(डॉ. राजन जयस्वाल यांच्यावरील नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या गौरव ग्रंथासाठी लिहिलेला व त्यात समाविष्ट लेख.)
 साहित्य-संस्कृती हे शब्द जोड शब्दासारखेच पुष्कळदा वापरले जातात. त्यातील
 साहित्य या शब्दाचा काही ना काही बोध तर सगळ्यांना होतो. कथा, कविता, 
कादंबरी, ललित लेखन, प्रवासवर्णन, समीक्षा, वैचारिक लिखाण, निबंध, चरित्र, 
आत्मचरित्र, प्रवासवर्णन; अशा विविध प्रकारांनी साहित्याचा कमीअधिक परिचय 
माणसाला असतो. साहित्य दाखवता येतं, सांगता येतं, त्याचं वर्णन सहजतेने 
करता येतं. `संस्कृती' या शब्दाचे मात्र तसे नाही. संस्कृती म्हणजे काय हे 
दाखवता येत नाही, तिचे वर्णन करता येत नाही. आजकाल नृत्य- गायन- नाट्य- 
चित्रपट- लोककला- इत्यादींना विस्कळीत अर्थाने संस्कृती म्हटले जाते, समजले
 जाते. परंतु ते योग्य नाही. या कला आहेत. संस्कृती ही अधिक जीवनानुगामी 
अमूर्त भावात्मक वस्तू आहे. वस्तू हा शब्द मुद्दाम वापरला आहे. कारण ती 
आहे, ती असते. ती केवळ कल्पना नाही. एवढेच की ती अमूर्त आहे. एखाद्या भौतिक
 पदार्थासारखे तिचे मोजमाप वा वर्णन करता येत नाही एवढेच. अर्थात हेही 
तेवढेच खरे की, साहित्य वा विविध कलांमधून संस्कृती अभिव्यक्त होत असते. 
प्रकट होत असते. एवढेच नाही तर, साहित्य वा विविध कला आणि त्यांचे आविष्कार
 संस्कृतीला घडवीत किंवा बिघडवित असतात. संस्कृतीला आकार वा घाट देत असतात.
 दुसरीकडे संस्कृतीही साहित्य वा कलांना घडवीत किंवा बिघडवित असते. त्यांना
 आकार आणि घाट देत असते. या दोन्ही बाबी अन्योन्याश्रयी असतातच असे नाही. 
परंतु त्यांचा प्रवास सोबत सोबत, हातात हात घालून होत असतो. साहित्य आणि 
कला या जीवनानुभवाकडे थोड्या अधिक झुकलेल्या असतात. मनोरंजन, मनोविनोद, 
मनोरुची त्यात प्रधान असतात. संस्कृती ही जीवनार्थाकडे थोडी अधिक झुकलेली 
असते. जीवनदृष्टी, जीवनाचे तत्वज्ञान त्यात प्रधान असते एवढेच. म्हणूनच 
साहित्याचा वा कलेचा विकास आणि संस्कृतीचा विकास वेगवेगळ्या पद्धतीने समजून
 घ्यावे लागते. साहित्य वा कलांचा विकास होतो आहे का? त्यांची घडण होते आहे
 का? त्यांची वृद्धी होते आहे का? या प्रश्नांची उत्तरे शोधताना वेगळ्या 
पद्धतीने शोधावी लागतात. जसे- लोक लिहितात की नाही, वाचतात की नाही, 
लिहीणाऱ्यांची अथवा वाचणाऱ्यांची संख्या, ग्रंथालये, ग्रंथालयांची संख्या, 
पुस्तक प्रकाशने, त्यांची आकडेवारी, साहित्य संमेलने, साहित्य विषयक अन्य 
कार्यक्रम आणि आयोजने, या साऱ्यासाठी दिला जाणारा वेळ आणि पैसा, अन्य सोयी-
 सवलती- साधने- यांची उपलब्धता; हे सारे विचारात घ्यावे लागते. त्यांचा 
ताळेबंद मांडावा लागतो. अन्य कलांच्या बाबतीतही असाच विचार करावा लागतो. 
त्यातून त्यांचे घडणे वा बिघडणे, त्यांची वृद्धी वा घट समजून घेता येते; 
समजून घेतली जाते. संस्कृतीची वाढ-घट कशी मोजायची? कशी समजून घ्यायची? 
त्याचं माप कोणतं? संस्कृतीचं घडणं बिघडणं अथवा वाढ-घट अशी बाह्य एककांनी 
समजून घेता येत नाही. संस्कृतीचा विकास समजून घेण्याचे मापदंड आंतरिक आहेत.
 ज्या मानवाच्या जीवनाचा तो अविच्छेद्य भाग आहे; त्या मानवाच्या भावना, 
विचार, जाणीवा, दृष्टी किती व्यापक होत आहेत वा संकुचित होत आहेत; त्यांचा 
विस्तार होतो आहे की आकुंचन होते आहे; हाच संस्कृतीच्या विकासाचा मापदंड 
असू शकतो. साहित्य अथवा कला; संस्कृतीच्या या विकासाला किती साहाय्य करतात,
 त्यासाठी किती पूरक ठरतात, यावरून साहित्य वा कलांच्या दर्जेदार असण्यावर 
वा नसण्यावर मोहोर उठवता येते.
 मानवाच्या भावना, विचार, जाणीवा, 
दृष्टी किती व्यापक होत आहेत वा संकुचित होत आहेत; त्यांचा विस्तार होतो 
आहे की आकुंचन होते आहे; हे तरी कसे ठरवायचे? या प्रश्नाचे उत्तर, म्हटले 
तर फार सोपे आहे. अर्थांची, शब्दांची फार ओढाताण न करता त्याचे उत्तर देता 
येते. मोठी पिशवी ती, ज्यात अधिक वस्तू सामावू शकतात, लहान पिशवी ती ज्यात 
कमी वस्तू सामावू शकतात. त्याचप्रमाणे भावना, विचार, जाणीवा, दृष्टी मोठी 
अथवा व्यापक तेव्हाच म्हटली जाईल, जेव्हा त्याचा परीघ अधिकाधिक मोठा असेल; 
अधिकाधिक भावना, विचार, जाणीवा, दृष्टी यांना सामावून घेऊ शकेल. याउलट ज्या
 भावना, विचार, जाणीवा, दृष्टी यांचा परीघ लहान असेल, त्या भावना, विचार, 
जाणीवा, दृष्टी लहान म्हणाव्या लागतील. अन आपला लहान परीघ मोठा करण्याचे 
नाकारत, अधिकाधिक भावना, विचार, जाणीवा, दृष्टी यांना सामावून घेण्याचे 
नाकारत जाणे; याला संकुचितपणा म्हणावे लागेल. आणखीन एका गोष्टीची नोंद 
घेणेही गरजेचे आहे. आपला परीघ मोठा करणे, अधिकाधिक भावना, विचार, जाणीवा, 
दृष्टी सामावून घेणे ही; चांगली अन योग्य असली तरीही धोकादायक प्रक्रिया 
आहे. त्यासाठी विवेक जागा असणे नितांत गरजेचे. परीघाबाहेरील व्यक्ती वा 
विचार यांना परिघात सामावून घेणे विवेकाधिष्ठित असायला हवे. हिंसा, 
एखाद्याचे अस्तित्व संपवणे वा नाकारणे, स्वार्थ, समग्र जीवनाच्या संदर्भात 
विचार करण्याला नकार देणे, आततायीपणा; यासारख्या बाबी व्यापकतेच्या 
नावाखाली सामावून घेता येत नाहीत, सामावून घेऊ नयेत. त्यातून फक्त आत्मनाशी
 भस्मासूर निर्माण होतात. हिंसा, एखाद्याचे अस्तित्व संपवणे वा नाकारणे, 
स्वार्थ, समग्र जीवनाच्या संदर्भात विचार करण्याला नकार देणे, आततायीपणा; 
इत्यादी बाबी समजून जरूर घेतल्या पाहिजेत. परंतु समजून घेणे आणि सामावून 
घेणे यातील भेद दुर्लक्षित करणे चुकीचे ठरते.
 संस्कृतीच्या जडणघडणीत
 समाजजीवनाच्या विविध घटकांचा कळत वा नकळत सहभाग असतो. वर्तमानाचा विचार 
केल्यास काय चित्र डोळ्यासमोर येते? प्रसारमाध्यमे आणि संवाद माध्यमे 
आजच्या युगावर सर्वाधिक प्रभाव गाजवीत असल्याचे पाहायला मिळते. कधी नव्हे 
एवढा हा प्रभाव वाढला आहे. ही मानवी प्रवासातील `न भूतो' अशी प्रक्रिया 
आहे. संवाद आणि संवादाची विविध माध्यमे मानवी सभ्यता व संस्कृतीएवढीच 
पुरातन आहेत यात वाद नाही. भाषा आणि वाणीचा किंवा मानवी खाणाखुणांचा उपयोग 
तर होतच असे, पण पशुपक्ष्यांचा संवाद माध्यम म्हणून वापर; तसेच 
`मेघा'सारख्या गोष्टींचा साहित्यिक प्रतिभेने संवाद माध्यम म्हणून केलेला 
उपयोग; नवीन नाहीत. तरीही, संवाद आणि संवाद माध्यमे यांचा पसारा, वैविध्य, 
राजापासून रंकापर्यंत असलेली त्याची उपलब्धता, सहजता, गती; हे सारे 
अभूतपूर्व आहे. प्रसार माध्यमे ही तर अगदी अलीकडच्या दोन शतकांची देणगी 
आहे. त्यातही गेल्या दोनेक दशकात झालेले बदल हे क्रांतिकारी या शब्दालाही 
उल्लंघून गेलेले आहेत. संवाद माध्यमे आणि प्रसार माध्यमे यांच्या या 
पसाऱ्याने मानवाच्या व्यक्त होण्याचे सगळे संदर्भच बदलून टाकले आहेत. 
`खाजगी किंवा व्यक्तिगत' या बाबी तर पातळ होऊ लागल्या आहेतच; पण व्यक्त 
होण्यातील स्त्री- पुरुष- तृतीयपंथी- हे लिंगभेद; भाषाभेद, भौगोलिक सीमा, 
जाती- भाषा- प्रांत- देश- विषय- वय- या साऱ्या सीमाही पुसट झाल्या आहेत. 
आपल्या घरात बसून जगातील कोणाशीही संवाद साधण्याची सोय आता उपलब्ध आहे. 
कोणतीही माहिती जाणून घेणे किंवा कोणतीही माहिती विशिष्ट व्यक्ती वा 
व्यक्तीसमूह यांच्यापर्यंत किंवा यच्चयावत सगळ्यांपर्यंत पोहोचवणे यात 
काहीही नवीन राहिलेले नाही. विचारांचे आदानप्रदान सहजसोपे झाले आहे. मोबाईल
 आणि आंतरजाल या संवादमाध्यमांनी माहिती आणि विचारांच्या आदानप्रदानातील 
मर्यादा तर पुसल्याच, सोबतच `प्रसार माध्यमे' हा मध्यस्थही बाजूस सारला 
आहे. माहिती आणि विचारांच्या आदानप्रदानासाठी असलेली अवलंबिता पुसून टाकली 
आहे. प्रसारमाध्यमांचे भविष्य काय असेल असाही एक प्रश्न यामुळे निर्माण 
झाला आहे.
 आपल्या त्या त्या वेळच्या निवडीप्रमाणे कधी व्यक्तिगत, तर
 कधी समष्टीशरण अशा या संवादसाधनांनी चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम 
होत आहेत. त्यांचे नेमके आकलन होण्यास अजून काही काळ जाऊ द्यावा लागणार 
आहे. तरीही त्यातील प्रवाह स्पष्टपणे पाहता, अनुभवता येतील इतके ठळक 
निश्चित आहेत. चांगल्या आणि वाईट गोष्टींची सहज उपलब्धता हे त्याचे एक 
लक्षण आहे. मोठाले धार्मिक वा तात्विक ग्रंथ, सगळ्याच भाषांमधील मोकळे होत 
असलेले कथा, कादंबरी- कविता- इत्यादी साहित्य, वैचारिक वाङ्ग्मय, वैज्ञानिक
 माहिती, इतिहास, पुराणे, राज्यघटना, नियम, कायदे, बँकांचे आणि कंपन्यांचे 
ताळेबंद, शास्त्रीय आणि अन्य संगीत, जुने व नवे चित्रपट, नाटके, भूगोल, 
पर्यटन, निसर्ग हे सगळे बोटांच्या टोकावर आले आहे. केवळ माहिती म्हणून 
नव्हे तर प्रत्यक्ष व्यवहार म्हणूनही हे एका क्लिकचे काम होते आहे. 
प्रवासापासून निवासाच्या आरक्षणापर्यंत किंवा प्रत्यक्ष पैसा कमावणे- खर्च 
करणे- देवाणघेवाण- अन्य व्यवहार हेही जागचे न हलता होऊ लागले आहेत. शिक्षण 
वा वैद्यकीय उपचार हे दोन व्यक्तींचा थेट संपर्क न होता होऊ लागले आहेत. 
खरेदी-विक्री डाव्या हाताचा मळ झाला आहे. यासोबतच फसवणूक, अधिकृततेचा अभाव,
 एकलकोंडेपणा, संशयीवृत्ती, गैरफायदा घेणे, लुबाडणूक, अनिश्चितता, 
आरोग्याच्या तक्रारी यांचीही भरमसाठ वाढ होते आहे. आपल्याला दुष्ट लोकांचा 
वा वृत्तींचा फटका बसू नये याचा मोठा तणाव प्रत्येकाला जाणवू लागला आहे. 
शिवाय जशा चांगल्या गोष्टी उपलब्ध आहेत तशाच पोर्नोग्राफी, ड्रग्ज, मादक 
द्रव्य, जुगार, वेश्यावृत्ती हेही सहज उपलब्ध आहे. एकीकडे माणसे एकलकोंडी 
होऊन दुरावू लागली आहेत, तर दुसरीकडे आपापल्या आवडीनुसार गट तयार करून 
आवडीच्या विषयात रममाण होऊ लागले आहेत. असंख्य साहित्यिक, वैज्ञानिक, 
धार्मिक, सामाजिक, राजकीय गट तयार होत आहेत. त्यात देवाणघेवाण होत आहे. 
आभासी वास्तवातून भेटणारे लोक आणि विचार, भावना, माहिती, साहित्य यांची 
देवाणघेवाण करणारे लोक; प्रत्यक्ष भेटून एकमेकांना समजून घेऊ लागले आहेत. 
त्यांचे लहानमोठे कार्यक्रम होऊ लागले आहेत. अन अशा गटांची सभासद संख्या 
लाखात सुद्धा पोहोचू लागली आहे. लिहिणारा, व्यक्त होणारा, वाचणारा वर्ग 
विकसित होऊ लागला आहे; वाढू लागला आहे. कधीकधी हे व्यसन सुद्धा होत आहे. 
कौटुंबिक गटात सुद्धा आजवर माहिती नसलेल्या अनेक गोष्टींचा, गुणांचा परिचय 
होऊ लागला आहे. यातून प्रत्येकाला चांगल्या व वाईट दोन्ही अर्थाने; संधी, 
सन्मान आणि ओळख प्राप्त होऊ लागली आहे.
 संवाद माध्यमांमुळे प्रसार 
माध्यमांचे स्वरूपही बदलले आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि अस्तित्व 
टिकवून ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर, तसेच पैशासाठी जाहिरात 
शरणता हा प्रसार माध्यमांचा धर्म झाला आहे. राजकारण, चित्रपट, मनोरंजन, 
गॉसिप, तंत्रज्ञान यांच्याशी संबंधित कार्यक्रम आणि लिखाण यांना प्रमुखता 
मिळाली आहे. संवाद माध्यमांच्या प्रभावातून ही माध्यमेही सुटू शकत नाहीत. 
संवाद माध्यमातील घडामोडी, प्रवाह, त्यांचा खरेखोटेपणा हेदेखील त्यांचे 
विषय होऊ लागले आहेत. तांत्रिक प्रगतीमुळे अन्य देशांशी live देवाणघेवाण 
करणे शक्य झाले आहे. दोन देशातील वृत्तवाहिन्या एकत्र येऊन वृत्त वा चर्चा 
लोकांपर्यंत पोहोचवू लागले आहेत. देशविदेशातील वृत्तपत्रे आंतरजालात सहजपणे
 उपलब्ध होऊ लागली आहेत. जेवण, झोप, अभ्यास, कौटुंबिक कार्यक्रम, 
पाहुणेराहुणे, भेटीगाठी, आवडीनिवडी, इच्छा, अपेक्षा, मानसिकता यांच्यावर या
 साऱ्याचा प्रभाव होऊ लागला आहे. क्रीडास्पर्धा, राजकीय घडामोडी, अन्य 
महत्वाच्या घटना, चित्रपट यांची माहिती सर्वजनसुलभ होऊ लागली आहे. मानवी 
जीवन आणि त्याचे असंख्य पैलू यांचा परहस्ते अनुभव का होईना, घरबसल्या मिळू 
लागला आहे. माहिती, प्रतिमा, दृश्य, मतमतांतरे, घडामोडी यांनी माणसाचे मन, 
बुद्धी तुडुंब भरून जाऊ लागली आहे. reality show या प्रकाराने इलेक्ट्रॉनिक
 प्रसार माध्यमांचे मोठे विश्व व्यापले आहे. अस्पर्शित प्रतिभांना अवकाश 
प्राप्त होणे हा त्याचा सकारात्मक परिणाम आहे, तर उथळ कौशल्यविकास आणि 
अकाली प्रगती खुंटणे हे त्याचे नकारात्मक परिणाम आहेत. काही बाबतीत या 
reality show मधून गरजू आणि अभावग्रस्तांना मदत मिळते आहे; तर अनेकदा `सोपा
 आणि पापमय पैसा' वाहतो आहे. सुमार लोक celebrity होत आहेत. सार्वजनिक 
कार्यक्रमातील त्यांचा वावर वाढला आहे. त्यामागे लोक धावत आहेत अन त्या 
तथाकथित celebrity उखळ पांढरे करून घेत आहेत. प्रादेशिक वृत्तवाहिन्या आणि 
मुद्रित माध्यमे लोकांमध्ये जाऊन; लोकहिताचे वा लोकानुरंजनाचे उपक्रम करीत 
आहेत. राजकीय चर्चा हे बौद्धिक दंगलीचे क्षेत्र झाले आहे. मुद्रित 
माध्यमातील संपादकांचे महत्व कमी होऊ लागले आहे. गंभीर, उच्च अभिरुचीचे 
लिखाण हद्दपार होऊ लागले आहे. दोन्ही प्रकारच्या प्रसार माध्यमांनी दैनंदिन
 जीवन तर व्यापून टाकले आहेच; सोबतच अर्थकारणालाही आकार दिला आहे, देत 
आहेत. राजकीय निर्णय प्रभावित करण्याची या माध्यमांची शक्तीही वाढली आहे.
 प्रसार माध्यमे आणि संवाद माध्यमे यांच्या चांगल्या वाईट परिणामांची चर्चा
 बाजूला ठेवून, केवळ सकारात्मक बाबी लक्षात घेतल्या तरीही संस्कृती 
संदर्भात काही प्रश्न समोर येतात. विचारांच्या, भावनांच्या, माहितीच्या 
देवाणघेवाणीतून, अभिव्यक्त होण्याच्या प्रक्रियेतून, समजून घेण्याच्या 
प्रयत्नातून; काय येणेजाणे करते आहे? कशाची देवाणघेवाण होते आहे? या 
देवाणघेवाणीने मानवी मन आणि जगणे किती आणि कसे समृद्ध होत आहे? वरवर नजर 
टाकली तरीही लक्षात येईल की; चित्र फारसे आशादायक नाही. संवाद माध्यमातून 
असंख्य स्त्री-पुरुष व्यक्त होऊ लागले आहेत. पण या व्यक्त होण्याचे स्वरूप 
कुरकुर, तक्रारी, कुरघोडी, टवाळकी असेच मोठ्या प्रमाणावर आहे. राजकीय गटात 
लोकांनी स्वत:च स्वत:ला वाटून घेतले आहे. अन्यथा प्रामाणिक आणि कळकळीचे 
असलेले लोकसुद्धा राजकीय हमरीतुमरी सोबतच, एकमेकांचा द्वेष करू लागले आहेत.
 संपूर्ण मानवी जीवनाचे अपार राजकीयीकरण झाले असून त्याने परस्पर 
संबंधांनाही गिळंकृत करणे सुरु केले आहे. मानवी मनातील सत्ताकांक्षा 
भस्मासूर होऊन समोर येते आहे. यात राजकीय सत्ता तर आहेच, सोबतच व्यक्ती, 
परिवार, विचार, संस्था, संघटना यांच्याही सत्ताकांक्षा तीव्र, तिखट आणि कडू
 होऊ लागल्या आहेत. एकाच छताखाली राहणारे चार जीवसुद्धा आपली सत्ता कशी 
चालेल किंवा सत्ता आपल्या हाती कशी राहील याचा प्रयत्न करताना दिसतात. 
सत्ताकांक्षेच्या भस्मासुराप्रमाणेच संपत्तीकांक्षेच्या भस्मासुरानेही 
अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. कोणत्याही गोष्टीचा संदर्भबिंदू पैशाशी 
येऊन थांबतो आहे. प्रतिष्ठा, मोठेपणा, न्याय, योग्यता, आदर पैशाच्या 
संदर्भात तोलले जाऊ लागले आहेत. `सर्वेगुणाः काञ्चनम् आश्रयन्ते' हे मानवी 
वृत्तीच्या अपरिपक्वतेचं लक्षण, मानवी पुरुषार्थ म्हणून पुढे येतं आहे. 
ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्या मनात आढ्यता आणि ज्याच्याकडे नाही त्याच्या 
मनात आशाळभूतपणा निर्माण होतो आहे. शिक्षण, संस्कार, जाहिराती, वातावरण, 
धोरणे, भाषा, चिकित्सा, विश्लेषण, चर्चा, जीवनाचे आदर्श आणि मापदंड; या 
साऱ्यातून सत्ता आणि संपत्ती यांचाच महापूर आला आहे. चांगल्या चांगल्या 
समाजोपयोगी योजना आदींचे `दूत' म्हणूनदेखील सत्ता, संपत्ती आणि भ्रष्ट जीवन
 यात बुडालेले लोकच पुढे येत आहेत. जीवन आणि तत्वज्ञान, जीवन आणि धर्म, 
जीवन आणि आध्यात्मिकता यांचा संबंधविच्छेद होऊ लागला आहे. `साधी राहणी, 
उच्च विचारसरणी' हा थट्टामस्करीचा विषय झाला आहे. माणसाने माणसाला समजून 
घेण्यासाठी, माणसाने जीवन समजून घेण्यासाठी आवश्यक अशी मनाची घडण गमावून 
बसतो आहोत आणि त्याची गरज आहे याकडेही दुर्लक्ष होत आहे. ज्ञान, सद्गुण, 
सदाचार, सद्भाव, साधेपणा, सहृदयता, संवेदनशीलता, विचारीपणा, संतुलन; या 
साऱ्यांना तिलांजली देणे सुरु झाले आहे. कधी भलेपणाचा अतिरेक, तर कधी 
व्यवहारचातुर्याचा अतिरेक पाहायला मिळतो. गैरफायदा घेणे आणि बळी जाणे 
दोन्ही वाढते आहे. यातून असुरक्षितता, अविश्वास, संशयीपणा, रिक्तता वाढत 
चालले आहे. मन, बुद्धी, भावना, विचार, जाणीवा; सशक्त, सार्थक आणि व्यापक 
होण्याऐवजी संकुचित, विसविशीत होत आहेत. संघर्षाची आणि समन्वयाची दोन्ही 
ताकत माणूस आणि समाज गमावून बसतो आहे. जीवनदृष्टी अशी काही राहिली आहे का 
असा प्रश्न पडू लागला आहे. जीवन म्हणजे केवळ वाहत राहणे अशीच भूमिका दिसून 
येते. गरिबी, दुर्बलता, अन्यायग्रस्तता म्हणजे आक्रस्ताळेपणाला सूट; तसेच 
श्रीमंती, बलसंपन्नता म्हणजे अधिकाराची सूट असेच चित्र पुढे येते आहे. 
संस्कृती म्हणजे जर जीवनदृष्टीचा विस्तार आणि त्याला अनुसरून व्यवहार हा 
असेल; तर दुर्दैवाने म्हणावे लागेल की संस्कृतीची घसरण सुरु आहे. व्यक्ती 
आणि समाजाच्या जीवनातील सत्ता आणि संपत्तीकडे झुकलेला लंबक जोवर ज्ञान, 
गुणसंपन्नता आणि आत्मभावाच्या विकासाकडे झुकत नाही तोवर ही घसरण सुरूच 
राहील. ढळलेला हा तोल प्रस्थापित करण्याचे आव्हान विचारी सारस्वतांपुढे आ 
वासून उभे आहे.
 - श्रीपाद कोठे
 नागपूर