बुधवार, ६ ऑक्टोबर, २०२१

निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने आज सार्वजनिक जागी आंदोलन करण्याविरुद्ध मत दिले. तो मोठा विषय होता त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात तो जाणे ठीक होते. पण आपण समाज म्हणून, व्यक्ती म्हणून सार्वजनिक वस्तू, वास्तू, वाहने कशी वापरतो? अगदी सार्वजनिक संडास सुद्धा लोक व्यवस्थित वापरत नाहीत. दार लावून धर्म उरकले पाहिजेत, स्वच्छता ठेवावी, पाण्याचा वापर नीट करावा; हेदेखील लोकांना कठीण वाटते. फेसबुकसारखी सार्वजनिक माध्यमे सुद्धा आपल्या बेजबाबदारपणाला अपवाद नाहीत. फेसबुक यादीतील मैत्री ही प्रत्यक्षातील मैत्रिपेक्षा निराळी असते. येथील ओळख निराळी असते. वय, अनुभव, ज्ञान, क्षमता, परिस्थिती, वृत्ती, विचार वेगळे असतात. त्यामुळे लिहिताना, व्यक्त होताना, प्रतिक्रिया देताना मर्यादा पाळाव्या, सभ्यता आणि संकेत पाळावे, भाषा नीट असावी; या कशाचेही भान ठेवण्याची गरज आम्हाला वाटत नाही. सुमार, उथळ, अविचारी, दांभिक, उच्छृंखल असंच पुष्कळ पाहायला, अनुभवायला मिळतं. आपण विश्वगुरु वगैरे होऊ तेव्हा होऊ, पण सध्यातरी आपण निर्लज्ज आणि निरर्थक समाजाकडे चाललो आहोत. ज्यांना याची खंत वाटते ते स्पष्ट आणि परखड बोलणे टाळतात हेही दुर्दैवाचे आहे.

- ७ ऑक्टोबर २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा