोडणारा आणि गुन्हेगारी स्वरूपाचा आहे. वेगवेगळ्या शहरात चालणारे दुचाकी स्टंट, रेव्ह पार्ट्या आणि हुक्का पार्लरचे वाढते प्रस्थ, मादक पदार्थांचा चिंताजनक विळखा, या साऱ्याशी संबंधित निरनिराळ्या स्तरावरील लोक, त्यांचे लागेबांधे, टोळ्या हे सगळे प्रकार अर्थ प्रभावाची गुन्हेगारी नाहीत तर काय?

अगदी आपल्या आजूबाजूला सुद्धा आपण हा माज पाहू शकतो. साधं गाड्या नीट पार्क करण्याचं उदाहरण घेऊ या. कुठेही कशीही गाडी उभी करणं हा जणू काही आपला जन्मसिद्ध अधिकार असल्याच्या थाटात लोक वागत असतात. शिवाय कोणी काही बोलायचं वा हटकायचं नाही. तसं केलं तर शिवीगाळ, मारहाण, कुजकट बोलणे वगैरे अंगावर घेण्याची तयारी ठेवावी लागते. बरे वरून पोलिस बिलिस आमचं काही वाकडं करू शकत नाहीत, ते आमच्या खिशात आहेत हा आव. हा आवही खरा असतो कारण पोलिसांचे हात ओले होतच असतात. नागपुरातील एका सदनिकेतील रहिवासी अनेक वर्ष एका राजकीय नेत्याच्या गाडी पार्किंगमुळे बेजार होते. हा नेता रात्री केव्हातरी येणार, त्यावेळी लोक झोपले असतात वगैरेकडे दुर्लक्ष करून हॉर्न वाजवणे, गाडीचा आवाज, त्याच्या बोलण्याचा आवाज, शिवाय सकाळी बाकीच्यांना आपापल्या गाड्या काढताना अडचण होईल याचा विचार न करता अस्ताव्यस्त पद्धतीने गाडी लावणे; हे सगळे डोक्यावर चढून बसलेल्या पैशाचे प्रताप नव्हे तर काय? बरे हा नेता होता. पण सामान्य महाविद्यालयीन तरुणी अशा पद्धतीने वागतात तेव्हा काय म्हणायचे? नागपुरातीलच एका मोठ्या लेखिकेला हा अनुभव घ्यावा लागला आहे. त्या लेखिका तब्येत दाखवण्यासाठी म्हणून डॉक्टरांकडे जायला निघाल्या तेव्हा त्यांच्या फाटकासमोर तरुण मुलींचे एक टोळके आपल्या दुचाकींवर बसले होते. त्यांना बाजूला व्हायला म्हटले त्यावेळी प्रथम तर त्यांनी लक्षच दिले नाही. मग शिवीगाळ करत, बोटे मोडत, अद्वातद्वा बोलत कसे तरी ते टोळके बाजूला झाले. आई-बापांची कमाई अंगात आलेल्या या तरुणी गुन्हेगार नाहीत काय?

अशा या ढोबळ गोष्टींशिवाय अशा असंख्य सूक्ष्म गोष्टी आहेत ज्या लक्षात येत नाहीत, पण सखोल विचार केला तर त्यातील अर्थ प्रभावाचे गुन्हे ध्यानात येतील. आपण आपल्या जीवनशैलीने प्रदूषण किती वाढवत आहोत हे ध्यानात घ्यावे. प्रदूषण केल्याशिवाय आपण जगूच शकत नाही हे खरे आहे. अगदी काहीही केले नाही तरीही दिवसाचे बारा तास आपण श्वासोश्वासाच्या माध्यमातून प्रदूषण करत असतो. मात्र आपल्या जगण्यातून प्रदूषण कमी कसे होईल, त्याची भरपाई कशी होईल याची काळजी न करता बेमुर्वतपणे ते वाढवीत राहणे याला गुन्हेगारीशिवाय दुसरे काहीही म्हणता येणार नाही. अनावश्यक खरेदी हादेखील गुन्हाच म्हणावा लागेल. अनेकदा अशा अनावश्यक गोष्टी कचऱ्यात टाकल्या जातात किंवा अनावश्यक खाणे केवळ चामडीच्या रुपात वाढत जाते. दोन्हीचा उपयोग नसतो. पण त्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या उर्जा, वेळ आणि कच्चा माल यांचे काय? तेही वाया जाणार. अनावश्यक खरेदी वा अनावश्यक उपभोग नियंत्रित केला तर त्यातून अन्य अनेकांच्या गरजा पूर्ण होऊ शकतील किंवा तेवढ्या गोष्टींची बचत होईल आणि पर्यायाने प्रदूषण टाळले जाईल.

वागताना, जगताना मात्र आपण एवढा आणि असा विचार करत नाही. एकूणच पैसा आला की आपण विचार न करता, सैलपणाने वागू लागतो. हा प्रकार देखील अर्थ प्रभावाच्या गुन्हेगारीतच मोडावा लागेल. हा मुख्यत: वृत्तीचा गुन्हा म्हणावा लागेल. बरे चारचौघात जमले की असे विषय काढायचे नसतात, बोलायचे नसतात. आपण सगळे हा अनुभव घेत असतो. मनातल्या मनात आपल्याला अनेक गोष्टी जाणवतात, पण शिष्टाचाराच्या नावाखाली त्या चटईखाली ढकलून द्यायच्या असतात. आपल्या उक्ती-कृतीचं विश्लेषण, सामाजिक जबाबदारी, गरिबी, जाणीवा, योग्य-अयोग्य वगैरे गोष्टी अर्थ प्रभावासोबत कालबाह्य आणि टाकावू होतात. मग त्यांचा विचारही करायचा नसतो. ही वृत्ती आणि त्याला अनुसरून होणारी कृती हे कायदेशीर आणि सामाजिक दृष्टीने तर गुन्हे आहेतच; पण नैतिक आणि आध्यात्मिक अंगानेही ते गुन्हे आहेत. सत्य बोलणे, सत्य आचरण करणे, सत्याच्या बाजूने उभे राहणे, स्वत:ला अंतर्बाह्य शुद्ध करणे यासारख्या गोष्टींना पारखे करणारा हा अर्थ प्रभाव आहे.

अर्थाच्या अभावी चांगले जीवन जगता येत नाही. एवढेच नव्हे तर त्यातूनही गुन्हेगारी जन्माला येते. मात्र अर्थाच्या प्रभावानेही गुन्हेगारी जन्माला येत असेल तर काय करायचे? येथे एक गोष्ट नीट लक्षात घ्यायला हवी की, अर्थाचा प्रभाव आणि अर्थाची मुबलकता या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. अर्थाचा प्रभाव हा मन-बुद्धीवरचा परिणाम आहे. जीवन जगण्यासाठी पुरेसा पैसा असणे आवश्यकच आहे. मात्र त्याची हाव सुटणे, मन-बुद्धी त्याच्या अंमलाखाली चालणे हे अयोग्य आहे. अर्थाचा हा प्रभाव रोखणे यासाठी सुद्धा मन-बुद्धीचाच उपयोग करून घ्यावा लागतो. ते संस्कारित असले की त्यावर अर्थाचा अनर्थकारी प्रभाव होत नाही. त्यासाठी त्याला समजवावे लागते की आनंद, सुख आणि पैसा हे पर्यायवाची शब्द नाहीत. पैसा पैशाच्या जागी आहे. आनंद आणि सुखाच्या परी निराळ्या असतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची एक कविता आहे `या झोपडीत माझ्या'. त्यातील काही ओळी अशा आहेत-

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या... ...
भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या... ...

ताऱ्यांकडे पाहून, प्रभुनाम गाऊन जे सुख आणि आनंद प्राप्त होतो त्याची मन-बुद्धीला जाणीव असेल तर अर्थाचा प्रभाव उत्पन्न होऊ शकत नाही. आनंदाच्या अशा अनेक परी असतात. चित्र काढण्यातला आणि चित्र पाहण्यातला आनंद, गाणी ऐकण्यातला आणि गाणी म्हणण्यातला आनंद, निसर्गात रमण्याचा आणि निसर्ग जतन करण्यातला आनंद, लेखनातला आणि वाचनातला आनंद, विनोदातला आणि गांभीर्याचा आनंद, चारचौघातला आणि एकांताचा आनंद, भजनाचा आणि ध्यानाचा आनंद; अशा आनंदाच्या असंख्य परी. त्यांचा मन-बुद्धीला परिचय झाला, त्यात रमणे सुरु झाले, त्याच्या परिणामी आतील व्यक्तित्व समृद्ध होऊ लागले की मग मन-बुद्धीवरचा अर्थाचा अनर्थकारी प्रभाव नष्ट होतो. सारे काही पैसा, पैसा आणि पैसाच असे जोवर राहील तोवर अर्थाचा प्रभाव आणि त्यातून जन्म घेणारी गुन्हेगारी राहील. ती कमी केल्यास सुख-शांती, न केल्यास दु:ख-अशांती. तुमची आमची इच्छा असो की नसो.

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, २७ जुलै २०१४

रविवार, १३ जुलै, २०१४

आपले असले तरीही...

आपल्या मराठीत एक छान म्हण आहे- `आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्टं.' माणसाची ही स्वाभाविक वृत्ती असते. परंतु एखादी गोष्ट स्वाभाविक आहे म्हणजे योग्य आहे, अनुकरणीय आहे किंवा ग्राह्य आहे; असे होत नाही. योग्य- अयोग्यता किंवा स्वीकार- नकार यांचा निकष स्वाभाविकता हा नाही. भारतात नव्याने आलेल्या भाजपा सरकारचा विचार करताना ही गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. अतिशय परिश्रमांनी एक सत्तांतर देशात घडून आले आहे. त्याचे अनेक अर्थ आणि अन्वय आहेत. ते हळूहळू प्रकट होतील. विचार, आचार आणि वृत्ती या सगळ्याच बाबतीत जीर्ण शीर्ण झालेल्या, भरकटलेल्या पक्ष आणि व्यक्तींकडून ही सत्ता खेचून घेऊन भारतीय जनतेने आपल्या सुजाणतेचा आणि सुबुद्धतेचा परिचय घडवला आहे. परंतु सुरुवातीला नमूद केलेल्या म्हणीप्रमाणे अवस्था होऊ नये याची भरपूर काळजी घ्यावी लागणार आहे. उत्साह आणि आनंद कधीकधी अंध बनवतो हे विसरता कामा नये.

हा इशारा देण्याचे कारण आहे सध्या सुरु असलेले अर्थकारण. आज प्रत्यक्ष अर्थकारणासोबतच त्यातील बारीकसारीक बाबींची चर्चादेखील होते. ही अतिशय चांगली आणि स्वागतार्ह बाब आहे. सामान्य माणूस जेवढा माहितीने परिपूर्ण, सजग, आस्थावान आणि परिपक्व राहील तेवढे चांगले. मुद्दा एवढाच की, ही माहिती- चर्चा- एकांगी नको. साधकबाधक हवी. साधकबाधक हा शब्द नेमका लक्षात ठेवायला हवा. विशिष्ट विचारांनी किंवा कृतीने काय साधता येईल आणि त्याने कशाला बाधा उत्पन्न होईल या दोन्हीवर लक्ष देण्याची आवश्यकता असते.

आज एक मुद्दा प्रकर्षाने मांडला जातो की, तुम्हाला सेवा हव्या असतील तर त्यासाठी पैसा मोजावा लागेल. हा मुद्दा मांडताना, ऐकताना फार चांगला आणि तर्कशुद्ध वाटतो. परंतु त्याचे परिणाम काय होऊ शकतील आणि मुळात तो सिद्धांत म्हणून बरोबर आहे का? ही भाषा ही भांडवलशाहीची भाषा आहे. प्रत्येक गोष्टीचे वस्तूकरण, वस्तूंचे किंमतीकरण ही भांडवलशाहीची रीत आहे. यात भावना, विचार, नाती, प्रतिभा, ईश्वर यांचेही वस्तूकरण होते. ही विकृती व्यवहारात काय रूप घेऊ शकते याकडे संकेत करणारी एक बातमी आजच वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली आहे. व्हेनेझुएला देशातील कराकस येथे असलेल्या विमानतळावर शुद्ध हवेत श्वास घेण्यासाठी २० डॉलर्स म्हणजे १२०० रुपये एवढा कर आकारला जातो आहे. उद्या आपण आपल्या घराच्या गच्चीवर उभे राहून मोकळ्या हवेचा आनंद घेत असू तर त्यावर कर वा शुल्क लागणार नाही कशावरून? पैसा मिळवणे एवढाच उद्देश झाल्यानंतर शोधायचे असते फक्त निमित्त.

भांडवलशाहीच्या अशा अनेक गोष्टींनी, मूल्यांनी, सिद्धांतांनी जगात सध्या उच्छाद मांडला आहे. त्यावर जगभर सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. त्याचा त्रास आणि उपसर्ग सगळ्या जगाला डंख मारतो आहे. यावर काहीही उपाय नाही अशा विचाराने जग हतबुद्ध झालेले पाहायला मिळत आहे. या सगळ्याची वर्णने आज विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर रशिया आणि अमेरिका अशा दोन शक्ती जगात कार्यरत होत्या. परंतु १९८६ साली रशियातील मार्क्सवादाच्या पतनानंतर भांडवलशाहीला वैचारिक आणि व्यावहारिक टक्कर देणारी कोणतीही शक्ती जगात उरली नाही. मार्क्सवाद त्याच्या अंगभूत कमजोरीमुळे कोसळणार होताच. महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर, गोळवलकर गुरुजी, दीनदयाळ उपाध्याय यांच्यासारख्या चिंतकांनी त्याचे सखोल विश्लेषण करून त्याबाबत इशाराही दिला होता. रशियापाठोपाठ चीन आणि अन्य कम्युनिस्ट देशांनीही मार्क्सवाद टाकून दिला. यामुळे जगभर निर्माण झालेली पोकळी भांडवलशाहीने व्यापून टाकली. आज या भांडवलशाहीची चलती आहे. परंतु या भांडवलशाहीने समस्या सोडविण्याऐवजी समस्या वाढवूनच ठेवल्या. या भांडवलशाहीने वाढवून ठेवलेल्या काही समस्या अशा-
१) आर्थिक, प्रादेशिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक असमतोल.
२) असंख्य स्तरांवरील असंतोष.
३) असंख्य स्तरांवरील संघर्ष.
४) असंख्य प्रकारचे तणाव.
५) विविध रोग आणि प्रकृतींच्या तक्रारी.
६) भावनिक एकारलेपण, भावनिक रिक्तता, भकासपणा.
७) प्रदूषण, पर्यावरणाचा विनाश.
८) मानवातील पशुत्वाची वाढ.
९) विचारशून्यता, मूल्यविहीनता, विवेकहीनता.
१०) सुखशांतीच्या अभावात भरघोस वाढ.
ही यादी बरीच वाढवता येईल. या सगळ्यांच्या परिणामी भांडवलशाही देखील कोसळणार हे सांगायला कोणा भविष्यवेत्त्याची गरज नाही. फक्त याची अधिकृत घोषणा कधी होईल एवढाच भाग आहे. महत्वाचा प्रश्न आहे पुढे काय? मानवी समाजाची पुढील वाटचाल कशी राहील? मार्क्सवाद आणि भांडवलशाही लयाला गेल्यानंतर मानव जातीपुढील तिसरा पर्याय कोणता?

सामान्य माणसांचा समाज हाच त्या तिसऱ्या पर्यायाचा आधार राहील. पण समाज म्हणजे काय? आज जे चित्र जगभरात पाहायला मिळते तशा समाजातून मात्र हा तिसरा पर्याय विकसित होऊ शकणार नाही. काय आहे आजचे चित्र? शुद्ध हवेसाठी करआकारणी करणाऱ्या ज्या वृत्ताचा उल्लेख सुरुवातीला केला आहे. त्याच बातमीत आजच्या समाजाचेही चित्र आहे. या करावर तेथील जनतेत काय प्रतिक्रिया आहे हे सांगताना बातमीत म्हटले आहे की, सोशल मीडियात या कराविषयी नाराजी व्यक्त करण्यात येत असून त्याची थट्टामस्करीही करण्यात येत आहे. एक मासलेवाईक प्रतिक्रियाही बातमीत देण्यात आली आहे ती अशी- `विमानतळाच्या खिडक्या फुटलेल्या आहेत, शौचालयांमध्ये पाणी नाही, कुत्र्यांचा मुक्त वावर आहे पण काहीही नसले तरीही येथे ओझोन मात्र आहे.' ही प्रतिक्रिया भारतातील नाही, व्हेनेझुएला येथील आहे हे आवर्जून लक्षात ठेवायला हवे.

व्हेनेझुएलाची लोकसंख्या सुमारे तीन कोटी आहे. प्रति चौरस किलोमीटरमध्ये फक्त ७७ लोक राहतात आणि त्यांचा वार्षिक उत्पन्न दर प्रति माणशी सुमारे १२ हजार अमेरिकन डॉलर एवढा आहे. भारताची लोकसंख्या १२५ कोटी आहे. येथे प्रति चौरस किलोमीटरमध्ये ३७८ लोक राहतात आणि येथील वार्षिक उत्पन्न दर प्रति माणशी सुमारे १६०० अमेरिकन डॉलर एवढा आहे. म्हणजेच भांडवलशाहीच्या आणि वर्तमान अर्थशास्त्राच्या भाषेत तो विकसित देश आहे आणि त्याचे आर्थिक मापदंड आदर्श आहेत. तरीही तेथे व्यक्त झालेली प्रातिनिधिक प्रतिक्रिया ही भारताचीही प्रातिनिधिक प्रतिक्रिया होऊ शकेल अशी आहे. भांडवलशाहीचे दारूण अपयश आणि जगभरातील समाज नावाची गोष्ट किती रसातळाला गेली आहे याचे ते निदर्शक आहे. बेजबाबदार, भरकटलेला, उद्दिष्टहीन, सगळ्या गोष्टींसाठी सरकारच्या तोंडाकडे पाहणारा, स्वत:वर कोणतीही जबाबदारी न घेणारा, खा- प्या- मजा करा- यातच मश्गुल, मला काय त्याचे ही मानसिकता, कोणतीही गोष्ट करण्यासाठी पुढे होण्यापेक्षा त्यावर वांझ टवाळकी करणारा, विचारहीन अशा माणसांचे विशाल समूह हीच आज जगभरातील समाजाची स्थिती आहे. या समाजातून मानवी कल्याणाचा तिसरा पर्याय विकसित होऊ शकत नाही.

मार्क्सवादाचे खरे स्वरूप समजावून सांगण्याच्या संदर्भात ज्या महानुभवांचा वर उल्लेख केला आहे, त्यांनीच भांडवलशाहीच्या परिणामांची चिकित्साही केली आहे आणि भाकीतही. त्यासोबतच तिसऱ्या पर्यायाचे मार्गदर्शनही केले आहे. त्यांच्याशिवाय योगी अरविंद, भारताचे राष्ट्रपती राहिलेले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, दत्तोपंत ठेंगडी यांचीही नावे त्यात जोडता येतील. दत्तोपंत ठेंगडी यांचे आर्थिक, सामाजिक, प्रशासकीय, कायदेविषयक आदी अनेक बाबींची चर्चा करणारे एक पुस्तक आहे- त्याचे नावच आहे Third Way - तिसरा मार्ग. दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेला एकात्म मानववाद याच तिसऱ्या मार्गाचे विवरण करणारा आहे. गांधीजींचा सर्वोदय याच तिसऱ्या पर्यायाचे वेगळे नाव आहे.

कोणता आहे हा तिसरा पर्याय? तो संपूर्ण स्वतंत्र विषय आहे. या ठिकाणी एक मात्र नमूद करणे आवश्यक आहे की, भारतीय जनता पार्टी; तिसरा पर्याय सांगणाऱ्या महानुभवांचा वारसा सांगत असली तरीही तिच्या आर्थिक चिंतनात- ध्येय धोरणात- त्याला स्थान राहिलेले नाही. याची तीन कारणे आहेत- १) मुळात त्या तिसऱ्या मार्गाबद्दल अविश्वास, अनादर आणि अनास्था. २) आजची देशांतर्गत आणि जागतिक परिस्थिती. ३) समाजाची मानसिकता. या तीन कारणांमुळे ज्यांना तिसरा पर्याय योग्य वाटतो तेदेखील काहीही करू शकत नाहीत. ही तिन्ही कारणे दूर केल्याशिवाय सध्याच्या स्थितीतून मार्ग निघणार नाही. ही तीन कारणे ३, २, १ या क्रमाने दूर करावी लागतील. म्हणजेच सगळ्यात पहिले समाजाची मानसिकता ठीकठाक करावी लागेल. ती मानसिकता पुढील इष्ट बदलांना चालना देईल. म्हणूनच भारतीय जनता पार्टीचे राज्य आल्याचा विविध कारणांनी आनंद झालेल्या लोकांनी या तिसऱ्या मार्गाचा अभ्यास, चिंतन केले पाहिजे. तो मार्ग संपूर्ण समाजापुढे ठेवला पाहिजे. त्यासाठी योग्य वातावरण, साधकबाधक विचार समाजात सुरु व्हायला हवा. केवळ `आपला तो बाब्या' या स्वाभाविक वृत्तीने भाजपच्या हाताला हात लावून मम म्हणून चालणार नाही.

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, १३ जुलै २०१४

शुक्रवार, ११ जुलै, २०१४

डॉ. ईश्वरचंद्र

प्राचार्य अरविंद खांडेकर यांचं डॉ. ईश्वरचंद्र यांच्यावरचं टिपण वाचलं आणि मन ४१ वर्षांपूर्वीच्या भूतकाळात पोहोचलं. खरं तर मनात संभ्रम आहे, मन:स्थिती द्विधा आहे; डॉ. ईश्वरचंद्र यांच्यावर लिहावं की नाही याबद्दल. न लिहिलं तर कृतघ्नता होईल आणि लिहिलं तर स्वत:बद्दल बोलावं लागेल. हे बोलणंही सामान्य हवापाण्याचं नाही तर काहीसं वेगळं. पण स्वत:विषयी बोलण्याचा प्रमाद पत्करूनही डॉ. ईश्वरचंद्र यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं महत्वाचं आहे आणि आवश्यकही. माझ्या आयुष्यातील त्यांचं स्थानच तसं आहे.

१९७३ चा उन्हाळा. चवथीची परीक्षा दिली होती. निकाल लागायचेच होते. उन्हाळ्याचं हुंदडणं सुरु होतं. त्या दिवशीचा खेळ होता- धनुष्यबाण. बांबूच्या कमच्यांचे धनुष्यबाण तयार करायचे आणि वेगवेगळे शत्रू तयार करून त्यावर निशाणा साधायचा. निशाणा अर्थातच झाडे, सायकली, भिंतीवरचा एखादा बिंदू वगैरे. थोडा वेळ गेला आणि कदाचित ती वेळच तशी असावी- सोबतच्या मित्राचा बाण माझ्या डाव्या डोळ्याला लागला. एकदम डोळा बंद झाला. रक्त वगैरे काही नाही. पण डोळा उघडताच येत नव्हता. एकदम पळापळ झाली. त्यावेळी वाहने, फोन काहीही नव्हते. वस्तीत घरेच मोजकी तर डॉक्टर कुठले? पुरुष सगळे नोकरीवर गेलेले. सगळीच पंचाईत. बरे दुखणे नाही, रक्त नाही, रडणे नाही; फक्त डोळा उघडत नव्हता एवढेच.

मी आणि मित्र शेजारी शेजारीच राहणारे, दोघांचे वडीलही लहानपणापासूनचे सख्खे मित्र. सुरुवातीला नागपूरच्या महाल भागात राहणारे, मग नोकरीही एकाच बँकेत, घरे बांधली तीही शेजारी शेजारीच. रा. स्व. संघाच्या घोषदलातही दोघे होतेच. संध्याकाळी मित्राचे वडील घरी आले. त्यांना सगळा प्रकार कळला. ते म्हणाले, आपण पहिले डॉक्टरांकडे जाऊ. डॉक्टरांकडे जायचे म्हणजे प्रथम फॅमिली डॉक्टर असलेले डॉ. ब. ग. पांडे यांच्या महालच्या दवाखान्यात जायचे. मित्राच्या वडिलांनी एक सायकल रिक्षा आणली. त्यावेळी ऑटोरिक्षा असतील तरीही तुरळक, नवसासायासाचे. मी आणि आई रिक्षात, मित्राचे वडील त्यांच्या सायकलवर. जाताना त्यांची सायकल मध्येच पंक्चर झाली. ते म्हणाले, तुम्ही व्हा पुढे. मी सायकल दुरुस्त करून येतो. आम्ही दवाखान्यात पोहोचलो. डॉ. पांडेंनी तपासले, इंजेक्शन, औषधे दिली. तेवढ्यात मित्राचे वडील व माझे वडील दोघेही दवाखान्यात पोहोचले. माझे वडील बँकेतून घोषाच्या रात्र शाखेत गेले होते. संघ मुख्यालयाच्या शेजारी मोहिते संघस्थानावर ही शाखा लागते. मित्राचे वडील दवाखान्यात येण्यापूर्वी तिथे गेले. त्यांनी तिथे निरोप दिला आणि ते दोघेही पोहोचले होते. डॉ. पांडे म्हणाले, मी तात्पुरते उपचार केले आहेत पण उद्या सकाळी पहिल्यांदा मेडिकलला घेऊन जा.

दुसऱ्या दिवशी सकाळी आई वडिलांसोबत मेडिकलला. तिथे होते- डॉ. ईश्वरचंद्र. ते वय काहीही लक्षात राहण्याचं नव्हतं. अनेक तपशील, माहिती घरी झालेल्या चर्चेतून, गप्पातून अपडेट झालेली आहे; पण डॉ. ईश्वरचंद्र यांचं ते दर्शन मात्र खरे सांगतो माझ्या पूर्ण लक्षात आहे. एखादा फोटो काढावा तसं. उंचपुरे, गोरेपान, थोडे टक्कल, दाट मिशा, ताठ कणा परंतु कमरेतून अतिशय किंचित पुढे झुकून चालणे, ज्ञान- कौशल्य- आत्मविश्वास- संपन्नता- संपूर्ण व्यक्तीमत्वातून जणू निथळत असलेले. डॉक्टर सिंधी किंवा पंजाबी असावेत. पंजाबी असतील तर केशधारी नव्हते, सहजधारी होते. भरदार देहावर डॉक्टरचा पांढरा अॅप्रन, गळ्यात स्टेथोस्कोप, डोळ्यावर चष्मा, बोलणे अतिशय सौम्य मृदू, हालचाली नेमक्या, काटेकोर आणि देखण्या- सफाईदार नृत्याच्या हालचालीसारख्या. गडबड गोंधळ नाही, आरडाओरड नाही. आजच्या मेडिकलशी तुलना केली तर कुठेही मेळ न खाणारे. त्यांनी लगेच तपासायला घेतले. ती वेगवेगळी यंत्रे, त्यांनी तपासणी, कधी उजेडात तपासणी, कधी अंधार करून तपासणी. शेवटी म्हणालेत- डाव्या डोळ्याच्या आतल्या नसांना मार लागला आहे. त्या डॅमेज झाल्या आहेत. आपण उपचार करू. रोज यावं लागेल. त्यांचं आश्वासक बोलणं, आश्वासक स्पर्श अजूनही लक्षात आहे. त्यानंतर दोन महिने रोज सकाळी मेडिकलला जाणे सुरू होते. रोज पूर्ण तपशीलवार तपासणी, डोळ्यात औषधे टाकणे आणि एक दिवस उजव्या हाताला- एक दिवस डाव्या हाताला अशी इंजेक्शने घेणे. यातला एकही दिवस असा गेला नसेल जेव्हा डॉक्टरांनी विचारले नाही- कैसे हो? आणि निघताना डोक्यावर हात ठेवून म्हटले नाही- सब ठीक हो जायेगा.

दोन महिन्यांनंतर एक दिवस इंजेक्शन, औषधे झाल्यावर ते वडिलांना बाजूला घेऊन म्हणाले- `आपण खूप प्रयत्न केले. पण मला वाटतं डावा डोळा आतून पूर्ण खराब होतो आहे. तो पूर्ण काढून टाकावा लागेल. नाही तर त्याचा उपसर्ग कदाचित उजव्या डोळ्याला सुद्धा होईल आणि देव करो तसं न होवो, पण उजवा डोळाही हातून जाऊ शकेल. आपल्याकडे वेळ फारच कमी आहे. ताबडतोब सांगा तुमचा निर्णय.' आई वडिलांनी लगेच निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी रुग्णालयात दाखल. जागतिक मान्यता मिळवलेला त्यावेळचा डोळ्यांचा निष्णात डॉक्टर शस्त्रक्रिया करणार होता. संध्याकाळी कोणीतरी म्हणाले, डॉक्टर ईश्वरचंद्र नाही कोणीतरी दुसरेच डॉक्टर शस्त्रक्रिया करतील. घरच्यांना घोर लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी शस्त्रक्रिया होणार होती. सकाळी डॉक्टर आल्याबरोबर त्यांना विचारले, काल कोणीतरी असं असं म्हणत होतं. डॉक्टर लगेच म्हणाले- त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. हे शासकीय रुग्णालय आहे. लोक काहीही बोलत असतात. शस्त्रक्रिया मीच करणार आहे. सगळे निश्चिंत झाले. शस्त्रक्रिया झाली. डावा डोळा काढून टाकावा लागलाच पण उजवा डोळा पूर्ण सहीसलामत वाचला. डॉ. ईश्वरचंद्र यांची तत्परता, कौशल्य यालाच सारे श्रेय आहे. त्यांनी थोडा जरी उशीर केला असता तरी आज हे जग माझ्यासाठी अंधार झाला असता. गेली चार दशकांहून अधिक काळ मी हे जग पाहतो आहे, सारे व्यवहार करतो आहे याचे सर्वाधिक श्रेय डॉक्टर तुमचे आहे. आणि रुग्णालयातून सुट्टी झाल्यावर पहिल्यांदा तपासायला गेलो तेव्हाचे त्या देवदूताचे शब्द होते-  `खुद को कभी कम मत समझना. एक आंख गयी तो उसकी ताकद दुसरे आंख को दे कर गयी है.'

डॉक्टर मी कधीच स्वत:ला कमी मानले नाही. तुमचे म्हणणे पूर्ण लक्षात आहे माझ्या. म्हणूनच दुसरे एक डॉक्टर मित्र माझ्या मागे लागले होते- `अपंग म्हणून नोंदणी करून टाक. बरेच फायदे असतात. प्रवासात वगैरे तर फायदा होतोच पण गॅस एजन्सी, पेट्रोल पंप वगैरेही मिळू शकेल.' त्यांना मी नकार दिला. ते डॉक्टर मित्र स्वत: अधू आहेत पायाने. अपंगांसाठी त्यांनी पुष्कळ कामही केलेले आहे. पण डॉक्टर मी स्वत:ला कणभरही कमी समजत नाही आणि माझ्या व्यवहारातही कधी कोणाला माझ्यातील त्रुटीची जाणीवही होत नाही. मग मी कशाला घेऊ सवलती बिवलती. जोपर्यंत कोणीही स्वत:ला अपंग समजत नाही तोवर कोणीही अपंग नसतो. आणि माझ्यातील त्रुटी फारच कमी आहे. सहज मात करता येईल अशी. माझ्यापेक्षा खूप गरज असलेले खूप लोक आहेत, त्यांना मिळावी मदत.

त्यानंतर कधीच संबंध आला नाही डॉ. ईश्वरचंद्र यांचा. आज प्राचार्य खांडेकरांचा लेख वाचला. त्यांना फोन केला. तेव्हा पुष्कळ बोलले प्राचार्य. डॉक्टर दहा दिवसांपूर्वी गेलेत. त्यांचे वय होते ९३ वर्षे. म्हणजे माझ्यावर उपचार आणि शस्त्रक्रिया केली तेव्हा ते होते ५२ वर्षांचे. मी होतो ९ वर्षांचा. त्यांच्या त्यावेळच्या वयाचा होण्यासाठीही मला अजून दोन-अडीच वर्षे आहेत. डॉक्टरांनी मेडिकल सोडले. त्यानंतर बर्डीवर स्वत:चा दवाखाना उघडला. त्या दवाखान्यातील जागतिक कीर्तीच्या डोळ्याच्या डॉक्टरची तपासणी फी होती २० रुपये. कोणी तीही देऊ शकत नसेल तर तीही माफ. हजारो लोकांना दृष्टी देणाऱ्या या डॉक्टरने सहकारी वगैरे ठेवून व्याप वाढवण्याचा प्रयत्न केला नाही. आपल्यानंतर आपली व्रतस्थता जपली जाईल याची काय शाश्वती? त्यामुळे परमेश्वर करवून घेतो तोवर करणे. गीतेतील कर्मयोगाचे आचरण. प्राचार्यांच्या लेखावरून कळले, डॉक्टर नागपूर विद्यापीठातसुद्धा सक्रिय होते. अनेक कामात त्यांचा सहभाग होता. आजच्या डॉक्टर लोकांना डॉ. ईश्वरचंद्र माहीत नाहीत. एक काळ आपल्या ज्ञानाने, कौशल्याने, सेवेने गाजवलेला; जागतिक कीर्ती संपादणारा नेत्रतज्ञ आयुष्याच्या शेवटी बेदखल होतो. यालाच म्हणतात कालचक्र. म्हणूनच जगणे आणि जगण्याचे समाधान पैसा, कीर्ती, पद, प्रतिष्ठा यांना बांधून ठेवू नये. हाच आहे गीतेचा सनातन संदेश. तो जगणारे तृप्त आणि कृतार्थ असतात. डॉ. ईश्वरचंद्र असेच तृप्त आणि कृतार्थ होते.

Thank You डॉ. ईश्वरचंद्र तुम्ही माझी दृष्टी आणि नजर वाचवलीत.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, ११ जुलै २०१४

रविवार, ६ जुलै, २०१४

चांगले, वाईट आणि मनाची शुद्धता

एक फार जुनी आणि प्रचलित गोष्ट आहे. श्रीकृष्ण एकदा युधिष्ठीर आणि दुर्योधन यांना एक काम सांगतात. युधिष्ठिराला सांगतात की, दिवसभर फिरून गावात किती दुर्जन लोक आहेत ते पाहा आणि मला सांगा. दुर्योधनाला सांगतात की, गावात दिवसभर फिरून किती सज्जन लोक आहेत ते पाहा आणि मला सांगा. दोघेही आपापल्या कामाला लागतात. संध्याकाळी परत येतात. श्रीकृष्ण विचारतात, सांगा तुम्हाला काय आढळले? युधिष्ठीर म्हणतात- गावात एकही दुर्जन व्यक्ती आढळली नाही. दुर्योधन म्हणतात- गावात एकही सज्जन व्यक्ती आढळली नाही.

एक बोधकथा म्हणून ही कथा सांगितली जाते आणि `दृष्टी तशी सृष्टी’ हा त्याचा बोध सांगितला जातो. आपली दृष्टी स्वच्छ, निर्मळ राहावी असा त्याचा निष्कर्ष. ही कथा वा त्याचा निष्कर्ष चूक आहे असे नाही. परंतु तो अपुरा आहे एवढे निश्चित. कारण आमची दृष्टी स्वच्छ व निर्मळ राहावी हे जेवढे खरे तेवढेच हेही खरे की, हे जग चांगल्या व वाईटाचे, सज्जनता व दुर्जनतेचे मिश्रण आहे. प्रत्येकाचा अनुभव हेच सांगतो. आम्हाला मात्र अनुभवाच्या त्या त्या क्षणी जग पूर्ण सज्जन वा पूर्ण दुर्जन वाटत असते. ही सज्जनता वा दुर्जनता अनुभव आल्यानंतर ठरवावयाची बाब आहे. त्याआधी काही निष्कर्ष काढता येत नाही. काही व्यक्ती वा घटना वारंवार घडतात, संपर्कात येतात, प्रत्ययाला येतात; तेव्हा पूर्वानुभवावरून काही ठोकताळे करता येतात. ते ठोकताळे करणे आणि त्यानुसार वागणे, काळजी घेणे आवश्यक असते.

कुठली तरी एकच बाजू घेणे चुकीचे असते. जगात फक्त दुर्जनच आहेत असे समजून सतत काळजी करत राहणे, शंकेखोरपणे वागणे, संशय घेत राहणे, अति सावधानता, त्यामुळे वृत्तीत- वागण्यात कटुता- रुक्षता- कडवटपणा- फटकळपणा- अंती आपलेच नुकसान करतात. दुसरीकडे जगात फक्त सज्जनच आहेत असे समजून वागल्यास त्याची मोठी किंमत पदोपदी मोजावी लागते. लुबाडणूक, फसवेगिरी, गृहीत धरले जाणे, डावलले जाणे, अपमान हे सारे वाट्याला येते. शिवाय आपल्याला कोणीही ठकवतात याचे जे दु:ख होते ते वेगळेच. म्हणूनच सज्जनता आणि दुर्जनता दोन्ही कळले पाहिजे, दोन्हीची जाण असली पाहिजे आणि त्या-त्या पद्धतीने वागता आले पाहिजे. सदा शंकेखोर किंवा सदा बिनधास्त दोन्ही चुकीचे. यालाच म्हणतात- चित्तशुद्धी.

अनेकदा चित्तशुद्धीचा अर्थ सज्जनता असा घेतला जातो. तो योग्य नाही. शुद्ध पाणी याचा अर्थ जे पाणी गढूळ नाही हा जसा आहे तसाच सरबत हे सुद्धा शुद्ध पाणी नाही. शुद्ध पाणी ते जे गढूळ करता येते किंवा ज्याचे सरबत बनवता येते. `पानी तेरा रंग कैसा, जिसमे मिलाया वैसा’ हे शुद्ध पाण्याचे लक्षण आहे. सज्जनता आणि दुर्जनता समजणारं आणि त्याच्याशी त्या-त्या पद्धतीने वागू शकणारं मन म्हणजे शुद्ध मन. मनाची ही शुद्धता प्राप्त करणं म्हणजे माणूस होणं. हात, पाय, कान, नाक, डोळे आहेत; भाषा बोलू शकतो; म्हणजे माणूस नाही. केवळ दुर्जनतेनी मन भरून टाकणं किंवा केवळ सज्जनतेनी मन भरून टाकणं; या दोन्ही विकृती. मनाच्या शुद्धतेनी साम्यावस्था प्राप्त करणे म्हणजे प्रकृती.

परंतु मनाची ही शुद्धता मिळवायची कशी? काही मने असतात जी म्हणतात- मला काहीही कळत नाही बुवा. काही मने म्हणतात- मला सारे काही कळते. काही लोकांना वाटते आपण फारच निरर्थक, दुबळे आणि अपूर्ण आहोत. काही लोकांना वाटते आपण सार्थक, सबळ आणि परिपूर्ण आहोत. आपल्याला कोणापासून काही शिकण्याची, समजून घेण्याची गरज नाही असे त्यांना वाटते. आपल्याला कोणी काही म्हणतो वा सांगतो याचाही त्यांना राग येतो, त्रास होतो. याउलट काही लोक सतत पडती भूमिका घेऊन वागतात. असे लोक जबाबदाऱ्या टाळतात, चालढकल करतात, सांगकामेपणा करतात. अशा लोकांचा कोणाला काही आधारही नसतो, उलट अनेकदा त्यांचा बोजाच होतो. फाजील आत्मविश्वास असणारे, अति अहंकारी; तसेच आत्मविश्वासहीन, व्यक्तित्वहीन असे बहुतांश पाहायला मिळतात. या दोघांचेही मन शुद्ध नसते.

मी स्वयमेव संपूर्ण नाही पण मी निरर्थक शून्यही नाही. मी अनेकांपेक्षा कमी आहे पण अनेकांपेक्षा अधिकही आहे. सगळ्याच गोष्टी मला कळत नाहीत पण अनेक गोष्टी मला कळतात. मला पुष्कळापासून पुष्कळ शिकण्यासारखे आहे आणि पुष्कळांना पुष्कळ शिकवण्यासारखेही माझ्याकडे आहे. आपल्या बलस्थानांची आणि आपल्या दुर्बलस्थानांची नीट, नेमकी जाण ही खरी गरज असते. ही जाण उत्पन्न होणे सततच्या प्रयत्नांनी शक्य होते. हे प्रयत्न स्वत:चे स्वत:च करायचे असतात. हा मानसिक, बौद्धिक व्यायाम आहे. अति आणि फाजील चर्चा, प्रश्नोत्तरे वगैरेपेक्षा आत्मपरीक्षण, आत्मविश्लेषण आणि प्रामाणिक प्रयत्न यासाठी आवश्यक. एखादी व्यक्ती असा मानसिक, बौद्धिक व्यायाम करते की नाही हे सांगावे लागत नाही. ते आपोआप कळते.

आपल्याला कोणापासून शिकण्यासारखे, ग्रहण करण्यासारखे आहे; त्यांच्यापासून शिकणे, ग्रहण करणे; कोणाचे बोलणे ऐकले पाहिजे ते ऐकणे, समजून घेणे; कोणाकडे दुर्लक्ष करायचे, कोणाचे बोलणे कानाआड करायचे, कोणाला टाळायचे वगैरे गोष्टी या मानसिक, बौद्धिक व्यायामाचा भाग होत. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. ही आहे प्रकृती. ही प्रकृती अशी का? चांगले आणि वाईट म्हणजे काय? हे दोन्ही कुठून येते? त्यांचे अंतिम गंतव्य कोणते? माझा त्यांचा संबंध काय? या आणि अशा प्रश्नांची सुरुवात म्हणजे संस्कृतीची सुरुवात. या प्रश्नांचा मागोवा घेतघेत अंतिम टोक गाठणे म्हणजे संस्कृतीची चरमसीमा. म्हणजेच सुसंस्कृततेचा आदर्श. युधिष्ठीर आणि दुर्योधन दोघेही निरनिराळ्या अंगाने विकृतीची उदाहरणे आहेत, तर श्रीकृष्ण हा सुसंस्कृततेचा सर्वोच्च आदर्श.

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, ६ जुलै २०१४

गुरुवार, ३ जुलै, २०१४

मराठी साहित्य संमेलन आणि विज्ञानाची दांभिकता

एखादी घटना किंवा परिस्थिती एखादं तत्व चांगल्या प्रकारे समजावून सांगते. नुसता विचार अनेकदा गळी उतरत नाही, अनेकदा दुर्लक्षित राहतो. येणारे मराठी साहित्य संमेलन पंजाबात नामदेव महाराजांच्या गावी होणार अशी बातमी वाचली आणि अनेक दिवसांपासून मनात घोळत असलेल्या विचाराला बळकटी मिळाली. कोणता विचार घोळतोय मनात? विचार आहे आधुनिक विज्ञानाचा. आधुनिक विज्ञानाने अनेक चांगल्या गोष्टी केल्या आहेत. त्याचे ऋण मानव जातीवर आहे. परंतु या सगळ्या गोष्टींवर बोळा फिरवणारी एक कोणती गोष्ट जर विज्ञानाने केली असेल, तर ती म्हणजे- विज्ञानाने माणसाला प्रचंड दांभिक बनवले आहे. माणसाचा दंभ अपार वाढवला आहे. विज्ञान त्याच्या डोक्यात गेलं आहे. नुकतेच एक साहित्यिक मला म्हणाले, तू जे काही लिहितो आणि लोकांपर्यंत पोहोचवतो ते विज्ञानामुळेच ना? मी त्याच्याशी सहमत नव्हतो. आज माझं म्हणणं उचलून धरलं गेलं. नामदेवांच्या काळी कुठे होतं आधुनिक विज्ञान? वैज्ञानिक- तांत्रिक सोयी, उपकरणे? तरीही उत्तर, दक्षिण सर्वत्र त्यांनी संचार केला. त्यांना ना प्रवासाची अडचण आली ना भाषेची. ना खाण्यापिण्याची ना कपड्यालत्त्याची. लिखाण केलं, कीर्तनं केली, प्रवचनं केली. अन ही सगळी निर्मिती एवढी सकस की अनेक शतके लोटूनही ताजी टवटवीत. काळाचा जंग त्यावर चढू शकला नाही.

अनेक गोष्टी सांगता येतील. आर्यभट्टाने संशोधन केले तेव्हा कुठे होते विज्ञान- तंत्रज्ञान? खाण्यापिण्याच्या वस्तू, आसऱ्यासाठी घरे, सुशोभनासाठी रंग ज्यांनी प्रत्यक्षात आणले, त्यांच्या सार्थक रचना आणि परंपरा निर्माण केल्या तेव्हा कुठे होते विज्ञान- तंत्रज्ञान? छत्रपती शिवरायांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी जो अचाट पराक्रम घडवला तेव्हा विज्ञान- तंत्रज्ञान एवढे प्रगत नव्हतेच ना? त्यांनी सगळ्या गडांवर केलेली बारमाही पाण्याची व्यवस्था आधुनिक छत्रपती आधुनिक विज्ञान- तंत्रज्ञान वापरून एका जिल्ह्यापुरतीही करू शकले नाहीत. भगवान बुद्धाने आपल्या धम्माचा जगभर प्रचार विज्ञान - तंत्रज्ञानाच्या शिवायच केला. हजारो वर्षांचे वेद उपनिषदांचे ज्ञानभांडार आधुनिक विज्ञान तंत्रज्ञाना शिवायच जतन करण्यात आले. पुरातन ज्ञानभांडारातील खूप सारे ज्ञान नामशेष झाले असेल तर तेही आक्रमणे वा अनास्था यामुळे.

जगभरातील मानवी सभ्यतेचा इतिहास याचा साक्षी आहे. माणूस प्रगती करतच होता. जगण्याच्या सर्व अंगांचा विचार करत होता. जुन्या गोष्टींमध्ये सुधारणा करत होता. जगणे समृद्ध करत होता. विज्ञान तंत्रज्ञान हेसुद्धा याच मार्गावरील एक स्थानक आहे. पण कुणास ठाऊक का आणि कसे, पण अशी काही जादू झाली की माणूस त्याला अंतिम स्थानक समजू लागला. एवढेच नव्हे तर त्यालाच जगण्याचा पर्याय मानू लागला. त्यातूनच प्रचंड दंभ वाढला. दिवसागणिक प्रत्ययाला येतं की, विज्ञान सगळ्या समस्या सोडवू शकत नाही, तंत्रज्ञान आम्हाला सुख देऊ शकत नाही, विज्ञान तंत्रज्ञान माणसाचं मन सन्मार्गी बनवू शकत नाही; तरीही आमचा दंभ मात्र कमी होत नाही. या दांभिकतेने परस्पर द्वेष, ईर्ष्या, स्पर्धा यांच्यात वाढच केली. आमची विचारशक्ती, आकलनशक्ती, धारणाशक्ती आटवून टाकली. तरीही आम्ही दंभ टाकून द्यायला मात्र तयार नाही.

विज्ञान- तंत्रज्ञानाच्या अनेक गोष्टी तर आपण स्वत:च नाकारतो. अणुबॉम्बची तर माणसाने धास्तीच घेतली आहे, पण अत्यंत आधुनिक असा laptop वापरणे सुद्धा अयोग्य असल्याने वापरू नये असा प्रवाह सुरु झाला आहे. अनेक antibiotics आज निकामी झाली आहेत. एवढेच काय विज्ञानाने स्वत:ची गृहितके तपासून पाहणे सुरु केले असून, आजचे विज्ञान स्वत:ला science of uncertainty म्हणवून घेत आहे. तरीही माणूस मात्र विज्ञानाचा दंभ सोडायला तयार नाही. मानवी मेंदूतून निघालेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक शोध, प्रत्येक विचार योग्य- स्वीकार्य- कल्याणकारी- आहे का, याचा विचार करून नीरक्षीरविवेक करण्यापासून ही दांभिकता माणसाला रोखून धरत आहे. विज्ञान तंत्रज्ञान यांचे स्वत:चे मूल्य शून्य आहे. त्याचे मूल्य त्याच्या उपयोगावर अवलंबून आहे. विज्ञान तंत्रज्ञान हे साधन आहे साध्य नव्हे. ती मानवी जगण्याला मदत करू शकणारी एक अतिरिक्त बाब आहे. त्याचं नियमन माणसाने करायचं आहे. हे नियमन करण्यासाठी प्रथम त्याला देण्यात आलेलं सर्वोच्च स्थान मनातून पुसून टाकावं लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे मानवाला त्याच्याहून अधिक उंच- व्यापक- सखोल- व्हावं लागेल. त्यासाठी त्याने बाळगलेला विज्ञानाचा दंभ आणि त्यातून अंगी बाणलेला दांभिकपणा टाकून द्यावा लागेल.

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, २ जुलै २०१४