मंगळवार, २४ मार्च, २०१५

व्होल्तेअरचे दुसरेही वाक्य आठवायला हवे

१८ व्या शतकातील प्रसिद्ध फ्रेंच इतिहासकार व तत्वज्ञ व्होल्तेअर यांचे एक वाक्य अतिशय प्रसिद्ध आहे- `I do not agree with what you have to say, but I'll defend to the death your right to say it.' सर्वोच्च न्यायालयाने आज माहिती अधिकार कायद्याचे कलम ६६ (अ) गैरलागू ठरवण्याचा जो निर्णय दिला, त्या पार्श्वभूमीवर या वाक्याची आठवण झाली. सर्वोच्च न्यायालयाने गैरलागू ठरवलेले हे कलम सोशल मिडीयाच्या संदर्भातील आहे. सोशल मिडीयावरून अनेक मते मांडली जातात, खूप माहिती पसरवली जाते, खूप चर्चा झडतात, चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे कार्यक्रम उपक्रम आयोजित केले जातात. यातून समाजपोषक आणि समाजविघातक दोन्ही गोष्टी घडत असतात. समाजपोषक गोष्टी तर जेवढ्या होतील त्या कमीच आहेत. मात्र समाजविघातक एकही गोष्ट त्रासदायकच ठरते. याच कारणाने ६६ (अ) कलम अंतर्भूत करण्यात आले होते. अर्थात त्याचाही गैरवापर पोलिस वा सरकारकडून होत नाही वा होऊ शकत नाही असे नाही. या सगळ्या चर्वितचर्वणात सर्वोच्च न्यायालयाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने कौल दिला आहे. कोणाला याचा आनंद होईल तर कोणाला हा निर्णय पटणार नाही.

व्होल्तेअरला याबद्दल काय वाटेल हे मात्र सांगता येणार नाही. कारण त्याच्या ज्या सुप्रसिद्ध वाक्याचा सुरुवातीला उल्लेख केला आहे, तेच आज आपल्या लक्षात आहे. परंतु त्याच व्होल्तेअरचे दुसरे एक अतिशय महत्वाचे पण अप्रसिद्ध वाक्य आहे- `Opinion has caused more trouble on this little earth than plagues or earthquakes.' या वाक्याचा आम्हाला पूर्णपणे विसरच पडलेला आहे. आज त्याच्या या दुसऱ्या वाक्याचाच प्रत्यय येत असून त्याने जणूकाही मानवाला वेठीस धरले आहे. `मतभेद असले तरीही तुझे म्हणणे मांडण्यासाठी मी तुझ्यासोबत उभा राहीन', हे वाक्य व्यक्तिगत नीतीचा आदर्श सांगते आणि `मतांच्या गलबल्याने पृथ्वीचे प्लेग किंवा भूकंपाहून अधिक नुकसान केले आहे', हे वाक्य सामाजिक चिंतन मांडते. या दोन्हीचं संतुलन आणि तारतम्य विसरल्याने अनवस्था निर्माण झाली आहे.

व्यक्तिगत नीतीला सामाजिक मूल्याचे रूप दिल्याने घोळ झालेला आहे. समाज हा एका अर्थी व्यक्तींचा समूह असला तरीही त्या दोहोंच्या पातळ्या आणि परीघ सारखे नसतात हे लक्षात घ्यायला हवे. मत, विचार, चिंतन या वेगवेगळ्या बाबी आहेत. त्यांना एकच समजण्याचा अडाणीपणा आम्ही करतो. व्यक्तिगत नीती आणि सामाजिक मूल्य या दोहोंचा हा भेद बाजूस ठेवला तरीही व्होल्तेअरच्या मूळ भूमिकेतच एक त्रुटी आहे. मतभेद असूनही मी तुझ्यासोबत उभा राहीन हे वाक्य फार उदात्त वगैरे वाटत असले तरीही, त्यातील गृहितक फसवे आहे. एखाद्या गोष्टीला दुसरी बाजू असू शकते किंवा आपल्या मताच्या पूर्णत: विरोधी मतदेखील बरोबर असू शकते, हे खरे; पण ते खरे वा योग्य असेलच असेही नाही. एखादा विचार अयोग्य वा असत्य असेल तरीही तो मांडण्यासाठी मांडणाऱ्याच्या पाठीशी उभे राहायचे का? अगदी राम जेठमलानी, कपिल सिब्बल वा असे अनेक वकील जेव्हा गुन्हेगारांचे वकीलपत्र घेऊन उभे राहतात तेव्हा हाच प्रश्न निर्माण होतो. एखादा विचार, एखादे मत योग्य की अयोग्य, चांगले की वाईट, हे ठरवण्याच्या कसोट्या काय असतात? केवळ एखाद्याला वाटणे, ही ती कसोटी नक्कीच नसते. मात्र आजच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कौटुंबिक अशा सगळ्याच क्षेत्रात व्यक्तीचे वाटणे, हीच एकमेव कसोटी मानली जाते. त्यासाठी सतत व्होल्तेअर उद्धृत केला जातो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून जी चर्चा आज होत असते त्यात हाच गोंधळ दिसून येतो. या भूमिकेतील दोष असा की, प्रत्येक जणच बरोबर आहे असे तर समजले जातेच; शिवाय त्यामुळे आपले मत तपासण्याची व्यक्तीची वृत्तीही मारली जाते. आपल्याला वाटणे हीच अंतिम कसोटी ठरल्याने प्रत्येक बाबीची साधकबाधक बाजू लक्षात घेणे, अनेक अंगांनी त्या गोष्टीचा विचार करणे, तारतम्य, तज्ञता, परिपक्वता, समजुतदारपणा या साऱ्याला मूठमाती दिली जाते. कारण मी जन्मजात परिपूर्ण, स्वयंभू, सर्वज्ञानी असा असल्याने समजून घेणे, विकसित होणे यांची गरजच वाटेनाशी होते. त्यातून असहिष्णुता, मग्रुरी, संघर्ष यांचा जन्म होतो. मतमतांचा गलबला माजतो.

मुळातच आमची अनेक गृहितके तपासून पाहण्याची गरज आहे. व्होल्तेअरने स्वत:च त्याकडे लक्षही वेधले होते. त्याच्या एका प्रसिद्ध वाक्याचा तर आम्ही चावून चोथा केला आहेच, त्याच्या दुसऱ्या अप्रसिद्ध वाक्याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळही आलेली आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, २४ मार्च २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा