शुक्रवार, १२ डिसेंबर, २०१४

अभिनंदनीय आणि आनंददायी

संयुक्त राष्ट्रसंघाने काल `आंतर्राष्ट्रीय योगदिनाची' अतिशय महत्वपूर्ण घोषणा केली. त्यामुळे आता २०१५ च्या २१ जून पासून दरवर्षी २१ जून हा दिवस `आंतर्राष्ट्रीय योगदिन' म्हणून साजरा होईल. तेही जगभर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघात यासंबंधात केलेली सूचना उचलून धरण्यात आली आणि थोड्याथोडक्या नव्हे, चक्क १७७ देशांनी त्या सूचनेला पाठिंबा दिला आणि काल त्याची प्रत्यक्ष अधिकृत घोषणा करण्यात आली. तमाम भारतीय जनतेच्या अभिमानाचा आणि आनंदाचा हा क्षण आहे. दुर्दैवाने हा आनंद आणि अभिमान दिसून आलेला नाही. वृत्तपत्रे आणि अन्य माध्यमांची ही मुख्य `हेडलाईन' व्हायला हवी होती. पण तसे झालेले नाही. तू-तू, मी-मी आणि अन्य क्षुद्रता आपल्यात किती ठासून भरलेली आहे याचीच जणू पावती यानिमित्ताने मिळाली आहे. ना सरकारी स्तरावर, ना विरोधी पक्षांतर्फे, ना प्रसार माध्यमात, ना सामाजिक स्तरावर, ना सोशल मीडियात; कुठेही हा आनंद, अभिमान, उल्हास, कौतुक दिसून आलेले नाही. कोणत्याही विरोधी पक्षाने या निर्णयाचे स्वागत का केले नाही? हजारो वर्षांची योगपरंपरा जागतिक स्तरावर मान्यता मिळवीत असेल तर ते अभिनंदनीय नाही का? `योग' या गोष्टीची अंगभूत शक्ती आणि श्रेष्ठता, त्याच्या प्रचार-प्रसारासाठी आजवर खपलेले आणि अजूनही खपणारे लोक यांचा हा विजय; आम्हाला व्यापक आणि सकारात्मक करू शकलेला नाही. `योगा' लोकप्रिय करण्यासाठी स्वत:च्या सीडी काढून स्वत: लोकप्रियता आणि पैसा मिळवणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्रींनीही चकार शब्द तोंडातून काढण्याचे कष्ट घेतले नाही. असो. यात बदल होईल तेव्हा होईल. मात्र आज `आंतर्राष्ट्रीय योगदिन' जाहीर झाल्याबद्दल आनंद आणि अभिमान व्यक्त करून त्याच्या हजारो वर्षांच्या परंपरेचे आणि त्या परंपरेच्या आजच्या अनुयायांचे त्रिवार अभिनंदन करणे आपले कर्तव्य आहे.

आता `योग' या विषयाची जगभर चर्चा होईल. योगासने शिकवणाऱ्या लोकांची मागणी होईल. योगदिनाला शुभेच्छापत्रे पाठवली जातील. ई-शुभेच्छापत्रेही उपलब्ध होतील. योगाची मंडळे निघतील. या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत. त्याची एक व्यावसायिक बाजूही आहे. त्यात काही गैर आहे असेही नाही. अगदी भारताला विदेशी चलन सुद्धा त्यातून मिळू शकेल. परंतु हे सारे तेवढ्यापुरतेच मर्यादित राहू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संयुक्त राष्ट्रसंघातील ते भाषण किती जणांनी लक्षपूर्वक ऐकले आणि ज्यांनी लक्षपूर्वक ऐकले त्यांना ते किती लक्षात आहे माहित नाही. पुन्हा लक्षात असलेल्या भाषणाचा कशा पद्धतीने अन्वयार्थ लावला जातो; या सगळ्याच महत्वाच्या गोष्टी आहेत. मोदींनी एक महत्वाचा मुद्दा मांडला होता की, आपण आपली जगण्याची शैली बदलण्याची गरज आहे. पर्यावरणापासून तर अर्थकारणापर्यंत, आरोग्यापासून तर समाजकारणापर्यंत सगळ्या समस्या कमी करण्यासाठी ते आवश्यक आहे. `योग' या अपेक्षित जीवनशैलीचा मार्ग दाखवतो. त्यामुळेच `योग' म्हणजे केवळ शारीरिक कसरतीचा एक प्रकार असा विचार न करता, महर्षी पतंजली यांनी म्हटल्याप्रमाणे - `योग: चित्तवृत्तीनिरोध:' हे लक्षात घ्यायला हवे. योगासनांसोबत त्याच्या सखोल तत्वज्ञानाचा, योगाने केलेल्या मानवी जीवनाच्या तलस्पर्शी विश्लेषणाचा प्रचार-प्रसार होईल; त्यासंबंधातील समज वाढेल, आचरण वाढेल यावर जोर द्यायला हवा. `योगा'द्वारे शरीर चांगले राखून पैसा, मानसन्मान, पदप्रतिष्ठा, करीयर, शारीरिक सुखोपभोग, अधिकाधिक संग्रह आणि अधिकार; यांचीच आराधना करायची असेल तर तो `योग' या मूळ वस्तूचा/ भावनेचा/ संकल्पनेचा घोर अपमान ठरेल. `सर्वे सन्तु निरामयाः' सोबतच `सर्वे भद्राणि पश्यन्तु' हा `योगा'चा म्हणूनच भारतीय चिंतनाचा गाभा आहे हे विसरता कामा नये. संपूर्ण जगभरातील ७०० कोटी लोकांच्या जीवनात योगाच्या माध्यमातून इष्ट परिवर्तन येवो आणि सगळ्यांच्या जीवनात निरामयतेसोबतच भद्रता नांदो.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, १२ डिसेंबर २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा