गुरुवार, ३ जुलै, २०१४

मराठी साहित्य संमेलन आणि विज्ञानाची दांभिकता

एखादी घटना किंवा परिस्थिती एखादं तत्व चांगल्या प्रकारे समजावून सांगते. नुसता विचार अनेकदा गळी उतरत नाही, अनेकदा दुर्लक्षित राहतो. येणारे मराठी साहित्य संमेलन पंजाबात नामदेव महाराजांच्या गावी होणार अशी बातमी वाचली आणि अनेक दिवसांपासून मनात घोळत असलेल्या विचाराला बळकटी मिळाली. कोणता विचार घोळतोय मनात? विचार आहे आधुनिक विज्ञानाचा. आधुनिक विज्ञानाने अनेक चांगल्या गोष्टी केल्या आहेत. त्याचे ऋण मानव जातीवर आहे. परंतु या सगळ्या गोष्टींवर बोळा फिरवणारी एक कोणती गोष्ट जर विज्ञानाने केली असेल, तर ती म्हणजे- विज्ञानाने माणसाला प्रचंड दांभिक बनवले आहे. माणसाचा दंभ अपार वाढवला आहे. विज्ञान त्याच्या डोक्यात गेलं आहे. नुकतेच एक साहित्यिक मला म्हणाले, तू जे काही लिहितो आणि लोकांपर्यंत पोहोचवतो ते विज्ञानामुळेच ना? मी त्याच्याशी सहमत नव्हतो. आज माझं म्हणणं उचलून धरलं गेलं. नामदेवांच्या काळी कुठे होतं आधुनिक विज्ञान? वैज्ञानिक- तांत्रिक सोयी, उपकरणे? तरीही उत्तर, दक्षिण सर्वत्र त्यांनी संचार केला. त्यांना ना प्रवासाची अडचण आली ना भाषेची. ना खाण्यापिण्याची ना कपड्यालत्त्याची. लिखाण केलं, कीर्तनं केली, प्रवचनं केली. अन ही सगळी निर्मिती एवढी सकस की अनेक शतके लोटूनही ताजी टवटवीत. काळाचा जंग त्यावर चढू शकला नाही.

अनेक गोष्टी सांगता येतील. आर्यभट्टाने संशोधन केले तेव्हा कुठे होते विज्ञान- तंत्रज्ञान? खाण्यापिण्याच्या वस्तू, आसऱ्यासाठी घरे, सुशोभनासाठी रंग ज्यांनी प्रत्यक्षात आणले, त्यांच्या सार्थक रचना आणि परंपरा निर्माण केल्या तेव्हा कुठे होते विज्ञान- तंत्रज्ञान? छत्रपती शिवरायांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी जो अचाट पराक्रम घडवला तेव्हा विज्ञान- तंत्रज्ञान एवढे प्रगत नव्हतेच ना? त्यांनी सगळ्या गडांवर केलेली बारमाही पाण्याची व्यवस्था आधुनिक छत्रपती आधुनिक विज्ञान- तंत्रज्ञान वापरून एका जिल्ह्यापुरतीही करू शकले नाहीत. भगवान बुद्धाने आपल्या धम्माचा जगभर प्रचार विज्ञान - तंत्रज्ञानाच्या शिवायच केला. हजारो वर्षांचे वेद उपनिषदांचे ज्ञानभांडार आधुनिक विज्ञान तंत्रज्ञाना शिवायच जतन करण्यात आले. पुरातन ज्ञानभांडारातील खूप सारे ज्ञान नामशेष झाले असेल तर तेही आक्रमणे वा अनास्था यामुळे.

जगभरातील मानवी सभ्यतेचा इतिहास याचा साक्षी आहे. माणूस प्रगती करतच होता. जगण्याच्या सर्व अंगांचा विचार करत होता. जुन्या गोष्टींमध्ये सुधारणा करत होता. जगणे समृद्ध करत होता. विज्ञान तंत्रज्ञान हेसुद्धा याच मार्गावरील एक स्थानक आहे. पण कुणास ठाऊक का आणि कसे, पण अशी काही जादू झाली की माणूस त्याला अंतिम स्थानक समजू लागला. एवढेच नव्हे तर त्यालाच जगण्याचा पर्याय मानू लागला. त्यातूनच प्रचंड दंभ वाढला. दिवसागणिक प्रत्ययाला येतं की, विज्ञान सगळ्या समस्या सोडवू शकत नाही, तंत्रज्ञान आम्हाला सुख देऊ शकत नाही, विज्ञान तंत्रज्ञान माणसाचं मन सन्मार्गी बनवू शकत नाही; तरीही आमचा दंभ मात्र कमी होत नाही. या दांभिकतेने परस्पर द्वेष, ईर्ष्या, स्पर्धा यांच्यात वाढच केली. आमची विचारशक्ती, आकलनशक्ती, धारणाशक्ती आटवून टाकली. तरीही आम्ही दंभ टाकून द्यायला मात्र तयार नाही.

विज्ञान- तंत्रज्ञानाच्या अनेक गोष्टी तर आपण स्वत:च नाकारतो. अणुबॉम्बची तर माणसाने धास्तीच घेतली आहे, पण अत्यंत आधुनिक असा laptop वापरणे सुद्धा अयोग्य असल्याने वापरू नये असा प्रवाह सुरु झाला आहे. अनेक antibiotics आज निकामी झाली आहेत. एवढेच काय विज्ञानाने स्वत:ची गृहितके तपासून पाहणे सुरु केले असून, आजचे विज्ञान स्वत:ला science of uncertainty म्हणवून घेत आहे. तरीही माणूस मात्र विज्ञानाचा दंभ सोडायला तयार नाही. मानवी मेंदूतून निघालेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक शोध, प्रत्येक विचार योग्य- स्वीकार्य- कल्याणकारी- आहे का, याचा विचार करून नीरक्षीरविवेक करण्यापासून ही दांभिकता माणसाला रोखून धरत आहे. विज्ञान तंत्रज्ञान यांचे स्वत:चे मूल्य शून्य आहे. त्याचे मूल्य त्याच्या उपयोगावर अवलंबून आहे. विज्ञान तंत्रज्ञान हे साधन आहे साध्य नव्हे. ती मानवी जगण्याला मदत करू शकणारी एक अतिरिक्त बाब आहे. त्याचं नियमन माणसाने करायचं आहे. हे नियमन करण्यासाठी प्रथम त्याला देण्यात आलेलं सर्वोच्च स्थान मनातून पुसून टाकावं लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे मानवाला त्याच्याहून अधिक उंच- व्यापक- सखोल- व्हावं लागेल. त्यासाठी त्याने बाळगलेला विज्ञानाचा दंभ आणि त्यातून अंगी बाणलेला दांभिकपणा टाकून द्यावा लागेल.

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, २ जुलै २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा