सोमवार, २२ ऑगस्ट, २०११

दलित बंधू, भगिनींनो... मित्र, मैत्रिणीन्नो...

एक वाद आले अन् शांतपणे निघून गेले. मनाला हायसे वाटले. `आरक्षण' चित्रपट आला. येण्यापूर्वी त्याने थोडी बळ माजवली. पण सुदैवाने सारे काही थोडक्यात निभावले. पंजाब, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश या तीन राज्यांत त्यावर बंदी घालण्यात आली होती. अन्यत्र तो पाहायला मिळाला. तीन राज्यांतील बंदीही नंतर उठवण्यात आली. त्यावर संमिश्र प्रतिक्रियाही आल्या आहेत. या निमित्ताने सार्यांनीच जी समजदारी परिपक्वता दाखवली ती दिलासा देणारीच आहे. या संवेदनशील विषयाचे कसे राजकारण केले जाते तेही उघड होउन गेले. या सार्याचे थोडेबहुत कवित्व पुढेही सुरू राहील. पण ती काही चिंतेची बाब नाही. 'आरक्षण' हा चित्रपट आहे आणि त्यात अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण यासारखे कलाकार आहेत त्यामुळे त्यावर चर्चा झाली. हा चित्रपट हिंदी भाषेत असल्यामुळे त्या चर्चेचे स्वरुपही अखिल भारतीय होते. मात्र, मराठीतही एका पुस्तकाने सामाजिक उडवली आहे. साहित्य आणि चित्रपट या दोन माध्यमांचे वेगळेपण, भाषेची मर्यादा वगैरे गोष्टींमुळे त्याची चर्चा फारशी झाली नाही. पण पुरुषोत्तम खेडेकर नामक माणसाने एक पुस्तक लिहून त्यात ब्राम्हण समाजाबद्दल जी गर ओकली आहे त्याने बळ नक्कीच माजली. त्यातही महत्वाचे म्हणजे दलित समाजातील अनेकांनी त्यावर अत्यंत प्रगल्भ भूमिका घेउन खेडेकरचे दात त्याच्याच घशात घातले आणि समाजात दुही पसरवण्याचा त्याचा कावा उघड केला. आता तर काही दलित बंधुन्नी त्या पुस्तकावरून खेडेकरला न्यायालयात खेचले आहे अशीही माहिती कानी आली आहे. खरंच कोणाही विचारी माणसाला समाधान देल असेच हे सारे आहे.
या निमित्ताने तुमच्याशी काही बोलावेसे वाटले. मनमोकळेपणे. सुरुवातीलाच हे सांगणे योग्य ठरेल की, मी स्वत: ब्राम्हण आहे. खरे तर हे सांगणे मनाला पटत नाही, पण आज परिस्थिति थोडी विचित्र आहे. कोणी कोणाविषयी, कशाविषयी बोलावे, बोलू नये याबद्दल खूप गोंधळ माजवला जातो. या जातीने त्याबद्दल बोलू नये, पुरुषांनी महिलांविषयी बोलू नये, कामगारांनी मालकाबद्दल बोलू नये, मालकाने कामगारांबद्दल बोलू नये, सामान्य माणसाने राजकीय नेत्यांबद्दल बोलू नये वगैरे वगैरे. मुळात बुद्ध होण्यासाठी दु:ख भोगण्याची गरज असतेच असे नाही. नुसते जगाचे दु:ख पाहूनही बुद्ध होता येते, त्यासाठी हवी फक्त मनाची अतीव संवेदनशीलता, निखळता, करूणा. आज मात्र तेवढे सोडून बाकी सार्याचीच चर्चा होते. असो. प्रस्तावनाच मोठी होते आहे. मूळ विषयाकडे वळू या.
आरक्षण ही आपल्या समाजातील एक सामाजिक ऐतिहासिकता आहे. जगात अन्यत्र असा प्रयोग झाला की नाही माहीत नाही, पण सगळ्या जगाने अनुकरण करावे असा हा प्रयोग आहे. माणसाला माणूस म्हणून उभे करण्यासाठी जगाच्या पाठीवर जे जे प्रयत्न झाले असतील त्यातील हा एक आगळावेगळा आणि अनोखा प्रयोग आहे. पण त्याचे आजचे स्वरुप आणि ते कुठवर चालावे हे दोन मुद्दे विचार करण्यासारखे आहेत. काय आहे त्याचे आजचे स्वरुप? त्याची ऐतिहासिकता वगैरे विचार न करता आज जो उठेल तो आरक्षण मागतो. मुस्लिमांना आरक्षण हवे, ख्रिश्चनांना आरक्षण हवे, महिलांना आरक्षण हवे, या जातीला हवे, त्या जातीला हवे, आता तर अगदी ब्राम्हणांनाही हवे. आरक्षण मिळावे म्हणून आपण कसे मागास आहोत याची चढाओढ लागलेली. मागास ठरण्याची चढाओढ? जणू काय हा देश, इथल्या संधी, संसाधने हा लोण्याचा गोळा आहे आणि तो पटकवायला सारे धडपडताहेत. हा काय समाज म्हणायचा?
मित्रांनो, असाही एक वर्ग आहे, ज्याला आरक्षण हा प्रकारच मान्य नाही. आरक्षण दिले म्हणजे काही उपकार केला असे वाटणाराही वर्ग आहे. त्याच्याकडे लक्ष देण्याचीही गरज नाही. माझे व्यक्तिगत मत म्हणाल तर, आरक्षण कितीही चालले तरीही माझी हरकत नाही. तरीही माझे म्हणणे असे की, आरक्षण पूर्णत: संपुष्टात यायला हवे. अर्थात याचा निर्णय ज्या समाजाला आरक्षण मिळते त्यानेच करायला हवा. तो वर्ग दलित असो, अन्य मागासवर्गीय असो, महिला असो वा कोणीही. कोणत्याही वर्गाने स्वत:ला असे वेगळे करून घेऊ नये आणि आरक्षणापुरते मर्यादितही करून घेऊ नये. खरे तर घटनाकारांनाही हेच अभिप्रेत नव्हते का? का त्यांनी केवळ १० वर्षांची मर्यादा ठेवली होती आरक्षणाला? हा समाज, येथल्या संधी, शिक्षण, रोजगार वगैरे व्यवस्था पुरेशा आणि न्याय्य असायलाच हव्यात, जेणे करून अशा वेगळ्या व्यवस्थेची गरजच राहणार नाही. पण या बाह्य गरजेसोबतच, मानसिकताही तयार व्हायला हवी. ही मानसिकता तयार करण्याचे काम त्या-त्या समाजगटांनाच करावे लागेल. किमान सुरुवातीला तरी.
आज परिस्थिती बदललेली आहे हे नाकारण्यात अर्थ नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लढ्यापासून आपण `दलित चेंबर ऑफ कॉमर्स'पर्यंत येउन पोहोचलो आहोत. economic times ऩे तर यशस्वी दलित उद्योजकांवर एक वृत्तमालिकाच मध्यंतरी चालवली होती. स्वत:चा व्यवसाय चालवणार्या दलितांची संख्या पश्चिम उत्तर प्रदेशात ६ टक्क्यांवरून ३६ टक्क्यांच्याही वर गेली आहे. पूर्व उत्तर प्रदेशात ही संख्या ४ टक्क्यांवरून ११ टक्क्यांवर गेली आहे. बंधुआ मजुरांमधील दलितांचे प्रमाण कमी झाले आहे. स्वत:ची जमीन बाळगणार्या दलितांचे प्रमाण १२ ते १५ टक्क्यांनी वाढले आहे. ही सारी आकडेवारी हुरूप वाढवणारी आहे. मंदिरे, पाणवठे, सार्वजनिक ठिकाणे येथे आता दलित समाज मोकळेपणे जा-ये करतो. कुठे काही समस्या निर्माण होत असेल तर ती मुख्यत: स्थानिक व व्यक्तीशी संबंधित असते. समाज म्हणून दलितांच्या मोकळ्या वावराला आता विरोध होत नाही. परंतु ही या सामाजिक समस्येची एक बाजू आहे.
दूसरी बाजू आहे मानसिक. एकात्म, सशक्त समाजासाठी दलित आणि दलितेतर घटकांनीच नव्हे तर सर्वच समाजघटकांनी परस्परांना मनाने स्वीकारण्याची गरज आहे. यासाठी सगळ्यांनीच जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. काही गोष्टी सोडाव्या लागतील, काही आग्रह सोडावे लागतील, कटुता तर पूर्ण सोडावी लागेल, माधुर्य वाढवावे लागेल. त्याला पर्याय नाही. एकाच घरातसुद्धा प्रेम हवे असेल तर प्रेम द्यावेच लागते आणि प्रेमच द्यावे लागते. प्रेम, स्नेह न देता किंवा त्या बदल्यात अन्य काही देऊन हा सौदा नाही करता येत. यासाठी भरीव प्रयत्न हवेत. याचा अर्थ प्रयत्न होत नाहीत असे नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असे प्रयत्न प्रदीर्घ काळापासून करीत आहे. अन्यही लोक करीत आहेत. दलितेतर समाजातील कटुता, नाराजी कमी करण्याचा प्रयत्न संघाने यशस्वीपणे केला आहे. या प्रयत्नांना विरोधही झाला, `नाटके' म्हणून त्याची संभावनाही झाली. तरी त्याचे प्रयत्न सुरूच आहेत. अर्थात कोणाचे प्रयत्न दिखाव्याचे असतील, नाटक असेल तरीही त्याचे स्वागतच करायला हवे. कारण अशा प्रयत्नांतूनच, जे साध्य करायचे आहे त्याचा महामार्ग तयार होत असतो. राजकारणाच्या पलिकडे जाऊन दलित समाजानेही व्यक्तिगत आणि सामूहिक पातळीवर असे प्रयत्न करायला हवेत. प्रदीर्घ काळापासून ही समस्या आपल्या समाजात आहे हे खरे आहे. परंतु आज जगाचाच वेग इतका वाढला आहे की, रोजचे जग वेगळे वाटावे. गेल्या १ हजार वर्षात नसतील झाले एवढे बदल मानवी जीवनात सर्वच पातळ्यांवर झाले आहेत. तेव्हा आता ही समस्या देखील लवकरात लवकर कायमस्वरूपी निकालात निघायला हरकत नाही.
आणखीही एक संवेदनशील मुद्दा आहे. तो आहे राज्यघटनेचा. राज्यघटना या विषयावर कोणी बोलू लागले की तो घटनाविरोधी, आंबेडकरविरोधी ठरू लागतो. हे खरेच योग्य आहे का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान नाकारणे हा वेडेपणाच म्हटला पाहिजे, पण त्याविषयी गरजेपेक्षा जास्त संवेदनशीलता जोपासली जाते असे नाही का वाटत? राज्यघटना तयार झाली तेव्हा घटना समितीत २१८ लोक होते. डॉ. राजेंद्रप्रसाद घटना समितीचे अध्यक्ष होते. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर होते. प्रत्येक राज्यातील गणमान्य लोक, अभ्यासक, विद्वान त्यात होते. या सगळ्यांनी विचारविनिमय करून घटना तयार केली. असेही होऊ शकले असते की, पूर्ण घटना तयार करण्याची जबाबदारी डॉ. आंबेडकर यांच्यावर असती तर कदाचित राज्यघटना फार वेगळी राहू शकली असती. डॉ. आंबेडकर स्वत: पक्के लोकशाहीवादी होते. त्यामुळे शक्य आहे की, त्यांना हव्या असलेल्या सार्याच बाबी राज्यघटनेत समाविष्ट झाल्या नसाव्यात. महत्वाचे म्हणजे घटना कशासाठी आहे? भारतीय समाजाच्या आशाआकांक्षा पूर्ण करण्यासाठीच ना? तो उद्देश पूर्ण होतो आहे का? नसेल होत तर त्याची कारणे काय? त्या संदर्भात घटनेचा विचार होणे, यात गैर काय? आपण आपले वडिलोपार्जित जुने घर पाडून त्या ठिकाणी पुन्हा नवीन बांधतोच ना? असे करणे याचा अर्थ आपल्या पूर्वजांचा अवमान, अनादर वा उपेक्षा असा होत नाही. उलट त्यांच्यामुळेच आपण आज ताठ मानेने उभे आहोत अशीच आपली भावना असते. समाज ही एक जीवंत, प्रवाही गोष्ट आहे. त्यासाठी आवश्यक अशा गोष्टी नव्याने उभ्या करणे, जुन्या गोष्टींचा आढावा घेणे, जुन्यातील काय टाकून द्यायला हवे, काय ठेवायला हवे याचा विचार करणे हे सारे जिवंतपणाचे आणि प्रवाहीपणाचेच लक्षण आहे. त्यात डॉ. आंबेडकरांच्या महानतेबद्दल मनात किंतुही येऊ देण्याचे काहीच कारण नाही.
मित्रांनो, संवाद बराच लांबला. पण आज खरेच तुमच्याशी मोकळेपणे बोलावेसे वाटले. माझा माणसावर आणि त्याच्यातील चांगुलपणावर निरपेक्षपणे पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच तुमच्याशी मनातलं एवढ सारं बोललो. काही कमीअधिक लिहिले असेल तर मोठ्या मनाने माफ कराल अशी आशा करतो. तरीही शेवटी आग्रहाची विनंती करतो की, जे काही बोललो त्यावर गांभिर्याने विचार करावा.

- श्रीपाद कोठे
नागपूर,
सोमवार, २२ ऑगस्ट २०११

शनिवार, ६ ऑगस्ट, २०११

बेशरमच नव्हे मूर्खही

गेल्या महिन्यात जगात एका नवीन गोष्टीची भर पडली. ती गोष्ट म्हणजे `बेशरम मोर्चा' उर्फ `slut walk '. आता बेशरमपणा ही काही अभिमान बाळगावा अशी गोष्ट नाही. पण या बदलत्या जगात किंवा असे म्हणता येईल की, बदलाचा रोग जडलेल्या जगात आता तीही अभिमानाची गोष्ट ठरू पाहते आहे. अर्थात थटटेवारी न्यावा असा हा प्रकार नक्कीच नाही. याचे कारण त्या मोर्चामागील हेतू. स्त्रियांवरील बलात्कार आणि छेडखानी याविरुद्धचा हा आक्रोश होता. कमी कपडे घालून स्त्रिया रस्त्यावर आल्या आणि त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. महिला वर्गाचे तोकडे कपडे घालणे बलात्कारांसाठी कारणीभूत आहे, अशा आशयाची टिपण्णी एका पोलिस अधिकार्याने केली आणि त्याच्याशी असहमती दर्शवण्यासाठी हे मोर्चे काढण्यात आले. तरीही एक गोष्ट आग्रहाने नमूद करायला हवी की, हा `बेशरम मोर्चा' हा शुद्ध मूर्खपणा आहे. या प्रकाराची सुरुवात सुदूर पश्चिमेतील कानडात झाली. हे मात्र बरे झाले. कारण महिलांच्या परिधानाची चिंता व चर्चा केवळ भारतापुरती मर्यादित नाही हे त्यातून स्पष्ट झाले. या प्रकाराला विरोध करणार्यांचा आता `संस्कृति रक्षक' म्हणून उपहास करणे बंद व्हायला हरकत नाही. हा phenomenon वैश्विक आहे हे स्पष्ट झाले.
या मोर्चात सहभागी झालेल्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले. त्या सार्याचा गोषवारा म्हणजे, `महिलानी कमी कपडे घातले म्हणून बलात्कार होतात हे चूक असून पुरुषांची मानसिकता त्यासाठी कारणीभूत आहे. त्यामुळे आम्ही कमी कपडे घातले तर कोणाला त्यावर आक्षेप का असावा?' यात दोन गोष्टी समाविष्ट आहेत. एक म्हणजे स्त्रियांवरील अत्याचार आणि दूसरी म्हणजे कमी कपडे घालणे. खरे म्हणजे या दोन्ही गोष्टींचा परस्परांशी फारसा संबंध नाही. (बुरख्याचे प्रचलन असलेल्या देशांमध्येही बलात्काराचे गुन्हे होतातच.) संबंध नाहीच असे मात्र नाही, पण फारसा नाही हे अगदी खरे. परंतु कमी कपडे घातल्याने अत्याचार होतात असे म्हणणारे जेवढे वेडसर तेवढेच, महिलांवरील अत्याचारासाठी पुरुषी मानसिकता कारणीभूत असल्याने आम्ही कमी कपडे घालू, असा युक्तिवाद करणारेही वेडसरच. महिलांवरील अत्याचार (खरे तर कोणावरीलही अत्याचार, म्हणजे महिला- पुरुष- दलित- ब्राम्हण- मालक- नोकर- माणूस- पशु पक्षी- निसर्ग- अगदी कोणावरीलही) समर्थनीय होऊ शकत नाही, मान्य होऊ शकत नाही. अत्याचार हा अत्याचारच. तो असभ्य, असंस्कृतच म्हणावा लागेल. मग बलात्कार त्याला अपवाद कसा? खरे तर बलात्कार ही एक विकृतीच म्हटली पाहिजे. पुरुषच बलात्कार करतात हे तरी खरे आहे का? स्त्रियांनी केलेल्या बलात्कारांची चर्चा होत नाही, मुळात समाज तो प्रकार असू शकेल असेही मान्य करीत नाही. पण म्हणून तसे घडतच नाही असे समजणे हे आपली समज आणि जाण किती कच्ची आहे तेच दाखवून देणे आहे. पुरुषी मानसिकता, पुरुषी मानसिकता म्हणून ओरडा करताना एका गोष्टीकडे सोयीस्कर दुर्लक्ष होते. ती म्हणजे, महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात आवाज ऊठवणे, संघर्ष करणे, लढा देणे यात पुरुषवर्गही मोठ्या प्रमाणात सहभागी असतो. थोड्या गमतीदार पद्धतीने (म्हणजे उथळ नव्हे) या गंभीर गोष्टीचा विचार करायचा तर, एकूण जागतिक लोकसंख्येच्या किती प्रमाणात बलात्कार होतात? बहुसंख्य पुरुष संयमित, विचारी आहेत हे नाकारण्यात काय हशील आहे? बलात्कारापेक्षा स्त्री-पुरुषांचे सुखी सहजीवन प्रचंड मोठ्या प्रमाणात जगात विद्यमान आहे. या सहजीवनाला तडे जाण्याचे प्रमाण जगभर वाढत आहे हे मान्य करूनही वास्तव बदलत नाही. बलात्कार होतात म्हणून स्त्रियांनाच का मर्यादा पाळायला लावतात? पुरुषांना का नाही उपदेश करत? यासारखा तर बालिश प्रश्न नसेल. कोणता समाज, कोणता कायदा, कोणता धर्म, कोणती रूढी परंपरा बलात्कार करा म्हणून सांगतात? उलट इस्लामसारख्या कडव्या धर्मातही बलात्काराला कठोर शासनच सांगितले आहे. सर्वत्र या गुन्ह्यासाठी कडक शासन करण्याचीच प्रवृत्ती दिसून येते. हे कायदेही कथित पुरुषी मानसिकतेच्या पुरुषांनीच केलेले आहेत. इथे हेही लक्षात घ्यायला हवे की, केवळ कायदे, नियम, शिक्षा यांनी यावर नियंत्रण मिळविता येत नाही. त्यासाठी प्रबोधन आणि वातावरणही योग्य हवे.
कामवासना ही काही बाहेरून येणारी गोष्ट आहे का? किंवा ती अमुक ठिकाणी, अमुक वेळी उद्दीपित होईल याचे काही गणित आहे का? तसे नाही हे थोडा विचार केला तरीही लक्षात येईल. कामवासना ही जीवाच्या अस्तित्वाला वेढून असलेली किंबहुना त्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. ही गरज पूर्ण करण्याची सुरक्षित, सन्मानजनक, न्याय्य पद्धतही माणसाने मानवी सभ्यतेच्या विकासप्रक्रियेत विकसित केली आहे. त्यावर आक्षेप घेणारेही आहेत. त्याप्रमाणे साधकबाधक चर्चाही वेळोवेळी चालत असतात. मात्र बलात्कार होतो त्यावेळी केवळ कामवासनेची पूर्ति हा एकच उद्देश असतो काय? खरे तर त्यापाठची मानसिकता ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. निराशा, उद्वेग, बदल्याची भावना, सूड, वैफल्य, कोंडी, संताप या अणि अशा गोष्टीही त्यात प्रामुख्याने असतात. स्त्रीचा उपभोग घेणे म्हणजे आपले वर्चस्व सिद्ध करणे असा विचारही त्यात असतो. अनेक अभ्यासक असेही म्हणतात की, हा मुळात स्त्री व पुरुष यांच्यातील विचार करण्याच्या प्रक्रियेतील फरक आहे. पुरुष स्त्रीचा उपभोग घेउन स्वत:चे श्रेष्ठत्व सिद्ध करू पाहतो आणि तिची कोंडी करू पाहतो. तर स्त्रिया स्त्रित्वाचा गैरफायदा घेणे, कोंडी करणे वा अन्य मार्गांनी आपले वर्चस्व सिद्ध करू पाहतात. जगभर या दोन्ही बाबी सर्रास पाहायला मिळतात. हे सारेच मानवी मनाच्या हीनतेचे परिणाम आहेत.
भारतीय तत्त्वज्ञानात तर याचा खूप सखोल विचार केला आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे मानवी मनाचे (केवळ स्त्री मनाचे, पुरुष मनाचे वा अगदी बाल मनाचेही नव्हे) सहा शत्रू आहेत असेच हे तत्त्वज्ञान सांगते. हे तत्त्वज्ञान सार्याँनाच आपल्या क्षुद्रत्वातून वर यायला सांगते. त्यातच व्यक्तीचे आणि समाजाचेही कल्याण आहे असा या तत्त्वज्ञानाचा दावा आहे. याबाबत दुमत होण्याचेही काही कारण नाही. परंतु आज तर सर्वत्र नेमके या सहा शत्रूचेच उद्दीपन करून सारे व्यवहार सुरू आहेत. त्याचे गोंडस तत्त्वज्ञानही वेळोवेळी मांडले जाते. शिक्षण, अर्थकारण, राजकारण, सामाजिक रीतीरिवाज, संकल्पना, जाहिराती, साहित्य, नाट्य, चित्रपट, वैचारिक प्रबोधन, कौटुंबिक संगोपन या सार्यातूनच माणसाच्या लघुत्वालाच बळ देण्याचे काम होताना दिसते. यापेक्षा वेगळा विचार करणारे उपेक्षित राहतात. कडूनिम्बाचे बी पेरून आंबे खाण्याची स्वप्ने आजचा समाज पाहत आहे. यातून काहीही हाती लागणे कठीण आहे.
महिलांच्या तोकड्या कपड्यांचा प्रश्न या ठिकाणी उत्पन्न होतो. तोकडे कपडे घालणार्या आणि त्याचा आग्रह धरणार्या महिला आजच्या उन्मत्त व उफराट्या सभ्यतेच्या प्रतीक आणि वाहक आहेत. दुसर्याचा विचार करणे म्हणजे मूर्खपणा असे समजणारा सभ्यतेचा हा प्रवाह स्वत:बद्दल मात्र `मनाला वाटेल तसे वागण्याचा आम्हाला अधिकार आहे' असे मानतो. आज महिलांना तोकडे कपडे का घालावेसे वाटतात? आपल्या शरीराचे प्रदर्शन करून लोकांना आकर्षित करण्याची धडपड त्या का करतात? यात शारीर भावनेपेक्षा वेगळे काही असते का? कमी कपडे घालणार्या स्त्रियांमध्ये बुद्धिमान स्त्रिया नसतातच असे नाही. पण आपल्या शरीराचे प्रदर्शन करण्यात कोणती बुद्धिमत्ता आहे? कर्तृत्व गाजवण्यासाठी असे पेहेराव करणे आवश्यक आहे का? सुधा मूर्ति, किरण बेदी, इंदिरा गांधी, सुषमा स्वराज, बचेंद्री पाल, पी. टी. उषा, कृष्णा पाटील, प्रतिभाताई पाटील, किरण शा... अक्षरश: शेकडो नावे घेता येतील. वावरण्याची सोय म्हणावे तर तेही नाही. उलट हे तोकडे कपडे घालून मोकळेपणे धड चालता येत नाही वावरणे तर दूरच.
हे कपडे तयार करणार्याँचाही उद्देश काय असतो? कपडे तयार करताना अंग प्रत्यंगाचे अधिकाधिक दर्शन कसे होईल याचेच प्रशिक्षण दिले जाते. कपड्यातून अंतर्वस्त्रे दिसायला हवीत असे डिझाईन जाणीवपूर्वक केले जाते. अशी बाहेर दिसणारी अंतर्वस्त्रे बाहेरील वस्त्रांपेक्षा महाग असायला हवीत असा या वर्गातील संकेत आणि कटाक्ष असतो. या सार्याचे साग्रसंगीत प्रशिक्षण असते. या सार्यामागे शारीर भावना उत्तेजित करण्यापलिकडे आणखी कोणता विचार असतो? एकीकडे `महिला या काही विकाऊ वस्तू (commodity ) नाहीत असा आक्रोश करायचा आणि दुसरीकडे त्यांना विकाऊ वस्तू करण्याच्या स्पर्धेत कळत नकळत सहभागी व्हायचे. याला बुद्धिमानी म्हणायचे का? पण अशाच पद्धतीने विचार आणि व्यवहार करणारा एक प्रवाह आज जगात आहे. या प्रवाहाला मुक्त लैंगिक संबंध वावगे वाटत नाहीत. पण मुक्त लैंगिक संबंध मान्य असणार्यान्ना काही त्रास नसतो, त्यांची मानसिक, भावनिक, शारीरिक कोंडी होत नाही, त्यांची कुतरओढ वा घुसमट होत नाही, ते पूर्ण स्वतंत्र आणि सुखी असतात असे समजण्याचे कारण नाही. मुक्त लैंगिक संबंध, त्याचे परिणाम, त्यातील चढउतार यावरही आज सर्वत्र विचार आणि लेखन सुरू आहे. त्यातून फार काही साध्य होत नाही, असाच त्या चिंतनाचा सूर आहे. हे सारे फार दूरचे आहे असेही नाही. आपल्या मराठीतील मेघना पेठे यांच्या `नातीचरामी' या कादंबरीचा या संदर्भात उल्लेख करता येईल. प्रश्न आहे सुखी, सन्मानजनक, सार्थक जीवन जगण्याचा. हे जीवन पुरुषांनाही मिळाले पाहिजे आणि स्त्रियांनाही. `मी'चा जास्तीत जास्त संकोच करणारी आधुनिक सभ्यता आणि त्याचे प्रतिक असणारे तोकडे वा विक्षिप्त कपडे (स्त्रियांचे आणि पुरुषांचेही ) सार्यांनाच हवे असणारे सुखी, सन्मानजनक, सार्थक जीवन उत्पन्न करू शकत नाहीत.
राहता राहिला प्रश्न हा बेशरम मोर्चा काढणार्या महिलांच्या भावनांचा. दोन उदाहरणांचा केवळ उल्लेख यासाठी पुरेसा व्हावा. ज्या बलात्काराच्या व स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे या महिला अस्वस्थ झाल्या त्याच घटनांनी या जगात दोन महान गोष्टींना जन्म दिला आहे. स्त्रियांवरील अत्याचाराच्या व बलात्काराच्या घटनांनीच जिजामातेला अस्वस्थ केले होते. अन् तिने शिवाजी घडवला. वर्धेच्या मावशी केळकरांनाही दूर बंगालमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेनेच पेटून उठवले आणि त्यांनी राष्ट्र सेविका समितीची स्थापना केली. शिवाजी आणि राष्ट्र सेविका समिती आज सार्या जगापुढे आहेत. समस्त स्त्री जातीला त्यांचा आधार आहे. जिजामातेने आणि मावशी केळकरांनी `बेशरम मोर्चा' काढला नाही. पण इतके सारे शहाणपण या बेशरम महिलांना हवे आहे का? त्यांना स्त्रियांची काळजी अधिक आहे की आपल्या तोकड्या कपड्यांची?

- श्रीपाद कोठे
नागपूर,
शनिवार, ६ ऑगस्ट २०११