शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१

bifocal approach

अमेरिकेत जन्मलेल्या बालकांना (बाहेरून आलेल्या जोडप्यांच्या) आपोआप अमेरिकन नागरिकत्व मिळणार नाही अशा अध्यादेशासाठी डोनाल्ड ट्रंप कामाला लागले आहेत. एक डझन लोकांचे जीव घेणाऱ्या पेनसिल्व्हेनिया गोळीबाराची घटना ताजी आहे. या दोन्ही घटनांना जोडून विदेशी लोकांबद्दल अमेरिका अधिक कठोर होऊ शकते. आपल्या येथेही असा विचार करणारे बरेच लोक आहेत. जगातही आहेत. किंबहुना तोच जगाचा प्रवाह आहे. पण हा प्रवाह योग्य आहे का? या प्रश्नाचे उत्तर, हो आणि नाही; असे दोन्ही असायला हवे. हो यासाठी की प्राप्त परिस्थितीत तेच व्यवहार्य आहे. अन नाही यासाठी की, ते मानवी सभ्यतेच्या विकासाला बाधक आणि छेद देणारे आहे. कठोरता तर जाऊच द्या, पण शस्त्र वगैरेही असू नये; असा विचार करणारेही बरेच आहेत. वेडपटपणा याहून वेगळा शब्द त्यांच्यासाठी वापरता येणार नाही. त्यांचा उद्देश आणि भाव योग्य असला तरीही; वास्तवाचे आकलन, व्यावहारिकतेची समज आणि आपली कल्पना कशी साकारू शकेल याविषयीचा घोर स्वप्नाळूपणा; यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणेच श्रेयस्कर. पण हेही लक्षात घ्यायला हवे की, कठोर भाषा- धोरणे- अंमलबजावणी- यांच्या परिणामाची व्याप्ती मर्यादित असते. मुस्लिम समस्या दूर ठेवण्यासाठी आपण पाकिस्तान तोडून दिला किंवा प्रत्यक्ष छत्रपतींनी शत्रूचा जो काही बंदोबस्त केला; त्याने समस्या संपली का? जगभरात अशा प्रकारे राक्षसी वृत्ती डोके वर काढीत असतातच. त्यांचा केवळ बंदोबस्त करणे पुरेसे नसते. एका बाजूला दुष्ट शक्तींचा बंदोबस्त आणि दुसऱ्या बाजूला माणसाचा चांगुलपणा, त्याच्यातील देवत्व जागवण्याचे प्रयत्न; त्यासाठीचे वातावरण, तशी शब्दावली, तशी जीवनरचना; हे दोन्ही एकाच वेळी सुरु राहायला हवे. भारतच नव्हे जगभरातच मानवी सभ्यतेचा प्रवास याच रीतीने झाला आहे. आदिमानवापेक्षा आजचा मानव जर काही वेगळा असेल तर तो यामुळेच. दुर्दैवाने आज मानवी चांगुलपणा, त्याचे देवत्व जागवण्याची प्रक्रिया अतिशय क्षीण झाली आहे. जगभरात तर ती औषधालाच सापडेल, पण भारतातही ती प्रक्रिया दुबळी होते आहे. मानवी जीवनाचा हा bifocal approach हेच भारताचे वैशिष्ट्यही आहे. कठोर वास्तवातही हे भान ठेवणे आणि ही प्रक्रिया सशक्त करणे आवश्यक आहे. `वसुधैव कुटुंबकम'साठी त्याला पर्याय नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा