शनिवार, १० जानेवारी, २०१५

महान विचारवंत समाजसेवकाची असहिष्णुता

एकेक वेळ असते आणि त्या क्षणातून त्या व्यक्तीची ओळख होत असते. आपण सहिष्णू आहोत असे म्हणणे वेगळे आणि तसे असणे वेगळे. आज असाच एक अनुभव आला. विश्वंभर चौधरी हे नाव आता महाराष्ट्रात नवीन राहिलेले नाही. त्यांनी त्यांच्या फेसबुक पानावर एक कथित छोटीशी कथा लिहिली आहे. महात्मा गांधी आणि रा. स्व. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांची भेट, असा त्या कथित उपरोधिक कथेचा विषय आहे. अशी भेट झाली हाच मुळात खोटा प्रचार आहे, असा त्याचा ध्वनित अर्थ आहे. त्यावर मी खरमरीत मत व्यक्त केले आणि त्या कथेला शीर्षकही सुचवले. काही वाचकांनी माझे मत आणि शीर्षक लाईक केल्याचे नोटिफिकेशन सुद्धा मला आले. त्यावेळी दुसऱ्या कामात असल्याने मी व्यस्त होतो. थोड्या वेळाने पाहतो तर विश्वंभर चौधरी यांनी मला त्यांच्या मित्र यादीतून काढल्याचे दिसले. त्याचे मला कणभरही दु:ख नाही. कोणाच्या मित्र यादीत असणे वा नसणे किंवा नाव असलेल्या व्यक्ती सोबतचे फोटो वगैरे खूप म्हणजे खूपच छोट्या गोष्टी आहेत माझ्यासाठी. शोध पत्रकारितेचा पुरस्कार तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते स्वीकारतानाचा फोटोही मी स्वत:च्या वडिलांना बैठकीच्या खोलीतून काढायला लावला होता. अन सुमारे १५ वर्षांपूर्वीची ही गोष्ट आज निमित्त घडले म्हणून सांगत आहे. असो. मूळ विषयावर यायचे म्हणजे, मी चौधरी यांच्या भिंतीवर जाऊन पाहिले तर तिथेही ती कथा दिसली नाही. ती कथा काढली वा ती मला दिसू नये असे काही केले माहित नाही. परंतु खूप मोठमोठ्या गोष्टी सांगणारी व्यक्ती किती असहिष्णू असू शकते याचा प्रत्यय आला. मलाही लोकांचे विविध अनुभव येतात. अतिशय कडवट देखील. मात्र मी माझ्याकडून कोणाला मित्र यादीतून वगळल्याचे उदाहरण नाही. हेच धैर्य अन सहिष्णुता शेवटपर्यंत टिको हीच प्रभूला प्रार्थना.

थोडेसे चौधरी यांच्या कथेच्या विषयासंबंधी. १९९७ साली मी स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त दैनिक लोकसत्तेत `स्मृतींची चाळता पाने' हा विदर्भाच्या स्वातंत्र्य लढ्यावर आधारित स्तंभ लिहिला होता. साधारण ३०-३२ लेख झाल्यानंतरचा लेख महात्मा गांधी व डॉ. हेडगेवार यांच्या वर्धा शिबिराच्या वेळी झालेल्या भेटीवरीलच होता. नेमका त्यावेळी मी सुट्टीवर होतो. दुसऱ्या दिवशी पाहिले तर माझा स्तंभ नाही. चौकशी केली तेव्हा ते पान सांभाळणाऱ्या मुख्य उपसंपादकाने सांगितले की, त्यावेळच्या संपादकांनी तो माझा लेख थांबवला. ही भाकडकथा असून संघवाल्यांचा हा खोटा प्रचार आहे, असे त्यांचे म्हणणे. मी त्यावर आक्षेप नोंदवला आणि माझे संपादक असूनही मी त्यांना स्पष्ट सांगितले की, तो लेख छापणार नसाल तर माझी लेखमाला बंद. आणि ५२ भागांची ती मालिका ३२ लेख होऊन पूर्ण झाली. मला त्याचाही खेद नाही. पण मोठ्या गोष्टी सांगणारे किती असहिष्णू असतात त्याचेच तेही एक उदाहरण होते. अन `गांधी विचारधारा' या विषयाचा पदवीधर असल्याने मी अधिकृतपणे सांगतो की डॉ. हेडगेवार आणि महात्मा गांधी यांची वर्धा शिबिराच्या वेळी भेट झाली होती. स्वत: महात्मा गांधी यांनी आपल्या हरिजनमध्ये या भेटीचा उल्लेख केलेला आहे. `समग्र हरिजन' मध्ये ते पाहता येईल.

या देशाचा इतिहास आणि अभ्यासक्रम, या देशाचा इतिहास आणि विचारवंत, या देशाचा इतिहास आणि प्रसार माध्यमे; या प्रमाणेच संघ आणि अभ्यासक्रम/ विचारवंत/ प्रसार माध्यमे हा एक खूप मोठा विषय आहे. अन आज समाजात ज्यांची टिमकी वाजवली जाते ते किती असहिष्णू आहेत, किती आकस आणि द्वेष बाळगतात याची अनेक उदाहरणे अगदी नावनिशीवार माझ्याकडे आहेत. अन संघाची भूमिका काय असते हेही मी अधिकृतपणे सांगू शकतो. अनेक वर्षे संघाचे सरकार्यवाह राहिलेले स्व. हो. वे. शेषाद्री यांची एक मुलाखत संघाला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मी घेतली होती ई.स. २००० साली. तेव्हा ते संघाचे अ.भा. प्रचारक प्रमुख होते. प्रसार माध्यमातून संघाबद्दल छापून आलेली एक चुकीची माहिती आणि नंतर झालेला त्याचा खुलासा, यावर मी त्यांना विचारले होते की संघ त्या व्यक्तीच्या अन वृत्तपत्राच्या माफीची मागणी करणार का? यावर शेषाद्रीजी म्हणाले, `नाही. ती संघाची रीत नाही. अन आम्हाला त्यासाठी वेळही नाही. आम्ही फक्त काम करीत असतो.' यावर वेगळे काही म्हणण्याची गरज नाही.

विश्वंभर चौधरी नावाच्या माणसाने मला मित्र यादीतून वगळले याचे मला ना दु:ख आहे, ना खेद. माझ्या मनात फक्त चीड आणि कीव आहे. तीही व्यक्तिश: त्यांच्याबद्दल नसून, अशा वृत्तीबद्दल आणि अशा वृत्तीच्या व्यक्तींबद्दल. समाज आणि देशाला त्याचे परिणाम भोगावे लागतात, ही माझी वेदना आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, १० जानेवारी २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा