सोमवार, १२ ऑक्टोबर, २०१५

कांगावखोर बौद्धिक दहशतवादाची नवीन खेळी

साहित्य अकादमीचे पुरस्कार परत करणाऱ्यांची संख्या डझनाचा आकडा ओलांडून पुढे गेली. तिघांनी साहित्य अकादमीचे राजीनामेही दिले. स्वाभाविकच चर्चाही सुरु झाल्या. या चर्चांमध्ये दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांची नावे स्वाभाविकच आलीत. अन्य दंगलींचाही उल्लेख झाला. एका मराठी वाहिनीवर संचालन करणाऱ्यांच्या उल्लेखातून २००२ च्या गुजरात दंगलींचा उल्लेख सुटला. तेव्हा अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेल्या एका व्यक्तीने ते लक्षात आणून दिले, एवढेच नव्हे तर आपण घाबरला आहात का? असा खोचक प्रश्नही केला. यातील हेतू कोणाच्याही सहज लक्षात येऊ शकतो. त्यावर संचालन करणाऱ्या व्यक्तीने आपण घाबरत नसल्याचे सांगून, २००२ चा उल्लेख आवर्जून अन जोरकसपणे केला. मला असल्या शहाण्यांची लाज वाटली अन मी टीव्ही बंद केला. आजवर या देशातील स्वनामधन्य विद्वान जे करत आले आहेत तेच अजूनही सुरु आहे. या देशात काय फक्त दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांचीच हत्या झाली? पंडित दीनदयाळ उपाध्याय अन डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी काय या देशातील नव्हते? नक्षलवादी नाव धारण करून डाव्या विचारसरणीचे गुंड या देशात रोज निष्पाप लोकांच्या हत्या करत नाहीत? पंजाबच्या मोगा शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर हल्ला करून दोन डझन स्वयंसेवकांना मारून टाकण्यात आले नव्हते? ईशान्य भारतात रा. स्व. संघ आणि अन्य समविचारी संघटनांच्या किती कार्यकर्त्यांच्या निर्मम हत्या झाल्या आहेत? त्या काय देशाबाहेरच्या आहेत? केरळमध्ये कम्युनिस्टांनी किती हत्या केल्या यावर तर खुद्द त्यांचेच नेते आता बोलायला लागले आहेत? अरे कांगावखोरांनो अन त्यांच्या समर्थकांनो, द्या- हवे तेवढे राजीनामे द्या; पण मी उल्लेख केलेल्या बाबींचा किमान उल्लेख तरी करा. तुम्ही तर गेली कित्येक दशके या लोकांना अन विचारांना पाल झटकावी तसे झटकत आला आहात. त्यांना अस्पृश्यांसारखी वागणूक देत आला आहात. त्यांचे उल्लेखही टाळत आला आहात. अन तरीही स्वत:च्या सहिष्णुतेची टिमकी वाजवताना लाज वाटत नाही?

अन कोणत्या तोंडाने करता आहात सहिष्णुतेच्या गप्पा? तो अधिकार तरी आहे का तुम्हाला? रा. स्व. संघाचे पाचवे सरसंघचालक स्व. सुदर्शनजी यांनी सरसंघचालक झाल्यावर पहिले काम केले होते, नागपूरच्या दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्याचे. त्यावेळी तुमच्याच पंथातल्या एका महान विचारवंताने अन त्याच्या साथीदारांनी जाऊन चक्क डॉ. आंबेडकरांचा तो पुतळा धुतला होता. तेव्हा कुठे गेली होती तुमची सहिष्णुतेची बांधिलकी? या देशातील सर्वोच्च न्यायालयाने रा. स्व. संघाला गांधी हत्येतून पूर्णत: मुक्त केले तरीही तुम्ही उठता बसता त्याला दूषणे देता, तेव्हा तुम्ही फारच सहिष्णू असता नाही का? शंकराचार्यांना ऐन दिवाळीच्या दिवशी बेड्या घातल्या होत्या तेव्हा तुमची सहिष्णुता झोपली होती का? अन ज्या नरेंद्र मोदींच्या नावापुढे पंतप्रधान हे विशेषण रोजच्या तुमच्या पोटदुखीसाठी कारणीभूत आहे, त्या मोदींना सतत एक तप तुम्ही ज्या पद्धतीने वागवले तेव्हा तुमची सहिष्णुता कुठे दडून बसली होती?

सहिष्णुतेच्या गप्पा कोणी कराव्यात? ज्यांच्या रक्तातून असहिष्णुता वाहते आहे त्या कम्युनिस्ट अन काँग्रेसवाल्यांनी? आणीबाणीनंतर शाह आयोगाने जेव्हा स्व. इंदिरा गांधींना दोषी ठरवले होते अन त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती, तेव्हा काहीच मिनिटात संघाच्या लोकांच्या घरांवर झालेले हल्ले तुम्हाला आठवतात तरी का? काँग्रेसी गुंडांनी केलेल्या दगडफेकीत फुटलेली माझ्या घराची काच अजूनही त्याची साक्ष देईल. याच हल्ल्यात हात तुटल्यामुळे वडिलांना चार महिने काय सोसावे लागले होते याची तुम्हाला कल्पना असण्याची शक्यताच नाही. कारण तुमची सहिष्णुता कायम सत्तेचे तळवे चाटण्यात व्यस्त राहत आलेली आहे. गांधी हत्येनंतर महाराष्ट्रात करण्यात आलेली ब्राम्हणांची कत्तल तुम्हाला माहितच नाही. कारण तुमच्या मते त्यावेळी महाराष्ट्र भारतात नसावाच.

भारतासहित जगभरातील पत्रकारांच्या हत्या, आयएसआयएसच्या कारवाया, पाकच्या कारवाया, कोरिया असो की सिरीया, अमेरिका असो की इराण... एकूणच मानवी जीवनातील हिंसा, त्याची कारणे, त्याचे परिणाम, त्यावरचे उपाय वगैरेंची चर्चा करण्याची तुमची क्षमता तरी आहे का? गोडगोड बोलणे वा इच्छाचिंतन यांच्या मर्यादांची चर्चा करण्याची तयारी आहे का तुमची? प्रत्येक घटना सरकारच्या इशाऱ्यानेच होते असे जे तुम्हाला तुमच्या राजीनामे देण्यातून सुचवायचे आहे त्याला तरी काय आधार? अशी बालिश कृती करून केवळ गोंधळ, अविश्वास माजवण्याचा तुम्हाला काय अधिकार? तुमची ही कृती बालिश तर आहेच, सोबतच बेजबाबदारदेखील आहे. तुमच्या बौद्धिक दिवाळखोरी शिवाय दुसरे काहीही यातून पुढे येत नाही.

नागपूरच्याच एका प्राध्यापक मित्राने, याच राजीनामा यादीत असलेल्या गणेश देवी यांना त्याने पाठवलेला मेसेज, सकाळी मला पाठवला. त्यात त्याने २००६ च्या मुंबई बॉम्बस्फोटात आपला भाऊ मरण पावल्याचा उल्लेख करून; गणेश देवींना प्रश्न केला आहे- त्याबद्दल साहित्यिकांनी काय केले होते? देवींची त्यावर काहीही प्रतिक्रिया नाही. आता सामूहिक बंडखोरी करणाऱ्या या साहित्यिकांनी समाजाच्या असंख्य गटांमध्ये ऐक्य, सहिष्णुता निर्माण करण्यासाठी काय केले आहे, या प्रश्नाचे उत्तर आधी द्यावे. मग सहिष्णुतेच्या वगैरे गप्पा माराव्यात. साहित्य अकादमीनेही दबावात येऊ नये. १०-१५ च नव्हे, आजवरच्या ११०० साहित्यिकांनी पुरस्कार परत केले तरीही घाबरू नये, दबावात येऊ नये. समाजात रुजलेल्या बौद्धिक दहशतवादाची ही नवीन खेळी सरकार, साहित्य अकादमी अन सामान्य माणसांनी ओळखण्याची गरज आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, १२ ऑक्टोबर २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा