शनिवार, २१ जून, २०१४

आत्मविलोपी

महापुरुषांची अखेरसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण असलेली अनेकदा पाहायला मिळते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार हेदेखील त्याला अपवाद नाहीत. २१ जून १९४० रोजी त्यांनी इहलोकीचा निरोप घेतला. त्या दिवशी तिथी होती, ज्येष्ठ कृष्ण द्वितीया. वय होते अवघे ५१ वर्षे. धिप्पाड आखाड्यात कसलेला देह त्यांनी अक्षरश: चंदनासारखा झिजवला.

त्यांच्या प्रकृतीची ओळख होण्यासाठी एक उदाहरण पुरेसे आहे. ते वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी कोलकाता येथे असतानाचा प्रसंग. सुरुवातीचे दिवस होते. खानावळवाला नियमितपणे डबे पाठवीत असे. काही दिवसांनी डॉक्टरांनी त्याला सांगितले की, तो पाठवतो तेवढा डबा त्यांना पुरत नाही. डबा जास्त पाठवावा. खानावळवाल्याला शंका आली की, अशी तक्रारवजा मागणी तर अन्य कुणाचीही नाही. न जाणो, दोघांचा डबा एकासाठी मागवून दोघे जेवतील. पैसे वाचवण्यासाठी विद्यार्थी असे करू शकतात. तेव्हा खानावळवाल्याने अट घातली की, तू येथे तेवढे जेवून दाखव तरच तुला जास्त डबा पाठवीत जाईन. डॉक्टरांनी अट मान्य केली व पूर्ण केली. तेव्हापासून त्यांना जास्त डबा मिळू लागला. असा हा देह अखेरच्या दिवसात जर्जर झाला होता. १९२५ च्या विजयादशमीला संघाची स्थापना केल्यानंतर त्या कार्यासाठी केलेली प्रचंड मेहनत, अखंड धावपळ, देहाचे संवर्धन- संरक्षण- पोषण- याविषयीची कमाल अनास्था; यामुळे त्यांचा वज्रासारखा देह आतून पोखरत गेला. शिवाय डोक्याला असलेल्या विवंचना वेगळ्याच.

त्यांच्या अगदी अखेरच्या दिवसात ते नागपूरचे तेव्हाचे संघचालक श्रीमंत बाबासाहेब घटाटे यांच्या सिव्हिल लाईन्सच्या बंगल्यातच वास्तव्याला होते. तेथेच त्यांच्यावर पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याला लंबर पंक्चर म्हणतात. या शस्त्रक्रियेत पाठीतून थेंब थेंब असे पाणी निघते. डॉ. हेडगेवार यांच्यावर ही शस्त्रक्रिया झाली तेव्हा मात्र पाठीतून पाण्याची धार निघाली होती. `रक्ताचे पाणी करणे' या वाक्प्रचाराचा जणू प्रत्ययच त्यावेळी आला होता. असे असतानाही मनात मात्र फक्त संघाचाच विचार होता. आपल्या स्वीकृत कार्याशी एवढी तद्रूपता क्वचितच पाहायला मिळते. या आजारातच नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांना भेटायला आले होते. पण त्यावेळी डॉक्टर झोपले असल्याने त्या दोघांची भेट होऊ शकली नाही. झोपेतही ते देशाचे स्वातंत्र्य आणि संघाचे काम याबद्दलच बोलत असत. दुसऱ्या कोणत्याही विषयाला त्यांच्या हृदयात स्थान नव्हते.

एवढे आजारी असूनही आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी हालचालीला बंदी केली असूनही, नागपूरला सुरु असलेल्या संघ शिक्षा वर्गात ते समारोपाला गेले होते. संघ शिक्षा वर्गाच्या समारोपाचे दोन भाग असतात, एक जाहीर समारोप आणि दुसरा फक्त सहभागी स्वयंसेवकांसाठी खाजगी समारोप. हट्ट केल्यामुळे डॉ. हेडगेवार यांना जाहीर समारोपाला नेण्यात आले होते. मात्र तेथे ते बसू शकले नाहीत आणि त्यांना परत नेण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी खाजगी समारोपाला मात्र ते गेलेत. तेथे त्यांनी आपले अखेरचे ऐतिहासिक भाषणही केले. त्यावर्षी प्रथमच देशाच्या सगळ्या प्रांतातून स्वयंसेवक त्या वर्गासाठी आले होते. संघाचे काम देशव्यापी झाल्याचे सुखद दृश्य त्यांना पाहता आले होते. त्याचा उल्लेख करून आपण आपल्यापुढे भारताचे लघु रूप पाहतो आहे, असे उद्गार त्यांनी काढले होते.

या जगाचा निरोप घेण्यापूर्वी काही दिवसांची गोष्ट. डॉक्टर बिछान्यावर पडून विश्रांती घेत होते. यादवराव जोशी त्यांच्याजवळ बसले होते. डॉक्टरांनी यादवराव जोशींना विचारले, `संघाचा कोणी अधिकारी मरण पावला तर त्याचा अंत्यसंस्कार कसा कराल?' यादवराव गडबडले. त्यांना प्रश्नाचा रोखही लक्षात आला. परंतु त्यांनी विषय टाळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा डॉ. हेडगेवार स्वत:च त्यांना म्हणाले, `अंत्यसंस्कार लष्करी इतमामात वगैरे करण्याची मुळीच आवश्यकता नाही. आपला संघ हा एक परिवार आहे. त्यामुळे परिवारातील एखादी व्यक्ती निधन पावल्यावर जसा साधेपणाने अंत्यसंस्कार केला जातो, तसाच संघाच्या सर्वोच्च अधिकाऱ्याचाही अंत्यसंस्कार करावा.' काय विलक्षण व्यक्तिमत्व असेल त्यांचे !! संघटनेचा अतिशय दूरचा विचार करून त्यासाठी मोलाचे मार्गदर्शन तर त्यात आहेच. शिवाय स्वत:बद्दलची विलक्षण आत्मविलोपी वृत्तीही त्यात आहे. मी स्थापन केलेली संघटना, माझी संघटना, मी सर्वोच्च प्रमुख, मी रक्ताचे पाणी करून ती नावारूपाला आणली, संपूर्ण भारतभर त्याचा विस्तार केला, माझे कर्तृत्व... कशाकशाचाही स्पर्शही मनाला नाही. शिवाय भाबडेपणाने, भक्तिभावाने कोणी तशा भावना बाळगू नये, तशा भावनांचे पोषण होऊ नये यासाठी स्वत:हून तो विषय मार्गी लावून देणे. एखाद्या योग्याला साजेशी अशीच मनाची ही अवस्था म्हणायला हवी. त्यांचा  अंत्यसंस्कार त्यांना अभिप्रेत अशाच साधेपणाने रेशीमबाग येथे पार पडला. आज त्याच ठिकाणी त्यांच्या समाधीवर स्मृती मंदिर उभे आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, २१ जून २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा