मंगळवार, ४ जुलै, २०१७

अन्नदाता सुखी भव - ३


`अन्नदाता सुखी भव'चा तिसरा भाग लिहिणं काही ना काही कारणाने पुढे जात राहिलं. आज सकाळी एक बातमी वाचण्यात आली आणि वाटलं- कदाचित या बातमीसाठीच लिखाण पुढे ढकलत जावं लागलं असेल. नियती खेळवते म्हणतात ते हेच. काय होती बातमी? अमेझॉन या ऑनलाईन विक्री कंपनीच्या प्रमुखाला आपली पाच लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकची संपत्ती दान करावयाची आहे. बातमीच्या शेवटी एक उल्लेख असाही आहे की, जगातल्या १६० हून अधिक लोकांना आपली अवाढव्य संपत्ती दान करायची आहे. ही संपत्ती कुठे आणि कशी दान करायची या चिंतेत हे लोक आहेत. आजच्या अर्थकारणाचा फार महत्वाचा भाग या ठिकाणी विचारात घ्यावा लागतो. आजचे अर्थकारण पैसानिर्मिती करणारे अर्थकारण आहे. त्या ऐवजी अर्थकारण हे पुरेसा पैसा खेळवणारे अर्थकारण हवे. पैशाची (विनिमयाचे साधन) निर्मिती हा अर्थकारणाचा महत्वाचा पैलू आहेच, पण अर्थकारण त्याच ठिकाणी थांबता कामा नये. आज तसे ते थांबते.
वास्तविक निसर्गचक्र, जीवनचक्र, विचारचक्र, स्वरचक्र यासारखेच अर्थचक्र असायला हवे. ही चक्र कल्पना फार महत्वाची आहे. या संपूर्ण अस्तित्वाचाच तो आधार आहे. हे अस्तित्व चक्रीय आहे. निसर्ग हे त्याचे फार सुंदर आणि लक्षणीय उदाहरण आहे. नेमके आजच्या विचारपद्धतीत ही चक्रकल्पना missing आहे. तेच अर्थकारणालाही लागू आहे. अर्थाचे एक चक्र हवे. त्या चक्रात आवश्यक आणि पुरेसा पैसा हवा. पण चक्र नसेल तर पैसा कितीही असला, आवश्यकतेपेक्षा कितीही अधिक असला तरीही तो फक्त एकाच, म्हणजे वरच्या दिशेने जाईल आणि खालच्या दिशेला त्याचा अभाव अधिकाधिक जाणवेल आणि त्याचा त्रास होईल. शरीरातील रक्त फक्त हृदयाकडेच जात राहिले किंवा फक्त हृदयाकडून जात राहिले तरी अनर्थ होईल. रक्त डोक्यापासून पायाकडे, पायापासून डोक्याकडे आणि हृदयापासून हृदयाकडे जात राहायला हवे. ते खेळते राहायला हवे. आणि गरजेपेक्षा अधिक सुद्धा असायला नको. त्याचे शरीरातील प्रमाण निश्चित असते.
आज याचा विचार अर्थकारणाच्या संदर्भात होत नाही. समाजशरीरात आज गरजेपेक्षा किती तरी जास्त पैसा आहे. तोही claim असलेला. unclaimed वेगळाच. मग एवढा पैसा असूनही दारिद्र्य का? शेतकरी आत्महत्या का? शेतकरी कर्जबाजारी का? कारण पैसा फिरत नाही. पैशाची निर्मिती होऊन उपयोग नाही तो फिरायलाही हवा. पुन्हा एकदा हेही लक्षात घ्यायला हवे की तो गरजेहून अधिक सुद्धा नको. हे कसे साधता येईल? पुन्हा एकदा शरीराचे उदाहरण घ्यावे लागेल. हात, पाय, धड, डोळे, कान, नाक, मेंदू हे सारे आपापले काम करतात. हे कामच त्यांच्याकडे रक्त खेचून आणते, त्यांच्यापासून रक्त परत पाठवते आणि हे चक्र सतत सुरु राहते. आणखीन एक- प्रत्येक अवयव, प्रत्येक पेशी आपापले काम करते, मात्र ते काम म्हणजे रक्त तयार करणे नव्हे. रक्तपुरवठ्याशिवाय अवयव काम करू शकणार नाहीत, अवयवांनी काम केले नाही तर शरीर राहू शकणार नाही. पण रक्त तयार करण्याचे आणि पुरवण्याचे काम फक्त हृद्य करीत असते. आजच्या यंत्र-तंत्र युगाने जी यांत्रिक विचारपद्धती उत्पन्न केली त्यात हा विचार होत नाही. संपूर्ण शरीर एक संपूर्णता आहे. त्यामुळे हृदय जे रक्त तयार करतं ते केवळ हृदयाचे नसून संपूर्ण शरीराचे असते. त्यामुळे ते देताना ते संकोच करीत नाही. हृदयाने तयार केलेले रक्त स्वीकारताना अन्य अवयव त्यात कमीपणा वा अपमान मानत नाहीत. आणि ही देवाणघेवाण गरजेनुसार असल्याने अधिक ओरबाडणे, साठवून ठेवणे, संग्रह करणे इत्यादी गोष्टींना वाव नाही. हे अर्थकारणाला लावून पाहिले की अनेक गोष्टींचा उलगडा होतो.
आज आमच्या विचारशून्यतेने आम्ही अनर्थ ओढवून घेतला आहे. हे संपूर्ण अस्तित्व, ही प्रकृती एक संपूर्णता आहे हे लक्षात न घेऊन, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक अस्तित्व वेगळे आहे असे आम्ही मानतो. त्यानुसार प्रत्येक अस्तित्वाने आपापले रक्त तयार करावे आणि त्या भरवशावर जगावे असे मानतो. नेमकी चूक इथे होते. प्रत्येक अवयव आपापले रक्त तयार करू लागला तर रक्ताचे फिरणे थांबेल आणि शरीर संपून जाईल. अर्थकारणाच्या संदर्भात हा विचार कसा करता येईल. जगण्यासाठी पैसा हवा हे निर्विवाद. हा येणार कुठून? त्यासाठी प्रत्येकाने काम करायला हवे. निर्विवाद. पण हे काम म्हणजे पैसा निर्माण करणे नव्हे हे लक्षात घ्यायला हवे. शरीराची प्रत्येक पेशी काम करते. पण ते काम म्हणजे रक्त तयार करणे नव्हे, तसेच प्रत्येकाने काम करायलाच हवे. ती जगण्याची मुलभूत गरज आहे. मात्र काम करणे म्हणजे पैसा तयार करणे नव्हे. आपल्या conditioning मुळे हे समजायला थोडे किचकट आहे, पण ते समजून घेण्याशिवाय पर्याय नाही. प्रत्येकाने काम करायला हवे, प्रत्येकाला काम करता यायला हवे. पण काम करणे आणि पैसा यांचा जो संबंध आज आपण जोडलेला आहे तो तोडायला हवा. काम म्हणजे रोजगार म्हणजे पैसा हे समीकरण बदलायला हवे.
प्रत्येक गोष्ट ज्यावेळी पैशात मोजली जाते त्यावेळी त्याला किंमत प्राप्त होते. सगळ्या गोष्टींची किंमत सारखी नसते. मागणी पुरवठ्या नुसार किमती ठरतात. त्याला परिस्थितीची जोड असते. त्यामुळे किंमत या स्वरुपात सगळ्यांना सारखा न्याय देताच येत नाही. म्हणूनच सोने, मोबाईल, शिकवणे, साहित्यनिर्मिती, कलासाधना, घर सांभाळणे, शेतीमाल यांच्या किमती सारख्या राहू शकत नाहीत. त्यांचे मूल्य आणि त्या मूल्याचे महत्व कमी होत नाही, संपत नाही. शेतीमालाचे जगण्याच्या संदर्भातले मूल्य आणि महत्व अजिबात कमी होऊ शकत नाही. तसेच घर सांभाळण्याचे किंवा शिकवण्याचे किंवा कलासाधनेचे किंवा साहित्य निर्मितीचेही. पण या सगळ्या गोष्टींची किंमत सारखी राहू शकत नाही. तसेच यातील सगळ्या गोष्टी पैसा निर्माण करू शकत नाहीत. आज मात्र आम्ही या प्रत्येक कामाला पैसा निर्माण करण्यात लावतो. यामुळे पैसा तर निर्माण होत नाहीच उलट त्याचा दर्जा आणि मूल्य कमी होते आहे. त्याचा फटका एकूण जगण्याला बसतो आहे. (क्रमशः)
- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, १८ जून २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा