गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०१७

यांना, त्यांना अन त्यांनाही...


दिल्लीतील फटाके दिवाळीपूर्वीच छान वाजले. अपेक्षा नव्हती एवढे वाजले. फटाके बंदीचे समर्थक, विरोधक आणि खुद्द माननीय न्यायालय यांना विनंतीवजा काही गोष्टी लिहाव्याशा वाटतात. त्यापूर्वी दोन बाबी अतिशय आग्रहाने सांगणे भाग आहे. १) प्रदूषण आणि त्याचा त्रास हे वास्तव आहे. ते कमी व्हायलाच हवे. २) zero pollution (शून्य प्रदूषण) is utopia. ३) प्रदूषण या मुद्यावर समर्थक, विरोधक हे चित्रच अयोग्य आहे.
आज खूप जास्त प्रदूषण आहे आणि त्याचा त्रास होतो हे कोणी नाकारू शकेल का? त्याचे उत्तर नाही असेच आहे. असे असताना वाद का होतो? हिंदू सणांनाच आक्षेप का घेतला जातो, असा यावरील तर्क आहे. तो अगदीच अनाठायी नाही. परंतु तो पूर्ण योग्यही नाही. न्यायालये हिंदू सणांच्या तोंडावर असे निर्णय देतात अशी लोकांची भावना आहे. ही भावना जशी न्यायालयांच्या भूमिकेमुळे आहे तशीच न्यायालयात या प्रथा परंपरांच्या विरोधात याचिका करणाऱ्या लोकांमुळेही आहे. प्रथा परंपरांच्या विरोधात न्यायालयात जाणारे लोक बहुतांश धर्म, परंपरा, संस्कृती, या देशाचा वारसा यापासून स्वत:ला वेगळे राखतात, दाखवतात आणि या गोष्टींना विरोधही करत असतात. यांच्या प्रदुषणाव्यतिरिक्तच्या सामाजिक, राजकीय भूमिका हेसुद्धा प्रदूषणावरून तट होण्याचे कारण आहे. धर्म, परंपरा, संस्कृती यांचा अभिमान बाळगणाऱ्या लोकांनी हा भेद बाजूला ठेवून विचार करायला हवा.
त्याच वेळी प्रदुषणाच्या विरोधात सक्रिय लढा देणाऱ्यांनीही लक्षात घ्यायला हवे की, शून्य प्रदूषण ही अशक्य बाब आहे. त्यामुळे अतिरेकी आणि आक्रस्ताळी भूमिका त्यांनी सोडायला हवी. तारतम्याने विचार करायला हवा. उठसूठ तलवारी काढून उपयोग नाही. या पृथ्वीवरील माणसासह श्वास घेणारे सगळे प्राणी २४ तासातील १२ तास कार्बन डायऑक्साइड वातावरणात सोडत असतात. त्यांना ते थांबवायला सांगणार का? हे हास्यास्पद आहे. मानवी मलमूत्र, मृत शरीरे, पदार्थ सडणे वा खराब होणे, या सगळ्याची विल्हेवाट अशा असंख्य गोष्टी अपरिहार्य आहेत. त्यामुळे प्रदूषण हे राहणारच. त्यामुळे प्रदुषणाचे प्रकार, प्रमाण, व्याप्ती लक्षात घेऊन त्याची हाताळणी व्हावी. गेल्या वर्षी कोणीतरी अकलेचे तारे तोडले होते की, हिंदूंच्या अंत्यसंस्कार पद्धती आणि यज्ञ यामुळेही प्रदूषण होते. हे निर्बुद्धतेचे लक्षण आहे. अन हे हिंदूंना म्हटले म्हणून निर्बुद्धतेचे लक्षण आहे असे नाही, तर विचारशून्य असल्याने निर्बुद्धतेचे लक्षण आहे. अंत्यसंस्कार दहन पद्धतीने केल्याने जर हवेचे प्रदूषण होत असेल तर दफन केल्याने मातीचे प्रदूषण होणार नाही का? मुळातच लाकडे, गोवऱ्या, पालापाचोळा जाळल्याने होणारे प्रदूषण आणि अन्य प्रदूषण यात फरक आहे. लाकडे, गोवऱ्या, पालापाचोळा यात कोणतीही रसायने नसतात. हां, त्याचा धूर होतो म्हणून आम्ही त्यावर लगेच आक्षेप घेतो, पण रसायनयुक्त पदार्थांमुळे होणारे प्रदूषण त्यापेक्षा कितीतरी घातक असते. या पृथ्वीवरील कोणतेही combustion प्रदूषणविरहीत असूच शकत नाही. स्वयंपाकाचा gas जळताना कार्बन डायऑक्साइड तयार करीत नाही का? जळण्यासाठी oxygen हवा आणि त्यामुळे कार्बन डायऑक्साइड तयार होणारच. काहीही जाळा. उलट लाकडे, गोवऱ्या, पालापाचोळा जाळल्याने फक्त कार्बन डायऑक्साइड तयार होतो. तर अन्य गोष्टींच्या ज्वलनाने अनेक रासायनिक पदार्थ वातावरणार सोडले जातात जे घातक आहे. शिवाय अधिक वृक्ष वा हिरवी झाडे लावून कार्बन डायऑक्साइड आटोक्यात आणता येणे शक्य आहे. झाडांच्या प्रकाश संश्लेषणासाठी तर कार्बन डायऑक्साइड आवश्यक आहे. रासायनिक पदार्थ आणि रासायनिक वायू मात्र झाडेही शोषून घेत नाहीत. मातीतही मिसळून जायला त्याला अवधी लागतो. सौदर्य प्रसाधनासारख्या गोष्टी तर ज्वलन न करताच अपार प्रदूषण करतात. घरात वा इमारतीत स्वच्छ हवा व सूर्यप्रकाश खेळता राहायला हवा हे तत्त्व तर आता हद्दपारच झालं आहे. एसी याच नवयुगाचा मंत्र आहे. आजच्या शहरांच्या रचनेमुळे एसी आणि सौंदर्य प्रसाधने काही प्रमाणात अपरिहार्यही झाली आहेत. परंतु त्यांचे उपद्रवमूल्य जास्त आहे. यासाठी वर्तमान जीवनपद्धती, जीवनशैली, जीवनरचना यांना पर्याय देण्याची गरज आहे. ते न करता केवळ उठसुठ न्यायालयात जाऊन बंदी आदेश आणण्याने गोंधळाशिवाय फार काही साध्य होणार नाही. पर्यावरणवाद्यांनी याचे भान ठेवलेच पाहिजे.
परंतु याचा अर्थ पर्यावरणवादी चूकच आहेत किंवा त्यांच्या म्हणण्यात काही तथ्य नाही किंवा ते आमच्या विरोधात भूमिका घेतात म्हणून आम्ही त्यांचे म्हणणे समजून घेणार नाही, हा दुराग्रह होईल. `हिंदू - समाजाला, संस्कृतीला' `हिंदू' राहायचे आहे की बाकीच्यांमधील एक म्हणून जगायचे आहे, हे ठरवावे लागेल. `काळ' ही बाबही लक्षात घ्यावी लागेल. १०० वर्षांपूर्वीचा काळ वेगळा होता. त्यावेळी हिंदू दुबळा होताच आणि त्यावर हेतूपुरस्सर आघात करणारेही अनेक होते. ते शक्तिशालीही होते. त्यामुळे सुरक्षात्मक आणि आक्रमक भूमिका अतिशय योग्य होती. आज काळ बदलला आहे. हिंदू नक्कीच सशक्त झाला आहे. त्याच्यावर प्रहार करणारे आजही आहेत परंतु त्यांची संख्या आणि शक्ती निश्चित ओहोटीला लागली आहे. एवढेच नाही तर त्याच्यासह त्याच्यासाठी उभे राहणारेही पुढे येत आहेत. जगापुढील समस्यासुद्धा `हिंदू'ला संपू देणार नाहीत कारण जगाला `हिंदू'ची गरज आहे. सुरक्षेची आवश्यक ती काळजी घेऊन, त्यात फार गुंतून न पडता, त्यापुढील क्षितीजांचा वेध घ्यायला हिंदूंनी आता सिद्ध व्हायला हवे. वेगवेगळ्या संदर्भातील आपल्या भूमिका त्यानुसार घेतल्या जायला हव्यात.
फटाक्यांच्या बाबतीतही तेच म्हणता येईल. फटाक्यांचे प्रदूषण रासायनिक प्रदूषण आहे. एका विशिष्ट वेळेत concentrate होत असल्याने त्याचा घातक परिणाम त्याच्या प्रदुषणातील एकूण टक्केवारीच्या अधिक आहे. ते प्रदूषण शोषले जाणारे नाही. त्यामुळे केवळ हवेचे नाही तर आवाज, प्रकाश, पाणी इत्यादींचे प्रदूषणही होते. शिवाय विचित्रता, विक्षिप्तता, अनिश्चितता या बाबीही ध्यानात घ्याव्या लागतात. मला एक प्रसंग आठवतो. साधारण वीसेक वर्षांपूर्वीचा. लोकसत्तातील एक महिला सहकारी रात्री ८-९ च्या सुमारास नवऱ्यासोबत स्कूटरवरून घरी जात होती. त्यावेळी ती गर्भवती होती. मध्येच एक बाण (फटाका) तिच्यावर येऊन पडला. ती खाली पडली. सुदैवाने काही झाले नाही. पण असे अनेक अनुभव प्रत्येकाच्या गाठी असतातच. त्यामुळे फटाक्यांचे हे अंगही लक्षात घ्यायला हवे. हे सारे लक्षात घेऊन फटाक्यांचा सोस टाकून द्यायला हवा.
माननीय न्यायालयांनीही काही गोष्टी ध्यानात घ्याव्यात ही विनंती. विश्वास कमावणे ही जशी पोलीस, प्रशासन, सरकार, उद्योग, माणसे यांची जबाबदारी असते तशीच ती न्यायालयांची पण असावी ना? न्यायालये श्रेष्ठ आहेतच, पण तेवढ्यामुळेच सगळ्यांनी त्यांच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवावा का? अशी अपेक्षा योग्य ठरेल का? समाजात विसंवाद उत्पन्न होऊ नये याची जशी काळजी अन्य बाबतीत घेतली जाते, तशीच प्रदुषणाच्या संदर्भातही घेतली जायलाच हवी ना? वर्षभरापासून असलेली फटाके खरेदीवरील बंदी मध्ये १२ दिवसच का उठवण्यात यावी? व्यापाऱ्यांचे काय? प्रदुषणाशी संबंधित अन्य घटकांचे काय? हिंदूंमध्ये असंतोष निर्माण होत असेल तर तो का? यासारख्या बाबींचाही विचार थोडा अधिक व्हायला हवा, अशी सगळ्यांची अपेक्षा नक्कीच असणार. न्यायालयांनी यावरही विचार करावा ही प्रार्थना.
- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, १२ ऑक्टोबर २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा