गुरुवार, १३ एप्रिल, २०१७

महायुद्धांचे आकडे

गेले दोन दिवस सिरीया आणि अफगाणिस्थानातील अमेरिकेच्या हल्ल्यांची चर्चा आहे. काल तर अण्वस्त्र वगळून आज जगात असलेल्या बॉम्बपैकी सगळ्यात मोठा बॉम्ब अमेरिकेने वापरला. जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे का अशी सार्थ शंका व्यक्त होऊ लागली आहे. विविध लहानमोठी युद्धे आणि दोन जागतिक महायुद्धे यांच्या माध्यमातून जगावर सत्ता स्थापन करणे किंवा अवांच्छित शक्तींना नियंत्रित करणे यांचे प्रयत्न जगभरात होत आलेले आहेत. अगदी भारतात देखील. रावण वा कंस यांना नियंत्रित करण्यासाठी श्रीराम व श्रीकृष्ण यांनी युद्ध केले. तर राजसूय इत्यादी यज्ञाच्या वेळी होणाऱ्या लढायातून वर्चस्व स्थापित करण्याचे प्रयत्न झाले. सिकंदराने विश्ववर्चस्वासाठी लढाया केल्या. शिवाजी महाराजांनी तत्कालीन आतंकवाद निपटून काढण्यासाठी लढाया केल्या. गेल्या दोनशे वर्षांचा इतिहास तर ताजा आहेच. वर्चस्व अथवा त्रासदायक शक्तींचे नियंत्रण या दोनच गोष्टी लढाया अथवा युद्ध यांच्या मुळाशी पाहायला मिळतात. यातील त्रासदायक गोष्टींचे नियंत्रण ही अपरिहार्य आणि आवश्यक बाब आहे. वर्चस्व ही ना अपरिहार्य बाब आहे ना आवश्यक. पण त्रासदायक गोष्टींच्या नियंत्रणासाठी वर्चस्व आवश्यक होऊन बसते. कालांतराने या वर्चस्वातूनच त्रासदायक गोष्टी जन्माला येतात. मानवजातीपुढील हा एक dilemma किंवा paradox आहे.

भारताने यावर उत्तर शोधले आहे. अस्वस्थता आणि संघर्ष या परिस्थितीत करावयाचा व्यवहार आणि शांततेच्या परिस्थितीत करावयाचा व्यवहार यांची फोड करून. जगाला या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत हे पूर्ण लक्षात घेऊनच वाटचाल करावी लागते हे भारताचे म्हणणे आहे. याला अनुसरूनच त्याने कामे इत्यादीची वाटणी केली होती. समाजाला, माणसाला अधिकाधिक `मन-बुद्धी'श्रीमंत करण्याचा प्रयत्न सतत व्हावयास हवा ही त्याची एक बाजू आणि त्याला emergency अन contingency यांच्यासाठी सिद्ध ठेवायला हवे ही दुसरी बाजू. `मन-बुद्धी'श्रीमंत करण्याची बाजू अधिक मजबूत करत दुसऱ्या बाजूची गरज कमी करत जाणे हे भारताचे प्राचीन सूत्र. यालाच म्हणायचे सभ्यता आणि संस्कृती. जगाने तर याचा काही विचारच केला नाही. परंतु भारतही मार्गच्युत झाला. त्यामुळे आज स्थिती अशी आहे की गांधी आणि सावरकर यांच्यावरून आपण भांडत बसतो. गांधी आणि सावरकर दोघेही आवश्यक असतात हे आम्हाला उमगतच नाही. emergency अन contingency च्या वेळी गांधी उपयोगाचा नाही म्हणून आम्ही त्याला शिव्या घालतो आणि `मन-बुद्धी'च्या श्रीमंतीच्या मार्गात सावरकर अडथळा ठरतात म्हणून त्यांना शिव्या घालतो. शिव्या घातल्या की प्रतिक्रिया होऊन त्यांचे समर्थक गटतट निर्माण होतात. माणूस आणि समाज जिथल्या तिथेच राहतो. आपले कर्मदरिद्रीपण महापुरुष आणि परिस्थिती यांच्यावर ढकलून आम्ही मूर्खता कुरवाळत बसतो. दोघेही आवश्यक आहेत. दोघांची वेगवेगळी स्थाने आहेत. दोघांची बलस्थाने आहेत अन दोघांच्या मर्यादा आहेत. त्यांचा योग्य उपयोग करून आम्हास पुढे जायचे आहे हे भान आम्ही गमावून बसलो आहोत. जगाला ही दृष्टी देणे हेच भारताचे प्रयोजन आहे. आम्हालाच त्याचे आकलन होत नसेल तर आम्ही जगासंबंधीचे कर्तव्य काय पार पाडणार? अन भारत जगाला ही दृष्टी देणार नाही, जगाच्या जीवनात ती पूर्ण मिसळून टाकणार नाही तोवर; महायुद्धांचे आकडे मोजणे संपणार नाही.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, १४ एप्रिल २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा