शनिवार, ३१ जानेवारी, २०१५

गांधीजींची पुन्हा हत्या नको...

आज महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. शहीद दिन म्हणूनही हा दिवस ओळखला जातो. गांधी हत्या, नाथुराम गोडसे, गोपाळ गोडसे, त्या घटनेचा इतिहास, सत्य, अहिंसा, स्वच्छता; या विषयांची या निमित्ताने प्रसार माध्यमात चर्चा होते. ती स्वाभाविक आहे. परंतु गांधीजी हे अनेक पैलू असलेलं व्यक्तिमत्व होतं. त्यातील बोटावर मोजण्याएवढ्या पैलूंची चर्चा होते, बाकी अस्पर्शित राहतात. असाच एक पैलू म्हणजे इतिहास. अलीकडे भारताचा इतिहास, भारतीय समाजाची विविध क्षेत्रातील हजारो वर्षांची साधना, प्रगती या गोष्टींचीही चर्चा होऊ लागली आहे. त्याची टवाळीही होत असते. पण गांधीजींना याबद्दल काय वाटत होते? दोन उदाहरणे याबाबत उल्लेखनीय ठरावीत.

राष्ट्रीय शिक्षण देता यावे यासाठी गांधीजींनी १९२० साली गुजरात विद्यापीठाची स्थापना केली. त्यावेळी अभ्यासक्रमाची तयारी करताना प्रश्न आला की, आजचा इतिहास तर इंग्रजांनी लिहिलेला इतिहास आहे. तो चुकीचा आहे. मग काय करायचे? तेव्हा मगनलाल प्रभुदास देसाई या इतिहास शिक्षकाने दोन वर्षे संशोधन करून भारताचा २०० वर्षांचा इतिहास लिहिला. प्रयत्नपूर्वक, अभ्यासपूर्वक त्यांनी लिहिलेल्या इतिहासाच्या त्या पुस्तकाचे शीर्षक होते- `भारत मा अंग्रेजोने वेपारशाही' (भारतातील इंग्रजांची व्यापारशाही- जसे लोकशाही, राजेशाही, हुकुमशाही तसे व्यापारशाही).

दुसरे उदाहरण आहे प्रो. धरमपाल यांचे. प्रो. धरमपाल हे अतिशय ज्येष्ठ गांधीवादी. अखेरच्या दिवसात त्यांचा निवास गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमातच होता. गांधीजींच्या कार्यात ते त्यांच्यासोबत प्रदीर्घ काळ होते. १९३१ साली इंग्लंडमध्ये गोलमेज परिषद झाली. त्यावेळी चर्चेच्या ओघात गांधीजी इंग्रजांना उद्देशून एकदा म्हणाले की, `आमची भारतीय शिक्षण पद्धती तुमच्यापेक्षा अधिक चांगली, व्यापक आणि श्रेष्ठ होती.' त्यावर इंग्रज तज्ञांनी त्यांना पुरावे मागितले. (अगदी आजचे आमचे तथाकथित विद्वान मागतात तसे.) गांधीजी म्हणाले- `माझ्याकडे पुरावे नाहीत. त्यामुळे मी तुमचे समाधान करू शकणार नाही. पण मी म्हणतो ते सत्य आहे.' या उत्तरावरून गांधीजींची मस्करी करण्यात आली, टर उडवण्यात आली. १९४७ साली देश स्वतंत्र झाल्यानंतर गांधीजींचे अनेक अनुयायी त्यांच्याकडे पुढील मार्गदर्शन घेण्यासाठी गेले. त्यात प्रो. धरमपाल हेही होते. ते गांधीजींना म्हणाले- `आता देश स्वतंत्र झाला आहे. आता मी काय करावे? माझ्यासाठी तुमची काय आज्ञा आहे?' त्या क्षणी गांधीजींच्या मनाच्या तळाशी रुतून बसलेला १९३१ सालचा त्यांचा उपहास वर आला आणि तो सारा प्रकार सांगून गांधीजी प्रो. धरमपाल यांना म्हणाले, तुम्ही प्राचीन भारतीय शिक्षण या विषयावर संशोधन करून माझ्या म्हणण्याची पुष्टी करता येते का पाहा.' त्यानंतर प्रो. धरमपाल यांनी त्या कामाला वाहून घेतले. सुमारे चार दशके त्यांनी अथक अभ्यास आणि संशोधन केले. त्यापैकी बहुतांश काळ ते विदेशात देखील होते. ब्रिटीश पार्लमेंटच्या ग्रंथालयात बसून, हजारो कागदपत्रांचे सखोल संशोधन करून त्यांनी प्राचीन भारतीय शिक्षणाचा इतिहास सिद्ध केला. The Beautiful Tree शीर्षकाने त्यांचे हे संशोधन पुस्तकरूपाने प्रसिद्ध आहे. भारतीय शिक्षण व्यवस्थेसोबतच भारतीय ज्ञानविज्ञान, भारतीय संशोधने, भारतीय समाजव्यवस्था, आणि हे सारे उद्ध्वस्त करण्याची कारस्थाने अन डावपेच या साऱ्याचेही वस्तुनिष्ठ संशोधनात्मक लेखन त्यांनी केले. अनेक खंडात त्यांचे हे संशोधन उपलब्ध आहे.

आज जेव्हा इतिहास पुनर्लेखनाचा विषय येतो, भारतातील प्राचीन ज्ञानविज्ञान, भारतातील प्राचीन संशोधने, प्राचीन भारतीय व्यवस्था यांचा विषय येतो तेव्हा तथाकथित विद्वान आणि अभ्यासक जी कोल्हेकुई करतात; त्या पार्श्वभूमीवर गांधीजींची त्या संदर्भातील भूमिका आणि दृष्टीकोन महत्वाचा ठरतो. गांधीजींच्या हत्येची चर्चा करतानाच त्यांच्या या पैलूकडे दुर्लक्ष केले, त्याकडे जाणूनबुजून कानाडोळा केला तर ती त्यांची वैचारिक हत्याच ठरेल. एका नाथुराम गोडसेने गांधीजींची हत्या केली, त्याने फक्त एक शरीर संपले. पण त्यांच्या वैचारिक हत्येचे परिणाम अधिक व्यापक आहेत. नाथुराम गोडसे अपराधी होताच. त्याला शिक्षाही मिळाली. पण वैचारिक हत्येचे पातक करणाऱ्यांचा अपराध मोजून त्यांनाही शिक्षा व्हायला नको का?

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, ३० जानेवारी २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा