मंगळवार, १२ ऑगस्ट, २०१४

अखंड भारत - १

खूपदा चर्चिला जाणारा, चर्चेहून अधिक महत्वाचा असणारा आणि त्याहूनही अधिक गैरसमजांचा एक विषय आहे अखंड भारत. इतिहासातील सत्य आणि भविष्यातील आव्हान आहे अखंड भारत. काय होता अखंड भारत? काय आहे अखंड भारत? काय राहील अखंड भारत?

भारताच्या इतिहासावर नजर टाकली तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते ती म्हणजे भारतावरील आक्रमणे. गेल्या हजारो वर्षात भारतावर शेकडो आक्रमणे झाली. इतिहासाच्या शेकडो पुस्तकांमध्ये भारतावर झालेल्या आक्रमणांचा उल्लेख आहे, त्याची चर्चा आहे. अफगाणिस्तान, नेपाळ, श्रीलंका, भूतान, तिबेट, पाकिस्तान, मालदीव, बांगलादेश यांच्यावरील आक्रमणांचा मात्र इतिहास नाही. कारण मुळात हे देश भारताचाच भाग होते. जी काही आक्रमणे झाली ती भारतावरच झाली. येथील भूभाग, येथील अमाप संपत्ती, येथील धनधान्य, येथील ज्ञानविज्ञान लुटण्यासाठी आणि हडपण्यासाठी भारतावर आक्रमणे केली जात आणि या आक्रमणकर्त्यांनी केलेल्या राजकारणातून गेल्या अडीच हजार वर्षात भारताचे २४ तुकडे झाले.

पुराणांमध्ये आणि धर्मशास्त्रांमध्ये भारताचे अतिशय सुस्पष्ट वर्णन असून हिमालयाच्या दक्षिणेला आणि हिंदी महासागराच्या उत्तरेला असलेल्या भूभागाला भारत म्हणतात आणि तेथील लोकांना भारती म्हणतात असे त्यात म्हटले आहे. भारताचे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी १९६५ साली दिलेल्या गणराज्य दिन संदेशात विष्णूपुराणातील यासंबंधीचा श्लोकच उद्धृत केला होता. तो श्लोक होता- `हिमालयं समारभ्य यावदेन्दु सरोवरम, तं देवनिर्मितम देश:, हिंदुस्थानं प्रचक्षते'. अशाच आशयाचा दुसराही एक श्लोक आहे- `उत्तरं यत समुद्रस्य, हिमाद्रेश्चैव दक्षिणम, वर्षं तद भारतम नाम, भारती तत्र संतती:' उत्तर आणि दक्षिणेच्या या सीमा नमूद केलेल्या असल्या तरीही भारताच्या पूर्व आणि पश्चिम सीमांचा उल्लेख मात्र नाही. परंतु थोडा नीट विचार केला तर लक्षात येईल की, हिमालयाचा पूर्व-पश्चिम विस्तार आणि हिंदी महासागराचा पूर्व-पश्चिम विस्तार याच भारताच्या नैसर्गिक सीमा होत्या. हिमालय आणि हिंदी महासागर यांचा पूर्व-पश्चिम विस्तार जवळपास सारखाच आहे. पूर्वेला इंडोनेशिया ते पश्चिमेला इराणपर्यंत हिमालय व हिंदी महासागराचा विस्तार आहे आणि या दोघांच्या मधील भूभाग म्हणजेच आजच्या इंडोनेशियापासून तर इराणपर्यंतचा संपूर्ण भूभाग म्हणजे प्राचीन भारत होय. तोच अखंड भारत.

या अखंड भारताचे सिकंदराच्या आक्रमणापासूनच्या अडीच हजार वर्षात २४ तुकडे पाडण्यात आले. या काळात रोमन, ग्रीक, हूण, शक, कुषाण, सिरीयन, पोर्तुगीज, फेंच, डच, अरब, तुर्क, तार्तार, मोगल व इंग्रज यांनी अनेकवार आक्रमणे केली. त्यांचा संघर्ष जसा येथील स्थानिक जनतेशी झाला तसाच त्यांचे आपापसातही संघर्ष झाले. आपापसात करारमदारही झाले. भारताचे काही तुकडे या त्यांच्या करारमदारांचाही परिणाम आहेत. यातील केवळ इंग्रजांनी १८५७ ते १९४७ या ९० वर्षांच्या काळात भारताचे सात तुकडे केले. १८५७ मध्ये भारताचे क्षेत्रफळ ८३ लाख चौरस किलोमीटर होते. आज भारताचे क्षेत्रफळ ३३ लाख चौरस किलोमीटर आणि शेजारील देशांचे क्षेत्रफळ ५० लाख चौरस किलोमीटर आहे.

त्यावेळच्या भारतात एकछत्री राज्यसत्ता नव्हती. वेगवेगळी राज्ये होती. मात्र व्यापार, तीर्थयात्रा, पर्यटन, रोटी-बेटी व्यवहार, नातेसंबंध, वेशभूषा, संगीत, नृत्य, साहित्य, भाषा-बोली, खाद्य परंपरा, ज्ञान-विज्ञान, पूजापाठ, पंथ-संप्रदाय हे सारे मुक्त होते. त्यावर कुठेही बंधने नव्हती. लोक कुठेही जाऊ-येऊ शकत होते. खरे तर एका प्रबळ राज्यसत्तेशिवाय एवढा मोठा देश आणि विशाल समाज एकत्र, सुखशांतीपूर्ण रीतीने कसा राहिला हा सगळ्या जगाच्या चिंतनाचा विषय आहे. भारतात येणारे ह्यू एन त्संग किंवा रिचर्ड बर्टन किंवा त्यांच्यासारखे अनेक पर्यटक वा संशोधक ज्यावेळी येत तेव्हा या संपूर्ण अतिविशाल भूप्रदेशात कुठेही गेले तरीही त्याचा उल्लेख भारत असाच करीत. या देशाच्या कोणत्याही भूभागात पाहिलेली, अनुभवलेली गोष्ट भारतात पाहिलेली वा अनुभवलेली, अशीच नोंद त्यांनी आपापल्या लेखनात केली आहे.

इंग्रजांनी या देशाचा पहिला लचका तोडला त्याचं नाव अफगाणिस्थान. इ.स. १८७६ मध्ये रशिया व ब्रिटीश यांच्यात एक करार झाला त्यानुसार रशिया आणि भारत (इंग्रजांच्या अंमलाखालील) यांच्या सीमेवर एक बफर राज्य निर्माण करण्याचा निर्णय झाला. ते राज्य म्हणजेच आजचा अफगाणिस्थान. शैव संप्रदायी, प्रकृती पूजक, बौद्ध मतावलंबी असलेल्या तेथील जनतेच्या इस्लामिकरणाची प्रक्रिया आधीच सुरु झाली होती. त्या प्रक्रियेला नंतर पूर्णत्व आले. महाराजा रणजीत सिंग यांनी कंधारवर राज्य केल्याचे स्पष्ट उल्लेख आहेत. धृतराष्ट्राची पत्नी आणि कौरवांची माता गांधारी याच गांधार (कंधार) देशाची राजकन्या होती. १८७६ साली ब्रिटिशांनी हा भूभाग भारतापासून वेगळा केला.

हिमालयातील ४६ लहान मोठ्या सरदारांना एकत्र आणून पृथ्वी नारायण शाह यांनी नेपाळ राज्याची स्थापना पूर्वीच केली होती. भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या अनेकांनी नेपाळमध्ये आश्रयही घेतला होता. ब्रिटिशांनी आपली ताकद वापरून या पहाडी प्रदेशातील छोट्या छोट्या राजांना सरदारांना एकत्र करून त्यांच्याशी एक करार केला आणि १९०४ साली नेपाळला स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता देत असल्याचे जाहीर केले. इंग्रजांच्या डाकुगिरीचे हे मासलेवाईक उदाहरण आहे. कोणीही मागणी वगैरे केली नसताना, आपला काहीही संबंध नसताना विश्वसम्राटाच्या स्वत:च स्वत:ला बहाल केलेल्या थाटात केलेल्या त्यांच्या या कृतीने नेपाळ जन्माला आले. तेथे इंग्रजांनी आपले प्रशासन लागू केले. १९४७ सालीच नेपाळलाही ब्रिटनने आपल्या कब्ज्यातून मुक्त केले. १९५३ साली महाराजा त्रिभुवन सिंह यांनी भारत सरकारला एक निवेदन देऊन नेपाळ भारतात सामील करून घ्यावे आणि नेपाळला भारताचे एक राज्य म्हणून दर्जा द्यावा अशी विनंती केली होती. १९५५ साली रशियाने संयुक्त राष्ट्रसंघात यासाठी दोनदा विशेषाधिकार वापरला होता. परंतु पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या भूमिकेने नेपाळ भारतात समाविष्ट होऊ शकला नाही. आजही भारत आणि नेपाळ मधील नागरिकांना परस्परांच्या देशात जाण्यायेण्यासाठी पासपोर्ट व्हिसाची गरज नाही. मात्र भारताच्या चुकीच्या आणि विचित्र धोरणांमुळे नेपाळ हा भारत विरोधासाठी चीनचा अड्डा बनला आहे.

भूतानला १९०६ साली वेगळा देश जाहीर करण्यात आले. १९१४ साली चीन सरकार व ब्रिटीश सरकार यांच्यात एक करार झाला आणि भारत व चीन यांच्यातील एक बफर राज्य म्हणून तिबेटला वेगळा स्वतंत्र देश जाहीर करण्यात आले. हिमालयाचे विभाजन करून मॅकमोहन रेषा तयार करण्यात आली. दोन विस्तारवादी, साम्राज्यवादी शक्तींचे हे जागतिक षड्यंत्र होते. स्वातंत्र्यानंतर १९४९ ते १९५९ या काळात तिबेटकडे पूर्ण दुर्लक्ष करून भारताने तिबेट चीनच्या घशात घातला. एकीकडे तिबेटला चीनचा प्रदेश म्हणून मान्यता देणे आणि दुसरीकडे तिबेटच्या दलाई लामांना आसरा देऊन निर्वासित तिबेटी सरकार स्थापन करण्यास मान्यता देणे, अशा अतिशय भोंगळ धोरणाने आपण एक मोठी डोकेदुखी मागे लावून घेतली. शिवाय १९६२ च्या युद्धात चीनने हडपलेला अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेशचा प्रचंड भूभाग तर आपण विसरून गेल्यासारखाच आहे.

याशिवाय थायलंड, कंबोडिया, जावा, सुमात्रा, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, फिलीपिन्स, सिंगापूर, व्हिएत्नाम येथेही भारतीय राजघराण्यांनी प्रदीर्घ काळ राज्य केले. त्या काळात तेथे हिंदू संस्कृती (धर्म, सभ्यता, रीतीरिवाज, कलाकौशल्य, साहित्य, मंदिरे, स्थापत्य, व्यापारउदीम वगैरे) दिमाखाने नांदत होती. ते देशही अलगथलग पडत गेले. श्रीलंका व म्यानमार यांना १९४८ साली ब्रिटीश सत्तेतून मुक्त करण्यात आले. श्रीलंकेत १९७८ साली तर म्यानमारमध्ये २०११ साली नवीन राज्यघटना अस्तित्वात आली. म्यानमार म्हणजे खरे तर पूर्वीचा ब्रम्हदेश. त्याच्या नावातच ब्रम्ह होते. लोकमान्य टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली याच देशातील मंडालेच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्यावेळी हा देश भारताचाच भाग होता. आपले साम्राज्य या ना त्या प्रकारे कायम राहावे किंवा भारतीय उपखंडात ढवळाढवळ करण्यासाठी आपल्याजवळ कायम स्थान राहावे या दूरदर्शी परंतु कुटील हेतूने ब्रिटिशांनी हे तुकडे करून ठेवले होते. यातील सगळ्यात महत्वाचा, मूलगामी आणि सखोल परिणाम करणारी कृती होती पाकिस्तानची निर्मिती. भारताच्या या विभाजनाची कहाणी हा एक स्वतंत्र शोकात्म महाअध्याय आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, १३ ऑगस्ट २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा