शुक्रवार, ११ जुलै, २०१४

डॉ. ईश्वरचंद्र

प्राचार्य अरविंद खांडेकर यांचं डॉ. ईश्वरचंद्र यांच्यावरचं टिपण वाचलं आणि मन ४१ वर्षांपूर्वीच्या भूतकाळात पोहोचलं. खरं तर मनात संभ्रम आहे, मन:स्थिती द्विधा आहे; डॉ. ईश्वरचंद्र यांच्यावर लिहावं की नाही याबद्दल. न लिहिलं तर कृतघ्नता होईल आणि लिहिलं तर स्वत:बद्दल बोलावं लागेल. हे बोलणंही सामान्य हवापाण्याचं नाही तर काहीसं वेगळं. पण स्वत:विषयी बोलण्याचा प्रमाद पत्करूनही डॉ. ईश्वरचंद्र यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं महत्वाचं आहे आणि आवश्यकही. माझ्या आयुष्यातील त्यांचं स्थानच तसं आहे.

१९७३ चा उन्हाळा. चवथीची परीक्षा दिली होती. निकाल लागायचेच होते. उन्हाळ्याचं हुंदडणं सुरु होतं. त्या दिवशीचा खेळ होता- धनुष्यबाण. बांबूच्या कमच्यांचे धनुष्यबाण तयार करायचे आणि वेगवेगळे शत्रू तयार करून त्यावर निशाणा साधायचा. निशाणा अर्थातच झाडे, सायकली, भिंतीवरचा एखादा बिंदू वगैरे. थोडा वेळ गेला आणि कदाचित ती वेळच तशी असावी- सोबतच्या मित्राचा बाण माझ्या डाव्या डोळ्याला लागला. एकदम डोळा बंद झाला. रक्त वगैरे काही नाही. पण डोळा उघडताच येत नव्हता. एकदम पळापळ झाली. त्यावेळी वाहने, फोन काहीही नव्हते. वस्तीत घरेच मोजकी तर डॉक्टर कुठले? पुरुष सगळे नोकरीवर गेलेले. सगळीच पंचाईत. बरे दुखणे नाही, रक्त नाही, रडणे नाही; फक्त डोळा उघडत नव्हता एवढेच.

मी आणि मित्र शेजारी शेजारीच राहणारे, दोघांचे वडीलही लहानपणापासूनचे सख्खे मित्र. सुरुवातीला नागपूरच्या महाल भागात राहणारे, मग नोकरीही एकाच बँकेत, घरे बांधली तीही शेजारी शेजारीच. रा. स्व. संघाच्या घोषदलातही दोघे होतेच. संध्याकाळी मित्राचे वडील घरी आले. त्यांना सगळा प्रकार कळला. ते म्हणाले, आपण पहिले डॉक्टरांकडे जाऊ. डॉक्टरांकडे जायचे म्हणजे प्रथम फॅमिली डॉक्टर असलेले डॉ. ब. ग. पांडे यांच्या महालच्या दवाखान्यात जायचे. मित्राच्या वडिलांनी एक सायकल रिक्षा आणली. त्यावेळी ऑटोरिक्षा असतील तरीही तुरळक, नवसासायासाचे. मी आणि आई रिक्षात, मित्राचे वडील त्यांच्या सायकलवर. जाताना त्यांची सायकल मध्येच पंक्चर झाली. ते म्हणाले, तुम्ही व्हा पुढे. मी सायकल दुरुस्त करून येतो. आम्ही दवाखान्यात पोहोचलो. डॉ. पांडेंनी तपासले, इंजेक्शन, औषधे दिली. तेवढ्यात मित्राचे वडील व माझे वडील दोघेही दवाखान्यात पोहोचले. माझे वडील बँकेतून घोषाच्या रात्र शाखेत गेले होते. संघ मुख्यालयाच्या शेजारी मोहिते संघस्थानावर ही शाखा लागते. मित्राचे वडील दवाखान्यात येण्यापूर्वी तिथे गेले. त्यांनी तिथे निरोप दिला आणि ते दोघेही पोहोचले होते. डॉ. पांडे म्हणाले, मी तात्पुरते उपचार केले आहेत पण उद्या सकाळी पहिल्यांदा मेडिकलला घेऊन जा.

दुसऱ्या दिवशी सकाळी आई वडिलांसोबत मेडिकलला. तिथे होते- डॉ. ईश्वरचंद्र. ते वय काहीही लक्षात राहण्याचं नव्हतं. अनेक तपशील, माहिती घरी झालेल्या चर्चेतून, गप्पातून अपडेट झालेली आहे; पण डॉ. ईश्वरचंद्र यांचं ते दर्शन मात्र खरे सांगतो माझ्या पूर्ण लक्षात आहे. एखादा फोटो काढावा तसं. उंचपुरे, गोरेपान, थोडे टक्कल, दाट मिशा, ताठ कणा परंतु कमरेतून अतिशय किंचित पुढे झुकून चालणे, ज्ञान- कौशल्य- आत्मविश्वास- संपन्नता- संपूर्ण व्यक्तीमत्वातून जणू निथळत असलेले. डॉक्टर सिंधी किंवा पंजाबी असावेत. पंजाबी असतील तर केशधारी नव्हते, सहजधारी होते. भरदार देहावर डॉक्टरचा पांढरा अॅप्रन, गळ्यात स्टेथोस्कोप, डोळ्यावर चष्मा, बोलणे अतिशय सौम्य मृदू, हालचाली नेमक्या, काटेकोर आणि देखण्या- सफाईदार नृत्याच्या हालचालीसारख्या. गडबड गोंधळ नाही, आरडाओरड नाही. आजच्या मेडिकलशी तुलना केली तर कुठेही मेळ न खाणारे. त्यांनी लगेच तपासायला घेतले. ती वेगवेगळी यंत्रे, त्यांनी तपासणी, कधी उजेडात तपासणी, कधी अंधार करून तपासणी. शेवटी म्हणालेत- डाव्या डोळ्याच्या आतल्या नसांना मार लागला आहे. त्या डॅमेज झाल्या आहेत. आपण उपचार करू. रोज यावं लागेल. त्यांचं आश्वासक बोलणं, आश्वासक स्पर्श अजूनही लक्षात आहे. त्यानंतर दोन महिने रोज सकाळी मेडिकलला जाणे सुरू होते. रोज पूर्ण तपशीलवार तपासणी, डोळ्यात औषधे टाकणे आणि एक दिवस उजव्या हाताला- एक दिवस डाव्या हाताला अशी इंजेक्शने घेणे. यातला एकही दिवस असा गेला नसेल जेव्हा डॉक्टरांनी विचारले नाही- कैसे हो? आणि निघताना डोक्यावर हात ठेवून म्हटले नाही- सब ठीक हो जायेगा.

दोन महिन्यांनंतर एक दिवस इंजेक्शन, औषधे झाल्यावर ते वडिलांना बाजूला घेऊन म्हणाले- `आपण खूप प्रयत्न केले. पण मला वाटतं डावा डोळा आतून पूर्ण खराब होतो आहे. तो पूर्ण काढून टाकावा लागेल. नाही तर त्याचा उपसर्ग कदाचित उजव्या डोळ्याला सुद्धा होईल आणि देव करो तसं न होवो, पण उजवा डोळाही हातून जाऊ शकेल. आपल्याकडे वेळ फारच कमी आहे. ताबडतोब सांगा तुमचा निर्णय.' आई वडिलांनी लगेच निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी रुग्णालयात दाखल. जागतिक मान्यता मिळवलेला त्यावेळचा डोळ्यांचा निष्णात डॉक्टर शस्त्रक्रिया करणार होता. संध्याकाळी कोणीतरी म्हणाले, डॉक्टर ईश्वरचंद्र नाही कोणीतरी दुसरेच डॉक्टर शस्त्रक्रिया करतील. घरच्यांना घोर लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी शस्त्रक्रिया होणार होती. सकाळी डॉक्टर आल्याबरोबर त्यांना विचारले, काल कोणीतरी असं असं म्हणत होतं. डॉक्टर लगेच म्हणाले- त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. हे शासकीय रुग्णालय आहे. लोक काहीही बोलत असतात. शस्त्रक्रिया मीच करणार आहे. सगळे निश्चिंत झाले. शस्त्रक्रिया झाली. डावा डोळा काढून टाकावा लागलाच पण उजवा डोळा पूर्ण सहीसलामत वाचला. डॉ. ईश्वरचंद्र यांची तत्परता, कौशल्य यालाच सारे श्रेय आहे. त्यांनी थोडा जरी उशीर केला असता तरी आज हे जग माझ्यासाठी अंधार झाला असता. गेली चार दशकांहून अधिक काळ मी हे जग पाहतो आहे, सारे व्यवहार करतो आहे याचे सर्वाधिक श्रेय डॉक्टर तुमचे आहे. आणि रुग्णालयातून सुट्टी झाल्यावर पहिल्यांदा तपासायला गेलो तेव्हाचे त्या देवदूताचे शब्द होते-  `खुद को कभी कम मत समझना. एक आंख गयी तो उसकी ताकद दुसरे आंख को दे कर गयी है.'

डॉक्टर मी कधीच स्वत:ला कमी मानले नाही. तुमचे म्हणणे पूर्ण लक्षात आहे माझ्या. म्हणूनच दुसरे एक डॉक्टर मित्र माझ्या मागे लागले होते- `अपंग म्हणून नोंदणी करून टाक. बरेच फायदे असतात. प्रवासात वगैरे तर फायदा होतोच पण गॅस एजन्सी, पेट्रोल पंप वगैरेही मिळू शकेल.' त्यांना मी नकार दिला. ते डॉक्टर मित्र स्वत: अधू आहेत पायाने. अपंगांसाठी त्यांनी पुष्कळ कामही केलेले आहे. पण डॉक्टर मी स्वत:ला कणभरही कमी समजत नाही आणि माझ्या व्यवहारातही कधी कोणाला माझ्यातील त्रुटीची जाणीवही होत नाही. मग मी कशाला घेऊ सवलती बिवलती. जोपर्यंत कोणीही स्वत:ला अपंग समजत नाही तोवर कोणीही अपंग नसतो. आणि माझ्यातील त्रुटी फारच कमी आहे. सहज मात करता येईल अशी. माझ्यापेक्षा खूप गरज असलेले खूप लोक आहेत, त्यांना मिळावी मदत.

त्यानंतर कधीच संबंध आला नाही डॉ. ईश्वरचंद्र यांचा. आज प्राचार्य खांडेकरांचा लेख वाचला. त्यांना फोन केला. तेव्हा पुष्कळ बोलले प्राचार्य. डॉक्टर दहा दिवसांपूर्वी गेलेत. त्यांचे वय होते ९३ वर्षे. म्हणजे माझ्यावर उपचार आणि शस्त्रक्रिया केली तेव्हा ते होते ५२ वर्षांचे. मी होतो ९ वर्षांचा. त्यांच्या त्यावेळच्या वयाचा होण्यासाठीही मला अजून दोन-अडीच वर्षे आहेत. डॉक्टरांनी मेडिकल सोडले. त्यानंतर बर्डीवर स्वत:चा दवाखाना उघडला. त्या दवाखान्यातील जागतिक कीर्तीच्या डोळ्याच्या डॉक्टरची तपासणी फी होती २० रुपये. कोणी तीही देऊ शकत नसेल तर तीही माफ. हजारो लोकांना दृष्टी देणाऱ्या या डॉक्टरने सहकारी वगैरे ठेवून व्याप वाढवण्याचा प्रयत्न केला नाही. आपल्यानंतर आपली व्रतस्थता जपली जाईल याची काय शाश्वती? त्यामुळे परमेश्वर करवून घेतो तोवर करणे. गीतेतील कर्मयोगाचे आचरण. प्राचार्यांच्या लेखावरून कळले, डॉक्टर नागपूर विद्यापीठातसुद्धा सक्रिय होते. अनेक कामात त्यांचा सहभाग होता. आजच्या डॉक्टर लोकांना डॉ. ईश्वरचंद्र माहीत नाहीत. एक काळ आपल्या ज्ञानाने, कौशल्याने, सेवेने गाजवलेला; जागतिक कीर्ती संपादणारा नेत्रतज्ञ आयुष्याच्या शेवटी बेदखल होतो. यालाच म्हणतात कालचक्र. म्हणूनच जगणे आणि जगण्याचे समाधान पैसा, कीर्ती, पद, प्रतिष्ठा यांना बांधून ठेवू नये. हाच आहे गीतेचा सनातन संदेश. तो जगणारे तृप्त आणि कृतार्थ असतात. डॉ. ईश्वरचंद्र असेच तृप्त आणि कृतार्थ होते.

Thank You डॉ. ईश्वरचंद्र तुम्ही माझी दृष्टी आणि नजर वाचवलीत.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, ११ जुलै २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा