गुरुवार, १३ जून, २०१३

गाढव तज्ञ

अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी आज जनतेला आवाहन केले की, कृपया सोने खरेदी करू नका. आपण किती गाढव आहोत, हे दाखवण्याची या तज्ञ लोकांना वारंवार इतकी उबळ का येते कळत नाही. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरते आहे. सोने आयात करण्यासाठी आपल्याला डॉलर द्यावे लागतात. त्यामुळे डॉलरची गंगाजळी आटते आणि foreign exchange reserve घटते. त्याने असंतुलन निर्माण होते, म्हणून सोने खरेदी करू नका, असा यांचा तर्क!! खरे तर `दुखणे पायाला आणि पट्टी डोक्याला' असा हा प्रकार आहे.

मुळात हे सगळे प्रश्न निर्माण झाले आहेत, कच्च्या तेलामुळे. यावर उपाय करायचे सोडून तज्ञांचे मात्र उफराटे उपदेश देणे सुरु आहे. कच्च्या तेलासाठी आपल्याला दुसऱ्यांवर अवलंबून राहण्यावाचून गत्यंतर नाही. त्यामुळे त्यातून मार्ग काढायचा याचा अर्थ, त्याचा वापर कमी करायचा आणि त्याला पर्याय शोधायचे. वापर कमी करायचा तर पर्यायी जीवनशैली विकसित करावी लागेल. शहर नियोजनापासून अनेक गोष्टी करता येतील. पण त्या करायच्या नाहीत आणि चुकीचे उपदेश द्यायचे. याला काय म्हणायचे? खरे तर आजची अर्थव्यवस्था कोणतेही प्रश्न सोडवू शकत नाही. अन या अर्थव्यवस्थेचा आधार असलेले अर्थशास्त्र दिशाहीन आहे. मुळात अर्थशास्त्र, अर्थव्यवस्था, अर्थचक्र कशासाठी? या प्रश्नापासून सुरुवात करायला हवी. तो एक स्वतंत्र विषय आहे.

परंतु मर्यादित विचार केला तरीही, सोने खरेदी न करण्याचा उपदेश किती मूर्खपणाचा आहे हे लक्षात येईल. आपल्या देशात सोने खरेदीची जी एक परंपरा आहे त्यामुळे लोकांच्या जगण्याला आणि अर्थव्यवस्थेला एक मजबूत आधार आहे. अडीअडचणीला लोकांना त्याचा आधार असतो. एक अतिशय सकारात्मक असा आपल्या जीवनव्यवहारांचा तो पैलू आहे. सरकारच्या नाकर्तेपणात स्वत:ला वाचवण्याचा तो एक चांगला उपाय आहे. दुसरे असे की, कच्चे तेल वा अन्य काहीही वापरून संपून जाणारे आहे. त्यात खर्च होणारे डॉलर म्हणजे घाट्यातला सौदा आहे. म्हणजे डॉलर तर खर्च होणारच. पण त्यानंतर आपल्या हातीही काही राहणार नाही. सोने खरेदी केल्यास, उद्या तिजोरीत खडखडाट झाला तरीही, आपण कफल्लक मात्र नक्कीच होणार नाही. सोने ही नेहमीच खात्रीची गुंतवणूक आहे. कदाचित त्याची विनिमय दराने किंमत थोडी कमीजास्त होईल, पण त्याचे मूल्य मात्र कायम राहील आणि म्हणूनच ते कधीही शून्यावर येणार नाही.

पण काय करणार? आज परिस्थिती अशी आहे की, `गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता.'

-श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, १३ जून २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा