बुधवार, १३ ऑक्टोबर, २०२१

वैचारिक ओकाऱ्या

एका मित्राशी जरा वादावादी झाली. मग त्याने एका महान संपादकाने लिहिलेल्या लेखाची लिंक पाठवली. मी असल्या लिंक वगैरे वाचत नाही असा त्याला परतीचा संदेश दिला. तो लेख मी आधीच वाचलेला होता. त्यात त्या संपादकाने मांडणी केली आहे की, देशभरात सगळीकडे भाजपला सत्ता मिळवून देण्याचे रा.स्व. संघाने ठरवले आहे. त्यानंतर त्यांचा पूर्ण अजेंडा राबवला जाईल. मी लिंक वाचत नाही असे म्हटल्याने मित्राची पंचाईत झाली. पण त्याला अपेक्षित हेच होते की- बोला यावर. संघ अन तुम्हीही म्हणता की, संघाला राजकारण करायचे नाही. आता बोला. आहे ना गंमत? आमच्या भागात एक म्हण आहे- `बाजारात तुरी, अन भट भटणीला मारी.' म्हणजे संघाची किंवा माझी भूमिका काय आहे हे गेलं उडत. त्याबद्दल कोणी विद्वान काही म्हणतात त्यावर बोला...!! यालाच म्हणतात- जाणूनबुजून असेल तर तमाशा, अजाणता असेल तर बावळटपणा.

तथाकथित स्वातंत्र्य, समता, लोकशाही, जागतिकीकरण, ज्ञानयुग, तंत्रज्ञान युग वगैरेंनी बाकी काय चांगलं- वाईट  केलं ते थोडं बाजूला ठेवू, पण या गोष्टींनी सगळ्याच गोष्टींचं बेसुमार सुमारीकरण केलं हे मात्र निर्विवाद. कोणीही उठावे अन काहीही करावे, कोणीही उठावे अन काहीही लिहावे, कोणीही उठावे अन काहीही बोलावे; कशाला काही धरबंद नाही. बरं जे करायचं, लिहायचं, बोलायचं ते तरी सुसंगत, विचारपूर्वक, `अभ्यासोनि प्रकटावे' असे असते का? नाव नको. आधी जसं संघाबद्दल उदाहरण दिलं तशी उदाहरणं कुठेही पाहायला मिळतात. धर्म, देव, धार्मिकता, शास्त्र, रूढी, लोकाचार, समजुती, परंपरा, तत्वज्ञान यांच्याही बाबतीत. म्हणजे मोठ्याने कर्णकर्कश्श भोंगे कोणी वाजवतात म्हणून देव धर्म वाईट. का बुवा? ते नाही विचारायचं. एखाद्या कुठल्या देवदेवतेच्या आख्यायिका वगैरे थेट उपनिषदांच्या एखाद्या सिद्धांताशी झुंजवायच्या. का? आम्हाला वाटते म्हणून.

राजकारण, समाजकारण, चळवळी यातही तेच. आज हिंदुत्वाची शक्ती वाढली आहे. त्यामुळे अनेक हौशे, नवशे, गवशे स्वत:ला हिंदुत्वाचे खंदे पुरस्कर्ते म्हणवून घेतात. आपापल्या ठिकाणी ते त्यांना वाटेल ते करतात. अन सगळे तोंडसुख येते हिंदुत्वाच्या वाट्याला. यात केवळ समाजोपयोगी वा समाजविघातक एवढाच भेद असतो असे नाही. काही प्रामाणिक मतभेद सुद्धा असू शकतात. पण लगेच कावकाव सुरु होते- ते असे म्हणतात, ते तसे म्हणतात. अगदी स्वातंत्र्य चळवळीत किंवा ज्यांना आपण आदर्श म्हणतो अशा नेत्यांमध्येही मतभेद राहत होतेच ना? कॉंग्रेसमध्येही हिंदुत्ववादी होतेच. महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्यातच नव्हे तर गांधीजी व रवींद्रनाथ टागोर यांच्यातही मोठे मतभेद होते. डॉ. आंबेडकरांना मानणाऱ्या रिपब्लिकन विचारांचे किती गट आहेत? किंवा कम्युनिस्ट विचारधारा किती धारांनी वाहते? पण त्यावर प्रश्न उपस्थित होत नाहीत. त्या चळवळी वा विचारधारा मानणाऱ्या व्यक्तींची कृत्ये त्यांच्या तत्वज्ञानाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यासाठी वापरली जात नाहीत. हिंदुत्व मात्र या साऱ्याला अपवाद.

सध्या साहित्यिक राजीनामे प्रकरण सुरु आहे. साहित्य आणि समाज यांचा खरंच कसा आणि किती संबंध असतो, यावर किती जण सखोल विचार करतात. साहित्याने जग बदलता आलं असतं तर आजवर काय कमी साहित्य निर्माण झालं आहे? असा प्रश्न समोर आला की दुसरे कुणी उठतात, अन साहित्य वगैरे झूठ आहे असा सूर आळवतात. साहित्याची अतिरेकी भलावण आणि साहित्य झूठ अशा भूमिका घेणारे दोघेही सारखेच उथळ आणि पोकळ. तेच सरकार आणि समाज यांच्या बाबतीत. एक तर सरकार सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार किंवा सरकार ही निरर्थक गोष्ट आहे. बस, दोनच भूमिका अन त्यांचे अभिनिवेश. घरात तरी आई वडिलांचे मुलांवर पूर्ण नियंत्रण असते का? म्हणजे काय त्यांचे काहीच नियंत्रण नसते?

मुळातच या जगातील बहुतेक सगळ्या गोष्टी multifaceted, multidimensional असतात. त्यातील जेवढे आपल्या शरीर-मन-बुद्धीच्या आवाक्यात आले ते लगेच त्रिकालाबाधित सिद्धांताच्या रुपात बाहेर टाकण्याची सवड आणि सोय सध्याच्या जीवन रचनेने आणि तंत्रज्ञानाने करून दिलेली आहेच. वरून या multifaceted, multidimensional जगातील असंख्य गोष्टी प्रत्येकाच्या मन-बुद्धीत इच्छेने वा अनिच्छेने कोंबत राहणारी प्रक्रिया आणि व्यवस्थाही आहेच. मग रोज अजीर्ण होईपर्यंत, प्रकृतीला झेपेल न झेपेल याकडे लक्ष न देता वेगवेगळी माहिती, मते इत्यादी कोंबत राहायचे. ते पचणे शक्यच नसते. कारण त्यासाठी मूळ पचनशक्ती आणि अवकाश लागतो. त्या दोन्हीचा अभाव. त्यामुळे जिकडे तिकडे बेसुमार वैचारिक, बौद्धिक, मानसिक, संकल्पनात्मक ओकाऱ्या. याच ओकाऱ्या कधी फेसबुकवरील चर्चा, कधी व्होट्स अॅपवरील पोस्ट, दूरचित्रवाणीवरील बडबडी, चित्रपट, कथा, कादंबऱ्या, घराघरातील चर्चा-वादविवाद, चहाटपरी वा पानठेल्यावरील गप्पा यातून सांडत राहतात. याची कारणे काय वगैरे चर्चा करता येतील. पण बेसुमार सुमारीकरण याच्या मुळाशी आहे हे खरे.

पुढील काळ कसा राहील? कुणास ठाऊक?

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, १४ ऑक्टोबर २०१५

रविवार, १० ऑक्टोबर, २०२१

नेता ऐसा मिळे अम्हाला...

केंद्र सरकारच्या एका ग्रामविकास योजनेचं उद्घाटन आज नवी दिल्लीतील विज्ञान भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. राजकारण, राजकीय नेते, सत्ताकारण यावर मतप्रदर्शन करण्याचं मी नेहमीच टाळतो. पण आजचा कार्यक्रम, त्यातील पंतप्रधानांचे भाषण, त्यातून पुढे आलेली योजना आणि त्यामागची दृष्टी याचं अभिनंदन केल्याशिवाय राहवत नाही. सध्या महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे आणि त्या निमित्ताने खूप बरीवाईट चर्चा सुरु आहे. ती चर्चा करणाऱ्यांनी आणि ज्यांना स्वत:चं, समाजाचं, देशाचं भलं व्हावं असं वाटतं त्या सगळ्यांनी तो कार्यक्रम, त्यातील भाषण जरूर ऐकावं. एकीकडे बारामतीची कुस्ती खेळतानाच दुसरीकडे देशाची, त्यातील ग्रामीण भागांची, समस्यांची, त्यावरील उपायांची, त्यातील खाचखळग्यांची अचूक जाण; प्रत्यक्ष कृतीसाठी दिशादर्शक कल्पना; प्रेरक भाषा; सर्वसमावेशकता; स्वत:चा वाटा उचलण्याचा संकल्प; अशा अनेक गोष्टी केवळ अर्धा तासात, समोर कागदाचा चिटोराही न ठेवता करणारे पंतप्रधान या देशाने पहिल्यांदाच पाहिले आहेत. एकीकडे प्रचाराचे दौरे आणि भाषणांची रणधुमाळी सुरु असतानाच, संपूर्ण देशाच्या ग्रामविकासाच्या संदर्भात मन-बुद्धीची एवढी तयारी आणि टीकेचा वर्षाव सुरु असतानाही मन-बुद्धीचा एवढा समतोल; या काही खायच्या गोष्टी नाहीत. एका संघगीताच्या काही ओळी सहजच ओठावर येतात-

धीरवृत्तीचा उंच हिमालय,

भीषणतेतही निर्भय निश्चल,

नेता ऐसा मिळे आम्हाला,

काय असे मग उणे,

यशाने दुमदुमवू त्रिभुवने...

आणि हे करण्यासाठी मुहूर्त लोकनायक जयप्रकाश नारायण आणि श्रद्धेय नानाजी देशमुख यांच्या जयंतीचा. स्वत:ला जयप्रकाशजींचे वारसदार म्हणवून घेणारे फक्त आणि फक्त मोदीविरोधात बुडून गेले असताना हा नेता त्यांना आदरांजली वाहण्यासाठी संपूर्ण देशापुढे, खासदारांपुढे देशाला पुढे नेण्याचा कृती कार्यक्रम ठेवतो- तोही `अरे हे तर सहज शक्य आहे' असं कोणाच्याही तोंडून निघावं अशा स्वरूपाचा. केवळ मोदी पंतप्रधान आहेत म्हणून केंद्र सरकारने देऊ केलेली मदत नाकारण्यात धन्यता मानणारे जेपीभक्त कुठे आणि अशी मदत नाकारणाऱ्यांनाही आपल्या योजनेत समाविष्ट करून घेण्याची मानसिकता कुठे?

देशाच्या ४०० जिल्ह्यात रात्रीचा मुक्काम करणारे मोदी कदाचित पहिलेच पंतप्रधान असतील. कुठे पाण्याची टाकी असते तर पाण्याचे नळ नसतात; तर कुठे नळ असतात तर पाण्याची टाकी नसते; ही आपल्या ग्रामविकासाची अवस्था माहीत असणारा आणि आपल्या भाषणात त्याचा उल्लेख करणारा हा नेता, स्वत:चे सोडून दुसरे गाव दत्तक घ्या- ही व्यावहारिक सूचना करायलाही विसरला नाही. आपण काही नवीन करीत आहोत असा आव न आणता अन्य लोक अशा प्रकारच्या ग्रामविकासासाठी जे प्रयत्न करीत आहेत त्याचाही उल्लेख करायला ते विसरले नाहीत. एवढेच नाही तर त्या प्रयत्नांची दृकश्राव्य ओळखही करून देण्यात आली. ही निधी देणारी योजना नसून, विकासाची नवीन दृष्टी विकसित करणारी योजना असल्याचे सांगतानाच- supply driven development ऐवजी demand driven development ची कल्पना अभ्यासक, कार्यकर्ते आणि विचारक यांच्यापुढे त्यांनी ठेवली.

आजच्या योजनेचे प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे सांगता येतील-

१) खासदाराने ग्रामीण भागात जावे.

२) ग्रामस्थांशी आपुलकीचे नाते जोडावे.

३) आपण काय सांगतो, त्याऐवजी लोक काय सांगतात ते ऐकावे.

४) आज्ञा देऊन कामे करण्यापेक्षा प्रेरणा देऊन कामे करण्याची पद्धत अवलंबावी.

५) छोट्याशा कामाला मोठ्ठा वळसा घालावा लागणारी पद्धत बदलून तिथल्या तिथे अनेक गोष्टी मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा.

६) आपणही एक गाव दत्तक घेणार असल्याची स्वत: पंतप्रधानांची भूमिका. (ही आजवर ऐकू न आलेली भाषा आहे.)

७) योजनेच्या यशासाठी प्रामाणिकता, कळकळ आणि भावना महत्वाची आहे यावर भर.

यादी आणखीनही करता येईल. मुख्य मुद्दा आहे- या जबाबदारीच्या, पुढाकार घेण्याच्या, झूल उतरवून काम करण्याच्या, कामाच्या बदल्यात कशाचीही अपेक्षा ठेवू नये हे स्पष्टपणे सांगण्याच्या, स्वत:चा वाटा उचलण्याच्या गोष्टी बोलणेही बंद झाले होते. जमिनीवरील पाय उचलले गेले होते. पंतप्रधान ज्या पद्धतीने काम करीत आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा जमिनीवर ठाम पाय रोवण्याची चर्चा सुरु झाली आहे. खरे तर या जगातील सगळ्याच गोष्टींच्या मुळाशी माणसाच्या (समाजाच्या) मनातील भावना आणि डोक्यातील विचार हेच असतात. प्रत्यक्ष कृती आणि त्याचा परिणाम या नंतरच्या गोष्टी आहेत. परंतु आजवर आपण भावना आणि विचार अडगळीत ढकलून सारे काही केवळ वरवर करीत राहिलो. भावना आणि विचारांना हात घालून आणि प्रवाहित करून कृतीला चालना द्यावी लागेल. पंतप्रधान तेच करीत आहेत. नेत्याने दुसरे करायचे तरी काय असते?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक राहिलेल्या भारतीय जनता पार्टीच्या पंतप्रधानांच्या आजच्या आवाहनाला सोनिया गांधी, राहुल गांधी, काँग्रेसचे अन्य खासदार, कम्युनिस्ट खासदार, अन्य समर्थक व विरोधक प्रतिसाद देतील? प्रत्यक्ष काही करून दाखवण्याची, प्रत्यक्ष समाजाचे भले करण्याची ही संधी खासदार उपयोगात आणतील? समाज पाहणार आहे, लोक पाहणार आहेत, जग पाहणार आहे. १०० खासदारांनी जरी हे करून दाखवले तरी पुरे. अन्य ७०० खासदारांच्या पाठीशी लागून जनताच त्यांना हे करायला भाग पाडेल. एकदा ही साखळी प्रक्रिया सुरु झाली की, राजकारणात तग धरण्यासाठी जमिनीवर राहून काम करण्याला पर्याय राहणार नाही.

- श्रीपाद कोठे

नागपूर

शनिवार, ११ ऑक्टोबर २०१४

गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०२१

Approach

approach

सध्या कुस्तीस्पर्धांची एक जाहिरात सुरु आहे. एक तरुण मांडीवर थाप मारून एका तरुणीला आव्हान देतो आणि ती तरुणी न घाबरता तशीच मांडीवर थाप देते आणि न बोलता पुढे जाते. तरुण खजील होऊन खाली मान घालतो. जाहिरातीतून जो संदेश दिला तो स्पृहणीय आहेच.

कालच राष्ट्र सेविका समितीच्या संस्थापिका मावशी केळकर यांच्या जीवनावर एक बोलपट लोकसभा टीव्हीवर पाहिला. काही गोष्टींची उजळणी झाली. सध्या सुरु असणाऱ्या कुस्ती स्पर्धांच्या जाहिरातीतून जो संदेश देण्यात येत आहे तोच संदेश घेऊन मावशी १९३६ साली उभ्या राहिल्या. पतीच्या निधनानंतर आणि नऊवारी पातळ नेसून. सगळ्या भारतभर तो संदेश पोहोचवला आणि त्यानुसार वागणाऱ्या, दंड खांद्यावर घेऊन थाटात संचलन करणाऱ्या हजारो सेविका देशाच्या कानाकोपऱ्यात उभ्या केल्या.

आमच्या घरासमोरच काही मोकळे प्लॉट होते. त्या मैदानावर समितीची शाखा लागत असे. माझ्या बहिणी इतर सेविकांसह ती शाखा सांभाळत. त्यावेळच्या नागपूरच्या काँग्रेस खासदाराच्या ताफ्यातील एक `दादा' आमच्या पलीकडील वस्तीत राहत असे. तो अनेकदा रस्त्याच्या कोपऱ्यावर येऊन उभा राहत असे. सुमारे चाळीसेक वर्षांपूर्वीची ही कहाणी. त्यावेळी नागपूर सुद्धा आजच्या सारखे नव्हते. आमची वस्ती नवीनच होती. रिक्षावाले अंधार पडला की यायला घाबरत. वस्तीच्या मुख्य चौकात रात्री एकटेदुकटे जाणे कठीण होते. तलवारी वगैरे केव्हा निघतील नेम नसे. रस्त्याच्या कोपऱ्यावर उभा राहणारा `दादा' तर मोठंच प्रस्थ होतं. पण समितीची शाखा. त्या सगळ्या मुलींची हिंमत, संघाची तगडी शाखा (आमची शाखा शंभरी शाखा होती), संघाची म्हणून जी खास कुटुंब होती त्यांचे परस्पर संबंध, या सगळ्यामुळे निर्माण झालेले वस्तीतील वातावरण यामुळे, कोपऱ्यावर उभे राहण्यापलीकडे त्या `दादाने'` काहीही केले नाही. तो करू शकला नाही. हे सांगण्याचे कारण म्हणजे मावशी केळकर यांनी सांगितलेला approach.

जाहिरातीतील संदेश आणि मावशी केळकर यांनी दिलेला संदेश एकच आहे. पण दोन्हीचा approach मात्र फार वेगळा आहे. तो फार समजावून सांगण्याची गरज नाही. दोन्ही approach चे परिणाम गुणवत्ता म्हणूनही खूप वेगळे. दोन्हीची उदाहरणे आज मोठ्या प्रमाणात आजूबाजूला सहज दिसणारी. शेवटी कोणाचाही कोणताही approach हा प्रेरणा आणि प्रयोजन यांनी आकार घेतो. मावशी केळकर यांचा approach आणि जाहिरातीचा approach यात हा फरक आहे. संदेश एक असला तरीही. समाजासमोर दोन्ही आहे. काय स्वीकारायचं हा समाजाचा प्रश्न आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

सोमवार, ८ ऑक्टोबर २०१८

बुधवार, ६ ऑक्टोबर, २०२१

निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने आज सार्वजनिक जागी आंदोलन करण्याविरुद्ध मत दिले. तो मोठा विषय होता त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात तो जाणे ठीक होते. पण आपण समाज म्हणून, व्यक्ती म्हणून सार्वजनिक वस्तू, वास्तू, वाहने कशी वापरतो? अगदी सार्वजनिक संडास सुद्धा लोक व्यवस्थित वापरत नाहीत. दार लावून धर्म उरकले पाहिजेत, स्वच्छता ठेवावी, पाण्याचा वापर नीट करावा; हेदेखील लोकांना कठीण वाटते. फेसबुकसारखी सार्वजनिक माध्यमे सुद्धा आपल्या बेजबाबदारपणाला अपवाद नाहीत. फेसबुक यादीतील मैत्री ही प्रत्यक्षातील मैत्रिपेक्षा निराळी असते. येथील ओळख निराळी असते. वय, अनुभव, ज्ञान, क्षमता, परिस्थिती, वृत्ती, विचार वेगळे असतात. त्यामुळे लिहिताना, व्यक्त होताना, प्रतिक्रिया देताना मर्यादा पाळाव्या, सभ्यता आणि संकेत पाळावे, भाषा नीट असावी; या कशाचेही भान ठेवण्याची गरज आम्हाला वाटत नाही. सुमार, उथळ, अविचारी, दांभिक, उच्छृंखल असंच पुष्कळ पाहायला, अनुभवायला मिळतं. आपण विश्वगुरु वगैरे होऊ तेव्हा होऊ, पण सध्यातरी आपण निर्लज्ज आणि निरर्थक समाजाकडे चाललो आहोत. ज्यांना याची खंत वाटते ते स्पष्ट आणि परखड बोलणे टाळतात हेही दुर्दैवाचे आहे.

- ७ ऑक्टोबर २०२०

बेजबाबदार

 बेजबाबदार

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत प्रदूषण इतकं वाढलं आहे की, येत्या २२ तारखेला `no car day' पाळण्याची तयारी सरकारने चालवली आहे. त्याला नायब राज्यपालांची परवानगीही मिळाली आहे. त्यावर एका बिझिनेस वाहिनीवर चर्चा झाली. बिझिनेस वाहिनी हे आवर्जून सांगण्याचे कारण म्हणजे, या विषयाचा थेट व्यवसायांशी असलेला संबंध. एक प्रकारे conflict of interest. असे असूनही हे विषय आता इतके महत्वाचे अन संवेदनशील होऊ लागले आहेत की त्याकडे दुर्लक्ष करणे कोणालाच शक्य नाही. तर या चर्चेत, नेहमीप्रमाणेच राजकीय नेतेही सहभागी झाले होते. कॉंग्रेसच्या रागिणी नायक या चर्चेत होत्या. त्यांनी सुरुवातीलाच एक भूमिका मांडली की, प्रदूषण दूर करण्याची जबाबदारी सरकारची आहे त्याची जबाबदारी लोकांवर टाकू नका. त्यांचे शब्द होते- dont shift the onus to peoples shoulder.

जी एक भयंकर मोठी चूक वर्षानुवर्षे चालत आलेली आहे, ती काल त्यांच्या मुखातून बाहेर पडली. आमचे एकूणच जगणे, त्यातील सुखदु:ख, त्रास अथवा सोयीसुविधा, समस्या वा त्या सोडवणे; या बाबी कोणत्याही एका घटकावर अवलंबून नसतात. त्याला अनेक पदर आणि अनेक कोन असतात. अनेकांची आपापली जबाबदारी असते. मात्र काहीही झाले की, सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याची अतिशय घातक सवय आपल्याला लागलेली आहे. `चाहे जो मजबुरी हो, हमारी मांगे पुरी करो' हाच आपला जीवनमंत्र झाला आहे. कोणत्याही गोष्टीची जबाबदारी स्वीकारायला आम्ही तयार नसतो. जबाबदारीविहीन जीवन आम्हाला हवे आहे. पण असे शक्य नसल्याने जबाबदारी ढकलायला सरकार ही एक चांगली गोष्ट आहे. काहीही झाले की सरकार काय करते? सरकार झोपले आहे का? असे प्रश्न विचारले की आमचे काम संपले.

पाश्चात्य सामाजिक विचारातील ही प्रचंड मोठी चूक आणि त्रुटी आहे. पण या पद्धतीने कोणतीही समस्या सुटणे हे मुळातच अशक्य असल्याने वाद, भांडणे आणि संघर्ष सुरु राहतात पण समस्या सुटत नाहीत. उलट समस्येच्या सोडवणुकीतून नवीन समस्या जन्माला येतात. सीसी कॅमेरे याचे उत्तम उदाहरण. चोऱ्या, दरोडे वगैरे होऊ नयेत यासाठी गेल्या काही वर्षात सीसी कॅमेरे आले. पण एकही दिवस असा जात नाही की, त्या कॅमेऱ्यात टिपलेला गुन्हा बातम्यात पाहायला मिळत नाही. समाजाने सुरक्षेसाठी पोलीस दल उभारले, पण पोलिसांवरील अत्याचार वा पोलिसांकडून होणारे अत्याचार; या रोजच्या बातम्या आहेत. सरकार ही गोष्ट सुद्धा चांगल्या सामाजिक व व्यक्तिगत जीवनासाठी निर्माण झाली. पण आज जी स्थिती त्या संबंधाने आहे त्याचे वेगळे वर्णन करण्याची गरज नाही. विद्यार्थांना शिक्षणासाठी पैसा मिळावा म्हणून बँकांनी कर्ज देणे सुरु केले. आज त्या कर्जातील पाच हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम बुडीत खाती आहे.

अक्षरश: असंख्य उदाहरणे देता येतील. एकांगी, बेजबाबदार विचारपद्धती, त्याला अनुसरून योजना, व्यवस्था अन विश्लेषणे; यांनी समस्या सुटत नाहीत. उलट त्यामुळे समस्यांचे डोंगर उभे होत राहतात. व्यक्तिगत जीवनातील एखाद्या क्षुल्लक घटनेपासून तर प्रदूषण वगैरेंसारख्या जगड्व्याळ समस्यांना अनेक पदर अन कोन असतात, अनेकांच्या अनेक जबाबदाऱ्या असतात. त्यातील प्रत्येकाने जबाबदारीने, विचारपूर्वक वागणे, विचार करणे आवश्यक असते. आम्हाला हे किमान मान्य तरी आहे का?

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, ७ ऑक्टोबर २०१५

स्वाभिमान आणि दृष्टिकोन

 स्वाभिमान आणि दृष्टीकोन

भारताच्या यशस्वी मंगळ मोहिमेची खिल्ली उडवणारे एक व्यंगचित्र न्यूयॉर्क टाईम्सने प्रसिद्ध केले. जगभरातील भारतीय समुदायाने त्यावर आक्षेप घेतल्यावर त्या वृत्तपत्राने माफीही मागितली. मात्र माफी मागितली म्हणजे वृत्ती आणि दृष्टी बदलते असे नाही. हे व्यंगचित्र काढणारी व्यक्ती सिंगापूरची आहे. काय होते त्या व्यंगचित्रात? कशावर भाष्य होते? भाष्य होते मंगळ मोहिमेला आलेल्या खर्चावर. पंतप्रधानांनी ज्या गोष्टीचा गौरवपूर्ण उल्लेख केला होता आणि समस्त भारतीयांना ज्याचा अभिमान वाटतो अशी ही बाब. हॉलीवूड चित्रपटापेक्षा कमी खर्चात पार पाडलेल्या या मोहिमेच्या खर्चाचा अर्थ, व्यंगचित्र काढणाऱ्या दीड शहाण्याने आणि ते प्रसिद्ध करणाऱ्या अति शहाण्यांनी, भारत दरिद्री आहे असा लावला. एक शेतकरी आपली गाय घेऊन दारावर उभा आहे आणि उच्चभू लोकांच्या क्लबमध्ये आत घेण्याची विनंती करतो आहे, असे त्यात दाखवले आहे. न्यूयॉर्क टाईम्सच्या या आचरटपणातून निर्माण झालेल्या मान-अपमानाच्या प्रश्नाचा योग्य निकाल त्यांच्या माफीने लागलेला आहे. परंतु या व्यंगचित्राने पुढे आणलेल्या इतर प्रश्नांचे काय? वास्तविक तेच या प्रकरणातील खरे प्रश्न असून आज जगाला भेडसावत आहेत. काय आहेत हे प्रश्न?

हे प्रश्न आहेत, जगण्यातील पैशाच्या भूमिकेचे. पैसा म्हणजेच जगणे की पैसा हे जगण्याचे साधन आहे? जी गोष्ट कमी खर्चात होते त्यासाठी अधिक पैसा खर्च करणे शहाणपणाचे की मूर्खपणाचे? कोणाजवळ किती पैसा आहे यावरून व्यक्तीचा, समाजाचा, देशाचा, संस्थेचा दर्जा उच्च किंवा नीच ठरवणे याला सभ्यपणा म्हणावे का? बुद्धिमत्ता, गुणसंपदा यांना काही अर्थ आहे की नाही? अमाप पैसा आहे एवढ्यासाठी निर्बुद्धतेचा गौरव करण्याची वृत्ती माणसाला भूषणावह समजायची का? ज्या मानवेतर सृष्टीवर माणसाचे जीवन अवलंबून आहे त्याबद्दल तिरस्कार, घृणा आणि कमीपणाची भावना मानवाला कमीपणा आणणारी नाही का?

संपूर्ण जगात या प्रश्नांची जी उत्तरे दिली जातील त्याच्या नेमके विरुद्ध भारताचे उत्तर असेल. उत्तरातील हा विरोध वृत्ती आणि विचारांचा परिणाम आहे. वृत्ती आणि विचारांचा हा विरोध आजचाच आहे असेही नाही. हा खूप जुना आहे. अमेरिका आज भारतेतर जगाच्या या दृष्टीची सगळ्यात सशक्त प्रतिनिधी आहे. सुमारे १२५ वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंद यांनी प्रत्यक्ष अमेरिकेतच या वृत्तीचे वाभाडे काढले होते. `डॉलरवर आधारित जीवनमूल्य, डॉलरवर आधारित समाजव्यवस्था, डॉलरवर आधारित विचारपद्धती' यावर प्रचंड कोरडे ओढून त्यांनी त्यातील त्रुटी आणि धोके दाखवून दिले होते. एवढेच नव्हे तर संपूर्ण जगासाठी यासंबंधातील भारतीय दृष्टीकोन कसा योग्य आहे याचेही विवेचन केले होते. आज त्यांनी दाखवलेल्या त्रुटी आणि धोके जगापुढे आ वासून उभे आहेत. जगातील बहुतेक सारेच संघर्ष आणि अशांती भारतेतर दृष्टीच्या स्वीकारामुळेच निर्माण झाले आहेत.

स्वामीजींनी भारताचा स्वाभिमान आणि दृष्टीकोन या दोहोंच्या प्रस्थापनेसाठी काम केले. आज स्वाभिमानाची प्रस्थापना झालेली आहे असा अनुभव येतो. न्यूयॉर्क टाईम्सच्या व्यंगचित्र प्रकरणाने हा अनुभव पुन्हा दिला आहे. दृष्टीकोनाची प्रस्थापना मात्र अजून बाकी आहे. खुद्द आम्ही भारतीय लोकही स्वभिमानापुरता विचार करीत असून, दृष्टीकोनाकडे दुर्लक्ष करीत आहोत अशी स्थिती आहे. `अर्थ' विषयातील भारतीय दृष्टीकोनाची प्रस्थापना हे आगामी काळातील आव्हान आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

मंगळवार, ७ ऑक्टोबर २०१४

पत्रकार कोण असतो?

 पत्रकार कोण असतो?

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना `देहाती औरत' म्हटल्याचा आणि त्यावेळी तेथे उपस्थित असलेली एन.डी.टीव्हीची पत्रकार बरखा दत्त चुपचाप मिठाई खात राहिली, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केला आणि त्यानंतर पुन्हा एकदा एका जुन्या प्रश्नावर नव्याने मंथन सुरु झाले आहे. तो प्रश्न आहे, `पत्रकाराची भूमिका काय असावी?'

`पत्रकाराची भूमिका काय असावी?' या प्रश्नावर `पत्रकार हा प्रथम पत्रकार असतो' असा एक जोरदार आणि जोमदार दावा केला जातो. तो पत्रकार असतो न्यायाधीश नसतो, त्यामुळे त्याने कोणता निवाडा करू नये. किंवा सगळ्या बाजू स्वच्छपणे समाजासमोर याव्यात म्हणून त्याने कोणतीही एक बाजू घेऊ नये, असे म्हटले जाते. पत्रकाराची निष्पक्षता हा त्याचा पहिला गुण समजला जातो. ते योग्यही आहे. ते त्याचे कर्तव्य आहे आणि तो त्याचा धर्मही आहे. असे असताना त्यावर चर्चा का होते?

मागे कारगिल युद्धाच्या वेळीही बरखा दत्त हिच्याच `ground report' वरून याच प्रश्नाची चर्चा झाली होती. मुंबई शहरावरील दहशतवादी हल्ल्यानंतरही अशीच चर्चा झाली होती. आपली इलेक्ट्रोनिक प्रसार माध्यमे जे अति उत्साही वार्तांकन दाखवित होती ते पाहून; पाकिस्तानातील अतिरेकी मुंबईतील आपल्या लोकांशी संवाद साधत होते. त्यावेळीही `देशभक्ती' की `व्यवसायधर्म' अशी चर्चा झडली होती.

या चर्चेत पत्रकाराची निष्पक्षता हा एक मुद्दा पुढे करून अनेक बाबींकडे डोळेझाक केली जाते. पहिला मुद्दा हा की, पत्रकारिता हा एक व्यवसाय आहे. त्यालाही अन्य व्यवसायांप्रमाणे काही मर्यादा आहेत आणि त्या तशा असायलाच हव्यात. व्यवसाय कोणताही असो- वैद्यकीय, अभियांत्रिकी, खानावळ, शिक्षण, धान्य, कपडे, सौंदर्यवृद्धी- त्याच्या परिणामांची जबाबदारी तो व्यवसाय करणाऱ्यांचीच असते. शिवाय या परिणामांचा विचार, ते परिणाम होण्याआधीच संबंधित व्यावसायिकाने करायला हवा. ज्या देशात तो व्यवसाय करतो त्या देशातील कायदे, नीतीनियम, सामाजिक मान्यता आणि सुरक्षा यांच्या मर्यादेतच त्याने व्यवसाय करायला हवा. तसे तो करत नसेल तर ते नियमबाह्य, घटनाबाह्य आणि अनैतिक असेच म्हणायला हवे. हाच नियम पत्रकारितेलाही लागू व्हायला हवा.

ही काही नवीन अपेक्षा आहे असेही नाही. सामाजिक उपद्रव होतो तेव्हा संबंधित समुदायांची नावे सांगू नयेत, लिहू नयेत किंवा त्यांचा नामोल्लेख करून चर्चा करू नये असे संकेत आहेत आणि ते बऱ्याच प्रमाणात पाळलेही जातात. बलात्कारित वा पिडीत मुलीची वा महिलेची ओळख जाहीर करू नये अशीही पद्धत पत्रकारितेत आहे. त्यामागे हीच जबाबदारीची भावना असते. मग जे सामाजिक बाबतीत केले जाते वा त्याबाबत जी विशिष्ट व्यवहाराची अपेक्षा केली जाते ती राष्ट्रीय सुरक्षेच्या व स्वाभिमानाच्या बाबतीत गैर का ठरावी? अगदी आजही हेच सुरु आहे. सध्या जम्मू-काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये पाक अतिरेक्यांनी घुसखोरी केलेली आहे. सुमारे दोन आठवड्यांपासून आपले बहाद्दर जवान त्यांचा बंदोबस्त करीत आहेत. आमचे दूरचित्रवाणीचे पत्रकार त्यांच्या मागेमागे कॅमेरा घेऊन धावत आहेत. कशासाठी हा तमाशा?

पत्रकारिता कशासाठी? `to entertain, educate and enlighten' हे पत्रकारितेचे ध्येय असल्याचे पत्रकारिता अभ्यासक्रमात शिकवले जाते. ते अतिशय योग्य आहे, पण म्हणून केव्हा, कोठे, किती आणि कशाचे याचे तारतम्य सोडून द्यायचे की काय? देशाच्या सीमांचे, देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचे, संरक्षण योजनांचे, लढाईचे वगैरे शिक्षण आणि माहिती द्यायची आहे तर द्या ना. कोण अडवतो? पण त्याची वेळ कोणती? युद्ध सुरु असताना? संघर्ष सुरु असताना? महत्वाच्या राजकीय वार्ता सुरु असताना? का? कोणत्या वेळेला कोणती माहिती दिली, कशा पद्धतीने दिली तर त्याचे काय आणि कसे परिणाम होतील? अमुक वेळेला अमुक गोष्टीची गरज आहे का? किती गरज आहे? कशाचाही विवेक, तारतम्य ठेवायला हवे की नाही? माहिती देणे, शिक्षण देणे, मनोरंजन करणे हे आमचे काम आहे म्हणून उद्या सेलीब्रिटीच्या अंतर्वस्त्रांचे ब्रांडस सांगाल. कशासाठी? ते नाही पोहोचले लोकांपर्यंत तर काही अडते का? माहिती वा बातमी पोहोचवताना त्याची गरज किती? त्याचे परिणाम काय? त्याची योग्य- अयोग्य वेळ यांचे भान सोडून देण्याचे काय कारण?

एखादी व्यक्ती पत्रकार असते, याचा अर्थ ती व्यक्ती पत्रकार म्हणूनच जन्माला येते वा मरतानाही पत्रकारच असते असे नाही. अगदी पत्रकार म्हणून काम करतानाही ती नेहमीच पत्रकार नसते. घरी, कुटुंबात, नोकरीत, खाजगी आयुष्यात ती पत्रकारितेचा मुखवटा काढूनही अनेकदा वावरत असते नव्हे ते आवश्यक असते. बातमीशी, घडामोडींशी त्या व्यक्तीची बांधिलकी असली पाहिजे, त्यासाठी कामाच्या वेळा वगैरे सबबी त्याने सांगायला नको. येथवर ठीक आहे. पण एखाद्या पत्रकाराच्या मुलाने काही चूक केली तर त्याचे प्राधान्य आपल्या मुलाच्या त्या चुकीची बातमी देण्याला राहील की त्याची चूक दुरुस्त करायला?

तपशिलाची ही चर्चा बरीच वाढवता येईल. मूळ मुद्दा हा आहे की, पत्रकारिता ही एखाद्याची भूमिका असते. ही भूमिका पार पाडताना त्याच्या बाकीच्या भूमिका अस्तंगत होऊ शकत नाहीत. इतरांप्रमाणेच पत्रकारही एकाच वेळी अनेक भूमिका निभावत असतो, नव्हे त्याने त्या निभावायला हव्यात. एखादा नट रंगमंचावर एखादी भूमिका समरस होऊन पार पाडीत असेल आणि त्याच वेळी समजा रंगमंचावर आग लागली तर त्याने काय भूमिकेतच वावरायचे की, कोणताही विचार न करता आग विझवायची? खलनायकाची भूमिका करणाऱ्यालाही घरी आल्यावर लक्षात ठेवावेच लागते की आपण पती आहोत, पिता आहोत, पुत्र आहोत वा मित्र आहोत. मग पत्रकारांनीच तेवढे आम्ही पत्रकार आहोतचा धोशा लावत राहण्यात काय अर्थ. तुम्ही पत्रकार आहात त्याच वेळी तुम्ही जबाबदार नागरिक आहात, देशभक्त आहात, समाजाचे एक घटक आहात, संवेदनशील माणूस आहात. एक भूमिका पार पाडताना अन्य भूमिका विसर्जित होत नसतात.

विशिष्ट संदर्भामुळे `राजधर्म' या शब्दाची खूप चर्चा होते. पण प्रत्येकच गोष्टीचा एक धर्म असतो हे ध्यानात ठेवले पाहिजे. पत्रकारितेचाही `पत्रकार धर्म' असतो. आणि या अर्थाने जेव्हा `धर्म' शब्द वापरला जातो त्याचा अर्थ कर्तव्य, जबाबदारी आणि हेतू (लक्ष्य) या तिन्हींच्या संमिश्रणातून होणारा विचारबोध आणि व्यवहारबोध असा होतो. पत्रकारांनी आणि पत्रकारितेनेही `पत्रकार धर्माचे' भान सतत ठेवले पाहिजे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

सोमवार, ७ ऑक्टोबर २०११