बाप्पा तुम्ही आलात आणि १० दिवस कसे तेजाळून गेले. नेहमीप्रमाणेच हे दिवस  कसे गेले ते कळलेही नाही. तुमची जादूच अशी आहे की बास! तुमच्या रुपाची  भुरळ, तुमच्या गुणांची मोहिनी, तुमच्या प्रसादाची माधुरी, तुमच्या  आशीर्वादाची शक्ती अन् तुमच्या अस्तित्वाचा परिमळ या सार्याचा परिणाम होतो  आणि वर्षभराची जाळीजळमटं धुतली जाऊन सारं वातावरण कसं सुस्नात होऊन जातं.  बाप्पा, उद्या तुम्ही जाणार. `पुढल्या वर्षी लवकर या' म्हणत सारे तुम्हाला  भावपूर्ण निरोप देणार. तुम्हीही पुढल्या वर्षी दहाएक दिवस अगोदर येणार असं  ऐकतो आहे. छान छान. आम्ही तुमची वाट पाहतच असतो. बाप्पा सगळ्यांनी  तुमच्याकडे काही काही मागितलं असणार. तुम्ही त्यांच्या मागण्या मान्यही  करणार. बाप्पा तुम्हाला निरोप देता देता माझंही एक मागणं आहे. द्याल मला?
 बाप्पा, तुम्ही रिद्धी-सिद्धीचे देवता. त्यामुळे तुमचं सारं काही दिमाखात  असतं. छान वाटतं पाहून. गेले १० दिवस मीही तो आनंद अनुभवला आहे. रोज तुमची  वेगवेगळी रूपं, तुमची आरास, तुमचे नाना नैवेद्य, तुमच्या दर्शनाला लोटणारी  गर्दी, तुमच्या भक्तांची अपार श्रद्धा, त्यांचे दानधर्म... सारं काही पाहत  होतो. तुमच्यावरचं माझं प्रेमही माझ्या डोळ्यातून  ओसंडताना तुम्हीही पाहिलंच असेल. पण देवा खरं सांगू? आणि खोटं सांगणार तरी  कसं म्हणा? तुझ्यापासून लपून काय राहिलं आहे? तर सांगू, तुझ्यावर उधळली  जाणारी संपत्ती, सोनं खुपत होतं डोळ्याला. कुठे किती किलो सोनं आहे, किती  दागिने आहेत याची चर्चा मला ओशाळं करीत होती. तुझ्याशिवायही चालतातच  या चर्चा. मागे २८ युगं विटेवर उभे असलेल्या त्या पांडुरंगाबद्दल आणि  त्याच्या रुक्मिणीबद्दलही ही चर्चा ऐकली, पाहिली होती. त्या शेषशायी भगवान  विष्णूच्या पद्मनाभ मंदिराने तर मध्यंतरी सार्यांचे डोळेच फिरवले होते.  शेवटी विष्णूही तूच ना? अथर्वशीर्षातही `त्वं ब्रम्हा, त्वं विष्णू, त्वं रुद्र'  वगैरे वगैरे म्हटलेच आहे ना. माझ्यासाठी तर सारी रूपं तुझीच आहेत. तर विषय  होता, सोन्याचा, दागदागिन्यांचा. भक्तगण तुला ते अर्पण करतात ही त्यांची  श्रद्धा आहे. पण तुलाही त्याचा मोह आहे? अरे बाप्पा, हे सारं वैभव, ही सारी  संपत्ती, एवढंच काय ही सारी चराचर सृष्टी तुझ्याच संकल्पमात्रे निर्माण  झाली आहे ना... तरीही त्यातल्या काही तुकड्यांचा तुला मोह व्हावा? नाही  देवा, हे नाही पटत. जशी माणसांची संपत्ती असते तशी देवांचीही असू शकते की  नाही वगैरे वाद घातले जातात. ते नाही ऐकवत बाप्पा. बाप्पा तुला ठाऊक आहे आज  तुझ्या लेकरांची स्थिती काय आहे ते. तुझी लाखोच नव्हे करोडो मुले अन्नान्न  फिरत आहेत. पिण्याचे पाणी, औषधे, शुद्ध हवा, तू जिची देवता आहे ती विद्या  या सार्याचा किती अभाव आहे तुला माहीतच आहे. साधं माणसाने माणसाशी  माणसासारखं वागावं हेही आढळत नाही. त्यासाठी लागणारा स्नेह, माया, प्रेम  दुर्मिळ झालं आहे. पैसेवाल्यांना गरिबांची कणव वाटत नाही, शहरात  राहणार्यांना गावात राहणार्यांबद्दल दुजाभाव वाटतो. पैसा, संपत्ती, सोनं,  जमीनजुमला बास... हेच विश्व झालं आहे. दुसर्याचा विचार करणं, मिळून मिसळून  राहणं वगैरे अडाणीपणाचं लक्षण ठरू लागलं आहे. लक्ष्मी आणि अलक्ष्मी यात  काही भेदच राहिलेला नाही. या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे सुद्धा माणूस  विसरून गेला आहे.
 बाप्पा, संपत्तीच्या मोहात पडू नका. त्याचा योग्य विनियोग करा, जास्तीत  जास्त दान करा. हे दान गरजूंच्या उपयोगी पडू द्या असं सारेच सांगतात. पण  तसं घडताना क्वचित दिसतं. करोडो रुपयांची मोटार फुकट भेट मिळाली तरी  त्यावरचा करसुद्धा माफ करावा म्हणून लोक हात पसरतात. असेच लोक आज आमचे देव  झाले आहेत!! तू फक्त १० दिवसांचा!!! माझं तुझ्याकडे एवढंच मागणं आहे की, ही सुरुवात तू तुझ्यापासून कर. तू सुरुवात केली तर सारंच कसं सुरळीत होईल असं माझी श्रद्धा मला सांगते. हे सोनंनाणं, जडजवाहीर, संपत्ती  याचा त्याग कर. लक्ष्मी फिरती राहू दे आणि नुसती फिरती नको, योग्य  मार्गाने आणि योग्य मार्गावर फिरती राहू दे. तुझे भक्त कधी कधी त्याचा  योग्य विनियोग करतात. पण त्यात नियोजन आणि दृष्टीचा अभाव जाणवतो. या  देशातला सगळ्यात शेवटला माणूस सार्यांच्या दृष्टीपुढे असू दे.  रिद्धी-सिद्धीवर तुझीच सत्ता चालते. तुझ्या भक्तांवर तर फक्त तुझीच सत्ता  चालते. या दोघांनाही समृद्धीकडे पाहण्याची योग्य दृष्टी आणि त्याच्या  विनियोगाची योग्य बुद्धी दे. आणि हो, एक पथ्य मात्र जरूर जरूर पाळायला लाव  दोघांनाही की, एक छदामही राजकीय नेत्यांच्या व सरकारच्या हाती जाऊ नये.  जगातली सारी समृद्धी घशात घालतील आणि तरीही त्यांना ढेकर येणार नाही.  त्यांच्या भुकेला अंतच नाही. त्यांना दुरुस्त करणे तुझ्याही आवाक्याच्या  पलीकडे आहे. तेव्हा त्यांच्या भानगडीत पडूच नको. तेव्हा बाप्पा, सोड मोह या  सार्याचा आणि सार्या विश्वाच्या मंगलमय कल्याणाची दृष्टी आणि बुद्धी  तुझ्या भक्तांना आणि रिद्धी-सिद्धीला दे. देशील मला बाप्पा एवढं...  प्लीज...
 -श्रीपाद कोठे
 नागपूर,
 शनिवार, १० सप्टेंबर २०११
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा