रविवार, १३ जुलै, २०१४

आपले असले तरीही...

आपल्या मराठीत एक छान म्हण आहे- `आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्टं.' माणसाची ही स्वाभाविक वृत्ती असते. परंतु एखादी गोष्ट स्वाभाविक आहे म्हणजे योग्य आहे, अनुकरणीय आहे किंवा ग्राह्य आहे; असे होत नाही. योग्य- अयोग्यता किंवा स्वीकार- नकार यांचा निकष स्वाभाविकता हा नाही. भारतात नव्याने आलेल्या भाजपा सरकारचा विचार करताना ही गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. अतिशय परिश्रमांनी एक सत्तांतर देशात घडून आले आहे. त्याचे अनेक अर्थ आणि अन्वय आहेत. ते हळूहळू प्रकट होतील. विचार, आचार आणि वृत्ती या सगळ्याच बाबतीत जीर्ण शीर्ण झालेल्या, भरकटलेल्या पक्ष आणि व्यक्तींकडून ही सत्ता खेचून घेऊन भारतीय जनतेने आपल्या सुजाणतेचा आणि सुबुद्धतेचा परिचय घडवला आहे. परंतु सुरुवातीला नमूद केलेल्या म्हणीप्रमाणे अवस्था होऊ नये याची भरपूर काळजी घ्यावी लागणार आहे. उत्साह आणि आनंद कधीकधी अंध बनवतो हे विसरता कामा नये.

हा इशारा देण्याचे कारण आहे सध्या सुरु असलेले अर्थकारण. आज प्रत्यक्ष अर्थकारणासोबतच त्यातील बारीकसारीक बाबींची चर्चादेखील होते. ही अतिशय चांगली आणि स्वागतार्ह बाब आहे. सामान्य माणूस जेवढा माहितीने परिपूर्ण, सजग, आस्थावान आणि परिपक्व राहील तेवढे चांगले. मुद्दा एवढाच की, ही माहिती- चर्चा- एकांगी नको. साधकबाधक हवी. साधकबाधक हा शब्द नेमका लक्षात ठेवायला हवा. विशिष्ट विचारांनी किंवा कृतीने काय साधता येईल आणि त्याने कशाला बाधा उत्पन्न होईल या दोन्हीवर लक्ष देण्याची आवश्यकता असते.

आज एक मुद्दा प्रकर्षाने मांडला जातो की, तुम्हाला सेवा हव्या असतील तर त्यासाठी पैसा मोजावा लागेल. हा मुद्दा मांडताना, ऐकताना फार चांगला आणि तर्कशुद्ध वाटतो. परंतु त्याचे परिणाम काय होऊ शकतील आणि मुळात तो सिद्धांत म्हणून बरोबर आहे का? ही भाषा ही भांडवलशाहीची भाषा आहे. प्रत्येक गोष्टीचे वस्तूकरण, वस्तूंचे किंमतीकरण ही भांडवलशाहीची रीत आहे. यात भावना, विचार, नाती, प्रतिभा, ईश्वर यांचेही वस्तूकरण होते. ही विकृती व्यवहारात काय रूप घेऊ शकते याकडे संकेत करणारी एक बातमी आजच वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली आहे. व्हेनेझुएला देशातील कराकस येथे असलेल्या विमानतळावर शुद्ध हवेत श्वास घेण्यासाठी २० डॉलर्स म्हणजे १२०० रुपये एवढा कर आकारला जातो आहे. उद्या आपण आपल्या घराच्या गच्चीवर उभे राहून मोकळ्या हवेचा आनंद घेत असू तर त्यावर कर वा शुल्क लागणार नाही कशावरून? पैसा मिळवणे एवढाच उद्देश झाल्यानंतर शोधायचे असते फक्त निमित्त.

भांडवलशाहीच्या अशा अनेक गोष्टींनी, मूल्यांनी, सिद्धांतांनी जगात सध्या उच्छाद मांडला आहे. त्यावर जगभर सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. त्याचा त्रास आणि उपसर्ग सगळ्या जगाला डंख मारतो आहे. यावर काहीही उपाय नाही अशा विचाराने जग हतबुद्ध झालेले पाहायला मिळत आहे. या सगळ्याची वर्णने आज विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर रशिया आणि अमेरिका अशा दोन शक्ती जगात कार्यरत होत्या. परंतु १९८६ साली रशियातील मार्क्सवादाच्या पतनानंतर भांडवलशाहीला वैचारिक आणि व्यावहारिक टक्कर देणारी कोणतीही शक्ती जगात उरली नाही. मार्क्सवाद त्याच्या अंगभूत कमजोरीमुळे कोसळणार होताच. महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर, गोळवलकर गुरुजी, दीनदयाळ उपाध्याय यांच्यासारख्या चिंतकांनी त्याचे सखोल विश्लेषण करून त्याबाबत इशाराही दिला होता. रशियापाठोपाठ चीन आणि अन्य कम्युनिस्ट देशांनीही मार्क्सवाद टाकून दिला. यामुळे जगभर निर्माण झालेली पोकळी भांडवलशाहीने व्यापून टाकली. आज या भांडवलशाहीची चलती आहे. परंतु या भांडवलशाहीने समस्या सोडविण्याऐवजी समस्या वाढवूनच ठेवल्या. या भांडवलशाहीने वाढवून ठेवलेल्या काही समस्या अशा-
१) आर्थिक, प्रादेशिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक असमतोल.
२) असंख्य स्तरांवरील असंतोष.
३) असंख्य स्तरांवरील संघर्ष.
४) असंख्य प्रकारचे तणाव.
५) विविध रोग आणि प्रकृतींच्या तक्रारी.
६) भावनिक एकारलेपण, भावनिक रिक्तता, भकासपणा.
७) प्रदूषण, पर्यावरणाचा विनाश.
८) मानवातील पशुत्वाची वाढ.
९) विचारशून्यता, मूल्यविहीनता, विवेकहीनता.
१०) सुखशांतीच्या अभावात भरघोस वाढ.
ही यादी बरीच वाढवता येईल. या सगळ्यांच्या परिणामी भांडवलशाही देखील कोसळणार हे सांगायला कोणा भविष्यवेत्त्याची गरज नाही. फक्त याची अधिकृत घोषणा कधी होईल एवढाच भाग आहे. महत्वाचा प्रश्न आहे पुढे काय? मानवी समाजाची पुढील वाटचाल कशी राहील? मार्क्सवाद आणि भांडवलशाही लयाला गेल्यानंतर मानव जातीपुढील तिसरा पर्याय कोणता?

सामान्य माणसांचा समाज हाच त्या तिसऱ्या पर्यायाचा आधार राहील. पण समाज म्हणजे काय? आज जे चित्र जगभरात पाहायला मिळते तशा समाजातून मात्र हा तिसरा पर्याय विकसित होऊ शकणार नाही. काय आहे आजचे चित्र? शुद्ध हवेसाठी करआकारणी करणाऱ्या ज्या वृत्ताचा उल्लेख सुरुवातीला केला आहे. त्याच बातमीत आजच्या समाजाचेही चित्र आहे. या करावर तेथील जनतेत काय प्रतिक्रिया आहे हे सांगताना बातमीत म्हटले आहे की, सोशल मीडियात या कराविषयी नाराजी व्यक्त करण्यात येत असून त्याची थट्टामस्करीही करण्यात येत आहे. एक मासलेवाईक प्रतिक्रियाही बातमीत देण्यात आली आहे ती अशी- `विमानतळाच्या खिडक्या फुटलेल्या आहेत, शौचालयांमध्ये पाणी नाही, कुत्र्यांचा मुक्त वावर आहे पण काहीही नसले तरीही येथे ओझोन मात्र आहे.' ही प्रतिक्रिया भारतातील नाही, व्हेनेझुएला येथील आहे हे आवर्जून लक्षात ठेवायला हवे.

व्हेनेझुएलाची लोकसंख्या सुमारे तीन कोटी आहे. प्रति चौरस किलोमीटरमध्ये फक्त ७७ लोक राहतात आणि त्यांचा वार्षिक उत्पन्न दर प्रति माणशी सुमारे १२ हजार अमेरिकन डॉलर एवढा आहे. भारताची लोकसंख्या १२५ कोटी आहे. येथे प्रति चौरस किलोमीटरमध्ये ३७८ लोक राहतात आणि येथील वार्षिक उत्पन्न दर प्रति माणशी सुमारे १६०० अमेरिकन डॉलर एवढा आहे. म्हणजेच भांडवलशाहीच्या आणि वर्तमान अर्थशास्त्राच्या भाषेत तो विकसित देश आहे आणि त्याचे आर्थिक मापदंड आदर्श आहेत. तरीही तेथे व्यक्त झालेली प्रातिनिधिक प्रतिक्रिया ही भारताचीही प्रातिनिधिक प्रतिक्रिया होऊ शकेल अशी आहे. भांडवलशाहीचे दारूण अपयश आणि जगभरातील समाज नावाची गोष्ट किती रसातळाला गेली आहे याचे ते निदर्शक आहे. बेजबाबदार, भरकटलेला, उद्दिष्टहीन, सगळ्या गोष्टींसाठी सरकारच्या तोंडाकडे पाहणारा, स्वत:वर कोणतीही जबाबदारी न घेणारा, खा- प्या- मजा करा- यातच मश्गुल, मला काय त्याचे ही मानसिकता, कोणतीही गोष्ट करण्यासाठी पुढे होण्यापेक्षा त्यावर वांझ टवाळकी करणारा, विचारहीन अशा माणसांचे विशाल समूह हीच आज जगभरातील समाजाची स्थिती आहे. या समाजातून मानवी कल्याणाचा तिसरा पर्याय विकसित होऊ शकत नाही.

मार्क्सवादाचे खरे स्वरूप समजावून सांगण्याच्या संदर्भात ज्या महानुभवांचा वर उल्लेख केला आहे, त्यांनीच भांडवलशाहीच्या परिणामांची चिकित्साही केली आहे आणि भाकीतही. त्यासोबतच तिसऱ्या पर्यायाचे मार्गदर्शनही केले आहे. त्यांच्याशिवाय योगी अरविंद, भारताचे राष्ट्रपती राहिलेले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, दत्तोपंत ठेंगडी यांचीही नावे त्यात जोडता येतील. दत्तोपंत ठेंगडी यांचे आर्थिक, सामाजिक, प्रशासकीय, कायदेविषयक आदी अनेक बाबींची चर्चा करणारे एक पुस्तक आहे- त्याचे नावच आहे Third Way - तिसरा मार्ग. दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेला एकात्म मानववाद याच तिसऱ्या मार्गाचे विवरण करणारा आहे. गांधीजींचा सर्वोदय याच तिसऱ्या पर्यायाचे वेगळे नाव आहे.

कोणता आहे हा तिसरा पर्याय? तो संपूर्ण स्वतंत्र विषय आहे. या ठिकाणी एक मात्र नमूद करणे आवश्यक आहे की, भारतीय जनता पार्टी; तिसरा पर्याय सांगणाऱ्या महानुभवांचा वारसा सांगत असली तरीही तिच्या आर्थिक चिंतनात- ध्येय धोरणात- त्याला स्थान राहिलेले नाही. याची तीन कारणे आहेत- १) मुळात त्या तिसऱ्या मार्गाबद्दल अविश्वास, अनादर आणि अनास्था. २) आजची देशांतर्गत आणि जागतिक परिस्थिती. ३) समाजाची मानसिकता. या तीन कारणांमुळे ज्यांना तिसरा पर्याय योग्य वाटतो तेदेखील काहीही करू शकत नाहीत. ही तिन्ही कारणे दूर केल्याशिवाय सध्याच्या स्थितीतून मार्ग निघणार नाही. ही तीन कारणे ३, २, १ या क्रमाने दूर करावी लागतील. म्हणजेच सगळ्यात पहिले समाजाची मानसिकता ठीकठाक करावी लागेल. ती मानसिकता पुढील इष्ट बदलांना चालना देईल. म्हणूनच भारतीय जनता पार्टीचे राज्य आल्याचा विविध कारणांनी आनंद झालेल्या लोकांनी या तिसऱ्या मार्गाचा अभ्यास, चिंतन केले पाहिजे. तो मार्ग संपूर्ण समाजापुढे ठेवला पाहिजे. त्यासाठी योग्य वातावरण, साधकबाधक विचार समाजात सुरु व्हायला हवा. केवळ `आपला तो बाब्या' या स्वाभाविक वृत्तीने भाजपच्या हाताला हात लावून मम म्हणून चालणार नाही.

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, १३ जुलै २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा