गुरुवार, १९ जून, २०१४

पंचतारांकित शैली शक्य आहे का?

आज सगळीकडे विकास, सुख,समृद्धी, आधुनिकता, विज्ञान- तंत्रज्ञान, वेग, झगमगाट यांची चर्चा पाहायला मिळते. थोडक्यात म्हणजे पंचतारांकित जीवनपद्धतीची चर्चा. बाकी सगळ्या गोष्टी, सगळे विचार बाजूला ठेवले तरी एक प्रश्न उभा राहतो की, जगातील सगळ्या ७०० कोटी लोकांना असे पंचतारांकित जीवन उपलब्ध करून देणे शक्य आहे का? जगाचे सोडून देऊ. भारतातील १२५ कोटी लोकांना असे जीवन उपलब्ध करून देणे तरी शक्य आहे का? आज सुमारे ४० कोटी लोक दोन वेळच्या जेवणाच्या चिंतेतून बाहेर पडले आहेत. तेवढ्याच लोकांना पाणी, वीज, आरोग्य आदी सुविधा बऱ्यापैकी उपलब्ध आहेत. हा आजचा सर्वसामान्य स्तर १२५ कोटी लोकांना उपलब्ध करून द्यायचा म्हटले तरी जमीन, पाणी, धान्य, जंगल, शेती, खनिजे इत्यादीवर किमान तिपटीने ताण वाढेल. या साऱ्या गोष्टी किमान तिप्पट लागतील. हे योग्य आहे अथवा नाही हा मुद्दा सध्या बाजूलाच ठेवू. किमान हे शक्य आहे का याचा विचार तरी करायला हवा की नाही? आणि हा स्तर पंचतारांकित स्तरापर्यंत पोहोचवायचा म्हटले तर काय होईल? किती अनवस्था प्रसंग येईल? १२५ कोटी लोकांचे जाऊ देऊ. आज जी ४० कोटी जनता थोडीफार निर्धास्त आहे, तिच्या डोळ्यातील- मनातील पंचतारांकित जीवनाचे स्वप्न पूर्ण करायचे म्हटले तरीही नैसर्गिक साधने पुरी पडतील का? तथाकथित जागतिकीकरणाची सुरुवात झाल्यानंतर सगळ्या जगात मोठे परिवर्तन येऊ लागले. पण त्याचा परिणाम काय झाला? विकसनशील देशातील लोक जास्त जेवायला लागल्याने अन्नधान्याची कमतरता जाणवू लागली आणि महागाई वाढली, अशी विश्लेषणे मी-मी म्हणणारे अभ्यासक आणि विद्वान करू लागले. या विश्लेषणात काहीच तथ्य नाही असे नाही. मागणी आणि पुरवठ्याचा तो साधा सिद्धांत आहे. हा सिद्धांत मानवनिर्मित नसून निसर्गदत्त आहे. पण याचा अर्थ विकसनशील देशातील लोकांनी पोटभर जेवू नये असा नाही. किंबहुना जगातील प्रत्येक माणसाला, एवढेच नव्हे तर पशूंना आणि पक्ष्यांना आणि किटकांनाही पोटभर, पुरेसे, पौष्टिक अन्न मिळालेच पाहिजे.

प्रश्न आहे तो हा मेळ कसा घालायचा हा? सर्वप्रथम एक गोष्ट कितीही विसंगत, कर्कश वाटली तरीही कानीकपाळी ओरडून सांगायला हवी की पंचतारांकित जीवनपद्धती चुकीची आहे. त्या पद्धतीने जगणे चूक आहे आणि त्याची स्वप्ने पाहणेही चूक आहे. व्यवहार आणि नैतिकता या दोन्ही अंगांनी ते चूक आहे. साधे परंतु आरोग्यदायी (आरोग्य- शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक,सांस्कृतिक, आध्यात्मिक) जीवन हाच हेतू आणि आदर्श असायला हवा. असे झाले नाही आणि सध्या सुरु आहे तीच जीवनपद्धती सुरु राहिली तर जे त्यात यशस्वी होतील ते माणूस राहणार नाहीत आणि जे त्यात मागे पडतील त्यांना वरच्या स्तरातील लोकांवर संघर्ष लादण्यावाचून पर्याय राहणार नाही. असे होऊ नये अशी प्रामाणिक इच्छा असेल तर जीवनाचा प्राधान्यक्रम निश्चित करावा लागेल. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य या मुलभूत गरजा आहेत. त्यांना सर्वोच्च प्राथमिकता द्यावी लागेल आणि या मुलभूत गोष्टी सगळ्यांना पुरेशा उपलब्ध होतील हे पाहावे लागेल. बाकी गोष्टींपैकी आवश्यक आणि अनावश्यक गोष्टी निश्चित करून अनावश्यक गोष्टींना निकाली काढावे लागेल. (अनावश्यक- उदा. – मोटारी, चंद्रावर मानवी वसाहत उभारणे वगैरे.) आमच्या सवयी, इच्छा आकांक्षा, प्रतिष्ठा सन्मान, संकल्पना (आधुनिकता, प्रगती, विकास, पुढारलेपण, मागासलेपण); इत्यादी बाबींची फेरमांडणी आणि पुनर्व्याख्या करावी लागेल. जगण्याच्या असंख्य मितींचा विकास करावा लागेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार सांभाळला त्यावेळी प्रथम महात्मा गांधींच्या प्रतिमेला वंदन केले. संसदेतील आपल्या पहिल्या भाषणात आणि निवडून आल्यानंतरच्या गंगाआरतीच्या वेळी बोलतानाही त्यांनी गांधीजींचे संदर्भ दिले. एकूण जीवनाच्या, विशेषत: अर्थकारणाच्या संदर्भात गांधीजींनी सांगितलेल्या काही मुलभूत गोष्टी लक्षात घेणे, विचारात घेणे अत्यंत आवश्यक आहे. गांधीजींनी म्हटले होते-

साधे शेतकऱ्याचे जीवन हेच खरे जीवन.

प्रत्येकाला केवळ भाजीभाकरीच नव्हे तर त्यासोबत दुध तूपही मिळायला हवे.

या वसुंधरेकडे सगळ्यांच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता आहे, पण कुणा एकाचीही हाव मात्र ती पूर्ण करू शकत नाही.

माणसाने पोटासाठी (चरितार्थासाठी) दिवसाचे सहा तास काम करावे, बाकी वेळ त्याने स्वत:चे जीवन जगण्यासाठी आणि घडवण्यासाठी द्यावा.

यंत्राने माणसाची जागा घेऊ नये, माणसावर प्रभुत्व गाजवू नये. यंत्र माणसाला सहायक असले पाहिजे.

गांधीजींच्या विचारातील या काही ठळक बाबी. या व्यवहारात आणण्याचा प्रयत्न करण्यातूनच भावी पर्यायी जीवनरचना आकारास येईल. एका आणखीन महत्वाच्या गोष्टीची नोंद करणे आवश्यक आहे. आपल्या सगळ्या अर्थविचारांचा आधार ईशावास्योपनिषदाचा प्रथम मंत्र आहे हे गांधीजींनी ठासून सांगितले होते. त्यांचा विश्वस्त विचारसुद्धा त्या मंत्रातूनच विकसित झालेला आहे. `हिंदस्वराज’मध्ये तर त्यांनी स्पष्टच म्हटले आहे की, पाश्चात्य सभ्यता कुचकामी आहे. पाश्चात्य सभ्यता मानवाला सुखी करू शकत नाही. सभ्यता याचा अर्थ जगण्याच्या सवयी, जगण्याच्या पद्धती, जगण्यामागचा विचार, जगण्याच्या कल्पना संकल्पना, जगण्याचे संदर्भ, जगण्याचा आशय, जगण्याचे हेतू, जगण्याचे मापदंड, जगण्याचे सारभूत आणि आधारभूत तत्वज्ञान; या सगळ्या गोष्टी. या सगळ्या गोष्टी पाश्चात्य ठेवून गांधीजींचे नाव घ्यायचे आणि सगळ्यांना सुखी करण्याची धडपड करायची यातून फार काही साध्य होणार नाही. जगात उभे राहण्यासाठी एका मर्यादेपर्यंत जगाचा विचार करणे, जगाच्या स्पर्धेत उतरणे हे आवश्यक आणि योग्य आहे. मात्र त्याचवेळी जगापुढे पंचतारांकित जीवनाच्या जागी जीवनाचा नवीन, योग्य, संतुलित आदर्श ठेवण्याचे आणि त्याचे उदाहरण घालून देण्याचे काम हे भारताचे काम आहे. आजवरच्या सगळ्या महापुरुषांनी, चिंतकांनी हेच सांगितले आहे.

गांधीजींचे नाव घ्यायचे पण वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, हिंदू; हे शब्द आले की शेपूट घालायचे असे चित्र पुष्कळदा पाहायला मिळते. दुसरीकडे हिंदुत्वाची मशाल खांद्यावर घेतलेले अनेक जण गांधीजी हे नाव पाल अंगावर पडावी तसे झटकतात. आधुनिक आणि अत्याधुनिक जीवनशैलीचे पुरस्कर्ते तर गांधीजींना काही समजत होते यावरच विश्वास ठेवत नाहीत. आपल्याला यातून बाहेर पडावेच लागेल. एकात्म मानव दर्शनाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनीही विश्वकल्याणी अर्थकारणासाठी त्रिसूत्री सांगितली होती. १) अधिकाधिक उत्पादन, २) संयमित उपभोग आणि ३) न्याय्य वितरण; ही ती तीन सूत्रे होत. गांधीजी आणि दीनदयाळजी यांचा आशय एकच आहे आणि त्याचा आधारही एकच आहे. पर्यायी, संतुलित जीवनशैलीचा स्वीकार आणि आग्रह हा संपूर्ण समाजाचा विषय आहे. सरकारला आणि व्यवस्थांना त्यासाठी बाध्य करणे ही समाजाची जबाबदारी आहे. आजच्या बेजबाबदार वातावरणात समाजाला, समाजातील प्रत्येकाला ही जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, १६ जून २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा