बुधवार, २७ ऑक्टोबर, २०१०

`सबका मालिक एक'

पुण्यात साईबाबांची दुसरी समाधी बांधण्याचा घाट घालण्यात आला असून त्यावरून सध्या काही वाद सुरु आहे. संत महात्म्यांनाही आपण सोडत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. साईबाबांची दुसरी समाधी बांधण्याची काय गरज आहे हा प्रश्न तर आहेच. पण त्याहून अधिक महत्वाचा प्रश्न म्हणजे तशी समाधी कोणी बांधली तर हरकत काय? त्यात भडकण्याचे कारण काय? संघर्षाची भाषा करण्याची काय गरज? एकाच संताची, महापुरुषाची समाधी एकाहून अधिक ठिकाणी असणे ही काही नवीन बाब नाही. त्या संताच्या वा महापुरुषाच्या अस्थिंचा थोडा थोडा भाग वितरित करून भक्तांची सोय आणि भावना यानुसार तशा समाध्या बांधण्यात आल्या आहेत. किंवा त्या संताच्या वा महापुरुषाच्या शरीराचा कोणताही अवशेष नसताना सुद्धा भक्तांची भावना म्हणून समाधी बांधण्याचा प्रघात आहे. त्यास नामसमाधी म्हणतात. अशी दुसरी समाधी उभारण्याची पद्धत नाही किंवा तसे काही उदाहरण नाही असे क्षणभर मान्य केले तरीही कोणी तसा प्रस्ताव ठेवला असेल आणि तसा प्रयत्न करीत असेल तर त्यात हमरीतुमरीवर येण्यासारखे काय आहे?
सगळ्याच संतांनी आणि आमच्या आध्यात्मिक परंपरेने सार्याच विश्वाचं, जीवन व्यवहाराचं स्वामित्व एका ईश्वरी शक्तीलाच बहाल केलं आहे. या संपूर्ण सृष्टीचा कर्ता, धर्ता, हर्ता केवळ एक परमेश्वर आहे असा त्यांचा संदेश आहे. शिकवण आहे. याचा गैरअर्थ काढून कोणी एखाद्याची लुबाडणूक करीत नाही एवढीच फक्त काळजी घ्यायला हवी. बाकी सर्व व्यवहार मुक्तपणे व्हायला हवे. परंतु ज्या साईबाबांनी `सबका मालिक एक' असा संदेश दिला त्यांच्या समाधीच्या स्वामित्वाचा दावा हास्यास्पदच म्हणायला हवा. आता तर त्या समाधीचे पेटंट करण्याच्या गोष्टी सुरु आहेत. आधुनिक अमेरिकी बाजारू संस्कृतीने ज्या अनेक अनिष्ट बाबी संपूर्ण जगात प्रसृत केल्या आहेत त्यातील एक म्हणजे पेटंट. आपला मतलब साध्य व्हावा आणि समाजाची, निसर्गाची व जगाची अबाधित लुबाडणूक करणे शक्य व्हावे यासाठी राबवण्यात येणारी ही एक संकल्पना आहे. कोणाच्या तरी आत्यंतिक स्वार्थी डोक्यातील ही कल्पना आहे. कोणत्याही गोष्टीचं पेटंट कसं काय असू शकतं? कोणत्याही गोष्टीच्या संशोधनावर कोणाची मालकी कशी काय असू शकते? या जगातील प्रत्येकाला जगन्नीयंत्याने स्वतंत्र बुद्धी दिली आहे, भावना दिल्या आहेत. स्वतंत्र भवताल दिला आहे. विकासाची एक प्रक्रिया दिली आहे. केवळ एखादी गोष्ट प्रथम एखाद्याला सुचली, मिळाली, प्राप्त झाली, कोणी त्याचा आधी वापर केला म्हणून त्याचा त्याच्यावर स्वामित्व हक्क झाला ही संकल्पनाच मुळात अमानुष, स्वार्थी, वेडगळ आहे.
महात्मा गांधींचे उत्तम उदाहरण जगासमोर आहे. आपल्या कोणत्याही लिखाणाचे स्वामित्व हक्क वगैरे त्यांनी कधीच मान्य केले नाहीत. आपल्या लिखाणातील कोणताही भाग कोणीही कुठेही वापरू शकतो असे त्यांनीच खुद्द म्हटले आहे. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू राहिलेले प्रसिद्ध मार्क्सवादी विचारवंत व नंतर हिंदू विचारांकडे आकृष्ट झालेले आणि `हिंदू अर्थशास्त्र' या ग्रंथाची रचना करणारे स्व. डॉ. म. गो. बोकरे यांनीही नंतर गांधीजींचा कित्ता गिरवला. आपले लिखाण कोणीही वापरू शकतो, असे त्यांनीही म्हटलेले आहे. आपल्या देशात तर पाण्याला कधीही नाही म्हणू नये अशीच सांस्कृतिक शिकवण आहे. कोणाही तहानलेल्याला कोणताही लाभहानीचा विचार न करता, हिशेब न करता पाणी पाजावे ही संस्कृती आहे. आणि हीच माणुसकीही आहे. त्यामागेही हाच भाव आहे की ईश्वराने, निसर्गाने, नियतीने आम्हाला जे काही दिले आहे त्यावर सार्यांचा समान हक्क आहे. पण आता तर हसणं सुद्धा `million dollar' झालेलं आहे. आत्यंतिक स्वार्थी, बाजारू विचार आणि संकल्पनांनी आता आमच्या अध्यात्माला आणि संत सत्पुरुषांनाही ग्रासणं सुरु केलं आहे हेच साई समाधी वादाने अधोरेखित केले आहे. महत्व आणि उत्पन्नावर होणारा परिणाम याविना या संघर्षाला अन्य कोणत्या बाजू असू शकतात??

-श्रीपाद कोठे, नागपूर.

1 टिप्पणी:

  1. श्रीपाद.... खरे आहे,पटले मला पण पेटंटचा मुद्दा जरा खटकला....
    चर्चा करूच ह्यावर.... :)

    उत्तर द्याहटवा