रविवार, १ एप्रिल, २०१८

केरळची एक बातमी

केरळची एक बातमी वाचण्यात आली-
`एक लाख शालेय विद्यार्थ्यांनी जात आणि धर्म यांचे रकाने कोरे सोडले.'
यातून ध्वनित अर्थ- या एक लाख विद्यार्थ्यांनी जाती धर्माचा त्याग केला. आता ते माणूस झालेत, केवळ माणूस.
यात भंपकपणा आहे आणि धोकाही. ऐकायला, बोलायला खूप्पच छान वगैरे वाटत असलं तरीही हे निरर्थक आहे.
१) मुळातच आपल्या सगळ्या दुहीचं, भांडणाचं, त्रासाचं मूळ जाती आणि धर्मात आहे हे तद्दन खोटं आहे.
२) स्वामी विवेकानंद, नारायण गुरु, असंख्य संत महंत यांनी याबाबत केलेलं विवेचन आणि त्यांचं नाव घेऊन करण्यात येणारं विवेचन यात कुठेच ताळमेळ नसतो. या साऱ्या महापुरुषांनी जाती वा धर्माच्या लहान units ची अपरिहार्यता मान्य केली, त्यांची गरज मान्य केली; पण बौद्धिक आणि भावनात्मक दृष्टीने त्यांच्या वर उठल्याविना पर्याय नाही हे सांगितलं.
३) आजचं या संदर्भातील सगळं विवेचन अभावात्मक आणि नकारात्मक, अन म्हणूनच परिणामशून्य आहे.
४) जाती आणि धर्माचा त्याग करणारी व्यक्ती अहंकार- दांभिकता- स्वार्थ- सगळ्या प्रकारच्या हिणकस भावना आणि व्यवहार यांचा त्याग करून माणूस होते का? उलट आम्ही फार महान कार्य केल्याच्या आविर्भावात अधिकच लहान होते.
५) बाबा रामरहीमच्या कथित आश्रमात सगळ्यांना `मानव' हीच संज्ञा होती. ती खरेच माणसे होती का?
६) जाती धर्माचा असा त्याग करून माणूस `माणूस' होतो का?
७) केवळ जाती वा धर्माचाच त्याग का? माणूस कोण मोठा लागून गेला? `माणूस' या गोष्टीचाही त्याग का नको? समग्र अस्तित्वाचा एक कण एवढीच ओळख का नको? किंबहुना तीही कशासाठी?
८) माणूस झालो म्हणून फुशारकी मारायची अन बकरे-कोंबड्या-मासे यांचा जीव घ्यायचा; माणसांचेच शोषण करायचे, माणसांचाच द्वेष करायचा, माणसांनाच वजा करत जायचे; ही कोणती नीती? की अनीती?
९) यातील `आधुनिकतेचा' कावेबाजपणा हा की, काहीच वर्षात `देश' हा रकाना पण कोरा ठेवण्याची टूम पुढे येईल.
१०) `संन्यास' यातही सर्व प्रकारच्या व्यवस्था आणि बंधनांचा त्याग अभिप्रेत आहे. परंतु त्यागाची ती कल्पना, पद्धती, तो भाव सकारात्मक, पूर्णतेकडे नेणारा आहे; तर या विद्यार्थ्यांनी केलेला जाती धर्माचा कथित त्याग नकारात्मक, शून्यतेकडे नेणारा, अभावात्मक असा आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, १ एप्रिल २०१८

सोमवार, २६ मार्च, २०१८

खारुताई...

खारुताई... तू काल व्यक्त केलेल्या भावना पोहोचल्या. छान वाटलं गं. असं मनमोकळं बोललं की छान वाटतं. माणसाला काय अन देवाला काय. अन तुला म्हणून सांगतो- माणसं मोकळ्या मनाने न बोलता लपवाछपवी करतात ना आपसात, तशीच ती लपवाछपवी करतात देवांशीही. जाऊ दे. कोणी कसं वागावं हे काय कोणाच्या हाती असतं होय? ते अगदी देवांच्याही हाती नसतं बघ. तुला गंमत वाटेल माझं म्हणणं वाचून, पण असतं मात्र तसंच. आता हेच बघ ना- काल तू म्हणालीस, `माझं खारपण अक्षय राहो'. चांगलं अन योग्यच आहे गं तुझं मागणं. हळवं सुद्धा. अन प्रेरक सुद्धा म्हणता येईल. पण मी जर असं मागणं मागितलं की बाबा- `माझं रामपण अक्षय राहो'; तर सगळ्यांना नाही गं आवडणार ते. लोक म्हणतील- आला मोठा राम. लागून गेला मोठा. देव झाला म्हणून काय झालं? मोठेपणा चढला याच्या डोक्यात, असं म्हणतील. अन मला हे देवपण टाकून देऊन खार व्हावंसं वाटलं तर? ऐकणार आहे का कुणी माझं? बरं दुसरंही आहेच ना... १०० योजने जाऊ शकणारा हनुमंतही लागतोच ना गं... शिवाय कोणी सुषेण, कोणी रागे भरणारा पण पाठ राखणारा लक्ष्मण, नल नील जांबुवंत अंगद हेही हवेतच ना? नुसत्या वाळूने बांधता आला असता का समुद्रावर पूल... आणि सांगू का हवा असतो रावणही- माझं रामपण, अन तुझं खारपण सिद्ध व्हायला. हे काहीच नसतं आपल्या हाती... ना तुझ्या ना माझ्या... आपण फक्त एवढंच करायचं- चालत राहायचं... मनातून काढून टाकायचं लहानमोठेपण... सोडून द्यायचे हट्ट लहान वा मोठे होण्याचे किंवा कसलेही... कोणास ठाऊक- कालचक्राच्या फेऱ्यात कधीतरी; तू होशील राम आणि मी होईन खार... होईलच असेही नाही, नाहीच होणार असेही नाही... कोणाला ठाऊक? गणितं मांडण्याची खोड टाकून देण्याचा प्रयत्न, एवढंच ठेवलंय त्या नियतीने आपल्या हाती... हो, आपल्या हाती- तुझ्या नि माझ्याही... नियती म्हणजे पराभव नाही, नियती म्हणजे कर्मशून्यता नाही, नियती म्हणजे संपून जाणे नाही... प्रगल्भ ज्ञानाच्या अत्युच्च विनयशीलतेला मानवी हुंकाराने बहाल केलेला शब्दालंकार आहे `नियती'... म्हणून सोडून द्यावे स्वत:ला त्या अगम्य चिरंतन प्रवाहावर... ठेवू नये कुठलीच अभिलाषा `रामपणाची' किंवा `खारपणाची' किंवा याची वा त्याची... वाहत राहावे प्रवाहासोबत... अन अंतरी निर्माण होणाऱ्या प्रत्येक उर्मीनुसार कृती करताना फक्त म्हणत राहावे- तत्त्वमसी तत्त्वमसी तत्त्वमसी...
- श्रीपाद कोठे
सोमवार
२६ मार्च, २०१८

शनिवार, २४ मार्च, २०१८

`खारपण'


ठाऊक आहे मला मी खार आहे. ना शक्ती, ना युक्ती, ना शिक्षण. पण मला ठाऊक आहे मी खार आहे आणि मला कळतं - रामकार्य कोणतं ते. मला रामकार्यच करायचं आहे हेही कळतं. मी ना सैनिक सुग्रीवाचा, ना सदस्य रामसैन्याचा. मी खार आहे अन खारीसारखंच काम करते. तसंच करू शकते. तुमच्या मोठाल्या गोष्टी तुमच्या तुम्ही पाहा, तुमची मोठाली कामे तुमची तुम्ही पाहा. मला नाही ठाऊक तुमचा राम अन मला ठाऊक करूनही घ्यायचा नाही. कसे नाही ठाऊक... पण मला फक्त रामकार्य ठाऊक आहे अन ते खारीच्या शक्तीने, खारीच्या पद्धतीने करणे ठाऊक आहे. वाळूचे चार कण उचलण्याची फक्त माझी शक्ती. ट्रकभर वाळू का नाही उचलता येत याची तक्रारही नाही, खंतही नाही अन मागणेही नाही. किनाऱ्यावर ये जा करता करता होणाऱ्या त्रासाचीही तक्रार नाही. होत असतील वादावादी, होत असेल बाचाबाची त्या वानरांशी... होत असेल तर होत असेल. मला काय त्याचे? कामात खंड पडू नये, बास. कसली भीती नाही, कसली क्षिती नाही. कोणी कोणी म्हणतात- जिवंत असेपर्यंत काम करत राहावं. तेही मनात नसू दे. कारण मला काय ठाऊक जिवंत म्हणजे काय, मरण म्हणजे काय, जन्म म्हणजे काय? अन कशाला शीण हवा. अन हो, आधी होऊन गेलीय म्हणतात एक खार. आलंय कानावर. म्हणून हे द्वाड मन आठवतं- त्या रामाची बोटे तिच्या पाठीवर उमटलेली. ती आठवण तेवढी काढून टाक. त्या खारीला कुठे ठाऊक होतं राम जवळ घेणार आहे आपल्याला. अन तिची इच्छा तरी कुठे होती तशी काही? तशी इच्छा असती तर ती खार राहिलीच नसती. ती झाली असती कोणी तरी दुसरी काही. बस... मी खार आहे अन मला राहू दे तशीच खार... `मी खार आहे, चार वाळूचे कण उचलण्याची माझी शक्ती आहे, अन रामकार्यासाठीच मला चार चार कण उचलत राहायचे आहेत' एवढं आणि एवढंच कळणारी. याहून अधिक काहीही देऊ नकोस, काहीही कळू देऊ नकोस... माझं `खारपण' अक्षय राहो... माझं `खारपण' अक्षय राहो... माझं `खारपण' अक्षय राहो...
- श्रीपाद कोठे
रविवार
२५ मार्च, २०१८

शुक्रवार, ९ मार्च, २०१८

'अब तेरा दर्द नासुर नहीं रहेगा'


काल रात्री 'बेगम जान' पाहिला. जागतिक महिला दिनानिमित्त 'स्टार गोल्ड'ने दाखवला. भारत-पाक फाळणीच्या पार्श्वभूमीवर सीमेवरील बेगम जानच्या कोठ्याची ही कहाणी. दोन देशांना अलग करणारी Radcliff रेषा या कोठ्यातून जाते. तिथे निरीक्षण चौकी होणार असते. त्यासाठी ही जागा रिकामी करायला सांगण्यात येते. स्वाभाविकच बेगम जान, तिथल्या मुली, जानने तिथे आणलेली एक वृध्द स्त्री या सगळ्यांचा जागा सोडायला विरोध. त्यातून प्रशासनाशी निर्माण होणारा संघर्ष. या संघर्षासाठी केली जाणारी तयारी. त्या संघर्षात बेगम जान व अन्य मुलींना येणारे अपयश. अखेर गुंडांना हाताशी धरून जागा रिकामी करण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नात आगीच्या भक्ष्यस्थानी पडणारा कोठा. सरतेशेवटी पद्मिनीच्या कथेच्या निरुपणासोबत बेगम जान आणि तिच्या साथीदार महिलांनी त्याच जळत्या कोठ्यात दिलेली स्वतःची आहुती. साधारण चित्रपट हा असा.
सर्वसाधारणपणे आपण कथा पाहतो. त्यामुळे शरीरविक्री करणाऱ्या महिलांच्या एका कोठ्याची शोकांतिका, असाच अर्थ मनात उतरतो, उरतो. पण सामान्य कथेच्या पलीकडे जीवनदर्शन म्हणून जेव्हा कलाकृतीकडे पाहिले जाते तेव्हा त्याचे वेगवेगळे पदर, कोन दिसतात, जाणवतात. मला ते तसे जाणवले. म्हणूनच बेगम जानच्या जौहारासोबतच त्यांना वेळोवेळी मदत करणारे, देश स्वतंत्र झाला तेव्हा कोठ्यावर दिवाळी साजरी करणारे मास्टरजी आणि कोठ्याचे रक्षण करणारा, सगळ्या महिलांना बंदूक चालवायला शिकवणारा रखवालदार; या दोघांचे चित्रपटात फोकस न झालेले बलिदान देखील मनात घर करून जाते.
प्रत्यक्ष संघर्ष सुरू होण्यापूर्वी तयार केलेल्या पार्श्वभूमीतील एक प्रसंगही असाच जीवनदर्शन घडवणारा. एक मुलगी कोठ्यावर आणलेली. तिचा पहिलाच दिवस. पूर्ण शून्य झालेली ती मुलगी बेगमच्या खाटेजवळ बसलेली. दगड झालेल्या त्या मुलीला ती घेऊन जायला सांगते. अन चार पावले पुढे गेलेल्या तिला परत आणायला सांगते. परत आल्यावर तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत ती विचारते 'बहुत दर्द हो रहा क्या मेरे बच्चे?' अन ती समजावते आहे असं वाटत असतानाच बेगम एक सणसणीत तिच्या कानाखाली ठेवून देते. या प्रकाराने भांबावलेली ती मुलगी प्रचंड आक्रोश करते. तेव्हा बेगम तिला घेऊन जायला सांगते आणि म्हणते - 'अब तेरा दर्द नासुर नहीं रहेगा. अब तू जीएगी.' एक प्रचंड जीवनसत्य. वेदनेला आवाज मिळाला की जगण्याचा मार्ग प्रशस्त होतो. मुकी वेदना जीवन संपवून टाकते. म्हणूनच वेदनेला स्वर लाभलेली ती मुलगी अंतिम संघर्षाच्या वेळी तिच्या भावना व्यक्त करताना म्हणते - 'ये तो हमरा घर है. घर पे जितनी स्वतंत्रता नहीं थी उतनी यहां मिली.'
कोणासाठी कोठा हेच घर होऊन जातं तर कोणासाठी घर वा हे जगच कोठा होऊन जातं. आजच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सशर्त इच्छामरणावरील निकालात हेच तत्व मान्य करण्यात आले आहे. परिस्थिती कोणावरही येऊ शकते. परिस्थिती स्त्री, पुरुष, बालक, गरीब, श्रीमंत, अमुक तमुक भाषाभाषी, लहान मोठे असा कोणताही भेद करीत नाही. परिस्थितीची कारणेही खूप वेगवेगळी असू शकतात. अनेकदा कारणांचे आकलन होतेच असेही नाही. जीवन हे कोणासाठी अन कशामुळे स्वर्ग वा नरक होईल, घर वा कोठा होईल सांगता येत नाही. ज्योतिष विषयाचा थोडाफार व्यासंग ज्यांचा असेल त्यांना हे लवकर लक्षात येईल. ज्योतिषाचा जो भाव पक्ष आहे (बारा घरे, त्यांचे भाव, त्या घरांमध्ये असणारे ग्रह, त्यांचा अर्थ) तो या दृष्टीने लक्षणीय आहे. बाकी तर असो पण आई वडील आणि मुले यांचं नातं सुद्धा शत्रुत्व पूर्ण करण्यासाठी असू शकतं, इतक्या धीटपणे ज्योतिष शास्त्र जीवनाचं प्रतिपादन करतं. आपल्या मनावरची, बुद्धीवरची झापडं बाजूला करून निरपेक्ष जीवन समजून घेणं जीवनाला समृद्ध करीत असतं. चांगलं, वाईट वगैरे खूप सापेक्ष असतं. जीवनाचं सोलीव दर्शन महत्वाचं. बेगम जान मध्ये मला ते जाणवलं. म्हणूनच तो केवळ शरीरविक्री करणाऱ्या महिलांचा किंबहुना महिलांचा शोकार्त चित्रपट न वाटता जीवनदर्शन घडवणारा चित्रपट वाटला.
- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, ९ मार्च २०१८

गुरुवार, ८ मार्च, २०१८

सारस्वतांपुढील आव्हान

(डॉ. राजन जयस्वाल यांच्यावरील नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या गौरव ग्रंथासाठी लिहिलेला व त्यात समाविष्ट लेख.)

साहित्य-संस्कृती हे शब्द जोड शब्दासारखेच पुष्कळदा वापरले जातात. त्यातील साहित्य या शब्दाचा काही ना काही बोध तर सगळ्यांना होतो. कथा, कविता, कादंबरी, ललित लेखन, प्रवासवर्णन, समीक्षा, वैचारिक लिखाण, निबंध, चरित्र, आत्मचरित्र, प्रवासवर्णन; अशा विविध प्रकारांनी साहित्याचा कमीअधिक परिचय माणसाला असतो. साहित्य दाखवता येतं, सांगता येतं, त्याचं वर्णन सहजतेने करता येतं. `संस्कृती' या शब्दाचे मात्र तसे नाही. संस्कृती म्हणजे काय हे दाखवता येत नाही, तिचे वर्णन करता येत नाही. आजकाल नृत्य- गायन- नाट्य- चित्रपट- लोककला- इत्यादींना विस्कळीत अर्थाने संस्कृती म्हटले जाते, समजले जाते. परंतु ते योग्य नाही. या कला आहेत. संस्कृती ही अधिक जीवनानुगामी अमूर्त भावात्मक वस्तू आहे. वस्तू हा शब्द मुद्दाम वापरला आहे. कारण ती आहे, ती असते. ती केवळ कल्पना नाही. एवढेच की ती अमूर्त आहे. एखाद्या भौतिक पदार्थासारखे तिचे मोजमाप वा वर्णन करता येत नाही एवढेच. अर्थात हेही तेवढेच खरे की, साहित्य वा विविध कलांमधून संस्कृती अभिव्यक्त होत असते. प्रकट होत असते. एवढेच नाही तर, साहित्य वा विविध कला आणि त्यांचे आविष्कार संस्कृतीला घडवीत किंवा बिघडवित असतात. संस्कृतीला आकार वा घाट देत असतात. दुसरीकडे संस्कृतीही साहित्य वा कलांना घडवीत किंवा बिघडवित असते. त्यांना आकार आणि घाट देत असते. या दोन्ही बाबी अन्योन्याश्रयी असतातच असे नाही. परंतु त्यांचा प्रवास सोबत सोबत, हातात हात घालून होत असतो. साहित्य आणि कला या जीवनानुभवाकडे थोड्या अधिक झुकलेल्या असतात. मनोरंजन, मनोविनोद, मनोरुची त्यात प्रधान असतात. संस्कृती ही जीवनार्थाकडे थोडी अधिक झुकलेली असते. जीवनदृष्टी, जीवनाचे तत्वज्ञान त्यात प्रधान असते एवढेच. म्हणूनच साहित्याचा वा कलेचा विकास आणि संस्कृतीचा विकास वेगवेगळ्या पद्धतीने समजून घ्यावे लागते. साहित्य वा कलांचा विकास होतो आहे का? त्यांची घडण होते आहे का? त्यांची वृद्धी होते आहे का? या प्रश्नांची उत्तरे शोधताना वेगळ्या पद्धतीने शोधावी लागतात. जसे- लोक लिहितात की नाही, वाचतात की नाही, लिहीणाऱ्यांची अथवा वाचणाऱ्यांची संख्या, ग्रंथालये, ग्रंथालयांची संख्या, पुस्तक प्रकाशने, त्यांची आकडेवारी, साहित्य संमेलने, साहित्य विषयक अन्य कार्यक्रम आणि आयोजने, या साऱ्यासाठी दिला जाणारा वेळ आणि पैसा, अन्य सोयी- सवलती- साधने- यांची उपलब्धता; हे सारे विचारात घ्यावे लागते. त्यांचा ताळेबंद मांडावा लागतो. अन्य कलांच्या बाबतीतही असाच विचार करावा लागतो. त्यातून त्यांचे घडणे वा बिघडणे, त्यांची वृद्धी वा घट समजून घेता येते; समजून घेतली जाते. संस्कृतीची वाढ-घट कशी मोजायची? कशी समजून घ्यायची? त्याचं माप कोणतं? संस्कृतीचं घडणं बिघडणं अथवा वाढ-घट अशी बाह्य एककांनी समजून घेता येत नाही. संस्कृतीचा विकास समजून घेण्याचे मापदंड आंतरिक आहेत. ज्या मानवाच्या जीवनाचा तो अविच्छेद्य भाग आहे; त्या मानवाच्या भावना, विचार, जाणीवा, दृष्टी किती व्यापक होत आहेत वा संकुचित होत आहेत; त्यांचा विस्तार होतो आहे की आकुंचन होते आहे; हाच संस्कृतीच्या विकासाचा मापदंड असू शकतो. साहित्य अथवा कला; संस्कृतीच्या या विकासाला किती साहाय्य करतात, त्यासाठी किती पूरक ठरतात, यावरून साहित्य वा कलांच्या दर्जेदार असण्यावर वा नसण्यावर मोहोर उठवता येते.
मानवाच्या भावना, विचार, जाणीवा, दृष्टी किती व्यापक होत आहेत वा संकुचित होत आहेत; त्यांचा विस्तार होतो आहे की आकुंचन होते आहे; हे तरी कसे ठरवायचे? या प्रश्नाचे उत्तर, म्हटले तर फार सोपे आहे. अर्थांची, शब्दांची फार ओढाताण न करता त्याचे उत्तर देता येते. मोठी पिशवी ती, ज्यात अधिक वस्तू सामावू शकतात, लहान पिशवी ती ज्यात कमी वस्तू सामावू शकतात. त्याचप्रमाणे भावना, विचार, जाणीवा, दृष्टी मोठी अथवा व्यापक तेव्हाच म्हटली जाईल, जेव्हा त्याचा परीघ अधिकाधिक मोठा असेल; अधिकाधिक भावना, विचार, जाणीवा, दृष्टी यांना सामावून घेऊ शकेल. याउलट ज्या भावना, विचार, जाणीवा, दृष्टी यांचा परीघ लहान असेल, त्या भावना, विचार, जाणीवा, दृष्टी लहान म्हणाव्या लागतील. अन आपला लहान परीघ मोठा करण्याचे नाकारत, अधिकाधिक भावना, विचार, जाणीवा, दृष्टी यांना सामावून घेण्याचे नाकारत जाणे; याला संकुचितपणा म्हणावे लागेल. आणखीन एका गोष्टीची नोंद घेणेही गरजेचे आहे. आपला परीघ मोठा करणे, अधिकाधिक भावना, विचार, जाणीवा, दृष्टी सामावून घेणे ही; चांगली अन योग्य असली तरीही धोकादायक प्रक्रिया आहे. त्यासाठी विवेक जागा असणे नितांत गरजेचे. परीघाबाहेरील व्यक्ती वा विचार यांना परिघात सामावून घेणे विवेकाधिष्ठित असायला हवे. हिंसा, एखाद्याचे अस्तित्व संपवणे वा नाकारणे, स्वार्थ, समग्र जीवनाच्या संदर्भात विचार करण्याला नकार देणे, आततायीपणा; यासारख्या बाबी व्यापकतेच्या नावाखाली सामावून घेता येत नाहीत, सामावून घेऊ नयेत. त्यातून फक्त आत्मनाशी भस्मासूर निर्माण होतात. हिंसा, एखाद्याचे अस्तित्व संपवणे वा नाकारणे, स्वार्थ, समग्र जीवनाच्या संदर्भात विचार करण्याला नकार देणे, आततायीपणा; इत्यादी बाबी समजून जरूर घेतल्या पाहिजेत. परंतु समजून घेणे आणि सामावून घेणे यातील भेद दुर्लक्षित करणे चुकीचे ठरते.
संस्कृतीच्या जडणघडणीत समाजजीवनाच्या विविध घटकांचा कळत वा नकळत सहभाग असतो. वर्तमानाचा विचार केल्यास काय चित्र डोळ्यासमोर येते? प्रसारमाध्यमे आणि संवाद माध्यमे आजच्या युगावर सर्वाधिक प्रभाव गाजवीत असल्याचे पाहायला मिळते. कधी नव्हे एवढा हा प्रभाव वाढला आहे. ही मानवी प्रवासातील `न भूतो' अशी प्रक्रिया आहे. संवाद आणि संवादाची विविध माध्यमे मानवी सभ्यता व संस्कृतीएवढीच पुरातन आहेत यात वाद नाही. भाषा आणि वाणीचा किंवा मानवी खाणाखुणांचा उपयोग तर होतच असे, पण पशुपक्ष्यांचा संवाद माध्यम म्हणून वापर; तसेच `मेघा'सारख्या गोष्टींचा साहित्यिक प्रतिभेने संवाद माध्यम म्हणून केलेला उपयोग; नवीन नाहीत. तरीही, संवाद आणि संवाद माध्यमे यांचा पसारा, वैविध्य, राजापासून रंकापर्यंत असलेली त्याची उपलब्धता, सहजता, गती; हे सारे अभूतपूर्व आहे. प्रसार माध्यमे ही तर अगदी अलीकडच्या दोन शतकांची देणगी आहे. त्यातही गेल्या दोनेक दशकात झालेले बदल हे क्रांतिकारी या शब्दालाही उल्लंघून गेलेले आहेत. संवाद माध्यमे आणि प्रसार माध्यमे यांच्या या पसाऱ्याने मानवाच्या व्यक्त होण्याचे सगळे संदर्भच बदलून टाकले आहेत. `खाजगी किंवा व्यक्तिगत' या बाबी तर पातळ होऊ लागल्या आहेतच; पण व्यक्त होण्यातील स्त्री- पुरुष- तृतीयपंथी- हे लिंगभेद; भाषाभेद, भौगोलिक सीमा, जाती- भाषा- प्रांत- देश- विषय- वय- या साऱ्या सीमाही पुसट झाल्या आहेत. आपल्या घरात बसून जगातील कोणाशीही संवाद साधण्याची सोय आता उपलब्ध आहे. कोणतीही माहिती जाणून घेणे किंवा कोणतीही माहिती विशिष्ट व्यक्ती वा व्यक्तीसमूह यांच्यापर्यंत किंवा यच्चयावत सगळ्यांपर्यंत पोहोचवणे यात काहीही नवीन राहिलेले नाही. विचारांचे आदानप्रदान सहजसोपे झाले आहे. मोबाईल आणि आंतरजाल या संवादमाध्यमांनी माहिती आणि विचारांच्या आदानप्रदानातील मर्यादा तर पुसल्याच, सोबतच `प्रसार माध्यमे' हा मध्यस्थही बाजूस सारला आहे. माहिती आणि विचारांच्या आदानप्रदानासाठी असलेली अवलंबिता पुसून टाकली आहे. प्रसारमाध्यमांचे भविष्य काय असेल असाही एक प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.
आपल्या त्या त्या वेळच्या निवडीप्रमाणे कधी व्यक्तिगत, तर कधी समष्टीशरण अशा या संवादसाधनांनी चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम होत आहेत. त्यांचे नेमके आकलन होण्यास अजून काही काळ जाऊ द्यावा लागणार आहे. तरीही त्यातील प्रवाह स्पष्टपणे पाहता, अनुभवता येतील इतके ठळक निश्चित आहेत. चांगल्या आणि वाईट गोष्टींची सहज उपलब्धता हे त्याचे एक लक्षण आहे. मोठाले धार्मिक वा तात्विक ग्रंथ, सगळ्याच भाषांमधील मोकळे होत असलेले कथा, कादंबरी- कविता- इत्यादी साहित्य, वैचारिक वाङ्ग्मय, वैज्ञानिक माहिती, इतिहास, पुराणे, राज्यघटना, नियम, कायदे, बँकांचे आणि कंपन्यांचे ताळेबंद, शास्त्रीय आणि अन्य संगीत, जुने व नवे चित्रपट, नाटके, भूगोल, पर्यटन, निसर्ग हे सगळे बोटांच्या टोकावर आले आहे. केवळ माहिती म्हणून नव्हे तर प्रत्यक्ष व्यवहार म्हणूनही हे एका क्लिकचे काम होते आहे. प्रवासापासून निवासाच्या आरक्षणापर्यंत किंवा प्रत्यक्ष पैसा कमावणे- खर्च करणे- देवाणघेवाण- अन्य व्यवहार हेही जागचे न हलता होऊ लागले आहेत. शिक्षण वा वैद्यकीय उपचार हे दोन व्यक्तींचा थेट संपर्क न होता होऊ लागले आहेत. खरेदी-विक्री डाव्या हाताचा मळ झाला आहे. यासोबतच फसवणूक, अधिकृततेचा अभाव, एकलकोंडेपणा, संशयीवृत्ती, गैरफायदा घेणे, लुबाडणूक, अनिश्चितता, आरोग्याच्या तक्रारी यांचीही भरमसाठ वाढ होते आहे. आपल्याला दुष्ट लोकांचा वा वृत्तींचा फटका बसू नये याचा मोठा तणाव प्रत्येकाला जाणवू लागला आहे. शिवाय जशा चांगल्या गोष्टी उपलब्ध आहेत तशाच पोर्नोग्राफी, ड्रग्ज, मादक द्रव्य, जुगार, वेश्यावृत्ती हेही सहज उपलब्ध आहे. एकीकडे माणसे एकलकोंडी होऊन दुरावू लागली आहेत, तर दुसरीकडे आपापल्या आवडीनुसार गट तयार करून आवडीच्या विषयात रममाण होऊ लागले आहेत. असंख्य साहित्यिक, वैज्ञानिक, धार्मिक, सामाजिक, राजकीय गट तयार होत आहेत. त्यात देवाणघेवाण होत आहे. आभासी वास्तवातून भेटणारे लोक आणि विचार, भावना, माहिती, साहित्य यांची देवाणघेवाण करणारे लोक; प्रत्यक्ष भेटून एकमेकांना समजून घेऊ लागले आहेत. त्यांचे लहानमोठे कार्यक्रम होऊ लागले आहेत. अन अशा गटांची सभासद संख्या लाखात सुद्धा पोहोचू लागली आहे. लिहिणारा, व्यक्त होणारा, वाचणारा वर्ग विकसित होऊ लागला आहे; वाढू लागला आहे. कधीकधी हे व्यसन सुद्धा होत आहे. कौटुंबिक गटात सुद्धा आजवर माहिती नसलेल्या अनेक गोष्टींचा, गुणांचा परिचय होऊ लागला आहे. यातून प्रत्येकाला चांगल्या व वाईट दोन्ही अर्थाने; संधी, सन्मान आणि ओळख प्राप्त होऊ लागली आहे.
संवाद माध्यमांमुळे प्रसार माध्यमांचे स्वरूपही बदलले आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर, तसेच पैशासाठी जाहिरात शरणता हा प्रसार माध्यमांचा धर्म झाला आहे. राजकारण, चित्रपट, मनोरंजन, गॉसिप, तंत्रज्ञान यांच्याशी संबंधित कार्यक्रम आणि लिखाण यांना प्रमुखता मिळाली आहे. संवाद माध्यमांच्या प्रभावातून ही माध्यमेही सुटू शकत नाहीत. संवाद माध्यमातील घडामोडी, प्रवाह, त्यांचा खरेखोटेपणा हेदेखील त्यांचे विषय होऊ लागले आहेत. तांत्रिक प्रगतीमुळे अन्य देशांशी live देवाणघेवाण करणे शक्य झाले आहे. दोन देशातील वृत्तवाहिन्या एकत्र येऊन वृत्त वा चर्चा लोकांपर्यंत पोहोचवू लागले आहेत. देशविदेशातील वृत्तपत्रे आंतरजालात सहजपणे उपलब्ध होऊ लागली आहेत. जेवण, झोप, अभ्यास, कौटुंबिक कार्यक्रम, पाहुणेराहुणे, भेटीगाठी, आवडीनिवडी, इच्छा, अपेक्षा, मानसिकता यांच्यावर या साऱ्याचा प्रभाव होऊ लागला आहे. क्रीडास्पर्धा, राजकीय घडामोडी, अन्य महत्वाच्या घटना, चित्रपट यांची माहिती सर्वजनसुलभ होऊ लागली आहे. मानवी जीवन आणि त्याचे असंख्य पैलू यांचा परहस्ते अनुभव का होईना, घरबसल्या मिळू लागला आहे. माहिती, प्रतिमा, दृश्य, मतमतांतरे, घडामोडी यांनी माणसाचे मन, बुद्धी तुडुंब भरून जाऊ लागली आहे. reality show या प्रकाराने इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांचे मोठे विश्व व्यापले आहे. अस्पर्शित प्रतिभांना अवकाश प्राप्त होणे हा त्याचा सकारात्मक परिणाम आहे, तर उथळ कौशल्यविकास आणि अकाली प्रगती खुंटणे हे त्याचे नकारात्मक परिणाम आहेत. काही बाबतीत या reality show मधून गरजू आणि अभावग्रस्तांना मदत मिळते आहे; तर अनेकदा `सोपा आणि पापमय पैसा' वाहतो आहे. सुमार लोक celebrity होत आहेत. सार्वजनिक कार्यक्रमातील त्यांचा वावर वाढला आहे. त्यामागे लोक धावत आहेत अन त्या तथाकथित celebrity उखळ पांढरे करून घेत आहेत. प्रादेशिक वृत्तवाहिन्या आणि मुद्रित माध्यमे लोकांमध्ये जाऊन; लोकहिताचे वा लोकानुरंजनाचे उपक्रम करीत आहेत. राजकीय चर्चा हे बौद्धिक दंगलीचे क्षेत्र झाले आहे. मुद्रित माध्यमातील संपादकांचे महत्व कमी होऊ लागले आहे. गंभीर, उच्च अभिरुचीचे लिखाण हद्दपार होऊ लागले आहे. दोन्ही प्रकारच्या प्रसार माध्यमांनी दैनंदिन जीवन तर व्यापून टाकले आहेच; सोबतच अर्थकारणालाही आकार दिला आहे, देत आहेत. राजकीय निर्णय प्रभावित करण्याची या माध्यमांची शक्तीही वाढली आहे.
प्रसार माध्यमे आणि संवाद माध्यमे यांच्या चांगल्या वाईट परिणामांची चर्चा बाजूला ठेवून, केवळ सकारात्मक बाबी लक्षात घेतल्या तरीही संस्कृती संदर्भात काही प्रश्न समोर येतात. विचारांच्या, भावनांच्या, माहितीच्या देवाणघेवाणीतून, अभिव्यक्त होण्याच्या प्रक्रियेतून, समजून घेण्याच्या प्रयत्नातून; काय येणेजाणे करते आहे? कशाची देवाणघेवाण होते आहे? या देवाणघेवाणीने मानवी मन आणि जगणे किती आणि कसे समृद्ध होत आहे? वरवर नजर टाकली तरीही लक्षात येईल की; चित्र फारसे आशादायक नाही. संवाद माध्यमातून असंख्य स्त्री-पुरुष व्यक्त होऊ लागले आहेत. पण या व्यक्त होण्याचे स्वरूप कुरकुर, तक्रारी, कुरघोडी, टवाळकी असेच मोठ्या प्रमाणावर आहे. राजकीय गटात लोकांनी स्वत:च स्वत:ला वाटून घेतले आहे. अन्यथा प्रामाणिक आणि कळकळीचे असलेले लोकसुद्धा राजकीय हमरीतुमरी सोबतच, एकमेकांचा द्वेष करू लागले आहेत. संपूर्ण मानवी जीवनाचे अपार राजकीयीकरण झाले असून त्याने परस्पर संबंधांनाही गिळंकृत करणे सुरु केले आहे. मानवी मनातील सत्ताकांक्षा भस्मासूर होऊन समोर येते आहे. यात राजकीय सत्ता तर आहेच, सोबतच व्यक्ती, परिवार, विचार, संस्था, संघटना यांच्याही सत्ताकांक्षा तीव्र, तिखट आणि कडू होऊ लागल्या आहेत. एकाच छताखाली राहणारे चार जीवसुद्धा आपली सत्ता कशी चालेल किंवा सत्ता आपल्या हाती कशी राहील याचा प्रयत्न करताना दिसतात. सत्ताकांक्षेच्या भस्मासुराप्रमाणेच संपत्तीकांक्षेच्या भस्मासुरानेही अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. कोणत्याही गोष्टीचा संदर्भबिंदू पैशाशी येऊन थांबतो आहे. प्रतिष्ठा, मोठेपणा, न्याय, योग्यता, आदर पैशाच्या संदर्भात तोलले जाऊ लागले आहेत. `सर्वेगुणाः काञ्चनम् आश्रयन्ते' हे मानवी वृत्तीच्या अपरिपक्वतेचं लक्षण, मानवी पुरुषार्थ म्हणून पुढे येतं आहे. ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्या मनात आढ्यता आणि ज्याच्याकडे नाही त्याच्या मनात आशाळभूतपणा निर्माण होतो आहे. शिक्षण, संस्कार, जाहिराती, वातावरण, धोरणे, भाषा, चिकित्सा, विश्लेषण, चर्चा, जीवनाचे आदर्श आणि मापदंड; या साऱ्यातून सत्ता आणि संपत्ती यांचाच महापूर आला आहे. चांगल्या चांगल्या समाजोपयोगी योजना आदींचे `दूत' म्हणूनदेखील सत्ता, संपत्ती आणि भ्रष्ट जीवन यात बुडालेले लोकच पुढे येत आहेत. जीवन आणि तत्वज्ञान, जीवन आणि धर्म, जीवन आणि आध्यात्मिकता यांचा संबंधविच्छेद होऊ लागला आहे. `साधी राहणी, उच्च विचारसरणी' हा थट्टामस्करीचा विषय झाला आहे. माणसाने माणसाला समजून घेण्यासाठी, माणसाने जीवन समजून घेण्यासाठी आवश्यक अशी मनाची घडण गमावून बसतो आहोत आणि त्याची गरज आहे याकडेही दुर्लक्ष होत आहे. ज्ञान, सद्गुण, सदाचार, सद्भाव, साधेपणा, सहृदयता, संवेदनशीलता, विचारीपणा, संतुलन; या साऱ्यांना तिलांजली देणे सुरु झाले आहे. कधी भलेपणाचा अतिरेक, तर कधी व्यवहारचातुर्याचा अतिरेक पाहायला मिळतो. गैरफायदा घेणे आणि बळी जाणे दोन्ही वाढते आहे. यातून असुरक्षितता, अविश्वास, संशयीपणा, रिक्तता वाढत चालले आहे. मन, बुद्धी, भावना, विचार, जाणीवा; सशक्त, सार्थक आणि व्यापक होण्याऐवजी संकुचित, विसविशीत होत आहेत. संघर्षाची आणि समन्वयाची दोन्ही ताकत माणूस आणि समाज गमावून बसतो आहे. जीवनदृष्टी अशी काही राहिली आहे का असा प्रश्न पडू लागला आहे. जीवन म्हणजे केवळ वाहत राहणे अशीच भूमिका दिसून येते. गरिबी, दुर्बलता, अन्यायग्रस्तता म्हणजे आक्रस्ताळेपणाला सूट; तसेच श्रीमंती, बलसंपन्नता म्हणजे अधिकाराची सूट असेच चित्र पुढे येते आहे. संस्कृती म्हणजे जर जीवनदृष्टीचा विस्तार आणि त्याला अनुसरून व्यवहार हा असेल; तर दुर्दैवाने म्हणावे लागेल की संस्कृतीची घसरण सुरु आहे. व्यक्ती आणि समाजाच्या जीवनातील सत्ता आणि संपत्तीकडे झुकलेला लंबक जोवर ज्ञान, गुणसंपन्नता आणि आत्मभावाच्या विकासाकडे झुकत नाही तोवर ही घसरण सुरूच राहील. ढळलेला हा तोल प्रस्थापित करण्याचे आव्हान विचारी सारस्वतांपुढे आ वासून उभे आहे.
- श्रीपाद कोठे
नागपूर

मंगळवार, १९ डिसेंबर, २०१७

`सत्ताप्रधान' की `धर्मप्रधान'


इतर अनेक गोष्टींप्रमाणे इंग्रजांनी आम्हाला सांगितलं- सत्ताप्रधान समाज म्हणजेच खरा समाज. समाज काय, देश काय, मूल्यं काय; चांगले आणि वाईट, योग्य आणि अयोग्य, अधिकृत आणि अनधिकृत यांचे मापदंड; सगळ्या सगळ्याचा विचार `सत्तेच्या संदर्भात' करायचा. आम्ही ते गुपचूप स्वीकारलं. आज त्याचा महावृक्ष झाला आहे. अखंड, विशाल राजकीय सत्ता नसतानाही आम्ही देश आणि समाज म्हणून एक होतो. सगळा देश मुस्लिम सत्तेने व्यापला असतानाही हा `हिंदोस्ता' होता. आम्ही `भारतवासी नाही' असे औरंगजेबसुद्धा म्हणत नव्हता. आता एकछत्री सत्ता असतानाही- `आम्ही भारतवासी नाही' हे म्हणणारी झुडुपं उगवत आहेत. जे असं म्हणत नाहीत आणि `आम्ही भारतवासी आहोत' असं म्हणतात; त्यांच्याही मनात- दुसऱ्या भाषेचा, दुसऱ्या जातीचा, दुसऱ्या संप्रदायाचा, दुसऱ्या प्रांताचा, दुसऱ्या (शेजारच्या) घरातला म्हणजे `आम्ही नाही' हे स्पष्ट असतं. का झालं असं? `धर्मप्रधान' समाजाला `सत्ताप्रधान' समाजात बदलण्याच्या इंग्रजांच्या धूर्तपणामुळे. आम्ही त्याचे बळी ठरलो आहोत का, अशी शंका घ्यावी अशीच आज स्थिती आहे. तूर्त पाकिस्तानचे एक बाजूला ठेवू. परंतु नेपाळ, श्रीलंका यासारख्या संस्कृती आणि मानस वेगळे नसलेल्या प्रदेशांबाबत `आम्ही' हा भाव आहे का आपल्या मनात? लगेच प्रश्न येईल- तो वेगळा देश आहे. कारण? कारण तेथे सत्ता वेगळी आहे. सत्ता हाच देशाचे एकत्व ठरवण्याचा एकमेव मापदंड. `सत्ताप्रधानता' हाच एकमेव संदर्भ.
समाज, देश, भाषा, अस्मिता, मूल्यं; जे जे म्हणून काही असेल त्याचा `आम्ही' म्हणजे सत्ता. त्यामुळे `भाषा' ही मानवी जीवनाचे एक अंग म्हणून कमी पाहिली जाते आणि तिला मिळणारा सत्ताश्रय आणि त्यातून निर्माण होणारी तिची सत्ता हेच महत्वाचे ठरते. ही `सत्ताप्रधानता' इतकी हाडीमासी खिळते की, आधी जेवणारे सत्ताधारी आणि वाढणारे गुलाम !!! कोणाला तरी वाढावे लागणारच. बरे, बफे ठेवला तरी, ती व्यवस्था करणारे नंतरच जेवणार; म्हणजे गुलामच; म्हणजे शोषित, अन्यायग्रस्त; वगैरे वगैरे वगैरे. व्यवहारातील छोट्या छोट्या गोष्टींपासून, मोठमोठ्या गोष्टींपर्यंत हेच. राजकीय पक्षांच्या आधारावर आज समाजात असलेले मतभेद, वादंग, संघर्ष हे या `सत्ताप्रधान' विचारांचेच परिणाम आहेत. याच विचारांनी आणि भावनांनी भारताची आणि भारतीय समाजाची एकता अनेक अर्थांनी मोडीत काढली आहे. स्वामी विवेकानंद, गांधीजी, योगी अरविंद, डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, दीनदयाळ उपाध्याय, दत्तोपंत ठेंगडी; या सगळ्यांनी हेच सांगण्याचा आणि शिकवण्याचा प्रयत्न केला.
`सत्ताप्रधानता' या समाजाच्या गळी उतरवणे आणि या समाजाला `धर्मप्रधान' बनवणे याचा हा संघर्ष १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धापासूनच सुरु झाला. तरीही त्याला आजचे स्वरूप यायला मोठा काळ जावा लागला. अगदी पन्नास वर्षांपूर्वी सुद्धा- पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची अंत्ययात्रा समोरच्या मार्गाने जात असताना, दिल्लीतील काँग्रेस भवनावरचा पक्षाचा ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला होता. आज असं चित्र दिसू शकेल का? मुळात `सत्ताप्रधानता' आणि `धर्मप्रधानता' म्हणजे काय? स्वतंत्र चर्चेचा विषय असला तरी; एवढे निश्चित की, जीवनातील सत्तेची गरज आणि भूमिका कमीत कमी असणे; किंबहुना सत्तेची गरजच राहणार नाही असं जीवन असणे; म्हणजे `धर्मप्रधानता'. अन, जीवनातील सत्तेची गरज आणि भूमिका अधिकाधिक असणे म्हणजे `सत्ताप्रधानता'. कम्युनिस्टांनी `सत्ताशून्य' समाजाची कल्पना मांडली आणि भारताने `सत्तानिरपेक्ष' समाजाची कल्पना मांडली. `सत्ताशून्य' समाज अशक्य आहे. त्यातून अराजक निर्माण होते. ते टाळण्यासाठी सत्तेचं अधिकाधिक केंद्रीकरण होत जातं. भांडवलशाही तर उघडउघड `सत्ताप्रधान' आहे. तीच भांडवलशाहीची आकांक्षाही आहे. भारताने मात्र `सत्तानिरपेक्ष' `धर्मप्रधान' समाज प्रत्यक्ष साकारून दाखवला आहे. भारताचा मोठा इतिहास, किंबहुना संपूर्ण इतिहास `सत्तानिरपेक्ष' `धर्मप्रधान' असाच आहे.
२०१४ साली भाजपा सत्तेवर आल्यानंतर जागतिक प्रसारमाध्यमांनी ज्या ऐतिहासिक परिवर्तनाचा उल्लेख केला त्याचा आशयच मुळात भारत आता `सत्तासापेक्षतेकडून' `सत्तानिरपेक्षतेकडे' जाऊ शकेल, असा होता. भारताला `धर्मप्रधान' रूप देण्याच्या १८५७ पासूनच्या प्रयत्नांचा आणि चिंतनाचा संदर्भ त्याला होता. भाजपा हा त्या प्रयत्नांचे आणि चिंतनाचे एक प्रतिक आहे या धारणेतून त्या माध्यमांनी काढलेला तो निष्कर्ष होता. भाजपचा विजय आणि सत्तारूढ होणे हा त्या प्रयत्नांमधील आपद्धर्म असणारा, अपरिहार्य असा टप्पा आहे. `सत्ताप्रधानतेच्या' वर्तमान वास्तवातून `सत्तानिरपेक्षतेच्या' भविष्याकडे वाटचाल करण्यासाठीची ही संधी आहे. या संधीचं नेमकं आकलन आणि पुढील वाटचाल हे एक मोठे आव्हान आहे. भारताला `सत्तानिरपेक्ष धर्मप्रधानतेकडे' घेऊन जाण्यात यश मिळेल की, `सत्तासापेक्ष सत्ताप्रधान' प्रयत्न, व्यवस्था आणि मानसिकता यांच्या लाटेत ही संधी वाहून जाईल हे तर काळच सांगेल. तुमच्या आमच्या मनातील `सत्ताप्रेम' अधिक असेल तर संधी वाहून जाईल.
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, १९ डिसेंबर २०१७

सोमवार, ११ डिसेंबर, २०१७

महात्मा गांधींचे अर्थचिंतन


`अर्थ' या विषयाचा विचार करताना स्वाभाविकच महात्मा गांधी यांचा विचार केला जातो. परंतु गांधीजींनी `अर्थ' या विषयाबाबत काय विचार वा मते मांडलीत याकडे वळण्यापूर्वी, एका गोष्टीची खूणगाठ बांधणे आवश्यक आहे की, गांधीजींचा आर्थिक विचार हे त्यांचे अर्थशास्त्र नाही. शास्त्र म्हणून त्यांच्या विचारांकडे पाहता येणार नाही. `शास्त्र' या संज्ञेसाठी ज्या पद्धतीचा अभ्यास आणि मांडणी हवी, तशी ती नाही. त्यामुळे प्रचलित अर्थाने ते शास्त्र नाही. गांधीजींचा अर्थविचार हे अर्थचिंतन आहे आणि अर्थशास्त्राला आधार देण्याचीही त्यात क्षमता आहे. असे असले तरीही त्यांच्या अर्थचिंतनात माहितीचा वा घडामोडींचा अभाव आहे, असे मात्र नाही. त्यांचे जीवन हे अतिशय कर्ममय जीवन होते. बालपण असो, इंग्लंडमधील शिक्षणासाठीचे वास्तव्य असो, व्यवसायानिमित्तचा दक्षिण आफ्रिकेतील दीर्घ निवास असो, की भारतात परतल्यानंतरचा स्वातंत्र्यलढ्यातील दीर्घ सहभाग असो; अनुभवांचे समृद्ध भांडार त्यांच्याकडे होते. घडामोडी, लोकस्थिती, गरजा, व्यवस्था, समस्या यांची अतिशय चांगली जाण त्यांना होती. या साऱ्याबाबत त्यांना जे वाटले ते त्यांनी वेळोवेळी बोलून वा लिहून प्रकट केले. एखाद्या समस्येवरील वा विषयावरील प्रबंध असे त्याचे स्वरूप नाही. वेळोवेळी त्यांनी दिलेले responses आणि स्वतंत्र भारताचे चित्र रेखाटताना त्यांनी केलेले रेखाटन म्हणजे गांधीजींचे विचार. त्यांच्या दुर्दैवी हत्येनंतर त्यांच्या या विस्तृत लिखाणातून आणि भाषणातून विषयवार संकलन करून अनेकांनी ते समाजापुढे ठेवले. त्यानंतर विविध विषयांच्या अनुषंगाने गांधीजींच्या चिंतनाचा मागोवा घेतला जाऊ लागला.
समाजातील शेवटचा माणूस हा त्यांच्या सगळ्या विचारांचा केंद्रबिंदू होता. कोणतीही योजना, कोणताही कार्यक्रम, कोणताही उपक्रम त्या शेवटच्या व्यक्तीला सक्षम बनवतो का? त्याला वर उचलतो का? ही त्यांची कसोटी होती. त्यासाठी त्यांनी `अंत्योदय' असा शब्द वापरला. रस्किनच्या `unto this last' याचा तो भावानुवाद. अर्थविचाराला सुद्धा हीच कसोटी ते लावीत असत. या अखेरच्या व्यक्तीचे चांगले जीवन हा त्यांचा ध्यास होता. तो त्यांच्या आर्थिक विचारांचा हेतू होता. हा हेतू साध्य करण्यासाठीचे प्रयत्न, पद्धती, व्यवस्था यांचा त्यांनी उहापोह केला. अन हे साकार करण्यासाठी आधारभूत विचार आणि तत्वज्ञान यांचीही त्यांनी चर्चा केली. हेतू, प्रक्रिया आणि आधारभूत विचार असे त्यांच्या अर्थचिंतनाचे तीन पैलू म्हणता येतील.
स्वयंपूर्ण गावे हा गांधीजींच्या सामाजिक आणि आर्थिक विचारांचा एक महत्वाचा घटक. बहुसंख्य भारतीय जनता आजही छोट्या गावांमध्ये आणि छोट्या शहरांमध्ये राहते. गांधीजींच्या काळी तर हे प्रमाण फार मोठे होते. या लाखो गावात विखुरलेल्या कोट्यवधी लोकांचा विचार प्राधान्याने करायला हवा असे त्यांचे मत होते. या कोट्यवधी लोकांचे दारिद्र्य, त्यांची भूक, त्यांचे आरोग्य, त्यांच्या वेळेचा सदुपयोग; हे सारे गांधीजींच्या चिंतनाचे विषय होते. आदर्श खेड्याची त्यांची कल्पना मांडताना ९ जानेवारी १९३७ च्या `हरिजन'मध्ये गांधीजी म्हणतात- `हिंदुस्थानातील आदर्श खेड्याची रचना अशी असेल की जेथे संपूर्ण स्वच्छता ठेवणे सुकर होईल. या खेड्यातील घरांची रचना भरपूर उजेड आणि हवा खेळत राहण्यासारखी असेल आणि घरांचे सामान असे वापरलेले असेल की जे त्या गावच्या आसपासच्या पंचक्रोशीत मिळण्याजोगे असेल. घरांच्या पुढे मोकळी जागा असेल आणि त्यात घरमालकाला त्याच्या घरच्या वापरासाठी भाजीपाला लावता येईल. गुराढोरांकरिता निवारा करता येईल. खेड्यातले रस्ते आणि गल्ल्या या काढून टाकता येण्यासारख्या धुळीपासून मुक्त असतील. गावच्या गरजेप्रमाणे गावात विहिरी असतील आणि त्या सर्वांना वापरता येण्यासारख्या असतील. गावात सर्वांच्याकरिता उपासनागृहे असतील. एक सार्वजनिक सभागृह असेल. गावची गुरे चारण्याकरिता एक सामयिक कुरण असेल. सहकारी दूधपुरवठा केंद्र असेल. प्राथमिक व दुय्यम शाळा असतील. तेथे औद्योगिक शिक्षणाला मध्यवर्ती स्थान असेल. गावची पंचायत असेल व त्यात तंटे मिटवले जातील. गाव आपले धान्य, भाजीपाला आणि फळे स्वत:च पिकविल. तसेच आपल्याला लागणारी खादी काढील. ही माझी नमुनेदार गावाविषयीची सामान्य कल्पना आहे.'
गावे संपन्न आणि स्वयंपूर्ण राहावीत हा त्यांचा आग्रह होता. अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा आणि त्यासोबत आरोग्य व शिक्षण हे त्यांचे प्राधान्यक्रम होते. प्रत्येक व्यक्तीला हे सारे त्याच्या गरजेप्रमाणे, सहजपणे आणि माफक दरात मिळायला हवे असे त्यांचे प्रतिपादन होते. हे कसे करता येईल यासाठीचे प्रयोगही त्यांनी केले. आहार सकस, पोषक आणि परवडेल असा असला पाहिजे असा विचार मांडताना त्यासाठी त्यांनी प्रयोग केले. असाच एक प्रयोग २२ ऑक्टोबर १९३५ रोजी त्यांनी मगनवाडी येथे केला. वर्ध्याच्या आसपासच्या गावातील कार्यकर्त्यांना त्यांनी जेवायला बोलावले आणि सर्वसामान्य माणसाला झेपेल असा आहार कसा असू शकेल त्याचे प्रात्यक्षिक सगळ्यांना दाखवले. एकूण ९८ लोक जेवायला होते. त्या जेवणात कणिक, टमाटे, गूळ, लाल भोपळा, जवसाचे तेल, दूध, सोयाबीन, नारळ, कवठ, चिंच, मीठ यांचे पदार्थ होते. हा खर्च प्रती व्यक्ती सुमारे सहा पैसे होता. जेवणानंतर गांधीजींनी त्यावर विवेचन देखील केले होते. असे वेगवेगळे प्रयोग आणि प्रत्यक्ष अनुभव आणि निरीक्षण यावर बेतलेले आपले मत व्यक्त करताना १९ ऑक्टोबर १९४७ च्या `हरिजन'मध्ये ते लिहितात- `पहिला धडा आपल्याला शिकायचा आहे तो स्वावलंबनाचा आणि स्वत:च्या बळावर विसंबून राहण्याचा. हा धडा जर आपल्या गळी उतरला तर परक्या देशांवर अवलंबून राहण्याच्या आणि अंती दिवाळखोर बनण्याच्या घातकी अवस्थेतून आपण मुक्त होऊ शकू. अन्नपदार्थांचे केंद्रीकरण करणे घातक आहे असे मला वाटते. विकेंद्रीकरणाने काळ्या बाजाराला सहजच आळा बसतो. इकडून तिकडे वाहतुकीत होणाऱ्या वेळेच्या आणि पैशांच्या खर्चात बचत होते. शिवाय, धान्ये, कडधान्ये पिकवणाऱ्या खेडेगावच्या माणसाला आपली पिके उंदरा घुशींपासून कशी वाचवावीत याचे ज्ञान असते. एका स्थानकातून दुसऱ्या स्थानकात नेताना उंदीर घुशी धान्य खाऊन टाकतात. त्यायोगे देशाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. खंडोगणती धान्याला आपण आचवतो. वास्तविक चिमूट न चिमूट धान्य आपल्याला हवे आहे. जेथे कोठे धान्य काढता येत असेल तेथे ते काढले पाहिजे.' स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षांनीदेखील गांधीजींनी मांडलेला हा विचार महत्वाचा ठरतो. खेडोपाडी उपलब्ध असलेले मनुष्यबळ व साधनसंपत्तीच नव्हे, तर प्रत्यक्ष जगण्यातून त्यांच्या गाठी असलेला अनुभव व कौशल्य हे देखील महत्वाचे आहे यावर त्यांचा भर होता.
गावातील कुटुंबांनी शेतीच्या छोट्या छोट्या तुकड्यांवर शेती करण्यापेक्षा सामूहिक शेती करावी असे त्यांचे मत होते. ते अधिक फायदेशीर व हिताचे ठरेल असे त्यांना वाटत असे. मात्र ही सामूहिक शेती याचा अर्थ आज मांडण्यात येत असलेला corporate शेतीचा प्रकार नव्हे. तसेच वरून लादलेला, सरकारी योजनेचा भाग असेही नव्हे. तर गावातील लोकांनी परस्पर सहकार्य, विश्वास यांच्या आधारावर सामूहिक हित जपण्यासाठी आणि सगळ्या गावच्या भल्यासाठी, उन्नतीसाठी एकत्र येऊन करावयाची शेती, असे त्याचे स्वरूप गांधीजींना अपेक्षित होते. निर्णयप्रक्रिया, विनिमय प्रक्रिया, व्यवसाय इत्यादी पूर्णत: गावातील जनतेच्या हाती असावे आणि सामूहिक शहाणपणाच्या आधारे त्यांनी काम करावे असा त्यांचा विचार होता. जमिनीचा कसदारपणा टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय खते वापरावी. ही सेंद्रिय खते गावातीलच काडीकचरा, टाकून देण्यात येणारे अन्न, झाडपाला, शेण व मानवी विष्ठा यांचा वापर करूनच तयार करावी. खतांसाठी गावाबाहेरील कशावर वा कोणावर अवलंबून राहावे लागू नये अशी त्यांची भूमिका होती. गावांच्या स्वयंपूर्णतेच्या त्यांच्या विचाराला सुसंगत असाच हा विचार होता.
ग्रामीण अर्थकारण आणि जीवन यांचा विचार करताना त्यांनी गायीगुरांचाही विचार समोर ठेवला आहे. या बाबतीत त्यांचा दृष्टीकोन व्यावहारिक आणि भावनिक असा दोन्ही आहे. यासंबंधात १५ फेब्रुवारी १९४२ च्या `हरिजन'मध्ये ते लिहितात- `आज गाय नष्ट होण्याच्या पंथाला लागली आहे. आमचे तिला वाचविण्याचे प्रयत्न यशस्वी होतीलच याची मला खात्री नाही. पण जर ती नष्ट झाली तर तिच्याबरोबर आपणही नष्ट होऊ. आपण म्हणजे आपली संस्कृती. आपली मूळची अहिंसक व ग्रामीण संस्कृती.' गायीगुरांवर प्रेम करणारे आणि त्यांना निर्दयीपणाने वागवणारे असे दोन्ही प्रकारचे लोक असतात याचा उल्लेख करून, निर्दयीपणाने वागणाऱ्या लोकांबद्दल ते लिहितात- `जर आपण आपली रीत सुधारली तर आपण दोघेही वाचू. नाहीपेक्षा दोघेही बरोबर तरू किंवा बुडू.' उपासमार आणि दारिद्र्य यांचा प्रश्न सोडवायचा असेल तर त्यासाठी गायीगुरांचे संरक्षण व संवर्धन आवश्यक आहे असे प्रतिपादन करून, आपल्या ऋषींनी आपल्याला हा उपाय दाखवून दिला आहे, असेही ते नमूद करतात. गायींचे पालनपोषण कसे करावे याबाबत त्यांचा विचार व्यवहार्य आहे. शेतीप्रमाणेच हे सुद्धा सामूहिक सहकार्याच्या पद्धतीने करावे असे त्यांचे मत होते. एकट्या कुटुंबाला आपल्या गुरांची योग्य निगा राखणे, पालनपोषण करणे व्यवहार्य नाही, असे त्यांचे मत होते. `गोरक्षण' हा शब्द बरोबर नसून, `गोसेवा' हे आपले ध्येय असले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते.
जमीनधारणा हा एक मोठा बिकट प्रश्न होता आणि आहे. भूमिहीन आणि जमीनदार असे दोन वर्ग कल्पिले जातात आणि त्यांच्यातील संघर्ष गृहीत धरला जातो. त्यावर गांधीजी म्हणतात- `पहिले पाऊल म्हणून जमीनदार आणि भूमिहीन यांच्यात परस्परांविषयी आदर आणि विश्वास यांचे वातावरण प्रस्थापित झाले पाहिजे. म्हणजे मग वरच्या वर्गात आणि सामान्य समाजात हिंसक संघर्ष होण्याची शक्यता राहणार नाही. वर्गसंघर्ष अपरिहार्य आहे असे मला वाटत नाही.' यावर अधिक प्रकाश टाकताना, अमेरिकेचे एक पत्रकार लुई फिशर यांच्याशी सेवाग्राम आश्रमात १९४२ सालच्या जून महिन्यात चर्चा करताना गांधीजी म्हणाले- `जो कसतो त्याची जमीन आहे हे मला मान्य आहे. परंतु त्याचा अर्थ जमीनदाराचा नाश केला पाहिजे असा करण्याचे कारण नाही. जो मनुष्य बुद्धीचा आणि नाण्यांचा पुरवठा करतो, तो हातांनी श्रम करतात त्यांच्याइतकाच कसणारा आहे. या दोघांमध्ये आज जी भयंकर विषमता आहे ती काढून टाकणे, हे आम्हाला साधायचे आहे.' यावर फिशर यांनी मुद्दा मांडला की, ही सुधारणेची क्रिया फार दीर्घ आहे. त्याला उत्तर देताना गांधीजी म्हणतात- `अत्यंत दीर्घ वाटणारी क्रिया पुष्कळ वेळा अत्यंत जवळची असते.' साम्यवाद आणि भांडवलशाही हे दोन्हीही गांधीजींनी या ठिकाणी सपशेल फेटाळले आहेत. अर्थकारणातील भांडवल आणि श्रम या दोहोंचे महत्व आणि जीवनाचे प्रवाहीपण यांचा एकत्रित विचार करून, एक समन्वयात्मक विचार व्हावा अशीच त्यांची भूमिका होती. अन आपल्या भूमिकेवर ते अतिशय ठाम होते. २ जानेवारी १९३७ च्या `हरिजन'मध्ये ते लिहितात- `खरा समाजवाद आमच्या पूर्वजांकडूनच वारसाने आमच्याकडे आला आहे. त्यांची शिकवण अशी की,
`सभी भोम गोपाल की या मे अटक कहां
जाके मन मे खटक रही सोही अटक रहा'
ईशावास्य उपनिषदाच्या प्रथम मंत्रातील भावार्थच यात प्रकट झाला आहे. अन्यत्र त्यांनी स्पष्टपणे म्हटलेही आहे की, ईशावास्य उपनिषदाचा प्रथम मंत्र हाच त्यांच्या अर्थविचारांचा आधार आणि गाभा आहे.
हाच विषय त्यांनी १५ नोव्हेंबर १९२८ च्या `यंग इंडिया'मध्ये अधिक स्पष्ट केला आहे. ते लिहितात- `हिंदुस्थानची आणि म्हटले तर जगाचीसुद्धा आर्थिक घडण अशी असली पाहिजे की, त्याखाली असणाऱ्या कोणालाही अन्नवस्त्राची ददात सोसावी लागू नये. प्रत्येकाला स्वत:चा निर्वाह करणे शक्य व्हावे इतके काम त्याला मिळावे. जीवनाच्या प्राथमिक गरजांची उत्पादन साधने सर्वसामान्य जनतेच्या हाती राहतील तरच, हे उद्दिष्ट सर्वत्र अमलात आणणे शक्य होईल. ही उत्पादन साधने देवाच्या हवापाण्याप्रमाणे सर्वांना सर्रास उपलब्ध होण्याजोगी असली पाहिजेत. दुसऱ्यांच्या लुबाडणूकीकरिता क्रयविक्रयाचे वाहन त्यांना बनवता कामा नये. कोणाही देशाने, राष्ट्राने किंवा व्यक्तीसमूहाने त्यांची मक्तेदारी करणे अन्यायाचे होईल. या तत्वाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच आज आपण या अभागी देशातच नव्हे तर जगाच्या इतर भागात सुद्धा अठराविश्वे दारिद्र्य पाहत आहोत.'
अर्थशास्त्राच्या मर्यादांची चर्चा करताना १ मार्च १९३५ च्या `हरिजन'मध्ये गांधीजी लिहितात- `अर्थशास्त्राचे सिद्धांत, गणितशास्त्राच्या सिद्धांतासारखे, कधीही न बदलणारे आणि सार्वकालिक व सार्वदेशिक आहेत असे नाही. इंग्लंड फ्रान्सचे अर्थशास्त्र मानणार नाही. फ्रान्स जर्मनीचे मानणार नाही. जर्मनी अमेरिकेचे घेणार नाही. अन त्यांनी ते घेतले तर ती चूक होईल. हिंदुस्थानलाही फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका किंवा जर्मनी यांच्या अर्थशास्त्राप्रमाणे चालणे परवडणार नाही.' प्रत्येक देशाचे अर्थशास्त्र हे त्याच्याजवळ उपलब्ध साधनसंपत्ती, मनुष्यबळ, शिक्षण, संस्कृती, गरजा आदींवर बेतलेले असते आणि ते तसेच असायला हवे. एकमेकांची नक्कल करणे, अनुकरण करणे हिताचे नसते. त्यांचा यंत्रविचारही याच अंगाने जाणारा आहे. त्याविषयी ११ मे १९३५ च्या `हरिजन'मध्ये ते लिहितात- `ज्या देशात जमिनीवर लोकसंख्येचे दडपण सर्वात जास्त प्रमाणात आहे त्या देशाचे अर्थशास्त्र आणि संस्कृती, ज्या देशात हे दडपण सर्वात कमी आहे अशा देशाच्या अर्थशास्त्राहून आणि संस्कृतीहून वेगळेच आहे, असणे भाग आहे. विरळ वस्तीच्या अमेरिकेला यंत्रांची गरज असू शकेल. हिंदुस्थानला त्याची गरज मुळीच असू शकणार नाही. जेथे कोटी कोटीच्या संख्येने श्रम करणारे घटक निष्क्रिय पडले आहेत, तेथे श्रम वाचवण्याचा विचार करण्यात अर्थ नाही. जर एखाद्याने, खाण्याकरिता होणारे हातांचे श्रम वाचवण्याचे यंत्र शोधून काढले, तर खाणे ही आनंददायक क्रिया न राहता तो त्रासच होऊन बसेल. आमच्या दारिद्र्याचे कारण आमचे उद्योगधंदे नष्ट झाले आणि त्याबरोबर बेकारी आली हे आहे. आपण उद्योगी बनले पाहिजे आणि जेथे आज गवताचे एक पाते येते तेथे दोन उगवतील असे केले पाहिजे.'
२२ जून १९३५ च्या `हरिजन'मध्ये वीज व यंत्र यासंबंधीच्या प्रश्नाला गांधीजींनी दिलेले उत्तर त्यांची याबाबतची भूमिका स्पष्ट करणारे आहे. ते म्हणतात- `एखादा समाजवादी सुद्धा यंत्राचा अविवेकी वापर करावा अशा मताचा असणार नाही. छापण्याची यंत्रे घ्या, ती बनणारच; ऑपरेशन करण्याची हत्यारे घ्या, ती हातांनी कशी बरे बनवता येतील? मोठी यंत्रेच त्यासाठी लागणार. परंतु आळसाच्या रोगाला बरे करणारे यंत्र या चरख्यावाचून दुसरे नाही. ते कोणी नष्टही करू शकत नाही.' आजही देशात सर्वत्र पुरेशी वीज उपलब्ध नाही. गांधीजींच्या काळात तर परिस्थिती एकदमच निराळी होती. वीज ही चैनीचीच बाब होती. त्या अनुषंगाने ते म्हणतात- `जेथे वीज नाही तेथे काय करायचे? त्या हातांना काही काम देणार की नाही? की काम नाही म्हणून ते हात तोडून टाकायचे?' त्यांची भूमिका किती व्यवहारी होती हे यावरून लक्षात यावे. यंत्रतंत्र उपयोगा विषयीच्या गांधीजींच्या विचारांची तीन सूत्रे सांगता येतील. १) यंत्रतंत्राचा अंदाधुंद वापर नको. २) गरजा आणि उपलब्धता यांचा सारासार विचार करून त्याचा वापर हवा. ३) मानवी कलाकौशल्य संपुष्टात आणणारा, हातापायांचा- शरीराचा वापर करण्याची शक्ती हिरावून घेणारा आणि मनुष्यबळाला बेकार बनवणारा यंत्रतंत्राचा वापर नसावा. यंत्रतंत्राचा वापर विवेकी असला पाहिजे हाच त्याचा आशय. लोकांची तातडीची कापडाची गरज भागवण्यासाठी त्याकाळी चरख्या शिवाय दुसरा उत्तम उपाय नव्हता हे आजही नीट विचार केल्यास लक्षात येईल. चरखा सहजपणे उपलब्ध होता. कापूस सहज उपलब्ध होता. त्याला मानवी श्रमाची जोड देऊन सगळ्यांना कापड उपलब्ध होऊ शकेल ही त्यांची व्यवहारी भूमिका होती. वीज, कारखाने, वाहतूक, सूत व कापड गिरण्या, देशव्यापी बाजारपेठ; या सगळ्याच्या अभावी कोट्यवधी लोकांची साधी कापडाची गरज भागू नये हे लाजिरवाणे होते. गांधीजींचा चरख्याचा विचार हा त्या प्रश्नाला उत्तर देण्यातून पुढे आला होता.
देशाच्या विविध राज्यात सत्तारूढ असलेल्या कॉंग्रेस मंत्रिमंडळातील उद्योग मंत्र्यांची एक परिषद पुण्याच्या कौन्सिल हॉलमध्ये ३१ जुलै १९४६ रोजी भरली होती. जनतेला स्वातंत्र्याचा आशय पटावा यादृष्टीने आपले आर्थिक धोरण काय असावे इत्यादी प्रश्नांवर त्या परिषदेत चर्चा झाली. गांधीजींचेही त्या परिषदेपुढे भाषण झाले. खेडेगावाला पूर्ण घटक समजून त्याची प्रतिष्ठा आणि दर्जा कसा वाढेल यावर त्यांनी त्या भाषणात उहापोह केला होता. ते म्हणाले- `हिंदुस्थानला आणि त्याच्या द्वारे जगाला स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर लोकांना शहरात न राहता खेड्यात राहावे लागेल. ही गोष्ट आज ना उद्या मान्य करावीच लागेल. शहरात आणि महालात करोडो लोक एकमेकांशी गुण्यागोविंदाने राहणे कधीही शक्य होणार नाही. तशा स्थितीत त्यांना हिंसा आणि असत्य यांचा आसरा घेण्यावाचून गत्यंतर राहणार नाही. सत्य आणि अहिंसा नसेल तर मानव समाजाला विनाशा खेरीज भवितव्य नाही, असे मी मानतो. सत्य अहिंसा ग्रामजीवनाच्या साधेपणातच अमलात आणणे शक्य आहे. हा साधेपणा चरख्यात व त्याने व्यक्त होणाऱ्या सर्व गोष्टीतच उत्तम रीतीने आढळण्यासारखा आहे. आज जग चुकीच्या मार्गाने जात असेल तर मी बावरून जाण्याचे कारण नाही. कदाचित हिंदुस्थान सुद्धा त्या मार्गाने जाईल आणि गोष्टीतल्या त्या पतंगाप्रमाणे, ज्या ज्योतीच्या भोवती तो अधिकाधिक भयानक रीतीने नाचत आहे तिच्यात जळून खाक होईल असा संभव आहे. परंतु माझ्या जीवात जीव आहे तोवर त्याला आणि त्याच्या मार्फत साऱ्या जगाला अशा मृत्यूपासून वाचविण्याचा प्रयत्न करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की, मनुष्याने आपल्या ज्या खऱ्याखुऱ्या गरजा असतील तेवढ्या भागवून संतोष मानावा व स्वयंपूर्ण व्हावे.'
कारखानदारीच्या संस्कृतीवर अहिंसा उभी करता येणार नाही आणि हिटलरच्या मनात आले तरी ७ लाख स्वयंपूर्ण खेडी तो नष्ट करू शकणार नाही, असाही विचार त्यांनी मांडला होता. लुबाडणूक ही देखील हिंसाच होय असे त्यांचे मत होते. मानवी जीवनासाठी उद्योग आवश्यकच आहेत. पण याची सुरुवात खालून व्हायला हवी. ग्रामोद्योग, कुटीरोद्योग, हस्तोद्योग यापासून सुरुवात व्हावी. ज्या गोष्टी त्या उद्योगांनी तयार करता येण्यासारख्या आहेत त्या तेथेच तयार व्हाव्यात. ज्या तेथे तयार होऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी टप्प्याटप्प्याने मोठे उद्योग असावेत अशा मताचे ते होते. सरकारला पैशाच्या स्वरुपात जसा कर देण्यात येतो, तशीच श्रमाच्या स्वरुपात कर देण्याची व्यवस्था असावी अशीही त्यांची सूचना होती. त्याने पैशाचा व्यवहार देखील नियंत्रित होऊ शकेल अशी त्यांची भूमिका होती.
१९४० च्या जुलै महिन्यात त्यांची काही अमेरिकन अभ्यासकांशी चर्चा झाली. खादी आणि इतर अनेक हस्तोद्योग हे मुळातच अर्थशास्त्रात न बसणारे उद्योग आहेत असे मत त्या अभ्यासकांनी व्यक्त केले. यावर गांधीजी त्यांना म्हणाले- `आजच्या ह्स्तोद्योगाच्या मालाशी तुलना करता कारखान्यातील माल अर्थशास्त्रात बसण्याजोगा आहे हे त्याचे स्वरूप त्याचा मुलभूत गुणधर्म नव्हे, तर तो आरोपित गुण आहे. समाजाने जे मूल्यपरिमाण मान्य केले किंवा मान्य करणे इष्ट मानले त्यावर तो गुण अवलंबून आहे. एखादा व्यवसाय किंवा उत्पादनपद्धती अर्थशास्त्राला धरून आहे की नाही याची ठाम कसोटी एकच; ती ही की, जीवनाच्या अत्यंत आवश्यक गरजा ती पद्धती कितपत भागविते आणि उत्पादकाला त्या उत्पादनातून किती लाभ होतो.' याच चर्चेत शहरीकरण हाही विषय होता. शहरीकरणाला गांधीजींचा ठाम विरोध होता. परंतु त्यासाठी आजच्या शहरी लोकांना खेड्यात पाठवावे असे त्यांचे मत नव्हते, तर शहरांवर आधारित खेडी, याऐवजी खेड्यांवर आधारित शहरे; अशी रचना आणि योजना असावी अशी त्यांची भूमिका होती. यातून हळूहळू आकार घेत एक समन्यायी चित्र आकारास येईल असा त्यांचा होरा होता.
स्वतंत्र भारताच्या आर्थिक सशक्तीकरणाविषयी बोलताना १९४७ च्या मे महिन्यात ते म्हणाले होते- `कॉंग्रेस अनुयायांनी केंद्रीय नियोजन आणि राक्षसी प्रमाणावर औद्योगीकरण न करता खेड्यामध्ये विकेंद्रीकरणाच्या पायावर विधायक कार्य करण्याची गरज आहे. केंद्रीय नियोजन आणि औद्योगीकरण ही अंती फार मोठी चूक असल्याचे आढळून येईल असे माझे भाकीत आहे. मी तुम्हाला जे सांगत आहे ते तुम्ही आपखुशीने जर न कराल तर परिस्थितीचा दाब ते करण्याला तुम्हाला भाग पाडील.' भारताचे पुनरुथ्थान वरून लादून होणार नाही तर तळागाळातील माणसांना सोबत घेऊन, त्यांच्या मनाला व मेंदूला आवाहन करून, त्यांचा सामूहिक पुरुषार्थ जागवूनच करावे लागेल, ही गांधीजींची भूमिका होती. खूप आधीपासूनच त्यांचे हे विचार होते. २० सप्टेंबर १९४० च्या `हरिजन'मध्ये नियोजनाविषयी गांधीजी लिहितात- `राष्ट्रीय नियोजनासंबंधीचे माझे विचार चालू विचारांहून भिन्न आहेत. मला ते औद्योगिक पद्धतीचे नको आहे. औद्योगीकरणाचा विषारी संसर्ग आमच्या खेड्यांना लागू नये म्हणून मी त्याला प्रतिबंध करू इच्छित आहे. पंडित नेहरूंना औद्योगीकरण पाहिजे आहे. कारण त्यांना वाटते की, जर त्याच्यावर समाजाचा ताबा असला तर भांडवलशाहीच्या अनिष्ट गोष्टींपासून ते मुक्त राहील. माझे स्वत:चे मत असे आहे की, त्या अनिष्ट गोष्टी औद्योगीकरणातच मुळात आहेत आणि कितीही समाजवाद आणला तरीही त्या मुळासकट काढून टाकता येणार नाहीत.' पंडित नेहरूंच्या मिश्र अर्थकारणाला गांधींचा किती ठाम आणि कडवा विरोध होता हे यातून स्पष्ट होते. या संदर्भात कॉंग्रेस वर्किंग कमिटीत चर्चा झाली होती. तसेच गांधीजी व पंडित नेहरू यांच्यात पत्रव्यवहार आणि प्रत्यक्ष चर्चाही झाली होती. ते सारे मुळातून वाचण्यासारखे आहे. एक मात्र निश्चित की, भारताच्या आर्थिक धोरणांविषयी, आर्थिक रचनेविषयी, नियोजनाविषयी या दोन्ही नेत्यात एकवाक्यता तर नव्हतीच उलट मतभेद होते. अन हे मतभेद त्यांनी लपवून ठेवले नाहीत हेही खरे. स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरू पंतप्रधान झालेत आणि गांधीजींची दुर्दैवी हत्या झाली. त्यामुळे स्वाभाविकच स्वतंत्र भारताची आर्थिक घडी पंडित नेहरूंच्या विचाराने घातली गेली. त्यात गांधीजींच्या अर्थविचारांना स्थान नव्हते. प्रयोग या स्वरुपात गांधीजींचे अनुयायी काही कामे करीत राहिले, पण गांधीजींचा अर्थविचार देशाच्या मुख्य प्रवाहाचा विचार झाला नाही. सैद्धांतिक स्वरुपात सुद्धा तो मुख्य प्रवाहात आला नाही वा आणला गेला नाही. सत्ता सांभाळणाऱ्या लोकांना तो नकोच होता आणि गांधींचे अनुयायी आणि त्यांच्या वा त्यांच्या नावाच्या संस्था व्यवहारात सत्तेच्या आणि वैचारिकदृष्ट्या कॉंग्रेसच्या दावणीला बांधलेल्या राहिल्या. हे बंधन तोडून स्वतंत्र भरारी घेणारा एकही अनुयायी गांधींना लाभला नाही.
व्यक्तिगत संपत्तीविषयी गांधीजींचे मत होते की, प्रत्येकाने आपली संपत्ती मर्यादित ठेवावी. प्रत्येक मनुष्य आपली बुद्धी, कौशल्य, क्षमता यानुसार काम करून प्रामाणिकपणे पैसा मिळवू शकतो. काही जण भरपूर पैसा मिळवू शकतील. काही जण कमी मिळवू शकतील. परंतु जे लोक अधिक पैसा मिळवू शकतात त्यांनी तो पैसा फक्त आपला आहे असे समजू नये. आपण मिळवलेली संपत्ती सगळ्यांसाठी आहे. त्यामुळे समाजातील अभाव दूर करण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात श्रीमंत लोकांनी पुढाकार घ्यायला हवा, असे त्यांचे म्हणणे होते. हिंदू समाजात एके काळी प्रचलित असलेल्या आश्रम व्यवस्थेचा उल्लेख करून, एका वयोमर्यादेनंतर आपली सगळी संपत्ती दान करून नि:संग होण्याचा विचारही त्यांनी मांडला आहे. सगळ्यांना चांगले जीवन प्राप्त होण्याचा हाच मार्ग असल्याचे त्यांना वाटत असे. `धरणीमातेकडे सगळ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भरपूर आहे, पण कोणा एकाची हाव मात्र ती पूर्ण करू शकत नाही,' हे त्यांचे वाक्य तर प्रसिद्ध आहे. हे सगळे कसे घडून येईल? केवळ कोणी म्हणतो म्हणून समाज असा वागेल का? गांधीजींनी याचीही चर्चा केली आहे. २३ फेब्रुवारी १९२१ च्या `young india'त ते लिहितात- Our civilization, our culture, our Swaraj depend not upon multiplying our wants--self-indulgence, but upon restricting our wants--self-denial. अन्यत्र ते लिहितात- Jesus, Mahomed, Buddha, Nanak, Kabir, Chaitanya, Shankara, Dayanand, Ramakrishna were men who exercised an immense influence over and molded the character of thousands of men. The world is the richer for their having lived in it. And they were all men who deliberately embraced poverty as their log....In so far as we have made the modern materialistic craze our goal, so far are we going downhill in the path of progress. गांधीजींना काय हवे होते आणि त्यांच्या आर्थिक चिंतनाची दिशा काय होती, हे यावरून स्पष्ट होते.
१) साधेपणा, २) स्वदेशी, ३) स्वयंपूर्ण ग्रामीण जीवन, ४) यंत्रांचा विवेकी वापर, ५) परस्पर सहकार्य, ६) छोट्या उद्योगांना प्राधान्य, ७) श्रमप्रतिष्ठा, ८) अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण सगळ्यांना सहज उपलब्ध असणे, ९) अंत्योदय, १०) प्रत्येक हाताला काम, ११) कामाचा योग्य मोबदला, १२) संपत्तीची स्वनियंत्रित मर्यादा, १३) परस्परावलंबन १४) विश्वस्त कल्पना; हे त्यांच्या आर्थिक विचारांचे ठळक पैलू म्हणता येतील. या सगळ्या बाबी घट्ट पोलादी चौकटीसारख्या नसून त्यांचा वेळोवेळी आढावा घेणेही त्यांच्या विचारात अंतर्भूत आहे. मात्र हा आढावा घेताना आणि निरनिराळ्या योजना, रचना तयार करताना आणि राबवताना, अर्थकारण कशासाठी याचा विसर पडता कामा नये. किंबहुना सर्वप्रथम अर्थकारणाच्या हेतूचा विचार करूनच अन्य बाबी करायला हव्यात. अर्थकारणाचा हा हेतू आहे सामान्य माणसाला देवमानवाकडे वाटचाल करण्यासाठी साहाय्य करणे. खूप सारी संपत्ती, साधने इत्यादी जमवून त्याआधारे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा अथवा ऐहिक उपभोगात आकंठ बुडून जाण्याचा प्रयत्न करणे आणि त्यासाठी साहाय्य करणे; गांधीजींच्या अर्थविचारात बसत नाही. ऐहिकतेचे जडवादी ध्येय समोर ठेवून शांततापूर्ण सुखदायी सहअस्तित्व प्रत्यक्षात येऊ शकणार नाही. उलट तो भस्मासुर ठरेल, असा गांधीजींच्या विचारांचा आशय आहे. आज जगापुढे उभ्या राहिलेल्या आर्थिकच नव्हे तर; सामाजिक, राजकीय, सामरिक, भौगोलिक, आरोग्यविषयक, पर्यावरण विषयक, मानसिक, शारीरिक आदी समस्यांचे विकराळ सर्वभक्षी रूप पाहिले की, रस्ता चुकल्याची जाणीव होते. अशा वेळी पुढील मार्ग कोणता याचा विचार करताना गांधीजींच्या चिंतनाचा विचारही करणे क्रमप्राप्त ठरते. ते टाळता येऊ शकत नाही.
स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षात बहुतांश काळ सत्तेवर असलेल्या आणि गांधीजींचा वारसा सांगणाऱ्या कॉंग्रेसने त्यांच्या विचारांची उपेक्षाच केली. तीन वर्षांपूर्वी केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने, त्याची छबी गांधीविरोधी असूनही त्यांच्या विचाराकडे लक्ष वळवलेले दिसून येते. त्यांच्या अनेक कल्पनांना अनुसरून योजना आखण्याचा प्रयत्नही होताना दिसतो. मात्र, अर्थकारणासाठी अर्थकारण अथवा पैसा निर्मितीसाठी अर्थकारण अशी भूमिका न ठेवता; जीवनासाठी अर्थकारण आणि जीवन म्हणजे आध्यात्मिक परिपूर्णता; हा आशय कायम नजरेपुढे असायला हवा. जडवादी, ऐहिक, उपभोगप्रधान जीवनादर्श समोर ठेवून गांधीजींच्या कल्पना राबवणे हे गांधी विचारांशी सुसंगत ठरणार नाही. ते भारताच्या व संपूर्ण मानवतेच्या हिताचे ठरेल का? याचाही शांतपणे विचार व्हायला हवा. हे आध्यात्मिक जीवनादर्श समाजात रुजवणे, प्रतिष्ठीत करणे, जोपासणे; ही निर्मळ अर्थकारणाची प्राथमिक आवश्यकता आहे. हेच गांधीजींचे अर्थचिंतन आहे.
- श्रीपाद कोठे