बुधवार, २९ एप्रिल, २०१५

समतेच्या नावानं चांगभलं

`समतेला माझा विरोध का?' या २२ एप्रिलच्या माझ्या लेखावर पुष्कळ वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. या प्रतिक्रियांमुळे माझी भूमिका स्पष्ट करण्याची पुन्हा संधी मिळाली. त्यासाठी प्रतिक्रिया देणाऱ्यांचे आभार. जी टीका करण्यात आली वा आक्षेप नोंदवण्यात आले त्यातील तीन प्रमुख आहेत. १) समता व समानता या दोन भिन्न बाबी आहेत. २) विकासासाठी संधींची समानता आवश्यक. ३) निसर्गदत्त विषमता आणि मानवनिर्मित विषमता यांची तुलना अयोग्य आहे.

या तिन्हीतील कुठलाच मुद्दा नवीन नाही. वरवर पाहता बिनतोडही आहे. मात्र थोडा खोलवर विचार केला तर त्यातील फोलपणा लक्षात येईल. समता आणि समानता या दोन भिन्न बाबी आहेत हे म्हणणे ठीक, पण त्यातील नेमका फरक सांगणे अवघड आहे. समता ही मनातील एक उच्च भावना आहे, पण त्याचे व्यवहारातील रूप कसे असेल? प्रेम ही जशी लक्षणांवरून जाणावयाची गोष्ट आहे, तशीच समता ही लक्षणांवरून जाणावयाची बाब आहे. अन ही लक्षणे समानतेच्या अधिकाधिक जवळ जाणारीच असावी लागतील. समुद्र आणि त्याच्या लाटा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत पण स्वतंत्र नाहीत. त्या अन्योन्याश्रयी आहेत. समुद्राशिवाय लाटा नाहीत आणि लाटांशिवाय समुद्र नाही. त्या केवळ भिन्न अवस्था आहेत. तसेच समता आणि समानता यांचे आहे. मनातील समता व्यवहारात येताना समानतेच्या रूपानेच येऊ शकते.

याच्याशीच संबंधित मुद्दा म्हणजे, निसर्गदत्त विषमता आणि मानवनिर्मित विषमता. निसर्गदत्त विषमता कोणीही नाकारत नाही. नाकारू शकत नाही. पण मानवनिर्मित विषमता मोडून काढण्याची चर्चा होते. प्रश्न असा आहे की, ही मानवनिर्मित विषमता येते कोठून? तिचे मूळ कोठे आहे? तिचे मूळ निसर्गदत्त विषमतेतच आहे याचा विसर पडतो. एखादी व्यक्ती स्वार्थी वा दुष्ट असते आणि ती शोषण, हिंसा वा अन्य तशा प्रकारच्या गोष्टी करते. पण स्वार्थी अथवा नि:स्वार्थी, दुष्ट अथवा सुष्ट हे भेद, ही विषमता निसर्गदत्त नाही का? निसर्गदत्त विषमता ही रूप, गुण, बुद्धी, परिस्थिती, वृत्ती, स्वभाव; अशा सगळ्याच प्रकारची असते. मानवी विषमता त्यातूनच जन्मास येते. अन ही निसर्गदत्त विषमता मिटवण्याचा रामबाण उपाय आज तरी माणसाकडे नाही. दुष्टाला सुष्ट करण्याची काय प्रक्रिया आहे? शिक्षण, संस्कार, विपश्यना वगैरे सारख्या पद्धती खरेच या जगातील सगळी कटुता, कृपणता, क्रूरता वगैरे घालवू शकतात? बरे आज एक कोटी दुष्टांना सुष्ट केले तरी उद्या तसेच तयार होतीलच ना? रोज लाखो बालके स्वत:चा पिंड घेऊन जन्माला येत असतात. शिवाय जगात घडणाऱ्या घटनांच्या क्रियाप्रतिक्रियातून माणसांचे वर्तन, विचार घडत, बिघडत असतात. पैसा, साधने, तंत्रज्ञान, माणसे यांचे कमीअधिक प्रवाह गरजेनुसार वाहत असतात. तेव्हा निसर्गदत्त विषमता आणि मानवनिर्मित विषमता या दोन गोष्टी नसून, एकीतूनच दुसरी जन्म घेते, हे समजून घेणे गरजेचे आहे.

तिसरा मुद्दा आहे- विकासासाठी संधींची समानता. हा तर फारच तकलादू आहे. यातून जंगलचा न्यायच उत्पन्न होण्याची शक्यता आहे आणि आज तेच पाहायला मिळत आहे. गॅट किंवा डंकेल प्रस्ताव आणि संपूर्ण जागतिकीकरणाची प्रक्रिया याच युक्तिवादावर आधारित होती. आज मात्र विपरीत चित्रच पाहायला मिळते. अगदी साधी गोष्ट आहे- रिलायन्स आणि खेडेगावातील एखादा दरिद्री शेतकरी यांना समान संधी आहे. पण रिलायन्स भाजी विकण्याचा दरिद्री शेतकऱ्याचा व्यवसाय करू शकते, पण दरिद्री शेतकरी रिलायन्स उभे नाही करू शकत. उलट यातून विनाश होतो तो दरिद्री शेतकऱ्याचाच. कायदे वगैरेची चर्चा न केलेलीच बरी. न्याय मागण्याची समान संधी असतानाही आज त्या संदर्भात काय स्थिती आहे? खरे तर सत्ता गाजवणे, कोणापेक्षा तरी वरचढ होणे, जग मुठीत बाळगणे, सर्वशक्तिमान होणे, वगैरे वगैरे असंख्य नावांनी मानवाच्या मनात अंगभूत असलेल्या काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षडरीपुंचा पुरता बंदोबस्त होईपर्यंत संधींच्या समानतेतून चांगलेच उत्पन्न होईल ही आशा करणे भाबडेपणाचे आहे. देण्यात आलेली संधी प्रत्येक जण उदार, विशाल मनाने आणि सद्वृत्तीने वापरेल याचा काय भरवसा? उलट तसे न होण्याचीच शक्यता अधिक. संधी मिळायचा अवकाश की मनातील स्वार्थ, सत्तालालसा उफाळून आल्याच म्हणून समजा. मुख्य म्हणजे स्वत: पुढे जाण्यासाठी दुसऱ्याला मागे ढकलणे, दुसऱ्याचे पाय खेचणे किंवा दुसऱ्याचे अहित करणे यात काय वावगे आहे, या प्रश्नाला समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत संधींची समानता काय आणि किती साध्य करू शकेल?

मग उपाय काय? उपाय आहे- माणसापुढे जगण्याचे व्यापक प्रयोजन ठेवणे. जगणे म्हणजे पैसा, वस्तू, साधने यांचा संग्रह वाढवीत जाणे नाही आणि जगणे म्हणजे जगवणे, ही व्यापक दृष्टी रुजवीत जाण्याची नितांत गरज आहे. मला पुढे जायचे आहे, मला अमुक मिळवायचे आहे, याच्यावर मात करायची आहे, त्याच्यावर मात करायची आहे (याच्यावर, त्याच्यावरमध्ये निसर्गही आला), याच्यापेक्षा श्रेष्ठ व्हायचे आहे वगैरे चुकीची प्रयोजने काढून टाकण्याची गरज आहे. संपूर्ण जीवनदृष्टीच बदलावी लागेल. ही जीवनदृष्टी बदलली की समता वगैरे आपोआपच साध्य होईल आणि मानव त्याहूनही खूप पुढे निघून जाईल. समतेसाठी आटापिटा करून ती साध्य होणार नाही आणि विपरीत परिणाम करेल. कारण माणसाच्या मनात आमुलाग्र बदल करण्याची, त्याच्या मनात उच्चतर भावांची प्रेरणा देण्याची शक्ती त्यात नाही. उच्चतर आदर्शांच्या साधनेने, रुजवणुकीनेच काही तरी मार्ग निघू शकेल. अर्थात- संपूर्ण गीता सांगितल्यावरही तुझा निर्णय तू घे असे सांगणाऱ्या पार्थसारथ्याची परंपरा मी सांगतो. त्यामुळे माझे म्हणणे पटलेच पाहिजे हा आग्रह नाही. प्रत्येकाचा आपापला विचार असावा.

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, २९ एप्रिल २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा