शुक्रवार, २४ जानेवारी, २०१४

अराजक

मी काही आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता, समर्थक, हितचिंतक व मतदार नाही. मुळात आम आदमी पार्टीची स्थापना चुकीची, अयोग्य, अनावश्यक आहे. आपल्या देशाला अधिक राजकीय पक्षांची गरज नाही. असलेली बजबजपुरीच कमी व्हायला हवी. त्यामुळेच आम आदमी पार्टी लोकसभेत जावी असे काही मला वाटत नाही. तरीही...

तरीही काही प्रश्न मनात येतात-

१) त्या विदेशी मुलींनी तक्रार करताच गुन्हा नोंदवून fir दाखल करण्यात आला. आणि चौकशीआधीच त्या निरपराध आहेत हे गृहीत धरून सगळ्यांनी गदारोळ सुरु केला. परंतु तेथील रहिवासी १०-२० वेळा पोलिस ठाण्यात गेले, त्यांनी तक्रार केली. मात्र त्याची दखलही घेण्यात आली नाही. का? स्थानिक लोक म्हणतात त्याप्रमाणे त्या विदेशी मुली खरेच अवैध कामे करीत असतील तर ते चूक नाही का? त्यातही तेथे जर अमली पदार्थांचा व्यापार वा अमली पदार्थांचे व्यवहार चालू असतील तर ते; मंत्री काय म्हणाले यापेक्षाही अधिक समाज व देश विरोधी आणि अधिक गंभीर स्वरूपाचे नाही का?

२) पोलिस कर्तव्यात कुचराई करतात हे देशव्यापी सत्य नाही का? आपल्या महाराष्ट्रातील मंत्र्यांनीही अशा तक्रारी केलेल्या नाहीत का? विरोधी पक्षांचा अनुभव वेगळा आहे का? पोलिस आपले काम व्यवस्थित करीत नसतील तर त्यांची तक्रार करावी, त्यांच्या व्यवस्थेत बदल घडवून आणावा वगैरे युक्तिवाद, तर्क आणि सल्ला बालिश नाही का? सध्याची इंग्रजांनी दिलेली पोलिस व्यवस्था कुचकामी असून केराच्या टोपलीत टाकून द्यावी आणि नवीन पोलिस रचना निर्माण करावी अशी चर्चा अनेक स्तरांवर किती दिवसांपासून सुरु आहे? काय झाले त्याने? चर्चा, नियम, तक्रारी वगैरेचा आपला अनुभव खरेच त्याची तरफदारी करावी असा आहे का? आपण किती बालिश आणि बावळट असावे?

याचा अर्थ अराजक असावे असा नाही. पण आम आदमी पार्टीच्या विरोधासाठी कायदा आणि मानवतेच्या नावाखाली दुसरे अराजक माजवावे हेही योग्य नाही ना?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा